स्मरणरंजन - भाग १
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, स्मरणरंजन मांडण्यासाठी आहे. बरेचदा जसजसे वय वाढत जाईल तसतसा, स्मरणरंजन हा माणसाचा स्थायीभाव होत जातो. काही आठवणी पुन्हा पुन्हा किंवा आवेगाने येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
या धाग्यावरती प्लीज आपापल्या स्मरणरंजनाबद्दल लिहावे. हा धागा अनावश्यक वाटल्यास, समंनी उडवावा. पण एखादे स्मरणरंजन ना "मनातील छोटे मोठे प्रश्न" मध्ये घालता येते ना एकाचा फक्त धागा काढता येतो. बरं सामाइक व्यनि त किंवा खफवर जरी ते शेअर केले तरी त्याचा जीव इवलासा तर रहातोच व मुख्य म्हणजे अन्य सर्व सदस्यांचे रोचक स्मरणरंजन ऐकायला, मिळत नाही, सहभाग घेता येत नाही. आणि वय वाढत जाते तशी स्मरणरंजन शेअर करण्याची इच्छा आणि एकाकीपणा वाढत जातो की काय नकळे. पण मला तरी तसे जाणवते. असो.
____
आत्ता पहाटेचं तांबडं कुठे फुटतय. मगाशी गॅलरीत जाऊन ऊभी राहीले. अतिशय प्रसन्न आणि धूर आदिपासून दूर अशी अनाघ्रात हवा आहे. मला आठवते, मुंबईच्या सिद्धीविनायकला आम्ही (आम्ही दोघे व एक जोडपे) कारने जायचो. देवदर्शनाइतकाच रंजक प्रवास असायचा.काय मस्त हवा असायची. मुंबापुरीला हलके जाग येत असायची, दूधवाले, पेपरवाले, व्यायामोत्सुक यांची लगबग असायची. घाटकोपर ते दादर असा निवांत कार-प्रवास करुन , फुलांचा हार वगैरे घेऊन रांगेत ऊभे रहायचे. पेढे, फुले व सकाळच्या प्रसन्न हवेचा सुगंध. नंतर देवदर्शन झाल्यानंतर उडपी रेस्टॉरंट (शेट्टी) मध्ये इडली-वडा सांबार चापायचा. कदाचित लग्नाला फार वर्षे न झाल्याने असेल, एकमेकांबरोबर, व आमच्या त्या गुजराथी मित्र जोडप्याबरोबर आयुष्यातील क्षण व्यतित करणे प्रचंडच आवडायचे.
आज ती आठवण आली तरी सिद्धीविनायकाची लाल मूर्ती डोळ्यासमोर तरळते, फुलांचा-पेढ्यांचा-अष्टगंधाचा सुगंध येतो आणि गणपती अथर्वशीर्ष कानात गुंजु लागते.
जादूचे, तारुण्याच्या नव्हाळीचे दिवस होते खरं तर कदाचित शास्त्रीयदृष्ट्या ब्रेन सेल्स भराभर तयार होण्याचा काळ असेल पण ते वातावरण मंत्रमुग्ध करे. खूप रसरशीत वाटे तेव्हा
म्हणजे नोकरी करायची तीच याकरता की असे मित्र-मैत्रिणींसमवेत उनाडता यावे मग ते सिद्धीविनायक असो की लोणावळा, पावसातील माळशेज असो की पावसात केलेली अष्ट-विनायक यात्रा असो. हे सर्व एका फोनवरती. नवर्याने शनिवारी सकाळी सकाळी,त्याच्या मित्राचा फोन घेतला की तिकडून काहीतरी बोलणे व्हायचे (अमक्या ठिकाणी जायचे का?) आणि मग हा बोलायचा "तू बोल! मै तो रेडी है" हाहाहा ही बंबैय्या हिंदी भाष की मी लग्गेच समजायचे यूहू आज कुठेतरी भटकायचा प्लॅन आणि मग भराभर आंघोळ उरकुन, अगदी पहाटेला बाहेर पडायचे. जर मुंबई बाहेर जात असू तर वाटेत ओह माय गॉड भले मोठ्ठे दूधाचे ट्रक्स लागायचे. वाटेतच अगदी मुद्दाम झाडाखाली गाडी टाकलेल्या चहावाल्याकडून चहा घेऊन प्ययचा. महाबळेश्वरलाही मोठ्या हॉटेलात? ... अरे हट्ट!, झाडाखाली उभ्या गाडीवर ऑमलेट-ब्रेड हाणायचे. अगदी चापायचे. म्ग टीप मात्र त्या गरीब माणसाला/स्त्रीला अगदी नीट द्यायची. तो हॉटेल्सचा माज नको. या गुजराथी जोडप्याने आमच भूतकाळ इतका सुखी केलेला आहे. खरं तर निव्वळ सहवासातून, प्रेमातून आम्हाला समृद्ध केलेले आहे. कुरबुरी अगदी नव्हत्या असे नाही.पण अगदीच नगण्य त्या मानाने प्रेम अलोट आणि एकदम प्युअर, निखळ.
.
कोकणात जाताना एकदा, एका झाडावर जांभळं पाहीली का तुती काहीतरी. आणि ती व्यक्ती (कर्ता पुरुष) आवारातच होता नेमका. या मित्राला अन नवर्याला काय हुक्की आली काय की त्याला विचारले "ए, देणार का जांभळ काढून?" तो म्हणाला "हो देऊ की." मग भाव वगैरे विचारला पण तो काही पटला नाही. मग हे दोघे नको म्हणून निघाले. पैकी मित्र उवाच - "जाने दे, जाने दे! शाणा कौआ है! शहरी लोग समझके लूटनेको बैठा है" वगैरे मुक्ताफळं उधळीत गाडीकडे गेले. मला इतकं कसंतरीच वाटलं - अरे गधड्यांनो त्याच्या अंगणातलं झाड. तुम्ही अनाहूत येऊन तो रानमेवा मागताय. वर त्याने जास्त भाव लवला तर या शिव्या. शरम करा पण मी बोलले काहीच नाही.
.
एकदा कोकणात एक इतकी सुंदर पडकी विष्णुमूर्ती पाहीलेली. आई ग्ग! काहीतरी खणताना मिळालेली होती. मी तशी मूर्तीच पाहीली नाही. पण गदी पडके देऊळ.
.
माळशेजला धबधब्यात भिजुन नंतर आम्ही बायका कारमध्येच कपडे बदलत असू. नीलूची मुलगी साडी वगैरे धरुन आडोसा करत असे. हे मी काहीतरी उगाचच बरळते आहे असे समजु नका. सांगायचा मुद्दा हा की यात गंमत एक गंमत होती. नीलूची मुलगी लहान असतेवेळी नदीचे तपकीरी पाणी लागले की म्हणे "ए चाय देखो चाय :)" तेव्हा आम्ही दोघे सडेफटींग होतो, त्यांना मात्र मुल्गी होती.
.
पावसाळ्यातील वीकेंडस खरच रमणीय होते. फार आनंददायक होते. पुण्याचा रिपरिप पण संततधार पाऊस, मुंबईचा धुआंधार, कोकणातील हिरव्या रानोमाळ पडणारा स्फटीकासारखा पाऊस, माळशेजच्या वळणावळणावरुन आणि पावसाळी हवेतील धुक्यातून जाणार्या गाडीचा थरार काय नाही अनुभवले. असे समजु नका की स्मरणरंजन हे नेहमी आनंददायीच असते कारण दु:खद, त्रासदायक घटना विसरलेल्या असतात. खरच ते दिवस खूप, अतोनात आनंददायीच होते निदान वीकेंडस.
मस्त लिहिलं आहेस.
शुचि खूप सुंदर कल्पना आहे.
तू म्हणतेस ते अगदी खरंय जसजसं वय वाढत जात तसतसं मन भूतकाळात खूप डोकवतं. काही उत्स्फूर्तपणे जगलेले क्षण तर काही हातातून निसटुन गेलेले क्षण ह्यात रमायला आवडत. मला वाटलं मलाच अस होतंय की काय पण नाही मी एकटीच अशी नाही आहे तर.
मी हे मनातलं सगळं कागदावर (ब्लॉगवर) उतरवायला घेतलं आणि मोकळं वाटायला लागलं.
खूप छान लिहितोस. लिहित राहा.
उल्का
उल्का, खूप धन्यवाद,
उल्का खूप धन्यवाद. या धाग्यावरच तुझ्या आठवणीही लिही ना. मला तर प्रत्येकाच्या मर्मबंधातील आठवणी जाणून घ्याव्याशा वाटतात.
+1
असं म्हणतात जेंव्हा स्वप्नांची जागा भूतकाळ अन पश्चातापाचे विचार घेउ लागतात आपण
म्हातारे झालो समजायच. म्हणून स्वप्ने आवर्जुन बघणे आणि त्याचा पाठलाग करणंअजुन सोडलं नाही, लेट्स सी.
actions not reactions..!...!
हे खरे आहे स्मरणरंजन एका
हे खरे आहे स्मरणरंजन एका विशिष्ठ वयोपरान्त होऊ शकते कारण तोपर्यंत त्यकरता लागणारे fodder(खाद्य) तयार झालेले असते. मग गाईसारखा व्यवस्थित रवंथ करता येतो. स्वप्नेही बरीच पूर्णत्वाला पोचलेली असतात किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावरती असतात. असं म्हणतात ना चाळीशीनंतर सुटलेले पुरुषाचे पोट सुखवस्तूपणाची जाणीव देते तद्वतच स्मरणरंजन हे हातात निवांतपणा असलेल्या (= फायनॅन्शिअली स्टेबल) प्रौढ व्यक्तीला नीट जमू शकते. त्याचा अर्थ हा नाही की तीशीत तसे करता येत नाही पण तीशी वगैरे काळ उमेदीचा असतो, काहीतरी मिळवण्याचे पिनॅकल असतो.
हम्म
इतिहासप्रेमी लोकांचे स्मरणरंजन तर यत्ता चवथीपासूनच सुरू होते. त्याला कुठल्या साच्यात बसवायचे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हाहाहा
हाहाहा
स्मरणरंजन तर यत्ता चवथीपासूनच
स्मरणरंजन तर यत्ता चवथीपासूनच सुरू होते.. हाहाहाहाहा
व्यक्तीगत स्मरण रंजन आणि सामुहीक स्मरण रंजन
व्यक्तीगत स्मरण रंजन आणि सामुहीक स्मरण रंजन असे दोन फरक करता येतात असे मला आपले एक वाटते. व्यक्तीगत स्मरणरंजन आपण सर्वच करतो. एका मर्यादेपर्यंत ते सुंदर च असते छान रीलीफ असतो. अशी सुविधा नसती स्मरणरंजनाची तर आपण "वर्तमाना" चा ताण कुठपर्यंत सहन करु शकलो असतो ? "वक्त ने किए हुए जख्म" कुठपर्यंत सहन करु शकलो असतो? शंकाच वाटते. म्हणुन
" आने वाले कल एक सपना है... गुजरा हुआ कल बस अपना है... हम गुजरे कल मे रहते है.............. यादो के सब जुगनु जंगल मे रहते है... "हे गाणं आवडतच.
तसेच "यादो की बौछारो से जब पलके भीगने लगती है " हा ही अनुभव आपल्या सर्वांचाच असतो.
मात्र सामुहीक स्मरणरंजन एका पुर्ण समुहाने सतत जुनं जुनं उगाळण्याचं समुह कुठलाही असो. उदा. सांस्कृतिक घ्या, पुण्यात जेव्हाही जातो तेव्हा नविन नाटक बघायच असत म्हणुन सकाळ च नाटकाच पान उघडल की नव्या नव्या नाटंकाबरोबर हमखास काही युगानुयुगे चालणारी जुनाट नाटकांची नाव आढळतातच उदा. ते हर्बेरीयम, वसंत कानेटकर, अत्रे .संगीत नाटक वगैरे" नेहमीचेच यशस्वी" नव्या संचात वाले प्रकार
एका प्रमाणापर्यंत म्हणजे काही बाबी क्लासिक असतात, काही तत्वे सनातन असतात हे मान्य करुनही रीट्रोस्पेक्शन सांस्कृतिक उजाळा देणे इ. च महत्व मान्य करुनही त्यांची पुनुरावृत्ती जेव्हा अती होते, सामुहीक स्मरणरंजना चा अतिरेक होतो तेव्हा त्या समुहाकडे वर्तमानात काही उणीव नक्कीच असते असे वाटते. म्हणजे आता नविन काही प्रसवण्याची आजच्या काळाला वर्तमानाला प्रतिसाद देण्यातली संवेदनशीलता सृजनशीलता कुठेतरी गोठल्यासारखी वाटते. मागे तो नव्वदोत्तरी विशेषांक फार छान होता. कारण त्याअगोदर पर्यंत साठोत्तरी साठोत्तरी इतकच काय ते आधुनिक नविन म्हणजे २०१० पर्यंत पुढील पन्नास वर्ष अजुनही साठोत्तरी क्रांती च चर्चा चर्वण तेच ते तेच ते नविन काहीच नाही आता नव्वदोत्तरी २०४० पर्यंत आपण सहज खेचत नेऊन चर्चा करत बसु. ते बर जुनी खोड वगैरे एकदाचे रीटायर झाले. नव्यामुंळे नविन काही येत , ताज्या हवेचा झोत येतो एकदमच ताजं बघायला मिळत बर वाटतं थोड. कल्चरल रीसायकलींगपेक्षा कल्चरल रीव्होल्युशन नेहमीच जास्त सेक्सी असते. एकंदरीत सर्वसाधारणपणे आपला मराठीसमुह सामुहीक स्मरणरंजनात फारच रमतो. पुन्हा पुन्हा शिळ्या कढीला उत देण्याची आपली क्षमता अफाट आहे. आपण जुनी नाटक उगाळतो, ५० वर्षे जुन्या कांदबर्या नव्या उत्साहाने चर्चितो.
असो तर लेखाच्या मुळ मुद्यावर येतो
तर आमच एक चिल्लर स्मरणरंजन सांगण्याचा मोह आवरत नाही. कोणे एकेकाळी मी ज्या मुलीवर लाइन मारायचो ती भारतातल्या अव्वल दर्जाची खडुस व खवचट होती बहुधा. १० वा की ११ व्या डेस्परेट प्रयत्नात मी एक चंदनाची प्लेट त्या काळाला अनुसरुन तासलेली डिझाइन केलेली त्यावर चिन्हे म्याटर वगैरे काढुन आणि रंगवुन भरपुर हमाली वगैरे करुन बनवली व माझा मित्र मनु सोबत तिला "गिफ्ट" द्यायला गेलो. मनु आमच्यातला दुवा होता तिचा काहीतरी अनाकलनीय नातलग टाइप होता. त्याच्यामुळे मला लिफ्ट मिळायची. तर ते ती प्लेट झुरळासारखी हातात घेऊण त्यावर अगोदरच्या १० प्रमाणेच तिने " तु इतका म्हणजे इतका "हा" असशील असे तुला किमान बघुन तरी वाटत नाही. त्या "हा" मध्ये जगातला सर्व तुच्छतावाद एकटवलेला होता म्हणजे मुर्ख ,उथळ इ.इ. व ती प्लेट परत केली. हा घाव वर्मी बसला, मग मात्र मी हरलो व ये अपने बस की बात नही म्हणुन काही काळ "स्मशान वैराग्यात" गेलो. त्या दोघांना नेहमी कुठेही अॅलक्सीडेंटली जे गाठायचो अरे इकडे कुठे ?, विवीध मार्गांनी जे तिला इम्प्रेस करायचे आटोकाट प्रयत्न करायचो ते सर्वच हताशेने एकदम सोडुन दिले. मध्ये जवळपास महीना असाच रटाळ कुजत गेला. एक दिवस मनु सकाळी सकाळी आला आणि म्हणाला " अरे ती तुझ्याविषयी विचारत होती की तु दिसत नाहीस सध्या म्हणुन " मी एकदम बिछान्यातुन ताडकन उठुन उभा राहुन डोळे चोळत म्हणालो " काय म्हणतोस ? ती काय म्हणाली माझ्यासाठी ? " मनु अगोदरचाच मख्ख चेहरा अधिक भकास करत म्हणाला " काही विशेष नाही बोलली तु तसा टाइमपास ला बरा होता म्हणाली "
ठीणगी पडली होती मी अर्थातच नव्या जोमाने कामाला लागलो.
बाप रे! अशा मुली असतात हे
बाप रे! अशा मुली असतात हे ऐकून आहे, एक अनुभवही आहे. आमच्या क्लासमधील रोहीता नावाची एक तमिळ मुलगी अशीच होती. मुलं तिला भेटी वगैरे द्यायचे आणि ती फक्त झुलवायची. तिची आणि माझी मैत्री असल्याने मी हे जाणून होते.
वा! सुंदर ओळी आहेत