जालावरचे दिवाळी अंक २०१३
गेल्या वर्षीपासून आपण 'ऐसी अक्षरे'वर विविध जालीय दिवाळी अंकाचा आढावा/मागोवा घेत आहोत. याही वर्षी आता जालावर दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागतील. काही प्रकाशित झाले देखील आहेत. हा धागा अश्याच जालावरील दिवाळी अंकांबाबत चर्चा करण्यासाठी आहे. तुम्ही वाचलेल्या, माहित असलेल्या आणि जालावर उपलब्ध असलेल्या दिवाळी अंकांबद्दल इथे मनमोकळी चर्चा करू शकता, समीक्षा करू शकता, परिचय करून देऊ शकता आणि आपली मते मांडू शकता.
वाचकांच्या सोयीसाठी पहिल्या पानावर जालावरील वेगवेग़ळ्या दिवाळी अंकांचा दुवा देण्याची प्रथा चालु रहाणार आहे. तेव्हा अंकांची माहिती देताना, चर्चा करताना त्या अंकाचा दुवा दिलात तर तो पहिल्या पानावरही टाकला जाईल याची नोंद घ्यावी.
इथे केवळ अंकांचे दुवेच नाहीत तर त्या अंकांत काय वाचाल? याविषयीच्या सुचवण्या देता आल्या / अधिक व्यापक मते-टिपण्ण्या करता आल्या तर अधिक आनंद होईल / उपयुक्त होईल.
चला तर आस्वाद घेऊया यंदाच्या जालीय दिवाळी अंकांचा!
नोंदः संदर्भासाठी गेल्या वर्षातील जालीय दिवाळी अंकाचे दुवे या धाग्यावर हलवले आहेत.
प्रतिक्रिया
साधनाचा दिवाळी अंक जालावर
साधनाचा दिवाळी अंक जालावर उपलब्ध झाला आहे. पहिल्या पानावर दुवा मिळेलच.
वाचल्यावर त्यातील लेखनावर चर्चा करूच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मिपा
'मिसळपाव'चा दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झालेला दिसतोय.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
यंदाच्या छापील दिवाळी अंकाचा
यंदाच्या छापील दिवाळी अंकाचा पंचनामाही इथेच केला तरी चालेल का? की वेगळा धागा आहे काढायचा? असो, तूर्तास इथेच. पार्श्वभूमीस अजून फटाके वाजताहेत तोवरचं ताजं, धावतं, कच्चं रिपोर्टिंग. अंक पुरते वाचलेले नाहीत. फक्त चाळलेत: -
'अक्षर' अजूनही सरस.
'शब्द' भारी ब्वॉ जड.
अरुणा ढेरेंचा चक्क एकाच विषयावरचा (रुक्मिणी) लेख दोन अंकांत - 'मौज' आणि 'पद्मगंधा'
'मौज' - सपाट, अपेक्षित
'साधना' - खणखणीत, दाभोलकर विशेषांक.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अभिप्राय
'पंचनामा' शब्द आवडला. ('चिरफाड' [की 'चीरफाड'? चूभूद्याघ्या.] अधिक थेट झाला असता. त्यापेक्षा बरा.)
बाकी चालू द्या.
त्रोटक आहे तोवर सध्या तरी
त्रोटक आहे तोवर सध्या तरी इथेच असू दे.. तुम्ही किंवा कोणी तपशीलाने काही लिहिलं तर वेगळा धागा काढू की! (समजली नसल्यास किंवा समजूनही दुर्लक्ष करायचं मनात असल्यास ही तपशीलाने लिहिण्याची विनंती वजा अपेक्षा आहे. )
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
'फ' फोटोचा
छायाचित्रणाला वाहिलेला "'फ' फोटोचा" चा दिवाळी अंक जालावर उपलब्ध झालेला दिसतो आहे.
इथे पीडीएफ आवृत्ती उपलब्ध आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
या अंकावर नजर टाकली. जेवढे
या अंकावर नजर टाकली. जेवढे पाहिले तेवढे सगळे फोटो आवडले.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+१ बराचसा अंक वाचला.. चित्रे
+१
बराचसा अंक वाचला.. चित्रे बरीचशी आवडली मात्र त्यासोबतीने येणारे गद्य बेतास बात आहे. तिथे अधिक मेहनत घ्यायला हवी होती. छायाचित्रणासंबंधित इतरही माहितीपूर्ण लेख हवे होते असे वाटते.
छायाचित्रकारांचे अनुभव असे ढोबळ स्वरूप या अंकाला आले आहे. अशा एखाद्या विषयाला वाहिलेल्या अंकाकडून चांगल्या चित्रांसोबतच विषयाशी संबंधीत, समांतर वगैरे अधिक आयामांची, माहितीची अपेक्षा होती ती मात्र पूर्ण झाली नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जालावरचा ऐसी अक्षरेचा दिवाळी
जालावरचा ऐसी अक्षरेचा दिवाळी अंक पहिल्यांदाच पाहतोय. मिसळपावचे दिवाळी अंक नेहमी चांगले असतात. यावर्षीचा अजून पाहिला नाही. जे काही अंक पाहीले त्यात माझ्या दृष्टीने ऐसी अक्षरेची कामगिरी उच्च आहे. हे संस्थळ नवंच असल्याने हे सगळं कौतुकास्पद आहे. अनुक्रमणिकेवर नजर फिरवली तरी लेख कसे मिळवले असतील याची कल्पना यावी. मध्यंतरी ब-याच आवडीच्या दिवाळी अंकांकडून निराशा होत होती. ऐसीचा हा अंक तक्रारीला जागा देत नाहीये. अर्थात, अर्धा अंक वाचलेला आहे बाकिचा अजून चाळतोच आहे. कुठे सूक्ष्म जागा मिळाली तरी तक्रारी करीनच याची खात्री बाळगावी.
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
सर्वोत्तम!
आत्तापर्यंत जितके जालीय दिवाळी अंक वाचलेत त्यात यावर्षीचा ऐसी अक्षरेचा अंक सर्वोत्तम आहे.
इतका सुंदर अंक पाहून खरंच खूप आनंद झालाय.
लेख एकाहून एक सरस आहेत.
अभिनंदन!
'पालकनीती' : बालसहित्य विशेषांक
काल 'पालकनीती' चा दिवाळी अंक घरी आला आहे.
यंदाचा दिवाळी अंक बालसहित्य विशेषांक आहे.
वरवर चाळला. लेखन करणारी मंडळी आणि लेखन दोन्ही अत्यंत रोचक आहे. अंक लहानग्यांच्या चित्रांनी भरलेला आहे. बालसाहित्यावर विविध अंगाने विचार झालेला दिसतोय.
अधिक प्रतिक्रीया अंक वाचल्यावरच देईन
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तुकड्यातुकड्यानं
तुकड्यातुकड्यानं रिपोर्टिंगः
- 'अनुभव'मधली समीर कुलकर्णींची गोष्ट अपेक्षेनं वाचायला गेले. गोष्ट तशी बरी आहे, पण हा माणूस दिवसेंदिवस असुधारणीय पद्धतीत आध्यात्मिक होत चालला आहे, असा मला दाट संशय येतो आहे. भारीच संस्कृतप्रचुर आणि आध्यात्मिक. या गृहस्थांचा तेंडुलकरांवरचा लेख, पुलं आणि सुनीताबाईंवरचा एक लेख (रवीन्द्रनाथांची कविता मिळवण्याबाबत) आणि एक अप्रतिम कथा पूर्वी वाचली होती. त्या मानानं ही कथा अगदीच काहीतरी.
- 'अक्षर'मधला चिन्मय धारूरकर यांचा संस्कृत भाषेबद्दलचा लेख भारी आहे. संस्कृत देवभाषा, गीर्वाणभाषा, जननी, संगणकीय अचूक भाषा... वगैरे कसे पद्धतशीर गैरसमज आहेत, ते त्यांनी नोंदलं आहे. 'अक्षर'वाल्यांच्या मूर्तिभंजक स्पिरिटला साजेसा आणि खणखणीत लेख.
- 'शब्द'मधली निहलानी यांची गणेश मतकरीनं घेतलेली मुलाखत. नेहमीच्या यशस्वी प्रश्नांपेक्षा वेगळी आहे. ती मुलाखत क्रमश: का आहे, देव जाणे. प्रदीर्घ मुलाखती येतात की दिवाळी अंकांतून. शोभूनही दिसतात. ('साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकांतल्या माधव वझेंनी घेतलेल्या मुलाखती. हं... असो.) बहुधा काहीतरी तांत्रिक अडचण असावी.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अजून एक त्रोटक रिपोर्टिंग
- 'साधने'च्या अंकातला विनय हर्डीकरांचा लेख भारी. गुजराती व्यापारी, इतिहासाच्या सुरुवातीपासून त्यांनी केलेला व्यापार, त्यांची परंपरेनं चालत आलेली आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्यं असं करत करत आपण अंबानींपर्यंत येतो. एक वेळ कोड पडलं तोंडावर तरी चालेल, पण मोढ बनिया जातीला थारा देऊ नये, अशी म्हण आहे म्हणे गुजरातीत. त्यांच्या फायदेकाढूपणाला सीमा नसते आणि विधिनिषेधही. अंबानी या समाजातून आलेले. अशा म्हणींचा सामाजिक अभ्यास झाला पाहिजे असं सुचवतात हर्डीकर! बनियांचं मिठ्ठास बोलणं, लवकर लग्न करून धंद्यात पडणं, फायद्याखेरीज बाकी कुठल्याही राजकीय वा धार्मिक विचारसरणीला एका मर्यादेपलीकडे महत्त्व न देणं, त्यांच्या एकत्र कुटुंबपद्धतीचे आर्थिक आणि शारीरिक फायदे... अशा सगळ्याला स्पर्श करत जाणारा लेख. मोदींच्या पलीकडचा गुजरात शोधणारा.
- 'अनुभव'मधला गौरी कानेटकरचा लेख. त्याची सुरुवातच लक्षवेधक आहे. 'आपण वरवरची पत्रकारिता करतो, आयुष्याला भिडत नाही' अशा खंतीतून ही बाई पारधी मुलींच्या होस्टेलवर एक वर्षभर राहायला गेली. त्यांचं भयानक आयुष्य, प्रवाहात सामील होताना त्यांना करावे लागणारे प्राणांतिक झगडे आणि हे सगळं फक्त काठावरून बघणारे आपण - अशी ही कोंडी आहे. तसा लेख एकांगी आहे. कामाच्या स्वरूपाबद्दल नि प्रश्नांच्या संभाव्य उत्तरांबद्दल काही म्हणत नाही तो. पण काठावरून सहानुभूतीनं पाहणार्या माणसाची अवस्था परिणामकारकपणे दाखवतो.
- 'अक्षर'मधली नंदा खर्यांची कथा. भविष्यातल्या भीषण मुंबईचं कल्पनाचित्र आहे. वाचताना अंगावर अक्षरशः काटा आला. त्यातल्या मुंबईत स्टेशनांची नावं लिलावात विकायला काढलीत. शहरभर सेक्युरिटी कॅमेर्यांचं राज्य आहे. तथाकथित भूमिपुत्रांची एक ऑफिशियल सेना आहे. त्यात सामील होऊन लाल लंगोट लावलेत तर किंवा हातात पैसा असेल तरच जगायची परवानगी आहे. नाहीतर कारकुंडे असा, नाहीतर पोलीस. कुत्र्याच्या मौतीनं मराल. तेही ग्लॅमरसली जीवबीव देऊन नाही. याचीही सवय होत होत. मुंबईकराच्या स्पिरीटनं!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
नंदा खरे
कथा आणि त्यातला अस्मिता-ओळख ह्यांच्याभोवतीचा खेळ वाचून मर्यादित प्रमाणात फिलिप के. डिकच्या कथाविश्वाची आठवण झाली.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हं, या एका विशिष्ट
हं, या एका विशिष्ट गोष्टीबाबत. इंट्रेश्टिंग आहे. वाचून पाहीन.
मला खर्यांच्या गोष्टींमधली प्रयोगांची रेंज बघून थक्क व्हायला होतं मात्र कायम. अंताजीची ती इतिहासकालीन सामान्य माणसाची दुनिया काय, ’भुई’मधलं विज्ञान-तंत्रज्ञानाचं समांतर विश्व आणि त्यात वापरून बघितलेलं भारतीयत्व काय, ’विटेवर वीट’मधलं बांधकामांचं विश्व काय नि याहून अगदी निराळं ’संप्रति’मधलं मूलभूत अर्थशास्त्र... काय रेंज आहे यार, खल्लास! नि सगळ्या गोष्टी, गोष्टी म्हणून खणखणीत हे वेगळंच.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
साधनेतील धारीयांचा लेख तसेच
साधनेतील धारीयांचा लेख तसेच पळशीकरांची मुलाखत असे 'राजकीय' लेखही रोचक आहेत.
धारीयांनी केलेली (प्रसंगी अतिरिक्त आणि काहिशी स्वाभाविक) आत्मस्तुती वगळली तरी काही तपशील नव्याने कळतात.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नक्कीच
मला साधना चा अंक आवडला.
पण एक शंका:-
प्रकाश घातपांडे ह्यांना माधव रिसबुडांवर लेख लिहायचा होता, तो त्यांएने मासिकात न लिहिता स्वतंत्र लेख लिहिला.
कारण? कारण हेच की ती व्यक्तीपूजा ठरली असती अंनिसच्या नजरेत.
मग ह्या दिवाळी अंकात जे दाभोलकराम्वरावर लेख आहेत ती व्यक्तीपूजा नाही का?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
छापील?
हा जालावरच्या दिवाळी अंकांचा धागा आहे ना?
छापील अंकांची चर्चा दुसरीकडे करूया.
जालावर 'ऐसी', 'मायबोली' आणि
जालावर 'ऐसी', 'मायबोली' आणि 'मिसळपाव' सोडून बाकी काय आहे?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
फेसबुक
फेसबुक ऑर्कुट ट्विटार गूगल
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अकरा
गेल्यावर्षी अकरा होते ना?
यावर्षी तीनच?
हो ना! यंदा 'रेरे' नाही.
हो ना! यंदा 'रेरे' नाही. 'मनोगत'नाही. अजून कुठले नाहीयेत?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
उपक्रम पण नाही
उपक्रम पण नाही
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
रे रे का नाही?
१. रे रे का नाही?
२. मनोगताचा अनुवाद विशेषांक घोशित झाल्याचं आठवतंय. उत्सुकता होती. पुढे काय झालं? दिवाळी अंकाचा शोध घेतल्यावर फक्त हे पान हाती लागतंय
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एकतर मराठी ब्लॉगविश्व जितक्या
एकतर मराठी ब्लॉगविश्व जितक्या जोरात पसरत होतं नि जसं फोफावेल असं दोन वर्षांपूर्वी वाटलं होतं, तसं नि तितकं वाढलं नाही. कुठे ना कुठे लोक लिहिते झाले असतील नि आम्ही मागोवा घेण्यात कमी पडलो असू, हे गृहीत धरूनही मराठी ब्लॉगविश्वातलं लेखन - निदान ललित तरी - म्हणावं तसं वाढलं नाही; संख्येनं नाही आणि दर्जानं वा प्रयोगांतही नाही.
दुसरं म्हणजे आम्ही त्या संकलनातली नॉव्हेल्टी टिकवून धरू शकलो नाही, एक प्रकारचा तोचतोचपणा येत गेला. ब्लॉगर्सना लिहितं करायचे काही तुटकेफुटके प्रयोग आम्ही केले खरे, पण त्याचा पुरेसा पाठपुरावा केला नाही. या प्रकल्पाला जितका वेळ द्यायला हवा, तितका आमच्याकडे कलेक्टिव्हली नव्हताही. लोकांना लिहितं करायला एक प्रकारची 'साहित्यिक' (आय नो, हा एक शिवीसदृश शब्द आहे, तरीही) ऊर्जा लागते, तीही आमच्यात उरली नसेल कदाचित.
परिणामी, 'यंदा थांबू. मग वाटलं, तर पुन्हा सुरू करता येईलच' अशी समजूत काढून ब्रेक घेतला. आता त्याचं पुढे काय होईल, कुणास ठाऊक.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मराठी ब्लॉगविश्वातलं लेखन -
याबद्दल सहमत आहे
मुळात ललित ब्लॉग्स फारसे अपडेट्च होत नाहित त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत जातं. या अंकाची विशेष वाट यासाठी पाहत होतो कारण ते ब्लॉग बघितले नसतील तर दर्जेदार ललित एकत्र एकगट्ठा वाचायला मिळत असे. इतके दर्जेदार संकलन अन्यत्र मिळणे कठिणच.
असो. निर्णयामागची भुमिका पटतेय (पण तरी आवडत नैचे )
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रिपोर्टिंग - ३ (त्रोटक नाहीये, ठाऊके!)
- अरुणा ढेरेंचं महाभारतावरचं लेखन मला आवडतं. 'काळोख आणि पाणी' नावाचं महाभारत नि लोकवाङ्मय असा पूल बांधणारं पुस्तक भारी होतं. तसं 'कृष्णकिनारा'पण सुरेख होतं - कुंती, द्रौपदी, राधा नि कृष्ण असा गोफ दाखवणारं. पण किती वेळा तुम्ही तेच ते लिहीत राहणार, असा प्रश्न येतोच. यंदा रुक्मिणी या विषयावर त्यांचे दोन लेख आहेत चक्क. एक 'मौजे'त नि एक 'पद्मगंधे'त. एकीत रुक्मिणीबरोबर थोडी सत्यभामाही आहे, इतकाच फरक. बाकी बाईचं सोसणं, गृहिणीपणाचा घरंदाज उबदार तृप्त वास वगैरे वर्षानुवर्षांचं स्टॅण्डर्ड तेच. बरं, एका विषयातून बाहेर नाही पडला आहात तुम्ही हे ठीक. पण एकाच वर्षी एकाच विषयावर दोन लेख? हे टाळणं, नाही म्हणणं, इतकं अवघड होतं का?
- लुप्त 'सरस्वती' नदीचा शोधही यंदा पाप्युलर दिसतोय. 'अनुभव'मधे मयुरेश प्रभुणे नामक पत्रकाराचा लेख. 'मौजे'त अश्विन पुंडलीक यांचा. ('रेरे'मधे गेल्या वर्षी अश्विनचा 'एका (सरकारी) पावसाळ्याचा जमाखर्च' होता. 'रेरे'मधला ब्लॉगर थेट 'मौजे'त बघितल्यावर जरा गार वाटलंच, खोटं का बोला? 'मौजे'चा बाकीचा अंक पाहून परत गरम व्हायला लागलं ते सोडा. शिवाय इतकं बरळल्यावर आता माझं मत पक्षपाती नाहीय, हे लोकांना पटणं कठीण. पण नाही पटलं तर न पटो. घालवा तुमचा वेळ प्रभुणेंच्या लेखावर फुकट, माझं काय जातंय? तर - ) अश्विनचा लेख भरपूर संदर्भ देणारा, सखोल आणि शिवाय जिवंत आहे. प्रभुणेंचा उडत उडत प्रवासवर्णन करणारा 'मीना प्रभू' शैलीतला. अश्विनचा लेख नसता, तर प्रभुणे सुटले असते. पण तुलनेला हा दणदणीत लेख असल्यानं त्यांची पंचाईत करून ठेवली!
- 'साधने'चा अंक नरेन्द्र दाभोलकरांनी व्यापलेला आहे खरा. पण तो ओलांडून पुढे गेल्यावर वागळेंनी घेतलेली सुहास पळशीकरांची मुलाखत हाती लागली. भारतातल्या राजकीय पक्षांचं लोकांशी नातं अजून तितकं तुटलेलं नाहीय, शिवाय राजकीय नेते स्वत:ची तुंबडी भरण्यापलीकडे काहीतरी करत असतात ही निरीक्षणं नि त्यामागचं तर्कशास्त्र सॉलिड होतं. भारतीय लोकशाही आता कुठे आर्थिक धोरणांना केंद्रस्थानी आणू पाहतेय, असं मांडणारा पळशीकरांचाच लेख 'अनुभव'मधे आहे. (राजकारणाबद्दल फारसं काही न कळणार्या माझ्यासारख्या लोकांना अशा लेखांचा आधार वाटतो. :प) 'अनुभव'मधेच सुहास कुलकर्णींचा भारतीय राजकारणातल्या घोषणांचा आढावा घेणारा धमाल लेख आहे. घोषणा कशा कलाटणी देणार्या असू शकतात नि त्यांतून पक्षांचं व्यक्तिमत्त्वं कसं रिफ्लेक्ट होत राहतं ते भलतंच वाचनीय आहे (उदा: 'प्रमिला दंडवते, सर्वांना गंडवते' ही खास शिवसेना धाटणीची घोषणा. :ड).
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
वा
साधना दिवाळी अंकाचा दुवा इथेच मिळाला. जवळपास वाचोन होत आले आहे.
मोहन धारियांचा आणिबाणी- राजीनामा प्रकरनातला लेख माहितीपूर्ण वाटला.
मुलाखत वाचून सुहास पळशीकर ह्यांच्याबद्दल आश्चर्यकारकरित्या चांगलं मत झालं.
अत्यंत व्यवहारवादी चौकटीतून राजकारनावरचं भाष्य आवडलं. (कधी कधी सगळं ठाउक असूनही आपण राजकारणाबद्दल सोवळेपणाचा आव आणत तरी बोलतो;
किंवा आहे त्यातला घाणेरडेपणा आपल्याला जाणवतच नाही. ते इथे नव्हतं; हे आवडलं. व्यावहारिक, रोखथोक कमेंटा.
"आखूड लोकांचा प्रदेश" हा मराठी माणसांबद्दलचा स्वतःचा वैताग त्यांनी बाहेर ओकलेला लेख वाचून ठ्ठो करुन हसलो होतो; हे आठवतय.)
.
- लुप्त 'सरस्वती' बद्दल मासिक, पुस्तकं , डॉक्युमेंट्र्या ह्याबद्दल ऐकून्-वाचून कंटळा येतोय.
"तिकडं अंगुलीनिर्देश करणारं काहीतरी आहे. लवकरच अधिक दुवे सापडतील." वगैरे वगैरे नेहमीची बडबड आणि तर्कटे ह्यांचा कंटाळा येतो.
तर्कावर सगळं काही असतं. नदी असते. तिथं लोकं असतात. त्यांचे पुरावे मिळायची खात्रीही असते.
पण फक्त तर्कातच आणि कल्पनेतच.
प्रत्यक्षात झाट काही हाती लागत नाही.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
'प्रत्यक्षात झाट हाती काही
'प्रत्यक्षात झाट हाती काही लागत नाही...'
अश्विनच्या लेखात जाम भूगर्भशास्त्रीय वगैरे माहिती नि पुरावेपण आहेत. ट्राय माडी.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
"हीच ती सरस्वती"
"हीच ती सरस्वती" असं एकदाचं झालं का सिद्ध?
ती एक एस्टॅब्लिश्ड फ्याक्ट बनली का?
आय मीन, " चंद्रगुप्त मौर्य ह्याच्यापूर्वीही भारताला लिखित इतिहास आहे" अशी स्पश्ट मान्यता आहे, शंभर वर्षापूर्वी त्यावर स्पष्टता नव्हती.
तशी स्पश्टता आता आली का ह्या मुद्द्यावर?
असो. पण बघतो.(तसंही बघितल्याशिवाय राहवत नाहिच म्हणा.obsession साली वाईट चीज आहे.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सरस्वतीचे एक असो पण ब्राह्मी
सरस्वतीचे एक असो पण ब्राह्मी लिपी अशोकापूर्वी असल्याचे ठाम पुरावे श्रीलंकेतील अन तमिळनाडूतील उत्खननात मिळालेले आहेत- लंकेत इसपू ४०० च्या सुमारचे तर तमिळनाडूत पलनी इथे इसपू ४५० चे. तमिळनाडूतील उत्खनन गेल्या दोनेक वर्षांतले आहे अन अजून ते डिबेट शमलेले नाही, पण लंकेतला शोध १९९० च्या सुमारास लागल्याने ते निश्चित आहे. त्यावर पेपरही लिहिल्या गेला आहे. त्यामुळे भारतीय उपखंडाचा लिखित इतिहास इसपू ४०० पर्यंत तरी मागे नेता येतोच!
तमिळनाडूतील पलनी येथील उत्खननाची लिंक.
लंकेतील उत्खननाचा पेपर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अवांतर शंका...
गौतम बुद्धाचं त्रिपीटक हे इ स पू ४०० पेक्षा लै जुनं आहे ना?
ग्र्म्थ म्हटल्यावर तो ही लिखितच असणार ना ? (वेद स्टाइल तो मौखिक असणं शक्य वाटत नाही; "सुरुवातीस भिख्खूंमध्ये मौखिक परंपरा होती, लयबद्ध, गेय अशा
रचनांची "; हे कधी कुठं वाचण्यात्-ऐकण्यात आलं नाही.)
पाणिनी सुद्धा अशोकपूर्व झालेला. चाणक्य्-विष्णुगुप्त- कौटिल्य चंद्रगुप्त मौर्याच्या काळचा. त्याचं अर्थशास्त्रही लिखितच होतं ना?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हम्म. त्रिपिटक असून असून किती
हम्म. त्रिपिटक असून असून किती जुनं असणारे? बुद्धजन्मवर्ष इसपू ६०० च्या आधी नाही म्हणतात. तेव्हा जुन्यात जुने म्हणजे इसपू ५७५ म्हटले तरी चालेल.
ग्रंथ म्हटल्यावर तो लिखितच असला पाहिजे असे नाही. वेद ज्या काळजीने जतन केले गेले तितकी काळजी अन्यत्र कुठे दिसत नाही याचा अर्थ मौखिक काही नाही असा आजिबात नाही. जगात सगळीकडेच लिखाणाचा प्रसार सडकून होण्याअगोदर मौखिक विद्याच जास्त बळजोर होती. बहुसंख्य जनता निरक्षर होती, मुख्यतः राजे अन व्यापारी सोडल्यास बाकी लोकांना गरज नव्हती. होमरचे इलियड-ओडिसी सुरुवातीला पिसिस्त्रातॉसच्या अध्यक्षतेखाली अथेन्समध्ये पहिल्यांदा लिहिल्या गेले त्याच्या आधी किमान दोनतीनशे वर्षे ते मौखिक रूपात होते. तिबेटी भाषेतले epic of king gesar हे १० लाख ओळी असलेले, महाभारतापेक्षा ५-६ पट मोठे असलेले महाकाव्य मौखिक रूपात जतन करणारे लोक होते, अजूनही आहेत काही लै तुरळक का होईना.
ही झाली समांतर उदाहरणे. बाकी बुद्धाने लोकल भाषांचा पुरस्कार केला होता. त्या त्या भाषेत माझी शिकवण सांगा, फक्त संस्कृत घुसडू नका अशी पॉलिसी होती त्याची. दोन ब्राह्मण शिष्य बुद्धाकडे गेले आणि वेद-स्टाईल तुमची शिकवण सूत्रबद्ध करतो म्हटले, तेव्हा बुद्धाने त्यांना नकार दिला. कारण त्याला भीती होती, की सगळे बामण आपला पंथ गिळंकृत करतील म्हणून. माधव देशपांड्यांच्या sanskrit and prakrit, a sociolinguistic study अशा काहीशा नावाच्या पुस्तकात ही कथा आलेली आहे.
अतिअवांतरः सुरुवातीच्या काळात संस्कृतला कडाडून विरोध करणारे बौद्ध-जैन धर्म पुढे मात्र पूर्णच संस्कृताळले. बौद्धांमुळे तर 'बुद्धिस्ट हायब्रिड संस्कृत' नामक संस्कृतचा एक उपभेदही तयार झाला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हो.
पण "त्रिपीटक लिखित आहे" हे विधान चूक की बरोबर ?
.
अतिअवांतरः सुरुवातीच्या काळात संस्कृतला कडाडून विरोध करणारे बौद्ध-जैन धर्म पुढे मात्र पूर्णच संस्कृताळले. बौद्धांमुळे तर 'बुद्धिस्ट हायब्रिड संस्कृत' नामक संस्कृतचा एक उपभेदही तयार झाला.
तशी गंमत तर भरपूर ठिकाणी आहे म्हणाअ दक्षिण आशिअयच्या इतिहासात.
बुद्धांनं य्ज्ञातील पशु बळींना विरोध केला तसाच मूर्तीपूजेचा कडाडून विरोध वगैरे केला म्हणतात.
पण खरं तर मंदिर कल्चर्, वैदिक/हिंदुंचं मूर्तीपूजन हे बुद्ध काळानंतरच वाढलेलं दिसतं. (खुद्द बुद्धाच्या मूर्ती बौद्धांनी बनिवल्या!)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पण "त्रिपीटक लिखित आहे" हे
डिपेंड्स ऑन द टाईम फ्रेम. त्रिपिटकाचे सर्वांत जुने हस्तलिखित पाहिले तर तोपर्यंत तरी ते लिहिल्या गेले होते असेच म्हणावे लागेल.
असो. माझ्या मते सुरुवातीला सूत्रबद्ध शिकवण ही नंतरच्या लोकांनी ग्रंथबद्ध केली असावी. ग्रंथबद्ध करण्याआधीही काही काळ मौखिक स्वरूपात ती असेलच. याला पॅरलल उदाहरण सॉक्रेटिस-प्लेटोचे घेता यावे. सॉक्रेटिसने स्वतः लिहिलेले काहीच उपलब्ध नाही. त्याच्या विचारांबद्दल जे काही कळते ते प्लेटोच्या ग्रंथांकडूनच. म्हणजे सुरुवातीला बुद्धाने काहीतरी शिकवण दिली. ती शिकवण प्रचार करत त्याचे शिष्य हळूहळू मगधभर हिंडू लागले. पॉप्युलॅरिटी वाढत गेली तसतसे क्रिटिकल मास आले अन मग ग्रंथबद्ध करण्याची गरज भासली असावी. त्यामुळे हा प्रश्न तसा व्हेग आहे. त्रिपिटक लिखित आहे म्हणजे मौखिक ते लिखित या प्रोसेसमध्ये फक्त कॉपी करणे इतकाच भाग होता, की मूळ शिकवण अधिक तपशीलवार लिहिली गेली? याचे उत्तर काही असले तरी नक्की फरक काय पडतो हे मला समजत नाही.
बाकी मूर्तिपूजेबद्दल सहमत आहे. इथवर की अरबी भाषेतला पुतळावाचक शब्द 'बुत्' हा बुद्धावरून आलाय असेही मत वाचलेय. खरेखोटे एक अल-मनात जाणे.
बाकी, त्रिपिटक साधारण इसपू २९ च्या सुमारास लिहिले गेले असे हे पेज सांगते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
'पद्मगंधे'च्या अंकात राजू
'पद्मगंधे'च्या अंकात राजू शेट्टींचा लेख आहे. बारामतीतल्या ऊसदर आंदोलनाबद्दल. भावुक, काहीसा तीव्र लेख आहे. पण का नाही? व्यक्तिपूजेचे गळे काढून भावुक झालेलं चालतं, मग... असो.
एरवी त्या आंदोलनाबद्दलची बातमी ऐकून, खांदे उडवून च्यानल बदललं असतं. आता नाही. त्याचं काय झालं, होतं आहे, याबद्दलची उत्सुकता वाटण्याइतकं तरी त्या लेखानं मला आंदोलनाशी जोडून घेतलं आहे. हे मोठंच म्हणायला हवं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मुळात ते आंदोलन केवळ
मुळात ते आंदोलन केवळ बातम्यांवरच बांधुन ठेवणारं होतं.. आता हा लेख वाचायलाच हवा.
जालावर॑ नसेलच.. पण तरी विचारूब बघतो: जालावर लेख/अंक आहे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नाही. जालावर नाहीय.
नाही. जालावर नाहीय.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन