"क्रांती" - कर ले घडी दो घडी!
दिलीप कुमारचे एवढे जबरदस्त काम क्रांतीमधे झालेले आहे की केवळ त्याच्याबद्दलच्या आदराने बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावे (सुरूवातीलाच एक संवाद म्हणताना तो स्वतःच्या मुलाला कडेवर घेताना किंचित हसतो, हे इम्प्रोव्हायझेशन नक्कीच त्याचे असणार. असे अनेक सीन्स आहेत), पण हळुहळू इतर जण त्याला वरचढ होतात :). लक्ष्मीकांत प्यारेलाल ची काही श्रवणीय गाणी आहेत ("लुई शमाशा उई" जर स्वतंत्रपणे ऐकले तर "vintage LP" आहे - मस्त ठेका आणि त्याहून जबरी लताचा आवाज), काही गाण्यांतील जमून गेलेली देशभक्तीपर वाक्ये, अशा काही genuine moments चित्रपटात नक्की आहेत. त्यात तेव्हाचा हा अतिप्रचंड हिट चित्रपट. एवढ्या लोकांना काहीतरी आवडल्याशिवाय तसे होणे अशक्य आहे. मनोज कुमारच्या सुरूवातीच्या बर्याच पिक्चर्समधली त्याची गाणी नेहमीच मस्त होती. दिलीप कुमारचे काही लंबे संवाद तर जबरी आहेत, विशेषत: जेव्हा तो ओरडून बोलतो. अमिताभएवढी मूळ आवाजाची देणगी नसून सुद्धा दिलीप कुमारची संवादफेक जोरदार आहे. मात्र तो हळू आवाजात बोलू लागला की तोंडातल्या तोंडात बोलतो. थिएटर मधे काही प्रश्न येत नसेल पण टीव्हीवर बघताना, आजूबाजूला इतर आवाज येत असताना तो काय बोलतोय ते नीट कळत नाही.
असो. आता जेथे क्रेडिट ड्यू आहे तेथे ते दिल्यावर या चित्रपटातून दिग्दर्शकाला अप्रत्यक्षरीत्या काय संदेश द्यायचा होता आणि जो इतकी वर्षे कोणालाच कळाला नाही, आणि केवळ चित्रपटसृष्टीचा शोध नंतर लागल्याने भारतीय स्वातंत्रलढ्याचे नुकसान झाले, तो पाहू:
-----------------------------------------------------------
सिंपल! इंग्रजांना उल्लू बनविणे एवढे सोपे होते हे गांधीजींपासून ते सशस्त्र क्रांतिकारकांपर्यंत कोणालाही कसे कळाले नाही? हिंसक किंवा अहिंसक दोन्ही उपायांव्यतिरिक्त एक बॉलीवूडी उपाय होता असे सिद्ध झालेले आहे. क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देणार असतील तेथे "फेरीवाल्यांस सक्त मनाई" वगैरे नसल्याने तेथे चणे विकायला जायचे. त्या चण्यांत विषासारखे काहीतरी घातलेले असेल हे त्या "गोर्या बंदरां"ना मुळात कळत नाही, एवढेच नव्हे तर "मेरा चना खा गया गोरा/खाके बनगया तगडा घोडा..." किंवा "मेरा चना... गैरोंके सर को फोडेगा" ई. ऐकून सुद्धा काहीतरी गडबड आहे हे लक्षात येत नाही. बांधलेले लोक व हे नंतर उपटलेले फेरीवाले एकमेकांना डोळे मारतात तो भारतीय परंपरेचा एक भाग असावा असा बहुधा इंग्रजांचा समज असतो. म्हणजे लोक एकमेकांना भेटले की नमस्ते करतात तसे काहीतरी. फेरीवाल्यांमधे हीरॉइन्सही असतात. त्या जनतेकडे असलेल्या कपड्यांच्या चणचणीचे प्रतीक असतात. हे सगळे नाचताना इंग्रज दंग झाले की बांधलेल्या लोकांना सोडवून घेऊन जायचे.
अशा एका गाण्याच्या सुरूवातीला हेमा आरशात बघते हा वरकरणी शॉट, पण बाकी पडदा तिचा लोकांना दाखवायचा भाग व्यापून टाकतो. व पूर्ण गाणे तिचे आवश्यक त्या कोनातून घेतलेले शॉट्स दिसत राहतात. मग हळूच मनोज कुमार कडे कॅमेरा. "मेरा चना खा गये गोरे..." म्हणताना त्याचा चेहरा पाहून हे प्रतिकात्मक वर्णन नसून खरेच त्याचे चणे कोणीतरी पळवले असे वर्णन करतोय असे वाटते. हळुहळू एक एक सैनिक बेशुद्ध पडायला लागले तरी इतरांना अक्कल येत नाही आणि ते तसेच चणे खात राहतात.
मनोज कुमारची एण्ट्री तशी आधीच होते. पण त्याला एण्ट्रीगिरी करायला वेळ दिलेला नाही. एखादे एण्ट्रीवाले जोशपूर्ण गाणे नितीन मुकेशच्या आवाजात म्हंटले तर लोकांचा हा नक्की जहाल गटातील आहे की मवाळ याबद्दल गोंधळ निर्माण होईल म्हणून ते कट केले असावे. तिकडे करीम खॉ (शत्रुघ्न) ला तोफेच्या तोंडी देणार असतात, त्याची सुटका करायची असते. तेथे एक गाणे. परवीन व सारिकाचा डान्स. तेवढ्यात तोफांमधे भलतेच काहीतरी भरले जाते. पहिली तोफ उडते तर करीम खॉ च्या अंगावर एक हारच जाऊन पडतो. मग "दूसरी तोप उडा दो" वगैरे होते. तर त्यातून फुले पडतात. मग तिसरी, तर त्यातून सगळीकडेच स्फोट होतात व सगळे क्रांतिकारक पळून जातात.
क्रांतिकारकही असे की शत्रूच्या मनात धडकी भरलीच पाहिजे. सगळ्यात तरूण तडफदार लीडर नितीन मुकेशच्या आवाजात "लुई शमाशा उई, उई उई उई उई" किंवा "मितवा, तेरे बिना, लागे ना रे जियरा" अशी गाणी गातो. तो पूर्वेला असेल व तो ज्याच्याशी बोलतोय ती व्यक्ती पश्चिमेला उभी असेल तर उत्तर किंवा दक्षिणेकडे बघत नाकावर बोट ठेवून तोंडातल्या तोंडात बोलतो.
हे सर्व साधारण १८२५-१८७५ मधे घडते. रामगढचा कोणीतरी राजा असतो. प्रेम चोप्रा त्याचा मेहुणा व प्रदीप कुमार असाच कोणीतरी. शशिकला त्याची बहीण. शशिकलाला मुलबाळ वगैरे नाही हे कळाल्यावर मग चित्रपटात निरूपा रॉय कशाकरिता आहे हे आपल्या लक्षात येते. त्यामुळे हा नुसता मल्टीस्टारर नाही तर मल्टी-मॉ-स्टारर आहे. कारण जिचा मुलगा हरवतो ती, जिला तो मिळतो ती, हे सगळे facilitate करणारी तिसरी (सुलोचना), व मनोज कुमार जिच्याकडे वाढतो ती अशा अनेक मॉ यात आहेत. निरूपा रॉय ची दोन मुले बिछडतात ("Not Again!", असे ती नक्कीच म्हणाली असेल) - एक क्रांतिकारक बनतो तर दुसरा इंग्रजांच्या बाजूचा "सेनापती".
पण शशिकलाचे वर्णन करताना राजा "तीन बार इसे मॉ बननेका मौका मिला, मगर ये मॉ न बन सकी....इस बार...वरना इसके पती, फतेहगढके महाराज चंपकसिंगजी दुसरी शादी कर लेंगे (तेथे एक 'महाराज' मिशी पिळताना दाखवलाय)" असे सांगतो. तिला मूल नाही ही माहिती प्रेक्षकांना बास आहे की. बाकी डिटेल्स कशाला? का तसे सांगितले नाही तर तिच्या फेक नवर्याची त्या फेक फतेहगढ मधे हेटाळणी होणार आहे?
रामगढ मधला राजा इंग्रजांना बंदर वापरायची परवानगी देतो पण दारूगोळा आणायचा नाही या अटीवर. मग ती मोडली जाते तेव्हा त्याचा विश्वासू सैनिक दिलीप कुमार त्याला सांगायला येतो, तर प्रेम चोप्रा व प्रकु त्याला त्या महाराजांच्या खुनात गोवतात.
दिलीप कुमारला फाशी द्यायचे ठरते. पण मधे थोडा वेळ त्याला जेल मधे ठेवतात. तेथे बरेच डॉयलॉग मारून प्रेमचोप्रा निघून जातो पण आपली पिस्तुल विसरतो. नियमाप्रमाणे ती पिस्तुल जेथे ठेवलेली असेल तेथे जेमतेम पोहोचता येइल अशी उपकरणे दिलीप कुमारला उपलब्ध असतात. मग तो तेथून पळून जाताना त्याच्या होडीवर स्फोट केला जातो व तो मेला असे सगळे समजतात. तिकडे निरूपा रॉयला दुसरा मुलगा होतो. पण लहान मुले व म्हातार्यांना इंग्रज मारत असल्याने निरूपा रॉय त्याला एका टोपलीत ठेवून पाण्यात सोडून देते. मला वाटले की पुढे जंगल बुक मधे सापडलेला तो मोगली हाच की काय. पण नाही. वाहते पाणी जसे खाली जायचा सर्वात सोपा मार्ग शोधते, तसे चित्रपटातील हरवलेली बाळे ज्यांना बाळांची जास्त गरज आहे अशा ठिकाणी आपोआप जातात. त्यामुळे ती टोपली शशिकलाच्या (वरच्या मॉ-मौका फेम) गॅलरीतून सहज दिसेल अशी वाहात येते.
नंतर बरीच वर्षे हे सगळे जवळपासच राहात असतात. पण कोणी आपले कुटुंब शोधायचा प्रयत्न करताना दिसत नाही. दिलीप कुमारचा इतर सैनिकांबरोबर राहिलेला मुलगा मनोज कुमार होतो. टोपलीतील बाळ शशी कपूर होतो. तो एकदा दरबारातील फिरत्या माशाला बरोबर बाण मारल्याने त्या राज्याचा सेनापती होतो (म्हणजे त्या राज्यात युसूफ पठाण कॅप्टन झाला असता ना?). दिलीप कुमार चे धोरण म्हणजे हजार इंग्रजांना धडा शिकवण्याआधी लाख फितुरांना शिक्षा द्यायची. (पण हे थोडे आईसक्रीम खाताना वितळलेला भाग आधी खात बसण्यासारखे नाही का?). मनोज कुमारचा 'हातवारे अभिनय' समजून घ्यायला मात्र अजून बरेच त्याचे चित्रपट पाहावे लागतील. नक्की कधी "आउट" सारखे एक बोट वर करून हात धरायचा, कधी आपल्या तोंडासमोर कोपरात वळवून अर्धा चेहरा दिसेल असा धरायचा, कधी दोन्ही हाताचे पंजे एकमेकांत मिसळून खांबावर हात टेकवायचे, बोलताना कधी नाकावर हात धरायचा, तर कधी चार बोटे तोंडावर धरायची, याचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे. नाहीतर दिलीपकुमारच्या अभिनय शाळेत हा फक्त पी.टी.च्या तासालाच हजर होता असा समज व्हायचा.
त्याच्या डायरेक्शनचा तर स्वतंत्र अभ्यासविषय होईल. मरणारा एक क्रांतिकारक थेट एका "क्रॉस" वर पडतो. दिलीप कुमारला गोळी लागते तेव्हा बोटीत एक "नन" प्रार्थना करताना दिसते. फाईटिंग चालू असताना मधेच स्क्रीनवर एक कोणीतरी धरलेला क्रॉस येतो. हे डायरेक्शन कळाले नाही. परवीन बाबी ची "सुरीली" जिवंत असतानाच काय पण मरताना सुद्धा तिचे शॉट्स ज्या पद्धतीने घेतले आहेत त्यावरून लक्षात येते की कहानी की माँग पूरी करणे हे एकमेव काम यात हिरॉइन्सचे आहे.
हेमामालिनी ही एक कोणतीतरी राजकन्या. या राज्यात येत असताना तिच्या रथाचे एक चाक निखळते ( शुटिंगच्या वेळेस नक्कीच तिने चुकून "चल धन्नो" म्हंटले असणार. नाहीतरी येथेही ती 'रामगढ' कडेच निघालेली असते). मग तिच्या जागी क्रांतिकाकांच्या गटातली परवीन बाबी जाते व ही क्रांतिकारकांकडे जाते. गंमत म्हणजे ही अदलाबदल झाली नसती तरी काहीच फरक पडला नसता. ज्याला आपण चोर समजलो तो क्रांतिकारक आहे हे लक्षात आल्यावर एखादी नॉर्मल राजकन्या "oh, my bad. it was nice knowing you. चला मी माझ्या राज्यात परत जाते" म्हणून निघून गेली असती. पण हेमा त्याच्या थेट प्रेमात पडते. मग "जिसने रचा संसार है ये उसकी रचना" म्हणजे "लुई शमाशा उई" हे गाणे होते, त्यानंतर "प्यार कर ले घडी दो घडी" हे होते. घडी दो घडी कसले, मधे बराच वेळ हेच होते.
रिकामा वेळ असताना मनोजकुमारला अधूनमधून तलवारीने कोठेतरी कापून आपले रक्त त्या क्रांतीच्या निशाणावर लावायची सवय असते. तसेच एकदा त्याने केले असता हेमा तेथून टपकणारे रक्त आपल्या कपाळावर लावून कोणालातरी नमस्कार करून मोकळी झालेली असते. पण मनोज कुमार जरा तयार नसतो. मग "खाओ कसम..." वगैरे झाल्यावर विमानाच्या खिडक्यांसारख्या एका नेपथ्यातून हेमा व मनोज कुमार यांचे चेहरे एकमेकांकडे सरकताना दिसतात. मग दोनच खिडक्या शिल्लक राहिल्यावर दिग्दर्शकापुढे एक चॅलेंज उभे राहते: १. मनोज कुमार हेमाच्या गळ्यात हात घालतोय असे दाखवायचे आणि २. तो हात त्या छोट्या खिड्क्यांमधून प्रेक्षकांना दिसला पाहिजे हे बघायचे. त्यामुळे तिसरेच कोणीतरी दोघांना एकत्र आणत आहेत असे वाटते. कदाचित निसर्ग निसर्ग म्हणतात तोच असावा. कारण अशा वेळेस निसर्ग आपले काम करतो असे म्हणतात. मग आजूबाजूला एकमेकांवर आपटणारी फुले नसल्याने कॅमेरा वरती जातो. तेथे एक खजुराहो शिल्प उपलब्ध असते. किती द्रष्टे शिल्पकार असतील त्या काळी!
पण क्रांतिकारकांनी खाजगी कामे गुप्तपणे करताना गुहेबाहेर आपले टांगे उभे करू नयेत हा क्रांतीचा पहिला नियम मनोज कुमार विसरतो, आणि पकडला जातो. हेमा "मै तालाब मे नहाने जा रही हू" मुळे तेथे नसते. हेमा तालाबमे, पण कॅमेरा मनोज कुमार वर, म्हणजे स्क्वेअर कट मारल्यावर डीप फाईन लेग ला कॅमेरा नेणार्या एखाद्या क्रिकेट कॅमेरामनने येथे शुटिंग केले असावे. प्रेम चोप्रा मनोज कुमारला मारणार तेव्हढ्यात शशी तेथे येतो व असे ठरते की सर्वांना जहाजावर घेऊन जायचे, गुलाम म्हणून. तेथील वादविवादांमधे स्क्रिपराईटरला सिरीयस writer's block आलेला दिसतो. कारण सुमारे पंधरा मिनीटे मदन पुरी, शत्रुघ्न, मनोज कुमार व हेमा यांचा शब्दकोष कुत्ते, कमीने व हरामजादे यापुढे जात नाही. शेवटी जो सर्वात जोरात किंवा सर्वात जास्त वेळा कुत्ते म्हणेल तो या वादात जिंकला असे समजून प्रेक्षकांनी पुढे जावे.
मग असे ठरते की टॉम ऑल्टर चा दारूचा ग्लास जेव्हा रिकामा होईल तेव्हा सर्वांना उडवायचे (आता मला लक्षात आले अर्धी दारू पिल्यावर सुद्धा 'ग्लास अर्धा भरलेला आहे' असे ऑप्टिमिस्टिक लोक का म्हणतात ते). परवीन व सारिका या अधूनमधून कहानीकी माँग पुरी करत असतात. थोडीफार हेमासुद्धा. टॉम आल्टर तिला व मनोज कुमारला तोफेच्या तोंडी देण्याआधी एक गाणे म्हणायला लावतो पावसात. आता इतक्या वेळचा अनुभव घेऊन सुद्धा त्यांच्या हे लक्षात येत नाही की कोणाला तोफेच्या तोंडी द्यायचे असेल तर आधी गाणे म्हणू देऊ नये, नंतर नक्की काहीतरी गडबड होते. जगावर सोडा, यांनी इंग्लंड मधे सुद्धा कसे राज्य टिकवले त्यांचे त्यांनाच माहीत. मग हेमाचे विविध शॉट्स सर्वांनी बघावेत म्हणून पुन्हा एकदा प्यार कर ले घडी दो घडी होते.
मग "पुराने मंदिर के पीछे" दिलीप कुमार आणि मनोज कुमार यांचा सामना. येथे केवळ तोंडातल्या तोंडात बोलण्यावरूनच हा आपला मुलगा आहे हे दिलीप कुमारने ओळखायला हवे होते. मग तेथे दोघांची फाईट सुरू होते. मग पुन्हा त्याची तलवार, याची तलवार, पहिल्या फटक्यात दोघांच्या तलवारी एकमेकांवर आपटणार, मग दोघांपैकी जो हीरो असेल तो दुसर्याला ढकलणार, मग पुढच्या फटक्यात एकाच्या तलवारीचे दोन तुकडे अशा मार्गाने लढाई चालते. या लढाईत एवढी पॉवर असते की आधी वादळ होते, मग विजा चमकतात, मग पाऊस पडतो आणि शेवटी शशी कपूरही येतो. दोघांना पकडून फासावर उभे केले जाते. तेव्हा ते "चना" गाणे होते.
नंतर प्रेम चोप्राच्या एका काडीमुळे शशी कपूर गद्दार आहे असा दिलीप कुमारचा समज होतो, व त्याला आणून फाशी देण्याचे ठरते. काल आपल्याला क्रांतीत सामील हो म्हणणारा दिलीप कुमार अचानक आपल्याला का गद्दार म्हणत आहे याचे शशीलाही काही आश्चर्य वाटत नाही. उलट तोच स्वतः फास आपल्या गळ्यात लावून घेतो. येथे खरे म्हणजे या एका संवादात काम झाले असते:
शशी: "गद्दार का म्हणून"?
दिलीप कुमार: "मी तुला सोडून दिल्यावर निघून जाताना तू मला मागून गोळी मारलीस"
शशी: "ती मी नव्हे, प्रेम चोप्राने मारली"
दिलीप कुमार: "ओह, ऊप्स! सॉरी. गद्दार पदवी कॅन्सल!"
पण नाही. त्याऐवजी १५-२० लंबेचौडे डॉयलॉग मारले जातात.
मग तेथे मनोज कुमार टपकतो. मग आणखी डॉयलॉग. क्रांतीचे नियम व क्रांतिकारकांनी दिलेल्या वचनांची वैशिष्ठ्ये एकमेकांना सांगितली जातात. मग इंग्रज येतात. त्यांना डॉयलॉगबाजीची सवय नसल्याने एकदम गोळीबार होतो. शेवटी इंग्रजांच्या किल्ल्यावर हल्ला करायचे ठरते. तेव्हढ्यात अजून एक गाणे घालायचे राहून गेल्याचे सर्वांच्या लक्षात येते. त्यामुळे आधीच एक जश्न होतो. तेथे हेमाने "दिलवाले, तेरा नाम क्या है..." अशी सुरूवात केल्यावर मग हजर लोकांपैकी प्रत्येकाचे नाव, गाव, इमान, पैगाम, पॅन नं "क्रांती" हेच आहे असे जाहीर होते. मग जंगी युद्ध होते. बरेच क्रांतिकारक मारले जातात. येथे दिलीप कुमारचा एक मल्टीगन शॉट आहे. म्हणजे सहा बंदुका एकीशेजारी एक लावून एकाच काठीने सगळ्यांचे ट्रिगर तो दाबतो. काठीचा "lever" सारखा उपयोग करून सुद्धा सहाच्या सहा बंदुकांचे ट्रिगर तो एकाच दिशेला दाबू शकतो (रजनीला अजून बरेच शिकायचे बाकी आहे). तसेच एक फुटाच्या अंतराने समांतर उडणार्या सहा बंदुकांतील गोळ्यां मुळे शंभर दीडशे फूट पांगलेले इंग्रज मरतात.
मग मला सर्वात आवडलेला शॉट म्हणजे क्लायमॅक्सला दिलीप कुमार आणि प्रदीप कुमार समोरासमोर येतात तो. दिलीप कुमार त्याला बंदुकीने गोळी मारायच्या आधी बराच वेळ थांबलेला दिसतो. कदाचित विचार करत असेल, "गोली की क्या जरूरत है, तेरे लिये तो मेरी अॅक्टिंग ही काफी है"!
मग येथे फ्लॅशबॅक परत येतो. कुणाल गोस्वामी सुरूवातीलाच दाखवला आहे. तो कॅमेर्याकडे जसा बघतो त्यावरूनच तो मनोज कुमारचा मुलगा आहे हे लक्षात येते. मनोज कुमार पिक्चर्समधे कधीकधी जेव्हा पूर्ण डोळे उघडतो आणि कॅमेर्याकडे बघतो ती नजर तमाम तरूणींच्या हृदयाची धडकन आहे असा पक्का समज झाल्याने कुणालही ही प्रयत्नपूर्वक तसाच बघतो.
मग त्याला ही हकीकत कळाल्यावर त्या माळरानातून तो जी उडी मारतो ती थेट प्रेम चोप्राच्या बेडरूममधे, आणि त्याला तेथेच मारतो. मग युनियन जॅकला उडवून तेथे क्रांती ही अक्षरे हिन्दी व उर्दूतून लिहीलेला झेंडा धनुष्यातून बाणासारखा मारून थेट उभा करतो. मग उगवत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर अशा क्रांतीतून पुढे भगतसिंग ते गांधीजींपर्यंत अनेक लोक कसे पुढे आले वगैरेचा आढावा घेतला जातो. फक्त यातील इंग्रजांविरूद्ध हुकमी जिंकण्याचा "चणे, गाणे व नाचणार्या हिरॉइन्स" फॉर्म्युला पुढच्या लोकांनी का सोडून दिला हे गूढच राहते.
प्रतिक्रिया
हुश्श!! गोंधळ झाला डोक्यात
हुश्श!! गोंधळ झाला डोक्यात नुसत वाचूनही! (चित्रपट मी पाहिलेला नाही हे वेगळं सांगायला नको!!)
तुमची कमाल आहे - एवढ सगळं समजून घेऊन ते आम्हाला सांगण! त्या दिग्दर्शकाला पाठवा हे!! म्हणजे त्यालाही कळेल त्याने काय केलय ते! बाय द वे, दिग्दर्शक कोण?
तुमची काही काही वाक्य एकदम भारी आहेत - << हिंसक किंवा अहिंसक दोन्ही उपायांव्यतिरिक्त एक बॉलीवूडी उपाय होता असे सिद्ध झालेले आहे.>> << बांधलेले लोक व हे नंतर उपटलेले फेरीवाले एकमेकांना डोळे मारतात तो भारतीय परंपरेचा एक भाग असावा असा बहुधा इंग्रजांचा समज असतो. म्हणजे लोक एकमेकांना भेटले की नमस्ते करतात तसे काहीतरी. >> - अनेक.
हा बहुधा विनोदी चित्रपट असावा - 'क्रान्ती' या विषयावरचा. स्वातंत्र्य वगैरे मिळालं होतच तोवर, मग कशाला उगीच गंभीर चेहरे करायला लावायचे नट-नटयांना आणि प्रेक्षकांना असा सूज्ञ विचार कदाचित दिग्दर्शकाने केला असेलही! आपण आपला संशयाचा फायदा द्यावा अशीही आपली एक परंपरा आहे ना!!
***
अब्द शब्द
एक आठवण सांगतो या
एक आठवण सांगतो या चित्रपटाविषयी.
लहान होतो मी. सहावी सातवीत असेन. त्यावेळी व्यवहार काही कळायचा नाही. वडील तहसिल कार्यालयात होते. त्यावेळी तिकीटांवर प्रत्येक शो च्या आधी करमणूक टॅक्स देण्यासाठी तहसिल कार्यालयात शिक्के मारायला लागायचे.
लक्ष्मी थेटरमध्ये हा क्रांती चित्रपट लागलेला होता. मी एका दिवशी सहाच्या खेळाचे तिकीट काढले अन काही कारणामुळे मी चित्रपट पहायलाच गेलो नाही. दुसर्यादिवशी हेच तिकीट वापरू हा विचार डोक्यात होता. मग दुसर्या दिवशी मी चित्रपटगृहावर गेलो. डोअरकिपर म्हणून गल्लीतलेच एक गृहस्थ उभे होते. ते तेथे नोकरीला नव्हते पण त्यांच्या ओळखीचे थेटर असावे अन ते वडीलांनादेखील ओळखत होते. त्यांनी माझ्याकडचे तिकीट कालचे असल्याचे सांगितले. पण मला त्यांनी आतमध्ये सोडले अन मी चित्रपट बघीतला.
अर्थात त्याकाळी वडीलांचे काम करमणूक कर विभागातच असल्याने त्यांचे नावजरी सांगितले असते तरी तिकीट विकत न घेता मला जाता आले असते म्हणा. पण तेवढी अक्कल नव्हती आलेली.
या चित्रपटाची गाणी श्रवणीय आहेत हे नक्की.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
हरे राम!
फारएण्ड बाबू, तुमच्यासारखे महान लोकं आहेत म्हणून आम्हाला असे कठीण विषयही ऑप्शनला टाकावे लागत नाहीत. मला अजून एक प्रश्न आहे, त्या उई शमाशा हुई का काय त्या गाण्यात हेमा आणि मनोज कुमारला अनुक्रमे मासेमारीचं जाळं आणि बैलगाडीच्या पुढच्या भागावर (बैल* जोडतात तिथे) ठेवून दाण्यांसारखं पाखडतात का?
आतिवासने उल्लेख केलेली आणि ही वाक्यं भयंकर आवडली:
त्याला एण्ट्रीगिरी करायला वेळ दिलेला नाही. एखादे एण्ट्रीवाले जोशपूर्ण गाणे नितीन मुकेशच्या आवाजात म्हंटले तर लोकांचा हा नक्की जहाल गटातील आहे की मवाळ याबद्दल गोंधळ निर्माण होईल म्हणून ते कट केले असावे.
"गोली की क्या जरूरत है, तेरे लिये तो मेरी अॅक्टिंग ही काफी है"!
* इथे काळ्या मठ्ठ बैलाचा काहीही संबंध नाही, हे गाणं उजेडात घडतं, अंधारात नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा मी थेटरात जाउन पाहिलेला
हा मी थेटरात जाउन पाहिलेला पहिला वहिला हिंदि चित्रपट.
सहाजीकच त्या नंतर बॉलीवूडपटांचा इतका धसका घेतला की पार कालिजात जाईस्तव परत कधीच आई बाबांकडे थेटरात जाण्याचा हट्ट केला नाही.
मिठूणदा, भरतकुमार आदी मंडळी हे चित्रसृष्टीतले मैलाचे दगड आहेत यावर आमचा ठाम विश्वास आहे.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा
मैलाचे दगड
हे चुकून(Freudian slip) 'मैल्याचे दगड' असे वाचले.
प्रकाटाआ
प्रकाटाआ
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सेम पिंच
या लोकांच्या कलाक्षेत्रातल्या बद्धकोष्ठाचे हे परिणाम असावेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जबरदस्त
लेख वाचताना मला मायक्रोवेव्ह पॉपकॉर्नची आठवण येत होती. थोडावेळ शांतता आणि मग एकदम फटाक फटाक करत फुटणारी खुमासदार वाक्यं.
किती वाक्यं गोळा करायची? सगळाच लेख असल्या भन्नाट फटाक्यांनी भरलेला आहे.
+१
+१
सत्कार
जनहो, मी माझा सार्वजनिक सत्कार केला जावा अशी मागणी करतो. हा चित्रपट मी थिएटरमध्ये जाऊन (तिकीट काढून, अर्थातच) दो न दा पाहिलेला आहे. (कारणे काहीही असोत ;-))
या चित्रपटाचे परीक्षण तो रिलीज झाल्याझाल्या आले होते. त्यातले एक वाक्य आठवते आहे. 'मनोजकुमार या माणसाच्या दिग्दर्शनाच्या कल्पना चमत्कारिक आहेत. काही काही वेळा पडद्यावर आधी त्याचा हात येतो आणि मग त्याचा चेहरा. 'हात दाखवून अवलक्षण' म्हणतात ते हेच असावे!'
बाकी प्रेम चोप्रा बेष्ट. कोणशाशा बालिकेवर (सारिका?) जबरी करुन झाल्यावर 'हमनें तुम्हें कलीसे फूल बनाया, तुम्हें हमारा शुक्रगुजार होना चाहिये' हे वाक्य इतर कुणाच्या तोंडी शोभेल?
हा लेख आणि अशा 'आठवणीतले ब्रॅन्डस' ची कल्पना फार्फार आवडली. 'कुली' किंवा 'अमर अकबर अँथनी' वर फुडचा लेख यावा अशी प्रेमळ इच्छा आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
खुमासदार लेख
हॅ हॅ हॅ! 'क्रांती'च्यावेळचं तुमचं वय आणि असा चित्रपट थेटरात दोनदा पहा(वयास लाग)णे यावरून कारणांचा अंदाज करता येतो पब्लिकला
बाकी फारएन्ड, __/\__
मजा आली.. खुमासदार लेख झाला आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खुमासदार : +१
दोन्ही मुद्द्यांशी प्रचंड सहमत!
- (पुढच्या परिक्षणाची वाट बघणारा) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
मज्जा आली.
पण 'लुई शमाशा उई' म्हणजे काय म्ह्णे?
फारएन्डभाऊ, आता खरंच 'अमर अकबर अँथनी' होऊन जाऊदे.
'लुई शमाशा उई'
'लुई शमाशा उई' म्हणजे काय?
किंचित असहमत.' रिटर्न ऑफ जुवेल थीफ ' चा नंबर आधी लागला पाहिजे. अति प्रेक्षणीय चित्रपट.
शरण
फार एन्ड याना मी पुन्हा एकदा शरण आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
_/\_
हे थोर आहे! आवडलेली वाक्यं इथं द्यायची म्हणजे अर्धा-पाऊण लेख पुन्हा डकवावा लागेल.
किंवा अम्मामालिनी असल्याने ही (पु.शि.रेगे-esque) पुष्कळ चण-चण असावी
कणेकर
कणेकरांनी याचे परीक्षण लिहिले होते. " हा चित्रपट इंग्रजांना दाखवला तर ते आपणहोऊन भारताची दीडशे वर्षांची गुलामी स्वीकारतील".
अवांतर : आम्ही क्रांती पहायला जात आहोत असे सांगून बॉबी पाहिल्याचे स्मरते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अवांतर : आम्ही क्रांती पहायला
अवांतर : आम्ही क्रांती पहायला जात आहोत असे सांगून बॉबी पाहिल्याचे स्मरते.
पक्के वस्ताद हो तुम्ही (पहिल्यापास्नच).
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा
मस्त
"हे थोर आहे" - १००% सहमत! ऐसीअक्षरे वरचे आजपर्यंतचे सर्वात बेष्ट विनोदी लेखन.
बाकीच्यांसारखंच "अमर अकबर अँथोनी" च्या परीक्षणाच्या अपेक्षेत...
"एंट्रीगिरी" आणि "मल्टी-माँ-स्टारर" हे नवीन फेव्हरिट शब्द...
मल्टी-मॉ-स्टारर
'मल्टी-मॉ-स्टारर' हे नवे बिरुद आवडले.
परंतु या लेखात मांडलेल्या मतांशी अस्मादिक मुळीच सहमत नाहीत. उदाहरणार्थ,
गायन आणि नृत्य या कलांचा हिंदुस्थानी संस्कृतीत मोलाचा वाटा आहे. येथील सर्वसामान्य जनता आपला हा महान वारसा आता विसरून गेली आहे.(हा हन्त हन्त) आज जरी ते अस्वाभाविक वाटले तरी दीड-दोनशे वर्षांपूर्वी सर्वच लोक विविध प्रसंगी गात आणि नाचत असत. मग क्रांती करताना ते नाचत-गात होते यात विशेष ते काय?
- असे मोझेस आणि कर्ण या दोन इतिहास/पुराण प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यात घडल्याचे सर्वांनाच माहित आहे.
-हे तर आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत पूर्वापार चालत आलेले आहे. पहा 'रामायण' (अहाहा - "मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी. पुनि पुन कितनाहूं सुनिए सुनाये, हिय की प्यास बुझत न बुझाये. पुनि पुन कितनाहूं सुनिए सुनाये, हिय की प्यास बुझत न बुझाये.")
विस्तारभयास्तव इतकेच लिहीतो की एकंदरीतच, लेखकाला भारतीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणादायक ठरलेल्या या रामगढच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल आकस आहे असे दिसते. या महान चित्रपटाचे हे छद्मरसग्रहण संगा, भारत, करीम खान आणि शक्ती यांसारख्या थोर स्वातंत्र्यसेनानींच्या महान गाथेवर लांच्छन लावण्यासारखे आहे. त्याबद्दल लेखकाचा निषेध!
हुच्च.....
फारएन्ड ह्या अतिमानवाच्या सर्वच परिक्षनांचा आपण फ्यान आहोत.
अगदि ते धर्मेंद- विनोद खन्ना- अमरापूरकर्चं कुठलं तरी टुकार पिक्चर असू देत नाही तर पेटलेली "क्रांती". सारेच भन्नाट.
बादवे,
तेथील वादविवादांमधे स्क्रिपराईटरला सिरीयस writer's block आलेला दिसतो. कारण सुमारे पंधरा मिनीटे मदन पुरी, शत्रुघ्न, मनोज कुमार व हेमा यांचा शब्दकोष कुत्ते, कमीने व हरामजादे यापुढे जात नाही
बस्स? एवढच? अरे ते ऑल टाइम ग्रेट दृश्य आहे राव. विशेषत; मरण्यापूर्वी इंग्रजांचा लाचार मदन पुरी बद्धकोष्ठ झाल्यासारखे हावभाव करतो ते तर ब्येष्टच. आणि भाषाही कुठली? तरः-
व्हिलन टोंम ऑल्टर :- "यू हिंदुस्तानी कुत्ता" (भारतीयाने काढलेला ब्रिटिश अॅक्सेंट सहज जाणवेल असे)
मदन पुरी :- "मी नॉट कुत्ता. यूssssss कुत्ता. युsssssssवर पीपल कुत्ता." (खास अगदि एक एक शब्द नीट उच्चारत इंग्लिश उच्चार,व्याकरण्,व एकूणच भाषेची मा-बहन एक करतो. इतकी की शेवटी ह्याच्या इंग्लिशला वैतागून सगळे इंग्रज देशाबाहेर जातील का काय ह्या धाअस्तीने नाइलाजाने टॉम ऑल्टरला त्याला मारावे लागते.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आईशप्पथ कसला हसतोय!!!
आईशप्पथ कसला हसतोय!!!
दिलीप कुमार आणि मनोज कुमार सारखे दोन नमुने एकत्र चित्रपटात काम करतायत हे पाहून प्रेक्षकांनी का क्रांती केली नाही याचं वाईट वाटतंय...
धमाल परीक्षण
धमाल परीक्षण
.
मनोरंजक परीक्षण
परीक्षण मनोरंजक आहे...
हा पिक्चर बघायचा प्रश्नच कधी उद्भवला नाही!
एकतर मनोजकुमारचा दस नंबरी हा चित्रपट एकदा चुकून बघितला होता. त्याचं काय झालं की बाहेर व्हेअर ईगल्स डेअरचं पोस्टर बघून आत गेलो आणि एकदम दस नंबरी सुरू झाला!! पैसे फुकट जाऊ नयेत म्हणून बघत थांबलो, झालं!! पण तेंव्हापासून या मनोजकुमाराला आम्ही प्लेगाच्या उंदराप्रमाणे टाळतो!!!
त्यातून या क्रांती पिक्चरची गाणी टीव्हीवर वारंवार दाखवीत असत.
त्यात त्या 'प्यार कर ले घडी दो घडी' या गाण्यात लोकल स्वप्नसुंदरी हेमामालिनी ही त्या जहाजावरच्या पाण्यात एखाद्या लठ्ठ डुकरिणीसारखी लोळतांना बघितली आणि सबंध पिक्चर बघायची वासनाच गेली हो!!!!
एखादी रसदार जिलेबी जर कुणी फिशमार्केटमधल्या ओल्याचप्प जमिनीवर लोळवून मग "आता खा!" म्हणून आपल्या पुढ्यात धरली तर जशी वासना मरते ना, तस्संच झालं बघा!!!
अगागा...
अगागागा... चाळणीत पाणी घालून जीव देईल हो ती... इतकं नका हाणू तिला. ती बिच्चारी त्या मूर्ख दिग्दर्शकाची गुलाम. पोट काय काय करायला लावतं माणसाला त्याचं हे उदाहरणच...
पोट काय काय करायला लावतं
त्यातूनही मोठ्ठं असल्यामुळे झाकलेलं पोट!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
महान लेख व महान लेखक
फारएन्ड यांच्यासारखे समीक्षक गेल्या १०,००० वर्षात झाले नाहीत व होणार नाहीत!!!
जुन्या काळी सिनेमाचे वर्णन करताना जाहीरातीत लिहले असायचे फुटाफुटाला एक्शन!! तसे ह्या लेखात वाक्या वाक्याला स्फोट घडवले आहेत!
अवांतर - पिडांकाका जिलेबी फिशमार्केटातल्या ओल्या जमीनीतच नव्हे तर कुठेही पाडून समोर धरली तरी खायची इच्छा होणार नाही. हा फार तर ती जिलबी न्योताइमोरी (आधीक माहीतीकरता पुरुषांनी Nyotaimori व महीलांनी Nantaimori इमेज गुगला) पद्धतीने सादर केली तर खाउच म्हणा! पण भा.पो. त्या गाण्याच्या अदभूत नृत्याकरता हेमाअम्मा तयार कशी झाली हेच कळत नाही.
धमाल विनोदी
धमाल विनोदी परीक्षण.
संधी
हा चित्रपट पाहण्याची संधी आहे का अजून काही? असल्यास पहावा असा विचार आहे. पाहताना शेजारी या परीक्षणाची प्रिंट ठेवावी म्हणतोय.
(No subject)
बिपिन कार्यकर्ते
जबरदस्त परिक्षण. अस्सल
जबरदस्त परिक्षण. अस्सल फारएन्ड क्वालिटी. मोठ्या अपेक्षेने धागा उघडला आणि अपेक्षापूर्ती झाली....
( आवडले हेवेसांनल)
सिनेमा पाहिला नाहिय... पण कधी बघण्याचा योग आलाच तर सर्वात पहिला पॉपकॉर्न तुमच्या नावानी !!!
मुद्दाम वर काहाडत हाये ह्यो
मुद्दाम वर काहाडत हाये ह्यो धागा
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जबराट
जबराट क्रांतीविच्छेदन.
हा सिनेमा पाहून आल्यावर माझ्या एका मित्राने केलेली कॉमेंट लक्षांत आहे.
'वांती केल्याशिवाय क्रांती होत नाही.'
फार एन्ड भौ, एक्दम भारी.खूपच
फार एन्ड भौ, एक्दम भारी.खूपच मजा आली राव. मला नव्वदीतल्या लै वैट्ट सिनेमान्बद्द्ल लिहायचय फार काळापासून. आता प्रेरणा घ्यायलाच हवी.
___/\_____:D> :D> :D>
___/\_____:D> :D> :D>
धमाल परीक्षण.
जबरदस्त!
फारेन्डभाऊ, 'हिम्मतवाला' बसतोय का बघा बरं तुमच्या कक्षेत? नवीन यायच्या आधीच जुन्याबद्द्ल लिहून टाका, म्हणजे नवीन अधिक डोळसपणे बघता येईल.
बाप और बेटा
फारेण्डानुं,
https://www.youtube.com/watch?v=BQlMuTRJg6M (१:२०:४४)च्या पुढील या महान मारामारीतील (वाचकांनी जरुर लाभ घ्यावा!) एक बारीक बारकावा (तुमच्या फारेण्डीय) नजरेतून सुटल्यामुळे देत आहे:
बाप-बेट्याच्या या अपूर्व फायटीत ब्याकग्राऊंडला शंकर व गणपती यांच्या मूर्ती दाखवण्याच्या डायरेक्शनचा खालील अभ्यासविषयात सहज समावेश व्हावा:
पण शशिकलाचे वर्णन करताना राजा
पण शशिकलाचे वर्णन करताना राजा "तीन बार इसे मॉ बननेका मौका मिला, मगर ये मॉ न बन सकी....इस बार...वरना इसके पती, फतेहगढके महाराज चंपकसिंगजी दुसरी शादी कर लेंगे (तेथे एक 'महाराज' मिशी पिळताना दाखवलाय)" असे सांगतो. तिला मूल नाही ही माहिती प्रेक्षकांना बास आहे की. बाकी डिटेल्स कशाला?
आई गं. वेड लागायची पाळी आली.
आई गं. वेड लागायची पाळी आली. परीक्षण (तेही लोळवणारं, म्हणजे पिक्चरला लोळवणारं, आणि वाचकांना हसून लोळायची पाळी येते असं) करण्याइतका हा पिक्चर तुम्हाला कळलाय, हेच मुळात आश्चर्यकारक आहे!
इतक्यात "रूद्राक्ष", "अय्या", "कसम पैदा करनेवाले की" असे अनेक नमूने बघायची वेळ आली, पण त्या कशातही इतकं मोठठं बोडण नव्हतं.
धत्तड तत्तड
film actor manoj kumar get dada saheb falke award:
इथल्या सर्व कलासक्तांचे खुप खुप अभिनंदन.