जे एन यू मेरा प्यारः एक स्त्री म्हणून
जे.एन.यू.त नव्याने आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना (विशेषतः मुलग्यांना) तिथले सिनियर आवर्जून सांगतात, 'कोणाकडेही दहा सेकंदांहून अधिक काळ टक लावून पाहू नकोस हं! जीएसकॅश होईल'. [म्हणजे लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होईल. 'जीएसकॅश' हे विद्यापीठातल्या 'Gender Sensitisation Committee Against Sexual Harassment'चं लघुरूप आहे.] दहा सेकंदाहून अधिक वेळ न्याहाळणं हा 'लैंगिक छळ' असल्याचं हे गमतीदार समीकरण विद्यापीठातलं लोकप्रिय मिथक आहे. ते मिथक आहे, हेही बहुधा सगळ्यांना माहीत आहे. असुरक्षिततेसाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्लीत स्थित हे विद्यापीठ स्त्रिया-मुलींना मोकळं अवकाश देण्याचा कसा प्रयत्न करतं, त्याची झलक या मिथकातून दिसते.
विशाखा केसनंतर आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सगळ्या कार्यालयांमध्ये लैंगिक छळविरोधी समिती असावी अशी सूचना होती. त्यानुसार एक-दोन वर्षांतच अशी समिती जे.एन.यू.तही स्थापन झाली. नियम बनताच जे.एन.यू प्रशासनाने लगेच समिती स्थापन केली, असं झालं नाही. विद्यार्थ्यांनी चळवळ करून ही समिती स्थापन करणं प्रशासनाला भाग पाडलं. [जीएसकॅश स्थापनेच्या इतिहासावर कदाचित रोचना नीट प्रकाश टाकू शकतील.] लैंगिक छळ झाल्यास शिक्षा करणारी समिती हे या समितीचं रूप असू नये, तर एकंदरीत लिंगभाव, लैंगिक समानता यांविषयी विद्यार्थ्यांना जागरूक, संवेदनशील करणं हे या समितीचं कार्य असावं ही जाणीव सुरुवातीच्या काळापासूनच होती. सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची प्रचंड हौस असलेल्या या विद्यापीठात या संस्थेनं चांगलंच मूळ धरलं यात नवल नाही. विद्यापीठातल्या संवेदनशील, चर्चोत्सुक वातावरणामुळेच अशी संस्था (समिती) अस्तित्वात आली आणि छान रुजली. आणि विद्यापीठातलं वातावरण संवेदनशील राखण्यासाठी समिती नेहमी काम करत असते. उदाहरणार्थ, आमच्या हॉस्टेलच्या बाथरूम्समध्ये - म्हणजे मुलींच्या अगदी खाजगी अशा जागी - 'लैंगिक छळ म्हणजे काय' याची सोप्या शब्दांत माहिती देणारी छोटी पत्रकं चिकटवलेली होती. या समितीतर्फे खूप छान नाटकं सादर झालेली मी पाहिली आहेत.
या समितीवर प्राध्यापकांचे, कर्मचार्यांचे प्रतिनिधी असतात, तसे विद्यार्थी-विद्यार्थिनींचेही. जे.एन.यू.च्या जीएसकॅशची जी नियमावली आहे, ती इतर संस्थांना प्रमाणभूत ठरण्यासारखी आहे, असं मत वेळोवेळी व्यक्त झालेलं आहे. इतर अनेक ठिकाणी अशी समिती अस्तित्वात आहे, हेच अनेकांना माहीत नसतं. लैंगिक छळ म्हणजे काय, तो झाला तर काय करायचं हेही अनेकांना माहीत नसतं. जे.एन.यू.तल्या बहुतांश लोकांना मात्र या समितीविषयी आणि तिच्या कार्याविषयी व्यवस्थित माहिती असते. अनेकांनी वेळोवेळी समितीचा आधार घेतलेला आहे. गुन्हा करणार्या आणि बळी पडलेल्या अनेकांना विद्यापीठाने (या समितीच्या सल्ल्यानुसार) व्यावसायिक व्यक्तींकडून समुपदेशन पुरवलेले आहे.
अशी समिती जे.एन.यू.त अस्तित्वात आहे, एवढंच नव्हे, तर तिचं काम चालतं, म्हणजे तिच्याकडे केसेस नोंदवल्या जातात याचा अर्थ जे.एन.यू.त लैंगिक स्वरूपाचे गुन्हे घडतात असाही होतो. पण तरीही, संस्थेतलं एकंदर वातावरण लिंगभावाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर निकोप, लिंगसमानतेच्या बाबतीत अतिशय सजग आहे असं मी ठामपणे म्हणेन.
सहा-सात हजार तरुण तरुणी ज्या कँपसमध्ये राहतात, तिथे काहींना एकमेकां/कींविषयी आकर्षण, प्रेम वाटणार, कधीतरी ते व्यक्त होणार, काहीं व्यक्तींना ते प्रेम मान्य होणार नाही, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावं असं काहींना वाटणार..अशा बर्याच गोष्टी घडणं स्वाभाविक आहे. खूप वेगवेगळ्या ठिकाणांहून, वेगळ्या परिस्थितींतल्या कुटुंबांतून, वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितींतून, संस्कृतींतून आल्यामुळे प्रेमाचे आविष्कार करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असणं हेही स्वाभाविक आहे. पण तरीही मुलगे नाक्यावर उभे राहून शिट्ट्या मारत आहेत, मुलींना छेडत आहेत, रस्त्यावरून जाताना धक्के मारत आहेत, काळोख पडल्यावर मुलींना बाहेर पडायची भीती वाटत आहे यापैकी कुठलीही घटना घडलेली मी पाहिली नाही किंवा ऐकली नाही. विद्यापीठाचं ग्रंथालय बारा वाजेपर्यंत आणि वाचन कक्ष २४ तास उघडा असतो, याचा उल्लेख आधीच्या लेखात आलाच आहे. कितीही रात्र झाली तरी वाचनालयातून हॉस्टेलला परत यायला (किंवा चहा पिण्यासाठी किंवा मॅगी खाण्यासाठी हॉस्टेलमधून बाहेर पडायला) एकट्या दुकट्या मुलीलाही कणमात्र भीती वाटणार नाही असं वातावरण विद्यापीठात आहे. भल्या थोरल्या कँपसमध्ये जिकडेतिकडे सुरक्षारक्षक असणं हे याचं एक कारण आहे, तसं कँपसमधली लैंगिक मुद्द्यांविषयीची प्रगल्भ समजही या स्वतंत्र, निर्भय वातावरणाला कारणीभूत आहे. अपरात्रीही उघड्या असणार्या इथल्या ढाब्यांच्या आकर्षणाने बाहेरून कोणी आले, रात्री रस्त्यांवरून फिरणार्या मुलींवर चेकाळून शेरे मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे प्रसंगही जे.एन.यू.त घडले आहेत, पण अशांना तिथल्या तिथे जाब विचारण्याचं धैर्यही इथल्या मुलींत आहे. कारण पूर्ण विद्यापीठ आपल्या पाठीशी उभं राहील, अर्ध्या रात्री धावून येईल, सुरक्षा रक्षक ताबडतोब मदत करतील याची खात्री.
स्त्रियांसाठी भयमुक्त वातावरण असणं हा एक मुद्दा झाला. जे.एन.यू.ने मला भयमुक्त वातावरण/ रात्री फिरण्याचं स्वातंत्र्य दिलं एवढंच नाही, तर एक तरुण माणूस म्हणून लैंगिकतेसंबंधीच्या अनेक मुद्द्यांबाबत साक्षर केलं. विचार करायला शिकवलं.
नेमक्या कुठल्या गोष्टीमुळे किंवा प्रसंगामुळे हे मला सांगता येणार नाही, पण विद्यापीठात राहायला लागल्यानंतर मला माझ्या शरीराची लाज वाटणं बंद झालं. माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींनी मी वयात आल्यावर अमुक कपडे घाल/ घालू नकोस असं कधीही सांगितलं नव्हतं. तरी का कोणास ठाऊक, या वयानंतर मला विशिष्ट कपडे (उदा. टीशर्ट, स्कर्ट-ब्लाउज) घालायची लाज वाटू लागली. बहुधा विद्यापीठातल्या मोकळ्या वातावरणाचा, जेंडरविषयक चर्चांचा परिणाम असेल, नकळत माझी लाज कमी होऊन, माझ्या शरीराला मी स्वीकारलं.
समलिंगी व्यक्तींविषयी आणि त्यांच्या प्रश्नांविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी काही गट गेल्या काही वर्षांत जे.एन.यू.त सक्रिय झाले आहेत. समलैंगिकतेबद्दल चर्चा होऊन सजगतेचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून दोन वर्षांपूर्वी एका मित्राने स्वतःचं 'गे'पण जाहीर करत विद्यार्थी संघाची निवडणूक लढवली. एस.एफ.आय या डाव्या संघटनेने त्याला पाठिंबाही दिला.
सेक्स वर्क-सेक्स वर्कर्स यांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी इथे मला मिळाली. सैद्धांतिक चर्चा ऐकल्या, तसं प्रत्यक्ष सेक्स वर्कर्स राहतात, तिथे जाऊन त्यांना भेटणं हेही करता आलं.
शेवटी एक प्रसंग सांगून हे जे.एन.यू.-स्त्री-पुरुष-समानता-वातावरण-संकीर्तन संपवते. आमच्या हॉस्टेलजवळ एक मुलांचं हॉस्टेल होतं, आणि आमचा जाण्यायेण्याचा रस्ता त्या हॉस्टेलवरून जायचा. संध्याकाळी वगैरे अनेक मुलगे चहा प्यायला आणि गप्पा मारायला बाहेर पडून त्यांच्या हॉस्टेलसमोर उभे राहायचे. आमच्या हॉस्टेलमधल्या काही मुलींना फक्त-मुलग्यांच्या घोळक्यांसमोरून जायला यायला किंचित संकोच वाटे. मुलग्यांनी आपल्या हॉस्टेलसमोरच्या रस्त्यावर उभं राहण्यात गैर नव्हतं. कारण ते काही शेरेबाजी, छेड काढणे करत नव्हते. तेव्हा कँपसमधल्या काही मुलामुलींनी काय केलं, संध्याकाळी एकत्र चहा प्यायला या हॉस्टेलसमोरच्या दुकानात जायला सुरुवात केली. मित्रमैत्रिणींच्या एकत्र घोळक्यांमुळे आपोआप त्या हॉस्टेलच्या भवतालचं वातावरण बदललं. अधिक खेळकर, मैत्रिपूर्ण झालं. ही काही 'ऑक्युपाय हॉस्टेलसमोरचा रस्ता' वगैरे चळवळ नव्हती, कुठलीही निदर्शनं, भांडणं झाली नाहीत. एका छोट्याशा, सहज सामूहिक कृतीमुळे दोन हॉस्टेलमधे असलेला एक अदृश्य ताण निवळला. तरुण स्त्री आणि पुरुष वेगवेगळे, आपापल्या गटांत राहिले तर सुरक्षित राहतात असं नाही, तर त्यांनी मैत्रिपूर्ण एकत्र येण्याने स्त्रियांसाठी अधिक मोकळं, निकोप वातावरण निर्माण होतं याची जाणीव मला जे.एन.यू.ने दिली.
म्हणून जे.एन.यू.वर माझं प्रेम आहे.
मनापासून आभार या लेखाबद्दल.
मनापासून आभार या लेखाबद्दल. संस्कृतिजतनाच्या आणि पतनाच्या दिवसांत या लेखमालिकेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
उत्तम लेखमाला
लेखमाला छान आहे. वाचत असताना माझ्या स्वत:च्या विद्यापीठाची (आय.आय.टी. बाँबे) आठवण न होणं शक्य नव्हतं. दोन्ही अनुभवांत बरंच साधर्म्य जाणवतं.
मी आय.आय.टी.त असताना (म्हणजे १९८८-९० च्या आसपास) जिला ढोबळपणे राजकीय-सामाजिक जाणीव म्हणता येईल ती आम्हा विद्यार्थ्यांमध्येही खूपच होती. मार्क्सवाद की लिबर्टेरियनिझम, पर्यायी विकासनीती, राखीव जागा असाव्यात का, भारतात राहण्याची आपल्यावर बांधिलकी आहे की नाही (कारण आयआयटियन मंडळी तेव्हा खूपच संख्येने बाहेर जात असत) अशा अगणित विषयांवर रम पिऊन चर्चा केलेली आठवते. नाटकं, आर्टफिल्म्स, फाउंटनहेडच्या खिळखिळ्या झालेल्या प्रती, कोसलाच्या खिळखिळ्या झालेल्या प्रती, शबनम पिशव्या वगैरेचा राबता होता हे अोघाने आलंच.
एक फरक असा की राजकीय पक्षांची प्रत्यक्ष हजेरी फार नव्हती. म्हणजे ‘अभाविप’ चं काम पाहणारे काही विद्यार्थी होते, आणि मार्क्सवाद जवळचा वाटणारेही अर्थात होते, पण पक्षसंघटना अशा दिसत नसत. राजीव गांधी आवडतो असं म्हणणारे मात्र कुणी आढळले नाहीत.
एक दुखा:ची बाब ही की आयआयटी हे इंजिनिअरिंग कॉलेज असल्यामुळे मुलींची संख्या भागिले मुलांची संख्या हे गुणोत्तर अगदीच शून्य + मेजरमेंट एरर इतपत होतं. त्यामुळे नाटकबिटक करायला प्रॉब्लेम यायचे. (स्त्रीपात्रविरहित अशी किती थोर नाटकं तुम्हाला माहित आहेत?)
> असुरक्षिततेसाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्लीत स्थित हे विद्यापीठ स्त्रिया-मुलींना मोकळं अवकाश देण्याचा कसा प्रयत्न करतं, त्याची झलक या मिथकातून दिसते.
एक अवांतर मुद्दा: ‘तरुण मुलींसाठी दिल्ली असुरक्षित आहे’ ही कीर्ती फारा वर्षांपासून ऐकतो आहे. पण ह्या बाबतीत मुंबईची सर्वसाधारण प्रतिमा तितकी वाईट नाही. ह्या फरकामागे तर्काच्या कसोटीवर टिकेल असं काही कारण आहे का हा प्रश्न डोक्यात येतो. मद्रास आणि कलकत्ता या उतरंडीत कुठे बसतात त्यावरही माहितगारांनी प्रकाश टाकावा…
आणखी एक अवांतर मुद्दा: JNU मध्ये गेलेली काही मंडळी इथे वावरताहेत असं दिसतं. त्यापैकी कुणाचा गो.पु. देशपांड्यांशी विद्यार्थी म्हणून संपर्क आला होता का? असल्यास त्यांच्याविषयी वाचायला आवडेल.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
* अच्युत गोडबोल्यांच्या
* अच्युत गोडबोल्यांच्या भाषणांतून ऐकलं होतं आय आय टी मधल्या सामाजिक-राजकीय वातावरणाविषयी.
* कोसलाच्या खिळखिळ्या झालेल्या प्रती.... कोसला मी पहिल्यांदी वाचलं शाळेत असताना, तेव्हा मला अजिबात आवडलं नव्हतं. जे.एन.यू.त गेल्यावर वाचलं, तेव्हा मात्र इतकं आवडलं की शेवटचं पान वाचून संपताच मी परत पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केली.
* दिल्ली खरंच असुरक्षित आहे का, वगैरे मला ससंदर्भ सांगता येणार नाही. पण माझे काही अनुभव सांगू शकते. दिल्लीत बस रात्री खूप लवकर बंद होतात. उलट मुंबईत, कलकत्त्यात लोकल, बस वगैरे उशिरापर्यंत चालू राहतात. नव्या दिल्लीच्या आखीवपणामुळे रस्त्यावरच दुकानं, त्यात जाणायेणार्यांची वर्दळ असं खूप होत नाही. मला व्यक्तिशः मुंबई/कलकत्त्यात रस्त्यावरून फिरताना दुकानांचा आधार वाटतो. मुंबईत लोकलमध्ये महिल्यांच्या डब्यात पुरुष घुसणं याची मी कल्पनाही करू शकत नाही. दिल्ली मेट्रोत जेव्हा महिलांचा डबा राखीव ठेवायला सुरुवात झाली, तेव्हा पुरुषांना ते पचवता आलं नाही. दोन चार पुरुष तरी घुसायचेच. स्त्रियाही त्यांच्यावर आवाज चढवून त्यांना शेजारच्या डब्यात हाकलायला उत्सुक नसायच्या. कलकत्त्यात मेट्रोत डब्यातली जवळजवळ १/३ बाकडी स्त्रियांसाठी राखीव असतात. चढण्या उतरण्याची दारे कॉमन. सहसा पुरुष बायकांना चोरटे स्पर्श वगैरे करत नाहीत. असे प्रसंग घडले तर बाकीचे पुरुष/स्त्रिया त्याविरुद्ध आवाज चढवतात. पण ही जनरलायझेशन्स आहेत.
* गो.पु....मी जे.एन.यू.त गेले तेव्हा गो पु निवृत्त झाले होते. पण मी त्यांची गुप्त भक्त आहे.त्यांची एकदा तरी भेट व्हायला हवी होती असं वाटून चुटपुट वाटते.
छान लेखमाला होती
छान लेखमाला होती
सुंदर!
तरुण स्त्री आणि पुरुष वेगवेगळे, आपापल्या गटांत राहिले तर सुरक्षित राहतात असं नाही, तर त्यांनी मैत्रिपूर्ण एकत्र येण्याने स्त्रियांसाठी अधिक मोकळं, निकोप वातावरण निर्माण होतं याची जाणीव मला जे.एन.यू.ने दिली.>>
छान लिहीलंय.
सुंदर लेखमालेचा तितकाच सुंदर समारोप!
धन्यवाद!
लेख आवडला.
लेख आवडला.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
लेखमाला छानच.
कुणीतरी मुंबई विद्यापीठ किंवा इथल्या कॉलेजांबद्दल असं काहीतरी चांगलं लिहा ना! मला फारच 'शीट यार, आपण का नव्हतो जे.एन.यु.त' असं वाटाया लागलंय.
देशद्रोही मेला! तुला
देशद्रोही मेला! तुला पाकिस्तानात धाडला पाहिजे....
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
डुप्रकाटाआ
डुप्रकाटाआ
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हे काय? संपली एवढ्यात? आख्खी
हे काय? संपली एवढ्यात? आख्खी माला लिहिण्याचं आश्वासन देऊन फक्त तीन फुलं ओवून गाठ मारण्याबाबत चार्वींना एक मुर्दाबाद. (तीन लेखांबद्दल तीन लाल सलाम दिलेले होतेच.)
'हम क्या चाहे - आजादी' च्या धर्तीवर
'हम क्या चाहे - लेखमाला,
जेएनयूपे - लेखमाला,
स्टुडंट लाइफ पे - लेखमाला,
स्टडी कल्चर पे - लेखमाला,
पॉलिटिक्स पे - लेखमाला,
होस्टेल लाइफ पे - लेखमाला'
आमच्या आयायटीबद्दल प्रतिसाद लिहिणार होतो, पण चिपलकट्टींनी तो आधीच लिहून ठेवलेला आहे त्यामुळे काय लिहायचं सुचलं नाही...
मुर्दाबाद नाही, 'शेम शेम'!
मुर्दाबाद नाही, 'शेम शेम'!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
छान लेखमाला. पण इतरांप्रमाणे,
छान लेखमाला.
पण इतरांप्रमाणे, लेखमाला उरकती घेतल्याचा आक्षेप नोंदवल्याशिवाय राहवत नाही.प्रश्न!
हा लेख संपला एवढाच ह्याचा अर्थ मी घेतला. मग सगळे जण लेखमालाच संपली असं का म्हणताहेत?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
शेम शेम
मलाही गुदगुल्या करायला आवडलं असतं, पण मी जरा उशीराच जागी झाले. त्यातून माझा आयडी 'अस्वल' असाही नाही.
चार्वी लेख आवडलाच. मी अशासारख्या संस्थेत शिकले नाही असं नाही, पण या दोन्ही संस्था आकाराने अगदीच बारक्या आहेत. इतरांशी मोठमोठ्या चर्चा, भलत्या वेळेस भटकतानाही सुरक्षित वाटणं*, असे अनुभव मला मिळाले नाहीत. एन.सी.आर.ए. मध्ये एक मित्र होता; त्याला मी माकपवाला म्हणते. (नोंद - तो मला दोन्ही-सेना-द्वेष्टी म्हणतो. हे सगळं मैत्रीखात्यातलं चिडवणं आहे.) त्याच्याशी अशासारख्या चर्चा अजूनही होतात. दुर्दैवाने या संस्थांचा जीवच बारका असल्यामुळे घमासान चर्चा झडल्या तरी फारतर तीनच लोकांचा त्यात सहभाग असे. ही लेखमाला वाचून, प्रत्येक शास्त्रासाठी निरनिराळी संस्थानं बनवू नयेत असं मत व्हायला लागलं आहे.
*इन-मिन-काही-शे लोक जिथे राहतात तिथे असुरक्षित काय डोंबलाचं वाटणार!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अय्यो! मी नाही हो संपवली
अय्यो! मी नाही हो संपवली लेखमाला. फक्त जंतूंनी ओळखलं मला काय म्हणायचं होतं ते. कदाचित 'म्हणून जे.एन.यू.वर माझं प्रेम आहे' असं लिहिल्याने गैरसमज झाला असेल. पण तुमच्या सगळ्यांच्या निषेधाच्या घोषणा वाचून गुदगुल्या झाल्या.
लेखमाला वाचत आहे.
लेखमाला वाचत आहे. एकंदर तुमचे लेख वाचून असं मत बनतय की जे.एन.यू. म्हणजे पृथ्वीवरील नंदनवन आहे की काय?
+१
वामनक्षलांसाठी तरी अगदीच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे खरोखरचं अभ्यासपूर्ण मत आहे
हे खरोखरचं अभ्यासपूर्ण मत आहे की उगीच टाकलेली अनावर पिंक? आत्तापर्यंतच्या चार्वी यांच्या लेखनातून तिथली परीक्षापद्धती कशी असते, स्त्रियांना कसं सुरक्षित वाटतं, राजकीय मतांना कशी मोकळीक आहे हे दिसलेलं आहे. त्यातून डाव्या विचारसरणीला पाठबळ या चांगल्या म्हणा, वाईट म्हणा मुद्द्यापलिकडे 'खरोखरच आपण इथे शिकायला हवं होतं' असं वाटण्यासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत.
हे खरोखरचं अभ्यासपूर्ण मत आहे
मताची पिंक आणि पिंकेचे मत कधी होते हे व्यक्तिसापेक्ष आहे.
माझा प्रतिसाद नीट पाहण्याचे कष्ट घेतले असतील तर "किमान डावे आणि नक्षली लोकांपुरते पाहिल्यास हेवन आहे" असा अर्थ होतो. याचा अर्थ बाकीच्यांकरिता नरक आहे किंवा कसे, हे ज्याचे त्याने ठरवावे.
आणि जे एन यू सारख्याच एका अग्रगण्य संस्थेत मी शिकलो असल्याने मला 'खरोखरच आपण इथे शिकायला हवं होतं' असं काही वाटत नाही. बीन देअर, सीन दॅट.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
+१. तुम्ही कितीही चांगल्या संस्थेत शिकलात म्हणून तुमच्यात सकारात्मक बदल होईलच असं काही नाही.
-Nile
+१
टंकनश्रम वाचवल्याबद्दल आभार.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पिंक म्हणजे कोणता रंग? लाल का गुलाबी?
चार्वीच्या आत्तापर्यंतच्या कोणत्या लेखातून वाम-नक्षलांना पाठिंबा, किमान त्यांचा उल्लेख झाला आहे, असं दिसत नाही. लेखनबाह्य तरीही संबंधित गोष्टींबद्दल मतप्रदर्शन करण्यात काहीच अडचण नाही, पण त्याबद्दल निदान लेखाच्या लांबीशी आणि प्रतीशी तुलना करता येईल इतपत विचार/मतप्रदर्शन अपेक्षित आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.