महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश
इथे ही बातमी वाचण्यात आली.
बातमी नुसार २७ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सरकारी कोशाचे प्रकाशन होणार होते.
डॉ. अनुपमा उजगरे यांनी हा कोश संपादित केला आहे. यामध्ये विविध पाककृती देण्यात आल्या आहेत. बातमी उत्सुकता चाळवणारी आहे. परंतु मला काही प्रश्न विचारयचे आहेत ते असे :
१. आपल्यापैकी कुणाला हा कोश प्रकाशित झाला आहे का याविषयी माहिती आहे का?
२. झाला असेल तर तो कसा खरेदी करता येईल? महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या प्रकाशनांचे वितरण कोठे होते? पुण्यामध्ये असे एखादे स्थळ आहे का जिथे सरकारी पुस्तके मिळू शकतात?
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
पुण्यात 'अक्षरधारा'ला उपलब्ध
पुण्यात 'अक्षरधारा'ला उपलब्ध आहे. मी त्यांना विनंती केल्यावर त्यांनी काही प्रती आणल्या होत्या.
हा कोश मला आवडला नाही. खाद्यसंस्कृतीच्या विकासाबद्दल भाष्य नाही. अगदी मोजक्या पदार्थांचा इतिहास दिला आहे. संपूर्ण कोशात पदार्थ आणि त्यांच्या कृती आहेत, जे महत्त्वाचं आहे, पण या पदार्थांबद्दल कृतीशिवाय अधिक माहिती यायला हवी होती. कोशात सुरुवातीला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांतल्या खाद्यसंस्कृतीबद्दल लेख आहेत, त्यांचा दर्जा दरवर्षी मराठीत जे अन्नपूर्णा / स्वयंपाक विशेषांक निघत असतात, त्यांतल्या लेखांइतकाच आहे. कोश वाचून अनेक माहीत नसलेल्या पदार्थांची नावं कळली, हा एकमेव फायदा.
मलाही हीच शंका वाटत होती.
मलाही हीच शंका वाटत होती. अर्थात सरकारी कोश आणि युनिवर्सिट्यांतली पीय्चड्यावाली लोकं यांच्या मुळे कोशात काही विस्ताराने नसेल अशी अपेक्षा आहेच. शिवाय केवळ माहिती पोटी माहिती म्हणूनच मला हा कोश हवा होता. >> संपूर्ण कोशात पदार्थ आणि त्यांच्या कृती आहेत हे इतकं जरी असेल तरी पुरेसं आहे फक्त त्यात पुरेसं वैविध्य असावे इतकं मात्र वाटतं. अक्षरधाराला जाऊन लगेच पडताळता येईल. धन्यवाद.
या माहितीबद्दल मनःपूर्वक आभार
या माहितीबद्दल मनःपूर्वक आभार चिनूक्स!
नुसत्या पाककृती देण्यात एक संकलन या व्यतिरिक्त काय महत्त्वाचं आहे? ते ही एखाद्या ऑफलाईन (छापील) पुस्तकात? आधीच अशी ढिगभर पुस्तके उपलब्ध असताना! हे वाचून अगदीच विरस झाला.
एकेक पदार्थ कसा घडत गेला, काळानुरूप त्यात काय बदल झाले, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात, जातींत तोच पदार्थ कसा बनवतात - काय वेरिएशन्स आहेत - त्याच्या सोबत कुठे कुठे काय काय खाल्ले जाते, त्या पदार्थाचा इतिहास, त्याचे वेगवेगळ्या साहित्यांत आलेले उल्लेख वगैरे माहिती कोशात नाहीये का? नसेल तर हा कोश का घ्यावा?
पुस्तकात लोणची, कोशिंबिरी,
पुस्तकात लोणची, कोशिंबिरी, भाताचे प्रकार, चटणी, वडे, वड्या, धपाटे, दशमी, पंचामृत, वरण असे अनेक विभाग आहेत. प्रत्येक विभागाच्या सुरुवातीस साधारण दहाबारा ओळींत माहिती आहे आणि नंतर पाककृती. कुठेही त्या पदार्थाचा इतिहास किंवा साहितातले उल्लेख इत्यादी नाही. असल्यास एखाददुसर्या ओळीत माहिती संपवली आहे.
कोशाच्या शेवटी खाद्यसंस्कृतीशी प्रचलित रूढी, खाण्याशी संबंधित म्हणी आणि आडनावं, स्वयंपाकघरासाठी उपयुक्त युक्त्या आणि औषधोपचार आहेत.
आदिवासी, ज्यू, ब्राह्मण, मराठा, मुस्लिम, ख्रिस्ती खाद्यसंस्कृतीबद्दल एकेका पानाचे लेख आहेत. सुरुवातीचं निवेदनही अगदी बाळबोध आहे.
मी पुस्तक न उघडता विकत घेतलं. घरी आल्यावर चांगलाच भ्रमनिरास झाला.
डॉ. अनुपमा निरंजन
डॉ. अनुपमा निरंजन उजगरे.
साहाय्य - डॉ. सुनंदा विनोद पाटील आणि श्री. विष्णु मनोहर
कोशात संपादकांच्या खाद्यसंस्कृतीविषयक अभ्यासाचा उल्लेख नाही.
शेवटी संदर्भसूचि आहे. ती वाचून करमणूक झाली. ९९ पुस्तकांपैकी केवळ ३-४ पुस्तकं ऐतिहासिक आहेत. म्हणजे रुक्मिणीस्वयंवर, भोजनकुतूहल, पेशव्यांचं विलासी जीवन आणि क्षेमराजाच्या पुस्तकाचं भाषांतर. बाकीची सगळी १९६०-७०नंतर प्रकाशित झालेली पाककृतींची पुस्तकं आहेत.
प्रश्न
आभार. तुम्ही सांगितलं त्यानुसार सेलेब्रिटी शेफ विष्णु मनोहरांनीच पुस्तकाचा बराचसा भार उचललेला दिसतोय. सुनंदा विनोद पाटील यांनी आदिवासी खाद्यसंस्कृतीवर संशोधन केल्याचं इथे दिसलं. त्यामुळे कोशात त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं का? अनुपमा उजगरे यांनी 'खाद्यसंस्कृतिविषयक मराठी वाक्प्रचार व म्हणी' असं पुस्तक लिहिल्याचं बुकगंगावर दिसतं. अशा काही अंगांचा कोशात विचार आहे का?
पुस्तकात खाण्याशी संबंधित
पुस्तकात खाण्याशी संबंधित म्हणींचा स्वतंत्र विभाग आहे. तुम्ही उल्लेख केलेल्या पुस्तकाचा सूचित समावेश आहे.
सुनंदा पाटलांचा आदिवासी खाद्यसंस्कृतीवर लेख आहे. पण मला त्यात नवं काहीच सापडलं नाही. खाण्याशी संबंधित गाणी इत्यादी त्यात नाही. केवळ सण, घटकपदार्थ यांवर विवेचन आहे. असं लेखन वरचेवर मासिकांमधून प्रकाशित होत असतं.
आदिवासी संस्कृतीवर अजून दोन लेख आहेत. एकात थोड्या पाककृती आहेत, ज्या बहुतेक चतुरंग पुरवणीत पूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. तुकाराम धांडे यांचा तिसरा लेख पुस्तकात का आहे ते कळलं नाही.
कॉफी
खाद्यसंस्कृती कोशाविषयीची चर्चा वाचताना मला राहून राहून ए.आर. वेंकटचलापतींचा in those days there was no coffee हा लेख आठवत आहे. 'नीरगरम' पिण्याची परंपरा असलेल्या तमिळनाडूत सनातनी मताच्या ब्राह्मणांकडून कॉफीपानाला झालेला विरोध (हल्ली आमच्या बायकासुद्धा कॉफी प्यायल्या लागल्यात..शिव शिव) ते घरी दळलेली कॉफी आणि गाईचे दूध यांच्यापासून सुगृहिणीने बनवलेली कॉफी ही तमिळ ब्राह्मण कुटुंबांत पाहुणचाराचा अविभाज्य भाग होणं, कॉफी प्यायच्या पेल्यांना काठ असल्याने सोवळ्या ओवळ्याचे संकेत पाळून (पेल्याला तोंड न लावता) कॉफी पिता येण्याची सोय, कामगारवर्ग = चहा तर उच्चभ्रू = कॉफी असा प्रवास त्यात मांडला आहे.
मलासुद्धा
मलासुद्धा अनेक संदर्भ आठवू लागले आहेत. मला वाटते सावी (savvy) की कुठेतरी आलेला 'कंजी'वरचा लेख, शंकर सखाराम यांचा खापुर्ला आणि त्यावरचा दुर्गाबाईंचा प्रतिसाद, सतीश काळसेकर, शफाअत खान, अनंत सामंत अश्या अनेकांचे उत्कृष्ट लेख असलेली एक जुनी लेखमाला असे बरेच काही. यात नुसते खाद्यजीवन नव्हते तर संस्कृतीसुद्धा होती.
याच धर्तीवर
याच धर्तीवर काही वाचन-आठवणी : चहा कामोत्तेजक म्हणून म्हणे सुरुवातीला पुरुषमंडळी चहा पिऊ लागली. कोणी म्हणे की हे पिल्लू ब्रिटिशांनीच सोडले होते का की भारतीयांनी चहाला पाठ दाखवणे सोडून तोंड द्यावे आणि ब्रिटिश मळेवाल्यांचा तोपर्यंत उठाव नसलेला चहा खपावा. पंचहौद मिशन चहापान आणि ग्रामण्य, टोमॅटो हा रक्तासारखा लाल म्हणून सोवळ्याला न चालणे आणि नाकारला जाणे, गाय पुरती विण्याअगोदर म्हणजे वासरू झाले पण वार बाहेर आलेली नाही अश्या स्थितीत तिचा चीक काढणे, का की विणे पूर्ण झाले की तिला सुवेर(सोयर) लागते आणि नंतरचा चीक सोवळ्याला चालत नाही. पूर्वी सोंवळ्या झालेल्या बायकांचे कडक सोवळे असे. त्यांच्यासाठी म्हणून ह्या सोवळ्यातल्या चिकाचा खरवस, इतरांना दुसर्या-तिसर्या दिवसाचा चीक चालत असे. ह्या सोवळ्या बायका एकदाच जेवत. यातल्या कित्येकांना ओंवळ्या खापरातून म्हणजे चिनी मातीच्या कपातून दूध/कॉफी चालत नसे. धातूचेच भांडे लागे. काही अन्ने 'खरकटी' असत. तेल तूप, लोणी यांना बाधा नसे. पूर्वी तेले न तापवता कच्चीच जास्त खाल्ली जात, जसे पिठल्यात कच्चे तेल, भाकरीवर जवसाचे तेल वगैरे. वाढण्याचीही पद्धत प्रत्येक जातीत वेगळी. काहींकडे मीठ अगदी डावीकडे कारण की स्वयंपाक व्यवस्थितच असणार, मिठाची गरजच पडणार नाही म्हणून डावीकडे. मध्ये मीठ वाढणे म्हणजे ते सारखे सारखे जेवणात मिसळावे लागणार याची आणि घरातल्या अन्नपूर्णेचा स्वयंपाक अळणीच असणार याचीही खात्री. तिखट खाणार्या/आवडणार्या काही जातींत गोड वस्तू कमी खाल्ली जाते म्हणून डावीकडे.
आणि संस्कृतीची परिसीमा म्हणजे काहींना पाणी पिण्यासाठी ओंजळ हेच भांडे असणे...
दिलंत ना बूच!
तर, टु कंटिन्यू,
मायबोलिवर अन्नं वै प्राणा: ही चिनूक्स यांनी लिहिलेली याच विषयावरची मालिका अत्यंत अभ्यासू व विशेष वाचनीय आहे.
अजूनेक बूच
आमचे खाद्येतिहासाचे जवळपास ९०% ज्ञान या लेखमालेवर आधारलेले आहे. पुढे त्यात उल्लेखिलेले काही ग्रंथ डौनलोडवून पाहिले. अतिशय संदर्भसंपृक्त लेखमाला. उत्तम गाभा, अनेकस्तरीय सादरीकरण आणि खूप दिवसांच्या, हळूहळू मुरत गेलेल्या अभ्यासातून तयार झालेल्या आणि ज्ञानसुगंध सर्वत्र दरवळणार्या या लेखमालेस जर द्यायचीच असेल तर बिर्यानीची उपमा द्यावी असे स्पष्ट मत आहे.
ही लिंक
ही लिंक बघा.
https://msblc.maharashtra.gov.in/bookandkosh.html
इथे प्रकाशनांची सूची आहे. यात तो कोश दिसला नाही.
बाकी पुण्यात जी पी ओ अर्थात गवर्मेण पोस्ट ऑफिसच्या जवळ शासकीय मुद्रणालय आहे, तिथे हा कोश मिळू शकेल. पाहिले पाहिजे, मलाही हा कोश पाहिजे आहे.