Skip to main content

बागकामप्रेमी ऐसीकर : २०१६ धागा - २

भाजी करण्यासाठी आणलेल्या कारल्याच्या आणि लाल भोपळ्याच्या बिया वेगवेगळ्या कुंड्यांमधे टाकल्या होत्या. त्या चांगल्या रुजल्या आहेत. आणि त्याचे वेल भराभर वाढताहेत.

आणि मी लावलेल्या मोगर्‍याला सुद्धा २५ ते ३० कळ्या लागल्या आहेत. परंतु त्यांचा जन्म काळ वेगवेगळा असल्याने.. एकाच वेळी सर्व फुलणार नाहीत असे दिसतय. रोज २ ,३ . त्या मुळे घरच्या मोगर्‍याचा गजरा करण्याला अजून बराच अवकाश आहे. ( तो पर्यंत गजरा माळण्याएव्हढे माझे केस वाढवायची मला संधी आहे. )

ऋषिकेश Mon, 16/05/2016 - 13:41

गेल्या दोन महिन्यात तीनदा मिरच्यांचं बी पेरलंय, पण एक साधा कोंभही नाही.
मिरच्यांचे दगासत्र असे पुस्तकच लिहायला पाहिजे :(

प्रथमेश नामजोशी Mon, 16/05/2016 - 14:26

In reply to by ऋषिकेश

अरे मी मिरच्यांचं बी टाकून नंतर त्या वाढणार्‍या झाडाकडे इतकं दुर्लक्ष केलं, की त्याला एक मिरची लागल्ये, हे ती हिरव्याची लाल झाल्यावर कळलं. :ड
आता लक्ष ठेऊन असल्यामुळे, एक नवी हिरवी मिरची नजरेतून सुटली नाय्ये. :)

प्रथमेश नामजोशी Mon, 16/05/2016 - 14:35

In reply to by ऋषिकेश

नाय रे नाय.

बादवे, या वर्षी आमच्या रातराणीलापण चांगला बहर आलाय. म्हणजे अगदी खोलीत दरवळवगैरे नाही. खिडकीशी जाऊन रातराणीचा ठरवून वास घेतला की येईल इतपतच ( ;) ) , पण हेही नसे थोडके.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 16/05/2016 - 23:40

In reply to by ऋषिकेश

पेरायच्या आधी बिया ओल्या कागदात, शक्यतो मऊसा टीपकागद, गुंडाळून प्लास्टीकच्या पिशवीत बंद करून ठेव. पिशवी ऊबदार जागी ठेव. साधारण १०-१५ दिवसांनी पिशवी उघडून कागदाच्या आत बियांना मोड फुटले आहेत का ते पहा. ते मोड, बारक्याशा डब्यात मातीत पेरून ठेव. (साधारण पाव किलोचा दह्याचा डबा) तो डबा पुरेनासा झाला की मगच मोठ्या कुंडीत रोपाची रवानगी कर.

मी सध्या अतीव कष्टांनी लॅव्हेंडरची रोपं वाढवायचा प्रयत्न करत्ये; त्याचं हेच सुरू आहे. मागच्या बिया-मोड (आणि एक महिना) फुकट गेले. इवलीशी दोन पानं असलेली रोपं बाहेर ठेवून दिली. रात्री जोरदार पाऊस आला; तासाभरात इंचभर पाऊस. कोवळ्या रोपांचा नायनाट. आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. लॅव्हेंडरची रोपं एवढ्या आरामात वाढतात याची काही कल्पनाच नव्हती; इंटरनेटगिरीही पुरेशी केली नव्हती. आता भोगा कर्माचे परिणाम!

---

माझ्या गेल्या वर्षीच्या मिरचीला ह्या वर्षी मिरच्या लागायला लागल्यात हे दुसरंच काही प्रेक्ष्य-निरीक्षण करत असताना लक्षात आलं. मिरची ताबडतोब खाण्याएवढी मोठी झालेली होती... अर्थातच पडत्या मिरचीची आज्ञा मानली.

.शुचि. Mon, 16/05/2016 - 23:42

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पेरायच्या आधी बिया ओल्या कागदात, शक्यतो मऊसा टीपकागद, गुंडाळून प्लास्टीकच्या पिशवीत बंद करून ठेव. पिशवी ऊबदार जागी ठेव. साधारण १०-१५ दिवसांनी पिशवी उघडून कागदाच्या आत बियांना मोड फुटले आहेत का ते पहा.

मटकीची ऊसळ करताना मी हीच मोडस ऑपरंडी वापरते. ऊबदार जागा = ओव्हन. जर कधी दही लावलच तर अदमुर्‍या दुधाची जागाही ओव्हन.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 16/05/2016 - 23:45

In reply to by .शुचि.

कडधान्यांना मोड आणण्याची पद्धतच. वेगवेगळ्या बियांना मोड यायला वेगवेगळा काळ लागतो. अॅस्टरच्या बियांना दोन दिवसांत मोड आले, लॅव्हेंडरला ८-१० दिवस लागले.

ऋषिकेश Tue, 17/05/2016 - 09:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे ही करून बघतो. आभार!
पण आता मिरच्यांसाठी उशीर झालाय बहुधा.. तरी करून बघायला काय हर्कते म्हणा

===

टोमॅटोचे कोंभ चिमण्या खातात हा नवा शोध लागला. मनीप्लान्ट सदृश एक झाड भेट मिळाल्याने ते ही खुछ्न ठेवलंय तर त्याची मुळ जमिनी वर येतात. ती मुळ घरट्यांसाठी वेचायला चिमण्या येतात. परवा टोम्याटोचे झाड छोट्या दह्याच्या वाडग्यात न मावण्याइतके झाल्याने मोठ्या कुंडीत बाहेर शिफ्ट केले. दुपारी बघितले तर चिमण्या शांतपणे ती पाने कुरतडून खात होत्या! मला चिमण्या पाने खातात हेच माहित नव्हते. धान्य किंवा अळ्याच खातात असे वाटलेले. :(
आता त्या झाडचा नुसताच दांडा आहे. ते ही झाड गेलंच बहुधा

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/05/2016 - 19:44

In reply to by ऋषिकेश

चिमण्या टोमॅटोची पानं खातात याचं आश्चर्य वाटलं. आमच्याकडे खारींनी मिरच्यांची पानं फस्त केली पण टोमॅटोला हात लावला नाही.

इकडे फार्मर्स मार्केट - आठवडी बाजारात खाण्यासारख्या कोणत्याही गोष्टी विकायला येतात. डँडीलायन हे तण समजलं जातं, त्याची पानं खाल्ली जातात. बाजारात ती विकायला येतात. बीटाची पानं, मटारची पानं बाजारात विकायला हे मी अमेरिकेत आल्यावरच बघितलं. मग टोमॅटोची का दिसत नाहीत म्हणून शोधाशोध केली तर समजलं त्यात फार मर्यादित प्रमाणात विषारी रसायन असतं. म्हणून बहुदा खारीसुद्धा टोमॅटोला तोंड लावत नसणार असा अंदाज केला. म्हणून हे आश्चर्य.

रोचना Thu, 26/05/2016 - 12:05

In reply to by ऋषिकेश

ऋ,
मिरच्यांचं नि आपलं कधीच जमणार नाही असं दिसतंय! लोक म्हणतात मिर्ची-कोथिंबिरी इतकं सोपं काहीच नाही, पण मला काय आजतागायत जमलं नाही.
एकच शंका - तू बिया कुठल्या वापरतोयस? कधी कधी घरच्या, दुकानातून आणलेल्या लाल मिर्च्या हायब्रिड रोपाच्या असू शकतात, किंवा त्यांच्यावर वाळवताना, पॅकेजिंग करताना बरेच नको ते संस्कार झालेले असल्यामुळे त्यांच्यातल्या बियांना नीट कोंब फुटत नाहीत. सेम विथ कोथिंबीर (हे मला आमच्या बागकामगुरूंनी सांगितले). त्यामुळे एक तर नर्सरीतून मिर्च्यांचं रोप तरी आणून लाव, नाहीतर बिया चांगल्या नर्सरीतून विकत आणून लाव.
पावसाळा लागला की पुन्हा प्रयत्न करून पहा - मी ही करणार आहे. प्रयत्नांती मिर्ची-कोथिंबीर-लिंबू :-)!

मेघना भुस्कुटे Thu, 26/05/2016 - 12:07

In reply to by रोचना

काय तुम्ही कसलेले गडी रडता! हॅट! माझ्यासारख्या लिंबूटिंबू बाईच्या कुंडीत मिरच्यांचे एक नाही - चार - माडे उगवलेत! ;-)

ऋषिकेश Thu, 26/05/2016 - 12:13

In reply to by रोचना

:)
मी यावेळी खास ऑर्गॅनिक बिया मागावल्या होत्या बँगलोरहून. बाकी इतर अनेक प्रकारे मिरच्या लाऊन बघितल्याहेत. दोनदा फुलांपर्यंत पोचलोय पण काही फळल्या नाहीत! :(

अर्थात प्रयत्न सोडणार नाहिच्चे.
आमच्याकडे जळ्ळ्या मेल्या नर्सर्‍या आहेत. अगदी एम्प्रेस गार्डन मध्येही शोधलं भाज्यांची रोपं नाहि मिळंत :(

कोथिंबीर मोप मिळते. पराब्लेम मिरच्यांचाच्चे. लिंबु कधी ट्राय नै केलं मोठी जागा लागते ना त्यासाठी

चिमणराव Tue, 17/05/2016 - 09:40

सिंगापुर वगैरे भागात एक दोनxएकxएक फुटाचा नायलान जाळीचा फ्रेमवाला सांगाडा मिळतो तो हँगरसारखा टांगता येतो कपडे वाळत घालायच्या दोरीवर.यामधल्या ट्रेवर निरनिराळ्या गोष्टी ठेवू शकता.माशा ,चिमण्यांपासून सुरक्षित.तो मिळतो का पहा.ते लोक मीठ लावून वाळवण्यासाठी वापरतात.फणसाचे गरे,केळी वाळवतात.त्यात रोपांचा वाडगा ठेवा.एक दारही असते.

पिवळा डांबिस Tue, 17/05/2016 - 22:13

गेल्या वर्षी खारींनी खूप नासधूस केली होती. फळं तर अर्धी नाश पावली पिकायच्या आधीच खारींनी पाडल्यामुळे!
तेंव्हा धिस ईयर द वैर वॉज पर्सनल! :)
बरेच उपाय/ सूचना विचारात घेऊन शेवटी पिंजरा विकत आणून लावला...
गेल्या दीड महिन्यात ६ (अक्षरी सहा) खारी पकडल्या!! काकी मला आता फासेपारधी म्हणते!! :)
पण आता आवारात खारी नाहीत!
एक खार आवाराच्या बाहेर फिरतांना अजून दिसतेय पण तिने आत यायचं धाडस अजूनतरी केलेलं दिसलं नाही.
आणि आली आत तर आहेच पिंजरा रेडी!!!!!!
च्यायला, नाय त्यांचा समूळ उच्छेद केला तर....

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/05/2016 - 22:27

In reply to by पिवळा डांबिस

तुम्ही किंवा काकींनी 'पाडस' वाचलं आहे का? खारींचं लोणचं करून टाका. तुुमच्या पाडसाला खायला आवडेलही कदाचित.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/05/2016 - 22:37

In reply to by पिवळा डांबिस

खारींना मराठी येत असतं तर तुम्हाला सापळे आणायची गरज पडली नसती. हे वाक्य मोठ्याने बोलल्यामुळे खारींनी आत्महत्या केल्या असत्या! पण अरेरे, खारी तेवढ्या हुशार नसतात.

पिवळा डांबिस Tue, 17/05/2016 - 22:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे वाक्य मोठ्याने बोलल्यामुळे खारींनी आत्महत्या केल्या असत्या!

बरोबर. सध्या आमच्याकडे ट्रंपची हवा असल्याने आम्ही पोलिटिकल करेक्टनेसला त्या ह्याच्यात नेऊन गाडतो!!!
:)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 19/05/2016 - 01:10

In reply to by पिवळा डांबिस

खारींना मतदानाचा हक्क नसतो; त्यामुळे ह्या बाबतीत ट्रंपोबांची पत्रास बाळगण्याचं कारण नाही. (पण काकींचं मत विचारून घ्या आधी!)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 18/05/2016 - 07:39

In reply to by नंदन

विखारी निषेध बघता वखारीची यात्रा झाल्याचं पुण्य मिळणारसं दिसतंय.

पिवळा डांबिस Wed, 18/05/2016 - 22:11

In reply to by पिवळा डांबिस

सातवी पकडली!!!! :)
आज सकाळी ऑफिसला निघतांना पिंजर्‍यात खुडबूड ऐकू आली.
बघतो तर सातवी खार अडकलेली!
हे जरा विचित्रच कारण खारी रात्रीच्या फिरत नाहीत, ही कशी आली कोण जाणे.
ऑफिसात जायची घाई असल्याने काही करता आलं नाही, आता संध्याकाळी घरी गेल्यावर तिची विल्हेवाट लावीन!!
नंदन, ये ह्या वीकेंडला, व्रताची समराधना घालूया!!!
:)

पिवळा डांबिस Thu, 19/05/2016 - 21:23

In reply to by चिमणराव

खारी मारल्यास रामेश्वरची यात्रा करावी लागते.

आम्ही पकडलेल्या खारी मारत नाही कै!
त्यांना चार-पाच मैल लांब रानात सोडून येतो!!!

पिवळा डांबिस Fri, 20/05/2016 - 21:20

In reply to by .शुचि.

अगं अधूनमधून त्रासदायक होत असला तरी एव्हढुलासा जीव तो! त्याला कशाला मारायचं?
(बाकी अदितीच्या बाबतीतही आमचं हेच धोरण आहे!!)
;)

.शुचि. Fri, 20/05/2016 - 21:27

In reply to by पिवळा डांबिस

हाहाहा मी हादरले होते. इतके दिलखुलास, विनोद्बुद्धी असलेले एकदम राजा माणूस, पिडां सिक्रेटली पापी दिसतायत :(
खरच अगदी हेच्च मनात आलेले =))

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/05/2016 - 21:42

In reply to by पिवळा डांबिस

म्हणूनच मी माझा जीव एव्हढुलासा ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. काकांच्या खोड्या काढल्या तरी मी त्यांना धोकादायक वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 25/05/2016 - 21:28

बागेचं प्रेक्ष्य-निरीक्षण करताना अचानक मोठाली वांगी धरलेली दिसली. आकाराच्या अंदाजासाठी बागेतलेच चेरी टोमॅटो तिथे ठेवल्येत.
वांगी

अजून एका झाडाला काळी, मोठी (भरताची) वांगी धरली आहेत. आणखी वांग्याची दोन झाडं आहेत, त्यांतलं एक पांढऱ्या वांग्याचं आहे. त्याला फळं कधी धरतात बघू.

पिवळा डांबिस Wed, 25/05/2016 - 22:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतरः काय येऊ घातलेल्या नवीन विशेषांकाचं बागेत बसून मोठ्याने अभिवाचन केलं होतं काय? ;)

रुची Wed, 25/05/2016 - 23:03

In reply to by पिवळा डांबिस

या बयेनं फक्त आकाराचा अंदाज येण्यासाठी वांग्यापुढे चेरी टोमॅटो मांडले असतील यावर विश्वास बसणं कठीण आहे. पण चांगली दिसतायत...वांगी हो!

रोचना Thu, 26/05/2016 - 11:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वा वा वा, इतक्या दिवसांनी आवडत्या धाग्यावर यायचं, आणि हे दृश्य आणि टिपणं - :-) साइझ डज मॅटर!

रुची Thu, 26/05/2016 - 22:48

आमच्याकडचा बाग वृत्तांत द्यायचा म्हणजे त्याआधी हवामानाचा इतिहास सांगावा लागतो. तर यावर्षी अल् निन्योच्या प्रतापाने जानेवारीनंतर फारसा बर्फच पडला नाही आणि मार्चअखेरीलाच वसंताचे आगमन झाले (जवळजवळ सहा आठवडे आधी) एप्रिलमधेच सगळ्या झाडांना पाने आली, मागच्या शिशिरात पेरलेला लसूणही उगवून आला, र्हूबार्ब तर नुसता फोफावला आणि आम्ही बर्याच बी-बियाण्यांची पेरणी केली पण या सगळ्या उत्साहात जवळच्या भागात अकाली लागलेले भयावह वणवे, प्रचंड दुष्काळाची चाहूल या सगळ्याची काळजी वाटतच होती. मग अचानक मागच्या आठवड्यात हवामान फिरले, दिवसाचे कमाल तापमान ५ डिग्री से. आणि बर्फमिश्रित पाऊस सलग तीन-चार दिवस पडला. सुदैवाने टोमॅटोची झाडे अजून घरातच होती पण बाहेर फुललेल्या गोष्टींची काळजी वाटत होती. असल्या बेभरवशाच्या प्रांतात आपण बागकामाचा छंद कशाला बाळगतो याचीही शंका यायला लागली पण बागकाम माणसाला बराच संयम आणि स्थित:प्रज्ञता शिकवतो बहुतेक त्यामुळे मधूनमधून वाफ्यांवर कापडे पांघरत आम्ही जरा शांत राहिलो. सुदैवाने वनस्पती माणसांपेक्षा अधिक चिवट असतात याचा अनुभव आला आणि तापमान सुधारल्यानंतर त्यांच्यावर फार काही वाईट परिणाम झाला नाहीय हे लक्षात आले. शिवाय पडलेल्या पावसामुळे सध्यापुरती तरी दुष्काळसदृष्य स्थिती सुधारली आहे आणि शेतकर्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. यावर्षी लोकल आंबट चेरी आणि मागल्या वर्षी लावलेल्या ज्युलिएट चेरीज ना बरीच फळे धरली आहेत. रेड करंट्स, गूजबेरींनाही फळ धरलंय, गुलाबांना आणि पियोनीजना खूप कळ्या आल्या आहेत पण पेरलेल्या बीट, गाजरे, पालक, मुळे यांची वाढ थोडी मंद आहे. घरात लावलेले टोमॅटो बरेच मोठे झाले आहेत, रोचनाच्या सल्ल्याने राखलेली मागल्या वर्षीची वांग्यांची झाडे दिवसा बाहेर ठेवायला लागल्यापासून थोडी सुधारली आहेत आणि त्यांना नवीन सशक्त पाने आली आहेत. आता येत्या वीकेन्डला अजून बिया पेरणे आणि आतली झाडे बाहेर जमीनीत लावण्याचे काम आहे. नंतर इथेच फोटो लावेन, उपप्रतिसाद देऊ नका.
आणि हो.. एक खुशखबर! आमच्या कम्युनिटी गार्डनला एक मोठी ग्रँट मिळाली आहे, मीच पुढाकार घेऊन अर्ज केल्याने एकदम कृतकृत्य वाटतंय. आता तिथेही राबवायच्या अनेक प्रकल्पांना आर्थिक पाठबळ मिळालं आहे म्हणून बराच उत्साह आहे.

पिवळा डांबिस Sat, 28/05/2016 - 09:37

In reply to by रुची

कम्युनिटी गार्डनला मिळलेल्या ग्रांटबद्दल हार्दिक अभिनंदन!
आमच्याकडे प्लमचा पहिला बार उतरवला, २०-२५ फळं मिळाली, ते झाड लहान आहे अजून. पीच मात्र ३०-४० उतरवले, झाडावर अजून ६०एक आहेत, १५-२० पक्ष्यांनी खाऊन पाडले. पेअर आणि सफरचंदाची फळं अजून लहान आहेत, ती सीझनच्या शेवटी म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरात तयार होतील. मायर लेमनच्या छोटया झाडाची सगळी लिंबं शेवटी वापरून संपवली. तू फुलोरा पाहिलेल्या दुसर्‍या मायर लेमनला आता छोटी-छोटी लिंबं लागली आहेत, ३०-४० असतील. ते इतकुसं झाड इतक्या लिंबांचं वजन कसं पेलवणार हा प्रश्नच आहे, त्याला लवकरच आधार लावावे लागणार आहेत. भाज्यांपैकी मेथी आणि मोहरी खाऊन संपवली, थोडी मोहरी जून झाल्यामुळे शेवटी उपटून टाकली. यावर्षी नवीन म्हणजे ब्लूबेरीची रोपं लावून एक बेट तयार केलं आहे, पाहू कसं जगतं ते!

आता येत्या वीकेन्डला अजून बिया पेरणे आणि आतली झाडे बाहेर जमीनीत लावण्याचे काम आहे.

सेम हियर. आमचं तुमच्यासारखं असं आत-बाहेर काही नसल्याने तो प्रश्न नाही! :) पण बिया मात्र पेरायच्या आहेत. हरभरे, टोमॅटो आणि काकड्यांचं बी पेरून झालंय. पण मिरच्या आणि कारली पेरायची आहेत. अजून दोन वाफे तयार करायचे आहेत त्यांच्यासाठी! लॉन्ग वीकेंडचा जॅम पॅक्ड प्रोग्राम आहे; हाडं दुखून येणार आहेत!! :)

पिवळा डांबिस Sat, 28/05/2016 - 09:42

In reply to by पिवळा डांबिस

झाडावरून उतरवलेल्या पीच आणि प्लमचे हे फोटो...

DSC_0794

DSC_0795

एंजॉय!!!
:)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/06/2016 - 04:01

In reply to by पिवळा डांबिस

मस्त दिसतायत फळं! पुढच्या वेळेस ह्या सुमारास आलं पाहिजे तुमच्याकडे.

दगड Wed, 13/07/2016 - 08:07

In reply to by पिवळा डांबिस

एक प्रश्न, त्या फळांना पावडर लावल्यासारखं दिसतय ते नॅचरल आहे का? फळे लवकर पिकली पाहिजेत म्हणून त्यांना पावडर लावतात असे ऐकून आहे, (खरंखोटं माहीत नाही), त्यामुळे विचारलं.

पिवळा डांबिस Thu, 14/07/2016 - 11:30

In reply to by दगड

फळांना पावडर लावलेली नाही.
त्या झाडावर दोन प्रकारच्या प्लमचं कलम आहे.
डावीकडची फळं ही एका कलमाची; ती अतीगोड असतात.
उजवीकडची फळं ही दुसर्‍या कलमाची; ती तुलनेने काहीशी कमी गोड पण एक विलक्षण सुगंध (मराठीत फ्रेगरन्स) असलेली असतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 26/05/2016 - 23:03

रुची, मस्तच. तुमच्या कम्युनिटी गार्डनच्या प्रकल्पाबद्दल सवडीने सविस्तर लिही.

फळं आणि फुलझाडांचे फोटोही हवेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/06/2016 - 04:01

आज पहिल्यांदाच भेंडीचं फूल बघितलं. हे ही अचानकच दिसलं. थोडंसं आयरीसच्या फुलासारखं दिसतं.
भेंडी फूल

ह्याची भेंडी झाली की एका भेंडीचं काय करायचं ह्याची पाककृतीही द्या कोणीतरी.

मनीषा Tue, 05/07/2016 - 06:42

माझ्या कारल्याच्या वेलीवर पुषकळ फुले आली आहेत. त्यातील तीन फुलांच्या देठाशी लहान कार्ली दिस्तायत.

.. आणि मिरचीला सुद्धा एक छानशी मिरची आली आहे. आणि फुले तर खुपच.

(फोटो काढलेत आणि फ्लिकरवर टाकलेत. तिथुन इकडे आणण्याचा प्रयत्न चालु आहे. )

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/07/2016 - 18:45

In reply to by मनीषा

फ्लिकरच्या अल्बमची लिंक व्यनि/खरडीत कळवा. मला काही जमतंय का पाहते. कारलं हे प्रकरण मी लहानपणापासूनच कधीही चाखलेलं नाही. पण भाषेतही स्थान मिळवणाऱ्या भाजीचे फोटो बघायला आवडतील.

चिमणराव Tue, 05/07/2016 - 08:59

कुठे भरपूर कार्ली लागणारा वेल दिसला तर त्याचा तुकडा कापून लावावा.ग्यारंटिड काम होतं. मुळांच्यापासून सहासात इंच दूर गोलात ओला कचरा पुरून ठेवा.( फणसाचा टाकलेला काटेरी सालीचा भाग,भाज्यांची डेखं इत्यादी.) जास्ती गरवाली कारली येतील.

जेडी Sun, 10/07/2016 - 19:14

गुलाब - रवींद्र भिडे (पुना रोज सोसायटी )

(जे ऐकले ते लिहिलंय -चुकीचे असल्यास माफ करावे ,दुरुस्ती स्वागतार्ह )

मी मागे अटेंड केलेल्या परसबागेच्या वर्गातील "रवींद्र भिंडे " ह्यांचे गुलाबावरील लेक्चर अतिशय आवडले ते मला इथे शेअर करावेसे वाटते आहे ,तुम्हीही त्याचा फायदा घ्या आणि सुंदर गुलाब वाढवा .
गुलाब वाढवताना हे लक्षात घेणे महत्वाचे आह-गुलाबाला अत्यंत कमी पाणी लागते .

साईज प्रमाणे गुलाबाचे मुख्य तीन भाग करतात
१ हायब्रीड ट्री -मोठी फुले ,लांब दांडे ,खूप दिवस टिकणारी फुले . 12 " उंचीची कुंडी पुरेशी आहे
२ फ्लोरीबंडा - फुलांचे गुच्छ येतात ,फुलांचा आकार मोठा असतो . 10 " उंचीची कुंडी पुरेशी आहे
३ मिनी गुलाब -फुलांचे गुच्छ येतात ,फुलांचा आकार अगदी छोटा ,काही तर बटणाच्या आकारचा असतो , 8 " उंचीची कुंडी पुरेशी आहे

कुंडी कशी भरावी ?

लागणारे साहित्य :
१. पोयटा माती 50%, शेणखत 50%,
किंवा
२ . काळी माती 40%, शेणखत 60%
+
फोलीडोल नावाची १ टेबलस्पून पावडर मातीत मिसळावी (कीडनाशक )
+
वाळू भाताची तूस (अर्धे घमेले )

वाळू किवा भाताच्या तुसू मुळे माती हवेशीर राहते आणि भुसभुशीत पणामुळे मुळांच्या वाढीस जागा मिळते .
गुलाबाला एक लिटर पाणी पुरेसे असते .

भरण्याची पद्धत :
कुंडीला खालच्या बाजूला मोठे भोक असावे .
तळात 2 " विटांचे तुकडे घालावेत
त्याच्यावर 2 " पालापाचोळा घालावा .
नंतर वरती वरील मिश्रण घालावे .

गुलाबाची पाने कधीही खतामध्ये घालू नयेत कारण त्यावर कीड असू शकते आणि ती कंपोस्ट मध्ये वाढते . अगदी उन्हाळ्यात दीड लिटर पाणी घालावे . पाणी कुंडीतून फक्त आठ ते दहा थेंब बाहेर यावे .

माती परीक्षण : जास्त प्रमाणात झाडे लावायच्या असतील तरच करावे .
पी एच -6 . 5 ते 7 . 5 असावा .

मातीचा पी एच जास्त असेल तर शेणखत ,मोहरीची पेंड घालावी ,मोहरीची झाडे लावावी आणि नंतर त्याच मातीत झाडे लावावी . गुलाबाला पाणी नेहमी सकाळी घालावे .

ऋषिकेश Tue, 12/07/2016 - 13:53

मला एक अळूचा कंद भेट मिळाला, देणार्‍याने हा वडीचा अळु आहे फक्त पाने लहान आहेत असे सांगितले होते.
आता पाने भरपूर आली आहेत मात्र ती फारतर तळहाताएवढीच आहेत. झाड मेले नाहिये/वाढ खुंटली नाहिये कारण नवनवी पाने येतायत. पाने खुडली नाहित तर जुनी पिवळी पडून जाताहेत.

मात्र इतक्या लहान पानांचा अळु खरोखरच खान्यायोग्य आहे की नाही हे कळायला मार्ग नाही. प्रत्यक्ष खाऊन बघणे सोडून अळु खाण्यास योग्य आहे की नाही (की नुसता शोभेचा आहे) इतर काही खुणा आहेत का?

(ज्याने भेट दिली तो माझ्या संपर्कक्षेत्राच्या सध्या बाहेर आहे ;) त्यामुळे इथे विचारतोय)

अनु राव Tue, 12/07/2016 - 14:11

In reply to by ऋषिकेश

अळूचा कंद पुण्यात विकत कुठे मिळतो हे कोणाला माहीती आहे का? १-२ ठीकाणी विचारले होते, पण त्यांच्या कडे नव्हते.

चिंतातुर जंतू Tue, 12/07/2016 - 14:43

In reply to by अनु राव

>>अळूचा कंद पुण्यात विकत कुठे मिळतो हे कोणाला माहीती आहे का?

मी पूर्वी मंडईत पाहिलेले आहेत. त्यांना 'अरवी' म्हणतात. (बटाटे-रताळ्याप्रमाणे) उकडून वगैरे खात असावेत. उपासाला चालतात बहुतेक. त्यामुळे आषाढीच्या सुमाराला मिळतील बहुधा. ते पेरले तर अळू येतात का, हे मात्र माहीत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/07/2016 - 21:36

In reply to by चिंतातुर जंतू

अळकुड्या पुण्यात मिळत नाहीत? अमेरिकेत बारा महिने मिळतात आणि पुण्यात का मिळू नयेत?

मी अळकुड्या पेरल्या, सुरुवातीला त्याला बारकी पानं आली आणि आता मोठी येतात. भाजीचा का वडीचा अळू हे मला समजत नाही; त्याचे दोन्ही प्रकार करून खाल्ले. थंडीत तापमान ४-५ से.च्या खाली जाणार असेल तर कुंडी घरात आणून ठेवते, पुण्यात ही अडचण येऊ नये. थंडीत पानं गायब होतात. तापमान वाढायला लागलं की पानं पुन्हा वाढतात. सुरुवातीची पानं बारकी असतात, पण पुढे मोठी पानं येतात.

तरीही गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी पानं बारीक आहेत, असं वाटतंय. ह्याचं कारण अळूला आणखी अळकुड्या झाल्यामुळे त्यांना जागा पुरत नसावी आणि/किंवा अळवाला नत्र कमी पडत असावं असा अंदाज आहे. एका कुंडीतले सगळे कांदे उकरून काढायचा बेत आहे, तेव्हा किमान पहिली शक्यता तपासून बघता येईल.

आठवणींच्या कुपीतून -
पावसाळी - ढगाळ आणि उबदार - हवेत अळू छान वाढतो. म्हणून तो उपासाला चालतो का नाही माहीत नाही, पण म्हणून पावसाळ्यात मोप मिळत असावा. ठाण्याच्या आमच्या इमारतीत, कोणे एके काळी, मातोश्रींनी अळू लावला होता तो ड्रेनेजचे पाईप खाली उतरायचे तिथे. तिथे उतू जाणारं पाणी खूप असे; त्यावर अळू चांगलाच फोफावला होता. शिवाय विशिष्ट जीवजंतू मर्यादित प्रमाणात पोटात जाऊन पचनशक्ती वाढली का, हे माहीत नाही. पण 'कौन चक्की का आटा खाती है', ह्या प्रश्नाचं काहीसं उत्तरही ह्यातून मिळावं. ;-)

सुनील Wed, 13/07/2016 - 08:52

In reply to by चिंतातुर जंतू

ते पेरले तर अळू येतात का, हे मात्र माहीत नाही

येतात. माझ्याकडे आहेत.

ऋषिकेश Wed, 13/07/2016 - 10:33

In reply to by चिंतातुर जंतू

मी मंडईतल्याच अळकुड्यांवर हा प्रयोग दोनदा करून पाहिला. एकदा मातीत मुग्या झाल्याने त्या ट्रेमधील सगळ्या भाज्या गेल्या - त्याचा दोष आम्ही अळकुड्यांवर(ही) लादला (खरंतर त्यावेळी साखरपाणीही मातीला दिले होते हे लक्षात घ्यायला हवे होते), दुसर्‍यांदा अळकुड्या सडून गेल्या पण कोंभ फुटला नाही.

अनु राव Wed, 13/07/2016 - 10:54

In reply to by ऋषिकेश

मी काल तातडीने कोथ्रुडातल्या मंडईतुन आर्वी चे कंद आणले आहेत.

ते लगेच कुंडीत लाऊ का? का आधी कोंब येतायत का ते बघु?
कोंब यायला पाहिजे असतील तर काही करता येऊ शकते का?

कोंब नाही आले तरी शनिवारी ४ कंद कुंडीत लाउन टाकते, उरलेले बाहेर ठेवते.

-------
नेट वर वाचले की प्लॅस्टीक च्या पिशवीत भरुन अंधारात ठेवावे म्हणजे कोंब येतील. हे बरोबर आहे का?

ऋषिकेश Wed, 13/07/2016 - 14:36

In reply to by अनु राव

सॉरी कल्पना नाही. मी थेट पुरले तर काय झालं सांगितलं.. बघा तुम्ही काय कसं होतंय.. इथे सांगा जे काही होईल ते.. इतर त्यातून धडा घेतील

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 13/07/2016 - 19:33

In reply to by अनु राव

पाण्यात कंद ठेवून पाहा; पाणी दर एक-दोन दिवसांनी बदला.

ही उचापत फार वाटत असेल तर सरळ कुंडीतल्या मातीत पुरा. माती व्यवस्थित ओली राहील ह्याची काळजी घ्या. माझ्याकडे कोंब फुटायला वेळ लागला होता (निदान दोन आठवडे तरी निश्चितच, कदाचित जास्तच); तेव्हा फार थंड हवा होती का नव्हती हे आठवत नाही.

अनु राव Mon, 17/10/2016 - 18:10

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एका अळुच्या कंदानी अचानक १ पान मातीतुन वर आणले आहे. २ महिन्यापूर्वी कुंडीत लावला असीन.
मी तो कंद मेलाच असे समजुन त्याच कुंडीत पालक लावला होता त्यामुळे त्या कुंडीला पाणी घालणे होत होते.
मागच्या आठवड्यात एकदम एक आळुच्या पानाच्या आकाराचे छोटे पान वर आले.

कैच्या कै वेळ लागलाय.

मी आशा सोडुन दिल्यामुळे दुसर्‍या कुंडीत लावलेल्या ३-४ कंदाना पाणी घालणे बंद केले होते, त्याचे आता वाईट वाटतय.

पिवळा डांबिस Thu, 14/07/2016 - 11:32

In reply to by चिंतातुर जंतू

अरवी पेरले तर अ़ळू येतात.
स्वानुभव.

चिमणराव Fri, 15/07/2016 - 07:57

अळू
यालाच उत्तर भारतीय अरवी म्हणतात.भारतसोडून इतर देशांत अळुचे कंद/अळकुड्या/गड्डे खाण्यासाठीच अळूची लागवड होते.आपण आणि गुजराती समाज पानांच्या अळुवड्या ( यास ते पात्रा म्हणतात ) आवडीने खातो. अळुची भाजी /फदफदं/चिट्टी मात्र महाराष्ट्रात खाल्ली जाते. ललित विषय.( अळुची चिट्टी संदर्भ मराठी सिनेमा 'मोलकरीण'? )

तर आता लागवडीकडे वळू.
१) अळुला पाणी भरपूर लागतं पण तुंबलेलं नको असतं. वाहातं घाण पाणीही चालतं.
२) एक प्लास्टिक टब २x1x1 फुट घ्या.तळास भोके पाडू नका. रुंदीकडच्या एका कडेस तीन इंच गॅप ठेवून बाकीची माती भरा.या गॅपमधून तळ दिसला पाहिजे.वरच्या मातीत कंद लावायचे आहेत.
३) कंद आणणे.
बाजारात अळुगड्ड्या विकायला येतात त्या पावकिलो आणाव्यात विक्रेत्यास "लावण्यासाठी हव्यात" सांगितले की तो वेचून कोंबवाल्या देईल.हे कंद ओले असतात ( अळू झाडाबद्दल नंतर लिहीन तेव्हा हा प्रकार लक्षात येईल ).यातले दोनतीन उकडून खाऊन पाहा.खाजरे असतील तर लावण्यासाठी वापरू नका.बाजारातल्या अळुकुड्या बहुतेक 'भाजीच्या अळू'च्या ( bji) असतात.याची पानं मऊ लुसलुशित पोपटी हिरव्या रंगाची असतात. 'वडीचे अळू' (vdi)चे कंद हवे असल्यास विक्रेते लोक आणून देतात.अथवा ओळखीच्या ठिकाणाहून तीन झाडे आणावीत.वडीची पाने मोठी काळसर हिरवी आणि वरची दोन टोके ठसठशीत असतात.
४) कंदांची तयारी
एखादा चांगला न खाजणारा लॅाट मिळालाय त्या सर्व अळुकुड्या कोरड्या मातीने झाकून ठेवा महिनाभर विश्रांतीसाठी. त्यानंतर हळहळू माती ओली करायची. थोड्या दिवसांनी काही अळुकुड्यांचे कोंब वाढताना दिसतील त्या लागवडीसाठी घ्या.
५) वरती (२) मधल्या टबात कोंब आलेले कंद लावून माफक पाणी द्या.बाजूच्या गॅपमधून तळाशी जमा झालेले पाणी दिसले की बास.
५-१) टब गच्चीत ठेवायचा असेल तर उन्हाने फाटू नये म्हणून काळे प्लास्टिक वापरून टबाच्या बाजू झाकाव्या लागतील.पावसात राहिला तर टब पाण्याने गच्च भरून राहू नये म्हणून गॅपच्या बाजूला तळापासून एक इंचावर तीन भोके पाडून ठेवा म्हणजे सेफ्टी वॅाल्व्ह झाला. भोके नको असली तर बंद करण्यासाठी फर्निचर बनवणार्यांकडे एक फिलर मेण मिळते ते दाबून बसवा.अथवा काळी चिक्कण मातीचा गोळा लिंपला तरी काम होते.
५-२) सुरुवातीला झाडे जवळ असली म्हणून फरक पडत नाही परंतू दमदार वाढणारे झाड दोन फुटांचा घेर (vdi) खाइल.भाजीसाठीच्याला कमी अंतर चालेल.
५-३) वडीच्या पानांचा उंडा (#) होण्यासाठी एकाचवेळी तीन पाने लागतात म्हणून कमीतकमी तीन/सहा/नऊ झाडे हवीत.
६) जेव्हा झाडे जोमदार वाढून पाणी 'पिऊ लागतील' तेव्हा वरून पाणी न देता थेट गॅपमध्येच पाणी ओतत राहावे,मातीने पाणी शोषल्यावरही तळास अर्धा इंच राहील असे ठेवा.म्हणजे पाणी भरपूर पण तुंबलेले नाही.डास होऊ नये एवढी काळजी घेऊन पाणी साचू द्यावे/सुकवावे.
७)खत??
नको.किचिनमधले खरकटे पाणी ( साबण न लावलेले ) थोडावेळ तसेच ठेवून वरचं बरंचसं निवळलेलं गॅपमधून देता येतं.सतत रोज मात्र असं करू नका.चार दिवसांनी ठीक आहे.एरवी चांगले वापरा.
८) कुंडी माती/प्लास्टिक ची वापरायची का?
- शोभेचं झाड म्हणून अळू लावायचा असेल तर ठीक आहे.नंतर जी पाण्याची गरज लागते त्याला न्याय मिळत नाही. ( कढिलिंब चांगला वाढतो कुंडीत.)

९) वडीच्या पानांची भाजी अथवा उलट केले तर चालते का?
- हो.फक्त पानांची तोडणी लवकर/उशिरा करायची.बाल्कनितल्या बागेत जागेअभावी चालवून घ्यावे लागते.चवीत/खुमारीत निश्चितच फरक जाणवतो.
********
हेही वाचा.
अळूचा मुख्य मोठा कंद गोलसर असतो चार महिन्यांत त्यातून बरीच पाने फुटून ती सूर्यप्रकाशात भरपूर अन्नद्रव्य बनवतात ते मुळात साठवतात त्यामुळे उजेड भरपूर हवाच. मुख्य कंदातून काही मुळे लांब पाठवली जाऊन त्यांच्या टोकाशी अन्न साठवले जाते तीच अळकुडी.याच्या दुसय्रा टोकास एक पानाचा कोंब वाढतो व त्यातून नवीन झाड होते.इकडे मुख्य कंदाचे काम संपलेले असते व त्यातून पाने न येता एक फुलाचा दांडा बाहेर येतो त्याला फुलेही येतात.कंदातला उरलासुरला पिष्टमय भाग फुलांत खर्च होतो. तर अशीवेळीच इतर पिले अळुकुड्यांत अन्न ठासून भरले असते.नवीन झाडाची पहिली पाने व मुळे यातूनच निर्माण केली जातात.झाडाची पहिली पिढी इथे संपते व पुढची सुरू होते.यावेळेस झाडे पुर्ण उपटून काही अळकुड्या परत लावून इतर विकतात.
अशा अळकुड्या आपण लावण्यासाठी आणतो तेव्हा त्यांना सुप्तावस्थेत सोडणे गरजेचे असते. अगोदर ज्या अळकुड्या भरदार दिसतात त्या नंतर बारीक होतात.अगदीच किरकोळ होतात त्यात अन्नद्रव्य फारच कमी असते त्यातूनही झाड येतेच पण वेळ बराच खाते.म्हणून शक्यतो वजनदार आणाव्यात.

मॅालमध्ये मिळणाय्रा आरवीबद्दल खात्री देता येत नाही त्या उगवतीलच वगैरे याची कारणे-
१) स्थानिक नसतात/असतीलच असे नाही.हे अळू तुमच्या हवामानाला वाढेलच असे नाही.
२) नवीन बाइओ तंत्रज्ञानाने निर्मित - टिश्यू कल्चर वापरून काढलेले पीक असू शकते.त्यातून वांझोटी निपज होते.प्रत्येकवेळी शेतकर्याला बियाणे कंपनीकडेच भीक मागत जावे लागते अशी व्यवस्था -जीन्स सप्रेशन केलेले असते.त्याला कोंब फुटणार नाही.

थोडक्यात स्थानिक भाजीबाजारातून जे मिळेल ते आणावे ते हमखास उगवेल.

ऋषिकेश Fri, 15/07/2016 - 09:27

In reply to by चिमणराव

वा! किती आभार मानावे हेच कळेना झालंय!
मी बहुतांश प्रत्येक स्टेपवर चुका केल्या होत्या. ट्रेमध्येच अळु लावला, त्याला भोकंही नव्हती. मात्र खूप पाणी घातले (त्याने अळकुड्या सडल्या असाव्यात).

आता जी आलीये तीची पाने वितभरच लांब होऊन मग पिवळी पडताहेत. हा अळू शोभेचा आहे की खाण्यास योग्य ते कसे समजावे?

चिमणराव Fri, 15/07/2016 - 16:13

सरळ नव्यानेच सुरुवात करणे सोपे पडेल कारण बाजारात भरपूर नवीन स्टॅाक आलाय एकादशी निमित्त.ते उद्या स्वस्त होईल.आणून ठेवा.ही माती प्लास्टीक पेपरवर पसरवून वाळवून पुन्हा वापरता येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 20/07/2016 - 21:53

अनुताई, अळकुड्यांना कोंब आले का?

काल मी एका कुंडीतला सगळा अळू काढला. अळूची टोपभर भाजी झाली; (आठवडाभर रोज थोडीथोडी ओरपता येईल). खाली बहुतेकशा अगदी बारक्या अळकुड्या होत्या; दोनच बऱ्यापैकी मोठ्या आहेत. मूळ सगळ्या अळकुड्या गायब झाल्या होत्या, काहींच्या मोठमोठ्या साली तेवढ्या सापडल्या. संपूर्ण कुंडीत जाडसर मुळंच-मुळं होती. ह्याचा अर्थ मुळांना, अळकुड्यांना जागा पुरत नव्हती म्हणून अळूची पानं बारकी बारकी येत असणार.

तेव्हा प्रयोगातून समजलेली गोष्ट - दरवर्षातून एकदा अळूची कुंडी रिकामी करावी. हे करताना अळकुड्या खराब होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी; पेरण्यासाठी आणि खाण्यासाठीही. त्यासाठी मातीत भरपूर पाणी ओतलेलं असेल तर मुळासकट उपटणं सोपं होईल. पुन्हा अळू वाढवायचा असेल तर त्यातल्या दोन अळकुड्या (पानांसकट) पुन्हा पेराव्यात; बाकीच्या खाऊन टाकाव्यात.

दुसऱ्या कुंडीतही हाच प्रकार झाला असणार. त्यातली दोन अळूची रोपं पुन्हा लावून बाकीच्या खाऊन टाकेन असं म्हणत्ये.

--

गेल्या आठवड्यात एक दिवस बाजारची भाजी खाल्ली नाही -
भाजी

आता 'एकाच भेंडीचं काय करू' असा प्रश्न फार पडत नाहीये. रोज निदान दोन-तीन भेंड्या तरी मिळत आहेत. आठवडाभर जमा करून भाजी करण्याएवढा, बऱ्यापैकी ऐवज जमा होतो. पण एका भेंडीची पानं तपकिरी व्हायला लागली आहेत. पाणी, खतं ह्यांपैकी काही कमी किंवा जास्त होत असेल असं वाटत नाही; ऊन फार आहे म्हणावं तर भेंडीला ऊन आवडतं असं इंटरनेटवर वाचलं. बाकी काही लक्षणं दिसत नाहीत; कडुनिंबाच्या तेलाचा फवारा मारलेला आहे. ह्याबद्दल आणखी काही सल्ला आहे का? भेंडीला लागणाऱ्या कीड-रोगांमध्ये काय-काय दिसतं?

अनु राव Thu, 21/07/2016 - 15:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गेल्या आठवड्यात एक दिवस बाजारची भाजी खाल्ली नाही -

हे खासच. मस्त.

अनुताई, अळकुड्यांना कोंब आले का?

नाही ना. २ कंद कुंडीत मातीत खुपसुन ठेवले आहेत. पण अचरटरावांच्या सल्ल्या प्रमाणे अजिबात पाणी घालते नाहिये.

उरलेले कंद प्लॅस्टिक च्या पिशवीत ठेवले आहेत अंधारात, अजुन तरी नाही आले कोंब.

अतिशहाणा Thu, 21/07/2016 - 18:38

In reply to by अनु राव

उरलेले कंद प्लॅस्टिक च्या पिशवीत ठेवले आहेत अंधारात, अजुन तरी नाही आले कोंब.

अंधारात दिसले नसेल!

अनु राव Tue, 09/08/2016 - 16:47

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोंब म्हणता येणार नाही, पण पिंपल सारखे १-२ स्पॉट ४ कंदांवर तयार झाले आहेत. बघु त्यातुन कोंब येतात का ते.

-------
५ ऑगस्ट चे अपडेट.

२-३ मिलीमिटर कोंबासारखे ५-६ कंदावर आलेले दिसले, पण ते कंद घट्ट राहिले नाहियेत. कुंडीत लाउन टाकले मोड वरच्या बाजुला ठेऊन. परीस्थिती काही ठीक दिसत नाही. आधी कुंडीत नुस्ते ठेउन दिलेले कुजुन गेले.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/08/2016 - 05:00

In reply to by अनु राव

पुन्हा प्रयोग करणार असलात तर अळकुड्या आणतानाच त्याला कोंब दिसतायत का पाहा.

आमच्याकडे अतिउन्हामुळे फक्त भेंडी आणि मोगरा खंबीर आहेत. दोन आठवड्यांपूर्वी तीन दिवसांत चार इंच पाऊस पडला; तेव्हा तापमान कमी झालं होतं. त्या तीन दिवसांत जेवढ्या मिरच्या, टोमॅटो, वांगी धरले तेवढे आता आहेत. बाकी फक्त पाणी घाला आणि झाडं जगवा एवढंच सुरू आहे.

चिमणराव Thu, 21/07/2016 - 14:26

मित्राकडे मोठे मिरचीचं झाड( मिरच्या लागणारं) आहे त्याचीच कटिंग आणून लावली वीस दिवसांपूर्वी.आता मिरचा लागायला सुरुवात झालीय.सोपे काम.

अनु राव Tue, 26/07/2016 - 14:00

In reply to by चिमणराव

सध्या माझ्या कडे मिरच्यांचे अमाप पीक आले आहे. ४ कुंड्यांमधल्या ४ झाडांना भरपुर मिरच्या लागल्यामुळे शेजार्‍यांना वाटाव्या लागतायत. एक झाड तर ५ फुट झालय. उन्हाळा जोरात होता तेंव्हा एक मिरची लागत नव्हती, पण १५ जून पासुन मिरच्या यायला सुरुवात झाली.

सई Tue, 09/08/2016 - 01:45

मी भारतात असताना नर्सरीतून कंपोस्ट खत आणायचे. इथे अमेरीकेत कोणते खत वापरतात किंवा कोणते चांगले? अमेझॉन वरून मागवेन म्हणत आहे. मी फुलझाड व टोमेटोच्या बिया आणून लावल्या आहेत. चांगल्या रुजल्या आहेत.

पिवळा डांबिस Tue, 09/08/2016 - 05:00

In reply to by सई

एवीतेवी अ‍ॅमेझॉन वरून मागवणार तर त्याआधी इथल्या अदितीला कॉन्टॅक्ट करून बघा. तिचा कंपोस्ट बनवायचा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट आहे, म्हणे. ;)
बाकी मी नर्सरीतून (किंवा कधीकधी हार्डवेअर स्टोअरमधूनही) खताची पोती आणतो. चिकन कंपोस्ट छोट्या झाडांसाठी आणि काऊ-मॅन्युअर मोठ्या झाडांसाठी.

आदूबाळ Tue, 09/08/2016 - 16:38

In reply to by पिवळा डांबिस

चिकन कंपोस्ट

...हल्ली झाडंही चिकन खातात? आमच्या वेळी असं नव्हतं. स्वातंत्र्यपूर्व काळात...
- आबासाहेब मोरे, मुक्काम फ्रंट शीट

पिवळा डांबिस Tue, 09/08/2016 - 21:34

In reply to by आदूबाळ

अवो तसलां तंदुरी चिकन नाय हो!
कोंबड्ये जिकडे तिकडे टोचां मारून खाऊन जां शिटतंत, त्या शिटेपासून बनवलेलां खत हो!
काय तुमच्यासारक्या झंटलमन मान्साक इक्ता शिंपल....
-डांबिस रामा

सई Tue, 09/08/2016 - 19:42

In reply to by पिवळा डांबिस

पिडा, छान माहिती दिलीत. जाते आता नर्सरीतच. अ‍ॅमेझॉन वरुन सध्या हे मागवलं आहे. Miracle-Gro Quick Start Planting and Transplanting Starting Solution.

या वेळी बीजापासून सुरु करून आलेले कोवळे कोंब आणि त्यांची दिसामासाने होणारी वाढ बघायला मजा येते आहे.

पिवळा डांबिस Tue, 09/08/2016 - 21:40

In reply to by सई

ऐसीवर नवीन दिसतांय!
माझं ऐकाल तर मिरॅकल ग्रो वगैरे रासायनिक पदार्थांचं इथे नांवही काढू नकात! इथला समस्त स्त्रीपरिवार (अदिती, रुची, रोचना आणि इतर) तुमची मंगळागौर घालेल!!! :)
इथे फक्त कंपोस्ट खत; शुद्ध, सात्विक, आणि आयुर्वेदिक!!

रुची Tue, 09/08/2016 - 23:26

In reply to by पिवळा डांबिस

:ड लेखनश्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद! मंगळागौरीची कल्पना चांगली आहे, त्यासाठी काही नवीन गाणी सुचवाल का?

सई, झाडे भराभर वाढायला दोन सर्वात महत्वाचे घटक लागतात १) सूर्यप्रकाश २) चांगली माती! हे दोन घटक असतील तर कोणत्याही रासायनिक खताची गरज भासणार नाही. इथे ऐसीवरच प्रकाशित झालेली प्रियदर्शनी कर्वे यांची लेखमालिका जरूर वाचा.

बर्याच गार्डन सेंटर्समध्ये गार्डन मिक्स मिळते जे म्हणजे माती (टॉपसॉईल), कॉम्पोस्ट आणि पीटमॉस वगैरेचे मिश्रण असते. हे गार्डन मिक्स वापरलेत तर वेग़़ळे खतपाणी करण्याची गरज निदान सुरवातीला तरी लागणारच नाही. झाडे लावताना MYCORRHIZAE नावाची एक गुणकारी बुरशी असते ती रोपांच्या मुळाशी घातल्यास जमीनीतली मूलद्रव्ये शोषून घ्यायला झाडांना मदत करतात. त्यासाठी आम्ही कधीकधी हे वापरतो. टोमॅटो, वांगे वगैरे रोपांना थोडे अधिक पोषण लागते पण उत्तम प्रतीचे कॉम्पोस्ट वापरल्यास ते पुरेसे ठराबे. वर्मीकॉम्पोस्ट बद्दलही इथेच जुन्या धाग्यांवर भरपूर चर्चा झालेली आहे.

एक सल्ला, ऑनलाईन काही विकत घेण्याआधी जवळच्या चांगल्या गार्डन सेंटरमध्ये जरूर जा, सर्व प्रकारच्या झाडांची, खत, माती वगैरे गोष्टींची माहिती मिळवा. शक्य असल्यास जवळच्या एखाद्या कम्युनिटी गार्डनमधल्या जेष्ठांशी चर्चा करा आणि मगच गोष्टी विकत घ्या. घरची बाग करायची असेल तर त्यात त्यामध्ये आपल्याला आनंद मिळावा हे मूळ उद्दिष्ट असते आणि त्यातून स्वतः उगवलेली रासायनिक खते, कीटकनाशके वगैरे न वापरता बनवलेली ताजी भाजी खाण्याचा आनंदही मिळतो. एरवी रासयनिक खते घालून फोफश्या केलेल्या भाज्या आणि कीटकनाशके फवारलेल्या गोष्टी बाजारात सहजशक्यपणे मिळतात. तेच आपल्या हौसेच्या बागकामात कशाला करावे असे आपले आम्हाला वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/08/2016 - 05:19

In reply to by रुची

मला व्यक्तिशः सेंद्रिय शेतीबद्दल रुची आणि रोचनाला आहे तेवढं प्रेम नाही; ह्या दोघी पक्क्या पॅशनेट आहेत.

माझं प्रेम निराळं आहे; जरा कोरडं आहे. मला झाडं कशी वाढतात, किती उन्हात कसा प्रतिसाद देतात ह्या गोष्टी बघायला आवडतात. त्यामुळे जिथे फार ऊन येणार नाही हे माहीत होतं तिथेही ह्या वर्षी एक टोमॅटो लावून बघितला. रोचनाने सुरुवातीला ऐसीवर धागा काढला तेव्हा ह्या गोष्टी बघण्यात किती गंमत असेल ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण करायला घेतल्यावर मजा वाटायला लागली; म्हणून करते. काही चुकलं, काही सल्ले हवे असतील तर इथे मदत मिळते आणि चांगलं पीक आलं तर मिरवताही येतं म्हणून मी बागकाम करते. गेली दोन-तीन वर्षं बागकाम करून लक्षात आलं की कंपोस्ट वापरून चांगलं पीक मिळतं तर मग कारखान्यांत बनवलेली रसायनं जमिनीत कशाला ओतायची!

मी घरी कंपोस्ट बनवते कारण मला त्याचीही गंमत वाटते. एरवी मी आव्होकाडोच्या साली कंपोस्टात टाकणं बंद केलंय. पण कालच एक आव्होकाडो खराब निघाला, म्हणून तो आख्खा कंपोस्टात टाकला. आज सकाळी बघितलं तर त्याच्या आतला सगळा गर जाऊन तिथे फक्त अळ्या दिसत होत्या. हे वर्णन फार किळसवाणं वाटू शकतं, पण मला ते बघताना गंमत वाटते. म्हणून मी कंपोस्ट करते. घरचं कंपोस्ट एकंदर बागेच्या दाढेखालीही येणार नाही एवढं कमी बनतं. दुकानांमध्ये कंपोस्ट विकत मिळतं ते काही फार महागही नसतं, त्यामुळे ते ही आणते. पण आता पिडांकाकांनी मला कंपोस्टक्वीन बनवल्यावर दोन शब्द लिहिणं भाग होतं, म्हणून खरडलं.

(रुचीने उल्लेख केलेली प्रियदर्शिनी कर्वेंची लेखमालिका इथे सापडेल.)

सई Wed, 10/08/2016 - 19:47

In reply to by रुची

हम्म. मलापण रासायनिक खताच वावडंच आहे. पण इथे माती मिसळलेल्या कंपोस्ट खताची मोठ्ठीच्या मोठ्ठी पोतीच दिसली वॉलमार्टला. आणि बाकी खते रासायनिक होती. त्यामुळे कळेना नक्की काय घ्याव. माती तर आधीच घालून रोप पण आली होती. मग गुगल जिंदाबाद म्हणत एक दोन साईटस् वर जे दिसलं त्याप्र्माणे मागवलं. आता जवळ नर्सरी शोधते आणि जाते. पण मागवलेल्या खताच काय करू असं झालं आहे.

पुण्यात असताना मी झाडांसाठी माती न वापरता ओला कचरा वापरला होता. पुण्यात राठी नावाच्या बाई त्यासाठी लागणार वर्मिकल्चर विकतात. ते करताना मजा आली होती. पण इथे बियांपसून सुरुवात करायच ठरवलं होतं. म्हणून मग तो प्रयोग नाही केला.

बिया पेरल्यावर रोप फार पटकन आली पण आता पुढे त्यांची वाढ हळूहळू होत्ये. म्हणून खताचा घाट घालावा म्हणल. काय आहे ना, मला फार घाई झाली आहे झाडावर फळ फुल लवकर आणि भरपूर बघायची. पण ती बिचारी आपल्या वेगानेच वाढणार. हो आणि सुर्यप्रकाश आणि माती दोन्ही चांगले आहेत.

सगळ्यांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल मंडळ आभारी आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/08/2016 - 19:58

In reply to by सई

अॅमेझॉनवर गोष्टी परत पाठवता येतात. (अनुभव आहे.) होम डीपो किंवा लोव्ज्‌मध्येही कंपोस्ट, शेणखत मिळतील.

रोपं सुरुवातीला फार हळूहळू वाढतात. मोठी झाली की मग वाढ चटचट होते; तापमानामुळे फार फरक पडत नाही, असा माझा अनुभव. त्यामुळे लगेच खतं घालायची गरज नाही; फळाफुलांचे बहर येण्याआधी, येताना खतांची/कंपोस्टची अधिक गरज पडेल. मोठ्या कुंडीत/वाफ्यात रोपांची रवानगी करतानाही कंपोस्ट वापरता येईल. पण सध्या धीर धरो.

सई Wed, 10/08/2016 - 20:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अॅमेझॉनवर गोष्टी परत पाठवता येतात. (अनुभव आहे.)

हो ते माहीत आहे. पण भारतात कसे परत पाठवायला आपल्याला फारस काही कराव लागत नाही. त्यांची माणसं येऊन घेउन जातात. इथे मला पोस्ट ऑफिस्ला जाऊन कुरियर कराव लागेल. तेही ठीक. पण अस नको व्हायला की ९ डॉलरची वस्तु आणि परत पाठवायच्यासाठी ४-५ डॉलर. म्हणजे अक्कल्खाती गेले हे पैसे.

पिवळा डांबिस Thu, 11/08/2016 - 03:45

In reply to by सई

म्हणजे अक्कल्खाती गेले हे पैसे.

पैसे अक्कल खती गेले म्हणायचे
:)

बाकी तुमच्या इथे डीआयवाय स्टोअर असेल तर तिथे चेक करा. त्यांची खतं होम डीपो किंवा लोव्ज पेक्षा चांगली निघतात असा माझा अनुभव आहे.

अनु राव Thu, 11/08/2016 - 10:00

In reply to by सई

हम्म. मलापण रासायनिक खताच वावडंच आहे

ह्याचे कारण काय?** जर योग्य प्रमाणावर रासायनिक खते घातली तर काय वाईट होते. कंपोस्ट काय रासायनिक नसते का?
एनपीएन (१९% वगैरे ) छोट्या झाडांना महीन्यातुन १ चमचा घातले तरी पुरते.

** : अ‍ॅझुमिंग तुम्ही पेस्टीसाईड्स बद्दल बोलत नाहीयेत.

पिवळा डांबिस Thu, 11/08/2016 - 03:42

In reply to by रुची

मंगळागौरीची कल्पना चांगली आहे, त्यासाठी काही नवीन गाणी सुचवाल का?

मी माझ्या आयुष्यात कधीच कुठली मंगळागौर पाहिलेली नाही त्यामुळे केवळ ऐकीव माहितीतून,
१. ते एक लिंबू झेलू बाई..
२. ते गवार मोडण्यासंदर्भातलं गाणं, जे बाजीरावमध्ये येडपटासारखं पिंगा म्हणून घातलंय ते..

बघा चालतील का, तशी ती दुरून बागकामाशी संबंधितही आहेत!!!
:)

चिमणराव Thu, 11/08/2016 - 06:51

वेगवेगळ्या झाडांसाठी वेगळे खत वापरावे लागते.
१)टोमॅटो,वांगी,मिरचा,झेंडू --शेणखत.
थोडे कमी कुजलेलेही चालेल
२)फुलझाडे - चांगले कुजलेले शेणखत
३)अगदी नाजूक फुलझाडे,हर्बस पुदिना वगैरे -वर्मी /गांडूळखत
४)गुलाब - रोप चांगले वाढण्यासाठी अगोदर शेणखत,तीन महिन्यांनंतर दर पंधरा दिवसांनी बोनमील/चिकिन कंम्पोस्ट/बाजारतली रोज मिक्स एक चमचा.
५)मोगरा -जानेवारीत शेणखत
६)चमेली,जाइ जुइ,मनि प्लांट - फक्त नवीन माती.
७)मोठी फळझाडं -फळांच्या मोसमाअगोदर तीन महिने /ब्लॅासम मोहोराच्यावेळी शेणखत.
८)वेलीफळभाज्या कारले,तोंडली,घोसाळे वगैरे- किचिनमधले भाज्यांच्या टाकायच्या साली थेट पुरणे.
९)शोभेची झाडे - पानांवर मारायचा नाइट्रेट स्प्रे
१०)घेवडा,वाल,चवळी वगैरे शेंगा येणारे - सल्फरवाले खत.
- leaf mould नावाचं खत भारतात मिळत नाही फक्त परदेशातच मिळतं.मोठ्या झाडांची गळलेली पानं एक वर्ष कुजवून बनवतात.कंदवर्गीय नाजूक फुलझाडांस फार मानवते.

चिमणराव Wed, 10/08/2016 - 07:02

>>घरची बाग करायची असेल तर त्यात त्यामध्ये आपल्याला आनंद मिळावा हे मूळ उद्दिष्ट असते आणि त्यातून स्वतः उगवलेली रासायनिक खते, कीटकनाशके वगैरे न वापरता बनवलेली ताजी भाजी खाण्याचा आनंदही मिळतो. एरवी रासयनिक खते घालून फोफश्या केलेल्या भाज्या आणि कीटकनाशके फवारलेल्या गोष्टी बाजारात सहजशक्यपणे मिळतात. तेच आपल्या हौसेच्या बागकामात कशाला करावे असे आपले आम्हाला वाटते.>>
हेच महत्त्वाचं.
>>>माझं प्रेम निराळं आहे; जरा कोरडं आहे. मला झाडं कशी वाढतात, किती उन्हात कसा प्रतिसाद देतात ह्या गोष्टी बघायला आवडतात. त्यामुळे जिथे फार ऊन येणार नाही हे माहीत होतं तिथेही ह्या वर्षी एक टोमॅटो लावून बघितला. >>>
प्रयोग करण्यात फार मजा येतेच आणि पारंपरिक गोष्टीला वेगळा फाटा.
तुळशीचं बी लावण्यापेक्षा कधीकधी फुलांच्या पुडीत उग्र घमघमाट येणाय्रा काळ्या {वैजयंती}तुळशीचे बोखे असतात ते लावावे .जगतात.
एक सांगायचं राहिलं - leaf mould नावाचं खत भारतात मिळत नाही फक्त परदेशातच मिळतं.मोठ्या झाडांची गळलेली पानं एक वर्ष कुजवून बनवतात.कंदवर्गीय नाजूक फुलझाडांस फार मानवते.

वेदश्री Wed, 10/08/2016 - 18:27

In reply to by चिमणराव

तुळशीचं बी लावण्यापेक्षा कधीकधी फुलांच्या पुडीत उग्र घमघमाट येणाय्रा काळ्या {वैजयंती}तुळशीचे बोखे असतात ते लावावे .जगतात.

उग्र घमघमाट येणारी काळी वैजयंती तुळस म्हणजे जिला जांभळ्या रंगाची मंजिरी येते ती का? शिर्डीला साईबाबांना वाहिल्या जाणार्‍या हारात असते बहुतांशवेळा ती का?

शिवाय 'बोखे' हा शब्द माझ्यासाठी नविन आहे. अर्थ सांगू शकाल का?

पसरट पानांची ताज्या हिरव्या रंगाची ती राम तुळस, अगदी नखभरही आकाराची जिची काळपट पानं असतील-नसतील ती कृष्ण तुळस, हिरव्या रंगात जांभळा रंग असलेल्या पानांची ती रुक्मिणी तुळस, कापराच्या घमघम वासाची ती कापूरतुळस.. इतकीच अजून माझी माहिती आहे महाराष्ट्रात आढळणार्‍या तुळशींची. अजून काही असतील तर जाणून घ्यायला आवडेल.

May Wed, 10/08/2016 - 18:40

In reply to by वेदश्री

जांभळ्या रंगाची मंजिरी येणारी आणि शिर्डीला साईबाबांना वाहिल्या जाणार्‍या हारात असते त्या तुळशिला सब्जा म्हणतात. (हा कदाचित हिंदी शब्द असेल. मराठीत वैजयंती तुळस असं नाव असेल तर माहीत नाही). सब्जा म्हणजे पाण्यात टाकुन पितात तोच. या तुळशिची पानं किंवा मंजिर्‍या सुकवुन जाळल्या तर मच्छरं पळुन जातात.

मनीषा Thu, 11/08/2016 - 07:41

In reply to by May

तुळस सुद्धा गुणकारी आहे.
तुळशीचा रस असलेला अडुळसा काढा मी नेहमी वापरते.. खोकल्यासाठी . चांगला गुण येतो. हल्ली अडुळसा चे सिरप सुद्धा मिळते.

माझ्याकडे थाई स्वीट बेसील आहे. त्याला जांभळ्या रंगाच्या मंजीर्‍या येतात. पानांचा वास खूप छान असतो. आणि अनेक थाई रेसिपीज मधे त्याची पाने वापरतात.

Thai sweet basil

चिमणराव Thu, 11/08/2016 - 09:15

In reply to by मनीषा

हे बेझल प्रकार नक्की कोणत्या भारतीय प्रकारात वापरायचा ते समजत नाही.वरचे फोटोतले झाड खूप वाढलेले पण शेवटी काढून टाकले.(कढीलिंब जसा बय्राच पदार्थात जातो तसे याचे नाही वाटत.)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 11/08/2016 - 18:37

In reply to by चिमणराव

टोमॅटोच्या सारात बाझिल छान लागतं; पेस्तो करण्याएवढी पानं नसतील तर टोमॅटोचं सार करून त्यात ती पानं सारून देते. टोमॅटोच्या कापांबरोबर पेस्तो चटणी म्हणून खाता येईल.

रुची Thu, 11/08/2016 - 20:34

In reply to by चिमणराव

थाई बेझिल असेल तर छोटे कांदे, आले, मिरची, धने, मीठ, हळद, कोथिंबिरीच्या काड्या यांच्याबरोबर त्याची पेस्ट करावी आणि ती तेलावर परतून मग नारळाचे दूध वगैरे घालून हव्या त्या भाज्या, मासे, चिकन इत्यादी गोष्टींची हिरवी करी करावी, छानच स्वाद येतो.

गोड बेझिल (ईटालियन वगैरे) टोमॅटोच्या किंवा काकडीच्या कोशिंबीरीत खूप छान लागतं किंवा सँडविचमध्येही घालून खाता येतं. उपटायचे कशाला, इतका चांगला वास आणि चव असते त्याची, आपल्याला हव्या त्या सॅलडमध्ये किंवा कोणत्याही पदार्थात ढकलून द्यायचं. एकदा वापरायला लागलात की पुन्हा आवडीने लावाल ती रोपे.

वरच्या फोटोतले बेझिल बहुतेक थाई आहे, थाई बेझिल अगदी हिरवेगार असते आणि इटालियन त्या मानाने पोपटी आणि, थाई बेझिलच्या पानांना जरा अधिक तीव्र वास असतो आणि मंजिर्या जांभळ्या असतात. हे थाई आणि हे इटालियन बेझिल असे दिसते.

चिमणराव Wed, 10/08/2016 - 21:57

In reply to by वेदश्री

तुळस आणि सबजा एकाच कुळातली झाडं समजतात तरी फरक आहेच.खरखरीत पानांची तुळस आणि गुळगुळीत सबजा.याचेच कापुर तुळस वगैरे प्रकार आहेत ते इकडचे नर्स्रीवाले बेझल म्हणून विकतात तरीही परदेशातले बेझल इकडे मिळत नाही.
बोखे म्हणजे तीनचार जोड्या पानांचे असलेले शेंडे.सदाफुली,गुलबाक्षी,सबजा,तुळस,तेरडा अशा झाडांचे शेंडेही लावता येतात.
वैजयंती तुळस बहुआयु असते तशी दुसरी नसते ती अडीच तीन महिन्यांनी निस्तेज होते.वैजयंतीचे खोड नंतर जाड होते व त्याच्या लाकडाचे मणी केल्यावरही त्याला तुळशीचा वास येतच राहातो.

घाटावरचे भट Fri, 12/08/2016 - 16:19

In reply to by चिमणराव

कस्तुरी मळवट चंदनाची उटी
रुळे माळ कंठी वैजयंती
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रविशशिकळा लोपलीया

वेदश्री Sat, 13/08/2016 - 17:21

In reply to by चिमणराव

बोखे म्हणजे तीनचार जोड्या पानांचे असलेले शेंडे.सदाफुली,गुलबाक्षी,सबजा,तुळस,तेरडा अशा झाडांचे शेंडेही लावता येतात.

ही माहिती खूपच उपयोगी आहे की! ओव्याचा बोखा लावला की लागतो हे माहिती होतं पण तुम्ही दिलेली यादी इंटरेस्टींग आहे. जांभ़ळ्या रंगाची सदाफुली लावायचीच आहे.. बोखाच लावून बघते आता.

वैजयंती तुळस बहुआयु असते तशी दुसरी नसते ती अडीच तीन महिन्यांनी निस्तेज होते.वैजयंतीचे खोड नंतर जाड होते व त्याच्या लाकडाचे मणी केल्यावरही त्याला तुळशीचा वास येतच राहातो.

मला ही वैजयंती तुळस हवी! हीचं botanical name सांगता का जेणेकरून मला तिच्या बिया मिळवता येतील.

वेदश्री Wed, 10/08/2016 - 19:10

कापूर तुळशीच्या बिया कुंडीत लावल्या तर मुंग्याच खाऊन जातायत. काय करावे कळत नाहीय. :-(

बागेचा वृत्तांत सांगायचा तर यावेळी पाऊस झिपूरझिपूर का असेना पण अगदी नेटाने पडत असल्याने नवे सदस्य - पांढरी आणि जांभळी गोकर्ण, मेंदी, गुळवेल, गणेशवेल आणि ओवा छान रुजलेत. उन्हाळ्यात अगदी इवलाली लिंबं गळून पडत होती पण गेल्या १५-२० दिवसांपासून रोज पिकलेल्या ७-८ लिंबांची रांगोळी पडलेली दिसतेय बागेत. जास्वंदांना कळ्या आल्यात, अजून एखादेच फूल उमलायला लागलेय. आडोसा करूनदेखील अनंत पारच होरपळून निघाला होता, जळाला का काय असे वाटत असतानाच एके ठिकाणी बारीकसा हिरवा ठिपका दिसल्यासारखे वाटले, पावसाने किमया केली आणि आता अनंत पुन्हा हिरवागार झाला. तीच गत पेरूचीही.. अर्थात पेरूच्या एकाच फांदीवर पाने आली आहेत त्यामुळे इतर जळालेल्या फांद्यांचे काय करावे हा विचारच चालू आहे. वितभर असलेले समुद्रशोकाचे वेल आता फोफावून अगदी ७ फुटापेक्षा जास्त उंच गेलेत.. त्यांच्या पानांच्या वड्याही खाऊन झाल्या एकदा. त्याची रोपं करून वाटतेय आता मैत्रिणींमध्ये. कडीपत्त्याची अगणित रोपं उतरली होती तर ती काढून गायत्री मंदिराच्या आवारात लावायला देऊन आले. अश्वगंधाच्या बिया मातीत खोवून ठेवल्या आहेत.. कधी रोपं उतरतायत त्याची वाट बघतेय. आंब्याच्या पानांवर न कळो कशाने काळे ठिपके पडले होते, ती सर्व पाने काढून टाकून जाळून टाकली. आता आंब्याला नवी पालवी आली आहे. गावरान आवळे लगडायला सुरूवात झाली आहे आणि ते मागायला घरी पोराटोरांची रांगही सुरू झाली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/08/2016 - 19:30

In reply to by वेदश्री

गुळवेल, गणेशवेल, समुद्रशोक ह्यांची नावंही माहीत नव्हती. फोटो दाखवता येतील का?

वेदश्री Mon, 15/08/2016 - 12:45

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

समुद्रशोक (Elephant Creeper)

समुद्रशोक

गणेशवेल

गणेशवेल

गुळवेल (Tinospora cordifolia)

3

चिमणराव Sat, 13/08/2016 - 14:41

In reply to by वेदश्री

>>>वितभर असलेले समुद्रशोकाचे वेल आता फोफावून अगदी ७ फुटापेक्षा जास्त उंच गेलेत.. त्यांच्या पानांच्या वड्याही खाऊन झाल्या एकदा. >>
फोटो द्या अथवा बोटॅनिकल नाव?

चिमणराव Sat, 13/08/2016 - 21:49

In reply to by वेदश्री

फोटो का दिसत नाहित?
समुद्र अशोक नवीनच आहे.गुजरातच्या बाजूला वापर आहे का?
वैजयंतीचं बोटॅनिकल नाव नाही माहित.पंढरपूर सोलापूरकडे फुलवाल्यांकडची तुळस तीच असते.खूप दर्प असतो. शेंड्यांवर पाणी शिंपडून ओल्या कापडात गुंडाळून आणता येईल.कधी इतर फुलबाजारांतही मिळते.बी आणून प्रयोग करण्यापेक्षा बरे.

पिवळा डांबिस Thu, 11/08/2016 - 03:54

आता ऐसीवरचा हा या वर्षातला दुसरा लांबलचक धागा.
गेल्या वर्षीही असे अनेक धागे निघाले आहेत. त्यांवर अनेक सभासदांनी दिलेली बरीच उपयुक्त माहिती आहे जिचा नवीन सभासदांना उपयोग होऊ शकतो.
जुन्या सभासदांनाही चटकन एखादा रेफरन्स हवा असल्यास मिळू शकतो.
ह्या सगळ्या धाग्यांना एकत्र करून एक बागकामविषयक स्वतंत्र विभाग सुरू करता येईल का?
सूचनेचा विचार व्हावा. (अगदीच एका फाटक्या माळ्याची सूचना म्हणून फाट्यावर मारू नये!)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 11/08/2016 - 19:08

In reply to by पिवळा डांबिस

बागकामाचे सगळे धागे एकत्र केले आहेत आणि उजव्या बाजूला 'ऐशां रसां ऐसे रसिक' भागात सगळ्यात खालचा, उजवीकडचा आयकन आहे त्यावर क्लिक केलं की सापडतील. वरच्या दुव्यांमध्येही निराळी टॅब बनवावी का?

चिमणराव Thu, 11/08/2016 - 21:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त काम झालंय.चिन्ह आवडले.हातातले रोप!
शोधाची लिंक युक्ती उपयोगी पडेल का?

पिवळा डांबिस Fri, 12/08/2016 - 23:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त काम केलंस बघ!
वरच्या दुव्यांमध्ये निराळ्या टॅबची गरज नाही, केलेली सोय पुरेशी आहे. किंबहुना ही चोरवाटच जास्त चांगली आहे! ;)
अनेक धन्यवाद.