चक्रव्यूहात अडकलेले प्रकाश झा
मी सिनेमाच्या हाताळणीऐवजी त्यातील कथानक/ माहिती या सामग्रीवर लिहीत आहे. त्या अर्थाने ही चित्रपटाची समीक्षा नसावी.
प्रकाश झा यांनी काही चांगले चित्रपट अलीकडे दिलेले आहेत. मला आवडलेले म्हणजे अपहरण, गंगाजल. व्यवस्थेचे बर्यापैकी ज्ञान त्यात दिसले होते. पोलीस इन्स्पेक्टर रँकच्या अधिकार्यांना आयजी रँकचे गणवेश चढवणार्या आणि पोलीस कमिशनर या पदाच्या अधिकार्यांना हास्यास्पद पद्धतीने रंगवणार्या हिंदी सिनेसृष्टीकडून फारशा अपेक्षा कधीच नव्हत्या. काही अपवाद आहेत, त्यात झा आहेत असे वाटत असतानाच हा चक्रव्यूह नावाचा वैचारीक गोंधळ बघण्यात आला. झांकडून असलेल्या अपेक्षा आणि चित्रपटाचा विषय संवेदनशील, आणि माझ्या जिव्हाळ्याचा. म्हणून दखलपात्र. लिहावेसे वाटले.
नक्षल प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांच्या नातेसंबंधांचा वेध/ वेगवेगळ्या दिशांनी नेणार्या विचारांचे वादळ असे काहीतरी दाखवायचे असेल, त्यातील नाट्य रंगवायचे असेल - असे असू शकते. तसेही या सिनेमात ठीक दिसत नाही. नक्षल प्रश्नच साकल्याने दाखवायचा असेल - तर तसेही ठीक दिसून येत नाही. थोडे विस्तारानेच सांगतो. ही दखल अशासाठी, की या असल्या सादरीकरणातून लोकांचे नक्षलवादाविषयी, या समस्येविषयी गैरसमज वाढण्याची शक्यता अधिक. या विषयावर भरपूर साहित्य उपलब्ध आहे असेही नाही, आणि वारंवार अशा विषयावर चित्रपट/ नाटक निघणेही कमी संभव. त्यामुळे सिनेमातील तृटींचे विवरण आणि सादरीकरणातून दाखवल्या गेलेल्या काही मिसलिडींग गोष्टींवर उजेड टाकणे आवश्यक आहे.
कथानक थोडक्यात असे - "नंदीघाट" नावाच्या "मध्य भारत" राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये प्रोफेसर गोविन्द (आणि अन्य अनेक नावांनी वावरणारा) (ओम पुरी) हा नक्षल आयडॉलोग कार्यरत असतो. कॉम्रेड राजन (मनोज वाजपेयी) आणि त्याचे नक्षल दलम आपल्या ट्रेनिंग सेंटरसहित या भागात आपले अस्तित्व दाखवत रहात असतात. महान्ता ग्रुपला आपला स्टील प्लँट या जिल्ह्यात सुरु करायचा असतो. परंतु नक्षलांच्या वाढत्या वर्चस्वामुळे तिथे काहीच हालचाल करणे सरकारला आणि महान्ता ग्रुपला शक्य होत नसते. नक्षलांचा पाडाव करण्यासाठी सिनियर एस्पी आदिल खान (अर्जुन रामपाल) या डेकोरेटेड आयपीएस अधिकार्याची तिथे बदली होते - तोच पोस्टिंग मागून घेतो. त्या भागात जाऊन खेडोपाडी जाऊन लोकांशी संपर्क साधू लागतो. स्थानिक उद्योजक, कंत्राटदारांना समजावतो आणि नक्षलांना खंडणी देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो. पण पुरेशा गुप्तचर यंत्रणेअभावी त्याला फारसे यश मिळत नाही. त्याचा कॉलेजमधील मित्र कबीर (अभय देओल) त्याला या दरम्यान भेटतो. हा धाडसी असतो, लहरी असतो, आणि अन्यायाची चीड असणारा आणि त्याविरोधात कुठल्याही टोकाला जाणारा असा विक्षिप्त मनुष्य असतो. तो आदिलला ऑफर देतो की नक्षल कॅडर बनून, त्यांच्यात मिसळून तो आदिलला सर्व गुप्त माहिती पुरवील आणि नक्षलांना संपवील. त्याप्रमाणे घडत जाते, आणि आदिलला यश मिळत जाते. मार्ग मोकळा झाल्याने महान्ता ग्रुप आपला प्लँट नंदीघाटला सुरु करण्यासाठी हालचाल सुरु करतो. प्रोजेक्टसाठी संपादित केलेली गावे मोकळी करुन देण्याची, आणि त्याबदल्यात पैसे देण्याची ऑफर महान्ता एस्पीला करतो. एस्पी त्याला नकार देतो. महान्ता स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरुन जबरदस्तीने गावे जमीनदोस्त करतो. एस्पी यात गुंतलेल्या गुंडांना अटक करतो. गृहमंत्री, डीजीपी त्याच्यावर दबाव आणतात आणि लँड अॅक्वीझिशनचे काम पाहण्यासाठी अन्य पोलीस अधिकार्याची नेमणूक करतात. दरम्यान सरकारची ही जबरदस्ती पाहून आणि गरीब आदिवासींचे हाल पाहून द्रवलेला कबीर आपली भूमीका बदलतो, आणि खराच नक्षल बनतो. शेवटी एका एन्काउंटरमध्ये आपला मित्र आदिल आणि मैत्रीण रिया (आदिलची पत्नी आणि सहकारी पोलीस अधिकारी) यांच्याकडून मारला जातो.
घोर अज्ञानाने भरलेली ही काल्पनिक कथा सांगून झा महाशय सिनेमाच्या शेवटी आपल्याला सांगतात की या नक्षलवादाच्या चक्रव्यूहातून आपण कसे सुटणार? मोजके शंभर परिवार देशातील २५% संपत्ती बाळगून आहेत, आणि ७५% लोकसंख्या दिवसाला २० रुपयांत गुजराण करतेय, इत्यादि.
***********
कसल्यातरी घाईघाईत सिनेमा बनवला आहे असे सतत वाटत राहते. कोणत्याही गोष्टीचा साकल्याने विचार केला आहे असे कुठेच दिसत नाही.
१. राज्याचे राजकारण, सरकार चालवत असलेल्या लोकांची कंपल्शन्स कुठे दिसत नाहीत. कॉर्पोरेटची भूमीका नाही. सरकार आणि कार्पोरेटचे संबंध म्हणजे कॉर्पोरेट सरकारला (पार्टीला) पैसा देणार, आणि त्याबदल्यात सरकार कार्पोरेटला पोलीस पुरवणार असे सरळधोपट आणि दिशाभूल करणारे अतिसुलभीकरण.
२. राजकीय विरोधकांचा पत्ताच नाही. कार्पोरेट विरोधकांचाही पत्ता नाही.
३. केंद्र सरकार, राज्य सरकार यांतील संबंधांचा उल्लेखही नाही. केंद्र सरकार पूर्ण गैरहजर. वास्तवात युद्ध पेटले आहे ते केंद्र सरकार आणि नक्षल यांच्यात. राज्य सरकारे केंद्र सरकारला धरुन काय ते झगडत आहेत. राज्ये यासाठी सर्वस्वी केंद्रावर अवलंबून आहेत. पैसा, माणूसबळ, सगळ्याच बाबतींत.
४. स्थानिक राजकारणी म्हणजे निव्वळ गुंड. बुल्डोझर घेऊन गावे जमीनदोस्त करणारे. आणि विशेष म्हणजे हे करत असताना त्यांना नक्षलांचे मुळीच भय नसते. एरवी मात्र नक्षलांची प्रचंड दहशत वगैरे असते. आणि स्थानिक राजकारण्यांच्या या असल्या गुंडागर्दीला "सलवा जुडूम" असे म्हणतात म्हणे.
५. एन्जीओ नाही. फ्रंटल ऑर्गनायझेशन नाही.
६. जिल्हा प्रशासनाचा पत्ताच नाही. जिल्हा इथे एस्पीच जणू सांभाळत असतो. तोच गावांमध्ये जातो, लोकांच्या जखमांना मलम लावतो, त्यांना विकासाचा शब्द देतो. आश्चर्य म्हणजे लँड अॅक्विझिशनही इथे एस्पीच करत असतो. आणि त्यावर थेट राज्याचे गृहमंत्री देखरेख करत असतात. डीजीपी त्यांचे भालदार चोपदार असल्यासारखे सतत त्यांच्यामागे उभे असतात आणि फोनवरून एस्पीला सबूरीचा सल्ला देत असतात.
७. इथली लढाई म्हणे आदिवासी करत असतात, आणि हे ओम पुरी, वाजपेयी इत्यादि त्यांना केवळ मदत करत असतात. सिनेमात एकाही आदिवासीने एकदाही तोंड उघडलेले नाही.
८. हे नक्षल पोलीसांना थेट अंगावर घेतात. त्यांच्या हेडक्वार्टरमध्ये वगैरे घुसून थेट दे दणादण गोळीबार करतात. पोलीसही नक्षलांना सरळ भिडत असतात. लारा क्रॉफ्ट टूम रेडर मध्ये दाखवल्यासारख्या अगदी आमने सामने गोळागोळी सुरु असते. गुरिला वॉरफेअर नावाला किंवा चवीलाही नाही. अॅम्बुश नावाचा प्रकार नंदीघाटमध्ये माहीत नसतो.
९. नंदीघाट हा एक मागासलेला भाग असतो, आदिवासी भाग असतो. आणि स्वातंत्र्यानंतर सरकारने तिथे कसलाच विकास केलेला नसतो. (विकास करणे हे सरकारचे काम असते म्हणे. लोकांनी काही करायचे नसते.). पण तिथे खूप मोठ्या संख्येने कंत्राटदार असतात. ते नक्षलांना भरपूर खंडणीपण देत असतात. ते नेमकी कोणती कामे करत असतात त्याचा पत्ता लागत नाही. ती विकासाची कामे नसावीत बहुदा.
मला आता कंटाळा आलाय. किती म्हणून काय काय सांगायचे! या गोष्टी कुठल्याही नक्षल रिलेटेड कथेमध्ये असणे अत्यावश्यक आहे. किमान ओझरता संदर्भ आवश्यक आहे. त्याशिवाय पान रंगणार नाही. आणि निरनिराळ्या बातम्यांची कटिंग्ज एकत्र करुन कथा बनवली तर ती झिरझिरीत कापडतुकड्यांची ठिगळाठिगळांनी बनवलेली गोधडी रंगीत दिसेल, पण ऊब देण्याच्या कामाला यायची नाही. रामायण जर वानरसेनेशिवाय दाखवले तर कोणती कथा निर्माण होईल? तसे झालेले आहे. प्रत्येक फ्रेममध्ये अज्ञान ठासून भरलेले आहे. प्रकाश झांची ही नोट वाचा -
The world looks at India, as a shining nation on the rise. Stories of economic growth, and a newly affluent middle class dot our consciousness. But in the underbelly of the world’s largest democracy,far away from the glitz of the big cities, a war is brewing.
India has been free and independent for over six decades. But go into the heart of the India’s forests and villages, “What freedom?” asks a tribal. “We have lost everything after India became independent.”
The state needs control over the land and the natural resources. But the tribals and villagers who have seen neither development nor compensation for this displacement, have decided to protest. They will not give up their forests, their rivers and their homes.
Young educated citizens from cities are leading the way, helping the tribals protest. But this protest knows only one language – the language of violence. And the State too knows only one language – the language of violence.
I found, as I traveled through beautiful green forests, and lush untouched landscapes that there was fear lurking in every corner. There were gunshots and there was a haunting silence. But there was no development.
I have tried to chronicle this conflict by telling the story of two friends, who eventually find themselves on opposing sides of this conflict. I have made this film to bring this conflict into public focus.
Chakravyuh, the word, implies a war formation from which there is no escape. My film is about this sense of being cornered from all sides. The dilemma of finding yourself in a war from which there is no escape.
ही नोट वाचून तर मला हसावे की रडावे तेच समजेना. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आदिवासींचे सर्वस्व हरण झाले; या भागात बंदुकांचे बार आणि भीषण शांतता आहे, पण विकास नाही; विस्थापनाचा मोबदला मिळाला नाही; स्टेटला फक्त हिंसेचीच भाषा समजते; मी हा सिनेमा बनवला तो हा संघर्ष लोकांपर्यंत आणण्यासाठी- ही भूमीका मांडणार्या दिग्दर्शकाने आपले हे मुद्दे कथानकात यावेत याची जराही फिकीर करु नये? बरोबर असोत वा चुकीचे असोत, मुद्दे तरी नीट मांडावेत.
केवळ पेपरातील बातम्या वाचून आणि एखाददुसरे नक्षलांची भलावण करणारे पुस्तक वाचून काढण्यात आलेला हा सिनेमा आहे यात मला शंका नाही. ऋणनिर्देश म्हणून सिनेमात सुरुवातीला काही आयपीएस अधिकार्यांची नावे आली आहेत. पण ती काही कन्सल्टन्सीसाठी असावीत असे म्हणवत नाही. त्यांना कन्सल्ट करुनही जर व्यवस्थेविषयीचे आणि त्याविरोधातील शक्तींविषयीचे, त्यांच्यातील संघर्षाचे असले अज्ञानी प्रदर्शन होत असेल तर दिग्दर्शकाची करावी तेवढी कीव थोडीच.
तर कुणाला या नक्षलवादाच्या प्रश्नात आस्था असेल, आणि हा सिनेमा पाहिलाच तर त्यावर चर्चा करता येईल. व्यक्तीशः मला हसू आलेले आहे, कीव आलेली आहे, चीडही आलेली आहे. ज्याप्रकारे नक्षॅलिझमला ट्रिव्हियलाइझ केलेले आहे, आणि एकूणच प्रश्नाला अत्यंत बेजबाबदार रीतीने हाताळले आहे ते चीड आणणारे आहे. अंकुर आणि निशांतमध्ये बेनेगलांनी या समस्येला अतिशय भेदकपणे तोंड फोडलेले आहे. त्याला नाव त्यांनी दिले नसेल नक्षलवाद, पण अतिशय मार्मिकपणे समस्या उलगडली आहे. झांकडून तेवढ्या टॅलेंटची अपेक्षा नसली तर माणूस अगदीच ढ नसावा असे वाटत होते. अपेक्षाभंग झालेला आहे. आणि जवळच्या काही मंडळींना सिनेमा आवडलाय असे दिसल्यामुळे काळजी वाटली. (आणि हे लिहीण्यात वेळ घालवला!)
प्रतिक्रिया
चित्रपट पाहून एखाद्या सामाजिक
चित्रपट पाहून एखाद्या सामाजिक प्रश्नाबद्दल लोक खरंच गंभीर मत बनवतात का?
- असा प्रश्न मला नेहमी पडतो.
हा अर्थातच गंभीर नाही, तर जाताजाता पडलेला प्रश्न आहे
***
अब्द शब्द
+१
असाच प्रश्न पडतो. पण थोड्या फरकाने..........
चित्रपट पाहून एखाद्या सामाजिक प्रश्नाबद्दल लोक खरंच गंभीर मत का बनवतात ?
.मूळ लेख,विषय ह्याबद्दल नीटशी कल्पना नाही. चित्रपट पाहिला नाही. त्यामुळे बाकी मौन.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आणखी एक प्रश्न असा पडतो की
आणखी एक प्रश्न असा पडतो की शहरी प्रेक्षकांनी गंभीर मत बनवले तरी काय ढेकळं फरक पडतो?
लेख आवडला. चित्रपटाबद्द्ल ऐकलेही नव्हते त्यामुळे पाहण्याचा प्रश्नच येत नाही.
सहमत
अपहरण आणि गंगाजल हे चित्रपट पाहून मी एक विशिष्ट गंभीर मत बनवले होते. दीवाना मस्ताना व हेराफेरी पाहून विनोदी मत बनवले. मात्र दोन्ही मतांचा कुणालाही ढेकळं फरक पडलेला नाही. शिवाय मी शहरी प्रेक्षकही आहे.
ट्रेलर बघितला होता. त्यात तरी
ट्रेलर बघितला होता. त्यात तरी नक्षलवादी-सरकार संघर्ष म्हणजे प्रचंड मारधाड एवढंच दाखवलेलं पाहून फार अपेक्षा नव्हत्याच. अभय देओल असल्यामुळे जी काही थोडी उत्सुकता होती, ती हा धागा वाचून नष्ट झाली.
स्वातंत्र्यापूर्वी आदिवासींचं काय भलं झालं होतं जे देशी-साहेबामुळे बरबाद झालं?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सर्वसामान्य लोक टिव्ही,
सर्वसामान्य लोक टिव्ही, सिनेमे पाहुन बर्याचदा मत बनवतात असं वाटतं. मिडिया आणि त्यात परत द्रुष्य माध्यम यांचा ३०- वय असलेल्यांवर खूप प्रभाव असतो.
मी सिनेमा पाहिलेला नाही.
मी सिनेमा पाहिलेला नाही. त्यामुळे तो बरा-वाईट की कसं याच्यावर काही मत नाही.
पण एकूणच - मस्त लिहिता तुम्ही सिनेमावर.
सिनेमाच्या तांत्रिक बाजूंवर लिहिणं कमी महत्त्वाचं असतं असं नाही. पण लोक केवळ त्यातच अडकून लिहिताना दिसतात.
नि आशयावर काही म्हणणारे लोक स्वत:ची प्रचारकी मतं सिनेमातून का बोंबललेली नाहीत, असा उरफाटा गळा काढून सिनेमाला झोडतात.
वास्तविक या दोन टोकांच्या बरोबर मधे लिहिणार्यानं असलं पाहिजे.
गँग्स नि आता हा चक्रव्यूह - या दोहोंमुळे तुमची चित्रपटाची समीक्षा वाचायलाच पाहिजे अशी खूणगाठ बांधली गेली. अजून वरचेवर लिहा की!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सत्तासंघर्ष आणि मैत्री
सत्ताकांक्षी माणसानं जिवलग मित्राला शत्रुपक्षाकडे हेर म्हणून पाठवायचं आणि मग आदर्शवादी मित्र फितूर झाला की हिंसा करायची हा जुना फॉर्म्युला आहे. जाँ आनुई ह्या फ्रेंच नाटककारानं आपल्या 'बेकेट' (१९५९) या नाटकामध्ये धर्मसत्ता आणि राजसत्ता या संघर्षात सापडलेला कँटरबरीचा आर्चबिशप आणि त्याचा मित्र हेन्री दुसरा यांची गोष्ट सांगितली होती. "an enlightened protagonist seeking a moral path in a world of corruption and manipulation" असं त्याचं वर्णन नाटककारानं केलं होतं. त्याआधी टेनिसननं याच ऐतिहासिक कथानकावर एक नाटक लिहिलं होतं. १९२३मध्ये त्या नाटकावर आधारित इंग्रजी सिनेमा आला होता आणि १९६४मध्ये आनुईच्या नाटकावर इंग्रजी सिनेमा आला. रिचर्ड बर्टन आणि पीटर ओ टूल यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीमुळे १९६४चा बेकेट गाजला आणि भारतातही पोहोचला. मग आपल्याकडे त्यावरून प्रेरणा मिळायला सुरुवात झाली. कुसुमाग्रजांनी मूळ फ्रेंच नाटकाच्या इंग्रजी आवृत्तीचं भाषांतर 'बेकेट' याच नावानं मराठीत आणलं (१९७१). नंतर समकालीन कामगार चळवळीच्या पार्श्वभूमीवर हाच संघर्ष मांडणारं मराठी रूपांतर मंचित झालं (कानेटकरांचं 'बेईमान') आणि मग त्यावर आधारित ऋषिकेश मुखर्जींचा 'नमक हराम' (१९७३) अमिताभ आणि राजेश खन्नाच्या अभिनयाच्या जुगलबंदीनं गाजला. आता झा यांनी त्याच मुरलेल्या लोणच्याची बरणी उघडून नक्षलवादावरचा सिनेमा बनवलेला दिसतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
माहितीपूर्ण प्रतिसाद. फक्त
माहितीपूर्ण प्रतिसाद.
फक्त हृषीकेश मुखर्जी आपले नाव ऋषिकेश असे (माझ्यासारखे) लिहित नसत असे वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
३.१४ तै म्हणाल्या त्याप्रमाणे
३.१४ तै म्हणाल्या त्याप्रमाणे मलाही अभय देओलचा चित्रपट असल्याने उत्सुकता होती.
परिचय, उद्वेग चांगला उतरला आहे
@अतिवास, शहरी वर्गाकडे वेळ आणि ग्रामीण वर्गाकडे सुविधा (आणि दोन्ही वर्गातील बहुतांश जनतेकडे इच्छा) नसल्याने दृकश्राव्य माध्यमाव्यतिरिक्त (व इतक्या सहज मिळणार्या माहिती व्यतिरिक्त) अन्य स्रोतांचा वापर करून मत बनविलेले दिसणे अधिकाधिक दुष्कर होत चाललेले दिसते. झटपट २-३ तासांत मिळण्यार्या तुटपुंज्या माहितीवर आधारीत बनलेली मते अनेकदा ऐकू येतातच.
कॉलेजांमधील डिबेटिंग स्पर्धांमध्ये मी अनेकदा चित्रपटातील प्रसंग, संवाद आपल्या विधानाचा संदर्भ देण्यासाठी म्हणून वापरल्याचे प्रत्यक्ष ऐकले आहे. तेव्हा किमान सामाजिक / राजकीय चित्रपट बनविताना सगळे नाहि दाखवले तरी विपरीत चित्र जाणार नाही ना याची खबरदारी घेणे अनेकदा योग्य वाटते (प्रसंगी त्यासाठी पर्फॉर्मन्सवर मर्यादा येत असतील तरीही)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कादंबर्यांमधली वर्णनं वाचून
कादंबर्यांमधली वर्णनं वाचून तोच खरा इतिहास मानणारे लोकंही नाहीत का? स्वामी, मृत्युंजय इ. कादंबर्यांचे संदर्भ वेळोवेळी दिले जातात असं निदान आंजावरतरी दिसतंच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
किंवा नाटके
नथुराम गोडसे हे दधीची असल्याबाबतचे एका नाटकातले लोकप्रिय वाक्यही काही धमाल संकेतस्थळांवर संदर्भ म्हणून दिल्याचे वाचले होते.
सहमत!
सहमत आहे. महानायक या काल्पनिक कादंबरीचा उल्लेख करण्याचे पातक आमच्याकडून एकदा झाले आहे. तसेच राजकारण्यांनी दिलेल्या माहितीला शास्त्रीय माहिती समजण्याचेही उदाहरण ताजे आहे. आणि ते फक्त आंजावर नव्हे तर मुद्रणमाध्यमातही दिसून आलेले आहे.
थोडं वेगळं मत
मी सिनेमा बघितलेला नाही त्यामुळे हे मत तेवढ्याच महत्त्वाने घ्यावं. पण या समीक्षेतले आक्षेप हे काहीसे तांत्रिक वाटतात. एकंदरीत क्लिष्ट व्यवस्थेचं सुलभीकरण केलेलं आहे, आणि त्या विशिष्ट प्रश्नाची कितीतरी अंगं गाळलेली आहेत असा रोख आहे. पण ते कुठच्याही कलाकृतीला लागू पडतंच. सिनेमासारख्या माध्यमात 'सरकार'चं किंवा 'व्यवस्थे'चं प्रतिनिधित्व एक व्यक्ती करते. त्यामुळे जिल्हा इथे एस्पीच जणू सांभाळत असतो. तोच गावांमध्ये जातो, लोकांच्या जखमांना मलम लावतो, त्यांना विकासाचा शब्द देतो. आश्चर्य म्हणजे लँड अॅक्विझिशनही इथे एस्पीच करत असतो. हा आक्षेप तत्वतः योग्य असला तरी प्रतीकात्मक व्यक्ती म्हणून एस्पी आहे हे लक्षात ठेवायला हवं.
तूर्तास एवढंच.
हा आक्षेप तत्वतः योग्य असला
तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण हे कोणत्या बाबतीत प्रतीकात्मक घेतलं तर ठीक राहतं तेही बघायला हवं. एखाद्या कथेमध्ये सगळाच पसारा घेता येत नाही हे बरोबर आहे. रामायणाचेच उदाहरण घेऊया. तीन तासांत सिनेमा बसवायचा म्हणून अनेक उपकथानके, अनावश्यक पात्रे गाळावी लागतील. मग म्हणून लक्ष्मणालाच गाळला, आणि प्रतीकात्मक म्हणून रामालाच फक्त ठेवला तर ते रामायण कसे मजेशीर होईल याची कल्पना करा. (किंवा रामाला गाळायचा, आणि लक्ष्मणाला ठेवायचा, आणि त्याच्या संवादात एखादा संदर्भ द्यायचा - की हो बाबा आहे राम बरं का, गेलाय इकडे कुठेतरी!).
याच सिनेमातील उदाहरण घेऊ. नक्षली संघर्षाचे निमित्त म्हणून स्टील प्लँट आणि त्यासाठीचे लँड अॅक्वीझिशन घेतले आहे. नक्षलांचे असे अनेक इश्यू आहेत. कुठे खाणी, कुठे गैरआदिवासी- आदिवासी, जमीनदारी, कुठे इंडस्ट्री. ते सगळेच एका गोष्टीत यायला हवेत असे काही नाही.
सुलभीकरण करणे वेगळे, आणि दिशाभूल करणारे विकृत सुलभीकरण वेगळे. रेव्हेन्यू मिनिस्टर, इंडस्ट्री मिनिस्टर चे प्रतीक म्हणून होम मिनिस्टर दाखवायचा; कलेक्टरचा प्रतीक म्हणून एस्पी; चीफ सेक्रेटरींचा प्रतीक म्हणून डीजीपी - काय आहे हे!