मत-मतांचा तवंग (लोकसत्तामध्ये पूर्वप्रकाशित)
रविवार, ३ मार्च २०२४च्या लोकसत्तामध्ये पूर्वप्रकाशित लेखाचा पूर्ण मसुदा इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. काही गोष्टी शब्दमर्यादेमुळे वगळल्या होत्या.
चित्र: लोकसत्तामधून
स्मार्टफोन हे तंत्रज्ञान भारतीयांनीही आपलंसं केलं आहे. गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण, जात, भाषा, धर्म अशा सगळ्या भेदभावांपलीकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट/डेटापॅक संपूर्ण देशात पसरले आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या व्यवसायांमध्ये स्मार्टफोनशिवाय कामं चालणार नाहीत; आणि रस्त्यावरचे फेरीवालेही स्मार्टफोनचा वापर व्यवसायासाठी करतात. दुसऱ्या टोकाला जाऊन बघायचं तर लोकांना स्वस्तातला डेटा नावाची अफू द्यायची म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगारी, अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे लोक दुर्लक्ष करतील, असं काही तथाकथित षडयंत्र (conspiracy theory) डेटा स्वस्त करण्यात असेल का?
मला हे पटत नाही. हे तंत्रज्ञान उभं करायला आणि चालवायला पैसा लागतो; पैशांचं सोंग कुणालाही आणता येत नाही; हा माझा तर्क. काश्मीर आणि मणिपूरमधलं इंटरनेट आता तरी सुरू झालं का? तिथल्या बातम्या येतात का? तिथल्या लोकांना गुंगवून टाकण्यात काही फायदा नाही का? जर लोकांना गुंगवून ठेवायला डेटापॅक स्वस्त केला का नाही, हे तपासण्यासाठी काही पुरावा शोधायचा तर लोकांचं स्वस्त डेटाआधीचं आणि नंतरचं वर्तन काय आहे याचा थोडा विचार करू.
मी विदावैज्ञानिक (डेटा सायंटिस्ट) आहे. या प्रश्नाकडे वैज्ञानिक पद्धतीनं बघायचं, तर लोक आधी किती पुस्तकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं वाचत होते आणि आता किती वाचतात याचे आकडे काढावे लागतील. लोकसंख्येच्या प्रमाणात किती पुस्तकं, मासिकं विकली गेली; ग्रंथालयांमधून किती पुस्तकं, मासिकं आणली गेली, याचे आकडे मिळवणं एक वेळ शक्य असेल. स्मार्टफोनच्या आधीचे आकडे, स्मार्टफोन तळागाळापर्यंत पसरले त्या काळातले आकडे, आणि डेटापॅक स्वस्त झाल्यानंतरचे आकडे. आणि मग त्याची तुलना करून बघायची. हे जरा कठीण आहे. म्हणून मी समाजशास्त्रात वापरतात तशी पद्धत ह्या लेखापुरती सुरू ठेवणार आहे. मला आजूबाजूला काय दिसतं याच्या ह्या नोंदी.
मी भारताबाहेर पहिल्यांदा गेले २००५ साली, ते शिकायला. इंग्लंडमध्ये. मी मँचेस्टरजवळच्या एका खेड्यात राहायचे. आठवड्यातून एकदा मी मँचेस्टरला जायचे. तो प्रवास साधारण ३५ मिनिटांचा होता. त्याच्या आदल्या वर्षी मी आठवड्यातून दोनदा ट्रेननं प्रवास करायचे, कुलाब्याच्या दोन वेगवेगळ्या संस्थांमध्ये शिकायला जायचे तेव्हा. ट्रेनमध्ये जाताना झोप काढायची आणि परत येताना काहीबाही वाचायचं असा माझा शिरस्ता होता. मँचेस्टरमध्ये गेल्यावर तो सुरू राहिला. त्यानंतर काही वर्षांनी मी अमेरिकेत आले. तिथेही काही काळ ट्रेन/बसप्रवास करत असे. नियमित ट्रेनप्रवासाच्या काळात माझं वाचनही नियमित राहिलं. बस/ट्रेनचा नियमित प्रवास सुटला की वाचनासाठी वेगळा वेळ काढायला लागतो.
भारतात मी शिकत होते तेव्हा स्मार्टफोन आलेले नव्हते. अमेरिकेत आले तोवर भारतातही स्मार्टफोनचं जाळं पसरायला लागलेलं होतं. या प्रवासांमध्ये एक गोष्ट लक्षात आली की भारतात प्रवासात फार कुणी पुस्तकं, मासिकं वाचताना दिसत नाहीत. इंग्लंड आणि अमेरिकेत, प्रवासात दिसलं की बरेच लोक तेवढ्या वेळात काही तरी वाचत असतात. हल्ली अनेक लोक लॅपटॉप काढून त्यावर काम करताना दिसतात; प्रोग्रॅमिंग छापाचं काम; किंवा इमेलं वाचून उत्तरं देणं वगैरे. अमेरिकेत अशी ट्रेनमध्ये एकदा एका प्रोग्रॅमरशी ओळख झाली. तेव्हा मी प्रोग्रॅमिंगमध्ये नवखीच होते. त्यानं मला काही संदर्भ दाखवले, त्याचा मला उपयोगही झाला.
या तुलनेत किंचित गफलत आहे, विशेषतः अमेरिकेच्या बाबतीत. अमेरिकेत बहुतेक सुखवस्तू, मध्यमवर्गीय लोक आपापल्या गाड्यांमधून फिरतात. ते लोक कितपत वाचत असतील हे फक्त ट्रेन/बसनं प्रवास करून समजणार नाही. मात्र ओपरा विन्फ्री, रीज विदरस्पून यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींचे 'बुक क्लब' आहेत; त्यांनी त्यात वाचलेली पुस्तकं अशी पुस्तकांची जाहिरात चालते. भारतात, महाराष्ट्रात अशा प्रकारची जाहिरात माझ्या बघण्यात नाही. बुक क्लब हा अजूनतरी भारतीय वाचनसंस्कृतीचा भाग झाल्याचं मला दिसत नाही.
मुंबईच्या लोकलमध्ये भजनं करणारे, वहीत जप लिहिणारे, दुपारच्या वेळेस गर्दी कमी असताना भाजी निवडणारे, कोळंबी सोलणारे लोक दिसायचे. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रेमानं खायला घालणारे लोकही भेटले. स्मार्टफोन येण्याआधी ट्रेनची वाट बघताना कंटाळलेले लोक दिसायचे. स्मार्टफोन आल्यानंतर स्टेशनवर क्वचितच कुणी कंटाळलेले दिसतात; भारतात, आणि भारताबाहेरही.
भारतात लोक फोन आहे म्हणून चारचौघांत जोरजोरात त्यावर गाणी वाजवतात; कुठलेसे व्हिडिओही जोरजोरात आवाजात लावतात. आपल्या आजूबाजूला लोक आहेत; त्यांना हे ऐकायचं नसेल; त्यांना दुसरं काही ऐकायचं असेल; किंवा झोपायचं असेल; वाचायचं असेल; इतरांना आवाज नको असेल असा विचार लोक करत नाहीत. जो प्रकार स्मार्टफोनच्या डेटापॅकमुळे, तोच प्रकार २००० सालच्या पहिल्या दशकात डॉल्बीच्या भिंतीमुळे सुरू झाला असेल का? डॉल्बीच्या भिंती लावून नाचल्यामुळे लोकांना मजा यायला सुरुवात झाली तेव्हा फोनवर मिळणारं इंटरनेट अजिबात स्वस्त नव्हतं आणि फेसबुक-ट्विटर भारतात लोकप्रिय झालेले नव्हते. व्हॉट्सॅपतर तेव्हा जन्मालाही आलं नव्हतं.
शेजाऱ्यांनी जोरजोरात रेडिओ लावला तर तो आपल्यासाठीच आहे अशी आपली समजूत करून घ्यायची; हा विनोद पुलंनी केला आहे. त्याला अनेक दशकं झाली! डॉल्बीच्या भिंती लावून नाचणारा वर्ग मोठ्या प्रमाणात नाही-रे वर्गातला आहे; किंवा त्या वर्गातून बाहेर येऊन फार काळ लोटलेला नाही. हे वर्तन एकाएकी बदलण्याची शक्यता कमीच. अचानक लोक तर्कशुद्ध आणि/किंवा समाजाचा विचार करायला सुरुवात करणार नाहीत. मध्यमवर्गातले लोक शिक्षणाची परंपरा असूनही कितपत तर्कशुद्ध विचार करतात?
स्मार्टफोन हे तंत्रज्ञान आहे; ते तंत्रज्ञान वापरण्यासाठी आपल्याला काही विशेष शिक्षण घ्यावं लागलं नाही. स्मार्टफोनचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विज्ञानाची गरज असते. त्यासाठी महत्त्वाचा असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्मार्टफोनच्या जोडीला आपल्याकडे येतो का? माझा संपर्क आहे-रे वर्गाशीच आहे; त्यांचं वर्तन कितपत बदललेलं दिसतं?
व्हॉट्सॅपचा उल्लेख 'विद्यापीठ' असा केला जातो. त्या व्हॉट्सॅप विद्यापीठातून विज्ञानाच्या नावाखाली आलेल्या हास्यास्पद गोष्टींमध्ये मला सगळ्यांत विनोदी वाटलेलं फॉरवर्ड म्हणजे "उभं राहून पाणी प्यायलं तर ते थेट गुडघ्यात जातं." (कधी ठसका लागल्यावर हे खरं असतं तर किती बरं झालं असतं असंही वाटतं.) कुठल्या आडनावाच्या लोकांचं कुलदैवत कुठलं, आणि पावसाळ्यात येणाऱ्या पालेभाज्या हिवाळ्यात खाणं कसं आरोग्यवर्धक, अशा प्रकाराची, बरीच अवैज्ञानिक आणि कधीकधी विज्ञानाच्या कक्षेबाहेरचीही फॉरवर्डं मी व्हॉट्सॅपवर वाचली आहेत. भारतात व्हॉट्सॅप लोकप्रिय झाल्याला काही वर्षं उलटली आहेत. अशी फॉरवर्डं करण्याचा लोकांचा उत्साह काही कमी होत नाही. डेटापॅक अत्यंत स्वस्त झाल्यामुळे लोकांनी विचार करणं सोडून दिलं आहे का?
आधी अमेरिकेतली गंमत. ऑक्टोबर २०२३मध्ये आमच्या घरापासून तासाभराच्या अंतरावरून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार होतं. आम्ही गाडी काढून ग्रहण बघायला गेलो; रस्त्यात खूप ट्रॅफिक, गर्दी होती. कारण लोक ग्रहण बघण्यासाठी घराबाहेर पडले होते. हायवेवर मोठेमोठे बोर्ड लावले होते, 'ग्रहण बघण्यासाठी रस्त्यावर थांबू नका.' मला तेव्हा एक फॉरवर्ड आलं की दुपारी १२च्या सुमारास ग्रहण आहे म्हणून सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेस्तोवर खाण्यापिण्याची काय पथ्यं पाळायची, म्हणजे ग्रहण बाधणार नाही. त्या फॉरवर्डचा उगम कुठे झाला हेही त्यातच लिहिलं होतं. अमेरिकेच्या व्हर्जिनिया नावाच्या राज्यातून ते लिहिलं होतं तिथून खंडग्रास ग्रहणही दिसणार नव्हतं. हे लिहिणारे लोक तिथल्या कुठल्याशा देवळातले होते, म्हणे!
आता ८ एप्रिलला पुन्हा अमेरिकेतून सूर्यग्रहण दिसणार आहे. आमच्या ऑस्टिनातूनही खग्रास ग्रहण दिसणार आहे. ऑक्टोबरमधली रस्त्यावरची गर्दी बघून झाल्यानंतर, आमच्याकडे तेव्हा ढग नसतील तर मी घरूनच ग्रहण बघणार आहे. इथे स्थानिक बातम्यांमध्ये काही बारक्या शहरांमधल्या बातम्या दाखवत होते. एका शहरात लोकांना म्हणत आहेत की १ ते १५ एप्रिल या काळातली वाणसामानाची खरेदी १ तारखेपर्यंत करून टाका. कारण ग्रहणासाठी पर्यटक गावात येतील आणि वाणसामान पुरेल का याची शाश्वती नाही.
लहानपणी उन्हातून घरी आल्यावर लगेच घटाघटा पाणी पिण्याविरोधात तंबी दिली जात असे. त्यामुळे अंधत्व येतं असंही मला सांगितलं होतं. झोपून वाचणं; खूप टीव्ही बघणं; अशी डोळे खराब होण्याची कारणं मला लहानपणी सांगितली जात असत. माझे आईवडील दोघंही शिक्षक. त्यांच्याकडूनच अशा काही अवैज्ञानिक गोष्टी मी ऐकल्या होत्या; लहानपणी डोळे झाकून मान्यही केल्या होत्या.
धरणातून पाणी खाली येतं, त्यावर वीज तयार होते. एके काळी शेतकऱ्यांचा ते पाणी शेतीसाठी वापरण्याला विरोध होता. म्हणे त्या पाण्यातला जीव काढून घेतला जातो. ही गोष्ट मला एका विज्ञानाच्या शिक्षिकेनं, जलविद्युत कशी तयार होते, यामागचं वैज्ञानिक तत्त्व शिकवताना सांगितली होती. पाण्यातला जीव काढून घेता येत नाही कारण पाण्यात जीव नसतो; हे स्पष्टपणे समजण्यासाठी मला आणखी दोन-चार वर्षं भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागला. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार! पोहऱ्यात नसलेली गोष्टी काढून कशी घेणार! जलविद्युत कशी तयार होते याची माहिती निराळी; पाण्यात जीव नसतो, हे आकलन निराळं.
स्मार्टफोन आणि डेटापॅकांमुळे लोकांमध्ये अवैज्ञानिकता वाढायला लागली आहे का, हे शास्त्रीय पद्धतीनं सिद्ध करण्यासाठीही आकडे गोळा करणं कठीण आहे; म्हणून या माझ्या आठवणी.
दर पिढीला असं वाटत असेल का, की आपल्या वेळी गोष्टी बऱ्या होत्या आणि आता त्या बिघडत चालल्या आहेत. समजा असं कुणाला वाटत असेल आणि सिद्धच करायचं असेल तर ते काय प्रकारच्या गोष्टी सांगतील?
एक उदाहरण म्हणून आपली एक रूढी बघू. नवा लॅपटॉप किंवा फोन आणल्यावर अनेक घरी त्या उपकरणाची पूजा होते आणि मग ते उपकरण वापरलं जातं. आधी वाहनं होती, आता फोन आहेत. वस्तू बदलली, वर्तन तेच राहिलं आहे. स्मार्टफोन आला म्हणून परंपरा बदलली नाही.
पूर्वी घरी नवी सायकल आणली, तिची पूजा केली तर २० वर्षांपूर्वी ते फक्त शेजाऱ्यापाजाऱ्यांना कळत होतं. आता कुठल्या नव्या उपकरणाची पूजा केली तर ते फेसबुक, व्हॉट्सॅपवरून हजारेक लोकांना कळवणं अगदी सोपं आहे. आपण १००० लोकांना कळवलं, याची दुसरी बाजू अशी की या १००० लोकांच्या घरी जेव्हा काही नवीन वस्तूची पूजा होते, त्याचे फोटो आपल्याला येतात. आधी २० लोकांच्या घरच्या पूजेबद्दल समजत असेल तर आता १००० लोकांचं समजतं. त्यामुळे स्मार्टफोन, डेटापॅक आल्यानंतर लोक अधिक सश्रद्ध झाले असं म्हणणं सोपं आहे.
शिवाय १९९०च्या दशकात उदारीकरणानंतर सुबत्ता भारतात यायला सुरुवात झाली; शिवाय तंत्रज्ञान स्वस्त झालं. लहानपणी मला ठाण्याच्या मध्यमवर्गीय, पांढरपेशा वस्तीतल्या घरात बसून गोकुळाष्टमीची गाणी इच्छेविरोधात ऐकल्याचं आठवतं. नोकिया आणि ब्लॅकबेरीची चलती होती त्या काळात आम्ही वेरूळला फिरायला गेलो होता; तिथे कुणी तरी आपल्या फोनवर जोरजोरात गाणी वाजवत फिरत होतं, हेही स्वच्छ आठवतं. तेव्हा घरात वाय-फाय असणं हेही फॅन्सी समजलं जात असे. आता हे तंत्रज्ञान आणखी स्वस्त झालं आहे; आणि समाजाची क्रयशक्ती वाढलेली आहे. म्हणजे जोरजोरात गाणी वाजवण्याचं तंत्रज्ञान खूप जास्त लोकांकडे उपलब्ध आहे. म्हणून जास्त लोक जोरजोरात गाणी वाजवताना दिसत असावेत, एवढंच. आपल्या आनंदाचा लोकांना उपद्रव होऊ नये, हा विचार पुरेसा तेव्हाही पसरला नव्हता; आजही पसरल्यासारखं वाटत नाही.
जुन्या पिढीतल्या लोकांना छापलेला शब्द खरा मानायची सवय होती; कारण छपाईचं तंत्रज्ञान स्वस्त-सोपं नव्हतं. आता बसल्या जागी हात झटकले तर व्हॉट्सॅपवर शे-दोनशे शब्द पडतात, तरीही छापलेला शब्द खरा मानायचा हा विचार फार कमी झालेला नाही.
जोवर या संदर्भातली आकडेवारी तपासली जात नाही, रीतसर संशोधन होत नाही तोवर काहीच सिद्धासिद्ध करता येणार नाही. म्हणून उरतात ती आपापली मतं. स्मार्टफोन आणि सोशल मिडिया वापरून आपण ती मतं सगळीकडे ठासून लिहीत असतोच की!
…
हॅहॅहॅ… आम्ही तर आणखी काहीतरी केल्याने अंधत्व येते, असेसुद्धा ऐकले होते. एके काळचा सर्वप्रचलित गैरसमज होता तो. खरा असता, तर दिलेल्या कोठल्याही क्षणी जगाची जवळजवळ अर्धी पौगंडोत्तर जनता आंधळी असती. पण लक्षात कोण घेतो?
(जाऊ द्यात. पुरुषी गोष्टी या; तुम्हा बायकांना कदाचित नाही ठाऊक असायच्या. चालायचेच.)
मी त्यांना दोष देणार नाही. Perhaps they knew no better.
मी ही गोष्ट थोडी वेगळी ऐकली होती. भारत भाक्रा-नानगल वगैरे धरणे बांधतो, नि पाण्यातून वीज काढून घेतो, नि असे वीज काढून घेतलेले निःसत्त्व, शेतीकरिता निकृष्ट असे पाणी तुम्हाला मिळते, असा अपप्रचार पाकिस्तानातील शेतकऱ्यांप्रति त्या काळात सर्रास चालत असे, म्हणे.
याचा इंटरनेट किंवा मोबाइल तंत्रज्ञान स्वस्त होण्याशी फारसा संबंध नसावा.
पूर्वी (बोले तो, इंटरनेट, मोबाइल फोन, वगैरे तंत्रज्ञान स्वस्त वगैरे तर सोडाच, परंतु, भविष्यात असे काही तंत्रज्ञान अस्तित्वात येईल, अशी फारशी कोणी कल्पनासुद्धा केली नसेल, अशा काळात) याहून फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. तेव्हासुद्धा लोक हेच करत. फक्त, खिशात मावणारा किंवा गळ्यात लटकवता येणारा ट्रांझिस्टर रेडियो हे तेव्हाचे ‘स्वस्त तंत्रज्ञान’ होते, एवढाच फरक. ‘तुमच्या आवाज करणाऱ्या उपकरणांचा (म्हणजे रेडियो, वॉकमन, वगैरे) आवाज इतरांना ऐकू येणार नाही, अशा बेतानेच वापरा’ अशा प्रकारच्या सूचना सार्वजनिक परिवहनांवर (म्हणजे, माझा असल्या गोष्टींशी जो काही अत्यल्प संबंध आला, त्यात कधीतरी) वाचल्याचे अंधुकसे आठवते. आणि हे इंटरनेट, मोबाइल वगैरे प्रकार सर्रास होण्यापूर्वी.
माणूस पूर्वीपासून जे करीत आला होता, तेच आजही करीत आहे. माध्यम बदलले, एवढेच.
(डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू हा प्रकार माझ्या कल्पनेप्रमाणे १९९३-९४च्या आसपास कधीतरी थोडाथोडा अस्तित्वात येऊ लागला असावा. तेव्हासुद्धा सुरुवातीला फार थोड्या वेबसाइटी अस्तित्वात असाव्यात. मला वाटते १९९०च्या दशकाच्या उत्तरार्धात हळूहळू वाढू लागल्या असाव्यात. त्यापूर्वी तर इंटरनेटची व्याप्ती ईमेल आणि यूजनेट नावाचा एक प्रकार असे (ज्यावर ग्रूप्स असत नि त्या ग्रूप्सवर लोक पोष्टी टाकू शकत), यापलिकडे फारशी नसावी. तसेही इंटरनेट ॲक्सेस हा प्रकार तेव्हा (अमेरिकेतसुद्धा) अत्यल्प जणांकडे असे. अमेरिकेतल्या विविध विद्यापीठांतून पडीक असलेला विद्यार्थिवर्ग (ज्याला विद्यापीठकृपेने ॲक्सेस मिळत असे) वगळला, तर इंटरनेटच्या बाजूला फारसे कोणी फिरकत नसे. ही परिस्थिती १९९०च्या उत्तरार्धात थोडी बदलू लागली. (इंटरनेट ॲक्सेस थोडा स्वस्त होऊ लागल्यावर. स्वस्त बोले तो, महिन्याला वीस डॉलर वगैरे (‘अमर्याद ॲक्सेस’), तेही डायलअपकरिता. (त्यापूर्वीच्या काळात वापरलेल्या किलोबाइटच्या हिशेबाने भाव ठरत असे.) डायलअप बोले तो, ज्यात इंटरनेट वापरताना तुमची टेलिफोन लाइन अडकून राहात असे, वगैरे. गरजेपुरते कनेक्ट करायचे, नि मग बंद करायचे. लँडलाइन नामशेष होत असण्याच्या काळात हे नाही लक्षात येणार. ज्यांना लाइन अडकून राहण्याची एवढीच पडलेली असायची, असे लोक खास इंटरनेटकरिता दुसरी लँडलाइन घ्यायचे. कनेक्ट करताना मॉडेम कर्णकर्कश आवाज करायचे, वगैरे.) ब्रॉडबँड ॲक्सेस हा प्रकार पुष्कळच नंतर सर्रास होऊ लागला. मोबाइलचीही थोड्याफार फरकाने तीच अवस्था होती. एक तर तंत्रज्ञान अतिशय बाल्यावस्थेत होते. शिवाय, फारसे कोणाला परवडण्यासारखे नव्हते. शतकांतराच्या थोड्या अगोदर प्रसार थोडा वाढू लागला. परंतु तेव्हासुद्धा, मोबाइलचा उपयोग फोन करण्याव्यतिरिक्त इतर कशासाठी करण्याची फारशी सोय नव्हती. बाकीचे प्रकार बरेच नंतर येऊ लागले.
या धाग्यावर हे सर्व अर्थात अवांतर आहे. सांगण्याचा मतलब एवढाच, की हा मोबाइल इंटरनेट प्रकार फार फार तर गेल्या पंधरावीस वर्षांतला आहे. त्यापूर्वी माणूस काय सार्वजनिकरीत्या अजिबात आवाज करीत नसे, अशी तुमची प्रामाणिक समजूत आहे काय? तशी असल्यास, ती साफ चुकीची आहे.)
कशाला तरी ‘ऑथॉरिटेटिव’ मानून त्यावर विश्वास ठेवणे, ही मानवी गरज असावी. पूर्वी लोक छापील शब्दावर विश्वास ठेवीत. आमची आजी, आकाशवाणी मुंबई ‘ब’वरच्या ‘भगिनीमंडळा’त वेळोवेळी डॉक्टरमंडळी (Quacks!) येऊन जे काही बडबडून जात, त्यास गॉस्पेल ट्रूथ मानीत असे. नि मग, वेळोवेळी, तिला अर्धवट समजलेली किंवा प्रसंगी अजिबात न समजलेली ती ‘माहिती’, फारसा विचार न करता परंतु सोयिस्करपणे, आम्हाला काही न काही करण्यापासून रोखण्याकरिता आमच्यावर फेकत असे. (The beauty of the scheme was प्रसंगी कोठल्याही डॉक्टरने ‘भगिनीमंडळा’त असे कधीही काहीही सांगितलेले असण्याचीसुद्धा गरज नसे; She could always make things up according to her own convenience and agenda. परंतु, तो वेगळा विषय झाला.) आजकाल लोक व्हॉट्सॲप नाहीतर फेसबुकावर येणाऱ्या कशावरही विश्वास ठेवतात.
याचा संबंधित तंत्रज्ञान महाग असण्याशी काहीही संबंध नाही. उलट, संबंधित तंत्रज्ञान जेव्हा स्वस्त होते, तेव्हाच लोकांपर्यंत ते पोहोचू शकते, नि लोक त्यावर विश्वास ठेवू शकतात, असेही उलटे आर्ग्युमेंट करायला जागा आहे. याउपर, हा निव्वळ मनुष्यस्वभावाचा भाग आहे, नि कालातीत आहे.
(‘अमूकअमूक केल्याने अंधत्व येते’ हे पेशाने शिक्षक असलेल्या तुमच्या पालकांनी तुम्हाला सांगणे, यामागेसुद्धा हीच प्रक्रिया असावी. चिकित्सा न करता कशावर तरी विश्वास ठेवण्याची मानवी गरज. म्हणूनच म्हणतो, I would not necessarily blame them for it; after all, they were human.)
– ‘गीतेत/बायबलमध्ये/कुराणात म्हटलेले आहे; खोटे कसे असेल?’
– ‘पेपरात छापून आलेले आहे; खोटे कसे असेल?’
– ‘अमूकअमूक बाबांनी म्हटले आहे; खोटे कसे असेल?’
– ‘रेडियोवर ऐकले/As Seen on TV; खोटे कसे असेल?’
– ‘पण जाहिरातीत म्हटलेले आहे ना तसे? मग ते खोटे कसे असेल?’
– ‘माझे आजोबा सांगायचे; खोटे कसे असेल?’
– ‘टिळक/गांधीजी म्हणून गेले; खोटे कसे असेल?’
– ‘टिळक/गांधीजी माझे आजोबा होते, नि त्यांनी सांगितले आहे; खोटे कसे असेल?’
– ‘अमूकअमूक पुस्तकात सुरेश भट/कुसुमाग्रज/पु.ल. देशपांडे/शेक्सपियर यांनी अमक्याअमक्या ठिकाणी अमकेअमके म्हटलेले आहे; खोटे कसे असेल?’
– ‘व्हॉट्सॲपवर आलेले आहे; खोटे कसे असेल?’
– ‘‘ऐसीअक्षरे’वर 'न'वी बाजू सांगत होते; खोटे कसे असेल?’
वरील विधानांत अर्थाअर्थी काहीही फरक नाही. आहे ते फक्त एक समान सूत्र आहे – विधान करणाऱ्याची त्या गोष्टीवर (किंवा, खरे तर, कशावर तरी) विश्वास ठेवण्याची नितांत मानसिक गरज.
याचा अर्थ, ज्याच्यावर विश्वास ठेवला जात आहे, ते प्रतिपादन खोटे आहे (किंवा तसे प्रतिपादन मुळात ज्याने केले, तो धडधडीत खोटे बोलत होता) असाच दर खेपेस होईल, असेही सांगता येत नाही. अनेक शक्यता असू शकतात. मूळ प्रतिपादक धडधडीत खोटे बोललेला असू शकतो. मूळ प्रतिपादकाच्या त्या विषयीच्या तत्कालीन आकलनात मर्यादा असू शकते. मूळ प्रतिपादकाची खरोखरच तशी प्रामाणिक (परंतु चुकीची) समजूत असू शकते. मूळ प्रतिपादकाने एक विधान केलेले असू शकते परंतु विश्वास ठेवणाराने त्यातून दुसराच काही अर्थबोध घेतलेला असू शकतो. किंवा, क्वचित्प्रसंगी, मूळ प्रतिपादन तंतोतंत खरेसुद्धा असू शकते. मात्र, विश्वास ठेवणाऱ्याच्या गाळणीतून या सर्व शक्यता निसटून जातात, इतकेच.
असो चालायचेच.
"उभं राहून पाणी प्यायलं तर ते
"उभं राहून पाणी प्यायलं तर ते थेट गुडघ्यात जातं."
असे तुम्ही म्हणता ते बरोबर च आहे
मी यावर थोडा शोध केला तर मला हे वाक्य मिळाले ते मी भाषान्तर केले आहे
"तुमच्यापैकी कोणीही उभे असताना पिऊ नये; आणि जर. कोणीही विसरला, त्याला उलटी करणे आवश्यक आहे."
स्वताहा हद्दित मधे असे लिहिले आहे
मी इथे त्याची लिन्क सुद्धा पाठवत आहे आधीक माहिती साठी
https://islamqa.info/en/answers/143966/the-wisdom-behind-drinking-whilst...
तसेच तुम्हि खूप प्रश्न विचारले पण सर्वांना च त्या प्रश्नाचे उत्तर माहिती असतात असे नसू शकते
कुराणात म्हटलेले आहे; खोटे
कुराणात म्हटलेले आहे; खोटे कसे असेल?
ho sahamat ahe
वीज काढून घेतलेले पाणी हे तर
वीज काढून घेतलेले पाणी हे तर आठवलेच पण यावरून "पावसाचे ढग पळवून लावणाऱ्या" पवनचक्क्या आठवल्या. कोणी कोणत्या काळात म्हटले ते नेमके आठवत नाही आता.
शालिनीताई पाटील
शालिनीताई पाटील
२०-३० वर्षांपूर्वी असेल
Deta स्वस्त आहे?
डेटा ,इंटरनेट बिलकुल स्वस्त नाही उलट खूप महाग आहे.
जेव्हा भारतात इंटरनेट च उगम झाला तेव्हा infra पासून अनेक गोष्टी न वर कंपन्यांनी खर्च केला होता.
तेव्हा एअरटेल चे लिमिटेड डेटा असणारे इंटरनेट .
२ रुपये प्रति दिवस होते.
म्हणजे ६० रुपये महिना आणि ह्या मध्ये ठराविक mb च deta मिळत होता.
आणि unlimited ७ रुपये प्रति दिवस म्हणजे २१० प्रती महिना .
आणि आज किती आहे ३०० रुपये प्रति ३ gb/ day.
Ek महिना.
म्हणजे स्वस्त नाही तर महाग आहे.
Aata infra वर बिलकुल खर्च नाही फक्त maintance वर कंपन्या खर्च करतात
.
अमेरिकेच्या तुलनेत (विशुद्ध $-₹ टर्म्समध्ये) भारतात डेटा (तथा एकंदरीतच मोबाइल सेवा हा प्रकार) केवळ स्वस्तच नव्हे, तर जवळजवळ फुकट म्हणता येईल इतका स्वस्त असावा, असा माझा अंदाज आहे. (तूर्तास तुलनात्मक आकडेमोड करण्याचे कष्ट घेत नाही.)
(भारतीय सेवादाते त्यातूनसुद्धा प्रचंड नफा कमावीत असतीलही, परंतु ती गोष्ट वेगळी.)
Jio चा ७५० रु मध्ये 90 days
Jio चा ७५० रु मध्ये 90 days validity,2GB per day, with unlimited calls हा (4g LTE) प्लान सामान्य माणसासाठी पुरतो.डेटा स्पीड 8MB ps पर्यंत जातो.( सध्या 5g स्पीड data 60MBps+याच प्लान मध्ये फुकट देतात ) fast आहे. मोबाईल डेटाला प्राधान्य आहे. प्रवासातही लागते. वर्क फ्रॉम होम कुणी करत नसल्याने होम इंटरनेट वायर कनेक्शन घ्यावे लागले नाही. तेसुद्धा २५० ते ७५० रुपयांत बरेच डेटा देते. बरेच जण ते वापरतात. फास्ट असते.
२०१६ मध्ये जियोने 4g LTE तंत्रज्ञान आणण्या अगोदर रुपये २२० एका जीबी डेटा साठी देत होतो. यानंतर २२० रुपयांत ५० जीबी डेटा मिळू लागला. आता आणखी 5g सुद्धा आले. आणखी फास्ट. या 4g तंत्रज्ञानाचा फायदा असा की त्या लहरी प्रसारीत करण्यासाठी 2g/ 3g पेक्षा कमी वीज लागते.
Data स्वस्त नसता तर विडिओ फुंकून फुंकून प्यावे लागले असते.
राजकारणी लोकांसारखे प्रतिवाद करू नका
इंटरनेट chya सुरुवातीच्या काळात.
.नवीन infra, नवीन तंत्र ते पण विकतचे .
ह्या वर जास्त खर्च होता.
Mtnl, BSNL चे नेटवर्क जवळ जवळ ह्यांनी फुकट वापरले, स्पेक्ट्रम सरकार नी स्वस्तात पुरवले जनतेच्या पैशाने.
आता infra वर खर्च नाही फक्त maintance वर खर्च आहे...,,,zzzzz
आणि ह्या टिंब टिंब आणि zz मध्ये बाकी सुविधा आहेत.
आता खरे तर १०० रुपयात 2gb per day एका month साठी आणि कॉल unlimited असे दर हवे होते..
जगाची उदाहरणे देवू नका प्रतिवाद करताना
माहिती आहे. प्रतिवाद नाही.
माहिती आहे. प्रतिवाद नाही.
जगाची उदाहरणे देवू नका प्रतिवाद करताना
यामध्ये फक्त इथली माहिती दिली आहे. २०१९ ला AGR टॅक्स बद्दल कोर्टाने शेवटचा निकाल दिला. परंतू १९९९ मध्ये तो टॅक्स आणण्यात आला होता. बराच वादविवाद होऊन फायनल झाला. टेलिकॉम कंपन्या लाभावरचा हा कर गिऱ्हाईकांकडून वसूल करून सरकारला देणार. २०१९ ला सर्व टेलिकॉम कंपन्यांनी एकत्र येऊन ठरवले की हळूहळू रेट वाढवत न्यायचे. AGR नसता तर १०० रु दर मिळाला असता. यामध्ये माझं मत घुसवलेलं नाही.
पाहा
100 तरी कशाला. १ रु मध्ये २
100 तरी कशाला. १ रु मध्ये २ जिबि का नको?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कमवतातच. किम्बहुना कमावलाच
कमवतातच. किम्बहुना कमावलाच पाहिजे, नाहितर BSNL होइल. सरकारकडुन स्पेक्ट्रम फुकट, नफा काही नाही, नुसतेच जनतेच्या पैशातुन बेल आउट आणि जनतेला स्वस्त सेवाही नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आक्षेप नव्हे.
अर्थात. नफा कमावण्याबद्दल आक्षेप नाही.
सांगण्याचा मतलब इतकाच होता, की डेटा काय, किंवा मोबाइल सेवा काय, (जगाच्या तुलनेत) जवळजवळ फुकट म्हणता येईल इतक्या स्वस्तात विकून त्यातूनसुद्धा प्रचंड नफा कमावण्यास स्कोप असल्यास निदान मला तरी आश्चर्य वाटणार नाही. (आणि, तो अवश्य कमावावा.)
आकडेवारी आणि सत्यता पडताळणे
आकडेवारी आणि सत्यता पडताळणे यांची काही गरज नाही. आहे ते आणि कुणी सांगितले यावर जग चालले आहे. तसेच राहू द्या. त्यातच गंमत आहे.
लहानपणी पावसाळ्यात गडगडले की 'म्हातारी दळतेय' हे ऐकून गप्प बसलो होतो. तीच गोष्ट बऱ्याच ठिकाणी चालू आहे. पर्यटन व्यवसायात तर लोककथांना फार महत्त्व आहे. तिथे वैज्ञानिकपणा नकोच.
लेख आवडला हा आणि (लोकसत्तेत)
लेख आवडला हा आणि (लोकसत्तेत) बाजूला असलेला मुक्ता चैतन्य ह्यांचाही.
विदा
विदावैज्ञानिकच म्हणायला लागले की कुणीतरी हे तपासलं पाहिजे तर आम्ही पामरांनी कोणाकडे बघायचं ?
माझ्यापुरता विदा देऊन ठेवतो. मी कुठल्याही वत्सापी किंवा छापील गोष्टींवर सहज विश्वास ठेवत नाही आणि पुढेही ढकलत नाही. भक्त मंडळींचे मेसेज तर दिसता क्षणी डिलीट करतो.
स्मार्टफोन आणि डेटापॅकांमुळे लोकांमध्ये अवैज्ञानिकता वाढायला लाग
हे अगदी सत्य आहे विज्ञान विषयी आवड आपण त्यालाच म्हणू शकतो .
जेव्हा कोणत्या ही गोष्टी वर आपण स्वतःची बुध्दी वापरून त्या वर विचार करून विश्वास ठेवतो.
स्मार्ट फोन च्या काळात लोक माहिती च्या जंजाळात अडकून जातात आणि स्वतःची बुध्दी बिलकुल वापरत नाहीत.
कारण इंटरनेट वर त्याची प्रस्तुती च माणसाची मानसिक स्थिती च विचार करून केलेली असते.
त्या मुळे विज्ञान न chya नावाखाली फक्त अंध श्रद्धा सहज पसरवल्या जातात आणि लोक विश्वास पण ठेवतात.
ह्या माहितीच्या स्फोटात खरी माहिती मिळणे अत्यंत कठीण आहे.
प्रवाह इतका तीव्र आहे की हे खोटे आहे हे काही विचारी लोकांना माहीत असते पण प्रवाह बरोबर त्यांना वाहून घ्यावेच लागते.
प्रवाह ची ताकत खरे दाबून टाकते.
नदीच्या धारेत अडकल्यानंतर तुमची इच्छा असो किंवा नसो पाण्याच्या प्रवाहात तुम्ही वाहून जातात च.
असे आहे हे
वर्तमान परिस्थितीला सुसंगत
वर्तमान परिस्थितीला सुसंगत असा लेख आहे. सर्व निरिक्षणे अगदी योग्य आहेत.
गेल्या शतकात अनेक संशोधने होऊन नवे शोध लागले. मानव जीवनाला उपयुक्त अशी खूप साधने निर्माण झाली. पण मानव आणि मानवी वर्तन यात काहीच बदल घडलेला अढळत नाही असे वाटते. काही चांगल्या उपयुक्त संशोधनाचा दुरूपयोग केला जातो असेही अढळते. अंधश्रद्धा, गैरसमज, कट्टरता इत्यादी मधे वाढ झाली की नाही माहिती नाही , पण त्याच्या कक्षा नक्कीच विस्तारल्या आहेत. पूर्वी एका मर्यादित परिघातच विचारांची देवाणघेवाण असे. ओळख लपवून वगैरे काही बोलणे, करणे शक्य नव्हते. त्यावेळेस कदाचित लोक काय म्हणतील या भितीने काही गोष्टी उघड बोलल्या जात नसत. पण त्यांचे अस्तित्व नव्हते असे काही म्हणता येत नाही. आता ओळख लपवून मतप्रदर्शन करता येते, तसेच समविचारी लोकांबरोबर सहज संपर्क करता येतो. एखाद्याचे मत चुकीचे असले तरीही त्याच मताचे असंख्य लोक त्याला आंतजालावर आढळतात. मग त्याचे ते चुकीचे मत अजूनच पक्के होते. काहीजण म्हणतात विचारांची देवाणघेवाण होते, पण तसे दिसत नाही उलट वैचारिक धृवीकरणच अधिक होते असे वाटते.
संपर्काच्या या नव्या साधनामूळे माणसे अधिक दुरावली आहेत असे वाटते. तुम्ही स्टेशनवर रेल्वेची वाट बघणारे आता कंटाळलेले दिसत नाही असे म्हणले आहे. पण माणसा माणसातला संवादच हरवला आहे. त्यांना भोवतालच्या जिवंत माणसांची गरजच राहिली नाही. त्यांना रिझवायला ते लहानसे उपकरण पुरेसे आहे. हे मला भयावह वाटते.
शेवटी कुठल्याही नविन शोधाची उपयुक्तता किंवा धोका, माणूस त्याचा वापर कसा करेल यावरच अवलंबून आहे.
गेल्या काही काळात मला या साधनांचा फार उपयोग झाला. मी इथे परक्या देशात (महिनाभर) एकटीच होते आणि आजारीही. त्यावेळेस अगदी औषधे देखिल मला घरपोच मिळू शकत होती. डॉक्टरचा सल्ला मला प्रत्यक्ष दवाखान्यात न जाता मिळू शकतो. डोळ्यांच्या त्रासाने मला वाचन करणे जमत नव्हते, तेव्हा मी कुणीतरी वाचीत असलेली पुस्तके ऐकू शकत होते.
साधनांचा वापर सुजाणपणे केला तर ती वरदान ठरतात नाही तर त्यांच्यामूळे घातक परिस्थिती निर्माण होउ शकते हे त्रिवार सत्य आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
माध्यमं आणि लहान मुलं
>>दर पिढीला असं वाटत असेल का, की आपल्या वेळी गोष्टी बऱ्या होत्या आणि आता त्या बिघडत चालल्या आहेत. समजा असं कुणाला वाटत असेल आणि सिद्धच करायचं असेल तर ते काय प्रकारच्या गोष्टी सांगतील?
वर नबांनी रेडिओचं उदाहरण दिलं आहेच. टीव्ही आला तेव्हाही लोकांनी बराच आरडाओरडा केला होता. मला आठवतं कुणीतरी राजीव गांधीला प्रश्न विचारला होता की घरात टीव्ही आल्याने मुलांवर परिणाम होतो वगैरे. त्यावर त्यानं "टीव्हीचं बटण तुमच्या हातात आहे, ते बंद करा" - असं उत्तर दिलं होतं. हे उत्तर ऐकून राजीव गांधी किती हजरजबाबी आहे वगैरे कौतुक आमच्या तीर्थरुपांनी केलं होतं. पण लहान मुलांना अशा तंत्रज्ञानापासून लांब ठेवणं फार अवघड आहे. राजीव गांधीचं कौतुक करणाऱ्या बापानी पुढे जाऊन केबल बंद करणे वगैरे उपाययोजना केल्याचं आठवतं. तरीही माझ्या बालपणीचा (अर्धावेळ काळ्या पांढऱ्या मुंग्या आणि पायजम्याचे रंगीत पट्टे विथ कूऽऽ आवाज असलेल्या) टीव्हीची आजच्या इंटरनेटयुक्त स्मार्टफोनशी तुलना होऊ शकते का?
आम्हीही मुलाला स्मार्टफोन किंवा कोणताही स्क्रीन द्यायचा नाही असं कोव्हिड संपल्यावर ठरवलं. त्याआधीही आम्ही ही गोष्ट कसोशीने पाळली होती. पण तेव्हा तो लहान होता. कोव्हिडमध्ये घरून शाळा शिकावी लागल्यानं आम्हाला आमचा निश्चय मोडावा लागला होता. शाळा परत सुरु झाल्यावर त्याला फोनवर काहीबाही गेम खेळायची सवय लागली होती ती आम्ही हळूहळू बंद केली आणि पुन्हा आमचा नो स्क्रीन नियम लागू केला.
पण पालक झाल्यावर लक्षात येतं हे किती अवघड आहे. बऱ्याचदा घरातल्या ज्ये.ना लोकांना, "त्याला फोन देऊ नका" असं सांगावं लागायचं. आता अशी परिस्थिती आहे की त्याला स्मार्टफोनमध्ये विशेष रसच राहिलेला नाही.
कोणतंही नवीन तंत्रज्ञान आलं की त्याबद्दल भीती बाळगणारे, त्याला मिठी मारणारे आणि संतुलित असे गट आपोआप पडतात.
मी "मुलांना स्क्रीन द्यावेत" याच्या बाजूने अनेक मुद्दे ऐकले आहेत
१. स्क्रीन बघत जेवणे आणि पुस्तक वाचत जेवणे यात विशेष असा काय फरक आहे? (मी स्वतः, जेवताना यापैकी काहीच करू नये या मताची आहे)
२. त्या त्या काळातल्या तंत्रज्ञानाशी मुलांचा परिचय असायला हवा.
३. आपल्याला वाचन महत्त्वाचं वाटतं - पण लिखित साहित्य अलीकडचं आहे - स्क्रीन्स आणि व्हिडीओ मौखिक परंपरेच्या जवळचे आहेत ज्याची मानवाला जास्त सवय आहे.
४. काही काळानं लेखन आणि वाचन लुप्त होणार आहे.
५. गेम, मालिका माहिती नसले की मुलांना मित्र मैत्रिणींमध्ये असताना वेगळं पडल्यासारखं वाटतं.
पण मला यांपैकी कोणताही मुद्दा मुलाला फोन वापरू देण्याइतका महत्त्वाचा वाटत नाही.
मला वाटतं आधीच्या पिढ्यांनी बघितलेलं इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आणि (स्मार्टफोन+सोशल मीडिया) यांची "बदलतं तंत्रज्ञान" या एकाच परिपेक्ष्यातून तुलना केली तर बऱ्याच गोष्टींचं सरसकटीकरण होईल.
१. आधीची प्रसार माध्यमं एकतर्फी होती. ती वापरकर्त्यांच्या आवडीनिवडी ओळखून त्यांना त्याच प्रकारचा मुबलक कंटेंट दाखवत नव्हती.
२. ही माध्यमं "समूहात असल्याचा" आभास निर्माण करणारी नव्हती. टीव्ही बघून किंवा रेडिओ ऐकून कंटाळा आला की लोक इतरांना भेटायला बाहेर पडत.
३. ती स्मार्टफोनइतकी पोर्टेबल नव्हती.
माझ्यावेळी आयुष्य अधिक सोपं/सरळ/आनंदी होतं असं मला वाटत नाही. माझ्या लहानपणीचं "काळजीचं माध्यम" टीव्ही होता. विशेषतः १९९० नंतर सॅटेलाईट टीव्ही आल्यावर पालकांना आपली मुलं काय बघतात याबद्दल काळजी वाटायची. पण पालकांना काळजी वाटावी अशा बहुतांश गोष्टी आम्ही १९९९ नंतर आंतरजालामुळेच केल्या. टीव्हीमुळे वाईटात वाईट जर काही झालं असेल तर अमेरिकन सिटकॉम बघायची सवय लागली.
टीव्ही बघितलाच नसता तर विशेष नुकसानही झालं नसतं. पण स्मार्टफोनबद्दल मात्र माझं मत वेगळं आहे. लहान वयात केलेला स्मार्टफोनचा वापर आधीच्या माध्यमांपेक्षा नक्कीच जास्त नुकसान करणारा आहे अशी मला खात्री वाटते.
दोन बाबी आहेत
आधी : मेडिया प्लेस बाऊंड होता. ५००० वर्षांपूर्वी आपापल्या गुरु/मित्र/भगत यांच्याकडे त्यांच्या जागेवर जाऊन तो कंझुम करावा लागे. ओढ्याकाठी हगायला बसताना कोणी भूर्जपत्रे वगैरे घेऊन बसत असेल असे वाटत नाही म्हणजे बसणारे बसत असतीलही पण रेअरच म्हणावेत तसे महानुभाव. ते टीव्हीपर्यंत असेच होते. पण टीव्हीसुद्धा पोर्टेबल होऊ लागला. खाजगी ट्रॅव्हलस वाले तर लेटेस्ट सिनेमावर पण मार्केटिंग करत. हा झाला स्टॅटिक स्पेस बाऊंड मेडिया आणि रिलेटिव्ह स्पेस बाऊंड मेडिया. ज्ञानेंद्रियांना दोन्हीही बाह्यच. म्हणजे तुमच्या शरीराची सीमा ते ओलांडून येत नव्हते.
आता : मेडिया किंवा जे काही आहे ते पोर्टेबल पूर्णपणे रिलेटिव्ह स्पेस बाऊंड आहेच. फरक की ते इंटरफेसेस शरीराच्या, ज्ञानेंद्रियांच्या खूप जवळ आले आहेत. मोबाईल, व्हिजन प्रो हेडसेट, अगदी नीलदंती हेडफोन बोन्डके. परंतु तरीही ते मेंदूच्या/ज्ञानेंद्रियांच्या बाहेर आहेत.
उद्या: ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा ओलांडून ते शरीरात येणे हीच नेक्स्ट स्टेप आहे. उद्याचा मेडिया असाच कंझुम केला जाईल यात मला कोणतीही शंकाच वाटत नाही.
फरक एवढाच की त्याने तुमचा आत्मभान बदलेल का? मेडियाशी द्वैत राहील की अद्वैत?
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
किंचित मतभेद
हे खरे असेलही, परंतु त्याला कारण 'तेव्हा तशी पद्धत नव्हती' हे नसून, तेव्हा मुळात भूर्जपत्रे दुर्मिळ होती, हे आहे.
आज तरी (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, कोणत्याही जमान्यात) समकालीन मीडियाशी सर्वांचेच पूर्णपणे अद्वैत नाहीच, हे तुम्ही छातीठोकपणे सांगू शकाल काय?
ब्रिज पीरियड मध्ये आहोत
१. येऊ घातलेली AI क्रांती
२. न्यूरालिंक सारखे प्रयोग
३. वाढता एकाकीपणा
४. ढासळता जन्मदर
५. प्रचंड आर्थिक विषमता
-----------------
सध्या आपण एका ब्रीज पीरियड मध्ये आहोत.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
?
काय म्हणायचे आहे ते समजले नाही. (क्षमस्व.)
सोडून द्या.
उद्या नवीन काहीतरी येईल तेव्हा स्मार्टफोनचे इतके विशेष वाटणार नाही. मला खात्री आहे. सोडून द्या.
स्क्रीन बघत जेवणे (पर्वतमुहम्मदन्याय)
जेव्हा स्मार्टफोन, किंडल वगैरे भानगडी नव्हत्या, आणि टीव्ही जेवणाच्या टेबलावर आणणे शक्य नव्हते, तेव्हा काही माणसे (कधीकधी आख्खी कुटुंबेच्या कुटुंबे) टीव्हीसमोर जेवायला बसत. (त्या काळात अमेरिकेत 'टीव्ही डिनर' नावाची झटपट गरम करता येणारी रेडिमेड जेवणाची कॅटेगरीसुद्धा बाजारात होती.) उलटपक्षी, टीव्हीसमोर जेवायला बसू नये, अशा मताचीही माणसे होती.
तर मग तुमचा नेमका मुद्दा काय म्हणालात?
(माझा मुद्दा म्हणाल, तर, काळ बदलतो, तसे फक्त तंत्रज्ञान बदलते; माणूस तोच राहतो, असा आहे.)
.
माझा मुद्दा असा आहे की स्मार्टफोन हे तंत्रज्ञान "एकास एक" असे वापरले जात असल्याने ते लोकांना, विशेषत: लहान मुलांना आजूबाजूच्या जगापासून लांब घेऊन जाणारे आणि अधिक घट्टपणे गुंतवून ठेवणारे आहे. हेच सगळ्यात वाईट असं मी म्हणत नाही पण सगळ्यांनी मिळून टिव्ही बघत जेवणे आणि मूल स्मार्टफोनशिवाय जेवत नाही म्हणून त्याच्या आवडीचे असे काही लावून त्याला भरवणे यात फरक आहे. पूर्वी मुलांनी (जास्त) जेवावं म्हणून आया टिव्ही लावून देत असतील आणि हे वरकरणी सारखं भासत असलं, तरी या दोन्ही अनुभवांमध्ये फरक आहे.
एकतर केवळ बोटाच्या स्पर्शाने one-thing-leads-to-another अशा प्रकारे मुलांना कंटेंट मिळत जातो. आणि अशा प्रकारचा कंटेंट सतत बघितल्याने वाचन करून स्वतःची कल्पनाशक्ती वापरायचा मुलं कंटाळा करतात. अशा प्रकारे कल्पनाशक्ती वापरायची आताच्या काळात गरज नसेल तर का वापरावी? हा मुद्दा येतोच. त्यासाठी माझ्याकडे काहीही उत्तर नाही. हे टिव्हीमुळे होतंच होतं हेही मला मान्य आहे - पण आता जितका कंटेंट मुलांच्या समोर येतो त्याला कोणत्याही प्रकारचीं सीमा नसते. ते पॉर्न बघतील वगैरे चिंता मला अजिबात वाटत नाही. निषिद्ध म्हणून जे जे काही असतं ते सगळं मुलं मिळवतात (आणि माझा मुलगाही कधीतरी असाच स्मार्टफोन मिळवेल) - पण the pervasiveness of this type of consumption isn't comparable to the older technologies.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आजही स्मार्टफोनवर बंदी घालणारे आणि न घालणारे असे पालक आहेत. But it is also true that smartphones are now rampantly used as pacifiers for toddlers in public places. भारतात आई - वडील - मूल अशी त्रिकुटं बाहेर जेवताना दिसली की हमखास लहान मुलाच्या हातात फोन दिलेला असतो. I don't judge them or blame them. I think public places have also become less tolerant of unpacified toddlers.
...
हे चॅनेलसर्फिंगपेक्षा नक्की वेगळे कसे? (मुलांच्या हाती रिमोट कंट्रोल कदाचित तुलनेने कमी ठिकाणी दिला जात असावा, एवढी बाब वगळल्यास?)
(आमच्या लहानपणी दूरदर्शनचा फक्त एकच चॅनेल असायचा, ही गोष्ट वेगळी. नंतर मग कधीतरी दुसरा चॅनेल (तोही मुंबईपुरता) आला, पुण्यात तर तो उपलब्ध नव्हताच. किंबहुना, मुंबईच्या काही उपनगरांतूनसुद्धा तो धड दिसत नसे, असे ऐकलेले आहे. (दिल्लीत मला वाटते दूरदर्शनचा दुसरा स्थानिक चॅनेल थोडा अगोदर आला असावा. मला आठवते, तेव्हाचे लक्ष्मणचे कार्टून होते, दोन टीव्ही शेजारीशेजारी, एकावर इंदिरा गांधींचे थोबाड तर दुसऱ्यावर राजीव गांधींचे. म्हणजे इंदिराहत्येपूर्वीची ही गोष्ट असावी. मुंबईचा दुसरा चॅनेल मला वाटते इंदिराहत्येच्या थोड्या नंतरचा असावा. (चूभूद्याघ्या.))
(तरी बरे, मुंबईपुण्यात होतो, म्हणून टीव्ही नावाच्या गोष्टीशी वाक़िफ़ तरी होतो. त्या काळात टीव्ही प्रसारण हा प्रकार फक्त दिल्ली, मुंबई-पुणे, मद्रास, कलकत्ता, पंजाबात (बहुधा) जालंदर किंवा अमृतसर, श्रीनगर, अशा काही मोजक्याच ठिकाणी उपलब्ध असे. (बंगलोर किंवा हैदराबाद अशा ठिकाणीसुद्धा नव्हे.) दूरदर्शनचे कव्हरेज देशात अत्यंत मर्यादित (आणि स्थानिक!) होते, नि देशातील बहुसंख्य जनतेला टीव्ही या चिजेची (असलीच, तर) फक्त ऐकीव माहिती होती. १९८०च्या दशकात कधीतरी 'नॅशनल नेटवर्क' (म्हणजे उपग्रहाद्वारे जिथेतिथे दिल्ली दूरदर्शन, स्थानिक स्वस्त Low power transmittersद्वारे पुन:प्रक्षेपित) हा प्रकार आणला गेल्यावर कुठे दूरदर्शनची व्याप्ती देशात सर्वत्र, खेडोपाडी वगैरे हळूहळू वाढली. असो.)
हे सर्व लांबण लावण्यामागचा मुद्दा एवढाच, की आमच्या लहानपणी जर सोय असती, तर आम्हीही चॅनेलसर्फिंग केले असते. (परंतु, तरीही नसतो करू शकलो. टीव्ही आमच्या घरी नव्हता; टीव्ही शेजाऱ्यांकडे होता. टीव्हीच्या प्रसारणांच्या वेळात कायम (जेवायची वेळ वगळता, नि त्यांनी हाकलेपर्यंत) त्यांच्याच घरी निर्लज्जपणे जरी पडीक असलो, तरी त्यांनी सटासट चॅनेल बदलू दिले असते, असे वाटत नाही. त्या काळात घरोघरी टीव्ही आणि टेलिफोन या चिजा नसायच्या. एक तर दोन्ही चैनीच्या वस्तू समजल्या जात. त्यामुळे, पाच ते दहा घरांमागे एखादा टीव्ही आणि वीसपंचवीस घरांमागे एखादा टेलिफोन हे साधारण प्रमाण असावे. (चूभूद्याघ्या.) लोक इतरांच्या घरात जाऊन सर्रास टीव्ही बघत, नि लोकांकडल्या टेलिफोनवरून फोन करत. ते लोक आपल्या फोनवरून कॉल करण्याचे रीतसर पैसेसुद्धा लावीत. ‘कॉलचा दर एक रुपया; ट्रंक कॉल करू नये!’ अशी (पुणेरी) पाटीसुद्धा लोकांच्या घरच्या फोनशेजारी दिसणे तेव्हा सामान्य होते. (फोनकंपनी (पुणे टेलिफोन्स) प्रत्यक्षात या लोकांना बिलात कॉलमागे तीस पैसेच लावीत असे, नि महिन्यातले सुरुवातीचे काही कॉल (प्लॅनप्रमाणे) फुकट असत. परंतु, ते असो.) आमच्या घरात फोन आल्यानंतर एकदा फोन बंद पडला म्हणून शेजारच्या मारवाड्याच्या दुकानातून तक्रारीचा कॉल लावायला गेलो, नि कॉल झाल्यावर त्याचे रीतसर पैसे देऊ केले, तर ‘कंप्लेंट कॉलचे पैसे पडत नाहीत’ अशी नवी माहिती त्याने (अतिशय सज्जनपणे) दिलीन्. आमच्या शेजाऱ्यांनी बहुधा त्याचेही पैसे लावले असते. असो; बरेच अवांतर झाले.)
आमच्या आजीआजोबांच्या जमान्यात लहान मुलाला pacify करण्याकरिता अफूचे बोंड पाण्यात उकळून पाजणे ही तितकीही असामान्य गोष्ट नव्हती, असे ऐकून आहे. (पुन्हा तोच मुद्दा; तंत्रज्ञान बदलते, माणूस तोच राहातो.)
(धाग्याशी संबंधित नसला, तरीही) हा मात्र महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे, मी जर समजा रेस्टॉरंटात गेलेलो असलो, आणि शेजारच्या टेबलावर एखाद्या मुलाने भोकाड पसरलेले असले, तर मला त्याचा त्रास होत नाही, किंवा काही वाटतही नाही. (मूल आहे, तिथे भोकाड पसरणारच.) मात्र, (किमानपक्षी इथे अमेरिकेत तरी) तेवढ्या कारणावरून त्या मुलाला किंवा त्याच्या आईबापांना जागच्या जागी गोळ्या घालणारे (किंवा, किमानपक्षी, गोळ्या घालू इच्छिणारे) पब्लिकही असू शकते, याचीही कल्पना आहे. (लहान मुलांना रेस्टॉरंटांसारख्या सार्वजनिक ठिकाणी बंदी असावी ("आम्ही पैसे भरून येतो; यांनी मुले 'डाउनलोड' केली (हे त्याचे शब्द; सर्वसाधारण मराठी तर्जुमा: ‘पोरे काढली’. मेंटॅलिटी तीच.) तर आम्हाला का त्रास?"), असे खुलेआम ॲडव्होकेट करणारा एक तथाकथित लिबर्टेरियन रेडियो टॉक शो होस्ट आमच्या अटलांटात एके काळी चलतीवर होता. (आता रिटायर झाला.))
(कोविडोत्तर जमान्यात पब्लिकचा एकंदरच intolerance तथा impatience प्रमाणाबाहेर वाढलेला आहे, हेही तितकेच खरे आहे. एवढ्यातेवढ्या कारणावरून road rage हा प्रकार सर्रास आहे. परंतु, याचा तंत्रज्ञानाशी थेट संबंध असावा, याबद्दल मी साशंक आहे. Rather, पब्लिकला राजकीय vested interestsकडून पद्धतशीरपणे polarize तथा enrage केले जात आहे, हा यामागचा मुख्य घटक असावा, अशी माझी शंका आहे. या polarizationमध्ये तथा enragementमध्ये ही नवमाध्यमे, influencers (किंवा भारतात मीडिया सेल) वगैरेंचा प्रभाव तथा हातभार मी अर्थातच नाकारणार नाही, परंतु, पारंपरिक ('मेनस्ट्रीम') माध्यमांतून हे जितके चालते तथा लक्ष्याप्रति पोहोचते, त्या तुलनेत नवमाध्यमांचा हातभार नगण्य असावा, असा माझा तरी अंदाज आहे. (भारतातही थोड्याफार फरकाने याहून फारशी वेगळी परिस्थिती नसावी.) असो चालायचेच.)
तंत्र ज्ञान च सरळ संबंध आहे
माणसाची मानसिकता निर्माण करण्याचे काम नवीन तंत्र ज्ञान च करत आहे.
1) वर कोणी तरी लिहिले आहे पहिली नवीन वस्तू ची पूजा केली की दहावीस लोकांना समजत होती.
आता हजारो लोकांना समजते.
त्या हजरो पैकी शेकडो लोकांची मानसिकता इथे निर्माण होतेच
२) माणसाची सहन शक्ती नष्ट झाली आहे लहान सहन कारणासाठी ह्यांचे वैयतिक आयुष्य धोक्यात येते मग त्या साठी हिंसा.
लहान मूल रडले की पहिले सहन करायचे आता तेच लोकांना सहन होत नाही.
ही मानसिकता कशी निर्माण झाली?
आधुनिक साधनांनी पसरवल्या गेलेल्या विचारांमुळे.
पुन्हा तेच सांगतोय…
पूर्वी कोकणात माणूस मेला, तरी मुंबईत त्याच्या नातेवाइकांना महिनोन् महिने पत्ता लागत नसे. इंग्रजाने तारा आणून मुंबईकराची सुतकाची सोय केली.
(परंतु, उलटपक्षी:)
इंग्रजाने रेल्वे आणली, तारा आणल्या, झालेच तर वर्तमानपत्रे आणली. (इंग्रजाने या गोष्टी स्वतःच्या सोयीकरिता नि स्वतःच्या फायद्याकरिता केल्या खऱ्या, परंतु) यातूनच (हिंदुस्थानातल्या) इंग्रजी साम्राज्याचा घात झाला! (कारण क्रांतिकारक नि क्रांतिकारी विचार आता देशातून प्रचंड वेगाने पसरू लागले.) Law of Unintended Consequences!
पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय: तंत्रज्ञान neutral असते; त्याचा वापर कोण (नि कशाकरिता) करतो, हे वापरणाऱ्या (माणसा)वर अवलंबून असते.
+१
रील्स किंवा तत्सम ३० सेकंदांचे सरकते विडिओ हे जबरदस्त व्यसन आहे.
ज्यांनी इतर करमणुकीची साधनं वापरून पाहिली आहेत अशा मोठ्यांना तासभर खिळवून ठेवणारं हे तंत्र.
मग लहान मुलं - ज्यांनी आयुष्यात पहिलयांदा एवढं व्यसनाधीन करणारं तंत्र वापारलं तर ती तर वेडीच होत असतील.
हे म्हणजे वयाच्या पहिल्या वर्षापासून रोज बचकभर केक खाल्यासारखं आहे.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
जबरदस्त नाही वाटत
६ तास बिंज वॉचिंग करणे आणि २ तास सरकते व्हिडीओ पाहणे यात काय कमी जास्त करणार.
३० सेकंदाच्या व्हिडीओचा कालांतराने प्रचंड कंटाळा येऊ लागतो. मग एक रोजचे काही वेळापुरतेचे विरंगुळ्याचे साधन.. तेही बोअर वाटू लागले कालांतराने. पर्सनल किंवा ग्रुप कंटेक्स्ट असल्याशिवाय हे व्हिडीओ फार धरून ठेवत नाहीत.
मला तर टिकटॉक अर्ध्या तासात बोअर झाले. एकतर ते भीषण हसू, 'आयोगिमा' असले कोणत्यातरी पौर्वात्य भाषेतले आश्चर्यकारक उद्गार ८० टक्के व्हिडीओला ऐकून परत कधीही त्याच्या वाट्याला जाऊ वाटले नाही.
रिले कधी मधी पाहतो. पण रोज पहावीत असे कधी वाटले नाही.
यात खरेतर व्यसन व्हिडीओ करणाऱ्या लोकांना पण त्यातून प्रचंड कमाई ना करणाऱ्या लोकांना असते असे वाटते. सतत व्हॅलीडेशन मिळवणे, सतत ट्रेंड मध्ये राहणे, उपजीविकेचे साधन म्हणून विकसीत करण्यासाठी धडपड करणे इत्यादी.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
अवश्य करावे
मुलांना अवश्य स्मार्टफोन द्यावा नाहीतर ती प्रचंड किरकिर करतात. विशेषत: प्रवासात. बाहेर जेवताना. पाहुण्यांकडे. मुलांना स्मार्टफोन ना देणारे आणि काचेतून पळती झाडे पाहायला लावणारे पालक मला अशक्य क्यूट वाटतात. कसले दांभिक लोक असतात, यांना हगता बसता उठता झोपता फोन, इंटरनेट लागते लागतो आणि मुलांनी मात्र तो वापरु नये हे काय अजब लॉजिक असते? उलट वापरून वापरून बुकणा पाडू द्यावा.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
बव्हंशी सहमत, परंतु... (++/-)
मुलांना अवश्य स्मार्टफोन द्यावा/वापरून वापरून बुकणा पाडू द्यावा, या भागाशी (स्वानुभवाने) प्रचंड सहमत आहे. मात्र:
ही ("Or else!"-वाली) कारणमीमांसा अजिबात पटली नाही. (बोले तो, स्मार्टफोन अवश्य द्यावा, परंतु तो या कारणाकरिता नव्हे! Let them not dictate terms. Rather, I tend to look at it as more like, "ले! तू भी क्या याद रक्खेगा?" शिवाय, चालू तंत्रज्ञानाशी मुलांनी वाक़िफ़ असण्यात काहीही हर्ज़ नाही.)
एक शक्यता: यात एक लॉजिक असेही असू शकते, की स्मार्टफोनबाहेर एक जगही आहे, आणि तेही अनुभव घेण्यालायक असू शकते, याचीही मुलांना एक किमान कल्पना असावी. म्हणजे, पालक हगता बसता उठता झोपता फोन, इंटरनेट वापरीत असतीलही, परंतु, त्यांनी लहानपणी काचेतून पळत्या झाडांचा अनुभव (for whatever it is worth) घेतलेला असतो. मुलांनी तो घ्यावा, नि मग स्वत: ठरवावे, की हा अनुभव अधिक worth, की तो, हे.
(अर्थात, दर वेळेस प्रत्येक पालकाचे हेच लॉजिक असेलच, असे नाहीच. परंतु, एक शक्यता, आणि एक पर्स्पेक्टिव.)
(मी स्वत: हगता बसता उठता झोपता स्मार्टफोनकडे बघत असेनही. परंतु, मला तर बुवा पुण्याहून मुंबईला जाताना झुकझुकगाडी मंकीहिलला थांबत असे, नि गाडीच्या बाजूच्या रुळावर माकडे जमत, नि लोक त्यांना खाऊ घालत, त्याचे अजूनही आकर्षण वाटते, नि आजकाल गाड्या तेथे थांबत नाहीत, नि थांबल्याच, तरी काचबंद एसी कंपार्टमेंटच्या बाजूला माकडे फिरकत नाहीत, याबद्दल प्रचंड हळहळसुद्धा. त्या अनुभवापुढे हजारदा स्मार्टफोननिरीक्षण व्यर्थ आहे. स्मार्टफोन बुकणा पडेपर्यंत वापरणे हे आपल्या जागी ठीकच आहे, परंतु, लहान मुलांना असली आकर्षणेसुद्धा पाहिजेत. Not (either) one at the cost of the other.)
असो.
आमच्या पिल्लाला मोबाइल आजिबात
आमच्या पिल्लाला मोबाइल आजिबात आवडत नाही. टिव्हीचा रिमोट आणून देतो पण मोबाइल दाखवला तर फेकून देतो.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
टीव्ही का युट्यूब वा तत्सम
मोबाईल फेकून देतो हे ठीक पण टीव्ही वर काय पाहतो? पेपा पिग किंवा तसलेच काहीतरी ना? एकदा युट्यूब ची गंमत कळायला लागली की साहजिकच मोठा इंटरफेस प्रेफर करणार. स्मार्टफोनपेक्षा. टीव्ही वर गेमही खेळता येतातच.
सेलर असेल तर टीव्ही तिकडे लावा. आणि कुलूप घाला. आणि त्याचा उपयोग मुव्ही थिएटर सारखा करा. म्हणजे आवर्जून तिथे जाऊन टीव्ही पाहायची तीही रोज किंवा ठराविक दिवशी फक्त १ तास. तेही जो कंटेंट लागेल तोच. (जो तुम्ही ठरवणार, चॉइस पण लिमिटेड) तुम्ही तर लहानपणी मोगली किंवा शक्तिमान सारख्या कार्यक्रम पाहायला शनिवारी रविवारची वाट पाहत होताच की. तसलेच एकतर्फी ब्रॉडकास्ट मॉडल तयार करायचे. शिस्तसुद्धा लागेल. चॉइस घातक.
नाहीतर पडू द्या बुकाणा टीव्हीचा. शेवटी मुले बंडखोर असतातच. जितके दाबले की तितके उसळणार.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
नाही. कोकोमेलनची गाणी.
नाही. कोकोमेलनची गाणी. तेदेखिल १०-१५ मिनिटे. १ वर्षाचा आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
.
मुलांना स्मार्टफोन ना देणारे आणि काचेतून पळती झाडे पाहायला लावणारे पालक मला अशक्य क्यूट वाटतात. कसले दांभिक लोक असतात, यांना हगता बसता उठता झोपता फोन, इंटरनेट लागते लागतो आणि मुलांनी मात्र तो वापरु नये हे काय अजब लॉजिक असते?
आपण मुलांसमोर सतत फोन वापरणे आणि त्यांना तो न देणे असं शक्य होत नाही. तुम्हाला मुलं आहेत किंवा नाही माहिती नाही पण हा प्रयोग करून बघण्यासारखा आहे.
मान्य
मुलांना सेफ असे स्मार्टफोन काढायला हवेत खरेतर. त्यांच्या वयाला साजेसे ऍप्प्स असलेले आणि त्यांना सर्जनशील वाव देणारे. तसे काहीतरी बाजारात असेलच की. इंटरनेटचा फक्त शैक्षणिक एक्सेस.
मुले जरा मोठी झाली की इंटरनेटवरची बोअरिंग कामे त्यांनाच करायला द्यायची. किंवा त्यांना घेऊन करत बसायची. उदा. महिन्याचा ताळेबंद एक्सेल उघडून आणि मुलांना एकेक एंट्री भरत बसायला लावायचे. मोबाईल वर केले तर अतिउत्तम. पहिली ५ मिनिटे उत्साहाने केल्यावर खेळायला पळतील.
(अनुभव नसल्याने हाइपोथेटिकल (ट्रोलिंग) सोल्यूशन्स सांगत आहे)
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
एका बाबतीत मात्र (नाइलाजाने) सहमत (अतिअवांतर)
तुमच्या मुद्द्यांना कितीही विरोध जरी केला, तरी या एका मुद्द्याशी एका अर्थी (स्वानुभवावरून) सहमत होणे प्राप्त आहे.
माझा मुलाला शाळकरी वयात जेव्हा अगोदर फीचरफोन नि नंतर स्मार्टफोन घेऊन दिले, तेव्हा किमान दोनतीनदा तरी त्याने शाळेतून घरी आल्यावर कपड्यांच्या खिशातून अगोदर फोन बाहेर न काढता कपडे आत्यंतिक निष्काळजीपणे थेट वॉशिंग मशीनमध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे, लहान वयात त्याने केलेला स्मार्टफोनचा वापर (त्याचे नाही तरी माझे, आणि विशेषत: आधीच्या माध्यमांच्या तुलनेत) जास्त नुकसान करणारा ठरला, हे नाइलाजास्तव मान्य करणे प्राप्त ठरते.
(अगदी स्वस्तातला अँड्रॉइड जरी म्हटला, तरी (त्या काळात!) प्रत्येक वेळेस शंभरदीडशे डॉलरचा फटका की हो! पैसे अक्षरश: पाण्यात गेले, म्हटल्यावर... धुतला गेलो!)
(एक अनाहूत सल्ला (सुपरअवांतर))
माझ्या मुलाने लहान वयापासून (साधारणपणे मिडल ते हायस्कूलच्या वयापासून) मोबाइल/स्मार्टफोन सर्रास हाताळले. हं, वर म्हटल्याप्रमाणे, कधीकधी गैरहाताळलेसुद्धा; त्यामुळे, लहान वयातला त्याचा हा वापर माझे (माफक आर्थिक) नुकसान करणारा निश्चितच ठरला, हे मी नाकारणार नाही, परंतु… (माझा अनुभव…) He turned out to be just fine! (तूर्तास अंडरग्रॅडच्या शेवटच्या वर्षाला आहे, नि फुल स्कॉलरशिपवर आहे. त्याच्या कॉलेज शिक्षणावर (अधूनमधून माफक पॉकेटमनी वगळता) मला अद्याप एक तांबडा सेंटही खर्चावा लागलेला नाही.) त्यामुळे, या गोष्टीची एका मर्यादेहून अधिक चिंता निदान मी तरी करणार नाही.
(अर्थात, तुमची मर्यादा कोणती, हे मी dictate करू शकत नाहीच, म्हणा.)
लहान वय = under 10
माझा मुलगा ९ वर्षांचा आहे. भारतात अनेक पालक मुलं पालथी पडायला लागली की त्यांना गंमत म्हणून व्हिडिओ दाखवायला सुरुवात करतात. मग पूर्वी जेवताना पोर पुढे, आई मागे अशी वरात निघे त्या ऐवजी आता एका जागी बसून हातात मोबाईल देऊन भरवतात वगैरे वगैरे.
काही मुद्दे
१. स्क्रीन बघत जेवणे आणि पुस्तक वाचत जेवणे यात विशेष असा काय फरक आहे? (मी स्वतः, जेवताना यापैकी काहीच करू नये या मताची आहे)
मला स्वत:ला असे करण्यात काहीही गैर वाटत नाही. (ज्याला करायचेय, त्याने करावे; ज्याला करायचे नाही, त्याने करू नये. मी करतो अनेकदा.)
२. त्या त्या काळातल्या तंत्रज्ञानाशी मुलांचा परिचय असायला हवा.
यात मला सहमत न होण्यासारखे फारसे काही दिसत नाही. म्हणजे, परिचय असायलाच हवा, असा दावा करायला मी कदाचित जाणार नाही, परंतु, किमानपक्षी, अशा परिचयात काही नुकसान नसावे.
३. आपल्याला वाचन महत्त्वाचं वाटतं - पण लिखित साहित्य अलीकडचं आहे - स्क्रीन्स आणि व्हिडीओ मौखिक परंपरेच्या जवळचे आहेत ज्याची मानवाला जास्त सवय आहे.
What rubbish! Totally irrelevant point (even if possibly true).
४. काही काळानं लेखन आणि वाचन लुप्त होणार आहे.
काहीही!
(तसेही, काही काळाने मानवजातसुद्धा लुप्त होणार आहे. म्हणून काय सर्वांनी आत्ताच मरावे काय?)
५. गेम, मालिका माहिती नसले की मुलांना मित्र मैत्रिणींमध्ये असताना वेगळं पडल्यासारखं वाटतं.
Now, that cannot be a reason or justification for doing anything whatsoever. (Keeping up with the Joneses?) अतिशय बकवास मुद्दा!
त्या काळात बाजारात पुरेसे content providers नव्हते, इतकेच. (आणि 'एकतर्फी'बद्दल म्हणाल, तर (एखाद्या फोरमवर पोष्टणे वगळल्यास) आताची माध्यमेसुद्धा बव्हंशी एकतर्फीच नव्हेत काय? असा कितीसा तुम्ही स्वत:चा कंटेंट अपलोड करता? बव्हंशी जे काही सामोरे येते, ते फक्त कंझ्यूमच करता की! हं, सामोऱ्या येणाऱ्या कंटेंटमध्ये आता वैविध्य आहे खरे, परंतु ते content providersच्या बाहुल्यामुळे आहे.)
(बाकी, व्हॉट्सॲप, फेसबुक यांसारख्या social mediaबद्दल म्हणत असाल, तर त्यांची तुलना काहीशी (मधल्या काळातल्या) ईमेल, झालेच तर यूजनेट(ईमृशांदे)वरील ग्रूप्सशी करता येईल. अर्थात, त्यांना तांत्रिक मर्यादा होत्याच, परंतु, तोच तर मुद्दा आहे. त्या केवळ तत्कालीन तंत्रज्ञानाच्या मर्यादा होत्या. बाकी, त्या तथा आजच्या माध्यमांतील ऐन्स्टंट्य तुलना करता येण्यासारखे आहे. शिवाय, तेव्हा मोबाइल तंत्रज्ञान पुरेसे विकसित झालेले नसल्याकारणाने तथा ती माध्यमे मोबाइलवर उपलब्ध नसल्याने सदैव हाताशी नसत, हा मुद्दा आहेच, परंतु तोसुद्धा पुन्हा तत्कालीन तांत्रिक मर्यादांचा भाग झाला.)
आणि, इतरांना भेटायला दुसऱ्यांकडे गेले, की ज्या (सास-बहू किंवा तत्सम) मालिकेला (किंवा 'महाभारत'पासून 'छायागीत'पर्यंत लोकप्रिय कार्यक्रमांना) कंटाळून बाहेर पडलो, तीच मालिका (किंवा कार्यक्रम) त्या घरातील संपूर्ण कुटुंब पाहताना आढळे, त्यामुळे तेथे गेल्यावरसुद्धा ते जबरदस्तीने पाहावे लागे. And then, where were you?
("समूहात असल्या"चा भास निर्माण न करण्याचा मुद्दा सहमत होण्यासारखा आहे, परंतु तो माझ्या मते दुय्यम आहे.)
३. ती स्मार्टफोनइतकी पोर्टेबल नव्हती.
पुन्हा, माझ्या घरच्या टीव्हीवर वाजणारी मालिका (किंवा माझ्या घरात वाजणारी 'विविध भारती' किंवा 'रेडियो सिलोन') हीच जर एकसमयावच्छेदेकरून तुमच्याही घरातल्या टीव्हीवरून (किंवा रेडियोवरून)सुद्धा जर वाजणार असेल, तर ती मी माझ्या घरी पाहिली/ऐकली काय, किंवा तुमच्या घरी येऊन पाहिली/ऐकली काय, की फर्क पैंदा? (The point is, irrespective of availability of choice or the lack thereof, if everybody is going to watch or listen to the same stuff, then, portability does not matter that much, does it now?)
एकतर्फी
आताची माध्यमेसुद्धा बव्हंशी एकतर्फीच नव्हेत काय? असा कितीसा तुम्ही स्वत:चा कंटेंट अपलोड करता? बव्हंशी जे काही सामोरे येते, ते फक्त कंझ्यूमच करता की!
एकतर्फीपेक्षा अधिक समर्पक कदाचित viewer-agnostic हा शब्द होईल. म्हणजे पूर्वीच्या प्रसारमाध्यमांना एखाद्या समूहाला काय आवडेल तो कंटेंट देणे इतकीच मर्यादा होती. आता समजा एखादं मूल यूट्यूब बघू लागलं, तर एक व्हिडिओ संपताना साधारण त्याच जातकुळीतील अजून ५-६ व्हिडिओ त्याच्यासाठी तयार असतात. ही शृंखला अनंत काळ चालू शकते.
त्यामुळे ते माध्यमही वापरकर्त्याशी अव्याहत interact करत असतं असं मी समजते.
ठीक
मुद्दा लक्षात आला.
आता अशी परिस्थिती आहे की
आता अशी परिस्थिती आहे की त्याला स्मार्टफोनमध्ये विशेष रसच राहिलेला नाही. हे कसे झाले? माझा मुलगा पाच वर्षाचा आहे आणि आमच्याकडे ह्यावरून रोज वाद होतात. आमचा अनुभव असा आहे कि कितीही वेळ दिला तरी तो कंटाळत नाही (३ तासापर्यंत देवून पाहील आहे. इतर गोष्टी होतात जसे की डोळे थकून झोप येते इ. ) कितीही वेळाने स्क्रीन बंद केला तरी थोड bargain आणि आरडाओरडा तो करतोच त्यामुळे सध्या १/२ तासाचा timer लावतो पण ते १ तासापर्यंत जात बरेचदा. इतर बर्याच गोष्टी त्याला आवडतात (पुस्तक वाचायलाही (म्हणजे आम्ही त्याच्यासाठी वाचतो), पण जितका जास्त वेळ तो एखाद्या दिवशी स्क्रीन बघण्यात घालवतो तितका जास्त वेळ तो इतर कोणतीही गोष्ट करू इच्छित नाही आणि अजून जास्त वेळ फोन हवा म्हणून वाद घालत राहतो.
हम्म
मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत:
१. मुलाला स्मार्टफोन वापरता आला पाहिजे नाही तर तो पुरेसा स्मार्ट म्हणवला जाणार नाही आणि तो मागे राहिल असे तुम्हाला वाटते का? म्हणजे स्मार्टफोन वापरता येणे हे अत्यावश्यक स्मार्ट स्किल आहे आणि ते लीलया हाताळणाऱ्या मुलाचे कौतुक वाटते?
२. तुम्ही कुठे राहता? भारतात की बाहेर?
३. तुमचा मुलगा स्मार्टफोन वर जास्त वेळ काय करतो? गेम खेळतो, रील्स पाहतो की युट्यूबवर असतो?
४. तुमच्या मुलाला 'तू मोठेपणी काय होणार' असे विचारले तर 'यूट्यूबर' वगैरे उत्तर मिळते का?
५. तुमचा एवरेज स्क्रीन टाइम किती आहे? फोन वरचा?
६. जेवताना तुम्ही सगळे टीव्ही पाहत जेवता का फोन पाहत जेवता का गप्पा मारत जेवता?
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
१. मुलाला स्मार्टफोन वापरता
१. मुलाला स्मार्टफोन वापरता आला पाहिजे नाही तर तो पुरेसा स्मार्ट म्हणवला जाणार नाही आणि तो मागे राहिल असे तुम्हाला वाटते का? म्हणजे स्मार्टफोन वापरता येणे हे अत्यावश्यक स्मार्ट स्किल आहे आणि ते लीलया हाताळणाऱ्या मुलाचे कौतुक वाटते?
नाही. नाही.
२. तुम्ही कुठे राहता? भारतात की बाहेर?
बाहेर्
३. तुमचा मुलगा स्मार्टफोन वर जास्त वेळ काय करतो? गेम खेळतो, रील्स पाहतो की युट्यूबवर असतो?
netflix (Octonauts, Ada Twist, Pororo, Pepa pig etc)
4. तुमच्या मुलाला 'तू मोठेपणी काय होणार' असे विचारले तर 'यूट्यूबर' वगैरे उत्तर मिळते का?
नाही. (त्याला 'यूट्यूबर' वगैरे माहीत नाही. तो डबल डेकर बस ड्रायवर पासून अंतराळवीर अस काहीही उत्तर देतो.)
५. तुमचा एवरेज स्क्रीन टाइम किती आहे? फोन वरचा?
१-२ तास (कधी कधी जास्त पण)
६. जेवताना तुम्ही सगळे टीव्ही पाहत जेवता का फोन पाहत जेवता का गप्पा मारत जेवता?
अस ठरलेल नाहीय. कधी गप्पा मारत कधी टीव्ही पाहत कसेही.
अता उत्तर दिलेली आहेत, ही उत्तर का हवी होती ते सांगाल का?
निरीक्षण
धन्यवाद. तुम्ही जी उत्तरे दिली आहेत त्यावरून सई केसकर यांनी दिलेला सल्ला apt आहे.
रेग्युलर कार्टून पाहण्यापुरता थोडा वापर ठीक आहे. पण तो अगदी वहावत गेला असे तरी वाटत नाही. काही मुले मी अक्षरश: वेड्यासारखी करताना पाहिली आहेत, त्या तुलनेत तुमचा मुलगा अजून सुपातच आहे. तुमच्या मुलाला व्हर्च्युअल विश्वातून बाहेर काढण्यासाठी स्विमिंग, कँपिंग, पक्षीनिरीक्षण, पशुपालन (काहीही, ससे, कासव, गिनीपिगे, उंदरे, मुंग्या), फिल्ममेकिंग, फोटोग्राफी, (जुन्या पद्धतीचे) लेगोबिल्डिंग किंवा तत्सम प्रकार, थोडक्यात जिथे फिजिकल एक्टिविटी आहे त्या गोष्टी वेळ आखून, क्लास लावून करायला लावा. त्यासाठी आधी स्वतः अशा एखाद्या गोष्टीला वेळ द्या.
नो डिवाइस झोन/टाइम : जेवणाचा टेबल अशा जागा नो डिव्हाइस झोन म्हणून डिक्लेअर करा. एक लक्षात घ्या, आयुषात खऱ्या इमर्जन्सी खूप कमी येतात. स्मार्टफोन वगैरे नसतानाही लोकांनी त्या हाताळल्या आहेत. त्यामुळे वरचे जग खाली जरी झाले तरी काही वेळा आणि काही जागा या नो डिव्हाइस झोन म्हणूनच ठेवायच्या.
सरकारी कार्यक्रम: नेफ्लिक्स पेक्षा जर कोणते सरकारी चॅनेल असेल मुलांसाठीचे तर ते बरे. नेटफ्लिक्स बंद करुन टाका. जर मुलगा कार्टूनच पाहणार असेल तर त्यातून त्याच्यावर वेगवेगळे दृश्य संस्कार तरी होऊ द्यात. उदा. जपानी अनिमे, फ्रेंच कर्टून्स इत्यादी.
बाकी काय, नाहीतर शेवटी आपण जे केले तेच ते करणार. बंड.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
.
अगदी खरे सांगू का? (१) मुलांना ‘तू मोठेपणी काय होणार’ असे विचारणे, आणि (२) मुलांच्या बाललीलांवरून ती मोठेपणी अमूकअमूक होतील, याबद्दल भाकिते करणे, या दोन्ही गोष्टींना काहीही अर्थ नसतो.
माझा मुलगा लहान असताना त्याच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी आम्ही एक तर केल्या नाहीत, किंवा वरकरणी केल्याच, तरी त्या गंभीरपणे घेतल्या नाहीत.
पहिली गोष्ट म्हणजे, माझ्या मुलाच्या लहानपणी त्याला ‘मोठा झाल्यावर तू कोण होणार’ असा प्रश्न जर विचारला असता, तर त्याचे उत्तर ‘कुत्रा!’ असे मिळाले नसतेच, याची मला आणि त्याच्या आईला दोघांनाही शाश्वती नव्हती. त्यामुळे, असा प्रश्न विचारण्याचे धाडस आम्हां दोघांनाही झाले नाही. (त्या वेळेस असे नक्की का वाटले, तेवढे मात्र आजमितीस निश्चित आठवत नाही. (पुष्कळ वर्षे झाली त्याला. आजमितीस माझा मुलगा, मला त्याच्याबद्दल काहीही वाटले, तरीही, तत्त्वतः ‘कायद्याने सज्ञान’ या सदरात जेमतेम का होईना, परंतु मोडतो.) परंतु, वाटले खरे!)
(Come to think of it, why should कुत्रा be frowned upon as a future career choice? म्हणजे, अमेरिकेत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाने (आणि, मुलानेच!१) मोठा झाल्यावर Presidentच व्हायची मनीषा बाळगली पाहिजे, ही अपेक्षा नक्की काय म्हणून असावी? वाटले एखाद्या मुलाला, की बाबा व्हावे आपण मोठेपणी कुत्रा म्हणून, तर नक्की काय बिघडते? आणि, लहानपणी वाटले, म्हणजे लगेच मोठेपणी होणारच आहे, असे थोडेच असते? (तसे असते, तर आजमितीस आम्ही इंजिनड्रायव्हर, पोष्टमन, नाहीतर तिकीटचेकर नसतो?) लहान मुलांना काय हवी ती स्वप्ने का नाही पाहू द्यायची? किंबहुना, आता विचार करता असे वाटते, की मोठेपणी कुत्रा व्हायला मलाही कदाचित आवडले असते. परंतु, नाही! आपल्या समाजाला — कोठल्याही समाजाला — काही गोष्टी कल्पनेतसुद्धा रुचत नाहीत, हेच खरे! चालायचेच.)
दुसरी गोष्ट म्हटली, तर मुलाच्या बाललीलांवरून मोठेपणी तो काय बनेल, याबद्दल भाकिते करणे. हा प्रकार आमच्या मुलाच्या बाबतीत आम्ही कधी केलाच नाही, असे प्रामाणिकपणे म्हणू शकणार नाही. परंतु, फारश्या गंभीरपणे केला नाही, हेही तितकेच खरे. तसेही, त्याच्या वेगवेगळ्या वेळच्या आणि वेगवेगळ्या phasesमधल्या उद्योगांवरून, हा मोठा झाल्यावर एक तर डॉक्टर२, नाहीतर न्हावी३, नाहीतर राजकारणी४, नाहीतर पेट्रोलपंपावरील अटेंडंट५, नाहीतर पोलीस६, यांच्यापैकी काहीतरी होईल, असे काहीबाही नि वेगवेगळ्या टोकांवरचे निष्कर्ष निघू लागल्यावर आम्ही तो नाद सोडला.
सारांश: सब फ़िज़ूल की बाते हैं। चालायचेच.
——————————
१ त्यातसुद्धा पुन्हा एक गंमत आहे. म्हणजे, अमेरिकेत जन्मलेल्या मुलांकडून जशी मोठेपणी President बनण्याची मनीषा बाळगण्याची अपेक्षा असते, तशी ती (अमेरिकेत जन्मलेल्या) मुलींकडून नसते, हा केवळ एक भाग झाला. मात्र, अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येक मुलाकडून अशी (मोठेपणी President बनण्याची मनीषा बाळगण्याची) अपेक्षा असतेच असते. परंतु, एकदा — एकदाच! — अमेरिकेत जन्मलेल्या एका बिगरपांढऱ्या (खरे तर निमपांढऱ्या) मुलाने मोठेपणी खरोखरच President बनून दाखवण्याचे धारिष्ट्य काय केलेनीत्, नि तेव्हापासून, चवताळलेल्या पांढऱ्यांनी कायकाय नाटके केलीनीत्, नि आजतागायत करीत आलेले आहेत, ते आम्ही याचि डोळां पाहिलेले आहे, पाहात आलेलो आहोत, नि पाहात आहोत. याहून अधिक काय बोलावे? (सारांश: सुखासुखी President बनू देत नाहीत. कुत्रा कसले बनू देताहेत? असो; हेही चालायचेच.)
२ लहानपणी तो ज्याच्यात्याच्या अंगावर चढून ‘तपाशीत’ असे, नि मग ‘इंजेक्शन’ ढोसून, आपण ‘रडल्या’वर मग एक ‘लॉलीपॉप’ नि मग (‘घरी’ जाताना) एक ‘स्टिकर’ देऊन बोळवण करीत असे, त्यावरून. (अनेकदा हे एपिसोड्स डॉक्टरांकडून घरी परत आल्यावर होत, परंतु कधीकधी असेच कधीतरीसुद्धा होत.)
३ त्याच काळात कधीतरी, लोकांच्या (शक्यतो बापाच्या) अंगावर चढून, त्यांचे केस कपभर पाण्याने चिप्प भिजवून, त्यानंतर मग हाताच्या बोटांनीच त्यांना ‘हेअरकट’ देण्याचा छंदसुद्धा जोपासला होतानीत्. ‘हेअरकट’बरोबरच, ‘शांपू’ हवा आहे काय, कोणत्या वासाचा ‘शांपू’ पाहिजे, सध्या आमच्याकडे अमूकअमूक ‘शांपू’वर ‘स्पेशल’ चालू आहे — ‘I recommend it!’ —असल्या पृच्छा तथा मखलाशीसुद्धा चालत असे, त्यावरून. (या एपिसोड्सना मात्र काळावेळेचे बंधन नसे.)
४ एका विशिष्ट phaseमध्ये, दिसतील ती नाणी, कोणताही मागचापुढचा विचार न करता, सरळ तोंडात टाकीत असे, त्यावरून.
५ त्या काळात मी ज्या कंपनीत काम करीत होतो, तेथे तेव्हासुद्धा वर्क फ्रॉम होम हा प्रकार आठवड्यातून एक दिवस चालत असे. तर असाच एके दिवशी घरी काम करीत बसलेलो असताना, हे चिरंजीव मागून आले, नि लॅपटॉपच्या भोकात चार्जरचे टोक घालून आम्हालाच वर ‘Filling gas!’ म्हणून शिकवू लागले, त्यावरून.
६ अनेकदा घरच्यांचे लक्ष चुकवून फोन उचलणे, नि त्यावर रँडम नंबर दाबून तो कॉल नेमका ‘९११’ (Emergency Services)ला लागला, की तेथल्या Despatcherशी आपल्या अगम्य बोलीतून लांबलचक संवाद साधणे, यावरून. हे एपिसोड्स अनेकदा होऊन गेलेले आहेत, तथा, फोन उंचावर असणे ही अडचण कधीच मानली जात नसे. खुर्चीवरून कट्ट्यावर चढण्याची कला महाराजांना अंमळ लवकर अवगत झाली होती. आणि, तसेही, ‘इच्छा असेल, तिथे मार्ग दिसेल’ म्हणतात, ते अजिबात खोटे नाही!
काही उपाय
हे अवांतर होत असेल तर संपादकांनी इतर कुठे हलवावे.
आमच्या अनुभवाप्रमाणे, मुलाला स्क्रीन द्यायचा नाही असं ठरवलं की आपणही त्याच्यासमोर स्क्रीन वापरायचा नाही हे त्यात गृहीत धरायला हवं. शिवाय मुलांसाठी म्हणून वेगळी उपकरणं विकतच घ्यायची नाहीत.
आमचा मुलगा रात्री साधारण ९;३० वाजता झोपतो. तोपर्यंत आम्ही दोघेही टीव्ही लावायचो नाही किंवा जास्त वेळ आमचे स्क्रीन बघायचो नाही. हे सहज शक्य झालं कारण आमच्या घरात सिरीयल बघणारे ज्येष्ठ नागरिक नेहमी असत नाहीत. याबाबतीत एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की लहान असताना आम्ही त्याला डे-केअरमध्ये ठेवायचो. तिथे त्याच्यावर अतिशय चांगले संस्कार झाले. त्याच्या खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या सवयी त्या डे-केअरमुळे लहान मुलांच्या जशा असाव्यात तशाच बरेच वर्षं राहिल्या. तो बराच लहान असताना (३ महिने) मी कामावर रुजू झाले आणि घरी त्याला सांभाळायला "घरचं" असं कुणीच उपलब्ध/तयार नव्हतं. वर्षभर त्याला आमच्या ओळखीतल्या एक काकू सांभाळायच्या. पण नंतर जवळपास ४ वर्षं तो पूर्णवेळ डे-केअरमध्ये असायचा. तिथे फोन वगैरे मिळण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय आपला फावला वेळ कसा घालवायचा याचं प्रशिक्षण त्याला तिथे मिळालं असं मला वाटतं. टीव्ही, मोबाईल बघायची सवय मुलांना घरच्यांमुळेच लागते. विशेषतः त्यांना सांभाळणारे ज्येष्ठ नागरिक सतत टीव्ही नाहीतर फोन बघत असतात असं एक निरीक्षण आहे. माझ्या आजूबाजूचे काही पालक मुलांना शिस्त लागावी म्हणून आधी आईवडिलांना शिस्त लावायला जातात. पण असली युद्धं करण्यापेक्षा मुलांना चांगल्या डे-केअरमध्ये घालावं. मुळात म्हाताऱ्या माणसांनी पूर्णवेळ मुलं संभाळावीत ही अपेक्षाच चूक आहे. त्यात inter-generational कलह फार तापदायक असतात. एक आई म्हणून मी माझ्या मुलासाठी जर काही path-breaking वगैरे केलं असेल तर ते आजोळ डे-केअर आहे असं मी म्हणेन. त्यामुळे "मुलाला पाळणाघरात ठेवणारी दुष्ट आई" असण्याचा मला अभिमान आहे.
याव्यतिरिक्त घरी असताना आम्ही काही गोष्टी पाळल्या. मुलगा कटकट करतो म्हणून त्याला स्क्रीन दिला नाही. त्याची किरकिर थांबवायचे इतर मार्ग (गोष्ट वाचून दाखवणे, त्याला बाहेर घेऊन जाणे, पाण्यात खेळायला देणे, पसारे करू देणे इ.) त्याला निवडू दिले. सुदैवानं थोडा मोठा झाल्यावर त्याला आमच्या सोसायटीतल्या लहान मुलांचा एक गट मिळाला. त्यामुळे आता तो शाळेतून आला की संध्याकाळचे तीनेक तास घराबाहेर असतो. या वेळात मुख्यतः ते सगळे फुटबॉल खेळतात किंवा सायकली चालवतात. संध्याकाळचा वेळ घराबाहेर जावा यासाठी पोहण्याचे क्लास लावणे, फुटबॉल क्लबला घालणे, सुटीच्या दिवशी टेकडीवर/पर्वतीवर जाणे इत्यादी इत्यादी मार्ग आम्ही निवडले. पण हे सगळं आपसूक झालं. त्यानं फोन बघू नये म्हणून आम्ही हे केलं असं वाटत नाही. घरात असताना तो अधिकांश वेळ लेगोची घरं नाहीतर गाड्या तयार करण्यात घालवतो. हल्ली थोडं थोडं स्वतंत्र वाचन करू लागला आहे.
कोव्हिडोत्तर काळात सुरुवातीला त्याला कुठलातरी एक गेम खेळायची सवय लागली होती. तेव्हा तो सगळ्यांच्या मोबाईलवर तो गेम डाउनलोड करून ठेवायचा आणि मिळेल त्याचा फोन घेऊन खेळायचा. त्या काळात मात्र, आजकाल निषिद्ध मानलं जाणारं 'टफ पेरेंटिंग' आम्ही अवलंबलं होतं. त्यासाठी मी माझ्या फोनवापरातही खूप बदल केले होते. ते सगळं इथे खूप अवांतर होईल. पण मुलानं फोन मागितला की आम्ही, "सॉरी. फोन मिळणार नाही" असं शांतपणे सांगायचो. मग तो कंटाळून दुसरं काही करू लागायचा. आता तो तेव्हा किती हट्ट करायचा याचे तपशील मला आठवत नाहीत, म्हणजे तोही फार हट्ट करत नसावा. पण या काळात आम्ही एक मध्यममार्ग काढला तो म्हणजे त्याच्या आवडीचे कार्टून/यूट्यूब त्याला मोठ्या टीव्हीवर ३० मिनिटांपर्यंत बघू द्यायचे. तो अजूनही अधूनमधून ही सुविधा वापरतो.
अर्थात हे सगळे उपाय सगळ्याच मुलांना मानवातील असं नाही. काही मुलं मुळातच बाहेर उनाडक्या करण्यात रमणारी असतात. आमचं पोर त्यातलं असल्यानं सोपं झालं असावं.
हा प्रतिसाद आवडला आहे.
हा प्रतिसाद आवडला आहे.
…
संपादकांच्या (किंवा इतर काही सदस्यांच्या (ahem!)) सहनशीलतेबद्दल मला खात्री नाही, परंतु, अवांतराचे (किंवा अति- किंवा परम- अवांतराचेसुद्धा) निदान मला तरी वावडे नाही. (Which, of course, is overstating the obvious.) त्यामुळे, बिनधास्त चालू द्या.
(तसेही, हे तितकेही अवांतर नाही.)
"मुलाला पाळणाघरात ठेवणारी दुष्ट आई" असले काहीही नसते. पारंपरिक संस्कृतिसंरक्षक हिंदू थेरडेशाहीने आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी उठविलेली ती एक परमहलकट कंडी आहे. पाळणाघर ही एक काळाची गरज आहे, तथा त्यात काहीही गैर नाही. (किंबहुना, पाळणाघरात मुलाचा इतर चार घरांतल्या इतर चार मुलांशी संपर्क येतो, जो घरात तितकासा येऊ शकतोच, असे नाही, हा पाळणाघरांचा (असलाच, तर) फायदाच आहे. आणि, अर्थातच, कोठल्याही मुलाला सुरुवातीसुरुवातीला पाळणाघरात, आईपासून दूर वगैरे राहायला आवडत नाही. Separation anxiety वगैरे भानगडी असतात. ते नैसर्गिक आहे. परंतु, that is absolutely no reason not to put a child into a daycare! किंबहुना, separation anxiety हा प्रकार तात्कालिक असतो. कितीही झाले, तरी आई (किंवा बाप) संध्याकाळी आपल्याला घरी परत न्यायला येतोय/येतेय, हे मुलाला एकदा लक्षात आले, की मुले आपोआप शांत होतात. आणि तसेही, separation anxiety is something to be overcome, not something to be cajoled, pampered or encouraged.)
आणि, पारंपरिक हिंदू संस्कृतिसंरक्षक थेरडेशाहीबद्दल म्हणाल, तर ते कशालाही विरोध करतात. अगदी बाहेरून पोळीभाजी विकत आणण्यापासून कशालाही. (म्हणे परंपरेचा ऱ्हास होतो, नि संस्कृती बुडते, नि काहीबाही. हिंदू संस्कृती पोहायला का शिकत नाही, ही एक अनाकलनीय गोष्ट आहे. असो.) त्याला अजिबात भाव द्यायचा नसतो. (किंबहुना, पारंपरिक हिंदू संस्कृतिसंरक्षक थेरडेशाहीला जितका भाव द्याल, तितकी ती सोकावत जाते, नि ते अंतिमतः आपल्या (म्हणजे हिंदूंच्याच!) ऱ्हासाचे ठरते.)
(असो. याइतके अवांतर तुम्ही तरी करू शकाल काय? नसल्यास, तुमच्या इवल्याश्या अवांतराची फिकीर अजिबात करू नका!)
(वैधानिक इशारा: मी याहूनही अधिक अवांतर येथे करू शकतो, परंतु तूर्तास आवरते घेतो.)
(बाकी, मुलांना मोबाइल देणे-न देणे, कोठल्या वयात देणे, याबद्दल माझी वैयक्तिक मते काहीही जरी असली, तरीही, तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत काय करावे, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न नि अधिकार आहे. (माझे वैयक्तिक मत, it is not necessarily as harmful as it is made out to be, इतक्यापुरतेच मर्यादित आहे. आणि, अर्थातच, YMMV. त्यामुळे, my opinion is in no way a recommendation, but merely something to be taken or discarded for whatever it is worth. असो.))
धन्यवाद. गेल्या दोन वर्षात
धन्यवाद. गेल्या दोन वर्षात आम्ही सारखी ठिकाण बदलली. सध्या त्याला घरी असताना कोणी मित्र नाहीत (खरतर त्याची शाळा आणि आमच काम संपल्यावर तुम्ही लिहीलेल्या बर्याच गोष्टी आम्हीही करतो पण बहुतेक तिघेच (आणि हिवाळ्यात घरातच) सगळा वेळ घालवतोय). हे सगळ तो त्यापूर्वी ज्या वातावरणात राहीला (घरात आजी आजोबा, शेजारचे मित्र आणि बरेचदा इतर चुलत भावंड) त्याच्या जवळपास उलट आहे. खरतर तेव्हा हा प्रश्न फार नव्हता कारण जास्त मोकळा वेळच असायचा नाही. आणि आता अचानक मग तुम्ही म्हणता तसे 'टफ पेरेंटिंग' करायला लागतय ( timer लावून फोन देणे). खरतर माझे आई वडील खूप controlling आहेत आणि मी (उगीचच) अस ठरवलेल की आपण मुलाला काही कधीच control करायच नाही. मग यातून खूप घोळ झाले आणि मी आधी लिहिल्याप्रमाणे बघू त्याच त्याला ठरवू दे , त्यानी मग कितीवेळ आपल्याशीच खेळायच म्हणून देवून पाहील. पण नाही तो कंटाळत नाही ,मग इतर प्रश्न आणि इतर guilt. तुमच्याशी मी पूर्ण सहमत आहे- लहान वयात केलेला स्मार्टफोनचा वापर नक्कीच जास्त नुकसान करणारा आहे अशी मला खात्री वाटते. इथले इतर प्रतिसाद वाचून परत वाटल त्याला फोन चा पिट्टा पाडू द्यावा का, (आणि आपण पाहीजे तेवढा फोन वापरायचा आणि त्याला द्यायचा नाही हा दुटप्पी पणा नव्हे का हे पण वाटून) पण त्याएवजी तुमचे पर्याय जास्त बरे वाटतात. बहूतेक काही प्रमाणात control करण गरजेचच असाव. ही भितीपण आहेच तो हे timer वगेरे किती दिवस चालवून घेईल.
हे पहा
https://www.youtube.com/watch?v=XT_6Lvkhxvo
टफ पेरेंटिंग कसे करावे आणि नंतर damage कंट्रोल कसे करावे याचा अतिशय उत्तम podcast
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
फरक
पहिले तंत्र ज्ञान माणसासाठी होते माणूस च त्या मध्ये श्रेष्ठ होता तंत्र ,यंत्र श्रेष्ठ नव्हती.
आता माणसासाठी तंत्र ज्ञान नाही.
तर यंत्र ,तंत्र माणसाला गुलाम बनवत आहे
यंत्र चे तंत्र माणसावर हवी झालेले आहे.
आता माणूस गुलाम आहे तो श्रेष्ठ नाही यंत्र आणि तंत्रा समोर.
.
माणूस गुलाम आहे, तो यंत्रतंत्राचा नव्हे, माणसाचा.
प्रवाह बरोबर माणूस वाहत जात आहे
प्रवाह इतका तीव्र आहे की विरोध करताच येत नाही वाहत च जावं लागते.
टीव्ही मुळे लोकांना मनोरंजन च साधन मिळाले हे सुरवातीला तेव्हा कार्यक्रम पण सर्व कुटुंब एकत्र बघतील असेच होते.
नावीन्य शोधण्याच्या नादात विवाह बाह्य संबंध, तीव्र हिंसा, असे कार्यक्रम आले आता ott वर तर.
हिंसा,सेक्स ह्या शिवाय काही नाही.
एकत्र कुटुंब कार्यक्रम बघूच शकत नाही.
इंटरनेट मुळे लोकांचा संवाद संपला.
इन मीन तीन व्यक्ती न च्या कुटुंबात पण संवाद राहिला नाही.
आई वेगळी समाज माध्यमावर,वडील वेगळे आणि मुलगा किंवा मुलगी वेगळे समाज मध्यामवर.
असे चित्र असते डायनिंग टेबल वर.
आभासी जगात लोकांना गुंतवले जात आहे.70 वर्षाचा म्हात्र्याला नवतरूनी न चे डान्स,फोटो, घायाळ करत आहेत.
आभासी संवाद होण्याचा मार्ग पण खुणवत आहे.
खऱ्या मित्र्यांपेक्षा fb वर जास्त मित्र आहेत .
संवाद कमी त्या मुळे आपुलकी कमी,प्रेम कमी, जिव्हाळा कमी ,ओढ कमी.
माणूस एकटा पडला आहे .
संपत्ती आहे,धन आहे पण साथ नाही.
Depression. चे प्रमाण मी नक्की सांगतो ह्या दशकात खूप मोठ्या प्रमाणात जगभर वाढलेले आहे.
जे तंत्र ज्ञान मानवी हिताचेच नाही त्याची निर्मिती केली जाते ती फक्त आणि फक्त व्यावसायिक फायद्यासाठी .
आता कुठे तरी थांबणे गरजेचे आहे.
आज काल मुल रस्तावर उभ राहून बघा.
ओव्हर weight आहेत,त्यांना कष्टाची सवय नाही.
खेळण्या कडे कमी कल आहे.
.शारीरिक बाबतीत कमजोर होत आहे.
शरीर कमजोर तर मन सुद्धा कमजोर.
एकूणच मानवी समाजावर आता विपरीत परिणाम दिसू लागले आहेत.
टीव्ही,vcr,कॉम्प्युटर,गाड्या,इंटरनेट ,fb,you tube, cable tv, आले लोकांनी स्वागत केले लोकांना भीती वाटली नाही उलट उस्ताह होता.
आरोग्य विभागात पण.
सोनोग्राफी,ecg,monography,x ray आले लोकांनी स्वागत केले .
पण आता नवीन तंत्र ज्ञान ची भीती वाटते ..
काय नवीन तंत्र येईल आणि आपलेच अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती वाटते.
रोबोट ची भीती वाटतं आहे.
कृत्रिम यांत्रिक बुध्दी मत्तेची भीती वाटत आहे.
ऑटोमेशन ची भीती वाटतं आहे.
जीन्स मध्ये बदल करणाऱ्या तंत्र ची भीती वाटतं आहे.
प्रदूषणाची भीती वाटत आहे.
पोष्टिक, आहार दुर्मिळ होत चालला आहे.
झुंडशाही वाढत आहे ती पण तंत्र ज्ञान ची मदत घेवून.
ज्याची गरज आहे त्या बाबत काहीच नवीन शोध नाहीत.
वृद्धांची काळजी घेण्यासाठी मनुष्य बल उपलब्ध नाही.
त्या साठी आधुनिक यंत्र च उपलब्ध नाहीत.
वृद्धांची मानसिक गरज सांभाळण्यासाठी नवीन तंत्र उपलब्ध नाही.
सत्व युक्त, पोश्टिक आहार .मिळावा म्हणून बी ,बियाणांचा शोध नाही.
हवेतील प्रदूषित घटक नष्ट करण्याचे तंत्र च विकसित केले गेले नाही.
काय आणि किती सांगावे.
...
दोष तंत्रज्ञानाचा नाही. तंत्रज्ञान हे neutral असते; चांगले किंवा वाईट दोन्हींकरिता वापरता येते.
दोष आहे, तो आपल्या स्वार्थानुसार तंत्रज्ञान gear करून ते बाजारात आणणाऱ्यांचा.
तुम्हीच म्हटल्याप्रमाणे,
तंत्रज्ञान आपोआप विकसित होत नाही. ते विकसित करावे लागते. विकसित केले, त्यावर पुरेसे प्रयत्न, पैसा, आणि वेळ खर्च केला, तर तुम्ही म्हणता तसे तंत्रज्ञान विकसित करता येणे अशक्य नाही.
परंतु, ते होत नाही. का? तर तसे करण्याकरिता जी संसाधने लागतात, ती ज्यांच्याजवळ आहेत, त्यांना ती त्याकरिता राबविण्यात रस नाही. का? तर स्वार्थ. Vested interests. यातून मला परतावा काय मिळेल?
दोष तंत्रज्ञानाचा नाही, अंतिमत: माणसाचाच आहे.
प्रकाटाआ
प्रतिसाद योग्य जागी हलविला आहे.
टायटल
मी फक्त टायटल वाचून लेख ना वाचताच प्रतिसादांना प्रतिसाद दिले. प्रतिसाद चांगले आहेत.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
बाप रे, एवढे प्रतिसाद!
माझ्या लेखनावर एवढे प्रतिसाद येतील अशी अपेक्षा नव्हती. आणि ते खरं आहे. प्रतिसाद वाचून खात्री पटली, विषय 'ऐसी'च्या वाचकांना महत्त्वाचा वाटतो. सदर विषयाबद्दल लेखन मागवणारा लोकसत्ता-संपादक पंकज भोसले वाचकांची नाडी ओळखून असणार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पुरवणी
पंकज म्हणे, "लोकसत्ता-पुरवणी-संपादक म्हण." लोकसत्ता-संपादक निराळे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छापील माध्यमांत मर्यादा असते.
छापील माध्यमांत मर्यादा असते.
शिवाय कुणीही कितीही चांगला लेख पाठवला तरी तो उचलून तसाच तेवढा सगळा छापतील यांची शाश्वती नसते. तसेच अर्ध पाव पान हे सुद्धा.
पूर्वी माणूस अनोळखी गर्दीत एकटाच असतो असं म्हणत. आता ओळखीच्या गर्दीतही एकटाच असतो. कुणाशी तरी मोबाईलवर संपर्कात असतो पण आजुबाजूच्या मित्र, नातेवाईकांशी दोन चार वाक्य बोलून परत मोबाइलच्या स्क्रीनमध्ये डोकं खुपसतो.
असे म्हणतात आणि आरोप पण ऐकले
असे म्हणतात आणि आरोप पण ऐकले आहेत.
समाज माध्यमाचा वापर देशांची सरकार पाडण्या पासून सरकार निवडण्यात करण्यात येत आहे.
अजेंडा चालवून समाजात फूट पण पाडली जाते.अर्थ व्यवस्थेचे गुलाबी चित्र पण निर्माण केले जाते.
आणि कट कारस्थान साठी च सर्वात जास्त ही माध्यम वापरली जातात.
त्यांचे positive उपयोग हा रॉ प्रॉडक्ट आहे..
मुख्य उत्पादन वेगळेच आहे ही माध्यम फ्री असण्याचे हे महत्वाचे कारण आहे.
लोकांची गुप्त माहिती .
अगदीं नाव,पत्ता,कौटुंबिक स्थिती.दिवसात कुठे कुठे भेट व्यक्ती देत आहे,कुठे जास्त वेळ घेत आहे .
त्या वरून सवयी,आर्थिक स्थिती,व्यसनी पना सहज माहीत पडतो.
एफबी ,insta सारख्या माध्यम मुळे लोकांचे विचार,त्यांची वैचारिक क्षमता,त्यांची कमजोरी सर्व काही माहीत पडते.
सर्व डेटा एकत्र उपलब्ध होतो.
त्याचे विश्लेषण करून त्या भागातील जनतेला कसे handle केले पाहिजे ह्याची रूपरेषा सहज उपलब्ध होते.
हवं तसे समाज मन निर्माण करता येते.
हा सर्वात मोठा तोटा आहे.
कुठे तरी मर्यादा असायलाच हवी.
सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांना लोकांची माहिती साठवून ठेवण्यासाठी सक्त मनाई असलीच पाहिजे.
पण शासन जेव्हा अशी मर्यादा घालेल तेव्हा ह्या सर्व सेवा स शुल्क होतील फुकट नक्कीच मिळणार नाहीत.
पण फुकट नकोच आहेत.
फुकटच्या गोष्टीत तोटा खूप असतो,दर्जा झीरो असतो
मुलाना मोबाईल पासून लांब ठेवण्याचा योग्य मार्ग
मुलांनी मोबाईल वापरल्या मुळे काही negetive गोष्टी घडतात , positive गोष्टी पण घडतात.
निगेटिव्ह मध्ये.
नको ते कंटेंट मुलांच्या पाहण्यात येतात ते मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करतात
मैदानी खेळ, निसर्गाची ओढ, बक्ती activity मध्ये त्यांचा सहभाग कमी होतो.
वाढत्या वयात शाळे बरोबर.
Swimming चे नियमित class मुलाना लावता येतील त्याचा काही वेळ पण जाईल आणि physical फिटनेस पण राहील.
मैदानी खेळ पैकी एकष्या खेळात त्याने सहभाग घ्यावा ह्या साठी त्याची आवड निर्माण करणे.
कोणत्या ही कला,स्किल प्राप्त करण्याचे class लावणे.
इतके सर्व केल्यावर एक तर त्याचे शरीर उत्तम राहील आणि स्क्रीन कडे बघायला त्याला वेळ पण मिळणार नाही ना त्याला टाईम पास साठी त्याची गरज लागेल.
सकाळी पाच ल उठवून एक तास जॉगिंग ,gym ल पाठवा.
ह्या सवयी लहान पना पासून असल्या की मन पण सशक्त च राहते.
मोबाईलचा वापर म्हटला तर माझाच
मोबाईलचा वापर म्हटला तर माझाच वापर भयानक वाढला आहे.
यात वाटसप आणि फेसबुक अजिबात नाही. मग काय पाहतो? तर काही अडचणींची उत्तरे शोधण्यात वेळ जातो. अडचणी सुद्धा मोबाइल वापरण्यातूनच आल्या आहेत. डिजिटल पुस्तके वाचणे वाढले. पायरेटेड साईटसमधून पुस्तके मिळू लागली. छोट्या स्क्रीनवर कशी वाचायची तर pdf fileघ्यायची नाही हे कळले. Epub फाईल आरामात स्क्रीनवर सेट होते. पण काही पुस्तके इपब मिळत नाहीत मग ती ईपब करायची खटपट. तेव्हा कळले की सर्वच pdf file epub करता येत नाहीत. तर ही शोधाशोध करायला वेळ गेला. अशा बऱ्याच गोष्टी वेळ खातात.
पर्यटनाला जायचे तर जागा ठरवण्यासाठी विडिओ पाहावे लागतात. मग जागा ठरल्यावर त्या जागेचे आणखी विडिओ पाहून 'कुठे जायचे नाही ' किंवा 'कुठे नाही गेलो तरी चालेल' हे शोधण्यात बराच वेळ जातो.
भाषा शिकण्यासाठी बरेच फुकट पर्याय आहेत. त्यातून शिकायचे तर विडिओ डाउनलोड करून परत परत पाहाणे. किंवा त्यांची audio फाईल मिळवणे. यातही वापर वाढलाच.
?
यात नक्की अडचण (आणि/किंवा वाईट) काय आहे?
अडचण किंवा वाईट काहीच नाही.
अडचण किंवा वाईट काहीच नाही. वापर कसा वाढत जातो याचं एक उदाहरण.
पण जेव्हा दुसरा कुणी आपल्याला हे करताना पाहतो तेव्हा (आणि तो असा काही एवढा गुंतलेला नसेल तर) त्याला वाटते की हा सदानकदा मोबदल्यात तोंड खुपसून असतो. एखाद्या जाणत्या मनुष्याची ही परिस्थिती असेल तर लहान मुलांचे काय होतं असेल.
प्रत्येकाची खेळणी वेगळी. त्यांच्या ऐपती प्रमाणे वापरतो. अगदी साधी कारसुद्धा न घेणाऱ्या आम्हाला टेस्ला साईबरट्रकमध्ये काय आहे हे पाहण्याचा मोह आवरता येत नाही. https://youtu.be/J40iAd46LEk?feature=shared