धार्मिक वाङ्मयातील अतिशयोक्ति
आपल्या प्राचीन धार्मिक वाङ्मयाकडे पाहिले की जाणवते की आपल्या प्राचीन लेखकांना मोठया संख्या आणि कोष्टकांचे फार आकर्षण होते. ह्याची दोन ठळक उदाहरणे देतो.
भारतीय युद्धात कुरुक्षेत्रावर १८ अक्षौहिणी सैन्य गोळा झाले होते आणि मूठभर सोडले तर बाकी सारे युद्धात मारले गेले.
१८ अक्षौहिणी सैन्य म्हणजे किती? अमरकोषात असे म्हटले आहे:
(२.८.८१.१) एकेभैकरथा त्र्यश्वा पत्तिः पञ्चपदातिका।
(२.८.८१.२) पत्त्यङ्गैस्त्रिगुणैः सर्वैः क्रमादाख्या यथोत्तरम् ।।
(२.८.८२.१) सेनामुखं गुल्मगणौ वाहिनी पृतना चमू:।
(२.८.८२.२) अनीकिनी दशाऽनीकिन्यक्षौहिणी (अथ संपदि - पुढील श्लोकाचा भाग)॥
श्लोकांचे स्वैर भाषान्तर: एक हत्ती, एक रथ, तीन अश्वारूढ सैनिक आणि पाच पदाति (पायी लढणारे सैनिक) म्हणजे एक पत्ति. ह्या पुढे सर्व भाग तिनाच्या पटीत घ्यावे. ते म्हणजे सेनामुख, गुल्म, गण, वाहिनी, पृतना, चमू आणि अनीकिनी. दहा अनीकिनींची एक अक्षौहिणी.
महाभारतात हेच कोष्टक दिले आहे.
ह्यावरून भारतीय युद्धात १८ अक्षौहिणींमध्ये पुढीलप्रमाणे सैनिक होते. एकूण सैनिकसंख्या आणि प्राणिसंख्या मोजण्यासाठी एका हत्तीबरोबर दोन सैनिक (माहूत आणि लढणारा), एका रथाबरोबर दोन सैनिक (सारथि आणि लढणारा), तसेच एका रथाबरोबर दोन अश्व असे मानले आहे.
एव्हढया मोठया सैन्यासोबत स्वयंपाकी, पाणके, भारवाहक आणि अन्य अनेक प्रकारचे सेवक असणारच. इतक्या प्रचंड संख्येने माणसे, हत्ती, घोडे, एका ठिकाणी दूरदूर अंतरावरून एकत्र आणणे, त्यांच्यासाठी अन्न, पाणी आणि चारा, त्यांची मलमूत्रविसर्जनाची व्यवस्था - त्यांच्या एक ना दोन हजार गरजा भागवणे हे काम आजची वाहतूक आणि संपर्क साधने, तसेच staff-work ची आधुनिक कौशल्ये वापरूनसुद्धा अशक्यप्राय आहे. महाभारतकालीन भारतात इतकी मोठी लोकसंख्याहि बहुधा नसावी. सैन्याची इतकी प्रचंड संख्या केवळ कविकल्पना दिसते.
ह्या लेखनात सुचविल्याप्रमाणे ३३ कोटि देवांची आपली कल्पना ही अशाच मनोविलासाचा भाग दिसते. एका गणतीनुसार देवांची मूळ संख्या ३३ असावी (८ वसु, ११ रुद्र, १२ आदित्य, २ द्यावापृथिवी, एकूण ३३.) (’एका गणतीनुसार’ असा शब्दप्रयोग अशासाठी केला आहे की अन्य ठिकाणी दुसर्या देवतांचा देव म्हणून उल्लेख असू शकेल.) पहा शतपथ ब्राह्मण ४.५.७.२. ’अष्टौ वसव:। एकादश रुद्रा द्वादशादित्या इमे एव द्यावापृथिवी त्रयस्त्रिंश्यौ त्रयस्त्रिंशद्वै देवा:...’ बृहदारण्यक उपनिषदात वरीलच गणती आहे असे माझे मित्र मला सांगतात. अवेस्तामध्येहि ३३ देव आहेत.
’कोटि’ ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे संख्यावाचक शंभर लाख. दुसरा म्हणजे ’the highest point, eminence, excellence'. (पहा मोनियर विल्यम्स). (मराठीमध्येहि ’प्रयत्नांची पराकोटी’ अशा शब्दप्रयोगात हाच अर्थ असतो.) ’सर्वोच्च स्थान’ अशा अर्थाने देवांची एक ’कोटि’ आहे. वर उल्लेखिलेल्या लेखनात म्हटल्याप्रमाणे ८व्या शतकापर्यंत हाच अर्थ वापरात होता. तदनंतर तो गळून पडून अजाणतेपणे आणि/किंवा मोठया संख्यांच्या कौतुकातून ३३००शे लाख देव तयार झाले!
सप्तलोक, सप्तद्वीपें, सप्तस्वर्ग, सप्तपाताल, सप्तसमुद्र ह्या कपोलकल्पनांमध्येहि संख्या आणि आणि कोष्टकांचे प्रेम दिसून येते.
कृष्णाच्या सोळा सहस्र बायका, पुनर्जन्माच्या ८४ लक्ष योनि, सगराचे सहस्र पुत्र, शंभर कौरव - अतिशयोक्तीची आणखी काही उदाहरणे.
हे सर्व मी मौजमजा ह्या सदरात लिहीत आहे ते अशामुळे की थोडाफार विचार करणार्यालाहि ही अतिशयोक्ति लगेच दिसते आणि ते आकडे तो गंभीरपणे घेत नाही. पण श्रद्धाळू लोकांची संख्याहि प्रचंड असल्यामुळे ह्या संख्या खर्याच आहेत असे मानणारे भाविकहि मोठया संख्येने असावेत असे वाटते. अशा प्रकारच्या आंधळ्या श्रद्धा एकतर खोटा धर्माभिमान निर्माण करतात किंवा हिंदुधर्माची कुचेष्टा करू इच्छिणार्यांना आयते कोलीत हाती देतात. (पूर्वी ख्रिश्चन मिशनरी हे सर्रास करत असत.) ह्यातून अनावश्यक संघर्ष निर्माण होऊ शकतात. (मी स्वतःला हिंदुधर्माचा पाईक मानीत नाही तरीहि खोटयानाटया कारणाने हिंदुधर्माची खिल्ली उडविली जावी हेहि मला मान्य नाही.)
प्रतिक्रिया
सैन्यबळाविषयीचं मत पटणेबल
सैन्यबळाविषयीचं मत पटणेबल आहे.
बाकी ८४लक्ष योनी म्हणजे कदाचित एकुणच जगातील विविध प्राण्यांचे प्रकार असावेत
कृष्णाने म्हणे युद्धात मारल्या गेलेल्या १६००० लोकांच्या बायकांचे पालन पोषण केले जे की नवरा करतो
कौरवांविषयी - ८-१० सोडले तर बाकी इतर दासीपुत्र वगैरे असावेत अशी एक धारणा आहे.
http://shilpasview.blogspot.com
माहिती जेवढी रोचक आहे
माहिती जेवढी रोचक आहे त्यापेक्षाही असा विचार करण्यामागचा विचार अधिक भावला. मौजमजेपेक्षाही माहिती म्हणून या लेखाकडे पहावं असं वाटतं. (मी स्वत:ला धार्मिक इ. मानत नाही, पण इतिहास म्हणून ही माहिती उपलब्ध आहे याचा धर्माशी काही संबंध नाही.)
मोठ्या संख्या कोष्टकांमधे रचण्यात ज्या प्रकारची बौद्धीक शिस्त दाखवलेली आहे ती पुढच्या काळात, एकूणच डॉक्यूमेंटेशन करण्यात का दिसत नाही असाही एक प्रश्न पडला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माहितीपूर्ण
>>>>>मौजमजेपेक्षाही माहिती म्हणून या लेखाकडे पहावं असं वाटतं. <<<<
हेच म्हणतो. मजेशीर माहिती.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
एकंदरीत पुराणात दिलेल्या
एकंदरीत पुराणात दिलेल्या आकड्यांना हजार ते दहाहजारने भागावं असा माझा ठोकताळा आहे. युगांचा हिशोब हा असाच. एक युग म्हणजे अशीच हजारोंनी वर्षं होतात.
मला वाटतं अतिशयोक्ती ही कथेत लोकांना दिपवून टाकण्यासाठी येते. 'फार विचार करू नका, खूप मोठ्ठा आकडा होता तो महाभारतातल्या सैन्याचा' असं सांगण्यासाठी ही कोष्टकं तयार होत असावीत. कारण चार लाख हत्ती आणि सत्तेचाळीस लाख सैनिक एका युद्धात वापरायचे तर ते रणांगण किती मोठं असेल याचीही कल्पना करवत नाही. कोणी करण्याच्या फंदात पडत असेल असंही वाटत नाही.
आधी काहीतरी कारणाने हे आकडे फुगतात,
यासारखी स्पष्टीकरणं नंतर तयार होतात.
अतिशयोक्ति
ही अतिशयोक्ती
१) अपभ्रंशातून
२) मनोऱंजकतेतून
३) अनुनयातून
४) वाहकाच्या आकलनमर्यादेतून
५) पंथाभिमानातून
६) प्रक्षिप्ततेतुन
.
.
.
आली असावी
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
मनोरंजक विष्लेषण आहे
मनोरंजक विष्लेषण आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
या न्यायाने
कलियुग सुद्धा खूपच कमी वर्षांचे असू शकेल! तरीच. एकदा माउंट अबूला गेलो असताना 'प्रजापिता ब्रह्माकुमारी' च्या आश्रमात गेलो होतो. कारण आम्हाला त्यांची एक उत्कृष्ट फुलांची बाग बघायची होती. त्यासाठी आधी, एक प्रदर्शन बघण्याची व १ तासाचे बौद्धिक ऐकण्याची सक्ती होती. तिथे ते सारखे, कलियुग ५००० वर्षांचेच आहे आणि आता ते संपतच आले आहे, असे सांगत होते. त्याहीपुढचा विनोद म्हणजे आत्ताच जर त्यांचे सभासद झालो तर येणार्या 'सत्ययुगात' गॅरंटेड मनुष्य जन्म मिळेल, असेही ठासून सांगत होते.
आम्ही काही ते आमंत्रण स्वीकारले नाही त्यामुळे सत्ययुग अनुभवण्याचा आमचा चानस गेला.
=))
हा हा हा!
'त्यांचे' सभासद झाल्यावर बर्याच गोष्टींची ग्यारांटी दिसतेय. माझ्यावर अशी (त्यांचे भाषण ऐकायच्या)सक्तीची वेळ आली असता, त्यांनी मी सभासद झाल्यास स्वर्गात जागा नक्की मिळण्याची हमी घेतली होती.
वैतागून "स्वर्गात का धाडता?, आम्हाला मृत्यूच नको आहे" असे म्हटल्यावर त्यांनी तुम्ही म्हणता तसे अमिष दाखवले होते.
मी देखील चानस घेतला नाही.
अवांतर: सत्ययुगात जन्मायची ग्यारंटी इथे कोणी घेतलाय का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
काळ बदलतो आहेच.
मला असं आमिष दाखवलं तर काही फायदा नाही. "मला स्वर्गात जाऊन तिथे पुन्हा तुमची तोंडं बघण्याची इच्छा नाही. माझे आहेत तेच मित्रमैत्रिणी हवे आहेत म्हणून मला नरकातच जायचं आहे"; असं काही उत्तर दिलं तर त्या लोकांची काय प्रतिक्रिया येईल? मला सत्ययुग नकोच आहे, महान बोअर प्रकार असेल तो.
आमच्या बापूंच्या एका मित्राने ओढून त्यांना ब्रह्मकुमारींच्या एका आठवडी शिबीराला नेलं होतं. माऊंट अबू असल्यामुळे बहुदा बापूही नाही म्हणाले नाहीत. त्या वेळी त्याच शिबीरात जयश्री गडकरही होत्या. रामायण मालिका बहुदा नुकतीच संपली होती, पण लोकांच्या स्मरणात होती. लोकांनी जयश्री बाईंना रामायणातले प्रसंग करून दाखवायला सांगितले म्हणे. हिंदू पुराणं ब्रह्मकुमारींना चालतात का नाही माहित नाही. पुढे बौद्धीकं वगैरे घेताना चर्चा झाली. बापूंनी प्रश्न विचारला, "सगळेच ब्रह्मकुमार/कुमारी झाले तर शंभर-एक वर्षात सगळी मानवजात नष्ट होईल. मग तुमचा पंथही नष्ट होईल. तर याचं उत्तर काय?" उत्तर मिळालं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बहुदा तेच त्यांना अपेक्षित असलेलं सत्ययुग असेल.
<<"सगळेच ब्रह्मकुमार/कुमारी झाले तर शंभर-एक वर्षात सगळी मानवजात नष्ट होईल. मग तुमचा पंथही नष्ट होईल. तर याचं उत्तर काय?" उत्तर मिळालं नाही. >>
बहुदा तेच त्यांना अपेक्षित असलेलं सत्ययुग असेल.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
सांख्यिक तपशिलांमुळे तथ्यतेचा वेष
सांख्यिक तपशील असले तर कथा तथ्य असल्याचा भास होतो.
"खूप सैनिक होते" असे म्हटले तर ढगळ्पणा वाटतो. "५३६ सैनिक होते" असे म्हटल्यास कोणीतरी मोजले असल्याचे उपकथानक ध्वनित होते. शिवाय मोजमाप करणारा प्रामाणिक अकाउंटंट होता असे उप-उपकथानक ध्वनित होते.
बायबलातील वंशावळी हा त्याच कथा-शैलीचा प्रकार मानला पाहिजे. आदमापासून प्रत्येक पिढीतील मुलांची नावे (ज्येष्ठ वंशावळ) सांगितलेली आहे. त्यावरून "ही कपोलकल्पित कथा नाही, प्रत्येक औरस व्यक्तीला आपला बाप ठाऊक असतो, त्याप्रमाणे पूर्ण वंशावळच प्रामाणिक आहे" असे ध्वनित होते. त्यामुळे आदमाची कथाही पितृ-श्रुतिर्वै सत्य असल्याची ग्वाही दिली जाते.
लेखा (सांख्यिक अकाउंट) असल्यामुळे व्यवहार सत्य होत नाही. तर लेखा तथ्याशी जुळवत-जुळवत ठेवण्याची यंत्रणा असेल, तरच लेखा घडलेल्या व्यवहाराचे प्रतिबिंब होतो. (पण हे विसरणे सोपे असते.)
अतिरंजित 'तपशील'
> सांख्यिक तपशील असले तर कथा तथ्य असल्याचा भास होतो.
हा विचार पटला. पण तरी अशी शंका येते: समजा महाभारत रचणाऱ्यांपैकी कुणीतरी (अनेक होते ह्याबद्दल माझी खात्री अाहे), भारतीय युद्धात १८,२७९ सैनिक होते असं म्हटलं असतं तर मला वाटतं कथेवर विश्वास बसायला अाणखी मदत झाली असती. किंवा रामाने ३९ वर्षे राज्य केलं असं म्हटलं असतं, तर अनेकांना 'खरंच तसं असेलही बुवा' असं वाटलं असतं. थाप मारायची तर ती पचेल अशी मारावी. अव्वाच्या सव्वा अाकडे फेकल्यामुळे 'कथेत तथ्य असल्याचा भास निर्माण करणं' हा हेतू काही प्रमाणात फसतो. अादमाचंही असंच अाहे. त्याची वंशावळ दिलेली अाहे खरी, पण तो ९३० वर्षे जगला असंही ठोकून दिलेलं अाहे.
पण मी जे म्हणतो अाहे, त्याची मला स्वत:ला खात्री नाही, कारण (सांख्यिक अाणि इतर प्रकारची) अतिशयोक्ती असूनही महाभारत किंवा जेनेसिस शब्दश: खरं अाहे असं मानणारे लोक अाहेतच. (पण बहुतेक दोन्ही खरी अाहेत असं मानणारे फारसे नसावेत.)
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
यावरून...
यावरून एक शंका. तपशील कपोलकल्पितच भरायचे आहेत, गुणिले रचयिते अनेक आहेत, म्हटल्यावर प्रत्येक रचयित्याचा (अतिरंजित) तपशील दुसर्या कोणत्याही रचयित्याच्या तपशिलाशी अगदी मिळताजुळता नाही, तरी चेंडूउद्यान जवळपासचा येईलच, याची शाश्वती काय? मग वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये वेगवेगळ्या टोकांचे आकडे सापडतात का? तसे सापडू लागल्यास विश्वासार्हतेचा प्रश्न येतोच, पण सापडत नसल्यास, काही रचयित्यांचे ते आपले आकडे जवळपास आणण्याचे आणि मग नॉन-कन्फॉर्मिंग आवृत्त्या पुंडाईने बाजारातून हडप करण्याचे संगनमत असावे का?
शिवाय, संगनमतकर्यांपैकी एखादा वरिजनल आणि इतरेजन कॉपीक्याट असण्याची शक्यता काय आहे?
'ब्रह्मदेवाच्या दिवसा'प्रमाणेच 'आदमचे वर्ष' असे कालमापनाचे काही पर्यायी (आणि समांतर) एकक त्या काळात (बहुधा खाजगी) वापरात असल्यास तपासावे लागेल.
बाकी, वंशावळीचेच म्हणायचे झाले, तर हो, आहेत खर्या. पण त्या खर्या आहेत, कोणी ठोकून दिलेल्या नाहीत, याला पुरावा काय? छडा लावायला नेमके कोण गेले आहे? आदमचे सोडा, (कधी होऊन गेला असलाच, तर) हजारो वर्षे होऊन गेली त्याला होऊन गेल्याला. आम्ही-तुम्ही काय किंवा सर्व उपस्थित सभ्य-असभ्य गृहस्थ-गृहिणी काय, आपण ज्यांना आपापले तीर्थरूप मानतो, ते तरी नक्की आपापले जैविक पिता आहेत, याला नक्की पुरावा काय? केवळ आपल्या मातु:श्रींचा शब्द? गर्भधारणेच्या नेमक्या क्षणी त्याची नोंद करायला कोणी त्रयस्थ साक्षीदार उपस्थित होता काय? अशा कोणा साक्षीदाराने सुयोग्यरीत्या त्याचे डॉक्युमेंटेशन करून ठेवले आहे काय? आणि जो क्षण गर्भधारणेचा म्हणून मानला, तोच क्षण खरोखर आपल्या गर्भधारणेचा होता, हे कशावरून? त्याच्याच थोडे आगेमागे, इतर कोणत्या प्रसंगी (आणि इतर कोण्या यशस्वी कलाकाराकडून) काम फत्ते झालेले नाही, याची खात्री देता येईल? हं, (कदाचित पुरेशा संधीच्या अभावापायी) तशी शक्यता कमी असेलही, पण 'लोक असंभव आणि अशक्य यांच्यात गफलत करतात, बहुधा तिथेच फसतात' (चूभूद्याघ्या) असे कायसेसे तो शेरलॉक होम्स की कोण तो म्हणून गेलेला आहेच ना?
'आपली आणि आपल्या मानीव जन्मदात्यांची चेहरेपट्टी/ठेवण/इतर कोणती जैविक वैशिष्ट्ये सारखीच आहेत' हा तर पुरावाच नव्हे. तसा सारखेपणा शोधायलाच गेला, तर तो एखादा काका, पैतृक आजोबा, वगैरेंमध्येही सापडून जाईल. पण म्हणून?
थोडक्यात, शक्यता शोधायला गेल्यास अनेक आहेत. त्यातली एकच शक्यता आपण सांगीवांगीवर खरी मानतो. ती सांगणारी मुख्य व्यक्ती कदाचित खरे बोलत असेलही, आणि तिला दुजोरा देणार्या इतर व्यक्ती या गुड फेथमध्ये तसे करीत असतील. पण त्या इतर शक्यता वगळून उरलेली एकच शक्यता खरी मानायला आपल्याजवळ कोणताही ठोस म्हणता येण्यासारखा पुरावा नाही.
नाही म्हणायला घटनेपश्चात असा पुरावा गोळा करायला एक मार्ग आजकाल उपलब्ध आहे, असे कळते. 'प्याटर्निटी टेस्ट' नावाचा काही प्रकार याबद्दल काही खात्रीलायक निष्कर्ष पुरवू शकतो, आणि (नेमके कसे ते माहीत नाही, पण) काका, आजोबा वगैरे 'इतर उमेदवार' वगळून 'विजेत्या उमेदवारा'वर झीरो-इन करू शकतो, असे ऐकलेले आहे. (तपशिलांबद्दल कल्पना नाही.) पण असा मार्ग जरी आजकाल उपलब्ध असला, तरी आपल्यापैकी नेमक्या किती जणांनी तो अवलंबला असावा? मग तो अवलंबला नसता आपण या गोष्टीवर विश्वास ठेवतो, तो पुराव्यानिशी आहे, असे म्हणता येईल काय?
आणि बाबा आदमच्या जमान्यात असा मार्ग उपलब्ध होता काय? सगळे आधुनिक शोध 'आपल्या पूर्वजां'नी पूर्वीच लावून ठेवले होते, असे मानण्याची आजकाल पद्धत आहे खरी, पण आदम हा 'आपल्या पूर्वजां'पैकी नसल्याने बहुधा त्याला तो मार्ग उपलब्ध नसावा. म्हणजे सगळेच आपले अंदाजपंचे दाहोदरसे!
तर सांगायचा मुद्दा, बाबा आदम काय किंवा तुम्ही-आम्ही आणि उपस्थित सभ्य-असभ्य गृहस्थ-गृहिणी काय, केवळ कोणाच्या तरी शब्दावर विश्वास ठेवून कोणत्याही पुराव्याअभावी कोणालातरी आपले जैविक पिता मानतो, याइतकी मोठी अंधश्रद्धा दुसरी कोणती बहुधा नसावी. (जे असे मानत नाहीत, त्यांना उद्देशून अगोदरच क्षमस्व.) 'इतकी मोठी अंधश्रद्धा दुसरी नसावी' म्हटल्यावर तिचे धारक (युअर्स ट्रूली इन्क्लूडेड) हे 'इतके मोठे मूर्ख दुसरे नसावेत' क्याटेगरीत बहुधा यावेत, हे ओघाने आले. अंधश्रद्धानिर्मूलनाची धुरा (अन्योन्यतत्त्वावर) खांद्यावर घेतलेल्यांनी * विशेष दखल घेण्यासारखा हा प्रकार असावा, असे वाटते. कदाचित 'च्यारिटी बिगिन्ज़ अॅट होम' या तत्त्वास अनुसरून इच्छुकांना स्वतःपासून सुरुवात करता येईल. 'तीर्थरूपांना सादर करावे, अन्यथा मातु:श्रींस भटाकडे ** पाठवून देण्याची व्यवस्था करावी' असा प्रश्न गंभीर अंधश्रद्धानिर्मूलकांनी स्वतःलाच विचारावा, अशा योग्यतेचा हा प्रकार आहे. (आम्ही अंधश्रद्धानिर्मूलनवादी नसल्याकारणाने, किंबहुना सोयिस्कर अंधश्रद्धांना आमचा काहीही विरोध नसल्याकारणाने, 'इदं न मम' हेवेसांनल.)
अतिअवांतरः 'अबसेन्स ऑफ एविडन्स इज़ एविडन्स ऑफ अबसेन्स' असेही काही तत्त्व फेकलेले अनेकदा ऐकण्यात येते. 'आपण ज्यांना तीर्थरूप मानतो, तेच आपले जैविक पिता आहेत', याबद्दलच्या कोणत्याही उपलब्ध पुराव्याचा अभाव हा असे काहीही नसल्याचा पुरावा मानता यावा काय? धूम्रपान करणारी बंदूक आम्हांस तरी कोठे दिसत नाही.
* यावरून आठवले. काहीतरी (बहुधा कोण्या प्राणिविशेषापैकी एखादे क्रियाशील दांपत्य) अंगावर घेतले, की लाथा बसतात, असे काही(बाही) सुवचन 'आमच्या पुण्या'त ऐकलेले आहे. त्याची या निमित्ताने आठवण झाली. (नोहाला विचारले पाहिजे. नावेवर एकेका प्राणिविशेषाची जोडपी चढवताना काही जोडपी तरी उचलून अंगावर घ्यावी लागली असणारच. तसे नोहाऐवजी मनूला विचारूनही चालण्यासारखे आहे, परंतु उगाच 'मनुवादी'चे लेबल अंगावर घ्यावे लागायचे. त्यापेक्षा नकोच ते!)
** 'भट' आडनावाच्या एखाद्या व्यक्तीकडे नव्हे.
नक्की काय म्हणायचं कळलं नाही
पण तरी एक मामूली तर्कविसंगती दिसली ती दाखवून दिल्यावाचून राहावत नाही.
आपल्यापैकी बहुतेक जण जन्मापासून जे वडील म्हणून मानतो, बाबा, डॅडी, पप्पा, पिताश्री वगैरे म्हणून हाक मारतो ते जैविक पिता म्हणजे काय याची तसूमात्र कल्पना नसताना. जे नातं निर्माण होतं ते जैविक पिता ऐवजी सामाजिक दृष्टिकोनातून पिता या अर्थाने होतं. विश्वास असतो तो त्या नात्यावर.
एवढंच दाखवून देऊन मी माझे त्रेसष्ठ* शब्द संपवतो.
(*कंसातले तसेच उद्धृत केलेले शब्द माझ्या शब्दात मी मोजत नाही)
त्याबद्दल वाद नाही
('पिता' = 'पालक' / 'संरक्षक' अशा अर्थाने) या मुद्द्याबाबत कोणताही वाद नाही. आणि लहानपणापासून मुळात जे मानले जाते, तेही याच अर्थाने, हेही मान्य आहे. परंतु पुढेमागे कधीतरी पितृत्वसंकल्पनेची जैविक पितृत्वाशी (जनकत्वाशी) सांगड बहुधा घातली जाते, विशेषतः सामाजिक पातळीवर, असे मानायला जागा आहे. (याला थोडेफार अपवाद असूही शकतात, परंतु त्या परिस्थितीत हे जैविक-नसलेले-परंतु-प्रतिपालकत्व-दर्शवणारे पितृत्व हे सहसा समाजाने रॅटिफाय केलेले असावे लागते, किंबहुना समाजाची सहसा तशी अपेक्षा असते, असे वाटते. त्याहीपुढे, प्रतिपालक-पिता हा बाय-डीफॉल्ट-अँड-अनलेस-स्पेसिफाइड-अँड/ऑर-रॅटिफाइड-अदरवाइज़ जैविक-पिताच असावा, अशीही काही सामाजिक अपेक्षा अथवा सामान्य गृहीतक अनेकदा दिसून येते.)
या सामान्य गृहीतकाकडे अथवा सामाजिक अपेक्षेकडे आणि त्यातून निर्माण होणार्या प्रतिपालक-पितृत्व आणि जैविक पितृत्व (अथवा जनकत्व) यांच्या अध्याहृत सांगडीकडे अंगुलिनिर्देश करण्यापलीकडे विशेष काहीच म्हणावयाचे नाही. त्या अनुषंगाने, आपले प्रतिपालक पिता कोण आहेत हे बहुतेकांना माहीत असावेच, परंतु त्यावरून आपले जनक कोण, याबद्दल, (आपली गृहीतके अथवा काहीही असोत, पण) कोणतेही विधान करता येत नाही, किंबहुना, आपल्या जनकत्वाबद्दल कोणीही कोणताही दावा केल्यास त्यास पुष्टी देणारा कोणताही पुरावा (मुद्दाम गोळा केल्याखेरीज) बहुधा उपलब्ध नाही, सबब असा दावा बहुधा फोल आहे, एवढेच अधोरेखित करावयाचे आहे.
याउपर, (१) उपरनिर्दिष्ट सामान्य गृहीतक अथवा सामाजिक अपेक्षा (अथवा अशा गृहीतकाच्या अथवा अपेक्षेच्या अस्तित्वाची बाब) कोणास मान्य नसल्यास, आणि/किंवा (२) आपले जनक कोण याबद्दल कोणाचा कोणताही दावा अथवा गृहीतक नसल्यास, आणि/किंवा (३) आपल्या जनकाच्या ओळखीबाबत एखाद्याचा अज्ञेयवादाचा दावा असल्यास, अशांबद्दल आम्हांस कोणताही प्रत्यवाय असण्याचे काहीच कारण दिसत नाही.
जैविक पुराव्याही गरज नाही.
घासकडवींच्या मुद्द्याला पुढे ओढून....
पुरातन भारतीय स्टॅण्डर्डनुसार मूल कोणाचे या प्रश्नाला "बीज क्षेत्र न्याय" लागू आहे. म्हणजे बीज किंवा क्षेत्र ज्याच्या मालकीचे असेल; त्याचे मूल* असा निर्णय आहे. म्हणून प्रसादाद्वारे झालेला राम आणि इंद्रापासून झालेला अर्जुन हे अनुक्रमे दशरथाचे आणि पंडूचे मुलगे ठरतात. आता क्षेत्र कोणाच्या मालकीचे हा निर्णय करणे सहज शक्य असल्याने जैविक पैतृत्व काहीसे दुय्यम ठरण्याची शक्यता जुन्या परंपरेत होती.
पुढे जेव्हा जैविक पैतृत्व महत्त्वाचे ठरण्याचा काळ आला तेव्हा "क्षेत्रां"साठी नवे आय एस ओ स्टॅण्डर्ड लागू केले गेले त्यानुसार क्षेत्राचा इतर बीजांशी संबंध निषिद्ध ठरला. त्या क्वालिटी अॅशुरन्ससाठी "पॉलिसीज आणि प्रोसिजर्स" बनवल्या गेल्या. नॉन कन्फर्मिंग क्षेत्रांचे सर्टिफिकेशन कठोरपणे रद्द करण्यात येऊ लागले**.
तरीही या स्टॅण्डर्डमध्ये काही प्रमाणात क्षेत्र मालकीचे नसले तरी बीजातील वाय क्रोमोसोम समान असेल तर चालेल असा अलावन्स ठेवलेला होता.
*सध्या गाजत असलेला पैतृकत्वाचा विशिष्ठ वाद हा भारतीय परंपरेनुसार बाद आहे.
**या परिस्थितीत "सर्टिफिकेशन रद्द झालेले नाही" हा जैविक पैतृत्वाचा पुरावा म्हणून चालून जायला हरकत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मतभेद
'सर्टिफोकेशन रद्द झालेले नाही' हा कदाचित पॉलिसीज़ अँड प्रोसीजर्सच्या इंप्लिमेंटेशनमधील हलगर्जीपणाचा पुरावाही असू शकतो, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो.
(असो. या विशिष्ट केसमधील तपशिलांबद्दल फारशी कल्पना नाही.)
+
ते बरोबर आहे. कदाचित ऑडिट मधला ढिलेपणा किंवा नॉनकन्फर्मिटी आढळल्यावरही अॅक्शन न घेण्याचा 'नाकर्तेपणा'सुद्धा असू शकतो.
म्हणुन चालून जायला हरकत नाही असं म्हटलं.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
थोडा साशंक
अधोरेखिताबद्दल थोडा साशंक आहे.
'सामाजिक दृष्टिकोनातून पिता' म्हटल्यावर, त्या दृष्टिकोनातून जैविक पितृत्वास (अथवा 'सामाजिक दृष्टिकोनातून पितृत्वा'च्या जैविक पितृत्वाशी एकरूपतेस) काहीही महत्त्व नसावे, बरोबर?
मग समाजमानसात वंदनीय ठरलेल्या एखाद्या व्यक्तीचा 'सामाजिक दृष्टिकोनातून पिता' हा त्या व्यक्तीचा जैविक पिता नसावा, असा संशय जर कोणी व्यक्त केल्यास, अथवा तशा अर्थाचा एखादा बिनबुडाचा परंतु कुत्सित विनोद कोणी प्रसृत केल्यास त्याचा परिणती अवांच्छनीय घटनांत होण्याचे काहीच कारण नसावे, समाजाला त्याने काहीच फरक पडू नये, असे मानावयास जागा आहे.
मुळात असा विनोद हा 'कुत्सित' ठरण्याचेही काही कारण नसावे. किंबहुना, हा विनोददेखील न ठरता, एक तर एका टोकाला एक 'स्टेटमेंट ऑफ पर्सीव्ड फ्याक्ट' नाही तर दुसर्या टोकाला 'थापा मारण्याच्या स्पर्धेतील विजेती एंट्री' (किंवा अध्येमध्ये काहीतरी) यांपैकी काहीतरी ठरावा. पण त्यापलीकडे काहीच होण्याचे काही कारण नसावे.
कदाचित आपल्या गृहीतकाप्रमाणे 'सामाजिक दृष्टिकोनातून पितृत्व' आणि जैविक पितृत्व यांच्यात 'सामाजिक दृष्टिकोनातून' काहीही संबंध नसावा का, आणि त्यातही अन्योन्य-अनलेस-स्पेसिफिकली-रॅटिफाइड-अदरवाइज़ संबंध तर नसावाच नसावा का, तसेच समाजाला 'सामाजिक दृष्टिकोना'तून जैविक पितृत्वाशी काहीच घेणेदेणे नसावे का, यावर विचार करीत आहे.
'आमचे पूर्वज महान होते' हे
'आमचे पूर्वज महान होते' हे सांगण्याची ही एक पद्धत असेल का?
मन/बुद्धी कल्पना करू शकते त्यापलिकडचे काही घडले आहे - असेही त्यातून कदाचित सांगायचे असेल.
त्या काळी 'कथा' सांगितल्या जात त्यामुळे पुढच्या प्रत्येक सांगणाराने आपली भर मूळ कथेत टाकली असेल अशीही शक्यता आहे.
***
अब्द शब्द
नव्या बाजुने चर्चा
नव्या बाजुने चर्चा नेहमीप्रमाणेच भरकटवली आहे. असो, सवयच ती!
http://shilpasview.blogspot.com
३३ कोटी देव
वाचनात आल्याप्रमाणे कोटि म्हणजे करोड नसून 'प्रत' (प्रतवारी) आहे आणि ३३ कोटींचे देव> असे आहेत :
वसु ८, रुद्र ११, आदित्य १२, इंद्र १ आणि प्रजापति १ = ३३