कृत्रिम शीतपेये - सावधान ! ! !
मंडळी, उन्हाळा आला की घशाला कोरड पडते, तहान साध्या पाण्याने भागत नाही आणि मग तहान भागवण्यासाठी सर्वसामान्यांचा ओढा आपोआपच काहीतरी थंड पिण्याकडे जातो आणि कृत्रिम शीतपेयांचा आस्वाद घेऊन तो बहुतेक वेळा हुश्श.. करतो. पण मंडळी, या कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने कितीतरी घातक द्रव्ये आपण पोटात ढकलत असतो याचा आपल्याला विसर पडतो.
कृत्रिम शीतपेयांमध्ये प्रामुख्याने फॉस्फरिक अॅसिड, कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साईड, अॅल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने असतो. फॉस्फरिक अॅसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे. याचबरोबर दात, मणके, कमरेची हाडे ठिसूळ होणे हे दुष्परिणाम तर होतातच.
शीतपेयांवर वारंवार झालेल्या संशोधनानुसार, व्यक्ती जर सातत्याने शीतपेयाचे सेवन करीत असेल तर त्यात असलेल्या साखरेच्या अतिप्रमाणामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडू शकतो. कोणतेही ३५० मिलीलिटर (ज्यामध्ये ३१.५ ग्रॅम साखर असते. ) शीतपेय एकावेळी घेतल्यास Diabetes-2 प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता २०% बळावते. शीतपेय माणसाच्या यकृताला आणि मूत्रपिंडाला हानी पोहोचविते आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला आमंत्रण देते. इम्पिरिअल कॉलेज ऑफ लंडनमधील प्रो. नीक वेअरहॅम यांच्या अभ्यासानुसार शीतपेयांच्या सततच्या सेवनाने वजन तर वाढतेच, पण शरीरातील इन्शुलिनचे कार्य कमी होते. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील प्रो. बेरी पॉपकीन यांनी तर आपल्या अन्नपदार्थातील साखर हा पदार्थ तंबाखूसारखा शरीरावर दुष्परिणाम करतो असे निष्कर्ष काढले आहेत.
या शीतपेयांच्या बाबतीत केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली त्यावेळी न्यायालयाने हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतले आणि अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला असे आदेश दिले की शीतपेयांचे सेवन हे प्रत्यक्षपणे नागरिकांच्या जीवनाशी निगडित असल्यामुळे या कार्बोनेटेड शीतपेयांची वेळोवेळी योग्य ती तपासणी करण्यात यावी तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे जे दुर्दैवाने केले गेलेले नाही.
याबाबतीतील सेंटर फॉर सायन्स इन दी पब्लिक इंटरेस्ट (सीएसपीआय) या केंद्राने प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक आहे.
कोकाकोला आणि पेप्सीसारख्या शीतपेयांच्या उत्पादन कंपन्या मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांमध्ये प्रचंड गुंतवणूक करीत आहोत. कारण या देशांतील अफाट लोकसंख्येमुळे प्रचंड बाजारपेठ आहे आणि शीतपेयांच्या दुष्परिणामांची गंभीरताही लोकांकडून दुर्लक्षित केली जाते. याचा फायदा उत्पादक उठवित आहेत. या केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मेक्सिकोमध्ये १२.४ अब्ज डॉलर्स (२०१६ ते २०२०) इतकी, ब्राझील मध्ये ७.६ अब्ज डॉलर्स (२०१२ ते २०१६), भारतामध्ये १२.४ अब्ज डॉलर्स (२०१२ ते २०२०) तर चीनमध्ये ५ अब्ज डॉलर्स (२०१४ ते २०१७) इतकी प्रचंड गुंतवणूक या कंपन्यांची आहे. याचाच अर्थ या कंपन्या मधुमेह, स्थूलत्व, दातांची हानी, हृदयरोग या आजारांना जणू खतपाणीच घालत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
भारतातील शीतपेयांची बाजारपेठ १० अब्ज डॉलर्स आहे. ती प्रतिवर्षी सहा ते सात टक्क्यांनी वाढते आहे. ‘कोक’ या कंपनीने विकत घेतलेले पेप्सी हे शीतपेय भारतात प्रथम क्रमांकाचे आवडते शीतपेय आहे. भारतातील ५१ दशलक्ष जनता आधीच मधुमेहग्रस्त आहे आणि डायबेटिक फाऊंडेशनने अशी भीती व्यक्त केली आहे की ही परिस्थिती अशीच राहिली तर २०२५ सालापर्यंत मधुमेहींची संख्या ८० दशलक्षावर पोहोचेल. मेक्सिकोसारख्या देशातील २०१३ सालातील शीतपेयाचे दरडोई सेवन १३५ लिटर इतके प्रचंड होते.
स्थूलत्वामध्ये जगात मेक्सिको सर्वात वर आहे तर Diabets-2 मधुमेहामध्ये पहिल्या नंबरवर तर लहान मुलांच्या स्थूलतेमध्ये जगात चौथ्या क्रमांकावर आहे, अशी शोचनीय स्थिती असलेल्या देशातच आपली पाळेमुळे खोलवर रुजविणा-या या अमेरिकाबेस शीतपेयांचे त्यांच्या देशातील दरडोई सेवन १९९८ ते २०१४ या काळात २५ टक्क्यांनी घटले आहे. ही तूट भरून काढण्यासाठी त्यांनी या विकसनशील देशात मोर्चा वळवला आहे. या कंपन्यांनी जरी असे जाहीर केले असले की लहान मुलांना लक्ष्य केले जाणार नाही तरीसुद्धा या शीतपेयांच्या जाहिराती प्रामुख्याने मुलांवरच चित्रित केलेल्या दिसतात. भारतामध्ये तर कोकाकोलातर्फे १२ ते १६ वयोगटाच्या मुलांसाठी क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले जाते.
सेंटर फॉर सायन्स इन पब्लिक इंटेरेस्ट (CSPI) ने अतिशय चांगल्या शिफारशी केल्या आहेत. शासनाने शीतपेयातील साखरेच्या प्रमाणावर निर्बंध घातले पाहिजेत आणि त्याची कठोर अंमलबजावणी होते ना? याबाबतही वेळोवेळी तपासण्या केल्या पाहिजेत. साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या या शीतपेयांवर काही कर आकारायला हवेत आणि या करापोटी मिळणा-या उत्पन्नातून आरोग्यविषयक आणि संतुलित आहार विषय उपक्रम राबवायला हवेत. (मेक्सिको देशाने या पेयावर २०१४ मध्ये पहिल्यांदा कर आकारला.) तसेच या साखरमिश्रित शीतपेयांवर धोक्याची जाणीव करून देणारे लेबल लावणे बंधनकारक करणे तसेच शाळांमधून शीतपेयांच्या विक्रीस बंदी असणे अशी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनने राष्ट्रीय आरोग्य यंत्रणांना तांत्रिक मदत द्यावी जेणेकरून शीतपेयांचे सेवन कमी करण्याविषयी धोरणे प्रभावीपणे आखणे व लोकांना शीतपेयांचे सेवन करण्यापासून परावृत्त करणे देशांना शक्य होईल.
भारतासारख्या विकसनशील देशात जाहिरातींचे प्राबल्य तर खूप जास्त प्रमाणात आहे आणि आरोग्यास हानिकारक अशा शीतपेयांच्या जाहिराती तर लोकप्रिय कलाकारांच्या अवास्तव स्टंटबाजीने पुरेपूर असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जीवघेणे साहस करून मग शीतपेयाची बाटली एका दमात रिचविली जाते आणि आमची तरुण पिढी आणि लहान मुले यांना हे पेय पिण्यास भुरळ पाडते.
देशातील ही सद्य परिस्थिती बदलण्यासाठी या लोकप्रिय कलाकारांच्या तोंडूनच आरोग्यास हानिकारक शीतपेयांची योग्य माहिती लोकांसमोर आणावयास हवी. लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, शहाळ्याचे पाणी आदी नैसर्गिक पेयांचे महत्त्व वारंवार त्यांच्यासमोर आणले गेले पाहिजे. एकंदरीतच लोकांच्या हिताचे आणि आरोग्याचे रक्षण करण्याच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणावर आणि सातत्याने जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.
ज्योती मोडक, मुंबई ग्राहक पंचायत
दैनिक प्रहार मध्ये पुर्वप्रकाशित.
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
अनुरावांशी सहमत आहे. शीतपेयात
अनुरावांशी सहमत आहे.
शीतपेयात नक्की कायकाय आणि कोणत्या प्रमाणात आहे हे त्या कॅनवर पष्ट लिहिलेलं असतं. उदाहरण इथे बघा:
एखाद्या वस्तूच्या अतिसेवनाने / सातत्याने सेवन करण्याने अलाणेफलाणे आजार होत असतील तर त्याला कंपनी कशी काय जबाबदार असू शकेल? समजा, मी रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ काका हलवाईच्या दुकानी जाऊन एक एक किलो खरवस खाल्ला, आणि आजारी पडलो, तर मी काका हलवाईला जबाबदार धरावं की माझ्या हरभकेपणाला?
ग्राहक पंचायतीने ग्राहकशिक्षणही केलं पाहिजे. अमुकमध्ये तमुक घातक - ठोका उत्पादकाला - हे योग्य नाही.
ग्राहक पंचायतीने
ग्राहक पंचायतीने ग्राहकशिक्षणही केलं पाहिजे. अमुकमध्ये तमुक घातक - ठोका उत्पादकाला - हे योग्य नाही.
खरंतर ग्राहक पंचायतीच्या लोकांना त्यांच्या मुजोरपणासाठी कठोर दंड देण्यासाठी सुद्धा तरतूद कायद्यात असायला हवी. सिरियसली.
उदा. खालील प्यारा पहा.
शासनाने शीतपेयातील साखरेच्या प्रमाणावर निर्बंध घातले पाहिजेत आणि त्याची कठोर अंमलबजावणी होते ना? याबाबतही वेळोवेळी तपासण्या केल्या पाहिजेत. साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या या शीतपेयांवर काही कर आकारायला हवेत आणि या करापोटी मिळणा-या उत्पन्नातून आरोग्यविषयक आणि संतुलित आहार विषय उपक्रम राबवायला हवेत. (मेक्सिको देशाने या पेयावर २०१४ मध्ये पहिल्यांदा कर आकारला.)
हे जर योग्य असेल तर -
(१) साखर उत्पादन करणार्या साखर कारखान्यावर साखरेमधील ग्लूकोजचे प्रमाण कमी करण्यावर निर्बंध घालण्याची तरतूद का नसावी ?
(२) इतद्देशीय श्रीखंड बनवणार्या कंपन्यांवर साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे निर्बंध असावेत का ?
( आता अॅपल्स टू ऑरेंजेस तुलना - चा मुद्दा उपस्थित करून आपण फार जबरदस्त प्रतिवाद करत आहोत असं भासवायचा यत्न होईलच. )
-----
आमची इन्टेंन्शन्स छान छान आहेत व आम्ही जनहितार्थ (ग्राहकहितार्थ) काम करतो म्हणून आम्ही कशाही अवास्तव मागण्या करू आणि त्या मान्य व्हायला हव्यात - असं ग्राहक पंचाय्तीला म्हणायचं आहे का ??
ऐसे
ऐसे लेख ऐसीकरांच्या सहज पचनी पडणार नाहीत. यातील प्रत्येक वाक्यासाठी ते विदा मागतील. फॉस्फॉरिक अॅसिडने कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियमचे डिप्लिशन होते तर ते पोटातल्याच हायड्रोक्लोरिक अॅसिडने का होत नाही, लिंबातल्या सायट्रिक अॅसिडने का होत नाही, असे प्रश्न विचारतील. अश्या भंडावणार्या प्रश्नांनी माघार घेत, तुम्ही चक्क, ही पेये आरोग्याला कशी पोषक आहेत, असे म्हणायला लागाल. त्यानंतरही ते पुन्हा विदा मागतील. सावधान!
लेखाबरोबर जे चित्र छापले
लेखाबरोबर जे चित्र छापले त्यातल्या मधल्या दोन शीतपेयांत फॉस्फोरिक अॅसिड आणि कॅफिन नसते.
अॅल्युमिनियम कोणत्या पेयात असते ठाऊक नाही.
साखरेच्या अतिरिक्त सेवनाने मधुमेह होतो याविषयी शंका आहे.
दररोज पोळीशी एक चमचा मुरांबा खाणार्या मुलांच्या पोटात किती साखर जाते?
उसाच्या रसाच्या ग्लासात ७३ ग्रॅमसाखर असते बहुधा.
>>कोक’ या कंपनीने विकत घेतलेले पेप्सी हे शीतपेय भारतात प्रथम क्रमांकाचे आवडते शीतपेय आहे.
कोक आणि पेप्सी एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत असे ऐकले आहे.
राजीव दीक्षित अजून जिवंत आहेत वाटतं.
सुलभीकरणाचा अट्टाहास
साखरेच्या अतिरिक्त सेवनाने मधुमेह होतो याविषयी शंका आहे.
शरीराला गरज नसलेली, म्हणजे अतिरिक्त, साखर शरीर मेदाच्या स्वरूपात साठवून ठेवतं. त्यातून लठ्ठपणा वाढतो. लठ्ठ लोकांना दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते.
- प्रत्येक व्यक्तीला किती साखरेची गरज असते हे वय, शारीरिक क्षमता, वजन, आकारमान, रोजची ऊर्जेची गरज अशा निरनिराळ्या गोष्टींवर अवलंबून असते, म्हणजे माणसानुसार बदलेल. शिवाय साखर म्हणजे फक्त ऊस/मक्यापासून निघणारी साखर नव्हे तर सगळ्या साध्या शर्करा (simple sugars); अगदी फळांमधली फ्रुक्टोज आणि दुधातली लॅक्टोजही.
- शिवाय लठ्ठपणामुळे मधुमेह होतोच असंही नाही. शक्यता वाढते.
पण असं म्हटलं की परिणामकारकता भीती कमी होते. सुबोध जावडेकरांच्या पॉर्न ओके प्लीज अंकातल्या लेखात सनसनाटीचा योग्य उल्लेख केला आहे; तो इथेही लागू होईल.
तुम्ही नुस्ते लेख लिहुन पळुन
तुम्ही नुस्ते लेख लिहुन पळुन जाता, आमच्या शंकांचा प्रतिवादच करत नाहीत. धीस इस नॉट फेयर. आम्ही फुकटे असलो तरी तुमच्या लेखांचे ग्राहक आहोत.
ग्राहक पंचायतीनेच ग्राहकांना फाट्यावर मारणे बरोबर नाहीये.
तरी बरे, अजुन कोणी लेखातल्या सो कॉल्ड शास्त्रीय तथ्यांबद्दल शंका विचारायला सुरुवात नाही केलीय.
नमस्कार,सर्व प्रतिसाद
नमस्कार,
सर्व प्रतिसाद देणाऱ्या वाचकांचे धन्यवाद.
आपल्या आलेल्या सर्व प्रतिक्रीया या लेख लिहिणाऱ्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांकडे ई-मेल द्वारे पोहोचविलेल्या आहेत. त्यांच्या उत्तरादाखल प्रतिक्रीया आल्यानंतर त्या येथे पोस्ट करु. तसेच हा लेख लिहिणाऱ्या कार्यकर्त्यांनाही या संकेतस्थळाचे संकेतनाम व परवलीचा शब्द पाठविण्यात आलेला आहे जेणेकरुन लेखिकेला परस्पर या संकेतस्थळावर उत्तर द्यायचे असेल तर देता यावे.
या संकेतस्थळावरील तसेच इतर संकेत स्थळावरील मुबई ग्राहक पंचायातीचे हे लेख पुणे विभागाच्या अनुदिनी गटाकडून (Blog Team) कडून त्या त्या संकेत स्थळावर दिले जात असल्याने वेगवेगळ्या संकेतस्थळाकरीता वेगवेगळे स्वयंसेवी कार्यकर्ते काम करतात. सबब या कार्यकर्त्यांना अशा प्रतिक्रीया येथे देणे शक्य होणार नाही. परंतू आपणांस pune.mgp@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल
कोक’ या कंपनीने विकत घेतलेले
हे वाक्य जरा गडबड आहे.
मुळात हे काम एफडीए सारख्या सरकारी संस्थेचे आहे ना?
तुम्ही ग्राहकाची फसवणुक होऊ नये म्हणुन काम करता ना? तुमच्या कामाबद्दल सहानभुती आणि आदर आहेच पण ज्या साठी सरकारी मानक संस्था आहेत ते काम तुम्ही करायला लागु नये असे वाटते.
पेप्सी मधे त्यांनी सांगीतलेल्या किंवा सरकारनी घालुन दिलेल्या नियमापेक्स्।आ जास्त घातक पदार्थ सापडले तर धरुन चोपा ना पेप्सीला. पण हे जरा वेगळ्याच वाटेवर चालु आहे.