Skip to main content

मनातले छोटे मोठे विचार आणि प्रश्न - भाग ५

Part 1 | 2 | 3 | 4

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
====================

जानेवारी, फेब्रुवारी असा उच्चार करणे अथवा लिहिणे चूकीचे आहे काय?
january, february या इंग्रजी महिन्यांचा उच्चार आणि मराठी कॅलेंडरातील उल्लेख जानेवारी आणि फेब्रुवारी असा आहे,हे उच्चार योग्य आहेत काय.?
jan -yoo- er- ee आणि feb -roo- er -ee अशी त्यांची उच्चारांची फोड दिलेली आहे.याचा उच्चार जान्युअरी ,फेब्रुअरी असा होतो कि आणखि कसा...कि जानेवारी फेब्रुवारी हेच उच्चार योग्य आहेत.?

आदूबाळ Thu, 20/02/2014 - 16:35

आपला इंग्रजी बोलण्याचा अ‍ॅक्सेंट अलंकारासारखा मिरवण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. "बरोबर" उच्चार असं काही प्रकरण नसतं.

माझे एक गुरुजी "सप्टेबर" आणि "ऑक्टोंबर" म्हणतात. आम्ही कार्टी हसायचो सुरुवातीला. नंतर तो माणूस काय योग्यतेचा आहे ते कळल्यावर अर्थातच चेष्टा करणं कमी झालं.

मन Thu, 20/02/2014 - 16:45

फिरोदिया करंडक फेब्रुवारी महिन्यातच असतो असे ऐकले.
ह्या चषकास हजेरी लावण्याचा मानस आहे.
ऐसीवरील कुणी मदत करु शकतील काय ?
थेट भरत नाट्य मंदिरात तिकिटे मिळणार नाहित असे वाटते.
इतर काही पर्यायी व्यवस्था आहे का ?

घाटावरचे भट Fri, 21/02/2014 - 09:17

In reply to by मन

आजकाल फिरोदिया भरतला होत नाही बहुतेक. प्राथमिक फेर्‍या यंदा एम.आय.टी कॉलेजच्या सभागॄहात झाल्या. अंतिम फेरी यशवंतरावला होते असे ऐकतो (गेली काही वर्षं तरी होत होती, यंदाचे माहित नाही).

संपादनः पण शेवटी भरत ते भरतच. त्याची मजा (पुण्यात) इतर कुठेच नाही.

धनंजय Sun, 23/02/2014 - 05:26

जानेवारी, फेब्रुवारी वगैरे उच्चार मराठीमध्ये सुयोग्य आहेत (हिंदीमध्ये जनवरी, फरवरी, वगैरे), आणि बहुधा प्रमाणलेखनही तसेच आहे.

इंग्रजी उच्चार स्थानिक प्रतिष्ठित लोकांसारखा केला तर बरे. (नियम नाही, पण सोपे निर्देश) त्या-त्या ठिकाणच्या रेडियोवरच्या किंवा दूरदर्शनवरच्या इंग्रजी बातम्यांमध्ये स्थानिक प्रतिष्ठित उच्चार ऐकू येतो. थोडेच दिवस बाहेरगावी किंवा बाहेरदेशी प्रवास करायचा असेल, तर आपल्या घरचा स्थानिक प्रतिष्ठितांप्रमाणे उच्चार ठेवणे सोयीचे. लोकांना समजत नसेल तर धीम्या गतीने बोलावे. दीर्घकाळासाठी बाहेरगावी किंवा बाहेरदेशी राहाणार असल्यास उच्चारांत फरक करून घेणे, नव्या वस्तीच्या गावाशी काही प्रमाणात समेट करून घेणे सोयीचे असते.

भारतीय स्थानिक प्रतिष्ठित इंग्रजीभाषक "जॅन्वरी, फेब्ररी" म्हणतात, बहुधा. आजकाल माझ्या स्वतःच्या इंग्रजी-भारतीय हेलाबाबत मी साशंक झालेलो आहे. (दररोज ऐकू येत नाही.)
"जॅन्वरी" - दूरदर्शनचा "२६ जानेवारी" कार्यक्रम यूट्यूबवर बघितला, आणि उच्चार मला ठीकच आठवत असल्याची पडताळणी केली.

चायवाला Fri, 21/02/2014 - 10:20

रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी अशी एक म्हण आहे त्याची आठवण झाली. सगळ्या संस्थळांवर असले रिकामे प्रश्न वाचायला मिळत आहेत सद्ध्या.

शहराजाद Sun, 02/03/2014 - 15:52

In reply to by अनुप ढेरे

न्हावी वापरत असलेले उपकरण. नळीसारखे असावे. पूर्वी खेडोपाडी न्हाव्याकडून लहानसहान शस्त्रक्रिया करवून घेत. त्यातले दूषित रक्त काढण्याचे उपकरण बहुतेक.

ग्रेटथिंकर Sun, 02/03/2014 - 17:07

In reply to by शहराजाद

काहीही सांगू नका, तुंबड्या नावाचा एक किडा असतो ,जळवांसारखा रक्त पिणारा..भिंतीला चिकटतो तो

शहराजाद Sun, 02/03/2014 - 21:01

In reply to by ग्रेटथिंकर

तुंब'ड्या' वेगळा आणि तुंब'डी' वेगळी. तुंबडी हे रक्त- पू काढून टाकण्याचे पारंपारिक साधन आहे. भिंतीला तुंबडी लावून त्यातून काहीही बाहेर येत नाही. म्हणीतल्या न्हाव्याला काही म्हणजे काहीच कामधंदा नसल्याने भिंतीला तुंबडी लावण्याचा रिकामा उद्योग करत बसला आहे.
रक्त शोषणारा किडा आणि रक्त काढणारे उपकरण, दोन्हीतले नामसाधर्म्य लक्षणीय वाटते.

गवि Mon, 03/03/2014 - 15:33

In reply to by शहराजाद

"(उदा. कोणालातरी लुटून)कंपन्यांनी / व्यापार्‍यांनी स्वतःच्या तुंबड्या भरुन घेतल्या.." म्हणजे काय?

पोती का?

याचेच थेट एकवचनही अनेकदा वाचलं आहे. स्वतःची तुंबडी भरुन घेतली अशा अर्थाने.

अतिशहाणा Mon, 03/03/2014 - 20:12

In reply to by गवि

तुंबडी ही बाटलीवजा वस्तूच येथे अपेक्षित असावी. दुसऱ्याचे रक्त काढून स्वतःची धन करणे या अर्थाने. मात्र या तुंबड्या नंतर ब्लडब्यांकेत जातात काय? अन्यथा दुसऱ्याचे (प्रामुख्याने अशुद्ध) रक्त काढून बाटलीत भरुन ठेवणे या क्रियेचा व्हॅंप/ड्रॅक्युला वगळता इतरांना नक्की काय फायदा आहे हे अनाकलनीय आहे.

अतिशहाणा Mon, 03/03/2014 - 20:04

In reply to by शहराजाद

तुंबडी घेऊन रक्तशुद्धीकरण करणारे वैदू गावामध्ये फिरताना पाहिले आहेत. मात्र न्हाव्यांचा तुंबडीशी काय संबंध हा प्रश्न पडतो. मी पाहिलेले तुंबडीधारक हे वैदू होते.

शहराजाद Mon, 03/03/2014 - 22:32

In reply to by अतिशहाणा

अहो ते दूषित रक्त भरून कशाला आणि कशा प्रकारे ठेवतील? फक्त हव्या त्याच जागचे रक्त निघावे आणि ते सर्वत्र पसरू नये म्हणून हे साधन. सर्वच न्हावी हे करत असतील असे नाही. मी स्वतः न्हाव्यांकडे किंवा वैदूंकडेही तुंबडी पाहिलेली नाही. (पाश्चात्य देशातले ब्लडलेटिंगचे उपकरण लांब नळीसारखे असलेले पाहिले आहे. ) मात्र भिडे लिखित म्हणी आणि वाक्प्रचारांच्या कोशात वरील अर्थ दिला आहे. जुन्या मराठी साहित्यात लहान शस्त्रक्रिया करण्यासाठी न्हावी बोलवण्याचे उल्लेख आले आहेत. उदा. पायाची त्वचा कापून नारूचे लांब कृमी बाहेर काढणे, गळवे कापून पू - रक्ताचा निचरा करणे इ.

ऋषिकेश Tue, 04/03/2014 - 09:33

In reply to by शहराजाद

विश्वकोश काय म्हणतो बघा:

तुंबडी लावणे : शरीरातील इंद्रियांच्या विकारांवरील एका चिकित्सेला ‘तुंबडी लावणे’ म्हणतात. ज्या विकारांमध्ये शोथ (दाहयुक्त सूज) किंवा रक्त एकाच ठिकाणी गोळा होण्याची क्रिया प्रामुख्याने आढळते, त्याच विकारांकरिता ही चिकित्सा पद्धती एके काळी वापरात होती. या चिकित्सेचा हेतू रक्त शरीराच्या पृष्ठभागाकडे खेचून घेणे किंवा दूषित रक्त शरीराबाहेर काढून टाकणे, हा असे. तुंबडी लावण्याचे दोन प्रकार वापरात होते : (१) शुष्क आणि (२) आर्द्र.

तुंबडी लावण्याची काचेची भांडी : (अ) साधे भांडे, (आ) रबरी चेंडू असलेले भांडे.शुष्क तुंबडी लावण्यासाठी दूषित भागावरील त्वचेवर पैशासारखा गोल पदार्थ ठेवून त्यावर कापूर ठेवून तो पेटवितात. जाळ झाल्याबरोबर त्यावर धातूची लोटी उलटी ठेवतात. लोटीतील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे आतील हवेचा दाब कमी पडतो व त्वचा आत ओढली जाते. लोटीचे काठ जाड व गोल असले म्हणजे त्वचेला इजा होत नाही. पैसा, कापूर व लोटी ऐवजी कपासारखे जाड काठाचे काचेचे भांडे आणि स्पिरिट वापरूनही तुंबडी लावता येते. अगोदर स्पिरिटचे २-३ थेंब भांड्यात टाकून ते पेटवतात व जाळ संपता संपता ते उपडे करून त्वचेवर दाबून धरतात. ज्या ठिकाणी तुंबडी लावायची ती जागा गरम पाण्याने प्रथम स्वच्छ धुऊन टॉवेलने कोरडी केल्यास साधारण दमट त्वचेवर तुंबडी चांगली बसते. खालील त्वचा सुजून लाल दिसू लागली म्हणजे तुंबडी काढून टाकतात. एका टोकावर रबरी चेंडू बसविलेल्या तुंबड्याही मिळत.

आर्द्र तुंबडी लावण्याकरिता प्रथम वर दिल्याप्रमाणे सर्व क्रिया करतात. काचेचे भांडे काढून टाकल्या जागी म्हणजेच सुजून लाल झालेल्या त्वचेवर बोथट हत्याराने लहान लहान ओरखडे काढतात. कधीकधी चाकूने छोटे छेदही घेतात. त्यांमधून रक्त बाहेर येऊ लागताच त्याच जागी दुसरी तुंबडी बसवितात. या दुसऱ्या तुंबडीत ८५ ते ११५ घ.सेंमी. रक्त गोळा होईपर्यंत ती ठेवतात. आर्द्र तुंबड्या बहुधा जेथे त्वचा जाड असते अशा जागी (उदा., मान, कटिभाग, पुरुषांचे वक्षस्थळ वगैरे) लावीत.

ही चिकित्सा पद्धती पाश्चात्त्य देशांत वापरात नाही. भारतात कित्येक वैदू लोक त्वचाविकार आणि नारूसारख्या विकारांवर तुंबड्या लावण्याचा उपचार करतात.

वर दिलेल्या दुव्यावर तुंबड्या लावण्याच्या पात्राचे चित्रही दिले आहे.

मात्र याचा नी न्हाव्ह्याचा संबंध समजत नाही. किंवा जिथे वैदु सहज उपलब्ध नसेल तेव्हा हे सोपे काम न्हाव्याकडे दिले जात असेलही कल्पना नाही.

राजेश घासकडवी Sun, 23/02/2014 - 02:51

ऐसीअक्षरेच्या ध्येयधोरणांपैकी एक म्हणजे
- चर्चा खेळीमेळीने व्हाव्या. चर्चेत विचारांचे खंडन वा मंडन करावे, ते विचार मांडणाऱ्या सदस्यांबद्दल टीका नसावी.

या चर्चेत काही सदस्यांनी वैयक्तिक पातळीवर शेरेबाजी केली आहे, तशी पुन्हा होऊ नये ही इच्छा. श्रेणीदात्यांनी त्यांना निरर्थक आणि अवांतर श्रेणी देऊन आपलं मत व्यक्त केलेलं आहेच. पण संपादक मंडळातर्फेही आठवण करून देण्याचीही गरज वाटली.

जाता जाता - गेल्या काही महिन्यात इतरही लेखांवर अवांतर प्रतिसादांचं प्रमाण वाढल्यासारखं वाटतं आहे. त्यांत वरील प्रतिसादांप्रमाणे खोडसाळपणा किंवा हिणवणारा वैयक्तिकपणा असतो असं नाही. मात्र कधीकधी विषयापासून भरकटणं दिसून येतं. काही प्रमाणात फाटे फुटणं चर्चेला बाधा न आणता नवीन समांतर विषयांवर चर्चा करायला उद्युक्त करतं. (उदाहरणार्थ हॅरी पॉटर बाबत चर्चा करताना टोल्कीनच्या पुस्तकांवर चर्चा सुरू होणं याने मूळ चर्चेला बाधा न येता नवीन परिमाणं मिळतात.) अशा प्रतिसादांना श्रेणीदातेही त्यांचा दर्जा लक्षात घेऊन चांगली श्रेणी देतात. किंवा आम्ही संपादक त्या प्रतिसादांचे धागे बनवून वेगळी चर्चा घडवून आणतो. हे काहीसं सकारात्मक अवांतर ठरतं. मात्र काही वेळा निव्वळ चर्चा भरकटवणारं अवांतरही होताना दिसतं. प्रत्येक धाग्याचा खरडफळा होण्याइतका प्रश्न बिकट झालेला नाही. तरीही प्रतिसादकांना विनंती आहे की आपला प्रतिसाद चर्चा भरकटवणारा आहे का याचा विचार करावा.

'न'वी बाजू Sun, 23/02/2014 - 13:23

In reply to by राजेश घासकडवी

मात्र काही वेळा निव्वळ चर्चा भरकटवणारं अवांतरही होताना दिसतं. प्रत्येक धाग्याचा खरडफळा होण्याइतका प्रश्न बिकट झालेला नाही. तरीही प्रतिसादकांना विनंती आहे की आपला प्रतिसाद चर्चा भरकटवणारा आहे का याचा विचार करावा.

...नि कल्पकसुद्धा!

बोले तो,

(१) आमच्या (यानी कि युअर्स ट्रूलीच्या) आजवर येथे प्रकाशित झालेल्या प्रत्येक प्रतिसादास एकएक करून 'अवांतर' अशी श्रेणी देत बसण्यापेक्षा, एकाच प्रतिसादात तेच काम किती सोप्या रीतीने, झटक्यात आणि त्याचबरोबर किती प्रभावीरीत्यासुद्धा साधले आहे, वाखाणावेसे वाटते. वाह भाई, वाह!

(२) शिवाय, भूतपूर्व का होईना, पण एक पुणेकर सोडल्यास पुणेरी पाटीचे मर्म तमाम दुनियेत दुसरा कोण जाणू अथवा वाखाणू शकेल बरे?

(३) '...काही वेळा निव्वळ चर्चा भरकटवणारं अवांतरही होताना दिसतं.': 'काही वेळा'! म्हणजे, तथाकथित ब्रिटिश अंडरष्टेटमेण्टचे आम्ही पंखे आहोतच; परंतु या सद्गुणाचे श्रेय इंग्रजांना उगाच (व्यर्थ वगैरे) दिले जाते, असे कधीकधी वाटून जाते खरे. (क्लासिक ब्रिटिश अंडरष्टेटमेण्ट मे नॉट, आफ्टर ऑल, बी क्लासिकली ब्रिटिश.)

(४) 'अन्योक्ती' (बोले तो, 'लेकी बोले, सुने लागे' - यात लेक कोण नि सून कोण हा प्रश्न पूर्णतः गौण आहे.) अलंकाराचा कल्पक नि समर्पक वापर. आदाब अर्ज़ है, जनाब!

(५) प्रत्येक ऑफेण्डिङ्ग लेकीस वा सुनेस प्रतिऑफेन्शी, पोष्टफ्याक्टो, व्यक्तिगत निरोपातून, खाजगीमध्ये, लोकांच्या नजरेआड व्यक्तिगत समज देत बसण्यापेक्षा, एखाददुसर्‍याच ऑफेण्डिंग सुनेचे जाहीरनाम्याद्वारे उदाहरण बनवणे हे कधीही अधिक कार्यक्षम. जेणेंकरून इतर (वॉनाबी) लेकीसुनांनी काय घ्यायचा तो बोध (आगाऊच) घ्यावा. इट पेज़ टू रेझॉर्ट टू प्रीत भरारा ट्याक्टिक्स, आफ्टर ऑल - समथिंग द्याट दे वोण्ट टीच यू इन म्यानेजमेण्ट ष्कूल.

(६) वस्तुतः, चर्चा भरकटविणारे, अवांतर प्रतिसाद न देण्यासंबंधीची 'सुचवण' तूर्तास ताजी असताना हे अतिअवांतर येथे लिहू नये; परंतु, या अनुषंगाने आम्हांस अत्यंत आवडती अशी एक कविता आठवली, ती येथे डकविण्याचा मोह अनावर होतो.

ब्रेश्टसाहेबाची कविता आहे. ज्याच्या नाटकावरून पु.लं.नी आपले 'तीन पैशाचा तमाशा' बेतले, तो हा पूर्व जर्मन नाटककार. १७ जून १९५३च्या पूर्व जर्मनीतील उठावाच्या संदर्भात त्याने ही कविता रचली होती. अतिशय रोचक नि उद्बोधक आहे, असे प्रतिपादण्याचे धाडस करू इच्छितो. जरूर आस्वाद घ्यावा.

अर्ज़ है:

After the uprising of the 17th of June
The Secretary of the Writers' Union
Had leaflets distributed in the Stalinallee
Stating that the people
Had forfeited the confidence of the government
And could win it back only
By redoubled efforts. Would it not be easier
In that case for the government
To dissolve the people
And elect another?

(७) असो. तरीही, प्रतिसादकांनी आपला प्रतिसाद चर्चा भरकटविणारा आहे, किंवा कसे, याचा विचार करावा, या प्रस्तुत अपेक्षावजा विनंतीमागील कळकळ आणि सदिच्छा समजता येण्यासारखी आहे. मात्र, याची दुसरी बाजू प्रस्तुत विनंतीकर्त्याच्या बहुधा लक्षात आलेली नसावी, अशी शंका आल्याने, ती बाजू मांडण्याची न पेलणारी जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न आम्ही करू पाहत आहोत, सो हेल्प अस गॉड.

तर अंदर की बात अशी आहे, की प्रतिसाद देण्यापूर्वी आम्ही असा विचार केला पाहिजे, हे खरेच. किंबहुना, असा विचार आम्ही करतोच, नि करत आलेलोच आहोत. अडचण अशी आहे, की बहु विचारांअंती आमच्या असे लक्षात येऊ लागले आहे, की आम्ही कसेही प्रतिसाद लिहिले, तरी त्यांतून फाटे हे फुटायचेच नि चर्चा भरकटायच्याच; सबब, आम्ही प्रतिसाद लिहिले की चर्चा भरकटणे हे केवळ अपरिहार्य आहे; तो आमचा नाइलाज आहे, ते तसे होऊ न देणे ही आमच्या बस वा अन्य कोणत्याही सार्वजनिक वाहनातील बाब नाही. तरी ही अडचण समंजसपणे नि मोठ्या उदार मनाने लक्षात घेऊन प्रस्तुत विनंतीकर्त्याने इतःपर आमच्या यापुढील येथील सर्व प्रतिसादांचे मजकूर आम्हांस आगाऊ सुचवीत जाण्याची मेहेरबानी करावी, अशी प्रतिविनंती आम्ही या विनंतिपत्राद्वारे प्रस्तुत विनंतीकर्त्यास करू इच्छितो. या प्रतिविनंतीची पूर्तता होऊ शकल्यास आम्ही जातीने प्रस्तुत विनंतीकर्त्याचे आजन्म ऋणी राहू. धन्यवाद.

असो. चर्चा भरकटवू शकणार्‍या, धाग्याचा खरडफळा बनवण्याचे पोटेन्शियल राखणार्‍या प्रस्तुत अवांतर प्रतिसादाकरिता आगाऊ क्षमस्व.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

निव्वळ चर्चा भरकटविणारे - चेक१अ. अवांतर - चेक१ब. धाग्याचा खरडफळा - चेक१क.

१अ किंबहुना, आमच्या आजवरच्या (या संस्थळावरीलच काय, पण आजवर कोणत्याही मराठी संस्थळावर दिलेल्या) एकाही प्रतिसादाने - प्रस्तुत प्रतिसाद इन्क्लूडेड - यदाकदाचित चर्चा भरकटविली नसेल, तर तो निव्वळ योगायोग अधिक फाऊल समजावा - इट इज़ सेकण्ड नेचर टू युअर्स ट्रूली, इट कम्स टू अस न्याचरली, कसचे कसचे, वगैरे वगैरे.

१ब वरील १अप्रमाणेच.

१क डिट्टो.

अ‍ॅज़ इन, अप्रीशिएट.

अनलेस... असो. (कुतूहल: प्रस्तुत विनंतीकर्त्याचे राष्ट्रीयत्व, बायेनीचान्स, ब्रिटिश असावे काय?)

वस्तुतः, कविता हा आमचा प्रांत नव्हे, आम्हांस कविता सहसा कळत नाहीत आणि म्हणूनच आम्ही सहसा कवितांच्या वाटेसही जात नाही. मात्र, ही एक कविता कशी कोण जाणे, पण आमच्या वाटेस आली, कधी नव्हे ती चुकून आम्हांस कळली, आणि कदाचित म्हणूनच आम्हांस ती बेहद्द आवडते. इतकी आवडते, की आजवर अनेक वेळा अनेक ठिकाणी आम्ही ती उद्धृत केली असेल, पण तरीही नवनवीन ठिकाणीं ती डकविण्यास आम्ही नेहमीच आतुर असतो.

कोठल्याशा टुकारपटात म्हणे "हम जहाँ खडे होते हैं, लाइन वहीं से शुरू हो जाती है" अशी काहीशी संवादपंक्ति आहे - कवितांप्रमाणेच चित्रपट हाही आमचा प्रांत नसल्याकारणाने या बाबीची ग्वाही देता येणे आम्हांस केवळ अशक्य आहे - काहीसे त्यासारखेच. "हम जहाँ प्रतिसाद लिखते हैं, चर्चा वहीं से भरकट जाती है|" असो.

राजेश घासकडवी Tue, 25/02/2014 - 13:09

In reply to by 'न'वी बाजू

एखाद्या शहरात कुठे दहशतवादी कृत्यं घडली की जबाबदारी घ्यायला काही संघटना पुढे येतात. 'याचसाठी केला अट्टाहास' असताना श्रेयच मिळालं नाही तर उपयोग काय? रस्त्यांवर जागोजागी टोलबूथ जाळले जातात, ते कोणी जाळले हे लोकांना कळणं यातच ते घडवून आणणाऱ्या शक्तींचा फायदा असतो. नाहीतर शक्तीप्रदर्शनाचा उपयोग काय? आणि मुळात शक्ती असताना तिचं प्रदर्शन केलं नाही तर त्या शक्तीचाच काय उपयोग?

ऐसीवरचे विरोधी पक्ष नेते या नात्याने 'न'वी बाजू यांनी ही जबाबदारी घेऊन (कोण म्हणतंय रे ओढवून घेऊन?) आपल्या शक्तीचं प्रदर्शनच केलेलं आहे. तेव्हा या शक्तीला न्यूट्रलाइज कसं करावं असा विचार आम्हा व्यवस्थापकांच्या (पक्षीः माझ्या. व्यवस्थापन मीच करतो ही जबाबदारी घेऊन मीही शक्तीप्रदर्शन करतोय हे लक्षात आलं असेलच) आला. सिंहासनमधल्या डीकास्टाला मुख्यमंत्री जशी कामगार कल्याणासाठी सरकारचे हात बळकट करण्याची भरपूर पगाराची ऑफर देतो, तशी व्यवस्थापनातल्या एखाद्या पदाची लालूच दाखवावी असंही मनात तरळून गेलं. पण तो लवकरच बारगळवला. त्याचं कारण खालीलप्रमाणे.

'न'वी बाजूंनी 'न'वी बाजू गिरी करणं हे ऐसी अक्षरेचं एक बलस्थान आहे. आमच्याकडे आलेल्या रॉच्या अहवालाप्रमाणे फक्त त्यांचे प्रतिसाद वाचण्यासाठी ऐसीवर येणारांची संख्या प्रचंड आहे. ऐसीच्या काही सदस्यांकडून त्यांना गुलाबी पाकिटात, वर अत्तराचा थेंब वगैरे टाकून पत्रंही जातात हेही आम्हाला कळलेलं आहे. तेव्हा खास 'सकारात्मक अवांतर' अशी क्याटेगरी तयार करून त्यांच्या सर्व प्रतिसादासाठी बहाल केली जात आहे असा फतवा मी काढलेला आहे. व्यवस्थापनाकडून अचानक मिळालेल्या अशा कृपादृष्टीमुळे अवांतर चळवळीच्या इतर कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याकडे संशयास्पद नजरेने पाहिलं जाईल, आणि ती चळवळ आतूनच पोखरून निघेल असा आमचा डाव आहे.

नितिन थत्ते Tue, 25/02/2014 - 14:39

In reply to by मी

शिवाय शब्दाच्या शेवटी आकडा (अंक) आल्यास तो अंक ऑपॉप सुपरस्क्रिप्ट होऊन बोल्ड होईल अशी सोय त्यांच्या लॉगइनवर उपलब्ध करावी.

ग्रेटथिंकर Sun, 23/02/2014 - 10:51

तुमचे संकेतस्थळ हे आमचे स्कोअर सेटलींगचे साधन नाही, याची आम्हास जाणीव आहे(चायवाल्या तु पण ऐक ते काय म्हणतात). अधिक वैयक्तीक प्रतिसाद एकमेकांच्या विपुत खरडले आहेत. असो आपल्या संकेतस्थळावर यायचे म्हणजे फारच साधनशुचिता बाळगावी लागत आहे, श्रेणी देणी वा इतर गोष्टी मला योग्य वाटत नाहीत ,चार सावरकरी आयडी एका गांधीवाद्याचा चांगला प्रतिसाद खोडसाळ श्रेणीत टाकू शकतात किंवा vice versa..असो वेळातवेळ काढून इथे यायचे तर तुमचे भल्तेच काहीतरी सुल्तानी नियम असतात ,ते नाहक त्रास देतात...पुण्य १ गुणांक २५ थ्रेशोल्ड २.५ हे मराठी संस्थळ आहे कि गणिताचा पेपर? तुमी हे खिलाडूवृत्तीने घ्याल याची अपेक्षा करतो व हे बदलावे याची विनंती करतो
(ऐसीअक्षरेचा फ्यॅन ग्रेटथिंकर)

चायवाला Tue, 25/02/2014 - 11:53

In reply to by ग्रेटथिंकर

तुमचे संकेतस्थळ हे आमचे स्कोअर सेटलींगचे साधन नाही, याची आम्हास जाणीव आहे>>>

हो का? तसे दिसत तरी नाही.

असो
राजेशजी, आपला आक्षेप मान्य. काळजी घेतोच आहे, पुढेही घेऊ.

राही Sun, 23/02/2014 - 16:24

लेच्यापेच्या धाग्यापेक्षा धट्टेकट्टे प्रतिसाद बरे. (बरें का श्याम)
धाग्याला शोभा/झालर/ठिगळे प्रतिसादांची.
धागाकर्ता मरतो तंबीने आणि वाचक मरतात प्रतिसादांच्या हेल-पाट्यांनी.
कुठे (श्यामभटाच्या) धाग्याची तट्टाणी आणि कुठे संस्थळाचा ऐरावत.
प्रतिसादात आहे ते धाग्यात कुठून येणार?

( ( बाकी ते 'वैयक्तिक उणीदुणी नकोत' हे योग्यच आहे.))

'न'वी बाजू Sun, 23/02/2014 - 19:32

In reply to by राही

काही सुभाषिते

सुभाषबाबूंनी हे सर्व नेमके कधी म्हटले बरे?

(बाकी, सुभाषबाबूंचे मराठीवरील प्रभुत्व इतके दांडगे होते, याची कल्पना नव्हती. रोचक माहितीकरिता आभार.)

आदूबाळ Tue, 25/02/2014 - 11:57

हपीसातल्या ल्यापटॉप वर इंटरनेट एक्सप्लोअरर ९ आहे. त्यावर लोकसत्ता नीट दिसत नाही - सारखं क्रॅश होतं. फायरवॉल आणि इतर इन्फरमेशन सिक्युरिटी उपायांच्या भडिमारामुळे दुसरा कुठला ब्राऊझर वापरू शकत नाही.

काही उपाय आहे का? की आलिया भोगासि?

आदूबाळ Tue, 25/02/2014 - 15:07

In reply to by बॅटमॅन

आलिया भट्ट आणि तदानुषंगिक भोगवट्याचा काही संबंध नाही असं फुटनोटीत लिहिणार होतो. पण लोकांना हा 'न'डू-आयडी वाटला असता - म्हणून थांबलो

मी Tue, 25/02/2014 - 13:28

In reply to by आदूबाळ

इंटरनेट एक्सप्लोअरर ९ हे इंटरनेट एक्सप्लोअरर ८ कम्पॅटिबिलिटी मोड मधे रन करता येईल.

ते कसे करावे हे ह्या दुव्यावर सचित्र सांगितले आहे.

अजो१२३ Tue, 25/02/2014 - 15:39

लोकसंख्या २% प्रतिवर्षाने वाढत आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या ४.५% प्रतिवर्षाने वाढत आहे. परंतु दर १०००० वाहनांमागे मृत्यू पावलेल्या लोकांच्या संख्येची टक्केवारी दर वर्षी कमी होत आहे. जे होत आहे ते चांगले कि वाईट?

ऋषिकेश Tue, 25/02/2014 - 16:26

In reply to by अजो१२३

चांगले वाईट या सापेक्ष संज्ञा आहेत.
कशासाठी/कोणासाठी चांगले /वाईट होते आहे त्यावर कदाचित काही भाष्य करता यावे.

ऋषिकेश Tue, 25/02/2014 - 16:49

In reply to by अजो१२३

तरीही काहीच विधान करता येणार नाही इतक्या ढोबळ फिगर्स आहेत या. अधिक खोलात जावे लागेल. यातील अधिकतर अपघात कोणत्या भागात होत आहेत? कसे होत आहेत. तो भाग वगळला तर उर्वरीत भारतात काय परिस्थिती आहे? वगैरे वगैरे
दुसरे असे की रस्ते हा स्टेट सबजेक्ट आहे. तेव्हा भारताचे दळणवळण मंत्री (असे काही मंत्रालय असल्यास) फार काही करू शकतील का साशंकच आहे.

मन Tue, 25/02/2014 - 17:18

In reply to by अजो१२३

रस्ते वाहतूक राज्य सरकार पाहते. केंद्र सरकार नाही. असं ऋ ला म्हणायचं असावं.
तांत्रिक मुद्दे मांडण्यात, पकडण्यात तो पटाइत आहे

नितिन थत्ते Tue, 25/02/2014 - 17:21

In reply to by ऋषिकेश

???

स्टेट सब्जेक्ट कसा असेल. राष्ट्रीय महामार्ग असतात ना?

राजेश पायलट हे भूपृष्ठ वाहतुक मंत्री होते असे वाटते (१९९५-९६) . सध्या ऑस्कर फर्नांडिस आहेत.

http://morth.nic.in/

ऋषिकेश Tue, 25/02/2014 - 17:23

In reply to by नितिन थत्ते

पण अपघात कुठेही होऊ शकतात हे एक आणि राष्ट्रीय महामार्ग हे इतर बहुतांश एकूण मार्गांपेक्षा कमीच असणार - असतात कारण ते आंतरराज्य असतात. राज्यातील बाकी बहुतांश रस्ते राज्यांतर्गत, त्याहून लहान रस्ते हे स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत येतात. (सगळा मलिदा एकट्या मुंबई महापालिकेला मिळू नये म्हणून तर एमेमारडीए वगैरे फाटे फुटले आहेत असे म्हटले जाते ;) )

नितिन थत्ते Tue, 25/02/2014 - 17:02

In reply to by अजो१२३

तुलना टेम्पर करायला हवी

१९८० मध्ये लोकसंख्येपैकी किती लोक वाहनाने प्रवास करीत त्यापैकी सार्वजनिक वाहनाने किती आणि खाजगी वाहनाने किती हे पहायला हवे. मग किती लोक मरतात हे पहायला हवे. त्या तुलनेत आज* किती ते पहायला हवे.

अवांतर: शासकीय भाषेनुसार दळणवळण मंत्री हा "पोष्ट आणि तार खात्याचा" मंत्री असतो. तुम्हाला अभिप्रेत असलेल्या मंत्र्याला "भूपृष्ठ वाहतूक मंत्री" म्हणतात.

*आज लग्नाला/यात्रेला सुमो-क्वालिस-ट्रॅक्स वापरण्याचे प्रमाण खूप आहे. आणि त्यांचे अपघात झाल्याच्या बातम्याही खूप येतात असे निरीक्षण आहे.

चायवाला Tue, 25/02/2014 - 17:06

In reply to by अजो१२३

  • लोक घरी किंवा ऑफिसात झोपत असतील
  • लोक घरी झोपत असतील किंवा ऑफिसात कामात असतील
  • लोक घरी कामात असतील किंवा ऑफिसात झोपत असतील
  • लोक घरी झोपत असतील किंवा ऑफिसातही झोपत असतील
  • लोक घरी कामात असतील किंवा ऑफिसातही कामात असतील

'न'वी बाजू Tue, 25/02/2014 - 18:10

In reply to by चायवाला

मला वाटते 'ऐसी'च्या सक्रिय सदस्यांच्या भौगोलिक वितरणाशी याचा काही संबंध असावा.

'ऐसी'चे बहुतांश सदस्य हे एक तर अमेरिकेत नाही तर भारतात आहेत, असे मानले, तरः

- अरुणजोशींचा प्रस्तुत प्रतिसाद जेव्हा आला, तेव्हा अमेरिकेत (ईष्टर्नटैम) पहाटेचे सुमारे साडेपाच वाजले होते. (शेण्ट्रलटैम साडेचार, मौण्टनटैम साडेतीन, प्याशिफिकटैम अडीच. अलास्का, हवाई, झालेच तर प्वेर्तोरीको, यूएसव्हीआय, ग्वाम, अमेरिकन समोआ वगैरेंचा विचार केलेला नाही. तसेही, अलास्काहवैयादि उपरनिर्दिष्ट अतिरिक्त प्रदेशांत कितीसे 'ऐसी'कर वास्तव्यास असतील, याबाबत साशंक आहे.) म्हणजे, बहुतांश अमेरिकावासी 'ऐसी'कर त्या वेळी झोपेत असणार. (झोपेत प्रतिसाद लिहिणार्‍या 'ऐसी'करांची संख्या ही तुलनेने अल्प असावी, असा कयास आहे. चूभूद्याघ्या.)

- भारतात त्या वेळी दुपारचे चार वाजले होते. म्हणजे बहुतांश भारतनिवासी 'ऐसी'कर त्या वेळी ऑफिसात असणार, पण त्यातही दिवसाचे काम आटोपून घरी जाण्याकरिता निघायची तयारी करू लागण्याच्या मागे असणार.

- अमेरिका आणि भारत यांव्यतिरिक्त 'ऐसी'कर बहुतांशी आणखी कोठे असू शकतात? (१) क्यानडा (टैमझोन बहुतांशी अमेरिकेप्रमाणेच; अतिपूर्वेकडील अटलाण्टिकटैमझोन = सकाळचे साडेसहा हा त्या भागात मोठ्या संख्येने 'ऐसी'कर असण्याच्या कमी शक्यतेमुळे गणलेला नाही.) (२) यूके/युरोप (सकाळचे साडेदहा/साडेअकरा.) (३) सिंगापूर/हाँगकाँग (संध्याकाळचे साडेसहा.) (४) ऑष्ट्रेलिया (संध्याकाळचे साडेसहा ते रात्रीचे साडेनऊ.) फार फार तर (५) आखाती प्रदेश (दुपारचे दीड ते अडीच). म्हणजे क्यानडा बाद. सिंगापूर/हाँगकाँग बॉर्डरलाइन. (संध्याकाळी साडेसहाला घरी आल्याआल्या किती जण तातडीने ऑनलैन जात असतील?) म्हणजे त्या वेळी 'ऐसी'वर असून असून असणार कोण? यूके/युरोप/आखाती प्रदेश/फार फार तर ऑष्ट्रेलियातील 'ऐसी'कर.

आता, (इतर प्रदेशांच्या तुलनेत) यूके/युरोप/आखाती प्रदेश/ऑष्ट्रेलिया या प्रदेशांत 'ऐसी'चे असे कितीसे सक्रिय सदस्य असावेत?

तेव्हा, श्री. चायवाला यांनी दिलेले कारण बहुतांशी सयुक्तिक वाटते. 'ऐसी'चे बहुतांश सदस्य हे त्या वेळी एक तर झोपा काढत असावेत (कोठे, हे गौण आहे), अन्यथा कार्यालयात (परंतु 'ऐसी'वर न येण्यासारख्या स्थितीत) असावेत.

ग्रेटथिंकर Tue, 25/02/2014 - 18:21

सायंकाळी सात ते दहा सगळ्या मराठी संकेतस्थळांवर ढिंगाणा चालू असतो ,याचे कारण भारतातले दिवसाचा शिणवटा आणि अमेरिकेतले रात्रीचा हॅन्गोव्हर घालावायला इथे येतात.

मन Tue, 25/02/2014 - 20:35

मी पूर्वीही कही दुरुस्त्या सुचवल्या होत्या दिनविशेषात.
पण खाजगी खरडवहीत जाउन सांगण्यापेक्षा जाहिर आपल्या चिकित्सेची टिमकी वाजवावी असा विचार करुन टंकत आहे.
हे आजच्या दिनविशेषाबद्दल :-

संतकवी व वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक एकनाथ (१६००)
प्रवर्तक म्हणजे pioneer, सुरुवात करणारा ना ?
त्या अर्थाने एकनाथ कुठे प्रवर्तक आहेत वारकरी संप्रदायाचे ?
.
.
१९१० : दलाई लामा यांनी चीनमधून भारतात येऊन आश्रय घेतला.
कायतरी गल्लत आहे.
१९१० ला नाही, १९५९ किंवा १९६० मध्ये हे महाशय भारतात दाखल झालेत.
.
.
१९६४ : कॅशियस क्ले विश्व हेवीवेट बॉक्सिंग चॅंपियन बनला.

बरोबर. पण उल्लेख करताना कॅशिअस क्ले, भविष्यातील महंमद अली, कॅशियस क्ले ; असा उल्लेख जास्त सयुक्तिक ठरतो असं मला वाटतं. (त्याची ओळख त्यानं जेव्हापासून बदलली आहे, त्यानंतर तुम्ही जेव्हा केव्हा त्याचा उल्लेख कराल, तो नव्या ओळखीनं करावा, किंवा निदान नवी ओळख हायफनेटेड रुपात तरी ठेवावी असं मला वाटतं.)

आदूबाळ Tue, 25/02/2014 - 21:07

In reply to by मन

१९१० : दलाई लामा यांनी चीनमधून भारतात येऊन आश्रय घेतला.

दलाई लामा हे एक पद आहे. ज्यांना लोक सामान्यतः दलाई लामा म्हणून ओळखतात ते चौदावे दलाई लामा तेंझिन ग्यात्सो.

हा उल्लेख आहे तो तेरावे दलाई लामा थुबतेन यांच्याबद्दल. चीनच्या क्विंग राजांनी विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात तिबेट वर आक्रमण केलं होतं. म्हणून १९१० साली त्यांना (ब्रिटिश) भारतात आश्रय घ्यावा लागला. सिक्कीमच्या राजघराण्याशी त्यांचे चांगले संबंध होते, त्यामुळे ते तिकडे जाऊन राहिले - ब्रिटिश सहकार्याने अर्थात.

--
अवांतरः या घटनेला बरेच कंगोरे आहेत. त्यातला एक म्हणजे - अँग्लो-चायनीज राजकारण आणि अर्थकारण. हा लय रोचक विषय आहे. यावरून दोन "अफूची युद्धं" झाली. भारतावर दीडशे वर्ष राज्य करण्यामागचं एक कारण म्हणजे ब्रिटिशांनी भारताचा उपयोग अफू पिकवण्याचा "कॅप्टिव सोर्स" म्हणून केला.

ऋषिकेश Thu, 27/02/2014 - 10:05

In reply to by आदूबाळ

या घटनेला बरेच कंगोरे आहेत. त्यातला एक म्हणजे - अँग्लो-चायनीज राजकारण आणि अर्थकारण. हा लय रोचक विषय आहे. यावरून दोन "अफूची युद्धं" झाली. भारतावर दीडशे वर्ष राज्य करण्यामागचं एक कारण म्हणजे ब्रिटिशांनी भारताचा उपयोग अफू पिकवण्याचा "कॅप्टिव सोर्स" म्हणून केला.

तपशीलात लिहाच हो!
मोठा रंजक इतिहास आहे हा!

चिंतातुर जंतू Wed, 26/02/2014 - 17:28

In reply to by मन

>> संतकवी व वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक एकनाथ (१६००)
प्रवर्तक म्हणजे pioneer, सुरुवात करणारा ना ?
त्या अर्थाने एकनाथ कुठे प्रवर्तक आहेत वारकरी संप्रदायाचे ?

मराठी विश्वकोशातून साभार :

आळंदीस जाऊन नाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला (१५८३) आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली (१५८४).
[...]
रुक्मिणी स्वयंवर (१५७१) हे भागवत संप्रदायातील पहिले व परंपराप्रवर्तक आख्यानक काव्य होय.
[...]

अडीच शतकांच्या ज्ञानेश्वरोत्तर कालखंडात संतसाहित्याची परंपरा खंडित व विस्कळित झाली होती. एकनाथांनी त्या पूर्वपरंपरेचे भान ठेवून वाङ्मयनिर्मिती केली; म्हणूनच ती परंपरा अखंड, एकात्म व प्रगमनशील राखण्याचे कार्य ते यशस्वीपणे करू शकले.
[...]
तेराव्या शतकात ज्ञानेश्वर-नामदेवांनी बहुजनसुलभ भक्तिमार्गाती प्रतिष्ठापना केली. पुढील अडीच शतकांत यावनी सत्तेमुळे भक्तिमार्गाचा प्रभाव क्षीण झाला. एकनाथांनी त्या भागवत पंथाचे प्रभावी पुनरुज्जीवन केले. आपल्या भागवत टीकेने भक्तिपंथाची त्यांनी शास्त्रोक्त प्रतिष्ठापना केली आणि बहुजनवर्गाचा मेळावा त्या पंथाभोवती संघटित केला. बागवत पंथाला अशा प्रकारे शास्त्र आणि समाज यांचे दुहेरी अधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले. जनताजनार्दन हे एक नवे तत्त्व प्रतिपादून भागवत पंथाला त्यांनी अधिक लोकाभिमुख बनविले. या पंथाला श्रीकृष्णाप्रमाणेच श्रीराम हे दैवत नव्याने परिचित करून दिले व रामचरित्राचा वीरवृत्तिपोषक व कालोचित भावार्थही कथन केला. एकनाथांचा भागवतधर्म व रामराज्याची कल्पना म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन होय.

कॅशिअस क्ले :

>> उल्लेख करताना कॅशिअस क्ले, भविष्यातील महंमद अली, कॅशियस क्ले ; असा उल्लेख जास्त सयुक्तिक ठरतो असं मला वाटतं.

सहमत.

मन Thu, 27/02/2014 - 10:12

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/shiv…
.
.
आजच्या महारआष्ट्र टाइम्स मधील माहिती :-

शिवलिंगाचे तीन भाग केल्यास भट्टीची प्रतिकृती तयार होते> अविनाश महालक्ष्मे

बहुतांश मंदिरांमध्ये असलेले शिवलिंग हे भाविकांचे श्रद्धाकेंद्र असले, तरी मुळात शिवलिंग म्हणजे आदी काळातील अग्नीची भट्टी होती तसेच बारा ज्योतिर्लिंगे म्हणजे त्या-त्या ठिकाणच्या अग्नीच्या मोठ्या भट्ट्या होत्या, असा दावा ज्येष्ठ विचारवंत ना. रा. गुप्ते यांनी केला आहे. 'आर्यसंस्कृती : नवीन दृ​ष्टिकोन' या गुप्ते यांच्या पुस्तकाचे प्रकाशन अलीकडेच ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात गुप्ते यांनी हा दावा केला आहे. रसिकराज प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे.

काही देशी व पाश्चात्य विद्वानांनी शिवलिंग म्हणजे शिश्न व योनी यांचे एकत्रित रूप असल्याचा निष्कर्ष काढला. मात्र, तो चुकीचा असल्याचे गुप्ते यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, लिंग या शब्दाचा अर्थ खूण, चिन्ह किंवा प्रतीक असा होतो. शंकराची मुख्यत्वे तीन नावे आहेत. रुद्र, शंकर व शिव. रुद्र म्हणजे रडणारा, शं-कर म्हणजे कल्याण करणारा व शिव म्हणजे पवित्र. रुद्रला कधीही पिंड किंवा लिंग शब्द जोडत नाही. शंकरच्या पुढे पिंड जोडतात, पण शिवपुढे मात्र लिंग आणि पिंड हे दोन्ही शब्द लागू शकतात. गुप्ते यांच्या अभ्यासानुसार, स्वायंभुव मनूची मुलगी आकृती व रुची या दाम्पत्याला यज्ञ आणि दक्षिणा अशी दोन अपत्ये होती. हे बहीण-भाऊ पुढे पती-पत्नी झाले आणि त्यांनी जगातील पहिली अग्नी भट्टी तयार केली. त्याआधी ​शिकार जळत्या लाकडावर टाकून भाजली जायची. यज्ञ व दक्षिणा यांनी शोधलेल्या या भट्टीला शोधकर्त्याचे यज्ञ हे नाव देण्यात आले. आज यज्ञ हे आर्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. दक्ष प्रजापतीची एक मुलगी अग्नीला दिली होती. अग्नीने कुटीतच लहान खड्डा करून त्यात छोटी लाकडे जाळण्याची पद्धत सुरू केली. त्या ज्वलन खड्ड्यास शोधकर्त्याचे नाव म्हणून अग्निकुंड असे नाव पडले. यज्ञ व दक्षिणा यांनी बनविलेल्या भट्टीचे स्वरूप पंजाबातील तंदुरीप्रमाणे होते. वर गोल भिंती, त्याखाली लाकडे जाळण्यास लांब दगडी पट्ट्या, खाली हवा आत जाण्यास छिद्रे, अशी रचना होती. या भट्टीची व शिवलिंगाची रचना सारखीच असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. यज्ञ-दक्षिणेच्या भट्टीची वार्ता सर्वत्र पसरल्यानंतर त्यांना ठिकठिकाणाहून प्रात्यक्षिकासाठी निमंत्रणे येऊ लागली. त्या प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी भट्टीच्या दगडी प्रतिकृती तयार केल्या. या प्रतिकृती म्हणजेच शिवलिंग होय. त्या काळी त्या बैलाच्या पाठीवर पाठविल्या जायच्या. म्हणूनच आज मंदिरांमध्ये शिवलिंगापुढे दगडी वृषभ असतो, असे गुप्ते यांनी म्हटले आहे. लेखकाच्या मते लिंग म्हणजे अग्नी. मराठीत स्फु म्हणजे उसळणे. जसे स्फुरण, स्फूर्ती, स्फोट आदी.

स्फु​ल्लिंग म्हणजे ठिणगी. म्हणजेच.. उसळून येणारा अग्नीचा लहानसा भाग. त्यामुळे लिंग हा अग्नीलाच उद्देशून वापरलेला शब्द आहे. ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतिरूप अग्नी असल्याचे त्यांनी मांडले आहे.

बारा ज्योतिर्लिंगे

सोमनाथ (सौराष्ट्र), मल्लिकार्जुन (श्री शैलम), महाकाल (उज्जैन), ओंकार (अमलेश्वर), वैद्यनाथ (परळी), भीमाशंकर (डाकिनीवन), रामेश्वर (सेतुबंध), औंढा नागनाथ (दारुका वन), विश्वनाथ (वाराणशी), त्र्यंबकेश्वर (गोदा तट), केदारेश्वर (हिमालय), घृष्णेश्वर (वेरुळ) अशी बारा ज्योतिर्लिंगे आहेत. भट्टीचा शोध लागल्यानंतर ठिकठिकाणच्या लोकांनी मोठ्या आकाराच्या भट्ट्या तयार केल्या. ही ठिकाणे म्हणजे बारा ज्योतिर्लिंगे होत, असे गुप्ते यांनी म्हटले आहे.

ग्रेटथिंकर Thu, 27/02/2014 - 10:27

In reply to by मन

नारा गुप्तेंनी उशीर केला, जागतिक इतिहासातील खिंडारे' हा पुनाओक यांचा ग्रंथ या विषयातला बायबल म्हणून ओळखला जातो .आमी त्याचे पारायण केले असल्याने संधिविग्रहाचे बादशाह फक्त पुनाच असा आमचा ठाम विश्वास आहे...

बॅटमॅन Thu, 27/02/2014 - 16:34

In reply to by ग्रेटथिंकर

संधिविग्रहाचे बादशाह फक्त पुनाच असा आमचा ठाम विश्वास आहे...

ग्रेटथिंकरांना आमचाही पाठिंबा.

राजेश घासकडवी Thu, 27/02/2014 - 10:58

In reply to by मन

अहो अग्निची भट्टी काय घेऊन बसला आहात? शिवलिंग म्हणजे अणुऊर्जा निर्माण करणाऱ्या केंद्रांची प्रतिकृती. हे चित्र पहा!

जेम्स बॉन्ड ००७ Fri, 28/02/2014 - 23:25

In reply to by राजेश घासकडवी

मागे एका किर्तनकाराने 'गण' आणि उंदीर म्हणजे माउस आणि कान म्हणजे स्पिकर्स असं कायकाय सांगत आपण actually गणपतीस्वरुप संगणकाची कशी पुजा करायचो इ. इ. प्रकाश पाडला होता..

ग्रेटथिंकर Sat, 01/03/2014 - 10:22

In reply to by आडकित्ता

मला तर चर्चच्या घुमटामध्येही अणुभट्टी दिसतेय.इतके प्रगत तंत्रज्ञान त्या काळी होते याचा अपाल्याला अभिमॅन असला पाहीजे :-P

ज्येष्ठ विचारवंत गुप्ते यांचे अजून काही संशोधन उपलब्ध आहे का? त्यात भयंकर मनोरंजन मूल्य आहे.

हे लोक असे मूर्खासारखे काहीही लिहितातच कसे? यांना स्वतःला ज्येष्ठ विचारवंत म्हणवते कसे?

आपलीच संस्कृती जगातली सर्वात महान संस्कृती आहे हे लहानपणीपासून बिंबवले गेले आणि नंतर सगळे त्याच्या विपरित निघू लागले कि लोकांना इंफेरिओरिटी कॉप्लेक्स येतो. त्यातून बुद्धी भ्रमिष्ट होते आणि असले काहीही सूचू लागते.

ज्योतिर्लिंग, यज्ञ, इ बद्दल उमाळा असेल, त्यांचे काही सामाजिक मूल्य असेल तर ते तसे मांडावे. ज्यांना रुचि आहे ते ते आवडीने वाचतील. पण वडाची साल पिंपळाला?

मन Thu, 27/02/2014 - 11:15

फिरोदिया करंडकाची अंतिम फेरी, त्यातील सर्व नऊ प्रयोग आहेत ह्या शनिवारी, १ मार्चला.
मी मागे इथे ऐसिवरच पृच्छा केली होती कसे जायचे त्याची. नात्य्गृहावर प्रवेशिका उपलब्ध नव्हत्या.
पण महत्प्रयासाने एक कॉण्टॅक्त हाताशी घावला.
कुणाला प्रवेशिका घ्यायच्या असतील तर आजच घ्याव्या लागतील. अन्यथा संपताहेत असे ती व्यक्ती म्हणाली.
मला शनिवारी दुसर्‍या शहरात जाणे भाग असल्याने येउ शकत नाही.

मन Wed, 26/02/2014 - 23:46

नाय रे बाबा. असं एकदम विषय देउन लागलिच त्यावर मजबूत , बांधीव लिहून द्यायला अत्रेच हवेत.
त्यांनी उभ्या उभ्या नाटकाची नांदी ऐनवेळी लिहून व सूर्-तालात बसवून दाखवली होती.
मला "आता अमुक अमुक बद्दल लिही" अस्म म्हणून बखोटिला धरलं तर भलतच भंकस तयार व्हायचं.
(तसंही एरव्ही फार काही वेगळं होत नाही; पण तेव्हा इतर पब्लिक काही म्हटली तरी मी निदान स्वतःची समजूत आपण थोर्थोर आहोत म्हणून तरी घालू शकतो.
इथे स्वतःलाही ते चांगले म्हणवता येणार नाही.)
असो.
सग्ळी मंडळी माझ्यावर पॉइण्टर टाकताहेत. त्यापेक्षा त्यांनीच ह्या विषयाबद्दल लिहायला सुरुवात करावी. मला काही सुचलच तर मी भर घालीन.
शिवाय चेष्टा म्हणून वरच्या प्रतिसादातलं मी विधान करणं वेगळं ; आणि इतकं खाजगी सगळं इथे लिहिणं वेगळं.
सगळे काही तेंडुलकरांइतके दबंग नसतात थेट लिहायला.

बॅटमॅन Thu, 27/02/2014 - 00:32

In reply to by मन

पळपुटा कुठला. अत्रे अन तेंडुलकरांची नावे फेकली म्हणून पॉइंटर जात नाही, कांय समजलेंत!!!!!!

ल्ही गप!!! बघावं तेव्हा काड्या सारत असतो हे ल्ह्या नं ते ल्ह्या म्हणून. आत्तासुद्धा अगोदर बाकीच्यांनी ल्ह्या, मग मी येतोचं तुणतुणं लावलंय, एइ चोलबे ना!!!

बिपिन कार्यकर्ते Thu, 27/02/2014 - 10:34

In reply to by मन

"नाय रे बाबा. असं एकदम विषय देउन लागलिच त्यावर मजबूत , बांधीव लिहून द्यायला अत्रेच हवेत.
त्यांनी उभ्या उभ्या नाटकाची नांदी ऐनवेळी लिहून व सूर्-तालात बसवून दाखवली होती.
मला "आता अमुक अमुक बद्दल लिही" अस्म म्हणून बखोटिला धरलं तर भलतच भंकस तयार व्हायचं.
(तसंही एरव्ही फार काही वेगळं होत नाही; पण तेव्हा इतर पब्लिक काही म्हटली तरी मी निदान स्वतःची समजूत आपण थोर्थोर आहोत म्हणून तरी घालू शकतो.
इथे स्वतःलाही ते चांगले म्हणवता येणार नाही.)
असो.
सग्ळी मंडळी माझ्यावर पॉइण्टर टाकताहेत. त्यापेक्षा त्यांनीच ह्या विषयाबद्दल लिहायला सुरुवात करावी. मला काही सुचलच तर मी भर घालीन.
शिवाय चेष्टा म्हणून वरच्या प्रतिसादातलं मी विधान करणं वेगळं ; आणि इतकं खाजगी सगळं इथे लिहिणं वेगळं.
सगळे काही तेंडुलकरांइतके दबंग नसतात थेट लिहायला."

म्हणजे, असं पटकन लिहायला जमणार नाही असाच सारौंश आहे ना तुझ्या रडण्याचा? म्हणूनच मग आधी तुम्ही लिहा मग मी भर टाकेन असा मार्ग सुचवलास ना? अरे! अगदी शिंपल सोल्युशन आहे माझ्याकडे. तू एक १५ दिवस घे लिहायला. आत्ताच्या आत्ता लिही असं कोण म्हणतंय? तर, घे चांगले पंधरातीनवार आणि लिही! आज आहे २७ फेब्रुवारी २०१४. बरोब्बर, १५ दिवसांनी येईल १२ मार्च २०१४. त्या दिवशी तुझा धागा टाक. ओके? :D ;)

बॅटमॅन Thu, 27/02/2014 - 12:05

In reply to by मन

प्रतिसाद-प्रतिसाद खेळायचं का? तू असा प्रतिसाद जितक्यांदा देशील तितक्यांदा मी प्रतिप्रतिसाद देऊन धाग्याचे काश्मीर करतो. बोल आहे तयारी?

की त्यापेक्षा गप लिहितो म्हणशील ;)

मन Thu, 27/02/2014 - 12:08

In reply to by बॅटमॅन

धागा भरकटत आहे हे पुन्हा लक्षात आणून देउ इच्छितो.
तुझ्या माझ्या बोलण्यासाठी खव वगैरे इतर माध्यमे आहेत. इतका चांगला धागा त्यासाठी वेठिस धरला जाउ नये.
आधीच ररा वन्स इन अ ब्ल्यू मून लिहिणार.
आता लिहिलच आहे तर त्या ऐतिहासिक वारशाचं जतन तरी करुया.
म्हणूनच
धागा भरकटत आहे हे पुन्हा लक्षात आणून देउ इच्छितो.

बॅटमॅन Thu, 27/02/2014 - 12:11

In reply to by मन

तू काहीतरी लिहिशील हे आधी कबूल कर. मग मी गप्प बसतो.

बघ बॉ, या ऐतिहासिक वारशाच्या जतनाची जबाबदारी आता तुझ्यावर आहे!

बिपिन कार्यकर्ते Thu, 27/02/2014 - 12:19

In reply to by मन

धागा भरकटत आहे असे मला तरी वाटत नाहीये. ररांच्या मूळ थीमनुसारच तू पण लिही हे सांगणे चालू आहे तुला. शिवाय, ररांनाही स्वतःला तू लिहावेस हेच वाटते आहे. आणि धागा भरकटलाच असेल तर तो http://www.aisiakshare.com/node/2635#comment-49324 इथेच! इर्रिव्हर्सिबल आहे आता! ;)

बॅटमॅन Thu, 27/02/2014 - 12:22

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहमत, मूळ थीमला अनुसरूनच हे सर्व चाललेलं आहे. असे असतानाही धागा भरकटतो आहे असे म्हणणे म्ह. पलायनवाद आहे.

मनोबा लिहिता हो!!!!

अनामिक Thu, 27/02/2014 - 12:32

In reply to by बॅटमॅन

किमान आपण कसं लिहू शकणार नाही असं वाटायचं, आणि मग कसा स्वतःला सेकंड चान्स दिला आणि कसं लिहिता आलं याबद्दल तरी लिहावं!

हा प्रतिसादही धाग्याच्या विषयाला अनुसरूनच आहे.

बॅटमॅन Thu, 27/02/2014 - 12:34

In reply to by अनामिक

व्वा! ही सुचवणी अजून भारी आहे.

मनोबा लिहिता हो!!

हा प्रतिसादही धाग्याच्या विषयाला अनुसरूनच आहे.

अजो१२३ Fri, 28/02/2014 - 16:25

ऐसीवर नावापेक्षा वेगळा आयडी असणारांनी कट्टयाच्या वेळी आपले खरे नाव सर्व उपस्थितांना सांगीतले असावे काय?

मन Fri, 28/02/2014 - 16:56

In reply to by नितिन थत्ते

कल्पना करा.
मेघना भुस्कुटे ह्या व्यक्तीने नितीन थत्ते ह्या नावाच आयडी बनवला.
नितीन थत्ते ह्यांनी राजेश घासकडवी नावाचा आयडी बनवला.
राजेश घासकडवींनी समजा अस्मि किंवा सविता असा आयडी बनवला.
.
.
आता, जर प्रत्यक्षात भेटल्यावर नितीन थत्ते ह्या व्यक्तीने आपली ओळख मेघना भुस्कुटे अशी सांगावी की
नितीन थत्ते अशी सांगावी की राजेश घासकडवी अशी सांगावी?

त्यांनी स्वतःची ओळख नितीन थत्ते अशी संगितलयस ते थापा मारताहेत असे समजावे काय?

नितिन थत्ते Fri, 28/02/2014 - 17:02

In reply to by मन

>>आता, जर प्रत्यक्षात भेटल्यावर नितीन थत्ते ह्या व्यक्तीने आपली ओळख मेघना भुस्कुटे अशी सांगावी की
नितीन थत्ते अशी सांगावी की राजेश घासकडवी अशी सांगावी?

नितिन थत्ते या आयडीने काय ओळख सांगावी असा प्रश्न आहे का?

राजेश घासकडवी Fri, 28/02/2014 - 16:50

In reply to by अजो१२३

ऐसीवर नावापेक्षा वेगळा आयडी असणारांनी कट्टयाच्या वेळी आपले खरे नाव सर्व उपस्थितांना सांगीतले असावे काय?

यावर वेगवेगळी उत्तरं सुचतात
- ९९ टक्के लोकांनी सांगितलं.
- खरी नावं म्हणजे नक्की काय?
- त्यांच्यापैकी जर कोणी राजकारणी असतील तर त्यांनी लोकांना अपेक्षा असलेलीच नावं सांगितली. उगाच त्यांना दोष का द्या?
- हाच जर कट्टा दोन हजार वर्षांपूर्वी झाला असता तर सगळ्यांनी खरी नावं सांगितली असती. पण आजच्या काळात काय सांगावं?

अजो१२३ Fri, 28/02/2014 - 17:25

In reply to by राजेश घासकडवी

यावर वेगवेगळी उत्तरं सुचतात

-शेवटी सुचलेले उत्तर सर्वात जास्त बरोबर आहे.
-ज्या क्रमाने लोक कट्टयावर आले, त्या क्रमाने खरे नाव सांगायची प्रमाण वाढू लागले.
-१९५० च्या तुलनेत, नावे, खरी असोत वा खोटी, दरडोई वाढली आहेत.
-१९५० पूर्वी केवळ नावे होती. आता आयडी सुद्धा असल्याने लोकांचे नामसुख वाढले आहे. (डोळे दिपवून टाकेल असा प्रवास या क्षेत्रात झाला आहे, इ इ )

आदूबाळ Fri, 28/02/2014 - 23:16

दिनविशेष मध्ये हे वाचलं:

१९०९ : 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले' ही कवी गोविंद यांची कविता व अन्य ब्रिटिशविरोधी साहित्य प्रकाशित केल्याबद्दल बाबाराव सावरकर यांना अटक.

बाबारावांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती ना? ते याच (आणि एवढ्याशाच) कारणावरून का? की अभिनव भारत मुळे?

मन Sun, 02/03/2014 - 09:54

१६४० : ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासमध्ये व्यापारी केंद्र काढण्यास दिल्लीचा मुघल सम्राट जहांगीरने परवानगी दिली.
आँ? शिवजन्म १६३०च्या आसपासचा म्हणतात. शिवाजी राजे दहा वर्षाचे असताना दिल्लीत जहांगीर सत्तेवर होता की शहाजहान ?
माझ्या माहितीप्रमाणे महाराजांच्या पुण्यातील जन्माच्या वेळेच्या आसपासच तिकडे सलीम/जहांगीरपुत्र शहाजहानची/खुर्रमची कारकिर्द सुरु झाली.
पुढील अडीच दशक ती सुरु होती. अगदि शिवाजी महाराजांनी सुरुवातीला मुघल व आदिलशाही प्रांतांची आलटून पालटून लूट केली त्यावेळी औरंगझेब दिल्लीच्या गादिवर नव्हता. त्यावेळी, शहाजहान गादिवर होता, औरंगजेब हा दख्खनचा सुभेदार होता.
असो. अवांतर होते आहे. मुद्दा हाच की १६४०च्या आसपास जहांगीर सत्तेवर असणे शक्य नाही.
मुद्दा क्र.२; म्द्रास तर लै लांब सुदूर दक्षिणेत , तामिळनाडूच्या पूर्व टोकाला राहिलं.
मुघलांनी त्याकाळी पुरेसा महराश्त्रही जिंकला नव्हता. अर्ध महाराश्ट्र, कर्नाटक इथे आदिलशाही सत्ता होती. त्याखलई दक्षिणेत इतर हिंदू राजे,नाय्क वगैरे लोक होते.
तर जिथे मुघल यंत्रणच नाही, तिथे व्यवहार करायला मुघल बादशाहची परवानगी घ्यायला कंपनी कशाला गेली असेल ?
(हे मॅकडोनाल्ड्स ह्या कंपनीला श्रीलंकेत व्यवहार करण्यासाठी बांग्लादेशने परवानगी देण्यासारखे आहे.)
.
.
.

२००१ : भारताच्या लोकसंख्येने १ कोटीची पायरी ओलांडली. ह्या बाबतीत भारत हा चीननंतर जगातील दुसरा देश ठरला.
एक कोती एक अब्ज्/बिलियन/शतकोटी?

चिंतातुर जंतू Sun, 02/03/2014 - 16:55

In reply to by मन

मूळ स्रोत -

१ मार्च
१६४० लंडन ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासमध्ये व्यापारी केंद्र काढण्यास दिल्लीचा मुघल सम्राट जहांगीरने परवानगी दिली.

इथून -

Sir Thomas was successful in getting permission from Jahangir for setting up factories. East India Company set up factories at Ahmedabad, Broach and Agra. In 1640 East India Company established an outpost at Madras.

इथून -

The first of the Company's vessels landed in India at Surat in 1608. There, Sir Thomas Roe, as James I's official representative to the Moghul Empire, established a 'factory' in 1615.
[...]
The English, however, were not alone. Those indefatigable explorers, the Portuguese, were already well established, not only in India – they had a major centre in Goa – but also in the court of the Emperor (at this time, Jahangir Khan).
[...]

इथून -

The Agency of Madras was established on 1 March 1640 and Cogan was made the first Agent.

थोडक्यात, जहांगीरकडून परवानगी आधीच मिळाली होती. मद्रासमध्ये केंद्र १ मार्च १६४० रोजी सुरू झालं. दुरुस्ती केली आहे. धन्यवाद.

>> एक कोती एक अब्ज्/बिलियन/शतकोटी?

१०० कोटी. दुरुस्ती केली आहे. धन्यवाद.

अजो१२३ Sun, 02/03/2014 - 22:00

हर (Her)हा चित्रपट पाहिला. या चित्रपटात नायक कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या operating system च्या प्रेमात पडतो. ही सिस्टीम खूप प्रगत झाली आहे असे मानले तरी ज्या प्रमाणात नायक तिच्यात ओढला गेला हे पाहता त्याला psychological treatment ची गरज आहे का हा प्रश्न मनात आला. (कथेतही हा प्रश्न एका पात्राच्या मनात येतो.)