उधळपट्टी
मला अर्थशास्त्रातले फारसे काही कळत नाही. पण रसेलचा In Praise of Idleness हा निबंध माझ्या डोक्यात कायम घोळत असतो.
पैशाची वारेमाप उधळपट्टी हा "आहे रे" वर्गावर सतत होणारा आरोप वाचून एक विचार प्रश्न सतावू लागला. अमुक-तमुक खर्च (उदा मंत्र्याचा परदेशप्रवास, धनिकांची लग्नातील उधळपट्टी इ.) हा देशातल्या भुकेलेल्या जनतेसाठी वापरला जायला पाहिजे असे म्हणणे मानवतेच्या भूमिकेतून ठीक आहे. पण "भुकेलेल्या जनतेसाठी" वापरला गेलेला पैसा संपत्ती निर्माण करू शकतो का? सध्या तरी मला या प्रश्नाचे उत्तर नाही असेच वाटते...फारफार राजकीय लाभ आणि सामाजिक असंतोष निर्माण होऊ नये यासाठी तो थोडाफार हातभार लावत असावा.
========================================================
बर्ट्रांड रसेलच्या In Praise of Idleness (१९३२) या निबंधाचे स्वैररुपांतर
(टीप - या निबंधाला असलेल्या तत्कालीन सामाजिक संदर्भांकडे दूर्लक्ष करू नये. मूळ लेखकाला नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्याच्या तुलनेत आपली बौद्धिक कुवत ओळखून मग खुशाल टीका करावी. सम्यक् विचार करण्याची क्षमता ज्यांच्याकडे नाही त्यांनी हा निबंध वाचण्याच्या फंदात पडू नये. पुण्यात आय.टी क्षेत्रामध्ये नुकत्याच आत्महत्या केलेल्या दोन तरूणांच्या आत्म्याला (आणि वैफल्याला) हा अनुवाद समर्पित केला आहे.मला क्लिष्ट आणि अनावश्यक वाटलेली काही वाक्ये मी यातून गाळली आहेत. भाषांतराऐवजी मथितार्थाकडे माझा रुपांतर करताना कल होता. त्याविषयी सूचना असल्यास त्यांचे स्वागत आहे. - राजीव उपाध्ये)
माझ्या पिढीतील बरेचजण एक म्हण ऐकत लहानाचे मोठे झाले. ती अशी की 'सैतान आळशी हातांकरता काही ना काही उद्योग शोधत असतो'. मी एक अत्यंत गुणी मुलगा असल्यामुळे मी अशा ऐकलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत असे. यामुळे मला जी विवेकबुद्धी प्राप्त झाली तीमुळॆ मी आतापर्यंत सतत परिश्रम करत आलॊ आहे. माझ्या विवेकाने माझी कृती जरी नियंत्रित केली असली तरी माझी मते मात्र आता पूर्णपणे बदलून गेली आहेत. मला असे वाटते की, जगात अनावश्यक श्रम खूपच केले जातात. श्रमांना प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेमुळे मनुष्य स्वत:चे खूप नुकसान करून घेत आहे. मला असे ही वाटते की, आधुनिक उद्योगप्रधान राष्ट्रांमध्ये दिली जाणारी श्रमप्रतिष्ठेवरील शिकवण आता बदलायला हवी.
तुम्हाला नेपल्समधिल प्रवाशाची गोष्ट कदाचित ठाऊक असेल. या प्रवाशाला १२ भिकारी सकाळच्या उन्हात निवांतपणे पडलेले दिसले. त्यांना देण्यासाठी त्याने एक नाणे काढले तेव्हा बारापैकी अकरा भिकारी पुढे आले. तेव्हा त्याने ते नाणे पुढे न आलेल्या आळशी भिकाऱ्याला दिले. असो. ज्यादेशांमध्ये भूमध्यसमुद्रीय सूर्यप्रकाशाची चैन उपलब्ध नाही तेथे असा निवांतपणा लाभणे कठिण आहे. निवांतपणाचे महत्त्व कळण्याकरता तेथे विशेष प्रचाराची गरज आहे.
माझे निवांतपणाचे समर्थन पुढे नेण्याअगोदर जो युक्तिवाद मला स्वीकारता येत नाही, तो अगोदरच टाकून द्यायला हवा. उदा. जेव्हा स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी कमवण्याची गरज नसलेला एखादा मनुष्य जेव्हा काम मागतो, तेव्हा लोक असे म्हणतात की त्याच्या या मागणीमुळे इतर गरजुंच्या रोजीरोटीवर टाच येऊ शकते आणि त्यामुळे त्याची ही कृती अन्याय्य ठरते. हा युक्तिवाद स्वीकारला तर आपण सर्वांनी आपले पोट भरण्यासाठी निवांत राहणे आवश्यक ठरते. या युक्तिवादात एक गोष्ट विसरली गेलेली आहे. ती अशी की, मनुष्य कमावलेले धन जेव्हा खर्च करतो तेव्हा तो रोजगार निर्माण करत असतो. त्याने धन कमावताना ज्या न्यायाने भाकरी त्याने हिरावून घेतली त्याच न्यायाने खर्च करताना त्याने अनेकांना भाकरी मिळवून दिली. यामध्ये खरा खलनायक असतो तो पैशाची बचत करणारा. त्याने बचत केलेल्या पैशातून इतरांची भाकरी निर्माण होत नाही. कमावलेला पैसा गुंतवला गेला तर गोष्ट वेगळी. त्यातून इतर शक्यता निर्माण होतात.
सामान्य माणूस बचत केलेला पैसा सहसा सरकारकडे ठेव म्हणून ठेवणे पसंत करतो. बरीच सरकारे सार्वजनिक पैशाचा मोठा हिस्सा झालेल्या युद्धांचा हिशेब चुकता करण्यात किंवा भावी युद्धांच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी वापरतात. त्यामुळे सरकारकडे आपले धन सोपावणारा सामान्य मनुष्य भाडोत्री खुनी पोसण्याच्या कामाला अप्रत्यक्ष हातभार लावत असतो. सामान्य माणसाच्या या सवयीमुळे लष्कराच्या भरभराटीला मदत होत असते. साहजिकच हा पैसा माणसाने आपल्या हौशी-मौजीकरता वापरला तर ते अधिक योग्य ठरेल.
पण माणसे आपला पैसा जेव्हा एखाद्या उद्योगामध्ये वळवतात तेव्हा मात्र परिस्थिती वेगळी असते. सध्याच्या काळात बरेच उद्योग धंदे बुडतांना दिसतात. याचाच अर्थ असा की, बरेचसे मानवी श्रम आणि पैसा समाधान निर्माण करण्याऐवजी बंद पडलेली यंत्रे निर्माण करण्यासाठी खर्च होत आहे. दिवाळखोर उद्योगांना मदत करणारी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्या पायावर धोंडा पाडून घेत असतात. हाच पैसा मित्रमंडळीना मेजवानी देण्यासाठी खर्च झाला तर आपण अशी आशा करू शकतो, की या मेजवानी मध्ये योगदान करणारे बेकरीवाले, खाटीक, मद्यविक्रेते हे सर्व समाधान पावतील. एखाद्याची गुंतवणूक जेव्हा फसते तेव्हा अशा व्यक्तीची लोक कीव करतात. पण मित्रमंडळीवर खर्च करणा-याच्या औदार्याचे मात्र समाजात कौतुक होत असते.
हे सर्व प्राथमिक आहे. पण मला गंभीरपणे असे म्हणावेसे वाटते की, श्रमप्रतिष्ठेची संकल्पना आधुनिक जगाचे बरेच नुकसान करत आहे, तसेच आनंद आणि समृद्धीचा मार्ग योजनाबद्ध श्रमनिवृत्तीमधून जातो.
आता आपण काम (श्रम) म्हणजे काय ते पाहू या. काम हे दोन प्रकारचे असते. यातील पहिला प्रकार म्हणजे कोणत्याही जड वस्तूचे तद्दृष इतर वस्तूसापेक्ष स्थान बदलणे आणि कामाचा दूसरा प्रकार म्हणजे दूसऱ्या लोकांकडून असे काम आज्ञा देउन करवून घेणे. यातील पहिला प्रकार कमी सुखद आणि कमी मोबदला देणारा आहे. हा जास्त सुखद आणि अधिक मोबदला देणारा आहे. दूस-या प्रकाराचा बराच विस्तार होऊ शकतो. आज्ञा कोणत्या व कशा द्यायच्या याचे सल्ले दूस-या प्रकाराच्या विस्तारात मोडतात. संपूर्ण युरपमध्ये आणखी एक कामाचा प्रकार आढळून येतो. हे कामगार वर उल्लेख केलेल्या दोन प्रकारांपेक्षा जास्त प्रतिष्ठा मिळवून आहेत. यांच्या कडे स्वत:च्या मालकीच्या जमिनी असल्यामुळे इतरांना काम करायची संधी मिळते. हे जमिनमालक निवांत असतात आणि कदाचित काहीजण अशी अपेक्षा करतील की मी त्यांची भलावण करीन. पण दूर्दैवाची गोष्ट अशी यांचा निवांतपणा इतरांच्या उद्योगामधून निर्माण होत असतो. जमिनदारांच्या या सुखासीन वृत्तीमध्ये श्रमाच्या मह्त्त्वाची पाळेमुळे सापडतात. या मंडळीना इतरांनी आपले अनुकरण करावे असे कधिही वाटत नाही.
मानवी संस्कृतीच्या उदयापासून ते औद्योगिक क्रांतीपर्यंत माणसे आपल्या कुटुम्बाला पुरून थोडेफार उरेल एवढे अन्न अथवा धन कमवत आली आहेत. कुटुंबातील बायकापोरानी त्याला बरोबरीने हातभार लावला आहे. पण हे गरजेपेक्षा अधिक कमावलेले अन्न किंवा धन, ते कमावणा-यांना उपभोगायला न मिळता ते धर्मगुरु आणि सैनिकांच्या गरजा भागवण्यासाठी लाटले गेले आहे. दूष्काळात जेव्हा पुरेसे अन्न उपलब्ध होत नसे तेव्हा धर्मगुरु आणि सैनिकांच्या गरजा मात्र प्राधान्याने भागवल्या जात असत. याचा परिणाम म्हणजे अनेक मजूरांचा भूकेने बळी गेला. शंभर वर्षापूर्वी नेपोलियनच्या युद्धकालात, १९१७ पर्यंत रशियात, पूर्वेकडे अजूनही, तर इंग्लंड मध्ये औद्योगिक क्रांती होऊन सुद्धा, नवीन उत्पादकांची पिढी निर्माण होईपर्यंत हाच प्रकार चालू असलेला दिसून येतो. अमेरीकेत स्वातंत्र्ययुद्धाबरोबर तर दक्षिण अमेरिकेत अंतर्गत यादवी पर्यंत हे शोषण चालू राहिलेले दिसून येते. दीर्घकाळ टिकलेला प्रघात माणसाच्या विचारांवर आणि मतांवर खोल परिणाम घडवून आणतो. आज आपण गृहीत धरलेली श्रमांची प्रतिष्ठा या पुरातन प्रथेतून जन्माला आली आहे. आजच्या औद्योगिक जगात ही पुरातन प्रथा सोयीची नाही. मर्यादित निवांतपणा हा कुणा विशिष्ट वर्गाचा मक्ता नाही, तो समाजातील सर्व घटकांचा समान अधिकार आहे. श्रमांची नीति ही श्रमजीवी वर्गाची नीति असते आणि आधुनिक जगात गुलामगिरीला स्थान नाही.
आदिम जमातीतील कष्टकरी त्यांनी निर्माण केलेले अन्न आपणहून सैनिकांची आणि धर्मगुरूंची पोटे भरण्या करता देणार नाहीत, हे उघड आहे. प्रथम दडपशाहीमुळे त्यांना गरजेपेक्षा जास्त अन्न निर्माण करावे लागले. नंतर कठोर परिश्रमांची नैतिकता त्यांच्या गळी उतरवण्यात आली. म्हणजेच मजूरांच्या काबाडकष्टांनी इतरांना निवांतपणा मिळण्यास मदत केली. परिश्रमांना नैतिकतेचा आधार दिला गेल्याने सक्तीची गरज कमी झाली आणि सरकारी खर्च पण कमी झाला. आजमितीला ९९% ब्रिटनमधल्या कष्ट्क-याना, राजाला मजुरा एवढाच पगार मिळावा असा प्रस्ताव आल्यास धक्का बसेल. कर्तव्याची संकल्पना ही ऐतिहासिकदृष्ट्या बोलायचे झाले तर, कष्टकर-यांच्या हितापेक्षा मालकाच्या हिताचे साधन म्हणून वापरली गेली. अर्थातच सत्ताधारी हे सोयिस्करपणे ही गोष्ट लपवताना दिसतात. शिवाय ते असा समज निर्माण करतात की, ते स्वत:पुरता विचार न करता सर्व मानव जातीच्या कल्याणाचा विचार करतात. काही वेळा हे खरे असते, अथेन्स मधल्या गुलामांच्या मालकानी त्यांचा निवांतपणा मानवी संस्कृतीच्या उद्धारासाठी उपयोगात आणला. कोणत्याही न्याय्य अर्थव्यवस्थेत हे शक्य झाले नसते. निवांतपणा हा मानवी संस्कृतीसाठी अत्यंत आवश्यक आहे, जो पूर्वी फार थोड्याना इतर अनेकांच्या काबाडकष्टामुळे मिळत होता. हे कष्ट अमोल होते, पण ते श्रम प्रतिष्ठेमुळे नव्हे, तर त्यातून निर्माण होणा-या निवांतपणामुळे.
नवीन तंत्रांमुळे, जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारे श्रम मोठ्याप्रमाणात कमी झाले आहेत. युद्धकाळात हे अधिक स्पष्ट होते. सैन्यात भरती झालेली माणसे, दारूगोळा आणि शस्त्रांच्या निर्मितिमध्ये तसेच हेरगिरी आणि इतर सरकारी कचे-यांशी निगडीत स्त्री-पुरूष हे सर्व अनुत्पादक उद्योगांमध्ये गुंतलेले होते. असे असून सुद्धा, मित्रराष्ट्रांकडचे अकुशल श्रमजीवी पूर्वीपेक्षा जास्त स्वास्थ्य अनुभवत आहेत. ही गोष्ट आर्थिक व्यवहारांनी लपवून ठेवली - कर्ज घेतल्यामुळे असा समज निर्माण झाला की जणु भविष्य वर्तमानाचे पोषण करत आहे. पण हे अशक्य आहे, माणूस अस्तित्वात नसलेली भाकरी खाऊन जगू शकत नाही. युद्धामुळे हे सिद्ध झाले की उत्पादन प्रक्रियेच्या शास्त्रीय व्यवस्थापनाने बहूसंख्य लोकांची स्वास्थ्यप्राप्ती काही थोड्या लोकांच्या उत्पादनक्षमतेमुळे शक्य आहे. युद्धोत्तर काळात कामाचे तास चारावर आणले असते तर उत्तमच झाले असते. परंतु पूर्वीचाच गोधळ परत निर्माण करण्यात आला. ज्यांच्या कामाला मागणी आहे त्यांना अधिक काळ कष्ट उपसावे लागत आहेत. उरलेल्याना बेरोजगारीमुळे उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. का? तर श्रम करणे, जे करतात त्यांचे कर्तव्य आहे. आणि माणसाला मिळणारे वेतन हे त्याने केलेल्या उत्पादनाच्या प्रमाणात न मिळता ते तो करत असलेल्या कामाच्या मानल्या गेलेल्या दर्जानुसार दिले गेले पाहिजे या आग्रहामुळे.
ही गुलामगिरीच्या राज्याची नैतिकता अत्यंत चूकीच्या परिस्थितीत वापरली गेल्यामुळे झालेला परिणाम भयानक होता. एक उदाहरण घेऊया. समजा काही लोक टाचण्यांचे उत्पादन करण्यात गुंतले आहेत. रोज आठ तास काम करून जगाला असलेली टाचण्याची गरज ते भागवतात. कुणीतरी असा शोध लावतो की हे लोक आता तेवढ्याच वेळात दुप्पट टाचण्यांचे उत्पादन करू शकतात. टाचण्या अगोदरच इतक्या स्वस्त आहेत की स्वस्त आहेत म्हणून आणखी विकल्या जाणे शक्य नाही. शहाण्यांच्या जगात टाचण्याचे उत्पादन करणारा कॊणीही कामाचे तास अशा परिस्थितीत आठावरून चारावर आणेल. पण प्रत्यक्षात असे करणे नाउमेद केल्यासारखे होईल म्हणून लोक टाचण्या आठ तास बनवत राहतील. टाचण्याचे उत्पादन प्रचंड प्रमाणात झाल्याने काही उत्पादकांचे दिवाळे निघेल. आणि पूर्वी टाचण्या बनवणा-यांपेक्षा निम्मे लोक नोकरी गमावून भिकेला लागतील. या दोन्ही शक्यतांमध्ये निवांतपणा तेवढाच निर्माण होतो. पण श्रमप्रतिष्ठेच्या अनाठायी आग्रहामुळे हा निवांतपणा आनंददायी होण्या ऐवजी उपद्रवकारक होईल याचीच जणु काळजी घेतली जाते. यापेक्षा अधिक मूर्खपणाची कॊणी कल्पना करू शकेल काय?
गरीबाना निवांतपणा आवश्यक असतो हे अमीरांना नेहमीच धक्कादायक असते. इंग्लंड्मध्ये १९व्या शतकाच्या सुरूवातीला दिवसाचे १५ तास काम हे सामान्यपणे गृहीत धरले गेले होते. लहान मुले सुद्धा १२ तास काम सहज करत असत. यात हस्तक्षेप करून काही जणानी जेव्हा हे कामाचे तास जास्त असल्याचे मत व्यक्त केले तेव्हा यामुळे मोठी माणसे मद्यपान आणि लहान मुले दांडगाई पासून दूर ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे असे समर्थन दिले गेले. मी लहान असताना, जेव्हा शहरात राहणा-या श्रमजीवीना जेव्हा मताचा अधिकार प्राप्त झाला तेव्हा काही सार्वजनिक सुट्ट्या जाहिर झाल्या. अनेक उच्चवर्णीयांनी यावर तीव्र नापंसती व्यक्त केली. एका सरदारीण बाईने गरीबांना सुट्ट्या कशासाठी हव्यात? त्यानी कामच करायला हवे असे म्ह्टल्याचे मला अजूनही स्मरते. आज हे लोक इतके स्पष्ट बोलत नसले तरी मूळ भावना अजूनही टिकून आहे.
आपण कोणताही पूर्वग्रह न ठेवता श्रमांच्या नीतीचा प्रामाणिक विचार करूया. प्रत्येक गरजवंत मनुष्य त्याच्या आयुष्यात इतरांच्या श्रमांची फळे उपभोगतो. मूलत: श्रम ही कल्पना पटण्यासारखी नाही हे गृहीत धरूनही, माणसाने तो कमावतॊ त्यापेक्षा जास्त उपभोग घेणे हे न्याय्य नाही. अन्न, वस्त्र, आणि निवा-याच्या बदल्यात त्याने वस्तू नाहीतर सेवा तरी द्यायलाच हवी. श्रम करणे हे कर्तव्य मानायला हरकत नाही पण ते या मर्यादेतच.
सोव्हिएत युनियन व्यतिरीक्त इतर अनेक समाजात श्रमांच्या या किमान अटीतून अनेकजण सुटतील. मला त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही. ही मंडळी वडिलोपार्जित संपत्तीचे वाटेकरी तरी असतात किंवा त्यांनी संपत्तीशी लग्न केलेले असते. यांच्या निवांतपणामूळे कष्टक-यांच्या पोटावर पाय येत नाही किंवा कुणाला अतिश्रम पण करावे लागत नाहीत.
सामान्य कष्टकरी जर फक्त चारच तास काम करू लागला तर बेकारीची समस्या सुटेलच, पण सर्वांच्या अन्नवस्त्रादि गरजा पण पुरेशा प्रमाणात भागतील. या कल्पना श्रीमंताना धक्कादायक आहेत कारण त्यांना असे वाटते की गरीबांना निवांतपणाचा उपयोग कसा करायचा हे कळत नाही. अमेरीकेत पुरेसे कमावलेले पुरुष तासन् तास कामाच्या रगाड्याला वाहून घेतात. साहजिकच रोजंदारीवर काम करणा-याना निवांतपणा ही कल्पना त्यांना पचत नाही. एक बेकारीची शिक्षा सोडली तर त्यांच्या मुलांनी निवांतपणा उपभोगलेला त्यांना आवडत नाही. यातला विचित्र भाग असा की, आपल्या मुलाकडून ढोर मेहनतीची अपेक्षा करणारा अमेरीकन पुरुष आपल्या बायका व मुलीनी मात्र काम न करण्याचे काही वाटून घेत नाही.
निवांतपणाचा सदुपयोग हा संस्कृती आणि शिक्षण यांच्या एकत्रित परिणामाने साध्य होतो. आयुष्यभर ज्याने कामाचे रगाडे उपसले आहेत त्याला अचानक निवांतपणा लाभल्यास कंटाळवाणे होईल. पण पुरेशा निवांतपणा अभावी माणसे अनेक चांगल्या गोष्टीना पारखी होतील. बहूसंख्य लोकांनी निवांतपणाला पारखे का व्हावे याचे कारण कळत नाही, श्रमतपश्चर्येचे मूर्ख समर्थक मात्र गरज नसताना आपल्याला अनावश्यक कष्ट करण्यास पुन: पुन: प्रवृत्त करत असतात. रशियातील नव्या श्रद्धांच्या प्रभावाखालिल सत्ताधा-यांच्या राज्यात पारंपरिक पाश्चात्य शिकवणीपेक्षा बरेच वेगळे असले तरी काही गोष्टी अजूनही बदलेल्या नाहीत. सत्ताधारी वर्गाची, विशेषत: शिक्षणक्षेत्रात प्रचारकार्यक्रम राबवणा-यांची श्रमप्रतिष्ठेबाबत मनोवृत्ती जगातील अन्य सत्ताधा-याहून फार वेगळी नाही. उद्योग, सौजन्य, दूरस्थ फायद्यासाठी ढोर मेहनतीची तयारी, वरिष्ठांच्याकरता समर्पणाची भावना इत्यादि कल्पना परत अवतार घेताना दिसतात. इतकेच नव्हे तर अधिकारी हे विश्वनियंत्याच्या इच्छेचे प्रतिनिधी आहेत यालाच डायलेक्टीकल मटेरीयालीझम असे नाव प्राप्त झाले आहे.
रशियातील श्रमजीवींचा विजय आणि अन्य देशातील स्त्रीवादी चळवळीचा विजय यात काही समान दूवे आहेत. वर्षानुवर्षे पुरूष स्त्रियांमधिल संतप्रवृत्तीचे अस्तित्व मान्य करत आले आहेत. याच वेळी ते स्त्रियांचे त्यांच्या कनिष्ठपणाबद्दल सांत्वन करताना संतप्रवृत्ती ही ताकदीपेक्षा अधिक चांगली हे पुन: पुन: सांगत आले आहेत. पण शेवटी स्त्रीवाद्यांनी ठरवले की, ताकद आणि संतप्रवृत्ती या दोन्ही आपल्याकडे असायला हव्यात. स्त्रीवादाच्या धुरीणांनी, पुरूषांनी प्रतिपादन केलेल्या संतप्रवृत्तीच्या आवश्यकतेवर विश्वास ठेवला पण राजकीय ताकदीचा हव्यास निरर्थक आहे हे मानायला ही मंडळी तयार नाहीत. अशीच काहीशी गोष्ट मानवी श्रमांच्या बाबतीत रशियात घडली आहे. वर्षानुवर्षे अमीरउमराव आणि त्यांचे भाट "प्रामाणिक परिश्रम" या कल्पनेचा पुरस्कार करताना साधी राहणी, गरीबांना मृत्युनंतर स्वर्गप्राप्ती देणारा धर्म इत्यादि कल्पना मजुरांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न चालवला. रशियात मानवी श्रमांच्या श्रेष्ठत्वाविषयीची शिकवण गंभीरपणे स्वीकारली गेली. मानवी श्रम हा तरूणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला गेला आणि तो नव्या नैतिक शिकवणीचा आधार मानला गेला. कदाचित आता हे सगळे छान वाटते आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असा एक मोठा देश कमीत कमी ऋणाच्या भाराखाली विकसित व्हायला हवा. या परिस्थितीत कठोर परिश्रम हे आवश्यकच आहेत कारण त्यामुळे मिळणारी फळे निश्चित आकर्षक आहेत. पण जेव्हा अशी वेळ येईल की सर्वजण अतिश्रमांशिवाय स्वस्थ आयुष्य जगु शकतात, तेव्हा काय?
पश्चिमेत हा प्रश्न अनेक मार्गांनी हाताळता येतो. आपण आर्थिक न्यायासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत आणि म्हणून उत्पादनातील मोठा वाटा संख्येने थोड्या पण काम न करणा-या व्यक्तींच्याकडे जातो. उत्पादनावर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे आपण अनेक अनावश्यक वस्तूंचे उत्पादन करतो. इतरांच्या अतिश्रमामुळे फार मोठ्या संख्येने कष्ट करण्यास सक्षम असा वर्ग कामापासून वंचित आहे. हे सर्व अपूरे पडते तेव्हा आपण युद्ध करतो. त्यासाठी काही माणसे दारुगोळा बनविण्याच्या कामात गोवली जातात तर काही माणसे त्याच दारुगोळ्याने विध्वंस घडवून आणण्यासाठी नेमली जातात, जणु काही आपण आतषबाजीची नुकतीच ओळख झालेली लहान मुले आहोत. या सर्व खटाटोपाने एक संकल्पना कायम तग धरून राहते, कठोर परिश्रम हे फक्त सामान्य माणसाचीच जबाबदारी आहे.
एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी श्रम हे मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय होऊ शकत नाही. तसे असते तर प्रत्येक मजूर शेक्सपियरपेक्षा श्रेष्ठ मानावा लागेल. दोन कारणांनी आपली यात दिशाभूल होत आली आहे. एक म्हणजे गरीबांना समाधानाच्या भ्रमात ठेवण्याच्या आवश्यकतेमुळे दीर्घकाल श्रीमंत श्रमप्रतिष्ठेची महती गात बसले आहेत. दूसरे कारण म्हणजे नवीन तंत्रामुळे मिळणारे सुख ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर निरनिराळे आश्चर्यकारक बदल घडवून आणता येतात. या दोन्ही प्रेरणांशी प्रत्यक्ष कामगाराचे काही घेणे देणे नसते. तो असे कधिही म्हणत नाही की, "मी श्रम एक सर्वश्रेष्ठ कर्तव्य म्हणून करतो आणि पृथ्वीचा कायापालट घडवून आणताना मला खुप आनंद होतो." मजूर कामाकडे फक्त अन्न्वस्त्रादि गरजा भागवण्याचे एक साधन म्हणून बघतात आणि त्यांना त्यांचा आनंद फक्त निवांतपणातून मिळतो इतर कशातूनही नाही.
काही जण असे म्हणतील की कामाचे तास चार झाले तर लोकांना आपला उरलेला वेळ कसा घालवायचा ते कळणार नाही. हे जर खरे असेल तर ते आधुनिक मानवी संस्कृतीला धिक्कारास्पद आहे. कारण यापूर्वीच्या काळाकरता हे खरे मानता येत नाही. पूर्वी आयुष्यात खेळकरपणा आणि मोकळेपणाला जे स्थान होते ते आता कार्यक्षमतेच्या पंथाने घेतले आहे. आधुनिक मनुष्य प्रत्येक कामाचे काही उद्देश्याने केले जाते असे मानतो पण तो काम हे कामाकरता केले पाहिजे असे मानत नाही. उदा. गंभीरप्रवृत्तीचे लोक चित्रपटाला जाण्याच्या सवयीवर सतत टीका करत असतात. तरूणाना हिंसक बनवण्याचे ते एक कारण म्हणून पुढे करतात. पण चित्रपट बनवण्याच्या श्रमांचे मात्र भरपूर कोडकौतूक होत असते. नफा देणारी प्रत्येक कृती ही श्रेयस्कर हा आग्रहाने मोठी उलथापालथ करतो. तुम्हाला मांस पुरवणारा खाटिक आणि पाव देणारा पाववाला हे स्तुतीला पात्र ठरतात. का तर ते पैसे कमावतात. पण तुम्ही जेव्हा त्यानी निर्माण केलेल्या अन्नाचा आनंद घेता तेव्हा मात्र ती चंगळ ठरते. ढोबळपणे बोलायचे झाले तर पैसे कमावणे हे 'चांगले' आणि खर्च करणे हे 'वाईट'. वस्तूत: या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि म्हणून असा विचार करणे विक्षिप्तपणाचे आहे. एखादि व्यक्ती श्रम करते ते नफा कमावण्याकरता करते, पण त्या श्रमांचा सामाजिक उद्देश हा फक्त उपभोगच असतो. व्यक्तीगत व सामाजिक उद्देषांच्या या फारकतीमुळे माणसाला सुसंगत असा विचार करता येत नाही आणि नफा हे उद्योग करण्यासाठी एक आमिष बनते. आपण उत्पादनाचा खूप विचार करतो आणि उपभोगाचा फार कमी...
पूर्वी निवांतपणाचा उपभोग घेणारा वर्ग हा श्रमजीवीवर्गापेक्षा संख्येने लहान होता. या सुखजीवी वर्गाने असे असंख्य फायदे उपभोगले की ज्यांना आर्थिक न्यायाच्या संकल्पनेत काहीही आधार सापडणार नाही. यामुळे शोषण तर वाढलेच पण या सगळ्यांच्या समर्थनार्थ नवेनवे सिद्धांत या सुखजीवी वर्गाने शोधले. हे सगळे दोष स्वीकारून या वर्गाचे मानवी संस्कृतीसाठी केलेले योगदान मान्य करायला हवे. कला आणि शास्त्रांचा विकास आणि संवर्धन, ग्रंथनिर्मिती, तत्त्वज्ञानाचा विकास, सामाजिक सुधारणा इत्यादि उदाहरणे इथे देता येतील. सुखजीवीवर्गाशिवाय मानवजातीला पाशवीपणातून मुक्ती मिळाली नसती.
जगात जेव्हा चार तासांपेक्षा जास्त काम करावे लागणार नाही तेव्हा जिज्ञासूना त्यांची जिज्ञासा भागवण्यासाठी, चित्रकाराना त्यांच्या कलेची साधना करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, नवोदित लेखकांना गुजराणीसाठी सवंग लेखनाची गरज पडणार नाही. वैद्यकीय व्यावसायिकाना ज्ञानोपासना करण्यासाठी तर शिक्षकांना नवी शैक्षणिक तंत्रे विकसित करण्यास पुरेसा अवधी मिळेल. कामाचा दर्जा सुधारून दमछाक होणार नाही. ब-याच जणांना नि:सत्त्व करमणूकीची गरज उरणार नाही. एक टक्का तरी लोक सार्वजनिक हिताच्या उपक्रमात भाग घेऊन आपल्या अभिनव कल्पना राबवू शकतील. निवांतपणाचे फायदे एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत. सामान्य माणसांना सुखी जीवनाच्या संधी निर्माण झाल्याने इतरांना उपद्रव देण्याची व संशयी वृत्ती कमी व्हायला मदत होईल. सर्वांना पुरेसे काम मिळाल्याने मुख्य म्हणजे युद्धाची चटक कमी होईल. चांगल्या वर्तनाची जगाला सर्व नैतिक गुणामध्ये सर्वात जास्त गरज आहे. चांगले वर्तन स्वास्थ्य आणि सुरक्षेच्या भावनेशी निगडीत असते, ते संघर्षातून निर्माण होत नाही. उत्पादनाच्या नवीन तंत्रानी आपल्याला स्वास्थ्य आणि सुरक्षेच्या संधी दिलेल्या असताना आपण काहीजण अतिश्रमाचा विनाकारण स्वीकार करून इतरांकरता उपासमार निर्माण केली आहे. यंत्रे येण्या अगोदर आपण जसे उत्साही होतो तसेच आताही आहोत आणि मला असे वाट्त यात आपण मूर्खपणा करत आहोत, ज्याची काहीही आवश्यकता नाही.
असमतोल
देशातल्या प्रत्येक माणसाच्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य या मूलभूत गोष्टी जोपर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत अन्य गोष्टींवर राष्ट्रीय संपत्ती खर्च करु नये असे जर ठरवले तर काय परिस्थिती उदभवेल? आजही देशात अशी माणसे आहेत की जी दोनवेळच्या अन्नाला महाग आहेत. दुसरी कडे जीभेचे चोचले पुरवण्यासाठी अन्नाची उधळपट्टी होत आहे. अक्षरशः अन्न फेकून दिले जाते. एक तुपरोटी खात असेल तर दुसर्याला किमान चटणी भाकरी तरी मिळाली पाहिजे असा विचार नक्कीच मनात येतो.
देशातील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा या पुर्ण होतील अशी शासनव्यवस्था निर्माण होणे हे एक स्वप्न आहे. समता ही गोष्ट उदात्त असली तरी व्यवहार्य नाही. सामाजिक असंतोष निर्माण झाला तर अराजकता माजेल व आहे रे वर्गाच्या अस्तित्वावर घाला येईल. असंतोषासमोर कुठलीही सुरक्षाव्यवस्था फिकी पडते.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
+१ समता ही गोष्ट उदात्त असली
+१
समता ही गोष्ट उदात्त असली तरी व्यवहार्य नाही.
अगदी योग्य.
रसलच्या या निबंधाचं तुम्ही
रसलच्या या निबंधाचं तुम्ही केलेलं भाषांतर इथेच चिकटवू शकाल का? चर्चा पुढे जाण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
सविस्तर प्रतिसाद सवडीने देतेच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चिकटवतो...
चिकटवतो...
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
लेख आवडला. अनुवादाची भाषा जरा
लेख आवडला. अनुवादाची भाषा जरा जुनाट वळणाची वाटली तरी एकूण रोचक विषयामुळे वाचनीय वाटला.
आर्थिक वृद्धीच्या शेवटाच्या जवळ असताना असे विचार पुढे येणे आणि त्यावर अंमलबजावणी होणे हे आवश्यक आणि स्वागतार्ह आहे.
नैसर्गिक आयुष्य सोडून शेती करायला लागल्यावर मालकीहक्काची संकल्पना निर्माण करणे आणि माणसाने रोजच्या रोज आणि भरपूर काम केल्याशिवाय मूलभूत गरजा पूर्ण होणार नाहीत असा जवळजवळ सगळ्या लोकांचा समज करून देणे हा मानवी इतिहासातला सगळ्यात मोठा 'कॉन जॉब' असावा आणि शासनव्यवस्थेसारख्या संस्थांना प्रभावित करू शकणारी माणसे तो मोठ्या निष्ठेने पुढे चालवत आहेत. आजची श्रमप्रतिष्ठा ही त्याकाळी शेतात कष्ट करावे म्हणून लोकांना उद्युक्त करण्यासाठीच्या कौतुकाचे विकृत स्वरूप आहे. आज जगातल्या कामकरी वर्गापैकी बहुसंख्य लोकांना आपण का काम करतोय याची यत्किंचितही कल्पना नाही. ज्याला आपण संपत्तीचे निर्माण म्हणतो ती वस्तुत: मानवी श्रमांची आणि नैसर्गिक स्रोतांची अक्षम्य नासाडी आहे. ज्या सुखासीन आयुष्याच्या आशेने माणूस मरमर काम करतो ते आयुष्य स्वत: मरेस्तोवर काम करून कधीच मिळत नाही. ते फक्त दुसर्याला स्वत:साठी काम करायला लावूनच मिळते (म्हणूनच नोकरी करणार्या प्रत्येक माणसाला स्वतःचा व्यवसाय करायची स्वप्ने पडत असतात)किंवा गरजा मर्यादित ठेवून तेवढ्यापुरतेच काम करून मिळते.
तरीही कॅपिटल अॅक्युम्युलेशन आणि युटिलिटी मॅक्सिमायझेशन या अर्थशास्त्रीय अंधश्रद्धांच्या आहारी गेल्याने बहुसंख्य गरजा भागल्या तरी काम करत राहणे आणि शिवाय जास्तीत जास्त नफ्यासाठी इतर लोकांना कामावरून काढून यंत्रांकडून काम करवून घेणे हे सर्वमान्य झाले आहे.
लेखाच्या सारांशाबद्दल धनंजय यांच्याशी सहमत आहे. कोणताही माणूस स्वखुशीने अतिकाम किंवा अतिआळस करणार नाही.
शेतीपूर्व मानवाला जर गरजा भागवायला रोज चार तास काम करावे लागत असेल असे समजले तर इतकी तांत्रिक प्रगती झाल्यावर आधुनिक माणसाला त्यापेक्षा जास्त काम करायची गरज पडायला नको. पण आधुनिक समाजात भरपूर समृद्धी असूनही कामाचे महत्त्व वाढतच आहे. त्यातही बॉब ब्लॅक म्हणतो तसे उगाचच पेपर शफलिंग करणार्यांचे प्रमाण जास्त असूनही, स्वाभाविकपणे, त्यांना स्वतःला उपलब्ध असणार्या सोयी स्वतःचा हक्क वाटतात आणि इतर वंचितांसाठी त्यांच्या वापराला मर्यादा घालणे अव्यवहार्य वाटते. असो.
मूळा निबंध वाचलेला नाही पण
मूळा निबंध वाचलेला नाही पण भाषांतर आवडले.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
वेगळ्या
एका वेगळ्याच विषयावरची चर्चा आणि मूळ लेखाचे भाषांतर, हे कमी श्रमात वाचायला मिळणार म्हणून प्रथम आपल्याला धन्यवाद. फक्त एकदाच हा लेख वाचून लगेच प्रतिक्रिया देणे अवघडच दिसते आहे, तरी तज्ञांच्या प्रतिक्रियेची वाट पहातो.
उधळपट्टी आणि चंगळवाद यात
उधळपट्टी आणि चंगळवाद यात साम्य आहे..त्यामुळे या संदर्भात हा 'चला, चंगळवादी होऊया' (गिरीश कुबेर) लेख आठवला.
सहमत आहे. मी देखील याच लेखाचा
सहमत आहे.
मी देखील याच लेखाचा दुवा देणार होतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
संबंध
रसेलचा निबंध आणि तुमचा "पैशाची वारेमाप उधळपट्टी हा "आहे रे" वर्गावर सतत होणारा आरोप वाचून एक विचार प्रश्न सतावू लागला. अमुक-तमुक खर्च (उदा मंत्र्याचा परदेशप्रवास, धनिकांची लग्नातील उधळपट्टी इ.) हा देशातल्या भुकेलेल्या जनतेसाठी वापरला जायला पाहिजे असे म्हणणे मानवतेच्या भूमिकेतून ठीक आहे. पण "भुकेलेल्या जनतेसाठी" वापरला गेलेला पैसा संपत्ती निर्माण करू शकतो का? सध्या तरी मला या प्रश्नाचे उत्तर नाही असेच वाटते" हा मुद्दा यांचा संबंध मला समजला नाही.
स्रोत किंवा क्षमता निर्धारित असताना अतिरिक्त श्रम करून इतरांची संधी घालवण्यापेक्षा निवांत रहावे, त्यातून अन्य काही गवसू शकते, असा काहीसा रसेल यांचा मुद्दा दिसतो. उधळपट्टी आणि रसेल यांच्या मुद्यातील निवांतपणा यांचे तुम्ही काही नाते जोडत आहात, असे दिसते.
उधळपट्टी न करता तो पैसा गरिबांच्या पोषणासाठी दिल्याने संपत्ती निर्माण होते किंवा कसे हे संपत्ती म्हणजे काय, तिची निर्मिती म्हणजे काय हे ठरल्यानंतरच निर्धारित करता येईल. तूर्त एक स्थिती पाहू: या खर्चातून संपत्ती निर्माण होत नसल्याने तो केला जाऊ नये, असे म्हटले तर, त्यानंतर या खर्चाअभावी या वर्गाची जी स्थिती होईल तिच्या परिमार्जनासाठीही खर्च केला जाऊ नये, कारण त्यातूनही काही संपत्ती निर्माण होत नसतेच, असे म्हणता येईल. अर्थातच, त्यानंतर होणाऱ्या संघर्षात आपला बचाव आपणच करावा यासाठी होणाऱ्या खर्चातूनही संपत्ती निर्माण होत नसल्याने तोही करण्याची गरज नाही, असे म्हणूया... थोडक्यात ही अशी मांडणी थांबण्याची शक्यता नाही, कारण मूळ मांडणीत एक मोठी गफलत आहे. मूळ मांडणीत माणसाची समाजशीलतेची गरज पुरेशी ध्यानी घेतलेली दिसत नाही. समाजशीलतेच्या या गरजेत संपत्ती निर्माण हे सर्वोपरी नाही, तर समाज बनून राहणे या गरजेची पूर्तता करणे हे सर्वोपरी आहे. समाजशीलतेची ही गरज पूर्ण करावयाची असेल तर संघर्ष टाळावा लागतोच आणि संघर्ष टाळून मिळणारी स्थिती यासाठी काही खर्च केला तर तो अनाठायी किंवा अवाजवी किंवा अनुपयुक्त ठरत नाही. आता ही स्थिती हीही समाजाची संपत्ती आहे, असे म्हटले तर मूळ मुद्दा निकालात निघतो.
श्रावण मोडक, ज्याला उधळपट्टी
श्रावण मोडक,
ज्याला उधळपट्टी म्हटले जाते त्या खर्चाकडे बघितले तर तो खर्च इतर अनेकांच्या ज्या गरजा भागवतो त्या गरजा (अंततः त्या गरजा भागवणारे उद्द्योग) भागण्याने संपत्तीची निर्मिती होते. संपत्तीची निर्मिती झाली नाही तर त्यातील वाटा बाजूला काढून "भुकेलेल्याना" दान्/मदत करता येणार नाही. त्यामुळे उधळपट्टीवर टीका करणे अयोग्य आहे.
मला तरी हा निबंध कालबाह्य झाला आहे असे वाटत नाही.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
अवघड आहे
१) मग काय "उधळपट्टी" / "चैन" करायची की नाही?
२) चैन व उधळपट्टी हे कसे ओळखायचे?
३) कामाचे तास कमी केले तर ज्यांना आठ-बारा तास काम करुनही भागत नाही त्यांचे अजुनच हाल होणार नाहीत का?
४) जर त्यांना चार तास कामाकरता मोबदला आठ तासांपुरता एवढा दिला तर त्यांची कामे विकसनशील / गरीब देशात नाही का जाणार? मग ते बेकारच होतील.
नक्की काय म्हणायचे आहे? हा निबंध कालबाह्य झाला आहे का?
मूळ लेखकाला नोबेल पुरस्कार
या वाक्याचा अर्थ काय घ्यावा? की मराठी आंजांवरील वाचकांच्या बौद्धिक कुवतीवर गर्भित नकारात्मक टिपणी आहे?
हे वाक्य किमान सध्याच्या काळात गैरलागू का ठरू नये? जर व्यक्तीने/संस्थांनी बचत करायची नाही असे ठरवले तर बहुतांश बँका डबघाईला येतील का? आणि त्या द्वारे त्या बँकाच्या कर्मचार्यांची भाकरी हिरावली जाणार नाही का? शिवाय या बँका कर्जे देऊ शकणार नाहित त्या कर्जांवर नवे उद्योग उभे रहाणे कठीण होईल तेव्हा बचत अर्थात 'सेव्हिंग' न करणे अधिक (किंवा किमान तितकेच) खलनायकी नाहि का?
सेव्हिग्ज अकाऊंटमध्ये पैसे ठेवणे ही बचत की गुंतवणूक? बचत गणल्यास वरील प्रश्न बघावेत. गुंतवणूक मानल्यास बचत कशाला म्हणावे हा प्रश्न आहेच.
उत्सुकता: हे चित्र (विशेषतः अधोरेखीत) भारतासारख्या विकसनशील देशांतही सत्य आहे का?
संबंध समजला नाही लष्कराला मिळू नये म्हणून सर॑कारी गुंतवणूक नको हे समजले पण मत ही गुंतवणूक पायाभूत सुविधांमध्ये का नको? वैयक्तिक हौशी-मौजी करताच का?
असो.. प्रश्न बरेच आहेत. तुर्तास इतकेच
टिपः प्रश्न विचारायची कुवत भरपूर ज्ञान असल्यास किंवा ठार अज्ञान असल्यास येतेच. मी दुसर्या वर्गात असल्याने माझी कुवत ओळखूनच हे प्रश्न विचारत आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सेव्हिग्ज अकाऊंटमध्ये पैसे
अर्थात बचत...ती कधीही गुंतवणूक मानली जात नाही.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
तसे असल्यास यामध्ये खरा
तसे असल्यास
हे वाक्य किमान सध्याच्या काळात गैरलागू का ठरू नये? जर व्यक्तीने/संस्थांनी बचत करायची नाही असे ठरवले तर बहुतांश बँका डबघाईला येतील का? आणि त्या द्वारे त्या बँकाच्या कर्मचार्यांची भाकरी हिरावली जाणार नाही का? शिवाय या बँका कर्जे देऊ शकणार नाहित त्या कर्जांवर नवे उद्योग उभे रहाणे कठीण होईल तेव्हा बचत अर्थात 'सेव्हिंग' न करणे अधिक (किंवा किमान तितकेच) खलनायकी नाहि का?
हेच प्रश्न लागु आहेत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अतिशय आक्षेपार्ह विधान
"(टीप - या निबंधाला असलेल्या तत्कालीन सामाजिक संदर्भांकडे दूर्लक्ष करू नये. मूळ लेखकाला नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्याच्या तुलनेत आपली बौद्धिक कुवत ओळखून मग खुशाल टीका करावी. सम्यक् विचार करण्याची क्षमता ज्यांच्याकडे नाही त्यांनी हा निबंध वाचण्याच्या फंदात पडू नये....)"
लेखाच्या सुरुवातीच्या ह्या विधानाला माझा जोरदार आ़क्षेप आहे.
टीका करणार्याची 'बौद्धिक कुवत' जर लेखनकर्त्याहून अधिक अथवा समान असली तरच त्याने टीका करावी, अन्यथा ती गंभीरपणे न घेतली जाण्याची शक्यता आहे असा गर्भित नियम घालणारे कोण हे दुड्ढाचार्य राजीव उपाध्ये आणि वाचकांच्या 'बौद्धिक कुवतीचे' मापन करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?
टीका किती गांभीर्याने वाचली जाईल हे टीकेच्या अन्तर्गत मूल्यावरच अवलंबून असावे. लेखकाच्या तुलनेत टीकाकाराचे बौद्धिक सामर्थ्य किती, तो लेखकाइतक्या सामाजिक दर्जाचा आहे काय असले मुद्दे संपूर्ण गैरलागू आहेत.
लेखकापेक्षा अधिक 'बौद्धिक कुवत' असलेल्याने निरर्गल टीका केल्यास चालेल काय?
राजीव उपाध्ये ह्यांच्या ह्या विधानाने औचित्यभंग झाला आहेच पण त्यांची टीप शब्दशः आणि तिच्याशी मतभेद न नोंदविता आमच्या माथ्यावर मारण्यामुळे धागाकर्त्यानेहि तोच औचित्यभंग केला आहे असे मी निषेधपूर्वक नोंदवितो आणि लेखावर येथे मतप्रदर्शन न करण्याचा माझा अधिकार बजावतो.
प्रास्ताविकाचा रसेलच्या निबंधाशी संबंध कळलेला नाही
प्रास्ताविकाचा रसेलच्या निबंधाशी संबंध कळलेला नाही.
रसेल निबंधाच्या समारोपात म्हणतो :
(ठळक ठसा माझा.) वेगवेगळे तर्क पुढे करून रसेल या निष्कर्षापर्यंत पोचतो, की समान वाटणी केली तर सर्वांनाच आराम आणि सुरक्षितता दोन्ही मिळतील. पण मूर्खपणाने समाजाने असमान वाटणी केली आहे. काही लोक अतिश्रम करतात त्यांचे पोट भरते, पण त्यांना आरामही नाही आणि सुरक्षितताही नाही. फावला वेळ असलेले भुकेले असतात, त्यांनाही आराम नाही की सुरक्षितता नाही. म्हणजे रसेलच्या मते शहाणपणा असा की श्रमाचा वेळ कमी व्हावा, आणि अधिक लोकांना या कमी-श्रमाच्या नोकर्या मिळाव्या. (पिनांच्या कारखान्याचे उदाहरण निबंधात दिलेच आहे.)
रसेलच्या निबंधातील सारांश वाक्यांचे वर दिलेले स्वैर भाषांतर प्रामादिक वाटते.
"काहीजण" आपणहून उपासमार वा अतिश्रम स्वीकारत नाहीत, असे रसेलचे म्हणणे नव्हे तर "आपण म्हणजे समाजाने मार्ग निवडला आहे" की काही जणांनी अतिश्रम करावा आणि काही जणांची उपसमार व्हावी. (खुद्द अतिश्रमाने गांजलेले किंवा उपाशी लोक तो-तो मार्ग आपणहून स्वीकारत नाहीत.)
+१
धनंजय यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
हा निबंध रसेल यांनी great depression च्या काळात लिहिलेला आहे हे ध्यानात घेणेही महत्त्वाचे आहे. मंदीच्या काळात लोकांचा कल बचत करण्याकडे असतो. रसेल यांचा निबंध त्यासंदर्भात (ग्राहकांनी बचतीपेक्षा मिळकत विविध गोष्टींवर खर्च केल्यास मंदीचे परिणाम कमी होतील) असावा असे वाटते.
उधळपट्टी
या संदर्भात येशूचे एक उदाहरण आठवते. मेरी मॅग्डालीनने त्याच्या पायांवर अत्तर वाहिले तेंव्हाही 'हा पैसा गोरगरिबांसाठी खर्च करता आला नसता का?' अशी ओरड काही लोकांनी केली. त्यावार येशूने दिलेले उत्तर चिंतनीय आहे. 'गोरगरीब हे कायमचे आहेतच. मी आज आहे, उद्या नाही. त्यामुळे तिला जे करायचे ते करु द्या.' तात्पर्य, उधळपट्टी नको म्हणून उधळपट्टी नसावी. तोच पैसा वापरुन रोजगार हमी योजना, इंदिरा आवास योजना राबवा, म्युनिसिपालटी डासांचे औषध मारा, झोपडपट्टीतल्या लोकांचे पुनर्वसन करा असला भाबडेपणा नसावा.
अवांतरः स्वतः कठीण परिस्थितीतून गेलेल्या लोकांना पैशाचे, अन्नाचे मोल कळते असे वाटते. होस्टेलच्या मेसला कित्येक वर्षे जेवल्यानंतर (साधारण ज्याचा विवेक शाबूत आहे असा ) कोणीही माणूस उरलेल्या आयुष्यात अन्नाची नासाडी करणार नाही, असे माझे (अगदी ढोबळ) मत आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
अवांतरासम उदाहरणः
एका पोलिश मित्राची आजी जर्मन यातनातळावर राहून आलेली आहे (का होती?). या मित्राने लहान वयात देशातलं कम्युनिष्टांचं राज्यही बघितलेलं. आजीची विवक्षित गोष्ट त्याने सांगितली ती म्हणजे जेवताना ब्रेडक्रम्ज (पावाचे कण) टेबलावर सांडले तर ती ते सुद्धा गोळा करून खात असे, अगदी कम्युनिष्टांचं राज्य गेल्यानंतरही!
अशी टोकाची उदाहरणं रोज दिसत नाहीत खरं.
रसलची मतं साधारण १०० वर्ष जुन्या, ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समाजाला उद्देशून असण्याची शक्यता अधिक वाटते. त्यामुळे भारतीय समाजाबद्दल बोलताना ही मतं जशीच्या तशी लागू पडतील असं वाटत नाही. उदा: "तुम्हाला मांस पुरवणारा खाटिक आणि पाव देणारा पाववाला हे स्तुतीला पात्र ठरतात. का तर ते पैसे कमावतात. पण तुम्ही जेव्हा त्यानी निर्माण केलेल्या अन्नाचा आनंद घेता तेव्हा मात्र ती चंगळ ठरते."
दुसरा एक युद्धखोरीचा मुद्दा वर आलेला आहेच.
सद्यपरिस्थितीत या निबंधाचा अर्थ लावायचा असेल तर सतत वाढत जाणार्या अर्थव्यवस्थेवर केलेली टीका म्हणूनही या निबंधाकडे बघता येईल. अर्थव्यवस्थेतला पैसा किंवा मौल्यवान गोष्टी वाढतच जाणार यावर त्याने टीका केलेली आहे असा माझा समज झाला. (शब्दांत नीट मांडता आलेलं नाही.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सहमत
अदितीशी सहमत.
एखादा लेख वा निबंध हा त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीवर आधारित असतो. परिस्थिती काळानुसार बदलत असते. १०० वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती आता अजिबातच राहिलेली नाही. कामगारांना आठ तासाच्या नोकरीवर ठेवले तर ते स्वतःहूनच सांगतात की बारा तासांची नोकरी (त्याप्रमाणे पगार) दिली तरच करु, नाहीतर दुसरी कंपनी शोधू. कारण आठ तासांत जो पगार मिळणार असतो त्यात त्यांचे भागत नसते.
मूळ लेख व चंगळवाद यांचा संबंधही ओढून ताणून लावल्यासारखा वाटतो. भारतासारख्या देशात, येत्या काही वर्षांत किती महागाई वाढणार आहे याचा कोणीच अंदाज बांधू शकत नाही. अशा वेळेस, कुठलाही सूज्ञ नागरिक जास्त शिल्लक ठेवणारच. आपण कधी मरणार आणि महागाई किती वाढणार हे नक्की कळले तरच कदाचित, माझ्यासारखा निवृत्त गृहस्थ चंगळवादी बनेल. ते सुद्धा आत्तापर्यंतचे संस्कार करु देणार नाहीत. सभोवताली गरीब लोक दोन वेळच्या जेवणासाठी झगडत असताना महागड्या हॉटेलात पुख्खे झोडणे मनाला पटणार नाही.
अवांतर:- कोल्हटकर साहेबांची प्रतिक्रिया वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती. तसेच संजोप राव यापेक्षा विस्तृत प्रतिक्रिया देतील असे वाटले होते. पण निराशाच पदरी आली.
असे
तुम्हाला तारतम्य आणि विवेक हेच सांगायचे आहे ना?
आताच ही बातमी वाचली
आताच ही बातमी वाचली
m.timesofindia.com/city/bangalore/Wedding-food-worth-Rs-339-crore-goes-waste/articleshow/16774949.cms आणि ही दुसरी
m.timesofindia.com/india/Indias-score-alarming-on-hunger-map/articleshow/16775168.cms
अन्नाच्या नासाडी वरुन आठवले
१. ऑफिसात फुकट मिळणारे जेवण भरपूर वाढुन घेउन रोज अर्धे टाकुन देणाऱ्याला त्याबद्दल टोकले असता 'हे काय वाया जात नाही. भटके प्राणी, पक्षी, बेक्टेरीआ वगैरे खातात ते' म्हणणारे
२. ऑफिस पूल पार्टीत फुकट मिळणारी दारु स्विमिँग पूल मधे टाकुन 'आज हम दारु मे नहायेँगे' म्हणणारे
३. केक तोँडाला लावणारे
आणि इतर बरेच...