मराठी भाषा विषयातील पहिल्या प्रबंधाचा अमृतमहोत्सव
मुंबई विद्यापीठाने २९ जून १९३८ या दिवशी पु. ग. सहस्रबुद्धे यांचा प्रबंध स्वीकारून मराठीतील पहिली पीएच. डी. त्यांना बहाल केली. शनिवारी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. मराठी भाषेत पीएच. डी. साठी शंकर दामोदर पेंडसे यांनी सर्वप्रथम २४ ऑक्टोबर १९३८ रोजी तत्कालीन नागपूर विद्यापीठात प्रबंध सादर केला होता. परंतु, पु. ग. सहस्रबुद्धे यांनी मुंबई विद्यापीठात सादर केलेला प्रबंध आधी स्वीकृत झाल्याने ते मराठी भाषेत पीएच. डी. मिळविणारे पहिले मानकरी ठरले. डॉ. सहस्रबुद्धे यांच्या प्रबंधाचा विषय 'स्वभावलेखन' हा होता. महिलांमध्ये डॉ. तारा गंगाधर केळकर यांना २७ जानेवारी १९४९ रोजी नागपूर विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय 'स्त्री जीवन - काळ महानुभाव ते रामदास' असा होता.
मराठी प्रबंधांची सूची नागपूरच्या साहित्य प्रसार केंद्राने प्रकाशित केली आहे. नागपूर विद्यापीठाचे सेवानिवृत्त ग्रंथपाल डॉ. वसंत विष्णू कुळकर्णी वयाच्या ८५व्या वर्षीही सूची संकलनाचे काम अव्याहतपणे करत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क - साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी, नागपूर - ४४० ००१ दूरध्वनी - ०७१२-२५२३७०२
संदर्भ - ह्या निमित्ताने दैनिक लोकसत्तामध्ये आलेली ही बातमी.
प्रतिक्रिया
हा प्रबंध कुठे वाचण्यासाठी
हा प्रबंध कुठे वाचण्यासाठी मिळू शकतो का?
प्रा. मा.त्रिं. पटवर्धनांचा ग्रंथ छन्दोरचना
प्रा.माधव त्रिंबक पटवर्धन (माधव जूलियन) ह्यांचा छन्दोरचना हा ग्रंथ प्रथम १९२७ साली प्रसिद्ध झाला. त्यात आणखी भर घालून हाच ग्रंथ जानेवारी १९३७ मध्ये प्रकाशनाला तयार होता आणि १९३७ त तो छापून प्रसिद्धहि झाला. हा ग्रंथ माधवरावांनी मुंबई विद्यापीठाची पी.एच.डी./डी. लिट अशी पदवी मिळावी अशा महत्त्वाकांक्षेनेच लिहिला होता. (गं.दे.खानोलकर ह्यांनी लिहिलेल्या चरित्रात प्रकरण १६ मध्ये हा उल्लेख आहे.) तो विद्यापीठात परीक्षेसाठी पाठविल्यावर त्यावरून बरेच राजकारण झाले. असे काही राजकारण झालेले दिसते कारण ह्या संदर्भातील प्रा.द.सी.पंगु ह्यांच्या 'माधवराव पटवर्धनांच्या डी.लिट.प्रकरणातील अंतस्थ भानगडी' ह्या शीर्षकाच्या १६ जून १९४६ च्या झंकारच्या अंकातील लेखाचा उल्लेख खनोलकर करतात. अखेरीस रंगाचार्य रेड्डी. प्रा.वेलणकर आणि फ्रेंच प्राध्यापक झुल ब्लोक ह्यांच्या शिफारसीवरून तो डी.लिट. पदवीयोग्य आहे अशी शिफारस जून-जुलै १९३८ मध्ये झाल्यानंतर १ डिसेंबर १९३८ ह्यादिवशी विद्यापीठाच्या पत्रातून हा निर्णय माधवरावांना कळविण्यात आला.
पु.ग.सहस्रबुद्धे ह्यांच्या कार्याचा गौरव करतांना माधवरावांचाहि योग्य उल्लेख व्हावा असे वाटल्याने ही प्रतिक्रिया लिहिली आहे. राजकारण आणि हेवेदावे नसते तर कदाचित हे रेकॉर्ड कदाचित माधवरावांच्या नावे नोंदले गेले असते.
तारखेचा घोळ?
>> शंकर दामोदर पेंडसे यांनी सर्वप्रथम २४ ऑक्टोबर १९३८ रोजी तत्कालीन नागपूर विद्यापीठात प्रबंध सादर केला होता.
>> मुंबई विद्यापीठाने २९ जून १९३८ या दिवशी पु. ग. सहस्रबुद्धे यांचा प्रबंध स्वीकारून...
जर जून १९३८ मध्ये प्रबंध स्वीकारला गेला होता, तर ऑक्टोबर १९३८ चा प्रबंध सर्वप्रथम कसा काय ठरतो? ती तारीख २४ ऑक्टोबर १९३७ होती का?