गजानन मेहेंदळे यांचे संशोधन आणि पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता' हे पुस्तक
या आठवड्यातील एका फुसके बारमध्ये मी इतिहासाचे अभ्यासक गजानन मेहेंदळे यांच्या एका व्हिडियोचा संदर्भ दिला होता. त्याचा प्रतिवाद कोणी केलेला आहे का हे विचारले होते. शिवाजीराजांना आताच्या संदर्भातल्या व्याख्येप्रमाणे सर्वधर्मसमभावी ठरवले जाते हाही इतिहास खोट्या व चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा काही जणांचा प्रयत्न असतो त्याचाच भाग आहे.
आताच्या शिवजयंतीच्या निमित्तानेही नेहमीप्रमाणे शिवाजीच्या सैन्यात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम सैनिक व सरदार होते असे ऐकण्या-वाचण्यात आले.
सर्वधर्मभावाच्या चौकटीत त्यांना जबरदस्तीने बसवले नाही तरी त्यांच्या कार्याचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही, असे असतानाही कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचा संदर्भ याबाबतीत अनेकदा देण्याचा प्रघात पडला आहे. सदर पुस्तक मीही वाचलेले आहे. हिंसेतून क्रांती ही जी कम्युनिस्टांची विचारसरणी आहे, त्यातून पानसरेंनी तळागाळातील लोकांसाठी जे केले त्यावर येचुरी, करात यांच्यासारखे कम्युनिस्ट नेते ताव मारतात आणि आपला अजेंडा साधतात हा यातला धोक्याचा भाग आहे. मग त्यांनी केरळमध्ये कॉंग्रेस व रास्व संघांच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या हत्या घडवून आणल्या यागोष्टीही सोयीस्करपणे विसरल्या जातात. केरळमध्ये रास्व संघ तर सत्तेच्या जवळपासही नव्हता व अाताही दिसत नाही.
फुसके बार वरील एका कमेंटमध्ये पानसरेंच्या पुस्तकावरील एका लेखाचा संदर्भ प्रकाश घाटपांडे यांनी मायबोली या पोर्टलवर दिला आहे. तो लेखही वाचनीय आहे. योगेश परळे यांच्या सकाळमधील या लेखाची लिंक खाली देत आहे
गजानन मेहेंदळेच्या व्हिडियोची लिंकही पुन्हा देत आहे. या लेखावरील प्रतिक्रिया जरूर द्याव्यात, त्याचबरोबर मेहेंदळेंच्या या व्हिडियोतील मतांचा कोणी इतिहासातल्या तथ्यांच्या आधारे प्रतिवाद केलेला आहे का यावर प्रकाश टाकला जावा ही अपेक्षा.
https://www.youtube.com/watch?v=LbZ5p2IIZD0
http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5227700114689738832
"
महाराज जश्यास तसे उत्तर द्यायचे,
तथाकथित पुरोगामी इतिहासकार शिवरायांना सेक्युलर ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत,त्याच्याउलट मेहेंदळे हे शिवरायांना प्रतिगामी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत,
दोन्ही भूमिकेतून काहीही निष्पन्न होत नाही,
महाराज उत्तम राजकारणी होते,वेळ पडल्यास स्वकियांनाही महारांजानी आडवे केले.
पण मेहेंदळे हे काही गोष्टींचे अवडंबर माजवतात आणि महाराजांना कट्टर ठरवायचा प्रयत्न करतात हल्ली.
जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी
महाराजांना प्रतिगामी
महाराजांना प्रतिगामी ठरवण्याचा प्रयत्न मेहेंदळे करतात हे म्हणणेच त्यांच्यावर अन्यायकारक आहे. तथाकथित पुरोगामी इतिहासकार शिवरायांना सेक्युलर ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत हे तुम्ही मान्य करता, त्या पार्श्वभुमीवरच मेहेंदळेंचे म्हणणे तसे वाटते. ते केवळ तथ्ये मांडताहेत. पण त्यांनी मांडलेली तथ्ये एकांगी आहेत का त्यांचे विरोधकही त्यांच्या या अभ्यासाचा प्रतिवाद करू शकत नाहीत हे पहायचे आहे.
गजानन मेहेंदळेंचा अभ्यास
गजानन मेहेंदळेंचा अभ्यास वगैरे असेल ते सगळे ठीक आहे पण स्वतःच्या फायद्याला सोयीस्कर तेवढीच "तथ्ये" सांगणे हा शुद्ध आणि खालच्या पातळीचा भामटेपणा आहे. साधं चिंचवडच्या मोरया गोसाव्याचं प्रकरण पाहिलं तर महाराज धर्ममार्तंडांच्या चाळ्यांना राज्यकारभारात थारा देत नव्हते हे कळेल. पण ह्यांनी ते उदाहरण सोयीस्करपणे वगळले. वर आव असा की मी फक्त सांगतोय.
मुळात इतिहास का शिकायचा हे मेहेंदळेंना कळलेले दिसतेय आणि त्यांना लगेच पुरेशी प्रसिद्धी देणार्यांनाही. एक विशिष्ट वृत्ती आहे ही आणि तिला नाव द्यायला पुरेसा घाणेरडा शब्द अजून तयार झालेला नाहीय. पण बाकीचे लोकही आता दूधखुळे राहिलेले नाहीत. अजेंडे लगेच लक्षात येतात.
जरी समजा हे खरेच असले तरी आज त्याचा रिलेव्हन्स काय? शिवाजी फक्त हिंदूंचा आणि त्यातही क्षत्रिय व ब्राह्मणांचाच राजा होता असे मानले तरी काय? पुढे काय? ह्याच लोकांनी कराव्या मग जयंत्या-पुण्यतिथ्या साजर्या आणि भांडत बसावं "तो कोणाचा" यावर. बाकीचे मौज बघताहेत आणि बघत राहतील. प्रतिवाद करुन बळंच सर्वांना पूजनीय वगैरे सिद्ध करायला कोणाला वेळ आहे?
मेहेंदळेंनी खरे काय ते
मेहेंदळेंनी खरे काय ते सांगितले तर तुम्हाला वाईट का वाटावे कळत नाही. त्यांच्याकडे किती मुस्लिम अधिकारी वा सेवक होते हा त्या कार्यक्रमातील भाषणाचा विषय होता. त्या भाषणात सगळे शिवचरित्र सांगण्याचा प्रयत्न नव्हता. मोरया गोसावींच्या संदर्भात तुम्हाला काय हवे ते विचारा की.
इथे कागदपत्रांचा अभ्यास करून त्यातली तथ्ये सांगणा-यांची वानवा आहे. उलट तसे काहीही न करता जातीय द्वेष वाढवणा-यांचाच सुकाळ आहे. श्रीमंत कोकाटे नावाचा एक जात्यंध सध्या इतिहासकार म्हणून मिरवतो आहे. तुम्हाला इतिहासाचा अभ्यास म्हणजे हे अपेक्षित आहे काय?
सदर व्हिडियोमध्ये त्यांनी जी त्थ्ये म्हणून सांगितली ती खरी आहेत का, त्यांचा प्रतिवाद कोणी केलेले पाहण्यात आहे का हा प्रश्न होता. तसे काही कोणी केलेले दिसत नाही. ते खरे असेल तरी पुढे काही नाही. तेवढेच.
पुढच्या वेळी शिवाजीच्या सैन्यात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम सैनिक व सरदारही होते असे सांगून जर कोणी दिशाभूल करत असेल तर त्याला विचारता येईल की बाबा तुझ्या म्हणण्याचा आधार काय? एवढेच.
काही तथ्ये मुद्दामहून न
काही तथ्ये मुद्दामहून न सांगणे हे खोटे बोलण्यासारखेच असते. (जे तुम्ही मुद्दामहून वा नकळत अनेकदा करता.)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आता तुम्हीच तसे करत आहात की. काहीही उदाहरण वगैरे न देता.
"काही तथ्ये मुद्दामहून न सांगणे हे खोटे बोलण्यासारखेच असते."
आता तुम्हीच तसे करत आहात की. काहीही उदाहरण वगैरे न देता.
तथ्य हे तथ्यच असते. तेही खोटे म्हणायचे तर हद्द झाली. प्रत्येक पोस्ट म्हणजे पीएचडीचा प्रबंध नसतो. तुम्हाला अपेक्षित असलेली एखादी बाजू पोस्टमध्ये दिसली नाही तर तुम्ही लगेच माझ्या हेतुबद्दलच शंका घेणार. तसे मुद्दे तुम्हाला दिसले नाहीत तर तुम्ही माझी त्या मुद्द्याबद्दलची मते तुमच्या मताच्या विरूद्धच आहेत असे ग्ृहित धरून टीका करणार. मी एक मुद्दा मांडला तर त्याबद्दल न बोलता तुम्ही पण 'तो'दुसराही मुद्दा का मांडला नाही यावरून टीका करणार.
किती मुस्लिम अधिकारी असले
किती मुस्लिम अधिकारी असले म्हणजे सेक्युलर म्हणता येते असा काही नियम आहे का? ५०% सैनिक मुसलमान असतील तरच सेक्युलर असे काही आहे का?त्या हिशोबाने भारत आधीच हिंदू राष्ट्र आहे असे म्हणता येईल आणि हिंदूंवर अन्याय होतोय या मुद्द्यातली हवा आणि भाजप/आरेसेसचा पायाच निघून जाईल. मुळात ही तथाकथित तथ्ये असली तरी मेहेंदळेंना वाचा फुटण्याचे किंवा जुने भाषण असेल तर ते पुढे येण्याचे टायमिंग कमालीचे संशयास्पद आहे. लेनच्या वादाच्या वेळी मात्र हे महाशय मिठाची गुळणी धरुन बसले होते की काय न कळे. आणि आता तर तुम्ही ही तथ्ये सेक्युलर लोकांविरुद्ध वापरणार हे कबूलच केले आहे. एका माणसाने केलेल्या दाव्यांचा प्रतिवाद कोणी केला नाही तर ते दावे सत्य अशी तुमची इतिहास संशोधन संपल्यातच जमा असल्याच्या थाटातली सोयीस्कर भूमिका दिसतेय.
कोकाटेंच्याही एखाद्या दाव्याचे खंडन कोणी तात्काळ नाही केले तर तो खरा मानणार का मग?
शिवाजी विषयावर विल्यम
शिवाजी विषयावर विल्यम डर्लिंपल काही लेखन करेल तर बरे होईल.
एखादा माणूस राजा कसा होतो अथवा त्याला राजा /शासक म्हणून प्रजा मान्य कशी करते यावर उदाहरणे देऊन लेखन व्हायला हवे.इतिहास समोर आणताना एखाद्या घटनेचा आढावा अथवा एखाद्या राजाचे शासन अथवा अमुकएक कालखंडातील सर्व घटना उलगडून दाखविणे हा हेतू असतो.या पुस्तकाचा/संशोधनाचा अथवा भाषणाचा हेतू काय हे विवेचन केलेत तरी आवडेल.
सकाळमधील लेख पूर्णतः पटला
सकाळमधील लेख पूर्णतः पटला नाही, तरी आवडला.
काही प्रश्न आहेत
चार्वी, तुझ्याकडून उत्तरं मिळू शकतील असे काही प्रश्न, सकाळमधल्या लेखाबद्दल आहेत म्हणून तुला उपप्रतिसाद -
१. लेखकाने वस्तुनिष्ठ चिकीत्सा करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो; पण शिवाजीबद्दल लिहिताना एवढा भावनिक प्रेमावेष का? हे लेखकाचं नेहेमीचं आहे, का परिस्थितीला शरण जाणं का राजकीय निर्णय?
२. शिवाजीला विज्ञाननिष्ठ का म्हणलं आहे? (या प्रश्नाचं विशेष प्रयोजन म्हणजे शिवाजीच्या काळात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्यासाठी मुळात विज्ञानाची काय प्रगती भारतात, शिवाजीपर्यंत पोहोचेल अशी, सुरू होती याबद्दल शंका आहे. दुसरं, विज्ञानवाद ही गोष्ट भारतात ब्रिटीशांकडून आली असं वाटतं; त्यामुळे ही चिकीत्साही कालविसंगत वाटते. लेखात अन्य संदर्भात कालविसंगतीचा उल्लेख आहेच.) याचे काही बाहेरचे संदर्भ देता येत असतील तरीही चालतील.
३. तुला लेखातला नक्की कोणता भाग पटला नाही?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खालील मुलभूत क्षेत्रात बारीक
खालील मुलभूत क्षेत्रात बारीक सारीक सुद्धा सुधारणा झाल्याची माहीती नाही.
१. सिस्टमिक : नोकरशाही तयार करणे, लँड रजिस्ट्री वगैरे, पोलिस दल वगैरे
२. न्याय - पिनल कोड करणे, न्यायालये आणि व्यवस्था तयार करणे
३. आर्थिक - त्याकाळात युरोपात बँका वगैरे निघायला लागल्या होत्या. रादर पेटंट वगैरे चे कायदे पण होत होते.
४. शैक्षणीक : शाळा वैगैरे काढणे, जगात मोठ्या प्रमाणावर नविन ज्ञान तयार होत होते ते मिळवण्या बद्दल काही करणे.
सामान्य जनतेसाठी आदीलशाही पेक्षा धर्माचा भाग सोडला तर जगण्यात काही फरक होता असे वाटत नाही.
संपादक,
हा प्रतिसाद आगलावा आणि खोडसाळ वाटत असल्यास ऊडवावा, किंवा मला सांगावे म्हणजे मी काढुन टाकीन.
ह्या म्हणण्यात काही चुक दिसत
ह्या म्हणण्यात काही चुक दिसत नाहीये
पेला अर्धा रिकामा का अर्धा भरलेला?
शिवकालपूर्व परिस्थिति लक्षात घ्या. सर्व देशभर इस्लामचे बन्दे सत्ताधीश होते. इस्लामी प्रदेशामध्ये राहण्याची मेहेरबानी हवी असेल तर हिंदूंनी जिझिया करासारखे कर निमूटपणे आणि नम्रपणे भरावेत अशी अपेक्षा राज्यकर्ते करू शकत होते. (पहा जदुनाथांचे औरंगजेबावरचे लेखन.) आपल्याच देशात येथलीच मूळची जनता दुय्यम नागरिक झालेली होती आणि परधर्माच्या अरेरावीखाली मान खाली घालून जगत होती.
ही परिस्थिति एका लहान भागापुरती का होईना बदलून येथील जनतेला मान वर करून जगता येईल असे कार्य शिवाजीने केले. ह्या existential प्रश्नापुढे नोकरशाही उभारणे असे प्रश्न दुय्यम ठरतात. एका आयुष्यात शिवाजी तरी काय काय करू शकला असता? त्याने जमिनीची मूळ मशागत करून तिला पीकयोग्य केले, पुढचे काम इतरांनी करावे! आणि तसेच पाहू गेल्यास राज्यव्यवहारकोश निर्माण करून कारभाराच्या भाषाशुद्धीला उत्तेजन त्यानेच दिले होते. त्याच्या पूर्वी कोणासहि हा प्रश्न जिव्हाळ्याचा वाटला नव्हता. ५१ वर्षांहून अधिक जगता तर अजूनहि काही करू शकता.
ते ज्यांनी करायला पाहिजे होते असे पुढचे राज्यकर्ते आणि समाजधुरीण कमी पडले असे म्हणा हवे तर. शेजारच्या गोव्यात १६व्या शतकात छापखान्याची विद्या येऊन पोहोचली होती पण आपण ती उचलली नाही. तितके जरी कोणी केले असते तर ज्ञानप्रसाराला केव्हढी गति मिळाली असती आणि किती सुधारणा त्यामागोमाग आल्या असत्या. युरोपात असे घडले. आपल्याकडेहि घडू शकले असते.
या प्रतिसादासाठी सलाम!
विचित्र मतमतांतरांच्या जंजाळात असाही सरळ, नेमका प्रतिसाद असू शकतो!
बरं आजोबा. मला काय फरक पडतोय.
बरं आजोबा.
मला काय फरक पडतोय.
१. योगेश परळे यांचे लिखाण मी
१. योगेश परळे यांचे लिखाण मी पहिल्यांदाच वाचले. त्यामुळे हे नेहमीचे आहे, का राजकीय निर्णय वगैरे मी सांगू शकणार नाही.
* शिवाजीबद्दल लिहिताना भावनिक प्रेमावेश का? हाहाहा! कोरडे, वस्तुनिष्ठ, केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून लिहिलेले लिखाण कोणी वाचणार नाही म्हणून.
२. या पुस्तिकेत (शिवाजी कोण होता) शिवाजीला पानसर्यांनी विज्ञाननिष्ठ म्हणून विशेष गौरवल्याचं मला तरी आठवत नाही. एखाद्या ठिकाणी उल्लेख असेल (तोही मला आठवत नाही), पण पानसर्यांनी या पुस्तिकेत शिवाजीच्या विज्ञाननिष्ठेबाबत कुठलाच मुद्दा सविस्तर मांडलेला नाही.
३. परळे यांचा लेख मला 'आवडला' असे म्हणण्याचे कारण, त्यांच्या लेखाने मला विचारप्रवृत्त केले, उदाहरणार्थ:
* धर्मनिरपेक्षता आणि आक्रमक हिंदुत्व या दोन्ही संकल्पना आधुनिक काळातील आहेत. अलीकडल्या काळातील संकल्पना इतिहासाला लावू नयेत.
* शिवकालीन भारतात मुस्लिम-मुस्लिम राज्यकर्त्यांमधे ज्या लढाया झाल्या, त्यांमागे शिया-सुन्नी संघर्ष हे एक कारण असण्याची शक्यता.
या लेखातील मला न पटलेले मुद्दे/ वाक्ये:
१. जिवंतपणी पानसरे यांच्या पुस्तिकेस ऐतिहासिकदृष्ट्या मृत्तिकेचीही किंमत नव्हती हा परळे यांचा उद्गार अप्रस्तुत आहे. या पुस्तिकेच्या दोन लाख प्रती विकल्या गेल्या, आणि ८ भाषांत अनुवाद झाला असा उल्लेख येथे आहे. ही भाषांतरे व सर्व विक्री पानसर्यांच्या मृत्यूनंतर झाली का? मला शंका आहे.
२. परळे यांनी म्हटले आहे, "पानसरे यांची ही पुस्तिका निखळ ऐतिहासिक दस्ताऐवज म्हणता येत नाही." पानसरे यांनी तसा दावाही केलेला नाही. त्यांनी इतिहाससंशोधकाचा आव आणलेला नाही. उपलब्ध पुस्तकांच्या, तथ्यांच्या आधारे त्यांनी शिवाजीच्या इतिहासाचा एक वेगळा अर्थ लावून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत एवढेच. आणि आपण उसनवारी केल्याचे पानसर्यांनी स्वतःच मान्य केल्याचा उल्लेख परळे यांनी केला आहेच. मग तरीही
हे प्रश्न परळे यांनी उपस्थित करण्याचे प्रयोजन मला कळले नाही.
३. पानसर्यांनी समकालीन संदर्भांचा अभ्यास न केल्याची टीका करणार्या परळे यांनी आपल्या कुठल्याच विधानाला समकालीन संदर्भ पुरवलेले नाहीत. पानसर्यांच्या 'अज्ञानमूलक' मांडणीला विरोध करताना परळे यांनी म्हटले आहे,
तसेच,
ही विधाने परळे कुठल्या समकालीन पुराव्यांवरून करतात?
शिवकालीन राजकारणाचा अभ्यास करणार्याने इस्लामी संकल्पनांचा अभ्यास केला पाहिजे, हे परळे यांचे म्हणणे पटते. पण या संकल्पनांबाबत त्यांनी स्वतः काही स्पष्टीकरण दिले असते, तर त्यांच्या म्हणण्याला काही जोर आला असता. उदा, परळे म्हणतात,
अशी नुसती राळ उडवण्यापेक्षा या साधनांच्या आधारे केलेले काही मौलिक संशोधन परळे यांनी मांडले असते, तर 'पानसरे यांनी ते केले नाही' या त्यांच्या टीकेला काही अर्थ राहिला असता.
४. माझा मुख्य आक्षेप आहे, तो परळे यांच्या या विधानावर:
अशी झालर लावण्याचा प्रयत्न पानसर्यांनी केला आहे, असे मला तरी कुठे दिसले नाही. पानसरे स्पष्ट म्हणतात,
पानसर्यांनी या पुस्तिकेत स्वच्छपणे म्हटले आहे की, शिवाजी हिंदू होता, धर्मश्रद्ध होता, पण त्याने धर्माच्या आधारावर प्रजेत भेदभाव केला नाही. शिवाजीचा धर्माभिमान इतर धर्मीयांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता. तसेच मुस्लिम धर्माविरुद्ध आपली मते लोकमान्य करण्यासाठी कोणी शिवाजीचा आधार घेत असेल तर ते चुकीचे आहे, त्यांनी आपला माल शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये.
५. परळे म्हणतात,
कुरुंदकरांच्या विधानाचा उघड विपर्यास करून त्याच्या आडून पानसर्यांची खिल्ली उडवण्याचे कारण नव्हते.
६. परळे यांच्या मते,
ही विधाने कुठल्या आधारावर केली आहेत, हे स्पष्ट नाही. पानसर्यांच्या मते, स्वराज्याबाबतची निष्ठा रयतेच्या मनात टिकून राहण्याचे कारण म्हणजे शिवाजी हा रयतेची कणव असलेला राजा होता.
पानसरे यांचे पुस्तक इथे वाचता येईल.
लेखन कसं वाचावं
आभार.
इतिहास या विषयाचा अभ्यास केला नसल्यामुळे या विषयाकडे कसं बघावं हे मला सहज समजत नाही. वरच्या प्रतिसादातली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे लेखन कसं वाचावं याबद्दलही (जाताजाता) मार्गदर्शन आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुम्ही आगी लावणारे धागेच का
तुम्ही आगी लावणारे धागेच का काढता हो राकु
आग कोठे दिसली तुम्हाला.
आग कोठे दिसली तुम्हाला. चोराच्या मनात चांदणे तसे 'अमुक अमुकच्या मनात आग' अशी म्हण तुमच्यासाठी रूढ करायला हवी. नसलेले दिसणे किंवा भलताच अर्थ काढणे अशा अर्थाने.
+१
.
जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी
न राहावल्यामुळे प्रतिसाद देणे
न राहावल्यामुळे प्रतिसाद देणे अवश्य आहे.
ब्रिगेड-भांडारकर इश्श्यू झाला तेव्हा त्याचा निषेध करण्यात मेहेंदळे आघाडीवर होते. त्यांनी ब्रिगेडचा नेहमीच निषेध केलेला आहे. शिवाय आत्ताच भाषण का दिले वगैरेंवरून आरोप करण्यात अर्थ नाही. त्यांना त्यांच्या काही निकटवर्तीयांकडून खूप आग्रह झाला तेव्हा त्यांनी ते भाषण दिलेले आहे.
बाकी शिवाजी आणि मुसलमान- मेहेंदळे यांनी दिलेले पुरावे अचूक आहेत. जर महाराजांच्या सैन्यात कमी मुसलमान अधिकारी असतील तर ते हिंदुत्ववादी आणि उलटे असल्यास सेक्युलर असे म्हणणे चूक आहे हे मान्य. पण अलीकडे "महाराजांच्या सैन्यात १/३ मुसलमान होते" वगैरे फेकूगिरीही चालू असते, त्याला उत्तर देण्याकरिता हे सांगणे आवश्यक आहे. त्याला जर कोणी अँटीमुसलमान वगैरे म्हणत असेल तर म्हणो. पुरावे सोडल्यास कुणाच्याही मताला काडीमात्र किंमत नसते.
बाकी महाराजांचे कर्तृत्व काय? हे पहायचे तर खालील गोष्टींवर विचार करावा ही विनंती.
१. साडेतीन जिल्ह्यांइतका जीव असलेले टीचभर राज्य मुघलांच्या पूर्ण दोनतीन लाख सेनेशी सलग सत्तावीस वर्षे लढू शकले, इतकेच नाही तर त्याचे प्रतिनिधी नंतर मुघलांच्या उरावर बसून अख्ख्या भारतभर प्रभुत्व संपादन करते झाले. याचा पाया महाराजांनी घातला.
२. फक्त पायदळ नव्हे तर आरमाराचाही पाया महाराजांनी घातला. त्या परंपरेत वाढलेले आंग्रे पुढे पूर्ण पश्चिम किनार्यावर इंग्रज, पोर्तुगीज, डच या सर्वांपेक्षा बळजोर होते. पुढे त्यांचा पाडाव झाल्यावर धुळपही कालिकतपर्यंत आल्याचे उल्लेख सापडतात.
३. आपल्या मुलखात व्यापार वाढावा असा महाराजांचा नेहमीच प्रयत्न असे. १६६४ सालच्या बटाव्हिया डाग रजिस्टर, पान क्र. ३२२ इथे पाहिल्यास दिसून येईल की महाराजांचा कोकणातील सुभेदार रावजी सोमनाथ याने दोन जहाजे एडन, मोखा (मक्का नव्हे. मोखा हे येमेनमधील बंदर आहे. स्पेलिंग mocha असे आहे.) इथे पाठवलेली होती आणि त्याद्वारे बक्कळ फायदा झालेला होता. पुढे दक्षिणदिग्विजय झाल्यावर १६७८-७९ साली तिथले सुभेदार रघुनाथ पंडित यांचेही एक जहाज इंडोनेशिया इथे गेल्याचा उल्लेख सापडतो. तेव्हा परदेशी व्यापारासाठी महाराज कसे जागरूक असत हे समजते.
भारताच्या पूर्व किनारपट्टीतील डचांचा व्यापार नेमका महाराजांनी तो भाग ताब्यात घेतल्यावर एकदम झपाट्याने वाढला. (पहा, तपन रायचौधुरी यांचे "जान कंपनी इन कोरोमंडेल", पान क्र. २१९-२०) अख्ख्या १७ व्या शतकात १६७६-१८८४ या वर्षांइतका नफा डचांना कधीच झालेला दिसत नाही. जिज्ञासूंनी रायचौधुरी यांच्या पुस्तकातील नफ्याचे आकडे स्वतःच्या डोळ्यांनी पहावेत अशी त्यांना विनंती आहे.
४. प्रजाजनांची काळजी- शेतकर्यांना बिनव्याजी कर्ज देण्याची शिफारस त्यांच्या पत्रात आहे. प्रजेवर कोणत्याही प्रकारे जुलूमजबरदस्ती न करावी असे ते सांगतात. आता यात काय विशेष असे वाटल्यास पुढील उदाहरण पहा. इ.स. १६७७ साली २६ ऑगस्ट रोजी डच ईस्ट इंडिया कंपनीला उद्देशून महाराजांनी एक कौल दिला. त्यात ते स्पष्ट म्हणतात:
यापूर्वी मुसलमान शासनाचे वेळी तुम्हांस इथून गुलाम (स्त्री व पुरुष) खरेदी करून त्यांना परदेशी पाठवण्याची पूर्ण परवानगी असून त्यात कुणाचाही अडथळा नव्हता. पण या देशावर माझे स्वामित्व असेतोवर तुम्हांला इथून गुलाम खरेदी करता येणार नाहीत, तसेच त्यांना इथून परदेशी पाठवताही येणार नाही. तुम्ही तसे केल्यास माझे लोक त्याचा सर्व प्रकारे विरोध करतील आणि असे करण्याची परवानगी मुळीच देणार नाहीत. तेव्हा तुम्हीही तुमच्याकडून असे घडणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.
जर कुणाला मी हे पदरचे फेकतोय असे वाटत असेल तर त्याने Corpus Diplomaticum Neerlando Indicum, खंड तिसरा, पान क्र. ६५ इथे हा मूळ डच भाषेतील परिच्छेद पहावा. तो इथे देत आहे, कुणाकडूनही भाषांतरित करून आणा म्हणजे स्वतःच्या मनचे सांगतोय असे वाटू नये.
यावरून स्पष्ट दिसून येते की याअगोदर विजापूरच्या काळात गुलामविक्रीला परवानगी होती. महाराजांनी "माझ्या प्रदेशातून इतःपर गुलाम विकत घ्यायचे नाहीत" असे म्हटले आहे. हे पाऊल त्या काळाच्या संदर्भात पाहता अतिशय क्रांतिकारक आहे. एकच उदाहरण देतो, महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी यांनी डच कंपनीला दिलेल्या कौलात फक्त "प्रति गुलाम (स्त्री वा पुरुष, लहान वा मोठा) कर ३१.५ फनम (एक चांदीचे नाणे)" इतकेच म्हटले आहे. अन्य लोकांचीही तीच स्थिती आहे.
५. पोर्तुगीजांविरुद्ध मस्कतच्या इमामाशीही राजांनी संधान बांधल्याचे पोर्तुगीज साधनांतच उल्लेख सापडतात.
६. राज्यव्यवहारकोश हे सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे पाऊल होते. तत्कालीन भारतात असे कोणीही केल्याचे दिसत नाही.
७. किल्लेबांधणीसाठी महाराजांनी अपटुडेट टेक्निक्स वापरल्याचा, जरूर तिथे युरोपियन इंजिनेरांची मदत घेतल्याचा उल्लेख जेसुईट पाद्र्यांच्या लेखनात आढळतो.
८. १६७९ च्या आसपास स्वराज्यातील जमिनीची मोजणी इ. सुरू झाल्याचा उल्लेख आहे. (बहुधा सभासद बखरीत)
इतरही अनेक गोष्टी आहेत. मुद्दा इतकाच, की राजकारण व समाजकारण या दोन्ही निकषांवर तत्कालीन पूर्ण भारतात महाराजांसारखा एकही राजा नव्हता. आदिलशहा, मुघल तसेच अन्य फिरंगी या सर्व शत्रूंना त्यांनी मात दिलेली होती आणि प्रजाजनांचे हित पाहून व्यापाराला यथाशक्ती चालना दिली होती. नेहमीच हिंदू धर्माचे संरक्षण केले होते, उदा. तमिळनाडूतील शोणाचलपती अर्थात तिरुवन्नमलै येथील शंकराच्या देवळाची विटंबना झाली होती तिथे महाराजांनी देवाची पुनःस्थापना केली, गोव्यातील सप्तकोटीश्वराचे देऊळही त्यांनी परत बांधले.
शिवाजी आणि मुसलमान- त्यांनी आपल्या नोकरीत मुसलमानांना ठेवले, नाही असे नाही. परंतु "सैन्यात तुरुक असता जये कैसा होतो" वगैरे मते पाहता (व्यंकोजीराजांना लिहिलेले पत्र पहा) त्यांचा उद्देश स्पष्ट व्हायला हरकत नसावी. याबद्दल एक रोचक पुस्तक सुदैवाने ऑनलाईन फ्री उपलब्ध आहे. युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्ना येथील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. gijs kruijtzer यांचे xenophobia in 17th century india हे पुस्तक अवश्य वाचावे अशी शिफारस करेन. त्यात पान क्र. १५३-१९३ चा चॅप्टर आणि मादण्णा-आकण्णा यांसंबंधीचा चॅप्टरही पूर्ण वाचावा अशी शिफारस आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
राम पुनियांनींच्या लेखावर
राम पुनियांनींच्या लेखावर संशय घेता?? Sanghi, I name you thee!
वा! मस्त आहे प्रतिसाद.
वा! मस्त आहे प्रतिसाद. तथ्याधारित आणि पुरेसा तटस्थ.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
प्रतिसाद आवडला. मी जाणकार
प्रतिसाद आवडला.
मी जाणकार नाही पण तुरुक = मुसलमान हे मेहेंदळ्यांचे म्हणणे योग्य नसावे. मुघल लोक स्वतःला तुर्क समजत आणि एतद्देशीय मुसलमानांना खालचे समजत "आम्ही तुर्क तुम्ही दखनी" असे म्हणत असत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मुघल लोकांची तुर्क ही जाणीव
मुघल लोकांची तुर्क ही जाणीव वांशिक होती, परंतु भारतभर 'नेटिव्ह' लिटरेचरमध्ये सगळीकडे तुर्क = मुसलमान असेच समीकरण असते. संस्कृतात तुरुष्क असा शब्दही त्याला आहे. तेलुगुमध्येही तुर्कालु असा शब्द असून त्याचा अर्थ मुसलमान हाच आहे. मराठ्यांच्या कागदपत्रांत "यवन व दुष्ट तुरुकहाचे" वगैरे उल्लेख येतात ते अशाच अर्थी. हे जे कोणी परदेशी मुसलमान आहेत, ते अफगाण आहेत की तुर्क किंवा मंगोल की अजून कोणी याचा भारतातल्या नेटिव्हांनी तितपत विचार केलेला दिसत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फारच छान. तुर्कांचा उल्लेख
फारच छान.
तुर्कांचा उल्लेख असलेल्या पत्राचा उल्लेख मागे बेडेकरांच्या व्याख्यानातही ऐकला होता.
बॅटमना, तुला असेच अधिकाधिक न
बॅटमना, तुला असेच अधिकाधिक न राहावल्यासारखे होवो अशी इच्छा करतो.
---/\---
अग्ग्गाग्गायो....
केवढे ते संदर्भ.
---/\---
बॅट्याच्या प्रतिसादाचीच वाट
बॅट्याच्या प्रतिसादाचीच वाट बघत होत. (विशेषत: ननिंचे प्रतिसाद वाचताना.)
बिपिन कार्यकर्ते
टाळ्या
मस्त प्रतिसाद!
प्रतिसाद आवडला आणि शिवाजी
प्रतिसाद आवडला आणि शिवाजी महाराज वेगळे होते यात वाद नाही. विरोध ज्या हेतूने भाषण केले/वापरले जातेय त्याला आहे. शिवाजीला आजच्या संदर्भात हिंदुत्ववादी बनवण्याच्या प्रयत्नाला आहे.
विरोध ज्या हेतूने भाषण
हरकत नाही. महाराज आजच्यासारखे हिंदुत्ववादी किंवा धर्मनिरपेक्ष दोन्हीही नव्हते. जिथे जमेल तिथे हिंदू धर्माची वाढ होईल अशी पावले त्यांनी उचलली हे पुराव्यावरून तरी दिसते आहे. ते फक्त हिंदुत्ववाद्यांना सोयीस्कर वाटते म्हणून दाबू नये इतकाच मुद्दा आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हिंदुत्त्ववाद्यांना सोयीस्कर
हिंदुत्त्ववाद्यांना सोयीस्कर आहे म्हणूनच तर आताच ते भाषण झाले ना? दाबायचा हेतू नसून ही हेतूवर टीका आहे. (अर्थात आजकाल टीका म्हणजेच दाबणे आहे म्हणा). महाराज सेक्युलर होते असा प्रचार काही लोक करतात हे यात गृहीतक आहे. पण महाराज मुस्लिमद्वेष्टे नव्हते एव्हढेच म्हणणे असू शकते (काही अतिरेकी सोडल्यास) महाराज सेक्युलर नव्हते असे म्हणण्याला "तेव्हा काही लोक सेक्युलर होते पण महाराज त्यात नव्हते" असा वास आहे. प्रत्यक्षात तेव्हा कोण सेक्युलर होतं? ज्याला जितपत धर्माभिमान असायला हवा तितपत तेव्हाच्या ज्ञानाप्रमाणे प्रत्येकाला असेच. मग महाराज सेक्युलर नव्हतेच किंवा होतेच हा वाद उकरुन काढणे हा वेडेपणा आहे आणि इतिहासाचा एरवी गंधही नसलेले लोक तो उगाळू पाहात आहेत आणि व्यासंगी लोक नेहमीप्रमाणे कोणताही स्टॅन्ड न घेता त्याला बळी पडत आहेत याची चीड आहे.
ननि, मेहेंदळे उजव्या
ननि, मेहेंदळे उजव्या विचारांचे आहेत हे अलम दुनियेला माहीत आहे. पण त्यांनी लिहिलेले शिवचरित्र सर्वात जास्त वास्तव आणि तथ्याधारीत आहे हे त्यांचे विरोधकही म्हणतात. त्यांच्यावर टीका होऊच शकते, व्हावीही... पण तुम्ही त्यांच्यावर जरा जास्तच टोकाची टीका केली असे वाचताना वाटत होते. कदाचित, सध्या पेव फ़ुटले आहे इतिहासकारांचे त्यातलेच किंवा तत्समच एक, असे तर नाही ना वाटले तुम्हाला त्यांच्याबद्दल?
बिपिन कार्यकर्ते
इतिहास संशोधक म्हणून
इतिहास संशोधक म्हणून मेहेंदळेंची निंदाच काय पण स्तुती करायचीही माझी पात्रता नसेल; पण "तटस्थ बुद्धीने संशोधन केले की झाले; बाकीच्यांनी त्याचा वापर कोणत्याही संदर्भात कसाही करो मला त्याचे सोयरसुतक नाही" या वृत्तीवर टीका करण्याचा आणि त्याबद्दल त्यांना दोष देण्याचा नक्कीच हक्क आहे असे मी मानतो. अडाणी धर्मांध लोकांचा राग येत नाही तितका विद्वान आणि एलिट लोकांनी योग्य तिथे विरोध न केल्याचा किंवा आपले ज्ञान आपल्या व्यक्तिगत "तत्त्वांसाठी" वापरल्याचा येतो. मेहेंदळे उजव्या विचारसरणीचे असतील तरीही त्यांचे स्वतःचे संशोधन स्वतःच्या विचारसरणीसाठी वापरणे योग्य कसे ठरते? त्यांना आपण कोणत्या विषयावर कोणत्या संदर्भात बोलतोय याची जाणीव नसेल यावर माझा विश्वास नाही.
उत्तर कोरियात जाऊन अणुविभाजनाचे शास्त्र शिकवणार्या प्राध्यापकाला ("मी फक्त अणू कसा फुटू शकतो ते दाखवतोय") केवळ व्यासंगी म्हणून जग डोक्यावर घेईल का?
हिंदुत्त्ववाद्यांना सोयीस्कर
या भाषणातली मते त्यांनी याअगोदर पंधरावीस वर्षे त्यांच्या पुस्तकात मांडलेली आहेत. ते एरवी मंडळ सोडून कुठेही भाषण देत नाहीत. यावेळेस त्यांना काही परिचितांनी खूपच आग्रह केला तो त्यांना मोडता आला नाही. हे त्यांच्याशी परिचय असल्याने माहिती आहे. मुद्दा इतकाच, की हे भाषण आत्ताच देण्यामागे मेहेंदळ्यांचा व्यक्तिगत स्वार्थ अॅज़ सच नाही. बाकी त्यांचे विवेचन हिंदुत्ववाद्यांच्या पथ्यावर पडत असल्याने त्यांनी या भाषणाची तळी उचलणे अगदी समजण्यासारखे आहे.
प्रश्न इतकाच, की हे जर बघवत नाही तर बाकीचे लोक काय करताहेत? आपण लिहिलेल्या इतिहासाचा पोलिटिकल वापर होऊ नये अशी तजवीज इतिहासकार कधीच करू शकत नाही. एकदा इतिहास लिहून प्रकाशित झाला की संपले. पुढे इतिहासकार फारतर मते मांडेल की असे करणे चूक, तसे करणे बरोबर वगैरे सांगेल पण त्यापलीकडे काही करू शकत नाही. तेव्हा मेहेंदळ्यांनी लिहिलेल्या इतिहासाचा किंवा मांडलेल्या सरणीचा जर हिंदुत्ववाद्यांकडून गैरवापर झाला तर त्याचा दोष मेहेंदळ्यांना लागत नाही. जसा हिरोशिमा-नागासाकीचा दोष अणुविभाजनाचे शास्त्र शोधणार्या शास्त्रज्ञांना लागत नाही.
व्यासंगी लोक काय किंवा लेमॅन काय, आपापल्या भूमिकेप्रमाणे काहीएक स्टँड घेतातच. मेहेंदळ्यांचे उजवे विचारही परिचितच आहेत. फक्त त्यात तेवढेच समाविष्ट नसते तर अतिशय तथ्यपूर्ण मांडणीही असते. माझे मत विचाराल तर मेहेंदळ्यांच्या विरोधी भूमिकेतून कुणी सीरियसली घेण्यालायक काही लिहिले असेल तर वाचायला आवडेल. तूर्तास दुसरी बाजू खूपच लंगडी दिसतेय कारण पुराव्यांचा चिकित्सकपणे वापर दिसत नाही, मोस्टलि "नॅरेटिव्ह बिघडायला नको" छाप नैतिक आव आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तूर्तास दुसरी बाजू खूपच लंगडी
हे सपशेलच मान्य आहे. वरती म्हटलंच आहे. मेहेंदळेंच्या पुराव्यांच्या विश्वासार्हतेवर किंवा त्यांच्या संशोधनावर आक्षेपच नाहीय आणि वैयक्तिक आकसही नाहीच. आक्षेप नॅरेटिव्ह बिघडण्यालाच आहे. शिवाजी काही आता जिवंत नाही; पण आमचा राजा असा होता अशी कल्पना करुन त्याचा अभिमान वाटून घेतो मी. शिवाजी दगाबाज होता असे म्हटले तरी मला राग येतोच. ते काही म्यानडेटरी नाहीय. शिवाजी नसता तर सुन्नत झाली असती म्हणतात. झालीही असती पण त्याचं आत्ता तीनशे-साडेतीनशे वर्षांनी वाईट वाटलं असतं का ही शंकाच आहे. नगरीनिरंजन ऐवजी नगरीनसीम झालो असतो कदाचित. तेव्हाच्या जंगली लोकांमध्ये आमचा राजा कनवाळू मानवतावादी होता हे नॅरेटिव्ह मला प्रिय आहे. यात नैतिक-बैतिक आव नाही; भावनिक आव असू शकतो.
इतिहास जसा आहे तसाच सगळाच्या सगळा मांडला जातो असे कधीच होत नाही. मग राहू द्या की तेवढं नॅरेटिव्ह. ते न बदलताही मुस्लिम धर्मांधतेचा विरोध करता येईल की. बाकी ज्यांना इतिहासाचा अभ्यास करायचाय त्यांनी करा आणि पुस्तकं लिहा. ज्यांना रस आहे ते वाचतील. भाषणं ठोकून आणि व्हिडिओ काढून सकल जन शहाणे करुन सोडण्याचा हट्ट कशाला? आमचं नॅरेटिव्ह बिघडलं म्हणून वर आम्ही शिव्यापण घालायच्या नाहीत.
तेव्हाच्या जंगली लोकांमध्ये
तसे नाही. धर्मनिरपेक्षतावादाच्या नॅरेटिव्हबद्दल म्हणत होतो.
इतिहास हा विषय गणित, फिजिक्स, इ. सारखा नाही. किमानपक्षी भारतात तर नाहीच नाही. यात समाजाशी फार जवळून संबंध येतो. आणि कलोनिअल गंडातून आपला समाज अजून बाहेर पडला नसल्याने तर अजूनच जास्त. त्यामुळे समाजाशी सर्व पातळ्यांवर एंगेज होणे आवश्यक आहे अशी माझी समजूत आहे. भाषणे ठोकणे हा त्याचाच एक भाग आहे.
बाकी तुमचं नॅरेटिव्ह बिघडलं म्हणून तुम्ही शिव्या घालता तसेच आम्हीही काही नॅरेटिव्हला विशेष पुरावा नसताना त्याला लोक डोक्यावर घेतात म्हणून शिव्या घालतो. चालायचंच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धर्मनिरपेक्षतावाद आणि
धर्मनिरपेक्षतावाद आणि मानवतावाद वेगवेगळे आहेत का? प्रामाणिकपणे विचारतोय.
या परिप्रेक्ष्यात जरा वेगळे
या परिप्रेक्ष्यात जरा वेगळे वाटतेय. आपले रेफरन्सेस अंमळ वेगळे असू शकतात. धर्मनिरपेक्षतावाद हा मानवतावादाचा सबसेट आहे असे तुमचे रीझनिंग असावेसे वाटते. मी तशा संदर्भात म्हणालो नव्हतो. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील धर्मनिरपेक्षतेचे बळजोर नॅरेटिव्ह अबाधित रहावे अशी बहुतेकांची खटपट असते, त्याला उद्देशून माझे बोलणे होते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्या हिशोबानेसुद्धा मुस्लिम
त्या हिशोबानेसुद्धा मुस्लिम बादशहांच्या पदरी हिंदू सरदार असणे आणि शिवाजी महाराजांच्या पदरी मुसलमान किल्लेदार वगैरे असणे ही धर्मनिरपेक्षताच होती की. आता किती होते आणि किती काळ होते त्यावरुन निष्कर्ष काढायचे असतील तर तशी व्याख्या केली पाहिजे आधी. अफजलखान आणि शहाजींचे चांगले संबंध असणे, नेताजी पालकरांच्या भावाला पुन्हा हिंदू न करुन घेणे किंवा सरसकट "घरवापसी" न राबवणे ही तर मला आजच्या काही लोकांपेक्षा जास्त निरपेक्षता वाटते. की तेही सगळं खोटंच?
त्या हिशोबानेसुद्धा मुस्लिम
निव्वळ त्या आकडेवारीला अर्थ नाही हे मी अगोदरच कबूल केलेले आहे. पॉइंट इतकाच आहे की मध्ययुगीन भारतातील इस्लामप्रणीत अत्याचारांवर नेहमी पांघरूण घातले जाते आणि ते सिलेक्टिव्ह असल्याने चूक आहे. जे नॅरेटिव्ह म्हणतोय ते हे आहे. आक्षेप हा मध्ययुगीन इस्लामप्रणीत अत्याचारांमधील धार्मिक एलेमेंट हे सिलेक्टिव्हली इग्नोर किंवा डाउनप्ले करण्याला आहे. जर ते गळ्यात मडके, हातात झाडू, इ.चे नॅरेटिव्ह चढत्या भाजणीने सांगायचे असेल तर हेही सांगितलेच पाहिजे. असे सिलेक्टिव्ह पांघरूण घालून हिंदुत्ववाद्यांच्या उत्कर्षास खतपाणीच घातले जाते हे या मठ्ठांच्या लक्षात येत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण मेहेंदळेंनी औरंगजेबाने कसे
पण मेहेंदळेंनी औरंगजेबाने कसे अत्याचार केले असे भाषण केले असते तर ते समजू शकलो असतो. शिवाजी महाराज कसे सेक्युलर नव्हते हे सांगून मुस्लिम राज्यकर्त्यांनी केलेले अत्याचार कसे हायलाईट होणार?
उलट त्या अत्याचारग्रस्त लोकांच्या सामान्य वंशजांना अधिक असुरक्षित वाटणार नाही का?
विषय महाराजांचा, त्यामुळे
विषय महाराजांचा, त्यामुळे औरंगजेबावर जास्त फोकस नसणे क्रमप्राप्तच आहे. बाकी अत्याचार हायलाईट करणे हा हेतू असता तर सीताराम गोएलांच्या "हिंदू टेम्पल्स-व्हॉट हॅपन्ड टु देम?" या पुस्तकाची पारायणे करूनच काम भागलं असतं. शिवचरित्राच्या संदर्भात मेहेंदळ्यांना काय वाटते आणि त्यांचे मते काय योग्य आहे असे सांगणारे ते भाषण आहे. त्याच्या उद्देशाला जरूरीपेक्षा ताणून बघण्यात अर्थ नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आमचाही कुर्निसात रुजू करून
आमचाही कुर्निसात रुजू करून घ्यावा बॅटेश्वर! __/\__
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बाटमॅनला सन्यासातून बाहेर
बाटमॅनला संन्यासातून बाहेर यायला लावल्याबद्दल राकुंचे आभार!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अगदी सहमत. आता अजोंना परत
अगदी सहमत. आता अजोंना परत आणलं तर उरलेली अर्धी इच्छा पूर्ण होईल.
टिंकुलाही.
टिंकुलाही.
चार्वी यांचा प्रतिसाद, बॅटमॅन
चार्वी यांचा प्रतिसाद, बॅटमॅन यांचा प्रतिसाद आणि बॅटमॅन-नगरीनिरंजन चर्चा या सर्वच गोष्टी उद्बोधक आहेत.
क्लास!
ननि आणि बॅटमन यांची चर्चा आवडली. या अशाच अभिनिवेशशून्य चर्चांसाठी मी एक वाचक म्हणून आसूसलेला असतो. दोघांना धन्यवाद!
प्रबोधक चर्चा. बॅटमॅनचे
प्रबोधक चर्चा. बॅटमॅनचे स्वागत.