फेसबुक – एक वसाहत
(फेसबुक वर असेच एकदा वेगेवेगळी सेटिंग्स तपासात होते. काही सेटिंग्स बदलून view as करून पण बघत होते. तेव्हा स्वत:चाच प्रोफ़ाइल आपले वेगवेगळे रूप दाखवू लागला. जणू नवीन कपडे आणल्यावर एक एक घालून दाखवावे अगदी तश्शीच fashion parade चालली होती. तेव्हा काल्पनिक, काहीसे विनोदी (फार काही नाही अगदीच थोडे बर्र का) लेखन सुचले ते असे आहे.)
हल्ली वास्तव जगाचा भाग बनलेलं एक आभासी विश्व आहे. आंतरजाल विश्व. ह्या विश्वात रमलात की कधी कधी वास्तवतेचे भानही रहात नाही. ह्या विश्वातील अनेक वसाहतींचा फेरफटका मारता मारता दमछाक होते जणू. तरीही ‘टेढा है पर मेरा है’ म्हणत म्हणत त्यात रमून जायचे असते.
अशीच एक वसाहत तुमची, आमची, सर्वांची अगदी ओळखीची ती म्हणजे फेसबुक. हे हौसिंग प्रोजेक्ट तसे खूप अवाढव्य आणि भारी पॉप्युलर बुवा! त्याचे काय आहे इथे एन्ट्री फ्री असल्यामुळे अगदी कोणीही आपले घर बांधू शकतात. ‘सेकंड होम’ म्हणा ना! ते सुद्धा अगदी एन्ट्री घेतल्या घेतल्या टेन्ट पासून महाला पर्यंत! फक्त अमेरिकन सुपीक डोक्यातून हे प्रोजेक्ट जन्माला आले असल्यामुळे इथे झोपडीला मात्र वाव नाही. पssण भारतीय लोकांचा प्रभाव म्हणा की प्रेम म्हणा इथे चक्क चाळ संस्कृतीला भरपूर वाव आहे. मस्त ना! तर प्रत्येक जण आपल्या स्वभाव-प्रवृत्ती प्रमाणे आपले घर बांधतो. मनात येईल तसे बदलतही असतो.
सुरवातीला बरेच जण आपले टेन्ट मधेच रहात असतात. नवीन असतात हो! माहिती नसते ना! मोकळा स्वभाव असला तर किंवा अज्ञानात म्हणा काही जण तर कायमच टेन्ट मध्ये राहणे पसंत करतात. टेन्ट मध्ये राहिल्यामुळे फारशी गोपनीयता ठेवता येत नाही. परंतु बहुतेक जण लौकरच दुसरे घर बघतात.
चाळीत दोन प्रकारची घरे असतात. काही घरांचे दरवाजे कायम बंद असतात. (Add Friend Without Follow) तुम्ही बेल वाजवल्यावर सुद्धा उघडतील याचा नेम नाही. पण एकदा उघडले की मात्र एकदम ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’ असते बघा! माझे घर असे आहे काही जणांनी दरवाजे कायम उघडे ठेवलेले असतात. (Add Friend With Follow) त्यांचे म्हणजे ‘अतिथी देवो भव!’ पण अर्थात जिवाभावाची मैत्री मात्र खास लोकांशीच बर्र का!
काही आपले अपार्टमेंट मध्ये राहतात. सगळे कसे बंद बंद. बेल वाजवल्यावर खात्री करतील ओळखीचे आहात का? तरच दरवाजा उघडतील नाहीतर बेल पण बंद करतील. (Mark as Spam) मग बसा बाहेर बोंबलत!
काही तर अशा घरात राहतात की तुमच्या ओळखीच्यांना बरोबर घेतल्यशिवाय तुम्हाला साधी बेल पण वाजवता येत नाही. मध्ये मला पण वाटले की राहू या आपण पण अशाच एका घरात! म्हणून एक दिवस गेले राहायला. पण मग वाटले की जुने कोणी ओळखीविना आले तर मला कसे भेटणार? म्हणून मग परत चाळीतल्या घरात आले झालं.
महालात राहतात त्यांची बेल वाजवायची सोयच नसते. काही ठिकाणी बाहेर पेटी असते त्यात हवे तर निरोपाचे पत्र टाकू शकता. काही तर तेवढी पण सोय नाही ठेवत. काय तरी बाई म्हणावे ह्या लोकांना? केवढा तो ताठा! अशा महालात राहणारे तर काही चक्क अज्ञातवासातही जातात. म्हणजे तुम्हाला त्यांचा महाल शोधून सापडत नाही.
मधूनच काही ओसाड घरे पण असतात. हो! म्हणजे घर घेतात आणि मग फिरकतच नाहीत. त्यांना ही वसाहत रुचत तरी नसावी अथवा यायला वेळ नसावा. काहींच्या तर चाव्यासुद्धा हरवून जातात. बिचारे! किती मुकतात ते ‘ह्या वैश्विक’ सुखाला!
इथे तुम्हाला स्वत:ला अपडेट ठेवायला मस्त सोय आहे. तत्वज्ञान, पाकशास्त्र, बातम्या, मनोरंजन इत्यादिशी संबंधित लोक आपले दुकान थाटून असतात. तुम्ही नाव नोंदवलत की अगदी घरपोच माहिती मिळते. खूप सारे क्लब्ज असतात. तुम्ही तिथे जाऊ शकता. काही सर्वांसाठी खुले असतात तर काही ठिकाणी एन्ट्री पास असतो.
पण एकंदरीत इथे धम्माल असते बुवा. कुठेही कसेही राहायला जा. केव्हाही बस्तान हलवा. मजेत राहा. वय, जात, धर्म, प्रांत, देश, आर्थिक स्थिती ह्या कशाच्याही सीमा नसतात. तुम्ही सभ्यतेने राहिलात, वागलात तर हे विश्व तुम्हाला आपलेपणाने सामावून घेईल.
कोई शक?
-उल्का कडले
प्रतिक्रिया
एखादे अनोळखी पण चांगले घर
एखादे अनोळखी पण चांगले घर दिस्ते. आपण दार ठोठावतो . काहीजण उघडत नाहीत ते बरे. पण काहीजण घरात घेतात आणि आपण घरात आल्यानंतर मक्खासारखं बसून राहतात. अजिबात बोलत नाहीत. मग आपण चिडून बोल बोल म्हणत चार शिव्या घातल्या तरी गप्पच. मग एक दिवस हळूच आपले मनगट पकडून आपल्याला हाकलून लावतात.
त्यांचा स्वभाव असेल कमी
त्यांचा स्वभाव असेल कमी बोलण्याचा तर कशाला त्रास द्यावा त्यांना? भेटून परत यावे आपल्या घरी आणि जावे मधून मधून भेटायला. बरोबर ना?
उल्का
वा! लेख आवडला! अर्थात जे फुकट
वा! लेख आवडला!
अर्थात जे फुकट दिसते कारण तुम्ही त्याचे ग्राहक नाही तर कच्चा माल पुरवणारे आहात. तुम्ही तिथे घरे बांधता म्हणून त्यांना तुम्हाला काय हवेय/आवडते त्याचे निरिक्षण करून तुमच्याखिडकीसमोर तुम्हाला हव्या त्या गोष्टीची झैरात टांगता येते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हो! वाढलाय खरा हल्ली हा
हो! वाढलाय खरा हल्ली हा त्रास.
उल्का
अर्थात जे फुकट दिसते कारण
त्या कच्च्या मालाच्या बदल्यात ते तुम्हास (जाहिरातीं व्यक्तिरिक्त) काहीही देत नाहीत असे तू म्हणत नाहियेस हे मी गृहित धरतो ऋ.
टाकाऊ वस्तूचा टिकाऊ उपयोग या
टाकाऊ वस्तूचा टिकाऊ उपयोग या संकल्पनेचे उच्च रूप म्हंजे फेसबुक. तुम्ही तुमच्या भिंतीवर काय करता, कोणाशी संवाद साधता, कोणत्या विषयावर साधता, तो संवाद किती काल चालतो, तुम्ही कोणत्या गोष्टीवर पसंतीची मोहोर उमटवता, कोणत्या बाबींना नाकं मुरडता, कोणत्या बाबीवर कधी बोलता, कुठुन बोलता, तुम्ही कोणाच्या भिंतीवर काय बोलता व कशाबद्दल, केव्हा व्यक्त होता - या सगळ्या तुमच्या अभिव्यक्तीचा तुम्ही व्यक्त करून झाल्यानंतर काही कालाने काहीच उपयोग नसतो ... काही कालानंतर ती अभिव्यक्ती अगदी तुमच्यासाठी सुद्धा बरीचशी निरुपयोगी ठरते. स्मृतिरंजनाखेरिज तिचा दुसरा कोणताही फारसा उपयोग नसतो. ती तुमच्यासाठी व तुमच्या आप्तस्वकीयांसाठी जवळपास टाकाऊ ठरलेली असली तरी तिचे विश्लेषण करून तिच्यातून मतितार्थाचा निचोड काढून त्यास मूल्य प्रदान करण्याचे अनोखे काम फेसबुक सारख्या कंपन्यांनी केलं. अर्थात यात फेसबुक ही एकमेव कंपनी नाही. इतरही अनेक आहेत. गूगलप्लस होती व ती मागे पडली. ती आजही चालू आहे पण फार कमी लोक वापरतात ते का ? हे विचार करण्याजोगे आहे. या अभिव्यक्तीसाठी तुम्हास एक पै ही द्यावा न लागणे हे (किमान सध्यातरी) लक्षणीय आहे आणि तुम्ही फेसबुकवर "वाया घालवलेला" वेळ सुद्धा त्यांनी उपयुक्त बनवला हे त्याहून अधिक लक्षणीय. आता - त्यातून आम्हाला काय मिळालं ? - हा प्रश्न केवळ एक विचारहीन माणूसच विचारू शकतो. व्यक्ती, व्यक्तीचं इतरांशी असलेलं नातं, नातेसंबंधातील स्नेह व्यक्त करण्याचे मार्ग, आणि व्यक्तीच्या दृष्टीने संवाद साधण्याच्या वृत्तीच्या जोपासण्याची गरज ह्या सगळ्यावर आपल्या संस्कृतित अत्यंतिक भर दिलेला आहे व आपल्या कलेतून, सणांतून तो ओसंडून वाहत असतो. जोडीला "माणूस माणसाला पारखा झालेला आहे" असले डायलॉग्स मारणारा मधु मलुष्टे आणि "आजकाल माणसं आत्मकेंद्री झालेली आहेत" असा शंखनाद करणारे सातारचे महाराज (उदयसिंगराजे) आहेतच. या सगळ्या कोलाहलात फेसबुक सारखे एक अत्यंत नवे माध्यम आपल्याला उपलब्घ होते ... जे कोणत्याही भेदभावाविना आपल्याला जवळपास अनिर्बंध अभिव्यक्तीसाठी संधी उपलब्ध करून देते हे नेमके कोणाचे यश आहे त्याचा विचार एखादं मिनिट थांबून करायला हरकत नसावी. ते केवळ एक त्यांचा फायदा म्हणून करत आहेत असं म्हंटल तर प्रश्न असा उपस्थित होतो की फायदा म्हणावा तर ते तर ईमेल (जीमेल, याहू, हॉटमेल वगैरे) सुद्धा करू शकतो ना ? मग फेसबुक मे क्या खास ?
मध्यंतरी एक कार्टून आले होते - त्याचा सारांश असा होता की जर भारत सरकारनं फेसबुक सारख्या योजनेचा शुभारंभ केला असता तर तिचं नाव "राजीव गांधी दोस्त बनाओ योजना" असं ठेवलं असतं.
या निमित्ताने गब्बरने इतकं
या निमित्ताने गब्बरने इतकं दीर्घ आणि मराठीतून काही लिहिलं इतके तरी फेसबुकचे आपल्यावर उपकारच आहेत!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
..आणि एकही लिंक दिली नाही,
..आणि एकही लिंक दिली नाही, प्लस एकही शेर हानला नाही. असं आणखी दोनदा झालं तर ऐसी-व्यवस्थापकांनी अकौंट हॅक झाला आहे का याचा तपास करावा.
अवांतरः गब्बरचा प्रतिसाद आवडला. उदयनराजे एवढं (सुसंगत) बोलले हीच एक ण्यूज आहे माझ्यासाठी.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
उदयनराजे ठ्ठो
ठ्ठो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं