अलीकडे काय पाहिलंत? -५
अलीकडे काय 'पाह्यलंत'? यातला चौथा भाग मागे पडल्याने हा नवीन भाग सुरु करत आहे.
तेंडुलकरांचे 'गिधाडे' पुन्हा रंगभूमीवर येणार हे वाचल्यापासून उत्सुकतेने त्या खेळाची वाट बघत होतो. अतिषा नाईकने दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा खेळ आज पाहिला. 'गिधाडे' बाबत श्रीराम लागूंनी म्हटले आहे की 'इतके सर्वार्थाने अंगावर येऊन छाताडावर थयाथया नाचणारे नाटक मी तोपर्यंत वाचले नव्हते. नाटक फार हिंस्त्र होते आणि फार जिवंत होते. अत्यंत निर्घृण हिंस्त्रपणे त्याने माझ्या टराटरा चिंध्या केल्या. अत्यंत निर्दयपणे माझे रक्त त्याने गटारात ओतून दिले आणि मग त्यातलेच एक टमरेलभर तोंडाला लावून घटाघटा गिळून टाकले आणि तृप्तीची घाणेरडी ढेकर दिली' तेंडुलकरांनी हे नाटक साठीच्या दशकात लिहिले आणि लागू व इतर मंडळींनी ते सत्तरीत रंगमंचावर आणले.त्यानंतर गेल्या चाळीस वर्षांत आपल्याला हिंसाचाराची इतकी सवय होऊनही हे नाटक आज तितकेच क्रूर आणि चिंध्या करुन टाकणारे , किंबहुना किंचित अधिकच ओळखीचे वाटले . यातले प्रमुख कारण म्हणजे अर्थातच तेंडुलकरांचे लिखाण. माणसाचे चेहरे घेतलेली गिधाडे आणि स्वार्थापुढे, लोभापुढे चिल्लर होऊन पायदळी तुडवली जाणारी मूल्ये हा 'गिधाडे' च विषय. बापाकडील पैसा मिळवण्यासाठी बापाचा शारीरिक छळ, बहिणीला मारहाण करुन तिचा केलेला गर्भपात (आणि त्यातला साडीवरील लाल रंगाच्या डागाचा तो वादग्रस्त सीन) हे सगळे आज कालबाह्य झालेले नाहीच (पैशासाठी आपल्या आजीच्या खुनाची सुपारी देणार्या नातवाची बातमी अगदी ताजी आहे.) उलट त्याला लैंगिक अत्याचाराचे एक नवीन परिमाण लाभले आहे. तेंडुलकरांच्या समकालीन दळवींनी 'पुरुष' मध्ये पुरुषी वर्चस्वाचे प्रतिक म्हणून बलात्कार हा विषय हाताळला होता, आज त्याला लैंगिक विकृतीची एक किळसवाणी मिती प्रप्त झाली आहे. तेंडुलकरांच्या द्रष्टेपणाला दाद देतानाच चाळीस- पन्नास वर्षांपूर्वी तेंडुलकरांनी अधोरेखित केलेले सामाजिक मुद्दे अधिकच गडद, अधिकच हिंस्त्र झाले आहेत ही भावनाही अस्वस्थ करुन जाते. तेंडुलकरांची ही गिधाडे अधिकच काळीकुट्ट, अधिक धारदार नखांची झाली आहेत, हे जाणवत राहाते. यांची चित्रे रेखाटायला आज तेंडुलकर आपल्यांत नाहीत हे जाणवूनही अस्वस्थ व्हायला होते.
'गिधाडे' ची भाषा आणि त्यातला हिंसाचार यामुळे सेन्सॉर बोर्डाने हे नाटक बरीच वर्षे अडकवले होते. आज त्या भाषेत आणि त्या हिंसाचारात फारसे खटकण्यासारखे काही वाटत नाही. 'गिधाडे' चा प्रयोग अतिषा नाईक आणि मंडळींनी सुरेख बसवला आहे. लागूंच्या 'गिधाडे' मध्ये गिधाडाच्या ढोलीसारखे केलेले नेपथ्य लोकांच्या अंगावर येत असे म्हणे. या 'गिधाडे' मध्ये संगीत आणि प्रकाशव्यवस्था यानी ती भूमिका पार पाडली आहे. टीव्हीवर प्रामुख्याने विनोदी भूमिका करणार्या अतिषा नाईकने रमेची संवेदनशील भूमिका झोकात केली. गौतम जोगळेकरांचा रमाकांतही झकास. अंगद म्हैसकर, सुहास शिरसाट, अमृता संत हेही ठीक. पपांची भूमिका करणार्या सुनिल गोडबोलेंचा बाकी मुद्दाम उल्लेख केला पाहिजे.
'लमाण' वाचल्यापासून 'गिधाडे' बघायला मिळावे, किमान त्याची संहिता वाचायला मिळावी अशी तीव्र इच्छा होती. सध्या इच्छापूर्तीचे दिवस आहेत असे दिसते. ('हमीदाबाईची कोठी' आणि 'सूर्याची पिल्ले' ची तिकिटे खिशात आहेत!) 'गिधाडे' कडूनच्या माझ्या अपेक्षा शंभर टक्के पूर्ण झाल्या. पहिल्या रांगेत बसून हे नाटक बघणार्या श्रीराम लागूंना व दीपा लागूंनाही तसेच वाटले असेल का?
लिलीचे फूल खुडताना...
'द ऑर्किड थीफ' हे पुस्तक वाचून पुन्हा एकदा हा चित्रपट पहायचा असं 'द अॅडॅप्टेशन' प्रथम पाहून ठरवलं होतं, त्याची या प्रतिसादाने आठवण झाली.
ह्या चित्रपटातले ऑर्किडचे रुपक सकृद्दर्शनी जॉर्जिया ओ'कीफच्या फुलांच्या चित्रांसारखं योनिक वाटू शकतं. मात्र त्याचबरोबर, 'या हृदयींचे त्या हृदयीं'चे अवघड 'रोपण' करण्याच्या कलाकाराच्या अप्राप्य महत्त्वाकांक्षेचेही ते प्रतीक आहे. हे साधणं किंवा त्याचा माग घेण्याची धडपड किती कठीण आहे, त्याबद्दल थेट ज्ञानेश्वरांपासून (जैसे जाल जळीं पांगिले....) ते फिलिप रॉथपर्यंत अनेकांनी लिहिलं आहे - त्याचाच हा कॉफमन शैलीतला आविष्कार.
ज्या सेमिनोल इंडियन्सचा ऑर्किडच्या तस्करीसाठी मूळ पुस्तकात उपयोग करून घेतला जातो; त्यांच्या नशिबीही ऑर्किडसारखेच फ्लोरिडा एव्हरग्लेड्सच्या आपल्या मूळ जागेहून विस्थापित होऊन मिसिसिपीच्या पल्याड, ओक्लाहोमा राज्यात, परक्या जागी आपली मुळं पुन्हा रुजवण्याचे प्रयत्न करणे आले; हाही एक अंतर्योगायोग. चित्रपटातल्या अनेक स्वसंदर्भांपैकी (सेल्फ-रेफरन्सेस) निराळ्या अर्थाने कदाचित हाही एक.
shakespeare in the park
shakespeare in the park नामक एका उपक्रमांतर्गत ऑथेल्लो पाहण्याचा योग आला. इथल्या एका बगिचात जहाजातले कंटेनर्स वगैरे वापरून रडार, मिसाईल्स वगैरे असलेला आधुनिक सेट केला होता. मागे प्रचंड मोठी वर्तुळाकार डिजिटल स्क्रीन, अमेरिकन सैनिकांच्या वेषातले ऑथेल्लो, कॅसिओ, इयागो वगैरे, रंगमंचावर ऑडी घेऊन येणारा ड्यूक (नाटकाचे प्रायोजक अर्थातच ऑडी), चिनी वंशाची तोकड्या कपड्यातली डेस्डेमोना असा भारी मॉडर्न टेक्नोट्विस्ट होता. पण पात्रांची भाषा मात्र तीच जुनी आणि संवाद म्हणायची पद्धतही पोशाखी नाटकासारखीच अन् हालचाली मात्र त्याच्याशी एकदम विसंगत.
मागच्या स्क्रीनवर हेलिकॉप्टर मधून जनरल ऑथेल्लो उतरतानाचे डिजिटल दृष्य दिसते आणि मग तो रंगमंचावर प्रवेश करतो असा प्रकार एकीकडे आणि आपल्या हॉटपॅन्ट्समधल्या बायकोला रुमाल(च) भेट देऊन तो हरवला म्हणून तिच्यावर संशय घेतो असा प्रकार दुसरीकडे. खाकी टी-शर्ट आणि खाली कॅमॉफ्लॉज पँट्स घातलेला ऑथेल्लो "Handkerchief! Handkerchief!! Handkerchief!!!" असं ओरडताना पाहून गंमत वाटली.
शेक्सपीयरचे नाटक म्हणून काही जागरूक आणि श्रीमंत शाळांनी पोरांना आणलं होतं नाटक बघायला. ऑथेल्लो आणि डेस्डेमोना रंगमंचावर हॉलीवूड स्टाईल चुंबन घ्यायला लागले की पोरं चेकाळून हूटिंग करायची.
प्रचंड करमणूक झाली. सोबत कमेंटा टाकायला मित्रकंपनी आणि खायला-प्यायला बरंच असल्याने वेळ चांगला गेला. मागे डिजनीचा लायन किंग चा प्रयोग पाहिला होता. तो आणि हा पाहून असं वाटतंय की नुस्त्या तांत्रिक सफाईदार करामती केल्या की शो भारी होतो असा या इंग्रजांचा समज होऊ लागलेला आहे.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे....
"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत!?" पाहिला.
चक्क आवडला
फुकट मेलोड्रामा टाळला आहे. शालेय मुलामिलीचे एकमेकांवर 'क्रश' असणे, आजीला आई-बाबांचा 'प्याच-अप' झाला असे सांगणे, सासु-सुना राजकारण न करण्र, कोणतेही पात्र काळे-कुट्ट किंवा गोरेपान नसून ग्रे असणे वगैरे बरेच काही आवडले
गोष्ट तशी नेहमीचीच आहे पण सादरीकरण फ्रेश वाटले.
मृणाल कुलकर्णींच्या दिग्दर्शनाचा पहिला प्रयोग म्हणून बराच आवडला.
पाहिला नाही
एका ऐसीकराने चेपु स्टेस्टस मध्ये आमच्या सारख्या मंडळींची तक्रार मांडली आहे
"मराठी पिक्चर तमाशातून सुटाला नि लग्नात अडकला."
ह्याच तक्रारीमुळे पाहिला नव्हता. एक तर "प्रेम म्हणजे ..." च्या जाहिरातीतला
नको तितका चकचकितपणा खटकला. मग पहायला जायची अजूनच भीती वाटली.
चित्रपट
जिस्म-२: धमाल हसलो.
कॅम्पेनः विल फेरेल व तो Zach Galifianakis असलेला. एकदम मजेदार आहे. विनोदाची पातळी विल फेरेल चे इतर बहुतेक चित्रपट असतात तशीच, पण त्या अपेक्षेने पाहिलात तर धमाल येइल.
स्पेशल-२६: आवडला. अनेक त्रुटी आहेत. पण चित्रपट बघताना त्याच्या वेगामुळे आपण एंगेज राहतो.
The blue umbrella - एक भारतीय गोष्ट
रस्किन बॉंडच्या कादंबरीवर आधारित विशाल भारद्वाजचा The blue umbrella पाहिला. फार आवडला.
हिमाचलमधल्या छोट्याशा गावात बिनिया ही रूढार्थाने थोडी आगाऊ वाटेल अशी चटपटीत शाळकरी मुलगी (श्रेया शर्मा) आणि गावातला लोभी दुकानदार नंदू (पंकज कपूर) ही मुख्य पात्र. बिनीया तिच्या गळ्यातली अस्वलाची नखं जपानी पर्यटकांना देऊन त्यांच्याकडची निळी जपानी छत्री घेते. सगळ्या गावाचं लक्ष या छत्रीकडे वेधलं जातं. नंदू बिनीयाला काय वाट्टेल ते देऊ करतो पण बिनीया नंदूला छत्री देत नाही. एक दिवस बिनीयाची छत्री गायब होते. गावाने नंदूवर आधी चोरीचा आळ घेतलेला असतो. त्याने छत्री चोरलेली नाही हे समजल्यावर गाववाले त्याची माफी मागतात, त्याला सेलेब्रिटी बनवतात. काही काळानंतर नंदूकडे त्याच प्रकारची पण लाल छत्री अवतरते. आता सगळ्यांचं लक्ष नंदूकडे जातं. हा थरारपट नसला तरी पुढे काय होतं हे सांगत नाही.
नंदूला तश्शीच छत्री का हवी असते, त्या छत्रीचं त्याच्या आयुष्यातलं स्थान काय असतं या निमित्ताने सौंदर्य, कलेचं आयुष्यातलं स्थान काय, एखादी गोष्ट हवीशी झाली की ती मिळवण्यासाठी माणूस काय काय करू शकतो हे नंदूच्या उक्तीकृतीमधून दिसतं. सगळ्या गावाला आवडणार्या बिनीयाचा चटपटीतपणा, तिच्या छत्रीशोधातून दिसतोच. सुंदर छत्री मिरवण्यापेक्षा आपल्याला आयुष्यात काय महत्त्वाचं आहे, नंदूचा लोभी स्वभाव समजूनही त्याच्याबद्दल तिला असणारी आपुलकी हा चित्रपटातला अतिशय हृद्य भाग आहे. गावातल्या लोकांचा साधेपणा, एकसुरी विचार करण्याची पद्धत, त्यातही सामान्य लोकांच्या स्वभावातले कंगोरे हा टिपिकल विशाल भारद्वाज प्रकारचा भारतीयपणा या सगळ्याला पूरक आहे.
पंकज कपूर हा उत्कृष्ट अभिनेता आहेच पण बिनीयाच्या भूमिकेतली श्रेया शर्मा ही छोटी मुलगीसुद्धा उत्तम कलाकार आहे. तिच्यावर चित्रित झालेली तीन गाणीही छान आहेत. विशालच्या सिनेमांमधली गुलजारची गाणी फारच मस्त असतात. पर्यटन स्थळ म्हणून दाखवलेलं हिमाचलमधलं छोटंसं खेडंही सुंदर आहे; शुद्ध १००% नेत्रसुख. दीड तासाची ही भारतीय गोष्ट बघितली नसेल तर जरूर पहा.
परवा "मटरु की बिजली का मंडोला
परवा "मटरु की बिजली का मंडोला ' पाहिला . एमिर केस्तुरिकाचे "लाईफ इज अ मिरॅकल "
" ब्लॅक कॅट व्हाईट कॅट " आठवले . मानव , प्राणी , निसर्ग आणि संगीत अशी फर्मास भेळ
असते केस्तुरीकाच्या सिनेमात . विशाल भारद्वाजने अशीच काहीशी चटकदार पाककृती
बनवली आहे . पंकज कपूर लाजवाब आहे . इम्रान खान अतिशय देखणा दिसतो आणि काम
झकास केले आहे . एमिरच्या सिनेमात गाढव किंवा डुकराला सुद्धा विशिष्ट भूमिका असते ,
तशी मटरु मध्ये गुलाबी म्हैस पण एका मजेशीर रोलमध्ये आहे . गाव , गव्हाची शेते आणि
मन्डोलाचे साम्राज्य अफलातून जमले आहे . गाण्यांची रेलचेल आहे पण ती लज्जतदार आहेत .
अनुष्का खट्याळ आणि लोभस आहे . प्रतिक बब्बरला विनोदी भूमिका जमली आहे . शबाना आझमी
सेड्युसिंग राजकारणी नेता म्हणून शोभून दिसली आहे . मझा आग्या .
+१
मटरूबद्दल लिहायचे राहून गेले होते. मलाही अतिशय आवडला होता हा चित्रपट. त्यातले पंकज कपूरचे 'जॅकल अँड हाईड' छापाचे पात्र उभे करताना त्यामागे 'आजचा मध्यमवर्ग' ही कल्पना असावी की काय असे वाटून गेले अर्थात तसे ते लेखक-दिग्दर्शकाला अभिप्रेत होते असा अजिबात दावा नाही पण त्या पात्राचा दुटप्पीपणा, त्याचा राजकार्ण्यांनी करून घेतलेला उपयोग, त्याच्या स्वार्थी शॉपिंग मॉल आकांक्षा आणि तरीही त्याचा जिवंत असलेला कॉन्शान्स वगैरेमागे अशी मांडणी असू शकते असे वाटून गेले. चित्रपट पहाताना थोडी 'जाने भी दो यारो'ची आठवण येऊन गेली पण त्यापेक्षा 'ब्लॅक कॅट व्हाईट कॅटचा' संदर्भ अधिक चपखल आहे, भारीच होता तोही सिनेमा. एमिर केस्तुरिकाचा 'लाईफ इज अ मिरॅकल' अजून पाहिला नाही पण आता जवळच्या लायब्ररीत मिळतो आहे हे पाहून बुक केला आहे, शिफरसीबद्दल धन्यवाद.
फसलेला प्रयत्न
मटरु थेट्रात जाउन पाहिला होता.फसलेला प्रयत्न वाटला. सुरुवात झकास होती.
(पंकज कपूरचं रुचितै म्हणतात तसं जेक्ल - हाइड होणं. किंवा आफ्रिकेतील लोक
आणून एकदम "इन्हे तो पता भी नहि की यह बिक चुके है!" हे संवाद)
पण नंतर नंतर त्या वैचित्र्याततही तोच तोच पणा जाणवायला लागला.
कंटाळलो. विचित्र हसरे एक्स्प्रेशन देत सतत टॉण्ट मारल्यासरखे अगम्य संवाद पात्रे म्हणू लागली.
शबानाचे स्म्वाद तर कहर आहेत. ("देश का भला होना जरुरी है. उसके लिये फॅक्टरी चाहिये." हे पुरेसं होतं.
ती बया भडक्क हावभाव करीत "देश का भला होन चाहिये. हम यानि देश. हमारा भला होना चाहिये.
ज्योतिरादित्य सिंधिया की तरफ देख्को. वोह अच्छा बच्चा है." वगैरे बडबड करते तेव्हा भयानक वैताग आला.
डोके दुखायला लागले हा पकाउपना पाहून.)
गुलाबो चे रुपक ही त्याची सदसदविवेकबुद्धीचे प्रतीक आहे ; की मागच्या "दाबलेल्या " केसेस आहेत "मारुती कांबळे"सारख्या
ते ही स्पष्ट झालं नाही. ते विवेकाचं प्रतीक आहे, असं मला वाटलं. मित्राचं म्हणणं ती त्याची कुकर्मं आहेत. पुढचा प्रश्नः-
कुकर्म चांगली कामं करण्यास उद्युकत का करतील?
ह्याउप्परही चित्रपट पहायचे एकमेव कारण म्हणजे चोप्रा-जोहर गँग बाहेर कुनीतरी काहीतरी करतोय,
निदान विचार करतोय. आणि त्याचे चित्रपट हलवायाचे दुकानासारखे गोग्गोड नाहित. म्हणून पहायला गेल्तो.
कधी विशाल भारद्वाज भेटलाच तर साल्याकडून तिकिटाचे पैसे परत घ्यायचे आहेत.
लिटल वुइमेन
लिटल वुइमेन पाहिला. ज्योचे काम करणारी नटी फार आवडली. क्रिश्चन बेल ही चांगला दिसलाय. बेथ आणि अॅमी मुळीच आवडल्या नाहीत.
एकुणात पिक्चर ठीक वाटला, फार नाही आवडला. सगळे फारच वरवर चाललेय असे वाटले. ज्यो सोडून इतर व्यक्तिरेखांची फारच काटछात केली आहे. पुस्तक वाचले नसल्यास फार संदर्भ लागणार नाहीत असे वाटले.
हमीदाबाईची कोठी
'हमीदाबाईची कोठी' पाहिले. मूळ संचात विजया मेहता, नाना पाटेकर, अशोक सराफ, नीना कुलकर्णी हे भूमिका करत असताना काय बहार येत असेल याची कल्पना आली. एवढ्यासाठीच हे नाटक पाहिले असे म्हटले तरी चालेल. एरवी गेल्या पिढीतल्या कोठ्या जमीनदोस्त होऊन त्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहाणे हेच सगळीकडे आहे.
जिस्म २ फारच कै च्या कै आहे.
जिस्म २ फारच कै च्या कै आहे. पण सन्नी तै छान दिसतात. चेहरा आणि केस म्हणतेय बरंका ;-)
स्पेशल २६ देखील आवडलेला. अशा चित्रपटात आपण नेहमी चोरांच्या बाजुने का असतो कै कळत नै.
मटरु आवडला अशी एकतरी व्यक्ती आहे हे पाहुन आनंद झाला. मी पाहीला नाही पण नेहमी वाईटच ऐकलय याच्याबद्दल.
ब्लु अंबरेला पहायचाय. मकडीदेखील छान होता. विशाल भारद्वाज चे चित्रपट शक्यतो छान असतात. इव्हन सात खून पण रोचक होता. पण त्या ठोँब्या जॉनमुळे थोडा गंडल्यासारखा वाटला.
एक थी डायन पहायचाय. अगदीच पैसे वाया नसावा असं वाटतंय.
डब केलेले दाक्षिणात्य चित्रपट
वेळ घालवण्यासाठी हिंदीत डब केलेले काही दाक्षिणात्य चित्रपट पाहत आहे. यात ब्रह्मानंदम हा एक भन्नाट कलाकार सापडला. त्याचे काही विनोदी प्रसंग येथे पाहता येतील. भाषा कळली नाही तरी या कलाकाराच्या चेहऱ्यावरचे अविर्भाव अप्रतिम आहेत.
फिराक पाहिला. दिग्दर्शन -
फिराक पाहिला. दिग्दर्शन - नंदिता दास. लेखन - नंदिता दास आणि सुची कोठारी.
२००३ च्या गुजराथच्या दंग्यांनंतर घडणारी काही कथानकं. गुजराथी जनतेच्या आयुष्याचे काही तुकडे चित्रपटात दिसतात. गुजराथी जनता म्हणजे कोण कोण तर, शानदार दुकान असणारे दोन मित्र, एक प्रथितयश पण वृद्ध गायक, एक कनिष्ठ मध्यमवर्गीय घर आणि काही कष्टकरी. 'धोबी घाट'ही त्याबाबतीत काहीसा असाच.
मतदारयाद्या काढून मुस्लिमांना टार्गेट केलं गेलं; सामान्य हिंदूंनी या सगळ्या प्रकारात भाग घेतला, विरोध केला नाही म्हणून हत्या, जाळपोळ, बलात्कार इ. होऊ शकलं हे सार. उच्च मध्यमवर्गीय, उच्चभ्रू दुकानदारांपैकी एक हिंदू, एक मुसलमान. दोघांची रहाणी, वेशभूषा, इ. कशातही फरक नाही. मुस्लिम भागीदाराचं नाव समीर, हिंदूंना आपलंच वाटेल असं. त्याच्याशी माफक संपर्क असणार्या लोकांना तो 'आपलाच' वाटावा असा. पण त्यांचं दुकान लुटलं जातं. समीरची होणारी घुसमट, त्याला वाटणारी उच्चभ्रू, सुशिक्षित पण प्रातिनिधिक भीती.
रस्त्याच्या कडेला आमलेटं विकणारा. त्याचं मत, "सगळे मुसलमान असेच जिहादी असतात". पण दुकानात कामाला येणारा छोट्या झुरळही मारू शकत नाही, जिहाद कसला करणार? "तो तसा नाही".
हिंदू कनिष्ठ मध्यमवर्गात टिपिकल शॉव्हनिझम. स्त्रीची जागा फक्त स्वयंपाकघरात. तिच्या दीराने बलात्कार केलेले आहेत; नवरा दीराला पाठीशी घालतो आहे. पण तिच्या दाराशी मुस्लिम स्त्रिया, मुलं आश्रय मागून गेले असावेत. दोन महिन्यांनंतरही दाराशी कोणी असहाय्य मदत मागत आल्याचे तिला भास होत आहेत. तिचा 'मुक्ती' मिळवण्याचा प्रयत्न.
कनिष्ठ वर्गातले मुस्लीम रिक्षावाले, बेकरी चालवणारे इ. हातावर पोट असणारे हे लोक. दंगलींच्या वेळेस पोलिसांनीही यांना मदत केली नाही. एकमेकांच्या आधाराने जिवंत रहाण्याचा प्रयत्न करत आहेत. दंगेधोपे शांत झाले तरीही यांचं आयुष्य जागेवर आलेलं नाही. सगळ्यांनाच प्रचंड भीती आहे, राग आहे; पण त्यावर काहीही उपाय नाही. यांनी किड्यामुंगीसारखंच जगायचं आणि एक दिवस चिरडलं जायचं.
आणि मुस्लिम समाजातले एक प्रतिष्ठित गायक. त्यांना उतारवयात विस्मरण व्हायला लागलेलं आहे. ते अजूनही भूतकाळाच्या सलोख्याच्या आठवणींमधेच मश्गुल आहेत. आणि अचानक त्यांच्यासमोर हे सत्य येतं. पण त्यांच्या शिष्यांनी, आजूबाजूच्या लोकांनी या परिस्थितीला घाबरून न जाण्याचं ठरवलेलं आहे.
दीप्ती नवल, टिस्का चोप्रा, संजय सुरी, रघुबीर यादव, नसिरुद्दीन शहा, नवाझुद्दीन सिद्दीकी, अशा सगळ्याच अभिनेत्यांनी उत्तम काम केलं आहे. नंदिता दास गुणी अभिनेत्री म्हणून माहित होतीच; तिचा 'फिराक'ही आवडला.
अॅन ऑफिसर अँड अ जंटलमन
रिचर्ड जेरे चा "अॅन ऑफिसर अँड अ जंटलमन" नावाचा सिनेमा पाहीला. फार आवडला. झॅक (रिचर्ड जेरे) "नौसेना वैमानिक" होण्यासाठी "विमानदल प्रशिक्षणार्थी" म्हणून दाखल होतो. त्याच्या बॅचचा ड्रील मास्टर फोलेय, हा अत्यंत कठोर व कडक शिस्तीचा प्रशिक्षक असतो. फॉलेय चे काम हे की शिस्तीच्या तप्त मुशीतून सोने घडविणे. मग भलेही काही विद्यर्थ्यांना डी. ओ. आर.(डिसचार्ज ऑन रिक्वेस्ट) द्यावा लागो.
या प्रशिक्षणार्थीं विद्यार्थ्यांना पटवून ऑफिसर नवरा मिळवण्याच्या इराद्याने येणार्या कारखान्यातील मुलींपैकी एक असते पॉला. प्रशिक्षणाच्या काळात तिचे व झॅक चे प्रेम बहरते. इतर मुलींसारखी ती मॅनिप्युलेटीव्ह नसते तर उलट झॅकला हे आत्यंतिक कठीण प्रशिक्षण पार पाडण्याचा हुरुप ती देत असते. ती लोचट किंवा सारखी पाठीमागे लागणारी दाखवली नसून उलट झॅकला मुक्त ठेवणारी, नॉनकमिटल व आपले आयुष्य मजेत जगणारी दाखवली आहे.
झॅकचे हलाखीचे बालपण, त्याची प्रशिक्षण पूर्ण करण्याची जिद्द, पॉला चा चांगुलपणा, झॅक च्या मित्राचे व्यक्तीचित्रण, झॅकचे मित्रप्रेम, मित्राने प्रेमात फसून केलेली आत्महत्या अशा खुबीं उलगडत चित्रपट पुढे सरकतो. मला यातील पॉला व फॉलेय चे व्यक्तिचित्रण आवडले. ड्रील मास्टर फॉलेय चे काम ज्याने केले आहे त्या अभिनेत्याला त्या वर्षीचे "सहायक भूमिकेचे" अॅकेडमी पारीतोषिक आहे.
रिचर्ड जेरे नेहमीच आय-कँडी दिसतो. या सिनेमात रोमॅटीक सीन्समध्ये तसेच ऑफीसरच्या पोशाखात अफाट देखणा दिसला.
द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट
हा मीरा नायरने दिग्दर्शित केलेला मोहसीन हमीदच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आजच पाहिला. अगदीच निराशा करणारा नसला तरी शेवटाचे केलेले हॉलिवूडीकरण, कादंबरीतील साटल्याला (subtlety) बव्हंशी दिलेला फाटा यामुळे - पुस्तक आणि त्यावर बेतलेला चित्रपट ही तुलना जरी बाजूला ठेवली तरीही - चित्रपट काही फार थोर वाटला नाही.
आयर्न मॅन ३
मार्वलचे सुपरहीरो अत्यंत आवडत असल्याने आयर्न मॅन -३ पाहण्यासाठी फारच तडफडत होतो. शेवटी या वीकेंडला चित्रपट पाहता आला. सुपरहीरोचीच गोष्ट असल्याने त्याबाबत फारसे बोलत नाही. मात्र खटकेबाज संवाद, स्पेशल इफेक्ट्स वगैरेमुळे चित्रपट अत्यंत धमाल झाला आहे. बेन किंग्जलेचे पात्र फारच मस्त. :), डाऊनी ज्यु. नेही खल्लास काम केले आहे. ३डी पाहायला हवा होता असे वाटून गेले. असो. नोव्हेंबरमध्ये थॉरचा पुढचा भाग येतोय. ते ट्रेलर बोनस म्हणून पाहायला मिळाले. आता त्या चित्रपटाची वाट पाहणे आले.
अपार्ट्मेंट
परवा "रहस्यमय" सिनेमा शोधायच्या नादात यू ट्युब वर "अपार्ट्मेंट" नावाचा हिंदी सिनेमा पाहीला व डोकेदुखीला आमंत्रण दिले. सहायक नायिका 'वेल्ब्युट्रीन" औषध घेत असते व तिला "बायपोलर स्किझोफ्रेनिया" असतो असे काहीसे यात दाखविले आहे. "बायपोलर" व "स्किझोफ्रेनिया" हे भिन्न आजार आहेत हे देखील ठाऊक नसताना आजाराची सरमिसळ करुन असा दिग्दर्शक/निर्मात्याने सिनेमा काढणे हाच मुळी मूर्खपणाचा कळस आहे. मूड स्विंग्स चे भडक व अवास्तव चित्रण यात आहे हे वेगळे सांगायलाच नको.
३/४ सिनेमा पाहून सोडून दिला. मनोरुग्ण व त्यांच्या मानसिक स्थितीचे यथार्थ वर्णन करता येत नसेल, काही सकारात्मक संदेश देता येत नसेल , थोडक्यात पेलत नसेल तर निदान दिशाभूल तरी करु नका.
दुर्दैव.
अल्झायमर्स (का डिमेन्शिया?) ग्रस्त वृद्ध व्यक्तिचं आजारपण आणि "बरं होणं" यावर काढलेला 'मैने गांधी को नही मारा' पाहिला आहेस का? शेवटचा कोर्टरूम ड्रामातली ड्वायलाकबाजी टाळली असती तर अधिक प्रभावी वाटला असता. त्यात (पट)कथालेखक, दिग्दर्शक, उर्मिला आणि अनुपम खेर यांनी सुरेख काम केलेलं आहे.
गेल्या आठवड्यात एक दिवस फार वैताग आला होता तेव्हा दीपा मेहताचा 'बॉलिवूड हॉलिवूड' पाहिला. हा चित्रपट आला तेव्हा चित्रपटगृहात पाहिला होता, पण तेव्हा अर्ध्याधिक गोष्टी डोक्यावरून गेल्या होत्या. कॅनडात (भारताबाहेर कुठेही पाश्चात्य देशात चालेल) रहाणार्या लोकांची, त्यानिमित्ताने खास बॉलिवुडी मेलोड्रामाची मस्त टिंगल केली आहे. दीपा मेहताच्या अन्य चित्रपटांशी (फायर, वॉटर, अर्थ) तुलनाच नको. हा तसा स्नॅकी टायपातलाच आहे. पण खरोखरच डोक्याला ताप नाही आणि काहीतरी चांगलं म्हणून बघायला मस्त आहे.
प्रतिसादात आलेले साटल्य आणि इफेक्टपिसाट हे दोन शब्द फारच आवडले.
नाही पाहीला. आजच पुढील बातमी
नाही पाहीला.
आजच पुढील बातमी वाचली - http://www.cbsnews.com/8301-204_162-57582213/catherine-zeta-jones-enter…
कॅथरीन झीटा जोन्स बायपोलर ची ट्रीटमेंट घेण्याकरता हॉस्पिटलमध्ये दाखल झाली.
त्याच बातमीतील शेवटचे वाक्य त्यांनी मुद्दाम नमूद केले आहे ते आवडले - "It's very treatable with a good source of support and the right medication,"
अवे वी गो
दिवसाला एक सिनेमा या दराने अनेक सिनेमे पाहिले जातात पण खास उल्लेख करावा असे कमीच असतात, त्यातला'अवे वी गो' हा इंडी सिनेमा अलिकडेच पाहिला. प्रथमच आई-बाप होणार असलेले एक जोडपे आपल्या बाळाला कोठे वाढवायचे हे ठरवायसाठी अमेरिकेच्या (आणि कॅनडाच्या) अनेक ठिकाणी रहाणार्या आपल्या कुटुंबियांना आणि स्नेह्यांना भेटायला जातात. वेगवेगळ्या ठिकाणचे वातावरण, मुलांना वाढवायची प्रत्येकाची पद्धत, कौटुंबिक समस्या आणि त्यांचा मुलांच्या संगोपनावर होणारा परिणाम हे सारं टिपतात आणि त्या अनुभवांवर आधारित असा काही वैयक्तिक निर्णय घेतात अशी काहीशी गोष्ट्. खरेतर सिनेमाला गोष्ट अशी नाहीच फक्त मुले होण्याआधीच त्यांना कसे वाढवायचे याचे एका जोडप्याने केलेले मुक्त चिंतन आहे. सिनेमाची कथा तशी फार ढोबळ वाटली तरी अनेक मुद्द्यांवर फार संवेदनाशील भाष्य केले आहे असे वाटते. माझ्या आवडत्या 'केविन अँड होब्स' मधे केविन एकदा म्हणतो की "Parenting is the only profession which doesn't need any qlalifications" दुर्दैवाने हे फार खरे आहे आणि फारच कमी पालक आपल्या मुलांना कसे वाढवायचे हे जागरूकपणे ठरवतात. कोणतीही एक पद्धतच बरोबर आणि दुसरी चुकीची असे नसले तरी जागरूकपणे निर्णय घेऊन, जबादारपणे मुले वाढवणे फार कमी जण गांभिर्याने घेतात. मुलांचे औपचारीक शिक्षण आणि त्यांचे व्यावाहारीक संगोपन इतकीच आपली जबाबदारी नसून त्यांना आनंदी, यशस्वी, जबाबदार बनवायचे असेल तर त्यांच्याबरोबर आपल्यालाही अधिक चांगल्या व्यक्ती होणे गरजेचे आहे या आणि अशा अनेक मुद्द्यांवर हा सिनेमा नेमके बोट ठेवतो. मुले असतील, हवी असतील किंवा आपल्या नात्यातल्या / जवळच्या लहान मुलांच्या संगोपनात सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी अवश्य पहावा असा सिनेमा.
प्रश्न
"Parenting is the only profession which doesn't need any qlalifications"
हे विधान विनोदी वगैरे आहे, परंतु ते खरे आहे का ? पालकत्व हा व्यवसाय कुठे आहे ? आणि जर का पालकत्वासारख्या गोष्टींकरता काही प्रशिक्षणादि गोष्टी अभिप्रेत असतील तर ते बहुतांशी इतर कुठल्याही मूलभूत स्वरूपाच्या गोष्टींबद्दलही खरे ठरते - आणि त्यामुळे बर्यापैकी गुळगुळीत स्वरूपाचे विधान ठरते.
विनोदीच.
'केविन अँड होब्स' (या कॉमिक स्ट्रीप) मधली विधाने विनोदीच असतात पण असे असतानाच त्यात कधीकधी मर्मावर बोट ठेवतात. पेरेंटिंग हा व्यवसाय नाहीच मुळी पण मुद्दा असा आहे की कोणत्याही व्यवसायापेक्षा कितीतरी अधिक महत्वाच्या या जबाबदारीला हाताळण्याची पात्रताही नसलेले अनेकजण पालक बनतात आणि आपण पालक बनण्यास पात्र आहोत असे समजतात.
अवे वी गो - २
'अवे वी गो' हा सॅम मेंडिस याचा चित्रपट. 'अमेरिकन् ब्युटी'प्रमाणे यातही त्याने अमेरिकी मध्यमवर्गीय कुटुंबसंस्थेवरील अनेक निरीक्षणे नोंदवून टिप्पण्या केल्या आहेत. त्यातला, ट्रँपोलिनवर पडून दोघे 'नवरा-बायको' आणाभाका घेतात, तो प्रसंग मला फार आवडला. दोघांत असलेले गाढ प्रेम आणि दुर्दम्य विश्वास, सचोटी त्या संवादांत दिसून येतो. तसेच त्याच्या मित्राने दत्तक घतलेल्या मुलांबरोबरचा प्रसंग आणि त्या मित्राच्या बायकोचा 'पोल-डांस'चा प्रसंगही अतिशय हृद्य वाटला.
फक्त तिच्या बहिणीकडे ते दोघे जातात, तो प्रसंग का टाकला असावा, ते कळले नाही. तिची बहीण, 'तुझ्या आयुष्यात तो आहे म्हणून नशिबवान आहेस', एवढेच एक महत्त्वाचे वाक्य बोलते. पण प्रेक्षकावर केवळ ते बिंबविण्याकरिता तो प्रसंग असेल, असे वाटत नाही. तुम्हांला काही विशेष दिसले ?
बाकी ...मुले होण्याआधीच त्यांना कसे वाढवायचे याचे एका जोडप्याने केलेले मुक्त चिंतन आहे... याच्याशी सहमत.
सिनेमा आवडला. मला सगळ्यांत
सिनेमा आवडला. मला सगळ्यांत जास्त आवडला तो 'आर वी फक-अप्स?' 'नो, वी आर नॉट फक अप्स..' हे संवाद त्या नवराबायकोत होतात तो प्रसंग. तिशी ओलांडली नि तरी आपल्याला साध्या-साध्या गोष्टींबद्दल धड मतं नाहीत, आपण रूढ अर्थानं 'आयुष्य ओळीला लागलेले लोक' नाही, नि आता मूल, अरे बाप रे... या जाणिवेनं बावचळून गेलेले नि आपल्याच आदर्शवादी धारणा तपासून बघणारे ते दोघं मला फार जवळचे वाटले.
ते दोघं तिच्या बहिणीकडे जातात त्या प्रसंगात फक्त इतकंच कुठे घडतं? त्या दोघी बहिणी त्यांच्या आईवडिलांबद्दलही बोलतात. बहुधा नायिकेला आईवडिलांचा मृत्यू अजुनी स्वीकारता आलेला नाही. तिला त्यांच्याबद्दल मोकळेपणानं बोलता येत नाही अजुनी, हे त्या प्रसंगातून स्वच्छ दिसतं. मुलाला जन्म देणं म्हणजे एका प्रकारे 'आईवडील गेले-पण आपण साखळी चालू ठेवली आहे' याचा साक्षात्कार होणं असेल, हेही या प्रसंगातून दिसतं. त्यामुळेच तर ते पतीपत्नी शेवटी ज्या मुक्कामी पोचून स्थिरावतात, त्याला अर्थ मिळाल्यासारखा होतो. नाही?
वेगळं सांगण्यासारखे दोन
वेगळं सांगण्यासारखे दोन चित्रपट पाहिले.
१. नोबडी नोज: हा एक जपानी ड्रामा आहे. बारा वर्षांचा एक मुलगा, अकीरा, यातलं मुख्य पात्र. याची पोरकट विचारांची आई अकीरा आणि त्याच्या तीन धाकट्या भावंडांना सोडून जाते. ही मुलं शाळेत जात नाहीत. अकीरा आणि भावंडांसकट स्टेट केअरमधे जायला तयार नाही कारण भावंडांना एकत्र रहाता येणार नाही. अकीरा या परिस्थितीत काय करतो याचं चित्रण म्हणजे हा चित्रपट.
या वयाच्या मुलांवर बनवलेले चित्रपट फार दिसत नाहीत. असतात ते गोग्गोड होण्याकडेही झुकण्याची शक्यता असते. नोबडी नोज या बाबतीत वेगळा आहे. मुळात बुद्धी असणारा आणि परिस्थितीमुळे अधिकच मोठा झालेला अकीरा आनि त्याची गोष्ट हृदयस्पर्शी असली तरीही त्याचे प्रश्न चुटकीसरशी सुटत नाहीत. असाच एक दुसरा चित्रपट आठवला तो म्हणजे The little girl who lives down the lane. तेरा वर्षाची मुलगी नव्या गावात रहायला येते तेव्हा तिचं आयुष्य कसं सुरू होतं यासंबंधात हा थरारपट आहे.
२. धर्म: थोडक्यात कथा काय हे वाचल्यावर काहीसा अपेक्षित चित्रपट पण उत्तम चित्रपट आहे. वाराणसीचा आदरप्राप्त, कर्मठ पंडित चतुर्वेदी (पंकज कपूर) याची मुलगी आणि बायको त्याच्याशी खोटं बोलून आईने सोडून दिलेल्या एका मुलाला घरी आणतात. पाचेक वर्ष हा मुलगा चतुर्वेदींच्या घरचा, त्यांचा मुलगा-भाऊ म्हणून मोठा होतो. पण त्यानंतर तो मुस्लिम असल्याचं समजतं. मुलाच्या इच्छेविरोधात त्याचा ताबा त्याच्या मुस्लिम आईकडे दिला जातो. मुलगा का धर्म या पेचातून काळ मार्ग काढत असतो; पण पुन्हा दंगे सुरू होतात. अशा वेळेस पंडित चतुर्वेदी धर्म वाचवणार का माणूसकी? स्वार्थ, धर्माचा वापर करून घेणं, आंधळेपणाने धर्मपालन, बिनडोक लोकांनी सुरू केलेले, चालवलेले दंगे-धोपे, नेहेमीप्रमाणे धर्माचरणात, दंग्याधोप्यांमधे स्त्रिया आणि मुलं पिचली जाणं आणि शेवट हे सगळं अपेक्षित आहेच.
पण हा चित्रपट सोडून ऑस्करवारीसाठी 'एकलव्य' पाठवला.
अवांतर-समांतर
या दोन्ही चित्रपटांबद्दल वाचून काहि म्हटले तर पूर्ण अवांतर पण काहिसे समांतर आठवले:
बारा वर्षांचा एक मुलगा, अकीरा, यातलं मुख्य पात्र. याची पोरकट विचारांची आई अकीरा आणि त्याच्या तीन धाकट्या भावंडांना सोडून जाते. ही मुलं शाळेत जात नाहीत. अकीरा आणि भावंडांसकट स्टेट केअरमधे जायला तयार नाही कारण भावंडांना एकत्र रहाता येणार नाही.
स्वतः चार्ली चॅप्लीन याला अश्या केअर टेकिंग संस्थेत जावे लागते कारण त्याच्या आईला मानसिक रुग्ण म्हणून दाखल केले असते. तेव्हाही त्याच्या मोठ्या भावापासून त्याची होणारी ताटातूट आठवली. (पुस्तक: हसरे दु:ख - भा द खेर बहुदा)
मुलाच्या इच्छेविरोधात त्याचा ताबा त्याच्या मुस्लिम आईकडे दिला जातो.
कॉनरॅड रिक्टरचे "द लाईट इन द फॉरेस्ट" आठवला. एका इंडियन मुलाला तो मूळचा ब्रिटिश आहे हे कळल्यावर करारानुसार त्याच्या 'खर्या' आईवडिलांकडे दिले जाते. त्याच्या नजरेतून आलेले हे पुस्तक अफलातून आहे.
टिपः याच लेखकाच्या विविध पुस्तकांचा जीए.कुलकर्णींनी केलेल्या अनुवादावरून पुस्तकाचा अंदाज लाऊ नका असे सुचवतो. जीए अनुवादात चांगलेच तोकडे पडलेत असे मला वाटते. मुळातील पुस्तके अतिशय जास्त ताकदीची आहेत.
द ग्रेट गॅट्स्बी आणि बीपी
द ग्रेट गॅट्स्बी
कान्स महोत्सव, अमिताभ बच्चनचा हॉलिवुड डेब्यू(?) वगैरेंमुळे सध्या बातम्यांत असलेला हा भव्यदिव्य चित्रपट पाहिला. कथा विकीवर मिळेल वाचायला. प्रेम, सूड, मैत्री, मत्सर, गर्व, गैरसमज यांनी भरलेला ड्रामा पडद्यावर उलगडत जातो आणि चित्रीकरण खिळवून ठेवते. मी ३डी मध्ये पाहिला. त्याची गरज नव्हती असं वाटलं.
बीपी
'बालक पालक' हा यूट्यूबवर मिळाला. चित्रपट खूप आवडला. सिनेमातली लहान मुले मला अगदी कृत्रीम वाटतात बर्याचशा वेळेला पण यात चक्क ठीकठाक वाटली. सगळ्यांनी अभिनय उत्तम केला आहे. चित्रपटात पात्र बरीच आहेत, पण प्रत्येकजण आपापल्या भूमिकेसाठी योग्य वाटले.
साधारण याच वयोगटातल्या मुलांची पात्र असलेल्या 'शाळा'शी तुलना झाली. माझ्यामते बीपी नक्कीच अनेक पटींनी उजवा आहे.
'शिवचरित्र आणि एक'
'शिवचरित्र आणि एक' हे सदानंद मोरेलिखित नाटक पाहिलं. इतकं बावळट नाटक अनेक दिवसांत पाहिलं नव्हतं. वेगवेगळ्या काळातल्या शिवचरित्रकारांवर एकेका ओळीची शेरेबाजी केली आणि त्याला शिवाजीभोवतालच्या अस्मितांच्या राजकारणाची फोडणी दिली की झालं नाटक, असा मोरे यांचा भ्रम दिसतो. त्यात चरित्रकार ब्राह्मण नायकाच्या पूर्वजांचा गावाकडचा इनामदारी भूतकाळ आणि त्याचा सहाय्यक मराठा तरुणाच्या पूर्वजानं त्याची शेती बळकावलेली असणं, किंवा त्या चरित्रकाराची मुलगी त्याच्या मराठा सहाय्यकाच्या प्रेमात असणं वगैरे हिंदी सिनेमा टाईप मसालासुद्धा घातलेला आहे. हेदेखील कमी पडेल असं वाटल्यामुळे एकाच हार्डडिस्कवर पुस्तकाची एकच प्रत ठेवलेली असणं आणि ती नष्ट होणं, अख्खं चरित्र संशोधकानं निव्वळ तोंडी डिक्टे़ट करणं, त्याच्यापाशी कोणत्याही लेखी नोंदी किंवा इतर संदर्भ नसणं वगैरे 'दा विन्ची कोड'छाप गोष्टी घातल्या आहेत. त्या पाहून तर स्वतः मोरे हे संशोधक आहेत का, याविषयीच संशय निर्माण होतो. ह्या सर्व काल्यामुळे नाटक अनवधानानं विनोदी होतं.
ही क्लिप(चित्रफीत) जरुर पहा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=cDDWvj_q-o8
संगीत , लिहीलेले शब्द, संपूर्ण चित्रफीत एक वेगळाच दृष्टीकोन देते. पाहताना व पाहील्यानंतर बराच वेळ मनात भावना उचंबळत राहतात.
ओम पुरीचा त्रासदायक अर्धसत्य...
ओम पुरी,गोविंद निहलानी, विजय तेंडुलकर ह्यांची एकत्रित इनिंग अर्धसत्य.
परवा कुणाकडं तरी गेलो असताना हा घाणेरडा, अंगावर येणारा पिक्चर लागला.
जमेल तितके टीव्हीकडे दुर्लक्ष करत गप्पा मारत होतो.शेवटच्या प्रसंगात रामा शेट्टी(सदाशिव अमरापूरकर) कदॅच जाण्याची इन्स्पेक्टर ओम पुरीला वेळ येते, तिथे मात्र राहवले नाही आणि मित्राला टीव्ही बंद करायला लावला.
आख्ख्या चित्रपताअत धड बॅकग्राउंड म्युझिक नाही, तुटक तुटक संवाद, रहदारीचे आवाज्,आसपास डोकावणारे वास्तव जीवनातील दृश्ये ( कुठेही फिल्मी झगझगितपणा नाही, शुष्क कोरडे वास्तव सर्वत्र) आणि वैतागयला लावणारे, त्रास देणारे वातावरण. पाहताना फारच त्रास होतो. पाहिल्यानंतरही विचार करताना त्रासच होतो.
पाहूच नका. पाहिलाच तर विचारही करु नका.
"अर्धसत्य"
चक्रव्यूह में धँसने के पहले
कौन और कैसा था मैं
यह मुझे याद ही नहीं आएगा
चक्रव्यूह में धँसने के बाद
मेरे और चक्रव्यूह के बीच
केवल जानलेवा निकटता थी
यह मैं जान ही नहीं पाऊंगा
चक्रव्यूह से बाहर निकल
मुक्त हो जाऊँ मैं चाहे फिर भी
कोई फ़र्क़ नहीं पड़ेगा इससे चक्रव्यूह की रचना में
मर जाऊँ या मार डालूँ
ख़त्म कर दिया जाऊँ या ख़ात्मा कर दूँ जान से
असम्भव है इसका निर्णय
सोया हुआ आदमी
जब शुरू करता है चलना नींद में से उठकर
तब वह देख ही नहीं पाऐगा दुबारा
सपनों का संसार
उस निर्णायक रोशनी में
सब कुछ एक जैसा होगा क्या?
एक पलड़े में नपुंसकता
दूसरे पलड़े में पौरुष
और तराजू के काँटे पर बीचों-बीच
अर्धसत्य।
---**----
मूळ मराठी कविता : दिलीप चित्रे
अनुवाद : चंद्रकांत देवताले.
'व्हाइट लिली नाइट रायडर'चा
'व्हाइट लिली नाइट रायडर'चा सोनाली कुलकर्णीचा प्रयोग पाहिला.
नाटक वेगळं आणि चांगलं आहेच. पण ते अलाहिदा.
मी रसिकाची कर्मठ फ्यान आहे. सोकुचं काम आवडतं. विशेष करून 'गाभ्रीचा पाऊस' आणि 'देऊळ'मधली सोनाली खणखणीत होती. पण तिचं लोकसत्तेतलं सदर वाचून 'गपे, निरागसपणा प्ले करणं बंद कर' असं ओरडावंसं वाटतं, त्या पार्श्वभूमीवर ती अभिनय करत नसताना डॉक्यात जाते(याच्या बरोब्बर उलट अमृता सुभाषचं सदर. पण ते असो.) तर तेही असो. रसिकानं केलेली भूमिका करताना सोनालीचं काय होतं अशी विकृत उत्सुकता होती.
पण - सोकु कायच्या काय खणखणीत. एकतर ती तिचा विशिष्ट आवाज भारीपैकी वापरते. अगदी चालही भूमिकेनुरूप बदलते. तिचं टायमिंग अफलातून आहे. हे सगळं एका चांगल्या अॅक्टरकडे असायचंच, ते ठीक. पण तिच्या कामात आधीच्या कलाकाराची छाप / आठवण / संकोच / बावरलेपणा कु-ठे-ही जाणवला नाही, जो कुठलीही दुसर्या कुणी केलेली चांगली भूमिका दुसर्यांदा करताना पुसणं भल्याभल्यांना जड जातं.
कबूल करायला त्रास होतोय, पण या भूमिकेत मला ती रसिकापेक्षा जास्त आवडली.
सोनाली कुलकर्णींचं 'व्हाईट
सोनाली कुलकर्णींचं 'व्हाईट लिली ...' पहायचं आहे... धन्यवाद मेघना आणि सन्जोप तुमच्या थोडक्यात दिलेल्या परीक्षणा बद्दल.
मी ह्या विकांताला 'The Bourne Legacy' पाहाण्याचा प्रयत्न केला, थोडा (थोडा काय सगळाच) डोक्यावरून गेला... म्हणजे ह्यात सिनेमाची चूक अर्थात नाहीये... पण मला असं जाणवलं की 'डायरेक्ट' 'The Bourne Legacy' पहाण्याऐवजी त्याचे आधीचे भाग पाहणे गरजेचं आहे... माझं म्हणणं बरोबर आहे का? खरंच अशी गरज आहे का की कुठलाही भाग कळायला हवा - जरा 'विकी' केलं आधीच्या भागांचं तरी कळायला हवं म्हणा... पण आधीचे सगळे भाग बघणं गरजेचंच असेल तर मग नाही वाटत एवढे भाग बघू शकेन (आजकाल एक सिनेमा सुद्धा २-३ भागांमध्ये/दिवसांमध्ये बघावा लागतो..)
नुकतेच पाहिलेले चित्रपट
द डिक्टेटर - बरेच फालतू जोक असले तरी बर्याच वेळा हसवतो. एकदा पाहायला हरकत नाही. दोन गोष्टी मात्र उच्चः १. त्या अॅना फॅरिस ने रंगवलेली हट्टी-लिबरल, ग्रीन वगैरे अॅक्टिव्हिस्ट आणि २. युनो मधे या अलादीन चे भाषण. समोरच्या लोकांना हुकूमशाही चे फायदे सांगताना अमेरिकेतील घटनांचे संदर्भ दिलेत ते जबरी आहे भाषण!
साह्ब, बीवी और गँगस्टर रिटर्न्सः हा दुसरा भागही आवडला. यात जिमी शेरगिल चे काम जास्त आवडले. नक्कीच पाहण्यासारखा आहे. मात्र माही गिल चे कॅरेक्टर सुचत गेले तसे घडवल्यासारखे वाटते.
आशिकी-२: अगदी येता जाता थोडाफार पाहिला. पिक्चर काही विशेष वाटला नाही पण मुख्य हीरो व हीरॉइन आवडण्यासारखे आहेत. तीच ती रडक्या चालीची 'तू मेरी इबादत है' छाप गाणी मात्र डोक्यात जातात.
टेबल नं २१ - सुरूवातीला पकड घेत नाही, पण शेवटी चांगला वेग आहे.
Crossing Over - एकदम जबरदस्त चित्रपट आहे. साधारण स्टाईल 'क्रॅश' सारखी. आधी पाहिला होता पण पुन्हा पाहिला.
उसगावकरांसाठी - यातील पहिले दोन, व हा शेवटचा नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग वर आहेत.
देसी डीव्हीडी
(मुक्तसुनीत यांच्या प्रतिक्रियेला हा प्रतिसाद. ती प्रतिक्रिया सोडून येथे वरती का दिसतो कळत नाही)
देसी डीव्हीडी रेंटलवरून :). ते सगळीकडे मिळतीलच असे नाही, पण स्ट्रीमिंग वाल्यांना ते तीन अगदी सहज उपलब्ध आहेत म्हणून तसे लिहीले. (बाय द वे स्ट्रीमिंग वरचा 'डर' आणि 'मोहब्बते' (पुन्हा एकदा) पाहण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे. पूर्ण झाल्यास त्याची फळे येथे दिसतीलच :) )
हा सिनेमा पाहिल्यानंतर मौशुमी
हा सिनेमा पाहिल्यानंतर मौशुमी ला अजून कॉमेडी रोल्स मिळायला हवे होते असे वाटले.
"नङ्ङ्ङ्ङ्गा देखा है आप ने मुझे... वस्त्रहीन?" हा सिनेमातला सर्वात मेमोरेबल सीन.
नांदी
हृषिकेश जोशी लिखित आणि दिग्दर्शित नांदी हा बहुचर्चित प्रयोग पाहिला. उत्तम निर्मितीमूल्ये, गाजलेले कलाकार आणि त्यांचा चोख अभिनय आणि हमखास टाळ्या मिळतील अशा नाटकातील उतार्यांची, प्रसंगांची निवड- हे सगळे कमकुवत संहिता आणि आत्मा हरवलेली कथा यांना तारुन नेऊ शकत नाहीत. नवीन काहीतरी करावे हा या तरुण मंडळींचा ध्यास कौतुकास्पद आहे, पण ते नवीन रचलेले, मांडलेले एकदा, दोनदा तपासून बघून मग ते प्रेक्षकांपुढे आणावे हा धीर यांच्याकडे दिसत नाही. त्यामुळे 'हातभर दाढी, आतमध्ये बुवा नाहीच' असे काहीसे या नाटकाबाबत वाटले. शरद पोंक्षे, तेजस्विनी पंडीत, स्पृहा जोशी, प्रसाद ओक, सीमा देशमुख, स्वतः हृषिकेश जोशी, अविनाश नारकर -अशी मोठी नावे आणि कीचकवधापासून ते बुद्धिबळ आणि झब्बू किंवा चाहूलपर्यंतच्या नाटकांतील स्त्रीपुरुषसंबंधावर प्रकाश टाकणार्या प्रसंगांचे सादरीकरण - त्यातल्या सर्वांचाच कसदार अभिनय - पोंक्षेंच्या 'बॅरिस्टर' मधल्या प्रसंगाचा खास उल्लेख करुन - ही सगळी पब्लीकला हमखास आवडणारी नोस्टाल्जिक मिसळ हृषिकेश जोशीने कल्पकतेने रंगमंचावर आणली आहे. मराठीतल्या मोठ्या नाटक निर्मात्यांची त्याने या नाट्काच्या निर्मितीच्या निमित्ताने मोट बांधली आहे. स्टेजवर मल्टिमिडीयाचा वापर हाही एक नवीन प्रयोग आहे. 'प्रिये पहा' सारख्या पदांचा समावेश, आप्पासाहेब-कावेरी, बॅरिस्टर- राधाक्का, विद्यानंद, सिंधू, गीता.. हे सगळे गुदगुल्या करणारे, प्रसंगी डोळ्यांच्या कडा ओलावणारे थालीपीठ शेवटी अगदी सपक, वातड वाटले. पन्नाशीच्या आसपासच्या आणि पुढच्या शहरी वर्गाला- ज्यांना वाहून गेलेल्या पण्याचे फार कौतुक असते आणि त्याबाबत फार हुरहुर वाटत असते- या प्रयोगाचे फार कौतुक वाटेल - मला स्वतःलाही सवाई गंधर्व महोत्सवात पहाटे तीन-चारच्या सुमारास कडाक्याच्या थंडीत गर्दीत उभे राहून ऐकलेले कारेकरांचे 'प्रिये पहा' आट्वले. पण ते तेवढेच. चोवीस तासानंतर इतर काहीच लक्षात राहिले नाही. रव्याच्या लाडवातील काजू-बेदाणे खुसखुशीत असावेत पण मूळ रवाच कच्चा आणि किंचित वाशेळा असावा असे काहीसे वाटले. या नाट्यप्रयोगाबद्दल फार अपेक्षा बाळगलेल्या असल्यामुळे हे सगळे अधिक गडदपणे वाटले.
प्रतिसाद
हा प्रतिसाद रोचक वाटला. तुम्ही "नांदी" या शीर्षकाने केलेल्या प्रस्तुत प्रयोगाचा हा प्रकार समजून घ्यायचा प्रयत्न केल्यानंतर प्रामाणिक प्रतिक्रिया दिलेली आहे असं वाटलं.
काही प्रश्न :
१. प्रस्तुत प्रयोग म्हणजे एकसलग असं कुठलं कथानक नसून वेगवेगळ्या नाटकांमधले प्रसंग आहेत असं दिसतं. प्रयोगाच्या (तुम्हाला जाणवलेल्या) अपेशाच्या मागे त्याचं हे fragmented असणं बव्हंशी जबाबदार आहे का ?
२. .... की जे तुकडे निवडले ते पुरेसे दर्जेदार किंवा पुरेसे अर्थपूर्ण असे नव्हते ? तसं असेल तर काहीशा अपरिचित/कमी लोकप्रिय/नवीन परंतु दर्जेदार असं काही असायला हवं होतं का ?
३. .... की निवडलेले तुकडे चांगले; पण नटांचा अभिनय/गायकांचा परफॉर्मन्स कमी पडला ?
४. संगीत/गद्य , विनोदी/गंभीर असं जे मिश्रण करण्यात आलं ते रसभंग करणारं वाटलं काय ? एखादा मूड तयार होतोय त्याची परिपूर्ती न होताच तो संपतो आणि नंतर काहीतरी विसंगत पहावं लागलं हे नीटसं पटलं/आवडलं नाही का ? "व्हरायटी शो"च्या धर्तीचं मनोरंजन परंतु मग काहीसा उथळपणा, अशी प्रतिक्रिया होती का?
काही उत्तरे
'नांदी' मध्ये कीचकवध ते चाहूल मधील (लेखकाच्या मते) स्त्रीपुरुष संबंधांवर प्रकाश टाकणार्या प्रवेशांची कडी आहे. भरतमुनी कुठल्याशा मराठी चॅनलवर मुलाखत द्यायला येतात आणि त्या मुलाखतीतून हे सगळे उलगडते अशी ही कल्पना आहे. कितीही प्रयत्न केला तरी अशा प्रवेशांचं फ्रॅगमेंटेड असणं टाळता येण्यासारखं नाही. म्हणून मग मला यात संगती पाहिजेच असा आग्रह कशासाठी हे कळेना. या सगळ्या प्रवेशांना बांधून ठेवणारं सूत्र (भरतमुनींचं आठवणींचं संग्रहालय) हे तर मला कमालीचं कृत्रीम वाटलं.
या तुकड्यांच्या निवडीबाबत लेखकाला काही फारसा चॉईस नव्हता असं मला वाटतं. चांदीचा वर्ख लावून भूतकाळ-नोस्टाल्जियाच पेश करायचा आहे तर मग त्यात 'अश्रूंची झाली फुले' पाहिजे, 'नटसम्राट' पाहिजे, 'बॅरिस्टर' पाहिजे - याला इलाज नाही. हा गल्ला भरण्यचा विषय आहे आणि इतके खर्चिक नाटक रंगमंचावर आणायचे म्हटल्यावर हा विचार पाहिजेच. (मग हे सगळे कडबोळे करण्याचा अट्टाहास कशासाठी हा भाग वेगळा)
अभिनय-परफॉर्मन्स विषयी मी आधी लिहिले आहेच. तो अगदी क्लास- अरभाट होता. त्यात वादच नाही. प्रयोगाला आलेल्या शंभरांपैकी नव्वदांनी तरी 'पैसा वसूल' म्हणून टाळी वाजवली असणार. एक टाळी मीही वाजवलीच.
जुन्या काळी जेंव्हा भारतात व्हीडीओ प्लेअर पहिल्यांदा आले तेंव्हा हिंदी गाण्यांच्या कॅसेटस भाड्याने मिळत. त्या काळात ती गाणी बघायला बरी वाटत.आज ती कल्पनाही असह्य वाटते. 'नांदी' बघितल्यावर मला तसले काहीतरी वाटले. दुसरी एक दुष्ट, खाजरी शंका अशी की हृषिकेशने हे सगळे 'एनाराय' आड्यन्सला डोळ्यासमोर ठेवून केले आहे की काय? शेवटी ही नांदी बीएमेम च्या उरुसात सादर करणे हेच ध्येय त्याने ठेवले आहे की काय?
सहमत
हृषिकेश पण टाळ्या वसूल करण्यासाठी एका पाठोपाठ एक वनलायनर मारत जातो.
भरत मुनींची मुलाखत हा प्रकारच फसलेला आहे, कारण त्यांना 'नाटक' सोडून स्त्रीपुरुष संबंधांवर प्रकाश टाकण्याला जुंपले आहे. ('भरत मुनींची मुलाखत' याऐवजी 'वात्सायन - भरत संवाद' अशी युक्ती वापरली असती तर मजा आली असती.कदाचित)
भरत मुनी आणि निवेदिका यांना रंगमंचावर प्रयोगभर अवघडून इथे तिथे बसावे लागते , (डावा कोपरा बहुतेक वेळा), दोघांना मंचावर वावरण्यास अजून थोडा वाव द्यायला पाहिजे. हे म्हणजे जसं संगीत नाटकात एक गातोय आणि बाकी कसेबसे उभे आहेत , तसं प्रयोगभर वाटत राहतं.
नेपथ्य उत्तम आहे , पण बहुतेक प्रसंगात मध्यभागी असलेला एक खांब गदगदा हालत राहतो. विशेषतः नटसम्राट च्या वेळी.
पार्श्वसंगीत उत्तम वाटले, शेवटची रिमिक्स नांदी (?) विशेष छान.
सहमत
नेपथ्य उत्तम आहे , पण बहुतेक प्रसंगात मध्यभागी असलेला एक खांब गदगदा हालत राहतो. विशेषतः नटसम्राट च्या वेळी.
सहमत आहे. बहुदा पहिला-दुसरा प्रयोग असल्याने तेवढी सफाई आली नसावी. पण ते एकूण इतके फ्लॅट इतक्या वेळा लावणे-काढणे हे काही खरे नव्हे. त्याला काहीतरी दुसरा पर्याय शोधायला हवा होता. (पांढर्या रंगाचे फ्लॅटस अंधारात हलवताना दिसतात हेही आधी ध्यानात यायला पाहिजे होते)
'ठष्ट' सहन केलं.अवांतरः
'ठष्ट' सहन केलं.
अवांतरः मराठी वाहिन्यांचा सुकाळ झाल्या झाल्या त्यांतल्या कुठल्यातरी एका वाहिनीवर (बहुदा ई टीव्ही मराठी) 'पळसाला पाने पाच' नावाची एक टीव्ही सिरियल लागे. ती संजय पवार यांनी लिहिलेली होती. एका फ्ल्याटवर पेइंग गेस्ट म्हणून राहणार्या पाच तरुण मुली (एक घटस्फोटिता, एक सो-कॉल्ड मॉडर्न मुलगी, एक भाबडी विद्यार्थिनी.... इ.) आणि एकमेकींवर आदळून त्यांच्यात होत गेलेले बदल + मैत्री अशी काहीशी न-गोष्ट होती. (पोट-अवांतरः सावित्रीच्या मुली आम्ही, आम्ही तिच्या नाती' असं नितांतसुंदर, फुकट गेलेलं शीर्षकगीत त्या मालिकेला होतं.)
तीच ती न-गोष्ट 'ठष्ट'मधे वापरलेली दिसतेय.
स्त्रीवादी विचारांचा प्रभाव पडून एका होस्टेलातल्या एका विवक्षित खोलीतल्या मुलींची लग्नं मोडतात. जसजसं नाटक पुढे जातं तसतसे, प्रारंभी अमंगळ-अभद्र वाटणारे आधुनिक स्त्रीवादी विचारच सर्वांना तारणहार वाटू लागतात... असं काहीतरी पवारांना म्हणायचं असावं. (पुन्हा अवांतरः हे नाटक स्त्रीवादी असेल, तर मी पुरुषप्रधान समाजात परमपूज्य पुरुषांच्या पायांशी बसण्याची लायकी नसलेली एक नादान बटकी आहे.) 'आम्ही पाहा कसे स्त्रीवादी' असली टिमकी वाजवण्यापलीकडे नाटकात काहीही घडत नाही. दारू-सिगरेट पिणे, भोक-पुरुष-शोषक-बाई-शोषण-भोक-दग्ध-झोपणे-भोक... असली अर्थहीन-निर्जीव डॉयलॉगबाजी करणे हा यांतल्या दोन तथाकथित स्त्रीवादी पात्रांचा मुख्य उद्योग आहे. हेमांगी कवी ही सहजसुंदर काम करणारी गुणी नटी वगळता इतर प्रत्येक नटीच्या तोंडात तत्काळ बरासा बोळा कोंबून त्यांना तिथेच विंगेशी बांधून घालावं आणि त्यांच्याच नाटकाचं रेकॉर्डिंग त्यांना चांगले आठदहा तास ऐकायला लावावं अशी क्रूर उबळ वारंवार येत राहते.
ती उबळही अखेर प्राण सोडते, तेव्हा कधीतरी नाटक संपतं. आपापल्या जबाबदारीवर बघायला जावा.
आजोबा या सुजय डहाके
आजोबा या सुजय डहाके दिग्दर्शिक सिनेमाची झलक पाहिली. यूट्यूबचा दुवा.
सुजय डहाकेकडून अपेक्षा आहेतच. उर्मिलाही आवडते. ट्रेलरमधले तिचे उच्चार, बोलण्याची पद्धतही आवडली. हा चित्रपट ज्या संशोधकावर आधारित आहे, त्या विद्या अत्रेय यांच्या कामासंदर्भात काही दुवे:
http://www.conservationindia.org/author/vidyaathreya
http://www.projectwaghoba.in/
http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20120407/4984385079632239848…
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/--/articleshow/…?
(विद्या अत्रेय यांच्या "बर्या अर्ध्या"शी मैत्री असल्याने चित्रपटाबद्दल अधिक कुतूहल आहे.)
बघणार...
आवडीचा विषय. नक्कीच बघणार. उर्मिला मातोंडकरचे मराठी (मराठी असूनही हिंदीत वावरलेल्या इतरांचे वाटते तसे) कृत्रीम वाटत नाही. एक्सायटेड (उत्तेजित हा शब्द मुद्दम टाळून) प्रसंगात बाकी ती रामगोपालवर्मट ओव्हरबोर्ड वाटते. अर्थात नुसती झलक बघून असे काही बोलणे योग्य नाही, मगर यूंही..
हृषिकेश जोशीचे काम आवडते. 'आई घातली आणि फॉरेष्टमध्ये आलो' या संवादाचे टायमिंग जबरदस्त. आता सेन्सॉरवाल्यानो हा संवाद कापू नका साल्यानो.. 'तुमचा पट्टेवाला बिबळ्या' ही अभ्यासपूर्ण चूक वाटते. तसे असेल तर कौतुक.
बघणार. कधी रिलीज होतो आहे?
अबाउट एली
अबाउट एली (२००९ ) (१२ अवोर्डस आणि काही नामांकने ) दिग्दर्शक असगर फरहदी . इराण, लॉ स्कूलचे माजी विद्यार्थी असलेली ३ जोडपी सहकुटुंब केस्पियन समुद्रकिनारी सहलीला येतात . सेपिदेह नावाची स्त्री आपल्या घटस्फोटीत मित्र अहमदला भेटायला तिच्या छोट्या मुलीच्या शिक्षिकेला एलीला घेऊन येते . त्यानंतर सगळे मजेत , हास्यविनोदात असताना अनपेक्षित ट्विस्ट येतो .मग मूल्यांचा चिरंतन संघर्ष सुरु होतो . सत्य , असत्य आणि घडलेल्या घटनेची जबाबदारी घेणे , यातले नाट्य , अभिनय आणि रहस्य खिळवून ठेवणारे आहे . या कुटुंबांचे खेळीमेळीचे संबंध नंतर तणावाच्या स्थितीत होणारे उद्रेक आणि एकमेकांना सांभाळून घेणे हे सगळ्यांनीच अगदी रसरशीत , जिवंत केले आहे .एली अतिशय निष्पाप ,गूढ अन अलौकिक सुंदर दिसते . समुद्राची गंभीर गाज आणि लाटांचे आपणच जणूकाही पाण्यात गटांगळ्या खातोय असे प्रत्ययकारी चित्रण धडकी भरवणारे आहे .एक चित्तथरारक अनुभव .
"एंड ऑफ वॉच"
जेक गायलन्हाल आणि मायकल पेना यांच्या प्रमुख भूमिका असलेला "एंड ऑफ वॉच".
दोन पोलिस ऑफिसर्स, त्यांचं एकत्र कारमधे फिरतानाचं, काम करतानाचं दृढ बनत गेलेलं नातं, लॉस एंजल्समधील गरीब वस्ती आणि गुन्हेगारी वातावरण, पोलिसी जीवनातली हिंसा हे आता काहीसे परिचित झालेले घटक इथे पुनरावृत्त होतात. मात्र असं असूनही, चित्रपटाचा सगळा भर हा पोलीसामधल्या माणसाचं, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं चित्रण करण्याकडे असल्यामुळे चित्रपट निश्चितच बांधून ठेवणारा वाटला.
अंजाम
काल 'अंजाम' हा माधुरी दिक्षित आणि शहारूखचा चित्रपट पाहिला. मेनस्ट्रीम बॉलिवुड मधला एक महान चित्रपट आहे हे मला कालच कळलं.'चने के खेत मे' हे गाणं आणि त्यातला माधुरीचा नाच आधी अनेकवेळा 'चित्रहार' रंगोली' वगैरे मध्ये पाहिला होता. काल सहज म्हटलं पाहू तर खरं हा चित्रपट काय आहे ते...अपेक्षाभंग अजिबात झाला नाही. या चित्रपटाची शेवटची ~४५ मिनिटं म्हणजे प्रामुख्याने माधुरीने घेतलेला बदला-हा भाग तर जरूर पहा. एका प्रसंगात शहारूख व्हीलचेअरवर जवळजवळ निश्चल अवस्थेत आणि माधुरी तलम साडी नेसून त्याला 'बरं' करायच्या उद्देशाने एक गाणं गाते आणि नाचते. आणखीनही असे उल्लेखनीय सीन आहेत...ते ज्यानी त्यानी पाहूनच त्यांचा आनंद घ्यावा.
खूप दिवसांनी घेतलेला प्युअर बॉलिवुडचा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. करमणूक करण्याचा उद्देश येनकेनप्रकारेण साधला या चित्रपटाने.
कुणी या चित्रपटाचा खास पंचनामा केला असेल तर वाचायला आवडेल.
सुखांशीss भांssडतो आम्ही sssss
सुखांशी भांडतो आम्ही म्हणे ! मग भांडा की कडाकडा नाही कोण म्हणतंय ? त्यात पार्श्वसंगीतात मधूनच अटॅक
आल्यासारखे रटाळ मालिकेच्या शीर्षक गीतावाणी सुखांशीss भांssडतो आम्ही sssss असा सुरेश वाडकरांच्या
बकरीसारख्या कंटाळवाण्या आवाजातला टाहो कशाला ?? ते कुणीही नथ्थु खैऱ्याने म्हटले असते तरी फरक पडला नसता .
चांगल्या होऊ शकणार्या कथेला ठारमेलोड्रामॅटिक ठिगळे लावणे बहुदा अनिवार्य असावे . श्रोते बहिरे असल्यागत गिरीश ओक
वगळता इतर कलावंत केकाटत होते . चिन्मय मांडलेकर यांचा मनोरुग्ण ठीक असून अधून मधून लाउड वाटला .
गिरीश ओकचा मनोचिकित्सक संयमित आणि ठीक आहे . बाकीचे बरेच्बरे आहेत . शेवट अगदी टिपिकल केला आहे . यात
नक्की कुठला सामाजिक प्रश्न हाताळला आहे ? हे नाटक म्हणजे अनेक सामाजिक समस्यांचा होल्डऑल झालेला आहे .
शेवटी अम्येरिक्येला जाणाऱ्या एकुलत्या लाडोबा बाळाशी आईबाबाचे ठार्मेलोसेंटी संवाद ऐकून अनावर हसू येऊ लागले .
ये कहा आगये हम ?मनोरुग्ण देखते देखते ? असे वाटले ब्वा :) या नाटकाला १२ / १३ पुरस्कार मिळालेले आहेत .
सर्व प्रेक्षकांनी समोसे विकत घेऊन हॉलमध्येचं हादडेपर्यंत मध्यंतर संपवायचे लक्षण दिसेना . आमचे कंटाळून मतपरिवर्तन
होण्यात होते इतक्यात नाटक सुरु झाले . त्यामुळे आम्ही नाईलाजाने चरफडत एसी हॉलमध्ये कोंडलेला समोश्यांचा संतापजनक
दर्वळ इन्हेलत नाटक बघत बसलो .
तसे नाटकातले काही संवाद चतुर आणि रंजक आहेत .केवळ मनोरुग्ण आणि त्याची चिकित्सा हा विषय धरून ठेवायला हवा होता .
जे आपले मनोरंजन करून घेण्यास स्वमर्थ आहेत ते ते कुठेही मज्जेत असतात . त्यामुळी आम्हीही मनोरंजलो ,गांजलो .
तात्पर्य : ज्यांची मुले अम्येरीक्येत फक्त बख्खळ पैसा कमवायला गेलीत त्यांच्या आईबापांनी त्यांना फक्त वखवख शिकवली आहे .
इति अभिराम भडक मकर . उप तात्पर्य : जो पिंपळगावातच राहिला तोचि भला . इति आम्ही .
टीप : सुरेश वाडकरांची काही गाणी अप्रतिम आहेत ती आवडतात . इतर गाण्यात बकरीची आठवण होते ब्वा , जाउद्या .
सहमत
सुरेश वाडकरांची काही गाणी अप्रतिम आहेत ती आवडतात . इतर गाण्यात बकरीची आठवण होते
सहमत आहे.
ज्यांची मुले अम्येरीक्येत फक्त बख्खळ पैसा कमवायला गेलीत त्यांच्या आईबापांनी त्यांना फक्त वखवख शिकवली आहे .
आयायाया! ठार्मेलोच. भडक मकर, दुसरे काहीच बरे सुचत नसेल तर म्हातारी माणसे तरुण पिढीला कसा वात आणतात हे सांगणारे 'छाया संध्या' या नावाचे नाटक लिहा....
नवा गडी नव राज्य...
खुप गाजत असलेल (भरपुर प्रयोग होत असलेल)..न.ग.न.रा. पाहिल... नाटकाला अमिताभच्या किन्वा शाहरुख्च्या सिनेमाला असती तशी गर्दी होती. नाटक तसे ठीकठाकच आहे..नवरा-बायको सम्बन्ध .. नवरयाने बायकोचा सन्शय घेणे..शेवट गोड होणे असा एकन्दरीत बाज आहे.
प्रिया बापट खुप- फ्रेश दिसली.. कहि बोल्ड सन्वाद स्त्री पात्राना दिले आहेत.बायकोने "आज मला दारु प्यायची आहे" अशी नवरयाकडे विचारणा करणे ही बदलत चाललेल्या जीवनशैलीचे द्रोतक म्हणावे काय?
'ये जवानी है दिवानी' पाहिला.
'ये जवानी है दिवानी' पाहिला. आयन मुखर्जी एवढा कंटाळवाणा चित्रपट बनवेल असं वाटल नव्हतं. तीच ग्राउंडेड हिरवीण, तोच ह्यापी गो लकी हिरो, तेचते ट्रेनने पर्यटनाला जाणे आणि तेचतेचते इंटरवलनंतर लग्नघर. DDLJ पासुन १७ वर्ष झाली तरी हेच पाहतोय. कंटाळा आला आता. नशीब पैसे देउन चित्रपटगृहात नै गेले, युट्युबवरच पाहीला, त्यामुळे थोड्या कमी शिव्या घालतेय.
चित्रपटाचा बेस्ट पार्ट म्हणजे फारुख शेखचे दोन सीन. गाणी अबरप्टली, उगाचच चालु होतात आणि बत्तमीज दिलशिवाय एकही मलातरी ऐकायला आवडलं नाही. बाकी सो कॉल्ड ह्यापी ऐँडीग दाखवण्यापेक्षा रणबीरसाठी त्याची कलीगच सोलमेट म्हणुन चांगली होती आणि दिपीकाला तीचा मित्र (सिकंदर खेर??) आहेच.
मॅन ऑफ स्टील पाहिला.
मॅन ऑफ स्टील पाहिला. सुपरमॅनची हिष्ट्री मस्त रंगवली आहे. बाप जोर-एल काही ठिकाणी येतो पण जनरल झॉड आधी पाहिल्याचे आठवत नाही.रसेल क्रो तेवढ्यात भाव खाऊन गेलाय. शिवाय चिरपरिचित क्रिप्टोनाईट घेणारा लेक्स ल्यूथरसुद्धा दिसत नाही या पिच्चरमध्ये. ३डी इफेक्ट्स तर जब्रीच आहेत. सुपरमॅन त्याच्या तुल्यबळ क्रिप्टोनियन्सबरोबर लढाई करतानाचे सीन्स एकदम खंग्री. सुपरमॅनमध्येही गुंतागुंत दाखवता येते हे यशस्वीरीत्या सिद्ध करणारा पिच्चर म्हणून याचे महत्व आहे नक्कीच. पैसा जवळपास पूर्णच वसूल.
मॅन ऑफ स्टील ची सर्वात
मॅन ऑफ स्टील ची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे आजपर्यंत सुपरमॅन ची शेकडो कॉमिक्स आहेत, ४-५ चित्रपट आहेत, हे सर्व baggage बाजूला ठेवून परत पहिल्यापासून फार छान सुरवात केली आहे. माझ्या दुर्दैवाने हा चित्रपट बघताना सुमारे दीड तासाने चित्रपटगृहात आग लागली आणी आम्हाला बाहेर पडावे लागले. आता शेवटचा १ तास बघण्यासाठी परत पहिला दीड तास बघीन असे वाटत नाही. इंटनेटवर उपलब्ध झाला तर बहुतेक उरलेला बघीन पण त्यात ३डी ची मजा नाही.
veiled rebecca
मुखपृष्ठावरचे बर्निनीचे शिल्प पाहून सालारजंगमधील veiled rebeccaची आठवण झाली. दोन्ही शिल्पकृती अमेझिंग आहेत.
'वेइल्ड् रिबेका' आणि इतर इतालीय शिल्पे
'रिबेका'चे सालारजंगमधले शिल्प ज्योवानी बेन्त्सोनी (१८०९-१८७३) या शिल्पकाराचे आहे.
त्याचाच समकालीन 'ज्योवानी स्त्रात्सा'चे (१८१८-१८७५) हे पुढील शिल्प पाहा.
'वेइल्ड् वर्जिन्' १, २, ३
.
किंवा त्यांच्याही आधी अन्तोनिओ कोर्रादिनी (१६६८-१७५२) ची ही पुढील शिल्पे -
'वेइल्ड् ख्राइस्ट्' १, २, ३, ४
'ला पुदीत्स्या' १, २, ३
शतरंज के खिलाडी
महिनाभरापूर्वी शतरंज के खिलाडी पाहिला. तो पूर्ण समजला असे म्हणण्याचे धाडस करु शकत नाही. पण समजलं ते असं :-
प्रेमचंदांच्या लघुकथेवर चित्रपट आधारित आहे. १८५६ चा,"राष्ट्रिय उठाव" किंवा "शिपायांच्या बंडा"च्या थोडासा आधीचा.
चित्रपट म्हटला खुसखुशीत आहे. साधा आपला एका लायनीत जात राहतो. ती लाइन कुठली? तर बुद्धीबळ खेळणारे दोन बड्या घराण्यातील उमराव स्टाइल जागिरदार वगैरे.
त्याच वेळी नवाब , त्याचं जप्त होणार राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनीचा वाढता प्रभाव.
थेट संबंध नसलेल्या दोन गोष्टीवर चित्रपट चालतोय.
तत्कालीन भारतीय वागणुकीवर्,स्वभावावर व्यंगात्म टिका असावी असं वाटलं.
अमिताभ बच्चन ह्याचं निवेदन अपेक्षेप्रमाणेच झकास.
(तो पर्फेक्ट आहे, जो शब्द जसा बोलायला हवा, तो तस्साच बोलतो. अगदि नेमकं बोलतो. कमीही नाही, अधिकही नाही. ही इझ ग्रेट.)
.
मला जाणवलेल्या काही गोष्टी. "पिरियड फिल्म" असली तरी नुसताच पोषाखीपट, श्रीमंती दाखवून तिकिटं विकायचा उद्देश नाही.
काहीतरी स्टेटमेंट समोरच्याला करायचय, पिक्चर काढणार्याला काहीतरी सांगायचय/सुचवायचय हे जाणवतं.
काय सुचवायचं असेल ?
दोन उमराव आहेत. एक संजीव कुमार दुसरा सईद जाफरी. दोघेही टंगळमंगळ करणयत, वाडवडिलांची किर्ती सांगण्यात वेळ घालवतात. दोघांना बुद्धीबळाचे वेड आहे.
(किंवा व्यसन आहे, आपण कमअस्सल होत आहोत, निर्बल होत आहोत्म, हे सुद्ध ते त्या व्यसनापायी विसरतात.स्वतःला असहाय्य अवस्थेत पोचलेलं पाहतात.)
१८५०च्या दशकापर्यंत नेमकी भारतीय पब्लिक कशी भुसभुशीत झाली होती, ब्रिटिशांनी अल्लाद आख्ख देश पोखरुन काढल्यावर त्या अजगराच्या
विळख्यात हे निर्बल, दुर्बल भारतीय कसे निपचित पडले होते; नि मधूनच पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण काढून स्वतःला थोर समजायचे;
व ते करताना केविलवाणे दिसायचे हे जाणवते.
तिकडे नवाब त्याच्या काव्य गुणात वगैरे मश्गुल आहे. कला, रंजन वगैरे कितीही महत्वाच्या गोष्टी असल्या, तरी त्याच्या आडोश्यानं आपली नि:कर्तबगारी झाकता येत नाही.
जर राज्यप्रमुखच हतवीर्य* असेल , गुंगून गेलेला असेल तर आख्खे राज्य परचक्रात जाते. हे अचूक दाखवलय.
ब्रिटिश खमके आहेत. पराक्रमाने त्यांनी बरच काही मिळवलय. ते मश्गुल झालेत असं नाही. ते आपल्या सीमा वाढवताहेत. आहेत त्या मजबूत करताहेत.
त्यांच्यासमोर सुस्त, निद्रिस्त अशा भारतीयांचा, भारतीय elitesचा पाड तो काय लागणार?
तैनाती फौजा घेताना सार्वभौमत्वालाच नख लागतय हे ज्यांना जाणवलं नाही, त्यांना दरवेळी कंपनी सरकारला वाअरसा हक्क, राजय्कारभार ह्याबद्दल विनवण्या करतना, परवानगी घेताना काहिच अपमान वाटला नसावा का असं वाटतं.
सिनेमातील घटना वगैरे मी मुद्दमच सांगत नाहिये. सिनेमा पाहून जे काय जाणवलं ते लिहिलं.
तुम्हीही पाहिला असल्यास मला समजलेलं योग्य आहे का, तुमच्यासारखच आहे का हे ऐकायला आवडेल.
.
इन अ नटशेल, पुढील वाक्याची यथार्थतता चित्रपट पाहून पटते. :-
हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते तर ते फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असता कोणते फुटावयाचे मातीचे की लोखंडाचे हे ठरलेले आहे.
थोडक्यात
"अॅडॅप्टेशन"
२००२ चा "अॅडॅप्टेशन". याबद्दल इतरांकडून ऐकलं होतं. पहायचा योग आज आला.
चित्रपटात निकलस केज, मेरील स्ट्रीप, चार्ली कूपर यांच्यासारखे नावाजलेले लोक अभिनयाकरता आहेत परंतु या सिनेमाचा हिरो पटकथालेखक चार्ली काऊफमन्, यात शंका नाही. सिनेमा आहे पटकथालेखकाला आलेल्या "रायटर्स ब्लॉक" बद्दलचा. निर्मितीप्रक्रियेतल्या आव्हानांचाचा सिनेमा कसा बनू शकतो ? याचं हे उत्तम उदाहरण आहे. काऊफमनच्या कामाचा परिचय "बीईंग जॉन माल्कोविच" या सारख्या भन्नाट सिनेमाद्वारे झालेला होता, त्याच्या भन्नाटपणाचाच नवा प्रत्यय देणारं हे प्रकरण आहे. वास्तव आयुष्यातल्या अनेक संदर्भांना काऊफमन सिनेमात आणतो आणि त्यांना चित्रपटाच्या मिथक कथानकात बेमालूम मिसळून टाकतो.
चित्रपटाची जन्मकथाच मजेशीर आहे. काऊफमनवर "The Orchid Thief" नावाच्या एका पुस्तकावर पटकथा लिहिण्याची जबाबदारी होती. काऊफमन ते करताना अडकला. आणि मग मूळ काम मागे राहिलं आणि या अडलेल्या बाळंतपणावरच सिनेमा लिहिला गेला. सिनेमात खुद्द चार्ली काऊफमन, हे पुस्तक, त्या पुस्तकाची लेखिका ही पात्रं आणि वस्तू आहेत. (मात्र त्यांच्या भूमिका अर्थातच निकलस केज आणि स्ट्रीपबाई यांनी केल्यात. ) या व्यतिरिक्त काऊफमन "डॉनल्ड काऊफमन" या स्वतःच्या जुळ्या भावाचं - जो आणखी एक पटकथालेखकच आहे - त्याचं पात्र योजतो. ("छाया-व्यक्ती" या प्रकाराचं हे उत्तम उदाहरण. अन्य उदाहरणे : जॉन क्विक्झोट आणि सँको पांझा.)
चार्ली काऊफमनचा हा विलक्षणपणा कुठवर जावा ? "अॅडॅप्टेशन" या सिनेमाच्या पटकथेचं श्रेय चार्ली आणि डॉनल्ड काऊफमन अशा दोन लोकांना दिलेलं आहे! इतकंच नव्हे तर याची पटकथा ऑस्कर नॉमिनेशनला गेली (आणि तिला पुरस्कारही मिळाला !) तेव्हा "डॉनल्ड काऊफमन" या पहिल्यावहिल्या "खोट्या" माणसाला ऑस्कर नॉमिनेशन मिळल्याचा इतिहास घडला.
असो. सिनेमा मनोरंजक आहेच पण निर्मितीप्रक्रियेबद्दलचे प्रश्न उभे करणारं , ते खेळकरपणे मांडणारं आणि तरीही उत्कंठावर्धक असं हे प्रकरण आहे.
अवांतर : निर्मितीप्रक्रियेला भिडणारं, निर्मितीप्रक्रिया हेच जणू मध्यवर्ती पात्र असण्याचं आपल्या भाषेतलं उत्तम उदाहरण म्हणजे "फायनल ड्राफ्ट" हे नाटक.