ज्योतिष, पत्रिका आणि संख्याशास्त्र
पुण्याला प्रथमच भेट देणार्या कोणाही परदेशी पर्यटकाला असा प्रश्न विचारला की काय हो? प्रथमदर्शी पुण्यातील कोणती गोष्ट तुमच्या डोळ्यात भरली? तर माझी खात्री आहे की बहुसंख्य पर्यटक पुण्याच्या रस्त्यावर धावणार्या काळ्या आणि पिवळ्या रंगांच्या रिक्षांचे नाव घेतील. मात्र हाच पर्यटक जरा जास्त शंकेखोर आणि चिकित्सक असला तर या रिक्षांपैकी बहुसंख्य रिक्षांच्या तळाला बांधलेली आणि रस्त्याला टेकेल की काय असे वाटावे, एवढ्या लांबीची एक सुती दोरी व त्यात ओवलेले एक लिंबू आणि चार/पाच हिरव्या मिरच्या यांकडे आपले लक्ष गेले असे सांगितल्याशिवाय राहणार नाही.
जादू-टोणा, दृष्ट, नजर, भानामती या सारख्या अंधश्रद्धांत जखडून पडलेल्या आजच्या भारतीय समाजाच्या अगतिकतेची, दोरीत ओवलेले हे लिंबू आणि मिरच्या, ही पहिली तोंडओळख या परदेशी पर्यटकांसाठी असणार आहे. त्या रिक्षावाल्याच्या शत्रूंची त्याला नजर लागू नये आणि शत्रूंनी त्याच्यावर जादूटोणा किंवा भानामतीचे प्रयोग करू नयेत म्हणून हा रिक्षावाला ही लिंबू-मिरच्या ओवलेली दोरी आपल्या रिक्षाला बांधत असतो. या रिक्षावाल्याच्या कृती सारख्या अनंत पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि परंपरा यात भारतीय समाज इतका बुडून गेलेला आहे की त्यातून त्याला बाहेर काढण्याचे काही विचारवंतांचे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरत आहेत. उदाहरणार्थ बहुतेक भारतीय आजही एका पूर्वापार चालत आलेल्या एका जुन्या समजुतीवर अजूनही विश्वास ठेवतात की घराची रचना किंवा आतील सामानाची रचना याचा त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या भविष्यावर परिणाम होत असतो. ही रचना म्हणे हे ठरवते की त्या व्यक्तीला जीवनात आनंद मिळेल की त्याच्यावर संकटे कोसळत राहतील. थोडक्यात म्हणजे त्याचे भविष्य घराच्या रचनेवर अवलंबून असेल.
भारतीय समाजातील पूर्वापार रूढी आणि परंपरा यातून समाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात करणारे ज्योतिबा फुले, आगरकर, महर्षी कर्वे यांसारखे अनेक कृतिशील विचारवंत गेल्या शे-दोनशे वर्षात होऊन गेले. आपल्या सध्याच्या काळात जादू-टोण्यासारख्या अंधश्रद्धांच्या विरुद्ध झगडणार्या विचारवंतांत अर्थातच डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. या विचारवंताने समाजाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे 1989 मध्ये त्यांनी स्थापन केलेली अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि त्यातून तयार झालेले आणि त्यांच्या विचारांवर पूर्ण विश्वास असणारे अनेक अनुयायी यांना म्हणता येईल. दुर्दैवाने हा विचारवंत 20 ऑगस्ट 2013 या दिवशी कोणा एका मारेकर्याच्या गोळीला बळी पडला. हा मारेकरी शोधून काढण्यात पोलिसांना अजूनही यश आलेले नाही नाही परंतु हे मात्र नक्की की हा मारेकरी किंवा ज्यांनी या मारेकर्याला सुपारी दिली होती ते लोक दाभोळकरांच्या विचारधारेमुळे त्यांचा स्वत:चा स्वार्थ साधण्यात अडचणी निर्माण झाल्याने या विचारधारेचा स्त्रोतच बंद करण्याचा एक निष्फळ प्रयत्न करू बघत आहेत. परंतु दाभोळकरांचे अनुयायी त्यांची चळवळ पुढे चालू ठेवून त्यांची विचारधारा लोकांपर्यंत पोचवत राहण्याचा प्रयत्न पुढे चालू ठेवतील या बाबत माझ्या मनात तरी शंका नाही.
2010 मध्ये डॉ.दाभोळकरांनी, जादू-टोणा आणि अंधश्रद्धा पसरवणे हे गुन्हे समजले जावेत यासाठी महाराष्ट्र विधानसभेने कायदा पारित करावा म्हणून बरेच प्रयत्न केले. परंतु याला राजकीय विरोध झाला. अशा प्रकारच्या कायद्याच्या विरोधकांनी, या कायद्याचा हिंदू संस्कृती, रूढी आणि परंपरा यावर विपरीत परिणाम होईल अशी फसवी कारणे देत या कायद्याला विरोध केला. खरे तर डॉ. दाभोळकरांनी या बाबतीत खुलासा करताना स्पष्टीकरण दिले होते की या प्रस्तावित कायद्याच्या संपूर्ण मसुद्यात परमेश्वर किंवा धर्म या दोन शब्दांचा कोठेही उल्लेख सुद्धा नाही. भारतीय राज्यघटने प्रमाणे प्रत्येकाला आपल्याला हवा तो धर्म व हवी तशा पद्धतीने आराधना करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे, आणि हा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हा प्रस्तावित कायदा फसवेगिरी आणि दुसर्याच्या भावना किंवा श्रद्धा यांचा दुरुपयोग स्वत:च्या स्वार्थासाठी करू बघणार्यांना अटकाव आणि शिक्षा व्हावी या साठी करावयाचा आहे. या कायद्याला होणारा विरोध तरीही मावळला नाही. अखेरीस डॉ. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढून हा कायदा अंमलात आणला आहे.अर्थात तो अध्यादेश विधानसभेकडून पारित करून घ्यावा लागेलच.
2009 मध्ये डॉ. दाभोळकर आणि प्रख्यात अंतराळ भौतिकी (astrophysicist) शास्त्रज्ञ डॉ. जयन्त नारळीकर व इतर सहकारी, ( यात आपले घाटपांडे काका सुद्धा बहुतेक सहभागी होते) यांनी मिळून आपल्याला फारसा ज्ञात नसलेला एक संख्याशास्त्रीय प्रयोग केला होता. या प्रयोगाचे निष्कर्ष ‘करन्ट सायन्स‘ या मासिकाच्या मार्च 2009 च्या अंकात प्रसिद्ध केले होते. व्यक्तीची कुंडली बनवण्याच्या भारतीय रूढीशी हा प्रयोग संबंधित होता.
आपल्यापैकी बहुतेकांना कुंडली म्हणजे काय हे बहुधा माहिती असेलच. त्या व्यक्तीच्या जन्मकाली किंवा दुसर्या कोणत्याही समयी, आकाशातील प्रत्यक्ष दिसणार्या आणि राहू, केतू सारख्या काल्पनिक ग्रहांची, आकाशातील स्थाने काय होती यावरून ही कुंडली तयार केली जाते. ज्योतिषावर विश्वास ठेवणार्या मंडळींची अशी समजूत असते की त्या व्यक्तीची स्वभाव आणि शरीर वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये आणि त्या व्यक्तीचे भविष्य या कुंडलीवरून ठरते आणि सांगता येते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला एखादा दिवस किंवा काल हा शुभ आहे की त्याच्यावर संकट परंपरा कोसळणार आहे हेही या कुंडलीवरून सांगता येते.
समाजातील अनेक राजकारणी, वरिष्ठ नोकरशहा आणि सामाजिक हितसंबंधाचे निर्णय घेण्यास जबाबदार असलेली मंडळी, इतर ठिकाणी विवेक बुद्धीने आणि तर्कसंगत विचार करत असली तरी अजूनही कुंडली आणि त्यावरून सांगितले जाणारे भविष्य याबाबत मात्र अंधश्रद्धा बाळगताना आढळून येतात. ही मंडळी स्वत:च्या मुलामुलींचे विवाह ठरवताना कुंडलीवर अवलंबून असतात असे दृष्टोत्पत्तीस येते.
डॉ. नारळीकर आणि डॉ. दाभोळकर यांनी मिळून केलेल्या संख्याशास्त्रातील प्रयोगाकडे परत वळूया. या प्रयोगाच्या निष्कर्षावर आधारित जो अहवाल वर निर्देश केलेल्या मासिकात प्रसिद्ध केला गेला होता त्याचा सारांश मी खाली उधृत करत आहे.
” महाराष्ट्रामध्ये जन्मजात बालकाच्या कुंडलीवरून वर्तवल्या जाणार्या त्याच्या भविष्याची सत्यासत्यता पडताळून बघण्यासाठी एक प्रयोग नुकताच करण्यात आला. या प्रयोगासाठी एकूण 200 जन्म कुंडल्या जमवल्या गेल्या होत्या. यापैकी 100 जन्म कुंडल्या (गट अ) या शाळेत हुशार म्हणून गणल्या जाणार्या मुलांच्या होत्या तर इतर 100 जन्म कुंडल्या ( गट ब) या मतिमंद मुलांच्या होत्या. कुंडली हुशार मुलाची आहे की मतिमंद मुलाची याचे व्यवस्थित रेकॉर्ड करून घेतल्यानंतर या कुंडल्या संपूर्ण रॅन्डम पद्धतीने एकत्र मिसळल्या गेल्या आणि आणि त्या नंतर अनेक ज्योतिषांना या कुंडल्यांवरून वर्तवलेल्या भविष्याची अचूकता पडताळण्यासाठी म्हणून या प्रयोगात भाग घेण्यासाठी पाचारण केले गेले. यापैकी 51 ज्योतिषांनी या प्रयोगात सहकार्य करण्यास तयारी दर्शवली. प्रत्येक ज्योतिषाकडे रॅन्डम रित्या निवडलेल्या 40 जन्म कुंडल्या पाठवल्या गेल्या आणि त्यांना या कुंडल्यांचे हुशार आणि मतिमंद अशा दोन गटात वर्गीकरण करण्याचे सांगण्यात आले. या प्रयोगात भाग घेण्याची तयारी दर्शवणार्या 51 ज्योतिषांपैकी फक्त 27 ज्योतिषांनीच केलेले वर्गीकरण परत पाठवले. या नंतर संख्याशास्त्राच्या आधाराने केलेल्या विश्लेषणातून असे दिसले की कोणतीही एक कुंडली हुशार मुलाची आहे की मतिमंद, हे वर्तवण्याची अचूकता, एखादे नाणे वर फेकल्यानंतर ते छाप किंवा काटा यापैकी कोणत्या बाजूवर पडेल? याची जेवढी अचूकता असते त्यापेक्षा थोडी कमीच आहे. यानंतर या सर्व कुंडल्या एका ज्योतिष्य विषयक संशोधन करणार्या संस्थेला दिल्या गेल्या व त्यांना या कुंडल्यांचे दोन गटात वर्गीकरण करण्याचे सांगितले गेले. परंतु त्यांच्या वर्गीकरणाची अचूकता फारशी सुधारली नाही.
या स्पष्ट परंतु विस्तृतता कमी असलेल्या प्रयोगावरून हे सिद्ध होते की जन्म कुंडलीवरून, ज्या मुलाची ती कुंडली आहे त्याची अभ्यासातील हुशारी पडताळणी किंवा ती वर्तवणे हे अशक्य आहे. “
दुर्दैवाने अंधश्रद्धा, भाबड्या समजुती आणि तथाकथित परंपरांवर विश्वास, या गोष्टी भारतीयांच्या मानसिकतेच्या इतका अविभाज्य भाग बनलेल्या आहेत की कोणत्याही बुद्धीनिष्ठ विचाराचे सुद्धा त्यांना वावडे असल्यासारखे आहे. मी नुकतेच एक वृत्त वाचले. या वृत्ताप्रमाणे भारताचे नवीन मंगळयान जेंव्हा बेंगरुळू शहरातील उत्पादन केंद्रावरून पूर्व किनार्यावरील रॉकेट उड्डाणाच्या तळाकडे पाठवण्यात आले तेंव्हा त्या यानाची, ज्ञात तंत्रज्ञानाची सीमारेखा म्हणता येईल अशा या प्रकल्पावर कार्य करणार्या शास्त्रज्ञांनी, म्हणे पूजा केली व मगच हे यान मार्गस्थ झाले. शास्त्रज्ञ मंडळींची जर ही मानसिकता असेल तर सर्व सामान्यांचा कर्मकांडांवर असलेला विश्वास किती पराकोटीला पोचलेला असणार आहे याची सहज कल्पना येऊ शकते. त्यामुळे डॉ. दाभोळकरांना त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात किती अनंत अडचणी आल्या असतील याची कल्पना सुद्धा करवत नाही.
वर उल्लेख केलेल्या संख्याशास्त्रीय प्रयोगात सहभागी असलेले दुसरे शास्त्रज्ञ डॉ. नारळीकर, यांनी नुकत्याच केलेल्या आपल्या एका भाषणात ज्योतिष्यासंबंधीच्या काही रोचक बाबींचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात:
” वैदिक कालखंडात 7 दिवसाचा आठवडा अशी कोणतीही संकल्पना नव्हती. त्याचप्रमाणे ज्योतिषी म्हणवून घेणार्या कोणीही व्यक्ती समाजात नसत. अलेक्झांडर जेंव्हा प्रथम भारतात आला तेंव्हा त्याने आपल्याबरोबर अनेक ज्योतिषी आणले. त्यातले काही तो परत गेल्यावर भारतातच राहिले आणि ज्योतिष हा प्रकार भारतात पुढे चालू राहिला.”
डॉ. नारळीकर पुढे म्हणतात की संख्याशास्त्र आणि शास्त्रीय दृष्टीकोन याच्या निकषांवर ज्योतिषांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीची अचूकता लोकांनी प्रथम पडताळून बघितली पाहिजे. ज्योतिषाच्या आधारावर जुळवलेल्या पत्रिका किंवा ज्योतिषांनी सांगितलेले भविष्य हे अचूक वर्तवले जात असल्याची कोणतीच शक्यता नसल्यामुळे लोकांनी त्यावर अवलंबून राहणे चुकीचेच ठरेल.
दुर्दैवाने डॉ. नारळीकरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवतील अशी मंडळी भारतीय समाजात एकूण तरी अत्यल्पमतातच आहेत व हीच भारतीय समाजाची खरी शोकांतिका आहे.
21 ऑक्टोबर 2013
प्रतिक्रिया
तेच ते...
अध्यात्म विरुद्ध विज्ञान अशी फाइट दुसर्या एका संस्थळावर ऑलरेडी सुरु आहे. कर्मकांड, देव, दैव हे मराठी आंजावरचे अजर आणि अमर विषय आहेत.
बाकी तुम्ही आणि घाटपांड्यांनी किंवा डोके ठिकाणावर असलेल्या कुणीही कितीही शांतपणे काहीही सांगितले तरी ते समजून घेतले जाणार नाही ह्याची खात्री आहे.
ज्यांना ते मान्य आहे ते पुन्हा पुन्हा सहमत सहमत म्हणत मुंड्या हलवतील. कित्येकांचे बाह्यदर्शनी कान उघडे असले तरी काही बाबतीत हिप्नॉटाइझ झाल्यासारखे डोके बंद असते;
त्यांना काहिच फरक पडणार नाही. घरात नि हापिसात श्रद्धाळू नि भाविक मंडळींनी भरगच्च वेढला/कोंडला असण्याचे संधी/(सौ/दु:)भाग्य नशिबी आहे; त्यांना झेलण्याचे प्रारब्ध आता मान्य केले आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कुठे?
अशी फाईट नक्की कुठे सुरू आहे?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
व्य नि पाठवलाय
व्य नि पाठवलाय
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मी नुकतेच एक वृत्त वाचले. या
शास्त्रज्ञ ही देखील माणसेच आहेत. ते काही जैवरासायनिक यंत्रमानवे नव्हेत. अंधश्रद्धा रुजण्याची कारणे केवळ सामाजिक नाहीत तर त्याचा उगम जैविक कारणांमधेदेखील आहे. अधिक माहिती- मेंदुच्या मनात ले. सुबोध जावडेकर. तसेच मेंदुतला माणुस - ले. डॉ आनंद जोशी व सुबोध जावडेकर या पुस्तकां मधे मिळेल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
लेख आवडला. या
लेख आवडला.
याबाबत साशंक आहे. गेलं शतकभर जनतेच्या श्रद्धाव्यवहारांमध्ये प्रचंड फरक पडत असावा असा माझा अंदाज आहे. दुर्दैवाने या बाबतीत काहीच मोजमाप नसल्यामुळे याबाबतीत अंदाजापलिकडे ठाम विधान करता येत नाही. पण काही गोष्टी उघड आहेत. एक उदाहरण सांगतो. गाडगेबाबांची मुलगी आजारी होती. तेव्हा त्यांनी काही नवस वगैरे बोलण्याऐवजी डॉक्टरकडून तपासणी करवून घेतली. त्यावेळी गावच्या लोकांमध्ये अशा वागणुकीबद्दल किमान आश्चर्य व्यक्त झालं होतं हे वाचल्याचं आठवतं आहे (त्यापलिकडे विरोध झाला की नाही हे लक्षात नाही). आता आजाऱ्यावर योग्य ते उपचार करवून घेण्याकडे सगळ्यांचाच कल दिसतो.
गेल्या शतकभरात साक्षरता आणि शिक्षणाचं प्रमाणही प्रचंड वाढलेेलं आहे. अशा वाढीबरोबर एकंदरीतच श्रद्धा कमी होतात. पुन्हा, याबाबत भारतातला काहीच विदा नाही. त्यामुळे इतर प्रगत देशांमध्ये जे झालं आहे तसंच होत असावं असा अंदाज बांधता येतो. अमेरिकेसाठीची आकडेवारी खाली दिलेली आहे. कुठच्याही धर्मस्थानाला नियमितपणे भेट देणारांची संख्या कमी होताना दिसते आहे. तसंच दुसऱ्या आलेखात जे अमेरिकन स्वतःला निधर्मी मानतात अशांची वाढती संख्या दाखवलेली आहे. (हा आकडा २०१३ साठी २०% आहे)
ब्रिटनमध्येही गेली तेरा वर्षं दरवर्षी १% ने चर्चची हजेरी कमी होत आहे.
माझा मुद्दा असा आहे की जर सामान्यपणे अंधश्रद्धा न म्हटल्या जाणाऱ्या श्रद्धादेखील कमी होताना दिसतात, तर अंधश्रद्धा निश्चितच आणखीन वेगाने कमी होत असाव्यात.
सर्वप्रथमः भारताबद्दलच्या
सर्वप्रथमः भारताबद्दलच्या विधानांच्या खंडनमंडनासाठी ब्रिटनचा विदा देऊन कसे चालेल?
बाकी शिक्षणप्रसार झाला म्हणून अंधश्रद्धा कमी होतात ये तो बिल्कुल जरूरी नाही-कमीतकमी भारतात.
आसाराम, सत्यसाईबाबा, अन्य ज्योतिषी यांची वाढती पाप्युलारिटी काय सांगते?
हां आता भगत-वैदूकडे जाणारे लोक कमी झाले असतील पण वैचारिक क्षमतेचा तो एकमेव मानक समजावा का?
प्रगत देश अन भारत यांमध्ये कायम विरोधच असेल असे नाही पण भारतातला ट्रेंड तस्साच आहे हे कशावरून? नोव्हाऊ-रिच लोक लै अम्धश्रद्ध असल्याची तक्रार माध्यमांतून येत असलेली पाहतो. निओरिलिजियस चळवळींनीही जोमाने मूळ धरलेय आणि हे आधीपेक्षा जास्त आहे हे समाजशास्त्रज्ञही मान्य करतात. असे इनेक्सोरेबल ट्रेंडचे अर्ग्युमेंट सांगण्यात अन्य गोष्टी दुर्लक्षिल्या जातात त्या जाऊ नयेत म्हणून सांगतो इतकेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सोपे आहे!
जितकी पॉप्युलॅरिटी वाढेल, तितकी पर क्यापिटा पॉप्युलॅरिटी कमी होईल. शिंपल!
ज्या काळी भगत-वैदूंकडे लोक प्रकर्षाने जात असत, त्या काळची हिंदुस्थानची लोकसंख्या किती? आजची (आसाराम-सत्यसाईबाबांच्या काळातली) किती?
म्हणजेच, दरडोई अंधश्रद्धा कमी होत आहे! तुमच्यासारख्या शुकशुकशीत लोकान्ला एवढी साधी गोष्ट कळू नये?
यावरून, शिक्षणाचा प्रसार जितका अधिक, तितके दरडोई शिक्षणमूल्य (म्हणजे, 'व्हॅल्यू' अशा अर्थी. 'फी' अशा अर्थी विदा तपासलेला नाही.) कमी होते, अशा निष्कर्षाप्रत येता यावे काय?
कित्येक शिकलेल्या लोकांतही
कित्येक शिकलेल्या लोकांतही अंधश्रद्धापालनदक्षता दिसते तेव्हा संशय उत्पन्न होतो खरा. तदुपरि, हे जे घटणारे % आहे ते नक्की कुठल्या अंधश्रद्धांचे आहे तेही पहायला आवडेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आसाराम, सत्यसाईबाबा, अन्य
ही पुन्हा 'मला आत्ता असं दिसतं' या स्वरूपाची विधानं झाली. काहीतरी समर्थनार्थ विदा मिळाला तर गंभीरपणे घेता येेतील. माध्यमांमधून दिसतं म्हणजे सत्य नव्हे. उदाहरणार्थ, गेली वीस वर्षं अमेरिकेतली गुन्हेगारी कमी होते आहे, पण माध्यमांमुळे खूप लोकांना ती वाढलेली वाटते.
मोजमापं नाहीत त्यामुळे ही सगळीच चर्चा काहीशी हवेत आहे हे आधीच मान्य केलं आहे. ब्रिटन किंवा अमेरिकेत जे चालू आहे तेच भारतातही होत असावं असा केवळ अंदाज आहे. यामागे 'जसजसं शिक्षण वाढतं, तसतशा अंधश्रद्धा कमी होतात' असा दावा आहे. हा मात्र बिनबुडाचा नाही. पण पुन्हा विदा अमेरिकेतला असल्यामुळे 'तो इथे लागू नाहीच्चे' असं म्हणता येईलच.
या आलेखावरून दिसून येतं की उच्चशिक्षितांमध्ये कुठच्याही धर्माशी निगडित नसणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे.
जिथे ठोस आकडेवारी नाही तिथे
जिथे ठोस आकडेवारी नाही तिथे संबंधित जे पुढं येतं त्यावरून काही अंदाज बांधता येतात. ते अंदाज अन्य ठिकाणचा विदा साईट करण्यापेक्षा नक्की बरे. कमीतकमी मी भारताबद्दल तरी बोलतो आहे, तुम्ही एक सिद्धांत उरीपोटी कवटाळून युरोपआम्रिकेचा विदा देऊन असेच भारताबद्दलही म्हणता यावे असा सिद्धांत मांडताहात. हे पूर्णपणे खोटेच्च्च आहे असा माझाही दावा नाही. फक्त उच्चशिक्षित म्हणवणार्या लोकांतही अंधश्रद्धांचे प्रस्थ आढळल्याने त्या दाव्याबद्दल साशंक होतो इतकेच.
बाकी सोडा, कमीतकमी युरोपआम्रिकेत अंधश्रद्धा कमी होतात म्हंजे नक्की कुठल्या प्रकारच्या याबद्दल स्पष्ट काही वाचायला आवडेल. म्हणजे ज्योतिषवाली, काळी जादूवाली की जण्रल बाबावाली अंधश्रद्धा कमी होत आहे? धर्मपालन करणे म्हणजे अंधश्रद्धा म्हणायचं असेल तर हर्कत नै, मग त्या अतिशय मर्यादित व्याख्येनुसार तुमचे म्हणणे ओके आहे. पण बर्याच 'धर्मनिरपेक्ष' अंधश्रद्धा उरतातच त्यांचे काय? उदा. १३ नंबर, ज्योतिष, मिडवाईफांच्या गफ्फा, इ.इ. जेव्हा अंधश्रद्धा म्हणतो तेव्हा मला मुख्यतः तशा गोष्टी अपेक्षित होत्या तर तुम्ही नुस्त्या धर्माचा विदा दिलात. बाकी गोष्टींचा विदा मिळाला तर पूर्णपणे तसे विधान करता येईल असे मला वाटते.
निव्वळ स्वतःची धर्माधारित ओळख कुणी सांगत नसेल म्हणून अन्य अंधश्रद्धांचे पालन तो करतच नसेल, हे कशावरून? शिवाय, अगदी युरोपआम्रिकेबद्दलही तुमचे अॅझम्प्शनच आहे की "अंधश्रद्धा म्हणून न गणल्या जाणार्या गोष्टीही कमी होताहेत तर अंधश्रद्धा म्हणून गणल्या जाणार्या गोष्टीही कमी होत असतीलच." वाक्य तसे बोलायला ठीक असले तरी त्याच्या पुष्ट्यर्थ विदा असल्याखेरीज ते गांभीर्याने घेणे शक्य नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी दिलेला विदा आणि त्यावरून
मी दिलेला विदा आणि त्यावरून मांडलेले अंदाज पुरेसे स्पष्ट आहेत. त्यापलिकडे काही अंदाज मांडणं योग्य ठरणार नाही. कारण इथे विद्याची फारच कमतरता आहे.
हे मुळात सुरू झालं ते लेखकाने 'अंधश्रद्धा कमी होत नाहीत' असं म्हटल्यामुळे. त्यावर मी म्हटलं की हे बरोबर आहेच असं नाही. कारण लेखकाने याबाबत निरीक्षणांपलिकडे काहीच विदा दिलेला नव्हता. त्यामुळे माझ्या अंदाजाच्या समर्थनार्थ मी एकंदरीत शिक्षणामुळे श्रद्धा कमी होत आहेत हे दाखवणारा विदा दिला. 'अंधश्रद्धादेखील अशाच कमी होत असाव्यात' हा अंदाज वर्तवला. चर्चमध्ये जाणारांची संख्या कमी होणं आणि त्याचबरोबर इतरही अंधश्रद्धांचं (१३ नंबर, ज्योतिष, मिडवाईफांच्या गफ्फा) पालन कमी होणं याबाबत माझ्याकडे कुठचंही कोरिलेशन नाही. तेव्हा तुम्हाला गांभीर्याने घ्यायचं नसेल तर अर्थातच तुमची मर्जी. मी म्हणेन की त्यापेक्षा कुठचा विदा गोळा केला तर हा प्रश्न निकालात लागू शकेल, किंवा सोडवण्याबाबत काही प्रगति करता येईल यावर विचार होणं जास्त सकारात्मक ठरेल.
मला गंमत याची वाटते की जेव्हा एखाद्या विधानासाठी जुजबी का होईना, विदा दिला जातो, तेव्हा त्यावर 'हा विदा सूचक असला तरीही पूर्णपणे शाबित करणारा नसल्यामुळे मी त्याविरुद्ध मतावर ठाम विश्वास ठेवणार, माझ्याकडे विदा नसला तरीही!' हा अट्टाहास कसा येतो कोण जाणे. 'श्रद्धा म्हणजे विदा नसताना ठेवलेला विश्वास, आणि अंधश्रद्धा म्हणजे विरुद्ध विदा असतानाही ठेवलेला विश्वास' अशी कोणीतरी व्याख्या केली होती. ती आता पटायला लागलेली आहे.
मला गंमत याची वाटते की जेव्हा
मी अमुक एका गोष्टीवर ठाम विश्वास ठेवतो आहे हा निष्कर्ष काढायला पुरेसा विदा नाही हे लक्षात आणून देऊ इच्छितो. बाकी चालू द्या.
आणि इतरत्र "फक्त विदा मिळवण्याला इतकं महत्त्व असतं तर नोबेल प्राईझ मशीन्सना द्यायला पाहिजे होती" अशी मुक्ताफळे उधळणार्यांनी इथे विद्याच्या बाजूने बोलून पुन्हा वैयक्तिक टीकाटिप्पणी करावी हा विरोधाभास रोचक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अवांतर
हम्म. असाच अट्टाहास क्लायमेट चेंज वगैरेबाबतही पाहण्यात आहे.
आणि इतरत्र "फक्त विदा
तुमची गल्लत होतेय बहुतेक. मी असं म्हटलेलं नव्हतं.
ही कोपरखळी आवडली. माझे अट्टाहास पुन्हा तपासून बघायला हवेत बहुतेक.
???X
उच्चशिक्षितांमध्ये (post-graduate work/degree) इवॅन्जलिकल्स, कॅथलिक, प्रॉटेस्टंट मिळून ७०% लोक दिसतात. ज्यु, इतर मिळवले तर हा आकडा ८०-८५% पर्यंत जावा. म्हणजे धर्माशी निगडीत लोकांचं प्रमाण नक्कीच धर्माशी निगडीत नसलेल्या लोकांपेक्षा अधिक आहे. समजा एकेकट्या पंथ/धर्माशी तुलना केली तरी मेनलाइन प्रॉटेस्टंट सर्वाधिक असावेत.
________
वरचा प्रतिसाद खूप आधीचा आहे. पुन्हा वाचतांना प्रतिसादात 'इतरांपेक्षा उच्चशिक्षितांमध्ये कुठच्याही धर्माशी निगडित नसणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे.' असे काहीसे म्हणायचे असावे असे जाणवले.
अशी स्टॅटिस्टिक्स भारतात
अशी स्टॅटिस्टिक्स भारतात कमीत कमी पुण्यात तरी आहे का हे पहाणे रोचक ठरेल. पण डोळ्यांना जे दिसते ते असे.
कोणतीही टिका नाही, फक्त ऑबर्झवेशन आहे.
१) पुण्यात दगडू शेठ गणपती समोर किंवा नवरात्री मध्ये सारसबागेसमोरच्या देवीच्या दारातील रांग पहा. मला तरी लोक जास्त धार्मिक (दिखाउ का होइना) दिसत आहेत. संकष्टीचे उपवास, पण खुप वाढलेले आहेत. पाठीला लॅपटॉप कानात ब्ल्यु टुथ असलेले तरूण/ तरूणी खुप संख्येने रागेत उभे असलेले दिसतात. साधारण पंधरा विस वर्षापुर्वी असे चित्र नव्हते असे आठवते.
२) मुस्लीम समाजातील स्त्रीयांचे बुर्खा आणि पुरुषांची स्कल कॅप चे प्रमाण वाढले आहे.
कापूसकोन्ड्या
कारणे (काही शक्यता)
- पंधरावीस वर्षांपूर्वी ब्लूटूथ असल्याचे आठवत नाही. (किंवा असलाच, तर फारसा प्रचलित नसावा.)
- वीस बहुधा नाही, तरी पंधरा वर्षांपूर्वी लॅपटॉप जरी बाजारात नुकताच येऊ लागलेला असला, तरी किमती बहुसंख्यांना परवडण्यासारख्या नव्हत्या.
तौबा तौबा! म्हणजे, मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे (नि ती लवकरच "आपल्या" लोकांच्या लोकसंखेला ओव्हरटेक करून जाणार आहे), असे जे आमचे हिंदुत्ववादी शंख करकरून सांगत असतात, ते खरेच निघाले म्हणायचे, क्की क्कॉय?
काहीही
काहीही.
इथे लोकसंख्येचा प्रश्न नाही. प्रमाण बघा बुरखे जास्त दिसतात ते केवळ लोकसंख्या वाढीमुळे नाही असे मला सांगायचे आहे,
हिंदुत्ववादी शंख करुन .........सांगतात ही प्रति़क्रिया तर बकवास आहे.
कापूसकोन्ड्या
>> बुरखे जास्त दिसतात ते केवळ
>> बुरखे जास्त दिसतात ते केवळ लोकसंख्या वाढीमुळे नाही
बरोबर. लोकसंख्यावाढीमुळे नाही तर टू व्हीलर्सच्या बेसुमार वाढीमुळे बुरखे जास्त दिसतात.
शिवाय पूर्वी स्त्रिया घरातच रहात असतील त्या बाहेर पडू लागल्यानेही बुरखे जास्त दिसत असतील.
स्कलकॅपपेक्षा त्या वेगळ्या गोल कॅप असतात (खालच्या चित्रातल्या) तसल्या अलिकडे जास्त दिसतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
'क्की क्कॉय?' कैच्याकै
'क्की क्कॉय?' कैच्याकै एक्स्प्रेसिव आहे! तेवढ्याकरता मार्मिक.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+१
'क्की-क्कॉय'च्या (किंचित) क:पदार्थदर्शक कोपरखळीबद्दल क्या कहने!
केकता क्कपूर?
काल काकूने काकाचे कचेरीच्या कामाचे कागद काळ्या कात्रीने कराकरा कापले?
साधारण पंधरा विस वर्षापुर्वी
नवी बाजू यांनी मांडलेला 'तेव्हा ब्लूटूथ, लॅपटॉप नव्हते' हा मुद्दा वगळला तरीही प्रश्न रहातो की तेव्हा पुण्यात तरुण तरुणी किती होते? १९९१ पासून पुण्याची लोकसंख्या जवळपास तिप्पट झालेली आहे. रांगा दिसणार नाहीतर काय?
तर्कशास्त्रीय विरोध
तुमच्या विरोधात आणि घासकडवी/थत्ते/सन्जोपराव यांच्या समर्थनार्थ काही मुद्दे मला सुचताहेत. पहा पटतात का ते -
तर्क क्र. १ - प्रमाणपत्रे दाखवा
१. १५-२० वर्षापूर्वी पुणे (तरी) होते का?
२. १५-२० वर्षापूर्वी दगडू शेठचा गणपती (तरी) होता का?
३. १५-२० वर्षापूर्वी पुण्यात मुसलमान (तरी) होते का?
४ इ इ
तर्क क्र. २ तांत्रिक चूक झाली आहे. डोळे टक्केवारी पाहू शकत नाहीत. ते केवळ अबसॉल्यूट नंबर पाहतात. टक्केवारीकरिता संस्क्रूती मंत्रालयाची वेबसाईट पाहा
१. लोकसंख्या वीस वर्षांपूर्वी किती, आज किती?
२. शहरीकरणाचा दर किती ते पहा.
३. दगडू शेटची जाहीरात किती प्रभावीपणे होते ते पहा
४. मुसलमानी टोप्या आणि बुर्खे किती स्वस्त झाले आहेत ते पहा.
तर्क क्र. ३ निरीक्षणच चूक आहे
१. तुम्ही पिक टायमाला द ह गणपतीला जाताच कशाला?
२. तुमचे घर मुस्लिम वस्तीच्या जवळ आहे का?
३. शुक्रवारी ४-५ वेळा फिरायला जायची सवय आहे का?
४. दगडूशेटच्या गर्दीच्या वेळी बाकी ओस पडलेले गणपती दिसले नाहीत का?
५. .... ...
तर्क क्र. ४ निरीक्षण योग्य आहे पण त्याचा अर्थ चूक काढला आहे
१. गणपतीच्या जागी राजकारण आणि लाईन मारायला मिळणे हे तिथे येण्याचे हेतू आहेत
२. उन, धूर लागू नये म्हणून अलिकडे आनंदाने बुरखा घातला जातो आहे.
३. वजन कमी करण्यासाठी उपासाची अलिकडे फॅशन झालीय
तर्क क्र. ५ विदा गंडला आहे.
१. पत्रकार मोजले का?
२. धार्मिक पालकांना घेऊन येणारे निधर्मी पाल्ये मोजली का?
३. संयोजक मंडळाची नेहमीची गर्दी वजा करून बोला
४. उर्मिला आली नसती चिटपाखरूही आलं नसतं (दिखाऊ का होईना तुम्हीच म्हणताय ना?)
तर्क क्र्. ६ अभेद्य नियम
१. निरीक्षणाकरिता प्रातिनिधिक स्थानाची/वेळेची/उदाहरणाची निवड करावी. वैशिष्ट्यपूर्ण निवडीने (टोप्या, द ह गणपती, संकष्टीचा उपास) निरीक्षणात चूक येते. सबब निरीक्षणे खरी असली, तरी निष्कर्ष सपेसल चूक आहेत.
२. अलिकडेच (कोलोरॅडो स्टेट यूनि.त) झालेल्या ताज्या संशोधनाप्रमाणे - मनुष्याचे वर्तन त्याच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत नाही. बाह्य वर्तन आणि विचारसरणी यात हजारो घटक असतात. मंजे या गर्दींचा काही अर्थ होत नाही.
आणि ते ब्लू टूथ वालं वाक्य किती चूकसंपन्न आहे. सत्य काय, प्रतिकात्मक काय काहीतरी कळतं का ते वाचताना!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
टाळ्या टाळ्या टाळ्या
टाळ्या टाळ्या टाळ्या
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
दृश्य चिन्हे वापरण्याचे
दृश्य चिन्हे वापरण्याचे प्रमाण वाढले असावे असे वाटते. माझ्या परिचयातले दोन मुसलमान पूर्वी नॉर्मल माणसांप्रमाणे पेहराव (शर्ट-पॅण्ट) करीत असत. हल्ली ते बहुतांशी मुस्लिम पेहरावात (लांब पांढरा सदरा + गोल टोपी ) असतात. [उलट निरीक्षण नाही].
त्याचप्रमाणे पूर्वी (१९९५ च्या पूर्वी) माझ्या परिचयात (सणप्रसंगी) आवर्जून पगडी घालणारे गृहस्थ आणि नथी घालणार्या महिला दिसत नसत. हल्ली मोठ्या प्रमाणात दिसतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हे काय वाचतोय मी???
म्हणजे? मुस्लिम 'नॉर्मल' नसतात, असा आपला दावा आहे काय?
हे काय वाचतोय मी? (आणि तेही, ऑफ ऑल द पीपल, थत्तेचाचांकडून???)
'न'वी काडी?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
रोचक अशी श्रेणी दिली आहे.
रोचक अशी श्रेणी दिली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नैसर्गिक संसाधनं
नैसर्गिक संसाधनं , खनिज संपत्ती त्यातही जीवाश्म इंधनं सान्त आहेत. ती हळूहळू का असेना निश्चित संपत जाणार आहेत ही वस्तुस्थिती आहे.
पण आपण त्याचं टेन्शन घेतो का? अजाबात घेत नाय. "कधीतरी होइल भविष्यात तसं. तोपर्यंत निघेल काहीतरी पर्याय." अशा काहिशा विश्वासाने आपण विसावतो. आहे तेच जोरदार चालू ठेवतो.
म्हणजेच तेव्हा आपण "सध्या आहे ते बरं आहे." असं म्हणत लांबच्या भविष्याकडे दुर्लक्ष करतो. "सध्या" आणि अगदि नजिकचा भावी काळ इतकच पाह्तो.
"सध्या " चा काळ चांगला आहे; भविष्य "चिंता करण्यासारखं आहे" तरी आशावादी बनतो.
.
.
आता हेच श्रद्धा का अंधश्रद्धा जे काय आहे त्याला लागू केलं तर काय होइल? समजा आहे तसाच प्याटर्न सुरु राहिला तर हळूहळू का असेना अंधश्रद्धा/श्रद्धा भविष्यात कमी कमी होत जाणार.
अरे हो. पण कधी? माझ्या जिवंतपणी तरी म्यानेजेबल लेवलला हे प्रमाण येइल ही आशा मी सोडून दिली आहे. तुम्ही "आज चित्र थोडं वेगळं आहे" पण "भविष्यात अजून चांगलं होइल" असा प्रवाह मांडता.
ह्याबाबतीत "सध्या "चा काळ वाईट आहे; भविष्य "चांगले" असण्याची शक्यता आहे; तरी पुन्हा तुम्ही आशावादी बनता.
हैट आहे!
.
.
शिवाय सध्या संथगतीनं जिकडे प्रवास सुरु आहे, तो तसाच तिकडे सुरु राहिल ह्याची काय ग्यारंटी?(मागच्या दोन तीन दशकात मुस्लिम कट्टरतावाद वाढलेला दिसतो म्हणतात, एकूण जागतिक कटक्टींकडे पाहता.
उदा:- सौदी आणि इराण किंवा पाकिस्तान्-अफगाणिस्तान हे कुणीच दोन्-चार दशकांपूर्वी इतके कट्टर नव्हते असे ऐकले आहे. आता मृत्यूनंतर स्वर्गात कुमारी अप्सरा (व्हर्जिन हूर च म्हणतात ना त्यांना?) अनंतकाळ उपभोगता येतील म्हणून इतरांसकट स्वतःला उडवनारे वाढत गेलेले दिसतात.(मनोबा, विदा द्या. जा फुट. देत नै ज्जा.))
कोणीकेकाळी ग्रीसमध्ये आज आधुनिक विचारचौकट म्हणतो त्याच्या अगदि जवळ वैचारिकरित्या समाज येउन पोचला होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही मूल्य मर्यादित प्रमाणावर तरी मानली गेली होती.
तर्काधारित बर्याच गोष्टी होत होत्या. अर्थात ग्रीकांमध्येही बर्याच अंधश्रद्धा होत्याच. पण इस पू काळाच्या मानाने त्यांनी प्रचंड वैचारिक प्रगती केली होती. त्याकाळात कुनी तिकडे पाहून
"हा आलेख असाच वर चढत जाणार" असे म्हटले असते तर त्याच्यावर विश्वास सुद्धा ठेवला गेला असता.
पण मध्येच युरोपचं अंधारयुग टपकलं. चर्चने मुस्कटदाबी सुरु केली आणि हजारबाराशे वर्ष तिथली प्रगती खुंटली. विचार कोंडले गेले.
म्हणजेच trend revrsal सुद्धा होउ शकतो; हे दाखवू इच्छितो.
.
अवांतरः-
पण ह्यासर्वाउप्परही, डिस्पाइट ऑफ ऑल धिस, मानव आजवरचं सर्वोत्तम आयुष्य सध्या जगत आहे असच मला वाटतं. अनेक दुर्दैवी जीव आजही टोकाच्या दारिद्र्यात आहेत. पण अनेकांना बाहेरही काढलं गेलय हे सत्य.
पूर्वी जे घट्ट परंपरेने जखडले होते, त्यातल्या कित्येकांना मोकळा श्वास मिळतोय, हे मागच्या काही हजार वर्षात प्रथमच होतय. संपूर्ण जगात गुलामगिरी त्याज्य ठरली आहे. कुठे चालतही असेल पण आज त्यात सत्तेचा माज
नाही, उच्च वंशाचा दर्प नाही. ती आज एक लपवण्याअसारखी गोष्ट झाली आहे. वेगळ्या वंशाच्या लोकांना हीन समजू नये हे तत्वतः सर्वत्र आणि प्रत्यक्षात बर्याच प्रमाणात आचरनात आणलं जातय.
धर्मग्रंथाच्या विरुद्ध जाणारं संशोधन करायचे किंवा त्याविरुद्ध जाणारे तर्क लिहायचे स्वातंत्र्य आज जगातील बहुसंख्य देशात आहे.(काही कट्टर्वादी अंधारात चाचपडत असलेले देश सोडल्यास).
हे ज्ञात इतिहासात इतक्या मोठ्या प्रमानात प्रथमच होतय. ह्यापुढे मानव जमात नष्ट झाली किंवा उतरणीला लागली तरी ह्या गोष्टीची नोंद राहिलच की एकेकाळी मानव प्रजातीने ह्या सर्व गोष्टी साध्य केल्या होत्या.
असो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ब्रिटनमध्येही गेली तेरा वर्षं
भारतात मला तर उलट चित्र वाटते.
कशाशी तुलना करता? हा मुद्दा महत्वाचा आहे. शिवाय प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते ही मांडणी देखील असते. शोषण करणारी,निरुपद्रवी,कमी हानीकारक वगैरे मुद्दे अशा श्रद्धांच्या बाबत येतात.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
भारतात मला तर उलट चित्र
याचं कारण वाढती लोकसंख्या (प्रत्येक हजारी बाबा-बुवा भक्ताचं प्रमाण कमी होणं) आणि दृष्यमानता वाढणं असं असू शकतं का? पूर्वी लोक फक्त स्थानिक बाबाजींचेच भक्त असतील. आता मौजे मुद्रे खुर्दमधे राहूनही आसाराम, अनिरुद्ध बापूंची "भक्ती" करता येते. मोठ्या बापूंनी छोट्या बापूंचं मार्केट गिळलं असेल का? दळणवळणाच्या प्रगत साधनांमुळे याच बापूंच्या सत्संग किंवा तत्सम कार्यक्रमांना उपस्थिती वाढणं, हे ही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भारतात मला तर उलट चित्र
कसलाच विदा नाही हो, त्यामुळे एकतर वैयक्तिक निरीक्षणांवर अवलंबून रहायचं किंवा 'असं असं होत असावं' अशी थियरी मांडायची. दोन्हीमध्ये विश्वासार्हतेचे प्रश्न आहेतच. मीच तुम्हाला विचारतो, नक्की काय आकडेवारी गोळा केली तर या बाबतीत चित्र स्पष्ट होईल? कारण कुठच्याही प्रश्नाबाबत, यू कॅनॉट कंट्रोल व्हॉट यू कॅनॉट मेजर हे तत्व लागू होणारच.
श्रद्धा की अंधश्रद्धा या काहीशा निरर्थक वादात मला पडायचं नाही. म्हणून मी 'जर सामान्यपणे अंधश्रद्धा न म्हटल्या जाणाऱ्या श्रद्धादेखील कमी होताना दिसतात' असा शब्दप्रयोग केलेला आहे. म्हणजे 'अधूनमधून देवाला नमस्कार करणं चांगलं' ही सामान्यपणे श्रद्धा मानली जात असेल, आणि जर ती कमी होताना दिसली तर 'देवाला बळी दिल्यावर माझं मूल बरं होईल' ही श्रद्धाही कमी झालेली असावी.
...या प्रयोगाचे निष्कर्ष
...या प्रयोगाचे निष्कर्ष ‘करन्ट सायन्स‘ या मासिकाच्या मार्च 2009 च्या अंकात प्रसिद्ध केले होते...
करंट सायन्सचं माहित नाही, पण स्केप्टीकल इन्क्वायरर वर तुम्ही म्हणता तो पेपर आहे.
ही लिंक
http://www.csicop.org/si/show/an_indian_test_of_indian_astrology/
लेख वाचला, आणि अतिशय आवडला.
लेख वाचला, आणि अतिशय आवडला. जयंत नारळीकरांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा सखोल अभ्यास केलेला दिसून येतो.
अंधश्रद्धा सरकारी पातळीवरहि अस्तित्वात आहे...
अंधश्रद्धा सरकारी पातळीवरहि अस्तित्वात आहे ह्याचे उत्तम उदाहरण आत्ता live पाहण्यास मिळत आहे.
शोभन बाबा नावाच्या कोणा बाबाला स्वप्नात दृष्टान्त झाला आहे की दौडिया खेडा नावाच्या उत्तर प्रदेशातील गावातील जुन्या जमीनदारी गढीमध्ये १००० किलो (की टन? जितके दिवस जात आहेत तितके वजन वाढत आहे!) बंडाच्या काळापासूनचे लपवलेले सोने आहे. बाबाची पहुंच केन्द्र सरकारपर्यंत असल्याने पुराणवस्तु खात्याला उत्खनन करून सोने मिळ्ते का हे पाहण्याचे आदेश उच्च पातळीवरून निघालेले दिसतात कारण तसे उत्खनन गेले काही दिवस चालू आहे. जितके दिवस जात आहेत तितक्या नवनवीन आख्यायिकाहि मिर्माण होत आहेत. एका आख्यायिकेप्रमाणे नानासाहेबांनी बंडाच्या अखेरीस परागंदा होण्यापूर्वी हे धन त्या जमीनदाराला सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते. जमीनदाराचे सध्याचे वारस वुडवर्कमधून बाहेर पडून संपत्तीवर दावा करू लागले आहेत. सगळीच मोठी मजा आहे. एक तोळाहि सोने अजून बाहेर पडलेले नाही.
हजार टनाच्या बिनडोक बातम्या छापणार्यांना हेहि दिसत नाही की एका जमीनदारापाशी हजार टन सोने एकगठ्ठा असणे ही गोष्ट अशक्यप्राय आहे. ह्या विकिपीडिया लेखानुसार भारतीय रिझर्व बँकेपाशी सध्या ५५० टन सोने असावे. हजार किलो हाहि आकडा अशक्यप्राय वाटतो.
सर (!)(अर्थात कोचिंग क्लासचे स्वयंघोषित सर) जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री होते तेव्हा 'गणपति (आणि शिवजीकी पूरी फ्यामिली) दूध पी रही है' ही बातमी कानी पडताच हातातले काम टाकून हा चमत्कार ह्याचि देही ह्याचि डोळा पाहण्यासाठी ते टाकोटाक घराकडे रवाना झाले होते हे आपण सर्वांनी वाचलेले स्मरणात असेलच.
सत्य
ही लै सनसनाटी बातमी आहे आणि माध्यमांतून लै चावून चोथा झालेली आहे.
पण नक्की आर्किऑलॉजीवाले तिथे का खोदताहेत त्यासंबंधी ही बातमी उपयुक्त ठरावी. मोठ्ठ्या गैरसमजांतून सरकारास झोडणे सोपेय, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. आणि रोचक गोष्ट अशी की या केसमध्ये कोणी ते पाहावयास उत्सुक दिसत नाही. फेबुवरही या कारणावरून सरकारास झोडणार्यांची चलती आहे सध्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
घोडामैदान जवळच आहे!
पुराणवस्तु संशोधनखात्याच्या ADG दर्जाचा अधिकारी काही वक्तव्य करतो तेव्हा प्रथमदर्शनी ते सत्य मानावे हे खरेच आहे. तदनुसार उत्खनन संपायची वाट पहायला हरकत नाही.
तरीपण संशयाची पाल चुकचुकते तीहि दुर्लक्षिता येत नाही.
ह्या सगळ्या गोष्टीमधील दुवे पहा. प्रथम बाबाला दृष्टान्त होऊन तेथे सोने पुरले आहे असे कळते. त्याच वेळेस भूगर्भ खात्याला त्याच जागी शोध घेऊन "prominent non-magnetic anomalous zone occurring at 5-20m depth indicative of possible non-conducting, metallic contents and or some alloys etc" असल्याचा अंदाज येतो आणि ८ ऑक्टोबरला त्याचा प्राथमिक अहवाल सांस्कृतिक मन्त्रालयाकडे जातो. तदनंतर आठवडयाच्या आत ह्या प्राथमिक अहवालावर अवलंबून पुराणवस्तु खाते galvanize होते आणि तेथे उत्खनन सुरूहि होते. सरकारी लाल फितीत इतक्या युद्धपातळीवर निर्णय युद्धकाळातहि घेतले जात नसावेत!
आपल्या प्रेरणेचा स्रोत म्हणून एकीकडे भूगर्भ खात्याकडे बोट दाखवितांनाच एडीजी साहेब दुसरे एक fig leaf हि हाताशी तयार ठेवत आहेत. आपण येथे केवळ antiquarian remains शोधत आहोत असेहि ते म्हणून ठेवतात. आणखी हातचे म्हणून दीडशे वर्षांपासून बासनात पडलेला १८६२ सालातील एक तर्क हुडकून काढून कोणी विचारलेच तर त्याच्या तोंडावर फेकायला तयार ठेवतात. आता प्रश्न असा उभा राहतो की ते भूगर्भ खात्याचे, तेहि प्राथमिक, मत ताडून पाहात आहेत का antiquarian remains शोधत आहेत? दोन्ही तर एकाच वेळी सत्य असू शकत नाही कारण भूगर्भ शास्त्रला जमिनीच्या खाली असलेली काही अमुक गोष्ट antiguarian महत्त्वाची असावी असे सुचायचे काहीच कारण नाही आणि तो त्यांचा प्रान्तहि नाही.
सांस्कृतिक मन्त्रालयाचे मत मात्र स्वच्छ आहे. त्यांना antiquarian remains ची काहीच वार्ता नाही. त्यांची सर्व भिस्त भूगर्भ खात्याच्या प्राथमिक अहवालावरच आहे. (बातमीतील शेवटचा परिच्छेद पहा.)
सरकारी अधिकृत बाजूशी विसंगत विधान करण्याचे पातक केल्याबद्दल एडीजी साहेबांनाच संकटांचा सामना करण्याची वेळ न येवो!
अन्यत्र पाहिले तर तिथे सोने
अन्यत्र पाहिले तर तिथे सोने असल्याची भुमका फार आधीपासून आहे. त्यासाठीही कदाचित भूगर्भ खात्याशी संपर्क साधला असू शकतो. या बाबाची प्रसिद्धी अकारणच सनसनाटी झालीय असे दिसते.
पण काही गडबड आहे असे वाटू शकण्याला पोषक परिस्थिती आहे खरी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मला इतक्या नीट लिहीता आलं
मला इतक्या नीट लिहीता आलं नसतं म्हणून थांबले होते, पण बातमी वाचून मलाही ते retro-fitting केल्यासारखं वाटलं होतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चकलात
ती बातमी छान आहे. फक्त आणखी प्रश्न निर्माण करते. सामान्यपणे धातूशोध, त्याचे उत्खनन हा खाणमंत्रालयाच्या अखत्यारितला भाग आहे. जर खरोखरच इथे धातूशोध चालू असेल, तर यात खाणमंत्रालयाचा सहभाग कसा नाही. खाणकाम करण्यासाठी वापरली गेलेली पद्धत (संशोधन, प्रस्ताव, खाणमंत्रालयाची मंजुरी, पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी...उत्पादन परवाना इ.इ.) इथे का वापरली जात नाहीये. माझ्या जमिनीत मी थेट खाणकाम करू शकतो का? नसल्यास ASI कसे करू शकते? त्यातून खरेच काही 'धातू' सापडले तर शासन नेहमीच्या पद्धतीने उत्पादकाला परवाना देऊन रेग्युलराईज करणार की त्यावर ASI ची मालकी ठरून त्याना काय वाटेल ते करण्याची परवानगी आहे? थोडक्यात कळीचा प्रश्न हा आहे की जे चालले आहे ते खाणकाम आहे की उत्खनन? हे जे 'धातू' असण्याच्या शक्यतेचा दावा करत आहेत ते धातू खनिजाचा की धातूपासून बनवलेल्या अंतिम उत्पादनांचा. अंतिम उत्पादनांचा असेल तर खाणकामासंबंधीचा माझा आक्षेप बाद ठरतो. पण मग धातूच्या वस्तूंचा शोध इतके विस्तृत खोदकाम करून का करावा लागतो याचे उत्तर ASI देणार आहे का? जर हा त्यांच्या रुटिन संशोधनाचा भाग असेल तर मग हा एवढा फौजफाटा, बंदोबस्त कशासाठी? तो तर सरकारनेच दिला ना, तो का? साध्या पुराणवस्तू खात्याच्या संशोधन-उत्खननाला एवढा बंदोबस्त सोडा साधा निवारा, शिष्यवृत्ती वगैरे पुरेसे पुरवल्याचे आठवते का? तिथे सोने आहे असा विश्वास बसला म्हणूनच हा एवढा खटाटोप ना? ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं.
कारण नि समर्थन यात फरक करायला शिकलं पाहिजे आपण.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
bulls eye
bulls eye
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हे विवेचन
पटणेबल आहे खरे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अंधश्रद्धा आणि स्त्रीवाद
या विषयाबाबत स्त्रियांच्या 'अंधश्रद्धा' पाहिल्यास, पाळीच्या वेळेस बाजूला बसणं सर्रास कमी झालेलं आहे, सोमवारी केस कापू/धुवू नयेत अशा चर्चा कानावर येत नाहीत, काल करवा चौथ होती (म्हणे), तर फेसबुकावर मुली-बायकांनी त्याबद्दल विनोद केलेले दिसले. करवा चौथ, वटपौर्णिमेच्या पालनाबद्दल विदा नाही, पण ५० वर्षांपूर्वी याबद्दल विनोद करणं सोडाच, या प्रथांविरोधात बोलणंही फार कठीण असावं, असं त्या काळाची वर्णनं वाचून वाटतं.
सोवळं-ओवळं या गोष्टी मला माहित नाहीतच, पण माझ्या मते (म्हाताऱ्या लोकांचे अपवाद वगळता) आजकाल हे कोणीही पाळत नसावं. शिवाशिव हा असाच एक त्यागला गेलेला प्रकार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
>>सोवळं-ओवळं या गोष्टी मला
>>सोवळं-ओवळं या गोष्टी मला माहित नाहीतच, पण माझ्या मते (म्हाताऱ्या लोकांचे अपवाद वगळता) आजकाल हे कोणीही पाळत नसावं. शिवाशिव हा असाच एक त्यागला गेलेला प्रकार.
जण्रल रोजच्या आयुष्यात फारसे पाळले जात नाही हे खरे म्हणजे रोज सोवळ्याने पूजा-स्वयंपाक नसतो). पण त्याची ओढ काही गेलेली नाही. महत्त्वाच्या समजल्या गेलेल्या प्रसंगी आजही पाळीतल्या महिला कटाक्षाने अनुपस्थित राहतात. तीन चार वर्षापूर्वीच नातेवाइकांसोबत एका महाराजांच्या मठात जायचा प्रसंग आला. तेथेच मठातच जेवण करूया असा विचार चालू असताना. "मठात जेवायला वाढणार्या बायका सोवळ्याने वाढतात" असा यूएसपी सांगण्यात आला होता.
घरगुती पदार्थ (कुर्डया वगैरे) बनवून विकण्याचा व्यवसाय करणार्याने ते पदार्थ करणार्या महिलांना त्यांच्या त्या काळात पदार्थ बनवायला देत नाही असा यूएसपी सांगितला होता (एका वर्षापूर्वी).
अस्पृष्याच्या घरात न खाणे-पिणे हा अजूनही (न सांगता) पाळला जाणारा आचार आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हे असं होत नाही असा अजिबात
हे असं होत नाही असा अजिबात दावा नाही. पण व्यक्तिगत पातळीवर आणि जेवढ्या प्रमाणात पूर्वी शिवाशिव पाळली जात असे, पाळीच्या वेळेस बाजूला बसणं होत असे किंवा शाळेत या विषयाबद्दल चर्चाच होत नसे तसं आता होत नाही. मुलींचा वेगळा वर्ग भरवून का होईना या विषयाबद्दल माहिती दिली जाते.
समाजातल्या बहुसंख्य लोकांना, कुरडया वगैरेंच्या ग्राहकांना पाळीबद्दल काहीही वाटेनासं झालं की हा यूएसपी रहाणार नाही. किंवा यंत्रांनी हे काम करायला सुरूवात केली की हा प्रश्नच येणार नाही. किंवा (आपल्यासारख्या) ग्राहकांनी याविरोधात आवाज सुरू केला तर त्यांना उलटा प्रचार करणं भाग पडेल.
मुद्दा असा की एकेकाळी जेवढी कडक नियमावली होती तेवढं काही आता राहिलेलं नाही. ही बंधनं शिथील होतानाच दिसतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आधुनिक जीवन पद्धती
थत्ते म्हणतात ते अगदी सत्य आहे. आधुनिक जीवन शैलीमुळे अनेक आचार धर्म पाळले जात नसले तरी ते आपण पाळत नाही म्हणजे आपण काहीतरी पाप करतो आहोत ही भावना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मनातून अंद्धश्रद्धा कमी झाल्या असे म्हणता येणार नाही. नवरात्राच्या दिवसात बायकांनी (फक्त बायकांनीच का हे अगाढ आहे) अनवाणी फिरणे, पितरांना जेवायला बोलावणे वगैरे सारख्या रुढींचा समाजावर पूर्ण पगडा असल्याचे या महिन्यात परत एकदा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत जवळ मोबाईल बाळगला म्हणून अंधश्रद्धा भारतीय समाजातून कमी झाल्या आहेत असे म्हणणे धाडसाचेच ठरेल.
निरोध
नवरात्रीच्या काळात निरोधांचा खपही खूप वाढलेला असतो म्हणे.(विदा गेला चुलित.)
लोक सिलेक्टिवली धर्मश्रद्ध किम्वा एकदम मॉडर्न कसे बनतात हे मला आजवर समजलेले नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
लोक सिलेक्टिवली धर्मश्रद्ध
+१ या कलियुगात लोक एवढे धार्मिक कसे काय होउ लागले ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
लोक सिलेक्टिवली धर्मश्रद्ध
लोक सिलेक्टिवली धर्मश्रद्ध किम्वा एकदम मॉडर्न कसे बनतात हे मला आजवर समजलेले नाही.
सिंपल आहे - लोकांना ज्या गोष्टी त्रासदायक असतात (उदा. सोवळे, रितीरिवाज्/प्रथा पाळणे) त्यावेळी ते मॉडर्न होतात, पण ज्यावेळी असं नसतं(उदा. घर घेताना वास्तुशास्त्राप्रमाणे घेणे, म्हणजे मित्रमंडळीत मिरवता येते)तेव्हा ते श्रद्धाळू होतात.
-अनामिक
+१
श्रावणात धाढी केली नाही तर ती वाढलेली (आणि ट्रिम न करता येणारी) दाढी नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अडचणीची ठरते. म्हणून तिथे मॉडर्न.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आधुनिक जीवन शैलीमुळे अनेक
बरोबर. पण बहुतेक वेळा या भावना माणसांच्या मनातून नष्ट होण्याऐवजी, त्या भावना असलेली पिढी नष्ट होते, आणि पुढच्या पिढीत तो आचारधर्म न पाळण्याबाबतची अपराधी भावनाही नष्ट होते (किंवा कमी होते). या प्रक्रियेसाठी समांतर उदाहरण द्यायचं तर साक्षरतेचं देता येतं. आजपासून जन्माला आलेलं प्रत्येक मूल शिकलं तरी संपूर्ण समाज साक्षर होण्यासाठी किमान पन्नास-साठ वर्षं जावी लागतील. कारण काही प्रमाणावर निरक्षरता असलेल्या आधीच्या पिढ्या तोवर तग धरून असतील.
तुलना ठीक नाही
पिढ्या ओव्हरलॅपिंग असतात. आणि निरक्षर माणसाने अपत्याला साक्षर करणं आणि पापाच्या भावना नष्ट होणं यात खूपच फरक आहे. निरक्षर माणूस स्वतः अपत्याला साक्षर करतो (आपण जसे आहोत त्याच्या विरुद्ध घडवतो). तसा आचारधर्म पाळणारा माणूस (आणि न पाळण्याला पाप मानणारा माणूस) अपत्याला आचारधर्मविरोधी बनवत नाही उलट अपत्यालाही तो आचारधर्मीच बनवायचा प्रयत्न करतो. अपत्याला स्वतःहून आचारधर्म त्यागावे लागतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
माझा मुख्य उद्देश बदलाचं
माझा मुख्य उद्देश बदलाचं डायनामिक्स दाखवण्याबद्दल होता.
तितका फरक नाही. वय वर्षे ४० च्या वरच्या बहुतेक निरक्षर व्यक्ती साक्षर होत नाहीत. तसंच विशिष्ट वयानंतर धार्मिक भावनांमध्ये, रुढींच्या आचरणांमध्ये किंवा तसं आचरण करता न आल्यामुळे येणाऱ्या अपराधी भावनेत फरक पडत नाही.
दुसरं म्हणजे या वाक्यातला 'कर्तरी' भाग बरोबर आहे. म्हणजे त्या त्या व्यक्ती प्रयत्न कुठचा करतात यात फरक आहे. पण त्या प्रयत्नांना यश किती येतं हे बाह्य कारणांवरून ठरतं. म्हणजे शाळांची उपलब्धता, मुलांच्या समाजातली वागणूक (पीअर प्रेशर). यामुळे साक्षर बनणं आणि आचारधर्मी न बनणं या घटना काही प्रमाणात 'कर्मणि' आहेत.
धर्माधारित हिंसा
ह्या संदर्भात धर्माधारित हिंसेच्या प्रमाणाकडे पाहणं रोचक ठरेल का?
स्रोत : http://theweeklynumber.com/1/category/india/1.html
ज्या समाजात धर्माधारित हिंसा मोठ्या प्रमाणावर होत असेल, त्या समाजात बुद्धिनिष्ठ विचार फारसे प्रभावी नाहीत असं म्हणता येईल का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आश्चर्य
भारत, रशिया , इंडोनेशिया ह्यांचा क्रमांक इतक्या वरती पाहून आश्चर्य वाटलं.
खरं तर मला ही यादीच धड समजलेली नाही.
बाकी सौदीमध्ये वैचारिक वाद होत नाहित हे त्यांच्या वैचारिक सामंजस्याचं लक्षण नसून स्मशानामध्ये रखवालदाराशी मुडदे भांडण करु शकत नाहित इतकेच सुचवू इच्छितो.
.
ज्या समाजात धर्माधारित हिंसा मोठ्या प्रमाणावर होत असेल, त्या समाजात बुद्धिनिष्ठ विचार फारसे प्रभावी नाहीत असं म्हणता येईल का?
हे तुम्ही रशियाबद्दल म्हणताय!!?? औद्योगिक क्रांतीपासून(किंवा खरं तर त्याही पूर्वीपासून) ते कम्युनिझमच्या उदयापर्यंत विविध प्रकारे रशियन अवकाश अनेकानेक तत्ववेत्त्या तार्यांनी खच्चून भरलेलं दिसत नाही का?
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
Social Hostilities Index (SHI)
ठीक. दिलेल्या दुव्यावर अधिक माहिती मिळेल.
स्रोत : http://www.pewforum.org/2013/06/20/arab-spring-restrictions-on-religion-...
हे उपरोधिक आहे असं मानतो. सध्याच्या रशियाबद्दल किमान माहिती असेल, तर तिथे धर्माधारित हिंसेत वाढ होणं ह्यात काहीही आश्चर्यकारक नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दुवा
दुवा गंडतो आहे.
वरील विधानात उपरोधिकता नव्हती. टोल्स्टॉय, चेकॉव्ह अशी नावं १९व्या शतकातील रशिया म्हटला की समोर येतात.
रशियाला (जर्मनी,फ्रान्स्,इंग्लंड , इटाली ह्यांच्यासारखं) स्वतःचं असं ठळक अस्तित्व आहे.(फिनलंड , हॉलंड हे इतके ठळकपणे जाणवत नाहित.)
ते अस्तित्व त्यांच्या कला क्रिडा व लष्करी साम
ह्यामुळेच
सध्याच्या रशियाबद्दल किमान माहिती असेल, ह्याचा रोख समजला नाही.
थोडं उलगडून सांगता येइल का? अगदि तपशीलवार नसलं; संक्षिप्त असलं तरी चालेल.
गंभीरपणे म्हणत आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पुतिनचा रशिया
पुतिनच्या रशियात ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती धर्माचा हस्तक्षेप प्रचंड प्रमाणात वाढला आहे. 'पुसी रायट' प्रकरण, समलिंगी लोकांचा छळ, पुतिनचा विरोधक असलेल्या बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हचा छळ, पुतिनविरोधकांना पोलिसांकडून मार असे अनेक प्रकार होत आहेत. गूगल केलं तर सापडेल.
कोणता दुवा गंडतो आहे? मला दुवे सापडताहेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आभार...
आता समजते आहे काय म्हणताय ते.
'पुसी रायट' प्रकरण, समलिंगी लोकांचा छळ, पुतिनचा विरोधक असलेल्या बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हचा छळ, पुतिनविरोधकांना पोलिसांकडून मार असे अनेक प्रकार होत आहेत.
समलैंगिक लोकांचा छळ सोडला तर ह्या सुट्या सुट्या केसेस म्हणून ठाउक होत्या. पण त्याची अशी शृंखला व त्यामागे ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती धर्माचा हस्तक्षेप ह्याची कल्पना नव्हती.
पण साला कडव्या कम्युनिस्ट सत्तेखाली सलग सात आठ दशके काढूनही रशियातील चर्चचा प्रभाव संपुष्टात आला नाही ही गंमतच म्हणायची.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
थोडेसे अवांतर
या विषयावरील चर्चेसाठी खालील धाग्यावर क्लिक केल्यास आपल्या माहितीत भर पडेल ही अपेक्षा.
http://www.ndtv.com/video/player/hum-log/video-story/288250