प्लास्टिकची माती
'माती असशी मातित मिळशी' हे सर्व सजीवांना लागू पडतं. (अगदी एकजात सगळ्या सजीवांना, सर्वच बाबतीत लागू पडत नाही, पण बहुतांश...). प्रत्येकच जीवाचं शरीर खाऊ शकणारा, पचवू शकणारा दुसरा जीव असतो. एक जीव मेला की ताबडतोब त्याचं शरीर जीवाणू खाऊन टाकतात. त्या जीवाणूंवर जगणारे जीव, त्यांच्यावर जगणारे जीव असं वर वर जात अन्नाच्या साखळीत ते शरीर शोषलं जातं.
माणसाने तयार केलेलं प्लास्टिक मात्र नॉन-बायोडिग्रेडेबल, म्हणजे या साखळीत सामावून जाऊ न शकणारं समजलं जातं. याचं कारण म्हणजे पॉलियुरेथिन त्याच्या घटक द्रव्यांमध्ये विघटन करून त्यापासून ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया आत्तापर्यंत कुठच्याही जीवाला सापडलेली नाही. त्यामुळे वापरून झालेल्या प्लास्टिकचं फेकून देण्यापलिकडे पुढे काही करता येत नाही. अनेक पर्यावरणवाद्यांची या प्लास्टिकच्या अतिरेकाबद्दल तक्रार होती, अजूनही आहे. मला व्यक्तिशः या तक्रारीचं कारण नीटसं कळलेलं नाही. मुळात ज्या क्रूड ऑइलपासून प्लास्टिक तयार केलं जातं, ते क्रूड ऑईलदेखील जमिनीच्या पोटात खोलवर, निसर्गाच्या अन्नसाखळीच्या बाहेरच होतं. ते जमिनीबाहेर काढल्यावर मात्र त्या साखळीत आणता यावं याबद्दलचा अट्टाहास मला कळलेला नाही. प्लास्टिकचा कचरा नीट झाकून ठेवावा, कुठेतरी खड्डा खणून खोलवर पुरून टाकावा इतपत मागणी ठीक वाटते. पण त्यासाठी निश्चितच खर्च येतो.
या बाबतीत आत्ताच एक अतिशय उत्साहवर्धक बातमी वाचली. येल युनिव्हर्सिटीचे काही विद्यार्थी अभ्यासासाठी ऍमेझॉन खोऱ्याच्या जंगलात गेले होते. तिथून त्यांनी काही वनस्पती व त्यात जगणाऱ्या जीवांचे (मायक्रोऑर्गॅनिझम) नमुने आणले. त्यात त्यांना एक फंगस सापडली - Pestalotiopsis microspora. हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही बिनधास्त प्लास्टिक खाते. इतकंच नाही, तर हे विघटन ऍनेरोबिक स्वरूपात - म्हणजे ऑक्सिजन न वापरता करते. त्यामुळे जिथे प्लास्टिक फेकून दिलेलं आहे अशा लॅंडफिल्समध्ये ही वनस्पती वाढली तर शेवटी 'प्लास्टिक असशी मातित मिळशी' हीही उक्ती खरी ठरू शकेल.
मूळ बातमी इथे.
प्रतिक्रिया
होय, मान्य
> प्लास्टिकचा कचरा नीट झाकून ठेवावा, कुठेतरी खड्डा खणून खोलवर पुरून टाकावा इतपत मागणी ठीक वाटते.
बरोबर. मूळ मागणी तितपतच आहे. क्रूड तेलसाठ्यांइतके "अध्यात नाही, मध्यात नाही" असे खोलवर पुरून ठेवणे महागाचे असते, म्हणून बरेचदा कचरा अध्यात-मध्यात राहातो. बायोडिग्रेडेबल कचरा अध्यात-मध्यात राहिला तरी त्याचा निचरा होतो. बायोडिग्रेडेबल कचरा हा पुरण्याचा खर्च वाचवण्याच्या हेतूने स्वस्त पडतो.
मागणीचं मूळ...
कोणाच्या मूळ मागणीचं वर्णन आहे हे माहीत नाही. मात्र प्लास्टिक बायोडिग्रेडिबल नाही, याबद्दलच्या ऐकू येणाऱ्या तक्रारींबरोबरच मानवाने निसर्गात कसे अनैसर्गिक घटक आणून त्याची बरबादी केलेली आहे हा स्वर कायम येतो. म्हणजे 'घर स्वच्छ ठेवावं, त्याने प्रसन्न वाटतं माणसाला' असं हळूवारपणे आईने सांगणं, आणि 'ही मेली घरात पसारा, घाण करून ठेवते. आईबापांनी काही वळणच लावलेलं नाही' असा सासूने त्रागा करावा... यातला फरक आहे.
"अध्यात नाही, मध्यात नाही"
म्हणजे नक्की काय? जर प्लास्टिकचा तुकडा समुद्रात पडलेला असेल आणि तो बायोडिग्रेडेबल नसेल तर तो अन्नसाखळीच्या अध्यात किंवा मध्यात येणं हा वदतोव्याघात आहे. समुद्रातला एखादा दगड हा अध्यात किंवा मध्यात असतो का? मानवी सौंदर्यदृष्टीशिवाय नक्की प्लास्टिक कशाच्या अध्यात मध्यात येतं?
हेही कळलं नाही. तत्वतः खरं असलं तरी बायोडिग्रेडिबल कचराही बरीच वर्षं टिकून रहातो. मोठ्या शहराच्या लॅंडफिलमध्ये एका संशोधकाने उत्खनन केल्याबद्दल वाचलं होतं. कित्येक वर्षांनंतर जसाच्या तसा राहिलेला हॉटडॉग त्याला सापडलेला होता. कचऱ्याच्याच ढिगाखाली पुरल्यावर प्लास्टिक काय किंवा हॉट डॉग काय... काहीच फरक पडत नाही.
सौंदर्यदृष्टीशिवाय
एक उदाहरण.
http://www.midwayfilm.com/about.html
-Nile
समुद्रात टाकणे हा गंभीर पर्याय आहे काय?
http://greenliving.nationalgeographic.com/disposal-nonbiodegradable-wast...
> The U.S. Environmental Protection Agency recommends recycling whenever possible,
> and disposing of your trash at a combustion facility or in a landfill only when
> recycling is not possible (see References 1, page 11).
> ...
> Recycling saves space in landfills and reduces the amount of virgin materials
> that must be mined or manufactured to make new products, saving energy and
> reducing global climate change in the process. (See References 3)
> ...
> Combustion of municipal waste also reduces the volume of trash that ends up in landfills.
> ...
> Landfills provide long-term storage for non-biodegradable waste. Ideally, landfills are
> carefully situated to prevent contamination from entering surrounding soil and water, and
> managed to reduce odor and pests as much as possible. (See References 4) Federal
> regulations require careful monitoring in and around the site.
वगैरे वगैरे.
नॉनबायोडिग्रेडिबिलिटीचा मुद्दा "non biodegradable waste" गूगल शोधावरील पहिल्या दुव्यात वरीलप्रमाणे दिसतो. मुद्दा विल्हेवाटीबाबत आहे. शेवटचा मुद्दा "अध्यात-मध्यात" बाबत आहे.
> याबद्दलच्या ऐकू येणाऱ्या तक्रारींबरोबरच मानवाने निसर्गात कसे अनैसर्गिक
> घटक आणून त्याची बरबादी केलेली आहे हा स्वर कायम येतो.
तुमची तक्रार लोकांच्या स्वराबाबत आहे, असे दिसते आहे. स्वरावर लक्ष केंद्रित होऊन मुद्द्यांबाबत कान बधीर होऊ नये. स्वरामागे मुद्दे नाहीत, याचे विवेचन करण्याचे "बर्डन ऑफ प्रूफ" तुमच्यावर आहे. त्यामुळे गूगल शोधावरच्या पहिल्या दुव्यापलिकडे मी गेलेलो नाही.
> "अन्नसाखळीच्या अध्यात किंवा मध्यात येणे हा वदतोव्याघात आहे"
"अन्नसाखळीच्या"च्या उल्लेख नि:संदर्भ आहे. "वदतोव्याघाता"चा आरोप करण्यासाठी तो आणलेला आहे काय?
कचरा समुद्रात टाकणे हा गंभीर पर्याय आहे काय? असल्यास हरकत नाही. पण चर्चेकरिता आधी "सुसंवादाकरिता कोणत्या सर्वमान्य गृहीतकांपर्यांत मागे जाणे आवश्यक आहे" ते ठरवणे आले.
तुमची तक्रार लोकांच्या
हो, स्वराविषयीच तक्रार आहे. माझ्या मते अनेक वेळा तांत्रिक प्रश्नांकडे जनसामान्य एक भावनिक प्रश्न म्हणून बघतात. त्यामुळे तांत्रिक मुद्देच नाहीत हे सिद्ध करण्याची माझी जबाबदारी नाही, कारण माझा तसा विश्वास नाही.
तुम्ही मांडलेले विल्हेवाटीविषयीचे आणि तदनुषंगिक खर्चाचे बहुतेक मुद्दे अर्थातच मान्य आहेत. माझा मुख्य मुद्दा प्लास्टिककडे बघण्याचा दृष्टिकोन हाच आहे.
अन्नसाखळीचा उल्लेख नि:संदर्भ असल्याचं मला वाटलं नाही. 'अध्यात मध्यात' या शब्दप्रयोगात माझ्यासाठी अन्नसाखळी अध्याहृत होती.
असो, माझा अधिक व्यापक मुद्दा असा होता की एके काळी जे अशक्य प्रश्न समजले जात असत त्यांच्यावर कालांतराने काही ना काही उपाय निघतो. कधी मुद्दामून शोधून तर कधी अचानक. प्लास्टिकचं काय करायचं? हा जो काही वर्षांपूर्वी भेडसावणारा प्रश्न होता त्यावर उपाय सापडायला लागलेले आहेत. ही प्लास्टिक खाणारी फंगस सापडणं हे तशाच अनेकविध प्रश्नांना निघालेल्या अनेकविध तोडग्यांपैकी एक.
स्वराबाबत मुद्दे बरेच व्यक्तिनिष्ठ होऊ शकतात
स्वराबाबत मुद्दे बरेच व्यक्तिनिष्ठ होऊ शकतात.
संवादक एकमेकांना "मला तुझा स्वर आवडत नाही" म्हणून संवाद बंद पाडू शकतात.
मात्र कुठलेसे वस्तुनिष्ठ मोजमाप बदलत असेल, आणि ते वस्तुनिष्ठ मोजमाप कुठल्या दिशेने बदलावे याबाबत संवादकांचे एकमत असेल, तर स्वराकडे दुर्लक्ष करूनही संवाद होऊ शकतो. आणि कार्य होऊ शकते.
परंतु स्वराचा मुद्दा कार्याच्या प्रेरणेकरितासाठी महत्त्वाचा आहे, हे मान्य. एखादेवेळेस समोरच्या व्यक्तीच्या स्वराबाबत इतका तिटकारा वाटू लागतो, की कार्याची प्रेरणा कमकुवत होऊ शकते.
व्यापक मुद्दा तसा नेहमीच खरा आहे : "In the long run, we will all be dead" (जॉन मेय्नार्ड केय्न्झ) आणि आज जिवंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटणारी सुखे-दु:खे पुढे कधीतरी नाहिशी होतील, त्या पुढच्या काळात जिवंत असलेल्या व्यक्तींची वेगळी सुखे-दु:खे तेव्हा समोर असतील.
स्वराबाबत मुद्दे बरेच
वस्तुनिष्ठ पद्धतीने स्वराबाबत मांडणी करण्याचा प्रयत्न चालू आहे. तोपर्यंत माझा तक्रारीचा स्वर चालवून घ्यावा.
हा हा हा.. तत्त्वतः हे बरोबर असलं तरी या बाबतीत बहुतांश जनता एकस्वरात गाते आहे, तेव्हा माझ्या तक्रारीने हा संवादच बंद पडेल अशी काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. आणि स्वराबद्दल चर्चाच होऊ नये असंही नाही. त्याही चर्चेचा स्वर संयत रहावा इतकंच.
तीच तर गंमत आहे. वरचं विधान खरं असलं तरी दुःखं नाहीशी होणारच नाहीत अशी एक व्यापक भावना असते, ती अनेक दुःखं नाहीशी झाली तरी जात नाही (असं माझं निरीक्षण आहे). एक प्रयोग करून पहा - एखाद्या पार्टीला मित्रमंडळी जमलेली असताना अनेक वेळा 'च्यायला, हे सालं सगळं जग/समाज रसातळाला चाललंय' अशा चर्चा अनेक वेळा ऐकू येतात. त्यात आसपास कसे प्रश्न आहेत हे सगळे जण आपापल्या परीने सांगतात. त्यात 'खरं तर तितकं वाईट नाहीये जग. आपल्या आईवडिलांनी जे जग पाहिलं त्यापेक्षा निश्चितच चांगलं झालं आहे' असा पवित्रा घेऊन पहा. बरेच जण कबूल होत नाहीत, आणि जे कबूल करतात ते नाईलाजाने कबूल होताना दिसतात. हा काही शास्त्रीय प्रयोग नाही, पण सर्वसाधारण परिस्थितीची कल्पना देतो.
आपल्या वयाच्या ३०-४० वर्षांपर्यंत प्रगती, त्यानंतर अधोगती
> 'च्यायला, हे सालं सगळं जग/समाज रसातळाला चाललंय' अशा चर्चा अनेक वेळा ऐकू येतात.
"प्रत्येकाच्या वयाच्या ३०-४० वर्षांपर्यंत प्रगती, त्यानंतर अधोगती" असे कुठेतरी वाचले होते.
"प्रगती होत आहे" आणि "अधोगती होते आहे" अशा दोन्ही चर्चा मला ऐकू येतात. मात्र वयस्कर लोक "अधोगती" पक्षात अधिक असतात, खरे. आणि तरुण लोक "प्रगती" पक्षात. शिवाय भारतात "ब्रिटिश अमल चांगला होता" असे पूर्वी ऐकायला मिळत असे म्हणे (पु.ल.देशपांड्यांच्या कुठल्याशा पुस्तकात त्यांच्या काळच्या वयस्कर लोकांबाबत) तसे आता ऐकू येत नाही. आजकालच्या वयस्कर लोकांच्या मते ब्रिटिश अमल सुवर्णकाल नव्हता.
अशा काही बाबींमुळे मला वाटते की प्रत्येकाच्या कालगणनेत एक "सुवर्णकाल" असतो, त्याआधी प्रगती, नंतर अधोगती, असा क्रम असतो.
असो - चालू द्या.
वयस्कर लोक "अधोगती" पक्षात
वय वाढेल तसा (साधारणतः, सरासरी वगैरे) माणसाचा शहाणपणा वाढतो असेही एक बव्हंशी मान्यताप्राप्त विधान आहे खरे.
असो.
स्वरासंबंधी सुस्वर संवाद चालू असला तरी मला न आवडणार्या काही स्वरांबद्दल लिहिण्याचे टाळतो.
हो
प्रत्येकाचा असा एक स्वतःचा सुवर्णकाल असतो. at its zenith the empire included ह्या अर्थाची वाक्ये साम्राज्यांसंदर्भात आणि राज्यांसंदर्भात ऐकू येतात. तसच माणसाचही नाही का. आपल्या कर्तृत्वाच्या अत्युच्च शिखरावर तो असतो. बहुतांश वेळा आपण ह्याहून अधिक उंच जाणार असा त्याला विश्वासही असतो.(आकाशपाळणा वरवर जात असतना नजर वरच्या दिशेलाच लावून बसलेल्यास होते तसे. तुमचा सुवर्णकाल निघून गेलाय हे कित्येकदा तो निघून गेल्यानंतरच समजते. तो सुरु असताना तो कायम टिकणार नाही; ह्याची जाणीवही नसते.(equity market मध्ये कसे सर्वोच्च किंवा नीचतम पातळी निघून गेल्यावरच समज्ते, की ती त्या त्या टोकाची पातळी होती. जानेवारी २००८ला सेन्सेक्स २१००० अंशावर असताना तो दोन चार महिन्यात २५००० ला जाणार असे मानणारेही होतेच. आणि तोच पडून पडून मे २००९पर्यंत ८०००अआंशपर्यंत खाली आल्यावर अगदि ३-४हजारपर्यंतही खाली येइल हे म्हणणारेही होतेच. दोन्ही वेळेस त्या त्या वेळा निघून गेल्यावर ते market bottom होते हे समजले. मानवी आयुष्यातही असेच होते की. शिवाय असा सर्वोच्च यशाचा कीम्वा मह्त्वाच्या घटनेचा बिंदू त्या-त्या माणसासाठी जणू एक नवीन कालगणनाच ठरतो. माणूस "ती मोठी घटना घडण्यापूर्वी" आणि "ती मोठी घटना घडल्यनंतर" असा विचार करु लागतो.) पु लं च्या "दोन वस्ताद" ह्या व्यक्तिचित्रणात ह्या सर्वोच्च बिंदूचे यथार्थ दर्शन आहे. ती दोघे त्यांनी काही दशकापूर्वी मिळालेल्या मानपानातच असतत; त्यांचे जीवन त्याच दोन्-चार क्षणात असते.(अर्थात इथे मी म्हणतो आहे ते थोडेसे वेगळे. ती घटना त्यांच्यासाठी life before आणि life after ठरावी अशीच आहे.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तुमची तक्रार लोकांच्या
+ १०१०१००.
अधोरेखिताशी प्रचंड सहमत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दुवा
दुवा सापडला. http://www.nytimes.com/1992/07/05/books/we-are-what-we-throw-away.html?s...
या अभ्यासात काही सामान्य गैरसमजाचं खंडन केलेलं आहे.
[list]
[*]चाळीस टक्के कचरा वर्तमानपत्रांचा असतो. स्टायरोफोम एक टक्का. डायपर दीड टक्का.
[*]अमेरिकन्स इतरांपेक्षा जास्त कचरा करत नाहीत
[*]गेल्या शतकभर कचऱ्याचं प्रमाण फार बदललेलं नाही.
[*]बायोडिग्रेडेबल कचरा बायोडिग्रेड व्हायला शतकं, सहस्रकं लागतात.
[/list]
अपुरे
प्रस्तुत प्रमाण अपुरे आहे.
त्या दुव्यातून उद्धृत:
If we are deluded about our own patterns of consumption, it follows that we might also hold mistaken notions about garbage in general. Most people believe, for example, that expanded polystyrene foam -- which is used in fast-food packaging, coffee cups, packing "peanuts" and the molded forms that come around stereo equipment -- constitutes a major proportion of our garbage and represents a serious strain on the capacity of landfills. But the garbage project found that expanded polystyrene foam accounted for less than one percent of the volume of garbage dumped in landfills between 1980 and 1989. And what about the 16 billion disposable diapers that Americans use every year? They constituted an average of no more than 1.4 percent, by volume, of the average landfill's total solid-waste contents during 1980-89.
१. बातमी १९९२ ची आहे. संशोधन त्याआधीचे आहे. संशोधन एकाच लँडफिलवरचे आहे. त्याचे कोणत्या प्रमाणात सार्वत्रिकीकरण करता येते याचा तपशील नाही.
२. हे एकाच लँडफिलचे संशोधन असल्याने १९९२ नंतर ते सिध्दांताच्या रुपात आणखी प्रयोगांती, संशोधनांती शाबित झाले आहे का? नसल्यास ही अशी सांख्यिकी केवळ अंगुलीनिर्देश करणारी मानावी लागेल का?
३. एक्स्पांडेड पॉलीस्टीरीन फोमबाबतचा निष्कर्ष १९८०-८९ या काळातील आहे. या काळात expanded polystyrene foamचा वापर कसा होता याची माहिती दिसत नाही. अर्थातच, या काळात "expanded polystyrene foam... constitutes a major proportion of our garbage and represents a serious strain on the capacity of landfills" ही ओरड होत असेल आणि ती प्रमाणांविना असेल तर ती निकालात काढावीच लागेल.
४. वरील बाबच पुन्हा एकदा डायपर्सना लागू होते.
क्रमांक २ आणि ३ बाबत अशी स्थिती आहे का की ओरड सुरू झाल्यानंतर अभ्यास करून तसे नाही हे दाखवण्याचा प्रयत्न झाला?
प्रस्तुत प्रमाण अपुरे
प्रश्नच नाही. मी उद्धृत केलेला लेख हा एका संशोधकाने केलेल्या अभ्यासाविषयी लिहिलेल्या पुस्तकाविषयीची माहिती आहे. म्हणजे आपण सत्यापासून किती लांब आलो पहा.
सत्य - प्रतीत - निरीक्षण - नोंदणी - सादरीकरण - पीअर रिव्ह्यू संस्कार - जनसामान्यांसाठी पुस्तकरूपी मांडणी - तिचं वाचन - प्रतीत मुद्दे - जनसामान्यांसाठी लेखस्वरूपात मांडणी - तिचं वाचन (मी) - त्याचा सारांश - त्याचं वाचन (तुम्ही) - आणि त्याविषयीची चर्चा.
इतक्या पायऱ्यांनंतर मूळ सत्याचा काही तथ्यांश शिल्लक राहिला नसेल असं तुम्हाला वाटलं तर मी तुम्हाला दोष देणार नाही. कदाचित त्या दुव्यात दिलेलं पुस्तक वाचलं तर तुम्हाला हवी असलेली पूरक माहिती मिळू शकेल असा अंदाज आहे. त्यामुळे ही मांडणी त्या पुस्तकाकडे अंगुलीनिर्देशात्मकच आहे.
माझा गोंधळ
यात माझा गोंधळ होतोय. तुमच्या या वाक्यात सत्यापासून हा शब्द कोणत्या सत्याविषयी बोलतोय, आणि लांब आलो म्हणजे काय घडले?
Expanded Polystyrene Foam
Expanded Polystyrene Foam ज्याला शुद्ध मराठीत थर्माकोल म्हटले जाते त्याचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी पॅकिंग म्हणून वापरण्याचे प्रमाण अलिकडे खूपच कमी झाले आहे. हल्ली बहुतांशी कॉरुगेटेड शीट्सनाच वेगवेगळे कट्स घेऊन पॅकिंगमध्ये वस्तू योग्य रीतीने फिट व्हावी असे डिझाइन केलेले असते. क्वचित रिसायकल्ड पेपर पल्पचा वापर केलेला असतो. (१९९२ मध्ये थर्माकोलचे प्रमाण जास्त असावे). भारतातसुद्धा हल्ली गणपतीच्या मखरासाठी बरेच लोक थर्माकोल वापरत नाहीत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ऐला!!!!!!!!!!!!! भारीच!!!
ऐला!!!!!!!!!!!!! भारीच!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
रोचक माहिती. प्लास्टिक पासून
रोचक माहिती.
प्लास्टिक पासून इंधन निर्मिती अल्का झाडगावकर यांनी शक्य करून दाखवलेली आहे.
लेखाच्या दुव्याबद्दल अणेक
लेखाच्या दुव्याबद्दल अणेक धण्यवाद!!! बहुत रोचक आहे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे रोचक आहे. पण इंधन निर्मिती
हे रोचक आहे. पण इंधन निर्मिती शक्य झाल्यास वेस्ट-मॅनेजमेंट पुरतेच हे मर्यादीत रहाणार का हा प्रश्न पडतो.
पुढील तंत्रज्ञानाकरिता चांगले बीज
अशा प्रकारचे जीवाणू/कवक (बॅक्टेरिया/फंगस) यांचे शोध भावी तंत्रज्ञानाकरिता चांगली बीजे असतात.
अशा अनेक सजीवांपैकी एखादी औद्योगिक प्रमाणात वापरता येऊ शकेल.
माणसाने तयार केलेलं प्लास्टिक
माणसाने तयार केलेलं असं म्हणता सोयीस्कर गृहितक मानता येणार नाही. बॅक्टेरियांच्या जीवावर जो कच्चा माल मिळतो त्यापासून प्लास्टीक बनतं. काही लाख वर्षांपूर्वी सेल्युलोज किंवा अन्य जैविक द्रव्यापासून पेट्रोलियम बनलं. आता आपल्याला अशा फंगसची माहिती समजली जे हे चक्र पूर्ण करेल. नैसर्गिक गतीपेक्षा अधिक वेगाने वर्तुळ पूर्ण कसं करायचं ते समजलं.
प्लास्टीकशिवाय आयुष्याची कल्पना करता येत नाही. ज्या कीबोर्डवरून टाईप करते आहे तो प्लास्टीकचा, ज्या पॅकिंगमधून लॅपटॉप आला त्यात प्लास्टीक, अंगावर थंड हवा टाकणारा पंखा प्लास्टीकचा, डीव्हीडीचं कव्हर प्लास्टीकचं ... एकेकाळी अमेरिका खंडात सोनं, चांदी सापडले म्हणून जगाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आली, ताजमहाल उभा करण्यासाठी जे पैसे मोजावे लागले, ते बनवता आले असं म्हटलं जातं. आज प्लास्टिक मनी राज्य करतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आशादायक बातमी. यातच पुढे
आशादायक बातमी.
यातच पुढे संशोधन होऊन कमीत कमी ऊर्जेत प्लॅस्टिकपासून पुन्हा ऑईल निर्माण करता आले तर काय बहार होईल!
रोचक माहिती
रोचक माहीती.
अवांतर - काल भारताच्या सुप्रीम कोर्ट ने स्वीस औषध कंपनी नोवार्टीस चा पेटंटचा दावा फेटाळला व भारतीय औषध कंपन्यांना स्वस्तात कॅन्सरवर औषधे बनवायचा मार्ग मोकळा झाला. १) माहिती दुवा येथे २) डॉक्टर्स विदाउट बोर्डर्स
रोचक माहिती. ऋता आणि ननिचा
रोचक माहिती.
ऋता आणि ननिचा प्रतिसाददेखील रोचक.
रोचक माहिती! आभार
रोचक माहिती! आभार.
बाकी,
पाण्याच्या पाईपलाईन्सच्या, ड्रेनेज लाईन्सच्या, गाई-म्हशींच्या अन्ननलिकेच्या, जठराच्या, पक्ष्यांच्या घरट्याच्या, शेतजमिनीच्या वगैरे मध्ये येत असल्याने माणसाला थेट तोटा होतो. त्यामुळे प्लॅस्टिक वापर शक्य असल्यास टाळणे मी हितावह समजतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रोचक
शोध रोचक आहे.
ही अनेक तक्रारींपैकी एक आहे, प्लास्टिकमधले घटक(BPA) Endocrine systemसाठी चांगले नसल्याचे दावे आहेत, अर्थात ते (प्लास्टिकसंदर्भात) अजून पुर्णपणे सिद्ध झाले नसले तरी धोका असल्याचे संकेत आहेत. प्लास्टिकची माती व्हायला लागल्यावर त्याचे उत्पादन अधिक जोराने होण्याची शक्यता आहे.
टाईम्सचा प्लास्टिकवरचा हा लेख रोचक आहे.
युजफुल बट डेंजरस
जर ही फंगस प्लास्टिक खात असेल तर मग तिच्या अनियंत्रित वाढीने जगातले प्लास्टिकही 'गंजू' लागेल आणि प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर निरुपयोगी होईल. (उदा. प्लास्टिकची उपकरणे, इंटेग्रेटेड सर्किट (आयसी), पाईप्स वगैरे दीर्घ पल्ल्याच्या उपयोगी रहाणारच नाहीत.)
मार्मिक! स्वगतः असा मूलगामी
मार्मिक!
स्वगतः असा मूलगामी विचार कधी करायला शिकणार रे बाबा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हम्म
उत्पादनांच्या प्लॅन्ड ऑब्सोलिसन्ससाठी ही पथ्यावरच पडणारी बाब ठरेल.
फारच आशादायक बातमी
फारच आशादायक बातमी
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
तलवारबाजी
तलवारबाजी वाचताना मजा आली. प्लास्टिक खाणारी बुरशी हा काही जग थरथरुन जाईल असा शोध नाही. आम्हीही एमएस्सीच्या प्रकल्पात मातीतून अशा प्रकारची बुरशी सहजपणे मिळवली होती. हां, आता केवळ प्लास्टिकवर अनएरोबिक कंडीशन्समध्ये ही बुरशी वाढते हे विशेष आहे हे खरे. पण त्यामुळे 'चला, आता प्लॅस्टिकच्या भस्मासुराचा प्रश्न मिटला' असे समजणे भाबडेपणाचे आहे. हे म्हणजे जगात जास्तीत जास्त गाई-म्हशी असलेल्या भारतासारख्या देशाने बायोगॅसचा शोध लागल्यावर 'हम्म, आता आम्ही स्वयंपाकाच्या गॅसच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार. आता आम्ही इराकची मिजास चालू देणार नाही' असे समजण्यासारखे आहे. अशा प्रकल्पांमधे 'स्केल अप' हा महत्त्वाचा भाग असतो. जोवर ते होत नाही तोवर देअर आर मेनी अ स्लिप बिटवीन दी बुरशी अॅन्ड दी प्लास्टिक कप इट कन्झ्यूम्स. तस्मात ही बातमी संशोधकांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची असली तरी सामान्यांनी एक भागवती सत्यकथी भिवई उंचावून 'बरी आहे' असे म्हणण्याइतपत आहे. हा मुद्दा सोडून इतर मुद्द्यांवरचा खणखणाट वाचताना मजा आली.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
एक भागवती सत्यकथी भिवई
या वाक्यामुळे 'प्रतिसादाला टोक आलं' एवढंच म्हणतो
बाकी स्केलेबिलिटी वगैरे मुद्दे मान्य आहेत. पण एक हायपोथेटिकल प्रश्न विचारतो. समजा या प्रकारच्या प्रोजेक्टसाठी स्केलेबिलिटी म्हणावी तितकी नाही. म्हणजे टाकली फंगस आणि तिने प्लास्टिक केलं फस्त असा प्रकार नाही. म्हणून ती व्यवस्थित आतपर्यंत टाकणे, पसरवणे, जिवंत ठेवणे, वाढवणे, तिची इतरत्र पैदास करणे, डिस्ट्रिब्यूट करणे यासाठी जास्त खर्च येईल. समजा जगभरचा प्लास्टिक कचरा नुसताच खड्ड्यात गाडून टाकायला दरवर्षी पाच बिलियन डॉलर खर्च येतो. (हा आकडा प्रत्यक्षाच्या बराच जवळ जाणारा आहे) त्याऐवजी ही फंगस वापरून ते बायोडिग्रेड करण्यासाठी दहा बिलियन डॉलर खर्च येतो. (हा आकडा मी तयार केलेला आहे) असंही गृहित धरू की तयार होणारे बायप्रॉडक्ट्स प्रत्यक्ष उपयुक्त नाहीत, धोकादायकही नाहीत. फक्त बायोडिग्रेडेबल आहेत. तर दुप्पट खर्च करावा का?
हा प्रश्न सगळ्यांसाठीच आहे. काय वाटतं?
काळं पाढरं
असा 'काळा का पांढरा' हा प्रश्न वास्तवापासून दूर राहतो. पाच बिलियन डॉलर किती वर्ष खर्च करायचे आहेत? असे खड्डे किती ठिकाणी (तात्पर्याने किती वर्षं?) करता येणारेत? आज खर्च जास्त असेलही, पण त्या पर्यायाचे अवलंबन केल्याने त्याच्या खर्चाची बचत भविष्यात होऊ शकते का? (एक 'वास्तवातले' उदाहरणः अशा प्रकारे विघटन करणार्या प्रक्रियेस अनुदान देणे इ. करून त्यात संशोधनाला चालना देता येईल का?)
आज पाच बिलियन डॉलर्स 'डेड इन्वेसमेंट' आहेत. शिवाय नुसत्याच पुरण्याला मर्यादा आहेत. दहा बिलियन्स खर्चून काही वर्षात ब्रेक इव्हन होता येईल, कदाचीत बायप्रॉडक्टसचा उपयोग करता येईल, किमान पुरण्याची मर्यादा वाढवता येईल वगैरे.
-Nile
काळं-पांढरं
मूळ थॉट एक्स्परिमेंटचा हेतू काळं पांढरं करण्याचा नव्हता. दहा बिलियन हा खर्च दर वर्षासाठी म्हटला होता. म्हणजे प्लास्टिक व्यवस्थित पुरण्यासाठी ५ बिलियन दरवर्षी. तर ते बायोडिग्रेडिबल करण्यासाठी ५ बिलियन + क्ष डॉलर्स दरवर्षी. प्रश्न असा आहे, की क्षची किती किंमत असेल तर दुसरा पर्याय निवडला जाईल, निवडावा, किंवा तुम्ही निवडाल. म्हणजे सगळा प्लास्टिकचा कचरा बायोडिग्रेड होण्यासाठी तुम्ही किती पैसे जास्त द्यायला तयार व्हाल? क्ष ची किंमत शून्य किंवा ऋण असेल, तर उत्तर अर्थातच उघड आहे. पण क्ष समजा पाव बिलियन असेल तर तुम्ही निवडाल का? १, २ ,...५...१०...?
घासकडवी
घासकडवी, यू इन्व्हायटेड इट. मग घ्या आता.
प्लॅस्टिक सेंद्रीय / ऑरगॅनिक आहे. कोणतेही ऑरगॅनिक उत्पादन पूर्ण डिग्रेड झाले की केवळ कार्बन डाय ऑक्साईड आणि पाणी ही दोन उत्पादने तयार होतील (आणि बरीचशी उर्जा तयार होईल, पण तो मुद्दा नाही.) त्यामुळे प्लॅस्टिकचे पूर्ण विघटन झाले तरी प्रदूषणाचा मूळ प्रश्न सुटेलच असे नाही, कारण कार्बन डाय ऑक्साईड तयार होतोच आहे. दुसरे असे की ही जी बुरशी आहे तिला तिची कार्बनची गरज भागवण्यासाठी प्लॅस्टिक पुरते, पण तिच्या वाढीसाठी लागणार्या इतर गरजांचे काय? (सजीवांना वाढीसाठी कायकाय लागते? तर त्याच्यासाठी C.HOPKINS, Canteen Manager असा एक रंजक फॉर्म्युला आहे. जिज्ञासूंनी तपशीलात जावे). त्यामुळे दहा बिलियन डॉलर्स या आकड्याबद्दल माझी खात्री नाही.
एवढे सगळे करुन प्लॅस्टिक आणि त्याच्यामुळे होणारे प्रदूषण हा मुद्दा कायमचा निकालात निघेल का? म्हणजे गड्याहो, वापरा तुम्ही हवे तितके प्लॅस्टिक. आमची बुरशीबाई आहेच मग त्याचा फडशा पाडायला. असे ते इतके सोपे सरळ असणार आहे का? तर तेही नाही. जीवशास्त्राची हीच गंमत- आणि फार मोठी मर्यादा- आहे. नाहीतर साध्या भाताऐवजी लावा गोल्डन राईस की भारतातल्या बाल अंधत्वाची समस्या सुटली बघा चुटकीसररशी. असं ते सगळं केळीच्या खुंटासारखं सरळसोट असतंय होय रे? अहो, पोलिओची लस तयार होऊन इतकी वर्षे झाली आणि डब्ल्यू एच ओ ला भारत पोलिओमुक्त आहे हे जाहीर करायला २०१२ उजाडावे लागले. जीवशास्त्राबद्दल अनादर म्हणून नव्हे तर जीवशास्त्राबद्दल अतीव आदर म्हणूनच मी म्हणालो की उतके उत्तेजित होण्याची गरज नाही. तूर्त तरी एखादी उंचावलेली दगडी भिवई पुरे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
अडथळे
अडथळे आहेत हे माहीतच आहे. हा प्रश्न चुटकीसरशी सुटणार नाही हे माहीत आहे.
माझा प्रश्न हा 'विचार-प्रयोग' होता. सध्या जे नुसते पुरण्यासाठी पाच बिलियन खर्च होतात, त्यापेक्षा किती जास्त दिले तर बायोडिग्रेडदेखील करण्याची किंमत रास्त ठरेल? याच्या उत्तरावरून बायोडिग्रेड करणं प्रत्येकाला किती महत्त्वाचं वाटतं याचा एक सर्वसाधारण अंदाज येईल.
वय आणि दृष्टीकोण
वयस्कर लोक "अधोगती" पक्षात अधिक असतात, खरे. आणि तरुण लोक "प्रगती" पक्षात.
वयस्करांच्याकडे मागे वळून पाहण्यासारखे बरेच असते त्यामुळे अनेक लोक सतत तिकडेच पहात असतात. त्यांना 'जुने तेच सोने' वाटते. नव्या गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन पूर्वग्रह्दूषित असण्याची शक्यता असते.
वय वाढेल तसा (साधारणतः, सरासरी वगैरे) माणसाचा शहाणपणा वाढतो असेही एक बव्हंशी मान्यताप्राप्त विधान आहे खरे.
हे विधान एरवीच्या जीवनामधील अनुभवाबद्दल कदाचित खरे असेल. झपाट्याने प्रगत होत असलेल्या तंत्रज्ञाबद्दल नाही.
यामुळे मी ज्येष्ठ नागरिक असूनसुद्धा प्रगतीवादी आहे.
रस्त्यात, शेतात, गटारांमध्ये दिसणारा प्लॅस्टिकचा कचरा प्लॅस्टिकच्या विरोधात होत असलेल्या आरडाओरड्याच्या मुळाशी बहुतेक वेळा असतो. प्लॅस्टिक हा विषारी पदार्थ नाही. प्लॅस्टिकची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची शिस्त बाळगली तर त्याचे दुष्परिणाम टाळता येतील.
+
वय वाढेल तसा (साधारणतः, सरासरी वगैरे) माणसाचा शहाणपणा वाढतो असेही एक बव्हंशी मान्यताप्राप्त विधान आहे खरे.
हे विधान एरवीच्या जीवनामधील अनुभवाबद्दल कदाचित खरे असेल. झपाट्याने प्रगत होत असलेल्या तंत्रज्ञाबद्दल नाही.
यामुळे मी ज्येष्ठ नागरिक असूनसुद्धा प्रगतीवादी आहे.
सहमत आहे. एरवीच्या जीवनात अनुभवामुळे (स्वत:च्या किंवा आजूबाजूच्या लोकांच्या) काही पिटफॉल्स ठाऊक झालेले असतात. त्यामुळे धोक्याचे इशारे देण्याचे शहाणपण येते. याचे "पाय खेचण्यात/खच्चीकरण करण्यात" रूपांतर केव्हा होते ते व्यक्तीव्यक्तीवर अवलंबून असते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
प्लॅस्टिक हा विषारी पदार्थ
यालाच वदतोव्याघात का काय ते म्हणतात का?
भौतिक प्रगती झाली तरी समाधान त्या प्रमाणात वाढत नाही ही आता (संख्या)शास्त्रीयदृष्ट्याही मान्य झालेली बाब असावी. वयस्कर लोक मागे वळून पाहतात तेव्हा आयुष्यात आनंद देणार्या गोष्टींचा तांत्रिक प्रगतीशी काहीही संबंध नव्हता असे लक्षात येत असण्याचीही शक्यता आहे.
मी ज्येष्ठ नागरिक नाही पण मी माझ्या आयुष्यातले आनंदाचे दिवस आठवतो तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत टिटवीची अंडी किंवा विंचू शोधत रानोमाळ भटकणे, रिठ्याच्या बियांनी एकमेकांना चटके देणे, बांबूच्या कामटीचे धनुष्य व खराट्याच्या काड्यांचे बाण करून पपईच्या झाडावर नेमबाजी करणे, गुलमोहराची फुले खाणे व त्यातल्या नाजूक 'गदांनी' गदायुद्ध खेळणे, रात्री उघड्यावर झोपून चांदण्या बघणे इत्यादी गोष्टी आठवल्या की चेहर्यावर स्मित उमटते. पहिली मोटरसायकल घेतली, पहिला कॅमेरा घेतला वगैरे गोष्टी आठवल्या तर तसे ते उमटत नाही. कदाचित मी 'मानसिकदृष्ट्या आजारी' असेन.
how ironic
How ironic is life. We spend so much money on expensive clothes, but the best moments in life are spent without clothes
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अर्धसत्य
अतिअवांतरः-
but the best moments in life are spent without clothes
But on clothes, नाही का ? नुसत्या जमिनीची कल्पना करु शकाल का ?
खीक् (समुद्राकाठची) वाळू,
खीक्
(समुद्राकाठची) वाळू, कोवळे गवत वगैरे पर्याय आहेत की राव
बरोबर
(समुद्राकाठची) वाळू, कोवळे गवत वगैरे पर्याय आहेत की राव
बरोबर. ज्याने त्याने गावे, आपापले गाणे, दुसर्याचे नाणे, खरे खोटे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
राजेश घासकडवींना दुजोरा
राजेश घासकडवींना दुजोरा देणारी बातमी.
http://timesofindia.indiatimes.com/home/environment/pollution/Plastic-wa...
बातमीत ६०% प्लास्टिकचे रिसायकलिंग होते असे म्हटले आहे पण सुप्रीमकोर्ट मात्र टाइम बॉम्ब वगैरे शब्द वापरत आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ज्याला आपण रिसायकलिंग म्हणतो
ज्याला आपण रिसायकलिंग म्हणतो त्यातले बहुतांश डाऊनसायकलिंग असते.
भारतात मुळात प्लास्टिक कमी
भारतात मुळात प्लास्टिक कमी वापरलं जातं. वरच्या लेखात ५.६ मिलियन टन म्हटलेलं आहे - अमेरिकेत हेच प्रमाण ३१ मिलियन टन (२०१० ची आकडेवारी) आहे. आणि त्यातलं जेमतेम १२ ते १५ टक्के रिसायकल होतं असं वाचलं होतं. (दुवा शोधतो). ५.६ मिलियन टन म्हणजे दिवसाला दर डोई १३ ग्रॅम. अमेरिकेसाठी हा आकडा सुमारे ३०० ग्रॅम आहे. सुप्रीम कोर्टाने या आकड्यांशी तुलना करून आपण उत्कृष्ट कामगिरी करत आहोत असं म्हणायला हवं.
टाइम बॉंब हा 'सर्वनाश होणार' म्हणणारांचा आवडता शब्द आहे.
चहासाठी प्लॅस्टिक कपांऐवजी
चहासाठी प्लॅस्टिक कपांऐवजी मातीचे कुल्हड वापरणे कितपत पर्यावरणपूरक आहे?
हडप्पामधली मातीची मडकी, खापरांचे तुकडे हजारो वर्षांनंतर टिकून आहेत त्या अर्थी भाजलेल्या मातीच्या वस्तूसुद्धा सहजरीत्या बायोडिग्रेडेबल नाहीत असे दिसते.
आमच्या शेजारी पूर्वी गुजराती कुटुंबे रहात होती. ती मंडळी लोखंडी तवा न वापरता मातीचे तवे (त्याला ते तावडी म्हणत) वापरत असत. दर दोन तीन महिन्यांनी २५-३० तवे ते विकत घेत. तेही कचर्यातच जात (यूज अॅण्ड थ्रो)..
शाडू मातीचा गणपती नदीच्या पाण्यात विरघळत असेल तर तो पाण्याला गढूळ करतो. प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा गणपती तसे काही न होता पाण्यात पडून रहात असेल तर तो शाडूच्या गणपतीपेक्षा कमी प्रदूषणकारी आहे.
[स्वगतः प्रदूषण कशाला म्हणायचे हे एकदा समजून घ्यायला हवे]
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
प्लॅस्टिक काही काळाने त्याची
प्लॅस्टिक काही काळाने त्याची चमक गमावून बसते आणि ठिसूळ होत जाते. या प्रक्रियेत त्यातून डायॉक्सिन (Dioxin) सारखी द्रव्ये मातीत व पाण्यात मिसळतात असे एका पुस्तकात वाचल्याचे आठवते. ते खरे असेलच असे नाही. असे काही शास्त्रीय संशोधन मुळातून वाचण्याएवढा माझा अभ्यास नाही.
मातीच्या कुल्हडचे असे काही होत नसेल असा माझा आपला एक अंदाज.
इन्टरेस्टिंग
हडप्पा शहरात सापडलेल्या मडक्यांवरून असे दिसते की "भाजलेल्या मातीच्या वस्तूसुद्धा सहजरीत्या बायोडिग्रेडेबल नाहीत".
यावरून एक उत्तम व्यावसायासाठी कल्पना सुचली आहे. सध्या टिकाऊ म्हणून वापरतात त्या पदार्थांच्या ठिकाणी भाजकी माती वापरूया. म्हणजे सेरामिकच्या (वितळेपर्यंत भाजलेल्या मातीच्या), किंवा टायटॅनियमच्या ठिकाणी आपण हडप्पा काळात भाजत तशा मातीच्या वस्तू वापरूया.
वरील व्यवसाय-कल्पनेत त्रुटी स्पष्ट आहे. बनवलेल्या मडक्यांपैकी किती मडकी खूप काळापर्यंत टिकतात, हे ठरवणे आवश्यक आहे. ग्राहकाला टिकाऊपणाबाबत काही मागण्या असतात. (उदाहरणार्थ : वस्तू अमुक कार्य करत-करत अमुक वर्षे आकार आणि घट्टपणा टिकवून असेल, त्याची संभवनीयता ९०% असावी... वगैरे, वगैरे.) "सहजरीत्या डिग्रेड नाही" बाबत - हजारो वस्तूंपैकी एखादी वस्तू योगायोगाने विवक्षित प्रकारे पुरली गेल्यास हजारो वर्षे टिकणे - असा मानदंड व्यवहार्य आहे काय?
श्री. थत्ते यांचा प्रश्न गंभीरपणे विचारलेला* आहे, की उपहासात्मक हेच मला कळत नाही.
(*प्रश्न गंभीर असण्याची शक्यता नकारता येत नाही. उदाहरणार्थ : मला एक कच्चे-भाजलेले मडके कचर्यात टाकून द्यायचे आहे. त्याचा चुरा करून बागेत टाकणे मला सोयीचे नाही. तर हे मडके बायोडिग्रेडेबल कचर्यात टाकावे, की नॉन-बायोडिग्रेडेबल? काही गावांत बायोडिग्रेडेबल कचरा पुरून/कुजवून त्याचे खत तयार करतात (कॉम्पोस्ट), मग ते मातीत मिसळतात. त्या खतात मडक्याची माती मिसळली तर काही हरकत नाही. काही गावांत बायोमास इंधन तयार करतात. काही प्रक्रियांमध्ये मातीची भेसळ होईल, ती टाळली पाहिजे. वगैरे. अशा प्रकारचा प्रश्न असल्यास "कच्चे-भाजलेले मातीचे मडके बायोडिग्रेडेबल की कसे?" या प्रश्नाचे उत्तर क्रियाशील आहे - कुठल्याशा कृतीत फरक पाडणारे आहे. पण प्रश्न गंभीर असता, तर वेगळ्या तर्हेने विचारला असता, नाही का?)
हा प्रश्न "रेदुक्तियो आद आब्सुर्दुम" आहे का? तर त्यांच्या उदाहरणापेक्षा चांगले उदाहरण सुचते. लगोरीच्या खेळातील दगड हे उदाहरण वापरायला हवे होते. एका वापरानंतर फेकून दिलेले हे दगड शेकडो वर्षे टिकायची संभवनीयता खूपच अधिक आहे.
मागे एकदा एका अभयारण्यात चालत होतो; डबक्यात आपोआप विखुरलेले दगड मी "पायर्या" म्हणून वापरले होते. हे दगड बहुधा हजारो वर्षांपूर्वी तयार झाले होते, आणि हजारो वर्षे टिकतील. हेच नव्हे, तर असे कुठलेही दगड खूप टिकतील. हे उदाहरण चालले असते.
परंतु "पायरी म्हणून वापरलेले दगड", "लगोरीच्या खेळात वापरलेले दगड" हे या चर्चेत नि:संदर्भ आहेत हे बहुधा श्री. थत्ते यांनी ओळखलेले असावे, - त्यांना उदाहरणे सुसंदर्भ वाटली असती, तर त्यांनी खचितच अशी उदाहरणे रेदुक्तियोकरिता वापरली असती. संदर्भ कळतो, तर मग हडप्पामधील मडक्यांचे उदाहरणही नि:संदर्भ म्हणून कळायला हवे होते.
---
महाराष्ट्र राज्य शासनाने नॉनबायोडिग्रेडेबल कचर्याबाबत पुढील अधिनियम प्रकाशित केला. तो बघूया :
Maharashtra Non-Biodegradable Garbage (Control) Ordinance, 2006 (pdf)
या पत्रकात "नॉनबायोडिग्रेडेबल" शब्दाची व्याख्या नाही. म्हणून हे पत्रक संदिग्ध आहे काय? हे नियम आकलनास-अशक्य आहेत काय? की संदर्भावरून कळते की जवळजवळ सर्व प्रसंगी कसे लागू करावेत? माझ्या मते संदर्भावरून स्पष्ट कळते.
---
ता. क. : येथे मी कुल्हड वापरण्याबाबत समर्थन दिलेले नाही. कुल्हडे भाजण्याकरिता पुरेसे लाकूड/कोळसा त्या गावात उपलब्ध आहे काय? कचरा पुरण्याकरिता मुबलक जमीन आहे काय - त्याची किंमत काय? कचरा पुरण्याकरिताची व्यवस्था आहे काय? त्याचा करभार कोणावर पडतो, आणि किती पडतो? वगैरे आकडे या अर्थशास्त्रीय विश्लेषणाकरिता आवश्यक आहेत. ते माझ्यापाशी नाहीत.
गंभीरच
हडप्पा येथील टिकून राहिलेली मडकी हा पर्यावरणाचा प्रश्न आहे असे म्हणणे नाही.
चर्चेचा विषय <धनंजय मोड ऑन>"(बहुतांशी एकदा/दोनदा) वापरून फेकून दिलेल्या वस्तूंचा सतत निर्माण होणारा आणि नष्ट न होणारा कचरा"<धनंजय मोड ऑफ> हा आहे असे समजून लिहिलेले आहे.
पाण्याचे मडके टिकाऊ असले तरी अशी मडकी "दररोज लाखों-करोडोंनी निर्माण होऊन फेकून दिली" जात नाहीत म्हणुन मडके हा माझ्या प्रतिसादाचा विषय नाही.
लालूप्रसाद यादव रेलवेमंत्री असताना स्टेशनवर प्लॅस्टिक कपाऐवजी कुल्हड वापरण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्याचा उद्देश आणखी मजूरांना काम मिळेल असा असला तरी त्यातून मोठ्या प्रमाणात कुल्हड कचरा निर्माण व्हायची शक्यता होती.
त्यावेळी कुल्हड हे पर्यावरणाला हानीकारक होतील अशी चर्चा झाली नव्हती. प्लॅस्टिक नॉन डीग्रेडेबल आहे ही सर्वमान्य समजूत आहे तशी "भाजलेली माती"सुद्धा निदान दोन-तीनशे वर्षे नॉन डीग्रेडेबल आहे हे सत्य समाजमान्य नाही. म्हणून ते उदाहरण घेतले होते.
प्रश्न गंभीरपणेच विचारला होता.
कोणत्याही यूज अॅण्ड थ्रो वस्तूंबाबत ही गोष्ट सत्य आहे. फेकून दिलेली वस्तू त्याच दिवशी डीग्रेड/नष्ट होण्याचं तंत्रज्ञान नसेल तर कचरा जमा होण्याची समस्या राहणारच. अगदी वर्तमानपत्रे, पुडीचे दोरे वगैरे सुद्धा.
प्लॅस्टिकच्या प्लेट डिग्रेड व्हायला हजारो वर्ष लागणार असतील आणि कागदी प्लेट डीग्रेड व्हायला दोन महिने* लागत असतील. उलट पत्रावळी दहा* दिवसात डीग्रेड होत असतील तरी दहा दिवसांचा कचरा सांभाळावा लागणारच.
लगोरीच्या दगडाचे उदाहरण नि:संदर्भ आहे कारण लगोरीचे दगड मी (दररोज नव्याने) बनवून घेत नाही. तेच तेच दगड पुन्हापुन्हा वापरतो. (ते दगड घरात आणून कपाटात ठेवून दुसर्या दिवशी लगोरी खेळायला नेत नाही. पण सिस्टिम अशी आहे की तेच दगड मला उद्यासुद्धा त्याच अंगणात सापडतात). ते दगड डीग्रेडेबल नसण्याने काही तोटा होत नाही. तीच गोष्ट तलावातल्या पायर्यांची.
दरवर्षी लाखोंनी नव्याने बनणार्या गणपतीच्या मूर्तींची आणि करोडोंनी बनणार्या दिवाळीतल्या पणत्यांची गोष्ट लगोरीच्या दगडांसारखी नाही. कुल्हडांची संख्या कदाचित त्यातून भयावह असेल.
आणखी लिहायचे आहे म्हणून या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये.
*दोन्ही कालावधी उदाहरणादाखल आहेत. ते तितकेच असतात की कसे याबद्दल खात्री नाही.
तुमचे डबक्यातल्या पायर्यांचे उदाहरण ताणून ते नदीत पडून राहिलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीला लागू करता येईल. जसे पायरीचे दगड हजारो वर्षे राहिले तरी चालतील तसाच प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा गणपतीही पडून राहिला तरी चालेल. उलट शाडू मातीचा विरघळणारा गणपती जास्त हानीकारक आहे असे म्हणणे आहे. पुण्यात सर्व लोकांनी आणि मंडळांनी शाडू मातीचे गणपती आणले तर अनंतचतुर्दशीनंतर तीन चार दिवस पुण्याच्या खालच्या अंगाला असलेल्या खेड्यातील जनतेला नदीतून पाणी घेता येणार नाही इतके ते गढूळ** असेल.
**या उदाहरणापुरती पुण्यातील नागरिक नदीत सोडत असलेली इतर घाण/कचरा दुर्लक्षिलेला आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
एक रोचक दुवा - ओस्लो शहरात कचरा टंचाई
एक रोचक दुवा - ओस्लो शहरात कचरा टंचाई
http://www.nytimes.com/2013/04/30/world/europe/oslo-copes-with-shortage-...
(वाचण्याकरिता बहुधा न्यू यॉर्क टाइम्स संकेतस्थळाचे सदस्यत्व घ्यावे लागेल.)
उद्धरण "Oslo, a recycling-friendly place where roughly half the city and most of its schools are heated by burning garbage — household trash, industrial waste, even toxic and dangerous waste from hospitals and drug arrests — has a problem: it has literally run out of garbage to burn. ..."