'थांबा!'.. तुम्ही ही पुस्तकं वाचू शकत नाही!!
हिंदू या दैनिकात काही दिवसांपूर्वी हसन सुरूर यांचा You can't read this book हा लेख प्रकाशित झाला होता. गेल्या आठवड्यात 'प्रहार'मध्ये 'थांबा!'.. तुम्ही ही पुस्तकं वाचू शकत नाही!! हे त्याचं मराठी रूपांतर प्रसिद्ध झालं आहे. मूळ लेखाचं शीर्षक हे निक कोहेन यांच्या 'You Can't Read This Book: Censorship in an Age of Freedom' या पुस्तकावरून घेतलेलं आहे. त्या पुस्तकात ब्रिटनमधल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोण आणि कशी गळचेपी करत आहे याचा लेखाजोखा आहे. त्याचा थोडक्यात परिचयः http://www.guardian.co.uk/books/2012/feb/12/cant-read-book-cohen-review
भारतात बंदी असलेली पुस्तकं किंवा वेगवेगळ्या कारणास्तव अभ्यासक्रमातून काढलेली पुस्तकं वगैरेंचा हसन सुरूर यांनी आपल्या लेखात आढावा घेतलेला आहे. महाराष्ट्राविषयी असं कुणी लिहिलं आहे का ते या निमित्तानं पाहायला आवडेल. वेगवेगळ्या वेळी कोणत्या मराठी पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी झाली, आज कोणत्या मराठी पुस्तकांवर बंदी आहे याची माहिती कुणी देऊ शकेल का?
प्रतिक्रिया
चांगला लेख
लेख रोचक आहे. मूळ इंग्रजी लेख लवकरच वाचतो.
आंबेडकरांचं "रिडल्स इन हिंदुइजम" आणि जेम्स लेनचे शिवाजीविषयक लिखाण यावरून तोडफोड/प्रसंगी मारहाण/मोर्चे/घोषणाबाजी वगैरे झालेलं आहे नि हा इतिहास सर्वपरिचित आहे. मात्र या प्रकाशनांवर अधिकृत बंदी आहे की नाही याची नक्की माहिती नाही. आनंद यादवांच्या पुस्तकातले उतारे वारकर्यांच्या निषेधावरून काढण्यात आले होते काय ? किंबहुना आनंद यादवांचं प्रकरण किंवा ८० च्या दशकात शालेय इतिहासात "मुहम्मद पैगंबराने केलेलं पलायन" च्या ऐवजी "स्थलांतर" असं म्हणण्याचा दबाव ही सगळी पब्लिक सेन्सॉरशिपची उदाहरणं. अलिकडे "मुक्त शब्द"च्या दिवाळी अंकांवरील नग्न स्त्रीचं मुखपृष्ठ बदलण्यात आलेलं होतं ;मात्र ही काही लिखाणावरची बंदी नव्हे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
बंदी म्हटली की जेम्स लेन चं
बंदी म्हटली की जेम्स लेन चं पुस्तक पटकन आठवत. असो अनुवादीत लेख रोचक आहे.
इथे दिल्याबद्दल आभार
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
यादीत नसलेली ३ पुस्तके
My Days With Nehru by M. O. Mathai
आणि
The Nehru Dynasty: Astro-political Portraits Of Nehru, Indira, Sanjay & Rajiv by K. N Rao
या दोन पुस्तकांवर भारतात पंडीत नेहरुंच्या काही वादग्रस्त पैलूंना उघडे पाडले असल्यामुळे कायमची बंदी आहे.
कोणाकडे असतील ही २ पुस्तके तर अवश्य सांगा, माझ्या एका मैत्रिणीला ही २ पुस्तके डेस्परेटली हवी आहेत
याव्यतिरिक्त
आयर्विंग वॅलेस या सुप्रसिद्ध कादंबरीकाराच्या नोबेल पारितोषिकप्राप्त कादंबरी 'द प्राईझ' वरही बंदी आहे असे अंधुकसे आठवते आहे. याबद्दल खात्री नाहिये. पण हे पुस्तक आता कुठेच मिळत नाही हे ही तितकेच खरे.
सागर, तुम्ही नेहरुं वरच्या
सागर, तुम्ही नेहरुं वरच्या ज्या दोन पुस्तकांचा उल्लेख केला आहे, ती दोन्ही पुस्तके मी जिथे राहते तिथे थोड्या कष्टानी का होईना पण उपलब्ध आहेत. तुमच्या मैत्रिणिनी Amazon चेक केले असेलच असे धरून चालते. मदत हवी असल्यास व्यनी करावा.
नोबेल पारितोषिकप्राप्त कादंबरी?
नोबेल पारितोषिकप्राप्त कादंबरी नव्हे; नोबेल पारितोषिकाविषयीची कादंबरी.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ओह्ह येस
चुकीच्या दुरुस्तीबद्दल धन्यवाद चिंतातुर जंतू
नोबेल पारितोषिक कसे मॅनेज केले जाते त्यावर बहुतेक ही कादंबरी असल्यामुळे बंदी असावी या पुस्तकावर.
पण बंदी खरेच आहे का या पुस्तकावर? त्याबद्दल नेमकी माहिती मिळाली नाही
प्राईझ बंदी प्रकरण
सागर ~
"प्राईझ" वर बंदी होती ही बाब सत्य, पण ती जगभर नसून फक्त 'स्कॅन्डेव्हियन कंट्रीज' नावाने ओळखल्या जाणार्या १. डेन्मार्क, २. नॉर्वे, ३. स्वीडन, ४. फिनलंड, ५. ग्रीनलंड, ६. आईसलंड या देशात. त्याला कारण अर्थातच या गटावर असलेला नॉर्वे आणि स्वीडनचा दबदबा. नोबेल प्राईझ आणि त्यामागील इतिहास परंपरेचा या देशांना अभिमान आहे (आणि तो रास्तही मानला पाहिजे) सबब पारितोषिक संदर्भात जर कुठे काही डावे वा अप्रिय लिखाण होत असेल तर त्या संदर्भातील पुस्तकांना तिथे येण्यास मनाई आहे. याचा अर्थ वॅलेसची गाजलेली 'प्राईझ' सरसकट इतरत्र विक्रीसाठी उपलब्ध नव्हती असा अर्थ नाही.
भारतातही त्या कादंबरीची तडाखेबंद विक्री झाली. माझ्याकडे आहे 'प्राईझ', तू वाचली नसल्यास केव्हाही घेऊन जा. खूप वेगवान कथानक आहे आणि तितकेच रंजक [अर्थात आयर्विंग वॅलेस त्यासाठीच 'फेमस' होता]. मात्र 'प्राईझ' लिहिण्यापूर्वी त्याने या पारितोषिकाबाबत पडद्यामागे कसे आणि किती खेळी खेळल्या जातात या संदर्भात सखोल अभ्यास केला होता.....तो तसा मूळचा पत्रकारच.....या अभ्यासाविषयी आणि त्या निमित्ताने त्याने केलेल्या भटकंतीवर एक वेगळेच पुस्तक त्याने स्वतंत्ररित्या प्रकाशित केले असून त्याचे नाव "Writing of a Novel" असे आहे आणि त्यात त्याने घेतलेल्या विविध व्यक्तींच्या (नोबेल संदर्भातील) मुलाखती, तपासलेली कागदपत्रे, आलेले विविध अनुभव याबाबत सविस्तर लिहिले आहे आणि ते पुस्तकही "टाईम" मॅगेझिनच्या "बेस्ट सेलर" लिस्टमध्ये झळकले होते. [हे पुस्तक मी वाचले आहे, मात्र त्याची प्रत आता माझ्याकडे नाही, कुणाला दिले आहे हे आता स्पष्ट आठवत नाही, मात्र मिळविण्याचा जरूर प्रयत्न करीन.]
"प्राईझ" वर एक चित्रपटही आला होता. पॉल न्यूमन आणि एडवर्ड जी. रॉबिन्सन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
अशोक पाटील
हे माहिती नव्हते
अशोक काका,
प्राईझ बद्दलची नेमकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
आयर्विंग वॅलेस हा कादंबर्यांतून खूप जबरदस्त चित्र उभे करतो. हिटलरच्या सातव्या गुप्त बंकरवर आधारित 'द सेवन्थ सिक्रेट' आणि (बहुतेक) राष्ट्राध्यक्ष स्त्रीचे अपहरण करुन तिच्याजागी डमी प्लांट करण्याच्या थरारक कथानकावर आधारित 'सेकंड लेडी' अशा कादंबर्यांतून याची प्रचिती मी घेतली आहे.
त्यामुळेच द प्राईझ बद्दल खूप उत्सुकता आहे.
तुम्हाला मी प्रत्यक्ष भेटेन त्यावेळी नक्कीच तुमच्याकडून वॅलेसची 'द प्राईझ' घेईन
तूर्तास द प्राईझ च्या चित्रपटाची टोरेंट शोधतो
रोहिंटन मिस्त्रींचं बुकर
रोहिंटन मिस्त्रींचं बुकर नॉमिनेशनप्राप्त पुस्तक Such A Long Journey मुंबई विद्यापीठाच्या दुसर्या वर्षाच्या अभ्यासक्रमात होतं. आदित्य ठाकरेंनी त्यावर बंदी आणवली. (प्रहारमधल्या लेखात सध्याची राजकीय समीकरणं पहाता या बातमीचा उल्लेख नसणं थोडं मजेशीर वाटलं.)
प्रहारमधल्या लेखावरून जावेद अख्तर यांची एक मुलाखत आठवली. (भाग एक, भाग दोन). हिंदू मूलतत्त्ववाद हा इस्लामिक मूलतत्त्ववादापेक्षा निराळा नाही असं काहीसं मत त्यात अख्तर यांनी मांडलं आहे. मुलाखतीच्या सुरुवातीवरून कुरूंदकरांचा 'जागर'मधला सेक्यूलरीझमवरचा निबंध आठवला. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लीम लीगचं स्वातंत्र्यलढ्यातलं योगदान याबद्दल त्यांची मतं थोडी स्फोटक आहेत.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
श्यामा
धागाकर्ते श्री.माहितगार यानी लेखात "वेगवेगळ्या वेळी कोणत्या मराठी पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी झाली ?" असा चौकशीचा एक प्रश्न विचारला आहे.
१९६३ साली 'रंभा' नावाने त्या काळी लोकप्रिय असलेल्या मासिकाच्या दिवाळी अंकात चंद्रकांत काकोडकर यांची "श्यामा" नावाची कादंबरी प्रसिद्ध झाली आणि त्यातील काही मजकूर अश्लिल असून तरुण वाचकाच्या मनावर त्यामुळे परिणाम होऊ शकतो या कारणास्तव पुण्यातील भिडे नावाच्या गृहस्थांनी 'ऑब्सेनिटी अॅक्ट' अंतर्गत मासिकाचे संपादक, लेखक आणि वितरक या तिघांवर खटला घालून "श्यामा" कादंबरी असलेला 'रंभा' चे सर्व अंक बाजारातून जप्त करावेत तसेच सदरची कादंबरी पुस्तकरुपात प्रकाशित करण्यात येऊ नये अशी समज संबंधितांना कोर्टाने द्यावी अशी मागणी केली. राज्य सरकारनेदेखील या खटल्याचा पाठपुरावा केला. कोर्टात काकोडकरांच्या बाजूने समीक्षक माधव मनोहर होते तर सरकारतर्फे कादंबरीच्याविरोधात ना.सी.फडके आणि आचार्य अत्रे साक्षीसाठी उभे राहिले. हायकोर्टात काकोडकर आणि प्रकाशक हरले आणि त्याना रुपये २५/- दंड व एक आठवड्याची साधी कैद झाली. पुस्तकावर बंदी तर आलीच.
पण काकोडकरांनी गोव्याचे वकील श्री.सुशील कवळेकर यांच्या मदतीने 'श्यामा' खटला सुप्रीम कोर्टापर्यंत लढविला आणि दोन अडीच वर्षाच्या मेहनतीनंतर (कादंबरीचा इंग्रजी अनुवाद करावा लागला कारण कोर्ट जगमोहन रेड्डी आणि एस.एम.सिक्री याना त्याची आवश्यकता होती. त्यानी इंग्रजी अनुवाद वाचल्यानंतरच केसला सुरुवात झाली) 'श्यामा' खटला जिंकला. सुप्रीम कोर्टाने कादंबरी अश्लील नाही असे सांगून महाराष्ट्र सरकारने लेखकाला ते रुपये पंचवीस परत द्यायला लावले. या ऐतिहासिक विजयानंतर "श्यामा" पुस्तकरुपाने बाजारात आली आणि त्याची तडाखेबंद विक्री झाली हे तर स्पष्टच आहे.
(पुस्तकरुपी कादंबरी बाजारात आली आणि प्रस्तावनेतच श्री.चंद्रकांत काकोडकर यानी या खटल्याची सविस्तर माहिती दिली होती. त्यात त्यांचे एक वाक्य आहे. एका मित्राने हे खटला आणि बंदी प्रकरण वाचल्यावर त्याना विचारले, "तू जिंकलास म्हणजे नेमके काय झाले ?" यावर काकोडकर उत्तरले, "जास्त काही नाही, फक्त पंचवीस हजार खर्च करून पंचवीस रुपये परत मिळविले...")
अशोक पाटील
बंदी कशावर आली होती?
'श्यामा'वर अशोक पाटलांनी लिहिलंच आहे. र. धों. कर्वे यांच्या 'समाजस्वास्थ्य'वर बहुधा अश्लीलतेचे आरोप झाले होते. मर्ढेकरांची एक कविता आणि विंदांची गणपतीवरची विरुपिका या अश्लील आहेत असं म्हटलं गेलं होतं. मर्ढेकरांवर खटलाही चालवला गेला होता, पण या उदाहरणांत अंतिमतः बंदी घातली गेली नाही. तेंडुलकरांच्या 'सखाराम बाईंडर', 'घाशीराम कोतवाल' किंवा 'गिधाडे'वरही चर्चा/खटले झाले, पण बंदी घातली गेली नाही (शिवाय ती मागणी पुस्तकाबाबत नाही, तर प्रयोगाबाबत होती.) तर बंदी घातली गेली असं मराठी लेखन कोणतं? वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या 'गांधी मला भेटला' या कवितेवरचा अश्लील आणि बीभत्स असण्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाला होता. अधिक माहिती इथे मिळेल.
या निमित्तानं मला दोन उपप्रश्नही पडले - बंदी घालण्यामागे नैतिकता किंवा धार्मिक भावना दुखावण्याचे आरोप किंवा राजकीय कारणं असतात असं बर्याचदा दिसतं. पण मराठीत मला नैतिकताविषयक उदाहरणं अधिक माहीत आहेत. त्या मानानं धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप झालेली किंवा राजकीय सेन्सॉरशिपची (विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळातली) उदाहरणं माहीत नाहीत. तर
१. राजकीय कारणांमुळे बंदी घातली गेली असं मराठी साहित्य कोणतं? आणीबाणीच्या काळात तरी असं झालं असणार. आणि -
२. धार्मिक भावना दुखावल्या गेल्या म्हणून बंदी घालण्यात आली असं मराठी साहित्य कोणतं?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सावरकर आणि पुंडलिक
श्री.चिंजं विचारतात :
"राजकीय कारणांमुळे बंदी घातली गेली असं मराठी साहित्य कोणतं?"
~ या क्षणी माझ्या नजरेसमोर आहे ते फक्त सावरकरांनी लिहिलेले 'मॅझिनी' चे चरित्र जे मराठीत होते. त्यावर ब्रिटिशांनी १९०८ मध्ये बंदी आणली. तसेच मला वाटते त्यांच्या "उ:शाप" [१९२७] या नाटकाच्या प्रयोगावरही बंदी आणली गेली होती. हे नाटक पुस्तकरुपात प्रकाशित झाले की नाही याचा विदा मिळत नाही. आणीबाणीच्या काळात 'झिरपलेली किरणे' या काव्यसंग्रहावर अधिकृत अशी बंदी होती की नाही याबद्दल दुमत आहे, पण तो संग्रह १९७७ नंतर सर्वत्र मिळू लागला होता.
~ सत्यकथेच्या भरभराटीच्या काळातील एका अंकात विद्याधर पुंडलिकांची 'सती' कथा प्रसिद्ध झाली आणि त्यावर बंदी आणावी म्हणून [विशेषतः पुण्यात] बराच गदारोळ उडाला. (बंदीची कारणमीमांसा इथे नको, अन्यथा धागा भरकटणार). मुंबईत मौजेच्या कचेरीवर निषेधार्थ मोर्चे निघून त्या अंकाची जाळपोळही झाली होती. सरकारने त्या कथेवर बंदी घातली नाही पण तो अंक बाजारातून काढून घेण्यास व्यवस्थापनाला सांगितले (की सुचविले?). पण 'सत्यकथा' कधी उघड्याने स्टॉलवर येतच नसल्याने तो आदेश/सूचना केवळ राळ खाली बसविण्यासाठीच होती. पुढे 'सती' कथा पुंडलिकांच्या 'देवचाफा' या संग्रहात समाविष्टही झाली आणि तेव्हा मात्र त्या कथासंग्रहावर बंदी आणावी असा कुठलाच प्रसंग प्रशासनापुढे आला नाही.
@ अदिती
"Such A Long Journey मुंबई विद्यापीठाच्या दुसर्या वर्षाच्या अभ्यासक्रमात होतं. आदित्य ठाकरेंनी त्यावर बंदी आणवली."
~ असे तू म्हटले आहेस. इथे 'बंदी' म्हणजे पूर्ण पुस्तकावर बाजारबंदी आणली असे कदाचित सुचविले जाईल. वास्तविक हे पुस्तक सर्वत्र राजरोसपणे मिळते. "बंदी आणली" म्हणजे मुंबई विद्यापीठीच्या बी.ओ.एस. ने सिलॅबसमधून ते पुस्तक काढून टाकले.
अशोक पाटील
"बंदी आणली" म्हणजे मुंबई
होय. ढिसाळ वाक्यरचनेबद्दल क्षमस्व.
निदान त्या निमित्ताने मी रोहिंटन मिस्त्रींची कादंबरी घरी आणली आहे. (कधी वाचेन ते पहायचं.)
मग वेगळा धागा काढावा ही विनंती.
चिंतातुर जंतूंचा प्रश्न महाराष्ट्र सरकार सहिष्णू आहे का? असं वाटत नाही. बंदी आणण्याइतपत प्रक्षोभक लिखाण होतं असं वाटत नाही. फेसबुकावरून अनेक सामान्य माणसं मर्यादित प्रमाणात (आणि काही अंशी अरोचक अशी) केंद्र सरकारची थट्टा करतात त्यावरून सध्याचे केंद्र सरकार अधूनमधून जागे झाल्याचे दाखवते. महाराष्ट्र शासन त्यापेक्षा फार वेगळे असेल असं वाटत नाही. असलंच तर कमी सहिष्णूच असेल असं वाटतं. यात थोडा तिरका तर्क आहे. भारत सरकारने बंदी घातलेली पुस्तकं महाराष्ट्रात मिळणारच नाहीत. या निर्णयांना महाराष्ट्र सरकारने न्यायालयात आक्षेप घेतल्याचे कानावर नाही. त्याउलट महाराष्ट्र सरकारने इतरही काही पुस्तकांवर बंदी घातलेली आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एकंदरीत
पुंडलिकांच्या 'सती'वर बंदी घालायची मागणी झाली होती हे माहीत नव्हतं. ती कथा मी पुष्कळ वर्षांपूर्वी वाचली होती तेव्हा असं काही झालं असेल असं वाटलं नव्हतं.
लीळाचरित्राच्या वि. भि. कोलतेसंपादित आवृत्तीच्या प्रस्तावनेवरून महानुभावपंथी लोकांनी काही तरी आक्षेप घेतला होता आणि त्या लीळाचरित्रावर बंदी आली होती असं आठवतं.
आतापर्यंत या धाग्यावर आलेली तुटपुंजी माहिती आणि हसन सुरूर यांच्या लेखातली भारत सरकारनं बंदी घातलेल्या पुस्तकांची लांबलचक यादी पाहता असं म्हणावंसं वाटू लागलं आहे की महाराष्ट्र सरकार त्या मानानं अधिक सहिष्णू असावं किंवा मराठीत असं लिखाणच फारसं होत नसावं!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
श्लील अश्लिल बंदी प्रकरण
"महाराष्ट्र सरकार त्या मानानं अधिक सहिष्णू असावं किंवा मराठीत असं लिखाणच फारसं होत नसावं!"
~ दोन्ही घटक लागू होऊ शकतात. महाराष्ट्र सरकाराच्या याबाबतीतील धोरणापेक्षा मूळात ज्याला 'वादग्रस्त' चे लेबल लागेल असे लिखाण चर्चेला येण्याइतपत सांप्रत भाषेत झालेच नाही असेच म्हणावे लागेल. (एकेकाळी 'बेळगावी' मासिकांनी बर्यापैकी धुरळा उडविला होता इथे, पण त्याचा वाचकवर्ग सीमित असल्याने आणि त्याची शासन दरबारी दखल घेण्याची गरजही नसल्याने फक्त बागवे कंपनीला त्यात रस होता).
'यमुनाजळी खेळू खेळ कन्हैय्या....' गाण्यावर बंदी घालण्याची भाषा होऊ शकणार्या काळात त्यापेक्षा जास्त "प्रोव्होकेटिव्ह" काय दाखविणार ? "ब्रॅण्डीची बाटली" मधील एक पात्र दामुअण्णा मालवणकर कृष्णाच्या मूर्तीपुढे उभे राहुन प्रार्थना करताना म्हणते, "कृष्णराव, बघा जरा आमच्याकडे !" बस्स. कृष्णाला 'कृष्णराव' म्हणून हिंदु संस्कृतीची हानी झाली म्हणून पुण्यातील संस्कृतीरक्षकांनी त्यावेळी टॉकिजसमोर निदर्शने केली आणि सेन्सॉरला ".....राव" उल्लेख काढून टाकावा लागला होता. यापेक्षा जास्त 'प्रक्षोभक' इथे काहीच झाले नाही असाच दाखला आहे.
कादंबरी क्षेत्रात ना.सी.फडके यांच्या स्वप्नाळू रोमॅन्टिक लेखनाने ४०-५० च्या दशकातील कॉलेजकुमार्/कुमारीत भलतेच प्रस्थ माजविले होते. फडक्यांची गोबर्या गालाची, लालचुटूक ओठांची आणि पापण्यांची मिनिटामिनिटाला फडफड करणारी 'इंदुमती' सर्वांना हवीहवीशी वाटत होती. पण फडक्यांना श्लील-अश्लिलतेच्या एका विशिष्ट मर्यादेबाहेर जाता आले नाही, त्याला जितके स्वतः फडके कारणीभूत तितकाच वचक आचार्य अत्रे यांचाही होता. अत्रे यानी समाजस्वास्थ्याचे कंकणच हाती बांधले असल्याने त्यानी आपली मुलुखमैदान तोफ शब्दाने आणि वाणीनेही जागृत ठेवली होती. फडकेच काय पण त्यानी दुर्गा भागवत, श्री.पु.भागवत, मर्ढेकर, खानोलकर, माडखोलकर यांच्यावरही 'अत्रे प्रहार' पडले आणि तेच पुरेसे असल्याने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाला 'बंदी' पर्यंत जुंपण्याचे प्रसंग आलेच नाहीत. पुढे दि.पु.चित्रे, भाऊ पाध्ये, ढसाळ, ढाले, दळवी, कर्णिक यानी आपापल्या मगदुराप्रमाणे अश्लिलतेकडे झुकू शकेल अशा वाङ्मयाची निर्मिती केली, त्यालाही अत्रे झोडपत असत पण वयोमानामुळे (तसेच 'मार्मिक' च्या उदयानंतर) ते थकत गेले आणि या त्यावेळेच्या यंग ब्रिगेडने त्याना जुमानलेही नव्हतेच. [दि.पुं.च्या 'केसाळ काळेभोर पिल्लू' वर तर मराठामध्ये सलग तीन आत्रेय आगखाऊ अग्रलेख आले होते. केवळ त्यामुळेच की काय त्या कथेवर वाचकांच्या अक्षरशः उड्या पडल्या होत्या.]
अशोक पाटील