मुघल - ए- आझम : एक कलाकृती बनताना..
मुघल ए आझम
.
नखशिखांत सौंदर्य !
कुणीतरी पुटपुटलं म्हणून राजकपूरनं मागं वळून पाह्यलं तर हिंदी सिनेमातला शरीफ हिरो शशीकपूर नकळत मधूबालाच्या सौंदर्याला दाद देत होता. कपूर घराण्याच्या कुठल्यातरी कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान टीव्हीवर प्यार किया तो डरना क्या हे गाणं चालू असताना घडलेला हा किस्सा...!
आजही रस्त्याच्या कडेला ब्लॅक अँड व्हाईट मधली मधूबाला रंगीतसंगीत ऐश्वर्या, प्रीती, करीना, कतरीना यांच्या जोडीने पोस्टरच्या रूपाने फूटपाथवर हटकून दिसते.. त्याकाळाची ही सौंदर्यवती.. अनारकलीच्या भूमिकेसाठी आणखी कोण योग्य होतं ?
के आसिफसारखा दिग्दर्शक आणि सलीम अनारकलीच्या प्रेमकहाणीचा भव्य पट..
फक्त सर्वोत्तमाचाच ध्यास घेतलेल्या आणि कसलीही तडजोड मान्य नसलेल्या के आसिफकडे हा चित्रपट आला तेव्हांच एका अतिभव्य रूपेरी इतिहासाचा पाया घातला गेला होता..
*************
पंचेचाळीस वर्षांपूर्वी ' मुघल-ए-आझम ' चा प्रिमिअर मराठा मंदिरमध्ये झालेला. , ... आणि रंगीत स्वरूपात , दुसऱ्यांदा ' प्रिमिअर ' झालेला पहिला चित्रपट म्हणून मुघल ए आझम चं नाव इतिहासात कोरलं गेलं '@ त्या काळचा सर्वात खर्चिक चित्रपट
@ या काळातला सर्वात खर्चिक संगणकीय संकलन असलेला चित्रपट
@ प्रत्येक सिनेमागॄहात सगळे खेळ सलग तीन वर्षं अखंड चालले... हा विक्रम आजवर मोडला गेलेला नाही...
@ 11 वर्षांच्या निमिर्तीकाळात आणि पुढच्या 44 वर्षांच्या ' प्रथमायुष्या ' त या सिनेमाशी जेवढ्या सुरस कथा , दंतकथा जोडल्या गेल्या , तेवढ्या खचितच दुसऱ्या कुठल्या सिनेमाशी जोडल्या गेल्या असतील...
( @ - ही माहीती लोकसत्तामधून साभार.. )
*************
त्या काळचा सुपरस्टार दिलीपकुमार सलीमच्या भूमिकेत असतांना अकबराच्या भूमिकेत पॄथ्वीराजकपूरला सन्मानाने आमंत्रित करतानाच दिलीपला तू या चित्रपटाचा नायक नाहीस हे के आसिफ सूचित करून गेला होता आणि अकबर बादशहाला एक शाही व्यक्तिमत्त्व बहाल करण्याचे काम पृथ्वीराज कपूर करून गेले..
कमावलेलं शरीर, गोरापान वर्ण, रूपेरी केस आणि खर्जातला धडकी भरवणारा आवाज यामुळे अकबर बादशहाचा वावर असताना पब्लिक टेन्शनमध्येच असायचं. विशेषतः सलीम अनारकली एकत्र असताना बहार बादशहाला चुगली करते आणि बादशहा रागारागाने एकेक दालनातून तावातावाने निघतो तेव्हाचा याचा संताप अंगावर येतो. त्या प्रसंगात आता काय होणार म्हणून गळ्यात आवंढा येतो इतका दरारा पॄथ्वीराज यांनी पडद्यावर निर्माण केलाय..
अनारकली उन्मत्त होऊन उर्मटासारखा प्रश्न विचारत असताना बादशहाच्या रागाचा पारा चढत जातो आणि शेवटी असह्य होऊन तो दाणकन आपली मूठ वज्रासारखी सिंहासनावर आपटतो तेव्हां महाराणी जोधाच्या डोळ्यातलं भय आपल्या काळजात उतरत जातं...
***********************
खरं तर दिलीपकुमारला आपण शाहजादा म्हणून कसे दिसू याबद्दल शंकाच होती. पण फाळणीनंतर बरेचसे कलाकार पाकिस्तानात गेल्याने दिलीपकुमार या चित्रपटात आला आणि नर्गीसने चित्रपट सोडला. चित्रपट सुरू झाला तेव्हां नर्गीसच्या स्वप्नाळू डोळ्यांची जादू देशातल्या रसिकांवर अशी काही होती कि मधूबालादेखील तोपर्यंत त्या डोळ्यांपुढे ताठ उभी राहू शकलेली नव्हती. पण राजकपूरसाठी काम करणार असल्याने दिलीपबरोबर ती काम करणे शक्य नव्हतेच आणि मग मधूबालाच्या नावावर हा चित्रपट लागला.
या चित्रपटाचा आवाका पाहून के आसिफ त्या काळाचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शापूरजी पालनजी यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी गेले होते. या धंद्यात उतरण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सुरूवातीला सांगितले पण आसिफ यांनी ही गोष्ट अशी काही रंगवून त्यांच्यासमोर "दाखवली" कि त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि ते अर्थसहाय्यास तयार झाले....
पुढच्या काळात शापूरजींना या चित्रपटापायी बराच मनःस्ताप सोसावा लागणार आहे आणि के आसिफ हा मनुष्य किती वेडा आहे हे त्यावेळी माहीत असलेली नियती मात्र शापूर्जीच्या कार्यालयाच्या आढ्यावर बसून खुदुखुदू हसत होती !
के आसिफला शीशमहाल उभारायचा होता. ३५ फूट उंच, रुंदीला ८० तब्बल ८० फूट आणि लांबी..............? फक्त १५० फूट !
चांगली दोन वर्षे लागली हा महाल उभारायला...! त्यासाठी बेल्जियमवरून आरसे मागवण्यात आले होते. शापूरजींनी त्या काळी पैसे किती मोजले असतील ? फक्त १५ लाख रूपये !!
कळतंय का १५ लाख म्हणजे किती ? सोनं चाळीस रूपये तोळा होतं म्हणे !! काढा आता हिशोब !!!
आणि तज्ञांशी चर्चा करून आशिफ म्हणाले या महालात फक्त एकच गाणं चित्रीत होणार आहे.
शापूरजींचं डोकं आउट व्हायला हे पुरेसं होतं आणि के आसिफ वि शापूरजी हे युद्ध भडकत गेलं...
शीशमहालच्या छतावर असलेल्या आरशांमुळे प्रकाश परिवर्तित व्ह्यायचा त्यामुळं कॅमेरामन चित्रीकरणास नकार देत. तर के आसिफला बादशाला तख्तपोशीकडे पाहतांना छताच्या प्रत्येक आरशात अनारकली दिसते असं दाखवायचं होतं. हे कठीण होतं. खरं तर अशक्यच शब्द योग्य होता पण आपल्यासमोर रिझल्ट आहे...
तर काय सांगत होतो....अशक्य असा निर्वाळा तंत्रज्ञांनी दिल्यावर सर्वांनी असे असेल तर हे गाणे कट करा इथपासून ते नाही दिसली मधूबाला आरशात तर कोणतं आभाळ कोसळणार आहे असे सल्ले के आसिफ ला दिले..
पण वेड्या आसिफला कलाकॄतीसाठी कोणतीही तडजोड मान्य नव्हती. त्याला त्याच्या मनःपटलावर ही कथा कशी दिसली होती तशीच ती सादर करायची होतॉ.
त्याने निर्वाणीचा इशारा दिला..
मला चित्रीकरण करता येणार नसेल तर या शीशमहालला मी माझ्या हाताने आग लावीन ..
आणि घाबरलेल्या शापूरजींनी शीशमहालचे सर्व भाग सुट्टे करून तो पॅक करून ठेवायला सांगितले..
इथून पुढे ते आसिफचे तोंडही पहायला तयार नव्हते...!
आसिफची गच्छंती जवळजवळ निश्चित होती
पण हार मानणा-यातला आसिफ नव्हता. हे प्रकरण सोहराब मोदींकडे गेलं. मोदी आणि पॄथ्वीराज कपूर हे दोघेही शापूरजींचे परिचित. ..
शापूरजींनी धंद्याचे गणित मांडले. आणि आसिफच्या त-हेवाईकपणचे सर्व किस्से सांगून अशा माणसाबरोबर मी कामकरू शकत नसल्याचे ठासून सांगितले. मोदींनी आसिफशी चर्चा केली. आसिफ काय चीज आहे हे त्यांना चांगलेच माहीत होते, पण कलंदरी वॄत्तीला असलेला शाप म्हणजे फटकळपणा...परखड म्हणा किंवा स्पष्टवक्तेपणा म्हणा...ज्याला सुनावले जाते तो मात्र फाटक्या तोंडाचा अशीच संभावना करीत असतो. कमाल अमरोहींसारखा मनुष्यही आसिफला सोडून गेला आणि वेगळ्या चित्रपटासाठी जुळवाजुळव करू लागला..चित्रपटाचे नाव अनारकली !
एस. मुखर्जीही प्रदीपकुमार आणि बीना रॉय या अप्रतिम लावण्यावतीला घेऊन याच नावाचा चित्रपट बनवायच्या तयारीला लागेलेले होते. आसिफ वर या कशाचाही परिणाम झालेला नव्हता.
कटू सत्य लोण्यात घोळवून सांगणं ही व्यापारी कला कलाकारांना अवगत नव्हती त्याकाळी...
मोदींनी यशस्वी मध्यस्थी केली. मोदींवर विश्वास ठेवून शापूरजींनी पुन्हा आसिफला एक संधी दिली...
द्यावीच लागली........... !
इंग्लंडहून आलेल्या सदस्यांनी इथे शूटींग होणार नाही असा निर्वाळा दिलेला. आसिफ ने विचार करायला सुरूवात केली.
रोज तो दिव्यांची मांडणी बदलत असे, कॅमेरा बदलत असे. पण व्हायचं काय कि आरशांच्या विशिष्ट रचनेमुळं कधी त्यात कॅमेरा तर कधी प्रकाशझोत येत...मोठी समस्या होऊन बसलेली. शिवाय मधूबाला तर प्रत्येक आरशात हवी होती...शापूरजींनी इशारा दिलेला...
शेवटी आसिफच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. त्याने जिथून त्रास होत नाही ते दिवे तसेच ठेवले व झुंबरांच्या आजूबाजूला आणि विशिष्ठ ठिकाणांवर मेणबत्त्यांचा वापर केला. आता सगळीकडूनच उजेड येत असल्याने ऑब्जेक्ट आरशात दिसू लागला आणि प्रकाशाचेही संतुलन झाले !!!
सगळ्या युनिटने नि:श्वास सोडला. हा कार्यभाग तर पार पडला आणि पुढच्या सगळे शूटींगच्या तयारीला लागले. आता विघ्न येऊ नये असंच सर्वांना वाटत होतं
आणि आसिफचे नवे खूळ सुरू झाले ...
सिनेमाला सुरूवात केल्याला आता सात वर्षे उलटून गेली होती. आणि आता रंगीत फिल्मसचा जमाना सुरू झाला होता. आसिफने रंगीत फिल्मसाठी पैसे मागितले. पुन्हा एकदा संघर्ष , पुन्हा मोदी !!
आता असे ठरले कि सरसकट रंगीत फिल्मवर शूट न करता काही भाग शूट करून तो इंग्लंडला लॅबमधे पाठवावा. तज्ञांचे मत विचारावे आणि मगच पुढचा निर्णय घ्यावा...
झालं
प्यार किया तो डरना क्या चे बोल शीशमहालात घुमले. मधूबालाचे पाय त्या बोलांवर थिरकू लागले. बादशहाला आरशात अनारकली दिसू लागली.....
हे गाणं रंगीत झालं. फिल्म टेस्ट करण्यासाठी इंग्लंडला गेली..प्रोसेसींग होऊन परत आली. तज्ञांनी अप्रतिम असा निर्वाळा दिला होता. आता पुढचा सिनेमा रंगीत होणार होता..आणि आसिफचं वेड पुन्हा उफाळून वर आलं......!
चित्रपटाचा रंगीत भाग पाहील्यावर आधी शूट केलेला भाग त्याला कमअस्सल वाटू लागला. आसिफ हे सर्वोत्तमाचे दुसरे नाव होतं.
आमीरला आपण पर्फेक्शनिस्ट म्हणतो..पण आसिफ या सच्च्या कलाकाराची तुलना कदाचित हॉलिवूडच्याच दिग्दर्शकांशीच करावी लागेल..
आता आसिफचे म्हणणे होते..चित्रपट पुन्हा पहिल्यापासून शूट करायचा..
संपूर्ण रंगीत !!
शापूरजी यांना ह्रूदयविकाराचा झटका येणेच बाकि होते...कारण आतापर्यंत या चित्रपटासाठी त्यांचे .......
दीड कोटी रूपये खर्ची पडले होते.. !!
एक हाडाचा कलाकार आणि एक हाडाचा व्यावसायिक यांच्यातलं हे युद्ध होतं. आसिफ हा हाडाचा कलाकार होता, त्यामुळंच तो मनासारखी कलाकॄती व्हावी यासाठी हट्ट धरत होता. आजचे सिनेमे पाहीले तर आसिफच्या या वेडाची महती काही औरच आहे.
पण शापूरजींच्या पदरातही त्यांच्या श्रेयाचे माप घालायला हवे. एका अट्टल व्यावसायिकाने एका खुळ्या कलाकाराला इतकी भरघोस मदत करावी हे त्यांच्या कलासक्त मनाचेच निदर्शन आहे.
११ वर्षानंतर सिनेमा पुन्हा पहिल्यापासून शूट करणे हे खरंच व्यावहारिक नव्हते. वितरकांचा दबाव वाढल्यावर असं ठरलं कि सिनेमा आहे तसा प्रदर्शित करावा. आसिफ रूसून बसलेला होता. सिनेमा बनेपर्यंतच त्याचा अधिकार होता. त्याने ती कलाकृती बनवली होती. आता शापूरजी आपले अधिकार वापरत होते. पैसा त्यांचा होता..
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिले तीन दिवस थेटर्स खाली होते. सगळे धास्तावलेले होते. पण आसिफ तरीही सांगत होता, या सिनेमाला ब्लॅक होईल..
आणि माऊथ पब्लिसिटीचा परिणाम होऊन सिनेमाकडे पब्लिक असं वळलं कि पुढचा इतिहास त्यांच्या या पावलांनीच लिहीला गेला !!!
प्रीमिअर चालू असतांना मात्र शापूरजींच्या मनातून आसिफबद्दलचा राग निवळत चालला होता. तो काय म्हणत होता हे त्यांना आता पडद्यावर कळत होते. आणि रंगीत भाग सुरू झाला मात्र..
त्यांना आतापर्यंतचा कृष्णधवल सिनेमा एकदम डावा वाटू लागला. ऐकलं असतं आसिफचं तर असं वाटून गेलं..
आणि मग त्यांनी आसिफचा हात प्रेमभरानं दाबत त्याला वचन दिला.
एक दिवस हा सिनेमा संपूर्ण रंगीत बनेल. मी हा सिनेमा तुझ्यासाठी कलरफुल करेन..!!
दोन वर्षांपूर्वी त्यांच्याच कंपनीने हा सिनेमा रंगीत अवतारात दाखल केला आणि एका अवलिया कलाकाराला एका उद्योगपतीने दिलेल्या वचनाची पूर्तता झाली ..!!
सगळंच अतर्क्य !!!
Kiran™
( लेखातील चित्रे आंतरजालावरून साभार घेतलेली आहेत. चित्रांच्या लोकेशनची लिंक कॉपी पेस्ट केलेली असल्याने चित्रही दिसतात ).
प्रतिक्रिया
सिनेमा बनत असतानाचे आणि
सिनेमा बनत असतानाचे आणि नंतरचेही हजारो लाखो किस्से प्रसिद्ध आहेत. लेखामध्ये त्यांचा समावेश केला नसला तरी इथं आपण नक्कीच बोलूयात त्यावर.
....
http://www.aisiakshare.com/node/309
http://www.aisiakshare.com/node/309
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ऐसी अक्षरे वर एक लेख
ऐसी अक्षरे वर एक लेख आधीपासूनच असल्याचं निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
या लेखाबाबतचा खुलासा
http://www.maayboli.com/node/16746 इथे तुम्हाला हा लेख वाचता येईल. मी इथे पहिल्यांदा दि. ६ जून २०१० रोजी पोस्ट केला होता.
आपण दिलेल्या लिंकवरील लेखचा दिनांक ०३.२.२०११ रोजीचा आहे.
दोन्ही धाग्यांवर एकमेकांच्या लिंक्स असल्याने बुचकळ्यात पडलो आहे. जर हा लेख हटवायचा असल्यास हटवता येईल. परंतु मूळ लेख आधीपासूनच दुस-या संस्थळावर अस्तित्वात आहे हे निदर्शनास आणून द्यावेसे वाटले. तसंच ऐसी अक्षरे वरचा लेख आणि यात खूपच फरक आहे. माझ्या मूळ लेखातली चित्रे प्रताधिकाराचा भंग होतोय या भीतीने काढून टाकलेली आहेत. इथे एम्बेडेड लिंक दिलेल्या आहेत.
माझ्या मूळ लेखाअर प्रसाद प्रसाद या नावाने एका सदस्याची सविस्तर प्रतिक्रिया देखील आहे जी वाचण्यासारखी आहे कदाचित ते आणि हे लेखक एकच असावेत. त्याबद्दल मनापासून आभार.
....
ओ
लेख उडवा वगैरे कोण म्हणत नाही.
तिकडे आणि इकडे दुवा असेल तर भविष्यात लेख वाचणार्याला त्याच विशयाशी संलग्न लेख वाचण्यात येइल म्हणून दुवे दिले आहेत.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
किरण आणि प्रसाद यांच्या
किरण आणि प्रसाद यांच्या धाग्यातून थोडी वेगवेगळी माहिती मिळतेय. तिकडे मेणाचा पातळ थर दिला म्हणलय. इकडे मेणबत्त्या वापरल्या. तांत्रीकदृष्ट्या कोणता मार्ग खरा वाटतोय?
छान लिहीलय. चित्रपट पाहिला
छान लिहीलय.
चित्रपट पाहिला नाही अजुन. आणि मला मधुबाला आवडत नाय :-P.
मधुबाला
मधुबाला आम्हास आवडणार.
दिलीपकुमार तुमचा फेव्हरिट असणार.
साधसं आहे की.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
...
गुर्जींच्या 'मिपा'वरील खवमधली बद्धकोष्ठ आणि मूळव्याध एकसमयावच्छेदेकरून उपटलेली 'मधुबाला' पाहून मत बनवलेत वाटते...
??? याबद्दल कै कल्पना नै मला.
???
याबद्दल कै कल्पना नै मला. नवीन आहे मआंजा वर. आणि फक्त ऐसीवर अॅक्टिव आहे.
आजच्या काळात मुघल ए आझम सारखा
आजच्या काळात मुघल ए आझम सारखा ध्यास घेतलेला सिनेमा हे आश्चर्यच वाटेल. सिनेमा नेमका कसा आहे हे माऊथ पब्लिसिटी द्वारे समजण्याच्या आधीच एका आठवड्यात शंभर कोटीचा गल्ला निव्वळ मार्केटिंगच्या जोरावर गोळा करण्याच्या आजच्या जमान्यात तीन वर्षे सिनेमा चालणे, सुरुवातीला थिएटर्स खाली असूनही नंतर हिट होणे हे पहायला मिळणार नाही. सेकंड रन तर आता बंदच झालेलं आहे. चांगले सिनेमे पुन्हा पुन्हा रिलीज होत आणि गर्दी खेचत. त्या दृष्टीने या कलाकृती अजरामर होत्या. आता थेटरातून एकदा पिक्चर उतरला कि तो टीव्हीवर येतो आणि नंतर बादच होतो. पुन्हा बघायचा असेल तर टीव्हीवरच.
तंत्रज्ञान आणि बदलते ट्रेण्डस यामुळे चांगल्याबरोबर नको असलेल्या गोष्टीही येतात.
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
या सिनेमात मधुबालाच्या
या सिनेमात मधुबालाच्या चेह-यावर निराशा जाणवते. मुघल ए आझम च्या वेळी मधूबाला आणि दिलीपकुमार यांच्यातले संबंध पराकोटीचे वाईट होते. दोघे एकमेकांशी बोलतही नव्हते. या जन्मात दिलीप आपला होऊ शकणार नाहि हे वास्तव तिने स्विकारलेले होते, त्याची उदासी तिच्या चेह-यावर होती.
याच सिनेमाच्या शूटींगदरम्यान नया दौर सुरू झाला होता. त्यात निर्मात्याच्या वतीने दिलीपने मधुबालाच्या विरूद्ध कोर्टात साक्ष दिल्याने तिला निर्मात्याला साइनिंग अमाउंट परत करावी लागली होती आणि तिची प्रचंड मानहानी झाली होती. तिला सर्वात जास्त धक्का बसला होता तो दिलीपने साक्ष दिल्याचा.. मधुबालाच्या वडिलांनी अताउल्लाखान यांनी दोघांचं लग्न होऊ दिलं नाही. इतर मुलींच्या लग्नावर याचा परिणाम होईल असं काहीतरी कारण होतं. त्यांना भेटूही दिलं जात नव्हतं. मधुबालावर अनेक निर्बंध आले होते. तसंच शूटींगच्या दरम्यान अताउल्ला़खान सेटवर उपस्थित राहू लागले.
नया दौर मधे दिलीपकुमार आहे हे कळताच त्यांनी शूटिंगसाठी मधुबालाला पाठवण्यास नकार दिला. निर्मात्याचं जे नुकसान झालं त्यामुळे वारंवार विनंत्या करूनही न ऐकल्याने त्याने कोर्टात दावा दाखल केला. दिलीपकुमारने मी सत्याची बाजू घेतली असा नंतर खुलासा केला मधुबालाला त्यावेळी ते सहन झालं नाही तरी नंतर तिने दिलीपने केलं ते योग्यच होतं अशी कबुली दिली होती.
या प्रसंगानंतर दोघांतले संबंध कधीही ठीक म्हणण्याइतपर्यंतही चांगले झाले नाहीत. मात्र बागेतल्या प्रणयप्रसंगात दोधांमधले प्रेम अद्याप कायम असल्याचे दिसून आले होते. या सीनमधे वर्तमान विसरून दोधांमधलं प्रेम उफाळून वर आलं होतं असं सगळेच म्हणतात. अताउल्लाखानच्या उपस्थितीत हा सीन करणे शक्यच नव्हतं. त्यासाठी त्याला जुगारात गुंतवून ठेवण्यासाठी एका खास माणसाची तरतूद के आसिफने केली होती. दारूच्या आहारी गेलेल्या खानाला हळूच एक बाटली दिली कि त्याचं दुर्लक्ष व्हायचं. त्याचा फायदा घेऊन या उत्कट क्षणांचं शूट उरकण्यात येत असे.
फूल खिले है गुलशन गुलशन या कार्यक्रमात एकदा नौशाद यांची मॅरेथॉन मुलाखत झाली होती ज्यात बाथरूम मधे गाणं गाऊन घेण्याचा उल्लेख आला होता. नुकतंच आशाबाईंनी त्यास दुजोरा दिला. अनेक ठिकाणी लिहूनही आलेलं आहे आणि बोललं गेलेलं आहे असा हा सिनेमा. खरंच दंतकथा.
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
महान कलाकृती
'ऐ मेरे मुश्किल कुशा' हे गाणं आणि अनारकली मी माझे प्रेम लपवणार नाही हे सांगायला प्रचंड रागावलेल्या अकबर बादशहाला 'बंदो से पर्दा करना क्या' असं भर दरबारात म्हणते हे त्या चित्रपटातले भाग मला खूप आवडतात.
बाकी मला कोणतीही कला समीक्षक म्हणून पाहायला आवडत नाही (पात्रता व आवड दोन्ही नाही), समीक्षकांची (जटील*) समीक्षा देखिल वाचायला/ऐकायला आवडत नाही. समीक्षक आणि कलाकार एकमेकांस पूरक असावेत कदाचित, पण आमचा तो प्रांत नाही.
मला दिलिप, मधुबाला, आणि मुघलेआजम फार भावले, पण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात शिरायची इच्छा होत नाही.
* प्रत्येक समीक्षा जटीलच वाटते, म्हणून.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ज्जे ब्बात!
समीक्षकांची (जटील*) समीक्षा देखिल वाचायला/ऐकायला आवडत नाही. समीक्षक आणि कलाकार एकमेकांस पूरक असावेत कदाचित, पण आमचा तो प्रांत नाही.
हा सम्यक (संतुलित ह्या अर्थानं) विचार आवडला.
पण बहुतांश समीक्षक स्वतःला रसिक म्हणवून घेतात.
आता आपला तो प्रांत नाही, हे ठाउक असूनही समोर दिसेल ते वाचत सुटायचं ऑब्सेशन असल्यानं
कित्येकदा सिनेसंगीत रसिकांची व्यर्थ बडबड* वाचावी लागते.
होतं कय, ह्यांनी उल्लेख केलेली १९५० किंवा १९६० पूर्वीची गाणी आपण ऐकलेलीच नसतात.
आणि त्यामुळे त्याबद्दल कढ दाटून येणारं ह्यंचं लिखाण चमत्कारिक करपट ढेकरेप्रमाणं वाटतं.
शिरिष कणेकर एकदा का त्या आठवणींत रमले तर असं काय लिहितात की मग अगदि दवणे सुद्धा परवडतील.
उदा:-
तोरा बाबूल ह्या चित्रपटातील "सैंया धरे पैंकी तैंया" मध्ये जो कोमल शुद्ध पंचम तीव्र ऋषभ नंतर लावलाय ...आहाहा...
"आखरी खत " मधील प्रणय प्रत्यक्ष जिवंत करणारं "जुनैद़ तेरि जस्मे हम दस्तबर हुये बासि" हे हुसैन जमामुलाली ह्यांचं अनमोल गीत तर काय वर्णू अहहा...
.
.
ह्या अशा गप्पा डोक्याला शॉट्ट असतात.
त्यापेक्षा ब्लॉग परवडतात. ब्लॉगवाले नक्की आमेहे कशाला चांगले म्हणत आहोत ते युट्युबवगैरे वरचे दुवे देउन सांगतात तरी,. त्यांच्यात निदान सामील तरी होता येतं.
.
.
*संदर्भ थाउक नसल्यानं आमच्यासारख्या अडाण्यांना ते तत्वज्ञानही व्यर्थ बडबडच वाटते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ब्लॉगवाले नक्की आमेहे कशाला
हे मात्र खरं. मी कधी कधी अशा लिंका उघडतो आणि क्वचित फार खूष होतो. उडनखटोला मधलं ते '...दुनिया बडी बेईमान' ऐकलं याच प्रकारे आणि जाम आवडलं ते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.