निबंध : माझे आवडते डावे ऋषीमुनी - चार्वाक
मी डावा आहेय आणीक सोडावॉटरच्या फॅक्टरीच्या परिसरात जन्माला आल्याने कम्युनिस्ट झालेलो आहेय. आमच्या लहानपणी मला अंकलिपी घेउन देतांना त्यासोबत अंकलिपीच्याच आकाराचे मार्क्सबाबाचे एक पुस्तक घेउन दिले होते. अंकलिपीतुन अ आ इ शिकल्यानंतर लगेचच मी मार्क्सबाबाचे पुस्तक वाचुन संपवावे असे माझ्या बाबांना वाटत असावे. मी अंकलिपीतीला अभ्यास संपवण्याआधीच मार्क्सबाबाचे ते लहानसे पुस्तक वाचुन संपवले. आणीक मला ते व्यवस्थीत समजले. आपल्याकडे लहान मुलांना आगोदर अंकलिपी देण्याआगोदर मार्क्सबाबाचे चरीत्र वाचायला द्यायला पाहिजे असे वाटते. ह्या विचाराने मी प्रेरीत होउन ही चरीत्रे कुठे छापली जातात त्या छापखान्याच्या शोधात निघालो. छापखाना जवळच्याच शहरात होता. मी दुपारी तिथे गेलो तेंव्हा छापखान्यात काम चालु होते आणिक भिंतीवरती मारुतीच्या फोटोसमोर हार लावलेला होता. अशा दैववादी छापखान्यात आमच्या मार्क्सबाबांची पुस्तके छापली जातात ह्याबद्दल वाईट वाटले. त्यानंतर मी सहजच काय काय छापले जाते ते शोधण्याच्या प्रयत्नात समोर ठेवलेले गठ्ठे चाळुन पाहिले तर त्यात मार्क्सबाबाची आणखी लहानसहान पुस्तके होती पण त्याशिवाय हनुमान चालीसा आणिक लक्ष्मीव्रतकथा आणि कोकीळाव्रताची कहानी सांगणारी लहान पुस्तकेही होती. हे पाहुन मला आश्चर्य वाटले. बाहेर विचारधारा निरनिराळ्या असल्या तरी त्या एकाच छापखान्यात छापल्या जातात हे पाहुन गंमतही वाटली. एका व्रतकथेच्या पुस्तकाच्या गठ्ठ्यात एक पुस्तक मी चाळुन पाहिले तर त्यातली मधली दोन पाने कम्युनिस्ट मॅनफिस्टोची पाने आहेत असे दिसले. बायंडरकडुन काहीतरी चुक झाली असेल म्हणुन मी घाईनेच ते पुस्तक उचलुन छापखान्याच्या मालकाकडे गेलो तर तो माझ्याकडे विचित्र नजरेने पहात होता. आज मी मोठा झाल्यानंतर ती एक ट्रिक होती असे वाटते. येनकेन प्रकारेन प्रचार हा करीत राहिला पाहिजे. ह्यावरुन महर्षी चार्वाकांचे एक हे सुंदर सुभाषित आठवले.
माझे एक जेष्ठ मार्गदर्शक म्हणतात वैश्विक वैगेरे विचार करुन भारतीय राजकारण शोधणे काही खरे नाही. आपण इथले आगोदर पाहिले पाहिजे आणीक मुलभुत प्रश्न समजाउन घेतले पाहिजेत. मला त्यांचे बोलणे थोडेफार पटते. शेवटी कितीजरी झाले तरी मार्क्स हा पाश्चिमात्य होता आणि शिवाय ज्यु ही होता. आज एक द्वितीआंश मिडीया हा ज्यु लोकांच्या ताब्यात आहे त्यामुळे कशावरुन मार्क्सने 'कम्युनिस्ट मॅनीफीस्टो' हे पुस्तक ज्यु लोकांनी माध्यमे त्याब्यात घेण्यासाठी म्हणुन लिहले नसेल? असाही प्रश्न उपस्थित होतो. ह्यावर उपाय म्हणुन मला काही लोकांनी चार्वाक आणि लोकायत विषयी सांगितले. तेंव्हापासुन चार्वाक हा मध्ययुगीन काळातला मार्क्सच आहे असे मला सारखे सारखे वाटत राहते. ज्याप्रमाणे मार्क्स नेहमी अपोकोलोप्टीक लिहत राहिला आहे त्याप्रमाणेच चार्वाकही अपोकोलिप्टीकच लिहतो. उदाहरणार्थत तो म्हणतो ''यावज्जीवेत सुखं जीवेद, ऋणं कृत्वा घृतं पिवेत'' म्हणजे माणसाने जगुन जगायचे तर सुखाने जगावे, कर्ज काढुन तुप खावे. ह्या वाक्याचा अर्थ अनेकजण चार्वाक हा भौतिकदावादी होता असा घेतात. देशीवाद्यांसोबत दारु प्यायला बसल्यास ते चार्वाकाच्या नावावर हमेशा काट मारतात कारण नेमाडेंनी खालच्या जातीतल्या लोकांना चार्वाकवादी असे संबोधले आहे.
मग चार्वाकाच्या ह्या सुभाषिताचा नेमका अर्थ काय? हे जर समजाउन घ्यायचे असेल तर आगोदर चार्वाकाने हे विधान कुठल्या काळात केले आहे ते समजाउन घ्यावे लागेल. उदाहरणार्थ मध्ययुगिन भारतातली नगरे ही अनेक युद्धे आणि लढाया जिंकुन मग वसवली जात असतं. लढाई संपल्यानंतर विजेत्या राजाची आणि त्याच्या नगराची भरभराट होत असे. पराभुत झालेल्या राष्ट्राकडुन लुट म्हणुन वा खंडनी म्हणुन विपुल प्रमाणात हिरे माणके, फळफळावळे, सुके मेवे, मध इत्यादी पदार्थ नगरीत येत. हे पदार्थ अर्थात राजा व त्याच्या मंत्रीपरीषदेसाठी असत. ह्या मंत्रीपरीषदेशिवाय कधीकधी सरंजामदार आणि सामंतदार ह्यांनाही ह्या गोष्टी मिळत असत पण त्याचा उपभोग न घेता ते लोक ह्या गोष्टी काळाबाजारात विकत आणि तिथुन मग ते पैसा असलेल्या कुठल्याही सामान्यजनतेला विकत घेण्यासाठी उपलब्ध होत. लढाई, युद्ध आणि लुटालुटीचा काळ हा दर चार वर्षांनी एकदा येत असे. ह्यावेळी मांडलिकत्व स्विकारलेल्या राजांनी खंडणी वेळेवर पाठवली तरी त्यांच्यावर ठस्सी द्यावी म्हणुन हल्ले केले जात आणिक खंडणी वाढवुन घेतली जाई. मग पुन्हा चार वर्षे नगरीत भरभराट होई. ही भरभराट कधीकधी खुप जास्त होई आणि उपभोग्य वस्तुंच्या वितरणासाठी निरनिराळे लोक कर्जे देउ लागत. ह्या कर्जाचा दर चार टक्के वा दहा टक्के इतका असे.
कर्ज स्वस्त झाले म्हणजे अनेक लोक ते मिळवित आणि त्यातुन उपभोग्य वस्तु विकत घेउन मजा करीत. मग हळुहळू ही कर्जे वाढायला लागत आणि ती वसुल करण्यासाठी धनको ऋणकोंना निरनिराळ्या प्रकारांनी छळत. हे सगळे ऋणको सामंत आणिक सरंजाम असल्याने ती दरवेळेस ऋण चुकते करीतच असे नाही. त्यामुळे मग ऋण महाग होत असे. ते एकाचवेळी दहा बारा सोळा प्रतिशतवरुन कधीकधी वीस प्रतिशत पर्यंतही जात असे. अशावेळी राजा युद्धाची तयारी सुरु करी. युद्ध सुरु होण्यापुर्वी चंगळवादाचे प्रमाण वाढत जाई. बाजारात निरनिराळ्या दारवा आणि भांगेचे पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध होत. ह्यासोबत काही रंगमहाली फॅशनशोजचे आयोजन करण्यात येई. ह्या फॅशन शोजमधले कपडे हे तोकडे असत आणीक निरनिराळ्या सुंदर स्त्रीया आगमपट्टीकेवर (Ramp) चालुन दाखवुन त्याचे प्रदर्शन करुन नेत्रसुखाची उधळण करीत. नेत्रसुख कसे घ्यावे ह्यासंबधी निरनिराळ्या पोथ्या रचल्या जात. ह्या फॅशनशोजला नव्यताप्रदर्शनउत्सव असे म्हटले जाई. ह्या नव्यता प्रदर्शनाचा प्रमुख गुणधर्म म्हणजे त्यात काही अंतर्वस्त्रांचेही प्रदर्शने असत ज्याला नागरिकांचा विशेष प्रतिसाद मिळे. ही अंतर्वस्त्रे सोन्याच्या बारीक तारांमध्ये मोती आणी माणकांची गोफन करुन बनविलेले असत. ही अशी मोत्यांनी बनविलेली लहान अंतर्वस्त्रे बाजारात आली म्हणजे आता लवकरच युद्ध होणार आहे आणि त्यात लोक मरतील, आर्थिक विध्वंस होईल आणि सुखाचे दिवस सरतील हे बुद्धिवाद्यांना आपसुकच कळुन येई. मोत्याची अंतर्वस्त्रे ही अर्थव्यवस्था लवकरच कोसळणार आहे ह्याचेच द्योतक असायची. मग अशावेळी आयुष्याचा काही भरवसा रहात नसे आणि काही लोक येउ घातलेल्या युद्धामुळे काळजीत पडत. त्याचवेळी ऋणांवर शतप्रतिशत व्याज चढविले जाई. दिलेले ऋण परत मिळेलच ह्याची धनकोंना खात्री नसायची. नेमके अशावेळी चिंतीत न होता शंभरच काय पण दोनशे प्रतिशतने कर्ज मिळत असले तरी ते चुकवावे लागणार नाही हि शक्यता लक्षात घेउन चार्वाक म्हणतो की एवीतेवी आता विनाश जवळच आला आहे जो थांबविला जाउ शकत नाही त्यामुळे उरलेसुरले आयुष्य आता सुखात जगावे. ऋण काढुन त्यातुन तुप विकत घ्यावे आणिक आयुष्याची मजा घ्यावी.
'ऋणं कृत्वा घृतं पिवेत' ह्या वाक्याचा थेट अर्थ काढुन आपल्याकडे फार उलटसुलट चर्चा होत असतात पण ऋणांच्या काळातली परिस्थीती काय होती? आर्थिक विकासाचा दर काय होता? अर्थव्यवस्था कोसळण्याची शक्यता किती होती? धनको दुर्बल आणि ऋणको सबल अशी परिस्थीती का निर्माण झाली? ह्यावर कुणीही काहीही बोललेले नाही. चार्वाकाच्या काळातुन आजच्या काळात आल्यानंतर नेत्रसुखाचे निरनिराळे सोहळे आपल्या सभोवताली जोरात चालले आहेत हे स्पष्ट दिसते. ह्याशिवाय लोक क्रेडीट कार्डावर चॉकलेट, कँडी आणि फॅट वाढविणारे निरनिराळे पदार्थ विकत घेतात इतकेच काय तुपही विकत घेतात. क्रेडीट कार्डावर तुप घेणार्यांची संख्या वाढली आहे आणि ह्याचवेळी जगातल्या निरनिराळ्या बाजारपेठांमध्ये महागडी अंतर्वस्त्रे विक्रीसाठी आलेली आहेत ज्यात काही मोत्यांपासुनही बनविलेली आहेत. अशा अतंर्वस्त्रांचे निरनिराळे शोज करुन विजय मल्यासारखे लोक कर्ज बुडवुन पळुन गेले आहेत.
मोत्यांची अंतर्वस्त्रे ही उपभोगतावादाचा चरमबिंदु असतो आणि त्यापश्चात अर्थव्यवस्था कोसळणार हेही स्पष्ट असते. ही अर्थव्यवस्था नेमकी कशी कोसळेल ह्यासंबधी निरनिराळे विद्वान निरनिराळे अंदाज लावीत असतात पण त्या सर्वांचे अंदाज चुकलेले आहेत. ह्याचाच अर्थ आता अर्थव्यवस्था कोसळणे जरी नक्की असले तरी ती कशी आणि केंव्हा कोसळेल हे कुणीही सांगु शकत नाही. दरम्यान जेनेट येलेन ह्यांनी ही आर्थिक परिस्थीती सबळ करण्याकरीता कळीच्या व्याजदरात पाव अंकाने वाढ केली आहे. कर्जे आता स्वस्त रहाणार नाहीत परंतु लोकांचा उपभोगाची सवयही कमी होणार नाही. अर्थव्यवस्था नेमकी कशी कोसळेल हे आता बुद्धीवादी सांगु शकत नसतील तर त्यांनी निदान वाढत्या दरांचे कर्ज घेउन सुखाने जगायला काही हरकत नाही. मार्क्सने सांगितलेली वा चार्वाकाने अव्हेरलेली जगबुडी अशीही होणारच आहे त्यामुळे .... यावज्जीवेत सुखं जीवेद, ऋणं कृत्वा घृतं पिवेत.
प्रतिक्रिया
हा हा हा
हा हा हा
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बनसोडे गुरुजी नेहमीप्रमाणे
बनसोडे गुरुजी नेहमीप्रमाणे थोर . ( पण शेवटच्या दोन परिच्छेदात जरा ओढून ताणून सुटल्यासारखे वाटले .. ... )
सहमत.
शेवटचे दोन मुद्दे काहीसे योग्य आणि खरे असले तरी मुळ लिखाणाला ठिगळ लावल्यागत वाटतात. शेवट क्वालीटी विनोदापर्यंत नेता आला असता पण ते झाले नाही
बनसोडे गुर्जी , दोन
बनसोडे गुर्जी , दोन परिच्छेदांचं निरीक्षण पटल्यामुळे तुम्ही नापास ( पुढे ऍग्री करून पुष्टी दिलीत , हे "तुम्हाला प्रगती करायची आहे" याचे दर्शक )
बाकी जाऊ द्या पण काही वाक्यांमुळे आपण फिदा आहे तुमच्यावर ( या रिमार्क मुळे मी पण नापास !!) फ्यान क्लब वगैरे काढा म्हणतो मी ( हे लिहिल्याने मला शाळेतून काढून टाकायला हवे)
भन्नाटच. बाकी चार्वाक नावाचा
<हसत गडाबडा लोळणारी स्मायली>
भन्नाटच. बाकी चार्वाक नावाचा एक ऋषी नव्ह्ता असं कुठल्याश्या व्रताच्या पुस्तकात वाचल्याचं आठवतय. अर्थात तेही ’आवडते डावे ऋषीमुनी’ या शिर्षकात चतुरपणे सुचवलं आहे. हा अंकलिपीआधी मार्क्सबाबा वाचल्याचा परिणाम बरें.
व्रतांच्या पुस्तकात कम्युनिस्ट मॅनिफेस्टोची पानं मुद्दाम घालतात. म्हणजे पुस्तकाचे बायंडिंग शाबूत रहाते म्हणे.
सगळे बुद्धीवादी सुखानेच जगतायत की आता तर त्यांना बुद्धी वापरायची ही गरज नाही जुने ग्रंथ चाळले की झाले काम.
चार्वाकदर्शन
'यावज्जीवेत्सुखं जीवेत्' हा सर्वश्रुत श्लोक चार्वाकाचा नाही. किंबहुना चार्वाकाचे असे निश्चित सांगता येईल असे काहीच उरलेले नाही. त्याचे तत्त्वज्ञान म्हणून जे आपल्यापुढे आहे ते त्याच्या विरोधकांच्या मुखातूनच आपल्याला कळते. 'यावज्जीवेत्सुखं जीवेत्' हा श्लोक सायणमाधवाचार्यांच्या 'सर्वदर्शनसंग्रह' संग्रहात चार्वाकमताचा दुसरा पुरस्कर्ता बृहस्पति - हाहि अज्ञातच - ह्याच्या मताचे प्रदर्शन करणारे म्हणून जे श्लोक दाखविले आहेत त्यांमध्ये एक आहे. सायणमाधवाचार्यांच्या दृष्टीतून चार्वाकदर्शन कसे दिसते ते देवीप्रसाद चट्टोपाध्याय ह्यांच्या 'लोकायत' नावाच्या पुस्तकात खालील शब्दांमध्ये दर्शविले आहे:
अगदी अगदी
तुम्ही सांगितलेला संदर्भ बरोबर आहे आणी चार्वाक दर्शनासंदभात मुळ इंग्रजी संशोधनाचे दुवे हे बरेचसे व्यवस्थीत आणी नेटके विस्तारीत आहेत. निबंधातला नायक मराठी लोकांच्या त्यातही देशीवादी लोकांच्या दारुच्या चर्चांमधुन आलेल्या चार्वाकाबद्दल बोलतो आहे आणि मौखीकात त्याचा वापर असाच केला जातो. ह्याशिवाय संसदेसह इतर अनेक ठिकाणी चार्वाकाच्या अर्थांचा गैरअर्थ करुन काहीही सांगितले जाते. मुळाता चार्वाक ही एकच व्यक्ती आहे हेही स्पष्ट झालेले नाही पण तो व्यक्ती असावा आणि डाव्यांचा कौटिल्य वैगेरे असावा अशा हिशेबाने चर्चा चालु असतात.
सुंदर लेखन!
सुंदर लेखन!
धन्य!
हा हा हा! भारी लिहिता राव तुम्ही :-)!