पसायदान? छे! "वसा महान" / मनुष्य-“पण"
पसायदान? छे! अस्तित्वशून्य अज्ञाताकडे भीक मागायचे दिवस कधीच गेले!
आता वसू या "वसा महान" / उचलू या "मनुष्य-पण"
("जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनि किंवा पुरून टाका" या "तुतारी"ने प्रेरीत … )
*
History & science have taught us to respect nature: the great teacher
It’s time we stopped praying & begging; let’s start building our own future!
*
आता विश्वज्ञे मानवें
येणें चिंतना परिसावे
परिसोनि मनीं घ्यावे
मानवी ‘वाण’ हे ॥१॥
जीवोत्क्रांत योनी कैक
परि वसुधैव कुटुंब एक
भूतां परस्परें पूरक
मैत्र जीवांचे ॥२॥
जे खळांची कुकर्मे मोडूं
तयां पापियां सहस्र दंडू
पीडितां भरपाई ओसंडू
न्यायाधिकारें ॥३॥
दुरितांचे तिमिर जाळूं
त्यां ज्ञानारोग्ये उजळूं
प्रगती-संधी-समता पाळूं
सर्वसहकारें ॥४॥
अज्ञान-दारिद्र्य लांच्छन
विझो धर्ममार्तंड तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन
सोयरे होवूं ॥५॥
कल्पकता चपळ वारू
तारिजे अज्ञानसागरु
विज्ञानाविष्कारे उभारुं
कल्पतरू लोकीं ॥६॥
आरोग्य वैद्यकाचे फळ
संपन्न पराकोटीचे बळ
सुयत्ने प्रगत करू सकळ
प्राणिजात ॥७॥
किंबहुना सर्व सुखी होवूं
विश्वा मनोधैर्यसूर्य दावूं
जो जे वांछील तो ते पावो
सु-स्वप्रयत्नें ॥८॥
येथ म्हणें विज्ञानानंद
निर्णयस्वामी स्वच्छंद
‘उचलूं, घेण्या जीवनानंद
मनुष्य-'पण' हा!’ ॥९॥
*
स्वामी विज्ञानानंद
विज्ञानदास = [तोचि] विज्ञानेश्वर
प्रतिक्रिया
.
ज्ञानेश्वरांच्या 'पसायदाना'ची (त्या गज़लवाल्यांच्या भाषेत बोलायचे, तर) 'ज़मीन उचलून' त्यावर आपली रचना उभारण्याचा प्रयत्न आहे. ते ठीकच आहे म्हणा (शेवटी खुद्द ज्ञानेश्वरांनीसुद्धा 'भावार्थदीपिका' लिहिताना साक्षात भगवान श्रीकृष्णांची ज़मीन उचलली होतीच.); मात्र, येथे हे लक्षात घेतले पाहिजे, की ज्ञानेश्वरांनी आपले (वरिजनल) 'पसायदान' लिहिण्याअगोदर आख्खी 'भावार्थदीपिका' - तुमच्याआमच्याकरिता 'ज्ञानेश्वरी' - (दुसऱ्याच्या सातबारावर का होईना, परंतु) रचली होती, आणि तिच्या अनुषंगाने तिच्या मागे 'पसायदाना'चे हे केवळ शेपूट जोडून दिले होते. ('पसायदाना'चे महत्त्व हे 'भावार्थदीपिके'च्या - तिच्यावर घेतलेल्या मेहनतीच्या - प्रकाशात आहे; अन्यथा, 'ज्ञानेश्वरी'शिवाय नुसतेच 'पसायदान' म्हणजे (चार्ल्सोपंत लुटविजरावजी डॉजसन उर्फ ल्यूइसदादा कॅरॉलांच्या भाषेत वर्णायचे, तर) grin without a cat आहे.)
प्रस्तुत रचनेच्या संदर्भात असे काही म्हणता येण्यासारखे आहे काय? अन्यथा, त्या मूळ 'पसायदाना'ची विनाकारण मोडतोड करून तिच्या सुट्या भागांतून केलेला काही स्वस्त जुगाड़, याव्यतिरिक्त या रचनेस फारसे महत्त्व उरत नाही. (गडकऱ्यांच्या 'कवींच्या कारखान्या'मधील 'ऐशी काव्ये कराया इकडून तिकडून आणलेली बुध्दी दे चक्रपाणी|' या पंक्तीचीसुद्धा आठवण आल्याखेरीज राहत नाही.) असो.
(थोडक्यात, 'ज्ञानेश्वरी' दाखवा, नाहीतर...)
पण…..
लेखामागची भूमिका (आणि काही प्रमाणात अभिनिवेशही) मान्य, पण पसायदानावरची plastic surgery बीभत्स झाली आहे.
पसायदान हे तेराव्या शतकात रचलेले साहित्य आहे, आजच्या काळाशी सुसंगत जाहीरनामा नव्हे. काव्य म्हणून ते विलक्षण सुंदर आहे. त्यातील प्रज्ञा, करुणा आणि शब्दकळा ही मराठीची आणि भारतीय जीवनदृष्टीची भूषणे आहेत. एकच उदाहरण : ‘खळांची ‘‘व्यंकटी” तेवढी सांडून, त्यांची सत्कर्मी रती वाढो’ हा विचार खळांच्या केवळ निर्दालनापेक्षा कितीतरी परिपक्व माणुसकी दाखवतो! थेट बुद्ध, ख्रिस्त आणि गांधींच्या जातकुळीतला.
२१ व्या शतकाचे विवेकवादी विश्वकाव्य जरूर लिहावे, पण त्यासाठी पसायदान vandalise कशाला करावे?
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!