Skip to main content

पत्र लिहीण्यास कारण की ...



 श्री० नरेन्द्र मोदी
पंतप्रधान
भारतीय संघराज्य

 

स० न० वि० वि०

 

 

पत्र लिहीण्यास कारण की सध्या देश ज्या मुद्द्यावर ढवळून निघाला आहे ते मुद्दे असे आहेत-


१. स्मार्ट मीटर
२. एथेनॉलयुक्त स्मार्ट पेट्रोल
३. राममंदिर दक्षिणेची चोरी
४. नीट परीक्षेतील गोंधळ
५. महाराष्ट्रातील भेसळ विरोधी कारवाई


’स्मार्ट मीटर’ आणि ’एथेनॉलयुक्त पेट्रोल’ याबाबत जनतेचा विश्वास संपादन करण्याची गरज का वाटली नाही. या प्रश्नाचे उत्तर मला काही मिळत नाही. हा विश्वास निर्माण करण्यासाठी "डोकी लढवली असती" तर आजची नामुष्की ओढवली नसती.

मा०मु० वाढत्या वीज बिलांचे कारण वाढलेला उन्हाळा, उष्णतेच्या लाटा असे सांगत आहेत. पण जिथे झोपडपट्टीत अव्वाच्यासव्वा बीले आली आहेत तिथे फक्त "वाढलेला उन्हाळा, उष्णतेच्या लाटा" ही कारणे असू शकत नाहीत. सर्व संबंधित याकडे सोईस्कर दुर्लक्ष का करत आहेत. जर ’स्मार्ट मीटर’ आणि ’एथेनॉलयुक्त पेट्रोल’ लोकांसाठी खरोखरच फायद्याचे असते तर तर या योजना लोकांनी डोळे मिटून डोक्यावर घेतल्या असत्या.

मला इथे आणखी एक (गैरसोईचा प्रश्न पडतो) - समजा रुग्णवाहिकांमध्ये स्मार्ट पेट्रोल वापरले आणि त्याचा परिणाम अत्यवस्थ रूग्ण दगावण्यात झाला तर काय? लष्कर स्मार्ट पेट्रोल वापरून युद्ध जिंकू शकेल का?

राममंदिर दक्षिणेची चोरी - चारित्र्यवान समाज निर्मितीचे मुखवटे (आय मिन व्रत) घेतलेल्या, "नि:स्वार्थ" आणि "निरपेक्ष" समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या संघटनेलेला एक देऊळ पारदर्शकपणे चालवता येऊ नये, स्वीकारलेल्या देणग्यांच्या पावत्या देता येऊ नयेत याची अंमळ मोज वाटली.

नीट परीक्षेतील गोंधळ - कोणत्याही कॉर्पोरेट व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला की उच्चपदस्थांना देखिल घरी पाठवतात. धर्मेंद्र प्रधानांनी भले पक्षबांधणीचे पुण्यकर्म केले असेल पण ते नीट परीक्षेतील गोंधळ सुधारण्यात अकार्यक्षम ठरले आहेत, हे निर्विवाद सत्य आहे.

महाराष्ट्रातील भेसळ विरोधी कारवाई - भारत कर्करोगाची जागतिक राजधानी बनलेला असताना, अपमत्यू लहान वयात सर्रास घडून येत असताना भेसळ विरोधी कारवाईचे लोण इतर राज्यात पसरायला हवे होते. १०० तुकाराम मुंढे जन्माला यायला हवे होते पण तसे झालेले नाही.

राहता राहीला एक महत्त्वाचा मुद्दा - व्हिसलब्लोअर ना आपण गंभीरपणे कधी घ्यायला लागणार? भारतीय लोकशाहीत लोकांवर कोणताही बदल कितीही हितकारक असला तरी तो लादता येणार नाही, हा वरील घटनांमधला संदेश आहे आणि तो अधिकाधिक मोठा होत जाणार आहे.


याखेपेस मी आपल्या "उर्वरित कार्यकाळास" शुभेच्छा देऊ शकत नाही.


कळावे,

राजीव उपाध्ये