हत्तीखाना
(आता तिथे खरडफळा निघालेलाच आहे, म्हटल्यावर, Separate But Equal तत्त्वास अनुसरून…)
.
हनुमान सप्त चिरंजीवांपैकी एक असल्याने "हनुमान जन्मोत्सव" योग्य ठरेल.
शिवाय, आमच्यातला एक जण देवपदास पोहोचला, या कारणास्तव आम्हांस त्याचा (यथार्थ) अभिमान आहेच.
(फक्त, तो जर श्रीरामाची चाटूगिरी न करता आपल्या जातीच्या अभिमानास जागला असता, तर अधिक बरे झाले असते, असे राहूनराहून वाटते.
परंतु, चालायचेच.)
माझा एक कायप्पावरील परिचित मला न चुकता दर वर्षी " ह. ज. मुबारक" असा संदेश हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पाठवितो.
_/\_
सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सायकल दिन
सगळ्यांना, विशेषतः सायकलप्रेमी ऐसीकरांना सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने ऐसीवरील सायकल प्रेमींनी त्यांच्या सायकलीवर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठव करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही.
जागतिक परिचारिका दिन
जागतिक परिचारिका दिन
जागतिक परिचारिका दिनाच्या सगळ्यांना, विशेषत: ऐसीवरील परिचारिकांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने ऐसीवरील परिचारिकांनी त्यांच्या पेशाविषयी आणि ते काम करताना येणाऱ्या आव्हानांविषयी एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठव वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही.
परिचारिका हे नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते. परिचारिका म्हणजे केवळ औषधे देणारी व्यक्ती नसते, तर ती रुग्णासाठी आधार, धीर आणि करुणेचे प्रतीक असते. परिचारिका आणि हत्तीमध्ये तर अनेक साम्यस्थळे दिसून येतात. हत्ती हा प्रचंड शक्तिशाली असला तरी त्याचा स्वभाव शांत, संयमी आणि काळजी घेणारा असतो. तो आपल्या कळपातील लहान सदस्यांचे संरक्षण करतो, त्यांना संकटातून बाहेर काढतो आणि त्यांची काळजी घेतो. परिचारिकाही अगदी तसेच करते. ती रुग्णांच्या वेदना समजून घेते, त्यांना मानसिक आधार देते आणि कठीण प्रसंगी धीराने उभी राहते. हत्तीची स्मरणशक्ती विलक्षण असते. त्याचप्रमाणे एक चांगली परिचारिका प्रत्येक रुग्णाची गरज, औषधे आणि उपचार यांची बारकाईने आठवण ठेवते. हत्ती जसा संकटात घाबरत नाही, तशीच परिचारिकाही आपत्कालीन परिस्थितीत शांतपणे काम करते. त्यामुळे करुणा, संयम, सामर्थ्य आणि जबाबदारी या गुणांमुळे परिचारिका आणि हत्ती यांच्यात सुंदर साम्य दिसून येते.
स्वातंत्र्यदिन : इस्राएल …
स्वातंत्र्यदिन : इस्राएल
स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्राएलच्या लोकांना, विशेषत: तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी इस्राएल देशाचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. त्या देशात हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का आणि त्या देशात हत्ती किती याचा त्या लेखात अंतर्भाव करावा ही आग्रहाची विनंती. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठव वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात अजिबात शंका नाही.
इस्राएल आणि हत्ती
इस्राएल हे देशाचे नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते. इस्रायलची तुलना हत्तीशी करायची झाली, तर ती मुख्यतः त्याच्या सामर्थ्य, स्मरणशक्ती आणि जगण्याच्या जिद्दीमुळे करता येईल. हत्ती आकाराने मोठा असतोच असे नाही, पण त्याची उपस्थिती प्रभावी असते. त्याचप्रमाणे इस्रायल भौगोलिकदृष्ट्या लहान देश असला, तरी जागतिक राजकारण, संरक्षणतंत्रज्ञान, कृषी, जलव्यवस्थापन आणि नवोन्मेष या क्षेत्रांत त्याचा प्रभाव मोठा आहे.
हत्ती संकटसमयी शांत दिसतो, पण गरज पडली तर अत्यंत ठामपणे स्वतःचे रक्षण करतो. इस्रायलचाही इतिहास संघर्ष, असुरक्षितता आणि अस्तित्वाच्या लढ्यांनी भरलेला आहे. सततच्या आव्हानांमध्येही त्याने तंत्रज्ञान, सैन्यशक्ती आणि राष्ट्रीय एकजूट यांच्या आधारे आपली ओळख टिकवली.
हत्तीची स्मरणशक्ती प्रसिद्ध आहे. इस्रायलच्या राष्ट्रीय मनातही इतिहास, वेदना, विस्थापन आणि पुनर्निर्माण यांची खोल स्मृती आहे. म्हणूनच इस्रायल हा हत्तीप्रमाणे—लहान जागेत उभा असलेला पण दूरवर प्रभाव टाकणारा, स्मरणशील, सजग आणि कठीण प्रसंगी अदम्य ठरणारा देश वाटतो.
जागतिक सदसद्विवेकी आक्षेप (Conscientious Objection) दिन
जागतिक सदसद्विवेकी आक्षेप (Conscientious Objection) दिन
सगळ्यांना, विशेषत: सदसद्विवेकी आक्षेप (Conscientious Objection) क्षेत्रात कामाला असलेल्या ऐसीकरांना जागतिक सदसद्विवेकी आक्षेप (Conscientious Objection) दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने त्या क्षेत्रात कामाला असलेल्या ऐसीकरांनी जागतिक सदसद्विवेकी आक्षेप (Conscientious Objection) क्षेत्राची ओळख करून देणारा एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठव वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात अजिबात शंका नाही. तसेच त्या क्षेत्राशी हत्तीचा संबंध कसा याचा अंतर्भावही त्या लेखात करावा ही आग्रहाची विनंती.
उदाहरणादाखल...
...तुम्ही जर समजा उद्या ठरवलेत, की हे सगळे पायदळी तुडविणे, चेंदामेंदा करणे वगैरे तुमच्या स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीस पटत नाही. आणि, कळपातील बाकीचे हत्ती पायदळी तुडविणे, चेंदामेंदा करणे वगैरे उद्योगांस समूहाने बाहेर पडलेले असता जर का तुम्ही हे कारण देऊन घरी बसून राहिलात, तर तुम्ही सदसद्विवेकी आक्षेपी हत्ती ठरू शकता.
??? 🤣
नाही म्हणजे, 'योगदान' म्हटले असतेत, तर ते एक वेळ समजू शकले असते, कदाचित मान्यही करता आले असते.
परंतु, 'त्याग'??????
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
(हं, पो टाकण्याला 'त्याग' म्हणून संबोधीत असलात, तर गोष्ट वेगळी. (तसाही, एका प्रकारे 'त्याग'च आहे तो, त्यामुळे, एका अर्थाने तुमचा दावा अगदीच चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही, म्हणा...))
(अतिअवांतर)
तसेही, 'संन्यास' आणि 'संडास' या दोन्हीं शब्दांची व्युत्पत्ती सारखीच — 'कशाचा तरी त्याग' या संकल्पनेतून उद्भवणारी (फक्त स्केलचा फरक, इतकेच.) — असल्याच्या संदर्भातील चर्चा येथे 'ऐसी'वरच पूर्वी झालेली आहे. (दुवा.)
(फक्त, व्युत्पत्तीचा स्रोत दर्शविणारा त्या चर्चेतील दुवा आता बदललेला आहे; तो असा पाहिजे, इतकेच.)
असो चालायचेच.
दिनवैशिष्ट्यातील उल्लेख
१९३० : मुंबईत सरदार वल्लभभाई पटेल, पं. मदनमोहन मालवीय, जयरामदास दौलतराम यांना ब्रिटिशांनी अटक केली.
स्वातंत्र्यलढ्यात हजारोंनी स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रज पोलिसांनी अटक केली होती. मग मुद्दामून या दोघांनाच अटक केल्याचा उल्लेख दिनवैशिष्ट्यांमध्ये का केला आहे? त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी केलेल्या त्यागाचे अवमूल्यन करायचा कोणताही हेतू हत्ती परिवारातील कोणाचाही नाही. या दोघांनाच अटक केल्याचा मुद्दामून उल्लेख केला गेला आणि इतरांच्या अटकेचा असा उल्लेख केला गेला नाही तर इतरांच्या त्यागाचे अवमूल्यन मात्र होईल अशी साधार भीती हत्ती परिवाराला वाटते.
विनम्र अभिवादन
माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४)
विनम्र अभिवादन. राजीव गांधी हे नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते.
राजीव गांधी यांची तुलना हत्तीशी करायची झाल्यास ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणि राजकीय कारकिर्दीतील काही वैशिष्ट्यांच्या आधारे रूपकात्मक पद्धतीने करता येईल.
हत्ती हा आकाराने प्रचंड आणि शक्तिशाली प्राणी आहे; मात्र सामान्यतः तो आक्रमकतेपेक्षा शांतपणा आणि संयमासाठी ओळखला जातो. राजीव गांधींच्या व्यक्तिमत्त्वातही काहीसा असा स्वभाव दिसून येतो. राजकारणात प्रवेश करण्याची त्यांची मूळ इच्छा नव्हती. वैमानिक म्हणून वेगळे आयुष्य जगणारे राजीव गांधी परिस्थितीमुळे राजकारणात आले आणि १९८४ मध्ये अचानक भारताच्या पंतप्रधानपदाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली. जणू एखाद्या शांत हत्तीला अचानक मोठ्या कळपाचे नेतृत्व करावे लागावे, तशी त्यांची परिस्थिती होती.
हत्तीची आणखी एक खासियत म्हणजे त्याची ताकद. परंतु केवळ ताकद असणे आणि तिचा प्रभावी वापर करता येणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राजीव गांधींकडे लोकसभेत अभूतपूर्व बहुमत होते. त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड राजकीय शक्ती होती. सुरुवातीला आधुनिक तंत्रज्ञान, संगणकीकरण आणि दूरसंचार यांना प्रोत्साहन देत त्यांनी भारताला नव्या युगाकडे नेण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, प्रचंड शरीर असलेल्या हत्तीला अचानक दिशा बदलणे अवघड असते. त्याचप्रमाणे विशाल आणि गुंतागुंतीच्या भारतीय प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेत बदल घडवणे राजीव गांधींसाठीही सोपे नव्हते. शाहबानो प्रकरण, श्रीलंकेतील हस्तक्षेप आणि बोफोर्स वादामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला.
त्यामुळे राजीव गांधी आणि हत्ती यांची तुलना मुख्यतः शांत स्वभाव, प्रचंड शक्ती, मोठी जबाबदारी आणि त्या शक्तीला योग्य दिशा देण्यातील आव्हाने या चार वैशिष्ट्यांच्या आधारे करता येईल.

विनम्र अभिवादन
गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१),
गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१),
अभिनेते शरद तळवलकर (२००१),
सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६),
साक्षेपी संपादक व प्रकाशक श्री.पु. भागवत (२००७)
विनम्र अभिवादन.
मात्र यापैकी कोणाचेही नाव उच्चारले तरी नकळतपणे मनात एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहत नाही. विशेषत: शरद तळवलकरांचे नाव घेतले तर अजिबात नाही.
देश
आज कोणत्याही देशाचा स्वातंत्र्यदिन, राष्ट्रीयदिन किंवा प्रजासत्ताकदिन नसल्याने आज कोणत्याही देशातील लोकांना त्या दिनाच्या शुभेच्छा नाहीत. असा कोणताही दिन नसल्याने कोणत्याही देशातील लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना त्या देशाचा इतिहास, भूगोल आणि त्या देशातील लोकांचे राहणीमान यावर लेख लिहायची विनंती नाही, कोणत्याही देशातील लोकांना त्यांच्या देशात हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये किती यांचा त्या लेखात अंतर्भाव करायची विनंती नाही. मुळात लेख लिहायचीच विनंती केली नसेल तर मग तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल याची शक्यताच नाही.
असाच एक चित्तथरारक प्रसंग...
अनेक वर्षांपूर्वी माझ्या शेजार्याच्या बॅकयार्डात एक भुंकणारा चतुष्पाद राहात असे. (तसा अतिशय प्रेमळ होता. गेऽला बिचारा.) त्याला त्याच्या हद्दीत (मनुष्य वगळल्यास) दुसरा कोठलाही प्राणी (अगदी दुसरा कुत्रासुद्धा) आलेला खपत नसे. (आणि, त्यात पुन्हा, त्याची माझ्याबद्दलची समजूत ही काहीशी तो आणि मी लहानपणी एक तर चतु:शृंगीच्या जत्रेत नपक्षी आमच्या ग्विनेट कौंटी फेअरमध्ये हरवलेले जुळे भाऊ होतो, नि हिंदी पिच्चरमध्ये जेणेकरून असे (लहानपणी जत्रेत हरवलेले जुळे) भाऊ हे मोठे झाल्यावर त्यातला एक चोर तर दुसरा पोलीस, किंवा (धार्मिक ऐक्य वगैरे दाखवायचे असल्यास) एक हिंदू तर दुसरा मुसलमान, किंवा यांचे कोठलेतरी पर्म्युटेशन अथवा काँबिनेशन दाखवतात, तद्वत, मोठेपणी तो कुत्रा झाला नि मी माणूस झालो, अशा धर्तीवरची होती. त्यामुळे, मधले कुंपण ओलांडून तो माझ्या बॅकयार्डात येऊ जरी शकत नसला, तरीसुद्धा, माझ्या बॅकयार्डाबद्दलही त्याची भावना ही तितकीच टेरिटोरियल होती. एकदा माझ्या बॅकयार्डात ससा की कासव कोणीतरी आले असता — ही दोन्ही श्वापदे आमच्याकडे क्वचित डोकावून जात — बॅकयार्ड माझे, परंतु त्यावरील हे अतिक्रमण त्याला सहन न होऊन त्याने भुंकून भुंकून घर डोक्यावर घेतले होतेन्. तर ते एक असो.)
तर सांगायची गोष्ट, आमच्या घरामागे एक मोठे तळे असल्याकारणाने, (स्थलांतराच्या) सीझनात अनेकदा बदकांचे नाहीतर कॅनडा गीज़चे थवे येऊन जातात. नि येतात तसे लोकांच्या बॅकयार्डांतून, झालेच तर आख्ख्या सबडिव्हिजनभर (मराठीत: सोसायटीभर) आपल्याच तीर्थरूपांची मालमत्ता असल्यासारखे भटकतात. झालेच तर, सगळीकडे हिरवेगार हगून ठेवतात. तर तेही एक असो.
तर एकदा अशाच एका बदकांच्या जोडप्याला आमच्या या जुळ्या भावाच्या बॅकयार्डात उतरण्याची दुर्बुद्धी झाली. तसा हा सामान्यतः डोक्याने अतिशय शांत; परंतु, तेव्हा मात्र याचे टाळके सटकले, नि त्या जोडप्यापैकी एकावर झडप घालून याने त्याला फाडले. (फाडून खाल्ले नाही. नुसते फाडले.) आता, बदकांना अक्कल नसते, किंवा कसे, ते मला ठाऊक नाही, परंतु, हे सगळे होत असताना, त्या जोडप्यातले दुसरे जे बदक होते, त्याने तेथून उडून जाण्याचा यत्किंचितही प्रयत्न न करता, हा कसा आपल्याबरोबरच्या दुसर्या बदकाला फाडतोय, ते शांतपणे बघऽत बसले. झाले. पहिल्याला यथेच्छ फाडून झाल्यावर याने दुसर्यालासुद्धा तस्सेच फाडले. दोघांना फाडून झाल्यावर मात्र याला पश्चात्ताप झाला असावा. कारण, त्यानंतर तो आपल्या आजूबाजूला पडलेल्या पिसार्याकडे पाहात, अत्यंत केविलवाण्या नजरेने, 'काय काय करावे लागते बिचार्या कुत्र्याला दिवसातून'-छापाचे अतिशय दु:खी भाव डोळ्यांत आणून हिंडत होता. चालायचेच.
(एकदा आमच्या या जुळ्या भावाने — आमच्या भेटी या सामान्यतः आमच्यामधील कुंपणापाशी होत — मला यत्किंचितही कल्पना नसताना नि माझी तशी यत्किंचितही अपेक्षा नसताना (माझी अपेक्षा हा फार फार तर माझे थोबाड चाटेल, अशी होती!), अचानकपणे पार माझ्या घशापर्यंत जीभ घालून अत्यंत उत्कट असा मौथ-टू-मौथ किस दिला होतान्. त्या चित्तथरारक अनुभवापैकी, 'कुत्र्याची लाळ खारट असते' एवढे एकच माझ्या आजतागायत लक्षात आहे; नव्हे, माझ्या स्मृतिपटलावर कायमचे कोरले गेलेले आहे. इतके, की, आजमितीससुद्धा मी ते शपथेवार सांगू शकतो. असो.)
(जुळ्या भावावरून आठवले. एकदा मी याच्याबद्दल माझ्या (तेव्हा लहान) मुलाला, "He thinks that I am his twin brother. In fact, he expects you to call him 'Uncle'." म्हणून सांगितले होते. माझ्या मुलाने तेव्हा मला दिलेली चमत्कारिक नजर माझ्या मनात आजही घर करून आहे. असो चालायचेच.)
>>> 'कुत्र्याची लाळ खारट…
>>> 'कुत्र्याची लाळ खारट असते' एवढे एकच माझ्या आजतागायत लक्षात आहे;
हा हा. शेवटी आयुष्यातले अनुभव पारिजातकाच्या फुलांसारखे असतात. जरी तासाभरात कोमेजून गेली तरी त्यांचा दरवळ मनाच्या कोंदणात भरून राहतो.
आम्ही एकदा घरात मांजर पाळण्याचा असफल प्रयत्न केला होता (सध्याची ऑफिसात आहेत). तर आम्ही राहतो पाचव्या मजल्यावर आणि आजूबाजूच्या प्रत्येक बाल्कनीत कबुतरं असायची. आणि मांजरं अतिशय निर्भीड आणि एजाइल असल्यानं, आमची मांजर सहज एका बाल्कनीतून दुसऱ्या बाल्कनीत जायची. कधीकधी ती अशी उतरत उतरत खाली पार्किंगपर्यंत जाऊन माझी वाट बघत बसायची. तर तिला शिकारीचा फार नाद होता. एकदा आमच्या बाल्कनीत कबुतर मारलं. पण खाल्लं नाही. मारून ठेवलं. मग आमच्यासारख्या काहीश्या मंद शहरी लोकांना मेलेलं कबुतर कसं डिस्पोज ऑफ करायचं याचा काहीच अंदाज नव्हता. म्हणून आम्ही ते सुपलीत भरून कचऱ्यात टाकलं. त्यातही ते ओल्या कचऱ्यात टाकायचं कारण ते बायोडिग्रेडेबल आहे अशी चर्चा करून आम्ही भाजीपाला इत्यादी असलेल्या कचरापेटीत एक संबंध मेलेलं कबुतर टाकलं. आणि कचरेवालीने आपल्याकडे बघू नये याची पूर्ण काळजी घेऊन आधीच कचरा बाहेर ठेवून घरात बसलो. पण भाजीपाल्यात मेलेलं कबुतर बघून तिला काय वाटलं असेल हा प्रश्न आजही अनेकदा माझ्या डोक्यात येतो.
नंतर आमच्या मांजरीने तुमच्या त्या चतुष्पादाप्रमाणे तिच्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. एकदम अटकेपार झेंडा लावायचा निग्रह वगैरे केला. त्यामुळे आम्हाला रोज सकाळी साधारण ७ वाजता बिल्डिंगच्या इंटरकॉमवर फोन येऊ लागले. एरव्ही या इंटरकॉमवर एखादे (किंवा ३-४) पुस्तकं रचलेली असतात. आणि तो वाजल्यावर आम्ही, कसला आवाज येतो आहे? असं एकमेकांना विचारतो.
तुमच्या मांजरीने आमच्या बाल्कनीत कबुतर मारले आहे. ते साफ करायला या.
मग कधी पहिला मजला. कधी तिसरा. कधी पाचवाच पण शेजारची बाल्कनी. असं एक एक घर रोज बघता येऊ लागलं. त्यानिमित्ताने अनेक ओळखी झाल्या. म्हणजे मला लोकांशी आपणहून जाऊन बोलायला आवडत नाही. म्हणून मी सोसायटीत खडूस/शिष्ट वगैरे म्हणून प्रसिद्ध आहे. याउलट माझा नवरा कुणाला भेटला की फारच आपुलकीने बोलतो. त्यामुळे सुपलीत मेलेलं कबुतर घेऊन, कोणत्या कंपनीत काम करता? हिंजवडीला कसे जाता? तुमच्या जाईच्या वेलाची एक फांदी नेऊ का? वगैरे प्रश्न विचारून नवऱ्यानं खूप ओळखी करून घेतल्या. पण काही दिवस असे गेल्यावर तो मला म्हणाला, आता मला रोज सकाळी रक्त बघून दिवसाची सुरुवात करायचा कंटाळा आला आहे. तुझं मांजर प्रेम मी समजू शकतो. लेकिन अब मेरे से ये नही हो पायेगा. मग काही दिवस मी एकटी गेले कबुतरं उचलायला. पण मग आम्ही एकत्रितपणे निर्णय घेऊन त्या मांजरीला तळमजल्यावरच्या एका घरात देऊन टाकलं.
पण आमच्या इथली किमान ५० कबुतरं कार्पोरेशनच्या कचऱ्यात गेली असतील. कदाचित नंतर ती यायची थांबली म्हणून कचरेवालीला दुःख झालं असेल.
त्यापेक्षासुद्धा…
…बंगाली भाषेत ‘बोका’ या शब्दाला एक सामान्य वापरातला अश्लील प्रत्यय लागून एक विशेषणवजा (अप)शब्द निर्माण होतो. ते विशेषण लावून जर नाव घेतले असते, तर बहार येती.
गंमत म्हणजे, बंगालीत 'बोका' या शब्दाचा अर्थ साधारणतः 'येडा' किंवा फार फार तर 'मूर्ख' असा काहीसा होतो. त्यामुळे, असे नाव घेतले असता त्यातून फारसा अनर्थकारक असा अर्थ निघू नये. विशेषेकरून, आंतरप्रजातीय संबंध तर त्यातून सूचित होऊ नयेतच नयेत. फार फार तर 'यज्ञात झोपणारा’ इतकाच अर्थ होईलसे वाटते. (ते तर काय, आपला हत्ती आहेच; त्यामुळे, चपखल बसून जाईल.)
परंतु, कसे आहे ना, की सामान्य मराठी माणसाचे सामान्य अज्ञान हे थक्क करणारे असते. (अहो, साधे ‘सौ.’ म्हणजे ‘सौजन्य’ हे समजत नाही यांना. भलताच अर्थ घेतात. अर्थात, त-वरून ताकभात-तपेले न ओळखता थेट तिरडी नाहीतर तेराव्यावर उतरणारी जमात ही; त्यामुळे, चालायचेच.) तेव्हा, या नावाचा नक्कीच चुकीचा अर्थ लावला जाईल. त्यामुळे, आणखी मजा येईल.
असो.


जयंती हा शब्द
मर्त्य (व्यक्तींच्या) संदर्भात वापरतात (चू भू द्या घ्या).
हनुमान सप्त चिरंजीवांपैकी एक असल्याने "हनुमान जन्मोत्सव" योग्य ठरेल.
माझा एक कायप्पावरील परिचित मला न चुकता दर वर्षी " ह. ज. मुबारक" असा संदेश हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पाठवितो.