बाय
"नातीगोती" या दिवाळी अंकाच्या विषयावरुन आठवले. माझ्या सासूबाईंनी (त्यांना मी आई म्हणते) लिहीलेला त्यांच्या शब्दातील हा लेख. अन्यत्र पूर्वप्रकाशित आहे. आज आईंना दिवळीअंकासाठी काही लिहीण्याचे सुचवेन. जमेलच असे नाही, जमले तरी निवडले जाईलच असेही नाही. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. तशाही आम्ही गप्पा मारताना स्वतःच्या वडीलांबद्दल आई भरभरुन बोलतात. अर्थात पुढील वक्तव्य त्यांच्या आईवरचे आहे. -
आजकाल खूपदा वेडं मन मागे मागे जातं आणि व्याकूळ आठवण येते ती बालपणीचा रम्य काळ घलवलेल्या वसई तालुक्यातल्या विरार गावाची. हळूहळू धूसर असं एक चौसोपी घर दिसू लागतं, पुढे मागे अंगण असलेलं. घराला मागे पडवी तर रांगोळीसाठी पुढे मोठ्ठा ओटा.परसदारी आम्हा मुलांसाठी करकर आवाज करणारा, साखळ्या-साखळ्यांचा भला थोरला झोपाळा. लहानपणी तर हा झोपाळा फारच प्रशस्त भासे.
अंगणभर तगर, प्राजक्त, जाई-जुई, जास्वंद याव्यतिरीक्त आंबा, पेरू, चिक्कू,पपनस, जांभूळ, करवंद. मग काय मे महीन्यात आम्हा मुलांची मज्जाच मज्जा. अरे हो तुळशी वृंदावन सुद्धा.
कडेसरीलाच पाण्यानी भरलेली विहीर, घरगड्याच्या कुटुंबासाठी झोपडेआवजा घर व एका बाजूला जळणाची लाकड आणि शेणाच्या गोवर्या साठवणीकरता खोपटं.
माझी आई ८ भावंडातली ४ भाऊ आणि ४ बहीणी. सगळी भावंड तिला बाय म्हणत. तडजोड मानापमान गिळून मुकाट सोसणं अंगवळणी पडलेलं. काम करताना तोंडात देवीचं नाव. काटकसर पाचवीला पूजलेली कारण पदरी ६ पोरं. पण करणंसवरणं अतिशय निगुतीचं. तांदूळही वर्षाचा एकदम शेतावरून घरात येत असे आणि वेताच्या कणग्यात साठवला जाई. सगळे म्हणत - बायला इलुशं तूप द्या, काहीतरी चांगलच होईल त्याचं. बाय कामाला वाघीण, काटक. तीन्ही वेळचं रांधण्यात, साफसफाईत दिवसाचे २४ तास कमी पडत पण कधी त्रागा नाही की मुलांवर रागराग नाही. साधं बिरडं करायचं तर भले थोरले वाल निवडावे लागत. मग आम्ही मोठे झाल्यावर आम्हाला काम वाटून मिळू लागलं.
दिवाळी म्हणजे मोठा सण. कारण बायचे बहीण भाऊ म्हणजे आमचे मवशा मामा आणि मावस भावंड एकत्र जमत. फराळासाठी आजीचं मोठं भींतीतलं कपाट - करंजी, पापडी, लाडू,शेव, चिवडा, अनारसे, सर्व काही त्यात मोठ्या पितळी डब्यात भरलेलं.त्याला आजी कुलूप लावायची. तिच्या वेळापत्रकाप्रमाणे अम्हाला फराळ मिळायचा. पण आजी दुपारी झोपली की मावशी गुपचूप आम्हाला फराळ द्यायची.
आजीच्या पश्चात बाय असाच चवदार फराळ बनवत असे. बायला आजीने तयार केलं पण आजीला कोणी ते मात्र विचारायचं राहून गेलं ही चुट्पूट कायम राहील. बाय सुग्रणच होती. लुसलुशीत पुरण्पोळी, खमंग तेलपोळी, गणपतीत बनवलेले उकडीचे मोदक याशिवाय आमचे पारंपारीक पदार्थ म्हणाल तर - भानोळी, रवळी, गोतांबील्, सांदणे, अप्पे,आयरोळ्या, अळूवडी, गुळपापडी किती किती म्हणून सांगू? थोडक्यामधे नेटका संसार करणारी होती.
दिवाळीला बाय सर्वांना सुवासिक उटणं लावून, तेलानी मर्दन करून खसखसून आंघोळ घालायची. मग नवीन कपडे घालून देवळात जाऊन यायचा शिरस्ता होता.मग एकेकाला ओवाळलं जायचं. खूप मजा वाटायची पण धीरही सुटायचा, कधी एकदा फटाके वाजवतोय असं व्हायचं.
मी शेंडेफळ होते.बायची खूप लाडकी. तिचं आवडतं वाक्यं होतं - "शरयुला रस्त्यावरचं कोणीही हसत हसत उचलून घेऊन जाईल". माझ्या लग्नानंतर ती गेली.तिच्यापेक्षा आम्ही मुलं जास्त शिकलो. पण तिच्या हाताची चव नाही आली आम्हा बहीणींच्या हाताला. ती तिचीच खासियत. तिचे आशीर्वाद मला जन्मभर पुरले आणि पुरत आहेत.
प्रतिक्रिया
सासूबाईंच्या आई म्हणजे ललित
सासूबाईंच्या आई म्हणजे ललित मधील "बाय" या सासूबाईंच्या भावाकडे होत्या त्या दिवसात, त्या आजारी असताना, सासूबाई खीर्/शिरा असं काहीतरी किंवा अन्य मऊ पण पौष्टिक पदार्थ घेऊन त्यांच्या भावाकडे जात. मला माहीत आहे कारण मी त्यांची आईवरची माया पाहीली आहे. "बाय" जेव्हा गेल्या तेव्हाही सासूबाई दिसेल अशा रडल्या नाहीत पण खिन्नता, दु:ख लपले नाही
.
त्यांच्या आई-वडीलांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी खरच असावेत कारण ७५ मध्येसुद्धा त्या खुटखुटीत आहेत. सुंदर दिसतातच पण अतिशय अॅक्टिव्ह आहेत.
____
आईची सर कोणाला येत नाही असे म्हणतात पण त्यांनी ते खोटे ठराविले आहे. खूप प्रेम आहे माझे त्यांच्यावरती. अर्थात म्हणजे धुसफूस नाही असे नाही पण आमची कुंडली नक्की प्रचंड जुळते. मी वेळोवेळी त्यांचा उल्लेख करत असतेच की ऐसीवरती. खरं तर त्यांच्याबद्दल मलाच लिहायला पाहीजे .... पण नीट जमेलसे वाटत नाही. असो.
____
आज दुपारची गोष्ट आहे. १० वर्षाच्या माझ्या मुलीची मैत्रिण आमच्याकडे माझ्या मुलीशी खेळायला म्हणून आली होती. आई म्हणजे माझ्या सासूबाई नेहेमीप्रमाणे लोकरीचा स्वेटर वीणत बसल्या होत्या. या चिमुरडीचा आल्या आल्या चिवचिवाट सुरु झाला. तिनी आल्या आल्या स्वेटरचं कौतुक केलं, तो शिकून घेण्यात रस दाखवला.
आई फक्त शांतपणे म्हणाल्या "बघ, म्हणजे येईल." : ) आणि वीणू लागल्या.
मैत्रिणीचा उत्साह बघून आमच्या पिल्लाला कंठ फुटला नसेल तर नवल - "आज्जी खूप छान वीणते. तिनी ऑलरेडी अर्धा स्वेटर वीणला आहे. ती मला शिकवणार आहे"
मला ते सगळं ऐकून खूप लाज वाटली. महीना झाला मी घारात आहे सध्या पण कधी आईंच्या वीणकामात रस घेतला नाही की स्वेटर अर्धा झालाय का कुणासाठी चाललाय याची साधी विचारपूस केली नाही.
या मुली मात्र आज्जीबरोबर आज खूप खेळल्या, एकटक वीणकाम पहात राहील्या. आईही खुलल्यासारख्या वाटल्या : )
हा आमचा नेहेमीचा अनुभव - जिथे मी आई म्हणून मुलीला कडक वळण लावायला जाते तिथे आज्जी तेच वळण हलक्या हातानी , सफाईनी लावून टाकते.
परवाची गोष्ट मुलीला एक गणित अवघड गेलं. अगदी रडवेली झाली ती. मी समजूत काढायला गेले तर ती अधिकच बिथरली. आईंनी मला हातानीच खुणावलं आणि गप्प बसवलं. मुलीला थोडी स्पेस दिली, रडू दिलं एकटं. थोड्याच वेळात श्रावणातल्या ऊन्-पावसासाराखा तिचा मूड हा हा म्हाणता बदलला. ती पूर्ववत हसू खेळू लागली. मी मनोमन आईंचे आभार मानले.
ज्येष्ठ व्यक्तींचं घरातील असणंच विशाल वृक्षासारखं भारदस्त, शीतलता देणारं, आश्वासक असतं. सर्वांना शक्य असतच असं नाही पण घरात एक टीनेजर असतेवेळी जर काही ज्येष्ठ व्यक्ती असतील तर माझ्या तरी मते जीवन बरच सुकर होतं.
सासूबाईंनी लिहीलेली कविता.
सासूबाईंनी लिहीलेली कविता. ऐसीवर प्रकाशित केलेली तिचा दुवा देत आहे.
http://aisiakshare.com/node/59
No! I cannot believe I have
http://aisiakshare.com/node/2363
अरे वा तुमच्याकडे वडाची सावली
अरे वा तुमच्याकडे वडाची सावली आहे.
विरारमध्ये आमचं येणंजाणं होतं.अजूनही काही घरं आहेत वर्णन केलेल्यासारखी.तिथल्या घरबांधणीवर गुजराथी वाड्यांची छाप आहे ,कोकणातल्या घरांची नाही.
विशेषतः झोपाळा
आईंचं आजोळ मी नाही पाहीलं अचरट जी. पण हे वाचून खरच पहावसं वाटलं होतं.
छान!
छान!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मस्त!!!!
मस्त!!!!
मस्त लिहीलंय..
मस्त लिहीलंय..
खूप छान लिहीलय. तुझ्या
खूप छान लिहीलय. तुझ्या सासूबाईंचा फोटो पाहिलाय. खरंतर तुम्ही दिसण्यातही माय-लेकी आहात असंच वाटतं बघून.
होय अंतरा, खरे आहे. अगदी १००%
होय अंतरा, खरे आहे. अगदी १००% खरे आहे.
+११११
लेख आवडलाच.
-सिद्धि
छान
लिहिलंय