भारताची प्रगती २: घृतं पीबेत
बिच्चारा चार्वाक!
अत्यंत महत्त्वाचं एक दर्शन मांडूनही लोकांना तो माहीत असतो केवळ 'ऋणं कृत्वा घृतं पीबेत' या ओळींनी. 'कर्ज काढा आणि तूप प्या लेको. पुढच्या जन्माची कशाला काळजी करता, पुनर्जन्म वगैरे काही नाही.' असा साधारण त्या वाक्याचा गोषवारा. वाक्य वाचून त्याची विचारसरणी म्हणजे हलकटपणाचा कळस वाटते. वाटणारच, कारण ते वाक्य त्याने लिहिलेलं नाहीच. त्याच्यावर टीका करणाऱ्याच्या लेखणीतून ते आलं आहे. म्हणजे न्यूटनचं सगळं कार्य बहुतांशी विसरलं जाऊन त्याच्याविषयी 'यडपट माणूस. त्याने स्वतःसाठी एक दार केलं आणि मांजरीसाठी दुसरं लहान दार केलं...' एवढंच लक्षात राहिल्यासारखं.
पण हा लेख चार्वाकाविषयी नाही. त्याच्या तत्वज्ञानाविषयीही नाही. वरच्या किश्श्यातला 'घृतं पीबेत' हा शब्दप्रयोग फक्त इथे उपयुक्त आहे. आणि तूप पिण्यासाठी कर्ज काढण्याची गरज पडत होती हेही.
पूर्वीपासूनच दूध-दुभतं, लोणी-तूप हे समृद्धीचं लक्षण समजलं जात असे. अगदी वेदकाळापासून. ऋग्वेदात सरमेची कथा आहे. ही इंद्राची कुत्री. इंद्राच्या गायी शेजारच्या राजाने पळवून नेल्या. त्या शोधण्यासाठी त्याने गरुडाला पाठवलं. गायींचा माग काढत आलेल्या गरुडाचं त्या शेजाऱ्याने अत्यंत गोड शब्दांनी स्वागत केलं. त्याची बडदास्त राखली. त्याला रोज दही, दूध, लोणी दिलं. ते खाऊन संतुष्ट झालेला गरुड इंद्राकडे हात हलवत परत आला. खोटंच सांगितलं, शेजारी काही गायी नाहीत. इंद्राला संशय येऊन त्याने त्याची मान पिरगळली. घशातून दही बाहेर आलं. नंतर पाठवलेल्या सरमेने मात्र ही दह्यादुधाची लाच स्वीकारली नाही. उपाशी राहिली. परत येऊन इंद्राला त्याच्या गायी शेजारच्या राजाकडे आहेत हे सांगितलं. तेव्हापासून कुत्रा हा माणसाचा मित्र होऊन राहील असं वरदान इंद्राने दिलं. सांगायचा मुद्दा काय, की त्या काळी संपन्न राजाची संपत्ती लाटण्यासाठी दूध, दही, लोणी, तूप ही लाच पुरेशी असायची. आजकाल हजारो कोटींचे घपले होतात.
भारताच्या प्रगतीचा आढावा घेताना तुपाचं उदाहरण घेण्याचं कारण म्हणजे तूप हे गरज आणि चैन यांच्या सीमारेषेवर कुठेतरी आहे. शरीराला मेदाची गरज असते. ती तेलाने भागवता येते, तुपाने भागवता येते. तेलं स्वस्त असतात तर तूप महाग. पण तुपाला एक तुपाचा घमघमाट, आणि लोण्याची मऊसूत स्निग्ध चव याविषयी वेगळं काही सांगायला नको. कांदाभाकर, मीठभाकर खाणाऱ्या जनतेला तूप पोळी मिळायची ती सणासुदीलाच. आनंद यादवांनी त्यांच्या आत्मचरित्रपर कादंबरीत त्यांच्या लहानपणचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या घरी गायी, म्हशी होत्या. म्हणून घरात दूध कायम असायचं. पण तेही प्रत्येक भावाला वाट्याला दररोज थोडं दही किंवा दूध येईल इतपतच. कारण उरलेलं सर्व रतीबाला जायचं. घरी गायी नसलेल्यांची तर परिस्थिती याहून बिकट.
मग सध्या परिस्थिती काय आहे? आणि मुख्य म्हणजे ती पूर्वीपेक्षा चांगली आहे, वाईट आहे की तशीच आहे? ते पहाण्यासाठी आपण काही आकडेवारी तपासून बघू. सर्वप्रथम देशभरात एकंदरीत किती लोणी/तुपाचा उपभोग (कंझम्प्शन - यासाठी मी तूप खाणं किंवा पिणं असे सुटसुटीत शब्दप्रयोग वापरणार आहे) झाला ते पाहू. (मूळ विदा जालावरून साभार).
आलेख क्र. १ मध्ये य अक्षावर एकंदरीत लोणी/तूप हजार टनांत आहे, तर क्ष अक्षावर वर्ष दाखवलेलं आहे. त्यातून हे स्पष्ट होतं की भारतीय जनतेच्या पोटात शिरणारं तूप १९६४ सालापासून मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. जवळपास दहापट झालेलं आहे. अर्थात तूप पिणं वाढलं आहे हे कळलं तरी त्यातून पूर्ण चित्र मिळत नाही. कारण त्याच काळात लोकसंख्याही वाढली. म्हणून सरासरी दरडोई दिवसाला किती तूप खाल्लं गेलं हे आपल्याला शोधून काढायला हवं.
.
.
.
.
.
.
.
.
.
आलेख क्र. २ मध्ये य अक्षावर दरडोई दर दिवशी ग्रॅममध्ये हीच आकडेवारी मांडलेली आहे. १९६४ सालापासून २०१२ पर्यंत हा आकडा चौपट झालेला दिसतो. तूप दहापट, लोकसंख्या अडीचपट, दरडोई चौपट. या आलेखात एक विचित्र गोष्ट मात्र दिसते. ६४ ते ७३ हा आकडा थोडा कमी कमी होतो आणि ७४ साली एकदम २५% वाढून पुन्हा लायनीवर येतो. मग पुढची काही वर्षं पुन्हा सपाट रहातो. कुठच्याही हळू बदलणाऱ्या आकड्यात अशी एकदम उडी दिसली की ती थोडी काळजी करण्यासारखी असते. इथे माझा अंदाज असा आहे की मोजमापाच्या पद्धतीत अचानक बदल झाल्यामुळे ती दुरुस्ती झाली असावी. तेव्हा ६४ ते सुमारे ८० पर्यंत तो आकडा स्थिर होता असंच गृहित धरणं योग्य वाटतं. ८१ ते ८६ च्या दरम्यान दरडोई तूप खाणं वाढायला सुरूवात होते. आणि ८७ नंतर निश्चितच वाढ झपाट्याने सुरू होते.
.
.
.
.
हे चित्र स्पष्ट होण्यासाठी पुन्हा दरडोई तुपाचा आलेख लॉगॅरिथमिक स्केलवर दिलेला आहे. त्यात हा दिशाबदल अधिक स्पष्ट दिसतो. याचा अर्थ ८० पूर्वी एकंदरीत तुपाची वाढ ही लोकसंख्यावाढीशी जेमतेम बरोबर होती. याउलट ८६ नंतर हा वाढीचा दरच झपाट्याने वाढला व पुढची २६ वर्षं साधारण कायम राहिला. थोडक्यात लोकसंख्या सुमारे पावणेदोन टक्क्यांनी वाढली तर तूप पिण्यातली वाढ सुमारे पावणेआठ टक्क्यांनी झाली. त्यामुळे सुमारे सहा टक्क्यांनी (५.९% ची रेषा आलेखावर दाखवली आहे) दरवर्षी दरडोई तूप पिणं वाढलं. दर बारा वर्षांत दुप्पट! हे भूतो न भविष्यती आहे.
.
.
.
.
मला सहज सापडलेला विदा गेल्या सुमारे चाळीस वर्षांचाच आहे. पण १९६४ सालपेक्षा भारतातलं तुपाचं प्रमाण त्याआधी फार चांगलं नव्हतं असं गृहित धरायला हरकत नाही. यासाठीचा काही विदा अस्तित्वात नाही. मात्र गेल्या शतकात गायींच्या जाती, पास्चरायझेशन, दूध रेफ्रिजरेट करणे, व एकंदरीतच डेअरी व्यवस्थापनामुळे जगभरच हे प्रमाण वाढलेलं आहे. १९०० ते २००० या काळातल्या अमेरिकेतल्या दूध उत्पादनाबद्दलच्या एका अहवालाच्या सारांशामध्ये खालील वाक्यं आहेत.
Over the span of the past 100 years, the U. S. dairy industry has seen a nearly 6-fold increase in the average yield per cow, a truly remarkable biological phenomenon. This large increase can be partitioned into about 1/3 from genetic gain, and 2/3 from better nutrition and a wide array of improved management skills and technologies.
त्यामुळे १९६४ सालापूर्वी कधीतरी तूप अधिक प्रमाणात उपलब्ध होतं यावर विश्वास ठेवायला कठीण जातं.
तुम्ही म्हणाल ठीक आहे, तूप पिणं वाढलं हे खरं आहे. अगदी दरडोई चौपट झालं. पण म्हणजे प्रगती झाली कशी काय? समजा पूर्वी शंभरातले चार लोकं सगळं तूप प्यायचे. आता तेच चार लोक चौपट तूप पितात. याला प्रगती कशी म्हणणार? नगरीनिरंजन यांनी हाच सरासरीचा मुद्दा मांडलेला होता. त्याला उत्तर दिल्याशिवाय 'प्रगती झाली' असं म्हणता येणार नाही.
हे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला याच आकड्यांमध्ये अधिक खोलवर जावं लागेल. व काही गृहितकं धरावी लागतील. कारण असा प्रत्यक्ष विदा मला तरी सापडलेला नाही. पण काही ठोकताळे बांधता येतात.
गृहितक
१. लोकसंख्या शंभर लोकांमध्ये (पर्सेंटाइल्समध्ये) विभागली आहे. १ सर्वात श्रीमंत, २ त्याहून थोडा कमी श्रीमंत... १०० हा सगळ्यात गरीब.
२. जे काही तूप असेल त्यातलं सर्वात श्रीमंत आपल्याला पिता येईल तितकं तूप पितो. नंतर क्रमांक दोन आपला हिस्सा घेतो. असं करत तूप संपत जातं, आणि कमी श्रीमंत लोक तूप घ्यायला येतात. तूप कमी असेल तर एक वेळ अशी असते की त्या माणसाला जास्तीत जास्त तूप पिणं परवडत नाही. तो थोडं कमी घेतो. असं करत करत एका वेळी तूप जवळपास संपून जातं. आणि जसजशी गरीब लोकांची पाळी येते तसतसं त्यांना मिळणारं तूप जवळपास शून्य होत जातं.
३. माणूस कितीही श्रीमंत असला तरी एका विशिष्ट मर्यादेपलिकडे तूप पीत नाही.
शेवटचं गृहितक सर्वात महत्त्वाचं आहे. माणसाच्या गरजा अमर्याद आहेत हे अर्थशास्त्राचं मूलभूत गृहितक आहे. पण या अमर्यादतेला मर्यादा घालणारं दुसरंही तत्व आहे. डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचं. मनुष्याच्या शरीराच्याच मर्यादा अशा आहेत की कितीही श्रीमंत माणूस झाला तरी त्याला एक किलो तूप दिवसाला खाणं शक्य नाही. दहा ग्रॅम तूप खाल्ल्यावर अकरावा ग्रॅम तूप खाण्याने तितकासा आनंद मिळत नाही. त्यापेक्षा इतर गोष्टींकडे तो आपलं लक्ष वळवतो. मी गणितापुरती ही मर्यादा दिवसाला १५ ग्रॅम अशी धरलेली आहे. हा आकडा कमी वाटत असला तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की भरपूर तूप खाऊ शकणारे भरपूर अंडी, मांस, फळं, तेलकट व गोड पदार्थ खाऊ शकतात. तेव्हा दिवसाला सुमारे ३० ते ५० ग्रॅम मेदातलं १५ ग्रॅम निव्वळ तुपातून येतं हे गृहितक अगदीच चुकीचं नाही. प्रत्यक्षात हा आकडा १५ ऐवजी २० असला तरी एकंदरीत युक्तिवादात बदल होत नाही.
या मॉडेलप्रमाणे, जर आपल्याला १९८० सालापासून असलेलं तूप कुठचे लोक किती पितात हे शोधून काढायचं झालं तर ते चित्र खालीलप्रमाणे दिसेल. यात दिसणारा कर्व्ह काहीसा अंदाजे काढलेला आहे. तो अचूक असण्याची गरज नाही. जो काही कर्व्ह आहे तो समाजातलं तुपाचं प्रमाण वाढलं की उजवीकडे सरकत जाईल हे सगळ्यात महत्त्वाचं.
या आलेखावरून दिसतं की तूप पिण्याबाबतीतली विषमता गेल्या तीसेक वर्षांत घटलेली आहे. १९८० साली फक्त पहिल्या पाचेक टक्क्यांनाच खऱ्या अर्थाने भरपूर तूप मिळायचं. पुढच्या चाळीस टक्क्यांना ते कमी कमी मिळत जवळपास शून्य व्हायचं. याउलट आता पहिल्या पन्नास ते साठ टक्क्यांना भरपूर तूप मिळतं. व पुढच्या चाळीस टक्क्यांना ते कमीकमी मिळत जातं. फक्त तुपाचा विचार केला तर असंही म्हणता येईल, की वाढत्या संपन्नतेचा फायदा गरीबांना सगळ्यात अधिक झाला. उदाहरणार्थ, विसाव्या टक्क्यावर असलेल्या माणसाला मिळणाऱ्या तुपात ७ ग्रॅमपासून १५ पर्यंत वाढ झाली. तिसावा टक्क्यासाठी हा आकडा ३ वरून १५ वर गेला. चाळिसाव्या टक्क्याच्या माणसासाठी हीच वाढ १ ग्रॅमपासून १४ ग्रॅमपर्यंत झाली. सरासरी दरडोई उत्पादन वाढलं तरी विषमता वाढली, आणि गरीबांचा तोटा झाला असं सर्रास म्हटलं जातं. त्यामुळे वितरणाकडे पहाणं महत्त्वाचं ठरतं. या मॉडेलप्रमाणे वितरणाचं चित्रही आशावादी दिसतं.
त्यामुळे तूप पिणं ही एकेकाळी अगदी मोजक्या श्रीमंतांची मक्तेदारी असली तरी आता ते बहुजनांना परवडायला लागलं आहे. कोरडं घड्याळ-टिपरू जेवण तुपाचा थेंब घालून चवदार करता यायला लागलं आहे. जीवनाच्या खडखड करणाऱ्या चाकांना थोडं तुपाचं वंगण घालून सुसह्य झालं आहे. याला मी प्रगतीच म्हणेन.
प्रतिक्रिया
पहिला परिच्छेद वाचून 'बिग
पहिला परिच्छेद वाचून 'बिग बँग' किंवा 'महास्फोट' हे खिल्ली उडवण्यासाठी टीकाकारांनी वापरलेलं नाव आठवलं. आता हेच नाव सर्वमान्य आहे. असो.
लेख आवडला.
या सुमारासच भारतातही दशमान पद्धतीची एककं (मैल, पाऊंड, फूट-इंच यांच्या जागी किमी, किलो, सेमी) अशी एककं वापरायला सुरूवात झाली का?
गृहीतकांमधे तूप वर्षानुवर्ष टिकतं आणि त्याचीही साठेबाजी शक्य आहे याचा विचार नाही का? (आजोबांकडे जुनं गायीचं तूप औषधी म्हणून म्हटलं तर थेंबभरच तूप ठेवल्याचं आठवत आहे. त्यामानाने माझ्या घरात अगदी अलिकडपर्यंत संपत नाही म्हणून म्हशीच्या दुधाचं तूप महिनोनमहिने पडून असायचं. यथावकाश जवळच्या मित्रमंडळात कन्यालाभ, पुत्रलाभ वगैरे झाल्याला काही वर्ष झाली आणि त्या सगळ्यांकडे माझ्याकडून रतीब सुरू झाला.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाफीसातून ग्राफ दिसत नसल्याने
हाफीसातून ग्राफ दिसत नसल्याने सध्या तर्काबद्दल तितकेसे बोलता येणार नाही.
मात्र सदर लेख हा सगळ्या प्रकारच्या तुपाबद्दल आहे असे समजतो. जस जसे तुप सर्वांपर्यंत पोचले तसे 'श्रेष्ठ' तुप आणि 'कनिष्ठ' तूप अशी भानगड उच्च्भ्रुंनी सुरू केली आणि तुप मिळुनही बहुजन वर्गाला संतुष्टता मिळाली का? हा प्रश्न आहे. प्रगती होणे आणि प्रगती झाली आहे हे पटणे असे दोन भाग असावे. आकड्यांची प्रगती दिसूनही प्रगतीचा भास - पर्सेप्शन (समाजकारण हे ही राजकारणाप्रमाणे पर्सेप्शनवर आधारीत आहे) का होत नाही याचेही कारण या लेखमालेतून शोधायला हवे असे वाटते.
बहुजनांपर्यंत पोहोचलेल्या तुपाला [जसे वनस्पती तूप-डालडा] तुप म्हणावे का खरे तुप (साजुक) अजुनही फारच थोडा वर्ग घेतो असा (अप)प्रचार करून आपले श्रेष्ठत्त्व जपण्याचा झालेला(अजुनही होतो) प्रयत्न बहुजनांपासून अंतर राखण्यासाठीच आहे असे प्रतिपादनही करता यावे का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
साजूक तूप
नाही. या लेखातली आकडेवारी ही केवळ लोणी वा त्यापासून बनलेलं तूप (बटरफॅट) विषयी आहे.
अर्थातच. त्याचं थोडक्यात कारण म्हणजे बार उंचावतो. आपल्याला आपलं आयुष्य किती सुखकर झालं आहे याची कल्पना येत नाही. कारण आपण तुलना गेल्या काही वर्षांशी करत असतो. वीस वर्षांपूर्वीचं आयुष्य ज्याला आठवतं त्याला वस्तूंपेक्षा तारुण्य आणि तो काळ आठवतो. तो गेलेला काळ कुठच्याच वस्तूंनी भरून काढता येत नाही.
काहि क्षेत्रातच
हे इतकं सरळ नसावं.. बदल आनि प्रगती अनेक क्षेत्रात झाली आहे मात्र काहि ठराविक क्षेत्रातील प्रगतीला सामान्यतः प्रगती म्हणून पाहिलं जातं तर काहिंच्या बाबतीत बार उंचावर जातो असं का होत असावं? उदा. टेलिकॉम क्रांती ही बहुजनांना सुखावह वाटते. 'मोबाईलची-फोनची सोय' याबद्दलची कवतिके अनेकदा ऐकु येतात. (कंपन्यांना नावे ठेवोत) फ्रीज पेक्षा आमच्यावेळच्या फडताळात पदार्थ काय नीट टिकत असं कोणी म्हणताना आढळत नाही. मग काहि क्षेत्रातच प्रगती झाल्याचं पर्सेप्शन कसं येत असेल?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शोध
आकडेवारीचा शोध चांगला आहे.
सविस्तर प्रतिसाद नंतर.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
वाचतो आहे.
७५ सालाच्या आसपास दिसणारा बंप बहुदा 'व्हाईट रेवल्युशनचा' भाग असावा. (चुक नसावी). ६४ ते ७५ पर्यंत उत्पादनाचा रेट फारसा वाढलेला दिसत नाही (लेखातील दुव्यानुसार), पण लोकसंखेच्यावाढीच्या दरामुळे कर्व्ह खाली जातो आहे असे भासत असावे (चार्ट नं. २). ७५ साली २५% उत्पादन वाढ आहे.
-Nile
स्मरणरंजनावर
अगदी साजुक उतारा. पुढच्या अशाच उत्तम लेखांची वाट बघत आहे.
मस्त
छान लेख, आकड्याचे खेळ पाहून गम्मत वाटली, पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
अवांतर - BPL survey मधे "तुपाचे कंझम्पशन" असा इन्डिकेटर टाकावा काय?
छान
छान.
या वाक्यांपुढील भाग नीटसा कळला नाही.माझ्या मते आलेखातून गृहीतकेच चित्रमय प्रकारे दिसत आहेत, त्यावेगळे काहीच दिसत नाही.
विदा नसतानाचा अंदाज
प्रत्यक्ष विदा नसल्यामुळे वितरण कसं असेल याविषयीचा अंदाज चित्रमय पद्धतीने मांडला आहे. तो अंदाज करण्यासाठी काही विशिष्ट नियम पाळले आहेत एवढंच सांगणं आहे. ते नियम कुठचे हेही सांगितलं आहे, ज्यायोगे इतरांना माझं चित्र तपासून पहाता येईल. आधी चित्र मांडून मग ते नियम कुठचे हे सांगितलं असतं तरी फरक पडला नसता.
मला बहुतेक तुमचा आक्षेप नीट कळलेला नाही. नक्की काय अपेक्षा होत्या?
काय चालू आहे हे कळलेच नव्हते
कारण त्या भागाची प्रस्तावना अशी आहे (अधोरेखन माझे) :
आणि गृहीतकांपैकी एक असे आहे :
या गृहीतकातच प्रस्तावित प्रश्नाचे खंडन केलेले आहे. कारण जर तूप पिण्याची कमाल मर्यादा असेल, तर की जे लोक पूर्वी त्या कमाल मर्यादेच्या एक-चतुर्थांशापेक्षाचे जास्त तूप पीत असत, ते आता चौपट तूप पीतच नाहीत - पिऊच शकत नाहीत. त्यामुळे गृहीतक मानले तर प्रस्तावनेतला प्रश्न या गृहीतकातच बाद होतो. (आणि गृहीतक नाही मानले, तर पुढचे विश्लेषण करता येत नाही.)
जर गृहीतकातच प्रश्नाचे उत्तर/खंडन आहे, तर मग परसेंटाइले वगैरे काढण्यात काय हशील आहे? वितरण काही का असेना, कमाल मर्यादा असली, आणि सरासरी वाढत असली, तर कमाल मर्यादेपेक्षा कमी असलेली सँपले वितरणात वाढत असली पाहिजेत. वितरण कसे असेल (बहुधा कुठलेसे घंटेच्या आकाराचे वितरण तुम्ही वापरले आहे), त्याच्याबाबत गरज नसलेला अंदाज का करावा? (एका गृहीतकातच उत्तर दिलेले असेल, तर बाकी सर्व गृहीतके अनावश्यक अडगळ होतात. अनावश्यक अडगळ टाळावी.)
आता तुमचे गृहीतक जीवशास्त्राला धरूनच आहे. माझ्या मते अन्ननलिकेचा किमान व्यास अमुकतमुक असला, आणि अन्ननलिकेतील अन्नाचा कमाल वेग अमुकतमुक असला, तर किती तूप व्यक्ती पिऊ शकेल, त्याला कमाल मर्यादा असतेच. फ्वा ग्रा साठी बदकांची पैदास करताना त्या बदकांच्या घशात प्रयत्नपूर्वक मेद ढकलतात, पण तरी एका मर्यादेपेक्षा जास्त मेद ढकलले जाऊ शकत नाही. शिवाय मनुष्यांना मळमळून येते आणि (बदकांवेगळे) स्वतःहून प्राशन थांबवता येते. तेव्हा ही कमाल मर्यादा त्याहून खूप कमी असणार.
पण तुम्ही या गृहीतकाने जो प्रश्न विचारात घेतला आहे, तो "स्ट्रॉ-मॅन" प्रश्न आहे, आणि खरे तर तुपाच्या वापराला लागू नाही. तर मनुष्यांच्या स्वयंपाकात सर्वात अधिक तूप वापरणार्या पाककृती कुठल्या? त्या पदार्थाच्या आत अंगभूत होत नाही. खोल कढईत तळलेल्या पाककृतींमध्ये तूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते, पण त्या तुपाचा मोठा भाग नंतर (श्रीमंत घरात तरी, शिवाय स्वास्थ्याच्या-स्वादाच्या दृष्टीने) टाकून दिला जातो. आता यालाही मर्यादा आहेत. बहुतेक लोकांच्या घरातल्या कढईचा आकार प्रचंड नसतो... त्यामुळे तूप पिण्याची मर्यादा माणशी दिवशी १५-२० ग्रॅम असली (याहून खूप अधिक असते) तरी तूप वापरायची मर्यादा सहज पाव-अर्धा किलोपर्यंत जाऊ शकते. आणि सध्या जर दरडोई-दरदिवशी सरासरी तूप-उपभोग १० ग्रॅम असेल, तर वरची मर्यादा आहे, ही बाब तशी नि:संदर्भ होते.
जर गृहीतक ३ मानले, तर असेही पोट-गृहीतक मानावे लागते, की खिजगणतीत घ्यावी लागावी इतक्या प्रमाणात लोकांनी ती मर्यादा गाठलेली आहे. हे पोटगृहीतक मानल्यास पुन्हा कुठलेही नवे गृहीतक न घेता गणिते न करता प्रस्तावनेतल्या प्रश्नाचे आपोआप खंडन होते.
याच प्रमाणे शारिर मर्यादा असलेला कुठलाही माल घेतला (उदाहरणार्थ व्यायमशाळा-जिमनेशियम मध्ये व्यायामाचे तास [पैसे नव्हे!], पायात घातलेल्या जोड्यांची संख्या [कपाटातल्या जोड्यांची नव्हे!]) आणि गृहीतक ३ वापरले तर आपण म्हणू शकतो : जर सरासरी उपभोग वाढला, तर पूर्वी कमी उपभोग घेणार्यांचा उपभोग तुलनात्मक रीत्या अधिक वाढला. पायातल्या जोड्यांचे वितरण तर मुळीच घंटाकृती नाहीत. गृहीतक ३ वापरले तर वितरण काय ते मानण्याची काहीएक आवश्यकता नाही.
- - -
गृहीतकांतच प्रतिपक्षाचे खंडन करणारे युक्तिवाद मला सहसा आवडत नाहीत. "युक्तिवाद असा काही असेल, तर गृहीतके अशी असावीत की प्रश्नाच्या दोन्ही बाजूंना मान्य असावीत. जर प्रतिपक्षाचे गृहीतक मान्य नसेल, उदाहरणार्थ "चारपट तूप पिणे शक्य आहे" हे गृहीतक अमान्य असेल तर ते थेट सांगावे. जर प्रतिपक्षांना एकमेकांची गृहीतके अमान्य असतील तर थेट निरीक्षणाशिवाय कुठलाच पर्याय नसतो. अशा परिस्थितीत युक्तिवाद फोल असतात.
जर गृहीतक ३ मानले, तर कुठलेही
हे बरोबर नाही. समजा परिस्थिती अशी असती की ८० साली सरासरी दरडोई तूप ०.०२ ग्रॅम आहे. याचा अर्थ सर्वात श्रीमंत पहिल्या टक्क्याला २ ग्रॅम तूप मिळतं. जर ते चौपट झालं तरी तोच पहिला टक्का ८ ग्रॅम तूप पिईल. त्यामुळे एकंदरीत जनतेची परिस्थिती सुधारली हे विधान कमकुवत ठरतं. त्यामुळे १५ ची मर्यादा आहे व ८० सालीदेखील अस्तित्वात असलेलं तूप पहिल्या पाचदहा टक्क्यांना बऱ्याच प्रमाणात मिळत होतं हे गणिताने व त्यातून येणाऱ्या चित्रातून दाखवावं लागतं. गणिताचा दुसरा फायदा असा होतो की त्यावरून गरीबांची परिस्थिती तुपाच्या बाबतीत अधिक सुधारली आहे हे आकड्यांनिशी (मॉडेलच्या मर्यादांमध्ये) सिद्ध करता येतं.
हेही बरोबर नाही. कारण ती वरची मर्यादा किती आहे यावर अवलंबून आहे. गणित केल्याशिवाय ते ठरवता येत नाही. कळीचा मुद्दा हा आहे की बहुजनांचा फायदा झाला का? ह्या प्रश्नाचं उत्तर गणिताशिवाय देता येत नाही. या लेखाचा उद्देशच एके काळी पाच टक्क्यांना जे सुख मिळत होतं ते आजकाल साठ टक्क्यांना मिळतं असं दाखवून देणं हा आहे. यात पाच टक्के व साठ टक्के हे आकडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते वरच्या विधानातून येत नाही. शिवाय उपभोगासाठी प्रत्येक माणसासाठी वरची मर्यादा असते हे गृहितक त्यातून साधा निष्कर्ष बाहेर पडतो म्हणून का त्याज्य आहे?
हे पटत नाही. गृहितक ३ हे सर्वसाधारण श्रीमंतांचा तुपाचा वापर पाहून व मनुष्याच्या शरीराच्या मर्यादा पाहून घेतलेलं आहे. त्यावरून जर तुमच्या मनात आलेखातलं चित्र गणित न करताच आपोआप तयार होत असेल तर फारतर म्हणता येईल की थिअरम सिद्ध करण्यासाठी जास्त पायऱ्या वापराव्या लागत नाहीत. पण या मिताक्षरी ( ) सिद्धतेमुळे गृहितक दोषी ठरत नाही. १५ ग्रॅम असा काहीतरी एक आकडा वरची मर्यादा म्हणून असावा हे गृहितक बदलण्यासाठी आवश्यक विदा कोणी दिला तरी मी जरूर बदलेन. प्रत्येक निष्कर्षाच्या वेळी मी 'या मॉडेलप्रमाणे' असं म्हटलेलं आहे. अर्थातच त्यात गृहितकांमधल्या दुरुस्तीप्रमाणे निष्कर्षांची दुरुस्ती अपेक्षित आहे. तेव्हा या प्राथमिक मॉडेलचं खंडन करायचं असेल तर तुम्हाला गृहितक का पटलं नाही हे सांगा. मग सर्वांनाच मान्य होतील अशी गृहितकं शोधण्याचा प्रयत्न करू. गणित सोपं आहे ही तक्रार का आहे हे कळलं नाही.
गुरुत्वाकर्षणाच्या गृहितकातच सफरचंद पृथ्वीवर का पडतं याचं उत्तर दडलेलं आहे का? असल्यास ते गृहितक त्याज्य आहे का?
तुम्ही पूर्ण प्रतिसाद वाचलेला नसावा
वगैरे.माझ्या वरच्या प्रतिसादात हा भाग आहे :
त्यामुळे या प्रतिसादाचे उत्तर देत नाही.
"स्ट्रॉ मॅन" शब्दप्रयोग असलेला परिच्छेद तुम्ही वाचलेला नाही. त्यात गृहीतक ज्या रीतीने वापरले आहे, त्याबाबत दोष सांगितला आहे. तूप वापरणे आणि तूप पिणे यांतला फरक सांगितला आहे. तो पुन्हा सांगत नाही.
पिईल ऐवजी वापरेल
असा विचार करता वरील तर्क काही प्रमाणात सुयोग्य असावेत असे वाटते...
एका नजरेत - शशि ओक
सुंदर रंगीत आलेख.
लेख टोटल डोक्यावरून गेलाय. कदाचित थकलोय खूप. उद्या पुनः वाचून पाहीन.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
लेख टोटल डोक्यावरून
थोडं तूप पिऊन पाहा. डोक्याला चांगलं असतं ते. (कृ. ह. घ्या.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तूप इज ऑल मिल्क फॅट बट ऑल मिल्क फॅट इज नॉट तूप
धनंजय यांनी तूप पिणे आणि तूप वापरणे यातला फरक तर सांगितलाच आहे. आता तूप पिणे आणि बटरफॅटचे (दुग्धजन्य मेदाचे) कन्झम्प्शन यातला फरक पाहू.
नॉस्टॅल्जिक काळातले श्रीमंत आणि मध्यमवर्गातील दुग्धजन्य मेदाचे कन्झम्प्शन हे मुख्यत्वे भात/भाकरीवर वाढणे, सणासुदीला पुर्या / शंकरपाळे वगैरे तळणे आणि लाडू वगैरेसारखे पदार्थ बनवणे व हलवायाकडून आणलेली मिठाई* आणि उपासाचे पदार्थ यांतूनच होत असे. म्हणजे अंदाजे ८०%+ कन्झम्प्शन हे तूप** या स्वरूपातच होत असावे.
आजच्या काळात श्रीमंत आणि मध्यमवर्गात होणारे बटरफॅट कन्झम्प्शन हे टेबल बटर, केक, बिस्किटे, पेस्ट्रीजमध्ये वापरले जाणारे तूप/बटर, चीज (क्यूब/स्लाईस/पिझा-पावभाजीवरील वरील चीज/सॅण्डविच), दूध पिणे***, पनीरचे पदार्थ वगैरे विविध अभिनव मार्गांनी होते. त्यामुळे टक्केवारीत तूप या स्वरूपातला घरातील वापर खूप घसरला आहे. माझ्यामते हा वापर २०% हून कमी आहे. दुग्धजन्य फॅट पोटात जास्त जात आहे हे खरे पण तूप स्वरूपात नाही. त्यामुळे घृतं पिबेत हे विसरलो आहोत ही रामदासांची तक्रार खरी आहे. बटरफॅटचे कन्झम्प्शन वाढले असले तरी ते वेगळ्याच स्वरूपात वापरले जात आहे शिवाय बर्याच वेळा तूप तयार स्वरूपात आणले जाते त्यामुळे तूप कढवणे-तिरके ठेवलेले पातेले-बेरी खाणे या स्मरणरंजनासाठी उपयोगाचे नाही. पॉईंट इज- बटरफॅट कन्झम्प्शन म्हणजे तूप पिणे नाही.
*आणलेली मिठाई किंवा घरी केलेले गुलाबजाम/श्रीखंड.
**पूर्वी मुले जरी दूध पीत असली तरी दूध तापवले गेल्याने बरीच फॅट ही सायीत जात असावी आणि दूध हे जवळजवळ शून्य फॅटचे प्यायले जात असावे. तसेच साय खायला सहसा मिळत नसे. आणि लोणी स्वरूपात वापर फारसा होत नसे.
***हल्ली मुंबई/महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी गायीचे दूध होमोजिनाइज्ड मिळते. ते तापवले तरी साय येत नाही. त्यामुळे त्या दुधात असलेली फॅट ही तशीच दुधातून पोटात जाते. जरी बटर, चीज इत्यादि गोष्टी परवडत नसल्या तरी पूर्वीपेक्षा अधिक लोकांना हे होमोजिनाइज्ड गायीचे दूध मिळत असेल तर तेवढी फॅट नव्या लोकांच्या पोटात जात आहे हे मात्र खरे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सवयींत बदल
हे पटण्यासारखं वाटतं. मुळात 'तूप पिणे' हा मी बटरफॅटच्या स्निग्धतेतून मिळणाऱ्या आनंदासाठी वापरलेला सुटसुटीत शब्दप्रयोग होता. त्यात भाकरीवरचा लोण्याचा गोळा येतो, साय खाणं येतं, केकवरचं क्रीम खाणं येतं, पनीर, रसगुल्ले, मिठाई खाणं येतं, चीजकेक खाणं येतं. तुम्ही म्हणता तसा बदल अमेरिकेत देखील झालेला आहे.
या चित्राकडे बघून 'पूर्वीचे लोक बावीस ग्रॅम बटर खायचे, आता पाचच ग्रॅम खातात.' असं म्हणणं म्हणजे त्यांचं बटरफॅटचं सेवन एक चतुर्थांश झालं, त्यामुळे समृद्धी कमी झाली असं म्हणणं चूक आहे. कारण आता त्यांनी तीच फॅट वेगवेगळ्या (चीज आणि आइसक्रीम) आकर्षक स्वरूपात खायला सुरूवात केली आहे. भारतातही ऐशी सालापूर्वीदेखील बटरफॅट इतर स्वरूपात खाल्ली जायचीच. पण एकंदरीतच सगळ्याच स्वरूपाची वानवा होती.
सध्या तपासायला वेळ नाही, कदाचित उपयुक्त दुवा
सध्या दुव्यावरील अंतर्गत दुवे किती ठोस आहेत ते तपासता आलेले नाही, पण हा दुवा सापडला.
(चित्र दिलेल्या पानावर चित्र पुनर्वापराकरिता सोय केलेली आहे.)
चित्र दिलेले संकेतस्थळ - दुवा.
लेख आवडला.
भारतात धवल क्रांतीनंतर दुधदुभत्याचे प्रमाण इतके वाढले की भारत एक आघाडीचा दुधउत्पादक देश झाला. त्यापुर्वी मध्यमवर्गीय घरांमध्ये आणि शेतकरी कुटुंबांमध्ये तुपाची उपलब्धता असली तरी इतर गरीब लोकांना तूप मिळत नसावे असे आकडेवारीवरून वाटते.
हे महत्वाचं आहे. पुर्वीपेक्षा जास्त लोकांना तूप मिळू लागले आहे हे यावरून सिद्ध होतं. पण त्याच बरोबर उत्पादन वाढले म्हणजे खरोखर वितरणपण सगळ्यांना झाले असे नाही हे ही लक्षात घ्यायला हवे.
तूप उपलब्ध असणे आणि ते घ्यायची क्षमता असणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे तुपाची उत्पादनवाढ आणि वितरण याबरोबरच क्रयशक्तीतल्या वाढीचाही विदा द्यायला हवा होता असे वाटते. शिवाय उत्पादन वाढले म्हणजे किंमत कमी होत असली तरी तुपाच्या उत्पादनखर्चापेक्षा कमी होणार नाही. त्यादृष्टीने किती लोकांना तूप परवडू लागले आहे हे पाहणे महत्वाचे आहे.
धनंजय यांनी दिलेल्या आलेखात थोडी तशा स्वरुपाची माहिती आहे.
झकास
प्रगतीचे मापदंड प्रत्यक्ष गरजेच्या वस्तूंच्या आधारे निश्चित करण्याचा अप्रोच आवडला. तूप खाणे, वापरणे, टक्केवारी किती हा मुद्दा माझ्या दृष्टीने केवळ तपशीलाचा आहे. मुळात आज 'इंडिया शायनिंग' किंवा 'देश कचर्यात चालला आहे' या दोन टोकाच्या प्रतिक्रिया सोयीच्या पुराव्यांच्या आधारे माथी मारल्या जातात. अशा गृहितक-समर्थक निकष वापरण्याच्या पद्धतीला छेद देऊन गरजांच्या आधारे (आता 'तूप' ही काय गरज आहे का? असा तपशीलावरच प्रश्न येईलच, पण तो तूर्तास 'गाडीपेक्षा अधिक गरजेचे' अशा तुलनात्मक उत्तरावर सोडून देतो.) निकष निश्चित करत मूल्यमापनाकडे जाण्याची पद्धत केव्हाही अधिक संतुलित मानतो मी.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
inferior good
हा लेख (आलेखांशिवाय) मटामध्ये मागच्या आठवड्यात वाचला.याविषयी मी माझ्या नातेवाईकाशी बोललो.त्याला अर्थशास्त्रातले निदान माझ्यापेक्षा जास्त समजते.तो ऐसीअक्षरेचाही सदस्य आहे पण सध्या इथे फार लिहित नाही आणि ऐसीवर लिहायची त्याची इच्छा असेल असे त्याच्याशी बोलल्यावर वाटले नाही.तेव्हा मी पण फार आग्रह धरला नाही.तरीही हा प्रतिसाद म्हणजे याविषयी त्याच्याशी बोलून त्याला काय म्हणायचे आहे याचा मी लावलेला अर्थ आहे.मी इथे एका मेसेंजरची भूमिका वठवत आहे.तेव्हा याविषयी फार प्रश्न विचारल्यास मला त्याविषयी काही लिहिता येणार नाही.तरीही एक वेगळा पैलू वाचकांना कळावा म्हणून हे इथे लिहित आहे.
अर्थशास्त्रात inferior good म्हणून एक संकल्पना आहे.सर्वसाधारण गोष्टींची मागणी लोकांचे उत्पन्न वाढते त्याप्रमाणे वाढते.पण एखाद्या गोष्टीची मागणी लोकांचे उत्पन्न वाढल्यावर कमी होत असेल तर ती गोष्ट म्हणजे inferior good. उदाहरणार्थ निरमा वॉशिंग पावडर.जसे लोकांचे उत्पन्न वाढते त्याप्रमाणे लोकांची मागणी निरमा वॉशिंग पावडरवरून एरिअल किंवा सर्फ एक्सेल अशा प्रकारच्या गोष्टींची मागणी वाढते आणि निरमाची मागणी कमी होते.त्या अर्थी फारच थोड्या गोष्टी inferior good नसतात.काही गोष्टींचा inferior good व्हायचा वेग जास्त असतो (उदाहरणार्थः टेक्नॉलॉजीशी संबंधित गोष्टी) तर काही गोष्टींचा कमी असतो.
पूर्वीच्या काळी माणसाची श्रीमंती त्याच्याकडे किती दूध-दुभते आहे यावरून मोजली जात असे.आज ती परिस्थिती नक्कीच नाही.आपली श्रीमंती इतरांपुढे मिरविणे ही मनुष्यस्वभावातील अनेक गोष्टींमधली एक गोष्ट आहे.असे लोक पूर्वी होते आज आहेत आणि भविष्यातही असणार आहेत.पण श्रीमंती कशी मिरवायची याचे मापदंड नक्कीच बदलले आहेत.पूर्वी तूप आणि तुपाचे पदार्थ मला खाणे परवडते याचे प्रदर्शन केले की श्रीमंतीचे प्रदर्शन आपोआप होत असे. आज तीच जागा तारांकित हॉटेलातील बुफेंनी किंवा तत्सम गोष्टींनी घेतली आहे.पूर्वीच्या काळी तुपाचे पदार्थ हा 'उंची' पदार्थांमधील बर्याच वरच्या क्रमांकावर होते.आज ती जागा पिझा-पेस्ट्री इत्यादींनी घेतली आहे.
या लेखात असा दावा केला आहे की तुपाचे कन्झम्प्शन वाढले आहे हा लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्याचे लक्षण आहे.तसा दावा करण्यापूर्वी तूप हे inferior good नाही किंवा तुपाचा inferior good व्हायचा वेग त्यामानाने कमी आहे हे सिध्द करता आले पाहिजे.तूप हे जर inferior good असेल तर तुपाचे कन्झम्प्शन वाढणे हे आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे नव्हे तर खालावल्याचे लक्षण असेल.तूप ही फार वेगाने inferior good होईल अशी गोष्ट आहे असे वाटत नाही तेव्हा सर्वसाधारणपणे हे अनुमान योग्य आहे असे वाटते.पण लेखातील अनुमान ज्याप्रमाणे विविध तक्ते आणि आलेख यावरून सिध्द करायचा प्रयत्न केला आहे त्याच धर्तीवर तूप हे inferior good नाही किंवा तुपाचा inferior good व्हायचा वेग कमी आहे हे सिध्द करता आले पाहिजे. नाहीतर हे अनुमान म्हणजे नुसते आकडे आणि आलेख यावरून एखादी गोष्ट सिध्द करायचा प्रयत्न असे म्हणता येईल पण ते विश्लेषण अर्थशास्त्रावर आधारीत आहे असे म्हणता येणार नाही.
मी ही गोष्ट लिहायचा माझ्या परिने प्रयत्न केला आहे.मला स्वत:ला फार चांगले आणि मुद्देसूद लिहिता येत नाही. तरीही नक्की मुद्दा काय आहे हे लक्षात आले असावे ही अपेक्षा.
इथे तुपाची युटिलिटी किंवा
इथे तुपाची युटिलिटी किंवा उपयुक्तता काय? या प्रश्नाचं आधी उत्तर देणं आवश्यक आहे. कारण एकापेक्षा अधिक उपयुक्तता आहेत. एक उपयुक्तता म्हणजे ते खाण्यापासून मिळणारा आनंद आणि त्यातून मिळणाऱ्या कॅलऱ्या. या बाबतीत तुपासाठी इतर जे पर्याय आहेत त्यात तूप हेच सर्वश्रेष्ठ आहे. इथे आणखीन एक लक्षात घ्यायचं म्हणजे या लेखात 'तूप' हा शब्द सोयीसाठी आलेला आहे. बटरफॅट - मग ते लोणी, क्रीम, तूप काहीही असो, मी तूप या शब्दाने व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे तूप परवडायला लागलं की जमेल तेव्हा तेल सोडून तूप खाण्याकडे सर्वसाधारण कल आहे. विकीपीडियावर खालील उल्लेख आहे.
Certain goods like vegetable oil instead of ghee is considered as an inferior good in india.
म्हणजे तूप हे खरं तर सुपिरियर गुड खाली गणलं जायला हवं. मात्र हे सुपिरियर, नॉर्मल आणि इन्फिरियर या व्याख्यांमध्येच काही अडचणी आहेत. एका विशिष्ट मर्यादेतच त्या लागू पडतात. नॉर्मल गुडच्या वर्णनात 'In particular, when the price of a normal good is zero, the demand is infinite.' असं वाक्य येतं. मला वाटतं ही इन्फिनिटीची संकल्पना त्रासदायक आहे. श्वासासाठी हवा ही नॉर्मल गुड आहे. खरं तर तिला पर्यायच नाही, त्यामुळे तिला सुपिरियर गुड म्हटलं काय, नॉर्मल म्हटलं काय, फरक पडत नाही. ती फुकट आहे. तरीही तिचं कंझम्प्शन इन्फायनाइट नाही. या कंझंप्श्नच्या इन्फिनिटीला मर्यादा घालण्यासाठी मार्जिनल युटिलिटीची संकल्पना आहे. आणि ती वापरूनच 'कितीही श्रीमंत झाला तरी एका मर्यादेपलिकडे तूप खात नाही' असं म्हणता येतं. आणि मग उत्पादन वाढल्यावर ते इतर लोकांनाही खायला मिळतं.
आता सर्वच सुपिरियर गुड्सची दुसरीही उपयुक्तता असते. ती म्हणजे 'मला सुपिरियर गुड्स परवडतात' हे दाखवण्याची, आणि त्यातून श्रीमंती मिरवण्याची उपयुक्तता. व्याख्येनुसारच या बाबतीत सर्वच गुड्स ही इन्फिरियर गुड्स असतात. समजा कुठच्याही एका काळी तशी दहा गुड्स आहेत - जी श्रीमंतीची लक्षणं म्हणून सादर करता येतात. आता त्यातल्या कुठच्याही एका गुडचं उत्पादन वाढलं आणि ते श्रीमंतांपलिकडे इतरांनाही परवडायला लागलं, तर अर्थातच 'श्रीमंती मिरवणे' यासाठीची त्या पदार्थाची युटिलिटी कमी होणार. आणि ते इतर नऊंकडे वळणार.
लेखाचा दावा किंचित वेगळा आहे. प्रगती झाली की नाही, यात 'श्रीमंत अधिक सुखी होतात आणि गरीब तसेच रहातात' हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न आहे. सुख देणाऱ्या वस्तूंची संख्या वाढली की अधिक लोकांना त्या मिळायला लागतात हे दाखवून द्यायचं आहे. मी मुद्दामच 'आर्थिक परिस्थिती सुधारली' या प्रकारचा युक्तिवाद टाळतो आहे. समाजातलं सौख्य वाढलं आणि दुःख कमी झालं हे मूलभूत सुखदुःखं देणाऱ्या गोष्टींच्या लोकांना असलेल्या उपलब्धतेवरून दाखवून देण्याचा प्रयत्न आहे.
लॉग ग्राफ
हे चित्र स्पष्ट होण्यासाठी पुन्हा दरडोई तुपाचा आलेख लॉगॅरिथमिक स्केलवर दिलेला आहे.
राजेशजी, भारताची भिन्न भिन्न क्षेत्रात झालेली प्रगती आपण पुढे आणत आहात ही स्तुत्य बाब आहे.
परंतु, दुग्धजन्य मेदांचे भारतातील प्रतिदिन, प्रतिव्यक्ती सेवन मांडत असताना लॉग ग्राफ वापरणे अप्रस्तुत वाटते. एखाद्या गोष्टीचे दरवर्षी घातांकीय पद्धतीने वर्धन झाले तर लॉग ग्राफ वापरावा. इथे मला हा ग्राफ अनावश्यक आणि काहीच जास्तीची माहिती न देणारा वाटला. तो सपाट असण्याऐवजी मूळ ग्राफपेक्षा जास्त उंच झालेला आहे (आकडे १ ते १० आणि बेस १०). त्या ग्राफमधल्या य अक्षावर log(butterfat in gram) असेल तर १० म्हणजे १०^१० ग्रॅम इतके प्रतिव्यक्ती प्रतिदिन सेवन. हा आकडा कैच्या कै आहे.
आपल्या शेवटच्या ग्राफमधे १००% भारतीय असे पदार्थ खाऊ लागले आहेत, तेही कमित कमी १.७५ ग्रॅम, असे दिसते (२०१० आणि २०१२ च्या रेषा). हा निष्कर्श वास्तवापासून दूर आहे. सेवनाचे वितरण वाढले आहे या आपल्या गृहितकाला विरोध करण्याचे कारण नाही पण ते ज्या प्रकारे आपण स्प्रेड दाखवली आहे ती गृहितके अॅग्रेसीव आहेत.
http://www.dahd.nic.in/dahd/WriteReadData/4.%20Part%20I%20Milk-BAHS%2020... पशु संवर्धन मंत्रालयाच्या डाटाप्रमाणे दूधाची प्रतिमाणसी उपलब्धता दुप्पट झाली आहे. सगळं जश्याला तसं आहे असं मानलं तर मेदांची उपलब्धता दुप्पट होईल. मग मेदांची उप्लब्धता चौपट झाली आहे म्हणणे म्हणजे नव्या अधिकच्या दुधाचेच वाटप विषम झाले आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
परंतु, दुग्धजन्य मेदांचे
१९८५ पर्यंत सपाट असलेली रेषा १९८६ पासून घातांकाने वाढायला लागली. हे स्पष्ट करण्यासाठी लॉग ग्राफ वापरला. त्याचा 'नी पॉइंट' कुठे आहे हे कळायला लॉग ग्राफचा उपयोग होतो. त्या आलेखावर मी किती घातांकाची रेषा फिट होते तेही दाखवलेलं आहे. १.०५९ पटीने तो आकडा दर वर्षी वाढतो.
आपण ग्राफ वाचण्यात थोडा गोंधळ करत आहात. लॉग स्केलचा ग्राफ असला तरी डावीकडचे आकडे तेच रहातात. जिथे १० दिसतं त्याचा अर्थ १० च असतो. खरं तर लॉग स्केलवर य अक्ष काढला की ग्राफ उंच होण्याऐवजी अधिक सपाट होतो. लहान संख्यांमधले फरक अधिक मोठे व स्पष्ट दिसतात. मोठ्या संख्यांमधले फरक कमी दिसतात.
वास्तवाविषयी काही विदा आहे का? मी समजावून सांगण्यासाठी एक मॉडेल मांडलेलं आहे. त्यात '१५ ग्रॅम अधिकतम दरडोई' असं गृहितक घेतलेलं आहे. तो आकडा २० असू शकेल असंही म्हटलेलं आहे. मुद्दा काय आकडे येतात यापेक्षा वितरण सुधारत जातं हे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे.
हा निष्कर्ष बरोबर नाही. दुधाची प्रतिमाणशी उपलब्धता सुमारे ८० सालपर्यंत सपाट होती. त्यानंतर अडीचपट झाली. बटरफॅटची उपलब्धता चौपट होणं अनेक कारणांनी शक्य आहे.
१. दुधाचा दर्जा वाढला - अधिक बटरफॅट असलेलं दूध देणाऱ्या गायी/म्हशींच्या जाती आल्या, त्यांचं खाणं सुधारलं इ. इ.
२. त्यातून लोणी काढण्याची एफिशियन्सी वाढली - बाजारात येणारं दूध मोठ्या प्रमाणावर लोणी काढणाऱ्या कंपन्यांपर्यंत पोचवण्याची सोय झाली, फुकट जाणारं दूध कमी झालं इ. इ.
३. मुळात लोणी काढण्यासाठी विकल्या जाणाऱ्या दुधाचं प्रमाण वाढलं - घरात दूध साठवण्याची फ्रिजची सोय झाली की फुकट कमी जातं, त्यामुळे अधिक दूध लोणी काढण्यासाठी उपलब्ध होतं.
४. लोणी साठवून ठेवणं आणि विकणं यामध्ये कमी लोणी फुकट जायला लागलं.
या सर्व कारणांमुळे दूध अडीचपट झालं तरी लोणी चौपट झालं हे सहज शक्य आहे.
वास्तवाविषयी काही विदा आहे
वास्तवाविषयी काही विदा आहे का?
४ लोकांच्या घरात दर दिवशी दर माणशी २ ग्रॅम - म्हणजे महिना पाव किलो. भारतात सर्वात स्वस्त तूप दिल्लीत ३०० ते ३५० रु प्रतिलिटर दराने मिळते. म्हणजे महिना १०० रु तूपाचे. वर्षाला १२०० रु प्रतिकूटुंब.
http://mospi.nic.in/mospi_new/upload/nss_press_note_1aug12.pdf या एनएसएसओच्या सर्व्हेत सर्वात गरीब १०%, मगचे १०%, मगचे, मगचे अश्या लोकांचे सरासरी उत्पन्न दिले आहे. यावर डोळे झाकून विसंबू शकता. सर्वात गरीब १०% लोकांचा ५०० रु प्रतिव्यक्ती, प्रतिमाह असे उत्पन्न आहे. १२००/(५००*४*१२) केले तर या लोकांचे ५% उत्पन्न (दूध सोडून फक्त)तुपाकरता जाईल.
त्यांना रोज ५०० मिली (अर्धा लिटर) दूध लागतेच लागते धरले तर दूधाचा वार्षिक खर्च =०.५*३२*३६५ = ५८०० रु प्रतिवर्ष.
दूध आणि तूप मिळून = (१२०० चे तूप +५८४० चे तूप)/(५०० रु प्रतिमाह प्रतिव्यक्ति* ४ लोक * १२ महिने) = ३०%. आपले एक तृतियांश उत्पन्न दूध आणि दूधाचे पदार्थ?
स्पष्टच आहे की तूप तर जाऊच द्या हे लोक दूधही/चहाही नीट पीत नसणार. हाच आकडा यावरच्या १०% ब्रॅकेटसाठी मोजला आणि असे करत केले तर 'संपत्तीचे वितरण' संतोषजनक आढळणार नाही.
आपल्या लेखात लेखात आपण अधिकचे तूप नीट वाटून 'खपवले' आहे. पण आता हे अधिकचे तूप कुठे गेले हा एक वेगळाच प्रश्न माझ्या मनात उभा रहिला आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
त्यांना रोज ५०० मिली (अर्धा
मी दुधाविषयी काहीच म्हटलेलं नाही. किंबहुना सरासरी दरडोई दूध २८० ग्रॅम आहे. तेव्हा गरीबातल्या गरीब १०% ना ते दरडोई दररोज १२५ मिली मिळेल असा दावा मी केलेला नाही. किंबहुना त्यांना दरडोई दररोज ५० मिली मिळत असावं असा माझा प्राथमिक अंदाज आहे.
मला वाटतं तुम्ही या अंदाजे आकड्यांना अतिरेकी महत्त्व देत आहात. हे डिस्ट्रिब्यूशन टेल-ऑफ कसं होतं याच्या गृहितकांवरून १.७५ ग्रॅम की ०.७५ ग्रॅम हे ठरेल. तसंच मी जो अधिकतम १५ ग्रॅमचा आकडा धरला आहे तो २० ग्रॅम असला तरीही फरक पडेलच. मुद्दा तो आकडा अचूक आहे की नाही हा नाही. हे मॉडेल क्वांटिटेटिव्ह कॅल्क्युलेशनसाठी नाहीये. यात मुख्य म्हणजे असं दाखवायचं आहे की पन्नास वर्षांपूर्वीपेक्षा 'तूप खाऊन समाधानी' अशांचं प्रमाण आता वाढलेलं आहे. आणि जसजसं दुधातुपाचं उत्पादन वाढेल तसतसं ते प्रमाण वाढत जाणार आहे. त्यामुळे ज्यांना 'एकेकाळी दूधदुभत्यांची रेलचेल होती' अशा सुवर्णयुगी आठवणी असतात त्यांना 'पन्नास वर्षांपूर्वी दहाच टक्के लोकांना तूप मिळायचं, शंभर वर्षांपूर्वी, तीनशे वर्षांपूर्वी त्याहीपेक्षा कमी लोकांना मिळायचं' याची आठवण करून द्यायची आहे.
सॅड टु से बट यु आर मिसिंग द फॉरेस्ट फॉर द ट्रीज.
हे नीट कळलं नाही. अधिकचं तूप कसं वितरित होत असावं याविषयीचं एक मॉडेल मांडलं आहे. याच्या विपरित चित्र तुमच्या डोळ्यासमोर असेल तर ते कृपया मांडा. मग आपण सत्याशी पडताळणी करून लेखातल्या मॉडेलमध्ये नक्की काय बदल करायला हवे ते ठरवू.
गणितं
आधीच्या प्रतिसादात मी तुमची गणितं न तपासताच '५ टक्के खर्च तुपावर!' हे विधान मान्य केलं होतं. आता जरा ती तपासून बघू.
१. तुमच्या गणितात ५०० रुपये दरमहा दरडोई हा आकडा धरलेला आहे. तुम्ही दिलेल्या दुव्यावर पहिल्या डेसाइलसाठी ५०३ (ग्रामीण) आणि ७०२ (शहरी) असे आकडे आहेत. तुम्ही सोयीस्करपणे सर्वात लहान आकडा गृहित धरला आहे. आख्ख्या डेसाइलसाठी या दोनचं वेटेड मीन घ्यायला हवं. तूर्तास आपण फक्त ग्रामीण आकडे घेऊ.
२. तुम्ही शहरातली किंमत - ३०० ते ३५० प्रतिलीटर ही वापरलेली आहे. गावातल्या आकड्यांसाठी गावातली किंमत वापरायला हवी.
३. राउंडऑफ एरर्स बऱ्याच आहेत. १.७५ ग्रॅमऐवजी २ ग्रॅम, मग चार लोकांना महिन्यासाठी २४० ऐवजी २५० ग्रॅम, ३२५ रुपये प्रतिलीटरचे पाव किलो करताना ९० रुपये ऐवजी १०० रुपये. या सगळ्यांतून सुमारे ३५ टक्क्याची एरर वाढीव दिशेला केलेली आहे. राउंडऑफ करताना आधी अचूक गणित करून शेवटचा आकडा राउंडऑफ करावा.
तूर्तास आपण गृहित धरू की पहिल्या डेसाइलमधले सगळे ग्रामीण भागांत रहातात. गावात मिळणाऱ्या तुपाची किंमत शहराच्या तीन चतुर्थांश असेल असं मी गृहित धरतो आहे (ट्रान्स्पोर्ट, मार्केटिंग, पॅकेजिंग, शहरातला जास्तीचा फायदा इ). म्हणजे सुमारे २४० रुपये प्रति लीटर. म्हणजे २६४ रुपये प्रति किलो. ग्रामीण भागात उत्पन्न दरडोई ५०३ प्रतिमाह म्हणजे दरडोई १६.७ रु दररोज.
आता गणित सोपं आहे. म्हणजे २६.४ पैसे ग्रॅम. १.७५ ग्रॅमची किंमत येते ४६.२ पैसे. म्हणजे १६.७ च्या २.७%. तुमचा आकडा होता ५%. अडीच टक्केहून थोडा अधिक खर्च तुपावर गरीब माणूस करेल का? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी ते तूप कशाऐवजी घेतलं जातं हे बघायला हवं. तुपाऐवजी तेल घेतलं तर किती खर्च करावा लागेल हे पहावं लागेल. म्हणजे तुपाची किंमत अडीचपट आहे असं धरलं तरी अतिरिक्त खर्च सुमारे १.६% येतो. शहरात असणाऱ्या पहिल्या डेसाइलसाठी हा आकडा याहून किंचित कमी येईल. हे बिलकुल अतिरेकी वाटत नाही.
(या प्रतिसादात आधी काही किंचित त्रुटी होत्या त्या दुरुस्त केलेल्या आहेत. उत्तर फारसं बदललेलं नाही)
१. तुमच्या गणितात ५०० रुपये
१. तुमच्या गणितात ५०० रुपये दरमहा दरडोई हा आकडा धरलेला आहे. तुम्ही दिलेल्या दुव्यावर पहिल्या डेसाइलसाठी ५०३ (ग्रामीण) आणि ७०२ (शहरी) असे आकडे आहेत. तुम्ही सोयीस्करपणे सर्वात लहान आकडा गृहित धरला आहे. आख्ख्या डेसाइलसाठी या दोनचं वेटेड मीन घ्यायला हवं. तूर्तास आपण फक्त ग्रामीण आकडे घेऊ.
मान्य.
२. तुम्ही शहरातली किंमत - ३०० ते ३५० प्रतिलीटर ही वापरलेली आहे. गावातल्या आकड्यांसाठी गावातली किंमत वापरायला हवी.
दिल्लीत तूपावर कमी कर असल्याने भारतातल्या गावांपेक्षासुद्धा इथे तूपाच्या किमती कमी आहेत.
३. राउंडऑफ एरर्स बऱ्याच आहेत. १.७५ ग्रॅमऐवजी २ ग्रॅम,
१.७५ ग्रॅम हे आपल्या आलेखातल्या भारतातल्या सर्वात गरीब माणसाचे (अगदी सर्वात गरीब, कोणतीही सरासरी नाही)सेवन आहे. मला शेवटच्या १० ते २० टक्क्याबद्दल बोलायचे आहे. आपल्या आलेखाकडेच पाहून त्यांचे सेवन २ ग्रॅम धरले तर चूक का? मी २०१३ च्या किमती वापरतोय (उत्पन्न २०१२ चे वापरतोय पण माझा नाईलाज आहे). ज्या गतीने आपल्या वार्षिक रेषा उजवीकडे सरकत आहेत ते पाहता २ ग्रॅम कमीच आहे.
मग चार लोकांना महिन्यासाठी २४० ऐवजी २५० ग्रॅम,
बाजारात जेव्हा प्रत्येक कुटंब जात प्रत्यक्ष असेल तेव्हा २५० ग्रॅम तूप घेणार. त्यांची कितीही गरज २४० ची गरज असली तरी अश्या प्रकारे तूप विकत नाहीत. लोकांनी छटाकाच्या पटीत तूप घेतले तरीही ग्रॅम ५० च्या पटीत येणार. मी प्रत्यक्ष एका कुटुंबाचा सदस्य म्हणून विचार करत आहे, देशाचा नाही.
या सगळ्यांतून सुमारे ३५ टक्क्याची एरर वाढीव दिशेला केलेली आहे.
झालेली आहे.
तूर्तास आपण गृहित धरू की पहिल्या डेसाइलमधले सगळे ग्रामीण भागांत रहातात. गावात मिळणाऱ्या तुपाची किंमत शहराच्या तीन चतुर्थांश असेल असं मी गृहित धरतो आहे (ट्रान्स्पोर्ट, मार्केटिंग, पॅकेजिंग, शहरातला जास्तीचा फायदा इ).
असे नाही. तूपाची जी लाक्षणिक वाढ झाली आहे ती डेरी मुळे झाली आहे. त्यामुळे उत्पादन शहराकडून गावाकडे येताना त्याची किंमत वाढते. ग्रामीण भागात वेगवेगळ्या छोट्या क्लस्टर मधे असे उत्पादन वाढवायची क्षमता असती तर प्रश्नच नव्हता. दळणवळण वाढले असल्याने, असे कोणते अॅडव्हांटेज असेल तरीही दोन्ही भागात तूपाच्या किमतीचा फरक कमी असतो. गावातले सगळेच दुधवाले दूध डेरीला विकतात (किंवा त्याच भावात शहरात विकतात) त्यामुळे गावात तूप विकणे हा सवता धंदा कोणी करत नाही हे भारतभरचे वास्तव आहे. इतकेच काय गावात दुधाची पावडर ज्या प्रमाणात विकली जाते ते पण हादरवून सोडणारे आहे. गावातली तूपाची किंमत जास्त धरली नाही तरी समान धरावी.
म्हणजे तुपाची किंमत अडीचपट आहे असं धरलं तरी अतिरिक्त खर्च सुमारे १.६% येतो. शहरात असणाऱ्या पहिल्या डेसाइलसाठी हा आकडा याहून किंचित कमी येईल. हे बिलकुल अतिरेकी वाटत नाही.
अतिरिक्त खर्च १.६% येतो ही वाक्यरचना चूक आहे. जेव्हा बजेटच २.५% असते तेव्हा १.६% फार मोठा (१.६/२.५% इतका) आकडा आहे. (हे वाक्य % काढून वाचावे लागेल).
प्रगती झाली आहे असे आपल्याला म्हणायचे आहे. प्रगतीचे दोन अंगे आहेत. १. सेवन - भारतात एकच माणूस आहे मानले तर हे चौपट वाढले आहे आणि ही अतिशय स्तुत्य बाब आहे. २. वितरण - अधिकचे उत्पादन कसे वाटले गेले आहे हे महत्त्वाचे आहे. ५० वर्षाखाली १०० पैकी ११व्या सर्वात श्रीमंत माणसाला तूप खायला मिळायचे नाही आणि आता मिळत आहे हा निष्कर्ष चूक आहे.
त्याची मला वाटत असलेली कारणे-
१. तूप शब्द ज्या उत्पादनाला वापरला आहे ते एक खरे तर collection of products आहे. असे असू शकते की आपण ज्याला तूप तूप म्हणत आहोत त्यात ५% च तूप असेल. तूपांचे जे प्रकार आहेत त्यांतले सर्वात उच्च प्रकार फारच कमी झाले असावेत. वाढलेले सेवन हे नक्की कशाचे आहे ते माहित नाही. असे तूप खाण्याला थोडा कमी अर्थ आहे. उदा. आज १००रु कि मिळणारे (एकावर एक फ्री असेल तर ५० रु) आईस्क्रीम ५० वर्षापूर्वीच्या तूपाशी तोलले जाऊ नये.
२.३. अधिकचे तूप किंवा तत्सदृश प्रकार गरीबांना खाण्यासाठी उपलब्ध नसावेत. ते इतरत्र वळवले असावेत, जसे लहान मुलांची साबणे. हा नवा उपयोग जे श्रीमंतच करतात. आपण ज्या ज्या गोष्टींना तूप म्हणत आहोत त्यांची किती किती आणि कोणती कोणती औद्योगिक वापर आहेत हे कळायला हवे.
४. आम्ही तीन-चार जण घरात तूपाचा फार कमी प्रयोग करतो (आमच्या पंजाबी शेजार्यांच्या मानाने नाहीच). तरीही 'डायरेक्ट' तूप आम्हाला १ १/२ कि प्रतिमाह लागते. हे १५ ग्रॅम भरते. पण आमच्या दुग्धजन्य स्निग्ध पदार्थांचे हे नाममात्र सेवन आहे. लोणी, चीज, पनीर, आईस्क्रीम, मिठाई
अजून काय धरले तर हा आकडा सहजी ३० च्या पुढे जाईल. पंजाबी लोकांचा हा ५० च्या वर असेल. श्रीमंतांचा अजून जास्त असेल. तूपाचे घरगूती अन्नेतर उपयोगही बरेच असावेत. पंजाबी लोक केसाला लावतात, तसे. दिवे, यज्ञ, इ प्रकार आहेत.
५. प्रगती होणे, आनंददायक, म्हणावीशी प्रगती होणे म्हणजे काय? समाधान केव्हा वाटावे? वर जेव्हा मी ५०० मिली दूध प्रतिकुटुंब प्रतिदिन म्हणालो तेव्हा आपण 'ते २०० मिली दूध प्रतिव्यक्ती प्रतिदीन घेत असतील' असे म्हटले आहे. म्हणजे लिटरच्या १/२० वा भाग दूध एका माणसाला एका दिवसाला. इतके दूध पिऊन त्यांचा संतोष होईल आणि ते तूप घेतील?
६. भारतातल्या १०% सर्वात गरीब लोक, ज्यांचे प्रतिव्यक्ती मासिक उत्पन्न ७५० रु पेक्षा कमी आहे ते आपल्या सगळ्या गरजा भागवून तूप देखिल विकत घेऊ शकतात असे आपल्याला खरोखरीच वाटते का?
माझं गणित नि गृहितके यामधे बर्याच चूका असतील, आपण त्यावर चर्चा टाळू. फक्त वरील प्रश्न क्रमांक ६ चे उत्तर सांगा. अशीच उत्तरे प्लॅनकॉमने दिली होती आणि पुढचे सर्वांना माहित आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
फक्त वरील प्रश्न क्रमांक ६ चे
इथे आपल्याला चर्चा थांबवावी लागणार असं दिसतंय. कारण या प्रश्नाचं उत्तर दोन प्रकारे काढता येतं. एक म्हणजे असं मॉडेल घेऊन आणि अंदाज करून. दुसरं म्हणजे प्रत्यक्ष मोजून. दुसरी पद्धत अर्थातच अधिक विश्वासार्ह आहे, पण ती कोणी अमलात आणलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारची गणितं करणं हाच मार्ग उरतो. मात्र गणितातून काहीही उत्तर येत असेल तरी ते तुमच्या 'हे खरं असणं शक्यच नाही' या आतल्या आवाजावर मात करणं शक्य नाही असं दिसतं आहे. मग राहिलं. तसंही मी मॉडेलच्या मर्यादा मान्य केलेल्या आहेतच. शेवटच्या दहाव्या पर्सेंटाइलला किती तूप मिळतं याच्या आपल्या स्वतंत्र गणितांवरून हे मॉडेल फार चुकीचं नाही असं मला वाटतं. तुम्हाला वेगळं वाटतं. इथे सोडून देऊ.
तूर्तास तरी या मॉडेलचा मुख्य संदेश लक्षात घ्या. तेहतीस वर्षांपूर्वी विसाव्या पर्सेंटाइलला जितकं तूप मिळायचं, साधारण तितकं तूप आता सुमारे साठाव्या पर्सेंटाईलला मिळतं. वीस आणि साठ ऐवजी कदाचित तीस आणि साठ हे आकडे असतील. किंवा वीस आणि पन्नास असतील. मुद्दा नक्की कुठचे आकडे किती अचूक हा नाहीये. मुद्दा समृद्धी पुढच्या पर्सेंटाइलांपर्यंत पसरते आहे हा आहे. याचं कारण म्हणजे मी वर दाखवलेल्या कर्व्हचा आकार कसाही असाही असला, तरी एकदा वरची मर्यादा आल्यानंतर त्या कर्व्हखालचं क्षेत्रफळ (उत्पादन) वाढलं की त्याची लांबी वाढवावीच लागणार. गेल्या साठेक वर्षांत ती तशी वाढलेली आहे एवढंच सांगायचं आहे.
तूप हे एक उदाहरण झालं. अशा अनेक गोष्टींबाबत हा युक्तिवाद करता येतो.
हे मला पटत नाही, तुम्हाला खात्री वाटते. चला सोडून देऊया इथेच. हा लेख, त्यातला विदा, आणि त्यानंतरची चर्चा ही माझं म्हणणं मांडायला पुरेशी झालेली आहे. अजून चर्चा करून फरक पडेलसं वाटत नाही.
या प्रश्नाचं उत्तर दोन
या प्रश्नाचं उत्तर दोन प्रकारे काढता येतं. एक म्हणजे असं मॉडेल घेऊन आणि अंदाज करून. दुसरं म्हणजे प्रत्यक्ष मोजून. दुसरी पद्धत अर्थातच अधिक विश्वासार्ह आहे, पण ती कोणी अमलात आणलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारची गणितं करणं हाच मार्ग उरतो. मात्र गणितातून काहीही उत्तर येत असेल तरी ते तुमच्या 'हे खरं असणं शक्यच नाही' या आतल्या आवाजावर मात करणं शक्य नाही असं दिसतं आहे.
दुसरी पद्धत अधिक विश्वासार्ह आहे आणि तिचा देखिल डाटा आहे.
http://www.nddb.coop/English/Statistics/Pages/Expenditure-Milk.aspx वर प्रतिव्यक्ति मासिक दूध आणि दूधाचे पदार्थ याचा अखिल भारतीय २००९-२०१० सर्वे आहे. लक्षात घ्या हा सर्वे सगळ्या भारतीयांचा आहे, फक्त गरीबांचा नाही. डाटा देणारा भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतो. ८०.५५ रु आणि १३७.०१ (मला आकडे राऊंड करायची भिती वाटत आहे, अन्यथा ८० आणि १४० लिहिले असते.)दरमाणसी दरमहिना ८० रु किंवा १३७ रु काय येते? २००९ च्या दरांनी (बिनासाईचे दूध २८ रु लिटर आणि तूप २७५ रु लिटर).
एक लिटर दूधात १० ते १५ कप चहा बनतो. या हिशेबाने शहरातला भारतीय माणूस महिन्यात ७५ कप चहा पिऊ शकतो. उगाच आपल्याला माझ्या अंतरीचे आवाज इ येऊ नयेत म्हणून आपण ९० मानू या. म्हणजे दिवसाला चांगले ३ चहा.
म्हणजे भारतीय चांगला चहा पिऊ लागलेत हे वादातीत आहे. १४० महिना बजेट मधे शहरी भारतीय तूप कसे खाऊ शकतात? आणि हा विदा फक्त गरीबांचा असता तर?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हा विदा महत्त्वाचा असला तरी
हा विदा महत्त्वाचा असला तरी पुरेसा नाही. यातून खरं तर मला जे म्हणायचं आहे त्यातल्या काही गोष्टी सिद्ध होतात. उदाहरणार्थ १९७७ ते २००९ पर्यंतच्या दुधाच्या किमती बघितल्या तर सरासरी कंझंप्शन १.३२ लीटर दरमहा वरून २.७८ लीटर दरमहापर्यंत वाढलेलं आहे. आणि या दरम्यान दूधावर होणारा खर्च एकंदरीत खर्चाच्या फक्त ९% कायम राहिलेला आहे. आपल्या महिन्याच्या खर्चाच्या तितकाच हिस्सा देत राहून दुपटीपेक्षा अधिक दूध (आणि दुग्धजन्य पदार्थ) मिळणं ही प्रगती नाही तर काय?
असो. आतापर्यंत चर्चा मी जे मॉडेल मांडलं त्यात तुम्ही त्रुटी दाखवणं, आणि मी त्या त्रुटी नाहीत हे सिद्ध करण्यात गेली. आता तुम्ही एखादं मॉडेल का नाही मांडत? तुमच्या मते कितव्या पर्सेंटाइलला किती तूप मिळतं आहे आणि ते वितरण गेल्या पन्नास वर्षांत कसं बदललं आहे हे जाणून घ्यायला आवडेल. आता यापुढची चर्चा तुमच्या मॉडेलवर करू.
डंका
यातून खरं तर मला जे म्हणायचं आहे त्यातल्या काही गोष्टी सिद्ध होतात.
होणारच. आपण वास्तवाला धरुनच निष्कर्ष काढत आहात. मी ही आपल्या ७५% गोष्टी मान्य करतच आहे.
आणि या दरम्यान दूधावर होणारा खर्च एकंदरीत खर्चाच्या फक्त ९% कायम राहिलेला आहे.
अन्नखर्चाच्या तो १०% होता (१९५०). आता १३% आहे.
आता तुम्ही एखादं मॉडेल का नाही मांडत?
मला मॉडेल लिहायला १. तूपात कोणकोणते पदार्थ येतात. २. त्यांच्या किंमती काय आहेत? ३. त्यांना तूप म्हणावे का? ४. उत्पादन किती, आयात, निर्यात किती, सेवन किती, अन्नेतर वापर किती, औद्योगिक वापर किती, धार्मिक वापर, औष्धीय वापर (ज्याला कशाला महत्त्व आहे) ते कळावे लागेल. ५. गरीब लोकांचे उत्पन्न, त्यांचे अन्नाचे बजेट, दूधाचे बजेट , आणि मेदांचे बजेट कळावे लागेल. ६. १९५० शी तुलना करायची तर या सर्वांचे ट्रेंड हवेत. ७. जनसंख्येचा वेगवेगळा विदा लागेल.
हे अवघड काम आहे आणि मला सवते जमणार नाही.
पण मला हे करण्याची गरज नाही. हे काम भारत सरकार आणि उद्योग करतात. त्यांचा विदा वापरुन मी माझा युक्तिवाद करु शकतो. पण अर्थात मला त्याची पूर्ण पाश्वभूमी माहित नसेल, तर ज्याला आहे त्याने मला करेक्ट करावे.
वर धनंजय यांनी प्रतिवादास फोल ठरवणारे गॄहितक असेल तर पुढचा युक्तिवाद निकामी आहे अशा अर्थाचे काही लिहिले आहे.
उत्पादन वाढणे, लोकसंख्यच्या दरापेक्षा ४ पट जास्त वाढणे ही बाब शिरोधार्थ मानली आहे. तो आनंद आपल्या दोघांनाही आहे. पण वितरणाबाबर मी साशंक आहे.
http://www.seaofindia.com/images/67/TFA-Study-Frost-20Sullivan-Detailed-... वर एक महत्त्वाचा विदा आहे. या लोकांनी कोणताही प्राथमिक सर्वे केलेला नाही आणि सारे आकडे पशु संवर्धन मंत्रालयाचे वापरले आहेत. हरयाणा मधे 'सरासरी' प्रतिव्यक्ति मेद सेवन ३३.२३ ग्रॅम प्रतिव्यक्ति प्रतिदिन आहे. मग पहिल्या १०% चे ते जास्तीत जास्त ते १००/८०/६० ही असू शकते.
ओरिसात ४ कोटी लोक आहेत. त्यांची सरासरीच २.६२ ग्रॅम प्रतिव्यक्ति प्रतिदिन आहे. एक शक्यता म्हणून तिथल्या पहिल्या १० % सेवन पुन्हा १००/८०/६० मानले तर बाकिच्यांना काय उरते? ओरीसाच्या ११% व्या श्रीमंत माणसाला काही मिळत नाही. हे गणित खालच्या बाजूने राज्यांना लावत गेले तर अर्धा भारत घॄतक्षुब्ध राहतो.
त्याच फाईल मधे भारताचे मेदांचे सेवन इतर विकसित देशांशी तोलले आहे. ते वाचताना द्युत हरलेल्या पांडवासारखी अवस्था होते.
'परिस्थिती सुधरली आहे' हे 'परिस्थिती किती सुधारल्यानंतर' डंका बडवून सांगावे अशी द्विधा मनात निर्माण झाली आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अन्नखर्चाच्या तो १०% होता
पण एकंदरीत अन्नाचा खर्चच मुळात एकूण खर्चाच्या प्रमाणात ७२ टक्क्यावरून ५४ टक्क्यांवर आलेला आहे.
इथेच आपण थांबू.
प्रतिसाद आवडला
प्रतिसाद आवडला.
एकूणच मूळ लेखात इन्फिरिअर गुड या संदर्भातील महत्वाच्या संकल्पनेचा उल्लेखही नाही.तूप इन्फिरिअर गुड 'निघाले नाही' ही गोष्ट वेगळी.पण मुळात तो मुद्दा लक्षातच न घेणे कसे योग्य आहे? अनेकदा अनेक लोक भारंभार आकडेवारी, आलेख इत्यादींवरून फार खोलातले विश्लेषण केले आहे असे दाखवायचा प्रयत्न करतात.पण मुळातल्या विषयातील संकल्पनेशी ते आकडे रिलेट केले नाहीत तर अशा विश्लेषणाला फारसा अर्थ राहत नाही.
उल्लेख
मूळ लेखात इन्फिरिअर गुडचा उल्लेख नाही याचे कारण या लेखाचा जो ट्रिगर होता त्यातच तूप आणि डालडा (हायड्रोजनेटेड वनस्पतीजन्य तेल) अशी तुलना करून डालडा हे इन्फिरिअर गुड असल्याचे मांडले होते आणि तूप परवडत नसल्यामुळे डालडा वापरावा लागल्याची खंत होती.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
छान चर्चा..
एका पेक्षा जास्त वेळा वाचायला लागला लेख आणि प्रतिसाद
वरती एक 'इन्फिरीयर गूड' चा मुद्दा आलाय तेच डोक्यात आलं पहिल्या प्रथम.
तूपाचा डायरेक्ट संबंध हा ह्रुद्यरोगाशी आहे ज्यांनी कॅलेस्टरोल असंतुलित होऊन ह्रुदयरोगाशी शक्यता अनेक पटींनी वाढते हे संशोधनांती सिद्ध झालय. गेल्या दोन द्शकात हे मध्यमवर्गीयच नव्हे तर अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतय त्यामुळे तूपाचा वापर दुय्यम होऊ लागलाय आणि पुढे जाऊन अधिक दुय्यम होईल (विशेषतः मध्यम आणि उच्च वर्गांमध्ये), फिटनेस काँशियस वाढलाय ते ह्याच कारणामुळे. त्यामुळे तूपाच्या वापरावरुन आर्थिक स्वास्थ्याची परिक्षा न होता ह्यापुढे शारिरिक स्वास्थ्याचीच परिक्षा होणार. मोदकावर आणि पुरणपोळीवर तूपाची धार फार तर एखाद पिढी
एकूणात लेख रोचक वाटला!
- प्रशांत उपासनी
अर्थशास्त्रात ज्या अर्थाने
अर्थशास्त्रात ज्या अर्थाने काही वस्तूंना इन्फिरियर गुड्स म्हणतात त्यात तूप बसत नाही. उत्पन्न वाढले म्हणून तुपाची मागणी कमी होते आणि उत्पन्न कमी झाले की तुपाची मागणी वाढते असे नाहीय.
बरेच श्रीमंत लोक तुपामुळे जाडी वाढते म्हणून तूप खात नसतील तरी लगेच ते इन्फिरियर गुड होत नाही कारण त्याच श्रीमंत लोकांचे उत्पन्न समजा कमी झाले तर ते नाईलाजाने तूप खायला लागतील असे नाही.
गरीबांना जास्त पोषक भाज्या परवडत नाहीत म्हणून ते बटाटा खातात. तुपाचं तसं नाही.
सत्तर ते ऐंशीं
१९७० ते १९७५-८० दरम्यान धवलक्रांतीव्यतिरिक्त आणखीही एक गोष्ट घडली. बँकिंग आणि विमाक्षेत्राचे राष्ट्रीयीकरण होऊन काहीश्या सक्तीने शाखाविस्तार आणि त्यासाठी मोठीच नोकरभरती करण्यात आली. त्या काळातले हे आकर्षक जॉब्ज मिळाल्यामुळे सुखवस्तू मध्यमवर्ग वाढला. या घटनेची तुलना आजच्या आय्टी-नोकरीविस्फोटाशी करता येऊ शकेल. यामुळेही थोड्याफार प्रमाणात क्रयशक्ती वाढून तूप वापरणे आवाक्यातले झाले असावे.
तुम्ही इथे क्रयशक्तीचा मुद्दा
तुम्ही इथे क्रयशक्तीचा मुद्दा मांडला आहे. म्हणजे डिमांड साइड किंवा मागणीची बाजू. मी लेखात मांडलेला मुद्दा निव्वळ उत्पादनाचा आहे. म्हणजे सप्लाय साइड किंवा पुरवठा. या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जातात. गरजा आहेत, वाढलेलं उत्पादन आहे पण क्रयशक्ती नसल्यामुळे माल पडून रहाण्याचा प्रकार आर्थिक मंदीत होतो. किमती पडतात, मालाला उठाव नाही, त्यामुळे धंदे मंदावून नोकऱ्या कमी होतात, आणि त्यातून क्रयशक्ती घटते. हे मंदीचं दुष्टचक्र. त्यामुळे उत्पादन वाढलं त्याचबरोबर क्रयशक्ती वाढत रहाणंही महत्त्वाचं आहे. मागणी आणि पुरवठा एकमेकांबरोबर वाढतात तेव्हा गरजा भागतात, आणि आर्थिक प्रगतीचं सुष्टचक्र चालू रहातं.
सुष्टचक्र शब्द आवडल्या गेला
सुष्टचक्र शब्द आवडल्या गेला आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
या लेखात 'उत्पादन वाढलं की
या लेखात 'उत्पादन वाढलं की वितरण सुधारतं, आणि एके काळी जे सुख पहिल्या तीस टक्क्यांना मिळायचं ते पहिल्या साठ टक्क्यांना मिळायला लागतं.' या प्रकारचा युक्तिवाद केलेला आहे. हा तात्विकदृष्ट्या बरोबर आहे पण जोपर्यंत विदा मिळत नाही तोपर्यंत त्यात अनेक खुसपटं काढता येतात या स्वरूपाचा आक्षेप घेतला गेला होता. जो अर्थातच योग्य आहे.
आनंदाची गोष्ट म्हणजे मला हे सिद्ध करणारा विदा मिळालेला आहे. या लेखात केवळ बटरफॅटविषयी चर्चा असली तरी एकंदरीत फॅट किंवा स्निग्ध पदार्थ खाण्याच्या बाबतीत वितरण सुधारलेलं आहे याचा विदा इथे पृष्ठ क्रमांक ३८ वर उपलब्ध आहे. त्यातून मी या लेखात धरलेली गृहितकं/निष्कर्ष रास्त आहेत हे दिसून येतं.
१. सर्वात वरचे १० टक्के - त्यांना आधीच भरपूर मिळत असतं त्यामुळे त्यांच्या सेवनाच्या प्रमाणात फारसा फरक पडत नाही.
२. ७२ साली जेवढं सेवन ७५ व्या पर्सेंटाइलचं होतं तेवढं २००४ साली ३५ व्या पर्सेंटाइलचं आहे. आणि ३५ व्या पर्सेंटाइलचं सेवन होतं ते आता पाचव्या पर्सेंटाइलचं आहे.
३. सेवनाच्या वाढीतली पट/टक्केवारी बघितली तर सर्वात तळागाळातल्या लोकांसाठी ती अधिक आहे. जसजसे वरच्या पर्सेंटाइलला जाऊ तसतशी ती कमी होते. किंबहुना दरडोई दरदिवशी वाढलेलं सेवन जवळपास सारखंच आहे. म्हणजे अतिरिक्त तेल/तुपाचं वाटप बऱ्यापैकी समानतेने झालेलं आहे.
सेवन अप! (अतिअवांतर)
अधोरेखिताबाबत, प्रस्तुत संदर्भात: 'सेवन केले' = 'एट'.
(उगाच लक्षात आले, म्हणून सांगितले. उगाच! बाकी चालू द्या.)
मग नाईन अजून काही म्हणायचं?
मग नाईन अजून काही म्हणायचं? टेन इट्स ओके.
अतिअवांतर
एट टू???
(हे म्ह. १० असावे भौतेक)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अंहं...
एट टू म्हणजे (आठातून) दोन खाल्ल्यावर सहा शिल्लक राहिले.
१६
किंवा ८*२= (८+२)+(८-२).
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं