का...का...का....काकस्पर्श!
'एक विलक्षण प्रेमकहाणी' म्हणून बराच गाजावाजा झालेला, जाहिरातींतून उत्सुकता चाळवणारा 'महेश वामन मांजरेकर' दिग्दर्शित 'काकस्पर्श' काल पाहिला. ( हे 'महेश वामन मांजरेकर' म्हणजे 'वास्तव'वादी महेश मांजरेकरच का? बहुदा असावेत.) अडीच-तीन तास कुठेतरी काढायचे होते, बाहेर मनस्वी उकडत होते. चित्रपटगृह चांगले, वातानुकूलित होते. या सबबी वाचकांसाठी नसून मी माझ्या 'मना सज्जना' ला सांगितलेल्या आहेत. मन हे ( 'काकस्पर्श' सारखे ) विलक्षण असते. ते हा चित्रपट बघून झाल्यावर पुन्हापुन्हा म्हणत होते, नुसताच मॉलमध्ये फिरला असतास, 'तेज' बघीतला असतास, 'विकी डोनर' बघीतला असतास...
स्वातंत्र्यपूर्व काळातले कोकणातले एक खेडे. त्यातील ब्राह्मणाचे एक कुटुंब. हरी हा कुटुंबप्रमुख. कणखर, तत्वनिष्ठ वगैरे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या समर्थ,बळकट वगैरे खांद्यांवर पेलणारा. कुटुंब म्हणजे बायको, पोरे, लहान भाऊ आणि एक सोवळी आत्या. या काळातले चित्रपट, मालिका यांमध्ये केशवपन केलेली. लाल अलवणातली, भेसूर दिसणारी एखादी जुनी आत्या, मावशी वगैरे नसेल तर त्यांना सेन्सॉरचे सर्टिफिकेट मिळत नसावे. स्वातंत्र्यपूर्व काळ, पण एकंदरीत या चित्रपटात काळाची, पात्रांच्या भाषेची, वेशभूषेची रचना करताना धारपांच्या कथेत पडतो तसा मितींना एक पिळा पडला आहे. या पात्रांची भाषा कधी सानुनासिक, पुस्तकी, ब्राह्मणी होते तर कधीकधी ती पात्रे - म्हणजे अगदी आपला हरीसुद्धा - बोलताबोलता 'अच्छा..' असा शब्द वापरुन जातो. हरीचा मुलगा पुढे पॅन्ट-शर्ट असा पोषाखात वावरतो, पण डोक्याला घेरा आणि शेंडी आहेच. असो, तर हा हरी आपल्या धाकट्या भावाचे दुर्गीशी लग्न ठरवतो आणि फलशोभनाच्या (हा शब्द या चित्रपटातली सर्व पात्रे 'फलशोधन' असा उच्चारतात. हरेच्छा!) रात्रीच तो भाऊ मरण पावतो. मग पुढचे काही लिहायलाच नको. ढसढसा रडणार्या कुटुंबियांमध्ये शून्य चेहर्याने बसलेली त्याची पोरगेलेशी बायको, तिला सोवळी करा असा अट्टाहास धरणारी ती आत्या (आणि गावातले कर्मठ ब्राह्मण), तिच्या लांबसडक केसांवर वस्तरा चालवण्याच्या एक सेकंदभर तेथे आलेला हरी, त्याने मग तो वस्तरा त्या नाव्याच्या हातून हिसकावून फेकून देणे (त्या न्हाव्याचे नावही... बरोबर ओळखलेत! शांतू!), गावाने हरीवर बहिष्कार घालणे, हरीने एखाद्या कातळासारखे सगळ्या आपत्तींना तोंड देत आपल्या धाकट्या भावजयीला या जालिम जमान्यापासून वाचवण्यासाठी उभे रहाणे, पुढे हरीची बायको गंभीर आजारी होणे, मग.. वगैरे वगैरे वगैरे...
तर अशी ही 'काकस्पर्श' ची शोकांतिका. चित्रपटाच्या नावापासूनच तो खास ब्राह्मण प्रेक्षकांना आकर्षित करुन घेण्यासाठी बनवलेला आहे हे स्पष्ट होते. एक निर्माता म्हणून अगदी फक्त व्यावसायिक दृष्टीकोनातून बघीतले तरी हे धाडसाचेच काम आहे. निर्माता-दिग्दर्शकाचे या चित्रपटात धाडस म्हणून काही असेल तर ते हे एवढेच. बाकी पन्नास -साठ-सत्तर वर्षांपूर्वीची कोकणी पार्श्वभूमीवरची कोणतीही एक कादंबरी घ्या, कोणीही एक शांतारामी ढोबळ सांकेतिकी दिग्दर्शक घ्या, थोडे फडकाळलेले-खांडेकरी संवाद लिहा. पाचदहा बाराबंद्या, साताठ धोतरे, नऊवारी लुगडी, पगड्या आणि नथी घ्या, उमेदवारी करणारे काही कलाकार घ्या आणि सुरु करा शूटिंग! झाला 'काकस्पर्श'! हाय काय आन नाय काय...
असल्या दाणादाण पडापडीत सचिन खेडेकर आणि केतकी माटेगावकर हे (आपले मराठी वगैरे..) कलाकार ध्यानात राहतात. सचिन खेडेकरचे काम सरासरीत चांगलेच असते. 'काकस्पर्श' मध्ये त्याने आपले टपोरे, भावपूर्ण डोळे, आपला आवाज आणि आपली शरीरयष्टी यांचा उत्तम वापर करुन घेतलेला आहे. केतकी माटेगावकरचा 'स्क्रीन प्रेझेन्स' ताजा, गोड आहे. 'शाळा' मध्ये ही ती इतक्याच प्रसन्नपणे वावरली होती. बाकी कलाकार या चित्रपटात आहेत इतकेच. पण ते तरी काय करणार बिचारे!
आपल्या भावाचे पिंडदान करणारा हरी या दृष्यापासून 'काकस्पर्श' हा चित्रपट सुरु होतो. पुढे याच दृष्यात कावळे पिंडाला शिवत नाहीत तेंव्हा कावळ्यांना बोलावण्यासाठी हरी मोठमोठ्याने 'का...का...का..' अशा हाका मारतो. साक्षात विधात्याला विचारलेला हा प्रश्नच जणू! चित्रपट संपला आणि मी बाहेर आलो. विलक्षण भूक लागली होती. पोटात कावळे ओरडत होते असे म्हटले तरी चालेल. डोक्यात बाकी तोच प्रश्न होता. का? का? का?
प्रतिक्रिया
लाल अलवणातली, भेसूर दिसणारी
हे वाक्य वाचून लेखकाची कीव वाटली. हे चित्र काही वर्षांपूर्वी घराघरात दिसायचे कारण लोकांचे आयुष्मान कमी होते. हे लेखकाला माहित नसावे.
प्रवाहाविरुद्ध जाणा-या लोकांना काय सोसावे लागते ते परीक्षणकर्त्यापर्यंत पोचलेले दिसत नाही.
परीक्षण सुमार वाटले...
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
<<लाल अलवणातली, भेसूर दिसणारी
<<लाल अलवणातली, भेसूर दिसणारी एखादी जुनी आत्या, मावशी वगैरे नसेल तर त्यांना सेन्सॉरचे सर्टिफिकेट मिळत नसावे.
हे वाक्य वाचून लेखकाची कीव वाटली. हे चित्र काही वर्षांपूर्वी घराघरात दिसायचे कारण लोकांचे आयुष्मान कमी होते. हे लेखकाला माहित नसावे.>>
ते चित्र घराघरात दिसायचे कारण, त्याकाळी सत्तर ऐंशी वर्षांच्या म्हातार्याचे ९-१० वर्षांच्या मुलीशी लग्न करून द्यायचे.मग त्या मुली विधवा होणार नाहीत तर काय?
म्हणजे?
लोकांचे आयुष्मान कमी!
बाप्रे!
लोक म्हंजे फकस्त पुरुष कावो? बाया काब्र नै लौकर मराय्च्या? सोनोग्रार्फी नव्ती म्हनून?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
सोनोग्राफीतून सुटल्या तरी
सोनोग्राफीतून सुटल्या तरी जरठ-कुमारी विवाहातून तेव्हा स्त्रियांची, नाही पोरींची, सुटका होत नसे. सध्याचं संमतीवय न गाठलेल्या मुलीही तेव्हा आलवणात दिसत असाव्यात. स्त्रिया युद्ध, मारामार्या यांच्यात मरत नसत. (४०-४५ हे जेव्हा समाजाचं सरासरी वय होतं त्या काळात) स्त्रिया नैसर्गिकरित्या अधिक टिकाव धरू शकत.
(प्रगत देशांमधे लोकसंख्येची विभागणी बघितल्यास, बालवयात मुलींची संख्या मुलांपेक्षा किंचित कमी आणि उतारवयात स्त्रियांची संख्या पुरूषांपेक्षा बर्यापैकी अधिक आहे, असं दिसतं.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
का, का, का
का, का, का? का हा लेख 'समीक्षा'मध्ये टाकलात? तिथून तो बाहेर काढा आधी. इतका सगळा मालमसाला असून तुम्ही पुरेसा 'आठ्याळ राखुंडे'पणा दाखवलेलाच नाही आणि तरी याला समीक्षा म्हणता? आस्वाद म्हणायचे!
तर ते असो... तुम्हाला दोन-अडीच तास गारवा मिळाला ना? मग झालं... तिकिटाचे पैसे म्हणजे त्याचंच भाडं असतं. त्या भाड्यात (रेंट या अर्थी) काय काय द्यावं लोकांनी?
असो... चित्रपट न पाहण्याचा निर्णय घेण्यासाठी पुरेसे मार्गदर्शन करणारं लेखन. आवडलं.
श्रामोँचा प्रतिसाद वाचून
श्रामोँचा प्रतिसाद वाचून आश्चर्य वाटलं
परीक्षण एकांगी झालं आहे
.
ओह!
ओह! 'पिंडाला कावळा शिवणे' अशा अर्थी 'काकस्पर्श' होय? हात्त्याच्या! आम्ही अगोदर 'काकस्पर्श'चा भलताच अर्थ घेतला... चालायचेच! असो.
+
आम्ही पण.
पण समीक्षा वाचण्यापूर्वीच त्याचा उलगडा झालेला होता म्हणून बरे.
'तो' काकस्पर्श आणि त्याने जुन्या काळातील स्त्रियांना भोगावे लागणारे त्रास हा ही चित्रपटाचा विषय होऊ शकेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
नेमका मुद्दा! म्हणूनच.
चूक आमचीच!
यावरून खरे तर लक्षात यायला हवे होते. की मुळात काकस्पर्श झालेला नाही तर फलशोभनाची भानगड उद्भवली कुठून, म्हणून. पण आमची नित्याची घाई - अशी नडते. चालायचेच.
(अधिक विचाराअंती) कोणास ठाऊक, कदाचित...
अधिक विचार केला असता असे वाटू लागते, की कोणास ठाऊक, हे कदाचित शक्य असेलही.
"त्या काळातले ते ब्राह्मण म्हणजे..."
चित्रपटाचा ट्रेलर
चित्रपटाचा ट्रेलर पाहिला...नथी, खोपे घातले नौवारी नेसली की झाला अभिनय त्याकाळातला..असं समजून घ्या..असं म्हणतायत असं वाटून गेलं.या अभिनेत्री कुठ्ल्याच प्रकारे त्या काळातल्या स्त्रीया आहेत असं जाणवलं नाही.
तुमचा अभिप्राय वाचून आश्चर्य वाट्लं नाही..
"कावळे पिंडाला शिवत नाहीत तेंव्हा कावळ्यांना बोलावण्यासाठी हरी मोठमोठ्याने 'का...का...का..' अशा हाका मारतो."
हे असं खरंच पूर्वी करत असत का?
हो
जौद्याना... थोडा सिंबॉलिझम समजून घ्यानाबे...
हो. अजूनही करतात. म्हणजे, शिवत नाही म्हणून तर सोडाच, शिवावा म्हणून अगोदरच करतात. पिंड ठेवायचा, आणि आजूबाजूला थोड्या वरच्या बाजूला साधारण ज्या परिसरात कावळे असणे अपेक्षित असते अशा जनरल दिशेने तोंड करून मोठ्याने 'काव! काव!' असे म्हणायचे. मोठे गमतीदार आणि मनोरंजक दृश्य असते - अनेकदा पाहिलेय, अगदी पॉइंट ब्लँक रेंजमधून.
बाकी चालू द्या.
'एक होता विदूषक' या चित्रपटात
'एक होता विदूषक' या चित्रपटात कावळ्यानी पिंड शिवण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या जमावाचं दृश्य पाहिलं आहे. पण त्यात 'काव काव' वगैरे करताना दाखवलेलं नाहिये.
विचित्र प्रथा वाटते ही.असे आवाज जोरजोरात काढायला लाग्ल्यास कावळे उलट जवळ यायला घाबरतील. नक्की कशानी काय होईल कावळ्यांना या बाबतीत..अनुभवी लोकच जाणोत.
माझ्या शंकेचं निरसन केल्याब्द्द्ल 'न'वी बाजू चे आभार.
खास ब्राह्मण प्रेक्षक?
चित्रपटाच्या नावापासूनच तो खास ब्राह्मण प्रेक्षकांना आकर्षित करुन घेण्यासाठी बनवलेला आहे हे स्पष्ट होते.
..........कसे काय बरे ? खरंच कळले नाही म्हणून विचारत आहे.
"आजच्या" काळात बनवलेला "त्या" काळातील चित्रपट...
चित्रपटाचा प्रोमो बघताना जाणवते की हा "आजच्या" काळात बनवलेला "त्या" काळातील चित्रपट आहे. आणि त्यामुळे तो बघावा असे वाटले नव्हतेच! ह्या परीक्षणामुळे न बघण्याच्या निर्णयाला बळकटी आली.
"जुनं ते सोनं" असलं तरीही हे रुढीपरंपरांचे "सोने" झळाळणार आहे थोडेच? तेही इतक्या भडकपणे दाखवताना?
जेव्हा मांजरेकर साहेब रेड्यो
जेव्हा मांजरेकर साहेब रेड्यो च्यानेलांवर 'हा माझ्या कारकिर्दितला सर्वात उत्तम चित्रपट आहे' वगैरे भाष्णे देत होते तेव्हाच न बघण्याचा निर्णय घेतला. हल्ली कोणी अभ्यासपूर्ण वगैरे विषेशणे स्वतःच देऊन प्रचार करू लागला की परिक्षणे वाचल्याशिवाय तिकीटघराची पायरी चढत नाही.
बाकी पिरियड फिल्म्स या केवळ तत्त्कालीन ब्राह्मणांवरच का बनतात या प्रश्न अनेकदा पडतो. इतर समाजात 'पिरिएड' फिल्ममधे दाखवता येतील इतके बदल अजूनही झालेले नाहीत का त्यावेळच्या त्यांच्या रहाणीमानाचे दस्ताऐवजीकरणच झालेले नाही?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
<<बाकी पिरियड फिल्म्स या केवळ
<<बाकी पिरियड फिल्म्स या केवळ तत्त्कालीन ब्राह्मणांवरच का बनतात या प्रश्न अनेकदा पडतो. इतर समाजात 'पिरिएड' फिल्ममधे दाखवता येतील इतके बदल अजूनही झालेले नाहीत का त्यावेळच्या त्यांच्या रहाणीमानाचे दस्ताऐवजीकरणच झालेले नाही? >>
ब्राह्मण आणि दलित समाजावरच जास्त लिहिले आणि दाखवले जाते. याला एक कारण हे हि असू शकतं कि त्या काळात, लिहिण्याची, शिकण्याची उपलब्धता फक्त ब्राह्मणांकडेच होती. बराच काळ ब्राह्मणांनी शिक्षण हा प्रकार फक्त त्यांच्यापुरताच मर्यादित ठेवला होता. मग ज्याच्या हातात लेखणी तो लिहिणार. नाही का? आणि दलितसमाजाने नंतर जी क्रांती केली त्यातून दलित साहित्य निर्माण झाले असावे.
अं...
'लिखिते', 'चिटणवीस' वगैरे लेखणीशी संबंधित (पारंपरिक?) हुद्दे, व्यवसाय अथवा जबाबदार्या या अशिक्षित अंगठाबहाद्दरांनी पार पाडल्या असाव्यात, हे पचावयास थोडे जड जाते.
पण तरीही, कोणास ठाऊक, कदाचित हे शक्य असेलही *. आणि आमची पचनशक्ती तशीही यथायथाच आहे.
चालू द्या.
* 'चलता है, हिन्दुस्तान है', अर्थात, 'भारतात काहीही होऊ शकते', या न्यायाने.
हा प्रतिसाद काही समजला नाही
हा प्रतिसाद काही समजला नाही ब्वॉ!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एक शक्यता...
... नजरेतून सुटली.
लिखिते, चिटणवीस वगैरे मंडळी ही आपापले व्यवसाय, हुद्दे, जबाबदार्या वगैरे पूर्वापार लेखणी न वापरता (उदा., टंकनयंत्र अथवा कळफलक वगैरे वापरून) पार पाडत असणे अशक्य नसावे.
आधी म्हटल्याप्रमाणे, आपल्या भारतात काहीही शक्य आहे. कदाचित एखाद्या लिखित्याने प्राचीन भारतात कळफलकाचा शोध लावला असेलही. किंवा गेलाबाजार कदाचित एखाद्या ऐतिहासिक चिटणवीसाने एखादे टंकनयंत्र विलायतेतून आयात केले असू शकेल. कोणी सांगावे?
'न'वी बाजू आणि मुक्तसुनीत
'न'वी बाजू आणि मुक्तसुनीत यांना एकत्रच प्रतिसादः
अडाणी बालिकेस माफ करा.
१. आडनावावरून बापजाद्यांचे व्यवसाय प्रत्येक वेळेस ओळखता येईलच असे नाही. -- बेसुमार शहरीकरण हो!
२. या चिटणवीस आणि लिखित्यांनी मुंज, घेरा इत्यादी गोष्टींचा त्याग करून मासे आणि कोंबड्यांना जवळचे मानले असण्याची शक्यता कितपत आहे? -- एक अजाण प्रश्न.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चिटणवीस
चिटणवीसादि आडनावं कायस्थांकडची मानली जातात.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
उंच माझा झोका
'उंच माझा झोका' नावाची शिरियल जशी फ्येमस व्हाया लागली तवाच म्या वळिखल्यालं की आता बाराबंदी, शेंडी, लाल आलवान छाप शिणुमे येनार म्हनून.
योक इचारू का? ह्ये 'फलशोधन' व्हतंका नाय शेवटी? म्हंजे लागतो का वो फळाचा शोध?
माझे मत
माफ करा - पण सिनेमा विषयी तुमचे मत चुकिचे आहे असे म्हणणार नाही ...(तुमचे विचार हे तुमचे आहेत)
पण इतरांनी या परीक्षणावरून मत बनवू नये, म्हणून हा आटापिटा....
सन्जोप राव :
१.
आपण चित्रपट हा केवळ पुर्वग्रहदुषित मनाने पहिला आहे असे वाटते
"चित्रपटाच्या नावापासूनच तो खास ब्राह्मण प्रेक्षकांना आकर्षित करुन घेण्यासाठी बनवलेला आहे हे स्पष्ट होते" - त्यामुळे आणखी काय बोलणार
(टीप - मी बामन नाही)
२. "( हे 'महेश वामन मांजरेकर' म्हणजे 'वास्तव'वादी महेश मांजरेकरच का? बहुदा असावेत.) "
हेच म्हनतो - पण चित्रपट इतका उत्कृष्ट वाटला म्हणून.....
३. "नुसताच मॉलमध्ये फिरला असतास, 'तेज' बघीतला असतास" - 'तेज' चि तुलना या वैचारिक सिनेमाशी कशी करता येईल ?
४. "हरीचा मुलगा पुढे पॅन्ट-शर्ट असा पोषाखात वावरतो, पण डोक्याला घेरा आणि शेंडी आहेच" - हे दृश्य आम्ही आजही पाहतो..(फक्त घेरा नसतो..इतकेच)
इतर :
५. पिंड दान करताना 'का का ' असे आवाज काढून कावळ्यांना बोलाविणे हा उद्देश असतो... आणि तो आजही करतात ...
आणि कावळे लवकर शिवले नाहीत तर... मृतात्म्याची इच्छा पूर्ण करतो म्हणून मनातल्या मनात पिंडाजवळ बोलले जाते.. आणि जोपर्यंत कावळा शिवत नाही तोपर्यंत एकेक जवळचा नातलग येऊन इच्छा पूर्ण कार्य्नाबद्दल बोलत राहतो...(इच्छा ओळखण्याचा प्रयत्न केला जातो ...हे सांगणे न लागे)
हा चित्रपट निश्चितच राष्ट्रीय पुरस्कार जिंकायची शक्यता आहे .. येवधेच म्हणतो..........
आता सांगा, भडास काढणं एवढंही
आता सांगा, भडास काढणं एवढंही वाईट नसतं की नाही!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जबरी
कोणीही एक शांतारामी ढोबळ सांकेतिकी दिग्दर्शक घ्या, थोडे फडकाळलेले-खांडेकरी संवाद लिहा. पाचदहा बाराबंद्या, साताठ धोतरे, नऊवारी लुगडी, पगड्या आणि नथी घ्या, उमेदवारी करणारे काही कलाकार घ्या आणि सुरु करा शूटिंग! झाला 'काकस्पर्श'! हाय काय आन नाय काय..
असल्या दाणादाण पडापडीत सचिन खेडेकर आणि केतकी माटेगावकर हे (आपले मराठी वगैरे..) कलाकार ध्यानात राहतात. सचिन खेडेकरचे काम सरासरीत चांगलेच असते. 'काकस्पर्श' मध्ये त्याने आपले टपोरे, भावपूर्ण डोळे, आपला आवाज आणि आपली शरीरयष्टी यांचा उत्तम वापर करुन घेतलेला आहे. केतकी माटेगावकरचा 'स्क्रीन प्रेझेन्स' ताजा, गोड आहे. 'शाळा' मध्ये ही ती इतक्याच प्रसन्नपणे वावरली होती. बाकी कलाकार या चित्रपटात आहेत इतकेच. पण ते तरी काय करणार बिचारे!
आपल्या भावाचे पिंडदान करणारा हरी या दृष्यापासून 'काकस्पर्श' हा चित्रपट सुरु होतो. पुढे याच दृष्यात कावळे पिंडाला शिवत नाहीत तेंव्हा कावळ्यांना बोलावण्यासाठी हरी मोठमोठ्याने 'का...का...का..' अशा हाका मारतो. साक्षात विधात्याला विचारलेला हा प्रश्नच जणू! चित्रपट संपला आणि मी बाहेर आलो. विलक्षण भूक लागली होती. पोटात कावळे ओरडत होते असे म्हटले तरी चालेल. डोक्यात बाकी तोच प्रश्न होता. का? का? का?
एसीमुळे सुद्धा डोके शांत झाले नाही असे इतका प्रभावी दिसतो हा चित्रपट!
उषा दातार यांची ही कथा स्त्री वर्गात विशेष प्रिय होती असे म्हणतात.
असो.
एका शब्दपेक्षा दोन बरे.
काही थोडे
खरे तर काही लिहून झाल्यावर लेखकाने त्याचे स्पष्टीकरण वगैरे देत बसू नये या मताचा मी आहे. कारण मग त्याला काही अंत रहात नाही. पण काही प्रतिक्रिया वाचून थोडेसे लिहिणे आवश्यक आहे असे वाटले.
लाल अलवणातील भेसूर दिसणारी बाई, पिंडदान वगैरे वगैरे: अशा बायका, त्यांची आयुष्यभर झालेली फरपट, नवरा म्हणजे काय हे धड कळायच्या आधीच वैधव्य आलेल्या बायकांना आयुष्यभर शिळेपाके खात, माळा जपत, अंधार्या खोलीमध्ये कुजत जगावे लागणारे जीवन, त्यांची शारीरिक उपासमार आणि त्याचा समाजातल्या पुरुषवर्गाने घेतलेला फायदा - हे सगळे मी फार जवळून पाहिलेले आहे -कदाचित वाचक वर्गापैकी बहुतेकांपेक्षा अधिकच जवळून. ( अशी विधवा केशवपन केलेली बाई - तिला त्या काळात 'रांडमुंड' या भयानक शब्दाने संबोधले जात असे - वाचकांपैकी किती लोकांच्या घरी होती? माझ्या घरी होती!) लहान मुले अशा बायकांना प्रचंड घाबरत असत. अशा - वात्सल्य आणि ममत्व या सस्तनांच्या मूलभूत अधिकारांना पारख्या झालेल्या बायका इतर बायकांच्या लहान मुलांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवून आपली तहान भागवत असत. इतर जोडप्यांचे- नवरा-बायकांचे-संबंध बघून आपली अतृप्त वासना शमवण्याचा प्रयत्न करत असत. त्यांना कुठे जायची मुभा नसे, काही चवीचे खायची मुभा नसे, मनाजोगते काही ल्यायची परवानगी नसे... काही नाही. त्या असे खुरटलेले, चिघळलेले आयुष्य जगत आणि एक दिवस मरुन जात. हे सगळे एखाद्या जखमेच्या व्रणासारखे माझ्या मनात ताजे, ठसठसते आहे. त्यामुळे माझी कीव करणार्यांनी ती जरुर करावी. पण हे सगळे बघीतल्यामुळेच असा चित्रपट म्हणजे त्यात एक विधवा सोवळी बाई हवीच हे मला ढोबळ, शांतारामी वाटले. अशा बायका समाजात असणे हा त्या समाजाचा दोष होता किंवा त्या बायकांचा दोष होता असे मला म्हणायचे आहे हा अर्थ काढणार्यांनी कृपया त्यांना तसे का वाटले हे स्पष्ट करावे (किंवा खरे तर कशाला तसदी घेता?)
पिंडदानाचेही तसेच. घाटावरचे पिंडदान, अतृप्त इच्छा, दर्भाचा कावळा हा सगळा त्या वाहून गेलेल्या काळाचा एक अविभाज्य भाग होता; काही प्रमाणात आजही आहे. 'का..का..का..' हा हरीचा आक्रोश हा 'हे असे का? आम्हाला ही शिक्षा का?' असा त्या जगन्नियंत्याला वगैरे केलेला सवाल आहे असे मला वाटले आणि म्हणून 'का..का..का आम्हाला ही शिक्षा का?' असा मला त्या मांजरेकराला सवाल करावासा वाटला असे हे थोडे 'टंग-इन-चीक' स्वरुपाचे लिखाण आहे. पण जाऊ द्या. लेखनाचे स्पष्टीकरण द्यावे लागणे म्हणजे लेखन अयशस्वी झाले आहे हे मान्य करण्यासारखेच आहे. त्यातल्या त्यात लेखन अयशस्वी झाले आहे हे मान्य करणे अधिक सोपे!
ढोबळ, शांतारामी दिग्दर्शन आणि फडकाळलेले, खांडेकरी लेखनः घरात अत्यवस्थ असलेल्या माणसासाठी देवघरात आराधना करत बसलेला कोणीतरी, आणि अचानक वार्याची झुळूक येऊन समईतली ज्योत विझणे - असे दिग्दर्शन पन्नाशी-साठीच्या दशकात दिसत असे. ते या चित्रपटातही आहे! 'का..का..का' मधली सांकेतिकता या विषयावर मी आधी लिहिलेच आहे. आजकाल हे सगळे नाटकी, उबवलेले वाटते. संवादांचेही तसेच. त्यामुळे टीका आहे ती अस्सल काय आहे हे ठाऊक नाही म्हणून नव्हे, तर कदाचित ठाऊक आहे म्हणूनच.
कालविसंगती: "हरीचा मुलगा पुढे पॅन्ट-शर्ट असा पोषाखात वावरतो, पण डोक्याला घेरा आणि शेंडी आहेच" - हे दृश्य आम्ही आजही पाहतो..(फक्त घेरा नसतो..इतकेच). हे वाक्य मला कळाले नाही हे प्रामाणिकपणे लिहितो. मी स्वतः पॅन्ट-शर्ट असा पोषाख करतो पण घेरा ठेवत नाही. हे सुसंगत आहे असे मला वाटते. या चित्रपटातले 'हरीचा लाल (मुलगा)' हे पात्र असे करते म्हणून ते विसंगत आहे. नाही का?
हा चित्रपट निश्चितच राष्ट्रीय पुरस्कार जिंकायची शक्यता आहे .. येवधेच म्हणतो..........: बास,बास... हे इतकेच मला म्हणायचे होते. ते अगदी मोलक्या आणि चपखल शब्दांत सांगितले आहे. 'काकस्पर्श' ला राष्ट्रीय पुरस्कार, मुलायमसिंग राष्ट्रपती, (मानकर पुण्याचे उपमहापौर झालेले आहेतच!), कलमाडी बीसीसीआयचे अध्यक्ष... बास,बास अगदी हेच!
शेवटी सुमार पूर्वगृहदूषित परीक्षणः सुमार या शब्दाबाबत बिलकूल चर्चा नाही. हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आहे. तेंव्हा सुमार हे अगदी सपशेल मान्य. पूर्वगृह म्हणाल तर सगळ्यांच्याच मनात असे बरेवाईट गंड असतात. एखाद्या धार्मिक कार्याच्या वेळी जानव्यातली लोखंडी किल्ली काढून ठेवावी तसे (डिस्केमर!) हे गंड बाजूला काढून लिहिणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही. तसे करुही नये. या मंचावर लिहिणे हा काही व्यावसायिक लिखाणाचा भाग नाही. त्यामुळे इथे किंवा अशा माध्यमांत लिहिताना एखादी भूमिका घेऊन, पद्मासन घालून लिहू नये असे मला वाटते. हा पूर्वगृह आहे का? वेल...
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
छ्या...
छ्या... का, का, का?
लेखन फसलं हे स्वीकारून हा माणूस शांत का बसला नाही? त्याचीही कबुली द्यायची आणि ती कबुली अशी सिद्ध करायची गरज होती का? (इथं आणखी लिहायचं होतं, पण हा लेख न समजण्यासारखंच न कळल्यानं ते जातिवाचक ठरलं असतं, म्हणून गप्प बसतो).
आणखी एक. लाल अलवण, घेरा वगैरे तुम्ही अनुभवलं आहे. पन्नाशीच्या दशकातली चित्रपटातील सांकेतिकता तुम्हाला माहिती आहे. हे सारे असे आज तुम्हाला लिहावे लागते याचा अर्थ तुमचे 'वय झाले आहे' असा निघतो. का, का, का या कबुल्या?
काहींचे अकालीच वय होते...
'क्षयज्ञ यांचे अकाली निधन' च्या चालीवर असे म्हणतो की जेहत्ते कालाचे ठायी जे काही चालले आहे ते पाहून काही लोकांचे अकालीच वय होते. त्या प्रकारच्या लोकांत अस्मादिक, प्रस्तुत लेखक (आणि दस्तुरखुद्द प्रतिसाददाते मोडकही! ) मोडतात असे वाटते. असो...
हाहाहा
हाहाहाहा... आम्ही ओळखतो ते सन्जोप राव हे नव्हेत असंही लिहिणार होतो, विसुनाना!
(स्वगत: खा आता आणखी एका म्हाताऱ्याचे फटके. सालं, ही सवय जायचीच नाही.)
हम्म
कोण म्हटले रे श्रामो अगदी 'अग्गदी तिक्कडची काडी इक्कडे करत नाहीत" म्हणून?
अवांतर: म्हणजे म्हातार्यांचे आधीचे फटके तुम्हाला येऊन लागले म्हणायचे. अरेरे.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
सन्जोप राव यांना प्रतिसाद
स्पष्टीकरण आवडले. आपल्या लिखाणामुळे काही प्रवाद उठत असतील तर त्यांना प्रतिसाद देण्याची प्रवृत्ती ही चांगली गोष्ट आहे.
आपल्या लहानपणी तुम्ही पाहिलेल्या आलवणातल्या विधवांबद्दलं तुमचं वर्णन हृदयस्पर्शी आहे , पण....
>>>असा चित्रपट म्हणजे त्यात एक विधवा सोवळी बाई हवीच हे मला ढोबळ, शांतारामी वाटले. <<<
जर का ते चित्रण त्या काळाचं असेल तर त्यामधे अशी व्यक्तीरेखा असणं हे "ढोबळ" का वाटलं ?
अर्थात, चित्रपटातले घटना, प्रसंग, व्यक्तींच्या वेषभूषा, बोलण्याचा ढंग आणि मुख्य म्हणजे व्यक्तिरेंखांच्या कंगोर्यांचं , मूल्यव्यवस्थेचं चित्रण जर का कालसुसंगत नसेल किंवा त्यामधे कलात्मक संगती नसेल तर एकंदर सगळा डोलारा कोसळतो हे मान्य आहे.
लिखाणातली व्यंगात्म शैली आवडली. अनेकांना ती नापसंत आहे असं दिसतं आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
लेखापेक्षा हा प्रतिसाद
लेखापेक्षा हा प्रतिसाद आवडला.
फक्त 'पूर्वगृह' हा शब्द 'पूर्वग्रह' असा लिहितात असे माझ्या अल्पमतीस वाटते!!
पूर्वग्रह
फक्त 'पूर्वगृह' हा शब्द 'पूर्वग्रह' असा लिहितात असे माझ्या अल्पमतीस वाटते!!
अगदी बरोबर आणि क्षमस्व.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
भूमिका
या मंचावर लिहिणे हा काही व्यावसायिक लिखाणाचा भाग नाही. त्यामुळे इथे किंवा अशा माध्यमांत लिहिताना एखादी भूमिका घेऊन, पद्मासन घालून लिहू नये असे मला वाटते.
.........अगदी योग्य. पण अगदी हेच टाळून तुमचे लिखाण येथे आले आहे. मनमोकळेपणाने (पूर्वग्रहांसकट) एखाद्या आवडलेल्या / न आवडलेल्या गोष्टीविषयी बोलणे वेगळे आणि एक विशिष्ट तोण्डावळा घेऊन (जो शान्तारामी दिग्दर्शनाचा उबग आल्याने / खर्या जीवनात बरेच काही धगधगते अनुभवल्याने तयार झालेला आहे) 'समीक्षा' या सदरात ते लि़खाण टाकणे वेगळे. जर तुम्हाला केवळ लिखाण करून थाम्बायचे होते तर प्रतिसाद वाचायची तसदी का बोवा ? एवढेच नव्हे तर आन्तरजालावर टाकायची तरी तसदी का ? आपल्या खरडवहीत लिहून थाम्बायचे होते. तुमचे लिखाण व्यावसायिक नाही ना मग चार लो़कांमध्ये आपले मत व्यक्त करायचे तर प्रतिसादादेखील तितक्याच धडाडीने घ्या की ! हीच तर उघड लेखनाची निखळ गम्मत नव्हे काय ? शेवटी कुठल्याही कलेबाबत केलेली चर्चा ही त्या कलेबाबत असावी हा मुद्दा आहे. इथे लिखाण किती मोजून मापून झाले आहे किंवा वादात कोण जिङ्कला/हरला ही चढाओढ नसून कधीतरी ही सगळी चर्चा आपल्याला त्या कलाकृतीचा आस्वाद घेण्याकडे नेईल ही अपेक्षा असावी. ती कधी पूर्ण होईल, कधी पूर्ण होणार नाही. पण तो उद्देश नसेल तर या सदरात आपले लिखाण करण्याचे कारण समजले नाही.
प्रतिसाद
अमुक यांचा प्रतिसाद आवडला.
तुम्ही तुमचं कुठलंही लिखाण जाहीर व्यासपीठावर मांडलंत/प्रकाशित केलंत की त्या कृतीची चिकित्सा लोक करणार हे उघडच आहे. जोवर प्रतिक्रियांची दिशा वैयक्तिक स्वरूपाची नाही तोवर लिखाणाचे सर्व पैलूंची - मग यात लिखाणामागच्या हेतूंसारख्या गोष्टींचीही - चिकित्सा ही आलीच.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
प्रतिक्रिया
हे परीक्षण वाचले तेंव्हा चित्रपट बघितला नव्हता. परवा तो टी.व्ही. वर बघितला. संजोप रावांशी सहमत आहे. सगळेच अत्यंत भडक व बटबटीत वाटत होते. 'उंच माझा झोका' मधेही हेच जाणवते.
त्याकाळी अशा वाईट प्रथा सर्वच समाजात होत्या. तरी बाकीच्यांवर काहीही भाष्य न करता, हे ब्राह्मणी प्रकार अधोरेखित करुन, फक्त त्यांनाच लोकांसमोर ठेवले जाते असे वाटले.
सहमत.
१००% सहमत. तुम्ही अन संजोपराव. दोघांशी.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
हे वाचायचंच
हे वाचायचंच राहिलं होतं
मागच्या रविवारी अर्धा चित्रपट पहिला. खरंतर, वैतागल्यामुळे पूर्ण बघू शकलो नाही. सन्जोपरावांनी मात्र समीक्षेने चांगलीच भादारलेय.
वाहतूक दिव्यावरचे भिकारी
पर्यटनस्थळी वा उच्चभ्रू वस्तीत कडेवर पोरं घेउन भीक मागणारे जेव्हा लाल दिव्यासाठी थांबलेल्या गाडीत कुण्या बड्या आसामीला वा परदेशी माणसांना पाहतात तेव्हा कडेवरच्या पोराला कडकडीत चिमटा काढतात. पोर कळवळुन जेवढे अधिक रडेल तेवढे भीक बरी मिळायची शक्यता अधिक!
सध्याच्या मोसमातला जुनी कुटुंब पद्धती, वाडे, गोठ - पाटल्या, अंबाडे - खोपे, धोतरे - बाराबंद्या वगैरेंचा दूरदर्शनवरचा वाढता व्यापार पाहता निर्माते-दिग्दर्शक मंडळींनी लोकांना रडवुन कमवायला हा विषय निवडला असावा. अन्यथा जी दुष्ट प्रथा आणि नष्टचर्य ५०-६० वर्शांपूर्वी संपले आणि ज्याचे कुणीही समर्थन करीत नाही
वा आजच्या घटकेला ज्याचा काहीही संदर्भ नाही असा विषय चित्रपटासाठी निवडण्याचे कारण नव्हते. या चित्रपटाचा रुदनांक उत्तम हे निश्चितच कारण आमची आणि हयात असलेली आमच्या आधीची पिढी यांनी आपल्या कुटुंबात अशा स्त्रिया, त्यांनी खाल्लेल्या कुटुंबासाठीच्या खस्ता आणि त्यांचे गोठलेले आयुष्य प्रत्यक्ष पाहिलेले व अनुभवलेले आहे. तेव्हा चित्रपट चालायला हरकत नाही असा कयास करुन कमाईच्या हेतूने काढलेला हा एक व्यावसायिक चित्रपट वाटतो.
सुरुवातीला खूप उच्च वाटलेली 'उंच माझा झोका' आता व्यावसायिक वळणाला लागली आहे.
कारल्याचा वेल लाव ग सुने लाव ग सुने, मग जा आपुल्या माहेरा
कारली काही लागणार नाहीत, सुनबाई माहेरी जाणार नाहीत
रमा मोठी होणार नाही
कशी होणार? एकदा का ते गोड बालपण, सुंदर वातावरण, बालवधूच्या निष्पाप मुद्रा, तिला होणारा घरातला जांच, विरोध हे सगळे संपले तर प्रत्यक्षात मोठी झालेली आणि ज्ञानार्जन करणारी रमाबाई कुणाला हवी आहे? मग टी आर पी कोसळेल ना! त्यापेक्षा ते बालपण, मंगळागौरी, मास्तरणींची फजिती, पाहुणीने घरात येउन केलेली दादागिरी, लुच्च्या नातेवाइकांनी सज्जन नातेवाइकांना लुबाडणे, सण वार, श्राद्ध....चालु द्या.
चित्रपट आणि समीक्षा, दोन्ही आवडले नाही
<< त्याकाळी अशा वाईट प्रथा सर्वच समाजात होत्या. तरी बाकीच्यांवर काहीही भाष्य न करता, हे ब्राह्मणी प्रकार अधोरेखित करुन, फक्त त्यांनाच लोकांसमोर ठेवले जाते असे वाटले >>
अनुमोदन.
ब्राह्मणी प्रकार अधोरेखित?
टीआरपी खेचण्यात जर यश मिळत असेल (जे 'उंच माझा झोका' किंवा 'काकस्पर्श'ला मिळालेले आहे असे दिसते) तर ते (पक्षी : ब्राह्मणी प्रथा अधोरेखित करुन त्यांना लोकांसमोर ठेवणे) सध्या चलनी असलेले एक व्यावसायिक गणित म्हणता येईल, नाही का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||