"ज्यूली "च्या लग्नाचे चौघडे
साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व विचार, समाजमन मागे पडत चाललं तरी अजून पुसलं गेलं नव्हतं. शहरातल्या सर्वसाधारण महाविद्यालयात मुलींचा वावर थोडासा वाढू लागला असला तरी कुणीही अनोळखी भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलणे म्हणजे अजूनही "जगावेगळी" गोष्ट होती. पोरींशी डायरेक बोलणे हे फिल्मी हिरो नि रोडरोमियोलाच शोभते असा मध्यमवर्गाचा(आणि निम्नमध्यमवर्गाचा) समज. सर्वाधिक संख्येने ह्यांचीच मुले कॉलेजात जात्.श्रीमंतांची संख्या देशातच कमी. गरीब भरपूर, पण शिकणारे कमी. ह्या काळानंतर तब्बल दोनेक दशकांनी मी शाळेत गेलो तेव्हाही "अव्वा! मुलींशी बोलतो का काय हा " असे म्हणत आम्ही पोरींशी बोलणार्यांना चिडवू. मिसरूड फुटून , कंठ फुटून दहावी-बारावीतही गेलो तरी अभिमानाने "आमचा हा कध्धी कध्धी म्हणून मुलींशी बोलत नाही हां" असे कौतुकानं आत्या-मावश्या सांगायच्या. ती भूषणाची गोष्ट होती. हे सगळं कधी? तर नव्वदच्या दशकाच्या मध्यावर. १९७५ तर साली तर काय अवस्था असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी.
आणि ह्या अशा देवभोळ्या, सात्त्विक, कर्मनिष्ठ, कर्तव्यपरायण , परमपवित्र भारतीय मनावर एकादिवशी सूं सूं करत धम्मकन बॉम्बगोळा आदळला. "लव्ह इन प्यारिस" मध्ये पोरींनी टांगा उघड्या दाखवणं वगैरे ठीक होतं, पडद्यावर नायकाशी "असं तसं" करायलाही लोकांची हरकत नव्हती. पण इथे थेट ते "असं तसं" केल्यावर "जे काही" स्त्रीच्या पदरात पडतं ते दाखवलं तेव्हा मात्र तेच सीन चवीचवीनं बघणार्यांना कसंसंच झालं, मळमळलं. लग्नाआधी स्त्रीला चक्क मूल झालं होतं!!
पिक्चर होता "ज्यूली". अँग्लो इंडियन (ब्रिटिश्-भारतीय मिश्रवंशीय) ख्रिश्चन घरातल्या पोरीला एका मित्रापासून दिवस जातात. होणारं मूल मारून टाकवत नाही, पण कुठे तरी "टाकून देऊया" म्हणून एका अनाथाश्रमासम ठिकाणी ते "टाकले जाते". त्याची आई कुमारिका बनून पुन्हा परत(लग्नाच्या बाजारात??) येते. राहवत नसले तरी इच्छा मारत राहते. दरम्यान पुनश्च नवरा परगावाहून परत येतो, त्याच्या परंपराप्रिय,धार्मिक हिंडू घरात ही बातमी फुटून गजहबही होतो. हो- नाही करत शेवटी त्याच्या घरचे मुलीचा स्वीकार करतात असं दाखवलंय; उगीच सुखांत दाखवायचा म्हणून. खरोखर सांगा, ह्याच्या एक शतांश जरी त्या काळात घडलं असतं तर किती आणि काय झेलावं लागलं असतं? सुखांत झाला असता?
पिक्चरची तेव्हाच्या प्रिंटमिडियात, उच्चभ्रू वर्तुळात बरीच चर्चा झाली. गाणी हिट्ट असल्यानं, मांडणी रंजक असल्यानं गल्ल्याचाही प्रश्न मिटला. संगीताचं फिल्मफेअरही नवखा राजेश रोशन घेऊन गेला. काही शिक्षित घरातही त्याबद्दल चर्चाविषयही निघे, पण तेवढ्यापुरताच.
शांतम् पापम्... कसं व्हावं आता? बिघडलेली चार दोन तरुण पोरपोरी त्या सिनेमाला गेलीत म्हणून पिक्चर तेवढ्यापुरता चालतोय असं म्हणत सात्त्विकांनी आपलं समाधान करून घेतलं. पुन्हा सगळं कसं शांत शांत झालं. जणू काही झालंच नव्हतं.
चौकटितलं जीवन पुन्हा चौकटीत परतलं. दोन्-अडीच दशके झाली.
.
.
.
ज्यांनी ज्यूली रिलीज झाला तेव्हा अडनिड्या वयात नुकताच प्रवेश केला होता त्यांची आता पोरे होऊन ती पोरे अडनिड्या वयात प्रवेश करू लागली होती. आणि तेव्हाच अजून एक फटाका फुटला. "क्या केहना".
कॉलेजकुमारी प्रिटी झिंटा कॉलेजातल्या आकर्षणातून एका मुलाला जन्म देते. पण प्रिटी झिंटाची पिढी बरीच धीट होती. ज्यूली सारखं तिला आपलं मूल टाकून द्यावंसं वाटलं नाही. ते मूल घेऊन मी जगेन अशा विचारांनी उभं राहिलेलं ते पात्र चित्रपटात दाखवलं गेलं. ज्यूलीला पहिल्याच आठवड्यात ब्लॅकनं तिकिट काढलेल्या आणि आता आई-बाबा झालेल्यांनी आता मात्र नाकं मुरडली! त्यांची मुलं अगदी दहावी-बारावीतलीही शेवटी पिक्चरला गेलीच, आई बाप गेले होते त्यांच्या आई बापांना चुकवून, तसंच काहीस. ज्यूली कुमारी माता बनल्याबद्दल लज्जित, घाबरली होती, लपवू पहात होती. तिचाच दोन दशकांनी आलेला अवतार मात्र तुलनेनं निश्चिंत होता, विचारात ठाम होता. "हे मूल माझं नाही" असं म्हणून पुरुष कधीही पितृत्व नाकारु शकतोच. "अरेरे ! स्त्रीला तसं करता येत नाही; मातृत्व नाकारता येत नाही" म्हणून कित्येकांना तसं मनातल्या मनात वाईटही वाटतं. पण प्रिटिला मात्र "अरेरे ! स्त्रीला तसं करता येत नाही;" असं वाटायच्या ऐवजी वाट्तं ते "स्त्रीनं मातृत्व नाकारायची गरजच काय" असा काहीसा तिचा पवित्रा आहे. इतके दिवस बाळाच्या होणार्या बाबाला "हे तुझंच आहे" म्हणून एक स्त्री विनवण्या करते हे सामान्य दृश्य. पण "हे माझं मूल आहे" (read:- "तुझं नाही. तू झिडकारलंस तेव्हाच हा गर्भ केवळ माझा झाला.")हे ठासून ती चित्रपटाच्या शेवटी सांगते तेव्हा थोडंसं आश्चर्य वाटतं. इथेही सुखांत शेवट करायचा म्हणून दगा देणार्या आणि नंतर पस्तावणार्या सैफला सोडून ती सरळ चंद्रचूड सिंगला होकार देताना दाखवलंय.(एरवी कुमारी मातेला कोण होकार देणार हा माता पित्यांना पडलेला प्रश्न. इथे कुमारी माताच दोघांपैकी कुणाला होकार देणार यावर आख्खा शेवटचा सीन आहे.)
अर्थातच हाही कमर्शिअल पिक्चर वगैरे आहे म्हणून लोकांनी सोयीस्कर रित्या सोडून दिला. तसंही "बॉलीवुडी धंदे पिक्चरातच होत असतात. आपल्या लोकांच्यात कुठं असतं का तसं." असं म्हणत पांघरूण घेऊन पुन्हा सगळे निवांत.
.
.
.
पण ...पुन्हा एकदा सात्त्विक समजल्या जाणार्या प्रादेशिक/मराठी चित्रपटातच सई ताम्हणकर - सुबोध भावे अभिनित "सनई चौघडे" अवतरला. चित्रपट पाहून शेवटी दोन चार जणांना दोन पाच सेकंदांसाठी का असेना वाटलच "कुमारी माता हे प्रकरण इतकं दडवण्यासारखं आहे काय? तिला चार चौघांसारखं जगायचं असेल तर "तिचं तिनं" काहीतरी बघून घेऊन, एखाद्याला पटवलंच पाहिजे का? कुणीतरी फार मोठा त्याग करतोय म्हणूनच तिला स्वीकारलं पाहिजे का? ती अरेंज मॅरेज म्हणतात त्या प्रकारानी तसं सर्व साधारण चार चौघे जर लग्नाच्या बाजारात उतरतात तसं उतरायला हरकत काय? जोडिदाराचा अजून एक ऑप्शन म्हणून consider करता येणार नाही का हिला ? की जगावेगळ्ं केल्यासारखच दिसलं पाहिजे?"
चित्रपट समाजसुधारणेसाठी, विचारप्रवर्तनासाठी वगैरे बनत नाहीत, धंद्यासाठी बनतात. पण बदलाचे वारे कुणीकडे वाहणार ह्याचा हल्कासा अंदाज ते देउनही जातात.
.
.
.
दोनेकशे वर्षांपूर्वी काही काही ठिकाणी सती जात. हळूहळू पाच-सात दशकातच ते बंद झाले. मग समाजानं प्रचंड खळखळ करुन का असेना स्त्री शिकली. शिकूनही बहुसंख्येने घरातच राहिली. परावलंबी राहिली.दरम्यान कुठे कुठे विधवा विवाह होताना दिसले. त्यानंतर आजवर कधी फारसे दिसत नसलेले दृश्य दिसले. चक्क काडीमोड्/घटस्फोट हा शब्द नव्यानेच शब्दकोशात आला. तोवर नवरा कसाही अगदी दारूडा, अर्धवट, खुनशी , बाहेरख्यालीही असला तरी तोच उत्पन्नाचे साधन असल्याने त्याच्याचकडे आपल्या एकनिष्ठपणाचे इमान सिद्ध करणे भाग होते. आता अशा काही केसेसमध्ये तरी कर्तबगार स्त्री हक्काने तथाकथित एकनिष्ठेला नि परावलंबनाला नकार देउ लागली. विधवा विवाह झाले तसे शहरांतून घटस्फोटिंतांचे अल्प का असेना विवाह सुरु झाले.
सतीबंदी,स्त्रीशिक्षण,आधुनिक स्त्रीपोषाख आजवर ह्यातली हरेक गोष्ट, हरेक घटना निव्वळ अशक्य, निदान पुढच्या पाच-सात शतकात तरी "ह्या देशात होणे नाही " अशा क्याटेगरीतली वाटायची. आवाक्याबाहेरची वाटायची. आज मला कुमारी मातेचा सर्वसाधारणपणे विवाह होणे, समाजस्वीकृती मिळणे ह्या देशात कधीही शक्य होणार नाही असेच वाटते; आवाक्याबाहेरचे वाटते. हे कधीही होणार नाही ह्याबद्दल मी ठाम आहे.........
वॉक द वॉक
अशा चर्चा/लेख काढून लोक नक्की काय साध्य करतात? आपण समाजापेक्षा चार पावलं पुढे आहोत हे?
ज्यांच्यात धमक असते ते लोक जे काय करायचं ते करून मोकळे होतात. समाज नावाचा माकडांचा कळप काय म्हणेल याची पर्वा करत बसत नाहीत. ज्या स्त्रीला मूल होण्यासाठी 'नवर्या'ची गरज नसते तिला इतर कशासाठीही नवर्याची गरज पडू नये. नीना गुप्तासारख्या स्त्रियांबद्दल माझ्या मनात पूर्ण सन्मान आहे, जिने विवाहपूर्व मातृत्व स्वीकारलं आणि त्याच्या बर्या-वाईट परिणामांसह निभावलं. मुलीला अनाथालयात टाकून आपल्या आयुष्यातून 'वाईप' करून टाकलं नाही.
आता कळीचा प्रश्न. तुम्हाला अशा प्रकारच्या मुलीचं स्थळ आलं तर अॅक्सेप्ट कराल का? याचं उत्तर 'हो' असं असेल तर अशा प्रकारचे धागे काढून आपलं पुरोगामीत्व सिद्ध करण्याची गरजच राहणार नाही.
वॉक द वॉक, डोण्ट टॉक द टॉक
शंका
काही शंका-
भ्रुणहत्या केली असती तर तो सन्मान राहिला असता काय? नसता राहिला तर तिने बरे/वाईटच बहूदा 'निभावण्यासाठी' फक्त आमच्या-तुमच्या सन्मानावर जगावे काय? विवाहपूर्व मातृत्व तिच्यावर समाजाने लादले होते काय?
हम्म्म्म्म्...
विवाहपूर्व मातृत्व समाजाने श्रीमती गुप्तांवर बहुधा लादले नसावे, असा अंदाज आहे. (म्हणजे, 'कसेही करा, पण कुमारीमाता व्हाच!' असे कोणतेही दडपण समाजाने त्यांच्यावर बहुधा आणले नसावे, किंवा तसा कोणताही अत्याग्रहही केला नसावा, अशा अर्थी. समाजाशी श्रीमती गुप्तांच्या डीलिंग्ज़बद्दल मला काहीच कल्पना नसल्याकारणाने याहून ठामपणे कोणतेही विधान करण्यास मी असमर्थ आहे; क्षमस्व.) परंतु उलटपक्षी, समाज सन्मान करतो किंवा कसे, यावर श्रीमती गुप्ता बहुधा अवलंबूनही राहत नसाव्यात, आणि म्हणूनच बहुधा समाजाच्या ('आमच्या-तुमच्या') सन्मानावर त्या 'जगत' नसाव्यात, अशीही एक शक्यता वाटून जाते.
बाकी, समाजास काय वाटते, सन्मान किंवा कसे, हा बहुधा समाजाचा प्रश्न असावा. कसें?
मी तेच तर म्हणतो आहे.
मी तेच तर म्हणतो आहे. भ्रूणहत्येचा पर्याय सहजपणे उपलब्ध असताना तिने तो न स्वीकारता विवाहपूर्व संबध ठेवण्याच्या आपल्या निर्णयाचं/कृतीचं आणि त्याच्या परिणामाचं उत्तरदायित्व संपूर्णपणे स्वीकारलं. वरच्या लेखात या 'वाट चुकलेल्या' कुमारी मातांना 'समाजाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे बुवा' असा काहीसा टोन दिसत आहे. मी म्हणतो गरज काय? प्रत्येक मुलीने 'लग्न करून मार्गी लागलं' पाहिजे अशी अपेक्षा का ठेवावी? मी बुवा विवाह वगैरे institutions च्या सक्तीला जराही किंमत देत नाही. ज्यांना विवाहाशिवायही संबध ठेवायचे असतील/मूल होऊ द्यायचं असेल त्यांनी खुशाल होऊ द्यावं. विवाह-बाह्य संबध ठेवणार्या संभावितांपेक्षा / विवाहबाह्य संतती इतरत्र वाढू देणार्यांपेक्षा अशा व्यक्तिंबद्दल मला जास्त आदर वाटेल, एवढंच मला म्हणायचंय.
>>>नसता राहिला तर तिने बरे/वाईटच बहूदा 'निभावण्यासाठी' फक्त आमच्या-तुमच्या सन्मानावर जगावे काय? विवाहपूर्व मातृत्व तिच्यावर समाजाने लादले होते काय?
'बहुधा' नाही, बहुतांश वाईटच. तिच्या लोकसत्ता का कुठेतरी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीचा दुवा मिळत नाही. नीना गुप्ता केवळ उच्च आर्थिक-सामाजिक वर्गातल्या होत्या म्ह्णून त्यांच्या मुलीला कमी त्रास झाला असं नाही. समाजाच्या सन्माना-अपमानावर जगण्याचा प्रश्नच येत नाही. (वर 'न'व्या बाजूने म्हटल्याप्रमाणे)
'समाजाने मातृत्व लादणे' म्हणजे काय हे नीटसं समजलं नाही.
मी ज्युली पाहिलेला नाही, त्यातलं ज्युलीचं कुमारी माता होणं हे बलात्काराने/लैंगिक अज्ञानामुळे ओढवलं गेलं होतं का हे मला माहीत नाही. पण तसं नसेल तर 'तिच्या पतिच्या घरच्यांनी तिला (मायनस तिचं मूल) स्वीकारणे' हाच सुखांत आहे का? अनाथालयात वाढणार्या त्या मुलासाठी तरी नसावा.
अर्र र्र....
पण तसं नसेल तर 'तिच्या पतिच्या घरच्यांनी तिला (मायनस तिचं मूल) स्वीकारणे' हाच सुखांत आहे का? अनाथालयात वाढणार्या त्या मुलासाठी तरी नसावा
नाही हो. सासरचे तिच्यामुलासकट तिला स्वीकरातात.(शेवटी हाही आमच्याच कुटुंबाचा अंश आहे(आमच्या पुत्रामुळे तुला झालेला पुत्र आहे.), ह्या अर्थाचे काहिसे म्हणत.)
बाकी फुरसतीत.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अर्र र्र +१
असंए होय? खुलाशाबद्दल धन्यवाद. तुम्ही मूल 'टाकून देण्याबद्दल' लिहिलं आहे. पण त्याचाही स्वीकार होण्याबद्दल लिहिलं नाही, त्यामुळे गैरसमज होतो आहे खरा. मी चित्रपट पाहिलेला नाही हे लिहिलं आहेच.
आपण या जगात आणलेल्या जीवाबद्दल आपण जबाबदार असावं, एवढंच माझं म्हणणं आहे.
नातीचा मुलीसम सांभाळ
"आपण या जगात आणलेल्या जीवाबद्दल आपण जबाबदार असावं...."
+ सहमत. माझ्या पाहण्यातील एक गृहस्थ (मित्रच म्हणतो) असेही आहेत की, ज्यांनी अशा एका मुलीचे पितृत्व स्वीकारले आहे की जिला या जगात आणण्याची जबाबदारी त्यांच्या नादान आणि पळपुट्या मुलाकडे होती. मुलाचे प्रेमप्रकरण याना माहीत होते, पण ज्यावेळी ती युवती 'कुमारी माता' बनण्याच्या मार्गावर होती त्यावेळी मुलग्याने दुसर्या बाजीरावाचा रोल स्वीकारला.....उच्चशिक्षित असल्याने नोकरीही अन्य प्रांतात मिळाली होती, तिथेच तो कायमचा स्थित झाला आहे. पण बापाला हे प्रकरण अ पासून ज्ञ पर्यन्त माहीत असल्याने त्यानीच पुढे होऊन त्या न झालेल्या सुनेला तिच्या डिलिव्हरी दिवसापर्यंत सांभाळले आणि तिला मातृत्व प्राप्त झाल्यावर त्या बाळाच्या संगोपनाची जबाबदारी स्वतःकडे घेतली.....त्या फसल्या गेलेल्या मुलीला मोकळे केले....पदवीधरच नव्हे तर बी.एड.चेही शिक्षण दिले. आज ती एका तालुक्याच्या ठिकाणी शिक्षिकेची नोकरी करीत आपले आयुष्य व्यतीत करीत आहे. [तिने पुढे विवाह केला वा ना केला, किंवा त्या बाजीरावाला अक्कल येऊन, कृत्याचा फिल्मी म्हटला जाणारा पश्चाताप होऊन त्याचे कदाचित मतपरिवर्तनही होईल, पण त्याचा संदर्भ इथल्या चर्चेत करत नाही].
आजाआजीच्या प्रेमळ देखरेखीखाली नात आनंदाने वाढत आहे....तिला हीच जोडी आपले आईवडील वाटतात, त्यात आश्चर्य नसावे.
अशोक पाटील
वास्तवातला अनुभव...
वास्तवातील घटना आभासी चर्चेला वस्तुनिष्ठ परिमाण देते. "असेही असू शकते " हे दाखवल्याबद्दल आभार काका.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बायस्ड
अनैच्छिक भ्रुण-हत्येचा पर्याय न निवडणं म्हणजे उत्तरदायित्व स्विकारणं असं वाटणं थोड व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात वाटतं, स्वेच्छेने मातृत्व स्विकारलं असल्यास परिणामांचा विचार केलेला असतो. निनाने संबंध ठेवण्याचा पर्याय स्वेच्छेने निवडला, मातृत्वाचा निर्णय पण तिचाच होता, भ्रुणहत्या केली असती तरी तो तिचाच निर्णय असता, त्यातिल बरोबर-चुकपणा बहूदा बायस मधून येतो, व्यक्तिस्वातंत्र्य मानल्यास भ्रुणहत्या किंवा मातृत्व दोन्हीही पर्याय सारखेच असावेत, निनाचा निर्णय चूक किंवा बरोबर हे वेगवेगळ्या सामाजिक चौकटीत वेग-वेगळे ठरेल एवढेच मला म्हणायचे आहे.
भ्रूणहत्येचा मुद्दा हा मूळ
भ्रूणहत्येचा मुद्दा हा मूळ विषयाला थोडा टॅन्जन्शियल जातो आहे. भ्रूणहत्येचा प्रथम उल्लेख मी केलेला नाही, किंवा त्या स्त्रीने भ्रूणहत्या होऊ दिली नाही म्हणून ती श्रेष्ठ ठरते असं मला म्हणायचं नाही (अनैच्छिक भ्रूणहत्या/गर्भपात या विषयाला इतके कंगोरे आहेत की तो एक वेगळाच चर्चाविषय होईल) कुमारी माता होणं हे 'लांच्छनास्पद आहे' आणि अशा स्त्रियांना समाजाने 'मोठ्या मनाने माफ करून आपल्यात सामावून घ्यावं' (त्यांच्या 'पापांची' भ्रूणहत्या किंवा अनाथाश्रम यांपैकी कुठल्याशा मार्गाने 'विल्हेवाट' लावून) असा काही सूर असेल तर तो मला पटत नाहीये.
अवांतर - स्त्रियांसाठी जिव्हाळ्याच्या या विषयावर (फक्त) पुरूष(च) तावातावाने चर्चा करत आहेत हे अंमळ गंमतीदार वाटतंय. ('मी' ही आयडी पुरुषाची असावी हा अंदाज)
दुसर्या
दुसर्या एका स्थळावर स्त्री आयडींचे प्रतिसाद बर्यापैकी आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणचं ट्राफिक वेगळं त्या त्या ठिकाणानुसार प्रतिसाद येणार, स्वाभाविकच.
बाकी फुरसतीत.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अवांतराबद्दल
प्रत्येक स्त्री स्त्रीवादी कार्यकर्ती असावी असा हट्ट अस्थानी वाटतो. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावं म्हणून झटणार्या बहुतांश व्यक्ती एकेकाळी फक्त पुरूषच होत्या.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हौ...
ह्याच धर्तीवर आठवलं, लिंकननं आफ्रिकन अमेरिकन मजुरांना गुलामगिरीतून काढायची घोषणा केली, पण तो स्वतः युरोपीय वंशाचा होता.(घोषणा आर्थिक कारणांसाठी, विरोधी बाजूचे खच्चीकरण करण्यास केली असे म्हणणारेही आहेतच अर्थात.)
गांधीजी उच्चवर्णीय असल्याने दलितोद्धाराचे त्यांची इच्छा कमअस्सल आहे असा आरोप काही ज्येष्ठ दलित नेते करित. किंवा गांधीनी थेट दलितोद्धाराची केलेली कामे मोजून दाखवा असे आव्हानच ते देत.(आंबेडक्रांनी मूकनायक वगैरे वृत्त्पत्रे चालवली, चळवळ उभारली. त्यातुलनेत गांधीजींनी राजकिय स्वातंत्र्याला अधिक वेळ दिला हे सत्य आहे.) म्हणजे मग त्यांनी काहीच काम केले नाही का? तर अवश्य केले. दलितांना त्यांचा हक्क मिळू द्यात, झाला तेवढा प्रकार खूप झाला हे त्यांनी सवर्णांच्या डोक्यात घुसवले. त्यामुळे आंबेडकर, जे थेट दलित जनतेत आक्रमक जागृती,प्रगती घडवत होते, त्यांना प्रस्थापित वर्गाकडून मिळणारी रिअॅक्शन/ विरोध अगदिच कमी झाली.
(ही सगळी माझी माहिती नाही, जालावरच वाचलेली आहे.)
थोडक्यात, ही माणसे त्या त्या समूहात नसली तरी त्यांनी त्या त्या समूहाने केलेल्या विरोधाला पाठिंबा दिला.
@खवचटः-
तुम्ही मूल 'टाकून देण्याबद्दल' लिहिलं आहे. पण त्याचाही स्वीकार होण्याबद्दल लिहिलं नाही, त्यामुळे गैरसमज होतो आहे खरा.
काही महत्वाचे मुद्दे झटकन लिहिण्याच्या नादात सुटले. स्वारी.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
चर्चा...
अशा चर्चा/लेख काढून लोक नक्की काय साध्य करतात?
ह्याच नाही कुठल्याही गोष्टीवर सुरु केलेल्या चर्चेवर सेम प्रश्न विचारुन आख्खी चर्चा गारद करता येइल.
आपण समाजापेक्षा चार पावलं पुढे आहोत हे?
अजिबात नाही. आम्ही पुढे नाही आहोत हे वरतीच लिहिल्य. "शहाणा बाळ" म्हणूनच वाढवला गेलो असेन तर "काळाच्या पुढे" वगैरे कसला आलोय बुवा?
नीना गुप्तासारख्या स्त्रियांबद्दल माझ्या मनात पूर्ण सन्मान आहे,
+१ तिचा चॉइस, तिची मर्जी. असो, खर्या व्यक्तीबद्दल नावानिशी लिहिणं, तेही वैयक्तिक गोष्टींबाबत, नाहीच होणार माझ्याच्याने अधिक.
तुम्हाला अशा प्रकारच्या मुलीचं स्थळ आलं तर अॅक्सेप्ट कराल का?
वैयक्तिक प्रश्न.no comments.ड बॉल सोडलेलाच बरा.
याचं उत्तर 'हो' असं असेल तर अशा प्रकारचे धागे काढून आपलं पुरोगामीत्व सिद्ध करण्याची गरजच राहणार नाही.
कोण आणि काय सिद्ध करतय? जेव्हा जे सुचलं ते लिहिलं. ज्यूली पाहून काहीएक डोक्यात आलं, ते उतरवलं.
सोसाट्याचा वारा सुटतो, येतं,गच्च भरून येतं,आसमंतात एक ओलेपणा जाणवू लागतो तेव्हा आपण सहज म्हणतोच की "ही तर पावसाची चाहूल" किंवा
"माका पावासचा वास येउचा आसा"....
बस्स. तितकच. पाउस येणारच अशी ती भविष्यवाणी कींवा आकाशस्वाणी आपण करत नाही, कींवा "पाउस आणूनच दाखवतो" असा चमत्कारिक दावाही आपण करीत नाही. फक्त समोर जे दिसलं त्यावर, आजूबाजूच्या घटनांवरची एक प्रतिक्रिया. बस्स. इतकच.
प्रतिक्रिया कोणीही देण्यास प्रत्यवाय* नसावा.
पुरोगामी शब्दावरून माझाच एक जुना धागा आठवला. इथे लिंका देतोय.
पुरोगामी!(एक छोटिशी गोष्ट) (http://mimarathi.net/node/4317 )
पुरोगामी!(एक छोटिशी गोष्ट) (http://www.misalpav.com/node/1703)
*हा शब्द नवीबाजूंकडून साभार.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
निषेध, काही मतभेद, वगैरे वगैरे... (अवांतर)
१. आम्ही "I think it's gonna rain" असे म्हणतो. आमचे उद्गार या प्रातिनिधिक यादीतून वगळून आमच्या गटाच्या प्रतिनिधित्वाच्या हक्कास नाकारल्याबद्दल तीव्र, कडकडून निषेध. (आम्ही अथवा आमचा गट 'आपण' या क्याटेगरीत मोडत नाही काय? की कदाचित रोमीऐवजी देवनागरीत लिहिल्यास 'आपल्या' क्याटेगरीत येऊन यादीत अंतर्भाव होऊ शकावा?)
२. 'आपण' (व्हॉटेवर बी द डेफिनिशन ऑफ द टर्म - पहा, देवनागरी वापरली असां!) असे म्हणतो, यामागील एक महत्त्वाचे कारण "नेमेंचि येतो मग पावसाळा, हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा" * हे असते, असे आमचे नम्र प्रतिपादन आहे. पक्षी, सोसाट्याचा वारा सुटणे, गच्च भरून येणे, आसमंतात आर्द्रतेचे आकलन होणे इ.इ. उपरनिर्दिष्ट पूर्वअटींची पूर्तता झाल्यानंतर सहसा पर्जन्यवृष्टी होते, असा आपला (तसेच, परग्रहावरून अथवा सार्वकालिक अवर्षणग्रस्त प्रदेशातून अवतरले नसल्यास बहुधा आपल्या पूर्वजांचाही) वर्षानुवर्षांचा - किंवा कदाचित पिढ्यानपिढ्यांचाही अनुभव असतो. आणि त्याचमुळे उपरनिर्दिष्ट सर्व घटनांच्या उपस्थितीत "वाह भई! जल्द ही बड़ी तेज़ धूप पड़नेवाली है, क्या बात है!" अथवा "I smell a drought" असे आपण - अथवा आम्हीही - म्हणत नाही. किंबहुना, अशा परिस्थितीत आपण - अथवा आम्ही - जे काही विधान करते होतो ("the statement that we end up making" अशा अर्थाने), ते केवळ या वर्षानुवर्षांच्या अथवा पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवाच्या बळावरच करू धजतो, हेही मांडण्याचे धारिष्ट्य करू इच्छितो.
वरील प्रस्तावाचे संदर्भात मात्र अशा कोणत्याही - वर्षानुवर्षांच्या वा पिढ्यानपिढ्यांच्या - अनुभवाचा दावा करता यावा किंवा कसे, याबद्दल साशंक आहे. सबब, तुलना पटण्यासारखी वाटली नाही.
* याकरिता समर्पक चालीच्या तूर्तास शोधात आहे. 'दिल की नज़र से, नज़रों की दिल से'ची चाल बसल्यासारखी वाटते, पण नेमकी त्या जास्तीच्या 'कोई हमें बता दे'पाशी गोची होते. 'तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यूं मुझ को लगता है डर'ची चाल ओढूनताणून बसवता येते, पण त्यात मजा नाही. कोणाला याहून अधिक उचित चाल सुचल्यास ती जरूर मांडावी.
हा शब्द आम्ही मराठी भाषेस बहाल केलेला नाही, तसेच तो मराठी भाषेत आम्ही रूढही केलेला नाही, अथवा या शब्दावर आमचा प्रताधिकारही नाही. पब्लिक डोमेनमधील हा शब्द आम्ही आम्हास वाटल्यास केवळ वापरतो, इतकेच. सबब, या शब्दाचे श्रेय - आणि पर्यायाने आपला श्रेयअव्हेर - आम्ही नम्रपणे नाकारू इच्छितो. आभारी आहोत.
कळीचा प्रश्न
कुमारी मातांचा प्रश्न महत्त्वाचा आहे यात शंकाच नाही. 'जूली' हा एक धाडसी प्रयत्न होता. (मुलाच्या आठवणीने पान्हा फुटून ओले झालेले अंतर्वस्त्र वगैरे त्या काळात धाडसाचेच होते) पण तो गाजला वेगळ्याच कारणासाठी. त्या आधीही 'धूल का फूल' सारखे प्रयत्न झाले होतेच...
अवांतरः झेलणे = पकडणे, टु कॅच. सोसणे = सहन करणे, प्रिटी झिंटा = प्रीती झिंटा...
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
आम्रिकेत माझ्या
आम्रिकेत माझ्या क्लायंटपंथातली एक म्यानेजर 'एकटी' माता होती. मात्र हे मातृत्त्व अपघाताने आलेले नसून तीने व्यवस्थित स्पर्म ब्यांकेत जाऊन (हवा त्या प्रतीचा स्पर्म पैसे फेकून मिळवून) 'कमावलेलं' मातृत्त्व होतं. त्यावेळी तिचं वय होतं १९! पुढे १६ वर्षे केवळ मातृत्त्व निभावलं आता मुलगी मोठी झाल्यावर दोघी एकाच युनिवर्सिटीमधे एम्बीए करत होत्या..
अश्या स्त्रीया पाहिल्या की त्यांच्या खंबीरपणाचं कौतूकही वाटतं आणि आदरही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कौतुकास्पद?
यात कौतुक वाटण्यासारखे असे मला तरी काहीही आढळले नाही. बाकी, वैयक्तिक निवडीचा आदर आहेच. (म्हणजे, उद्या माझा एखादा सहकारी जर माझ्यासारखा उभ्या रेघांचा शर्ट न घालता चौकड्यांचा शर्ट घालून आला, तर त्याच्याबद्दल जेवढा आदर वाटेल, साधारणतः तेवढा. चौकडीचा शर्ट घालणार्या सहकार्याचे कौतुक कितपत वाटेल, याबद्दल साशंक आहे.)
काय आहे, की सदर स्त्रीला मी व्यक्तिशः ओळखत नाही, परंतु तुम्ही जे काही वर सांगितले आहे, त्यानुसार तिने मातृत्व स्वयंनिर्णयाने पत्करलेले असावे, असे प्रतीत होते. ते मातृत्व तिने वैवाहिक संबंधांतून मिळवले, की विवाहात न शिरता संबंध ठेवून, की स्पर्मब्यांकेतून स्पर्म मिळवून (त्याकरिता पैसे फेकून, चेक लिहून, क्रेडिट कार्ड स्वाइप करून अथवा अन्यथा), हा मुद्दा गौण आहे, आणि ती सर्वस्वी तिची खाजगी बाब आहे. त्यापुढे, मातृत्वप्राप्तीनंतर अपत्याचे संगोपन करणे हा नैसर्गिक कॉन्सीक्वेन्स असावा; त्यात जगावेगळे असे बहुधा काही नसावे. बरे, इफ़ आय नो माय अमेरिकन्स राइट, यात आपण विशेष कौतुकास्पद असे काही करीत आहोत असे तिला बहुधा वाटतही नसावे, आणि अशा कौतुकाची तिची बहुधा अपेक्षाही नसावी; किंबहुना, यात कोणाला काही विशेष कौतुकास्पद वाटू शकते, हे बहुधा तिच्या गावीही नसावे, आणि फार कशाला, पण यात ती विशेष कौतुकास्पद अथवा घृणास्पद असे काही करत आहे, असे तिच्या आजूबाजूच्या बहुतांश एतद्देशीय * सहकार्यांनाही वाटत नसावे, असा अंदाज आहे.
असो. बाकी, कोणाला कशाबद्दल काय वाटावे, हे ठरवणारा मी कोण, हा भाग आहेच.
* एक्ष्ट्रीम राइटविंगर्ज़ नॉटविथष्ट्यांडिंग. अशा टोकाच्या दक्षिणपंथी, दुसर्याने काय करणे योग्य वा अयोग्य हे ठरवू पाहणार्या जमाती बहुधा प्रत्येक समाजात असाव्यात, चालायचेच. त्यांचा फार विचार करायचा नसतो; त्यांना फक्त नोव्हेंबरात हाणून कसे पाडता येईल, एवढेच पहायचे असते. असो; हे अवांतर झाले.
कौतुक वाटते हे खरे. का
कौतुक वाटते हे खरे. का वाटले/वाटते याचा विचार केला नव्हता.
तीची कौतुकाची अपेक्षा नव्हतीच. मात्र मी माझ्या तोपर्यंतच्या आयुष्यात अश्या प्रकारचा पर्याय निवडणारी, तरीही समर्थपणे अपत्याचे एकट्याने संगोपन करून पुढे मुलीसोबत स्वतः तिच्याच वर्गात बसून शिक्षण घेणारी स्त्री प्रथमच पहात होतो. त्यामुळे मला कौतुक वाटले असावे.
माझ्या अल्पशा वास्तव्यात मी तिथे अशा ३ माता भेटल्या मात्र त्यापैकी या एकीचेच कौतूक वाटते. तेव्हा केवळ स्वेच्छेने कुमारी माता झाली म्हणून ते नसावे (म्हणजे ते आहेच - असावेच- मात्र ते एकमेव कारण नसावे असे (आता) वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
प्रतिसाद
पाश्चात्य जगतात (कमी अधिक फरकाने) अशा स्वरूपाच्या निवडीचं स्वातंत्र्य समाजाताल्या प्रत्येक थरातल्या स्त्रीला मिळणे हा तेथील व्यवस्थेचा भाग आहे. हा हक्क नाकारणार्या किंवा दडपू पहाणार्या व्यवस्थेमध्ये अशा स्वरूपाची निवड करणं हे उल्लेखनीय ठरलं असतं/ठरतं.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
का बुवा?
का बरे?
सर्वप्रथम, हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आहे, म्हटल्यावर, त्याबाबत इतरांना मत असण्याचे कारणच काय? दुसरे म्हणजे, निर्णय समाजमान्य असो अथवा सामाजिक मतप्रवाहाविरुद्ध, एकदा 'वैयक्तिक' म्हणून तो घ्यायचा ठरवला, की त्यापुढे तो निभावण्यासाठी जे काही करावे लागेल ते करणे (अथवा, उलटपक्षी, ते अशक्यप्राय अथवा परकोटीचे त्रासदायक ठरू पाहत असल्यास त्यातून बाहेरचा मार्ग शोधणे), हे ओघानेच येऊ नये काय? इतरांना याबद्दल बरेवाईट काही वाटण्याचा प्रश्न कोठे यावा?
एखादा निर्णय हा सामाजिक मतप्रवाहास अनुसरून नाही, केवळ या कारणास्तव, तसा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक पातळीवर घेणारास त्याबद्दल ब्रॅगिंग राइट्स प्राप्त व्हावेत काय? आणि त्याच विचारधारेने पुढे जाऊन, इतरांना त्याचे कौतुक वाटण्याचे काही कारण असावे काय?
मुळात निर्णय वैयक्तिक आहे म्हटल्यावर त्याचा उल्लेख तरी का व्हावा? (पक्षी, ही बाब 'उल्लेखनीय' का असावी?) ही 'उल्लेखनीयता' त्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करीत नाही काय? त्या व्यक्तीच्या प्रायवसीच्या हक्कास बाधा आणीत नाही काय?
प्रश्न
>>>>मुळात निर्णय वैयक्तिक आहे म्हटल्यावर त्याचा उल्लेख तरी का व्हावा? (पक्षी, ही बाब 'उल्लेखनीय' का असावी?) ही 'उल्लेखनीयता' त्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करीत नाही काय? त्या व्यक्तीच्या प्रायवसीच्या हक्कास बाधा आणीत नाही काय? <<<<
अशा गोष्टीचा उल्लेख प्रायव्हसीच्या हक्काला बाधा ठरेल असं वाटत नाही. विविध देशप्रांतातील प्रायव्हसीचे कायदे काय आहेत याची माहिती मला नाही. परंतु खासगी गोष्टींचे/व्यक्तींचे काढलेले फोटो/व्हिडीओ इत्यादि गोष्टी प्रायव्हसीच्या भंगाखाली येऊ शकेल. मात्र अशा प्रसंगीचे जाहीर उल्लेख प्रायव्हसीच्या अखत्यारीत येतील का याबद्दल साशंक आहे. नीना गुप्ता या व्यक्तीच्या आयुष्यातल्या अशा स्वरूपाच्या निर्णयाची चर्चा वर आलेली आहे. अशा स्वरूपाचा निव्वळ उल्लेख त्या व्यक्तीच्या प्रायव्ह्सीचा भंग ठरतो का हे मला माहिती नाही.
असो. एखाद्या व्यक्तीचा असा निर्णय उल्लेखनीय ठरेल याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नावागावापत्त्यासकट त्या व्यक्तीच्या खासगी आयुष्याची गॉसिपवजा चर्चा हे मला अभिप्रेत नव्हतं हे मी येथे नमूद करतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
कायद्याचे सोडा
कायद्याचा भाग सोडा. माझा मुद्दा, अशी उल्लेखनीयता ही त्या व्यक्तीच्या प्रायवसीच्या 'हक्का'पेक्षा प्रायवसीच्या 'अपेक्षे'ला बाधा आणीत नाही काय, असा (शब्दांत थोडा फेरफार करून) पुन्हा मांडू इच्छितो. शक्य असल्यास फेरविचार व्हावा.
'उल्लेखनीयते'चा अर्थ हा साधारणतः 'शालजोडी-श्रीफलासहित सत्कारा'च्या धर्तीवरच घेतलेला आहे. काळजी नसावी.
प्रतिसाद
>>>>अशी उल्लेखनीयता ही त्या व्यक्तीच्या प्रायवसीच्या 'हक्का'पेक्षा प्रायवसीच्या 'अपेक्षे'ला बाधा आणीत नाही काय, <<<<
याचा खालील अंगांनी विचार केला जाऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीच्या, या स्वरूपाच्या बाबींची चर्चा सार्वजनिक अवकाशांत कधी/कशी घडत असावी ?
१. ती घटना चालू व्यवस्थेपेक्षा वेगळी आणि मुख्य म्हणजे त्या व्यवस्थेला आव्हान देणारी , अशा स्वरूपाची पहिली घटना असली तर त्या घटनेच्या अनुषंगाने त्या वैयक्तिक बाबींची चर्चा होते.
२. वरील संदर्भातल्या व्यक्तीने आपणहून सार्वजनिक व्यासपीठांवर चर्चेला यायची तयारी दाखवली आणि अशा चर्चा खुल्या वातावरणात झाल्या तर त्या व्यक्तीच्या स्वतःच्या मर्जीनेच वैयक्तिक बाबींची चर्चा घडवून आणली जाऊ शकते.
वरील दोन्ही शक्यतांमधे त्या व्यक्तीची प्रवाहाविरुद्ध पोहण्याची प्रवृत्ती , तयारी , धमक हे समान गुणधर्म आहेत. व्यवस्थेला आव्हान दिल्याशिवाय काही हे घडणार नाही. थोडक्यात, अशा परिस्थितीमधे अशा व्यक्तीला आपल्या प्रायव्हसीची किंमत द्यावी लागत असेल. आता असं होणं हे काही योग्य नव्हे. पण बहुदा ज्या सामाजिक "टॅबू"ला अशा व्यक्ती आव्हान करत असतात त्या मूळ मुद्द्याचा "सोशल स्टिग्मा" हा खासगीपण न जपल्यापेक्षा अधिक तीव्र असावा.
मी वर अधोरेखित केल्याप्रमाणे खासगीपणा जपता यायला हवा. कुणालाही त्याची किंमत द्यावी लागू नये. परंतु ज्या परिस्थितीला या व्यक्ती सामोर्या जातात त्यात खासगीपणाला ढका लागतच असावा असं म्हणता येईल.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
साशंक
अशा परिस्थितीत अशी चर्चा व्हायचीच, होऊ नये, पण होतेच, नाइलाजास काय इलाज, कोण आणि किती जणांची तोंडे धरत बसणार, प्रत्येकाला एकएक (तरी) असतेच, चालायचेच, वगैरे इथवर एक वेळ समजू शकतो. परंतु...
मुळात आपल्या खाजगी बाबींची चर्चा सार्वजनिक मंचावर घडवून आणण्याची इच्छा कोणाला का व्हावी, याबद्दल साशंक आहे.
१. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची प्रवृत्ती, की प्रवाह हा वैयक्तिक निवडीस प्रतिकूल निघाल्याकारणाने, नाइलाजास्तव, प्रवाहाविरुद्ध पोहण्याची निर्माण झालेली निकड?
२. आणि ३. एकदा का एखाद्या बाबतीत वैयक्तिक कारणांकरिता प्रवाहाविरुद्ध पोहण्याची निकड आहे, असे ठरले, तर मग तशी तयारी आणि धमक असणे अनिवार्य नाही काय?
व्यवस्थेला आव्हान हा कधीकधी स्वतःवर होणार्या अन्यायाच्या निवारणाकरिता करावा लागणारा एक अनिवार्य भाग ठरू शकावा, इथवर मान्य. तो मूळ उद्देश नसावा, तर बहुधा केवळ एक साधन ठरावे. ('शकावा', 'नसावा', 'ठरावे' हे प्रयोग येथे विध्यर्थी न घेता शक्यतादर्शक अर्थाने घ्यावेत.) पण ते असो. मूळ मुद्दा असा, की असे व्यवस्थेला आव्हान हे बहुधा तत्त्वाच्या आधारावर आणि तेवढ्याच मुद्द्यांस धरून देता यावे. (म्हणजे, 'हा सर्वस्वी माझा खाजगी मामला असून, मी कोणताही गुन्हा केलेला नाही; सबब, समाजाला माझ्या वैयक्तिक बाबींत ढवळाढवळ करण्याचा आणि/किंवा माझ्या मूलभूत अधिकारांपासून मला वंचित करण्याचा काहीही अधिकार नसावा' अशा किंवा यासम, आणि एवढ्याच एका, मुद्द्यावर.) आपल्या खाजगी बाबींची सांगोपांग, जाहीर चर्चा करण्याची काही गरज असण्याबद्दल, आणि अशा सांगोपांग, जाहीर चर्चेमधून (समाज सोकावण्याव्यतिरिक्त) काही साध्य होण्याबद्दल, प्रचंड साशंक आहे.
सामाजिक "टाबू"स भीक न घालता करण्याइतकी जर एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीस योग्य वाटण्यासारखी असेल, तर अशी व्यक्ती अशी गोष्ट करताना "सोशल स्टिग्मा"ला भाव देईल, याबद्दल साशंक आहे. अशा परिस्थितीत, खाजगीपण न जपण्याची "किंमत मोजावी (वगैरे) लागण्या"चे अशा व्यक्तीस काही कारण जाणवत नाही. तशी निकड असण्याबद्दल तर प्रचंड साशंक आहे. (केक खाऊन शिल्लक ठेवता येत नाही, तद्वत.)
(समाजास येनकेनप्रकारेण टक्कर देणे हाच मूळ उद्देश, अथवा स्वत:च्या खाजगी बाबींची जाहीर चर्चा करण्याची अनावर इच्छा, अथवा प्रसिद्धीसाठी स्टंट, यांसारख्या शक्यता येथे विचारात घेतलेल्या नाहीत.)
उपस्थित समाजरचनेत नाइलाजाने स्वीकारावी लागणारी बाब एवढ्या मर्यादित प्रमाणात हा मुद्दा ग्राह्य वाटतो. म्हणजे, समाज आहे, चर्चा ही होणारच, एका मर्यादेपलीकडे ती थांबवता येत नाही, तसा प्रयत्न केल्यास त्यातून ईप्सितसाधनापेक्षा मनस्तापच अधिक पदरी पडतो, वगैरे वगैरे. तेवढ्या प्रमाणात खाजगीपणाला लागणारा धक्का हा बहुधा अनिवार्य असावा. परंतु त्यापलीकडे जाऊन, स्वतःच अशी चर्चा घडवून आणून, आपल्याच खाजगीपणास आपणच सुरुंग लावण्याचे फारसे काही प्रयोजन निदान मला तरी दिसत नाही. (पुस्तक लिहून अर्थार्जन वगैरे शक्यता येथे लक्षात घेतलेल्या नाहीत.)
असो.
प्रतिसाद
चर्चाविषय आणि मांडणी रंजक आहे. एकमेकांपासून (सुमारे) वीस वर्षे दूर असलेल्या तीन चित्रपटांच्या निमित्ताने, कुमारी मातृत्त्वाच्या मुद्द्याकडे,पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोन कसा हळुहळू बदलला आहे याची चांगली कल्पना एक वाचक म्हणून मला आली.
विवाहपूर्व किंवा एकंदरच विवाहाशिवाय झालेल्या संततीला जन्म देऊन वाढवण्याइतपत स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग हा अर्थातच आर्थिक सक्षमीकरणातून जातो असं मला दिसतं. हे सक्षमीकरण भारतीय संदर्भात एका विशिष्ट वर्गातल्या , परिस्थितील्या स्त्रियांचंच झालेलं आहे. मुद्दा स्त्रियांच्या सबलीकरणाचा वाटतो. गर्भाशयासंदर्भातली स्वायत्तता, निवडीचं स्वातंत्र्य या बाबी या व्यापक मुद्द्याचाच एक भाग आहेत.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
तुमचं या दृष्टिकोनात
तुमचं या दृष्टिकोनात पड्णार्या बदलांचं निरिक्षण (चित्रपट हे प्रोब म्हणून वापरून केलेलं) आवडलं.
'न'वी बाजू यांचे मुद्दे पट्ले..उल्लेखनीयते बद्द्लचे....पण कोणत्याही सामाजिक बदला मधे एक काळ 'उल्लेखनियतेचा' येतोच.
एक काळ असा होता की जेव्हा मुलीने/स्त्रीने शाळेत जाणं (किंवा तिला घरच्यांनी पाठवणं) उल्लेखनीय होतं. पुढे या त्यांना मिळणार्या कौतुकामुळे/फायद्यांमुळे इतरांनी त्यांचं अनुकरण केलं. आणि आज आपण मुलींनी शिकणं अगदी सामान्य गोष्टं मानतो.
तसाच हा काळ कुमारी मातांना मिळणार्या 'उल्लेखनियतेचा' आहे. पुढे ही उल्लेखनीयता कमी होईल आणि सगळेच ती सामान्य गोष्ट मानतील.
(ही उल्लेखनीयता का, असं विचारून तुम्ही ('न'वी बाजू) बदल फास्ट्फॉर्वड करण्याच्या प्रयत्नात आहात असं वाटत...चांगलच आहे. तसंच मला, आताच्या काळात जेव्हा आया आपल्या लग्नाच्या वयाच्या मुलाचं कौतुक सांगत फिरतात " आमच्या मुलाला भात-वरण, मॅगी करता येतं हो" तेव्हा वाटतं, आणि मी त्यांना विचारते की यात काय आलय मोठं कौतुक करण्यासारख?)
आणखीन एक...आपल्याला दैनंदीन जीवनात न भेट्णारी व्यक्तिमत्व कधीतरी भेटली आणि आवडली तर आपल्याला त्या व्यक्तिब्द्द्ल जास्त कौतूक वाटतं. रोज एक कुमारी माता मला भेटली तर माझ्या ल़क्शातंही येणार नाही ते कालांतराने.
काही मुद्दे
मुळात कौतुक / फायदा ही(च) अनुकरणाची कारणे का असावीत? 'ही गोष्टदेखील करता येते' म्हणून (अथवा 'मला करावीशी वाटली' म्हणून) एखादी गोष्ट का केली जाऊ नये?
आणि येथे तर अनुकरणाचाही मुद्दा नाही. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे, ज्याला/जिला जे योग्य वाटते, ते त्याने/तिने करावे. दुसरा/दुसरी करतो/ते म्हणून नव्हे, तर स्वतःला करावेसे वाटले म्हणून. नसेल वाटत, तर करू नये. सक्ती नाही, आग्रह नाही. केल्याबद्दल किंवा न केल्याबद्दल, समाजाकडून कौतुकही होऊ नये किंवा निंदाही होऊ नये. (कशाबद्दल व्हावी?) असे का होऊ नये? यात नेमके काय गैर आहे?
'शुभस्य शीघ्रम्', नाही का? (म्हणजे, समाज जेव्हा व्यक्तीच्या खाजगी बाबींत ढवळाढवळ करणे सोडून देईल, तो सुदिन, अशा अर्थाने.)
खरे आहे. यात कौतुक करण्यासारखे काहीच नाही. (किंबहुना, प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर ज्याचे म्हणून हे "कौतुक" सांगावयाचे, त्याच्या जोड्यांत स्वतःस उभे करून पाहिल्यास, हे ऐकावयास अत्यंत स्टुपिड*, एम्बॅरॅसिंग** वाटते. परंतु हे घडते. नाइलाज आहे.)
शंका:
१. 'कुमारीमाता असणे' हा 'व्यक्तिमत्त्वा'चा भाग अथवा प्रकार असण्याबद्दल साशंक आहे.
२. एखादी व्यक्ती आपल्यास का आवडते? किंवा, अशी एखादी व्यक्ती ही आपल्याला का आवडावी? कुमारीमाता आहे, म्हणून? की अन्य काही कारणांमुळे, एक व्यक्ती म्हणून, तिचे कुमारीमाता असणे नॉटविथष्ट्यांडिंग ऑर ह्याविंग नो बेअरिंग व्हॉटसोएवर?
*, ** या नेमक्या अर्थच्छटा समर्थपणे व्यक्त करणारे समर्पक मराठी प्रतिशब्द याक्षणी सुचत नाहीत; क्षमस्व.
"मुळात कौतुक / फायदा ही(च)
"मुळात कौतुक / फायदा ही(च) अनुकरणाची कारणे का असावीत? "
अगदी मूलभूत प्रश्न विचारला आहे. ते नैसर्गिक आहे, एवढच उत्तर माझ्या आवाक्यात आहे थोडा विचार करता.
"'ही गोष्टदेखील करता येते' म्हणून (अथवा 'मला करावीशी वाटली' म्हणून) एखादी गोष्ट का केली जाऊ नये?"
केली जावीच..पण जी व्यक्ति तसं करते तिच्या मनात तरी काही कारण असतच ते करण्यामागे..इतरांनी प्रश्न विचारले तर त्यांना उत्तरं देण्यास नकार द्यायचा...मग हळूहळू कोणी विचारेनासे होतात.
"आणि येथे तर अनुकरणाचाही मुद्दा नाही. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे, ज्याला/जिला जे योग्य वाटते, ते त्याने/तिने करावे. दुसरा/दुसरी करतो/ते म्हणून नव्हे, तर स्वतःला करावेसे वाटले म्हणून. नसेल वाटत, तर करू नये. सक्ती नाही, आग्रह नाही. केल्याबद्दल किंवा न केल्याबद्दल, समाजाकडून कौतुकही होऊ नये किंवा निंदाही होऊ नये. (कशाबद्दल व्हावी?) असे का होऊ नये? यात नेमके काय गैर आहे?"
अनुकरण हे आपण नकळत करतच असतो...आणि इतरांनी अनुकरण करावं का नाही हे कुठे कुणाच्या हातात आहे.समाजाकडून कौतुक काय किंवा निंदा काय...ती नकळत घेतलेली दखल आहे.ती कोणत्या बाबतीत समाजानी घ्यावी आणि कोणत्या बाबती घेऊ नये हेच कालांतराने होणारे बदल नाहीत का?
शंका निरसनाचा प्रयत्न:
१. 'कुमारीमाता असणे' हा 'व्यक्तिमत्त्वा'चा भाग अथवा प्रकार असण्याबद्दल साशंक आहे.
"कुमारीमाता असणे" (इथे मी हा शब्द 'एकट्या माता' या एकूण सगळयासाठी वापरला आहे, फक्त कुमार वयात माता असं मला म्हणायचं नाही/नव्हतं) हा व्यक्तिमत्वाचा भाग नाही..पण हे होण्याचा जी निर्णय घेते तो निर्णय घेणारे अजूनही माझ्या पाहाण्यात फार कोणी नसंतील, तर अर्थातच मला त्यातलं वेगळेपण जाणवेल...आणि विचार करून, खरंच असं करणही आनंददायी आहे/नाही असं काहीही मला वाटू शकतं..
२. एखादी व्यक्ती आपल्यास का आवडते? किंवा, अशी एखादी व्यक्ती ही आपल्याला का आवडावी? कुमारीमाता आहे, म्हणून? की अन्य काही कारणांमुळे, एक व्यक्ती म्हणून, तिचे कुमारीमाता असणे नॉटविथष्ट्यांडिंग ऑर ह्याविंग नो बेअरिंग व्हॉटसोएवर?
कुमारीमाता/ एकटी माता होणे हा निर्णय घेणे एक प्रकारचा 'सिम्बॉल' आहे (जोवर ते 'वेगळं' आहे)...आवडणं न आवडणं (या कारणामुळे) हे व्यक्तिसापेक्ष आहे. कोणत्या कारणामुळे एखादी व्यक्ति आवडवी, न आवडावी हे फार खाजगी प्रश्न आहेत.
आभार....
संजोपराव्,ऋषिकेश, नवीबाजू,ऋता,मुसु ह्या सर्वांचे आभार.
@ऋषिकेश :- किस्सा रोचक वाटला. भारतात तरी नजीकच्या भविष्यात असे(स्वतःहून एक्टिने स्पर्म बँकेत जाणे) दिसेलसे वाटत नाही. आणि नवीबाजू म्हटल्याप्रमाण आपण धाडसाचं वगैरे काम करतोय हे "तिच्या गावीही नसेल."
@संजोप रावः- झेलणे = पकडणे, टु कॅच. सोसणे = सहन करणे उपयुक्त सूचना.
@मुसु :- स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग हा अर्थातच आर्थिक सक्षमीकरणातून जातो
+१
@ऋता :- मूळ प्रतिसादात "उल्लेखनीयतेच्या" मांडलेला मुद्दा रास्त वाटतो. सध्या तरी ती गोष्ट उल्लेखनीय आहे. संख्या वाढली, तर ती तशी राहणार नाही.
@नवीबाजू:- आपले मुद्दे अजूनही वाचतोच आहे. गोंधळायला होते आहे.(साधारण वकिली तर्क ह्या भाषेत चालत असावेत, त्यांचा अचूक अर्थ काढण्यास मेंदूस शिणवटा येतो. उदा म्हणून एक काल्पनिक विधान :- "जर ते तसे असून असे असताना हे करण्याऐवजी हा पर्याय सोडून तत्सम कृती केली असती किंवा केली नसती तरीही तिच्यावर किम्वा तिच्याशी संबंधित कुणावरही कितपत कितपत प्रभाव पडला असता किंवा का पडला नसता ह्याने नक्की इथे चर्चा करताना अडखळायला होण्याचे कारण नसले तरी
पुढे चालवायचे एक उद्गम आहे" )
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सनई चौघडे
तुम्ही उल्लेख केलेल्यातला एकही चित्रपट मी पाहीलेला नव्हता. पण 'सनई चौघडे' हे तर नावही मी ऐकलेलं नव्हतं. कालच तो मी यूट्युब वर पाहिला.चांगला वाटला - मुख्यत: वेगळ्या विषयामुळे आणि वेगवान कथा मांडणीमुळे..कांदेपोहे हे गाणं ह्यात आहे हे कळल.सुरुवातीला 'कांदेपोहे' कार्यक्रम दाखवलेत ते खेदाने वास्तवातले आहेत.
आंतरराष्ट्रिय महिलादिन
आज आंतरराष्ट्रिय महिलादिन...........
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars