"महाराष्ट्रात ज्वालामुखी नवीन नाही. सह्याद्रीच्या रांगा ज्वालामुखीच्या उद्रेकातूनच तयार झालेल्या आहेत हे आपण शालेय भूगोलातच शिकलेलो आहोत. पण हा ज्वालामुखी आता मृत आहे. निदान गेली ६५ लाख वर्ष या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नाही असं मानलं जातं."
विक्षिप्त अदिति ह्यांच्या ह्या यलोस्टोन पार्कविषय धाग्यात वरील वाक्य वाचले आणि बरेच दिवस डोक्यात असलेला एक विचार पुढे आला. मी भूगर्भशास्त्राचा अभ्यासक नाही, केवळ थोडीबहुत माहिती सर्वसामान्य वाचनातून गोळा केली आहे. तसेच एकेकाळी सह्याद्रीच्या डोंगरपठारांमधून आणि किल्ल्यांवर बराच हिंडलो आहे आणि त्यातून हा येथे मांडलेला हा ढोबळ विचार तयार झालेला आहे. भूगर्भशास्त्राच्या अभ्यासकांकडून ह्याबद्दल अधिक खोलात जाऊन अधिकृत असे काही वाचावयास आवडेल.
मी वाचल्यानुसार डेक्कन ट्रॅपची निर्मिति ही पृथ्वीच्या पोटातील लाव्हा वरती येऊन घट्ट झाल्यामुळे निर्माण झाला आहे हे खरे पण ही प्रक्रिया ज्वालामुखींच्या उद्रेकातून स्फोट होऊन झालेली नाही तर पृष्ठभागावरील भेगांमधून दाबामुळे लाव्हा वर येऊन सावकाश क्षितिजसमान्तर पसरला जाऊन घडलेली आहे. सहज शोधता books.google.com येथे Hydrology and Water Resources of India हे पुस्तक मिळाले त्याच्या पृ.२४० वर हेच म्हटले आहे.
सह्याद्रीमध्ये आसपास चारहि बाजूस डोंगर आहेत अशा जागी उभे राहून सभोवार दृष्टि टाकली की असे जाणवते त्या डोंगरांची रचना सर्वात खाली दगडमातीचा आणि चढाचा डोंगर, त्याच्यावर शंभर-दीडशे फूट उंचीची खडकाची उभी भिंत, त्यावर पुनः दगडमातीचा आणि चढाचा डोंगर, त्यावर पुनः शंभर-दीडशे फूट उंचीची खडकाची उभी भिंत अशा प्रकारची असते. बहुशः पहिल्याच खडकाच्या भिंतीवर सपाट जागा असते आणि त्यावर पुढील डोंगर नसते. महाराष्ट्रातील बहुसंख्य डोंगरी किल्ले ह्या सपाटीवर वसलेले असतात. उभ्या खडकाच्या भिंतीच्या वर असल्याने त्या जागा शत्रूपासून आश्रयाच्या जागा म्हणून अतिशय योग्य असतात. खडकाच्या भिंतीमध्ये आवश्यक तेथे दरवाजे काढले आणि थोड्याफार तटाच्या भिंती आवश्यक तेथे बांधल्या की स्वसंरक्षण करण्यास निसर्गाने निर्मिलेली अति-उपयुक्त अशी जागा तयार मिळते. पावसाच्या खडकात मुरलेल्या पाण्यामुळे तेथे पाण्यासाठी टाकीहि खोदता येतात सातार्याचा अजिमतारा, तेथील जवळचे सज्जनगड, नांदगिरी, चंदन-वंदन असे किल्ले, पुण्याजवळचे सिंहगड, पुरंदर, विसापूर-लोहगड हे किल्ले असेच आहेत. अशा जागा सह्याद्रीमध्ये भरपूर असल्याने येथे ३५०-४०० किल्ले ऐतिहासिक काळापासून निर्माण झाले आहेत.
काही ठिकाणी खडकाच्या एकाऐवजी दोन भिंती आढळतात. असे डोंगर साहजिकच एक भिंतवाल्या डोंगरांहून अधिक उंच असतात. पुण्याजवळ पुरंदरमध्ये अशा एकावर एक दोन भिंती आढळतात. राजगडचा बालेकिल्ला, नाशिक जिल्ह्यात चांदवडच्या सभोवतालचे डोंगर ही मी पाहिलेली अन्य काही उदाहरणे. ह्या पायर्यापायर्यांच्या रचनेमुळे त्यांना स्वीडिश भाषेतील तशा अर्थाच्या शब्दावरून 'डेक्कन ट्रॅप' हे नाव मिळाले आहे.
येथे सहजच लक्षात येणारी गोष्ट म्हणजे खडकांच्या ह्या पहिल्या वा दुसर्या भिंती सर्व जवळपासच्या डोंगरांवर एकाच समपातळीला असतात. महाबळेश्वर आर्थर्स सीट, हरिश्चंद्रगदाच्या पश्चिमेचा कोकणकडा येथे हे स्पष्ट दिसते.
अशी रचना का झाली असावी ह्याबद्दल माझा तर्क आहे तो असा. पृथ्वीच्या पोटातील लाव्हा भेगांमधून बाहेर येऊन पसरतांना लाव्हाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या काळात कधी मऊ तर कधी अधिक कठिण अशा लाव्हांचे थर एकावर एक बसत गेले. तदनंतर हवा,पाणी, तापमानातील बदल, वर वाढू लागलेल्या वनस्पति ह्यांमुळे ह्या थरांची झीज होऊ लागली आणि तुलनेने मऊ थर धुपून जाऊन त्यांचे उतार निर्माण झाले. धुपायला विरोध करणारे कडक थर तसेच राहिले आणि त्यांच्या भिंती तयार झाल्या आणि म्हणून एका आसमंतातील ह्या भिंती एकाच पातळीवर दिसतात.
सह्याद्रीत कित्येकदा वेळा मी लाव्हाच्या थिजलेल्या बुडबुडयासारखे दिसणारे गोल आकाराचे चेंडूसारखे गोळे आसपासच्या घट्ट दगडात अडकलेले पाहिले आहेत. हे गोळे अनेक थरांचे बनलेले असतात आणि हे थर अगदी ठिसूळ असून हातानेदेखील एकमेकांपासून विलग करता येतात. लाव्हा पसरत असतांना आतील गॅसमुळे हे बुडबुडे झाले असावेत असा माझा तर्क आहे.
वर उल्लेखिलेल्या खडकाच्या दोन उभ्या भिंती आणि मधील चढाचा डोंगराचा भाग सातार्याजवळील ह्या चित्रात स्पष्ट दिसत आहेत. सातार्याच्या अजिमतार्याच्या जवळजवळ पश्चिम पायथ्यापासून आणखी पलीकडे दिसणार्या यवतेश्वर परिसराचे हे चित्र आहे. पुढचा डोंगर पहिल्याच भिंतीपाशी संपतो. मागे - न दिसणारा - अजिमतारहि असाच एक भिंतीचा आहे. उजव्या वरच्या कोपर्यात यवतेश्वराची पहिली आणि दुसरी अशा दोनहि भिंती दिसत आहे. डाव्या बाजूच्या सांबरवाडी नावाच्या डोंगरालाहि त्याच उंचीवर तशीच दुसरी भिंत आहे. (यवतेश्वराच्या टोपीसारख्या दिसणार्या दुसर्या भिंतीला सातार्याचे लोक 'बंडा' असे म्हणतात - का ते ठाऊक नाही! त्याच्यावर फूटबॉलच्या मैदानाइतक्या आकाराचे सपाट मैदान आहे नेहमीपेक्षा अधिक पाऊस एखादे दिवशी पडला तर तर ह्या बंडावरून धबधबे लागतात, सातार्यातून हा देखावा मोठा प्रेक्षणीय दिसतो. अलीकडे बरेच प्रसिद्धीला आलेले कासचे पठार यवतेश्वराच्या मागे आणि पहिल्या भिंतीच्या पातळीवर आहे.)
त्यापुढील चित्र चंदन-वंदन ह्यांपकी एका किल्ल्यावरून दुसर्याचे घेतलेले चित्र आहे. (हे ३६० अंशात फिरविता येते.) ह्या चित्रातही समपातळीवरील थर स्पष्ट दिसतात.
भूगर्भशास्त्राच्या अभ्यासकांचे आणि अन्य निरीक्षकांचे ह्यावरचे विचार वाचावयास आवडतील.