आमचं खूप बरं आहे !
रामायण अन महाभारत हे दोन ग्रंथ म्हणजे भारतीय संस्कृतीच्या जीवनरेखा समजल्या जातात. प्राचीन काळापासून हिंदू धर्मातील स्त्रियांसमोर सीता अन द्रौपदी यांचे विशेष आदर्श आहेत.
मनुष्य जीवनाचे आदर्श, काळे अन पांढरे अशी व्यक्तिमत्वे अन नियती-अधीनता यांचे सुक्ष्म बारकाव्यांसह चित्रण महर्षी वाल्मीकींनी रामायणात केले तर यच्चयावत भारतीय साहित्याचे आद्य प्रणेते महर्षी व्यास यांनी महाभारत लिहून सर्व मनुष्यजातीची कुंडली मांडून ठेवली. रामायण अन महाभारतात मनुष्य स्वभावाची सर्व वैशिष्ट्ये अन नमुने तपशीलासह पाहायला मिळतात. सुष्ट, दुष्ट, धर्मी, अधर्मी, नम्र, उद्धट , सालस, पाताळयंत्री, सुशील, उन्मत्त, उदार, हीन, सोज्ज्वळ , कुटील, सात्विक, भित्रा , ढोंगी या आणि इतर अनेक गुण-अवगुणांच्या निरलस आणि मिश्रित छटा अन त्यांची सरमिसळ होऊन बनलेली व्यामिश्र व्यक्तिमत्वे महाभारताखेरीज इतर कोणत्याही ग्रंथात पाहायला मिळत नाहीत. ‘व्यासोच्छिष्टम जगत्सर्वम्’ असे उगाच नाही म्हटले जात.
पण खरं सांगायचं तर मला तरी या दोन कहाण्या म्हणजे दोन राजकुलोत्पन्न , सर्वगुणसंपन्न, अलौकिक सौदर्यशाली, मानिनी पतिव्रतांच्या शोकांतिका आहेत असेच वाटते. त्यांच्या अपमानाने सुरु झालले सूडाचे प्रवास, ज्यांची परिणीती महायुद्धात झाली. पण युद्धामध्ये या पतिव्रतांच्या पतींचा जय होऊनही त्याची अखेर दु:खदच झाली.
अत्यंत वैभवात, लाडाकोडात, कुलीन संस्कारात वाढलेली सीता. विवाहानंतर तितक्याच उच्च राजकुळात नांदत असलेली. उद्या पतीचा यौवराज्याभिषेक होणार या शुभसंदेशाच्या अपेक्षेत असताना विपरीतच घडले. एक राजकन्या, राजस्नुषा अन भावी महाराज्ञी असूनही पतीसह अन बंधुसमान दिरासह नेसत्या वस्त्रानिशी तिला वनवास भोगावा लागला. जिचे नखही कधी परपुरुषाच्या दृष्टीस पडले नाही त्या सीतेवर रावणाची केवळ नजरच पडली नाही तर त्याच्या हातून दयनीय अवस्थेत तिचे अपहरण केले गेले. समर्थ पती, पिता, दीर अन सासरा असताना रावणाच्या कैदेत विरागिनीचे आयुष्य काही काळ का होईना, कंठावे लागले.
यानंतर केवळ तिच्याच सन्मानासाठी हजारो नर-वानर अन राक्षस यांच्यामध्ये झालेल्या युद्धामधील रावण—वधानंतर सुद्धा तिच्या नशिबी अग्निदिव्यच आले. अत्यल्प काळाचे राज्ञी पद अन दीर्घ काळ अवहेलना अन वनवासच आला. सर्व प्रकारची दिव्ये यशस्वीपणे पार पाडूनही सौभाग्यवतीचे भाग्य अन मानसन्मान तिच्या पदरी मात्र अखेरपर्यंत पडलेच नाहीत .
तसेच महाभारतातील द्रौपदी. तीही राजकन्या, राजस्नुषा, भावी महाराज्ञी. पण विवाहानंतर लगेच अन त्यानंतरसुद्धा तिच्या जीवनातला वनवास चुकला नाही. हस्तिनापुरात अन इंद्रप्रस्थातल्या वैभवशाली वास्तव्यातही तिचे जीवन कलह, हेवेदावे, अशांतता यांनी ग्रासलेलेच होते. त्यानंतरच्या वनवासात कसोटी पाहणारे प्रसंग अनेक अन सुखाचे थोडे. देवासमान पाच पती, सर्व वैभव, घरदार, संपन्न परिवार आणि श्रीकृष्णासारखा समर्थ पाठीराखा असूनही विपन्न भटक्यांचे जिणे भाळी लिहिलेले. अन तेही अपमानाच्या आगीत जळत असलेले.
अन मग समोर आले महाभारतीय युद्ध, ज्याच्यामध्ये तिचे पुत्र, सुना अन केवळ पतींशिवाय साराच परिवार अत्यंत दुर्दैवी रित्या बळी पडला. ज्या धर्माच्या रक्षणासाठी ते युद्ध झाले त्या धर्माचीही लक्तरे करणारे प्रसंग या युद्धात घडले अन प्रिय पुत्रांसहित संपूर्ण कुलविनाश डोळ्यादेखत घडलेला द्रौपदीला पहावा लागला.
इतक्या नाट्यपूर्ण घटना सामान्य स्त्रियांच्या जीवनात क्वचितच घडत असतील.
अन हे सर्व घडल्यानंतर जे राज्य सौख्य लाभले त्याला खरोखर सौख्य म्हणावे का ?
सीता , द्रौपदी दोघींनीही जीवनभर धर्माचरण अन पातिव्रत्य यांची कास सोडली नाही. तरीही त्यांच्या भाग्यात हे दुर्दैवी भोग का बरे यावे ? प्राक्तन म्हणावे तर या दोघीही अयोनिजा, असामान्य, साक्षात देवता. ज्यांचे स्मरण प्रत्येक हिंदू नित्य करत असतो अशा महान पतिव्रता. त्यांच्या खडतर जीवन मार्गाच्या चित्रीकरणातून या दोन महर्षींना कोणता आदर्श दाखवायचा आहे ? जर ‘स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम’ असे असेल तर ‘स्त्रियस्य भाग्यम’ कशात आहे ? पुरुषांच्या सुखात ? की स्त्रिया नेहमीच अभागी हेच गृहीत धरायचे ?
बाकी या सगळ्याचा विचार केल्यावर एक गोष्ट मात्र वाटते . या अलौकिक स्त्रियांच्या वाट्याला जर इतके दु:ख, अपमान, अवहेलना येत असेल तर त्या मानाने आम्ही सामान्य स्त्रिया सुखीच नव्हे तर भाग्यशाली असे समजायला मुळीच हरकत नाही !
हो, आमचं तरी बाई खूप बरं आहे !
काय, बरोबर आहे ना माझे म्हणणे ?
प्रतिक्रिया
निश्चितच.
निश्चितच आजच्या स्त्रियांची स्थिती सीता आणि द्रौपदीपेक्षा अनेक पटींने वरचढ आहे. काही प्रश्न आहेतः
१. अयोनिज व्यक्तीचे कुळ ते नक्की कोणते? (कोणाच्या कुलविनाश हा अयोनिय स्त्रियांचा कुलविनाश समजावा?)
२. या स्त्रिया जर पुरूष, विशेषतः नवर्यांवर अवलंबून नसत्या आणि/किंवा स्वत:ची कर्तबगारी दाखवणार्या असत्या तर त्यांची कहाणी अशी करूण झाली असती का?
अ. सीता शारीरिक बळात अर्थात रावणापेक्षा डावी ठरणार त्यामुळे तिथे काही विशेष पर्याय नव्हता. तिला रावणात काही रस नव्हता, तिने त्याला नाकारणंही १००% मान्य. पण पुढे रामाने तिचा त्याग केल्यानंतर "तुझी मुलं नाहीत, ती फक्त माझीच मुलं आहेत" किंवा "नाही ना माझ्यावर विश्वास, मग जा पळ आता" असं ठणकावून त्याला सांगितलं असतं तर?
आ. द्रौपदीच्याही बाबतीत, पाचही पांडवांशी लग्न करण्याची तिची इच्छा नव्हती* तर तेव्हा ठणकावून सांगितलं असतं तर? किंवा दुर्योधनाला "आंधळ्याचा मुलगा आंधळा"* असं म्हणाली नसती तर? किंवा कर्णाला धुडकावून लावताना त्याची जात काढली नसती* तर? द्रौपदीवर आजच्या काळात अट्रोसिटी आक्टान्वये गुन्हा नाही लागणार?
रामायण आणि महाभारत या गोष्टी (कथा या अर्थाने) जुन्या आहेत, तेव्हाची सामाजिक मूल्य वेगळी होती हे सगळं मला माहित आहे आणि मान्यही आहे. म्हणूनच जरतरच्या गोष्टी करण्याऐवजी त्या काळच्या मूल्यांची आणि स्त्रियांच्या सामाजिक स्थानाची तुलना करते आहे. आज ती गतकालीन मूल्य, पती हाच परमेश्वर असतो, कर्तबगार पुरूषाशी लग्न करण्यातच स्त्रीजन्माची धन्यता आहे, वंशश्रेष्ठता, जात-पात इ.इ. मानली जात नाहीत याचा आजच्या समाजाला आनंद का असू नये? ज्या मूल्यांची सीता आणि द्रौपदीने कास धरली ती म्हणजे धर्माचरण अन पातिव्रत्य तीच आजच्या काळाचा विचार करता पूर्णतया हुकलेली नाही वाटत?
उलटंही बघायचं झालं तर सौदीत आजही स्त्रियांचं नख परपुरूषाच्या नजरेस पडू नये याची काळजी घेतात. हे असलं जगणं कोंडवाड्यापेक्षा निराळं आहे असं वाटतं का? मग सीतेचं नखही परपुरूषाला दिसलं नाही ही आजही अभिमानाने सांगण्याची गोष्ट वाटते का?
सीता आणि द्रौपदी या स्त्रिया अलौकिक होत्या यावर माझा अजिबात विश्वास नाही. स्वतःचं राज्य वाचवण्याच्या हेतूने रणांगणात उतरणारी, कर्तबगारी दाखवणारी झाशीची राणी खरोखर महान आहे; तिच्या आधी काही दशकं इंग्रजांशी लढणारी कित्तूरची चन्नम्मा महान आहे. संशोधनासाठी अपार कष्ट घेणार्या कमला सोहोनी महान आहेत. सीता आणि द्रौपदीला पुरूषप्रधान संस्कृती बायकांच्या गळी उतरवण्यासाठी काव्य लिहून महान बनवलं.
* मूळ महाभारत किंवा रामायणात काय लिहीलेलं आहे हे महत्त्वाचं नसून लोकं काय मानतात हे इथे अधिक महत्त्वाचं आहे. लोकांची समजूत द्रौपदीला अर्जुनातच रस होता अशी असेल तर ते ग्राह्य धरावं.
अवांतर: पंचकन्यांपैकी मंदोदरी हे नावसुद्धा अतिशय पुरूषप्रधान दृष्टीकोनातून आलेलं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पुनर्विचार व्हावा.
खालील विधानांचा पुन्हा एकदा विचार व्हावा.
<< सीता शारीरिक बळात अर्थात रावणापेक्षा डावी ठरणार >>
परशुराम, ज्याने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली असा पराक्रमी योद्धा स्वतःचे शिवधनुष्य राजा जनकाकडे सांभाळण्यास देतो. लहानगी सीता ते धनुष्य उचलून त्यासोबत खेळत असते. हे पाहून परशुराम असे सुचवितो की इतक्या ताकदवान मुलीसाठी तितकाच ताकदवान वर हवा. म्हणून शिवधनुष्यास प्रत्यंचा लावणाराच सीतेच्या गळ्यात माळ घालणार असा पण लावला जातो. या वेळी रावण धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतो पण अपयशी होऊन खाली पडतो व धनुष्य त्याच्या छाताडावर पडते जे बाजुला काढण्याकरिता इतर चारसहाजणांची मदत घ्यावी लागते.
हे वाचल्यावर सीता रावणाहून ताकदीने कमी असेल असे वाटत नाही.
<< लोकांची समजूत द्रौपदीला अर्जुनातच रस होता अशी असेल तर ते ग्राह्य धरावं >>
अशी कितीशा लोकांची समजूत आहे? बहूतेकांना हे माहीत आहे की, सीतेला कर्ण आणि कृष्ण यांच्यात अधिक रस होता.
<< कर्णाला धुडकावून लावताना त्याची जात काढली नसती* तर? द्रौपदीवर आजच्या काळात अट्रोसिटी आक्टान्वये गुन्हा नाही लागणार? >>
नाही. असा गुन्हा दाखल होऊ शकणार नाही. तिने कर्णाच्या जातीला कमी लेखले नसून फक्त आपण सूतपुत्रास वरणार नसल्याचे जाहीर केले र्होते. आपण अमूक एका जातीत विवाह करू इच्छित नाही असे सांगणे बेकायदेशीर ठरत नसावे. अन्यथा, रविवार लोकसत्तेत येणार्या विवाहविषयक बहुसंख्य जाहिरातदारांवर खटले भरावे लागतील - त्यात अगदीच स्पष्ट लिहीलेले असते - एससी/एसटी क्षमस्व.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
श्लोक
‘स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम’ असे असेल तर ‘स्त्रियस्य भाग्यम’ कशात आहे ?
मला वाटतं श्लोक पुरा वाचला नसावा तुम्ही. त्याचा अर्थ फारच वेगळा आहे. पुरा श्लोक असा आहे (खरेतर हाही पूर्ण नाही, पण अर्थापुरता पुरेसा आहे)
'स्त्रियश्चरितम् पुरुषस्य भाग्यम्, न देवो जानाति कुतो मनुष्यः' स्त्रीचे चरित्र नि पुरुषाचे भाग्य याबाबत ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. याचा अर्थ स्त्रीचे चरित्र नेहमीच संशयास्पद असते असा आहे. स्त्रीयांबद्दल अतिशय अनुदार दृष्टिकोनातून लिहिला गेलेला श्लोक आहे हा. माझ्या अंदाजाने तुम्ही स्त्री चरित्राबद्दल नेमके उलट भाष्य करणारा आहे असा तुमचा समज झाला आहे, म्हणून हा प्रपंच. नसल्यास क्षमस्व.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
श्री रराजी, पूर्ण श्लोक उदधृत
श्री रराजी, पूर्ण श्लोक उदधृत केल्याबद्दल आभार. तो वाचल्यानंतर चूक समजली. चू. भू. दे. घे.
स्नेहांकिता, सीता आणि द्रौपदी
स्नेहांकिता, सीता आणि द्रौपदी यांच्याबद्दल तर जाऊ दे -मी त्यात भर घालण्याजोगं काही नाही म्हणून जाऊ दे!
मला दुर्दैवाने आजही कितीतरी स्त्रिया (आणि पुरुषही) दिसतात की ज्यांच्या आयुष्याकडे पाहताना 'आमचं तरी बाई खूप बरं आहे' असं इतर अनेकींना - त्यात मीही आले - (अनेकांना) वाटल्याविना रहात नाही. पण किती जणी (आणि किती जण) हे म्हणू शकतील ठामपणे स्वतःच्या जगण्याबद्दल?
सुख कशाला म्हणायचं, भाग्य कशाला म्हणायचं याचा विचार बहुतेक वेळा आपण दुस-याच्या तुलनेत करतो (त्याच्यापेक्षा/तिच्यापेक्षा सुखी किंवा भाग्यवान इत्यादी) ... त्यामुळे कुणाला कशात सुख आणि भाग्य मानावं लागत - किंवा वाटत- हे अनेकदा परिस्थितीनुसार आणि संदर्भानुसार ठरत. त्यामुळे हा ज्या त्या व्यक्तीचा निर्णय असतो कशाला आणि कुणाला संदर्भ मानायचा ते.
***
अब्द शब्द
"सुख कशाला म्हणायचं, भाग्य
"सुख कशाला म्हणायचं, भाग्य कशाला म्हणायचं याचा विचार बहुतेक वेळा आपण दुस-याच्या तुलनेत करतो (त्याच्यापेक्षा/तिच्यापेक्षा सुखी किंवा भाग्यवान इत्यादी) ... त्यामुळे कुणाला कशात सुख आणि भाग्य मानावं लागत - किंवा वाटत- हे अनेकदा परिस्थितीनुसार आणि संदर्भानुसार ठरत. त्यामुळे हा ज्या त्या व्यक्तीचा निर्णय असतो कशाला आणि कुणाला संदर्भ मानायचा ते."
अगदी असंच मनात आलं.
"प्राचीन काळापासून हिंदू
"प्राचीन काळापासून हिंदू धर्मातील स्त्रियांसमोर सीता अन द्रौपदी यांचे विशेष आदर्श आहेत."
हे आदर्श का आहेत हा प्रश्न पडला. (निदान मी तरी यांना आदर्श म्हणून गणल्याचं आठवत नाही.)
अदितीच्या प्रतिक्रीयेतला तिसरा मुद्दा अगदी पूर्णपणे पटला.
या दोन स्त्रीयांशी तुलना करून "आपलं खूप बरं आहे" हे का म्हणावं?
"प्राचीन काळापासून हिंदू
"प्राचीन काळापासून हिंदू धर्मातील स्त्रियांसमोर सीता अन द्रौपदी यांचे विशेष आदर्श आहेत."
हे आदर्श का आहेत हा प्रश्न पडला. (निदान मी तरी यांना आदर्श म्हणून गणल्याचं आठवत नाही.)
अदितीच्या प्रतिक्रीयेतला तिसरा मुद्दा अगदी पूर्णपणे पटला.
या दोन स्त्रीयांशी तुलना करून "आपलं खूप बरं आहे" हे का म्हणावं?
सीता आणि द्रौपदी आदर्श
अदिती आणि ऋता,
सीता आणि द्रौपदी आदर्श हे माझे वैयक्तिक मत नसून त्यांना भारतीय समाजाने आदर्श म्हणून, स्वीकारले आहेत. पूर्वीच्या काळातील मुल्यानुसार त्यात चुकीचे काही वाटत नाही.
सीता आणि द्रौपदी या अलौकिक समजल्या गेल्या कारण पुन्हा त्या काळातील मूल्ये. त्यांच्यावर आलेल्या असामान्य संकटांमध्येही त्या ज्या धैर्याने, संयमाने अन विवेकाने आणि त्या काळातील स्त्रीधर्माला अनुसरून वागल्या तशी त्या काळातली एखादी सर्वसामान्य स्त्री वागली असती असे वाटत नाही. उदा. हनुमानाने सीतेला लंकेतून सुरक्षितपणे श्रीरामाकडे नेण्याची तयारी दाखवूनही सीतेने नकार देणे. वस्त्रहरणासारखा प्रसंग सामान्य स्त्रीवर आला असता तर तिने कदाचित आत्महत्याच केली असती. पण द्रौपदीने संयमाने दीर्घकाळ आपल्या पतींचा स्वाभिमान सतत धगधगता ठेवून धर्ममार्गाने बदला घेतला. अशा अनेक प्रसंगांमध्ये या दोघींचे असामान्य गुण दिसतात.
आजच्या समाजात शिक्षण अन अर्थार्जनाची संधी मिळालेल्या स्त्रियांना असे धैर्य सहजसाध्य झाले आहे . पण पुराणकाळात इतका विवेक अन धैर्य बाळगणे हे स्त्रियांमध्ये नक्कीच दुर्मिळ असावे.
सविता,
सुखाची सापेक्षता तर सर्वमान्यच आहे. सुखी व्हायचे असेल तर चारचाकीतून फिरणाऱ्याला कधी कधी दुचाकी वाल्याकडे पहावं लागतं, अन दुचाकीवाल्याला पायी फिरणाऱ्याकडे.
त्या काळात डोकावल्यानंतर आजच्या भारतीय स्त्रीकडे काय नाही यापेक्षा आर्थिक, सामाजिक व निर्णयाचे स्वातंत्र्य, अल्प का होईना, सुरक्षितता आहे हे सुखाचे वाटू नये का ?
स्नेहांकिता, आणखीही काही
स्नेहांकिता, आणखीही काही प्रश्न पडले. त्या काळात सामान्य, राजघराण्याबाहेरच्या स्त्रियांचं आयुष्य कसं असेल?
द्रौपदीला द्युतात दासी म्हणून जिंकलेलं असताना तिचं वस्त्रहरण करण्यात दुर्योधनाला काही गैर वाटत नाही. त्यानुसार ती दासी आहे का नाही हा प्रश्न थोडा टेक्निकल आहे. पण दासी आहे असं मानलं तर तिला वाट्टेल तसं वागवण्यात कोणाला (विदुर, भीष्म, द्रोण, कृपाचार्य इ.) काही अडचण दिसत नाही. याचा अर्थ ती राजघराण्यातली आहे म्हणूनच तिला काय तो थोडा आदर-सन्मान मिळतो आहे. कोणी असती एखादी अनाथ स्त्री, तर तिच्या अब्रू, आत्मसन्माबद्दल कोणाला काही पडलेली होती का?
सैरंध्री या दासीवर कीचक सहज डोळा ठेवू शकत होता. कीचक थोडा रासवट होता, राजाही त्याला घाबरायचा याचा विचार केला तरी दासीला नकाराधिकार होता का? मग सामान्य स्त्रियांच्या नशीबात हे भोग होतेच की! द्रौपदी काही काळ दासी बनली होती म्हणून निदान तिला बाकीच्या स्त्रियांचं आयुष्य काय असतं याची कल्पनातरी आली असेल. तर वनवास संपल्यानंतर तिने सामान्यच विचार केला. "माझा अपमान झाला, माझ्या नवर्यांनी, मुलांनी (स्वतः नाहीच*) याचा बदला घ्यावा". तेव्हा तिथे तिला असामान्य गोष्ट सुचली का, की मी या दासींचं, इतर सामान्य स्त्रियांना आयुष्य आत्मसन्माने जगता येईल असं काही करेन? नाही. कारण ही काव्य आहेत ती पुरूषप्रधान संस्कृतीचा उदोउदो करण्यासाठी. त्यात वर्णन केलेल्या स्त्रिया नक्की कोणते आदर्श दाखवणार?
तेव्हाच्या काळानुसार तेव्हा हे सुसंगतच होतं. पण आज आहे का? नाही. मग आज का त्यांना आदर्श म्हणायचं? सामान्य स्त्रियाही या दोघींपेक्षा कितीतरी अधिक आत्मसन्मानाने जगतात. त्यांना उगाच चुकीचे आदर्श का दाखवायचे?
* हे ही पुरूषप्रधान संस्कृतीला साजेसेच. स्त्री ही पुरूषाची हक्काची वस्तू. तिचा अपमान हा तिच्या नवर्याचाच अपमान. मग तिच्या अपमानाचा बदला नवरा/नवरे, मुलांनी घ्यावा.
चेतन सुभाष गुगळे: द्रौपदीचा डोळा कृष्णावर होता हा सिद्धांत मी अपवादाने का होईना, पण ऐकलेला आहे. (लाईन मारायला) मानलेला भाऊ नामक प्रकार आपल्या संस्कृतीत तेव्हापासूनच आहे का काय? तिचा डोळा कर्णावर होता तर तिने त्याची जात काढून त्याला का नकार दिला? एवीतेवी तेव्हा अर्जुन मेल्याचीच बातमी होती, कर्णाला तो पण जिंकताही आला असता, तिची सोयच नसती का लागली?
लहान सीतेला ज्या धनुष्याशी खेळता येतं ते धनुष्य रावणाला उचलताही येत नसेल पण सीतेला उचलता येत असेल तर सीता स्वतःपेक्षा अधिक वजन उचलू शकते असा अर्थ त्यातून निघतो. स्वतःच्या वजनापेक्षा अधिक वजन उचलून त्याच्याशी खेळणारे किती मनुष्य आहेत? वेटलिफ्टर वगैरे लोकंही वजनं उचलून त्यांच्याशी खेळू शकत नाहीत. सबब सीता मनुष्य नसावी, नसल्यास तिचा आदर्श मनुष्यांनी का मानावा? अन्यथा हे वर्णन अतिरंजित आहे, त्याकडे दुर्लक्ष करावे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सत्य / असत्य कोणी ठरवावे?
<< तिचा डोळा कर्णावर होता तर तिने त्याची जात काढून त्याला का नकार दिला? >>
अर्थातच कृष्णाच्या दबावामुळे. कृष्णाचा हा सल्ला ऐकल्याचा तिला पुढे काही प्रसंगी नक्कीच पश्चात्ताप झाल्याचे वर्णन महाभारतात आहे.
<< स्वतःच्या वजनापेक्षा अधिक वजन उचलून त्याच्याशी खेळणारे किती मनुष्य आहेत? वेटलिफ्टर वगैरे लोकंही वजनं उचलून त्यांच्याशी खेळू शकत नाहीत. सबब सीता मनुष्य नसावी, नसल्यास तिचा आदर्श मनुष्यांनी का मानावा? अन्यथा हे वर्णन अतिरंजित आहे, त्याकडे दुर्लक्ष करावे. >>
सीता अग्नीपरीक्षा पास झाली किंवा जमिन दुभंगून त्यात गेली हे तरी मग खरे का मानावे?
सोयीच्या बाबी खर्या व गैरसोयीच्या बाबी काल्पनिक असे मानणे उचित ठरेल काय? संपूर्ण रामायण / महाभारत हेच काल्पनिक आहे असे का मानु नये?
सीता अशोक वनात राहिली तेव्हा तिने आजुबाजुला काही रोपटी लावली. त्यांस पाणी दिले. रामाने युद्ध जिंकल्यावर त्यास अयोध्येस परतण्याची घाई होती कारण ठरलेल्या मुदतीत राम अयोध्येस पोचला नाही तर प्राणत्याग करण्याचा मनोदय भरताने बोलुन दाखविला होता. याच घाईमुळे रामाने रावणाचे पुष्पक विमान वापरून अयोध्येस प्रस्थान करायचे ठरविले होते. तेव्हा आता माझ्या पश्चात मी लावलेल्या झाडांचे काय होणार? ती मरून जातील अशी काळजी सीतेस वाटली. लगेच रामाने जमिनीत एक बाण मारून पाण्याचा अखंड स्त्रोत निर्माण केला.
झाडांबाबत चिंतीत असणार्या इतक्या कोमल मनाच्या स्त्रीस चोळीच्या मोहाकरिता हरिणाची शिकार करण्याचा विचार का बरे पडावा?
खरे तर सीतेला वनवासात जाण्याचा आदेश नव्हताच मूळी. रामाला एकट्यालाच तशी आज्ञा होती. लक्ष्मण पाठीराखा म्हणून निघाला, परंतू त्याच्या पत्नीस - उर्मिलेस त्याने अयोध्येतच थांबण्याची सूचना केली जी तिने पाळली. रामानेही तशीच सूचना सीतेस केली. परंतु, रामाच्या पाठीमागे भरत व शत्रुघ्न वाकड्या नजरेने आपल्याकडे पाहतील असे सांगुन सीतेने रामासोबत येण्याचा हट्ट धरला. तरीही राम तिला नेण्यास तयार नव्हताच. तेव्हा रामाला आपल्याशिवाय एकट्याला इतकी वर्षे एकट्याने कशी व्यतीत करता येतील? तो नक्की पुरुषच आहे ना? अशी खोचक विचारणा (तीही अतिशय शेलक्या शब्दात) सीतेने केली. तेव्हा नाईलाजाने रामाने सीतेलाही वनवासात आणले.
पुढे हरिणाकरिता रामाला पिटाळले. मायावी मारिचाने काढलेला "लक्ष्मणा धाव" हा आवाज ऐकून लक्ष्मणासही बाहेर हाकलले. तो बिचारा रामाची आज्ञा मोडून कुठेही जायला तयार नव्हता तर त्यास "तू राम मरण्याची वाट पाहतो आहेस. तु़झा माझ्यावर डोळा आहे." अशा शब्दांनी व्यतीत करून जाण्यास भाग पाडले.
ज्या लक्ष्मणाने सीतेच्या पायातले दागिने लगेच ओळखले परंतु शरीराच्या वरील भागातील दागिने त्याने कधी पाहिलेही नव्हते अशा लक्ष्मणाला तिने दुषणे का द्यावीत?
बरे लक्ष्मणाने आखून दिलेली रेषाही ओलांडली आणि आपल्यापेक्षा शारिरीक बळाने कमकुवत असलेल्या रावणाने आपणांस पळविले असा देखावा सीतेने निर्माण केला. अर्थातच, या सीतेला पुढे कोणतेही सुख मिळू नये असे रामायणात घडणे हा काव्यगत न्यायच नव्हे का?
अजून एक आख्यायिका म्हणजे, रामायणात काय घडणार हे आधीच एका पोपट द्वयीस ठाऊक होते. ते आपसांत त्याविषयी बोलत असताना पक्षांची भाषा ठाऊक असणार्या लहानग्या सीतेने तो संवाद ऐकला. सीता ऐकते आहे ह्याची जाणीव होताच पोपट बोलायचा थांबला. तेव्हा चिडलेल्या सीतेने पोपटद्वयीवर हल्ला केला. मादी चटकन मेली. परंतु नराने अतिशय तळमळत प्राणत्याग केला. मरता मरता आपण पुनर्जन्म घेऊन या गोष्टीचा बदला घेऊ असे नर पोपटाने सांगितले. तोच पुढे रजक (धोबी) बनला व सीतेच्या द्वितीय वनवासास कारणीभूत ठरला. या द्वितीय वनवासाची परिणती पुढे सीतेच्या जमिनीत गडप होण्यात
झाली.
अर्थातच, ह्या भाकडकथांवर माझा विश्वास नाहीच. परंतू एक काल्पनिक कादंबरी म्हणून या सर्व लेखनाकडे पाहिले तरी सीता कुठल्याही दृष्टीने आदर्श पात्र वाटत नाही. निरुपद्रवी शंबुकाचा विनाकारण वध करणारा जातीयवादी रामही आदर्श वाटत नाही आणि निरपराध श्रावणाची हत्या करणारा चंगळवादी दशरथ तर त्याहूनही नाहीच. लक्ष्मण,बिभीषण व कुंभकर्ण हे भाऊ म्हणून आदरणीय वाटतात. भरत हा तर एक भाऊ म्हणून व आद्य विश्वस्त म्हणूनही सर्वार्थाने आदर्शच ठरावा. रामायणातला पाहुणा कलाकार श्रावण हा आदर्श पुत्र आहेच. त्याच्या जीवनाविषयी विचार केला तरी डोळे पाणावतात.
महाभारताचा विचार करता भरत, भीष्म, विदूर, विकर्ण व बलराम यांचेबद्दल आदर तर गांधारी, घटोत्कच, कर्ण व अश्वत्थामा यांच्याविषयी सहानुभूती वाटून जाते.
असे काही सन्माननीय अपवाद वगळता या महाकाव्यांमधील पात्रे तिरस्करणीयच वाटत राहतात.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
अदिती, पुराणकाळात सामान्य
अदिती,
पुराणकाळात सामान्य स्त्रियांचे आयुष्य कसे होते याचा काही उल्लेख पुराणांमध्ये वाचलेला आठवत नाही. पण इतिहासकालीन सामान्य स्त्रियांपेक्षा बरेचसे महत्वाचे स्थान त्यांना असावे असे, गार्गी, मैत्रेयी, अनुसया, देवयानी इ. उदाहरणावरून वाटते. संपूर्ण स्वातंत्र्य नसले तरी कमीतकमी स्त्रियांची मते विचारात घेतली जात असावीत.
दासी म्हणून राहताना द्रौपदीने राणी सुदेष्णा हिला ज्याअर्थी अट घातली की ‘मी परपुरुषाची सेवा करणार नाही’, त्याअर्थी दास्यत्वातही काही एक मर्यादित स्वातंत्र्य असावे. पण त्याला न जुमानणारे दुर्योधन व किचकासारखे नराधम त्याकाळीसुद्धा होतेच, असे दिसते. धर्म अन न्याय यांची दुर्योधनाने बेमालूम गल्लत केल्याने विदुर, भीष्म, द्रोण, कृपाचार्य यांच्यासारखे धर्मरक्षकहि चकले असावेत. पती हा स्त्रीचा स्वामी समजला जात असे. ते ५ पतीच जर दुर्योधनाच्या युक्तिवादापुढे गप्प बसले तर आपण मध्यस्थी करणे धर्मसंमत ठरेल का असाही विचार त्यांनी केला असावा.
द्रौपदीची व्यक्तिरेखा पाहता, वनवासानंतर दास्यत्वातील किंवा इतर सर्वसामान्य स्त्रियांसाठी काही करावे असे तिला वाटले असणे शक्य आहे. पण त्याचा उल्लेख महाभारतात नाही. एकूणच पांडवांच्या राज्याकालातील कार्यांचा काही उल्लेख आढळत नाही. पण रामराज्य आदर्श असून त्यामध्ये अन्याय अधर्म यांना थारा नव्हता, असे उल्लेख मात्र आढळतात.
सीता अन द्रौपदी यांना आदर्श म्हणणे अर्थातच आजच्या काळात कालबाह्य ठरेल. मला त्यांचा आदर्श घ्यावा असे म्हणायचे नसून, त्या काळाच्या मानाने आज आपण सामान्य स्त्रिया सुद्धा पुष्कळ चांगल्या परिस्थितीत जगतो आहोत, याचे समाधान मानले पाहिजे हे लेखामध्ये सांगावेसे वाटले.
सीतेचा आदर्श
>>मला त्यांचा आदर्श घ्यावा असे म्हणायचे नसून,
पण यांचं काय करायचं?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
निषेध.
>> पण यांचं काय करायचं? <<
निषेध.
त्याच विशिष्ट केसबाबत विचार करता, नवरा तिला घेऊन जहाजावर गेला नव्हता, जाऊ शकत नव्हता तर तिने याच्या मागेमागे फिरावं अशी अपेक्षा करणं तर्कदुष्ट नाही का?
स्नेहांकिता यांचा प्रतिसाद पटला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.