संवाद
माणसं एकमेकांशी कशासाठी बोलतात?
मन मोकळं करण्यासाठी?
वेळ घालवण्यासाठी?
ज्ञान, माहिती, मनोरंजनासाठी?
की सवय म्हणून?
अनेकदा मला हे प्रश्न पडतात, विशेषत: मी स्वत: आवश्यकतेपेक्षा जास्त बोलत असते तेंव्हा तर मला हमखास हे प्रश्न पडतात.
आणि गंमत म्हणजे दरवेळी या प्रश्नांची वेगळीच उत्तरे मला मिळतात.
व्यक्तीनुसार, परिस्थितीनुसार आणि खरे सांगायचे तर माझ्या मनस्थितीनुसार या प्रश्नांची उत्तरे बदलतात असे मला आढळले.
मजा वाटली मला. पण मनातला गोंधळ अधिकच वाढला.
मी मूळची गणिताची विद्यार्थिनी असल्याने (आता आलिकडे मला गणित काहीच येत नाही हा भाग वेगळा!) एखादा प्रश्न सोडवण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग असतात हे मला माहिती आहे - माझी तशी 'श्रद्धा'च आहे म्हणा ना!
पर्याय म्हणून मी या प्रश्नांकडे दुस-या बाजूने पहायचे ठरवले. मी विचार करायला लागले.
माणसं का ऐकतात?
प्रश्न बदलला तरी उत्तरं मात्र तीच येऊ लागली. म्हणजे:
माणसं वेळ घालवण्यासाठी ऐकतात.
माणसं ज्ञान, माहिती, मनोरंजनासाठी ऐकतात.
माणसं सवय म्हणून ऐकतात.
विचार करताना दोन गोष्टी नव्याने लक्षात आल्या. म्हणजे आहेत तशा त्या जुन्याच, अनेकदा कानांवर पडलेल्या - पण साक्षात्काराचा ठसा काही वेगळाच असतो.
एक म्हणजे - माणसं नाईलाजाने, पर्यायच नसतो म्हणून ऐकतात.
त्याहून अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे खरं तर माणसं ऐकतच नसतात! आणि बोलणा-याला (बोलणारीला) तरी कोठे फिकीर असते समोरचा ऐकतोय (ऐकतेय) की नाही ते! आपण आपले आपल्याच बोलण्यावर (- लिहिण्यावरही) खूष असतो!
हे असं चित्र समोर आल्यावर काही काळ माझी अवस्था फार वाईट झाली. म्हणजे मला कोणाशी काही बोलावसं वाटेना, कोणाचं काही ऐकावं वाटेना. संवादाची प्रक्रिया म्हणजे मला एक शुद्ध फसवणूक वाटायला लागली. बोलून मन मोकळं करण्याजोगं आपण काही अनुभवलं तरी आहे का, याच आश्चर्य वाटायला लागलं!
हे सगळे विचार मनात येत होते तेव्हा माझा मुक्काम पॉंडिचेरीत होता. पॉल ब्रन्टनच्या पुस्तकात रमण महर्षींच्या मौनाबद्दल वाचलं होतं. पॉंडिचेरीपासून रमणाश्रम काही तासांच्या अंतरावर! मग मी तिकडे गेले.
रमणाश्रम शांत होता. पण ती गंभीर स्मशानशांतता नव्हती. रमण महर्षींच्या प्रतिमेसमोर बसल्यावर वाटलं: या माणसाला समजेल आपण काय म्हणतो आहोत ते. (मेलेल्या माणसाला कसं समजेल? - असा एरवी सहज सुचणारा विचार तेथे माझ्या मनात आला नाही हेही नवलच!) - जणू ते आधीच समजल्यागत त्यांच ते गूढ स्मितहास्य!
पण मला काही बोलावसं वाटेना. दुस-यांशी बोलायचं नसतं तेंव्हा अनेकदा मला स्वत:शी बोलायला आवडतं. पण तेथे स्वत:शीही बोलावसं वाटेना. ऐकायची तयारी होती माझी - पण माझ्याशी रमण महर्षी कसे बोलणार? तेथे ते नव्हते, त्यांचा फक्त फोटो होता. तो फोटो जिवंत वाटत होता, पण अखेर तो फोटोच होता. मी नुसती बसून राहिले शांतपणे. काहीच मनात नव्हतं. आपल्या मनात काही नाही याची जाणीवही नव्हती.
परतीच्या प्रवासात लक्षात आलं, की आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे आपल्यालाच नीट माहिती नसतं. चाचपडत असतो आपण, म्हणून भारंभार बोलत राहतो. त्यातून कधीतरी नेमकेपणाने अभिव्यक्त होऊ – या एकमेव आशेवर आपण बोलत राहतो (लिहित राहतो!) आपण जसे आपल्या गोंधळात असतो, तसेच समोरचा(ची)ही बहुतेक तशाच गोंधळात असतो - असते. गोंधळलेल्यांचे ऐकण्यात फायदा नसतो हे अनुभवाने आपण सगळे जाणतो - म्हणून ’न ऐकण्याची’ प्रवृत्ती एका अर्थी स्वाभाविकच!
’काय बोलायचे’ हे ज्यांना समजले, ती रमण महर्षींसारखी ऋषितुल्य माणसे त्यांच्या जिवंतपणीही फार काही बोलली नाहीत .. आणि त्यांचे ’ऐकायला’ जगभरातून माणसं धडपडत तिथवर येतात – रमणांच्या मृत्युनंतरही येतात.
संवादाचे सार अखेर कळण्यात आहे - बोलणे अथवा लिहिणे ही केवळ साधनेच आहेत.
या साधनांविनाही संवाद होतो यातच त्याचे सारे रहस्य दडलेले आहे काय?
प्रतिक्रिया
सत्य, वास्तवदर्शी अन उद्बोधक लेखन .
सत्य, वास्तवदर्शी अन उद्बोधक लेखन .
सविता, खरोखर, बोलण्याचा उद्देश ‘संवाद’ हा आहे हे समजून बोलणारे फार कमी. कमीतकमी शब्दांत भाव उतरवण्याचा प्रयत्न फारसा कुणी करत नाही. शब्दांचे अवडंबर माजवणारे अन संवादाचा वाद बनवणारेच फार .
खरं तर शब्दांमधून व्यक्त होतात त्यापेक्षा जास्त भाव मौनातून किंवा एखाद्या साध्याशा कृतीतून व्यक्त होऊ शकतात. रमण महर्षींचे महात्म्य शब्दांविना संवादामध्येच आहे. ध्यानाद्वारे विचार प्रसृत करण्यासाठी त्यांची ख्याती आहे. त्यांचे अभिव्यक्तीचे माध्यम ‘शब्द’ नसून ‘मौन’ होते. आणि ते किती प्रभावी होते हे त्यांच्या देश - परदेशातील अनुयायांच्या संख्येवरूनच दिसून येते.
स्नेहांकिता, आभार. बोलण्याचा
स्नेहांकिता, आभार. बोलण्याचा उद्देश 'संवाद' हे मान्य; पण 'संवादाचा' उद्देश काय असतो असा एक प्रश्न राहतोच बाकी.
***
अब्द शब्द
संवादाचा मूळ उद्देश अर्थातच
संवादाचा मूळ उद्देश अर्थातच एकाच्या मनातला भाव दुसऱ्याकडे पारित करणे हाच असला पाहिजे, नाही का ? संवाद पशु पक्ष्यांमधेही असतो आणि माणसांमधेही . पण माणसे संवादाचा उपयोग मूळ उद्देशपेक्षा वेगळ्याच कारणांसाठी करतात. वादापासून ते विनोदापर्यंत. ज्यातून काही बोध घ्यावा असे बोलणे फारच थोडे. म्हणूनच ऐकणारे नाईलाजाने ऐकतात.
बाऊंसर
बापरे.. यावेळी बरेच बाऊंसर गेले!.. पुन्हा आरामात वाचावे लागणार.. वाचेनच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋषिकेश, बाऊंसर? म्हणजे आता
ऋषिकेश, बाऊंसर? म्हणजे आता पुढे 'फ्री हिट' वाटावं असं काहीतरी लिहावं लागणार का मला ? (अर्थातच शिक्षा म्हणून!)
***
अब्द शब्द
नाही नाही.. प्ल्रॉब्लेम
नाही नाही.. प्ल्रॉब्लेम लेखनात नसावा.. माझ्या आकलनातच असणार. आहे.
आता पुन्हा वाचलं.. बरंचसं पोचलं..थोडा संवाद झाला
बाकी संवाद होण्यासाठी बोलणार्याइतकीच ऐकणार्याच्या आकलनशक्तीची पातळीदेखील महत्त्वाची असते याचा बोध घेतला
'गाढवापुढे वाचली गीता..' म्हणताना दोष गाढवाचा की त्याच्यासमोर गीता वाचणार्याचा ही चर्चा मात्र टाळणेच योग्य
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋषिकेश, आकलनशक्तीची पातळी
ऋषिकेश, आकलनशक्तीची पातळी वगैरे नाही .. अनेकदा तितका शांतपणा नसेल तर अडचण येते वाचनात. निदान थोडा का होईना संवाद झाला ना, मग चांगली सुरुवात आहे म्हणायचं!
***
अब्द शब्द
माणसं नाईलाजाने, पर्यायच नसतो
असं असेल तेव्हा तो संवाद नसतोच, नाही का ?
अशी स्थिती अनेक वेळा निर्माण होते खरी पण त्यावर न बोलणे अथवा न ऐकणे हा उपाय होऊ शकत नाही. न बोलण्याने अनेक गैरसमज निर्माण होतात आणि न ऐकण्यामुळे ते आणखी वाढतात असे मला वाटते.
हे १००% सत्य आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
मनीषा, आभार. << असं असेल
मनीषा, आभार. << असं असेल तेव्हा तो संवाद नसतोच, नाही का ?>> हे मान्य; पण अनेकदा संवादाकडे जाणीवपूर्वक न पाहिल्याने हे आपल्याला कळतच नाही हा दुर्दैवाचा भाग आहे. << न बोलणे अथवा न ऐकणे हा उपाय होऊ शकत नाही >> या मताशीही सहमत - पण त्याच त्याच पद्धतीने संवाद करत राहण्यापेक्षा (More is Better ही एक मनोवृत्ती झाली आहे आपली) - आपल्या संवादाच्या पद्धतीत बदल घडवून आणायला हवेत याचे भान अनेकदा मलाही नसते.
***
अब्द शब्द
बरंच काही बोलल्यानंतरही काहीच
बरंच काही बोलल्यानंतरही काहीच सांगितलं नाही याची दुसरी बाजू, बरंच काही ऐकलं पण समजलंच नाही असा विचार केलाच नव्हता. दुसरीही अवस्था बर्याचदा, विशेषतः वर्गात, झालेली आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अदिती, 'वर्गातली अवस्था' ..
अदिती, 'वर्गातली अवस्था' .. एकदम वाईट आठवण! आजही कित्येक मीटिंग्जमध्ये माझी अशीच अवस्था असते 'काय चर्चा केली आपण? काय ठरलं आपलं?' या प्रश्नांची काहीही उत्तरं नसतात अनेकदा!
***
अब्द शब्द
वर्गातली अवस्था
ती दुसरी वर्गातली अवस्था तर कायमच, अगदी शाळेपासून कॉलेजापर्यंत तशीच राहिली होती. बर्याच वेळा मिटिंगमधेसुद्धा तीच अवस्था असते. अश्या वेळी माना डोलावून शब्दांशिवायही चांगला संवाद होतो
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
थोडे विस्कळीत विचार
हे माझ्या मनातले विस्कळीत विचार.
माणसे संवाद का करतात?
तर, आपल्या भावना दुसर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी.
भावना का पोहोचवाव्याश्या वाटतात?
तर, त्या व्यक्तीशी आपले नाते(आई-बाप, मुले, नवरा-बायको, शेजारी, मित्र किंवा परिचीत) असते म्हणून. नाते जितके जवळचे, तितका शब्देवीण संवादूही होत असतो.
संवाद असफल का होतो?
तर, हे नाते एकतर्फी वा बदललेले असावे म्हणून.
परत संवाद कसा साधता येईल?
प्रत्येकाची संवाद समजून घेण्याची पद्धत वेगळी असते अथवा कालमानाने बदलते. नातेसंबंधही बदलतात.
त्याचा विचार करून, वेगळ्या पद्धतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करणे.
अनेकदा संवाद साधण्याचे प्रयत्न असफल झाले, तर काय करावे?
१. संवाद एकतर्फी आहे असे समजून, तो थांबवावा.
२. नाईलाजाने रेटत रहावा.
हे दोन्ही पर्याय दुर्दैवी आहेत. मग काय करावे?
सानिया, मला विस्कळीत विचार
सानिया, मला विस्कळीत विचार आवडतात, त्यामुळे तुमचेही विचार आवडले.
संवाद असफल होत असेल तर काय करायचे याबाबतचे दोन्ही पर्याय दुर्दैवी आहेत हे मान्य. पण 'संवादाची पद्धत बदलायची' असा एक तिसरा पर्याय असू शकतो का? जो तुम्ही आधी मांडला आहेच. तोही फसू शकतो अर्थातच ...पण निदान 'प्रयत्न केला' इतके तरी समाधान लाभते.
किंवा संवाद साधण्यासाठी नवी माणसे शोधावीत असाही एक पर्याय असतोच कायम.
***
अब्द शब्द
निर्हेतुकतेचे फायदे
या लिखाणात बोलण्या-ऐकण्याकडे फार उपयुक्ततेच्या अंगानं पाहिलेलं आहे की काय अशी शंका येते आहे. माझा बऱ्याचदा असा अनुभव आहे की समोरची व्यक्ती ही एक माणूस आहे हे एवढंच कारण तिचं बोलणं ऐकण्यासाठी जेव्हा पुरेसं असतं (म्हणजे कोणत्याही अंतस्थ किंवा उघड हेतूशिवाय) तेव्हा त्या ऐकण्याचा खरा फायदा होतो (म्हणजे व्यापक अर्थानं; जडवादी अर्थानं नाही). 'गोंधळलेल्यांचे ऐकण्यात फायदा नसतो' याच्याशीही असहमत. कधीकधी त्यातूनच गोंधळ का झाला असावा आणि पर्यायानं तो कसा टाळता येईल हेही समजतं. (बाकी गोंधळलेल्यांचं ऐकायचं नाही असं ठरवलं तर मराठी संकेतस्थळावर येणंच बंद करावं लागेल )
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चिंतातुर जंतू,<< या लिखाणात
चिंतातुर जंतू,
<< या लिखाणात बोलण्या-ऐकण्याकडे फार उपयुक्ततेच्या अंगानं पाहिलेलं आहे की काय अशी शंका येते आहे >>
हा एक नवाच दृष्टिकोन. मी त्यावर विचार केला नव्हता - पण तीही एक शक्यता आहेच.
अगदी पूर्ण निरुद्देश अशी आपली कृती असते का - याबद्दल माझ्या मनात शंका आहे.
'गोंधळलेल्यांच ऐकण्यात फायदा असतो' - कारण त्यांचा गोंधळ का झाला असावा आणि पर्यायाने तो टाळावा कसा हे समजतं - ही भूमिका परत एकदा उपयुक्ततावादी आहे की माणूस म्हणून सहसंवेदनेची आहे की दोन्हींच मिश्रण आहे - हेही तपासून पहावं लागेल.
बाकी 'मराठी संस्थळावर येणंच बंद करावं लागेल' याही मुद्याशी पूर्ण सहमत.
***
अब्द शब्द
चिंतन मनापासुन आवडले.
प्रामुख्याने आपापला एकटेपणा सुसह्य करण्यासाठी घातलेली साद असते ती असे माझे मत आहे.
म्हणजे एका निर्जन बेटावर असतो आपण. आपल्या अनुभूती, अनुभव हे फक्त आपले आणि आपलेच असतात. एक वैश्विक एकटेपणाही असतो. जगाच्या कोलाहलात जरी जाणवला नाही तरी असतो, प्रत्येकाला असतो.
याचे मात्र सोप्पे उत्तर आहे. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी.
____________________________
गोंदवल्याला मंदीरात (मठ), ब्रह्मानंद हॉल आहे. तिथेही रमणाश्रमासारखी शांतता असते. खूप छान वाटतं. लोक जपमाळ घेउन जप करत बसलेले असतात.