सध्या काय वाचताय? - भाग ८
याआधीचे भागः १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७
बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
***************
तारा वनारसे यांचे 'तिळा तिळा दार उघड' वाचून संपविले, खरेतर पुरवून पुरवून वाचले. हे छोटेखानी पुस्तक प्रवासवर्णन, ललित, अनुभवकथन या पारंपारिक वर्गवारीत मोडत नाही पण या तिन्ही गोष्टींचे अतिशय रसाळ मिश्रण आहे. एखाद्या परिसराकडे पहाताना त्याच्या इतिहासाशी समरसून आणि तो परिसर ज्यांनी विशेष बनविला आहे त्यांच्या साहित्यातल्या/कलाकृतीत त्या परिसराच्या खुणा शोधत दोन्हींचा एकत्रित, संपूर्ण अनुभव घेण्याची आणि त्याबद्दल अतिशय प्रभावी लिखाण करण्याची पद्धत अनोखी आहे.
पहिला प्रदीर्घ लेख 'हॉवर्थच्या परिसरात' हा माझ्या काही व्यक्तिगत आठवणींशी साधर्म्य असल्याने आणि त्यातील तीव्र उत्कटता मी अनुभवली असल्याने मला सर्वाधिक जवळचा वाटला. एमिली आणि शार्लट ब्रॉंटेच्या शब्दांचे प्रतिध्वनी ऐकत ऐकत ताराताई हॉवर्थच्या परिसरात भटकतात. मनातल्या साहित्यकृती, लेखिकेबद्दलची आत्मीयता यांसह त्या परिसराशी त्या एकरूप होतात आणि मनातल्या प्रत्येक भावनिक-आत्मीक तरंगांबद्दल त्या तितक्याच प्रभावीपणे लिहितात. मूर्सलॅंडबद्दल लिहिताना त्या म्हणतात,
"वारा सुसाटपणे कुठून कुठून येतो. मन मानेल तसा पिंगा घालतो. गोल गोल घुमून वर आभाळात उधळतो. पुन्हा पुन्हा हेदरला झोडपून काढतो. त्याचा तो धिंगाणा सहन करायला हेदरसारखा जिवटपणाच पाहिजे. त्याचं भणाणा गाणं मूर्सवर एकसारखं घुमत असतं आणि त्यात लॅपविंग आणि कर्लू पक्षांच्या केका मिसळतात. मूर्सच्या गाभ्यापाशी दुसरे आवाज नाहीत. निसर्गाच्या सौंदर्याचे नेहमीचे संकेत इथं सापडणार नाहीत. डोळ्यांना सहज आल्हाद देणारं कोवळं मार्दव इथं नाही. तसाच क्षणिक दरारा दाखवणारा निसर्गाचा लहरी अविष्कारही इथं नाही. माणसाला जर मूर्सवर सौंदर्य शोधायचं असेल तर त्याने ते आपल्याबरोबर तिथंवर न्यायला हवं असं शार्लट म्हणते ते एकापरीनं खरं आहे."
हे अनुभव ह्रद्य आहेत, अभ्यासू आहेत, चिंतनशील आहेत. शैली रसाळ आहे, भाषा सहज पण मोहक आहे. काही लेखांत भाषा थोडी जास्तच अलंकारित होते की काय असे वाटून जाते खरे पण त्यातल्या सहजतेने आणि मार्दवाने आपल्याला त्याचा विसर पडतो आणि आपण वाचत रहातो.
काही लेख श्रद्धांबद्दल आहेत.. पण या श्रद्धा अतिशय डोळस आहेत, सतत आत्मनिरिक्षण करणार्या आहेत, चिंतनशील आहेत आणि अनेकदा तर्ककठोरही आहेत; तरीही हे लेख तटस्थ कोरडे नाहीत, त्यातल्या भावनिकतेबद्दल त्यांना अपराधीपणाही नाही. संयत, सूक्ष्मात जाऊन लिहिलेले पण मनस्वी आणि भावविभोर असं एक दुर्मिळ मिश्रण आहे या अनुभवांग! शेवटचा आळंदीवरचा लेख आणि सुरवातीचा हॉवर्थवरचा लेख पूर्णपणे गुंतवून ठेवतात.
पुस्तक भेट म्हणून दिलेल्या मित्राच्या अभिरुचीबद्दल आदर वाढला आहे. तारा वनारसेंबद्दल आधी काहीच माहित नव्हते त्यामुळे हे पुस्तक नजरेस पडले असते तरी उचलून चाळले तरी असते का नाही याबद्दल शंका आहे.
कुठल्याश्या दिवाळी अंकातली
कुठल्याश्या दिवाळी अंकातली त्यांची "रडणारी मुलगी" अशा नावाची कथा अतिशय नावडून परत यांच्या वाटेला जायचं नाही असं ठरंवलं होतं.
हा प्रतिसाद वाचुन तो पूर्वग्रह मोडीत काढावासा वाटला. बघू.
उत्तम
परिचय. मिळवून वाचण्याच्या यादीत या पुस्तकाची भर घातली आहे.
साधर्म्य
योगायोगाने हा प्रतिसाद आणि ही बातमी/पुस्तक-माहिती एकदमच वाचत होतो.
-Nile
तारा वनारसेंबद्दल आधी काहीच
+१ असेच म्हणतो.
मात्र या परिचयानंतर असे होणार नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चुकीचा तपशील. उडवला आहे.
चुकीचा तपशील. उडवला आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अतिअवांतरः वनारसे आडनावावरून
अतिअवांतरः
वनारसे आडनावावरून आजीबाई (खरे नाव बहुतेक राधाबाई) वनारसे नामक विदर्भातील आजींच्या चरित्राची आठवण झाली. मूळच्या विदर्भाच्या, नंतर बरेच काय काय झाले आणि लंडनला गेल्या. तिथे मेस सुरू करून चांगला जम बसवला आणि नाव कमावले इ.इ.इ. अन तेही आजपासून ६०-७० वर्षांपूर्वी. लै दिवसांपूर्वी हे वाचले होते, पुन्हा पाहिले पाहिजे. अत्रेही लंडनला गेले तेव्हा त्यांना भेटल्याची वर्णने आहेत भौतेक.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बनारसे
त्यांचे आडनाव वनारसे असे नसून बनारसे असे होते, असे आठवते.
अर्र रैट्ट. आयमाय स्वारी.
अर्र रैट्ट. आयमाय स्वारी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
'कहाणी लंडनच्या आजीबाईंची'
'कहाणी लंडनच्या आजीबाईंची' असं पुस्तक होतं ना एक? राजहंस प्रकाशन बहुतेक.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ओह येस तेच ते! धन्स हो
ओह येस तेच ते! धन्स हो मेघनातै
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सध्या काय वाचताय
कास्पार: पेटेर हांदके
कास्पार हाउसेर या एका जर्मन राजपुत्र बद्दलची रहस्यमयी ऐतिहासिक कथा बहुत लोकांना ठाऊक असेलच. ( इथे एक विकी धागा देतो: http://en.wikipedia.org/wiki/Kaspar_Hauser ). याच कथेला धरून काही उत्कृष्ट जर्मन चित्रपट देखील (जुने आणि नवे) आहेत. परंतु पेटेर हांदके या मूळ ऑस्ट्रिया मधील लेखकाने या कथासूत्रातील एक अत्यंत महत्वाचा धागा घेतला आहे आणि त्याची अत्यंत meticuluous मांडणी केली आहे. ७० च्या दशकात हे नाटक लिहिले. Suhrkamp या अत्यंत नावाजलेल्या जर्मन प्रकाशनाने हे ९५ पानी नाटक प्रकाशित केले आहे.
नाटकाच्या सुरुवातीलाच लेखक आपली भूमिका स्पष्ट करतो. - कास्पार सोबत नक्की काय घडले किंवा ते नक्की काय होते याविषयी कास्पार हे नाटक भाष्य करीत नाही. एखाद्यासोबत काय होणे शक्य आहे हे कास्पार दाखवते. एखाद्याला बोलण्याद्वारे वाणी पर्यंत कसे आणता येऊ शकते ते हे नाटक दाखवते. या नाटकाचे नाव - वाक्छळ - देखील असू शकेल.- यामध्ये अनेक वर्षे (म्हणजे बालपणापासून किंबहुना जन्मापासूनच) समाजापासून दूर असलेल्या, कुठलीही भाषा ज्ञात नसणाऱ्या अशा या कास्पार ची (त्यावेळी पौगंडावस्थेत असावा) एक एक करीत शब्द शिकण्याची आणि पर्यायाने स्वतःला ओळखत जाण्याची संपूर्ण प्रक्रिया चित्रित केली आहे. एका अत्यंत मूलभूत गोष्टीशी आपल्याला वाचक म्हणून सतत भिडावे लागते- मला जर भाषा येत नसती , मग ती कुठलीही असो- तर मी कोण असतो. सुरुवातीला मंचावर येणारा कास्पार एकच वाक्य उच्चारत असतो- मला कोणासारखे तरी व्हायचे आहे, मला कोणीतरी व्हायचे आहे-
आणि हळू हळू इतर अनेक माध्यमातून त्याला नवी नवी वाक्ये मिळत जातात आणि हा सर्व प्रवास म्हणजे हे नाटक - कास्पार.
जर्मन भाषा येत असणार्या लोकांनी मूळ भाषेत जरूर वाचावे. त्याचे इंग्रजी भाषांतर देखील उपलब्ध आहे. तसेच रंगसूचना लिहिण्याची एक विशिष्ट elaborate शैली हे या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. लेखकाला हे नाटक फार स्पष्टपणे, कधी कधी जरूरीपेक्षा अधिक स्पष्टपणे दिसले आहे असे वाटते. कारण त्याच्या रंगसूचना वाचून दिग्दर्शकाची गरज आहे की नाही असे वाटू शकेल. अजून या नाटकाचा प्रयोग पाहण्याची संधी मिळाली नाही. परंतु पहायचे मात्र नक्की आहे.
Observer is the observed
हॅरी पॉटरबद्दल.
This comment has been moved here.
"बेबी"
विजय तेंडुलकर लिखित, १९७५ साली पुस्तकरूपाने प्रकाशित झालेलं दोन अंकी नाटक, "बेबी".
सुरवातीलाच एक गोष्ट लक्षांत आली : हे नाटक पुस्तकरूपाने येईस्तोवर हे नाटक कुणीही प्रयोगादाखल रंगभूमीवर आणलेलं नव्हतं. तेंडुलकर पहिल्याच पानावर म्हणतात : "प्रयोगाशिवायच प्रसिद्ध होत असले, तरी हे नाटक प्रयोगासाठीच आहे." नंतर एका मित्राशी गप्पा मारताना कळलं की याचे (किमान नव्वदच्या दशकात) "आविष्कार" तर्फे प्रयोग झालेले होते. (आता छबिलदासमधे की माहीमच्या म्युनिसिपल हायस्कूलमधे, ते काही बोलणं आमचं झालं नाही खरं.)
तेंडुलकरांच्या कुठल्याही नाटकाला एकाच कुठल्यातरी विभागात किंवा साच्यात टाकणं ही अतिशय धोक्याची गोष्ट आहे, इतकी बहुविध स्वरूपाची नाटकं त्यांनी लिहिली. तरीही किंचित् धाडस करायचं झालं तर मी "सखाराम बाईंडर"च्या प्रकृतीशी मिळतं जुळतं असं याचं एक वर्णन करेन.
--------कथासूत्र : सुरवात ----------------------
नाटकामधे एकंदर चार पात्रे. बेबी, एक पंचवीशी पार केलेली, सिनेमामधे "एक्स्ट्रॉ"चं काम करणारी मुलगी. तिचा भाऊ राघव. नाटकाच्या सुरवातीला राघव नुक्ताच दीडेक वर्ष वेड्यांच्या इस्पितळात काढून (पळून ?) आलेला आहे. आपल्या जुन्या घरी तो जातो. बहीण तिथे भेटत नाही आणि तेथील लोक त्याच्याकडे कुत्सितपणे पहातात म्हणून बहिणीचा शोध घेत घेत तिच्या या घरापाशी पोचतो. घरात शिरून तिला भेटतो. राघव ज्यावेळी "मेंटल"मधे गेला त्यावेळी तो "शिवापा" नावाच्या गुंडाच्या गँगविरुद्ध मारामारी मधे गुंतला होता असं दिसतं. राघवच्या म्हणण्यानुसार त्याच्याविरुद्ध कट करून त्याला वेडं ठरवून इस्पितळाच्या नरकात त्याला डांबण्यात आलं. राघवला बेबी सांगते की ती आता शिवापाने करून दिलेल्या बिर्हाडात, त्याचं अंगवस्त्र म्हणून राहाते. राघवला अर्थातच याचा धक्का बसतो. शिवापा यायच्या सुमारास बेबी राघवला बाहेर जायला सांगते. शिवापा येतो. त्याचे नि बेबीचे संबंध मालक नि गुलामाचे असावेत तसे आहेत. राघव आला आहे हे शिवापाला कळतंच. तो अर्थातच भडकलेला आहे. शिवापा नि बेबीच्या रात्रीच्या प्रसंगानंतर बेबी शूटींगला दुसरे दिवशी येते. तिथे तिला कर्वे नावाचा, तिच्याशी जवळीक साधू पहाणारा सहदिग्दर्शक भेटतो. ती एकटी आहे हे लक्षांत घेऊन तिच्याकडे यायची इच्छा व्यक्त करतो. याच वेळी शिवापाला बेबीच्या घरी राघव सापडतो. तो राघवला शिवीगाळ आणि मारहाण करतो.
पुढील आठ दिवस शिवापा बेबीकडे येत नाही.
एके रात्री कर्वे बेबीकडे येतो. तिच्या जवळ येऊ पहातो. त्याच वेळी अचानक शिवापा यायची चाहूल लागल्यावर बेबी कर्वेला आतील खोलीत दडवते. शिवापाची अनेक वर्षं आजारी असलेली, त्याची गुलाम म्हणूनच जगलेली बायको आजारपणात दगावलेली आहे. तो बेबीपाशी येऊन बायकोच्या नावाने रडतो भेकतो. सर्व सांगून झाल्यावर शेवटी बायको ही "पतिव्रता" आहे असं सांगतो. आणि या पार्श्वभूमीवर बेबी "साली कुत्री"च आहे हेही म्हणतोच. शब्दाला शब्द वाढल्यावर शिवापाला कर्वे घरात असल्याचा सुगावा लागतो. कर्वे विलक्षण घाबरलेला असतो. पण दु:ख नि दारूच्या नशेत चूर असलेला शिवापा कर्वेला जाऊ देतो. आणि बेबीला ती वेश्यावृत्तीची आहे, एकनिष्ठ नाही असं पुनःपुन्हा ऐकवतो. बेबी आणि तिचा भाऊ राघव हे घर सोडून जायचा निर्णय घेतात. नाटक संपतं.
--------कथासूत्र : शेवट ----------------------
शिवापाची भाषा ही निम्नस्तरातल्या व्यक्तींची आहे. म्हणजे गांवढळ किंवा बंबैय्या अशी नव्हे तर, नागरी मराठीच. पण क्रूरपणाची, "रखेल" "कुत्री" असं सहज म्हणणारी. राघव आणि बेबी यांची भाषा मध्यमवर्गीयांची. कर्वेची काहीशी सोज्वळच.
शिवापा आणि बेबी यांचे एकांतातले प्रसंग अंगावर काटा आणण्याइतपत क्रौर्याचे आणि त्याच वेळी उमळून यावे अशा स्वरूपाच्या नातेसंबंधांचे बनलेले आहेत. शिवापा घरी गेल्यावर बेबी खरोखरच एखाद्या कुत्रीसारखी चार पायांवर त्याच्यापाशी जाते, त्याला हुंगते, त्याच्या चपला काढते. त्याला चाटल्यासारखे करते. तोही तिला हिंदीत कुत्रीशी बोलावं तसं बोलतो. हे सर्व वाचताना मला प्रचंड अस्वस्थ करणारे वाटले खरे. राघवने वेड्याच्या इस्त्पितळाचे केलेले भयप्रद आणि घृणास्पद वर्णन, कर्वेच्या साध्या शब्दांतून टपकत असणारी त्याची वासना, शिवापाने राघव आणि बेबीच्याही - बाबत दाखवलेली हिंसा.. इतकं ग्राफिक स्वरूपाचं चित्रण (माझ्या मते) सखाराम मधेही नाही. सखाराम मधे संभोगाचं सूचन सावल्यांमधून केलेलं आहे. स्त्रीपुरुषाचे एकमेकाशी रत होत असतानाचे आवाज , विव्हळणे आहे, ते येथे मला आढळले नाही. सखारामाची भाषाही भडक आणि हिंसक खरी. पण या नाटकातला शिवापा पाशवी आहे.
असो. समाजाच्या वर्तुळाच्या अगदी परीघापाशी असणार्या घटकांचं चित्रण असं या नाटकाचं वर्णन करता येईल. माणसामाणसांमधलं सौजन्य, न्याय, माणूसपणाची राखलेली कदर या सार्याला तिलांजली दिल्यानंतर, "उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला" अशा प्रकारच्या संबंधांना मायक्रोस्कोपमधे घालून पाहिलेले मी नाटक वाचत असताना अनुभवले. प्रयोग करताना तो सगळा हिंसक रासवटपणा कसा अंगावर येत असावा याची मी निव्वळ कल्पनाच करू शकतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
'बेबी'चा नाट्यप्रयोग
चेतन दातार दिग्दर्शित 'बेबी'चा एक प्रयोग मी पाहिला आहे. बहुतेक माहिमच्या 'मियाँ महम्मद छोटानी' शाळेमध्ये किंवा माटुंग्याच्या 'यशवंत नाट्यमंदिर'मध्ये.
भूमिका:
बेबी : अदिती देशपांडे,
राघव : आशुतोष दातार,
शिवाप्पा : मंगेश भिडे (या गुणी कलाकाराला खूप वर्षांनी 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' मध्ये 'अब्दुल्ला'च्या भूमिकेत पाहून फार आनंद झाला होता. फार पूर्वीपासून हा अभिनेता प्रायोगिक रंगभूमीवर आहे. अगदी अतुल पेठेसोबत 'वेटिन्ग् फॉर गोदो'त 'पोझ्झो'ची भूमिका करण्यापासून ते 'राधा वजा रानडे'पर्यंत).
बाकीचे कलाकार आठवत नाहीत.
या नाटकापूर्वी तेंडूलकरांचे कुठलेच नाटक मी रंगमंचावर पाहिले नव्हते. नाटक त्यावेळी मला फारसे कळले नव्हते. शिवाप्पाचे रासवट वागणे, छाया प्रकाशाचा खेळ, ध्वनी-संयोजना, नेपथ्य यामुळे काहितरी अभूतपूर्व जळजळीत असे काही पाहतो आहोत हे मात्र लख्ख जाणवले होते. मंगेश भिडेंच्या दणकट आवाजातले उतारचढाव, बेबीला घृणास्पद, कस्पटासमान वागविणे हे अंगावर येते हे खरे आहे.
:-)
आमचा मित्र नि तुम्ही यांनी एकच प्रयोग पाहिलेला असण्याची दाट शक्यता आहे. आमच्या मित्राला प्रयोग काहीसा मिळमिळीत वाटला होता हे येथे नमूद करतो
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
दोन तोफा
"कळ्यांचे नि:श्वास" पुस्तकाच्या पुनरावृत्तीला विभावरी शिरूरकर/मालती बेडेकर यांनी लिहीलेली दीर्घ प्रस्तावना वाचली. सरळ सोप्या भाषेत परखड, नेमके सामाजिक विश्लेषण कसे करावे याचा लेख चांगला उदाहरण आहे. आता मूळ कथा वाचतेय, पण त्यांत तेवढा दम जाणवत नाही. उगीच आधी प्रस्तावना वाचली असं आता वाटतंय. भाषा उगाच कृत्रिम आणि पात्रांमधले संवाद नाटकी वाटताहेत - अर्थात त्या काळात या कथांमुळे कसला गदारोळ झाला याची कल्पना येते.
त्याच बरोबर अशोक शहाणेंचा "नपेक्षा" निबंधसंग्रह वाचतेय. "क्ष किरण" हा गाजलेला निबंध वाचला. या मुळे ही तत्कालीन साहित्यिकांची डोकी का फिरली असतील हे लगेच कळतं - कोणालाच सोडलं नाहीये. काही मुद्द्यांवर तीव्र असहमती जाणवली, तरी वाचताना खूप मजा आली. क्ष-किरणा नंतरचा निबंध अधिक आवडला, पहिल्या इतके तीर नसले तरी विश्लेषण जास्त नेमके वाटले.
एकूण या दोन्ही लेखकांचे वेगळ्याच शैलीतले, पण अत्यंत धारदार आणि चिकित्सक लेखन वाचून मजा येतेय.
+०.५
नपेक्षा न वाचल्याने +१ पूर्ण दिला नाही.
लै दिवसांपूर्वी कळ्यांचे नि:श्वास वाचले होते. तरू अन वल्लरी यांचे संवाद तसे बरे वाटले होते तेव्हा, पण आता तुम्ही म्हटल्यावर कृत्रिमता अंमळ लक्षात आली. प्रस्तावना वाचायला हवी खरी.
त्र्यं.शं.शेजवलकरांनी यावर केलेले भाष्य आठवले. ते विद्याधर पुंडलीकांच्या आवडलेली माणसे नामक पुस्तकात आहे- "विभावरी शिरूरकर म्ह. नदीत गेल्यावर पोहता येईना/पलीकडे जाता येईना अन परतही फिरवेना अशी स्थिती आहे."
हे नेमके/चिंत्य आहे असे पुंडलीक म्हणतात. असो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नपेक्षा
'नपेक्षा' नक्कीच वाचनीय आहे. साठोत्तरी काळात अशोक शहाणे, नेमाडे वगैरे लेखकांनी मराठी जनमानसावर त्या काळी पगडा असलेल्या कित्येक लेखकांचा थिटेपणा परखड आणि रंजक शैलीत दाखवून दिला ही चांगली गोष्टच आहे. पण आता मागे वळून पाहता असं वाटतं की त्यामुळे पोरकट शैलीत प्रस्थापितांची खिल्ली उडवण्यालाच समीक्षा समजण्याचा एक वेगळा आणि अनिष्ट पायंडा मराठीत पडला. शहाण्यांच्या एक दशांशही वाचन किंवा बुद्धी नसलेले लोक तसलीच शैली वापरून फडमारू लिखाण करू लागले. आजही हे असंच होताना दिसतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बरोबर आहे. पण प्रस्थापितांची,
बरोबर आहे. पण प्रस्थापितांची, किंवा एकूण पूर्वपक्षाची रंजक, एव्हन शिवराळ भाषेत, खिल्ली उडवणे, हे साठोत्तरीच नाही तर त्याहून चांगलेच जुने चिपळूणकरी वळण आहे, नाही का? मर्मावर बोट नेमक्या भाषेत ठेवता येणं हे या शैलीचं मुख्य आकर्षण, पण संदर्भहीन सरसकटीकरण हे त्याचा सर्वात वीक पॉईंट. शहाण्यांच्या पुस्तकात दोन्ही ठळकपणे जाणवतात.
या पुस्तकाचं (नाहीतर त्यातील काही लेखांचं तरी) सहवाचन करायला कोणी तयार आहे का? माझं मराठी साहित्याचं इतकं गाढं वाचन नाही, पण शहाणेंची काही निरीक्षणं मला लगेच पटली, आणि काही फारच प्रॉब्लेमॅटिक जाणवली. काही निरीक्षणांचा संदर्भ नीट जाणून घ्यायला, चर्चा करायला आवडेल. कोणी तयार असल्यास पुस्तक पूर्ण करून नवीन धागा काढेन.
मला रस आहे. पण पुस्तक
मला रस आहे. पण पुस्तक मिळवायला एक आठवडा तरी जाईल.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सहसमीक्षा
पण त्याला समीक्षा म्हटलं जायचं का? नेमाड्यांच्या 'टीका स्वयंवर'ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता तो बहुतेक समीक्षा म्हणून.
हरकत नाही. वाचून बरीच वर्षं झाली. पुन्हा वाचायला आवडेल. फक्त माझी प्रत कुणी तरी ढापली आहे. त्यामुळे मागवावी लागेल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पण त्याला समीक्षा म्हटलं
अर्थात, विष्णुशास्त्री चिपळूणकरांना मराठी समीक्षेचे जनक वगैरेच समजले जाते (आणि तसा त्यांचाही दावा होताच).
नेमाड्यांना हा पुरस्कार मिळाला हे माहित नव्हतं. पण त्या पुरस्काराला किंवा त्यातील गटांना (माझ्या मते तरी) फारसे महत्त्व नाही - त्याचे प्रादेशिक गणितच वेगळं, आणि राजकीय असतं.
आता टीकास्वयंवर वाचून खूप वर्षं झाली. पण नेमाड्यांचं मला सर्वात कमी आवडलेलं पुस्तक हे नक्की.
दरम्यान, संगणक आला. तुमची
दरम्यान, संगणक आला. तुमची भाषा उखडून टाकायला टेक्नॉलॉजी कामी येऊ शकते. तसं मराठीचं झालं आहे. सी-डॅकवाल्यांनी मराठीची वाट लावली.. सगळय़ाच भारतीय भाषांची वाट लावली. त्यांनी प्रत्येक अक्षराला एक कोड दिला. ही कोड सिस्टीम त्यांनी १९८३ साली अमलात आणली. आणि त्याला 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड'चं सर्टिफिकेट आहे. या कोड सिस्टीममध्ये तीन वर्षांनी त्यांनी पुन्हा सुधारणा केली. असं करणारा भारताशिवाय जगात दुसरा देश नाही. त्याचा अर्थ असा होतो की, आधीच्या कोडमध्ये केलेलं सगळं काम वाया गेलं. आता जे कोड आहेत, त्यातले तीन कोड जास्तीचे आहेत. म्हणजे ते असायची जरूर नाही. असे कोड देणं हेसुद्धा जगातल्या दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाही. हे भारतातच आहे फक्त. याकरता विजय भटकर वगैरे मंडळी जबाबदार आहेत
शहाण्यांचे हे मत वाचून मला अजब वाटलं. नपेक्षा घ्यावसं वाटूनही मी ते टाळलं.
दुवा.
स्पष्ट करा
शहाण्यांची सगळी मतं पटतील असा ह्या भूमंडळी कुणी सापडेल का ते माहीत नाही. शिवाय, इथे ते नक्की कशाविषयी बोलत आहेत ते मलाच ठाऊक नाही. हा नक्की कशाचा इतिहास आहे? आधीचा कोड कोणता? नंतरचे तीन कोड कुठले?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सहमत.
सहमत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वर दिलेला दुवा हा अशोक
वर दिलेला दुवा हा अशोक शहाण्यांनी "'क्ष'-किरण"च्या निमित्ताने लिहिलेला लेख. ह्या लेखात "आजचं मराठी साहित्य आणि एकूणच साहित्यव्यवहार" यावर त्यांनी मते मांडली आहेत. त्यातला एक परिच्छेद वर दिलेला आहे. तो तेवढाच आहे. भाषेला संगणक-तंत्रज्ञानात आणताना कशी वाट लावली/लागली असा रोख.
आहे त्यावरून अंदाज करावा तर शहाणे ह्या एकमेव परिच्छेदातून "युनिकोड-प्रणाली" वर टीका करताहेत असं कळेल. ही टीका मायंदाळ एकांगी/वरवरची आहे असं मला वाटलं. त्यात उद्विग्नताच दिसली.
आधीचा कोड कोणता? नंतरचे तीन कोड कुठले?
त्यांना अक्षरांना दिलेल्या युनिकोड्स बद्दल बोलायचे आहे बहुधा.
अशी मते बनवणार्या टीकाकारास (भरपूर वाचन आणि मती असलेल्या ) किती गंभीर घ्यावे हे कळेना म्हणून माझ्याकडून नपेक्षा वाचायचे राहीले.
(हे फक्त टीकाकार शहाणेंबद्दल. 'प्रास'वाले शहाणे, कोलटकरांच्या कविता छापणारे, बंगाली मराठीत आणणारे शहाणे, लघु-अनियतकालिकांचे चळवळी शहाणे आदराचे)
म्हातारे शहाणे
मला सांगता येणार नाही. मला एवढं नक्की माहीत आहे की शहाणे ज्यात अनेक वर्षं कार्यरत आहेत त्या मराठी व्यावसायिक प्रकाशनाच्या आणि डीटीपीच्या जगात युनिकोड कुणीही वापरत नाही. बाकी देवनागरी युनिकोडचा इतिहास मला माहीत नाही, पण ह्या टीकेमागे त्याविषयीचे काही संदर्भ असू शकतील.
शिवाय, शहाण्यांचं आता वय झालं आहे. 'नपेक्षा'मध्ये ऐन भरात लिहिलेलं लिखाण आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वेडे शहाणे
शहाण्यासारखं असं म्हणता येईल की हे कोलॅटरल डॅमेज असावं.
लोलिता वाचायला सुरूवात
लोलिता वाचायला सुरूवात केलीये.. सुरुवात तर एक्दम भारी वाटतेय!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
'द आर्ट ऑफ लव्हिंग'
हे पुस्तक काहीशा उशिरानेच वाचायला घेतलं आहे. या पुस्तकावर चांगली टीका किंवा त्याहून वेगळा विचार मांडणारे काही लेखन उपलब्ध आहे का?
राधिका
राधिका
व्यासांचे शिल्प - नरहर
व्यासांचे शिल्प - नरहर कुरुंदकर
मराठीमध्ये महाभारताबद्दल लिहिल्या गेलेल्या निरनिराळ्या ललित / अललित लेखनाबद्दल कुरुंदकरांचं विवेचन. विस्कळीत. पण रोचक. रंजक तर आहेच आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
नक्की वाचतो.
नक्की वाचतो.
'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर' आणि 'जळते रहस्य'
'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर' आणि 'जळते रहस्य'
मनोव्यववहारांची गुंतागुंत उलगण्याचा प्रयत्न करणार्या या दोन लघुकादंबर्या.
एक भाऊ पाध्यांची तर दुसरी बा.भ. बोरकरांनी आवर्जून मराठीत भाषांतरीत केलेली स्टीफन झ्वैग या ऑस्ट्रीयन लेखकाची.
बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर ही महाराष्ट्रात १९६०च्या दशकात घडणारी कादंबरी असली तरी आणि तिच्यात त्या स्थळकाळाचे भान देणारे बरेचसे उल्लेख असले तरी खरेतर स्थलकालातीत कादंबरी आहे असे म्हणता येईल. हेच 'जळते रहस्य'बद्दलही म्हणता येईल. कदाचित दोन्ही कादंबर्यांवर फेमिनिस्टांचा -स्त्रीवाद्यांचा काही आरोप, काही बालंट आताच्या काळात येऊ शकेल - स्त्रीमनाचा विचार न करता लेखकांनी पुरुषांच्या दृष्टीने विश्व चितारले आहे वगैरे (किंवा स्त्रीने नेहमी संसार-मुले यांचाच विचार करून स्वतःचे मन का मारायचे? वगैरे..). पण ते असो. त्या गोष्टीला या कादंबर्या वाचताना फारसे महत्त्व देता येत नाही.
दोन्ही कादंबर्या उत्तम आहेत यात वादच नाही. फक्त बोरकरांचे भाषांतर हे भाषांतर आहे असे जाणवते. पण त्यामुळे कथेच्या ओघाला कुठे बाध येत नाही.
+१
सहमत. 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर' ही माझी अत्यंत आवडती कादंबरी आहे. घरात असलेल्या इतर अनेक पुस्तकांकडे आता ढुंकूनही पाहावेसे वाटत नाही. मात्र ही कादंबरी आवर्जून पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते. भाऊ पाध्यांचे या कादंबरीतल्या लेखनाची भाषा नेहमीच अत्यंत ताजी वाटली आहे. ६० च्या दशकातील कादंबरीची भाषा आजही -आजची- वाटावी हे आश्चर्यकारकच आहे.
भाऊ पाध्यांच्या वासूनाका आणि राडा या कादंबऱ्या तेव्हा प्रयत्न करुनही मिळाल्या नव्हत्या (औट ऑफ प्रिंट). आता त्या उपलब्ध आहेत असे दिसते.
बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर
>>बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर' ही माझी अत्यंत आवडती कादंबरी आहे. <<
याबद्दल +१. त्यातलं प्रियंवदेची चितारलेली व्यक्तिरेखा मला मार्मिक वाटते. ही कादंबरी साठच्या दशकातली असूनही आजची वाटावी अशीच आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
ज्ञाताच्या कुंपणावरून
'अंताजीची बखर' आणि 'बखर अंतकाळाची' वाचल्यानंतर नंदा खर्यांचे आणखी लेखन वाचण्याच्या उत्सुकतेने 'ज्ञाताच्या कुंपणावरून' मागवले होते.
पुस्तक रोचक आहे. 'मी कोण' हे प्रकरण मस्त आहे. पुस्तकातली विनोदाची झाकही मस्त आहे. मधला पेशीविभाजन, डीएनए, आरएनए वगैरेंबद्दलचा भाग थोडा कंटाळवाणा वाटला (बायो शिकत असतानाही तसा बराच कंटाळवाणाच वाटायचा). हे नंदा खर्यांचे तसे बरेच आधीचे पुस्तक आहे. ज्या पुस्तकाने नंदा खरे हे पुस्तक लिहिण्यास उद्युक्त झाले ते 'गॉडेल एशर बाख' हे पुस्तक आणि त्यांची नंतरची पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
'संप्रति' आणि 'नांगरल्यावीण
'संप्रति' आणि 'नांगरल्यावीण भुई'चीही जोरदार शिफारस करते. मग वाटल्यास 'कहाणी मानवप्राण्याची'.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
'अंताजीची बखर' आणि 'बखर
ही उत्सुकता मलाही आहे. नांगरल्याविण भुईचा थोडका परिचय या धाग्यात आला होता. त्यांच्या पुस्तकांची अद्ययावत यादी आणि प्रत्येक पुस्तकाचा परिचय (एकोळी/ट्विटरी चालेल) देता आला तर लय उपकार होतील.
नंदा खरे व्यवसायाने बिल्डर आहेत असं कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. बिल्डर ते लेखक प्रवासाविषयी कोणाला माहिती आहे का?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ही त्यांच्या पुस्तकांची
ही त्यांच्या पुस्तकांची यादी:
१) ज्ञाताच्या कुंपणावरून: आउट ऑफ प्रिंट. ग्रंथाली. उत्क्रांती. मुख्यत्वेकरून विज्ञान. पण रंजक आणि मिश्किल भाषेत.
२) वीसशे पन्नास: आउट ऑफ प्रिंट. ग्रंथाली. अद्याप मिळू शकलेलं नाही.
३) अंताजीची बखर: ग्रंथाली, आता मनोविकास. अंताजीबोवांबद्दल बहुत काय लिहिणे! ते जालावर फेमस आहेत!
४) संप्रति: आउट ऑफ प्रिंट. ग्रंथाली. खर्यांच्या मते त्यांचं सगळ्यांत चांगलं पुस्तकं. बाजारयंत्रणेचे नियम तिच्यावरच उलटवून दर्जेदार जगू बघणारा एक जिगरबाज माणूस. त्याची गोष्ट. एकदम वेगळीच गोष्ट.
५) जीवोत्पत्ती आणि नंतर: आउट ऑफ प्रिंट. ग्रंथाली. मुख्यत्वेकरून विज्ञान.
६) दगडावर दगड, विटेवर वीट: ग्रंथालीकडे अधूनमधून एखादी प्रत मिळून जाते. एका ठेकेदार कम बिल्डरचं प्रथमपुरुषी पुस्तक. याला लेबल फिक्शनचं आहे. पण खरे बिल्डरच होते. लेखन उशिराचं. हे बघता ते जवळजवळ आत्मपर असणार असा अंदाज.
७) नांगरल्याविण भुई: ग्रंथालीकडे अधूनमधून एखादी प्रत मिळून जाते. हेही जालावर फेमस आहे. एखाद्या एयू (अनदर युनिवर्स) फॅनफिकसारखा बाज आहे या पुस्तकाचा. ट्यूरिंगनं भारतात संगणक विकसित केला असता तर काय झालं असतं अशी कल्पना करून आणि अनेक ऐसपैस-रंजक परिशिष्टांसकट. मला हे पुस्तक थोडं ग्रिम वाटतं.
८) कहाणी मानवप्राण्याची: मनोविकास. मध्यंतरी मिळत नव्हतं. आता मिळतं. माणसाच्या उत्क्रांतीचा इतिहास.
९) बखर अंतकाळाची: ग्रंथाली, आता मनोविकास. अंताजीबोवांबद्दल बहुत काय लिहिणे! ते जालावर फेमस आहेत. पणं हे 'अंताजीची बखर'इतकं मिश्किल नाही. बहुधा पेशवाईच्या अंताचा सूर लागल्यामुळे, खुद्द अंताजीचं वय झाल्यामुळे आणि लेखकाच्या बदललेल्या वयामुळेही - या पुस्तकाचा सूर जरा गंभीर आहे. पुस्तक भारीच.
१०) E.O.Wilson च्या Anthill या कादंबरीचं भाषांतर - वारूळपुराण: मनोविकास काढणार आहे. अजून काढलेलं नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
नंदा खर्यांइतका विज्ञाननिष्ठ
नंदा खर्यांइतका विज्ञाननिष्ठ फिक्शन लिहिणारा मी तरी दुसरा कुठला लेखक मराठीत वाचला नाही. त्यांच्या पुस्तकांत मिष्कीलपणाची छटा अतिशय मोहक.
ज्ञाताच्या कुंपणावरून आता
ज्ञाताच्या कुंपणावरून आता मनोविकासचे उपलब्ध आहे. मी इथून मागवले होते. 'बखर अंतकाळाची' मनोविकासनेच पहिल्यांदा छापले बहुतेक.
ज्या पुस्तकाने नंदा खरे हे
हे सेकंडरी वाचन लग्गेच थांबव आणि गोडेल, एशर आणि बाख वाच अगोदर असा तुला आगाऊ सल्ला देतो. अफाट पुस्तक आहे. कासव आणि अकिलीसचा संवाद फार्फार्फार उच्च आहे. साला मी त्याच्या फार पुढे गेलोच नाही, पण जे कै वाचले ते अतिशय जबरी होते.
अन अजून एकः वाचले नसल्यास-जे पुस्तक वाचून जॉन नॅश गणितात इंट्रेस्टेड झाला ते पुस्तक- मेन ऑफ मॅथेमॅटिक्स- वाचावेस अशीही तितक्याच आग्रहाने शिफारस करतो. त्याच्या शैलीच्या प्रेमात जो पडलोय तो अजूनही बाहेर आलेलो नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
डॉ. समीर कुलकर्णी
सध्या अनुभव(छापील) मासिकांतले डॉ. समीर कुलकर्णी यांचे ललित लेखन वाचत आहे.
संवेदनशील(कितीही घिसापिटा शब्द असला तरी पर्याय नाही) ललित लेखन. आपल्या अनुभवांना शब्दबद्ध करताना डॉ. जास्तीचे शब्दबंबाळ होत नाहीत. अस्थीविसर्जन, देवदर्शन अशा घटनांभोवती भावुक, वैचारिक वलये गुंफताना लेखक समतोल सोडत नाही, त्यातून एकाप्रकारच्या अलिप्ततेचा शांत अनुभव देतो.
हे काही उपलब्ध लेखः
दर्शन
तप:स्वाध्याय
गोपद्म
परंपरा
वास्तवाचा विस्तव
कथा:
ऍम्ब्युलन्स राईड
धन्यवाद
तपःस्वाध्याय या आधी वाचला होता, पण पुनर्वाचनातही तितकाच आवडला. त्याबद्दल काहीही बोलले तरी शब्दबंबाळ होईल, अशी भीती वाटते. "Interpretation is the revenge of the intellect upon art... To interpret is to impoverish" हे विधान निराळ्या संदर्भात असले तरी या लेखालाही लागू पडावे.
सोपे-सहज
डिएसएलाआरच्या ९९ सगळ्यांना भेडसावणार्या समस्यांचे निराकरण. हा एक छान माहितीपर लेख आहे, हौशी डिएसएलआर धारकांसाठी बर्याच साधारण प्रश्नांची सोपी उत्तरे ह्यात सापडतील.
अनेक आभार!
अनेक आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चार्ली चॅप्लिन
ऑफिसात एका वेगळ्या संदर्भात एक बोर्ड पाहण्यात आला.
त्यातून समजले ते असे :-
charlie chaplin look alike ह्या स्पर्धेत तृतीय क्रमांक कुणाला मिळाला ?
स्वतः चार्ली चॅप्लिन ह्यालाच!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
'कल्पनेच्या तीरावर' - वि.वा.शिरवाडकर
काल 'कल्पनेच्या तीरावर' - वि.वा.शिरवाडकर हे पुस्तक वाचुन झाले.
ज्या काळात हे पुस्तक लिहिले गेले त्याच काळात असे नाही तर कधीही वाचताना, नीती-अनीती, चांगले-वाईट आदी संकल्पनांबद्दल मूलगामी विचार करायला भाग पाडणारे पुस्तक अर्थातच आवडले. भाषा, शैली जुनी असल्याने लेखनाचा काळ चांगलाच जाणवत रहातो. शिवाय शेवटी शिवटी कथा ताणल्याचे फिलिंग येऊ लागले नी पात्रेही हवी तशी - हवी तितकी - ताकदीने उभी राहिली नाहीत. मात्र तरीही एका रोचक कल्पनेसाठी नी ती इतक्या साटल्याने ताणण्यासाठी शिरवाडकरांना मार्क द्यावेच लागतात.
पुस्तक नक्की वाचा ही शिफारस आहेच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जेम्स बॉल्ड्विन, रेझा अस्लान
अलीकडे वाचलेली पुस्तकं:
१. The Spy Who Came in from the Cold - John le Carré
हेरकथांतलं क्लासिक म्हणून ज्याची गणना होते, असं हे पुस्तक बरेच दिवस वाचायच्या यादीत होतं. अखेर या महिन्यात मुहूर्त लागला. १९६३ साली, म्हणजे बर्लिनची भिंत उभी राहिल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक तेव्हा भरात असलेल्या जेम्स बाँडच्या सुरस प्लॉट्सहून सर्वस्वी निराळं आहे. पुस्तकाचं पहिलं आणि अखेरचं प्रकरण सोडलं तर मारधाड किंवा 'अॅक्शन' अशी नाहीच. ब्रिटिश आणि पूर्व जर्मन गुप्तहेरखात्यांतली चढाओढ, डबल क्रॉस हे वाचनीय आहेच; पण त्याचसोबत सुष्ट विरुद्ध दुष्ट अशी उघड विभागणी नसणं आणि अंतिमतः 'जैसे थे' स्थितीच कायम राहणार असली तरीही सामान्य हेराचा वा व्यक्तीचा बळी जाऊ देण्यात दोन्ही बाजूंना काही वावगं न वाटणे, हा व्यक्ती आणि व्यवस्था यांच्यातला संघर्ष सूचकपणे अधोरेखित होणं ही या कादंबरीची बलस्थानं.
२. Go Tell It on the Mountain - James Baldwin
१८६०च्या दशकात गुलामगिरीच्या मुद्द्यावरून अमेरिकेत यादवी युद्ध झालं खरं, पण त्यातून दक्षिणेतल्या कृष्णवर्णीयांना मिळालेले फायदे अनेक कारणांनी (राजकीय तडजोड, जुनीच धोरणं रेटणारे नवीन कायदे) अल्पजीवी ठरले. परिणामी लाखो कृष्णवर्णीयांनी उत्तरेतल्या तुलनेने उदारमतवादी राज्यांकडे आणि कॅनडाकडे शक्य होईल त्या मार्गांनी, जीव धोक्यात घालून धाव घेतली. या 'ग्रेट मायग्रेशन'मुळे अमेरिकेच्या उत्तर भागातल्या अनेक शहरांचा, अनेक वस्त्यांचा तोंडवळा पुरता बदलून गेला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात डेट्रॉईट, क्लीव्हलँड, शिकागो, बाल्टिमोर, फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन डीसी, न्यू यॉर्क यासारख्या मोठ्य शहरांत कृष्णवर्णीयांची वस्ती झपाट्याने वाढली. ('द वार्म्थ ऑफ अदर सन्स' हे पुस्तक या संदर्भात वाचण्यासारखे आहे).
न्यू यॉर्कच्या हार्लेम या अशाच कृष्णवर्णीय-बहुल वस्तीत जेम्स बॉल्डविन वाढला. त्याचे सावत्र वडील धर्मोपदेशक होते. घरची हलाखीची परिस्थिती आणि धार्मिक वातावरण (हे थोडंफार सॉमरसेट मॉमच्या 'ऑफ ह्युमन बॉन्डेज'ची आठवण करून देणारं), उत्तरेत जरी उघड अन्याय कमी प्रमाणात असला तरीही वर्णभेदाचे सतत जाणवणारे अस्तित्व, सावत्र वडिलांचा सोसावा लागलेला जाच, चौदा-पंधरा वर्षांचं अडनिडं वय आणि त्याचवेळी आपला स्वभाव आणि लैंगिक कल बहुसंख्यांहून निराळा असल्याची झालेली पुसट जाणीव - अशा निरनिराळ्या 'मायनॉरिटी विदिन मायनॉरिटी' जाणीवा जेम्स बॉल्डविनच्या 'गो टेल इट ऑन द माऊंटन' ह्या पहिल्या, आत्मचरित्रात्मक कादंबरीत एकमेकांत गुंतून सामोर्या येतात. एखाद्या व्यक्तीच्या अस्मितेला जसे भाषिक, जातीय, धार्मिक, लैंगिक, राजकीय पदर असतात; तशीच वेगळेपणाची, बहुसंख्यांहून निराळं असण्याची भावनादेखील व्यामिश्र असते - याचा पडताळा देणारी ही कादंबरी आहे.
३. Giovanni's Room - James Baldwin
कृष्णवर्णीय + समलैंगिक अशा दुहेरी कोंडीला कंटाळून, १९४८ साली वयाच्या विशीतच जेम्स बॉल्डविनने अमेरिका सोडून पॅरिसचा आश्रय घेतला. (एका अर्थी 'ग्रेट मायग्रेशन'चीच ही पुढची पायरी म्हणता येईल). तिथल्या मोकळ्या, उदारमतवादी वातावरणात त्याने विपुल साहित्यनिर्मिती केली. कृष्णवर्णीय लेखकांच्या गाजलेल्या कादंबर्यांतले साहित्यिकदृष्ट्या कच्चे दुवे दाखवणार्या 'Everybody's Protest Novel' या निबंधाने रिचर्ड राईटसारख्या मातब्बर लेखकाचा रोषही ओढवून घेतला.
'जोवान्नी'ज् रूम' ही त्याची दुसरी कादंबरी 'गो टेल इट...'ची उंची गाठत नसली, तरी वाचनीय आहे. 'गो टेल इट...'ची मध्यवर्ती कल्पना 'स्व'चा शोध अशी सांगता येईल. त्यात समलिंगी आकर्षणाचे उल्लेख अगदीच ओझरते येतात. 'जोवान्नी'ज् रूम'मध्ये शारीर संबंधांचं वर्णन नसलं तरी अशा 'The love that dare not speak its name' आकर्षणाला मुख्य प्रवाहात खुलेपणाने मांडण्याचं श्रेय या पुस्तकाला नक्कीच जातं.
४. Oliver Twist - Charles Dickens
१८३४ साली 'पुअर लॉ' अस्तित्वात आल्यावर त्यावर 'डार्क ह्युमर'च्या अस्त्राने टीका करणारी टिपिकल डिकन्शियन कादंबरी. कथानक जरी फार काही निराळं नसलं, तरी अलीकडेच जॉन स्टुअर्टने फॉक्स न्यूजचे "वेल्फेअर"चा बागुलबुवा उभा केल्याबद्दल जे वाभाडे काढले किंवा स्वतः पस्तीस लाख डॉलर्सची फार्म सबसिडी लाटून फूड स्टँप्सना विरोध करणारा रिपब्लिकन हाऊस सभासद पाहिला की अजूनही त्यातला उपहास तितकाच रिलेव्हंट असल्याची खात्री पटते
"The memories which peaceful country scenes call up, are not of this world, nor of its thoughts and hopes. Their gentle influence may teach us how to weave fresh garlands for the graves of those we loved: may purify our thoughts, and bear down before it old enmity and hatred; but beneath all this, there lingers, in the least reflective mind, a vague and half-formed consciousness of having held such feelings long before, in some remote and distant time, which calls upon solemn thoughts of distant times to come, and bends down pride and worldliness beneath it." हा परिच्छेद तर थेट कालिदासाच्या 'तच्चेतसा स्मरति नूनमबोधपूर्वं भावस्थिराणि जननान्तर सौहृदानि'ची आठवण करून देणारा.
५. Zealot - Reza Aslan
६. No god but God: The Origins, Evolution, and Future of Islam - Reza Aslan
प्रेषित, त्यांचा उदय झाला तेव्हाची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, ती बदलण्यासाठी प्रेषिताने केलेले प्रयत्न आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या म्हणण्याचा झालेला विपर्यास - असा साधारण रेझा अस्लनच्या या दोन पुस्तकांचा ढाचा आहे. यातले येशू ख्रिस्तावरचे 'झेलट' अधिक रोचक वाटले.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमन साम्राज्य आणि त्या साम्राज्याशी हातमिळवणी केलेल्या ज्यू धर्मीय पुजारी वर्ग यांच्याविरुद्ध सामान्य ज्यू जनतेत खदखदणारा असंतोष - परिणामी येशूच्या आधी आणि नंतरही उदयास आलेले अनेक धर्मसुधारक/प्रेषित आणि त्या सार्यांचा क्रूसावर झालेला अंत - इ.स. ६६ साली ज्यूंनी केलेला उठाव आणि पराभवानंतर जेरुसलेमची झालेली वाताहत - परिणामी येशूच्या अनुयायांनी ज्युईश परंपरेपासून जाणीवपूर्वक घेतलेली फारकत आणि रोमन सम्राटाच्या अधिकार्यांऐवजी येशूच्या अंताचे ज्यूंवर फोडलेले खापर - गॉस्पेल्समध्ये कालानुक्रमे घडत गेलेले बदल (उदा. जॉन द बाप्टिस्ट ह्या येशूच्या मार्गदर्शकाचे घटवत नेलेले महत्त्व) - पीटर आणि पॉलमधल्या मतभेदांमुळे ख्रिश्चॅनिटीवर पडलेला ग्रीको-रोमन प्रभाव - या गोष्टी मुळातून वाचण्यासारख्या आहेत. (अवांतर - फॉक्स न्यूजवरच्या ज्या रेसिस्ट मुलाखतीमुळे हे पुस्तक गाजले, ती येथे पाहता येईल.)
'नो गॉड बट गॉड' हे इस्लामवरचे पुस्तक 'झेलट'च्या आठ-एक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं. झेलटच्या तुलनेत हे जरा विस्कळीत आहे. महम्मदाच्या उदयासोबतच शिया - सुन्नी संघर्षाचं मूळ, भारतातल्या देवबंद आणि अलीगढ अशा दोन विरुद्ध टोकाच्या चळवळी, ओसामा बिन लादेनचा उदय, हिजाबवरून झालेला वाद, तुर्कस्थान आणि इराण या अरबेतर देशांचा इस्लामकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशी थोडी सरमिसळ यात झालेली असली तरी तेही वाचनीय आहे.
७. The History of the Siege of Lisbon - José Saramago
रोचना यांनी 'सध्या काय वाचताय?'च्या आधीच्या भागावर या पुस्तकाचं नाव सुचवलं होतं. सुदैवाने ते स्थानिक ग्रंथालयात लगेच सापडलं.
पुस्तकाचं नाव जरी ऐतिहासिक घटनेशी संबंधित असलं, तरी ही ऐतिहासिक कादंबरी नाही. रायमुंडो सिल्व्हा नावाचा पन्नाशीतला, अविवाहित मुद्रितशोधक लिस्बनच्या वेढ्याबद्दलच्या एका पुस्तकाचं प्रूफरीडिंग करत असतो. इस्लामी सत्तेखाली असलेलं लिस्बन पुन्हा जिंकून घ्यायला पोर्तुगीजांना क्रुसेडर्सनी मदत केली, याऐवजी त्यांनी 'मदत केली नाही' असा एक छोटा, पण महत्त्वाचा बदल तो करतो आणि पुस्तक छपाईला जातं. ही चूक उघडकीला आल्यावर आणि रायमुंडोला ताकीद मिळाल्यावर, प्रकाशनसंस्थेतली एक अधिकारी व्यक्ती त्याला या बदललेल्या इतिहासाची फेरमांडणी करायला सांगते.
या मोठ्या घटनेचा इतिहास लिहिताना राहून/गाळल्या गेलेल्या वा नजरेआड केलेल्या लहान लहान घटनांबद्दल रायमुंडोच्या मनात मग खल सुरू होतो. कथानक मग बाराव्या शतकातली ऐतिहासिक घटना आणि विसाव्या शतकातलं रायमुंडोचं वैयक्तिक आयुष्य - अशा दोन रूळांवरून पुढे सरकतं. सारामागोची लेखनाची शैली निराळी आहे. विरामचिन्हांचा आणि वक्त्याच्या नामनिर्देशनाचा किमान वापर, स्ट्रीम-ऑफ-कॉन्शसनेस शैलीतलं निवेदन, पानंच्या पानं चालणारे परिच्छेद आणि भूतकाळ व वर्तमानकाळ यांच्यात विनासायास फिरणारं कथानक - यामुळे हे पुस्तक 'सहज वाचायला घेतलं नि चार पानं वाचून बाजूला ठेवून दिलं' या पद्धतीने वाचता येत नाही. पण या शैलीमुळे वाचकाचीही पुस्तकात अधिक गुंतवणूक होते.
इतिहासापेक्षाही इतिहासलेखन आणि तत्सम गोष्टी (Historiography) या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहेत. उदाहरण द्यायचं तर अॅरिस्टॉटलने माशीला चार पाय असतात असं लिहून ठेवल्याने, अनेक शतके प्रत्यक्ष पुराव्याकडे दुर्लक्ष करून जे इतिहासात लिहिलं आहे, तेच ग्राह्य धरून पुढे चालण्याची वृत्ती किंवा खुमारी वाढवण्यासाठी लेखकाने घेतलेलं स्वातंत्र्य. उदाहरणार्थ - चंद्रकोर असणारा झेंडा तुर्कांनी पंधराव्या शतकात प्रथम प्रचलित केला, पण ११४७ मध्ये घडलेल्या ह्या लढाईत असाच झेंडा पोर्तुगीज सैन्य लिस्बनच्या किल्ल्यावरून खाली उतरवतं, असा मूळ पुस्तकात उल्लेख असतो. (अगदी बाबासाहेब पुरंदर्यांनीही 'राजा शिवछत्रपती'मध्ये देवगिरीच्या पाडावाचे वर्णन करताना 'लखलखता चांदतारा असणारा हिरवा झेंडा तळपत्या तलवारींनिशी...' - असा उल्लेख केला असल्याचं आठवतं.)
८. The Winter's Tale - William Shakespeare
शेक्सपिअरच्या अखेरच्या काही नाटकांतलं हे एक नाटक. आमच्या शहरात गेल्या महिन्यात या नाटकाचा प्रयोग होता, त्यापूर्वी ते वाचून घेतलं. मैत्री - संशय - शिक्षा - विरह - योगायोग - पुनर्मीलन अशा परिचित फॉर्ममधलंच असलं तरी शाब्दिक कोट्या आणि परिचित शब्दांचा निराळ्या तर्हेने केलेला वापर यामुळे वाचताना मजा येते. उदाहरण द्यायचं झालं तर amazing हे अलीकडे अगदी घासून गुळगुळीत झालेलं विशेषण. पण 'maze च्या भूलभुलैयात अडकल्यावर झालेली किंकर्तव्यमूढ अवस्था म्हणून a-mazed' - असा त्याचा मूळ अर्थानुरुप केलेला वापर पाहणे रोचक ठरते.
बाकी 'Exit, pursued by a bear' ही शेक्सपिअरच्या नाटकांतली प्रसिद्ध स्टेज डायरेक्शन यातलीच.
सारामागोची कादंबरी आवडली हे
सारामागोची कादंबरी आवडली हे वाचून आनंद झाला!
अगदी आपल्या बखरींसारखं, नाही का? वाचताना उगाच डोक्यात विचार आला होता - भाऊसाहेबांच्या बखरीत एखाद्या कारकुनानी अशीच चूक केली असती, आणि ती दुरुस्त करून आजच्या महाराष्ट्रात बसून इतिहासचिंतन, सत्यचिंतन करावे लागले तर.... सारामागोच्या पुस्तकाचा असा भावानुवाद वाचायला मजा आली असती.
च्यामारी
झेंड्याची इतकी आयड्या नव्हती.
"अल् हिलाल"चं , चंद्रकोरिचं अरबी आणि पर्यायाने मुस्लिम जगतात बरच कौतुक आहे; अगदि सातव्या शतकातल्या इस्लामच्या उदयापासून ते आहे ; असं समजत होतो. खलिफा म्हणवणारय किंवा मुस्लिम धरमसंरक्षक म्हणवून घेणार्या सत्तांच्या झेंड्यावर असणं ते स्वाभाविक वाटे.
(थोडक्यात :- उमय्याद व अब्बासिद खिलाफतींनी तुर्कांच्या अगोदर सात आठशे वर्षे तरी चंद्रकोरिचा झेंडा वापरला; असा माझा समज होता.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
चंद्रकोर ही इस्लामपूर्व
चंद्रकोर ही इस्लामपूर्व अरबांच्या चंद्रभक्तीचे प्रतीक आहे अशी समज होती. पूर्व रोमानी ख्रिस्ती साम्राज्य, उर्फ बिझंटीन साम्राज्याच्या नाण्यांवर चंद्रकोर-तारा असत. त्यांची राजधानी कॉन्स्टँटिनोपल ही चंद्रदेवतेने वसवली होती अशा दंतकथेवरून शहराचे आणि पर्यायाने राज्याचे ते प्रतीक बनले. बिझंटीन साम्राज्याचे हे प्रतीक त्यांच्यावर विजय मिळवल्यावर तुर्कांनी पुढे वापरले. पुढे तुर्कांचे इस्लामी साम्राज्य म्हणून लौकीक झाल्यावर प्रतीक इस्लामी बनले, असे इतिहासकारांचे मत आहे.
भाऊसाहेबांच्या बखरीत एखाद्या
अगदी, अगदी. नाही म्हणायला, नारळीकरांची एक विज्ञानकथा या अंगाने जाते. पानिपतात मिळालेला विजय, इंग्रजी अंमल मुंंबईपुरता मर्यादित, फाळणी न घडणे इ. कल्पनारंजन त्यात होतं - पण तिचा 'सीज ऑफ लिस्बन'शी तसा बादरायणच संबंध म्हटला पाहिजे.
@मनोबा - खिलाफतींच्या झेंड्यांबद्दल थोडी माहिती इथे मिळाली: http://en.wikipedia.org/wiki/Symbols_of_Islam#Other_colours
सौ लहानमोठ्या नोंदींनंतरक एक
सौ लहानमोठ्या नोंदींनंतरक एक नंदन की!
एकही पुस्तक ऐकलेलंही नव्हतं.. आता ब्रिटिश लायब्ररीत शोधुन वाचणे आले - विशेषतः २,३,७. आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१ तंतोतंत असंच.
+१ तंतोतंत असंच.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
बाकी शून्य
कमलेश वालावलकर यांचे बाकी शून्य नुकतेच वाचले. अजून अरूण साधूंची प्रस्तावना वाचायची आहे. त्यांनी या पुस्तकास प्रशस्तीपत्र दिले आहे, आणि त्याबद्दल ऐकूनही होतो बरेच दिवस.
एका अस्वस्थ माणसाची अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. लेखकाचा आवाका बराच मोठा आहे. शेवटी काही सुखांत किंवा तार्किक न घडता अनेक प्र्श्न मांडून पुस्तक संपते. अर्थात ते ठीकच. लैंगिक वर्णने भरपूर, कशाला हे एवढं? असं नंतर नंतर वाटतं. अस्वस्थता मांडणारी बरीच पुस्तके आहेत, ती बर्याचदा धड सोडवतही नाहीत, अन धड वाचवतही नाहीत.
एकूण काहीसं दमदार वाचल्यासारखं वाटलं. कथा सांगली मिरजेत घडते, तिथला परिसर व तो काळ एकदम नोस्टाल्जिक करून गेला. एकदम रिलेट होता आलं. विचारांत पाडणारं काही ललित वाचायचा मूड असेल तर जरूर वाचा.
- स्वधर्म
सांगली मिरजेत कथा घडते काय?
सांगली मिरजेत कथा घडते काय? मग वाचले पाहिजे. धन्यवाद!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सांगली मिरजेच्या
इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्याचे भावविश्व पुस्तकाच्या अर्ध्या आधिक भागात. उत्कट आणि खोल. दमदार भाषा पण अस्सलही. त्या विशिष्ट भागातल्या अनेक फ्रेझेसही भेटतात.
- स्वधर्म
हैन! इंजिनियरिंग म्ह. वालचंदच
हैन! इंजिनियरिंग म्ह. वालचंदच असणार. सहीये!
(वालचंदी मित्र असलेला) बॅटमॅन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाचलयं. विचित्र आहे जरा
वाचलयं. विचित्र आहे जरा पुस्तक. नेमाडपंथी शैली. एकुणच लेखक नेमाड्यांचे फ्यान असावेत. पुस्तकातपण कोसलाचं कौतुक आहे भरपूर...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
विचित्रच
विचित्र म्हणावं असंच. पण वेगळं काही (गुडी गुडी वाचून कंटाळलेल्यांसाठी) नक्कीच.
-स्वधर्म
पुस्तकाची ओळख करून
पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. मागवून वाचते.
किंवा तार्किक न घडता म्हणजे
म्हणजे अतर्क्य काही घडतं का?
त्यालाही विरोध नाही.
काहीच न घडण्याला मात्र विरोध आहे. असं काही आहे का त्यात?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
इर्रॅशनल
खरं तर मला 'इर्रॅशनल' म्हणायचं होतं, पण अतार्किक असा शब्द वापरला गेला. त्या अर्थाचा चपखल मराठी शब्द आठवला नाही.
पुस्तकात जे घडतं ती एक शोधयात्रा आहे - स्वत:ची व जगाची. नायक जे निर्णय घेत जातो, ते काहीसे 'इर्रॅशनल' वाटत रहातात...
-स्वधर्म
गुलाबी सिर, मी संपत पाल, चिताक, नाईटिंगेल वुड
इथेच सुचवलेले 'गुलाबी सिर - पिंक हेडेड डक' हे संतोष शिंत्रे यांचे पुस्तक - कथासंग्रह - वाचला.
अतिशय फ्रेश विषय, समकालिन परिस्थिती/पार्श्वभूमी, विचारांतील - नितीमत्तेतील ताजेपण विलक्षण आवडले. समकालीन कथासंग्रहातील वेगळ्या विषयांना हात घालणारा वाचनीय कथासंग्रह असे याचे वर्णन करता यावे. पर्यावरण, आधुनिक समाजकारण, नक्षलवाद, समाजात असणारी एक खिन्नता आणि तरीही आशावादी किनार घेऊन प्रत्येक गोष्ट येते. नव्या सहस्त्रकाच्या पहिल्या दशकात लिहिलेल्या या कथा आहेत. बहुतांश कथा वाजवून घ्याव्यात इतक्या नेमक्या, 'क्रिस्प', शब्दांच्या महिरपी न काढताही खिळवणार्या - परिणामकारक!
त्यानंतर "मी संपत पाल" हे एका भाषांतरीत आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचले. गुलाबी गँगची संस्थापिका संपतपाल हिची जीवनकहाणी किंवा खरंतर संघर्ष कहाणी. भारतातील समकालीन प्रश्न, स्त्रीवादाचे हे काहिसे बोल्ड अंग त्यामागचे विचार, लाठी घेऊन लढण्यामागचे धोरण, विविध प्रसंगातून उभे राहणारे व्यक्तीमत्त्व, अगदी खोलवर मुरलेली जातीव्यवस्था व खालच्या जातीत स्त्रीयांच्या प्रश्नाला अधिक गडद करणारी "जात" आदी विविध अंगांनी विविध प्रश्न आपल्या समोर येतात. या प्रवासात काँग्रेसचे, मायावतींचे उल्लेख येतात, पण संपत पाल त्यांच्यात सहभागी होत नाही. तिचा लढा किती योग्य, किती चुकीचा हे बाजुला ठेवले तरी अनेकदा व्यवहारज्ञानातून सुचेल तशा मार्गाने सतत पुढे जात राहिलेला हा भारतातील आधुनिक स्त्रीवादी लढा मुळातून समजुन घेण्यासारखा आहे.
दरम्यान पॅरलल रिडिंग करताना 'नाईटिंगेल वुड' वाचून काढलं. ब्रिटिश खवचटपना, नर्मविनोद आणि प्रवाही कथाकथन ही तीनही गुण या पारंपरिक कादंबरीत आहेत. फार्फार नाही तरी कादंबरी बरीच आवडली.
यानंतर सध्या 'चिताक' हे महादेव मोरे यांचे पुस्तक वाचायला घेतले आहे. त्यावर विस्ताराने पुस्तक वाचुन झाल्यावर
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तुला साष्टांग दंडवत __/\__
तुला साष्टांग दंडवत __/\__ एका वेळेस एवढे पुस्तकं. आणि तू ह्या पुस्तकांचा उल्लेख अगदी आत्ता २-४ दिवसांपूर्वी केलेलास आणि तू ते संपवले देखील? :O
दिर्घ विकांताची कृपा. शिवाय
दिर्घ विकांताची कृपा.
शिवाय अरे, पुस्तकांची साईझ लहान आहे. दोन्ही पुस्तके १५० पानांच्या आसपास आहे.
नाइटिंगेल वुड संपवायला २-३ आठवडे लागले. (आमच्या ब्रिटिश विंग्रजी वाचनाचा स्पीड भलताच कमी आहे)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
डॉ. मुरलीधर शहा यांनी
डॉ. मुरलीधर शहा यांनी संपादिलेले समग्र राजवाडे खंड बर्याच दिवसांनी चाळत होते.
दर वेळेस हे वाटल्यावाचून राहत नाही, की या एकमेव कामगिरी साठी शहा साहेबांना महाराष्ट्रातले सगळे पुरस्कार मिळायला हवे होते. प्रत्येक खंडाला वेगवेगळ्या संशोधकांनी लिहीलेल्या दीर्घ, अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक, चिकित्सक प्रस्तावना - अ.रा. कुलकर्णी, सदानंद मोरे, कल्याण काळे, श्री. र. कुलकर्णी... यातील कोणीही उगाच राजवाड्यांची स्तुती केली नाही. त्यांच्या कामगिरीच्या गुणदोषाचे एकत्र परखड परीक्षण केलं आहे. प्रत्येक विषयात त्यांच्या विचारांच्या नावीन्याची, तसेच मर्यादांचीही चांगली कल्पना येते.
वर तळटीपा! संपूर्ण संदर्भ!! संग्रहित केलेल्या लेखांची मूळ प्रकाशन माहिती स्थळ-काळ समेत!!! काही विचारू नका. खुद्द राजवाडे प्रस्तावनेच्या टीकेवर नाराज झाले असतेच, पण हा व्यवस्थितपणा पाहून ते शहांवर खूष झाले असते.
मराठी इतिहासासाठी राजवाड्यांचे मूळ लेख तर एक अनमोल ठेवा आहेतच, पण हा उपक्रम ही काही कमी नाही.
किती खंड आहेत? प्रकाशन कुठले?
किती खंड आहेत? प्रकाशन कुठले? किंमत किती? इ.इ. कृपया सांगावे ही इणंती. आगौच धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बारा/तेरा खंड. १९९५-१९९८
बारा/तेरा खंड. १९९५-१९९८ दर्म्यान धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळाने प्रकशित केले. शहा आणि गिरीश मांडके जनरल संपादक, आणि प्रत्येक खंडाला निराळ्या लेखकाची प्रस्तावना. किंमत आता ठाउक नाही - मी प्रथम उपलब्ध झाले तेव्हा सेट विकत घेतला होता. २००० रु च्या आसपास असावा तेव्हा - ई-रसिक किंवा बुकगंगेत विचारता येईल.
खंडांची माहिती:
१. मराठी भाषा व व्याकरण.
२. मराठी ग्रंथ व ग्रंथकार
३. संस्कृत भाषा व भाषाशास्त्रीय लेख
४. अभिलेख संशोधन
५. मराठी धातुकोश
६. नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
७-८. समाजकरण आणि राजकारण
९. आत्मचरित्रविषयक लेख
१०. प्रस्तावना खंड
११. इतिहास व इतिहासविषयक लेख
१२. संपादक राजवाडे
१३. समग्र संतसाहित्य.
वाह! बहुत धन्यवाद मॅडमजी.
वाह! बहुत धन्यवाद मॅडमजी. विचारून पाहतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
On Not Going Home - James Wood
परदेशस्थ भारतीयांचे मायदेशाबद्दलचे उमाळे म्हणा किंवा शहरी लोकांनी मूळ गावाच्या गतकातर होऊन काढलेल्या आठवणी म्हणा - यात तसं काही नावीन्य नाही. मात्र हे नॉस्टॅल्जिक कढ ओसरले की 'यू कॅन नेव्हर गो होम अगेन' हे कडू-गोड वास्तवही जाणवू लागतं.
या अनुभवाचे आपल्या आयुष्यातले दाखले, साहित्यातली उदाहरणे (नायपॉलपासून ते सेबाल्ड, अलेक्झांडर हेमॉन, इस्माईल कदारे या युरोपियन लेखकांपर्यंत) आणि तदनुषंगाने मांडलेले काही विचार असं जेम्स वूड या मूळच्या ब्रिटिश, पण अमेरिकेत स्थायिक झालेल्या समीक्षकाच्या भाषणाचं स्वरूप आहे. ते येथे वाचता येईल. वाचण्याऐवजी (किंवा सोबत) जमल्यास ते ऐकावं, अशी शिफारस करेन. (काही किस्से उदा. नाबोकोव्हसारख्या इमिग्रंट लेखकांचा क्लिशेड् इंग्रजी शब्दांतील 'पन्स' अथवा मूळ, पण कालौघात हरवलेला अर्थ शोधण्याचा कल - हे छापील भाषणात नाहीत.)
भाषण तसं दीर्घ आणि अनेक संदर्भ असणारं आहे. पण त्यातले काही ठळक मुद्दे:
>>To have a home is to become
हे पटलं. दुव्यासाठी धन्यवाद.
आकलन
नरहर कुरुंदकरांचे 'आकलन' हे पुस्तक वाचून झाले. त्यातील गांधीजी आणि समाजसुधारणा हा लेख वाचून काही प्रश्न पडले आहेत. कुरुंदकर म्हणतात की गांधीजींनी म्हटले आहे की 'सर्व धर्म सारखेच खरे आहेत'. मला मुळात इथे खरे म्हणजे काय हे नक्की समजले नाही. कुरुंदकर म्हणतात की ह्या धर्मांत इतक्या परस्पर-विसंगती आहेत की 'सर्व धर्म सारखेच खरे आहेत' ह्या वाक्याचा व्यावहारिक अर्थ 'सर्व धर्म खोटे आहेत' असा होतो. मी जर अ, ब, क ह्या तीन परस्पर-विसंगत विधानांचा विचार केला, तर अ, ब, क हे तिन्ही बरोबर आहेत म्हणणे हे तिन्ही चूक म्हणण्यासारखे कसे होऊ शकते हे कळले नाही.
पुढे कुरुंदकर असे म्हणतात, की गांधीजींच्या म्हणण्याचा अर्थ असा होत असल्याने धार्मिक मंडळी गांधीजींवर चिडून असत. आता जर कुरुंदकर म्हणत आहेत तोच अर्थ गांधीजींना अपेक्षित असेल, तर तो किमान धार्मिक लोकांपर्यंत पोचला असे म्हणता येईल (त्यांच्या चिडण्यावरून). मला मुळात ही दोन विधाने समान अर्थाची वाटत नाहीत. त्यात जर दुसरा अर्थच (कुरुंदकरांनी सांगितलेला) (गांधीजींना) अपेक्षित असेल, तर सर्व धर्म खरे आहेत असे म्हणावे तरी कशाला? सरळ सर्व धर्म खोटे आहेत म्हणावे की! की हे भोळ्या लोकांना गंडवण्यासाठी आहे की सगळे धर्म तेच सांगतात वगैरे वगैरे...?
माझे आकलन
म्ह. बहुतेक सर्व धर्मांचे उद्दिष्ट एकच आहे, सर्व धर्मांत चांगला पार्ट सेमच आहे, इ.इ. म्हणावयाचे असावे. माझे स्मरण बरोबर असेल तर गांधीजींनी एके ठिकाणी म्हटले आहे की कुराणातील अवतरणे देणार्यांना मनुस्मृतीतली अवतरणेही १-ऑन-१ देता येतील, पण त्याने साध्य काही होणार नाही. अतएव चांगले ते घ्यावे इ.इ. असे म्हणायचे असावे.
एका धर्मातली शिकवण दुसर्या धर्माच्या विरोधी असू शकते- कैक ठिकाणी तसे दिसतेही. सबब तर्ककर्कशपणे पाहू गेल्यास कुरुंदकरांचे म्हणणे योग्य असले तरी गांधीजींना ती तर्ककर्कशता अभिप्रेत नसावी असे वाटते.
कुरुंदकर म्हणतात तेवढ्या लिटरल अर्थाने गांधीजींना ते अभिप्रेत नव्हतेच. धार्मिक मंडळी चिडायची कारण गांधीजींच्या मताप्रमाणे पाहू गेले तर चांगुलपणावर आपापल्या धर्माचा युनिकनेस उरायचा नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ह्या धर्मांत इतक्या
याचा मी लावलेला अर्थः
सर्व धर्म सारखेच खरे आहे म्हटल्याने मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे दुसर्या धर्माला नावे ठेवायचा. जर सर्व धर्म सारखेच खरे आहेत म्हणताच, धर्मातील विसंगती बघितली नी ती रद्द करत गेलो तर हाती काहीच उरत नाही. उदा हिंदु धर्म मृत्यूपश्चात तात्काळ निकाल/मोक्षप्राप्ती सांगतो, इस्लाममध्ये कयामतका दिन आहे. आता दोन्ही एकाच वेळी खरे असु शकत नाही. हे दोन्ही "सारख्याच प्रमाणात खरे" ठरण्यासाठी "दोन्ही खोटे" या एकाच पॉईंटला वैध ठरते.
जोवर एकच धर्म खरा आहे असे मत असते त्यावेळी खरे काय खोटे काय ही सीमारेषा सापेक्ष का होईना स्पष्ट असते. मात्र सारे काही सारख्याच प्रमाणात खरे म्हणयचे तर त्याचा लसावी सारेच खोटे यात निघावा असे कुरूंदकरांचे म्हणणे असावे असे वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अॅडम आणि अमलताश
'अॅडम' हे रत्नाकर मतकरींचे पुस्तक कोणत्या अपेक्षा सोबत घेऊन वाचले कुणास ठाऊक. एकूण काय की लेखकाला थांबावे कुठे हे कळणे महत्त्वाचे. 'अमलताश' विषयी याच मंचावर बरेच नकारात्मक लिहिले गेले आहे. मला वाटते कोण कुठल्या वयात काय वाचतो/ ते यावर त्या त्या पुस्तकांचा तिच्यावर / त्याच्यावर काय आणि कसा परिणाम होतो हे ठरत असावे. 'रायटिंग, नॉट दी रायटर' या वाक्याचा एरवी मी कंटाळा येईस्तोवर उदोउदो करत असतो. पण 'अमलताश' ने मला अस्वस्थ केले. माझ्यापुरते हे 'अमलताश' चे यश आहे असे मी समजतो. प्र.ना.संत हे माझे नावडते लेखक आहेत हे मान्य करुनही.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
मला वाटते कोण कुठल्या वयात
+१
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अमलताश
खूप घाईत लिहिल्यासारखे वाटले. म्हणजे ते संयत असावे असा आग्रह नाही, पण तो सगळा उतार घाईचा वाटला. अगदी लोकप्रियतेचा फायदा घ्यावा इतपत घाईचा. (किंवा श्री. कुलकर्ण्यांनी मागे लागून लिहून घेतल्यासारखे. अर्थात ते कबुलीही तशीच देतात या पुस्तकाविषयी असं कळालं). आणि अतिशय उत्तम फोटोग्राफीचा वारसा घरीच असताना अमलताशासहित दिलेल्या प्रत्यक्ष घराचा फोटो सुमार एडीट केलाय. खुपलं तेही मला.
The Secret Life of Cats
The Secret Life of Cats नावाचं (फ्रेंचमधून इंग्लिशमधे अनुवादित झालेलं) पुस्तक कालच ग्रंथालयातून आणून वाचायला सुरूवात केली आहे. पहिली काही पानं वाचून आणि बहुतेकशी चित्रं पाहून झाली आहेत. हा परिच्छेद फारच आवडला -
With a trembling hand I toss the leftovers of my meal toward it. It makes as if to escape, then there is silence. It waits, then slowly advances. The offering is accepted. I move forward, filled with fear and curiosity. I know its fear is as intense as my own, its curiosity even greater. How long, I wonder, will it take us to bridge the few yards that separate us?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जगबुडी!
मांजरीला It म्हणणं? अब्रह्मण्यम! एक वेळ देवाचं अस्तित्व नाकारता येईल, पण मनुष्याहून श्रेष्ठ अशा मांजरीला इतर यःकश्चित प्राण्यांप्रमाणे न्यूटर प्रोनाऊन वापरणं? छे छे छे. आंग्लभाषी असंस्कृतपणा नुसता!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
"The offering is accepted."
"The offering is accepted." या वाक्यानंतर "It" म्हणण्याला सगळ्या आस्तिक लोकांनी विरोध केला पाहिजे. तुम्ही कुठे हो आलात देवदर्शनाच्या लायनीत? या चर्चेतून थोडा बोध घ्या.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Code Name Verity ही कादंबरी
Code Name Verity ही कादंबरी कोणी वाचली आहे का?
अत्यंत रोचक आणि अत्यंत बोअर अशा दोन टोकांच्या प्रतिक्रिया याबद्दल मिळताहेत.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
वाचायला सुरुवात केली आहे. लय
वाचायला सुरुवात केली आहे. लय भारी आहे! वाचून झाली की डिट्टेलवारी लिहीन...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
आवडलं. पहिला भाग मस्तच आहे.
आवडलं. पहिला भाग मस्तच आहे. दुसरा भाग वाचताना 'अरे माझ्या देवा! भारीच की!' वाटलं. पण पुलावरच्या 'किस मी हार्डी' नंतर माझा इंटरेस्टच संपला त्यामुळे शेवटचे काही धडे बोअर झालं.
किस मी हार्डी नंतरचे धडे हे
किस मी हार्डी नंतरचे धडे हे इतस्ततः पसरलेली कथासूत्रं जुळवण्यासाठी लिहिले आहेत. काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ते दोनदा वाचले.
नंतर विचार करता वाटून गेलं - डबल एजंट पकडण्यात अभूतपूर्व यश मिळवलेल्या जूलियाला एका बारीकशा फ्रेंच शहरातलं गेस्टापो ऑफिस उडवायला पाठवणं पटत नाही.
बाकी त्या अमेडियस फॉन लिंडेनला जबरदस्त चितारलंय.
सर्वात धक्का देणारी गोष्ट म्हणजे हे पुस्तक चक्क young adult fiction - कुमारकथा - आहे!!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मला त्या दोघींची मैत्री फार
मला त्या दोघींची मैत्री फार आवडली (अर्थातच)! जिगसॉ पझल सोडवण्याच्यादृष्टीने मी वाचलच नै पुस्तक, बहुतेक मला ह्यापी एंडींग हवं होत. लिंडेन किंवा इतर कोणत्याही पुरुषापेक्षा यातल्या स्त्रियाच जास्त रोचक आहेत. क्विनी, म्याडी, एंजल आणि पेनसुद्धा :-). आजकाल अशी बरीच पुस्तकं येतायत वाटतं ज्यात स्त्रिया जास्त स्ट्राँग, केपेबल, इव्हन खलनायिकादेखील असतात. आणि हो मला यंग अडल्ट पुस्तकं आवडतात बर्याचदा. ह्यारी पॉटर, ट्वायलाइट, हंगर गेम्स. परवा वाचलेली डायवर्जंट मात्र जरा पकाउ वाटली.
हो - ती बेख्डेल टेस्ट की काय
हो - ती बेख्डेल टेस्ट की काय ते पूर्ण करणारी कादंबरी.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
राणी बंग - गोईण: आदिवासींशी
राणी बंग - गोईण:
आदिवासींशी बोलून मिळवलेली झाडांबद्दलची माहिती, समजुती, औषधी उपयोग इत्यादी. ठीकठाक आहे. फार काही ग्रेट नाही. कसंबसं रेंगाळत पुरं केलं.
मल्लिका अमरशेख - मला उद्ध्वस्त व्हायचंयः
कवी ढसाळ आणि पुरुष ढसाळ यांच्यातल्या भीषण विसंगतींबद्दल प्रामाणिकपणे बोलणारं, बाई नामक दलिताचे चिरकालीन प्रश्न विचारणारं, उत्कट पुस्तक आहे. ते वाचताना 'रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो' तर आठवत राहिलीच, खेरीज 'तू तलम अग्नीची पात' लिहिणार्या बाईचं हे आत्मकथन आहे, हेही सारखं डोक्यात राहिलं. फारा दिसांनी इतकं जळजळीत काही वाचलं. या पुस्तकावर बंदी आहे म्हणे. खरंतर लेखकांच्या पत्नींच्या वादग्रस्त आत्मचरित्रांची मराठीतली तगडी परंपरा बघता हे पुस्तक त्या अर्थानं फार निराळं नव्हे. 'नवरा नामक प्राण्याची काळी बाजू' या एका व्यथेच्या पलीकडे जाणारं सशक्त पुस्तक आहे. त्यावर का बंदी आहे कळेना.
मायकल पोलन - फूड रूल्सः
निरनिराळ्या अन्नविषयक संज्ञा आपल्या तोंडावर येताजाता फेकल्या जात असतात. गोंधळून जायला होतं. अशात खाण्यापिण्याविषयीचे साधेसोपे मजेदार नियम सांगतं हे पुस्तक. त्यात जगभरातल्या खाद्यविषयक म्हणी आहेत, तसेच 'सुपरमार्केटच्या कडेकडेनं फिरावं, तिकडे प्रक्रिया न केलेलं अन्न विकतात' किंवा 'मधल्या वेळी शक्यतो झाडाचा थेट भाग असेलसा पदार्थ खावा, नुकसान कमी' असे मजेशीर आधुनिक निष्कर्षही आहेत. छोटेखानी पुस्तक. मजा आली.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
फूड रूल्स
मस्त आहे. एकदा वाचून ठेवून देण्यापेक्षाअ घरी संग्रही ठेवून अधूनमधून स्वतःलाच आठवण करून देण्यासाठी उपयुक्त. सगळ्या सूचना शास्त्रीयदृष्ट्या अचूक असतील असे वाटत नाही, पण "थंब रूल" म्हणून चपखल.
पॉलन चं ऑम्निवोर्स डिलेम्मा
पॉलन चं ऑम्निवोर्स डिलेम्मा हे माझं अत्यंत आवडतं पुस्तक. चार प्रकरणात चार वेगळ्या जेवण पदार्थांचे फूड चेन तपासतं. पहिलं ड्राइव-इन मधे विकत घेतलेला आणि गाडीत खाल्लेला बिग मॅक चा बर्गर, दुसरा नैसर्गिक खतांनी पोसलेले, पण जगाच्या कानाकोपर्यातून विमानाने आणलेले खाद्यपदार्थ, तिसरा पॉलीफेस फार्म नावाच्या वर्जिनियातल्या शेतावर उगवलेले नैसर्गिक पदार्थ, आणि शेवटचा त्याने स्वतः शिकार आणि गोळा केलेला. आपल्या रोजच्या जेवणातले खाद्यपदार्थ कुठून येतात, त्यांची खरी पर्यावरणीय किंमत काय आहे यावर विचार करायला लावणारं मार्मिक विवेचन. पॉलीफेस फार्म च्या प्रकरणाने काही काळ मला वेड लावलं होतं.
नंतर च्या पुस्तकांत तोचतोचपणा खूप जाणवला. पण हे पुस्तक फर्स्ट क्लास आहे.
मेघना - मला उद्ध्वस्त
मेघना -
मला उद्ध्वस्त व्हायचंय वर बंदी नाहीये. लेखिकेनेच ते पुस्तक मागे घेतलय. पुस्तक अप्रतिम आहे ह्यात शंकाच नाही. तुलनेसाठी हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचं मी भरून पावले आहे हे पुस्तक उत्तम ठरावं. मल्लिका आणि मेहरुन्निसा या दोघीही मुसलमान स्त्रिया पण त्यांची सामाजिक स्थानं निराळी असल्यामुळे दृष्टीकोन खूप वेगळा आहे. शिवाय दोघींचं नवऱ्याला पाहणे ही भिन्न आहे.दोघींच्या प्रेम विषयक कल्पना देखील वेगळ्या आहेत. स्त्रीच्या स्व विषयक जाणीवा - सकारात्मक किंवा नकारात्मक - किती नवर्याशी निगडीत असतात हे ह्या दोन्ही प्रांजळ आत्मचरित्रांमध्ये खूप छान पणे आलंय. उध्वस्त होत जाणे आणि भरून पावणे - तुलना खूप रोचक आहे. जरूर वाच.
தநுஷ்
ओह, धन्स. मिळवावं लागेल आता
ओह, धन्स. मिळवावं लागेल आता ते!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अंतर्नाद/आत्मश्लाघा
'अंतर्नाद' हे मराठीतलं त्यातल्या त्यात चांगलं मासिक. भानू काळेंसारखा समर्थ संपादक लाभलेलं. संपादकीय, सर्वोत्तम ठाकूर आणि अवधूत परळकर यांचे लेख/सदरे वाचनीय असतात यात वादच नाही. अंकाचं मुखपृष्ठ म्हणून केलेली चित्रांची निवडही चोखंदळ.
असं असलं तरी इतर लेखांमध्ये बव्हंशी एक तर हुकमी भाषांतरं तरी सापडतात किंवा आठवणींच्या नावाखाली केलेली स्वतःची भलावण!
कृ. ज. दिवेकर हे नाव यात अग्रहक्काने घ्यावे लागेल. फेब्रुवारीच्या अंकातला त्यांचा दिनकर गांगलांबद्दलचा लेख हा बराचसा त्यांच्या स्वतःच्या साहित्यसंपदेबद्दल (!) आहे. मार्चच्या अंकात त्यांचा लेख नसल्याची उणीव त्यांनी वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र पाठवून व त्यात आपल्या कामगिरीचा उल्लेख करून भरून काढली आहे. (आता 'मे'च्या अंकात त्यांचा केशवराव कोठावळ्यांवरचा लेख वाचण्याची स्वपीडक उत्सुकता आहे :)).
चांगली कॉर्पोरेट करिअर सोडून साहित्याचे असिधाराव्रत स्वीकारलेले काही लेखकु मराठीत आहेत, याची आपणा सर्वांना 'आयडिया' असेलच. शिवराज गोर्लेही त्यांपैकीच एक. त्यांचा ज्ञानप्रबोधिनीवरचा एक लेख फारा वर्षांपूर्वी वाचला होता, तो आवडला होता - मात्र अंतर्नादच्या एप्रिलच्या अंकात त्यांनी स्वतःच स्वतःच्या कारकीर्दीचा आढावा घेताना जी मजेशीर विधानं केली आहेत, त्यातली काही अशी -
"मी लेखक म्हणून किती व कसं यश मिळवलं आहे, त्या यशाचे किती विविध पैलू आहेत याची समीक्षकांनाच काय, माझ्या प्रकाशकांनाही पुरेशी कल्पना नाही."
"माझा विनोद भले बालिशपणाचं बिरुद मिरवेल, पण सवंगतेच्या पातळीवर जाणार नाही." [चित्रपट पटकथा - बंडलबाज, खतरनाक, बजरंगाची कमाल, धुमाकूळ इ.]
"काही झालं तरी मुंबईत स्थायिक व्हायचं नव्हतं. त्यामुळे हिंदी चित्रपट-मालिकांच्या अनेक संधी मी सोडल्या.... प्रिंट मिडियाकडे मी तसा उशीराच वळलो. वाचकांनी माझ्या दिवाळी अंकातील कथांना भरभरून प्रतिसाद दिला. खुशीपत्रांचा ओघ सुरू झाला. बहुतेक पत्रांत 'पुलंच्या तोडीचं, त्यांची आठवण करून देणारं लेखन' असा उल्लेख...'नग आणि नमुने' हे मराठीतलं पहिलं ऑडिओ बुक, ज्याला अमेरिकेतूनही मागणी असते."
"काही शाळांमध्ये दर आठवड्याला माझे लेख सूचनाफलकांवर लावले गेले."
"आणखी एक - तब्बल तेरा वर्षं रिसर्च असिस्टंट असलेला मी पहिला मराठी लेखक आहे. जयश्री ही माझी लेखनिक नव्हे तर माझ्या पुस्तकांची पहिली वाचक आहे. तिच्या तोंडून मी माझं पूर्ण पुस्तक प्रथम ऐकतो! तेही माझ्या शैलीचं रहस्य म्हणावं लागेल!"
"काय लिहिलं नाही मी? नाटक, चित्रपट, टीव्ही सिरियल, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रं, कविता, गीतं, विनोदी व प्रेरक साहित्य, स्तंभलेखन, संपादन, जाहिरातींसाठी कॉपीरायटिंगही. आश्चर्य वाटेल पण लवकरच 'मुलं शिकतात कशी?' 'स्वातंत्र्यातून समृद्धीकडे' आणि 'होय, होमिओपॅथी तुम्हांला वाचवू शकते' ही पुस्तकं येत आहेत." (ठळक ठसा माझा)
याशिवाय फर्ग्युसनमध्ये मराठीत मिळालेले मार्क, 'श्यामची आई'च्या खपाचा विक्रम मोडला असा दावा, वाचकांच्या पत्रातले हेलावणारे उल्लेख, जीए-तेंडुलकर-दळवींवर माफक टीका असा बराच मालमसाला आहे.
---------------------------------------------------------------
यातला विनोदाचा भाग सोडला तर एका चांगल्या मासिकाला आलेलं साचलेपण (ठरावीक लेखक, विषय) आणि अलीकडच्या Vanity Publishing च्या (पदरचे चाळीस-पन्नास हजार रूपये खर्चून पुस्तक प्रसिद्ध करवून घेणारे हौशी लेखक) आणि कुठल्याही विषयाचे 'विकी'रण करून पाडलेल्या पुस्तकांच्या जमान्यात 'आत्मस्तुती हेच मार्केटिंग' हा बनू पाहणारा नॉर्म (फेसबुकीय लेखकांसोबतच गोर्ले, नगरकर यासारख्या तुलनेने अधिक प्रस्थापित लेखकांचे अलीकडचे लेख पाहता) या दोन गोष्टी - 'मराठी साहित्याचं काय होणार?' छापाचे गळे न काढता - केवळ येथे नोंदवाव्याशा वाटल्या.
"लेखकराव" झाला आहे त्यांचा.
"लेखकराव" झाला आहे त्यांचा.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
==))
काही निवडक वाक्यांसाठी :-
==))
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
गोर्ले
गोर्ले हे जगायला अत्यंत लायक असे नरपुंगव आहेत याची खात्री पटलेली आहे. स्वतःवर असे खारीक-खोबरे उधळून घेता आले की या जगात काहीही करणे शक्य आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
२०५० - नंदा खरे पुस्तक
२०५० - नंदा खरे
पुस्तक बाजारात मिळत नाही. एका सहृदय मित्राच्या कृपेनं प्रत घरपोच मिळाली.
जगात महामारीच्या तीन लाटा पाठोपाठ आल्यामुळे लोकसंख्येचे हिशेब उलटेपालटे झाले आहेत आणि परिणामी माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीतही मूलगामी आणि सकारात्मक बदल झाले आहेत. सौर उर्जा हा कळीचा उर्जास्रोत आहे आणि पर्यावरणरक्षण हा निव्वळ मूठभर लोकांनी चैनीसाठी करण्याचा विचार न उरता जगण्यासाठी ते अपरिहार्य ठरले आहे. मधली ६२ वर्षं काळझोप घेऊन उठलेला लेखक हे सगळं अचंब्यानं पाहतो आहे, समजून घेतो आहे, त्याच्या काळातल्या (८०-९०चं दशक!) गोष्टींशी याची तुलना करतो आहे आणि सामाजिक-आर्थिक-वैज्ञानिक बदल टिपतो आहे...
हे खर्यांचं सुरुवातीच्या काळातलं पुस्तक. यात भविष्यातले संभाव्य बदल टिपताना त्यांची नजर विलक्षण आशावादी आहे. ते वाचताना खर्यांचीच यंदाच्या 'अक्षर'मधली गोष्ट अपरिहार्यपणे आठवते. त्या गोष्टीतही भविष्यातल्या शहरी माणसाचं चित्रण आहे. पण ते कुठल्याच अर्थानं आशावादी नाही. यंत्रांनी व्यापलेलं आयुष्य, प्रदूषण, ताणतणाव आहेतच. त्याबरोबरच सतत नजर ठेवून असणारं बिग ब्रदरसदृश अस्तित्व, पोकळ अस्मिता वापरून केल्या जाणार्या साठमार्या, कॉर्पोरेट्सनी माणसाला पिळून घेणं, त्याच्या सर्जनक्षमता मरत जाणं... हेही आहे.
अगदी सुरुवातीच्या काळातलं २०५० आणि सध्याचा लेखकाचा गंभीर-कडवट सूर यांतली तुलना अतिशय रोचक आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हा प्रतिसाद आला तेव्हाच
हा प्रतिसाद आला तेव्हाच वाचल्याचे आठवत होते, बराच शोध घेतला तेव्हा मिळाला. खरेंनी नवी आवृत्ती काढायला हवी.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
अशोकपूर्व ब्राह्मीच्या
अशोकपूर्व ब्राह्मीच्या अवशेषांबद्दल चर्चा करणारा एक पेपर वाचला. श्रीलंकेत हे अवशेष सापडले आहेत. काळ साधारण ३५० इसपू च्या आसपास जातो. मातीच्या भांड्यावर कोरलेले १-२ शब्द आहेत फक्त. तमिऴनाडूतही इसपू ४०० च्या आसपासचे अवशेष सापडलेत म्हणतात, पण त्यांचे लंकस्थ अवशेषांइतके कॅलिब्रेशन झालेले नाही. लंकस्थ अवशेष १९९६ साली पब्लिशवण्यात आले, तर तमिऴनाडूतले अवशेष २००८ नंतर सापडलेले आहेत.
त्यामुळे अशोकाच्या शिलालेखांच्याही १०० वर्षे अगोदर भारतात लेखनकला प्रचलित असल्याचे अवशेष मिळालेत. हे अतिशय महत्त्वाचे आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धारप : कथा "मुक्ती"
नारायण धारप हे एक आवडते कथाकार. त्यांच्या साचेबद्ध दुष्ट:सुष्ट कथांचा नाही, पण बाकी कथांचा खूप छान अनुभव आहे. 'मुक्ती' ही अशीच एक कथा.
त्यात धारपांनी भयकथेचा एक निराळा पैलू हाताळला आहे. साधारण कथानक : कथानायक आपल्या बालपणीच्या वाड्यात पुन्हा एकदा जातो. वाडा पाडण्याच्या आधी त्याचे दर्शन घ्यावे ह्या हेतूने. तेव्हा पूर्वायुष्यातील काही प्रसंग, व्यक्ती आणि अनुभव ह्यान्ची एक विचित्र सरमिसळ होते...
आता ह्यात भय हा केवळ एक भाग आहे. पण धारपांनी जुना वाडा, त्यातले रचनेचे तपशील आणि भावना ह्याचा औसम मेळ साधला आहे.
कथा संग्रह : पडछाया.
~धारपांच्या अशा वेगळाल्या भय-प्रयोगांचा चाहता!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
'फॅन्ड्री 'मधील जातीसंघर्ष
शुद्धोदन आहेर ह्यांचा लोकसत्तामधील फँड्रीच्या अनुषंगाने समीक्षण + लेख '' फॅन्ड्री 'मधील जातीसंघर्ष !"
एखादी गोष्ट वगळता समीक्षा उत्तम असून वाचनीय आणि चिंतनीय आहे.
करूण सत्यकथा..
The Strange Last Voyage of Donald Crowhurst हे पुस्तक वाचलं.
सनडे टाइम्स ह्या नियतकालिकाने आयोजित केलेली एकाकी जगसफर करण्याची ( single handed circumnavigation) स्पर्धा. त्यात कुवत जेमतेम असतानाही त्याच्या बक्षिसापोटी सहभागी झालेला डॉनाल्ड क्रोहर्स्ट हा स्पर्धक, आणि त्याचे स्पर्धेतील दिवस ह्याची ही कथा. डॉनाल्डला अर्थात एकाकी जगसफर करणे जवळपास अशक्य होते. स्पर्धेत भाग घेउन तो निघाला आणि काही काळ त्याने खराखुरा प्रयत्न केला. पण बर्याच अड्चणींनंतर त्याला कळून चुकलं की हे आपलं काम नोहे. मग आपण खरंच जगप्रवास करतो आहोत, अशा अर्थाचे संदेश त्याने त्याच्या संपाद्काला पाठवायला सुरुवात केली. बराच वेळ असा समुद्रात काढून त्याने परत येतेवेळी त्याच्या तपशीलपूर्वक बनावट नोंदीही बनवल्या! पण आपण फसवणूक करतो आहोत हा guilt complex, एकाकीपणा आणि प्रचंड ताण ह्याचा परिणाम होउन डॉनाल्डने वेडाच्या भरात समुद्रातच आत्मह्त्या केली.
अतिशय करूण कथा आहे. पट्कन दुवा हवा असल्यास विकिपिडिया वाचा.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
1Q84
This comment has been moved here.
राखीव सावल्यांचा खेळ - किरण
राखीव सावल्यांचा खेळ - किरण गुरव (शब्द प्रकाशन)
भेण्डे पुरस्कार, ग. ल. ठोकळ पुरस्कार, बाबुराव बागूल पुरस्कार; अशी पुरस्कारांची रांगच्या रांग आणि 'ग्रामीण बाजाची कथा' असं लेबल हे दोन्ही बघून मी काही पुस्तक उचललं नसतं. जागतिकीकरण-व्यवस्थेनं चालवलेलं शोषण-गरिबी-शेतीतली भीषण ओढगस्त-ग्रामीण इरसालकी... हे सगळं माहीत असतं आपल्याला. पण दरेक 'ग्रामीण' कथेत हेच नि इतकंच असावं? असंवेदनशील म्हणा हवं तर - पण मला बॉ कंटाळाच येतो.
हे पुस्तक भलताच सुखद अपवाद निघालं.
चित्रमय आणि भरघोस वर्णनं आहेत. 'बंद मुठीत माशी कोंडावी, तसं दु:खात आतबाहेर कोंडून राहिलेलं घर', 'कमळागत सरसा उमललेला चांद'... अशा वेगळ्याच ताज्या उपमा आहेत. बदलत्या वास्तवाचं जबरदस्त आणि मिश्कील भान आहे. खवचट-बेरकी-सोसणारी-कडूतिखट झालेली-अश्राप माणसं ही अशी बघता बघता डोळ्यांपुढे जिवंत उभी करण्याचं कसब आहे. धारदार-ताजी-जिवंत भाषा आहे.
संपूच नये असं वाटायला लावणारं पुस्तक फार दिवसांनी मिळालं. अजून काही लिहिलं आहे का या गृहस्थांनी? वाचावं लागेल...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
विकत घेण्याइतकं चांगलं
विकत घेण्याइतकं चांगलं वाटतंय. घेतोच!
आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुखवटे आणि इतर कथा - आनंद
मुखवटे आणि इतर कथा - आनंद विनायक जातेगावकर
जातेगावकरांची 'श्रीमंत गोपिकाबाईची बखर' आणि 'व्यासांचा वारसा' दोन्ही बेहद्द आवडल्यामुळे कथासंग्रह अपेक्षेनं उचलला होता. पण 'घर' आणि 'मुखवटे'सारखी एखाद-दीड कथा वगळता भ्रमनिरासच झाला. सारखी आपली ज्यातत्यात नाजूक हुरहुर, मनाला लागलेली ओढ, आलेलं नैराश्य आणि निरर्थकाचे अर्थ. 'आपल्याच पिंढरीवर नखानं गिरगुट्या काढून त्यात अर्थ शोधत बसायची धडपड' हे जी.एं.नी केलेलं उपहासपूर्ण वर्ण॑न आठवावं, इतका वैताग आला.
बहिणीच्या लग्नानंतर निसटून चाललेलं भावाबहिणीतलं नातं, गौरीच्या मुखवट्यांशी आणि एकूणच सासरच्या घरा-परंपरांशी सासुरवाशणीचे लव्ह-हेट प्रकारचे संबंध, पौगंडावस्थेतली हुरहुर - हे पुन्हा पुन्हा दिसलेले आकृतिबंध.
बाकी... ठीक. हेच का ते जातेगावकर असा प्रश्न पडला. अर्थात, हे तसं जुनं लेखन आहे. तेवढा फायदा त्यांना द्यायला हवा.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ऑपरेशन यमु
मकरंद साठ्यांचं 'ऑपरेशन यमु' वाचलं. लिहिण्याची शैली थोडीशी श्याम मनोहरांसारखी वाटली. एखाद्या स्त्रीच्या मनात विचारांचे, भावनांचे जे प्रवाह चालू असतात ते जर कागदावर उतरवले तर जे असेल त्यासम ही शैली आहे . ह्याला अधुनिकोत्तर म्हणत असावेत. अखंड एकच पात्र आपल्याशी बोलत असतं पण त्यात प्रवाहीपणा आहे ज्यामुळे कंटाळा येत नाही.वेगळं म्हणून वाचण्यासारखं आहे.
ह्यानंतर किंवा ह्याआधीच त्यांची 'अच्युत आठवले आणि आठवण' हे वाचण्याची शिफारस झाली आहे.