Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०२

Questions issues queries problems

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 19/06/2019 - 06:18

मराठीत आता सदतीसऐवजी तीस सात, किंवा त्र्याण्णवऐवजी नव्वद तीन लिहावं, अशी काही व्यवस्था आता मराठी पाठ्यपुस्तकांत आलेली आहे. ह्यावर मंगला नारळीकर ह्यांचं स्पष्टीकरण - दुवा

ह्यांतला संख्यानाम हा उल्लेख आवडला. ९३ ह्या संख्येचं नाव त्र्याण्णव आणि वर्णन नव्वद तीन, असं आकलन करून देता आलं तर, संकल्पना समजण्यासाठी मदत होईल असं वाटतं.

गवि Wed, 19/06/2019 - 10:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यावर आजचा लोकसत्ताचा अग्रलेख एक बाजू मांडतो.

https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-balbharti-made-chan…


..अगदीच ‘बाल’भारती!


पण इतक्या सुलभीकरणाची गरज आहे का? सोपे करून सांगणे आणि सुलभीकरण यांत मूलत: फरक आहे आणि तो महत्त्वाचा आहे. या प्रकरणात त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.


आपल्या बहुतांश भाषा संस्कृतोद्भव आहेत. उत्तरेकडील भाषांत रुळलेली संख्यानामे पाहता त्यातून हे स्पष्ट व्हावे. त्रयोदशगुणी, चतुर्थाश आदी शब्दांतून या संख्यानामांचे मूळ स्वरूप दिसून येते. आता जोडाक्षरे टाळण्याच्या नादात आपण या शब्दांना भाषेतून हद्दपार करणार काय? सरकारी तर्क पाहू गेल्यास तसे करणे आवश्यक ठरते. मग अन्य मराठी जोडाक्षरांचे काय, हा प्रश्न पडतो. प्रतिष्ठा या शब्दाची फोड यापुढे ‘परतिषठा’ अशी करण्यात कोणती भाषिक प्रतिष्ठा आपण राखणार?


अशा वेळी जी उत्तम पद्धत आपल्याकडे होती तिचे पुनरुज्जीवन करायचे की अतिसुलभीकरणाचा बुद्धिमांद्याकडे नेणारा मार्ग निवडायचा


अशा वेळी जी उत्तम पद्धत आपल्याकडे होती तिचे पुनरुज्जीवन करायचे की अतिसुलभीकरणाचा बुद्धिमांद्याकडे नेणारा मार्ग निवडायचा हा काही आव्हान वाटावा असा प्रश्न नाही.
यातील विरोधाभास असा की सरकार केंद्रीय पातळीवर संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनाची भाषा करणार, त्यासाठी वेळप्रसंगी घडय़ाळाचे काटे मागे फिरवण्यासही मागेपुढे पाहणार नाही आणि त्याच वेळी संख्यानामांच्या उच्चारणांबाबत हास्यास्पद निर्णय घेणार. याची संगती कशी लावायची? जागतिक पातळींवर अलीकडेपर्यंत भारतीय विद्यार्थी इतरांच्या तुलनेत पुढे असत. अगदी विकसित देशांतील विद्यार्थ्यांपेक्षाही भारतीय विद्यार्थी काही बाबतीत आघाडीवर असत. त्यामागे आपली अंकगणित शिकवण्याची पद्धत हे महत्त्वाचे कारण आहे, हे नि:संशय. पाश्चात्त्य देशांत सरसकट सर्वानाच साध्या बेरजा, गुणाकारदेखील गणनयंत्राच्या मदतीखेरीज जमत नाहीत. अशा वेळी पाढे पाठ करणे भोगलेला भारतीय हे अंकगणित सहज तोंडी करतो, असे सर्रास पाहायला मिळते. हे भारतीयांस साध्य होते ते केवळ अंकगणित शिकवण्याच्या पारंपरिक पद्धतींमुळेच. एरवी आपल्या शिक्षण पद्धतीत शोधू गेल्यास खंडीभर त्रुटी अथवा दोष आढळतील. पण काही गोष्टी आपल्या पद्धतीत निश्चित उजव्या आहेत. संख्यानामे ही त्यापैकी एक.
परंतु आता केवळ जोडाक्षरे टाळण्यासाठी त्यात बदल करण्याचा घाट घातला जात असेल तर त्यात शहाणपणा किती, हा प्रश्नच आहे. लिहिण्यास वा उच्चारणास त्रास होतो म्हणून जोडाक्षरे नकोत, ऱ्हस्वदीर्घची ब्याद नको म्हणून शुद्धलेखनाचा आग्रह नको, अनुत्तीर्ण होण्याची भीती नको म्हणून सगळ्यांनाच वरच्या वर्गात ढकला.. या सुलभीकरणास अंत नाही. शिक्षण हे विद्यार्थीकेंद्री हवे हे मान्य. पण म्हणून विद्यार्थ्यांनुनयाची गरज नाही.


व्यवस्थापनाचे एक साधे तत्त्व असे की जे मोडलेले नाही, ते जोडण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या शिक्षण खात्यास हे ठाऊक नसावे.

इत्यादि

धर्मराजमुटके Wed, 19/06/2019 - 11:40

In reply to by गवि

लोकसत्ता तोंडावर आपटलेला आहे. निदान या बाबतीत तरी ? सुलभीकरण ? अहो तो दुसरीतला धडा आहे. सुलभीकरण लहान मुलांसाठी नाही करायचे तर कोणासाठी ? शिवाय अंकांसमोर जुने आणि नवे दोन्ही पर्याय दिले आहेत ना.

'न'वी बाजू Wed, 19/06/2019 - 18:00

In reply to by धर्मराजमुटके

शिवाय अंकांसमोर जुने आणि नवे दोन्ही पर्याय दिले आहेत ना.

आमच्या वेळची गोष्ट सांगतो. एसएस्सीला (१९८१) मराठी माध्यमाच्या इंग्रजी विषयाच्या पेपराला दहा मार्कांकरिता निबंधाचा एक प्रश्न असे. त्याला तीन पर्याय असत. पहिला पर्याय: दिलेल्या विषयावरून निबंध लिहिणे. दुसरा पर्याय (तुलनेने सोपा): विषय दिलेला असे. सोबत एक प्रश्नावली दिलेली असे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहिता येईल अशी. ती उत्तरावली एकापुढे एक अशी जोडून लिहिली, की झाला निबंध. आणि तिसरा पर्याय?

तिसरा पर्याय: एक तयार निबंध लिहून दिलेला असे. त्यातील काही शब्द गाळलेले असत. ते गाळलेले शब्द बाजूच्या रकान्यात वाटेल त्या क्रमाने मांडलेले असत. आठ मार्कांकरिता ते शब्द योग्य त्या गाळलेल्या जागांत भरायचे, नि दोन मार्क शीर्षकाकरिता. (शीर्षकात कल्पकतेस वाव अपेक्षित असावा. मात्र, शीर्षकाकरिता दोनाहून कमी मार्क वाटण्याचा प्रघात नसावा.)

आता मला सांगा, असा तिसरा पर्याय उपलब्ध असताना कोण गाढवीचा पहिल्या दोन पर्यायांकडे ढुंकूनसुद्धा बघेल? (चांगला निबंध स्वतंत्रपणे लिहिता येण्याची क्षमता असतानासुद्धा?)

सामो Wed, 19/06/2019 - 18:01

In reply to by गवि

व्यवस्थापनाचे एक साधे तत्त्व असे की जे मोडलेले नाही, ते जोडण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या शिक्षण खात्यास हे ठाऊक नसावे.

अगदी खरे आहे. कोणाला जुलाबाची कळ आली म्हणुन अचानक हा फतवा निघाला? मूर्ख साले.

'न'वी बाजू Wed, 19/06/2019 - 17:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'फ़ोर स्कोअर अँड सेव्हन इयर्स अगो'वरून याची प्रेरणा घेतली असू शकेल काय?

..........
म्हणूनच शिक्षणातील थेरडेशाहीचा नि:पात झाला पाहिजे! (अन्यथा, आजच्या पिढीतल्या किती जणांना 'फ़ोर स्कोअर अँड सेव्हन इयर्स अगो' माहीत असेल, नि त्यावरून असला अगोचरपणा करायचे सुचेल?) डंबिंग डाउन ऑफ एज्युकेशन नुसते! (आणि तेही प्राथमिक पातळीवर!) या थेरड्यांना काय वाटते, की लहान मुलांना 'त्र्याण्णव' वगैरे समजण्याची अक्कल नसते, की जेणेकरून त्यांना असे प्रीडायजेस्ट करून (अर्धे पचलेले) चमच्याने भरवावे? या थेरड्या पिढ्याच 'भावी पिढ्यांना अक्कल नसते' या (चुकीच्या) गृहीतकाखाली शिक्षणाचे 'सुलभीकरण' (एकेए डंबिंग डाउन) या नावाखाली मातेरे करून भावी पिढ्यांचे नुकसान करीत असतात! (त्यापेक्षा मग भावी पिढ्यांना सरळसरळ 'वुई डोंट नीड नो एज्युकेशन, वुई डोंट नीड नो थॉट कंट्रोल' म्हणून का शिकवीत नाहीत? हे असले अर्धवट काहीतरी कशासाठी? पुरताच बट्टयाबोळ होऊन जाऊ द्या ना!)

धर्मराजमुटके Wed, 19/06/2019 - 11:54

मी पुस्तक नाही पाहिले पण वर्तमानपत्रातले काही चित्रे पाहिली. विषय न समजून घेता माध्यमांवरील भाषा शास्त्री कोकलतायत. वस्तूत: पानावर संख्यानाम (नवीन आणि जुने) दोन्ही दिलेत. उगाच आरडा ओरडा चालू आहे.

हा चित्राचा दुवा :
Balbharati

घाटावरचे भट Wed, 19/06/2019 - 11:49

In reply to by धर्मराजमुटके

मला वाटतं की मुद्दा असा आहे की दोन नावांतलं विद्यार्थ्यांच्या लक्षात राहून पुढे काय जाईल? त्र्याण्णव की नव्वदतीन.

धर्मराजमुटके Wed, 19/06/2019 - 12:03

In reply to by घाटावरचे भट

इंग्रजी माध्यमातील मुले देखील संख्या पाठ करताना थ्री नाईन थर्टी नाईन / नाईन थ्री नाईनटी थ्री असेच म्हणतात.
मला वाटते की त्र्याण्णव लक्षात रहाणे यामुळे सोपे होईल.
आणि लोकसत्ता ने जोडाक्षरे टाळण्याचा मुद्दा यात कोठून आणला ? एकोणतीस, सदतीस, एकोणचाळीस ह्यात जोडाक्षरे कोठे दिसली ?

घाटावरचे भट Wed, 19/06/2019 - 12:34

In reply to by धर्मराजमुटके

या विषयावर व्हाट्सॅपावर आलेला एक विनोद -

ती: (चिडून) अरे जा... तू काय एकटाच भारी आहेस का? मी पाच-सहा बघितलेत तुझ्यासारखे
तो: (गोंधळून) पाच-सहा?
त्याचा मित्र: अरे तिला छप्पन म्हणायचं आहे... नवीन सिलॅबसवाली आहे ना ती...

धर्मराजमुटके Wed, 19/06/2019 - 12:54

In reply to by घाटावरचे भट

पण विनोद जरा चुक्याच !
नवीन सिलॅबसवाली नं पन्नास सहा म्हणायला हवं होतं !

घाटावरचे भट Wed, 19/06/2019 - 17:56

In reply to by धर्मराजमुटके

अजून एक विनोद:

आता फडणवीस साहेबांचा उलेख 'फडण दोन शून्य' असा करायचा असा फतवा निघाला आह म्हणे....

#शिक्षणाचाविनोद

तिरशिंगराव Wed, 19/06/2019 - 21:08

In reply to by घाटावरचे भट

५६ इंची छातीचा क्लेम करणाऱ्यांचं, खरं माप ५० च असणार! पन्नास सहा चा गैरफायदा घेतला त्यांनी!

चिमणराव Wed, 19/06/2019 - 13:33

In reply to by धर्मराजमुटके

ही बातमी तरंगत अमेरिकेत पोहोचेलच म्हणून दिली नव्हती.
जोडाक्षरांचा मुद्दा हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री मगर यांनी मांडला आहे. त्यांची मुलाखत झाली परवा पाच वाजता एबिपी माझा चानेलवर.
" असं देण्याचा उद्देश मुलांना जोडाक्षरे असलेल्या संख्या लिहितांना अडचण येते. "

पहिली दुसरीपर्यंत संख्या/अंक पाहून बोलता येईल ना?
दुसरा काही हेतू असावा. पुढे चौथीपासून मिलिअन, बिलिअनला शब्द देऊन लाख ,कोटी काढतील बहुतेक.
मग शंभर -हजार दीप लावू आम्ही.

धर्मराजमुटके Wed, 19/06/2019 - 14:55

In reply to by चिमणराव

जोडाक्षरांचा मुद्द्यावर माझे आकलन चुकीचे झाले. मी फक्त काही ठराविक बातम्याच वाचल्या होत्या. आय माय स्वारी !

चिमणराव Wed, 19/06/2019 - 15:56

In reply to by धर्मराजमुटके

लोकसत्ताने ते अगोदरच्या लेखात कधी दिलं असेल, सगळ्यांना माहीत असं समजून आता लिहिलं नसेल. मगरसाहेब सर्व प्रश्नांची शांतपणे उत्तरे देत होते. काही नवीन केले अभिनिवेश नव्हता.
आता मगरसाहेब पडले हुकुमाचे ताबेदार त्यांनी सांगितले तसे केले.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 19/06/2019 - 23:08

In reply to by धर्मराजमुटके

चित्राबद्दल आभार.
डॉ. नारळीकरही म्हणत आहेत की तिसरीपासून नेहमीचे आकडेच वापरणार. एकदा सुलभीकरण करून, संकल्पना समजली की पुढे सुलभीकरण गळून पडणार.

त्यानिमित्तानं चाललेल्या टपराट विनोदांमुळे मला तरी हसायला आलं. उगाच सगळ्या गोष्टी मनावर घेण्याची काही गरज नाही.

चिमणराव Thu, 20/06/2019 - 07:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉ. नारळीकरही म्हणतात पुढे सुलभीकरण गळून पडणार

पण ग्याझेटमध्ये ही पद्धत मान्य अमुक तारखेपासून तर? किंवा गुगलनेच विचारलं तुमचं प्रमाण लेखन द्या तर?
२३४ = दोनशे तीस चार /दोनशेतीसचार/दोनशे तीसचार/दोनशे पस्तीस??

'न'वी बाजू Thu, 20/06/2019 - 16:03

In reply to by चिमणराव

२३४ = दोनशे तीस चार /दोनशेतीसचार/दोनशे तीसचार/दोनशे पस्तीस??

नाही. चौतीस दोन. पूर्वीच्या जमान्यात पाढ्यांत म्हणायचे, तसे.

बाकी, एकीकडे दाहोदरसे, अठ्ठाविसासे, चौतीस दोन वगैरे मंडळींचे उच्चाटन करायचे, आणि दुसरीकडून पन्नास सहा वगैरे मंडळींना घुसवायचे, याला काय म्हणावे?

अवांतर:

२३ = दोनशे तीस चार /दोनशेतीसचार/दोनशे तीसचार/दोनशे पस्तीस??

इन एनी केस, २३४ = दोनशे पस्तीस कसे होतील?

कासव Fri, 21/06/2019 - 11:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी विक्षिप्त अदिती यांच्या मताशी आणि सुरुवातीला व्यक्त केलेल्या धर्मराजमुटके यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

इथे बुद्धिमत्तेवर शंका घेऊन कुणी सुलभीकरण करण्याचा रस्ता निवडलेला दिसत नाहीये. आकलन अधिक सुलभ व्हावे अन् तेही कळण्याइतपतच मर्यादित असावे, हाच उद्देश सुरुवातीला आहे.

त्र्याण्णव ऐवजी मुलं ‛नव्वद तीन’च लक्षात ठेवतील किंवा शतक किंवा शतकापुढील आकडे-मोजणीत गोंधळ होईल हीच एकप्रकारे मुलांच्या बुद्धिमत्तेवर घेतलेली शंका नाही का?

आजच्या लोकसत्ताच्या लोकमानसमधील पत्रांमधून मार्मिक प्रश्न उपस्थित केले आहेत.

दुवा - https://www.loksatta.com/lokmanas-news/letters-from-readers-readers-opi…

गवि Fri, 21/06/2019 - 12:12

In reply to by कासव

"मुळात साऱ्या जनतेला दहाच्या वर आकडे माहीत करुन घेण्याची किंवा त्यांचे उच्चार करण्याची गरजच काय? अंक ही संकल्पना समजली की झालं.. अगदी बेसिक मायक्रो लेव्हलवर डोकं लावणं व्यवहारात कुचकामी ठरलं आहे,"

..... असा विचार करण्याची वेळ लवकरच येईल. तेव्हा ही चर्चा मागे पडून अन्य काहीतरी चालू असेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 22/06/2019 - 00:47

In reply to by गवि

ह्यात आकडे अक्षरांत लिहिण्याची गरज मला समजलेली नाही. किंवा त्याचा गणित, भाषा ह्यांच्याशी असलेला व्यावहारिक संबंध, मला समजलेला नाही.

गवि Sat, 22/06/2019 - 01:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुख्यतः उच्चार (बोलणं) यांच्याशी सध्याचा विषय संबंधित आहे.

त्याबाबत लहानपणापासून कानी पडत गेल्यास एकूणपन्नास म्हणजे नेमके किती वगैरे कन्फ्युजन मुलांच्या मनात होईल असं वाटत नाही. पोरं फार adaptive असतात. उगीच अति सुलभीकरण आवश्यक नाही वाटत.

चिमणराव Fri, 21/06/2019 - 15:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सगळ्या गोष्टी मनावर घेण्याची काही गरज नाही.

नैतर काय.
पण मग मराठी गेली डुबली'ची ओरडही नको.

सामो Wed, 19/06/2019 - 17:56

मध्यंतरी एक टेड टॉक ऐकला - एक डिसॉर्डर आहे जिच्यात जरी व्यक्तीचा अवयव अँप्युटेट केलेला असला तरी त्या व्यक्तीला वाटत रहाते की तो अवयव आहे. जसे अगदी गर्भाशय काढलं तरी मेन्स्ट्रुअल क्रँपस येतात वगैरे. डावा हात अँप्युटेट केला तरी डाव्या हाताला खाज येते आहे असे वाटते. काहींचा अँप्युटेटेड हात वर्षानुवर्षे दुखतो. याचे कारण मेंदूत वायरिंग झालेले असते. ते आधी अनलर्न करावे लागते वगैरे.
_______________
एक डिसॉर्डर आहे जिच्यात मेंदुचा विशिष्ट भाग दुखावला, तर स्वत:ची आई नकली आहे कोणीतरी तिचे रुप घेतलेले आहे असे वाटत रहाते. बाकी ती व्यक्ती अगदी नॉर्मल असते हे फक्त आईच्या बाबतीतच होते.
याचे मानसशास्त्रिय कारण किंवा थिअरी अशी मांडली जाते की - लहानपणीचा एडिपस कॉम्प्लेक्स मेंदूचा हा भाग सप्रेस ठेवतो. पण तोच भाग दुखावला की हा एडिपस कॉम्प्लेक्स उफाळून वर येतो. पण आता तर आपण अशा रीतीने मोल्ड झालेलो असतो की आईकडे 'त्या' द्रूष्टीने पहायचे नाही. म्हणुन मग मेंदू एक कॉन्स्पिरसी थिअरी उभी करतो की ही आपली आई नाहीच कोणीतरी फेक व्यक्ती आहे.
________
अजुन एक डिसॉर्डर आहे जिच्यात काही लोकांना आकडे व रंग अशीच जोडी दिसते. उदाहरणार्थ एक म्हटले की लाल रंग, २ म्हटले की पिवळा वगैरे अशी जोडीच येते. त्यांना फक्त आकडा असा बघताच येत नाही. याचे कारण आकडे रजिस्टर करणारा व रंग रजिस्टर करणारा दोन्ही भाग मेंदूत, अगदी जवळ आहेत. दोहोत जे सेपरेटर लायनिंग आहे ते या लोकांत अगदी पातळ असते. कवि पहा कसे २ एकदम वेगळ्यावेगळ्या कल्पनांची जोडगोळी करतात. याचे कारण हेच क्रॉस वायरिंग/ लायनिंग पातळ असणे वगैरे. ही डिसॉर्डर आपल्यातही थोड्याफार प्रमाणात आढळते.
https://i.guim.co.uk/img/media/1feb779a11f840bf2509c3fc219ba29307436c94/0_47_957_590/master/957.jpg?width=620&quality=85&auto=format&fit=max&s=5dd945827ea8b1e0fd23c886365da9f0
वरील उदाहरणात किकी कोण आहे व बोबा कोण आहे विचारलं तर बहुसंख्य लोकं हे तथाकथित 'इन्ट्युइटिव्हली' काटेरी आकृतीला किकी म्हणतील व गोलाकार, अणकुचीदार कडा नसलेल्या आकृतीला बोबा म्हणतील. हा तो किकी-बोबा प्रयोग.

हा तो टेड टॉक - https://www.ted.com/talks/vilayanur_ramachandran_on_your_mind?language=…

चिमणराव Wed, 19/06/2019 - 17:53

एक डिसॉर्डर आहे जिच्यात जरी व्यक्तीचा अवयव अँप्युटेट केलेला असला तरी त्या व्यक्तीला वाटत रहाते की तो अवयव आहे.

दोन दिवस आठवायचा प्रयत्न केला पण नाव आठवत नाही ये. रश्यन लेखक डोस्टोवस्किची कथा आहे. पाय गमावून खोटे पाय लावलेला पायलट. पायात संवेदना येतात. पुन्हा विमान उडवतो वगैरे.

सामो Sat, 22/06/2019 - 11:25

अर्धवट वाचून मनात आलेले विचार -
Conciousness अर्थात स्वत:च्या. इतरांच्या अस्तित्वाचे भान बरोबर? हे नक्की असतय काय? जाणिअव-नेणिवांचा संततधार ओघ? आपल्या पंचेंद्रियांवरती काही एक बदल ( दृश्य = प्रकाशातील बदल, ध्वनी = हवेच्या दाबातील बदल) कोसळत रहातो. आपला मेंदू काहीतरी सुसंगती लावण्याचा प्रयत्न करतो. फ्रेम आफ्टर फ्रेम - हा ओघ आपली पंचेंद्रिये प्रताडित करत रहातो? आपण अर्थ लावण्यात मश्गुल रहातो. यातून जर (यदाकदाचित) ब्रेक घेतला तर काय होइल? कासव जसे आपले अवयव आत ओढून घेते तसे जर पंचेंद्रिये बंद केली तर काळच ठप्प होइल का?

'न'वी बाजू Sat, 22/06/2019 - 15:13

In reply to by सामो

कासव जसे आपले अवयव आत ओढून घेते तसे जर पंचेंद्रिये बंद केली तर काळच ठप्प होइल का?

कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहात नाही.

बिटकॉइनजी बाळा Thu, 27/06/2019 - 13:33

दक्षिण गोव्यात फरताड्याच्या किंवा वर्क्याच्या आजूबाजूला लोकल खाण्याची उत्तम ठिकाणं कोणती? (समुद्रातली मासेमारी सध्या बंद आहे)
नदीतले मासे, इतर जलचर किंवा इतर कोणतेही चांगले हॉटेल जिथे तिथले स्थानिक लोक खातात अशी ठिकाणे हवी आहेत.

सुनील Sun, 30/06/2019 - 11:38

In reply to by बिटकॉइनजी बाळा

बरोबर दोन वर्षांपूर्वी, वर्क्यापासून १०-१५ किमी आत, असोळणे गावात एक खाणावळ आहे, जिथे उत्कृष्ठ मत्स्याहार मिळाला होता. अधिक माहिती.

बिटकॉइनजी बाळा Mon, 01/07/2019 - 00:26

In reply to by सुनील

मला तिकडे जाता आले नाही तरी आसोळण्याला बीफ समोसे, भाजीपाव, गाजराचा केक इत्यादी यथेच्छ हादडले. सकाळी लक्ष्मी कॅफेत गेलो पण तिकडे हवातसा नाशता मिळाला नाही(कोलंबी पाव वगैरे).मडगावात रांचे यांचे हॉटेली(गिरीश रांचे घर) मिक्स थाळी घेतली. तिसऱ्या, कुर्ल्या होते पण खूप कमी. सुकट-खोबऱ्याची चटणी, आंबोशी इत्यादी मस्त लागले. जरा ओव्हरहाईपड वाटत होते पण वेळेला केळे या न्यायाने...
राहत्या हॉटेलातच उत्तम तिसऱ्या मिळाला.
थोडी लोकल चौकशी करता बिशप नावाचे हॉटेल कळाले. तिकडे सुंगटं आणि भात खाल्ला. बाकी सगळा टुरिस्टी प्रकार झाला. ते फूड जेन्ट्रीफिकेशन का काय म्हणतात तसं झालंय बहुतेक. चायनीज फास्ट फूडने उच्छाद मांडलाय नुसता

चिमणराव Thu, 27/06/2019 - 13:51

नीलोनी प्रश्न बरोबर विचारलाय. टुरिस्ट ठिकाणी ओवरहाइप्ट नसलेली खास ठिकाणं हवीत.

-
मिपावरच्या "किणकिणाट" यांचा लेख शोधावा लागेल। उत्तर मिळेल. पालोळे' पर्यंत कारने सापडतील.

अस्वल Tue, 02/07/2019 - 00:45

इंग्रजीत हे पुस्तक कुणी पणिकरांनी लिहिलं आहे - https://www.amazon.in/Vedic-Experience-Mantramanjari-Contemporary-Celeb…
ते सापडलं.
मराठीत ऋग्वेदावर लिहिलेलं उत्तम पुस्तक कुठलं आहे?
मला मूळ संस्कृत कळणार नाही, पण मूळ->मराठी भाषांतर-> आणि त्यावर टिपणी. अशा स्वरूपाचं पुस्तक ऋग्वेदावर मराठीत आहे का?

चार्वी Tue, 02/07/2019 - 12:17

In reply to by अस्वल

सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी ऋग्वेदाचे मराठी भाषांतर केले आहे. त्यात टिपणी आहे का नाही कल्पना नाही. एखाद्या जुन्या ग्रंथालयात मिळायला हवे.

अबापट Wed, 03/07/2019 - 03:51

In reply to by अस्वल

अस्वलराव, तुम्ही तरुण वगैरे असावेत असा संशय आहे.या वयात ही काय थेरं ?
आज तुम्ही ऋग्वेद वाचताय , उद्या चौदावा केदारनाथच्या गुहेत जाऊन बसेल.
कसं होणार या देशाचं.
आवरा स्वतःला.

अस्वल Wed, 03/07/2019 - 05:18

In reply to by अबापट

अण्णा, हॅ हॅ .
आम्हाला पामेला अँडरसनपासून ते महात्मा गांधींपर्यंत काहीच वर्ज्य नाही.
तस्मात सध्या हाती ऋग्वेद असला तरी उद्या सोमरस असेल ह्यात शंका नाही.
आपुन तुम्हारेहीच साथ है

१४टॅन Wed, 03/07/2019 - 07:09

In reply to by अबापट

त्यात काय, मीही आत्ता आहे त्याच्या पावपट वयाचा असताना गीतेचा १४वा अध्याय पाठ केलेला. केदारनाथच्या गुहेत जायला नक्कीच आवडेल, इस्पेशली उन्हाळ्यात.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/07/2019 - 19:20

In reply to by १४टॅन

तेव्हा तुला कन्सेन्टचा अधिकार नव्हता. त्यामुळे तेव्हाची पापं मोजली जात नाहीत. :प

चिमणराव Sat, 06/07/2019 - 12:58

तिकडच्या एका मराठी मंडळात कार्यक्रम संपल्यावर किंवा अगोदर राष्ट्रगीत गातात . तिकडे राहतो तिकडचीच निष्ठा.

'न'वी बाजू Fri, 12/07/2019 - 21:53

In reply to by सामो

...पर्गेटिव आणि लॅक्सेटिव यांच्यात जो फरक आहे, कदाचित तोच असावा काय?

बोले तो, सारकाने पोट साफ होते, तर रेचकाने जुलाब होऊन पोट साफ होते, असे काही?

----------

तळटीपा:

मराठीतला जुलाब. हिंदी/उर्दू/फारसीतला जुलाब नव्हे.१अ

१अ मराठीतला जुलाब आणि हिंदी/उर्दू/फारसीतला जुलाब यांच्यात कार्यकारणभाव१अ१ आहे.१अ२

१अ१ मराठीत: 'कॉज़ अँड इफेक्ट रिलेशनशिप'. किंवा, खरे तर 'इफेक्ट अँड कॉज़ रिलेशनशिप' म्हणावे काय?

१अ२ हिंदी/उर्दू/फारसीतला जुलाब प्यायल्याने मराठीतला जुलाब होतो.१अ२अ

१अ२अ (उलटपक्षी... असो.)

चिमणराव Fri, 12/07/2019 - 22:13

In reply to by 'न'वी बाजू

अन्न पचून ,रस रक्तात जाऊन उरलेला चोथा बाहेर काढून टाकणारी - पर्गेटिव
आतड्यास म ऊपणा आणणारी - लक्सेटिव
पोटातले ग्यास बाहेर काढणारी -कार्मिनटिव

चिमणराव Fri, 12/07/2019 - 22:02

अन्नाचे शरिरात शोषले जाईल असे रस ( इन्झाइम्सच्या क्रियेने) तयार होऊन आतड्यापर्यंत ( इंन्टेस्टाइन) रक्तात शिरतात म्हणजे 'रिचवले' जातात. मदत करणारी औषधी रेचक. फिजिकल अक्शन म्हणजे आतड्याच्या आतल्या बाजूस तिखट खाल्यावर त्यापासून बचाव म्हणून एक चिकट पदार्थ तयार होतो. तो काढला नाही तर रस शोषला जात नाही. एरंडेल(क्यास्टर ओईल) तो काढून टाकते म्हणून रेचक.
-----
पाचक - इन्झाइम्स स्टिम्युलंट, किंवा मदत (काळी मिरी वगैरे)

सारक - फाइबर,तंतू ठेवून अन्नाचा घट्ट लगदा होऊ देत नाही, अन्न आतड्याच्या आतल्या बाजूस चिकटू देत नाही. पुढे सरकण्यास मदत आणि इन्झाइम
स मिसळण्यास मदत. (पालेभाज्या)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 14/07/2019 - 04:00

गेले तीन दिवस SciPyला गेले होते.

पायथन भाषेत ओपन सोर्स सॉफ्टवेर लिहिणाऱ्यांची आणि वापरणाऱ्यांची परिषद. तिथे तीन मुद्द्यांवरून अत्यंत तळमळीनं चर्चा घडल्या.

१. ओपन सोर्स सॉफ्टवेर. जेवढ्या जास्त लोकांना ह्याचा फायदा होईल तेवढं चांगलं.
२. विदाविज्ञानातून ज्या काही नकारात्मक, नुकसानदायक गोष्टी घडत आहेत, त्याचा आढावा; त्यावर काही करता येईल का?
३. एकंदरच सॉफ्टवेर आणि तंत्रज्ञान क्षेत्र किती विविध आणि सर्वसमावेशक आहे. (ह्या सत्रात माझा मॅनेजरही होता - गोरा, अमेरिकी, स्ट्रेट, धडधाकट शरीराचा, cis-पुरुष)

बाकी आवडलेल्या, किंवा रस असलेल्या विषयांपैकी काहींचा सारांश -
१. शक्यता वापरून काही मॉडेलं कशी सुधारता येतात; ह्या संदर्भात सुधारणा म्हणजे नक्की काय.
२. जुनी सर्वेक्षणं वापरून अमेरिकेत बंदुकांवर बंदी आणण्याबद्दल लोकांचा उत्साह कमी होत चालला आहे, हे दाखवणारं. त्यात त्यांनी सांख्यिकी संकल्पना फार चांगल्या पद्धतीनं दाखवल्या.
३. आलेख काढण्याची नवी पायथन मॉड्यूलं दाखवली गेली.
४. अॅस्ट्रोपायबद्दल एक भाषण होतं; ते बहुतेकसं माझ्या डोक्यावरून गेलं. मला सॉफ्टवेअरमध्ये फार रस नाही.
५. ग्यान किंवा GAN - general adversarial networks वापरून जुन्या फुटक्या-तुटक्या गाडग्यामडक्यांचे आकार कसे होते, ह्याची त्रिमितीय चित्रं बघताना गंमत वाटली. ती गाडगीमडकी, खापरं जुनाट आणि त्यांची तयार केलेली चित्रंही अगदी बेसिक होती. पण त्यात ह्या तंत्रज्ञानाचा वापर नवा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 22/07/2019 - 04:13

ह्या लेखातून आमिर खानचं नक्की कौतुक केलंय का अपमान? सगळी गोष्ट झाल्यावर पुढे सुपरस्टार आमिर खानची तुलना स्वतःची मतं बाळगणाऱ्या रिक्षावाल्याशी करणं, ह्यातून नक्की काय म्हणायचं आहे? तुम्ही काय अर्थ लावाल?

फाडा पोस्टर, निकला आमिर...

पुंबा Sat, 27/07/2019 - 17:54

ब्राह्मणांच्या कुठल्याही गोष्टीला फार म्हणजे फार महत्व मिळतं. उदा. स्वयंपाक! मराठीत जेवढी पाककृतींची पुस्तके असतील त्यातली किमान ९० % शहरी/ ब्राह्मण लेखक- लेखिकांनी लिहिलेली असतील किंवा बहुतांश पाककृती शहरी, ब्राह्मण घरातल्या पद्धतींचे दस्ताइवजीकरण करत असावीत असे वाटते. सारस्वत, सीकेपी, कोळी, मराठा वगैरे पाककृतींची पुस्तके देखिल दिसली. वैदर्भिय, मराठवाडी, कोल्हापुरी, मालवणी असे प्रदेशनिहाय पाककृतींचे एकत्रीकरण कुठे ना कुठे दिसते. मात्र वाणी, धनगर, माळी, भटक्या विमुक्त इतर जाती,
ग्रामीण मुस्लिम, बलुतेदार, आदीवासी, दाउदी बोहरा वगैरे लोकसमुहांमध्ये लोक काय खातात, त्यांच्या पाककृती, विशिष्ट पद्धती, जिनसा, प्रमाण, मसाले यांबद्दल कुठेही माहिती मिळणे दुरापास्त असते. अगदी युट्युब पाहिले तरीही ह्या समुहांच्या खाद्यसंस्कृतीला प्रतिनिधीत्व मिळते असे वाटत नाही. विविधता जाऊन सपाटीकरण होण्याची चाल पाककलेलादेखिल सोडणार नाही हे आहेच. पण निदान नोंदी का न व्हाव्यात?

'न'वी बाजू Sat, 27/07/2019 - 19:22

In reply to by पुंबा

ब्राह्मणांच्या कुठल्याही गोष्टीला फार म्हणजे फार महत्व मिळतं. उदा. स्वयंपाक! मराठीत जेवढी पाककृतींची पुस्तके असतील त्यातली किमान ९० % शहरी/ ब्राह्मण लेखक- लेखिकांनी लिहिलेली असतील किंवा बहुतांश पाककृती शहरी, ब्राह्मण घरातल्या पद्धतींचे दस्ताइवजीकरण करत असावीत असे वाटते.

आजमितीस मराठीतली बहुसंख्य पाककृतींची पुस्तके ब्राह्मणांनी लिहिलेली असतीलही, परंतु यामागील कारण 'ब्राह्मणांच्या कुठल्याही गोष्टीला फार म्हणजे फार महत्व मिळतं' हे नसावे. मला वाटते, 'पाककृतींची पुस्तके' हा एसेन्शियली अर्बन फेनॉमेनन असावा. त्यातसुद्धा, एका ब्राह्मणीने लिहिले, एकीचे खपते पाहून दुसरीने लिहिले, असे करत करत ब्राह्मणांनी (रादर, ब्राह्मणींनी) लिहिलेली पाककृतींची पुस्तके बोकाळली असावीत.

कम टू थिंक ऑफ इट, 'बोकाळली' म्हणायला, ऐशी कितकी रे कितकी रेशिपीबुके ब्राह्मणींनी लिहिली, आँ? मला तरी कमलाबाई ओगले आणि मंगला बर्वे (प्रत्येकी एक पुस्तक) एवढी दोनच आठवतात. (हं, ती भयंकर पॉप्युलर झाली - बहुधा अर्बन ब्राह्मणवर्गात - ही बात अलाहिदा.)

आणि तसेही, पाककृतींच्या मराठी पुस्तकांच्या क्षेत्रात ब्राह्मण लेखिका पायोनियर खचितच नसाव्यात. अंग्रेजों के ज़माने में, जेव्हा तुमच्या त्या कमलाबाई ओगले (तोवर चुकून जन्माला आल्या असल्याच, तर) बहुधा दुपट्यात मुतत असाव्यात, नि त्या मंगला बर्वेंची कोणी कल्पनासुद्धा केली नसावी (शब्दश:, त्यांना कोणी 'कन्सीव्ह'सुद्धा केले नसावे), अशा काळात, लक्ष्मीबाई धुरंधर नावाच्या एका पाठारे प्रभू बाईंनी 'गृहिणी-मित्र अर्थात एक हजार पाकक्रिया' नावाचे एक पाककृतींचे पुस्तक लिहिले होते. बहुत काळापर्यंत लई पापिलवार होते - जवळपास ष्ट्याण्डर्ड रेशिपीबुक होते, म्हणाना! (मला वाटते 'ऐसी'वर याचा पूर्वी जिक्र झालेला आहे.) त्यात विविध तऱ्हांच्या शाकाहारी-मांसाहारी पाकक्रिया होत्या, आणि ज्ञातिनिरपेक्ष कोठल्याही मराठी माणसास उपयुक्त असे रेशिपीबुक होते. काही इंग्रजी पाककृतीही होत्या. फार कशाला, तुमच्या घरात कधी जर इंग्रज साहेबाला सहकुटुंब जेवावयास बोलावण्याचा प्रसंग आलाच, तर काय जेवण बनवावे, त्यात कुठ्ल्या कोर्समध्ये काय ठेवावे, हेसुद्धा होते. (बहुधा धुरंधरबाई ज्या समाजातून आल्या, त्या समाजात असे प्रसंग पुष्कळ येत असावेत - रादर आणले जात असावेत.) एके ठिकाणी कोंबडीच्या सुपाची रेशिपी 'एक कोंबडीचे पिल्लू घ्यावे, त्यास मारून त्याची पिसे काढून साफ करावे' इथपासून सुरू करून स्टेप-बाय-स्टेप दिलेली होती. तसेच, 'मेयोनेज अर्थात अंड्याचे चालते-बोलते सॉस' असेही अका पाककृतीचे (बोलके) शीर्षक आठवते.

कमलाबाई ओगले वगैरे फार नंतर आल्या. (जॉनी-कम-लेटली.) असो चालायचेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 27/07/2019 - 21:28

In reply to by 'न'वी बाजू

आणखी एक मुद्दा क्रयशक्ती आणि वाचनाचा.

पुस्तकं विकत घेऊन वाचणं ज्यांना वेळ, पैसा, सवयी म्हणून परवडतं तो वर्ग बहुतांशी उच्चवर्णीय आणि त्यांतही ब्राह्मण होता. गेल्या काही वर्षांत किंवा दीड-दोन दशकांत परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे.

त्यात अपवाद म्हणून आलेलं शाहू पाटोळेंचं 'अन्न हे पूर्णब्रह्म' आता तसं जुनंही झालं. आणखी पुस्तकं हळूहळू येतील. कदाचित पुस्तकांच्या जागी फेसबुकवर अब्राह्मणी स्वयंपाक जास्त दिसतही असेल.

पुंबा Sat, 27/07/2019 - 23:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'अन्न् हे अपूर्णब्रह्म' असे हवे.
आणि हा अपवादच म्हणावा लागेल.
आणि पुस्तके सोडूनच देऊ, युट्युब जेथे कुकरी चॅनेल्सचा सुळसूळाट आहे, तिथेसुद्धा ब्राह्मण पद्धतीचा स्वयंपाकच दिसतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 28/07/2019 - 03:07

In reply to by पुंबा

'अन्न हे अपूर्णब्रह्म' असं नाव आहे.

कुक्री च्यानल मी शोधत नाही; पण फेसबुकवर मला काही प्रमाणात अब्राह्मणी पाककृती दिसतात. (त्या लिहिणाऱ्यांत शाहू पाटोळे हे नावही असतं.) ब्राह्मणी पाककृती डकवणाऱ्यांना मी अनफॉलो करते. म्हणून माझा प्रश्न, यूट्यूबवर अब्राह्मणी कुक्री चालतच नाही, का तुम्हाला सापडत नाही?

चिमणराव Mon, 29/07/2019 - 03:40

In reply to by पुंबा

एकदम अनुमान काढणे अवघड आहे . गुगल ट्रेन्ड्झ किंवा दुसरे काही एन्जिन वापरल्यास डिजिटल लेखनाचे कळू शकेल.
----------
ब्राम्हणांना 'कशामध्ये काही तरी घालून काय होते हे बघण्याची हौस असावी' किंवा
असे प्रयोग पुस्तकात छापण्याची हौस असावी?
-------
बरेच वर्षांपुर्वीचा एक प्रसंग आठवला.
"ढोकळा खातोस ना?"
"हो."
"तसं नाही म्हणायचय, पॉम्फ्रेट घातलेला केलाय तो खाणार का?"
--------------------------------------

'न'वी बाजू Mon, 29/07/2019 - 06:15

In reply to by चिमणराव

"तसं नाही म्हणायचय, पॉम्फ्रेट घातलेला केलाय तो खाणार का?"

मी ढोकळा आणि पॉम्फ्रेट दोन्ही खातो. परंतु पॉम्फ्रेट घातलेला ढोकळा जर कोणी सामोरा केला, तर त्यास तोंड लावेनसे वाटत नाही.

बोले तो, हा पॉम्फ्रेट आणि ढोकळा दोहोंचाही सत्यानाश नव्हे काय?

उद्या फ्रूट सॅलडमध्ये मटण घालून खाल. परवा व्हिस्कीत कढी ओतून प्याल. तेरवा... जाऊ दे!

चिमणराव Mon, 29/07/2019 - 10:04

In reply to by 'न'वी बाजू

~ दोहोंचाही सत्यानाश ~

मलाही तसंच वाटतय. "पॉम्फ्रेट म्हणजे उकडलेला बटाटाच, वास नसतो" असं एका मासे खाणाऱ्याने सांगितले.
मुद्दा हा आहे की प्रयोग करण्याची हौस.

चिमणराव Mon, 29/07/2019 - 18:45

In reply to by 'न'वी बाजू

न खाणाऱ्यांस वळवण्याचा घाट असावा का?
--------------
विमानाच्या शेपटीत (फ्युजिलाज का काय ते) , बसमध्ये ड्राइवरसाइडच्या रांगेत बसणे टाळायचे; माशाचं शेपुट खायचं नाही यांत किती तथ्य आहे ?

१४टॅन Mon, 29/07/2019 - 17:10

In reply to by 'न'वी बाजू

पुस्तकांत 'सफरचंद घालून बेक केलेला मासा' आणि 'आंब्याच्या रसातले पापलेट' ह्या रेसिप्या दिलेल्या आहेत.

अबापट Mon, 29/07/2019 - 17:35

In reply to by 'न'वी बाजू

बाकी जाऊदेत पण व्हिस्कीत कढी ? काय हे न बा.
( बाकी व्हिस्कीत दूध घालून प्यायलेला एक मित्र होता, पण ते केवळ किडा म्हणून. आणि एकदा (वाईट) व्हिस्कीत (इतर काही उपलब्ध नसल्याने {व्हिस्की , किंवा सोडा, किंवा इतर पाण्याव्यतिरिक्त काहीही)
मँगोला टाकून पिण्याचा कार्यक्रम केला आहे. वाईट व्हिस्की व मँगोला दोन्ही कमी वाईट लागले चवीला.
शेवटी काय वेळेला ... वगैरे.
गेले ते दिवस . असो.
तुमचे असे काही रोचक प्रयोग असल्यास कळवणे. तेवढेच मनोरंजन ...

चिमणराव Sat, 27/07/2019 - 21:54

In reply to by 'न'वी बाजू

सहा महिन्यांपूर्वी मटात हे लेख येत होते. धुरंधर वगैरे. तारतम्याने ही का ती पुस्तकं अधिक हे नाय सांगता येणार. बाकी {आतल्या/आपल्या} घरातल्या सैपाकघरातला वावर ब्राम्हण पुरुषांचा आता अधिक झाला असण्याची शक्यता सुपाइतकीच दाट आहे.

आदूबाळ Mon, 29/07/2019 - 13:43

In reply to by पुंबा

ष्टे टून्ड, पुंबा. तुम्हाला आवडेल असं एक पुस्तक लौकरच येत आहे. तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं पुस्तकात नाही तरी प्रस्तावनेत नक्की मिळतील अशी आशा आहे.

मारवा Thu, 15/08/2019 - 23:38

गाय..................टेम्पो...........दाढीवाला.......... गांवकरी..............खल्लास !!!!!
असं एक टायटल बनवलं मी
म्हणजे उपयुक्ततावाद या थेअरी चा वापर करुन तो याला म्हणजे मॉब लिंचींग ला लावुन पाहत होतो.
पण मीच गोंधळलो म्हणुन थांबलो
लेख बनवला की टाकुन पाहतो.

चिमणराव Sun, 08/09/2019 - 04:39

पूर्वी साबण कंपन्यांंतर्फे घरी कर्मचारी पाठवून डेटा थेट गोळा करत. असं आता करत नाहीत. किंवा पर्यटन प्रदर्शनं लागतात तिथे प्रवेश फ्री परंतू एक एन्ट्री फॉम भरून घेतात. मागच्या वर्षी कुठे गेलात?, पुढे कुठे जावेसे वाटते,इमेल पत्ता वगैरे.
- डेटा थेट गोळा करण्यात अडचणी असतात का? फार स्लो पद्धत?

पुंबा Mon, 16/09/2019 - 17:29

Original Thinker ची नेमकी परिभाषा काय असते? एखाद्या विचाराचे Original असणे नेमके कोणत्या कसांवर जोखले जाते/जावे?

सामो Wed, 18/09/2019 - 20:44

In reply to by चिमणराव

च्रट्जी विस्कॉन्सिन/मिनेसोटामध्ये फक्त नेटिव्ह अमेरीकन्स ना वॉलाय मासा पकडायला परवानगी आहे. तेही प्रमाणात. काहीतरी निर्बंध आहेत. तेव्हा बरेचदा तो मासा अन्य लोकांना सापडला तरी परत पाण्यात सोडावा लागतो. तेव्हा मला वाटतं परत पाण्यात सोडलेला मासा वाचतो.

पुंबा Thu, 19/09/2019 - 00:27

{{
जरि तुझिया सामर्थ्याने
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरिही नाही

शक्तीने तुझिया दिपून
तुज करितिल सारे मुजरे
पण सांग कसे उमलावें
ओठांतिल गाणे हसरे ?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचे पाते
अन् स्वतःस विसरुन वारा
जोडील रेशमी नाते

कुरवाळित येतिल मजला
श्रावणांतल्या जळधारा
सळसळून भिजली पाने
मज करितिल सजल इषारा

रे तुझिया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावें ?
अन रंगांचे गंधांचे
मी गीत कसें गुंफावें ?

येशिल का सांग पहाटे
किरणांच्या छेडित तारा:
उवळीत स्वरांतुन भंवतीं
हळु सोनेरी अभिसारा ?

शोधीत धुक्यांतुन मजला
दवबिंदू होऊनि ये तूं
कधी भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधित हेतू

तू तुलाच विसरुन यावें
मी तुझ्यात मज विसरावें
तू हसत मला फुलवावें
मी नकळत आणि फुलावं

पण तुझिया सामर्थ्याने
ढळतील दिशा जरि दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही
}}
वरील कविता मी माझ्याकडच्या फोटोचे गुगल फोटोजमधून ओसीआर करून घेतली आहे. गुगलचे ओसीआर जवळजवळ पर्फेक्टली चालते. (सांगायचे हे होते. कविता मस्त आहेच.)

सामो Thu, 19/09/2019 - 00:32

In reply to by पुंबा

वाह!!!
कोण कवि आहेत पुंबा?