सरकार, मैने आपका अंडा खाया है सरकार...
कुक्कुटसमाजाचे मानवी जीवनावर जेवढे उपकार मानावे तेवढे कमीच. अंड्यांचा शोध लावण्याचं श्रेय या समाजाकडे जातं. या समाजाला इतिहास काही दशलक्ष वर्षे मागे जातो. आज जगभर सर्वत्र उत्खननातून डायनोसॉरची म्हणून जी अंडी बाहेर काढली जातात ती खरे तर कुक्कुट समाजाने निर्माण केली आहेत. मात्र कुक्कुट समाजाचा नंतर जो र्हास होत गेला (घडवून आणला गेला, कसे ते पुढे येईलच) त्यात अंड्यांचा शोध लावण्याचे श्रेयही कुक्कुट समाजाकडून हिरावून डायनोसॉर समाजाला परस्पर देण्यात आले. मात्र ही थिअरी खरी नसून उबवलेली आहे हे मी यापूर्वीच सिद्ध करून दाखवले आहे, तरी वाचकांच्या सोयीसाठी त्यातला प्रमुख मुद्दा पुन्हा मांडतो. तो म्हणजे, डायनोसोरची उंची सर्वसाधारणपणे पन्नास ते साठ फूट असे. आणि त्यांचे हात फार लहान असल्यामुळे त्यांना खाली बसता येत नसे, आणि एकदा बसल्यावर पुन्हा उठता येत नसे. अशा परिस्थितीत पन्नास फुटांवरून खाली पडलेले अंडे फुटणार नाही काय? यावरून ही अंडी कोंबड्यांचीच आहेत हे सिद्ध होते. तसेच या अंड्यांच्या आकारावरून त्या काळातील कोंबड्या सुमारे आठ ते नऊ फूट उंच असाव्यात असे अनुमान काढता येते.
कुक्कुट समाज हा सूर्यपूजक होता. ऋग्वेदातील सूर्यप्रशंसक सूक्ते ही त्यांनीच लिहीली असावीत असा कयास करण्यास जागा आहे. ही सूक्ते सूर्योदय होताना गायली जात. आजही या समाजात सूर्योदयाच्या वेळी सूर्योपासना करण्याची प्रथा आहे. मात्र दरम्यानच्या काळात या समाजाच्या संस्कृतीचा जो र्हास झाला, त्यात या समाजाची भाषाही लोप पावली, आणि आज केवळ सूर्य उगवल्यावर 'कुकुचकु' अशी बांग देऊन ही उपासना करण्याची प्रथा शिल्लक राहिली आहे.
इतिहास हा केवळ माणसांनाच नाही तर ज्यांनी अंडी उबवली अशा सर्वांचा आहे. अंडी नसती तर आज मानवजातीची काय अवस्था झाली असती? रोज हातगाडीवर आम्लेटपाव खाऊन कामाला लागणार्या कष्टकर्यांची काय स्थिती झाली असती? आपल्या जिभेचे चोचले पुरवणारे बैदा करी, बैदा मसाला असे पदार्थ अस्तित्वात तरी आले असते काय? आपल्या सुसज्ज किचनमध्ये दिमाखात केक बनवणार्या उच्चभ्रूंचे केक अंड्यांशिवाय फुगले असते काय? आणि ते खाऊन त्यांची पोटे फुगली असती काय? नाट्य, गायन, अभिनयकलांचे पावित्र्य अंड्यांशिवाय राखले गेले असते काय? बेसूर गायक, सुमार नाट्यप्रयोग, आपल्या विरोधी मताचा प्रचार करणारे व्याख्याते यांच्यावर फेकण्यासाठी अंडी कोठून आली असती बरे?
अंड्यांमुळे इतिहासात मोठमोठी युद्धे लढली गेली. अठराव्या शतकात फ्रान्समध्ये अंडी अतोनात महाग झाली. त्या वेळी फ्रेंच सम्राज्ञी मेरी अंड्वानेतने भुकेलेल्या रयतेसमोर काढलेल्या 'अंडी नाहीत तर भेंडी खा' या उर्मट उद्गारांपायी चौदाव्या लुईला लोकांनी चौदावे रत्न दाखवले आणि त्यातूनच फ्रेंच राज्यक्रांतीची मुहूर्तमेढ रचली गेली, हे आपण विसरता कामा नये. भारतीय स्वातंत्र्ययुद्धातही अंड्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. 'तुम मुझे अंडे दो, मैं तुम्हे आम्लेट दूंगा', ही घोषणा कोण बरे विसरेल? ब्रिटीश सरकारने अंड्यांवर बसवलेल्या कराच्या निषेधार्थ मोहनदास गांधी नावाच्या एका गुजराती पुढार्याने दांडी या गावी पदयात्रा काढून मूठभर अंडी गोळा केली, आणि त्यातून ब्रिटिश सत्तेला जो हादरा बसला, त्याचीच परिणती 'चले जाव' च्या आंदोलनात होऊन शेवटी इंग्रजांना या देशातून गाशा गुंडाळावा लागला. तर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले, ते अंड्यांमुळे. खरे तर, भारताच्या झेंड्यावर अशोक-चक्राऐवजी अंड्याचे चित्र असावे, अशी मागणी मी करेन.
अंड्याच्या व्यापारावर जगात मोठमोठी शहरे उदयास आली. अंडमान बेटे, अंडाल्युशिया ही एकेकाळी अंडोत्पादनाची महत्त्वाची केंद्रे होती. ज्या प्रदेशांत ज्या जातीची अंडी मिळत त्यावरून त्या त्या देशांना ती ती नावे पडली. उदाहरणार्थ, 'इंग्ल' या प्रकारची अंडी निर्माण करणारा प्रांत, म्हणून इंग्ल + अंड --- इंग्लंड असे नाव पडले. अशाच प्रकारे डॉय्श्ल, नेदर्ल, फिन्ल या प्रकारची अंडी उत्पन्न करणारे देश अनुक्रमे डॉय्श्लंड, नेदरलंड, फिनलंड अशा नावांनी पुढे ओळखले जाऊ लागले.
आज आपण जीवनाच्या सर्व क्षेत्रांत कॉम्प्युटरचा उपयोग करतो, पण कॉम्प्युटिंगचा पायाच मुळी अंड्यावर आधारित आहे. अंडी फोडण्याच्या दोन पद्धती शास्त्रात सांगितल्या आहेत. एक म्हणजे मोठ्या बाजूने फोडणे व दुसरी लहान बाजूने फोडणे. या दोन पद्धतींवरून 'बिग अंडियन' आणि 'लिटल अंडियन' असे दोन पंथ उदयाला आले. आजच्या सर्व संगणनप्रणालींचा पाया हा या दोनपैकी एका पद्धतीवर आधारलेला असतो, हे कोणताही संगणक तंत्रज्ञ आपणाला सांगेल.
आता प्रश्न असा पडतो, की मानवी संस्कृतीवर इतका प्रभाव टाकणार्या कुक्कुट समाजाची काळाच्या ओघात इतकी अधोगती का झाली? याला कारण दुसरेतिसरे काही नसून मनुवादी बामणी धर्म!
कुक्कुट समाजाची वाढती प्रगती होत असलेली पाहून सहन न झालेल्या या लोकांनी हळूहळू या समाजाला वाळीत टाकायचे धोरण अवलंबले. यासाठी त्यांनी अनेक पातळ्यांवरून या समाजाचे शिस्तबद्ध खच्चीकरण घडवून आणणे सुरू केले.
सर्वप्रथम त्यांनी कुक्कुट समाजाचा थोर तत्ववेत्ता अंडनमिश्र आणि वैदिकांचा म्होरक्या शंकराचार्य यांच्यात वाद घडवून आणून संख्याबळाच्या जोरावर आणि राजसत्तेच्या पाठिंब्यावर शंकराचार्याला विजेता म्हणून घोषित केले. त्यानंतर कुक्कुटांनीच लिहिलेले वेद वाचण्याची त्यांनाच बंदी करून ते वेद हळूहळू आपल्याच नावावर खपवून दिले.
इतक्यावरच हे वैदिक थांबले नाहीत तर त्यांनी कुक्कुट समाजाला शह देण्यासाठी गौ-समाजाला अधिकाधिक राजाश्रय आणि धर्माश्रय देण्याचे सुरू केले. यापूर्वी भारतखंडामध्ये गायीचा समावेश आहारात केला जात असे व एक उपयुक्त पशु यापलिकडे त्यांच्याकडे पाहिले जात नसे. मात्र या वैदिकांनी गायीला अनन्यसाधारण महत्त्व देऊन गायीला देवता म्हणून घोषित केले. त्यांनी गाय खाणे निषिद्ध ठरवले व चक्क कुक्कुटाहाराला शास्त्रमान्यता दिली! ज्या भारतखंडात कुक्कुटसमाजाचे स्थान अत्यंत वरच्या श्रेणीवर होते तेथे सकाळसंध्याकाळ चुलीवर चक्क कोंबड्या शिजू लागल्या.
गौ-समाजाच्या हे पथ्यावरच पडले. त्यांनीही, मानवांनी अधिकाधिक कोंबड्या खाव्यात म्हणून 'अधिक कोंबड्या खा' ही मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत कुक्कुट समाजाची जी ससेहोलपट झाली तिला इतिहासात तोड नाही. ही मोहीम शतकानुशतके चालली. अमेरिका वगैरे देशांत, जिथे अजून गोवधबंदी पुरेशी प्रचलित झाली नाही तिथे तर ही मोहीम अजूनही राबवली जाते. उदाहरणार्थ, हे पहाः
या सर्वाचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि कुक्कुटसमाजाला स्थानभ्रष्ट करण्यात वैदिकांनी यश मिळवले. आज हा समाज अत्यंत हलाखीचे आणि उपेक्षेचे जिणे जगतो आहे. तर अशी आहे कुक्कुट समाजाची कहाणी. आज जरी हा समाज उपेक्षेचे जिणे जगत असला, तरी यांचे योगदान आपण विसरता कामा नये.
प्रतिक्रिया
खवचट खानावणी झिंदाबाद.
खवचट
खानाओकवणी झिंदाबाद.--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कुक्कुट समाजाचे धडाडीचे
कुक्कुट समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते श्री खवचट खान यांचा विजय असो
कोँबडी अंडे या विषयावरील त्यांच्या लेखाची आम्हाला नेहमीच उत्सुकता असते
याविषयाचा त्यांचा व्यासंग वाखाणण्याजोगा आहे
सध्या श्रावण चालू असल्याने या मांसाहारी* धाग्यावर प्रतिक्रीया देणार नव्हते पण एकेकाळी संडे हो या मंडे रोज खावो अंडे याची मनपूर्वक अंमलबजावणी केल्यामुळे प्रतिसाद दिला आहे
* अंडे शाकाहारी की मांसाहारी यावर खवचट खान यांनी प्रकाश पाडावा ही विनंती
.
_/\_
खवचट खान यांच्यासारख्या महान इतिहासतज्ञांनी आपले कार्य असेच पुढे सुरू ठेवावे ही विनंती. त्यात त्यांना मदत म्हणून आमच्याकडून जे जे शक्य आहे ते सर्व आम्ही करू. उदा: या ऐतिहासिक महत्त्वाच्या लेखात त्यांनी, स्वातंत्र्यलढ्यातले महत्त्वाचे गीत, ज्याला घाबरून ब्रिटीश लेखक, कवी आणि साहित्यिकांनी गुरू, पक्का, जंगल असे शब्द इंग्लिश भाषेत नेले, ते गाळले आहे:
फोडलेस तू अंडे तव्यावर, साम्राज्याचा खचला पाया.
याशिवाय कुक्कुट समाज एकेकाळी खेळातही अग्रणी होता. आज ऑलिंपिकमधे पदकांची वानवा आहे म्हणून आपल्याकडे कंठशोष केला जातो, पण लंगडीसारख्या खेळांमधे कोंबड्या एकेकाळी अतिशय प्रवीण होत्या. धावण्याचा त्यांना प्रचंड सराव होता. त्यांची अधोगती म्हणजे भारतीय खेळाडूंची अधोगती. उदा हे गाणे पहा:
कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाया लागली.
"हाल कैसा है जनाब का" सारखी प्रचलित हिंदी गाणी एका कोंबडीला पकडता न आल्यामुळे लिहीली गेली आहेत हे ही आजच्या भारतीय समाजाने विसरू नये.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अवमान, घात, तंबी
खवचट खान नामक माणसाने (त्याचे खरे-खोटे नांव/जात काहीही असो) गौ समाजाचा (आणि तदनुषंगिक सर्वच दुग्धदात्या सस्तन प्राण्यांचा) घोर अवमान केलेला आहे.
गायीबैल वेदांपेक्षा पुरातन आहेत हे सत्य नाकारत ते श्रेय स्वत:कडेच ठेवायचे आहे.
सकाळी गायी पण हंबरत दूध देतात आणि दिवसभर गावभर चरून मग दिवेलागणीला घरी परत येतात. त्यामुळे सूर्यावर आमचा पण हक्क आहे. हे सत्य त्यांना पुरेपुर अमान्य आहे.
केकमध्ये लोणी पण घालतात. आणि मावा केक तर कित्ती छान लागतो. पण आमचं योगदान त्यांना अमान्य आहे.
इथल्या मालकचालकांचे पित्ते लगेच चान्चान प्रतिसाद द्यायला आलेत. इतरांना तुच्छ समजण्याची ही झुंडशाहीची प्रवृत्ती समाजविघातक आहे.
स्वत:ला काही जमत नसेल तर किमान निरशा दुधाच्या भरल्या बादलीत मुत्तू नये.
दोषी ख-या नांवाचे असोत कि खोट्या, भारतात रहात असोत कि विदेशात, त्यांना जेरबंद केले जाईल.
चहासुद्धा दुधाशिवाय्चा कोरा प्यावा लागेल तेव्हा वठणीवर याल.
मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.
स्वत:ला काही जमत नसेल तर
निरशा दुधाच्या बादलीत अंड्याच्या साली फेकू नयेत कसं वाटेल?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुमचा मानसन्मान ठेवा
तुमचा मानसन्मान ठेवा तुमच्याकडेच. सकाळी सूर्योपासनेच्या पवित्र वेळी तुमच्या गायी गवळ्यांना आपल्याबरोबर कसला व्यवहार करू देतात ते पाहिलं की मान खाली जाते! त्याउलट शालीन कोंबड्या बघा, माणसांना जवळही येऊ देत नाहीत.
चहाबद्दल म्हणाल तर चहात दूध घालून पिण्यासारख्या गावठी सवयी आम्ही केव्हाच सोडून दिल्या आहेत. आम्ही ब्लॅक कॉफी पितो, लोण्याऐवजी मार्गरिन वापरतो आणि शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतो. तुमच्या समाजाचा आता आम्हाला कोणताही उपयोग राहिलेला नाही बर्का तेव्हा अंधारातच बसून राहिलात तर बरं!
लेखकाचा कुक्कुटसमाजाची महती
लेखकाचा कुक्कुटसमाजाची महती सांगण्याचा हेतू उदात्तच आहे. मात्र ते करताना सत्याची जमीन सोडून लेखकाचं वारू कल्पनावकाशात झेप घेतं आहे. अंड्यांच्या शोधाचं सर्व श्रेय लेखकाने कुक्कुटसमाजाला देऊन टाकलं आहे हे थोडं खटकलं. अंड्यांचा शोध हा काही तसा लावायला कठीण नाही. खरं तर प्रत्येक सस्तन स्त्रीमध्ये एकं अंडं असतं. मनुष्यसमाजातल्या मादीमध्ये तर सुमारे चार आठवड्यांनी नवीन अंडं तयार होतं. कुक्कुटसमाजाने जर काही केलं असेल तर त्या अंडद्रव्याला पॅकेज करून ते शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया साध्य केली. ती प्रक्रिया अर्थात इतर प्रजातींनाही सहज साधली होती. आणि केवळ पक्ष्यांनाच नव्हे. चिं. वि. जोशी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात खुद्द त्यांच्या आईच्या तोंडी खालील उद्गार आहेत.
'मी गेले की मेल्यांनो कोंबडीचीच काय, पण गोमातेचीही अंडी खुशाल खा!'
यावरून हेच सिद्ध होतं की १९३० च्या आसपास गायीची अंडीही बाजारात मिळत असत, सभ्य ब्राह्मणी समाजात ती उघडपणे खाण्याची प्रथा नसे इतकंच.
दुसरा मुद्दा मला मांडावासा वाटतो की कुक्कुट जमात काय किंवा अंडी घालणारे इतर पक्षीसमाज काय - त्या सर्वांना द्विज म्हणण्याची प्रथा आहे. याचं कारण म्हणजे ते अंडं म्हणून प्रथम जन्माला येतात, आणि अंड्यातून बाहेर आल्यावर त्यांचा दुसरा जन्म होतो. त्याच धर्तीवर ब्राह्मणांनाही द्विज म्हटलं जातं. उपनयनाआधी जे काही बालक असतं ते एका अदृश्य अंड्यातच असतं. किंबहुना बालक व बलक यांतलं ध्वनिसाधर्म्य काही योगायोगाने आलेलं नाही. उपनयनानंतर हे अंडं फुटतं आणि त्या बलकाचा बालक होतो, व आईबापांना सोडून गुरुगृही जातो. तेव्हा ब्राह्मण समाज व कुक्कुट समाज हे एकमेकांचे दूरचे बंधूच. असं असताना ब्राह्मणांवर लाथाळ्या उधळण्याचं कारण काही कळलं नाही.
असो, एकंदरीतच समाजाधिष्ठित लेखन करून तुम्ही नक्की काय साधत आहात हा प्रश्न पडला. विशिष्ट समाजाची पोकळ स्तुती करून, त्यांच्या अहंकाराला गोंजारून समाजासमाजामधली तेढ वाढवण्याचाच तुमचा प्रयत्न आहे की काय? असंही वाटून गेलं.
तपशीलात गडबड
तपशीलात गडबड आहे.
प्रत्येक सस्तन मादीच्या शरीरात लाखो-करोडो अंडी असतात. मनुष्य-स्त्रीमधे दर महिन्याला एक अंडं पक्व होऊन अंडाशयातून बाहेर पडतं. कोंबडीत दर २४-२५ तासाला एक अंडं, अंडरूपातच बाहेर पडतं.
बाकी चालू द्या.
-- ३_१४ रॅशनल अदिती
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाहीच्च मुळी
तुम्ही म्हटल्याप्रमाणे, ती जी लाखो करोडो अंडी असतात ती कच्ची असतात. मी पक्क्या अंड्यांनाच 'अंडं' म्हणून संबोधत होतो. कच्ची अंडी चांगली नाहीत तब्येतीला - त्यांत इ-कोलाय बॅक्टेरिया वगैरे असतात.
६_२८ पूर्णसर्क्युलर राजेश
तुमचा प्रतिसाद गांभीर्याने
तुमचा प्रतिसाद गांभीर्याने दिलेला आहे की केवळ लेखावर तिरकस टीका करण्यासाठी ते कळत नाही. वरवर पाहता प्रतिसाद गंभीर वाटतो. पण बलक-बालक साधर्म्य वगैरे मुद्दे तितकेसे पटत नाहीत. उगीच ओढून-ताणून आणल्यासारखे वाटतात. तसेच माझ्या संशोधनाप्रमाणे गायीची अंडी १९३० काय तर कुठल्याच काळात बाजारात मिळत नसत. आज सकाळीच आमच्या दुग्ध-विपणकाकरवी खात्री करून घेऊन मगच बोलतो आहे. अर्थात ही सर्व वक्रोक्ती असेल तर बात अलाहिदा. मला वक्रोक्ती फारशी कळत नाही त्यामुळे काय उत्तर द्यावं कळत नाही.
'सभ्य ब्राह्मणी समाज' या वाक्प्रयोगातून तुम्हाला काय सूचित करायचे आहे ते मात्र समजले नाही. म्हणजे अब्राह्मणी समाज असभ्य असतो असे तर म्हणावयाचे नाही? असे असेल तर आपल्या मनातल्या सुप्त अहंभावाचे प्रामाणिकपणे मूल्यमापन करावे एवढाच सल्ला द्यावासा वाटतो.
बाकी चालू द्या.
तुमच्या प्रतिसादावरून तुम्हीच
तुमच्या प्रतिसादावरून तुम्हीच वेड पांघरून पेडगावला जात असल्याचा संशय आला, तरीही तुमचा प्रतिसाद प्रामाणिक आहे असं गृहित धरून उत्तर देतो.
खानसाहेब, संस्कृत भाषेचा अभ्यास कृपया वाढवावा ही विनंती. संस्कृत साहित्यात पुत्र किंवा कन्येचं निदर्शन करण्यासाठी पहिलं अक्षर आकारयुक्त करण्याची प्रथा सर्वमान्य आहे. उदाहरणार्थ भरताचा पुत्र (किंवा भरतापासून निष्पन्न झालेला) तो भारत. वसुदेवापासून निष्पन्न झालेला, म्हणजे त्याचा पुत्र तो वासुदेव. आता वासुनाका हे पुस्तक वाचून अनेकांनी 'वसु नावाच्या पोरीवर लाइन मारणारा तो वासु' अशी व्युत्पत्ती लावण्याचा प्रयत्न केला होता. पण तो सदोष आहे हे मी पूर्वीच धर्मभारत मध्ये एक लेख लिहून सिद्ध केलेलं होतं.
पुराव्याचा अभाव म्हणजे अभावाचा पुरावा नव्हे. तुमचा दुग्ध-विपणक १९३० सालच्या आधी जन्माला आला होता का? चिं. वि. जोशींचा जन्म निश्चितच त्याआधी झाला होता. असं असताना कोणत्यातरी फुटकळ गवळ्यावर विश्वास का ठेवावा? खरी गोष्ट अशी आहे, की गौसमाजाने आपला अंडी घालण्याचा इतिहास दडपून टाकलेला आहे. माध्यमांवर त्यांचीच सत्ता असल्याने त्यांनी स्टालिनप्रमाणे पद्धतशीर सेन्सॉरशिप राबवली. आणि गायींनी अंडी घालण्याचे सर्व उल्लेख काढून टाकले.
या वाक्याला सोज्वळ हरामखोरपणाचा दर्प येतो आहे. मी सभ्य ब्राह्मणी समाज म्हटलं तेव्हा अर्थातच 'ब्राह्मणी समाजातले, स्वतःला सभ्य समजणारे' असा अर्थ अपेक्षित होता. मी न केलेली विधानं माझ्या तोंडी दडपून बसवू नयेत ही विनंती.
>>>भरतापासून निष्पन्न झालेला)
>>>भरतापासून निष्पन्न झालेला) तो भारत
'आ'काराने सुरू होणार्या कुठल्याही शब्दाचं मूळ 'अ' काराने सुरू होणार्या तत्सम शब्दापासून निष्पन्न झालेला, असं लावण्याची कल्पना वेडगळ आहे. हाच न्याय 'राजेश' या शब्दाला लावला तर काय सूचित होते बरे?
चिं.वि. जोशी यांचा दूध किंवा अंडी या दोहोंपैकी एकाच्या तरी निर्मितीशी संबंध होता काय? मग दुग्धविपणकाच्या अनुभवातून आलेल्या ज्ञानापुढे त्या कुणा जोशीबुवाच्या पुस्तकपांडित्याला का महत्व द्यावं? जगातल्या सर्व ज्ञानाची मक्तेदारी काय ती आमच्यापाशीच, हा दर्प यातून जाणवतो आहे. गो-समाजाचा उपयोग संपल्यावर त्यांच्यावरच चिखलफेक करण्याच्या वृत्तीचीदेखील गंमत वाटली, आश्चर्य नाही.
दर्पावरून आठवलं, नीच कर्म करून आल्यावर अंगुलीप्रक्षालन न करणार्यांना इथेतिथे दर्प येत असल्याची भावना येणारच. दुसर्यांकडे अंगुलिनिर्देश करण्यापूर्वी त्यांनी स्वतःकडे रोखलेली उर्वरित बोटे तपासून पहावी.
असो, एकंदरीतच या संस्थळावर मनुवादी मंडळीची भाऊगर्दी दिसत आहे. माझ्यासारख्या इतिहासतज्ञांनी या संस्थळावर येऊन वेळेचा अपव्यय करण्यात हशील नाही. तेव्हा संपादकांनी माझे सदस्यत्व रद्द करावे अशी मी त्यांना विनंती करतो.
शुभेच्छा
'कोम्बडी रस्त्यापलीकडे का गेली ?', 'भैराळं', इ. आकर्षक लिखाणानन्तर तुमचे हे लेखनातील अधःपतन पाहून क्लेश झाले. पुढील अधिक दर्जेदार लेखनासाठी शुभेच्छा.
!
!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
चालू द्या
अमुक आणि मन यांच्याशी सहमत. बाकी चालू द्या...
अधोगती
-लेखातील या प्रश्नानंतर लेखाची अधोगती झालेली दिसून येते. 'अवगुंठनात सौंदर्य असते' हे ख.खा. विसरलेले दिसतात.
आवडली
काही काही वाक्यं खास आवडून गेली. मस्त!
-Nile
मस्त
हे वाचून फुटले.
राधिका
तुझं पण नाव सांगणार! अवांतर
तुझं पण नाव सांगणार!
अवांतर :
बिपिन कार्यकर्ते
ब्रह्मांड
खर तर सगळ विश्व एका अंड्यात सामावलेले आहे. ते म्हणजे ब्रह्मांड. याचा विसर पडलेला दिसतो.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
'अंडी नाहीत तर भेंडी खा'
'अंडी नाहीत तर भेंडी खा' फुटलो. खखा नेहमीच असे नवनवीन वाक्प्रचार बाजारात....अरारारा उपमा चुकली ओ.... चलनात (हे ठीक आहे) आणत असतात. त्यामुळे आम्ही त्यांचे फ्यान आहोत.
(खखांच्या 'विदावाचस्पती', 'गुग्गलपंडित' नि 'विकीविदुषी' या पदव्यांचा फ्यान) रमताराम
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
आठवण
खवचटखान यांना आम्ही आठवण करुन देतो की ब्रिटिश लोकांना कुक्कुटसमाजाची चांगलीच कदर होती. त्यांनी आठवड्याच्या साती वारांत अंडे घातले आहे.
हिरण्यगर्भ ब्रह्माण्ड
खिक्.
लेखात हिरण्यगर्भ ब्रह्माण्डाचा उल्लेख मुद्दाम टाळलेला आहे, आणि अंड्यापासून वैश्विक उगमाचा अवमान केलेला आहे. अंड्यांचा अवमान करणार्या लेखाचा निषेध.
+१. मला तर यामागे
+१. मला तर यामागे समाजाधिष्ठित दुफळी माजवणारी सूप्त विचारसरणी दिसते.
आणि तुम्ही अपार मेहनतीने
आणि तुम्ही अपार मेहनतीने प्लॅटिपसला 'घातलेली अंडी'देखील हे खवचटपणे विसरले ! कुठे फेडाल ही पापे खखा ?
>>>अपार मेहनतीने प्लॅटिपसला
>>>अपार मेहनतीने प्लॅटिपसला घातलेली अंडी
'श्री घासकडवी पाण्यात उभे राहून प्लॅटिपसला अंडरवेअर चढवण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि प्लॅटिपस त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे' असे दृश्य डोळ्यांसमोर येऊन अंमळ करमणूक झाली.
असे पूर्वग्रह बरे नव्हेत
असे पूर्वग्रह बरे नव्हेत खानसाहेब!
तुमच्याकडे काही पुरावा आहे का, प्लॅटीपसला अंडी आवडत नाहीत याचा?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अवान्तर
आणि अण्डी न आवडून साङ्गतो कोणाला ?
प्लॅटीपस आणि एखिदना , हे दोनच सस्तन प्राणी असे आहेत की ज्यांस पुनरुत्पादनासाठी अण्डे घालावे लागते.
(हुश्श ! अण्ड्याच्या एकवचनी रुपामुळे इथे कुठल्या अण्ड्याविषयी बोलले जात आहे हे कळावे...:). खरे तर याच रोचक कारणामुळे 'पिसाळलेला हत्ती' याञ्च्या 'नांवे सुचवा' धाग्यात हे नांव टाकले होते. असो.)
सामूहीक अधःपतनाचे
या लेखामागे या स्थळावर प्रकाशित झालेल्या एका लेखाची हुर्रे उडवण्याचा हेतू दिसतो...या प्रकारात लेखक - प्रतिसादक मिळून मिसळून सहभागी झालेले दिसतात.
हे सामूहीक अधःपतनाचे उत्तम उदाहरण आहे.
लेख विडंबनाचा उत्तम नमुना
लेख विडंबनाचा उत्तम नमुना आहे. ख.खांना अशाच लेखनाला शुभेच्छा.
प्रतिसादकर्त्यांबद्दल म्हणावे तर मी खुप जुन्या काळी लिहिलेला शेर सांगतो....
कौन कहता हैं कि बेशर्मी कि भी कोई हद होती है...
शर्म को भी देखा हैं हमने बेशर्मीसे चलते यारो..."
चालु द्यात....