विद्रोही
थांब तुकारामा असा पळू नकोस वैकुंठाला
विमान तुझे वळव आणि बघ जरा वाकून
अरे रामदासा ये तुझ्या गुहेतून बाहेर
कपडे घाल आधी, जेवलास का तू?
बास झाली तुझी झोप गौतमा, ऊठ आता
उघड डोळे, बघ जगाकडे, गेली का झोप?
अरे न्याना, उघड तुझी द्य़ानेश्वरी उलट पाने
लिही त्यात मांड्यांची रेसिपी, विसरलास का तू?
अहो फोटोतले गांधीबाबा, आता तरी सुधरा
उचला ती बंदुक, उडवा त्या कसाबला
रे माणसा माणसा, घे विवेकाचा ध्यास
जुनी झुगारूनी कात, पेटव क्रांतीची ज्योत
(ऐसीअक्षरेवर पहिलेच लेखन आहे, कृपया चुभुद्याघ्या. धन्यवाद.)
प्रतिक्रिया
काहीही. बरळ. क्रांतीकारकांनाच
काहीही. बरळ. क्रांतीकारकांनाच उलट्या बोंबा मारुन जाब?
काही रहस्यमय गूढ अर्थ असल्यास समजला नाही.
कविता
ऐसीअक्षरे वरील प्रथम लिखाणानिमित्त स्वागत.
कविता नीटशी समजलेली नाही. खरे तर कवितेचा अर्थ उलगडून सांगायची पध्दत नाहीच. पण प्रस्तुत कविता (स्थूलमानाने) विचारांना आवाहन देणारी वगैरे दिसते. शूरशिपाई यांनी नेहमीचा रिवाज सोडून चार शब्द लिहावेत.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
तुमच्या जमान्यात काय क्रांती
तुमच्या जमान्यात काय क्रांती करायची आहे ती करा...उगाच बिचार्या तुकाराम, रामदास अन ज्ञानेश्वरांना का वेठीस धरता ? त्यांच्या काळात त्यानी भरपूर क्रांत्या केल्या आहेत.
बराच विद्रोह करायचाय इतके(च)
बराच विद्रोह करायचाय इतके(च) कळले.. रुपकांची निवड का ते मात्र कोडेच आहे.
असो, ऐसीवर स्वागत! येत रहा लिहित रहा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आत्यंतिक तिरकस लेखन केलं तर
आत्यंतिक तिरकस लेखन केलं तर ते कधी कधी खरंच मनापासून लिहिलं आहे असं वाटतं. ही कविता त्याचंच उदाहरण आहे.
संत-महात्म्यांनी दिलेला सल्ला माणूस विसरलेला आहे. ज्ञानेश्वरी लिहिण्यापेक्षा ज्ञानेश्वरांनी मांड्यांची रेसिपीच लिहिणं आजच्या जगात श्रेयस्कर ठरेल. कारण नाहीतरी इतकं लिहिलं त्याला कोण किंमत देतो? गांधीबाबांचा फोटो लावायचा आणि कसाबला गोळ्या घाला म्हणायचं हा नवीन 'विवेकवाद' आहे. अहिंसा, दुसऱ्यावर दया करा, चांगलं वागा वगैरे संदेश ही जुन्या विचारांची कात फेकून देऊन माणूस आता नवीन विचारांची क्रांती करतो आहे असं कवीला म्हणायचं आहे. यातली खरी आयरनी म्हणजे माणसाच्या मूलभूत आक्रमक स्वभावाला बंधन घालून त्याला भलं करण्याचा प्रयत्न संत-महात्म्यांनी केला. ते वैचारिक जोखड झुगारून देऊन पूर्ववत पशूप्रमाणे वागायला लागणं याला क्रांती म्हटलेलं आहे. हा देखील छद्मी उल्लेख आहे. क्रांती करताना तत्वतः जुन्या, हिंसक, भरडणाऱ्या व्यवस्थेकडून नवीन दयामय जगाकडे प्रवास अपेक्षित असतो. इथे उरफाट्या प्रवासाला क्रांती म्हणून हेटाळलं आहे.
कवितेवर कोलटकरी प्रभाव जाणवला.
हं, असा अर्थ समजवल्यावर थोडी
हं, असा अर्थ समजवल्यावर थोडी समजली असं वाटतंय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कवितेचे अॅडव्होकेट
स्पिन डॉक्टर घासकडवी यांनी प्रयत्न बराच केला आहे. पण वैचारिक जोखड झुगारुन द्यायचे आहे तर मग "घे विवेकाचा ध्यास" कसे काय? हा "घे विवेकाचा घास" असते तर अगदी तुम्ही म्हणता तसा अर्थ लागतो.
असो वर मुसु व आरा दोघांनी आक्षेप नोंदवला म्हणजे कवितेत लोच्या दिसतोय पण कधी कधी अर्थ अगदिच सोपा समोर दिसणारा असू शकतो.
पहिल्या पाच कडव्यात जे काय लिहले आहे ते काय आता होणे शक्य नाही. त्यामुळे शेवटच्या कडव्यात लिहिल्याप्रमाणे सामान्य लोकांनीच आता अन्य कोणी महत्त्वाची कामे करेल अश्या भ्रमात न रहाता कामे करावीत. असा काहीसा सूर वाटतो.
आवाहनाप्रमाणे मी ओळ क्रमांक ४, शेवटाचा प्रश्न, जेवून घेतो व तसेचं ओळ क्रमांक ८ मधील मांड्यांची रेसिपी मिळाली तर टाकतो.
बाकी नावातच शिपाई असल्याने व आमच्या सामान्य लोकांच्या मराठी पुस्तकात शिपायाच्या गळ्यात बंदूक पाहिली असल्याने खुद्द कवी कसाबला उडवायचे काम करू शकेल. अर्थात हा कवी/शिपाई सामान्य असेल तरच. (बरेचदा ते नसतात ते कवी - कलाकार, द्र्ष्टे व सैनिक - देशभक्त त्यामुळे असामान्यच)
अवांतर - कसाब व महागाई शब्दांचा वापर कवितेत केला गेल्यास सरकारने किमान १००० /- रु कर आकारावा. तेवढीच वित्तीय तूट भरुन निघायला मदत होईल.
प्रामाणिकपणा
लेखनात प्रामाणिकपणा दिसून येतो.. बाकी कवितेचे क्राफ्ट लेखनाच्या सरावातून येत जाईल. अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा !
अर्थ
मी सगळे प्रतिसाद वाचले नाहीत परंतु घाईत असल्यामुळे फक्त थोडक्यात माझा विचार सांगतो.
माझ्या मते, आयुष्यभर एकाच तत्वाला चिकटून बसण्यापेक्षा प्रसंगानुरूप विवेकाने वागणे याला क्रांती म्हणायला हवे. एकाच तत्वाला चिकटून सगळ्याच प्रसंगाला एकाच मापात तोलणे हे चुकीचे आहे. ही खरी क्रांती नव्हे. (खरी क्रांती मला शिवचरित्रात दिसते, तशी वरीलपैकी कोणाच्याच चरित्रात दिसत नाही)
हे खूप आक्रमक आहे हे मला मान्य आहे, परंतु हा एक विचार आहे, तो व्यक्त करायचा होता, तसा झाला नसेल तर पुन्हा प्रयत्न करेन.
धन्यवाद.
स्पष्टीकरण
वरील अर्थाला पुरवणी म्हणून काही मुद्यांचे स्पष्टीकरण देतो.
संतांचा उल्लेख :
या कवितेतली कुठलीही पात्रे जशीच्या तशी व्यक्तीश: घेऊ नये. तुकाराम रामदास, महात्मा इ. व्यक्ती नसून ती एक विचारसरणी किंवा वृत्ती आहे. हे सर्व संत आपल्याच मनात आहेत. तुकारामांचा मोक्षाचा मार्ग, रामदासांचे वैराग्य, महात्म्याची अहिंसा, बुध्दाची शांतता, ज्ञानेश्चरांनी मनातल्या संतापाचे रूपांतर मांड्यात केले (हिच ती मांड्यांची रेसिपी, म्हणजे मनातल्या रागावर ताबा मिळवणे) इ. इ. सर्व आपल्या ठिकाणी योग्य आहेत. पण एक कुठली दिशा बरोबर आहे असे म्हणता येणार नाही, या सगळ्यातून जसा प्रसंग असेल तसा विचारात बदल घडवणे ही क्रांती आहे. या सगळ्या संतांच्या शिकवणीचा वापर विवेकाने झाला तरच ती क्रांती म्हणता येईल.
आपल्या मनातल्या गांधीजी, रामदास आणि तुकाराम इइ यांना प्रसंगानुरूप बदलावे असे मला म्हणायचे आहे.
राजेश घासकडवी यांचा प्रतिसादः
"ते वैचारिक जोखड झुगारून देऊन पूर्ववत पशूप्रमाणे वागायला लागणं याला क्रांती म्हटलेलं आहे."
-हो वैचारिक जोखड झुगारून विवेकाने वागणे अपेक्षित आहे. पशूप्रमाणे नव्हे.
"आत्यंतिक तिरकस लेखन केलं तर ते कधी कधी खरंच मनापासून लिहिलं आहे असं वाटतं."
- तसे नाही, लिखाण मनापासून केलेले असते, ते तिरकस किंवा कसे यावे असे ठरवता येत नाही. तिरकस लिहायचे
म्हणून तिरकस लिहिता येत नाही.
सहज यांचा प्रतिसाद:
"कसाब व महागाई शब्दांचा वापर कवितेत केला गेल्यास सरकारने किमान १००० /- रु कर आकारावा."
-कवितेला शब्दांचे आणि माणसांना विचारांचे बंधन नसावे.
कवितेतील भावना आता लक्षात
कवितेतील भावना आता लक्षात आल्या आणि पटल्याही. क्षमस्व, शूरशिपाईजी. शब्दांमध्ये अजून काही एक स्पष्टत्व यावे असे वाटते. शुभेच्छा !
"एकाच तत्वाला चिकटून बसण्यापेक्षा प्रसंगानुरूप विवेकाने वागणे"
हे सुद्धा एक तत्त्वच आहे का? (माझ्या मते ते तुमचं आहे असं कवितेवरून वाटतं)
मग "हे" तत्त्व आपण किती दिवस सांभाळणार? आणि या तत्त्वाच्या विरुद्ध क्रांती करायची म्हणजे नक्की काय करायचं?
हे म्हणजे "प्रत्येक नियमाला अपवाद असतो" या नियमासारखं झालं. माझा तर असल्या विधांनांमुळे जाम गोंधळ होतो. त्या पेक्षा "ठेविले अनंते ..." किंवा "ठकासी असावे.." हि तत्त्व सोपी वाटतात.
माझा पण इथे हा पहिलाच प्रतिसाद आहे तेव्हा चु.भू.द्या. घ्या.