अवसान, हिंमत, धाडस
फार फार मागे, कोणे एके काळी घडलेली; पंचतंत्रात असते तशीच, त्याच काळातली ही एक गोष्ट.
जंगलातले ससे चपळ झाले की सिंह सुस्तावले सांगता येणार नाही. पण येनकेन प्रकारे सिंहांना सशांची शिकार करता येणे अवघड होउ लागले; दुरापास्त होउ लागले.
नव्या सावजांना कसे शोधता येइल ह्याबद्दल विचार करत हळूहळू खंगत जाणारे ते सिंह चिंतित बसले होते.ते फारच अश्क्त दिसू लागले होते. इतक्यात आलेल्या मानभावी सेवकाने, कोल्ह्याने त्यांचे लक्ष विचलित केले. "तू का आलास रे बाबा आता" असं एक वयोवृद्ध सिंह आयाळाला बाजूला सारत गुरगुरत बोलता झाला.
"चिंता कसली दिसतेय सर्व वनश्रेष्ठींच्या मनी, ते जाणून घ्यावे म्हणून यावेसे वाटले." कोल्हा वदला.
सिंहांनी चिंतेचे कारण सांगितले.कोल्हा खुदकन हसला. सिंहांनी कारण विचारताच ते शिताफीने टाळून शिकार मिळवून द्यायचे वचन त्याने दिले; अर्थातच शिकारीतला आपला माफक हिस्सा कबूल करुनच तो निघाला.
.
तिकडे ससे बर्यापैकी खूश होते. हल्ली शिकार्यांचे; विशेषत: सिंहांचे हल्ले सपशेल अपयशी होउ लागले होते. पण दरदिवशी नव्याने हल्ला करायचे सिंह काही सोडित नव्हते. रोज रोज ह्यांच्यापासून पळण्यापेक्षा एकदाच काय ते कायमचे नीट करताच येणार नाही का असं आता सशांमधल्या काहिंना वाटू लागलं.
इतक्यात कोल्ह्याची चाहूल लागली म्हणून सगळे सावध झाले. आपापल्या बिळात खोलवर शिरुन बसले. पण कोल्ह्यानं त्यांना विश्वासात घेतलं. आपलं आधीच पोट भरलय हे पटवून दिलं नि हिताच्या चार गोष्टी बोलायला बाहेर बोलावलं.
"अरे मला कसले घाबरताय? मी तर असा एकटाच, तोही थकत चाललेला." उसासा टाकत कोल्हा बोलला.
"बाबा रे , तू असशील एकटा आणि म्हाताराही . पण म्हणून आम्हाला खायचं सोडशील का?" एक जरासा वृद्ध म्हणाला.
"अरे मीच काय कुणीही तुम्हाला एकट्या दुकटा गाठून खाउन टाकतं. आम्ही दिसलो की तुम्ही सैरावैरा पळता. जरा पहा, मी हा असा एकटा. तुम्ही हे एवढे शंभराच्या घरात. आलात अंगावर धाउन एकाच वेळी, तर काय बिशाद आहे आमची कुणाला काही करायची. "
ज्येष्ठ ससा गालातल्या गालात हसला. पुढल्याच क्षणी सचिंतही झाला. एक तरुण ससा मात्र सळसळत्या उत्साहाने विचार करु लागला. प्रतिकार करण्याच्या कल्पनेनं भारावून गेला. "हो नक्कीच. आम्ही इतके सारे आहोत. आम्ही का घाबरावं." तो तरुण ससा जोरकस बोलता झाला. हळूह़ळू इतरांनाही आपल्या बाजूला प्रवृत्त करु लागला. पोक्त सशाचं अनुभवाचं शहाणपण मात्र कुणीच ऐकून घ्यायच्या तयारीत नव्हतं. एकापाठोपाठ एक ससे त्या विचाराने प्रभावित होउ लागले. नव्या विचारांची जणू साथ पसरु लागली. झालं; सिंहांना अद्दल घडवायचं भरपूर संख्येनं असलेल्या सशांच्या मनी बसलं. कोल्ह्याच्या सूचनेनुसार सगळ्या धाडशी सशांनी त्या मूठभर सिंहांवर ऐन रात्रीच हल्ला करायचं ठरवलं.
ते रात्री निघाले. निबिड अरण्यात, दाट झाडीतून, चिखल वाटेतून आणि घट्टगडद पसरलेल्या नि वाळलेल्या पालापाचोळ्यावरून ते मोठ्या आवेशाने निघाले. ह्या सशांपासून दूर कुठेतरी दोन डोळे मिश्किल चमकले. डोळे मिटून नि मनात गुदगुल्या करुन घेत स्वस्थ अंधारात रमले.
बराच वेळ झाला होता. ससे बरेच अंतर चालून आले होते.सिंह नजरेच्या टप्प्यात आले. सशांनी ठरल्याप्रमाणे अगदि जवळ जाईपर्यंत काहीही गोंगाट केला नाही. सिंह आता त्यांच्या अगदि समोर होते. ससे सर्व शक्तीनिशी आता त्या सर्वांना यथाशक्ती गुद्दे घालणार होते. एकेकट्याचे गुद्दे काहीच नसले तरी सर्वांचा एकत्रित परिणाम फार मोठा होणार ह्याची त्यांना खात्री होती!
त्या सर्वांनी सिंहाला घेरले. आणि हाय रे दैवा !!
त्याच वेळी झोपेचे सोंग घेत असलेला तो सिंह जागा झाला. प्रचंड मोठ्यानं फोडलेली त्याची डरकाळी, त्यावेळचा त्याचा आवेश नि अजस्त्र्/हिंस्त्र रूप पाहून्च काही ससे गलितगात्र झाले.काही घाबरुन तिथेच धापकन पडले, ते पुन्हा न उठण्यासाठीच. एकानं कशी बशी हिम्मत करुन सिंहाच्या पंजापर्यंत जायचा प्रयत्न केला नि सिंहाला भलताच आनंद झाला. आयती शिकार मिळते म्हटल्यावर तो कशाला सोडातोय. पंजाशी खेळणार्या त्या चिमुरड्या सशाला तत्क्षणी कचकन चिरडत त्यानं त्याच्या नरडित नखं खुपसली. दुसर्या पंजानं अजून एकास धरले. बजूलाच पडलेल्या अजून एका सशाला त्याने नुसत्या तोंडातील तीक्ष्ण दातांनी उचलून चावायला, गिळायला सुरुवात केली.
दोन पंजाखाली दोन नि तोंडात एक अशी मस्त मेजवानी त्या उपाशी वनराजास मिळाली. त्याचे रौद्र रूप पाहून आता मात्र उरलेलेही ससे गांगरले. गोंधळले.सैरावैरा धावू लागले. वाट फुटेल तिकडे जीवाच्या आकांताने भयचकित जीव पळाले.अगदि स्वतःच्या कित्येक जातीबांधवांना ढकलत्,बाजूला सारत, कशाचेही भान न ठेवता ते निघाले. कुणी धावता धावता ठेचकाळले. कुणी धक्का लागून ओढ्यात पडले. कुणाच्या नशीबी कपाळमोक्ष आला. आपल्या रक्ताने जमीन लालच लाल करत त्यांचा प्रवास सुरु होता, वाचण्यासाठी! मारण्यासाठी नव्हे!
.
धावता धावता एक ससा दुसर्याला म्हणाला..."काय चुकलं? असं कसं झालं? आपण तर इतके सारे होतो ना."
दुसरा म्हणाला "पण म्हणून काय झालं> ? आपण ससे आहोत ना."
पाहिला उत्तरला:- "पण सिंहामध्ये आणि सशांमध्ये असं काय वेगळय? हिंमत त्यांच्याइतकी आपणही आणलीच होती की. "
दुसरा बोलला :- "आपण आणलं ते नुसतं सिंहाचं काळीज. माणसं ह्याला उसनं अवसान म्हणतात, तसं काहीसं.
सिंहाचं काळीज सिंहालाच शोभतं. आपलं सध्या तितकं सामर्थ्य तरी आहे का? "
पहिल्याला आत्ता कुठे जाणवलं. जे होतय त्यातली गोम उमगल्यासारखं त्याला वाटलं. पण तरीही त्याला प्रश्न पडलाच.
"म्हणजे मग आपण कायम असच घाबरायचं? पळायचं? धूम ठोकायची? सिंहांना कधीच धडा शिकवू शकणार नाही आपण?"
.
धावणारा दुसरा ससा किंचित गूढ स्मित करत बोलला "धडा शिकवूयात की. अगदि जरूर शिकवूयात. पण आपण असं त्यांच्यासारखं लढणं हे त्यांच्याच पथ्यावर पडणारं आहे.अरे आपली खासियत पळणं. आपण अधिक चपळ व्हावं. अधिक जोरात पळावं. अगदि एकानंही सिंहाच्या हाती लागू नये. मग तो उपाशी राहणार नाही का? दरवेळी हल्ला केलाच पाहिजे का? आपण त्याच्यावर हल्ला करणं काय नि त्यानी आपल्यावर करणं काय, ते त्याच्याच हिताचं नाही का?"
.
पहिल्याला आता सारं सारं समजलं. पण आपल्या आप्तांच्या किंकाळ्या त्याला आता अस्वस्थ करत होत्या. इतक्या दूर आल्यावर त्याला ऐन रणात पडलेल्या आपल्या सुहृदांची आठवण झाली.हे जाणवून दुसरा बोलला "अरे ते पडलेत त्यातही तुझच हीत आहे. ते तिथे आहेत, म्हणून सिंह तिथे गुंतलाय. ते सुटले असते, तर ह्याक्षणी कदाचित सिंहाच्या जबड्यात तू लटकत राहिला असतास! नि ते अलगद माझ्यासोबत आले असते. तथा, अधिक शोक करु नकोस. धावणे हाच तुझा धर्म. तोच कसोशीने पाळ.धाव, अधिक जोरात धाव. उत्तम धावक हो . नि त्यातच अधिकाधिक उत्तमतेचा ध्यास घे. धावशील तर वाचशील. समोरासमोर दोन हात करु गेलास तर मरशील. सिंहाचे सामर्थ्य आल्याशिवाय फुकाचे सिंहाचे काळीज असल्याचा आव आणू नकोस"
--मनोबा
प्रतिक्रिया
(No subject)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जबरि : )
जबरि : )
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
छान
छान
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ?
तेच वाट्टेय.
तेच वाट्टेय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तसे नसावे, असे वाटतेय, पण...
...नक्की काय, ते कळत नाहीये.
किंवा असेही असू शकेल-क्ष य झ
किंवा असेही असू शकेल-क्ष य झ शी लढायचे तर त्याच्याच शस्त्राने लढावे लागेल. का? तर स्वतः आत्ता आहोत त्या परिस्थितीत कुचकामी आहोत म्हणून. इथे मग व्यवस्था आणि सामान्य माणूस, सध्याच्या काही घटना, वैग्रे परिमाणे लावता येतील कदाचित.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
साशंक
नेमके कसे?
(No subject)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
?
गोष्ट रोचक आहे, हे निर्विवाद. पण यातून नेमके काय सुचवायचे आहे, नेमकी कशावर ही टिप्पणी आहे, नेमके कशावरील हे रूपक आहे, ते बहुत विचाराअंतीसुद्धा लक्षात येत नाहीये.
आपल्याला ते लक्षात आले असावे, असे आपल्या प्रतिसादावरून वाटते. कृपया सर्वांच्या सुविधेसाठी ते स्पष्ट करू शकाल काय?
आभारी आहे.
+१
दिल्लीच्या घटनेसंदर्भात टिप्पणी असावी असं सुरूवातीला वाटलं. पण उत्तरार्ध वाचून असं वाटलं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
संबंध लावता येईलही हवे तर, पण साशंक आहे
उत्तरार्धाचासुद्धा दिल्लीच्या घटनेशी कदाचित (ओढूनताणून) संबंध लावता येईल, परंतु लेखकाचा तसा हेतू असण्याबद्दल साशंक आहे.
उदाहरणार्थ:
आपल्याकडे "समाजात वेश्या आहेत, म्हणून आपल्या आयाबहिणींची लाज सुरक्षित आहे" असा एक (माझ्या मते अत्यंत घृणास्पद आणि बिनडोक) युक्तिवाद सर्रास फेकला जातो. आणि दिल्लीसारख्या घटना घडल्या, की असले फुसके आणि फुकटचे युक्तिवाद फेकणारांस तर ऊत येतो. त्याच्याशी याचा (बादरायण)संबंध जोडता यावा.
मात्र, तो प्रिमाइस धरल्यास, इतर अनेक बाबी जुळत नाहीत. उदाहरणार्थ, दिल्लीच्या घटनेत स्त्रियांनी पुरुषांवर (किंवा बलात्कारी पुरुषांवर) संयुक्त हल्ला केलेला नव्हता. किंवा, 'कोल्हा' कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
शिवाय:
ही जर का कथेची 'तात्पर्ये' असतील, तर कथेचा दिल्लीच्या घटनेशी संबंध जोडला असता त्यांतून जी काही (माझ्या मते भयंकर) गृहीतके सामोरी येतात, ती - प्रस्तुत लेखकाशी किंवा त्याच्या मानसिकतेशी ओळख असल्याचा माझा दावा नाही, पण, जे काही थोडे निरीक्षण केले आहे, त्यावरून - प्रस्तुत लेखकाच्या मानसिकतेबद्दलच्या माझ्या मनातील जी काही प्रतिमा आहे, तिच्याशी मिळतीजुळती नाहीत. सबब, दिल्लीच्या घटनेशी या कथेचा कोणताही संबंध प्रस्तुत लेखकाच्या मनात नसावा, असा निदान माझा तरी अंदाज आहे. (चूभूद्याघ्या.)
अर्थातच लेखकाचे विचार असे
अर्थातच लेखकाचे विचार असे "घृणास्पद आणि बिनडोक" नसण्याबद्दल खात्री आहे म्हणूनच दिल्लीच्या घटनेशी संबंध लागला नाही. मग गुजराथ निवडणूकीचे निकाल?
ससे म्हण़जे मतदार, कोल्हा म्हणजे काँग्रेसचे बंडखोर. पण तरीही "सिंहाचे सामर्थ्य आल्याशिवाय फुकाचे सिंहाचे काळीज असल्याचा आव आणू नकोस" हे फार झेपत नाहीये.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गोष्ट आवडली, पण...
...याचे नेमके तात्पर्य काय असावे, त्यावर विचार करतोय. (The moral of the story proves to be elusive - about as elusive as a good rabbit from the story ought to be. इंग्रजीबद्दल क्षमस्व; इच्छुक उत्साहींनी गोषवारा पुरवावा.)
आभार
सर्व वाचकांचे, प्रतिसादकांचे आणि वाचनमात्रांचेही आभार. ही गोष्ट फार फार दिवसापासून, दोनेक वर्षापासून डोक्यात घोळत होती. त्याचा शेवटचा बांधीव कच्चा मसूदा मी स्वतःलाच व्यनि केला ती तारिख होती १४ नोव्हेंबर. दिल्लीतील दुर्दैवी घटना त्यानंतर महिनाभराने तरी घडली आहे.
कुठल्याही गोष्टीचा थेट प्रत्यक्ष, वास्तव घटानांशी जसाच्या तसा संबंध लागणे आवश्यक नसावे असे माझे मत आहे. कथा ही कथा आहे . इसापनिती, पंचतंत्र, सिंदबादच्या कहाण्या किंवा अरेबियन नाइट्स, ह्यासारख्या बोधप्रद( काही मते विविध गप्पातून मांडणार्या) किंवा किंग आर्थर किंवा होली ग्रेलसारख्या गूढरम्य पण रंजक सारख्या. ह्या झाल्या लोककथा शैलीच्या अंगानं फुलत गेलेल्या.
काही गलिव्हर ट्रॅवल्स , एलिस इन वंडरलँड सारख्याही आहेत.
.
माझ्या स्वतःच्या काही पूर्वी प्रकाशित झालेल्या लेखनाची ही यादी:-
(सुटका (एक छोटीशी गोष्ट)
http://www.manogat.com/node/18817
http://www.aisiakshare.com/node/1131
.
.
(प्रतिमासृष्टी (एक छोटीशी गोष्ट) ) http://mimarathi.net/node/4319
.
स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा) http://www.aisiakshare.com/node/1129
.
घोड्याची गोष्ट.... http://www.aisiakshare.com/node/1109
मसीहा... http://www.aisiakshare.com/node/111०
ह्यापैकी माझे कुठलेच लिखाण एखाद्या विशिष्ट घटनेने ट्रिगर झालेले नाही.
सुचले म्हणून्/तसे लिहिले.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
भर
प्रतिसादात अजू भरः-
मित्रांच्या* घोळक्यात ही ष्टोरी ऐकवल्यावर आलेले काही प्रतिसाद पुढीलप्रमाणे
.
१.शिवबानं आग्र्यातून शिताफीनं निसटून,परमुलखात विनाकारण "वेडात मराठे वीर" स्टाइल धाडस केलं नाही; सुरक्षित परतीचा मार्ग धरला हे इष्ट केलं असं तुला म्हणायचय का? त्यांचं त्या प्रसंगातलं शहाणपण तू अधोरेखित करतोयस का?
.
२.इक्विटी मार्केट मध्ये, शेअर बाजारात मोठा मासा छोट्याला गिळतो. एकेकटे निर्बल, असहाय नि निर्बलतेची धड जाणीवही नसलेले रिटेलर्स हे सर्वांचं सहज सावज(soft target) आहे; व बाजारात नेहमीच त्याची वाजवली जाते असं तुला म्हणायचय का?
.
३. हल्ला करताना, आक्रमक होण्याचा काही काळ आनंद घेण्यापूर्वी, मोठ्या माशानच आपल्याला आक्रमक व्हायला (त्याच्या फायद्यासाठी ) उद्युक्त केलय असं तुला म्हणायचय. प्रतापगडावरील घाबरण्याचं नाटक रचणार्या आणि नंतर पराक्रम गाजवणार्या मुत्सद्द्याचं हे वर्णन आहे का?
.
४. evolution takes time. एका रात्रीत इकडचे तिकडे होइल अशी अपेक्षा करणे मूर्खपणा आहे. स्वनाशाचा मार्ग आहे. व्यवस्थेतील बदल असा सहजासहजी होणार नाही; हे तुला दाखवायचय का.
.
५.फुकटात ( "अंगात मस्ती अन् खेळ कुस्ती " छापाचे) अवसान आणू नये. अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहावे; असे काही का?
६.सामर्थ्यला पर्याय नाही.competent/सक्षम व्हा असे काही? किंवा
शक्ती/ताकद असणे आणि competent/सक्षम/fit असणे एकच नाही, असे काही सांगायचेय का?
.
७.तुमच्याशी गोग्गोड बोलणारे नि आशावादी भविष्य दखवणारे हितचिंतक असतीलच असं नाही. किंवा
dont look at what he talks; look at what he says! (तो जे बोलतोय ते पाहू नका, त्याला काय म्हणायचय किंवा तो ते का म्हणत असावा(hidden agenda/ गर्भितार्थ) हे ध्यानात घ्या.) असं काही म्हणायचय का?
.
८.पलायन हीसुद्धा एक उत्तम strategy/धोरण आहे. तो शब्द नकारात्मक/derogatory म्हणून वापरू नका. असं काही?
.
९.लढणे म्हणजे नेहमीच समोरासमोरची मारामारी नसते. समोरच्यावर फारसा प्रत्यक्ष न हल्ला करताही नामोहरम करता येते.(सशांनी जसे करणे , धावणे अपेक्षित आहे तसे) तसे काही?
रशियाने नेपोलियन किंवा नाझींविरुद्ध आपले हवामान व प्रचंड भूमी शस्त्रासारखी वापरली. त्यासारखे काही?
किंवा महाभारतातील्/भागवतातील रणछोडदासाने धूम ठोकून कालयवनास भस्मसात केले; तसले काही?
.
१०.स्वतःपुरतं पाहणे आणि स्वतःची उन्नती रास्त मार्गाने करुन घेणे ह्यात काहीही गैर नाही. तुम्ही परोपकारी नसलात, फुकटात समाजसेवा केली नाहित म्हणून तुम्ही लागलिच वाईट्ट ठरत नाही. स्वत:चं न्याय्य अस्तित्व टिकवणं हा तुमचा हक्क आहे. तुम्ही तेवढच पाहिलत तरी पुरेसं आहे.अधिक धावून सक्षम व्हा; आप्ल्या लोकांस सक्षम करा; स्वतःचे भले साधा.असे काही?
.
११. आपल्या कृतीचा नेहमीच इष्ट परिणाम गृहित धरु नये. विजय taken for granted घेउ नये; प्लान बी तयार असावा; नि "सिंहाला संपवू शकलो नाही तर काय" ह्याचाही विचार करावा असे काही?
.
१२.अस्तित्व survival हेच सत्य नि तेच अंतिम उद्दिष्ट बाकी सर्व फुकाचे तत्वज्ञान. जो उरतो तो जिंकतो. तोच पुढे "योग्य्/नैतिक"ही ठरतो. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना मरायला उद्युक्त करण्यासाठी अभिमान, धैर्य, शौर्य असल्या शब्दांचा बकवास उगाळला जातो हे समजून घ्या.
ह्या छापाचं काही?
.
१३.केजरीवाल वगैरे सारख्यांनी किंवा खरोखरच साधन शुचिता जपणार्या इतर कुणीही निवडणूक लढवण्याबद्दल हे आहे का?
.
ह्या सर्वांशिवाय अजूनही एक आहे. पण सार्वजनिक ठिकाणी लिहिणं बरं दिसणार नाही. संसदिय, सभ्य भाषेत इथं लिहिता येणार नाही.
.
*आमच्या घोळक्यात तसे बर्यापैकी शैक्षणिक वैविध्य असले(MBA, B COM, B E , M TECH) तरी सगळे आयटीवाले आहेत.
"मृत्युंजय" वाचून महाभारताबद्दल आणि "छावा"- "श्रीमान योगी" वाचून शिवशंभूकाळातील इतिहासाबद्दल "अंतिम आणि ठाम" मत बनवायचं एक वय असतं. माझ्यासकट आमच्यातील बहुतांशाचं अजूनही बौद्धिक वय तितकच आहे.
--मनोबा
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
उरलं सुरलं....
काल लिहायची राहिलेली अजून काही तात्पर्ये :-
१४. धागा त्याला वाचून दाखवल्यावर महाविद्यालयीन, ज्युनिअर मित्राची कमेंट :-
कुणीही कितीही " सहिच ना बाप.बाँड है तू तो. ती तुला लाइन देउन राह्यलिये" छापाचे म्हणत उचकावले तरी शांत विचारकेल्याशिवाय propose करण्याचे बालिश धाडस करु नये. केल्यास सार्वजनिक अपमान, सँडलचा प्रसाद, भावी सासर म्हणून पाहिले गेलेल्यांकडून जाहिर सत्कार व पाद्यपूजा ह्या प्रकारांस तयार रहावे.
.
१५. ह्या धाग्यावर माझ्या आयटीतल्या सिनिअयरची क्मेंट :-
गॅरेजवाल्याने/मध्यस्थाने जुनाट गाडीची कितीही, तोंडफाटेस्तोवर स्तुती केली तरीही सेकंड हँड गाडी घेताना शंभरदा विचार न केल्यास पस्तावाल.
.
१६. ह्या धाग्यावर माझ्या आयटीतल्या सिनिअयरची अजून एक कमेंट :-
आपण आर्थिकदृष्ट्या लुख्खे आहोत हे ठाउक असूनही अत्युच्च, "प्रिमिअम", श्रीमंताच्या सोसायटीत्/टाउअनशिप मध्ये ओव्हरस्ट्रेच करुन घर तर घेता येइल; पण मेंटेनन्सपायी निम्मा पगार खर्च कराल तेव्हा पस्तावाल. ह्या महागड्या निद्रिस्त सिंहाना त्यांनी तुमचा फडशा पाडायच्या आत ओळखा.
.
१७.(दुसर्या एका संस्थळवर आलेले तात्पर्य) स्वतःचे सिंहाचे काळीज गावभर मिरवत लग्नाच्या भनगडित पडू नये.
.
१८. मध्यमवयीन काकांची प्रतिक्रिया:-
"हात दाखवून अवलक्षण केले" अशा स्थितीत स्वतःला आणू नये. धावणे, घाबरणेच बरे.फुकाचे अवसान = हात दाखवून केलेले अवलक्षण.
.
१९. मध्यमवयीन काकांची अजून एक प्रतिक्रिया:-
"घी देखा लेकिन बडगा नही देखा" अशी स्थिती होउ नये म्हणून डोके ताळ्यावर ठेवावे.
.
२०. एका (गटणेसदृश) वाचनकिड्याचे तात्पर्य :-
सजिवाच्या अस्तित्वासाठी भय हा एक अत्यंत उपयुक्त फॅक्टर आहे. "पाठीवर पडलेल्या पानाला आभळ समजून सशाने घाबरने कधीही चाअंगले. त्याचा role तोच आहे." भय विसराल तर संकटात अडकाल, धोके होतील, फसाल. तस्मात, संशयी व्हा; भयग्रस्त रहा.
.
२१. एका पेपरकिड्याची प्रतिक्रिया :-
इटालियन बाईला हाकलायची राना भीमदेवी गर्जना करत नंतर स्वतःचा पोपट करुन घेउ नका.
.
कथेतील protagonist, प्रोटॆगनिस्ट* म्हणजेच मुख्य पात्र कोण आहे/मानले गेले आहे; ह्या नुसार तात्पर्य बदलू शकते. सशाच्या भूमिकेतून तात्पर्य वेगळे, कोल्हांसाठी वेगळे किम्वा तुम्ही सिंह असाल तर वेगळे. कुणाच्या दृष्टीकोनातून कथा पाहताय ते महत्वाचं.
* ह्या संज्ञेबद्दल भडकममास्तरांस थॅंक्स.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मला वाटले व्यवस्था बदलण्याचा
मला वाटले व्यवस्था बदलण्याचा भ्रम झालेल्या जंतरमंतर क्राउडला संदेश आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मुद्दा क्र. १३
मुद्दा क्र. १३ चाच जंतरमंतरवाले हा जोडमुद्दा(twin point) ठरावा.
तेरावा मुद्दा मांडाणार्यानं तोच आशय गृहित धरलेलाय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
येस्स्स तेच!!!
येस्स्स तेच!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हात्तेज्या !
मला वाटले संस्थळीय युद्धावरती आधारीत आहे का काय कथा.
पंचतंत्र वैग्रेच्या काळात 'पेड न्यूज' ची प्रथा होती काय ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
ही कथा
ही शिवसेना आणि मनसेची कथा आहे हे आम्ही केंव्हाच ओळखले होते! धन्यवाद.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
सन्जोपराव
पण ह्यातले कोण नक्की कोण आहे ते पण उलगडून सांग की.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
कथा ही कथा असते एकदम मान्य!
कथा ही कथा असते
एकदम मान्य!
बाकी कथा अत्यंत सुंदर!
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
मस्त कथा
मुद्दा अगदी बरोबर मांडला आहे.
असं होय!
मला वाटलं संपादक (नरडीत नखं खुपसणारे) विरुद्ध सदस्य (गरीब बिचारे ससे), या विषयी आहे की काय!!
-Nile