कविता किती लहान असावी?
लघुकविता हा माझा प्रांत नाही बहुधा. एक क्षण टिपणारं एखादं कडवं, काहीतरी छोटंसं मौलिक सांगणारी चांगली चारोळी, किंवा हायकू या प्रकारच्या कवितांचा कसा आस्वाद घ्यावा हे नीट कळत नाही. (हे विचार मनात आले ते धनंजयच्या शोधत-शोधत या कवितेमुळे)
कदाचित तो कवितेकडून असलेल्या माझ्या अपेक्षांचा परिणाम आहे. आत्तापर्यंत मी कविता म्हणून जे काही वाचलेलं, शिकलेलं असतं त्याचा परिणाम असेल. आपल्यापैकी बहुतेक सर्वांचीच कवितांशी तोंडओळख होते ती शाळेत. माझ्या बाबतीत तरी तसंच झालं. घरी अर्थातच आई, मावश्या यांच्या तोंडून त्यांनी पाठ केलेल्या कविता ऐकून होतोच. पण खऱ्या अर्थाने अभ्यास शाळेतच झाला. कवितेचं सौंदर्य कसं ओळखावं हे शाळेत जरी शिकलो नाही, तरी पाठ्यपुस्तकात बहुतेक सर्व कविता मान्यवर कवींच्या होत्या. त्यामुळे त्यावेळी जे संस्कार झाले त्यातले बरेच टिकून राहिले. कवितांची वेगवेगळी रूपं सादर करण्याचा पाठ्यपुस्तकांत प्रयत्न केलेला होता. पण सर्वच कवितांची रचना ही काही कडव्यांची होती. शाळेत ज्या कविता म्हणून शिकलो त्या जवळपास सर्व कविता एका उपमेचा कल्पनाविस्तार अशा स्वरूपाच्या होत्या. उदाहरणार्थ पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेत तर तो अत्यंत (काहीसा अतिरेकी) बारकाव्यांनिशी केला होता. निसर्गचित्र रेखाटणाऱ्या कविताही होत्या. अभंग होते, ओव्या होत्या, गज़ल होत्या, मुक्तछंद कविता होत्या. पण लघुकविता नव्हत्या. ज्या काही होत्या त्या उपदेशात्मक सुविचार या स्वरूपाच्या - बहुतेक संस्कृतमध्ये होत्या. पण ही सुविचारात्मक सूत्रंदेखील गजलेच्या शेरांप्रमाणे एकगठ्ठ्याने येत असत.
लघुकवितांमध्ये उपमा किंवा रूपकाचा विस्तार न करता एक अति त्रोटक अशी मांडणी केलेली असते. एखाद्या क्षणात दिसलेलं एक चित्र, मनात आलेली एक कल्पना, एका भावनेचा छोटासा आविष्कार... त्या वाचून नेहमीच काहीसं अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं. म्हणजे मोठ्या पुष्पगुच्छाच्या रचनेची अपेक्षा असताना एखादंच फूल मिळावं. मस्त पाणीपुरी हादडायला जावं, आणि फक्त एक खायला मिळावी. कदाचित पाणीपुरीच्या चवदारपणापायीच एकने समाधान होत नाही. भूक तर भागत नाहीच. पण निव्वळ वासनाफजिती होते. कवितेचा आस्वाद घेताना असं काही सहा कडव्यांची एक प्लेट असं गणित असतं का? आस्वादाचं नक्की एकक काय? गुच्छ, फूल की नुसतीच पाकळी?
असं म्हणता येईल की अशा लघुकविता म्हणजे वाचकाच्या मनाच्या पाण्यात टाकलेला एक छोटासा खडा, त्यामुळे उठणारे तरंग हे वाचकाचेच. तेव्हा त्या कवितेतून निघणारा अर्थ हा वाचकाच्या मनात अधिक असतो आणि कवितेत कमी असतो. पण पुन्हा किती छोटं आस्वाद-एकक पुरेसं आहे हा प्रश्न सुटत नाही. कारण हेच लघुत्व टोकाला नेलं तर 'वासनाफजिती' अशा एका शब्दाची पाकळीही अति-लघुकविता म्हणता येईल का? किती लहान कविता ही पुरेशी मोठी असते?
आकार
आकार
कवितेचा
आकार केवढा?
ज्याच्या-त्याच्या
मनाएवढा!*
मन
ज्याचे-त्याचे
समज, आकलन*...!
आकलन!
चर्चा वाचतो आहे
अश्याच प्रकारचा प्रश्न मुळ धाग्यावर विचारला आहे. कविता आनि कवितक यांत फरक कसा करावा?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
करण्यात काय हशील आहे?
फरक करण्यात काय हशील आहे?
काही हशील नसल्यास नवीन संकल्पना बनवणे टाळावे. (विश्लेषणात लाघव=सुटसुटीतपणा असावा.)
दुसर्या प्रकारे प्रश्न विचारतो :
तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारचा आस्वाद मिळतो, हे तुम्हाला मनापासून जाणवते आहे. ही गोष्ट येतील अन्य प्रतिसादकांना तुम्हाला सांगायची आहे. त्याकरिता तुम्ही सध्या "कविता" आणि "कवितक" अशी दोन नावे योजली आहे. पुढच्या वेळी एखादी रचना वाचताना आस्वादप्रकार क्रमांक १ प्राप्त झाला, तर त्याचे वर्णन तुम्ही "कविता" म्हणाल आणि क्रमांक २ प्राप्त झाला, तर त्याचे वर्णन तुम्ही "कवितक" म्हणाल. यामुळे वेळ वाचेल, हे हशील आहे.
परंतु सध्या तरी हे जे दोन प्रकारचे आस्वादानुभव येतात ते तुम्ही वर्णन करून सांगायचे आहे. ते वर्णन तुम्ही करून सांगितले, तर वाचक कदाचित म्हणतील - होय! आम्हालाही अशा दोन वेगवेगळ्या प्रकारचे आस्वाद मिळतात! दोन प्रकारांकरिता दोन नावे असली, तर चर्चेत वेळ वाचेल... मग तुमच्या सुरुवातीच्या वर्णनाला अन्य वाचक त्यांच्या अनुभवातून समृद्ध करतील. या चर्चेत मग या दोन संकल्पनांची व्याख्या तयार होईल.
पण या क्षणी मला तरी दोन वेगळ्या प्रकारचे आस्वादानुभव येत नाहीत. त्यामुळे व्याख्या कसली करावी हे कळतच नाही. पण अन्य लोकांना (तुम्हाला) दोन वेगवेगळ्या प्रकारचे आस्वाद मिळत असावे या बाबीचे मोठेच कुतूहल वाटते. म्हणून ही विनंती - काही उदाहरणे देता का? म्हणजे तुम्हाला "कविता" म्हणायची, आणि "कवितक" म्हणायचे त्याचे एक-एक उदाहरण द्या. कथाविषय किंवा भावनाविषय यांच्यात साम्य असले, तर उत्तम. आणि त्यात तुम्हाला काय वेगळा अनुभव आला, हे रेखाटा.
(उदाहरणार्थ माझी कविता "गुरफटलेली आसवे" आणि गुलझार याची "मेरा कुछ सामान" या कवितांच्या विषयात साम्य आहे, असा आस्वाद राजेश घासकडवी यांनी दिलेला आहे. [मला हे तितकेसे पटन नाही, पण] समजा तुम्हालाही तसे वाटते. मग ती दोन उदाहरणे घेऊन तुमचे दोन आस्वादानुभव वर्णन करून सांगा. त्यावरून मग अन्य लोक भर घालतील. मग "कविता" आणि "कवितक" हे नाविन्यपूर्ण वर्गीकरण उपयोगी असल्याचे हळूहळू पटू लागेल. न-पटल्यास मात्र असे कुठले वर्गीकरण टाळावे.)
कवितेचे वर्गीकरण केवळ
कवितेचे वर्गीकरण केवळ आस्वादापुरते मर्यादित नसावे. कवितेचे वर्णन करताना सुद्धा ते उपयोगी पडते. खंडकाव्य, दीर्घकाव्य वगैरे 'लांबीवरून' केले गेलेले वर्गीकरण सर्वत्र रुढ आहे. तेव्हा लांबीवरून वर्गीकरण करता येत नाही असे नाही (अर्थात तुमचे श्री. धनंजय यांचे तसे म्हणणे असल्याचा उल्लेख वर नाही मात्र ही चर्चा लांबीवरून आहे म्हणून हा मुद्दा उल्लेखला आहे)
छोट्या कवितांचे अनेक प्रकार आपण बघतो . त्यातील अनेकांना विविध नावे आहेत. जसे हायकू, त्रिवेण्या, दोहे, मिताक्षरी अभंग, चारोळ्या. खरंतर याही सार्या कविता. या सार्यांमधे काहि साम्य असेल तर कमीत कमी शब्दांतून जास्तीत जास्त आशय पोहोचवण्याचा कवीचा मानस आणि प्रयत्न असतो. यातील अनेकांना अंगभुत लय असते मात्र छंद, वृत्त वगैरे असतीलच असे बंधन नाही (खरंतर लयीचेही बंधन नाही). या रूढ प्रकारांमधे न बसणारी मात्र तरीहि कमीत कमी, परंतु नेमक्या परिणामकारक शब्दांत आशय/कथा/संदेसह पोहोचवण्याचा प्रयत्न करणारी 'शोधत शोधत' ही व अश्यासारखी कविता सादर होते. अर्थातच ही कविता आहे. मात्र समोरच्याला वर्णन करून सांगताना "ती मिताक्षरी कविता आहे मात्र कमीत कमी शब्दांतून अंगभुत कथा इतक्या परिणामकारकपणे आणि नेमक्या शब्दांतून सांगते" इतके बोलण्यापेक्षा "हे छान कवितक आहे" इतके बोलणे सोपे वाटते.
बर्याचदा (बहुतांशवेळा) मोठ्या कवितेपेक्षा एखादे कवितक अतिशय अधिक परिणाम करते. शिवाय कवितकामधे वाचकांच्या आकलनक्षमतेला, विचारांना, गृहितकांना, 'अन्सेड गोष्टींना' थोडक्यात मनाजोगत्या रसग्रहणाला अधिक वाव असतो. कवितांच्या अनेक प्रकारांअमधे जे काहि म्हणायचंय ते बरेचसे थेट मांडलेले असते. कवितकातील तो शोध अधिक आनंददायी वाततो. कवितक हे कवितेपेक्षा फार वेगळं नाही पात्र तिचाच एक स्वायत्त असा सबसेट - वर्गीकरण आहे असे मला वाटते. (रुढ मिताक्षरी कविता या सबसेट मधे याव्यात) हे अपुर्ण वाटल्यास सारख्या आशयाची कविता व कवितक शोधायचा प्रयत्न करतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चांगली चर्चा, एक टिप्पणी
चांगले मुद्दे आहेत.
एक टिप्पणी : महाकाव्य आणि खंडकाव्य या नावांत (रूढीप्रमाणे) रचनेच्या लांबीचा थेट संबंध नाही. काव्यविषयाचा आवाका अपेक्षित आहे. महाकाव्यात एखाद्या विभूतीच्या किंवा कुलाच्या/राष्ट्राच्या जीवनाचे सर्व अंगांनी वर्णन असते, आणि खंडकाव्यात काही मर्यादित अंगांचे वर्णन असते. (रघुवंश महाकाव्य आहे, आणि मेघदूत खंडकाव्य आहे : असे म्हणताना त्या रचनांची लांबी कळत नाही, पण विषयाचा विस्तार कळतो.) म्हणजे एखाद्या कवीचे खंडकाव्य दुसर्या एखाद्या कवीच्या महाकाव्यापेक्षा लांबीने मोठे असू शकते. (इंग्रजीतल्या "नॉव्हेल" आणि "शॉर्ट स्टोरी" यांच्यात असाच काही विषयाच्या आवाक्याचा फरक आहे. लांबीचा नाही.)
!
!
कवितेचा आकार
कविता किती लहान असावी?
शक्य तितकी!:)
कवितेतला आशय आणि तिचा आकार यांचा फारसा संबंध नाही....
उदा.
कवितेचे नांवः वासनाफजिती
"अगं एऽऽऽ"
"इऽऽश्य!"
"उऽऽप्स!"
"शी! मेलं नेहमीचंच!!!!"
Performance Art
Reader-response criticism मधून अालेली एक भूमिका अशी की गायन, नाच यांसारखीच वाचन ही एक performance art अाहे (पण एकान्तात करण्याची §). जर मूळ कविता (तिचं text या अर्थाने) फार लहान वाटली, तर तुमच्या मनातल्या इतर कविता, इतर प्रतिमा, इतर कल्पना यांची 'भर' घालून ती तुम्ही वाढवू शकता, मूळ text मधले न रुचणारे भाग काढून टाकू शकता, किंवा थोडक्यात तुमच्या अभिरुचीला अनुसरून काहीही करू शकता. वाचक हे जे काही करतो तो (निदान त्याच्या स्वत:साठी) त्या कवितेच्या 'अर्था'चाच भाग अाहे. मूळ text किती अाहे याला फार महत्त्व नाही.
जर कविता खूप मोठी असेल तर लोक अापसूक हे करतातच. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरी, Paradise Lost, Divina Comedia या मोठ्या कविता अाहेत, पण अनेकांना त्यातले काही ठराविक भागच अावडतात, तेच भाग त्यांच्या डोक्यात घर करून राहतात अाणि इतर भरताड ते विसरून जातात. मूळ प्रश्न जर फिरवला (किती मोठी कविता पुरेशी लहान असते?) तर त्याला काही उत्तर नाही हे स्पष्ट होतं, कारण मोठी कविता मनाने हवी तशी लहान करता येते. मग लहान कविता मोठी का करू नये?
मी वर 'एकान्तात' या शब्दाच्या इथे § अशी खूण केली तेव्हा एकान्तात करण्याच्या इतर performance arts वाचकाला अाठवाव्यात अशी माझी अपेक्षा होती. पण वाचणाऱ्याच्या मनात प्रत्यक्षात काय येईल यावर माझं काय नियंत्रण अाहे? अाणि का असावं?
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
थोडी असहमती...
हे आवडलं. वाचन ही परफॉर्मिंग आर्ट असली तरी तिच्यासाठी आवश्यक असलेल्या प्लॅटफॉर्मला काही विशिष्ट लांबी-रुंदी हवी. हे माझं मत आहे. इतरांचं मत काय आहे हे समजून घेण्यासाठीच हा चर्चाप्रस्ताव.
लहान आणि मोठं करण्याच्या ऑपरेशन्समध्ये रिफ्लेक्टिव्ह सिमेट्री नाही. भरपूर अन्न असेल तर ते कमी करून आपल्याला हवं तेवढंच खाता येतं. कमी अन्न समोर असेल तर आपल्याला ते वाढवून भूक भागवता येत नाही. कवितेचा अर्थ खचितच अन्नासारखा सान्त नसतो. मनात घोळवत बसलं तर जाणवणारा अर्थ कमी जास्त होऊ शकतो हे खरं आहे. तरीही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत किती लहान म्हणजे पुरेशी मोठी असा प्रश्न विचारता येतो. मी एक शब्दाच्या कवितेचं उदाहरण दिलं. त्याहीपुढे जाऊन समजा फक्त एक काना कविता म्हणून सादर केला तर? किंवा कान्यातलाही अर्धा भाग पुसून तो सादर केला.... हा थोडा अतिरेक आहे हे मान्य आहे, पण तरी प्रश्न असा आहे, की कुठच्या आकाराला बहुतांश गंभीर वाचकासाठी कविता ही कविता असणं थांबतं?
थोडी असहमती
जयदीप यांचा प्रतिसाद आवडला आणि पटला.
फक्त आकाराचा विचार करण्यापेक्षा त्यात अर्थ आहे का याचाही विचार व्हावा. धनंजयच्या कवितेमधे अर्थ आहे, तो अर्थ आवडला त्यामुळे कविता अल्पाक्षरी असणं खटकलं नाही. अल्पाक्षरी आहे म्हणून कविता किंवा प्रकटन चांगलं असेलच असं म्हणवत नाही. पण जयदीप यांनी दिलेली उदाहरणं, लांबण लावली असेल तर वाचक आपणहून संपादन करतो, असं होतं. वाचकाचं हे काम धनंजयच्या कवितेततरी टळतं.
पण पिडाकाकांचा प्रतिसाद सगळ्यात जास्त आवडला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मिताक्षर कवितांची परंपरा
मिताक्षर कवितांची परंपरा असावी लागते, हे खरे आहे. पण कित्येक भाषांत असते. मराठीत मिताक्षर कवितांचा महत्त्वाचा रचयिता म्हणजे संत तुकाराम. त्याच्या दोन रचना घेऊया :
दोन्ही कवितांत विलक्षण आणि नाविन्यपूर्ण उपमा किंवा रूपक आहे. आणि जितके विस्ताराने (म्हणजे मिताक्षरात) सांगायचे तितके विस्ताराने सांगितले आहे.
हिंदीमध्ये कबीराचे दोहे पुष्कळदा सुटे आणि स्वयंपूर्ण असतात.
यात रूपक जितक्या विस्ताराने कबिराला सांगायचे होते, त्याने सांगितले.
तुकारामाच्या किंवा कबिराच्या वरील कवितांत श्रोत्या-वाचकाने खूपसा अर्थ भरायचा असतो. बराचसा अर्थ आपल्या सामायिक संस्कृतीमधून येतो. ज्या संस्कृतीत "माटी कुम्हारको कैसे रौंद सकती है" या विषयी काही पूर्वकल्पनाच नसते, त्या ठिकाणी उपमा अपुरी पडते. पण ज्या संस्कृतीत श्रोता त्या चित्रात अर्थ भरू शकतो, त्या संस्कृतीत आणखी थोडासुद्दा विस्तार करणे म्हणजे दोह्याचा विचका करणे होय. श्रोत्याने भरपूर अर्थ आपल्या अनुभवातून आणला, म्हणजे कबिराने फारसे योगदान दिले नाही, अशी तक्रार करता येईल का? मला वाटते की कबिराने श्रोत्याच्या मनात येणार त्या विचारांना खूप म्हणजे खूपच आकार दिलेला आहे. या कबीर-श्रोता संवादात अर्थ काय असणार आहे, त्यात कबिराचा वाटा >>५०% आहे, असा माझा वैयक्तिक अंदाज आहे.
या प्रतिभावंत कवींच्या माळेत निव्वळ कौशल्यच असलेल्या (तितकी प्रतिभा नसलेल्या) कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे नावही आता घेतो. ते अशाकरिता : एका कडव्याच्या स्वयंपूर्ण कविता रचणे संतकाळात बंद पडले, असे नव्हे, तर अव्वल इंग्रजी काळात चालूच होते.
- - -
शाळांच्या अभ्यासक्रमातील कविता काही ठराविक लांबीच्या असतात. हे खरे आहे. धड्याकरिता एका तासात शिकवता यावी अशी लांबी असावी. कारण दीर्घकवितांचा पुष्कळदा तितपत भाग पाडलेला दिसतो. उदाहरणार्थ, माझ्या पाठ्यपुस्तकात थोडेच वेचलेले मनाचे श्लोक होते. उलटपक्षी कबिराचे अनेक दोहे एका धड्यात दिलेले होते. परंतुपरंपरेत ते विवक्षित दोहे एकत्रित माळण्याची पद्धतही नसते. कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या "अन्योक्ती" मात्र पाठ्यपुस्तकांत एक-एकच देण्याची प्रथा होती, हा अपवाद मात्र नमूद केला पाहिजे.
परंतु यापुढे पाठ्यपुस्तकातील प्रथा काय याबाबत पुढे काही लिहीत नाही. कारण तो आस्वादचर्चेतला मुद्दा नसून शिक्षणशास्त्रातला मुद्दा आहे.
- - -
"छोटासा" हे कधीकधी, क्वचित, खरे असले, तरी... बहुतेक वेळा मिताक्षरी चित्र, मिताक्षरी कल्पना, आणि मिताक्षरी भावनाविष्कार हा काहीतरी वैश्विक, भव्यदिव्य किंवा जीवनसार वगैरे देते, अशी मिताक्षरी कवीची महत्त्वाकांक्षा असते. सर्व कवींसारखी. "क्वचित" ऐवजी "पुष्कळदा" आशय छोटासा वाटत असेल तर काहीतरी अपूर्ण राहिल्याची भावना योग्यच आहे. एक तर रसिकाला कवीचे म्हणणे नीट समजलेले नाही, किंवा कवीची महत्त्वाकांक्षा फसलेली आहे. (मिताक्षरी कवी हा यशस्वी, कुशल, किंवा प्रतिभावान असला पाहिजे असा नियम नसतो. ज्या प्रमाणात सर्व कवी थिटे असतात, त्याच प्रमाणात मिताक्षरी कवीही थिटे असतात.)
जर "अति"त्रोटक असेल तर कवी फक्त वैचित्र्यच साधतो. मात्र रचल्या तितक्या शब्दांत आपल्याला हवे ते सगळे सांगितले, असा कवीचा दृढविश्वास असला, तर कविता "अति"त्रोटक नसते. अगदी-हव्या-तितक्या-लांबीची असते.
- - -
कदाचित पेढ्याची उपमा मनात आणावी. एकच पेढा खाऊन तितका आस्वाद परिपूर्ण मानायची प्रथा आहे. (निकृष्ट पेढा फसतो, पण जेव्हा पेढा नावडतो, तेव्हा चव बिघडल्यामुळे, लाडूपेक्षा लहान असल्यामुळे नाही.) मात्र वासनाफजिती जर होत असेल तर एक आश्चर्य वाटते : कविता लहान आहे, हे डोळ्यांना स्पष्ट दिसते. कवी "ही पाणीपुरी-प्लेट नाही, तर पेढा आहे" अशी जाहिरात करत असतो. कविता आशयसंपृक्त आहे, त्यामुळे आस्वाद तोंडात घोळवूनच खूप वेळ टिकणार आहे, ही जाहिरात (बढाई म्हणा) कवीने डोळ्यांना दिलेलीच असते. त्यामुळे येथे ट्रूथ-इन-अॅडव्हर्टाइझमेंट आहे. त्यामुळे जर "आशय तोंडात घोळवावा इतका संपृक्त नव्हता" अशी तक्रार असेल, तरच ती वासनाफजिती म्हणता येईल.
- - -
यांच्यापैकी कुठलेच नाही. एकसंधता आणि गोटीबंदपणा हे निष्कर्ष वापरून एकक ठरते. गुच्छाची, फुलाची आणि पाकळीची चित्रे (चित्रकाराचा मनसुबा असेल तर) परिपूर्ण असू शकतात. पण जर चित्रकाराने गुच्छाचे चित्र काढले असेल, तर त्यातील पाकळीचा भाग आस्वादासाठी अपूर्ण असतो. आणि जर पूर्ण चित्र पाकळीचेच काढले असेल, तर ते आस्वादाचे एकक होय.
- - -
आस्वादानुभव हा कवीच्या आणि आस्वादकाच्या सहयोगाने होत असतो. (आणि दोघांची सामायिक संस्कृतीही त्यात येते.) त्यामुळे पहिले अधोरेखित ठीक नाही. दुसरे अधोरेखित पुन्हा वर दिलेल्या कबिराच्या दोह्याला लावून बघा. सामायिक संस्कृतीचे कुठले तरंग कुठल्या नाविन्यपूर्ण पद्धतीने श्रोत्याच्या मनाच्या पाण्यात उमटावे? माझ्या मते जो काही आस्वादानुभव होतो त्यात कबिराचे योगदान >>५०% आहे. मात्र संस्कृती नाहिशी होईल, किंवा श्रोता तयारीचा नसेल, तर >>५०% योगदान देऊनही मनावर फारसे तरंग उमटणार नाहीत.
- - -
एका शब्दाच्या कविता :
बहुधा जमणार नाहीत. असे वाटण्याकरिता माझा एक आधार व्याकरणातला आहे. बहुतेक वेळा प्रत्येक शब्द हा जवळ-जवळ पूर्णपणे सामायिक संस्कृतीतला असतो. (पुष्कळदा वक्ता आणि श्रोता दोघांना शब्दकोशातला अर्थ पुरेसा वाटतो.) मात्र वक्ता शब्दांची काँबिनेशने करून, या सामायिक संस्कृतीचा आधार घेऊन श्रोत्याला काही नवीन सांगतो. उदाहरणार्थ पुढील शब्दांचे अर्थ वक्ता-श्रोत्यांना नवीन वाटणारे नसतील :
आहे : "असणे" शब्दाचे रूप
कप : एका प्रकारचे पात्र
कलंडून : उभ्या स्थितीतून वाकडे हॉऊन
चहा : एक पेय, पीत नसताना एक द्रव
मांडीवर : शरिराचा एक भाग, त्याच्या ऊर्ध्व बाजूला
सांडणार : द्रव किंवा सदृश पदार्थ वरून खाली ओघळणे, भविष्यातली घटना
यातील कुठलाही एकच शब्द उच्चारला, तर संस्कृतीचा आधार घेऊनही श्रोत्याला काही नवीन संदेश कळत नाही.
परंतु जेव्हा वक्ता श्रोत्याला म्हणतो : "कप कलंडून चहा मांडीवर सांडणार आहे", तेव्हासुद्धा शब्दांचा अर्थ आणि अन्वय लावण्यासाठी श्रोत्याला सामायिक संस्कृतीचा आधार घ्यावाच लागतो. पण वक्त्याचा सामायिक संस्कृतीच्या पलीकडे काही नवीन अभिप्राय असतो, तोदेखील श्रोत्याला कळतो.
म्हणून श्रोत्याला-वाचकाला काही नवीन आस्वादानुभव करून देणारी कविता ही बहुधा एका शब्दापेक्षा लांब असेल. (येथे फक्त शाब्द-कविता आहे, असे मानले आहे. चित्र किंवा सुलेखनाच्या कलाकृतीत, किंवा गीतामध्ये एक शब्दही कलाकाराला पुरेसा वाटू शकेल.)
तरी या बाबतीतही मी पूर्णपणे ठाम नाही. मराठीत एका शब्दाची काही वाक्ये पूर्ण वाक्ये असतात. (म्हणजे पूर्ण-पूर्ण, संदर्भ-पूर्ण नव्हे.) उदाहरणार्थ : "उजाडले." शिवाय मराठीत काही नवीन शब्द कवीने तयार केले, ते कोशात नसले, तरी मराठमोळेपणामुळे काहीतरी आशय ध्यानात येतो. तेव्हा अशी कुठलीशी एका शब्दाची कविता मराठीत शक्य आहे. पण मला हे फारसे संभवनीय वाटत नाही.
- - -
मग किमान लांबी काय आहे? कवीला "आशय सांगायचा त्या पद्धतीने पूर्ण सांगितला" असे वाटेल तितकी लहान चालेल. (मोठीही चालेल, हे सांगणे नलगे. म्हणजे कवीच्या मते राईट-साइझ हवी.)
जर रा.घा. यांना वाटले, की "वासनाफजिती" हा शब्द परिपूर्ण-एकसंध-गोटीबंद संदेश देतो, तर त्याला ते कविता म्हणून प्रकाशित करू शकतात. "परिपूर्ण-एकसंध-गोटीबंद संदेश आहे" हा आत्मविश्वास दृढ कसा होईल? कविता रचता-रचता ते तिला मनात खूप वेळ घोळवतील. जो काय संपृक्त आशय त्यांना सांगायचा आहे, तो सामायिक संस्कृतीच्या आधाराने त्या एका शब्दात परिपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि स्वत्ववान आहे, याबाबत त्यांची खात्री होईल. कारण (जर आशयास पुरेसा शब्द असेल तर) एकही भरतीचा शब्द घातल्याबरोबर त्यांच्या मनातल्या मूळ आशयाला मर्यादा पडतील - ते भरतीचा शब्द रचनेतून लगेच खोडतील.
काही आस्वादकांना त्याचा आस्वाद घेता येणार नाही, किंवा जो आस्वाद मिळतो, तो काही आस्वादकांना आवडणार नाही. ते आस्वादक तक्रारही करतील. रा. घा. यांचा आत्मविश्वास दृढ असेल, तर ते बधणार नाहीत.
थोडं पटलं, थोडं नाही...
तुम्ही मांडलेले दोन मुख्य मुद्दे संक्षेपात पुन्हा मांडतो.
१. मिताक्षरी रचनांकडे पाणीपुरीच्या उपमेऐवजी पेढ्याच्या उपमेतून बघावं.
हे पटण्यासारखं आहे. पण हेच भुकेचं आणि खाद्यपदार्थाचं रूपक पुढे थोडं ताणून बघू. भुका या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही वेळा भूक नाही पण निव्वळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाल्लं जातं. पेढा हा भुकेसाठी नाही, तर त्या गोड, स्निग्ध चवीच्या आस्वादासाठीच खायचा असतो. पाणीपुरी हीदेखील तशी भूक भागवण्यापेक्षा काहीतरी चमचमीत खाल्ल्याचा आनंद अधिक असतो. पण एका पेढ्याची एका पाणीपुरीशी तुलना करणं योग्य नाही. कारण आपल्या अपेक्षा वेगळ्या असतात. आणि माझा मूळ मुद्दा अपुरेपणाचा होता. तेव्हा कदाचित पेढा वापरून पाव पेढ्याचं उदाहरण देता आलं असतं.
२. बहुतेक यशस्वी किंवा प्रसिद्ध मिताक्षरी रचनांमध्ये त्या रूपकाच्या मांडणीसाठी आवश्यक तितकीच अक्षरं वापरलेली असतात.
इथे पुन्हा तुम्ही घनतेचा मुद्दा मांडत आहात, तर मी एकंदरीत वस्तुमानाची कल्पना मांडतो आहे. कविता हा मुळातच एक आशयघन वाङमयप्रकार आहे. पण या घनतेला काही मर्यादा आहेत हे तुम्हीही मान्य करत आहात. माझा मुद्दा असा आहे की घनतेबरोबरच व्याप्तीलाही महत्त्व आहे. बाकी एकच संकल्पना कमीत कमी शब्दांतच मांडल्याने यशस्वी होते हे पटत नाही. कबीराच्या दोह्यापेक्षाही विंदांची 'माती' ही त्याच अर्थाची कविता अधिक शक्तीशाली आहे असं माझं मत आहे. 'गणपत वाणी' चा आशय दोन वाक्यांत सांगता येईल खरा, पण त्या शब्दचित्राच्या आवाक्यामुळे परिणाम वाढतो.
पुन्हा खाण्याचं उदाहरण द्यायचं झालं तर गिर्यारोहण करताना खाद्य काय बरोबर घ्यावं असा प्रश्न असतो. केवळ वजनाचाच विचार केला तर कॅलरींनी परिप्लृत असं तूप, लोणी किंवा फारतर चॉकोलेटच न्यावं. पेढेही चालावेत. पण त्याने खाल्ल्याचं समाधान मिळत नाही. त्यामुळे काहीतरी चावून खाण्यायोग्य एनर्जी बार्स वगैरेही घेतले जातात.
तिसरा एक मुद्दा, जो तुम्ही पूर्णपणे न मांडता निर्देशित केला आहे तो म्हणजे 'अर्थ हा काव्यात असतो तसाच त्याच्याशी निगडित समाजाच्या जाणीवेत, सांस्कृतिक जडणघडणीतही असतो'. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 'ग्योडेल, एश्चर, बाख' मध्ये डग्लस हॉफस्टॅडरनेही याप्रकारची चिह्न व त्यातून अर्थ 'काढणारी' व्यवस्था (सिस्टिम) यामध्ये भेद केलेला आहे. माझा मुद्दा त्या चौकटीत मांडायचा झाला तर पुरेशा सर्वसाधारण व वैविध्यपूर्ण व्यवस्थेसाठी (मनुष्यांसाठी), पुरेसा क्लिष्ट अर्थसमुच्चय (काव्यानुभव) येण्यासाठी एक विशिष्ट मर्यादा पडते. ही मर्यादा संदेशाच्या, चिह्नांच्या लांबीवर पडते.
काही गोष्टी पुन्हा, काही नव्या
काही गोष्टी पुन्हा वेगळ्या सांगण्याऐवजी वरील प्रतिसादातील मुद्द्यांकडे निर्देश करतो :
वरील प्रतिसादात :
तुमच्या "पाव पेढा" नव्या रूपकात "पाव" हा शब्द कळीचा आहे. तुम्ही "छोटा पेढा" म्हणाला नाहीत. "पाव पेढा" म्हणालात. हलवायाला जे आस्वादाचे एकक वाटले, त्याचा अंशच आहे. अशाच प्रकारे एक लाख कडव्यांच्या महाभारताचा पाव भाग घेतला - २५००० कडवी - तर समाधान होणार नाही. ते एकक मोडल्यामुळे.
आणि :
वरील प्रतिसादात :
होय. तैलचित्र अनुभवायची अपेक्षा असेल, तर शिल्प बघून ती शांत होत नाही. पण ही शिल्पाची त्रुटी नाही.
आणि :
वरील प्रतिसादात :
(जे पटवायचा प्रयत्नच नाही, ते पटले नाही, हे उत्तम.)
- - -
आता नवीन मुद्दे :
आस्वादक आपल्या अनुभवातील कवितांमध्ये तुलना करतो. हे ठीकच आहे. विंदांची "माती" माझ्या ओळखीची नाही.
आणि :
व्याप्तीलाच महत्त्व आहे. कवीला जे काही सांगायचे आहे, त्याची व्याप्ती कवितेत मावली पाहिजे. घनतेचा मुद्दा एवढ्याकरिता : जर कवीला-सांगायचे ते थोडक्या शब्दात मावले, तर घनता खूप असते.
आणि :
असहमत. (त्यामुळे वाक्याच्या उत्तरार्ध नि:संदर्भ.)
आता मर्ढेकरांचा विषय निघाला आहे, तर मर्ढेकरांच्या दोन मिताक्षर कवितांची उदाहरणे घेऊ :
तुझ्याच आलों डोळ्यांदेखत;
असाच पडलों येथे खितपत;
जन्माचें जें माझें घेणें,
वसूल होइल केव्हा, कितपत!
आता मर्ढेकरांना ज्या पद्धतीने जे सांगायचे होते, ते परिपूर्णरीत्या सांगून झाले, असा माझा कयास आहे. वाढवायचे असते तर त्यांचा लिहिता हात कोण थांबवत होते? - कोणीच नाही. मुद्रकानेही मुद्रण नीट केल्यामुळे आपल्याला वाचायच्या आधीच कळते की कवितेची पूर्ण मुद्रित लांबी किती आहे. (ट्रूथ इन अॅडव्हर्टाइझमेंट.) आणि कविता वाचून झाल्यावर अंतर्गत परिपूर्णता जाणवते.
आणखी एक उदाहरण :
चंद्रकिरणांनो, तुम्हां
वाजते का कधी थंडी
स्वतःची? मध्यरात्रीं
हिवाळ्यांत हुडहुडी!
लांबवलें मरणाला;
गारठून जाल जेव्हा --
चिता हवी शेगोटीला.
इथेसुद्धा कवीला जे काय सांगायचे, आणि ज्या पद्धतीने सांगायचे होते, ते स्वयंपूर्ण-गोटीबंद एकक आहे. हा आशय कमी शब्दांत सांगितला असता, तर जमले नसते. आणि अधिक शब्दांची गरज नव्हती. वर्णन थोडेही अधिक असते, तर त्यामुळे वाचकाच्या मनातील पडसादांना जी मर्यादा पडली असती, ती मर्ढेकरांना बहुधा नको होती. आशयाची व्याप्ती वाढत नाही, तर कमी होते. (जर अधिक कुठलातरी वर्णनात्मक, उपमा-स्पष्टीकरणात्मक तपशील वाचकाला समजल्याशिवाय आशय अपुरा आहे, असे मर्ढेकरांना वाटत असते, तर त्यांनी आणखी कडवी लिहिली असती.)
"कांही कविता" संग्रहाच्या प्रास्ताविकात बालकवींनी म्हटले आहे :
मर्ढेकरांना हुकुमत होती, आणि लयही तोंडवळणी होती. त्यामुळे कवितेत किती शब्द/ओळी आहेत, याची मर्यादा "जमत नाही" म्हणून पडत नसावीच. केवळ रचनावैचित्र्य म्हणून वरील कविता लहान लिहिली ("इरेस पडलो जर बच्चंजी") असे वाटत नाही. कारण "इरेस पडलो जर" कवितेत त्यांनी केवळ वैचित्र्यासाठी मुक्तछंद लिहिणे हास्यास्पद मानलेले आहे. ... बालकवी प्रस्तावनेत पुढे म्हणतात :
मर्ढेकरांच्या वरील कवितांबाबत तुम्ही काय ठरवाल? त्यापलीकडे काही आहे काय?
- - -
(मर्ढेकरांची कविता तुम्हाला विशेष आवडते, आणि त्यांच्या कवित्वाच्या प्रभुत्वाबाबत तुम्हाला खात्री आहे, असे आपल्या आदल्या चर्चांवरून माहीत आहे. म्हणून मुद्दामून मर्ढेकरांची उदाहरणे घेतली आहेत. जीवनाबाबत असा काही दृष्टिकोन असलेल्या मर्ढेकरांचा थोड्या लांब कविताही तुमच्या ओळखीच्या आहेत. वाटल्यास कोणी म्हणेल की "गणपत वाणी" कवितेत खितपत पडून मरणार्याचे वर्णन आहे. वरील चार ओळीच्या "तुझ्याच आलों" कवितेची तुलना त्या कवितेशी करता येईल का? वगैरे.)
वासनाफजिती हा नवीन शब्द ठीक
वासनाफजिती हा नवीन शब्द ठीक वाटला.
मला अजूनही "भूक चाळवणे", "अवसानघात होणे" आदि जुने शब्द आवडतील.
________________
>> हायकू या प्रकारच्या कवितांचा कसा आस्वाद घ्यावा हे नीट कळत नाही. >>
मनी अँड माईंड्फुलनेस या पुस्तकात दिल्याप्रमाणे - हायकू ही जपानच्या झेन बुद्धिझम ने जगाला दिलेली देणगी असून, या कविता म्हणजे कवीच्या विश्वातील एखादाच निसटता क्षण आत्यंतिक बारकाव्याने टिपून सादर करण्याची कला होय. Each haiku is pure snapshot of what is happening.
कवितेला लहान/ लघु पेक्षा
कवितेला लहान/ लघु पेक्षा मिताक्षरी म्हणणे योग्य वाटले.
धनंजय यांच्या सामायिक संस्कृतीच्या मुद्याशी सहमत.
गजलेचा एक शेरही वेगळी आणि परीपूर्ण कविता होऊ शकतो.
मिताक्षरी चित्र( वाचायला गम्मत वाटली !)असते,पण मिताक्षरी असल्यामुळे चित्राचा आस्वाद अपुरा/ अर्धवट राहिला असे होत नाही. मिताक्षरी कल्पना अनेकदा जास्त प्रभावी ठरतात ( आपण अश्या जाहिराती बघतोच).
माझ्या मते भावना विष्कार जेवढा इन्टेन्स ( ? मराठी शब्द) तेवढा मिताक्षरी .. तेवढा स्फोटक असतो.
पाणीपुरीचा मुद्दा पटला नाही. Law of diminishing returns प्रमाणे लांब कवितांचा आस्वाद कमी होतो माझ्यासाठी कधीकधी. ( यात परत परत वाचण्याचा आणि परत आस्वाद घेण्याचा अनुभव गृहीत धरलेला नाही दोन वेगळ्यादिवशी पाणीपुरी खाण्याप्रमाणे))
ईंग्रजी काव्यात लिमरिक नावाचा मिताक्षरी कवितेचा प्रकार आहे. त्यात कविता ठराविक लांबीची असते, तिला लय असते, आशय महत्वाचा असू/नसू शकतो पण मांडणी सहसा विनोदी असते. असेच एक प्रसिध्ह लिमरिक येथे देत आहे ( माझे नाही, कॉपी राइट नसावी कारण खूप जुने आहे आणि जालावर सहज उपलब्ध आहे)
There was a young Lady of Niger
Who smiled as she went for a ride on the back of of a tiger
They returned from the ride
With the Lady inside
And a smile on the face of the tiger
मुद्दा असा की कवितेच्या केवळ लघुतेशी कवितेच्या आस्वादाचा संबंध आहे असे मला वाटत नाही.
कविता एवढी सुद्धा असू शकते.
अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला
आकाराच्या नियमांच्या चौकटीत
बांधू पाहण्याचा
निषेध....निषेध...निषेध
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
चला! या निमित्ताने नितिनही
चला! या निमित्ताने नितिनही कविता लिहायला लागला ... आणि पहिलीच रचना जहाल आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा हा हा
प्रतिसादातला पहिला भाग खरा नाही.
दुसरा खरा आहे.
असो. या निमित्ताने कवितेवरची बरीच चर्चा वाचायला मिळाली.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नव्या कवीचे स्वागत :)
थत्तेचाचा आगे बढो!
हम तुम्हार पिछे है!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लुटारू ?
थत्तेंना लुटारू* का म्हणतात? म्हणजे तुम्हीच एकटे म्हणताय असं मला अजिबात म्हणायचं नाही. अनेक जण म्हणतात, पण का ते काही कळलं नाही. कृपया खुलासा करावा.
*चाचा - समुद्री लुटारू.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
हॅ हॅ हॅ.. ते लेखनातुन
हॅ हॅ हॅ.. ते लेखनातुन बरोब्बर नेमके मर्म लुटून नेतात. म्हणून लुटारू
त्यांनी असं मर्मावर बोट ठेवल्यावर (पक्षी: लुटून नेल्यावर) अनेक लेखकरावांची पंचाईत होते ती वेगळीच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चेतन्+ऋ ... चालू द्या.
चेतन्+ऋ ... चालू द्या.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
रेड व्हीलबॅरो
कविता अल्पाक्षरी असो वा पसरट, मुळात कवीला जे सांगावयाचे आहे ते 'सर्वोत्तम शक्य' पध्दतीने व्यक्त होणे आवश्यक असते.
कवितेतला विचार तिचे रूप ठरवत असावा असे मला वाटते. हाऊल किंवा वेस्टलॅन्ड सारख्या कवितांचा वर्ण्य विषय खूपच व्यापक असल्याने या कविताही दीर्घ स्वरूपात आल्या आहेत.
वर विवेचनात जुन्या मराठी कवितांचा उल्लेख आला आहे.काही नवीन उदाहरणेदेखील बघता येतील. कवी सांजेय यांची ही कविता मागे वाचनात आली :
ना
पैशाने...
ना
उसनवारीने...
मी तुझ्याकडे कधीचा...
मला परत कर.....
- सान्जेय
( ऐलपैल वरून साभार)
मला वाटतं कवीचा विचार हा या लहानशा कवितेतून बर्यापैकी व्यक्त झाला आहे.
विलियम कार्लोस विलियम्सची ' रेड व्हील्बॅरो' The Red Wheelbarrow ही लहानशी कविता या संदर्भात वाचण्याजोगी आहे .