एका पुरोगाम्याचं आत्मपरीक्षण
उत्पल यांच्या फेसबुकवरची ही नोंद, त्यांच्या परवानगीने इथे प्रकाशित करत आहे.
डॉ. कलबुर्गी यांची हत्या, त्यावरील बजरंग दलाच्या सह-समन्वयकाचे ट्वीट या पार्श्वभूमीवर मी काही लिहिलं होतं. त्याचा समारोप करताना मी 'अजिबात भावनिक न होता पूर्णपणे स्ट्रॅटेजिक विचारच करावा लागेल' असं म्हटलं होतं. त्या पोस्टवर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यापैकी हेमंत कर्णिक आणि आशुतोष जावडेकर यांच्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने आणि माझ्याही मनातील संघर्षाच्या अंगाने तटस्थपणे काही मांडायचा प्रयत्न करतो. या दोघांच्याही प्रतिक्रिया इथे देत आहे -
हेमंत कर्णिक - तुझी कन्सर्न कळते. व्यक्तीपातळीवर आपण काम करत असतोच. पण मोदीराज आल्यापासून काही लोक भयंकर चेकाळले आहेत. आपल्या आसपास वावरणार्यांच्यात खूनबाजी आणि दडपशाही यांचं उघड वा आडून समर्थन करणारे निघतील असं अजिबात वाटलं नव्हतं. त्यांच्या बुद्धिभेदाला जनतेच्या मैदानात कसं तोंड द्यायचं, हा खरा प्रश्न आहे. नेमकी त्यांचीच हत्या होते आहे, ज्यांना हे करता येत होतं.
आशुतोष जावडेकर - अजिबात भावनिक न होता पूर्णपणे स्ट्रॅटेजिक विचारच करावा लागेल -- ' हे योग्य आहेच आणि तू कविता/गद्य जे लिहील आहेस तेही उत्तम आहे .पण अजून एक : सेलेक्टीव्ह निषेध करायची एक राजकीय पद्धत मला उजवे आणि डावे या दोन्ही बाजूंकडे आढळते. निषेध हा वृत्तीचा असावा, व्यक्तीसापेक्ष नव्हे . एक लक्षात घेऊया , अति-उजवे आणि अती-डावे या दोन्हीला या देशात कधीच जनाधार मिळालेला नाही आणि त्याच एक कारण हेही आहे की सामान्य जनतेला हा सेलेक्टीव्ह निषेध आतून कळतो!
हेमंत कर्णिक म्हणतात तसं भाजप सरकार आल्यापासून वातावरण बदललं आहे हे खरं आहे. गेल्या वर्षीची निवडणूक, भाजपचा विजय, मग मोदी सरकारची एक वर्षाची कारकीर्द यावर पुष्कळच चर्चा झाली आहे, सतत होत आहे. मोदी समर्थक आणि मोदी विरोधक असे दोन तट पडून त्यांच्यातले प्रेमळ संवाद चराचर व्यापून उरले आहेत. मला असं जाणवतं की बहुधा इतक्या मोठ्या प्रमाणात वाद-विवाद होण्याची ही वेळ बऱ्याच काळाने आली असावी. अर्थात यात सोशल मीडियाची भूमिका फारच महत्त्वाची आहे. कारण याआधी अशा चर्चा, वाद-विवाद होतच असणार. फक्त सोशल मीडियाने जे व्यासपीठ दिलं आहे ते अद्वितीय आहे. कारण यात विरोधक समोर नसला, दिसत नसला तरी त्याच्याशी वाद-विवाद करता येतो.
मला प्रामुख्याने आशुतोषच्या सिलेक्टिव्ह निषेधाच्या अंगाने बोलायचं आहे. पण त्याआधी थोडी प्रस्तावना आवश्यक आहे.
मला स्वतःला धर्मविरहीत जगण्याची कल्पना आकर्षित करते. मी स्वतः खरं तर तसं जगतो आहे. आणि ते केल्याने मला काहीही अडचण आलेली नाही. पण अर्थातच हे सगळं इतकं सोपं नाही याची मला कल्पना आहे. म्हणजे प्रत्येकाला धर्मविरहित जगता येईल असं नाही. वेगवेगळ्या प्रसंगी मी वैयक्तिक दुःख इतरांसारखंच अनुभवलं आहे, पण मी एका टोकाचं दुःख, अस्तित्व पणाला लागतं असं दुःख अनुभवलेलं नाही. उदा. माझं घर भूकंपात पडलेलं नाही किंवा आगीत जळालेलं नाही, माझ्या घरातील कुणी कधी दंगलीत, अपघातात मारलं गेलेलं नाही. मला अतिशय हलाखीत दिवस काढायला लागलेले नाहीत. मी स्त्री नसल्यामुळे मला आपल्या समाजातील स्त्रीच्या मानसिकतेतील असुरक्षिततेचा अनुभव नाही. (पुरूष असल्यामुळे लैंगिक गरजेच्या गोचीचा अनुभव आहे!)
एकूणात माझा जो काही थोडाफार संघर्ष असेल तो एक मध्यमवर्गीय संघर्ष आहे. माझं माझ्या दुःखांशी वैर नाही, पण मला दुःख झालं असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते मी माझ्या सामाजिक स्थानासकटच म्हणत असतो याचं भान मला ठेवावं लागतं. उदा. सकाळचीच भाजी काय संध्याकाळी असं वाटून जेव्हा मी वैतागतो तेव्हा असं वाटण्यात फार मोठा गुन्हा आहे असं नाही, पण सकाळची भाजी संध्याकाळी मिळणं हेदेखील काही लोकासांठी सुख असू शकतं ही जाण मला ठेवावीच लागते.
माझ्यासारखा माणूस जेव्हा 'माझा' म्हणून विचार करतो तेव्हा मला 'माझा' विचार करण्याइतपत लिबर्टी आहे हे मला लक्षात ठेवावंच लागत. कारण मी जो काही विचार करतो, करू शकतो त्यात माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील घडणीचा सहभाग असतो. माझ्या सामाजिक स्थानाचा सहभाग असतो. मी जर एखाद्या वेश्येच्या पोटी जन्माला आलो असतो तर मी कसा विचार केला असता? मी जर दंगलीत मारल्या गेलेल्या आई-वडिलांचा मुलगा असतो तर मी कसा वाढलो असतो? मी जर हातावर पोट असणाऱ्या एखाद्या मजुराचा मुलगा असतो तर मी कसा विचार केला असता?
आपल्याला दुःख असणं हे मला मान्यच आहे. पण आपल्या दुःखाची प्रत, त्याची जातकुळी ओळखण्याइतपत आपला मानसिक विकास व्हायला हवा यात मला शंका वाटत नाही. मी जर समाजाचा भाग असेन तर समाजविचार सोडून विचार करणं मला योग्य वाटत नाही.
म्हणूनच मी धार्मिक नसलो तरी धर्म, श्रद्धा या गोष्टींकडे मला काळजीपूर्वक बघावं लागतं हे मला विसरून चालत नाही. धर्म, श्रद्धा या गोष्टींकडे विविध संदर्भात बघावं लागतं. श्रद्धेला संपूर्ण न नाकारता, सत्प्रवृत्त माणसांच्या श्रद्धेचा अनादर न करता माझ्यासारख्या अश्रद्ध माणसांना त्यांचं म्हणणं मांडता यायला हवं. मी उद्वेगाने अनेक वेळा धर्माबद्दल तिरकसपणे लिहिलं आहे, पण तो हल्ला अर्थातच धर्माचे नकारात्मक परिणाम, धर्माच्या अतिरेकामुळे येणारं अवलंबित्व, विचारशक्तीचा ऱ्हास यावर आहे. मला असं वाटतं की स्वतंत्र विचाराची शक्ती असेल तर वेश्येच्या पोटी जन्माला आलेला मुलगा असो की मजुराच्या पोटी जन्मलेला मुलगा असो की एखाद्या विचारवंताच्या पोटी जन्माला आलेला मुलगा असो - सगळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. ही शक्ती धर्म देतो असं मला वाटत नाही. मार्क्सचं 'धर्म ही अफूची गोळी आहे' हे वाक्य वारंवार उद्धृत केलं जातं, पण त्या वाक्याआधी जी संपूर्ण मांडणी आहे ती बरेचदा वाचली जात नाही. ती मुद्दाम इथे देतो -
Man makes religion, religion does not make man. Religion is, indeed, the self-consciousness and self-esteem of man who has either not yet won through to himself, or has already lost himself again. But man is no abstract being squatting outside the world. Man is the world of man – state, society. This state and this society produce religion, which is an inverted consciousness of the world, because they are an inverted world. Religion is the general theory of this world, its encyclopedic compendium, its logic in popular form, its spiritual point d’honneur, its enthusiasm, its moral sanction, its solemn complement, and its universal basis of consolation and justification. It is the fantastic realization of the human essence since the human essence has not acquired any true reality. The struggle against religion is, therefore, indirectly the struggle against that world whose spiritual aroma is religion.
Religious suffering is, at one and the same time, the expression of real suffering and a protest against real suffering. Religion is the sigh of the oppressed creature, the heart of a heartless world, and the soul of soulless conditions. It is the opium of the people.
शेवटच्या परिच्छेदात मार्क्स म्हणतो की धर्म हा हृदयशून्य जगाचे हृदय आहे, आत्मा हरवलेल्या परिस्थितीचा आत्मा आहे. धर्म ही अफूची गोळी आहे.
मी धार्मिक मनुष्य नाही. अज्ञेयवादी आहे. घरात देवघर नाही. पण मी क्वचित कधी सत्यनारायणाचं बोलावणं आलं तर जातो. नमस्कारही करतो. ते औपचारिकच असतं, पण निमंत्रणाला नकार देणं काहीसं जड जातं. मी धार्मिक नसलो तरी भिडस्त आहे. पटकन नाही म्हणता येंत नाही. वैचारिक समता की माणसाशी जोडलेपण असा प्रसंग आला तर मी जोडलेपणाची निवड करेन. अर्थात त्यासाठी माणूस सत्प्रवृत्त, हिंसा न करणारा, हिंसेवर विश्वास नसलेला असायला हवा. धार्मिक माणूस सत्प्रवृत्त असूच शकतो. धर्मांध माणूस नाही. मुळात धर्म हे माझ्या दृष्टीने एक कोडं आहे. (धर्म हा शब्द मी सगळीकडे हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन इ. संघटित धर्म या रूढ अर्थानेच वापरतो आहे.)
हे सगळं सांगणं आवश्यक वाटलं कारण मला पुढे जे म्हणायचं आहे ते म्हणायच्या आधी माझी व्यक्तिगत भूमिका काय हे सांगणं गरजेचं वाटलं.
मागे एकदा याकूब मेमनच्या फाशीबाबत लोकसत्तात जो अग्रलेख आला होता त्यावरील एका प्रतिक्रियेला मी प्रतिक्रिया दिली. ती वाचून अर्थातच पुन्हा प्रतिक्रिया आल्या. स्वामीजी निश्चलानंद यांनी तीव्र नकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांना मी दहशतवादाचं समर्थन करतो आहे असं वाटलं. त्यावर मी दहशतवादाचं समर्थन करत नाही असं म्हणून त्यांची माफी मागितली. मनापासून मागितली.
मला असं वाटतं की मी ही माफी मागितली पाहिजे, कारण मी जेव्हा तिरकसपणे काही लिहितो तेव्हा कदाचित काही सत्प्रवृत्त माणसांनाही मी दुखावलं असेल. आणि अशा वेळी माफी मागण्यात कमीपणा वाटायचं कारण नाही. कारण माणूस दुखावला गेला आहे हे सत्य मला नाकारता येत नाही.
डावे-उजवे-मधले हे सगळे विचाराने कुठल्याही बाजूचे असले तरी ती माणसं आहेत आणि म्हणून परिवर्तनीय आहेत असं मला वाटतं. मला सोशल मीडियाची भीती वाटते ती या माध्यमामुळे आपण अधिकाधिक एकारलेले, अपरिवर्तनीय होत आहोत असं वाटतं म्हणून. आपण फार तीव्रतेने भांडतोय. सतत भांडतोय. 'आपलं चुकू शकतं' हे आपण विसरतोय का? आपण सगळे मुळात एकाच व्यवस्थेत राहतोय. तुम्ही कम्युनिस्ट असा किंवा उजवे असा, ऑफिसातला बॉस किंवा व्यावसायिक असू तर आपले क्लायंट्स हेच आपले नियंत्रक आहेत हे सत्य आहे. आपल्याला आपल्या वॉर्डमधल्या नगरसेवकाचे 'की रिझल्ट एरियाज' माहीत आहेत का? अशा वेळी आपण पंतप्रधान, आरबीआयचे गव्हर्नर यांच्या कामाविषयी बातम्या, लेख याच्या आधारे जोरात भांडू शकतो याची मला मौज वाटते.
सोशल मीडियाच्या या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर सिलेक्टिव्ह निषेधाचा मुद्दा पुढे येतो.
मुस्लिम दहशतवाद, मुस्लिमांकडून झालेले/होणारे अत्याचार याबाबत पुरोगामी इ. लोक काही बोलत नाहीत असा एक आक्षेप अनेकजण नेहमी घेतात. याबाबत पुढे काही लिहिण्याअगोदर मी हे कबूल करतो की या आक्षेपात तथ्य आहे. यामागची कारणं सांगता येतील. पण ही वस्तुस्थिती आहे असं मला वाटतं. याचाच थोडा परामर्श घ्यावा असं वाटतं.
मुस्लिम हे अल्पसंख्य आहेत आणि त्यांना या देशात सुरक्षित वाटणं गरजेचं आहे, मुस्लिम दहशतवादाचं रूप उग्र असलं तरी प्रत्येक मुस्लिम दहशतवादी नसतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे असा एक विचार आहे आणि मीदेखील हा विचार मानणाऱ्यांपैकी आहे. मुस्लिम शासकांनी इथे, विशेषतः उत्तर भारतात अनेक शतकं राज्य केलं. बाबराने इब्राहिम लोधीचा पराभव केला तो १५२६ मध्ये. तिथून मुघल साम्राज्याची सुरूवात होते. इब्राहिम लोधीच्या आधी त्याचा बाप सिकंदर लोधी, त्याआधी सिकंदर लोधीचा बाप बहलोल खान, त्याआधी सईद साम्राज्य असा सगळा इतिहास पुष्कळच मागे जातो. आणि त्यात केवढी गुंतागुंत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
आर्य बाहेरूनच आले आणि त्यांनी इथल्या लोकांना दास केलं अशी जी मांडणी आहे त्याला आंबेडकरांनी आक्षेप घेतला आहे. 'शूद्र पूर्वी कोण होते?' या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात हे सगळं त्यांनी विस्तृतपणे मांडलं आहे. वैदिक परंपरेला आव्हान देणारी श्रमण परंपरा, इतर अनेक पंथ असं बरंच काही इथे घडलेलं आहे. त्यावर पुष्कळ संशोधन झालं आहे. अनेक मत-मतांतरे आहेत. त्यात शिरणं हा माझा उद्देश नाही. माझी तेवढी कुवतही नाही. हे सगळं सांगावसं वाटलं कारण या देशाच्या इतिहासाबाबत काहीही विधान करणं अशक्य आहे असं मला वाटतं. माझं इतिहासाबाबत एवढं एकच मत ठाम आहे. एकाने काही मांडलं की त्यावर दुसरा आक्षेप घेतो, दुसऱ्याने काही मांडलं की त्यावर तिसरा आक्षेप घेतो. भारताचा इतिहास हा बाकी काही नाही तरी आक्षेपांचा इतिहास आहे हे नक्की!
आता या अत्यंत म्हणजे अत्यंत गुंतागुंतीच्या संस्कृतीत, समाजात काहीजण फक्त एकच झेंडा घेऊन उभे आहेत. काहीजण हिंदुत्वाचा झेंडा घेऊन उभे आहेत - मुस्लिम इथले नाहीत, आक्रमक आहेत, त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे ही त्यांची भूमिका आहे. माझ्यासारखे काही आधुनिक विचारांचा झेंडा घेऊन उभे आहेत - धर्म वगैरे विसरा आता आणि खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्या ही माझी भूमिका आहे. मुस्लिम मूलतत्त्ववादी इस्लामचा झेंडा घेऊन उभे आहेत - त्यांना हिंदू बहुसंख्यांचा धोका वाटतो.
आता आपण माझ्याबद्दल बोलू. मी हिंदू धर्मातील वाईट गोष्टींबाबतच का लिहितो? मला मुस्लिम समाजातील दोष दिसत नाहीत का?
याची ठळक कारणं -
मी लिबरल हिंदू घरात जन्माला आलो. लहानपणी मुस्लिम लोकांमध्ये पुष्कळ वावरलो. अगदी घरातल्यासारखा. ('असलेपण-नसलेपण' या माझ्या ब्लॉगवरील लेखात मी याबाबत सविस्तर लिहिलं आहे.) दंगल पाहिली तेव्हा मुस्लिम काय किंवा हिंदू काय, आक्रमक म्हणून कुणीच लक्षात राहिले नाहीत. दंगलीची प्रत्यक्ष झळ पोचली नाही. हिंदू घरात वाढत होतो त्यामुळे हिंदू परंपरा जवळून पाहिल्या. हिंदू समाजात सतीसारख्या काही भयंकर परंपरा होत्या हे कळलं. देवाची मूर्ती काहीही म्हणजे काहीही करू शकत नाही हे कळलं. पुढे मग सगळंच फोल वाटू लागलं. सामाजिक वाचन झालं त्यात हिंदू समाज, हिंदू धर्मसुधारणा याचाही समावेश होता. धार्मिक वाचन झालं नाही. आईने एकदा लहानपणी शनिमाहात्म्य वाचून दाखवलं होतं. तेव्हा मला साडेसाती सुरू होती म्हणून. पण ती शनीची गोष्ट मी गोष्ट म्हणूनच ऐकली होती. मोठेपणी गीतारहस्य उत्साहाने वाचायला घेतलं होतं, पण ते काही झेपेना. भक्तीयोगात मला शरण जा, माझी भक्ती करा असं काही यायला लागलं तेव्हा कंटाळा अधिकच वाढला. देव समजा ठीक आहे, पण देवळाच्या बाहेर भिकारी का असतात? आत देव - सगळ्या जगाचा त्राता आणि त्याच्या दाराबाहेर भिकारी कसे? पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून अर्ध्या किलोमीटरवर वेश्यावस्ती आहे. मंदिरात जाणं योग्य, पण या बायकांशी बोलणं चांगलं नाही असं का? असे प्रश्न पडू लागले. मला असं लक्षात येऊ लागलं की आपण भौतिक जगाकडे आस्थेने बघणाऱ्यांपैकी आहोत. आपल्याला अध्यात्माची गोडीच नाही. आपल्याला जमिनीवरचे, जगण्याचे प्रश्न जास्त खुणावतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला गणपतीकडे बघून काही वेगळं, शांत, प्रसन्न असं वाटत नाही. आपल्याला त्या वेश्येमध्ये रस आहे. आपल्याला तिच्याशी बोलावसं वाटतं. या जगात दुःखाचं एक मूलभूत कारण पैसे नसणं हे आहे. असं असताना धर्म त्याबद्दल काय सांगतो? तर काही नाही. धर्म म्हणतो की पैसे कसे कमवायचे ते तुमचं तुम्ही बघा. पण तुम्ही पैशासाठी वेश्याव्यवसाय करणं वाईट. आणि ते करणारेही वाईट. पण मग जिला फसवून या व्यवसायात आणलं ती वाईट कशी?
धर्माने मला, म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या माणसाला काय दिलं? किंवा धर्मपालन करणाऱ्या आसपासच्या लोकांनी मला वैचारिकदृष्ट्या काय दिल? तर काही नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकत नव्हते. त्यांच्या श्रद्धेला माझा विरोध नव्हताच, पण ते बदल घडवून आणू शकत नाहीत हे लक्षात येत होतं. धर्म माणसांना एकत्र ठेवतो असं सांगण्यात येतं. पण जर सगळ्यांना व्यवस्थित पैसे मिळाले आणि सगळ्यांनी नागरिकशास्त्राचे नियम पाळले तरी सगळे एकत्र राहतीलच की. उलट ते अधिक चांगल्या पद्धतीने एकत्र राहतील. मग सगळ्यांकडे पैसे असतील, सगळेजण नागरिकशास्त्र समजून घेतील यासाठी काय करायचं?
ऐहिक जगाचे प्रश्न सोडवण्यासाठी अध्यात्म किंवा धर्म कसे उपयोगी पडतील, मुळात उपयोगी पडू शकतील का असा विचार मी केला नाही हेही खरं आहे. कारण त्यातला रसच संपला होता. माझी वैचारिक भूक भागत नव्हती त्यामुळे धर्माबद्दलची माझी आस्था संपली होती. आपल्या प्रश्नांची उत्तरं धर्मात, परंपरांमध्ये नाहीत हे लक्षात आलं.
माझ्या आसपासचे लोक हिंदू होते. आहेत. ज्या सार्वजनिक उत्सवांमुळे त्रास झाला (आवाज, गर्दी, लोकांची गैरसोय) ते प्रामुख्याने हिंदू उत्सव होते. माझ्यावर ज्यांचा प्रभाव पडला त्या गांधींना मारणारे हिंदू होते. दुसरा प्रभाव म्हणजे आंबेडकर. त्यांनी ज्या समाजातील जाती-आधारित शोषण मला दाखवलं तो हिंदू समाज होता. दाभोळकरांची हत्या झाल्यावर त्यांच्या चित्रापुढे फुली मारणारी सनातन प्रभात ही हिंदू संघटना आहे. स्टेन्स आणि त्यांची दोन लहान मुलं यांना जिवंत जाळणारा दारासिंग हा कट्टर हिंदुत्ववादी होता. कुलबर्गी यांच्या हत्येनंतर ट्वीट करणारा हिंदुत्ववादी होता.
दंगलीचा संदर्भ मी देत नाहीये. कारण त्यात दोन्हीकडील माथेफिरू असतात. आणि गरीब हिंदू व गरीब मुस्लिम श्रीमंत हिंदू आणि श्रीमंत मुस्लिमांनी भडकावल्यामुळे मूर्खपणे एकमेकांचे गळे कापतात. दंगल हा एक वेगळाच विषय आहे. मी काही सुटे प्रसंग देतोय ज्यात दंगल वगैरे नसताना अचानकपणे हत्याकांड घडलेलं आहे.
वर उल्लेख केलेल्या कट्टर हिंदुत्ववाद्यांप्रमाणेच कट्टर मुस्लिमांनी इथे अलिकडे अशा प्रकारची हत्याकांडे केली आहेत का? माझ्या माहितीत तरी नाही. आणि जर असं काही घडलं असेल तर ते निषेधार्हच आहे.
मी हिंदू धर्माची माझ्या कुवतीनुसार थोडीफार चिकित्सा करतो, करू शकतो कारण माझ्याकडे तेवढी सामग्री आहे. माझ्याकडे मुस्लिम धर्माविषयीची इतकी सामग्री नाही.
थोडक्यात, 'मला धर्म नाही आणि मला धर्मविरहित जगू द्या' हे मी आज सांगत असलो तरी मी ज्या धर्माला पाहिलं, अनुभवलं आणि ज्या धर्मामुळे मला वैचारिक त्रास झाला तो हिंदू धर्म होता. मी मुस्लिम असतो आणि लिबरल असतो तर मी मुस्लिम धर्माची चिकित्सा केली असती. कारण त्यावेळी माझ्याकडे मुस्लिम धर्माविषयीची सामग्री असती.
आता ही चिकित्सा करताना मी उपरोधिक झालो आहे हे खरं आहे. आणि त्यामुळे कुणा सत्प्रवृत्त धार्मिक माणसाला मी दुखावलं असेल तर त्याबद्दल मी दिलगीर आहे. मला 'खुमखुमी' येते हे खरं आहे, कारण धर्मांधता माझ्यातल्या क्रिएटिव्ह माणसाला जागं करते.
मला मुस्लिमांचा त्रास कुठे दिसतो? अर्थातच दहशतवादी कृत्यात. मग मी त्या हल्ल्यांनी व्यथित होऊन लेख लिहिला का? निषेधाची कविता केली का? नाही केली. याचं कारण? माहीत नाही. मला काही सुचलं नाही इतकंच. ’मला का सुचलं नाही’ याचं विश्लेषण होऊ शकतं. आणि मी त्याबाबतीतील प्रश्नोत्तरांना तयार आहे.
मी स्वतः 'पुरोगामी' गटातला आहे. म्हणजे मला या गटातील लोकांचं सगळं पटतं का? नाही. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण द्यावं का? खुशाल द्यावं. महाराष्ट्र भूषण हा एक फार मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं का? अजिबात नाही. नोबेल पुरस्कार मिळालेल्या माणसाहून नोबेल न मिळालेला भारी माणूस जगात असू शकतो का? हो. असू शकतो. दाभोळकर, पानसरे यांचे मारेकरी सापडले तर त्यांना फाशी द्यावी का? देऊ नये. माझ्यावर दाभोळकर, पानसरे यांचा प्रभाव आहे का? अर्थातच आहे. औरंगजेब रोडचं नाव बदलायला माझी काही हरकत? अजिबात नाही. महात्मा गांधी रोडचं नावदेखील बदलावं. त्यांचे पुतळे वगैरेसुद्धा काढावेत. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक बंद करावं का? करू नये. माझ्या आसपास गांधींना मनसोक्त नावं ठेवणारे लोक आहेत. मी त्यांच्याशी प्रतिवाद करतो का? नाही करत. कारण गांधी न आवडणारे लोक असू शकतात हे मला स्वीकारता आलंच पाहिजे असं मला वाटतं. गांधींवर जे जे आक्षेप आहेत ते ते मला तपासावेसे वाटतात. कारण गांधींचा माझ्यावर प्रभाव आहे. मी त्यांचा भक्त नाही. ज्या दिवशी मी 'भक्त' होईन त्या दिवशी मी संपेन असं मला वाटतं.
माझ्यासमोर आव्हान हे आहे की मी गांधी विचार रस्त्यांची नावं, पुतळे याशिवाय लोकापर्यंत कसे पोचवू शकतो हे बघण्याचं. मला 'गांधी' लोकांपर्यंत पोचवायचे नाहीत. गांधी विचार पोचवायचा आहे.
गांधींचा खून झाल्यावर ब्राह्मणांची घरं जाळली गेली तेव्हा ती वाचवण्यासाठी गांधीवादी मंडळीसुद्धा गेली होती. आता समजा गोळवलकर गुरुजींची हत्या झाली असती तर आपल्याकडे काय घडलं असतं? हिंदुत्ववादी मंडळींनी 'हो, मी गोळवलकरांना मारलं' अशा नावाचं नाटक चालू दिलं असतं का? हत्या समजा मुस्लिम माणसाने केली असती तर मुसलमानांची घरं वाचवायला हिंदुत्ववादी गेले असते का?
गांधीप्रणित सहिष्णुता आणि धर्मप्रणित असहिष्णुता यात हा जो फरक आहे तो आपण, विशेषतः हिंदुत्ववादी मित्रांनी लक्षात घेतला पाहिजे.
आता शेवटचं.
'पुरोगामी' या शब्दाबद्दल आणि त्या विचारांच्या लोकांबद्दल आज जी नाराजी दिसते तिकडे दुर्लक्ष नाही करता येणार. आपण स्वतःला तपासलं पाहिजे. आपण खरोखरच सिलेक्टिव्ह निषेध करतो का? आपण खरोखरच काहीही झालं तरी मुस्लिमांची बाजू घेतो का हे तपासलं पाहिजे. देशांतर्गत ज्या काही घटना होत आहेत त्यात मुस्लिम दोषी असतील तर ते दोषी आहेत हे ठामपणे म्हटलं पाहिजे. मुळात हा हिंदू-मुस्लिम असा प्रश्नच नाही. आपण गुन्हेगारांचा निषेध करणार असू तर सर्वच गुन्हेगारांचा निषेध करायला हवा. मला कल्पना आहे की कदाचित असा निषेध होऊनदेखील उजव्या विचारांच्या लोकांपर्यंत तो पोचला नसेल. पण तरी त्यांच्यात जी नाराजी दिसते ती अशी दुर्लक्षून चालणार नाही असं मला वाटतं. आपण आपला विचार फक्त निषेधाच्या माध्यमातून कसा पोचवू शकणार? परिवर्तनाच्या चळवळीत अनेक मोठे कार्यकर्ते होऊन गेले. अनेक कार्यकर्ते आजही काम करत आहेत. पण संघाच्या शाखा झपाट्याने वाढतात आणि परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यक्रमाला परिवर्तन झालेले लोकच जास्त प्रमाणात असतात हे का? धर्म आणि श्रद्धा या देशातल्या लोकांच्या डीएनएमध्ये आहे. कदाचित परिवर्तन माझ्या डीएनएमध्ये आहे तसंच. म्हणून आपल्याला वादापेक्षाही कल्पकता दाखवावी लागेल. संध्याकाळी खेळायला म्हणून मुलांना एकत्र करून संघाची शाखा भरवली जाते. ही कल्पना चांगली आहे. आपण परिवर्तनाचा विचार अशा माध्यमातून रुजवू शकतो का? खेळण्यासाठी मुलांना एकत्र करून त्यांच्यात वैज्ञानिक विचार रुजवता येतील का? आपण परिवर्तनवादी आहोत याचा आपल्याला अहंकार आहे का? आपण सामान्य माणसाशी जोडून घेऊ शकत नाही आहोत का? धर्माची चिकित्सा तर व्हावीच, पण आपण फक्त तेवढंच करतो आहोत का? आपण पर्याय देतो आहोत का? आपल्याला परिवर्तन हवं आहेच, पण असे अनेक प्रश्नही आपण आपल्याला विचारले पाहिजेत. कारण आपण प्रश्न विचारणारेच लोक आहोत. त्यातून आपली स्वतःचीदेखील सुटका नाही.
भारतातील खरा झगडा हा हिंदू-मुस्लिम नसून कम्युनल हिंदू आणि लिबरल हिंदू हा आहे असं राम मनोहर लोहियांनी म्हटल्याचं स्मरतं. मला असं वाटतं हे दोघे एकत्र आले, किमान त्यांच्यातले ताण कमी झाले तर कदाचित आपल्याकडचे बरेच प्रश्न सुटतील. विभागला गेलेला फोर्स एकत्र येईल. हा भाबडेपणा आहे हे मला मान्य आहे. पण तरी मी हे म्हणतो आहे. कदाचित भाबडेपणा हाच माझा स्ट्रॅटेजिक विचार असेल.
- उत्पल
प्रतिसाद एका "पुरोगाम्या"साठी
प्रतिसाद एका "पुरोगाम्या"साठी आहे. जेव्हा हा पुरोगामी एकीकडे "आपण खरोखरच सिलेक्टिव्ह निषेध करतो का? आपण खरोखरच काहीही झालं तरी मुस्लिमांची बाजू घेतो का हे तपासलं पाहिजे. देशांतर्गत ज्या काही घटना होत आहेत त्यात मुस्लिम दोषी असतील तर ते दोषी आहेत हे ठामपणे म्हटलं पाहिजे. मुळात हा हिंदू-मुस्लिम असा प्रश्नच नाही. आपण गुन्हेगारांचा निषेध करणार असू तर सर्वच गुन्हेगारांचा निषेध करायला हवा" असे आत्मपरिक्षण करायला हवे असे म्हणतो त्याच वेळी मी दुसर्या धर्मावर टिका करत नाही कारण माझ्याकडे सामग्री नाही असेही म्हणतो. ह्याला विरोधाभास म्हणावा की बायस? ह्यांना आजुबाजुला दिसणारे सगळे हिंदू मुलतत्ववादी/अतिरेकी आहेत, बाकी कुणी नाही. हिरव्या रंगाचा चष्मा घातल्यावर सगळं हिरवंच दिसतं, नाही का?
विचार करण्यास उद्युक्त केलेला परिच्छेद
मला स्वत:ला सगळ्यात जास्त विचार करायला प्रवृत्त करणारा परिच्छेद -
डावे-उजवे-मधले हे सगळे विचाराने कुठल्याही बाजूचे असले तरी ती माणसं आहेत आणि म्हणून परिवर्तनीय आहेत असं मला वाटतं. मला सोशल मीडियाची भीती वाटते ती या माध्यमामुळे आपण अधिकाधिक एकारलेले, अपरिवर्तनीय होत आहोत असं वाटतं म्हणून. आपण फार तीव्रतेने भांडतोय. सतत भांडतोय. 'आपलं चुकू शकतं' हे आपण विसरतोय का? आपण सगळे मुळात एकाच व्यवस्थेत राहतोय. तुम्ही कम्युनिस्ट असा किंवा उजवे असा, ऑफिसातला बॉस किंवा व्यावसायिक असू तर आपले क्लायंट्स हेच आपले नियंत्रक आहेत हे सत्य आहे. आपल्याला आपल्या वॉर्डमधल्या नगरसेवकाचे 'की रिझल्ट एरियाज' माहीत आहेत का? अशा वेळी आपण पंतप्रधान, आरबीआयचे गव्हर्नर यांच्या कामाविषयी बातम्या, लेख याच्या आधारे जोरात भांडू शकतो याची मला मौज वाटते.
लेखात काही वाक्ये सहज पटतील
लेखात काही वाक्ये सहज पटतील अशी आहेत.
उदा. खालील वाक्ये आवडली.
म्हणूनच मी धार्मिक नसलो तरी धर्म, श्रद्धा या गोष्टींकडे मला काळजीपूर्वक बघावं लागतं हे मला विसरून चालत नाही. धर्म, श्रद्धा या गोष्टींकडे विविध संदर्भात बघावं लागतं. श्रद्धेला संपूर्ण न नाकारता, सत्प्रवृत्त माणसांच्या श्रद्धेचा अनादर न करता माझ्यासारख्या अश्रद्ध माणसांना त्यांचं म्हणणं मांडता यायला हवं.
आता इतर काही गोष्टी.
माझ्या आसपासचे लोक हिंदू होते. आहेत. ज्या सार्वजनिक उत्सवांमुळे त्रास झाला (आवाज, गर्दी, लोकांची गैरसोय) ते प्रामुख्याने हिंदू उत्सव होते. माझ्यावर ज्यांचा प्रभाव पडला त्या गांधींना मारणारे हिंदू होते. दुसरा प्रभाव म्हणजे आंबेडकर. त्यांनी ज्या समाजातील जाती-आधारित शोषण मला दाखवलं तो हिंदू समाज होता. दाभोळकरांची हत्या झाल्यावर त्यांच्या चित्रापुढे फुली मारणारी सनातन प्रभात ही हिंदू संघटना आहे. स्टेन्स आणि त्यांची दोन लहान मुलं यांना जिवंत जाळणारा दारासिंग हा कट्टर हिंदुत्ववादी होता. कुलबर्गी यांच्या हत्येनंतर ट्वीट करणारा हिंदुत्ववादी होता.
स्टेन्स आणि त्यांच्या २ मुलांना मारणार्या दारासिंगला आजन्म तुरूंगवास झालेला आहे. त्याचा सर्वांनी निषेधच केलेला आहे. त्याला पाठिंबा देणारे अगदी तुरळकच सापडतील.
कुलबर्गी यांच्या हत्येनंतर ट्वीट करणारा नक्कीच विकृत विचारांचा होता. तो हिंदुत्ववादी होता असे लिहून त्याच्या आधी हिंदुत्ववादी असणार्यांची दोन उदाहरणे देऊन काही सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे का? असे विकृत विचार असणारे सर्व धर्मात आणि निधर्म्यांमध्ये सुद्धा असतात. हे वृत्त पहा -
http://www.christianitytoday.com/ct/2001/februaryweb-only/15.0.html
T. John, a civil aviation minister in Karnataka's state government and a member of the Orthodox church, has handed in his resignation after widespread criticism and protests by Hindus angry at his interpretation.
The 69-year-old politician had described the Gujarat earthquake, the worst to hit India in 50 years, as "the punishment of God to the people for ill-treating Christians and minorities in the state."
त्यावेळी कर्नाटकात निधर्मी कॉंग्रेसचे सरकार होते. टी जॉन हा त्याच निधर्मी काँग्रेसचा होता.
दाभोळकरांची हत्या झाल्यावर त्यांच्या चित्रावर फुली मारण्याचे सनातन प्रभातचे कृत्य अत्यंत मूर्खपणाचे आणि विकृत मनोवृत्तीचे दर्शक होते. सनातनवाले सोडल्यास इतर कोणीही त्या कृत्याला पाठिंबा दिलेला नाही. परंतु सनातन या खुनामागे नाही हे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. दाभोळकरांचा खून झाल्यावर काही तासातच सनातनच्या अनेक कार्यकर्त्यांची चौकशी झाली. जवळपास २ आठवडे तपास करूनही सनातनविरूद्ध काहीही सापडले नाही. किंबहुना सनातनवर संशय यावा यासाठीच खुन्यांनी जाणूनबुजून दाभोळकरांना मारले असावे (अर्थात संशय यावा असेच सनातनमधील लिखाण होते). दाभोळकरांचा खून राजकीय कारणातून झाला असावा असा माझा व्यक्तिगत अंदाज आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या काळात राज्य सरकारने २ वेळा सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या केंद्र सरकारला पाठविला होता. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार असून देखील सबळ कारणांअभावी केंद्र सरकारने सनातनवर बंदी घालण्यास नकार दिला होता. २०१४ मध्ये देशात व महाराष्ट्रात निवडणुक होणार होती. अशावेळी दाभो़ळकरांच्या खुनामुळे आपोआपच सनातनवर संशयाची सुई येईल, त्याद्वारे सनातनवर बंदी घालण्याची मागणी रेटता येईल व निवडणुकीत सेना-भाजपला आरोपांचे धनी करून बॅकफूटवर ढकलता येईल असे तर्कशास्त्र या खुनामागे असण्याची शक्यता वाटते.
तसेच पानसरेंच्या खुनामागे हिंदुत्ववादींपेक्षा कोल्हापूरातील टोलबंदी आंदोलन हे मुख्य कारण असावे असे वाटते. २०१० मध्ये तळेगावातील सतीश शेट्टी यांचा टोलबंदी आंदोलनाच्या कारणावरूनच खून झाला होता. इथेही तसेच कारण असावे असे वाटते.
कलबुर्गींच्या खुनामागे काहीतरी वैयक्तिक कारण असावे. त्यासंदर्भात एका जोडप्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी लिंगायतांसंबंधात जे वादग्रस्त लेखन केले होते (जे त्यांनी नंतर मागे घेतले) ते कारण सुद्धा असू शकते.
दंगलीचा संदर्भ मी देत नाहीये. कारण त्यात दोन्हीकडील माथेफिरू असतात. आणि गरीब हिंदू व गरीब मुस्लिम श्रीमंत हिंदू आणि श्रीमंत मुस्लिमांनी भडकावल्यामुळे मूर्खपणे एकमेकांचे गळे कापतात. दंगल हा एक वेगळाच विषय आहे. मी काही सुटे प्रसंग देतोय ज्यात दंगल वगैरे नसताना अचानकपणे हत्याकांड घडलेलं आहे.
वर उल्लेख केलेल्या कट्टर हिंदुत्ववाद्यांप्रमाणेच कट्टर मुस्लिमांनी इथे अलिकडे अशा प्रकारची हत्याकांडे केली आहेत का? माझ्या माहितीत तरी नाही. आणि जर असं काही घडलं असेल तर ते निषेधार्हच आहे.
अलिकडे म्हणजे किती अलिकडे जायला परवानगी आहे? कट्टर मुस्लिमांनी केलेली खालील हत्याकांडे अगदी चटकन आठवली.
(१) जानेवारी १९९३ - ६ हिंदू माथाडी कामगारांना स्थानिक मुस्लिमांनी भोसकून मारल्यामुळे दंगल पुन्हा सुरू झाली.
(२) जानेवारी १९९३ - राधाबाई चाळीतील एकमेव हिंदू कुटंब राहत असलेल्या खोलीला बाहेरून कडी लावून खोली पेटवून देऊन आतील ६-७ जणांना जिवंत जाळण्यात आले.
(३) मार्च १९९३ - शुक्रवारी दुपारच्या नमाजाच्या वेळी (मध्यान्हीच्या सुमारास) बहुसंख्य मुस्लिम मशिदीत असताना टाईमर लावून मुंबईत १३ ठिकाणी केलेल्या बॉम्बस्फोटात २५८ व्यक्तींचा मृत्यु झाला. त्यातील जवळपास सर्वचजण हिंदू होते. बाँबस्फोटाचा कट दाऊद इब्राहिम, याकूब मेमन, टायगर मेमन, इ. मुस्लिमांनीच रचला होता.
(४) फेब्रुवारी २००२ - अयोध्येहून परतणारे हिंदू कारसेवक असणार्या रेल्वेच्या बोगीला गोध्रा येथील स्थानिक मुस्लिम गटाने पेट्रोल ओतून आग लावल्यामुळे बोगीतील ६० हिंदू जिवंत जळून मृत्युमुखी पडले.
(५) २४ सप्टेंबर २००२ - गुजरातेतील अक्षरधाम मंदिरावर मुस्लिम अतिरेक्यांनी केलेल्या अतिरेकी हल्ल्यात ३३ हिंदू भाविक मरण पावले.
(६) फेब्रुवारी २०१० - पुण्यातील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाल्याने १७ मृत्युमुखी. बाँबस्फोटाचा प्रमुख सूत्रधार रियाझ भटकळ आणि त्याचा भाऊ.
(७) जुलै २००६ - मुंबईतील अनेक लोकल ट्रेन्समध्ये बॉम्बस्फोट होऊन तब्बल २१० नागरिक मृत्युमुखी. बॉम्बस्फोटामागे इंडियन मुजाहिदीन ही अतिरेकी संघटना.
(८) २६ नोव्हेंबर २००८ - १० पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत सशस्त्र हल्ला केल्यामुळे १९० नागरिक मृत्युमुखी
(९) २९ ऑक्टोबर २००५ - इस्लामिक रिव्होल्यूशनरी फ्रंट या अतिरेकी संघटनेने दिल्लीत ३ ठिकाणी केलेल्या बॉम्बस्फोटात ६३ नागरिकांचा मृत्यु
(१०) १३ मे २००८ - जयपूरमध्ये इस्लामिक अतिरेकी संघटनांनी केलेल्या ९ बॉम्बस्फोटात ६३ जणांचा जागीच मृत्यु
(११) फेब्रुवारी १९९८ - कोईमतूरमध्ये झालेल्या वेगवेगळ्या १२ बाँबस्फोटात ६० जणांचा मृत्यु. अल उम्मा या मुस्लिम संघटनेचा यात हात होता.
कट्टर मुस्लिमांनी केलेले यातले एकही हत्याकांड आठवू नये? अर्थात हिंदू कट्टरवादी आणि मुस्लिम कट्टरवादी यांना एकाच पारड्यात तोलणार्यांना सोयिस्कररित्या मुस्लिमांनी केलेले एकही हत्याकांड आठवत नाही याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही. त्यांना हिंदूंच्या डोळ्यातले कुसळ स्पष्ट दिसते परंतु मुस्लिमांच्या डोळ्यातले मुसळ दुर्बिण लावूनसुद्धा दिसत नाही.
श्रीकृष्ण आयोग
>> (१) जानेवारी १९९३ - ६ हिंदू माथाडी कामगारांना स्थानिक मुस्लिमांनी भोसकून मारल्यामुळे दंगल पुन्हा सुरू झाली.
THE Shiv Sena has long asserted that the January riots were triggered by the murder of four mathadi (head-load) workers in a Muslim-dominated part of south-central Mumbai on the night of January 5 and the burning alive of six Hindus during the early hours of January 8 at Radhabai Chawl, a tenement block at Jogeshwari (northwest Mumbai). The Commission's finding is that sections of the print media, particularly the Sena mouthpiece Saamna and Navakal, gave exaggerated accounts of these incidents and contributed to the arousal of Hindu communal passions.
One of the mathadi workers, all of whom were sleeping in the godown of a transport company, was stabbed to death when he went out into the street to relieve himself. The other three, who came out to help him, also met the same fate.
It is admitted by Senior Police Inspector Subhash Kadam that the mathadi workers themselves did not consider the murders to be "communally motivated", says the Commission. "The blame for turning a case of simple murder into a communally motivated murder must... fall on Vaman Lad and Hemant Koli," a former Shiv Sena member of the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) and a Sena shakha pramukh (branch chief) respectively. The propaganda unleashed by this duo prompted some mathadi workers to stab a Muslim, says the Commission.
स्रोत : The Shiv Sena indicted फ्रंटलाइन Vol. 15 :: No. 17 :: August 15 - 28, 1998
मूळ लेखामध्ये असा उल्लेख आहे
मूळ लेखामध्ये असा उल्लेख आहे की कट्टर मुस्लिमांनी केलेली हत्याकांडे लेखकाला माहिती नाहीत. त्याची माहिती देण्यासाठी मुस्लिम कट्टरवाद्यांनी केलेल्या फक्त ११ हत्याकांडाची माहिती दिली आहे. या ११ हत्याकांडातच जवळपास १००० हिंदू मारले गेले आहेत.
तुम्ही वर 'फ्रंटलाईनच्या' ज्या रिपोर्टची लिंक दिलेली आहे तो श्रीकृष्ण आयोगाचा अहवाला आहे. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी हा धागा नाही. फक्त एवढेच सांगतो की तो अहवाल अत्यंत पक्षपाती व एकतर्फी होता व त्यात बराचसा दोष शिवसेनेच्या माथी मारण्यात आला आहे. मुस्लिमांवर अगदी थोड्या प्रमाणात व सौम्य दोष दिलेला आहे. १९९८ मध्ये दिलेला हा अहवाल अत्यंत पक्षपाती व एकतर्फी असल्याने तत्कालीन भाजप-सेना युती सरकारने फेटाळला होता. परंतु नंतर १९९९ पासून सलग १५ वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने सुद्धा कारवाईसाठी या अहवालाचा आधार घेतला नव्हता. तुम्हाला जर श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावर चर्चा करायची असेल तर दुसरा धागा उघडा.
एक आठवण सांगतो. मी मार्च १९९२ ते जानेवारी १९९३ या काळात सिंगापूरमध्ये काम करीत होतो. माझे काम ४ जानेवारी १९९३ ला संपल्यावर ६ जानेवारी १९९३ ला सकाळच्या विमानाने सकाळी ११ च्या सुमाराला मी मुंबईला परतलो. परता आल्यावर लगेच अंधेरीत एका काकांना भेटायला गेलो. ते घरी नव्हते. काकूने त्यांना फोन केल्यावर त्यांनी तातडीने पुण्यास निघण्यास सांगितले. मुंबईत सकाळी काही माथाडी कामगारांचे खून झाले असून दंगल पेटायला सुरूवात झाली आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार मी व माझा भाऊ एक टॅक्सी घेऊन दादरला एशियाड बससाठी निघालो. टॅक्सी चालक मुस्लिम होता. जाताना टॅक्सी ड्रायव्हरने अनेक मुख्य रस्ते टाळून बर्याच लांबच्या मार्गाने गाडी नेली. त्याबद्दल त्याला विचारले असताना तो म्हणाला की परत दंगल सुरू झाली आहे. दंगलीसाठी पाकिस्तानातून राजस्थानमार्गे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणल्याचे त्याच्या कानावर आले होते. सुदैवाने कोठेही न अडकता बर्याच उशिरा दादरला पोहोचून एशियाडने पुण्याला पोहोचेपर्यंत रात्रीचे जवळपास १० वाजले होते.
गांधींचा खून झाल्यावर
गांधींचा खून झाल्यावर ब्राह्मणांची घरं जाळली गेली तेव्हा ती वाचवण्यासाठी गांधीवादी मंडळीसुद्धा गेली होती. आता समजा गोळवलकर गुरुजींची हत्या झाली असती तर आपल्याकडे काय घडलं असतं? हिंदुत्ववादी मंडळींनी 'हो, मी गोळवलकरांना मारलं' अशा नावाचं नाटक चालू दिलं असतं का? हत्या समजा मुस्लिम माणसाने केली असती तर मुसलमानांची घरं वाचवायला हिंदुत्ववादी गेले असते का?
२००२ मधील गुजरातमधील दंगलींवर आधारीत प्रामुख्याने हिंदूंना दोष देणारे अनेक चित्रपट निर्माण झाले (उदा. फिराक, परझानिया). हिंदूंना दोष देणारी Even the Crows सारखी डॉक्युमेंटरी निर्माण झाली. यांच्यावर बंदी नव्हती. दाभोळकर व पानसरेंच्या खुनानंतर 'सॉक्रेटीस ते दाभोळकर, पानसरे व्हाया तुकाराम' हे नाटक सध्या सुरू आहे. आश्चर्य म्हणजे सॉक्रेटिस, दाभोळकर, पानसरे यांच्या बरोबरीने यात संत तुकारामांचाही समावेश केलेला आहे. यावरही बंदी नाही किंवा या नाटकाविरोधात कोणीही बोललेले नाही.
काही मतभेद
१.
मला असं वाटतं की स्वतंत्र विचाराची शक्ती असेल तर वेश्येच्या पोटी जन्माला आलेला मुलगा असो की मजुराच्या पोटी जन्मलेला मुलगा असो की एखाद्या विचारवंताच्या पोटी जन्माला आलेला मुलगा असो - सगळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते.
ही वाक्यं वाचली, आणि मग आधीच्या परिच्छेदात आलेली वाक्यं परत वाचली, ती अशी-
माझ्यासारखा माणूस जेव्हा 'माझा' म्हणून विचार करतो तेव्हा मला 'माझा' विचार करण्याइतपत लिबर्टी आहे हे मला लक्षात ठेवावंच लागत. कारण मी जो काही विचार करतो, करू शकतो त्यात माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील घडणीचा सहभाग असतो. माझ्या सामाजिक स्थानाचा सहभाग असतो. मी जर एखाद्या वेश्येच्या पोटी जन्माला आलो असतो तर मी कसा विचार केला असता?
वेश्येच्या पोटी जन्माला येणं आणि लिबरल घरात जन्माला येणं, यामुळं एकदमच वेगवेगळ्या परिस्थिती उद्भवतात, हे उत्पल यांच्या या आधीच्या वाक्यांवरून त्यांनी स्पष्ट केलंय. पण मग परत 'स्वतंत्र विचाराची शक्ती असेल तर... सगळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते' हे विसंगत वाटलं. 'स्वतंत्र विचाराची शक्ती' हा कच्चा माल आहे असं गृहीत धरलं तरी तो पुरेसा नाही, हे आधी स्पष्ट केलेलं असताना पुन्हा त्या शक्तीचा नि 'चांगल्या प्रकारे वाढ होण्या'चा संबंध कसा जोडता येईल, ते कळलं नाही. यातली गुंतागुंत यापेक्षा अधिक असेल असं वाटतं.
२.
मार्क्सनं धर्माला अफूची गोळी म्हणण्याच्या आधीच्या वाक्यांमध्ये धर्माला हृदयशून्य जगाचं हृदय म्हटलंय- मान्य. पण तरी त्यातला अफूची गोळीचा निष्कर्षच वरचढ ठरतो, असं वाटतं. अफूची गोळी लोक का घेत असतील, याची काही कारणं दाखवण्यापुरतंच फक्त मार्क्स 'हृदयशून्य जगाचं हृदय' वगैरे बोलतोय असं वाटतं. त्यापलीकडं या परिच्छेदातून तरी धर्माबद्दल काही अधिक खोलवर सापडत नाही, असं वाटतं. मार्क्सला मुख्य बदल अपेक्षित आहेत ते भौतिकतेत, ते झाल्यावर 'हृदय' कसं असेल असं त्याला वाटतं? अशा बदलांच्या शेवटच्या टप्प्यातही- म्हणजे साम्यवादी समाजातही जग 'हृदयशून्य' असू शकेल, हे त्याला मान्य होतं का? तसं मान्य होतं असेल, तर मग तेव्हा 'हृदय' म्हणून कोणती गोष्ट असायला हवी? या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत, असं वाटतं. ही उत्तरं त्याच्या लिखाणात इतरत्र असतीलही, किंवा अनेक मार्क्सवाद्यांनी त्याबद्दल लिहिलं असेलच, आपल्याकडे मराठीत वारकरी संत मंडळींकडे मार्क्सवादी दृष्टीनं पाहणारी काही पुस्तकं आहेतही. पण वर उद्धृत केलेल्या त्या विशिष्ट परिच्छेदातून तरी सर्वसामान्य वाचक म्हणून असंच जाणवलं की, मार्क्स हा धर्माकडे 'अफूची गोळी' म्हणून पाहत होता.
३.
राज्यशास्त्राचे शिक्षक राहिलेले राम बापट यांनी 'भांडवलशाहीच्या बदलत्या दिशा आणि पुरोगामी जबाबदाऱ्या' या विषयावर नाशिकमधे २७ डिसेंबर १९९६मध्ये झालेल्या विचारवेध संमेलनात अध्यक्षीय व्याख्यान दिलं होतं. त्यात ते एका ठिकाणी म्हणतात:
याच व्यासपीठावर प्रा. मे. पुं. रेगे यांनी केलेल्या धर्मचिंतनाचा आधार मी येथे थोडाफार घेणार आहे.
अतीत असे तत्त्व नाहीच. विश्वात नाही. माणसात नाही. म्हणून धर्माला प्रामाण्य नाही. धर्म भ्रामक असतात. तेव्हा त्याचा उच्छेद करून इहवादाचा प्रसार करणे हे प्रबोधनाचे (एन्लायटन्मेंट) आणि आधुनिकत्वाचे लक्षण बनले. सबंध जीवनाला गुंफून घेणाऱ्या एखाद्या नियामक तत्त्वाची आता गरज नाही, असाही दावा मांडण्यात आला. अनेक मातब्बर तत्त्वज्ञ व धर्मचिंतक यांनी यापेक्षा खूपच वेगळी मांडणी केली. तरी प्रत्यक्षात विज्ञान हेच एकमेव ज्ञान (सायंटिसिस्ट) मानणारी विवेकवादी (रॅशनलिस्ट) व विज्ञानवादी (पॉझिटिव्हिस्ट) मतप्रणाली दबदबा राखून होती.
भांडवली राजकीय अर्थकारणाला ही गोष्ट पथ्यावरच पडली. एका बाजूला नास्तिक किंवा आर्थिक व्यवहारांचे क्षेत्र सोडून एरवी 'धार्मिक' अनुशासन मानणारे भांडवलशाही अभिजन प्रस्थापित धर्मसंस्थांवर भौतिक सुविधांची खैरात करीत होते व असतात; तर दुसरीकडे धर्मविहीन आधुनिकतेचा घोष करीत 'पुरोगामी' वर्तुळात मिरवीत असतात. परिणामी, बहुसंख्य धर्मभोळ्यांच्या जीवनात भांडवलयुगीन आत्मकेंद्रितता कमी होण्याची किंवा सतेज धार्मिक चिंतन व जाणिवा यामुळे सामाजिक बांधिलकी वाढण्याची जी शक्यता असते ती दिवसेंदिवस मंदावत गेली.
यातूनच मूलतत्त्ववादी राजकारणाची सुरुवात होते. सेमिटिक धर्मपरंपरा एवढेच त्याचे एकमेव कारण नाही. आज दुर्बळ व परावलंबी भांडवलशाही राष्ट्रांतील मूलतत्त्ववादाबद्दल सतत बोलणारे अमेरिकेचे राज्यकर्ते त्याचा आधुनिक काळातील उगम व माहेरघर स्वतःच्याच व्यवस्थेत आहे ही वस्तुस्थिती झाकून टाकत असतात. आत्मौपम्यदृष्टी चेतविणाऱ्या धार्मिक जाणिवांऐवजी संघटित धर्माचा सत्ताकारणाकरता पाठीराखेपणा करणे हे मत भांडवलशाही राजकीय अर्थकारणाला घडविणाऱ्या रॅशनलिस्ट संप्रदायांचेच एक कडवट फळ आहे.
याबाबतीत बहुतेक सर्व पुरोगामी चळवळींनी जी भूमिका घेतली ती वस्तुनिष्ठ पातळीवर भांडवलशाही अधिसत्ता राबवायला आजवर पोषकच ठरली. आत्मभान मिळवून देणारी प्रत्येक गोष्ट भांडवलशाह्यांना नकोच होती व असते. विनोबा म्हणत तसे यापुढे धर्म नष्ट होतील, पण आत्मज्ञान व आध्यात्मिक जीवनशोधन लागणारच आहे. साम्यवादी, समाजवादी व अन्य पुरोगाम्यांची हीच चूक डॉ. आंबेडकरांनी अचूक ओळखली. म्हणूनच त्यांच्या धम्मात 'पवित्र'पणाचे महत्त्व जाणलेले आहे.
(विचारवेध संमेलन अध्यक्षीय भाषणे, खंड १. संपादक- किशोर बेडकिहाळ. सुगावा प्रकाशन. पहिली आवृत्ती- २६ डिसेंबर २००३ पान ११९-१२०)
४. धार्मिक जाणीव आणि सत्ताकारणाकरता संघटित धर्माचा उपयोग, असा भेद बापटांनी शेवटाकडं नोंदवलेला दिसतोय. आणि त्यासंदर्भात डॉ. आंबेडकरांचं महत्त्व अधोरेखित केलंय. ते अधोरेखन महत्त्वाचं आहे, असं वाटतं.
५. लेखात उल्लेख केलेल्या एका प्रतिक्रियेत या देशात अति डावे व अति उजवे यांना कधीच जनाधार मिळाला नसल्याचं म्हटलंय. तेही कळलं नाही. शिवसेना हा पक्ष अति उजवा नाही का? मग त्याला जनाधार मिळालेला नाही का? किंवा भाजप हा नक्की कितपत उजवा आहे?
आभार
राम बापट नेहमीप्रमाणेच मर्मभेद करतात. उद्धृतासाठी आभार.
>> लेखात उल्लेख केलेल्या एका प्रतिक्रियेत या देशात अति डावे व अति उजवे यांना कधीच जनाधार मिळाला नसल्याचं म्हटलंय. तेही कळलं नाही. शिवसेना हा पक्ष अति उजवा नाही का? मग त्याला जनाधार मिळालेला नाही का? किंवा भाजप हा नक्की कितपत उजवा आहे?
शिवसेना : शिवसेनेला मिळालेला जनाधार आतापर्यंत मर्यादितच राहिलेला आहे असं वाटतं. म्हणजे इतकी वर्षं राजकारणात असूनही एकदा १९९५मध्ये आणि आता अशी दोनदाच महाराष्ट्रात सत्ता हाती आली, तीदेखील भाजपसोबत. आताच्या सरकारात तर शिवसेना 'ऑल्सो-रॅन'च आहे.
भाजप : पद्धतशीरपणे 'सब का साथ, सब का विकास' असा पवित्रा घेऊन, तो लोकांच्या गळी उतरवून सत्ता मिळालेली आहे. म्हणजे हिंदुत्ववादाच्या बाबतीत आपला अतिउजवा चेहरा झाकण्यात यश मिळालं, तसंच अर्थकारणातही आपला अतिउजवा चेहरा झाकण्यात यश मिळालं तेव्हाच सत्ता मिळाली. नव्हे का?
जनाधाराबद्दल
जनाधाराच्या संदर्भात दोन प्रश्न लक्षात घ्यावेसे वाटले- शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्यावर सत्तेपर्यंत पोचायला त्यांना किती कालावधी लागला? शिवाय, भाजपने अतिउजवा चेहरा झाकण्यात यश मिळवलं असेलही, पण मूळ आर्थिक-धार्मिक चेहरा काय आहे? (आर्थिक चेहरा खरंतर सगळ्याच पक्षांचा कुठकुठला आहे?) शिवाय 'जनाधार' म्हणजे फक्त निवडणुकीतला विजय, इतकंच मर्यादित ठेवलं, तरच हे बोलता येईल. अन्यथा, रा.स्वं.संघाच्या शाखा आणि शिवसेना-संस्थापकांना आदर्श मानणाऱ्या हार्दिक पटेलला मिळालेला प्रतिसाद, यांच्यातली संख्या पाहिली, तर अतिउजव्यांना 'कधीच' जनाधार मिळाला नाही, हे अतिशयोक्तीचं वाटतं.
बापटांनी केेलेला डॉ. आंबेडकरांचा उल्लेख त्या संदर्भात जास्त खोलात जायला मदत करणारा वाटला.
परसेप्शन
>> पण मूळ आर्थिक-धार्मिक चेहरा काय आहे?
मला वाटतं की जनाधाराचा मुद्दा येतो तेव्हा 'परसेप्शन' महत्त्वाचं ठरतं. पारंपरिक भाजप मतदार नसलेल्या माझ्या परिसरातल्या अनेकांची भाजपकडून अपेक्षा विकासाची आहे. ती भाबडी किंवा अज्ञानाधारित असू शकेल, पण ती प्रतिमा किंवा ते परसेप्शन सध्याच्या जनाधारापुरतं महत्त्वाचं ठरलं असावं.
>> रा.स्वं.संघाच्या शाखा आणि शिवसेना-संस्थापकांना आदर्श मानणाऱ्या हार्दिक पटेलला मिळालेला प्रतिसाद, यांच्यातली संख्या पाहिली, तर अतिउजव्यांना 'कधीच' जनाधार मिळाला नाही, हे अतिशयोक्तीचं वाटतं.
हार्दिक पटेलचा जनाधार जनसामान्यांकडून आहे असं दिसतं का? पाटीदार किंवा पटेल समाज म्हणजे भूधारक आणि धंदेवाला समाज आहे. ते जनसामान्य नव्हेत बहुधा.
सुखवस्तू
>> भाजपच्या बाबतीत जनाधाराचं परसेप्शन म्हणून तुम्ही उदाहरण दिलेला परिसर- सुखवस्तू असावा- मान्य केला; तर मग
नाही. मी उदाहरण दिलेले लोक (परंपरेनं भाजपचे मतदार नसलेले) सुखवस्तू नाहीत. रिक्षावाले, बसप्रवासी, बस कंडक्टर, चहाच्या टपरीवरचे (तेसुद्धा पूर्व पुण्यातले; सदाशिव पेठेतले नव्हेत), किरकोळ धंदे करणारे (पण गुजराती-मारवाडी नव्हेत; मराठी) व्यावसायिक वगैरे, म्हणजे निम्न आर्थिक स्तरातले लोक आहेत. ते आधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मतदार होते. ह्याउलट, माझ्या परिसरातले सुखवस्तू लोक दुहेरी कारणांनी खूश आहेत - त्यांना हिंदुत्ववाद आणि विकास दोन्ही हवंय - पण ते परंपरेनं भाजपचे मतदार आहेत. त्यामुळे माझ्या उदाहरणात ते क्वालिफाय होत नाहीत.
-
तसं असेल मग.
(सुधारित: विचार केला, पण तरी मूळ म्हणणं पटलं नाही तितकं.
पटलं नाही कारण: शिवसेनेसंबंधी उल्लेख केलेला मुद्दा- हिंदुत्वातून सत्ता, संघाच्या शाखा, बाबरी मशीद आणि नंतर भाजप, इत्यादी. शिवाय मुळात काँग्रेस/राष्ट्रवादीचा मतदार असलेल्या एखाद्याच मतदारसंघ/परिसरावरून बाकीच्या एकूण देशातली सर्वसामान्य जनतेच्या परसेप्शनचा थेट अंदाज कसा बांधता येईल. तसं कोकणात, मराठवाड्यात एखाद्या परिसरात बोललं तर पूर्णच वेगळं परसेप्शन जाणवू शकेल. एकूण परसेप्शनचा अंदाज घ्यावा वाटला, म्हणून संघाच्या शाखा, हार्दिक पटेलचे समर्थक, ही थोडी स्पष्ट संख्येची उदाहरणं सुसंगत वाटली.)
जहाल-मवाळपणा आणि परसेप्शन
>> मुळात काँग्रेस/राष्ट्रवादीचा मतदार असलेल्या एखाद्याच मतदारसंघ/परिसरावरून बाकीच्या एकूण देशातली सर्वसामान्य जनतेच्या परसेप्शनचा थेट अंदाज कसा बांधता येईल. तसं कोकणात, मराठवाड्यात एखाद्या परिसरात बोललं तर पूर्णच वेगळं परसेप्शन जाणवू शकेल. एकूण परसेप्शनचा अंदाज घ्यावा वाटला, म्हणून संघाच्या शाखा, हार्दिक पटेलचे समर्थक, ही थोडी स्पष्ट संख्येची उदाहरणं सुसंगत वाटली.)
हे सगळं योग्यच आहे. माझ्या सांगण्याचा हेतू एवढाच होता की भाजप असो की शिवसेना, त्यांना त्यांची जहाल भूमिका काही अंशी बाजूला सोडून काही अंशी मवाळ झाल्यावरच सत्ता हाती लागलेली आहे. बाबरी मशीद आणि हिंदुत्वाच्या अजेंड्यावरून अडवानींनी देश पेटवला तेव्हा त्यानंतर सत्ता मिळाली होती हे खरं, पण ती अनेक घटक पक्षांना सोबत घेऊन आणि वाजपेयींसारखा मवाळ चेहरा पुढे करूनच राबवावी लागली. किंवा, २००२मध्ये गुजरातेत मोदी ज्या शैलीत बोलून लोकांना चेतवत असत त्याच्याशी त्यांच्या आताच्या भाषणांची तुलना केली तर आताचे मोदी मवाळच आहेत. (मी फक्त 'परसेप्शन'विषयी म्हणतोय.)
आणखी एक मुद्दा : ज्या उद्योगपतींच्या पैशांवर निवडणुका लढवल्या जातात आणि नंतर ज्यांना मलिदा दिला जातो, त्यांनाही कट्टर अजेंडा नको असतो. तसा अजेंडा घेतला तर त्यांना अपेक्षित बरकत येण्यात अडचणी येण्याची शक्यता वाढते. दुसरीकडे, रिक्षावाल्यालाही कट्टर अजेंडा नको असतो, कारण त्याचं पोटही शहर शांत असण्यावर अवलंबून असतं. उठसूठ दंगली, जाळपोळी, कत्तली होऊ लागल्या तर ते त्यालाही पचणार नाही. अशा गोष्टीही जहाल अजेंड्यांसंदर्भात लक्षात घ्याव्या लागतील.
ओ गब्बरशेठ
गब्बरशेठ...
ओ गब्बरशेठ...ऐकताय ना.
आणखी एक मुद्दा : ज्या उद्योगपतींच्या पैशांवर निवडणुका लढवल्या जातात आणि नंतर ज्यांना मलिदा दिला जातो, त्यांनाही कट्टर अजेंडा नको असतो. तसा अजेंडा घेतला तर त्यांना अपेक्षित बरकत येण्यात अडचणी येण्याची शक्यता वाढते. दुसरीकडे, रिक्षावाल्यालाही कट्टर अजेंडा नको असतो, कारण त्याचं पोटही शहर शांत असण्यावर अवलंबून असतं. उठसूठ दंगली, जाळपोळी, कत्तली होऊ लागल्या तर ते त्यालाही पचणार नाही.
स्पॉन्टेनिअस ऑर्डर!
अनार्की मध्येही ऑपॉप व्यवस्था उभी राहू पाहते वगैरे.
किंवा गोष्टी ऑपॉप इक्विलिब्रिअमला येतात वगैरे.
किम्वा वेगळ्या रेग्युलेटरची गरजच नैय्ये ; कारण परिस्थितीनुसार जो तो व्यावहारिक निर्णय घेउ पाहतो.
(किंवा जो व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी ठरतो तोच शिल्लक राहतो! )
.
.
गब्बर जेव्हा तात्विक प्रवचनं झोडित असतो; तेव्हा त्याला ह्यातल्या काही गोष्टी सुचवाय्च्या असतात असं वाटतं.
.
.
गब्बर,
बोल रे भावा कैतरी. बरोबरे ना हे ?
किमान एकातरी धाग्यावर चांगली
किमान एकातरी धाग्यावर चांगली चर्चा होऊ दे. झक्कास चाललिये चर्चा. अनार्की मध्येही ऑपॉप व्यवस्था उभी राहू पाहते वगैरे. - अनार्की फार काल टिकत नाही व त्यातून व्यवस्था (ऑर्डर) निर्माण होऊ लागते हे रॉबर्ट नॉझिक सायबांनी मांडून ठेवलेले आहेच. जॅक हर्शलाईफर यांनीसुद्धा स्पॉन्टेनियस ऑर्डर (इन हायेकियन सेन्स) व अनार्की चा संबंध जोडला होता. इथे.. अविनाश दिक्षितांनी सुद्धा. आता माझे नेम ड्रॉपिंग इथेच तुतोप करतो.
-
काही कारणांमुळे मला इथं तुमची प्रतिक्रिया बघायला आणि त्यावर पुन्हा प्रतिक्रिया द्यायला उशीर होतोय. समजून घ्यालंच.
तुमच्या प्रतिक्रियांमधून तीन गोष्टी जाणवल्या: १) अति उजव्या विचाराचा राजकीय पक्ष असला, तरी सत्तेवर येण्यासाठी त्याला काहीसं मवाळ व्हावंच लागतं. २) उजव्या अजेंड्यानं सत्ता मिळाली तरी मग सत्तेवर आल्यानंतर काहीशी तरी मवाळ भूमिका त्याला घ्यावी लागते. ३) कुठल्याही वर्गातल्या माणसाला उठसूठ दंगली, जाळपोळ, इत्यादी नको असल्यामुळं त्यांचाही कट्टर अजेंडा नसतो.
यातला दुसरा मुद्दा मला सगळाच मान्य आहे. आत्तापर्यंत तरी असं दिसतंय, हे खरं. पहिल्या आणि तिसऱ्या मुद्द्यावर माझं म्हणणं थोडक्यात असं (त्यात आता पुनरुक्ती होईल)-
मी ज्या मूळ विधानावर आक्षेपटाइप मत नोंदवलेलं तो होता 'या देशात अति उजव्या आणि अति डाव्या शक्तींना कधीच जनाधार मिळाला नाही'. ते ज्या पद्धतीनं लेखात आलंय, त्यातला सूर चिकित्सक नाही, असं वाटलं. त्या 'कधीच'मुळे त्यात काही कंगोरे नाहीत, उलट थोडं भाबडं वाटलं. फेसबुकवरच्या प्रतिक्रियेत थोडक्या शब्दांत तसं होऊन जात असेल, पण इथं हे लेख म्हणून आलं, त्यावर चर्चा- अशा स्वरूपात ते एकदम असं पूर्ण निष्कर्ष काढणारं वाक्य बऱ्यापैकी अतिशयोक्तीचं वाटलं.
अतिउजवेपणा हा एक घटक आपल्याकडच्या राजकारणात वापरला जातो, हेच त्या वाक्यामुळं दुर्लक्षिलं गेल्यासारखं मला वाटलं. म्हणून राम बापटांचं उद्धृत, त्यातला डॉ. आंबेडकरांचा उल्लेख हे सगळं इथं नोंदवावं वाटलं. आंबेडकरांनी इथल्या राज्यव्यवस्थेला जसा प्रतिसाद दिला तसा का दिला, यावर पूर्ण काही बोलण्याएवढा माझा अधिकार नाही. पण त्यावर चर्चा झाली, तर या मूळ लेखातल्या काही मुद्द्यांवर थोडी स्पष्टता येईल, असं वाटतं.
अतिउजवेपणा फक्त सत्ता किंवा हिंसक कृत्य यांच्याच संदर्भात तपासता येईल, असं वाटत नाही. शिवाय जनाधार या शब्दाचा अर्थ आणखी व्यापक केला, तर त्यासंबंधीची काही उदाहरणं वर नोंदवली आहेतच.
ओवेसी बंधूंचं उदाहरणही इथं जुळणारं वाटतं. त्यातला मोठा भाऊ कायद्याला धरून अजिबात कचाट्यात न सापडता युक्तिवाद करत राहतो. (तरी मराठी माध्यमं त्याच्याशी बोलताना जितकी आक्रस्ताळी होतात, तेवढी ठाकऱ्यांसमोर लीन झालेली असतात, हेही साहजिकच). धाकटा भाऊ त्याला जमेल तेवढ्या आवाजात अतिउजवा घटक भाषणात वापरत राहतो. मोठा भाऊही वापरेल, पण त्याला तुम्ही म्हणताय तो रंग असतो, असं वाटतं. म्हणजे तो साधारणपणे धाकट्याची भूमिका अप्रत्यक्षपणे बॅलन्स करू पाहात असतो. इथंही मुस्लिमांचे प्रश्न वेगळेच आहेत, त्याचा धर्माशी संबंध काय, वगैरे मुद्दे आहेतच. त्यामुळं त्यांना धाकटे ओवेसी म्हणाले समजा की, '१५ मिनिटांसाठी देश ताब्यात द्या, मग दाखवतो!' तरी तसं प्रत्यक्षात होत नाही.
पण असं प्रत्यक्षात 'कधीच' होत नाही, असा जो सूर लेखातल्या मूळ विधानात आहे, तो धोकादायक वाटलेला. म्हणजे शिवसेना आपण एवढी इथं पाहतो, त्यांना सोईसोईनं थोडं मवाळ व्हावं लागणं हे इथल्या समाजाचं काही डायनॅमिक्स असेल किंवा काहीही असेल, पण असा अतिउजवा घटक 'कधी कधी तरी' वापरला जातो, त्याचे तेव्हा तेव्हा तरी गंभीर परिणाम होत राहतात, जोरदार माणसं मरतात, इत्यादी, हे सगळं त्या निष्कर्ष वजा विधानामुळं चर्चेतच आलं नसतं असं वाटलं. पण मी त्यावर माझ्या मर्यादेत कितपत बोलू शकतो, याविषयी शंका. म्हणून राम बापट, आंबेडकर, इत्यादी.
(आणि आर्थिक उजवेपणा-डावेपणाच्या बाबतीत मध्य भारतातल्या परिस्थितीचा संदर्भ घेऊन बोलता येईल, असं वाटतं.)
good Discussion.
लेखाचा विषय/अवाका उत्तम आहे.
सिलेक्टिव्ह निषेधाविषयी थोडंसं-
१.
प्रत्येकाच्या अनुभवाचा एक मर्यादित परीघ असतो. त्या परीघातल्या गोष्टी स्पष्टपणे जाणवतात, रूचतात किंवा जाचतात.
उदा. मी एक डावरा मनुष्य आहे. त्यामु़ळे मला कुठल्याही धार्मिक प्रसंगात "उजवा हात पुढे कर" हे ऐकावं लागतं.
ही एक अतिशय क्षुल्लक गोष्ट आहे, पण ती माझ्यासाठी वैयक्तिक बाब आहे. मला त्याचा त्रास होतो, डोक्याला शॉट. त्यामुळे मी त्याचा विरोध करतो.
आता इथे हिंदू धर्मातली ही गोष्ट मला जाचते म्हणून मी त्याचा "सिलेक्टीव्हली" विरोध करतो असं म्हणता येत नाही. जर माझा धर्म "बंबंबं" किंवा "टिंगटाँग" असता आणि त्याने मला असली चिंधीगिरी करायला लावली असती तरीही मी विरोध केलाच असता. म्हणजे जर एखाद्या मुस्लिम लोकांच्या सणात मला असलं काही ऐकवलं तर मी तिथेही त्यांना सुनावेन.
.
इथे आपण अधिकाधिक व्यापक उदाहरणंसुद्धा घेऊ शकतो. म्हणजे बायकांना पाळीच्या वेळी असणारे निर्बंध, लग्न करताना पत्रिका, जाती, वाळीत टाकणे वगैरे वगैरे.
तेव्हा मी हिंदू धर्मातल्या/संस्कृतीतल्या गोष्टींना विरोध करतो ते माझ्या वैयक्तिक अनुभवविश्वातील blocking/non blocking issues आहेत म्हणून.
तिथे दर वेळी पाहिजे तर डिस्क्लेमर टाका की "ही गोष्ट जर इस्लाम/ख्रिश्चन/शीख्/जैन/इतर धर्मात असेल तरीही मी तिचा तितकाच हिरीरीने विरोध करीन".
२.
तात्विक मतभेद.
"स्त्रियांना जाचक प्रथांना विरोध" अशी माझी भूमिका आहे. आणि मी समजा हिंदू धर्मातल्या जाचक प्रथांना विरोध करत असेन तर माझा मुस्लिम धर्मातल्या अशा प्रथांना विरोध असलाच पाहिजे. जर मी मुस्लिम प्रथेला पाठिंबा देऊन फक्त हिंदू धर्मातल्या प्रथेला विरोध केला तर ते ढोंग आहे.
भाबडा
लेखकानेच कबूल केल्याप्रमाणे लेख भाबडा वाटला. तरीही, असे प्रश्न पडावेत, त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानुसार आपले वर्तन बदलावे हा गुणही पुरोगामीच.
मुस्लिमांचा किंवा हिंदूचा विरोध करणे या पेक्षा 'इस्लामचा', 'हिंदू धर्माचा' वगैरे विरोध करावा. इथे अर्थातच रोख धर्मातील वाईट चालीरीतींवर रोख आहे. चोरी करू नये असे सगळ्यात धर्मात सांगितलेले असेल, त्यात विशेष काही नाही. त्यामुळे अशा सामान्यज्ञानाच्या प्राप्तीसाठी कोणत्याच धर्माच्या कुबड्या घेण्याची आवश्यकता भासायची गरज नाही.
कार्ल मार्क्स काय म्हणाला किंवा अजून कोण शे दीडशे वर्षांपूर्वी काय म्हणालं याला फार महत्व देण्याअगोदर शे दीडशे वर्षांपूर्वी 'विश्वाचे ज्ञान' कितपत होते यावर विचार करावा. सत्यनारायणाला जाणे आणि सत्यनारायण केला नाही तर कोप होतो असे विचार असणे यात जमिन अस्मानाचा फरक आहे. तो विवेकवाद्यांना सहज कळतो, तिथे त्रेधातिरपीट उडायचं काहीच कारण नाही. असो.
आभार...
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार....
@ प्रकाश घाटपांडे - मला राजेशने लेख माझ्या आयडीवरून प्रकाशित करण्याबद्द्ल विचारलं होतं. पण मी फारसा उत्सुक नव्हतो. कारण हा लेख मुळात प्रतिक्रिया स्वरूपात किंवा प्रति़क्रियेतून सुचलेला असा होता. त्यामुळे त्याला मागचे संदर्भ होते. दुसरं एक कारण म्हणजे मी ऐसीचा सदस्य असलो तरी इथे क्वचितच येतो. मला ऑनलाइन चर्चा करणं जरा अवघड जातं. समोरासमोर बोलण्यात मी जास्त रमतो. अर्थात गेल्या काही दिवसात मी फेसबुकवर जे लिहिलं त्यावरील चर्चेत भाग घेतला आहे. पण मला आता त्यातही दमायला झालं आहे...:)...मला माहीतगार कोण हे माहीत नाही. माझ्या आयडीवरून लेख प्रकाशित करण्याऐवजी राजेशने त्याच्या आयडीवरून लेख प्रकाशित केला तर अधिक बरं होईल असं मी राजेशला सुचवलं होतं.
लेख इथे प्रकाशित झाल्याचं मला माहीत नव्हतं. काल संध्याकाळी अवधूतचा मेसेज आला तेव्हा समजलं.
@ ऋषिकेश - 'दिवाळी टू दिवाळी लिहिण्याची कारणं' असा एक छोटा लेख मी ऐसीवर लिहिला होता.
@ श्रीगुरुजी - माहितीबद्द्ल आभार...अतिरेकी हल्ले अर्थातच मला माहीत आहेत. पण मला व्यक्तिगत हल्ले तपासायचे होते. अर्थात मी माझ्या लेखात तसं अधिक स्पष्टपणे म्हणायला हवं होतं. आणि हेही खरं आहे की मुस्लिम अतिरेकी जसे योजनाबद्ध हल्ले करतात तसे हिंदू अतिरेक्यांनी केल्याचं दिसत नाही. अयोध्या, मालेगाव बॉम्बस्फोट अशी काही देशांतर्गत उदाहरणे आहेत, पण पाकिस्तानात जाऊन निरपराध लोकांना मारलेलं नाही हे खरं.
मुस्लिमांना पुरोगामी लोक झुकतं माप देतात या आरोपात तथ्य आहे हे मी म्हटलं आहेच.
@ अवधूत - स्वतंत्र विचाराबाबत मला म्हणायचं आहे ते असं की प्रत्येकाचं सामाजिक स्थान भिन्न असलं तरी स्वतंत्र विचार करून आपल्याला 'प्राप्त परिस्थितीत मी काय केलं पाहिजे' हे कळू शकतं. (ते धर्मामुळे कळतं असं मला वाटत नाही.) म्हणजे उदा. माझ्यासारख्या माणसाने माझ्या स्थानामुळे जे फायदे मला मिळतात ते ओळखून ज्यांना ते मिळत नाहीत त्यांच्याशी संवाद वाढवला पाहिजे. वेश्येच्या मुलाने आपली परिस्थिती आपल्याला कशी सुधारता येईल हा विचार केला पाहिजे. आता यात 'साध्य-साधन' यातील संघर्ष होतीलच. पण मला म्हणायचं असं आहे की स्वतंत्र विचार करत गेलो तर आपल्याला निदान आपली तरी प्रगती साधता येते.
'स्वतंत्र विचाराची शक्ती' हा कच्चा माल आहे असं गृहीत धरलं तरी तो पुरेसा नाही हे आधी स्पष्ट केलेलं असताना' असं तू लिहिलं आहेस. 'तो पुरेसा नाही' असं मला म्हणायचं नाही, तर तो माल वापरला जात नाही किंवा विकसित होत नाही असं माझं निरीक्षण आहे. मी जो विचार करतो तो विचार आणि वेश्येचा मुलगा करतो तो विचार यात फरक आहे, पण आमच्या दोघांच्याही विचारातील एकारलेपण आम्हा दोघांनाही टाळता येऊ शकतं, ते टाळावं असं मला सुचवायचं आहे.
अर्थात यातील गुंतागुंत अधिक असेल हे तुझं म्हणणं मला पूर्णपणे मान्य आहे. याबाबत सविस्तर बोलू. (आणि अहोजाहो कशाला? मी आपला तुला अरेतुरेच म्हणतो. ऑनलाइन चर्चेबाबत माझे जे गोंधळ होतात त्यातला हा एक. मला कदाचित काही संकेत कळत नसावेत किंवा मान्य होत नसावेत. आता आपण दोघं एकमेकांना चांगलं ओळखतो, भेटून गप्पा मारतो असं असताना इथे तू अहोजाहो म्हटल्याने मला एकदम दुरावल्यासारखं वाटलं…:)…)
मार्क्सच्या त्या परिच्छेदाबाबत तुझं मत मला पटलं. मला असं वाटतं की त्याने धर्माची 'गरज' अधोरेखित केली आहे. तो धर्माकडे अफूची गोळी म्हणून बघत होता, पण ही गोळी घ्यायची 'वेळ येते' असं त्याला म्हणायचं आहे असं मला वाटतं. भोवतालची परिस्थिती बदलली तर या गोळीची गरज भासणार नाही.
मार्क्सला मुख्य बदल अपेक्षित आहेत ते भौतिकतेत, ते झाल्यावर 'हृदय' कसं असेल असं त्याला वाटतं? अशा बदलांच्या शेवटच्या टप्प्यातही- म्हणजे साम्यवादी समाजातही जग 'हृदयशून्य' असू शकेल, हे त्याला मान्य होतं का? तसं मान्य होतं असेल, तर मग तेव्हा 'हृदय' म्हणून कोणती गोष्ट असायला हवी? या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत, असं वाटतं.
हे तुझं मत करेक्ट आहे. इथे माझ्याकडून टाळी!
राम बापट यांच्या उद्धृताबद्दल आभार….विचारप्रवृत्त करणारी मांडणी.
विनोबा म्हणत तसे यापुढे धर्म नष्ट होतील, पण आत्मज्ञान व आध्यात्मिक जीवनशोधन लागणारच आहे. साम्यवादी, समाजवादी व अन्य पुरोगाम्यांची हीच चूक डॉ. आंबेडकरांनी अचूक ओळखली. म्हणूनच त्यांच्या धम्मात 'पवित्र'पणाचे महत्त्व जाणलेले आहे.
अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचं! धर्म नष्ट झाला आणि तर्काधारित जगणं सुरू झालं की माझ्या जीवनशोधाचं काय? हा मुद्दा कळीचा आहे आणि यावर इथे सविस्तर बोलणं अवघड होईल. पण याच संदर्भात आणखी एक बाजू म्हणून स. ह. देशपांडे यांच्या 'संघातील दिवस' या लेखातील एक उतारा देतो. माझ्या ब्लॉगवरील लेखातही मी तो उद्धृत केला आहे.
शेकडो कार्यकर्त्यांनी संघासाठी आपली उमेदीची वर्षं दिली. कित्येकांनी आपलं सर्वस्व दिलं. काहीतरी करावं अशी ज्यांची तडफड होती त्यांचा भ्रमनिरास झाला, १९४६ साली अप्पा पेंडसे, वसंत गीत, मधु देवल, दि. वि. गोखले, राजा वाकणकर इत्यादी दहाबारा अस्वस्थ आत्मे एकत्र आले आणि संघात कधीही न घडलेली एक गोष्ट त्यांनी केली. ते गुरुजींना जाऊन भेटले व त्यांनी नवीन विधायक दिशेचा आग्रह धरला. गुरुजींनी नकारघंटा वाजवली.
पण संघाच्या निष्क्रीयतेवरही ज्यांची निष्ठा होती असे अनेक स्वयंसेवक संघात होते हे विसरता येत नाही. खरोखरच आपल्याला राजकारणात भाग घ्यायचा नाही, आपलं कार्य अधिक मूलभूत आहे, ते राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्याचं आहे किंवा संस्कृतीसंवर्धनाचं आहे याची बालंबाल खात्री असलेले अनेक स्वयंसेवक संघात होते. आणि या आभासा खातर आपल्या संस्काराचा होम करणारे कार्यकर्तेही होते. अजूनही आहेत.
याचं स्पष्टीकरण काय? पारंपरिक भारतीय मनोवृत्तीचं प्रतिबिंबच या घटनेत पडलेलं असावं का? भारतीय मनाला 'वास्तवाची अभिरुची' नाही असं डॉक्टर सहस्त्रबुद्धे म्हणत असत. त्याचाच हा एक परिपाक आहे काय? हे म्हणणं खरं असावं. धर्म हा 'अदृष्टफल' असतो अशा परंपरेचे आपण पाईक. किंवा 'फलाशारहित' कर्म करण्याच्या. जे उद्दिष्ट मूर्त स्वरूपात दिसत नाही त्याची गूढता, रहस्यमयता आपल्याला आकृष्ट करते. ते मूर्त होऊ लागलं की त्याच्या भोवतालचं मोहक आवरण गळून पडतं. म्हणून प्रत्यक्ष वस्तुगत प्रश्नांशी झुंज घेणं हा आपला स्वभाव नाही. आपण 'प्रॉब्लेम सॉल्व्हर्स ' नाही. (संघातले दिवस आणि इतर लेख, पृ. ४२-४३)
अतिउजव्या आणि डाअतिडाव्यांच्या जनाधाराबाबत तुझ्या आणि चिंतातूर जंतूच्या दोघांच्याही मतांमध्ये काही 'टेक-अवेज' आहेत. पण एकूणच आपल्याकडे अतिडावे ते अतिउजवे या स्पेक्ट्रममध्ये कोण कुठे कधी आपापल्या जागा बदलतं काही कळत नाही! एक सरळ साधं कारण म्हणजे आपण विचारधारेकडे विचारधारा म्हणून बघतो आणि सक्रिय पक्ष किंवा पक्षाचे समर्थक विचारधारेकडे पक्षीय राजकारणाचं हत्यार म्हणून बघतात.
@ श्रीगुरुजी - माहितीबद्द्ल
@ श्रीगुरुजी - माहितीबद्द्ल आभार...अतिरेकी हल्ले अर्थातच मला माहीत आहेत. पण मला व्यक्तिगत हल्ले तपासायचे होते. अर्थात मी माझ्या लेखात तसं अधिक स्पष्टपणे म्हणायला हवं होतं. आणि हेही खरं आहे की मुस्लिम अतिरेकी जसे योजनाबद्ध हल्ले करतात तसे हिंदू अतिरेक्यांनी केल्याचं दिसत नाही. अयोध्या, मालेगाव बॉम्बस्फोट अशी काही देशांतर्गत उदाहरणे आहेत, पण पाकिस्तानात जाऊन निरपराध लोकांना मारलेलं नाही हे खरं.
पाकिस्तानात कशाला? भारतात या "हिंदू अतिरेक्यांनी" किती बॉम्बस्फोट केले आहेत व किती जणांना मारले आहे ते सांगता का जरा. कोणकोणत्या "हिंदू अतिरेक्यांनी" बॉम्बस्फोट केले आणि कोणाकोणावर हे आरोप सिद्ध झाले ते सांगता का जरा. म्हणजे मुस्लिम अतिरेक्यांनी अनेक बॉम्बस्फोट केले, अनेकांवर बॉम्बस्फोट केल्याचे सर्व न्यायालयात सिद्ध झाले आणि त्यात अनेक मुस्लिम अतिरेक्यांना शिक्षाही झाली. पण आजतगायत एकही "हिंदू अतिरेक्याने" बॉम्बस्फोट केल्याचे एकही प्रकरण एकाही न्यायालयात सिद्ध झाल्याचे ऐकले नाही. माहिती असल्यास सांगा.
"हिंदू अतिरेकी" असा शब्द अगदी रूळलेला, परिचित शब्द असल्यासारखा सहजतेने वापरताय म्हणून विचारतोय.
मुळातील संयत प्रतिक्रियेला
मुळातील संयत प्रतिक्रियेला इतक्या अभिनिवेशात का बरे प्रतिक्रीया यावी?
मला या मूळ विचारांच्या व्यक्तीबद्दल व्यक्तीसापेक्ष न लिहिता जनरल लिहायचं आहे. अशा प्रकारे "संयत (?)" लिहिणार्यांची हीच गंमत आहे. संयत लिहित आहोत असे दाखविता दाखविता अगदी सहजपणे ते "हिंदू अतिरेकी" हा शब्द लिहून ते मोकळे झाले. मुळात हिंदू धर्माच्या नावावर धर्मासाठी दहशतवादी कृत्ये करणारा असा कोणताही हिंदू धर्मियांचा दहशतवादी गट/संघटना आजतगायत अस्तित्वात नाही. आजतगायत एकाही हिंदू व्यक्तीवर भारतातल्या कोणत्याही न्यायालयात दहशतवादाचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही किंवा दहशतवादाच्या एकाही खटल्यात शिक्षा झालेली नाही. आजतगायत कोणत्याही हिंदू संघटनेने दहशतवादी कृत्ये केल्याचे आढळले नाही. तरीसुद्धा अगदी सहज आणि संयत लिहितो असे दाखवून "हिंदू अतिरेकी" असा शब्द वापरून हिंदूंना थेट दहशतवाद्यांच्या पंगतीला बसवून ते मोकळे झाले.
त्याच्या बरोबरीने आपल्या लेखात मालेगाव बॉम्बस्फोटाचा उल्लेख करून व त्या संदर्भात "हिंदू अतिरेक्यांनी" हा बॉम्बस्फोट केला हा निष्कर्ष काढून ते मोकळे देखील झाले. हे प्रकरण गेली ७ वर्षे प्रलंबित अवस्थेत आहे. या बॉम्बस्फोटाचा खटला घटनेच्या जवळपास ७ वर्षानंतर जेमतेम ४ दिवसांपूर्वी न्यायालयात सुरू झाला. पण हा बॉम्बस्फोट "हिंदू अतिरेक्यांनी" केला हा स्वयंघोषित निकाल यांनी याआधीच देऊन टाकला आहे. अगदी सहज आणि संयत लेखन करताकरता अनावधानाने असे झाले यावर केवळ भोळसटच विश्वास ठेवू शकतील.
जरी आजतगायत एकाही हिंदू व्यक्तीवर हे आरोप सिद्ध झाले नसले तरी मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात कुमार केतकर, वागळे, प्रसन्न जोशी इ. मंडळी तर हिंदू अतिरेक्यांनीच हे बॉम्बस्फोट केले किंवा दाभोळकर/पानसरे/कलबुर्गी इ. च्या हत्या हिंदुत्ववाद्यांनीच केल्या असे तावातावाने ठामपणे सांगतात.
जेव्हा इस्लामी दहशतवादी, मुस्लिम अतिरेकी इ. शब्द वापरले जातात तेव्हा हीच "संयत" मंडळी "दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना धर्म नसतो", "एका विशिष्ट धर्मावर दहशतवादाचा शिक्का मारू नका" असा टाहो फोडत असतात. पण हीच "संयत" मंडळी बोलताबोलता अगदी सहज, नेहमीच्या वापरातला असावा अशा साळसूद तर्हेने "हिंदू अतिरेकी" असा शब्द वापरून मोकळे होतात.
संयत लेखनाचा अभिनिवेश आणताआणता अगदी सहज लिहित आहे असे दाखवून मुद्दाम असे स्वयंघोषित निष्कर्ष घुसडणे हेच अशांचे वैशिष्ट्य आहे.
अस्थानी.
लेखकाने विषयाचा अवाका मर्यादित ठेवला आहे. तसंच आपल्या संकल्पना चुकू शकतील ह्याचीही नोंद केली आहे.
इतकं असताना तुमच्या प्रतिसादात "ते" काय म्हणतात, "त्यांची" विधानं कशी आहेत छाप जनरलायझेशन असल्याने संताप/प्रतिक्रियेतील आवेश अस्थानी वाटतो.
जी.एंनी म्हटल्याप्रमाणे "द्वेषाचं नाणं मूळ जागीच खपतं". तेव्हा "ज्यांनी" वर म्हटलेली विधानं केली असतील "त्यांना"च सुनवा.
इथे एवढं भयानक जनरलायझेशन नको.
लेखात बरेचसे जनरअलायझेशन आहे.
लेखात बरेचसे जनरलायझेशन आहे. गांधीजींचा खून हिंदूंनी केला हे वाक्य जनरलायझेशनच आहे. तसेच ग्रॅहम स्टेन्सच्या खुनाचा उल्लेख करताना त्यांच्या खुनापूर्वी त्याच भागातील स्वामी लक्ष्मणानंद व त्यांचे ४ सहकारी अशा ५ जणांना स्थानिक ख्रिश्चनांनी बस अडवून मारले व त्यातून हिंदू-ख्रिश्चन तणाव उत्पन्न होऊन शेवटी त्याची परिणिती ग्रॅहम स्टेन्स व त्यांच्या २ मुलांच्या खुनात झाली ही पार्श्वभूमी कोणताच निधर्मी, पुरोगामी विचारवंत सांगत नाही. फक्त ग्रॅहम स्टेन्स हेच नाव मोठ्याने उच्चारून हिंदुत्ववादी कसे खुनी आहेत हेच सांगितले जाते पण लक्ष्मणानंद आणि त्यांच्या ४ सहकार्यांच्या खुनाची घटना जाणूनबुजून टाळली जाते. तसेच २००२ च्या गुजरात दंगलीचा वारंवार उल्लेख करताना त्यापूर्वी झालेल्या गोध्रा येथील ट्रेनच्या बोगीच्या जळीताचा उल्लेख हे निधर्मांध जाणूनबुजून टाळतात. गुजरात किंवा मुजफ्फरपूर दंगलीत निर्वासित झालेल्या मुस्लिमांबद्दल मोठ्याने कंठशोष करताना हे निधर्मांध १९८९-९० मध्ये काश्मिर खोर्यातून निर्वासित झालेल्या आणि अजूनही निर्वासित शिबिरात राहणार्या ३-४ लाख हिंदूंचा कधीही उल्लेख करताना दिसत नाहीत.
उत्पल यांनी दुसर्या एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे त्यांना कदाचित पूर्वपिठीका माहित नसल्याने लेखात जनरलायझेश झाले असावे. परंतु उत्पल यांनी जे लेखात विचार मांडले आहेत, तसेच विचार बरेचसे निधर्मी, पुरोगामी विचारवंत वेगवेगळ्या व्यासपीठावरून मांडतात आणि वर लिहिल्याप्रमाणे त्यात ते मागची पार्श्वभूमी टाळून फक्त नंतर घडलेल्या सिलेक्टिव्ह घटनाच सांगतात.
हे आभारप्रदर्शन झाल्यावर
हे आभारप्रदर्शन झाल्यावर लिहीणं म्हणाजे वरातीमागून घोडं असण्यासारखं होतय पण आलेच आहे लिहायला तर लिहीतेच.
लेख आवडला. त्यातली प्रांजळ आणि जमिनीवर पाय ठेवून केलेली मांडणी आवडली.
या देशाच्या इतिहासाबाबत काहीही विधान करणं अशक्य आहे असं मला वाटतं. माझं इतिहासाबाबत एवढं एकच मत ठाम आहे. एकाने काही मांडलं की त्यावर दुसरा आक्षेप घेतो, दुसऱ्याने काही मांडलं की त्यावर तिसरा आक्षेप घेतो. भारताचा इतिहास हा बाकी काही नाही तरी आक्षेपांचा इतिहास आहे हे नक्की!
खरय. मुळात आपण स्वत: काही मूळ अभ्यासलेलं नसतं. कोण्या इतिहासलेखकाने किंवा अजून कोणी काही म्हटलय त्या आधारे कोण चूक कोण बरोबर, कोणी माफी मागावी वैगेरे विधानं केली जातात. त्यातही त्याचा आता प्रॅक्टीकल फायदा काय? हे मत कोणतं ना कोणतं लेबल लावून कानामागे केलं जातं. हे या देशाच्याच नाही कदाचित पूर्ण जगाच्या इतिहासाबद्द्लचं सत्य आहे. इतिहास हा एक कॅलिडोस्कोप आहे. पण तो सुटा करुन त्यातले काचतुकडे एकमेकांना जखमी करण्यासाठी वापरले जाणं हा जगभरात चालत आलेला खेळ आहे.
हिंदू धर्म सहीष्णू आहे हे बर्याचजणांचं लाडकं मत असतं. याचं मूळ काय? मुळात हिंदू हा एकेश्वरवादी, एकपोथीवादी धर्म नाही. इथे भारतात रहात आलेल्यांनी त्या त्या वेळी आपल्या सभोवतालच्या समाजाच्या विचारा-आचारांची संगतवार केलेली मांडणी, अस्वीकाराला स्वीकारार्ह (किंवा उलटही ) बनवण्यासाठी त्या त्या वेळी घातलेले नियम यांचं रंगीबेरंगी रुप म्हणजे हिंदू धर्म.
या धर्माला सहीष्णूतेचं स्वरुप येण्याचं कारण म्हणजे या मातीतली परस्परावलंबी समूह व्यवस्था म्हणजेच स्वावलंबी ग्रामीण व्यवस्था. जगभरात तिरस्कार झेलणारे बेने-इस्त्रायली इथे शनीवार-तेली म्हणून स्वीकारलं जाणं हे याचं एक उदाहरण. तरीही ठाम झालेल्या विचारसरणीवर आघात करण्यार्यांना इथे फार प्रेमाने स्वीकारलं गेलयं असं मूळीच नाही. परंतू रुढ झालेली विचारसरणी मोडून काढणं कठीण असलं तरी वेगवेगळी विचारसरणी, त्याची वेगवेगळी मांडणी या मुळे कोणत्याही विचाराला कुठेना कुठे आधार, पूर्वीचा दाखला देणं शक्य होतं. आणि व्यावहारिक दृष्या अपायकारक नसेल तर ती विचारसरणी स्वाकारली जाते; व्यावहारिक फायदे होत असतील तर रुढ होण्याच्या मार्गाला लागते.
हे वेगळेपण म्हणजे हिंदू धर्माची शक्ती आहे हे समजून न घेता हिंदू धर्माला एका विचारसरणीच्या, एका देवाच्या , एका धर्मग्रंथाच्या दावणीला बांधणं हा बर्याच धार्मिक लोकांचा (नकळतचा) बेत असतो. यात मी माझ्या अवतीभवतीच्याच धार्मिक लोकांबद्द्ल बोलतेय. उगाच मोठी न झेपणारी नावं न घेता माझ्या आजूबाजूला बघितलं तरी हेच दिसतं.
एखाद्याला दु:खावर उपाय सुचवायचा म्हणजे आपण करत असलेल्या पूजा-अर्चनेशी त्याला जोडून घ्यायचं. यात करणारा हे प्रामाणिकपणे शुद्ध हेतूने करत असतो पण त्यातून माणूस मूळ प्रश्न सोडवण्याच्या तयारीला न लागता त्याचें कंगोरे बोथट करत स्वत:चा बचाव करत रहातो.
उत्पल यांनी म्हटल्याप्रमाणे
आपल्या दुःखाची प्रत, त्याची जातकुळी ओळखण्याइतपत आपला मानसिक विकास व्हायला
बंधने येतात.
मी जर समाजाचा भाग असेन तर समाजविचार सोडून विचार करणं मला योग्य वाटत नाही.
हे अशक्य होत जाईल एवढा आजूबाजूचा समाज बदलत चालला आहे की काय असं वाटतं. कारण समाजाला स्वत:च्या गरजा, त्रास याचा ग्राउंड लेवलवरचा विचार नकोच आहे अफूच्या धुंदीतच पडून रहाणे सोपे आहे ते तो स्वीकारतो. मग ही अफू धर्माची असो, करमणूकीची की वेगवेगळ्या अस्मितांची.
धर्म आणि श्रद्धा या देशातल्या लोकांच्या डीएनएमध्ये आहे.
असं नसून इथे लोकांना स्वत:च्या समस्या स्वत: मेहनत घेउन सोडवण्याची सवय नाहीय. पूर्वीपासूनच नाहीय.
शिवाय आजूबाजूचा समाज म्हणजे दु:ख, असुविधांनी गांजलेलाच समाज पुरोगाम्यांच्या परिघावर असतो का? अशी शंका येण्याजोगी परिस्थिती आहे.
वेश्यावस्ती, गरीब ह्यांची दु:ख भीडण्याइतकी, त्यांच्यात जाउन काम करण्याइतकी शक्ती माझ्याकडे नसेल. पण आज ज्या साध्या गोष्टी मला जाणवतात त्यावर एकत्रित तोडगा शोधण्याचीही एनर्जी माणसाला उरु न देणार्या प्रत्येक गोष्टीला माझा विरोध आहे. त्यात मुख्यत्वे धर्म आहे. एखाद्याला घरगुती प्रश्नावर किंवा दु:खावर धार्मिक तोडगा सुचवा तो सहज स्वीकारला जातो पण समुपदेशकाकडे जायचं सुचवा की तुमच्या आयुष्यातली छिद्रं शोधून त्याच्या पंचनामा केला जातो. मग विचाराने पुरोगामी असलेला सामान्य माणूस ’मी माझा भला’ या विचाराने अबोल रहातो, अवती भवतीच्या धार्मिक , प्रांतीय, जातीय आरड्याओरड्यापासून स्वत:चा बचाव करत. या सामान्य पुरोगाम्यापर्यंत पोहोचता येणारं नेटवर्क थिटं पडत चाललेलं आहे. आणि वेगवेगळ्या धार्मिक कृतीं हे आयतं नेटवर्क धर्मवीरांच्या हातात आहे त्याच्या कचकून वापर केला जातो. उदा. हळदीकुंकू समारंभ, मार्गशीर्ष ई. पूजा, वैगेरे. आणि हे विका-विकत घ्या संस्कृतीला सोईचं असल्याने त्याचा प्रचंड उदो उदो केला जातो. एकेकाळी फक्त कलेसाठी असं म्हणत माझ्या घरात स्थान मिळवलेल्या संस्कारभारतीचा प्रकार मी अनुभवलेला आहे. याआडून नको असलेल्या गोष्टी कश्या संभावितपणे दूर केल्या जातात आणि हवी असलेली विचारसरणी कशी जाणीवपूर्वक पेरली जाते याचा अनुभव मी घेतलाय. पण पुरोगामी विचारसरणी पेरायला अशी कुठलीच गोष्ट मला भेटली नाही ते काम पुस्तकांनी आणि आजूबाजूचा डोळस विचार यांनीच केलं. कदाचित हे पुरोगामी चळवळीचं मागे पडण्याचं कारण असावं. म्हणून
आपल्याला वादापेक्षाही कल्पकता दाखवावी लागेल. संध्याकाळी खेळायला म्हणून मुलांना एकत्र करून संघाची शाखा भरवली जाते. ही कल्पना चांगली आहे. आपण परिवर्तनाचा विचार अशा माध्यमातून रुजवू शकतो का? खेळण्यासाठी मुलांना एकत्र करून त्यांच्यात वैज्ञानिक विचार रुजवता येतील का? आपण परिवर्तनवादी आहोत याचा आपल्याला अहंकार आहे का?
हे मला पटतयं.पण परिवर्तन या शब्दांतील सर्व शक्यता एकत्र घेउन. जो विचार माझा नाही त्याला एखादा परिवर्तनवादी विचार म्हणात असेल तर तो माणूस माझा असं म्हणत माणसं गोळा करायला लागतील.
आपण सगळे मुळात एकाच व्यवस्थेत राहतोय. तुम्ही कम्युनिस्ट असा किंवा उजवे असा, ऑफिसातला बॉस किंवा व्यावसायिक असू तर आपले क्लायंट्स हेच आपले नियंत्रक आहेत हे सत्य आहे.
हेच पुरोगामी चळवळीच्या मुळावर आलय. महत्व आलंय ते तुमच्या व्यावसायिक, आर्थिक यशाला आणि समाजमान्य चेहर्याला. तुमचे विचार पटले तरी ते स्वीकारताना कराव्या लागणार्या सव्य-अपसव्यापेक्षा पाटावर बसून मंत्र म्हणत सव्य-अपसव्य करणं जास्त सोपय. मग त्याला समाज मानतो. तुम्ही कोपर्यात बसता आणि ते बसणंही सहन न होणारे तुम्हाला ’पुरोगामी दहशतवादी’ असं म्हणत सुटतात. आजची अर्थ-व्यवस्था विकणार्याला आणि विकत घेउ शकणार्यांनाच आपलं म्हणते. असं विक्रीयोग्य आपल्याकडे काय आहे? मग वरचं काम किती कठीण आहे हे लक्षात येईल. पण अशक्य नाही.
आपल्याला आपल्या वॉर्डमधल्या नगरसेवकाचे 'की रिझल्ट एरियाज' माहीत आहेत का? अशा वेळी आपण पंतप्रधान, आरबीआयचे गव्हर्नर यांच्या कामाविषयी बातम्या, लेख याच्या आधारे जोरात भांडू शकतो याची मला मौज वाटते.
अगदी अगदी. सामान्य माणूस कसा विचार करतो ह्याची अनुभवलेली एक झलक. एकदा रिक्षाने जाताना कोणत्या कारणांवरुन आठवत नाही (आमच्याकडील चांद्रभूमीय रस्त्यांमुळे असेल) पण शेजारचा माणूस नगरसेवकाला प्रामाणिकपणे बोल लावत होता. शेजारची बाई म्हणाली. "हा नवीन नगरसेवक निवडून आलाय तो काही कामाचा नाही जुनी बाई होती ती बरी होती. हळदीकुंकू तरी करायची."
या अश्या सामान्यांपर्यंत पोचण्यासाठीची ठाम व्यवस्था धर्माच्या हातात आहे. कारण धर्म या लोकांमधूनच रुजलाय. ती मोडून नवी तयार करण्याचे कष्ट घेणं फार अवघड आहे. (राष्ट्र सेवादलाबद्द्ल ऐकलय पण पुढे काय? )
धर्म हा सर्व धार्मिकांनी एकत्र येण्याचा अजेंडा आहे. तसं पुरोगामी लोकं एकत्र येउ शकतील असा अजेंडा म्हणजे पर्यावरण-रक्षण असू शकतो का? आज गणेश विसर्जनासाठी स्वीकारल्या गेलेल्या कृत्रिम तलावांना विरोध होतोय. सनातनच्या साईटवर निर्माल्य वाहत्या पाण्यातच का टाकावे हे पटवून देणारा लेख वाचला होता. (भले सनातन आमची नाही असे हिंदूत्ववादी म्हणात असले तरी ते हिंदूच म्हणवून घेतात). लोकांना पटणारा, व्यावहारिक अजेंडा शोधणं आवश्यक आहे. साध्या साध्या गोष्टीतही पुरोगाम्यांचा भाबडेपणा,परिस्थितीकडे दुर्लक्ष आणि प्क्षीय राजकारणाशी जुळवून न घेता येणे हा त्यांचा खरा दोष आहे. याच भाबडेपणातून आता आत्मपरिक्षण वैगेरे शब्द ऐकू येतायत. गरज, आपलं काय चुकलं ते बघण्याची नाही तर जे योग्य आहे त्यावर भर देऊन ते पटणार्या आणि न पटण्यार्याही लोकापर्यंत पोचवण्यार्या माणसं शोधण्याची आणि त्यांच्या दृढ इच्छाशक्तीची आहे. इतरांच्या व्यासपीठावर जागा शोधण्यापेक्षा स्वत:चं व्यासपीठ निर्माण करण्याची गरज आहे आणि हे सुद्धा काळ सोकावायच्या आधी.
जामच भरकटले. पण मनापासून वाटलं ते लिहीलं.
इतिहास हा एक कॅलिडोस्कोप आहे.
इतिहास हा एक कॅलिडोस्कोप आहे. पण तो सुटा करुन त्यातले काचतुकडे एकमेकांना जखमी करण्यासाठी वापरले जाणं हा जगभरात चालत आलेला खेळ आहे.
+१००. असलं प्रचंड अफलातून चांगलं वाचायला मिळतं म्हणून ऐसी वर रेंगाळतो.या वाक्याबद्दल धन्यवाद.
हे वेगळेपण म्हणजे हिंदू धर्माची शक्ती आहे हे समजून न घेता हिंदू धर्माला एका विचारसरणीच्या, एका देवाच्या, एका धर्मग्रंथाच्या दावणीला बांधणं हा बर्याच धार्मिक लोकांचा (नकळतचा) बेत असतो.
हे नाही पटलं. हिमालयात जाऊन एका पायावर उभं राहून तप करण्यापासून ते चालत्या मोटरसायकलीवरून देवळापुढे किचिंत मान झुकविण्यापर्यंत सगळ्या साधना आणि सगळ्या देव- देवता हिंदु वॅलीड मानतात. इतरांना त्यांच्या श्रद्धांबद्दल (नास्तिकाला ज्या टाकाऊ वाटतात) न बोचकारता कुणी स्वतःपुरतं नास्तिक रहायलाही बहुतेक हिंदुंची अडचण नसतेच.
एकुणात 'विका- विकत घ्या' ही सगळीकडचीच संस्कृती बनलीय. तथाकथीत धार्मिक बाबींचा त्याला अपवाद नाहीच.
मात्र एकुण सगळ्या दु:खाचे, अज्ञानाचे, अशांततेचे आणि अस्थीरतेचे मूळ इथल्या धर्मातच आहे, हा विचार प्रस्थापीत करण्यापूर्वी धर्माचे जे कांही सकारात्मक योगदान माणसांना एकमेकांशी जोडण्यात आहे, त्याचाही विचार करायला हवाच ना! सर्वसामान्य माणसाला नेहमी सिम्प्लिफाईड कांहीतरी हवं असतं..ते पुरोहीत (म्हणजे जे कोणी अशा प्रकारचे मिडल्मेन असतात ते) देतात..धर्म नाही. खरा धर्मविचार याहून वेगळा आहे; यावर प्रचंड प्रबोधन झालंय आणि अजून त्याच्या कैक पटींनी व्हायची गरज आहे. वेगवेगळ्या प्लॅटफोर्म्सवरून व्हायला हवं. त्या-त्या कालखंडात धर्मचिकित्सा करून कालोचीत बदल करण्याची सिस्टीम हिंदुंमध्ये होती. ती बंद पडली-पाडली. मक्तेदार तयार झाले. अजूनही यात बदल होऊ शकतात. त्यासाठी धर्म/ श्रद्धा लगेच स्क्रॅप करून टाका असं म्हणून चालणार नाही. उलट रिअॅक्शन येईल आणि तोच खेळ पुन्हा सुरू राहील. कुणाला जाळायचं नाही- कुणाला टाळायचं नाही- कुणाला पाळायचंही नाही..अशा विवेकी प्रबोधनाच्या सतत झिरपण्यानेच ते होईल, असे वाटते. पुरोगामी समाज म्हणजे तरी दुसरं काय?
छान प्रतिसाद इतरांना
छान प्रतिसाद
इतरांना त्यांच्या श्रद्धांबद्दल (नास्तिकाला ज्या टाकाऊ वाटतात) न बोचकारता कुणी स्वतःपुरतं नास्तिक रहायलाही बहुतेक हिंदुंची अडचण नसतेच.
मुळात नास्तिकवाद हा हिंदू धर्मातील एक भाग आहे. तुम्ही नास्तिक आणि हिंदू दोन्ही एकाच वेळी असु शकता याला धर्माचीच अधिकृत मान्यता आहे
हिंदू रहाण्यासाठी देव, देवळं, मुर्ती इत्यादी काहीही मानण्याची सक्ती हा धर्म करत नाही. (त्यामुळे एखाद्या 'नास्तिका'ने मुर्तींना पवित्र न मानणे हे प्रचंड धार्मिक कृत्य आहे. किंबहुना नास्तिकाने कसे वागावे याचे नियमही घालून दिल्याचे म्हटले जाते. ते नियम कोणाला माहित आहेत काय? मला नाहीत - उत्सुकता आहे.) पण ऐकून कोण घेतो.
हिंदु धर्माचा काही संस्थांनी मक्ता घेऊन सध्या जे चाल(व)ले आहे ते या धर्माचे अब्राहमीकरण आहे! :(
चार्वाक हे असे उदाहरण असू शकेल?
'नास्तिका'ने मुर्तींना पवित्र न मानणे हे प्रचंड धार्मिक कृत्य आहे.
त्याच्या स्वतःपुरते.. मात्र जे असं करीत नाहीत, त्यांच्या श्रद्धांचा त्याने/ तिने आदरच करणे (किमान त्यांविषयी अनुदार नसणे) अपेक्षीत असावे.
हिंदु धर्माचा काही संस्थांनी मक्ता घेऊन सध्या जे चाल(व)ले आहे ते या धर्माचे अब्राहमीकरण आहे!
'ब्राह्मणीकरण' ही नको अन 'अब्राहमीकरण' ही नको.
हिंदु धर्माचा काही संस्थांनी
हिंदु धर्माचा काही संस्थांनी मक्ता घेऊन सध्या जे चाल(व)ले आहे ते या धर्माचे अब्राहमीकरण आहे!
हे पुरोगामित्वाचे कन्सॉलिडेशन करणार्या व्यक्तींच्या बोटचेपेपणाचे फलित आहे.
बाकी "हिंदू धर्माचे अब्राहमीकरण" अशी एक पुडी सोडली की आपले म्हणणे आपोआप बाय डिफॉल्ट बरोबरच ठरते, बरोबर शिवाय काही असूच शकत नाही हे विसरलो म्हणा.
मुळात नास्तिकवाद हा हिंदू धर्मातील एक भाग आहे
१. नास्तिकवाद हा हिंदू धर्मातील एक भाग आहे.
२. हिंदू धर्मात डुक्कर, मासा, माकड यांच्या रुपात देव असू शकतो याला मान्यता आहे.
३. हिंदू धर्मात देव तुमच्या, माझ्यात सर्व चराचरात (अगदी वेश्येतदेखील) असतो याला देखील मान्यता आहे.
४. हिंदू धर्मात मुर्तीपुजा न करणे / नास्तीक असणे यालादेखील मान्यता आहे.
५. हिंदू धर्मात एकेश्वरवादी नसण्याला मान्यता आहे.
६. हिंदू धर्मात कोणताही एकच धर्मग्रंथ प्रमाण मानला नाही तरी त्याला मान्यता आहे.
७. हिंदू धर्मात परिवर्तनशीलतेला ( सहज नसली तरी) मान्यता आहे.
८. कान टोचणारा आणि न टोचणारादेखील हिंदू असू शकतो, वैद्यकिय कारणास्तव सुंता करावी लागली तरी तो धर्मभ्रष्ट होत नाही.
९. वादविवादात जेव्हा हवे तेव्हा हिंदू धर्म आहे येथपासून हा हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही तर ती एक जीवनपद्धती आहे इथपर्यंत आपले मत ताणायला वाव असतो.
एवढं सगळं असूनदेखील बर्याच हिंदूंना आपण हिंदू धर्मात जन्माला आलो याचा न्युनगंड असतो आणि हिंदू धर्माचा त्याग करावा वाटतो, हे एक कोडेच आहे.
शिवाय धर्माला अफूची गोळी माननार्या मार्क्सची विचारसरणी थोडक्या काळातच उलथली तरी त्याच हे प्रसिद्ध वाक्य अजून लोकांना दाखले द्यायला कामी येते. केवळ शतक दीडशतक देखील टिकू न शकलेल्या विचाराला एवढे महत्त्व पण जो काळाचे अनेक घाव पचवून अजूनही टिकून आहे तो धर्म अगदीच टाकावू वाटतो तेव्हा नक्की काय म्हणावे ते कळत नाही.
धर्म ऐहिक प्रश्न सोडविण्यास मदत करत नाही ? पैसा कसा कमवावा ते तुमच तुम्ही बघा ?? असं हिंदू धर्मातला कोणता ग्रंथ म्हणतो ? काही कळाले नाही.
असो.
मात्र फेसबूकवरील लेख इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार ! फेसबुक सारख्या सोशल साईटवर बराच कचरा येऊन पडत असतो. त्यातून असले चांगले लिखाण शोधायचे कष्ट करणे जीवावर येते. त्यामुळे जाणीवपुर्वक तिथे खाते उघडलेले नाहिये.
सोशल मिडियावर इतक्या संयंत भाषेत लिखाण करणार्या व्यक्ती आणि त्यांना सयंत प्रतिक्रिया देणार्या नेटकर्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत गेली की खर्या अर्थाने अच्छे दिन आले असे म्हणता येईल. चांगल्या प्रतिक्रिया म्हणजे छान, छान, अतिशय सहमत, +१ अशा प्रतिक्रिया नव्हेत. तर विरोधी विचार असलेला सुर देखील संयमाने उमटलेला असावा याला चांगली प्रतिक्रिया देणे म्हणावे अशी माझी व्याख्या आहे.
तर विरोधी विचार असलेला सुर
तर विरोधी विचार असलेला सुर देखील संयमाने उमटलेला असावा
मेजर +१००. हेच पाहिजे आहे.
एवढं सगळं असूनदेखील बर्याच हिंदूंना आपण हिंदू धर्मात जन्माला आलो याचा न्युनगंड असतो आणि हिंदू धर्माचा त्याग करावा वाटतो, हे एक कोडेच आहे.
माझ्यासारख्या सामान्यांकरिता, हिंदू धर्म हे नक्की काय आहे ह्याचं निश्चित उत्तर नाही. इतर धर्मांच्या मानाने त्याची एक amorphous स्थिती आहे, आणि कदाचित त्यामुळेच वेगवेगळे विचार त्यात प्रचलित आहेत. (कॉर्पोरेट भाषेत diversity.) हे नक्कीच भारी आहे.
मी हिंदू असल्याने कदाचित मला माझी ऐहिक विचारसरणी माझ्या आध्यात्मिक विचारांपेक्षा वेगळी ठेवता येते.
ह्याचा फायदा हा की मी स्वतःला हिंदू म्हणवूनही काही खास वेगळं करत नाही- माझ्या स्वतःच्या बुद्धीप्रमाणे वागत रहातो.
तोटा हा, की इतके छान छान विचार असूनही माझ्यावर ते पाळण्याचं काहीच बंधन नाही- ते विचार कृतीत आणावे लागत नाहीत.
.
पण मला रोज जगताना/विचार करताना/ निर्णय घेताना / कसं जगावं हे ठरवताना धर्माची गरज लागत नसेल तर मी हिंदू आहे असं आग्रहाने का म्हणावं?
मग मी नावापुरता हिंदू उरतो, आणि माझी मूल्यं स्वतःच्या डोक्यानेच ठरवतो. अशा माझ्या हिंदू असण्यात काय अर्थ? त्यामुळे मला रूढार्थाने मी हिंदू आहे असं वाटत नाही. म्हणून मी धर्म त्यागतो.
हा,पण जर "सगळे विचार जाणून घेऊ, त्यांनाही काहीतरी अर्थ असेल- ते टाकाऊ नाहीत" किंवा "हे विश्वचि माझे घर" असे विचार माझ्या डोक्यात यायला माझं हिंदू असणं कारणीभूत असेल, तर मला हिंदू रहाण्यात स्वारस्य आहे.
.
न्यूनगंड अहंगंडाबद्दल मला कल्पना नाही. इथे कुणाला हिंदू असल्याचा अहंगंड्/न्यूनगंड आहे का? त्याबद्दल ऐकायला आवडेल.
+१ माझे अनेक आचार
+१
माझे अनेक आचार सवयींने/संस्कारांनी हिंदु असण्यात मोडणारे आहे. त्यामुळे कोणी धर्म विचारला तर न लाजता तसेच न फुशारता, मी 'हिंदू' असे सांगतो मात्र त्यात मला मिरवण्यासारखे काहीही वाटत नाही.
कारण मी हा धर्म जाणतेपणी घेतलेला नाही तो मला चिकटला आहे आणि त्याचा मला नी माझा त्याला त्रास होणार नाही इतक्या अंतरावर आम्ही असतो
अंतरा किती मनापासून लिहीलयस.
अंतरा किती मनापासून लिहीलयस. हॅटस ऑफ टू यु. खूप विचार करतेस आणि सुसंगत मांडतेस.
धर्म हा सर्व धार्मिकांनी एकत्र येण्याचा अजेंडा आहे. तसं पुरोगामी लोकं एकत्र येउ शकतील असा अजेंडा म्हणजे पर्यावरण-रक्षण असू शकतो का?
टिळकांनी गणेशोत्सव त्याकरताच तर सार्वजनिक रीत्या सुरु केला.
___
बरच कळलं बरच नाही. पण जे कळलं ते आवडलं.
आभार...
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार...
@ अंतराआनंद - तुमचा मनापासून लिहिलेला प्रतिसाद आवडला. परिवर्तनाचा विचार करणाऱ्यांना प्रभावी पर्याय निर्माण करावे लागतील यात शंका नाही… (बाय द वे - या लेखाचं शीर्षक मी दिलेलं नाही. माझ्या फेसबुक पोस्टला शीर्षक नव्हतं.)
@ श्रीगुरुजी - अनवधनाने माझ्याकडून तुम्ही दुखावले गेलात त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. मी मुस्लिम अतिरेक्यांप्रमाणेच हिंदू अतिरेकी हा शब्द योजला कारण मला त्यातून 'धर्माबाबत अतीआग्रही असणं' असं सुचवायचं होतं. परंतु मुस्लिम दहशतवादामुळे आणि मुस्लिम अतिरेक्यांमुळे अतिरेकी या शब्दाला 'हिंसक' असा अर्थ प्राप्त झाला आहे. तिकडे माझं दुर्लक्ष झालं खरं.
मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत माझी माहिती चुकीची आहे असं तुमच्या प्रतिसादावरून दिसतं. त्याबद्दलही आपण माफ कराल अशी आशा बाळगतो. या प्रकरणाबाबत मी अधिक माहिती घेईन.
मी खरंच सहज म्हणूनच 'हिंदू अतिरेकी' असं लिहून गेलो कारण माझ्या मनातील अर्थ वेगळा होता. कृपया याची खात्री बाळगा. पण त्याच्या परिणामी तुम्ही दुखावला गेलात त्याबद्दल मी दिलगीर आहे. 'हिंदू अतिरेकी' ऐवजी 'हिंदू मूलतत्त्ववादी' म्हणणं योग्य ठरलं असतं. मी माझ्या लेखातही हिंदू आणि मुस्लिम मूलतत्त्ववादी हे शब्द वापरले आहेत.
उत्पल, तुमच्या भावना समजल्या
उत्पल,
तुमच्या भावना समजल्या आणि पोहोचल्या. माफी वगैरे इ. ची अजिबात गरज नाही आणि नव्हती. मूलतत्ववादी सर्वच धर्मात आहेत, परंतु फक्त मुस्लिम मूलतत्ववाद्यांनी दहशतवाद आणि हिंसेचा आश्रय घेतलेला आहे, इतरांनी नाही. दुर्दैवाने निधर्मांधांनी आपल्या लेखनात्/बोलण्यात "हिंदू अतिरेकी" हा शब्द "मुस्लिम अतिरेकी" या शब्दाइतकाच जनरल शब्द करून टाकला आहे आणि तेसुद्धा त्यासाठी कोणताही पूर्वोतिहास किंवा पुरावे नसताना. त्यामुळे सहजतेने हा शब्द वापरला गेला की खेद होतो आणि न राहवून मी प्रतिसाद देतो.
श्री श्री गुरुजी यांस एका विनम्र जंतूकडून
उत्पल यांना वर आपण असे म्हणता :
>> लेखात बरेचसे जनरलायझेशन आहे. गांधीजींचा खून हिंदूंनी केला हे वाक्य जनरलायझेशनच आहे.
आणि मग आपण असे म्हणता :
>> मूलतत्ववादी सर्वच धर्मात आहेत, परंतु फक्त मुस्लिम मूलतत्ववाद्यांनी दहशतवाद आणि हिंसेचा आश्रय घेतलेला आहे, इतरांनी नाही.
आपणास कुणी गांभीर्याने का घ्यावे? धन्यवाद आणि शुभेच्छा.
मी माझ्या प्रतिसादात फक्त
मी माझ्या प्रतिसादात फक्त गांधींविषयीचे वाक्य दिले. परंतु मूळ परिच्छेदात ओळीने ५-६ वाक्ये - हे हिंदूंनी केलं, ह्यामागे हिंदुत्ववादी होते इ. इ. लिहून १९४८ पासून २०१५ पर्यंत एक जनरल पॅटर्न आहे आणि त्यामध्ये एक संलग्नता आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. एका मोठ्या कालखंडात घडलेल्या तुरळक आयसोलेटेड घटना घेऊन त्याचा एक जनरल पॅटर्न करायचा प्रयत्न केला गेला आहे.
ख्रिश्चनांच्या बाबतीतही अशाच आयसोलेटेड घटना घडलेल्या आहेत (उदा. ओरिसातील स्वामी लक्ष्मणानंद व त्यांच्या ४ सहकार्यांचा स्थानिक ख्रिश्चनांनी केलेला खून, २००१ मधील गुजरातमधील भूकंपानंतर "देवानेच गुजरात्यांना शिक्षा दिली" अशी प्रक्षोभक प्रतिक्रिया देणारा कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील टी जॉन नावाचा मंत्री, झाबुआमधील ननवर स्थानिक ख्रिश्चनांनी बलात्कार केलेला असताना तो बलात्कार हिंदू मूलतत्ववाद्यांनीच केला असा झालेला आरोप इ.इ.). परंतु लेखात ख्रिश्चन मूलतत्ववाद याबद्दल कोठेही उल्लेख नाही.
आणि मुस्लिमांविषयी म्हणाल तर फक्त भारतात नव्हे तर जगातल्या अनेक देशात मुस्लिम मूलतत्ववाद्यांनी दहशत आणि हिंसेचा आश्रय घेतलेला आहे हे सत्य आहे. जगभरातील अनेक न्यायालयात हे निर्विवाद सिद्ध झाले आहे. याची असंख्य उदाहरणे आहेत. सर्वच उदाहरणात जवळपास एकच पॅटर्न आहे. आपल्यावर अन्याय होतोय असा सामूहिक कांगावा सुरू करायचा, नंतर वेगळा देश तोडून मागायचा (उदा. काश्मिर, चेचन्या, अमेरिकेतील टेक्सस राज्य, इ.) आणि नंतर जिथे शक्य आहे तिथे आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी दहशतवादी हल्ले सुरू करायचे हाच पॅटर्न सर्वसाधारणपणे सर्वत्र वापरला जातो.
त्यामुळेच वरील लेखात हिंदूविषयी लिहिताना एका मोठ्या कालखंडात घडलेल्या तुरळक आयसोलेटेड घटना घेऊन अशा घटना नेहमीच घडल्या जाणार्या घटना आहेत असे दाखवून एक जनरलायझेशन करायचा प्रयत्न केला गेला आणि त्याच वेळी जगाच्या पाठीवरील वेगवेगळ्या देशातील मुस्लिम मूलतत्ववादी दहशतवादाचा जो एक जनरल पॅटर्न वापरतात जातो त्याविषयी मात्र फारसे लिहिले गेलेच नाही.
आणखी काही आयसोलेटेड संघटना
मुस्लिम नसलेल्या - भारतीय दहशतवाद्यांच्या आणखी काही आयसोलेटेड संघटना. यातील अनेक संघटनांनी भारताचे पंतप्रधान, भारतातील राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या यशस्वी हत्या करवून आणल्या आहेत.
१. युनायटेड लिबरल फ्रंट ऑफ आसाम
२. बब्बर खालसा इंटरनॅशनल
३. खलिस्तान कमांडो फोर्स
४. तमिळनाडू लिबरेशन आर्मी
५. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम
या यादीत मध्यभारतातील नक्षलवादी चळवळीतील संघटनांची नावे नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे तेही हिंदूधर्मीयच आहेत.
नंतर वेगळा देश तोडून मागायचा (उदा. काश्मिर, चेचन्या, अमेरिकेतील टेक्सस राज्य, इ.) आणि नंतर जिथे शक्य आहे तिथे आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी दहशतवादी हल्ले सुरू करायचे हाच पॅटर्न सर्वसाधारणपणे सर्वत्र वापरला जातो.
एक्झॅक्टली. ईशान्य भारतातील नॉन-मुस्लिम दहशतवादी हेच करताहेत. दक्षिण भारतातील नॉन मुस्लिम दहशतवाद्यांनी हेच केले आहे आणि पंजाबातही नॉन मुस्लिम दहशतवाद्यांनी हेच केले होते.
काहीही! तुम्ही दिलेल्या
काहीही! तुम्ही दिलेल्या संघटना अतिरेकी संघटना म्हणून घोषीत असल्या (आणि असाव्याही) तरी त्या संघटना "हिंदू अतिरेकी" ह्या संकल्पनेत कशा बसतात? ह्या सगळ्या संघटनांचा उदय वेगवेगळ्या कारणांनी झालाय आणि उद्दिष्टही वेगवेगळी आहेत. ह्या संघटनांनी "हिंदू धर्म खतरेंमे" म्हणल्याचं ऐकीवात नाही की ह्यांनी केवळ दुसर्या धर्माच्या लोकांवर अत्याचार केलेले ठाऊक नाही. ह्यांचा लढा दूसर्या धर्माच्या विरोधात नाही आणि त्यामुळे ह्या धर्मांध / हिंदुत्ववादाने झपाटलेल्या ठरत नाहीत. ह्यांना हिंदू मुलतत्ववादी संघटना तरी का म्हणावं?
काहीही! तुम्ही दिलेल्या
काहीही! तुम्ही दिलेल्या संघटना अतिरेकी संघटना म्हणून घोषीत असल्या (आणि असाव्याही) तरी त्या संघटना "हिंदू अतिरेकी" ह्या संकल्पनेत कशा बसतात? ह्या सगळ्या संघटनांचा उदय वेगवेगळ्या कारणांनी झालाय आणि उद्दिष्टही वेगवेगळी आहेत. ह्या संघटनांनी "हिंदू धर्म खतरेंमे" म्हणल्याचं ऐकीवात नाही की ह्यांनी केवळ दुसर्या धर्माच्या लोकांवर अत्याचार केलेले ठाऊक नाही. ह्यांचा लढा दूसर्या धर्माच्या विरोधात नाही आणि त्यामुळे ह्या धर्मांध / हिंदुत्ववादाने झपाटलेल्या ठरत नाहीत. ह्यांना हिंदू मुलतत्ववादी संघटना तरी का म्हणावं?
ह्यातल्या अनेक संघटना राजकीय हक्कांसाठी लढत आहेत असं म्हणता येईल असं मला वाटतं. पण मुख्य मुद्दा दहशत निर्माण करण्याच्या कारवायांत या गुंतलेल्या आहेत का हा आहे. ज्यांना यांचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, मानसिक, वैचारिक विरोध आहे त्यांच्याशी लढताना इतर लोकांच्या मनात या संघटना दहशत निर्माण करतात का ? हा एक (एकमेव नव्हे) निकष आहे दहशतवादाच्या व्याख्येत. इतर लोक म्हंजे ज्यांच्याशी तुमची कोणतीही (वैचारिक, राजकीय, धार्मिक वगैरे) लढाई नाही ते. त्यांच्याविरुद्ध हिंसामार्गाचा अवलंब या संघटना करतात का ? - हा एक निकष आहे.
दुसरा म्हंजे जे लोक टार्गेट केले जातात ते टार्गेट करताना जाणूनबुजून इतर लोकांनाच जास्त इजा पोहोचेल अशा कारवाया केल्या जातात का ?
त्या इतर लोकांना मारण्यासाठी निवडताना त्या इतर लोकांचा धर्म हे त्यांचे मुख्य क्वालिफिकेशन असते का ?
आता कोलॅटरल डॅमेज चा मुद्दा उपस्थित होईलच. पण तो मुद्दा नाही.
( मला वाटतं यातले काही प्वाईंट्स तुम्ही खाली मांडलेले आहेत.)
दहशतवाद
दहशतवाद याचा अर्थच मुळी दहशतीने आपला दबदबा निर्माण करणे, स्वतःकडे लक्ष्य वेधून घेऊन आपले उपद्रवमूल्य दाखवून देणे. उपद्रवमूल्याचे बार्गेनिंग करण्यासाठी जास्तीत जास्त (निरपराध) नागरिक वेठीस धरले गेलेच पाहिजेत. नाक दाबले की तोंड उघडते ही यांची रणनीती असते. रेल् वे रूळ उखडले किंवा रेल गाडीमध्ये स्फोट केले तर ती हिंसा सर्वांविरुद्धच ठरते. आणि ती जाणून बुजून केलेली असते. राजकीय मागण्या असतील तर सरकारला हिंसात्मक कृत्यांद्वारे सळो की पळो करून सोडण्याचाच हेतू असतो. आणि यात नेहमीच सर्वसामान्य नागरिक(च) भरडले जातात. सामान्य माणसाचे जितके जास्त नुकसान, तितकी सरकारची धावाधाव अधिक असे हे साधे समीकरण असते. सगळे दहशतवादी मूलतत्त्ववादी नसतात आणि सगळे मूलतत्त्ववादी दहशतवादी नसतात, पण ते एकमेकांच्यात असतात.
मूलतत्त्ववादी हे सर्वात प्रथम धर्मरक्षावादी असतात. जी सुधारणा/बदल 'आम्हांला' मान्य असेल, तीच आम्ही घडू देऊ. बदलामुळे धर्म भ्रष्ट होतो. तो आमच्या मते शुद्ध स्वरूपात राखणे हे आमचे परमकर्तव्य आहे आणि कोणत्याही किंमतीनिशी ते आम्ही पार पाडू असा अभिनिवेश बाळगल्यावर 'कोणतीही किंमत' म्हणजे किती, याचे भान सुटणे अटळ असते. आणि मग मूलतत्त्ववादी आणि अतिरेकी आणि दहशतवादी यांतल्या सीमारेषा अस्पष्ट होत जातात.
काहीही हं श्री(गुरुजी).
... नंतर वेगळा देश तोडून मागायचा (उदा. काश्मिर, चेचन्या, अमेरिकेतील टेक्सस राज्य, इ.) ...
बरे आहात ना? टेक्सासातल्या स्थानिक बातम्यांमध्येसुद्धा जी गोष्ट चर्चेला येत नाही ती तुम्हाला बरी समजली. काहीही हं श्री(गुरुजी).
--
अतिशहाण्याच्या प्रतिसादात आय.आर.ए.ची भर घालता येईल. (पण ती संघटना भारतीय नव्हे.)
मी बरा आहे. तुम्ही कशा
मी बरा आहे. तुम्ही कशा आहात?
लुईस फराक्खान हे नाव ऐकलंय का? टेक्सस राज्याला मुस्लिम राज्य असे घोषित करावे अशी ९० च्या दशकात झालेली मागणी माहित आहे का? टेक्ससमध्ये शरिया कायदेपद्धती लागू करावी अशी मुस्लिम संघटनांनी केलेली मागणी माहिती आहे का? तुम्ही टेक्ससमध्ये कधीपासून आहात याची कल्पना नाही. ९० च्या दशकात अमेरिकेत असाल तर वरील सर्व माहिती असती.
काहीही हं श्री(गुरुजी).
टेक्सस राज्य अमेरिकेपासून वेगळं असावं अशी मागणी वेगवेगळे लोकं १९ व्या शतकापासून करत आहेत. कट्टर टेक्सन असण्याची ती निशाणी आहे. (नाही, १९ व्या शतकापासून मी टेक्सासात काय, कुठेच नव्हते.) मुस्लिम संघटनांनी अशी मागणी केली असेल तर त्या संघटना खरी आणि सच्ची टेक्सन अस्मिता बाळगून आहेत.
आधीच्या प्रतिसादातील खालील
आधीच्या प्रतिसादातील खालील वाक्य -
टेक्सस राज्य अमेरिकेपासून वेगळं असावं अशी मागणी वेगवेगळे लोकं १९ व्या शतकापासून करत आहेत. कट्टर टेक्सन असण्याची ती निशाणी आहे.
आणि या प्रतिसादातील हे वाक्य -
टेक्सासात स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीचा इतिहास आहे वगैरे गोष्टी साफ नजरेआड.
आता कोणते पदक देऊ? ऐसीवर सर्वोत्कृष्ट कोलांट्या उड्या मारण्यासाठी एखादे पदक असले तर तेच देतो.
काहीही हं श्री(गुरुजी).
हा हा हा. माहिती आणि तुमच्या प्रतिसादांचं वर्णन यांच्यातला फरक तुम्हाला समजेनासा झालाय. वैचारिक अप्रामाणिकपणा होऊन गेलाच (बजरंग दलाच्या रॅलीला महत्त्व नाही, पण फराखान किती महत्त्वाचा) पण आता तर विचारच बंद झालेला दिसतोय. किंवा थोडं भाषाशास्त्र, त्यातल्या खवचटपणा, उपरोध, अन्योक्ती या गोष्टी शिकून येता का प्लीज?
स्वगत - लोक स्वतःचा वेळ खर्च करून नादिया कोमानचीला गंड येईल अशा उड्या मारून आपली करमणूक करून देतात. मज्जानू आंजा चर्चा. कोणीतरी श्रीगुरुजींना बॉलिंग करा ना, मला आरामात बसून गम्माडीगंमत बघायच्ये.
९० च्या दशकात अमेरिकेत असाल
९० च्या दशकात अमेरिकेत असाल तर वरील सर्व माहिती असती.
मी अमेरिकेत नव्वद सालपासून आहे. आणि जेव्हा फराख्खान जोमात होता तेव्हाही ओजे सिंप्सनच्या खटल्याला जितकी माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळालेली होती त्याच्या एक शतांशही प्रसिद्धी फराख्खान, त्याच्या मागण्या यांना मिळाली नव्हती. आणि त्याच सुमाराला बाबरी मशिदीचं जे प्रकरण झालं त्याचे पडसाद भारतात अजूनही उमटताना दिसतात. दहशतवादाचा मूळ उद्देश हा जनमानसात धडकी भरवणं, ती घटना सामूहिक मानसात कोरून ठेवणं हा असतो. अमेरिकेत आत्ता लोकांना विचारलं की फराख्खान माहित्ये का कोण ते? तर त्यांना सांगता येणार नाही. भारतात बाबरी मशीद हा शब्द उच्चारला तरी भावना पेटतात. यावरून कुठचा दहशतवाद मोठा? हे तुम्हीच सांगा. हत्तीशी चिलटाची काय तुलना करताय!
मी लुईस फराक्खानला किती
मी लुईस फराक्खानला किती प्रतिसाद मिळाला याविषयी लिहिले नव्हते. चेचन्या, काश्मिर इ. भागांप्रमाणे अमेरिकेत सुद्धा अशाच प्रकारची मागणी मुस्लिम मूलतत्ववाद्यांकडून झाली आहे असे मी लिहिले होते. जगाच्या वेगवेगळ्या भागात जिथेजिथे मुस्लिम लोकसंख्या वाढायला लागते तिथेतिथे कालांतराने वेगळ्या देशाची मागणी करण्याची एक मोड्यूस ऑपरंडी आहे. अमेरिकेत सुद्धा त्याचे सूतोवाच झाले. ९० च्या दशकात लुईस फराक्खानला मिळत असलेला प्रतिसाद आता खूप कमी झाला असला तरी भविष्यात अशी मागणी होणारच नाही असे सांगता येणार नाही.
मी लुईस फराक्खानला किती
मी लुईस फराक्खानला किती प्रतिसाद मिळाला याविषयी लिहिले नव्हते.
हम्म्म, मिपावरचे श्रीगुरुजी तुम्हीच काहो? कारण तुमच्यासारखेच विचार मांडणाऱ्या त्या आयडीने लिहिलेलं आहे की 'नुसती टक्केवारी उपयोगाची नाही. अडकून पडलेल्या प्रोजेक्ट्सचा साईझ सुद्धा महत्त्वाचा आहे.' असं म्हटलं होतं. आता तुम्ही म्हणताय की परिणामाचा साइझ महत्त्वाचा नाही, घटना घडलीय ती बघा. ते जर तुम्हीच असाल तर या प्रकाराला सोयीस्कर दुटप्पीपणा म्हणतात.
तुम्ही लहानलहान घटना एकत्र करून त्याचं जनरलायझेशन करण्याचा प्रयत्न करत आहात तर. मग मी मगाशी विचारलेल्या बजरंग दलाची तलवार घेऊन काढलेली रॅली दहशतवाद मानावी की नाही या प्रश्नाच्या उत्तराला का बगल देत आहात? तसंच बाबरी मशीद पाडणं हा दहशतवादच आहे. हे दोन आणि इतर दंगलींचे संदर्भ गोळा करून हिंदू अतिरेकीपणाबद्दलही सहज जनरलायझेशन करता येईल की. बायदवे, हिंदूंची 'पितृभू, पुण्यभू' व्याख्या तुम्ही मानता का? तसं असल्यास शीख हे तुमच्या मते हिंदू आहेत का? हे विचारण्याचं कारण असं, की शीखांनीदेखील स्वतंत्र देश मागितला होता.
मुळात या लेखात उत्पलसारख्या विचारी माणसाने संयत भाषेत आत्मपरीक्षण केलेलं होतं. त्यावर तुम्ही खुसपटं काढल्यावर तुमची माफी मागण्याचा मोठेपणा घेतला. ती माफी मागण्याची काहीच गरज नव्हती असं माझं स्पष्ट मत आहे. मला वाटतं की तुम्हीच आत्मपरीक्षण करून 'हिंदू अतिरेकी' हा शब्दप्रयोग का योग्य आहे हे समजून घ्या. आणि त्यांच्याकडून माफी मागा.
अजून एक प्रश्न - तुम्ही हिंदुत्ववादी आहात का? याचं उत्तर हो असल्यास, उत्पलने जसं स्वतःला पुरोगामी जाहीर करून स्वतःच्या पुरोगामीपणाचं सच्चं आत्मपरीक्षण केलेलं आहे तसं हिंदुत्ववाद्याचं आत्मपरीक्षण लिहिण्याची तुमच्यात धमक आहे का?
हम्म्म, मिपावरचे श्रीगुरुजी
हम्म्म, मिपावरचे श्रीगुरुजी तुम्हीच काहो?
मीच तो.
कारण तुमच्यासारखेच विचार मांडणाऱ्या त्या आयडीने लिहिलेलं आहे की 'नुसती टक्केवारी उपयोगाची नाही. अडकून पडलेल्या प्रोजेक्ट्सचा साईझ सुद्धा महत्त्वाचा आहे.' असं म्हटलं होतं. आता तुम्ही म्हणताय की परिणामाचा साइझ महत्त्वाचा नाही, घटना घडलीय ती बघा. ते जर तुम्हीच असाल तर या प्रकाराला सोयीस्कर दुटप्पीपणा म्हणतात.
ते वाक्य कोणत्या संदर्भात लिहिले आहे ते पहा. इथे आपण पूर्णपणे वेगळ्या संदर्भात बोलत आहोत.
तुम्ही लहानलहान घटना एकत्र करून त्याचं जनरलायझेशन करण्याचा प्रयत्न करत आहात तर.
लहानलहान घटना?????????????
मग मी मगाशी विचारलेल्या बजरंग दलाची तलवार घेऊन काढलेली रॅली दहशतवाद मानावी की नाही या प्रश्नाच्या उत्तराला का बगल देत आहात?
याचे उत्तर एका वेगळ्या प्रतिसादात दिले आहे.
तसंच बाबरी मशीद पाडणं हा दहशतवादच आहे.
हा दहशतवाद नाही.
हे दोन आणि इतर दंगलींचे संदर्भ गोळा करून हिंदू अतिरेकीपणाबद्दलही सहज जनरलायझेशन करता येईल की.
हिंदूंनी धर्मासाठी केलेली दहशतवादी कृत्ये व त्यासाठी किती हिंदू न्यायालयात दोषी आढळले ते सांगा. म्हणजे मग जनरलायझेशन होईल का नाही ते कळेल.
बायदवे, हिंदूंची 'पितृभू, पुण्यभू' व्याख्या तुम्ही मानता का? तसं असल्यास शीख हे तुमच्या मते हिंदू आहेत का? हे विचारण्याचं कारण असं, की शीखांनीदेखील स्वतंत्र देश मागितला होता.
हा एक पूर्ण वेगळा विषय आहे. याविषयी वेगळा धागा काढा. तिथे मी लिहीन.
मुळात या लेखात उत्पलसारख्या विचारी माणसाने संयत भाषेत आत्मपरीक्षण केलेलं होतं. त्यावर तुम्ही खुसपटं काढल्यावर तुमची माफी मागण्याचा मोठेपणा घेतला. ती माफी मागण्याची काहीच गरज नव्हती असं माझं स्पष्ट मत आहे. मला वाटतं की तुम्हीच आत्मपरीक्षण करून 'हिंदू अतिरेकी' हा शब्दप्रयोग का योग्य आहे हे समजून घ्या. आणि त्यांच्याकडून माफी मागा.
उत्पल यांनी माफी मागण्याची गरज नव्हती हे मी सुद्धा एका प्रतिसादात लिहिले आहे. त्यांच्या मूळ लेखावर मी प्रतिसाद दिल्यावर तुमच्या मते मी खुसपटं काढली. म्हणजे त्यांची मते मी अजिबात विरोध न करून (म्हणजे तुमच्या मते खुसपटे न काढून) आणि निमूटपणे मान्य करून टाळ्या वाजवाव्या ही तुमची अपेक्षा दिसतेय. शेषराव मोर्यांनी याच मानसिकतेचे "वैचारिक दहशतवाद" असे सार्थ वर्णन केले आहे. "हिंदू अतिरेकी" हा अशाच निधर्मांध विचारवंतांनी प्रसवलेला शब्द आहे. हिंदू दहशतवाद अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसताना "हिंदू अतिरेकी", "हिंदू दहशतवाद", "भगवा दहशतवाद" असे शब्द वारंवार उच्चारणे आणि जर कोणी धर्माच्या आधारावर अस्तित्वात असलेल्या धार्मिक दहशतवादाबद्दल "मुस्लिम अतिरेकी", "हिरवा दहशतवाद" असे शब्द वापरले की "दहशतवादाला धर्म, जात, रंग, रूप नसते" असे हमखास टाळीचे वाक्य फेकणे हेच निधर्मांधांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
"हिंदू अतिरेकी" असा शब्द अजिबात योग्य नाही आणि "हिंदू दहशतवाद" असा हिंदू धर्मावर आधारीत कोणताही दहशतवाद अस्तित्वात नाही. त्यामुळे मी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीसुद्धा तुम्हाला खात्री असेल तर हिंदू धर्मावर आधारीत दहशतवादी कृत्ये केल्याबद्दल जे दोषी आढळले आहेत अशा हिंदू अतिरेक्यांची नावे सांगावी.
अजून एक प्रश्न - तुम्ही हिंदुत्ववादी आहात का? याचं उत्तर हो असल्यास, उत्पलने जसं स्वतःला पुरोगामी जाहीर करून स्वतःच्या पुरोगामीपणाचं सच्चं आत्मपरीक्षण केलेलं आहे तसं हिंदुत्ववाद्याचं आत्मपरीक्षण लिहिण्याची तुमच्यात धमक आहे का?
होय. मी हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्ववाद्यांसंबंधी अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यासंबंधी नक्की लिहेन.
ते वाक्य कोणत्या संदर्भात
ते वाक्य कोणत्या संदर्भात लिहिले आहे ते पहा. इथे आपण पूर्णपणे वेगळ्या संदर्भात बोलत आहोत.
दुटप्पीपणा मान्य केलात तर इथले वाचक निदान तुम्हाला प्रामाणिकपणाबद्दल तरी काही मार्क देतील. एका बाजूला जवळपास शून्य उपद्रवमूल्य असलेल्या फराक्खानाचं उदाहरण मिरवायचं, आणि दुसऱ्या बाजूला 'नुसत्या घटना मोजू नका, त्यांचा परिणाम बघा' असं म्हणायचं. हा सोयीस्कर दुटप्पीपणाच आहे.
हा दहशतवाद नाही.
बाबरी मशीद पाडणं हा धार्मिक दहशतवाद नसेल तर तुमच्या व्याख्या फारच कोत्या दिसतात. तुम्ही तुमची धार्मिक दहशतवादाची व्याख्या लिहून का सांगत नाही? म्हणजे संवाद साधायला सोपं पडेल. पण आत्तापर्यंतचा तुमचा वावर बघितला तर तुम्ही मांडणी करण्यापेक्षा आक्षेप घेण्यात वाकबगार आहात हे दिसून येतं.
"हिंदू अतिरेकी" हा अशाच निधर्मांध विचारवंतांनी प्रसवलेला शब्द आहे. हिंदू दहशतवाद अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसताना "हिंदू अतिरेकी", "हिंदू दहशतवाद", "भगवा दहशतवाद" असे शब्द वारंवार उच्चारणे आणि जर कोणी धर्माच्या आधारावर अस्तित्वात असलेल्या धार्मिक दहशतवादाबद्दल "मुस्लिम अतिरेकी", "हिरवा दहशतवाद" असे शब्द वापरले की "दहशतवादाला धर्म, जात, रंग, रूप नसते" असे हमखास टाळीचे वाक्य फेकणे हेच निधर्मांधांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
निधर्मांध??? अहाहा. सर्वधर्मसमावेशक उदारमतवादी डोळस आणि स्वतःचं गंभीरपणे आत्मपरीक्षण करू शकणाऱ्या लोकांना शिव्या देण्याची ही पद्धत सुंदर आहे. फार आवडली. एकंदरीत तुम्हाला लेबलं लावणं फार छान जमतं.
हिंदू धर्मावर आधारीत दहशतवादी कृत्ये केल्याबद्दल जे दोषी आढळले आहेत अशा हिंदू अतिरेक्यांची नावे सांगावी.
हिंदू देशात हिंदू दहशतवाद इतका माजला आहे की पोलिसदेखील घाबरतात. तसं नसतं तर कायद्याविरुद्ध शस्त्रं पाजरत निघालेल्या रॅलीतल्या लोकांना अटक झाली असती. माया कोदनानींबाबत गुजरात सरकारच म्हणतं की त्यांना फाशीची शिक्षा मागू नये. बजरंग दलाच्या लोकांचे व्हीडियो उपलब्ध असतानाही त्यांना शिक्षा होत नाहीत. जाऊदेत, हे किती वेळा सांगायचं...
हा एक पूर्ण वेगळा विषय आहे. याविषयी वेगळा धागा काढा. तिथे मी लिहीन.
मी काय म्हणतो, तुम्हीच हिंदू म्हणजे नक्की कोण याबाबत काही मांडणी का करत नाही? स्वतःची मांडणी करणं, आणि येणाऱ्या आक्षेपांना उत्तर देणं कठीण असतं. याउलट आक्षेप घेणं सोपं असतं.
असो. तुमच्या एकंदरीत वावरावरून, उत्तरं देणं टाळण्याच्या पद्धतीवरून, स्वतः मांडणी न करण्याच्या पद्धतीवरून तुमच्यात किती धमक आहे हे उघड आहे. तेव्हा तुमच्यावर अजून किती वेळ फुकट घालवावा असा प्रश्न मला पडलेला आहे.
दुटप्पीपणा मान्य केलात तर
दुटप्पीपणा मान्य केलात तर इथले वाचक निदान तुम्हाला प्रामाणिकपणाबद्दल तरी काही मार्क देतील. एका बाजूला जवळपास शून्य उपद्रवमूल्य असलेल्या फराक्खानाचं उदाहरण मिरवायचं, आणि दुसऱ्या बाजूला 'नुसत्या घटना मोजू नका, त्यांचा परिणाम बघा' असं म्हणायचं. हा सोयीस्कर दुटप्पीपणाच आहे.
त्याच्यात कोणताही दुटप्पीपणा नाही. तो धागा केंद्र सरकारच्या एक वर्षाच्या मूल्यमापनावर होता. त्यात एका प्रतिसादकाने असे लिहिले होते की भूसंपादनामुळे ८% प्रोजेक्ट्स अडकून पडले आहेत. त्यावर मी असे लिहिले होते की टक्केवारीच्या बरोबरीने प्रोजेक्ट्सचा साईझ देखील बघितला पाहिजे. ५ विहिरी खणण्याचे ५ प्रोजेक्ट्स अडकून पडले आहेत आणि १ धरण बांधण्याचा प्रोजेक्ट अडकून पडला आहे, अशी तुलना केली तर विहिरींची संख्या जास्त असली तरी धरण हे जास्त महत्त्वाचे आहे अशा स्वरूपाचा तो अर्थ होता. तो समजला नसेल तर माझा नाईलाज आहे.
बाबरी मशीद पाडणं हा धार्मिक दहशतवाद नसेल तर तुमच्या व्याख्या फारच कोत्या दिसतात. तुम्ही तुमची धार्मिक दहशतवादाची व्याख्या लिहून का सांगत नाही? म्हणजे संवाद साधायला सोपं पडेल. पण आत्तापर्यंतचा तुमचा वावर बघितला तर तुम्ही मांडणी करण्यापेक्षा आक्षेप घेण्यात वाकबगार आहात हे दिसून येतं.
बाबरी मशीद हा एक फार मोठा विषय आहे. हा धागा वेगळ्या विषयावर आहे. त्यामुळे त्या विषयावर लिहिण्याची ही जागा नाही. तुम्ही बाबरी मशीद या विषयावर एक वेगळा धागा काढल्यास तिथे सविस्तर लिहीन. धार्मिक दहशतवादाची व्याख्या विचारलीच आहे म्हणून सांगतो. "कोणतेही कारण नसताना फक्त स्वतःच्या धर्मासाठी निष्पाप नागरिकांची हत्या करणे" ही धार्मिक दहशतवादाची व्याख्या आहे.
निधर्मांध??? अहाहा. सर्वधर्मसमावेशक उदारमतवादी डोळस आणि स्वतःचं गंभीरपणे आत्मपरीक्षण करू शकणाऱ्या लोकांना शिव्या देण्याची ही पद्धत सुंदर आहे. फार आवडली. एकंदरीत तुम्हाला लेबलं लावणं फार छान जमतं.
बेगडी धर्मनिरपेक्षता आचरणात आणणार्या ढोंगी पुरोगाम्यांकरिता निधर्मांध हा शब्द अगदी चपखल आहे.
हिंदू देशात हिंदू दहशतवाद इतका माजला आहे की पोलिसदेखील घाबरतात. तसं नसतं तर कायद्याविरुद्ध शस्त्रं पाजरत निघालेल्या रॅलीतल्या लोकांना अटक झाली असती. माया कोदनानींबाबत गुजरात सरकारच म्हणतं की त्यांना फाशीची शिक्षा मागू नये. बजरंग दलाच्या लोकांचे व्हीडियो उपलब्ध असतानाही त्यांना शिक्षा होत नाहीत. जाऊदेत, हे किती वेळा सांगायचं...
पोलिस हिंदू दहशतवाद्यांना घाबरतात हे निधर्मांधांचे नेहमीचेच निराधार आरोप आहेत. मुस्लिम दहशतवादी बिनधास्त दहशतवादी कृत्ये करतात. बर्याच प्रकरणात ते सापडले आहेत व गुन्हे सिद्ध होऊन त्यांना शिक्षा देखील झाली आहे. परंतु हिंदू आजपर्यंत कोणत्याच दहशतवादी कृत्यात असल्याचे आढळलेले नाही. बजरंग दलाचे दहशतवादी कृत्ये करण्याचे पुरावे असतील तर त्यांना नक्कीच पकडावे. परंतु पुरावे नसतील तर गळा काढण्यात अर्थ नाही.
मी काय म्हणतो, तुम्हीच हिंदू म्हणजे नक्की कोण याबाबत काही मांडणी का करत नाही? स्वतःची मांडणी करणं, आणि येणाऱ्या आक्षेपांना उत्तर देणं कठीण असतं. याउलट आक्षेप घेणं सोपं असतं.
असो. तुमच्या एकंदरीत वावरावरून, उत्तरं देणं टाळण्याच्या पद्धतीवरून, स्वतः मांडणी न करण्याच्या पद्धतीवरून तुमच्यात किती धमक आहे हे उघड आहे. तेव्हा तुमच्यावर अजून किती वेळ फुकट घालवावा असा प्रश्न मला पडलेला आहे.
माझ्यावर अजून किती वेळ फुकट घालवावा हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मी इतर काही जणांसारखा "पुरोगामी", "विचारवंत" इ. इ. नसल्याने तुम्ही माझ्याकडून मांडणीची अपेक्षाच कशी धरता याचे आश्चर्य वाटत आहे.
५ विहिरी खणण्याचे ५
५ विहिरी खणण्याचे ५ प्रोजेक्ट्स अडकून पडले आहेत आणि १ धरण बांधण्याचा प्रोजेक्ट अडकून पडला आहे, अशी तुलना केली तर विहिरींची संख्या जास्त असली तरी धरण हे जास्त महत्त्वाचे आहे अशा स्वरूपाचा तो अर्थ होता.
अहो तो अर्थ समजला, म्हणूनच मी एका बाबरी मशिदीचा हत्ती आणि फराक्खानसारखं चिलट अशी तुलना होऊ शकत नाही असं दाखवलं. आता तुम्हाला बाबरी मशीद पाडणं हा धार्मिक दहशतवाद वाटतच नाही. ते का हे समजावून सांगणारा एक लेख लिहिलात तर बोलणं होऊ शकेल. नाहीतर तुम्ही केवळ भगवा चष्मा वापरत आहात असंच म्हणावं लागेल. तसंही त्या धाग्यावर आणि इतरत्रही तुमच्यावर भाजपाचे प्रचारक असल्याचा आरोप अनेकांनी केलेला आहे. एकंदरीत तुमच्या विचार मांडण्याच्या पद्धतीवरून त्यात तथ्य असावं असं वाटतं.
कोणतेही कारण नसताना फक्त स्वतःच्या धर्मासाठी निष्पाप नागरिकांची हत्या करणे
फारच मोजूनमापून केलेली तोकडी व्याख्या आहे. आणि हे कारण कोण ठरवणार म्हणे? तरी तुम्ही बॉंबस्फोटाचं कलम गाळलं आहे हे थोरच. ही विकीपीडियाची व्याख्या पाहा
Religious terrorism is terrorism carried out based on motivations and goals that have a predominantly religious character or influence.
इतरत्र असलेली व्याख्या
...this article defines the tactic of terrorism as a) the use or threat of violence; b) the targeting of civilians, property, or government; c) the intent of creating fear aimed at altering the status quo; and d) a group activity.[6] .....
Therefore, this article proposes that religiously motivated terrorism can be defined as: the threat or use of force with the purpose of influencing or coercing governments and/or populations towards saliently religious goals. The discussion below will elaborate on three goals in particular: fomenting the apocalypse, creating a religious government, and religiously cleansing a state or area.
या व्याख्या तुम्हाला वापरता येतील का बघा जरा. पण त्यासाठी थोडं आत्मपरीक्षण करावं लागेल.
बजरंग दलाचे दहशतवादी कृत्ये करण्याचे पुरावे असतील तर त्यांना नक्कीच पकडावे. परंतु पुरावे नसतील तर गळा काढण्यात अर्थ नाही.
हे मस्तच. बजरंग दलाच्या भाऊबंदाचंच सरकार असल्यामुळे ढळढळीत पुरावे असले तरी पकडले जात नाहीत. तुम्हाला मी व्हिडियो दाखवला - नंग्या तलवारी नाचवणं, आणि भर रस्त्यात बंदुका नाचवणं हा पुरावा पाहूनही त्यांना अटक होत नाही.
मी इतर काही जणांसारखा "पुरोगामी", "विचारवंत" इ. इ. नसल्याने तुम्ही माझ्याकडून मांडणीची अपेक्षाच कशी धरता याचे आश्चर्य वाटत आहे.
अहो बालादपि सुभाषितं ग्राह्यं. तेव्हा लिहा काहीतरी सकारात्मक.
असो. या लेखासाठी माझा वेळ खरंच संपत आलेला आहे. आणि आता आपण तेच तेच बोलत आहोत. तुम्ही उत्तरं दिली की टाळलीत हे वाचकांनाच ठरवू देत. तेव्हा अजून फार लिहीनसं वाटत नाही.
म्हणूनच मी एका बाबरी मशिदीचा
म्हणूनच मी एका बाबरी मशिदीचा हत्ती आणि फराक्खानसारखं चिलट अशी तुलना होऊ शकत नाही असं दाखवलं. आता तुम्हाला बाबरी मशीद पाडणं हा धार्मिक दहशतवाद वाटतच नाही. ते का हे समजावून सांगणारा एक लेख लिहिलात तर बोलणं होऊ शकेल. नाहीतर तुम्ही केवळ भगवा चष्मा वापरत आहात असंच म्हणावं लागेल. तसंही त्या धाग्यावर आणि इतरत्रही तुमच्यावर भाजपाचे प्रचारक असल्याचा आरोप अनेकांनी केलेला आहे. एकंदरीत तुमच्या विचार मांडण्याच्या पद्धतीवरून त्यात तथ्य असावं असं वाटतं.
बाबरी मशीद आणि फराक्खान यांची तुलना मी केलेलीच नाही. मी सर्वात प्रथम फराक्खानचा उल्लेख ज्या प्रतिसादात केला तो प्रतिसाद नीट वाचा म्हणजे लक्षात येईल. बाबरी मशीद पाडणे हा दहशतवाद नाही हे मी पूर्वीच लिहिले आहे.
फारच मोजूनमापून केलेली तोकडी व्याख्या आहे. आणि हे कारण कोण ठरवणार म्हणे? तरी तुम्ही बॉंबस्फोटाचं कलम गाळलं आहे हे थोरच. ही विकीपीडियाची व्याख्या पाहा
बॉम्बस्फोटाचा उल्लेख गाळला नाही हो. उलट बॉम्बस्फोटाचा उल्लेख न करून व्याख्या मर्यादित करण्याचा प्रयत्न टाळला आहे. मी दिलेली व्याख्या अशी आहे.
"कोणतेही कारण नसताना फक्त स्वतःच्या धर्मासाठी निष्पाप नागरिकांची हत्या करणे"
धर्मासाठी निष्पाप नागरिकांची हत्या करताना बॉम्फस्फोट, एके-४७ घेऊन मारणे, रेल्वेत जाळून मारणे इ.इ. कोणत्याही मार्गाने मारले तरी तो दहशतवादच आहे. त्यासाठी मारण्याच्या प्रत्येक पद्धतीचा वेगळा उल्लेख करून व्याख्या मर्यादित करण्याची गरज नाही.
विकीपीडियाच्या व्याख्येचे म्हणाल तर जगात दहशतवाद या शब्दाच्या अनेक व्याक्या आहेत. प्रत्येक देशाची स्वतःची वेगळी व्याख्या असू शकते. भारत ज्या कृत्यांना दहशतवादी कृत्ये म्हणतो ती कृत्ये पाकिस्तानच्या दृष्टीने काश्मिरच्या स्वातंत्र्यासाठी केलेली आंदोलने असतात. संयुक्त राष्ट्रसंघाने तर "दहशतवाद" या शब्दाची व्याख्या केलेलीच नाही. http://www.humanrightsvoices.org/EYEontheUN/un_101/facts/?p=61
हे मस्तच. बजरंग दलाच्या भाऊबंदाचंच सरकार असल्यामुळे ढळढळीत पुरावे असले तरी पकडले जात नाहीत. तुम्हाला मी व्हिडियो दाखवला - नंग्या तलवारी नाचवणं, आणि भर रस्त्यात बंदुका नाचवणं हा पुरावा पाहूनही त्यांना अटक होत नाही.
तुम्ही ज्याला बजरंग दलाचे भाऊबंद समजता त्यांचे सरकार येऊन फक्त १ वर्ष झाले. त्यापूर्वी सलग १० वर्षे बजरंग दलाच्या शत्रूंचे सरकार होते हो. निदान त्या काळात तरी त्यांना का पकडले नसावे? मिरवणुकीत तलवारी असणे हा दहशतवाद नाही हे मी पूर्वीच लिहिले आहे. भारतीय दंडविधानाच्या नक्की कोणत्या कलमाखाली हे कृत्य दहशतवाद आहे ते माहिती असल्यास सांगावे.
अहो बालादपि सुभाषितं ग्राह्यं. तेव्हा लिहा काहीतरी सकारात्मक.
असो. या लेखासाठी माझा वेळ खरंच संपत आलेला आहे. आणि आता आपण तेच तेच बोलत आहोत. तुम्ही उत्तरं दिली की टाळलीत हे वाचकांनाच ठरवू देत. तेव्हा अजून फार लिहीनसं वाटत नाही.
लिहा किंवा लिहू नका. हा तुमचा व्यक्तिगत निर्णय आहे.
आणि मुस्लिमांविषयी म्हणाल तर
आणि मुस्लिमांविषयी म्हणाल तर फक्त भारतात नव्हे तर जगातल्या अनेक देशात मुस्लिम मूलतत्ववाद्यांनी दहशत आणि हिंसेचा आश्रय घेतलेला आहे हे सत्य आहे.
अहो, भारताबाहेर नाही राहात हिंदू लोक फारसे. जिथे राहातात त्यातल्या श्रीलंकेत तर त्यांनी केलेला दहशतवाद जगप्रसिद्ध आहे. तो भारतालाच इतका तापदायक ठरला की तो आवरण्यासाठी भारताला सैन्य पाठवण्याची जबाबदारी घ्यावी लागली. त्या पीस कीपिंग फोर्समधले मारले गेलेले सैनिक किती हिंदू होते? आणि भारतात हिंदूंच्या दहशतवादाकडे - विशेषतः हिंदू मुस्लीम दंग्यांमध्ये - पोलिस सर्रास दुर्लक्ष करतात त्यामुळे कित्येक हिंदू दहशतवादी न्यायालयापर्यंत पोचतच नाहीत. आत्ता परवाच नागपुरात निघालेल्या बजरंग दलाच्या सशस्त्र रॅलीचं प्रयोजन हे लोकांमध्ये आनंदाचा प्रसार करण्यासाठी होतं की दहशत निर्माण करण्यासाठी होतं? त्यातले किती जण पकडले जातील असं तुम्हाला वाटतं? का ते सगळे बजरंग दली मुस्लीम होते?
दहशतवादला धर्माचा रंग
दहशतवादला धर्माचा रंग देण्याआधी ते ते दहशतवादी कृत्य धर्मासाठी, धर्माच्या नावाखाली केले गेले का हे पहायला नको का? की दहशतवादी फक्तं धर्माने हिंदू म्हणून त्यांना "हिंदू अतिरेकी" ठरवायचं?
बाकी तुमच्या हिंदू मुस्लीम दंग्याच्या आणि बजरंग दलाबद्दलच्या कमेंटशी सहमत!
अनामिक
दहशतवादला धर्माचा रंग देण्याआधी ते ते दहशतवादी कृत्य धर्मासाठी, धर्माच्या नावाखाली केले गेले का हे पहायला नको का? की दहशतवादी फक्तं धर्माने हिंदू म्हणून त्यांना "हिंदू अतिरेकी" ठरवायचं?
हो पण पॅलेस्टाईन, काश्मीर, चेचेन्या अशा अनेक ठिकाणी मुळात जमिनींवरुन/सत्तेवरुन चाललेल्या वादांनाही इस्लामी अतिरेकी असंच म्हटलं जातं.
दहशतवादला धर्माचा रंग
दहशतवादला धर्माचा रंग देण्याआधी ते ते दहशतवादी कृत्य धर्मासाठी, धर्माच्या नावाखाली केले गेले का हे पहायला नको का?
बरोबर. दहशतवाद हा कोणीही केला तरी निंद्यच आहे. मात्र चित्र असं रंगवलं जातं की हिंदू मानसिकतेतच असं काहीतरी आहे की ते डोक्यात खून चढवून घेऊन इतरांना कापून काढण्याची कृत्यं करतच नाहीत. हिंदू मुस्लीम दंग्यांची आकडेवारी पाहिली तर जागोजागी मुस्लीम अधिक मारले गेलेले दिसतात. म्हणजे धार्मिक भावना पेटतात तेव्हा त्यासाठी हातात तलवारी घेऊन कापाकापी करण्यात हिंदूही मागे नसतात.
आता मला एक सांगा, इंदिरा गांधींचा खून झाल्यावर खुनी शीख होते म्हणून हिंदूंनी शिखांचं हत्याकांड केलं. गांधींचा खून झाला तेव्हा खुनी ब्राह्मण म्हणून ब्राह्मणांची घरं हिंदूंनीच जाळली. या कृत्यांना धर्माधिष्ठित दहशतवाद म्हणायचं नाहीतर काय म्हणायचं? शीखांना, ब्राह्मणांना जरब बसली पाहिजे म्हणून या गोष्टी घडल्या. त्यात पोळलेल्या व्यक्तींचा मूळ घटनेशी काहीही संबंध नव्हता. १९८४ साली दिल्ली शहरातून नंग्या तलवारी घेऊन जाणारे हे स्वतःसाठी काही करत नव्हते, तर ते त्या धर्माचे प्रतिनिधीत्व करत होते. (आता यावर - छे छे, ते धार्मिक नै कै, राजकीय होतं - वगैरे स्पष्टीकरणं येण्याची वाट बघतो आहे. मग कसाबच्या हत्याकांडालाही राजकीयच म्हणण्याची सोय होईल. तसा ९-११ चा हल्लाही राजकीयच म्हणता येईल.)
मुस्लिम अतिरेकी हा अत्यंत सहजपणे वापरला जाणारा शब्दप्रयोग आहे. त्यासाठी कुठचं तरी अतिरेकी कृत्य करणारा मुस्लिम असणं पुरतं. याउलट हिंदू अतिरेकी किंवा भगवा दहशतवाद हा शब्द वापरला तरी लोकांच्या भावना दुखावतात. इट्स टाइम टु कॉल अ स्पेड अ स्पेड.
मात्र चित्र असं रंगवलं जातं
मात्र चित्र असं रंगवलं जातं की हिंदू मानसिकतेतच असं काहीतरी आहे की ते डोक्यात खून चढवून घेऊन इतरांना कापून काढण्याची कृत्यं करतच नाहीत. हिंदू मुस्लीम दंग्यांची आकडेवारी पाहिली तर जागोजागी मुस्लीम अधिक मारले गेलेले दिसतात. म्हणजे धार्मिक भावना पेटतात तेव्हा त्यासाठी हातात तलवारी घेऊन कापाकापी करण्यात हिंदूही मागे नसतात.
जेव्हा जातीय दंगा होतो तेव्हा दोन्ही बाजूंकडून हिंसा होते. फक्त एक बाजू हिंसा करतेय आणि दुसरी बाजू गप्प बसून शांततेचा जप जपतेय असे होऊच शकत नाही. त्यामुळे दंगा का सुरू झाला आणि तो कोणी सुरू केला हे शोधणे आवश्यक आहे. मुजफ्फरनगर, गुजरात, ओडिसा, हैद्राबाद इ. अगदी अलीकडील दंगलीच्या घटना पाहिल्या तरी दंगली सुरू होण्यामागची कारणे लक्षात येतील.
आता मला एक सांगा, इंदिरा गांधींचा खून झाल्यावर खुनी शीख होते म्हणून हिंदूंनी शिखांचं हत्याकांड केलं. गांधींचा खून झाला तेव्हा खुनी ब्राह्मण म्हणून ब्राह्मणांची घरं हिंदूंनीच जाळली. या कृत्यांना धर्माधिष्ठित दहशतवाद म्हणायचं नाहीतर काय म्हणायचं? शीखांना, ब्राह्मणांना जरब बसली पाहिजे म्हणून या गोष्टी घडल्या. त्यात पोळलेल्या व्यक्तींचा मूळ घटनेशी काहीही संबंध नव्हता. १९८४ साली दिल्ली शहरातून नंग्या तलवारी घेऊन जाणारे हे स्वतःसाठी काही करत नव्हते, तर ते त्या धर्माचे प्रतिनिधीत्व करत होते. (आता यावर - छे छे, ते धार्मिक नै कै, राजकीय होतं - वगैरे स्पष्टीकरणं येण्याची वाट बघतो आहे. मग कसाबच्या हत्याकांडालाही राजकीयच म्हणण्याची सोय होईल. तसा ९-११ चा हल्लाही राजकीयच म्हणता येईल.)
१९८४ मध्ये हिंदूंनी शिखांचे हत्याकांड केले हे वाक्यच अत्यंत जनरलायझेशन आहे. कृपया अशी बिनबुडाची वाक्ये लिहू नका. मूळ लेखात असलेल्या अशाच जनरलायझेशनविरूद्ध मी लिहिले होते. १९८४ मधील शिखांचे हत्याकांड हिंदूंनी केलेले नसून ते काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केले होते. १९४८ मध्ये ब्राह्मणांची घरे जाळली ती हिंदूंनी नसून प्रामुख्याने मराठा जातीतल्या काही दांडग्यांनी जाळली होती. त्या जळीतामागे धार्मिक कारण नसून जातीय द्वेष होता. त्यामुळे कृपया असे सरसकटीकरण करू नका.
मुस्लिम अतिरेकी हा अत्यंत सहजपणे वापरला जाणारा शब्दप्रयोग आहे. त्यासाठी कुठचं तरी अतिरेकी कृत्य करणारा मुस्लिम असणं पुरतं. याउलट हिंदू अतिरेकी किंवा भगवा दहशतवाद हा शब्द वापरला तरी लोकांच्या भावना दुखावतात. इट्स टाइम टु कॉल अ स्पेड अ स्पेड.
मुस्लिम अतिरेकी असा शब्द सहज वापरला जातो कारण अशा धर्माच्या नावावर केलेल्या दहशतवादी कृत्यामागे अनेक मुस्लिम सापडून त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत. आजच १२ मुस्लिमांवर जुलै ०६ मध्ये मुंबईतील लोकल्समध्ये बॉम्ब ठेवून १८९ नागरिक मारल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे हा शब्द अगदी सहज वापरला जातो.
हिंदू अतिरेकी किंवा भगवा दहशतवाद असे शब्द जरूर वापरा. पण त्यासाठी आजतगायत हिंदूंनी धर्माच्या नावावर किती बाँबस्फोट केले, किती जणांवर ते आरोप सिद्ध झाले याचा आधी शोध घ्या आणि नंतरच असे शब्द वापरा. इट्स टाइम टु कॉल अ स्पेड अ स्पेड हे मला मान्य आहे. परंतु आपण ज्याला स्पेड म्हणत आहोत तो नक्की स्पेडच आहे ना याची तर आधी खात्री करून घ्या.
हिंदू अतिरेकी किंवा भगवा
हिंदू अतिरेकी किंवा भगवा दहशतवाद असे शब्द जरूर वापरा.
अरे वा वा, मग हे आधीच सांगायचं ना. इतकी डोकेफोड करायला लागली नसती.
जेव्हा जातीय दंगा होतो तेव्हा दोन्ही बाजूंकडून हिंसा होते.
अशा वेळी पुरोगामी दोन्ही बाजूंचा निषेध करतात. गांधीजी अशा वेळी आपली सर्व ऊर्जा पणाला लावून प्राणांतिक उपोषण करून दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न करतात. केवळ ते हिंसा करतात म्हणून आम्ही पण करणार - यात आम्ही हिंसक बनतो हेही उघडच आहे. आणि तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे का की आत्तापर्यंत सर्व दंगे मुसलमानांनीच चालू केलेले आहेत? एकजरी उदाहरण सापडलं हिंदूंनी दंगा केल्याचं तर तुम्ही त्याला धार्मिक दहशतवाद म्हणणार का?
जळीतामागे धार्मिक कारण नसून जातीय द्वेष होता.
जातीव्यवस्था ही हिंदू धर्मापेक्षा वेगळी आहे? काय सांगता राव! आता तुम्ही फक्त लेबलांशी खेळताय. तो धार्मिक दहशतवादच होता. एका विशिष्ट धर्माला नव्हे, तर विशिष्ट जातीला दहशत बसवण्यासाठी असंबद्ध लोकांना पोळलं गेलं. शिखांची कत्तलही धार्मिक कत्तलच होती. केवळ शीख असण्यामुळे माणसं मारली. हिंदू पंतप्रधानाने शिखांच्या देवळात लष्कर घुसवलं, दोन शिखांनी तिचा खून केला, इतर हिंदूंनी हजारो शीख मारले. हेच जर इंदिरा गांधींच्या जागी मनमोहन सिंगांनी लष्कर धाडलं असतं तर घडलं असतं का? हिंदूंनी इतर धर्मीयांना मारलं की त्याला जातीय, राजकीय, वगैरे लेबलं लावायची...
अनेक मुस्लिम सापडून त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत.
याचं कारण हिंदू भारतापलिकडे फार नाहीत, आणि भारतात हिंदू दहशतवादी कृत्यांकडे काणाडोळा केला जातो. पुन्हा विचारतो - बजरंग दलाची रॅली हा दहशतवाद आहे की नाही? त्यांच्यापैकी किती जणांना अटक होईल?
पण त्यासाठी आजतगायत हिंदूंनी धर्माच्या नावावर किती बाँबस्फोट केले, किती जणांवर ते आरोप सिद्ध झाले
तुम्ही नेहेमी चाणाक्षपणे हिंदूंनी किती बॉंबस्फोट केले असं विचारत असता. दहशतवाद केवळ बॉंबस्फोटातून येत नाही. नंग्या तलवारींतून, जिवंत जाळण्यातून येतो, आणि तो हिंदूंनी शेकडो वेळा दाखवलेला आहे.
चला, आता पुन्हापुन्हा मी तेच तेच प्रश्न विचारतो आहे, आणि तुम्ही उत्तरं टाळत आहात. असा भ्याडपणा दाखवायचा तर चर्चेत भाग कशाला घ्यावा? किंवा तुमची विधानं गंभीरपणे का घ्यावी?
हिंदू अतिरेकी किंवा भगवा
हिंदू अतिरेकी किंवा भगवा दहशतवाद असे शब्द जरूर वापरा.
>>> >>> अरे वा वा, मग हे आधीच सांगायचं ना. इतकी डोकेफोड करायला लागली नसती.
माझे वाक्य तोडून वापरलेत. माझे मूळ वाक्य असे होते.
हिंदू अतिरेकी किंवा भगवा दहशतवाद असे शब्द जरूर वापरा. पण त्यासाठी आजतगायत हिंदूंनी धर्माच्या नावावर किती बाँबस्फोट केले, किती जणांवर ते आरोप सिद्ध झाले याचा आधी शोध घ्या आणि नंतरच असे शब्द वापरा.
वाक्य तोडून न वाचता संपूर्ण वाचलेत तर अर्थ समजेल.
अशा वेळी पुरोगामी दोन्ही बाजूंचा निषेध करतात. गांधीजी अशा वेळी आपली सर्व ऊर्जा पणाला लावून प्राणांतिक उपोषण करून दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न करतात. केवळ ते हिंसा करतात म्हणून आम्ही पण करणार - यात आम्ही हिंसक बनतो हेही उघडच आहे. आणि तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे का की आत्तापर्यंत सर्व दंगे मुसलमानांनीच चालू केलेले आहेत? एकजरी उदाहरण सापडलं हिंदूंनी दंगा केल्याचं तर तुम्ही त्याला धार्मिक दहशतवाद म्हणणार का?
गोध्रा येथे रेल्वे बोगीतील ६० प्रवाशांना स्थानिक मुस्लिमांनी जाळून मारल्याचा किती पुरोगाम्यांनी निषेध केला? काश्मिरमधून पंडितांना निर्वासित व्हायला भाग पाडलेल्या स्थानिकांचा किती पुरोगाम्यांनी निषेध केला? निषेध तर लांबच राहिला, ती रेल्वे बोगी संघाच्याच लोकांनी आतून पेटवून दिली असा जावईशोध काही पुरोगामींनी लावला होता.
जातीव्यवस्था ही हिंदू धर्मापेक्षा वेगळी आहे? काय सांगता राव! आता तुम्ही फक्त लेबलांशी खेळताय. तो धार्मिक दहशतवादच होता. एका विशिष्ट धर्माला नव्हे, तर विशिष्ट जातीला दहशत बसवण्यासाठी असंबद्ध लोकांना पोळलं गेलं. शिखांची कत्तलही धार्मिक कत्तलच होती. केवळ शीख असण्यामुळे माणसं मारली. हिंदू पंतप्रधानाने शिखांच्या देवळात लष्कर घुसवलं, दोन शिखांनी तिचा खून केला, इतर हिंदूंनी हजारो शीख मारले. हेच जर इंदिरा गांधींच्या जागी मनमोहन सिंगांनी लष्कर धाडलं असतं तर घडलं असतं का? हिंदूंनी इतर धर्मीयांना मारलं की त्याला जातीय, राजकीय, वगैरे लेबलं लावायची...
१९८४ मधील शिखांची हत्या हा धार्मिक दहशतवाद नव्हता. काँग्रेसमधील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेला तो काँग्रेस पुरस्कृत हिंसाचार होता. हिंदू या धर्माचा या हिंसाचाराचा काहीही संबंध नव्हता. त्यातला एक प्रमुख आरोपी जगदीश टायटलर हा हिंदू नसून ख्रिश्चन आहे हे कदाचित आपल्याला माहित नसावे. कृपया हिंदूंनी शीख मारले असा अपप्रचार करू नका. टायटलरच्या सहभागामुळे ख्रिश्चनांनी सुद्धा शीख मारले असे का म्हणत नाही?
याचं कारण हिंदू भारतापलिकडे फार नाहीत, आणि भारतात हिंदू दहशतवादी कृत्यांकडे काणाडोळा केला जातो. पुन्हा विचारतो - बजरंग दलाची रॅली हा दहशतवाद आहे की नाही? त्यांच्यापैकी किती जणांना अटक होईल?
ही रॅली हा दहशतवाद नाही.
तुम्ही नेहेमी चाणाक्षपणे हिंदूंनी किती बॉंबस्फोट केले असं विचारत असता. दहशतवाद केवळ बॉंबस्फोटातून येत नाही. नंग्या तलवारींतून, जिवंत जाळण्यातून येतो, आणि तो हिंदूंनी शेकडो वेळा दाखवलेला आहे.
हिंदूंनी धर्मासाठी निरपराध नागरिकांची हत्या केल्याची उदाहरणे द्या.
चला, आता पुन्हापुन्हा मी तेच तेच प्रश्न विचारतो आहे, आणि तुम्ही उत्तरं टाळत आहात. असा भ्याडपणा दाखवायचा तर चर्चेत भाग कशाला घ्यावा? किंवा तुमची विधानं गंभीरपणे का घ्यावी?
मी तुम्हाला अनेकवेळा विचारले आहे की ज्यांच्यावर दहशतवादाचे आरोप सिद्ध झाले आहेत अशा हिंदू दहशतवाद्यांची नावे सांगा. हा स्पेसिफिक प्रश्न आहे. परंतु तुम्ही उत्तर टाळत आहात कारण तुमच्याकडे उत्तरच नाही. उत्तर देण्याऐवजी दुसरेच जनरलायझेशन सुरू आहे.
मला गंभीरपणे घ्यायचे का नाही हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
श्रीलंकेत १९५८ मध्ये सलग ६
श्रीलंकेत १९५८ मध्ये सलग ६ दिवस सुरू असलेल्या तामिळीविरोधी दंगलीत शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले. या दंगलीत ३००-१५०० नागरिक मारले गेल्याचा अंदाज आहे. खरा आकडा कधीच बाहेर आला नाही. त्यातले बहुसंख्य तामिळ होते. त्यातून तामिळींविरूद्ध श्रीलकंन पोलिस, लष्कर, जनता विमुक्ती पेरामेना सारख्या सशस्त्र सिंहली संघटना यांनी नंतरची अनेक वर्षे सर्व प्रकारची दडपशाही व दंगली केल्या व त्यातून शेवटी तामिळींचा सशस्त्र लढा सुरू झाला. हा लढा हिंदू वि. बौद्ध किंवा हिंदू वि. ख्रिश्चन असा धार्मिक नव्हता. सशस्त्र लढ्यामागची कारणे सुद्धा धार्मिक नव्हती. तामिळींनी श्रीलंकन लष्कराला जशास तसे उत्तर देऊन अनेक हत्या केल्या. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात हत्या केल्या गेल्या.
हे प्रकरण आणि जगातल्या अनेक देशात निव्वळ धर्मासाठी मुस्लिम मूलतत्ववादी करीत असलेली हत्याकांडे यांच्यात फरक आहे. श्रीलंकेत लष्कराच्या हत्याकांडाला स्थानिक तामिळींनी त्याच मार्गाने उत्तर दिले. परंतु स्थानिक तामिळ हे उत्तर देत असताना, श्रीलंकन लष्कर स्थानिक तामिळींची हत्या करीत आहे म्हणून जगातील उर्वरीत देशातील श्रीलंकन किंवा इतर तामिळींनी आपापल्या देशातल्या श्रीलंकन्सना किंवा बौद्धांना अतिरेकी कृत्ये करून मारणे असे प्रकार झालेले नाहीत. तसेच या दोन्ही बाजूने झालेल्या हत्याकांडात धर्म हा मुद्दाच नव्हता.
दुसरीकडे आपला प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कोणताही संबंध नसला तरी जगभरातील मुस्लिम मूलतत्ववाद्यांकडून केवळ धर्म या एकाच कारणासाठी वेगवेगळ्या देशात हत्या केल्या जात आहेत. पॅलेस्टाईन वि. इस्राईल या लढ्यात भारतीय मुस्लिमांचा काहीही संबंध नसला आणि तसेच अमेरिका वि. अफगाणिस्तान किंवा अमेरिका वि. इराक या युद्धात भारतीय मुस्लिमांचा काहीही संबंध नसला तरी मुंबईत छबाड हाऊसमधील ज्यू मारणे किंवा पुण्यातील जर्मन बेकरीत परकीय नागरिकांची वर्दळ असल्याने तिथे बाँम्बस्फोट घडवून नागरिकांना मारणे इ. प्रकारांंमागे केवळ धर्म ही एकच गोष्ट आहे. म्यानमार लष्कराने घुसखोर बांगलादेशी मुस्लिमांवर केलेल्या कारवाईशी भारताचा कणभरही संबंध नव्हता. एकाही भारतीय मुस्लिमाला त्याची झळ पोहोचली नव्हती. तरीसुद्धा मुंबईत मुस्लिमांनी त्याविरूद्ध मोर्चा काढून महिला पोलिसांना मारहाण करून हुतात्मा स्मारकाची नासधूस केली. यामागेही केवळ धर्म हेच एकमेव कारण होते.
दुसरीकडे आपला
दुसरीकडे आपला प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कोणताही संबंध नसला तरी जगभरातील मुस्लिम मूलतत्ववाद्यांकडून केवळ धर्म या एकाच कारणासाठी वेगवेगळ्या देशात हत्या केल्या जात आहेत. पॅलेस्टाईन वि. इस्राईल या लढ्यात भारतीय मुस्लिमांचा काहीही संबंध नसला आणि तसेच अमेरिका वि. अफगाणिस्तान किंवा अमेरिका वि. इराक या युद्धात भारतीय मुस्लिमांचा काहीही संबंध नसला तरी मुंबईत छबाड हाऊसमधील ज्यू मारणे किंवा पुण्यातील जर्मन बेकरीत परकीय नागरिकांची वर्दळ असल्याने तिथे बाँम्बस्फोट घडवून नागरिकांना मारणे इ. प्रकारांंमागे केवळ धर्म ही एकच गोष्ट आहे. म्यानमार लष्कराने घुसखोर बांगलादेशी मुस्लिमांवर केलेल्या कारवाईशी भारताचा कणभरही संबंध नव्हता. एकाही भारतीय मुस्लिमाला त्याची झळ पोहोचली नव्हती. तरीसुद्धा मुंबईत मुस्लिमांनी त्याविरूद्ध मोर्चा काढून महिला पोलिसांना मारहाण करून हुतात्मा स्मारकाची नासधूस केली. यामागेही केवळ धर्म हेच एकमेव कारण होते.
आणि इकडे लक्ष वेधले की तुम्ही बाय डिफॉल्ट प्रतिगामी, हिंदुत्ववादी वगैरे कायकाय ठरता.
म्हणजे आता तुम्ही 'हिंदू लोक
म्हणजे आता तुम्ही 'हिंदू लोक दहशतवादी असतात, पण तो दहशतवाद धर्मासाठीच वापरतील असं नाही.' हे मान्य करण्यापर्यंत पोचलात. उत्तम. अशीच प्रगती केलीत तर हिंदूंनी धर्मासाठी केलेला दहशतवादही दिसून येईल.
बजरंग दलाच्या सशस्त्र रॅलीच्या भारतातल्याच उदाहरणाला सपशेल बगल दिलेली आवडली. बजरंग दल हे संघपरिवारातलंच अपत्य आहे. आणि सगळाच संघपरिवार भारताला हिंदुराष्ट्र बनवण्यासाठी झटत असतो. आता मग त्यांच्या रॅलीला हिंदू दहशतवाद म्हणावं की नाही? याचं 'नाही' उत्तर देण्यासाठी काय तारेवरची बौद्धिक कसरत करावी लागते ती पाहायला आवडेल. हो असं प्रामाणिक उत्तर देण्याची तुमची क्षमता आहे की नाही यावरून तुमचा काही अजेंडा आहे की नाही हेही समजेल.
तुम्हाला माहिती नाही का?
येथे हे प्रमाणित करण्यात येते की
रा स्व संघ आणि बजरंगदल या संपूर्ण अलग संघटना आहेत.
रा स्व संघ आणि भाजप या संपूर्ण अलग संघटना आहेत.
भाजप आणि विश्व हिंदू परिषद या संपूर्ण अलग संघटना आहेत.
विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रसेविका समिती या संपूर्ण अलग संघटना आहेत.
रा स्व संघ आणि भारतीय मजदूर संघ या संपूर्ण अलग संघटना आहेत.
भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संपूर्ण अलग संघटना आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बजरंग दल या संपूर्ण अलग संघटना आहेत.
या बजरंग दलाच्या रॅलीबद्दल
म्हणजे आता तुम्ही 'हिंदू लोक दहशतवादी असतात, पण तो दहशतवाद धर्मासाठीच वापरतील असं नाही.' हे मान्य करण्यापर्यंत पोचलात. उत्तम. अशीच प्रगती केलीत तर हिंदूंनी धर्मासाठी केलेला दहशतवादही दिसून येईल.
हा प्रतिसाद माझ्यासाठी आहे का? कारण 'हिंदू लोक दहशतवादी असतात, पण तो दहशतवाद धर्मासाठीच वापरतील असं नाही.' असे मी कोणत्याही प्रतिसादात म्हटलेले नाही.
बजरंग दलाच्या सशस्त्र रॅलीच्या भारतातल्याच उदाहरणाला सपशेल बगल दिलेली आवडली. बजरंग दल हे संघपरिवारातलंच अपत्य आहे. आणि सगळाच संघपरिवार भारताला हिंदुराष्ट्र बनवण्यासाठी झटत असतो. आता मग त्यांच्या रॅलीला हिंदू दहशतवाद म्हणावं की नाही? याचं 'नाही' उत्तर देण्यासाठी काय तारेवरची बौद्धिक कसरत करावी लागते ती पाहायला आवडेल. हो असं प्रामाणिक उत्तर देण्याची तुमची क्षमता आहे की नाही यावरून तुमचा काही अजेंडा आहे की नाही हेही समजेल.
या बजरंग दलाच्या रॅलीबद्दल कोठेही वाचले नव्हते. तुमच्या प्रतिसादातूनच ते समजले. परंतु बहुसंख्य माध्यमांनी याकडे दुर्लक्षच केलेलं दिसतंय. ही रॅली बहुतेक माध्यमांना अजिबात महत्त्वाची वाटलेली दिसत नाही. गुगलवर शोध घेतल्यावर फक्त "मी मराठी" वाहिनीच्या लिंकवर या रॅलीसंबंधी बातमी दिसली. या व्यतिरिक्त फारशा लिंक्स दिसल्या नाहीत.
या रॅलीकडे बहुतेक प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष का केले असावे हे समजणे सोपे आहे. रॅलीतून उघड्या तलवारी नेणे ही भारतात नेहमीच घडणारी गोष्ट आहे. अशा रॅलीला लगेच 'हिंदू दहशतवाद' असा शिक्का मारण्याची जरा जास्तच घाई होत आहे. जरा खालील उदाहरणे पहा.
http://www.rediff.com/news/report/delhi/20030416.htm
१६/४/२००३ या दिवशी समाजवादी पक्षाच्या अमर सिंगने दिल्लीत एक राजपूतांचा मेळावा घेतला होता. त्यासंबंधी असे लिहिले आहे.
Thousands of swords were also distributed to the participants.
Many of the participants were seen raising the swords both outside and inside the stadium during the five-hour event.
"The organisers had informed us that they would make symbolic distribution of swords to a few respected leaders of the Kshatriya community... But it turned out that more than 3000 swords were distributed," a police officer said.
दुसरे उदाहरण -
http://www.tribuneindia.com/news/punjab/cong-maligning-state-s-image-sa…
६/१/२०१५ - The SAD hired private buses and school vans to ferry supporters. A number of buses were seen parked near the venue with supporters, carrying placards, atop. Nihangs were seen brandishing swords, that were sheathed, during sloganeering.
अजून एक - ७/७/२००७ - http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/6632961.stm - Monday's marchers dressed like Indian soldiers and British officers and staged mock fights with swords and muskets on top of colourful floats.
वरील उदाहरणातील समाजवादी पक्ष, अकाली दल इ. ना हिंदू दहशतवादी म्हणणे योग्य ठरेल का?
परंतु बहुसंख्य माध्यमांनी
परंतु बहुसंख्य माध्यमांनी याकडे दुर्लक्षच केलेलं दिसतंय. ही रॅली बहुतेक माध्यमांना अजिबात महत्त्वाची वाटलेली दिसत नाही.
अरेवा, फराक्खानच्या बाबतीत माध्यमांना महत्त्वाची वाटली नाही म्हटलं तर 'हो, पण ते घडलं ना' म्हणायचं, आणि इथे ते काही विशेष नाही म्हणायचं. पुन्हा एकदा दुटप्पीपणा.
रॅलीमध्ये तलवारी नेणं ही परंपरा वगैरे काहीही नाही. असलीच तर दहशत बसवण्याची परंपरा आहे. आणि जन्माष्टमी साजरी करण्यासाठी बंदुकांचं काय प्रयोजन? खालच्या लिंकवर बघा - स्वच्छ व्हिडियो आहे. भारतामध्ये अशी शस्त्रं उघडपणे बाळगणं हा गुन्हा आहे तो उगीच नाही. आपण बघूच की यातल्या किती जणांना अटक होते ते.
समाजवादी पक्षाने जर केलं असेल तर त्यांनीही दहशतवादाचा प्रयत्न केला असं म्हणायला मी तयार आहे. पोलिसांनी त्यांना पकडायला हवं होतं. अकाली दलाने जर उघड्यावर रस्त्यावर लोकांसमोर तलवारी नाचवल्या असतील तर त्यांचंही कृत्य दहशतवादी म्हणायला मी तयार आहे. पोलिसांनी त्यांनाही पकडायला हवं होतं. पण इतरांनी केलं त्यांना पकडलं नाही. बजरंग दलाने केलं, त्यांना पकडलं नाही. तुम्ही माझाच मुद्दा सिद्ध करत आहात. बजरंग दलाने जे केलं ते माझ्या दृष्टीने कायदेबाह्य होतं, आणि दहशतवादी होतं. मी जर त्या रस्त्यावर असतो तर माझ्या मनात दहशतच बसली असती.
रेवा, फराक्खानच्या बाबतीत
रेवा, फराक्खानच्या बाबतीत माध्यमांना महत्त्वाची वाटली नाही म्हटलं तर 'हो, पण ते घडलं ना' म्हणायचं, आणि इथे ते काही विशेष नाही म्हणायचं. पुन्हा एकदा दुटप्पीपणा.
बरोबर आहे ना. फराक्खानला ९० च्या दशकात अमेरिकन माध्यमात बरेच कव्हरेज मिळत होते. विसाव्या शतकात ते का कमी झाले असावे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे.
समाजवादी पक्षाने जर केलं असेल तर त्यांनीही दहशतवादाचा प्रयत्न केला असं म्हणायला मी तयार आहे. पोलिसांनी त्यांना पकडायला हवं होतं. अकाली दलाने जर उघड्यावर रस्त्यावर लोकांसमोर तलवारी नाचवल्या असतील तर त्यांचंही कृत्य दहशतवादी म्हणायला मी तयार आहे. पोलिसांनी त्यांनाही पकडायला हवं होतं. पण इतरांनी केलं त्यांना पकडलं नाही. बजरंग दलाने केलं, त्यांना पकडलं नाही. तुम्ही माझाच मुद्दा सिद्ध करत आहात. बजरंग दलाने जे केलं ते माझ्या दृष्टीने कायदेबाह्य होतं, आणि दहशतवादी होतं. मी जर त्या रस्त्यावर असतो तर माझ्या मनात दहशतच बसली असती.
तुम्ही एखाद्या कृत्याला दहशतवादी कृत्य समजले तरी कायद्याला तसे वाटायला हवे ना! खाली एका प्रतिसादात तर एका सदस्याला सार्वजनिक उत्सवांचा उपद्रव हे दहशतवादी कृत्य वाटते. कोणाला काय वाटते यावर कायदा अवलंबून नसतो. कायद्यानुसार ते दहशतवादी कृत्य असेल तर नक्कीच ते दहशतवादी आहे. हे कृत्य तुम्हाला दहशतवादी कृत्य वाटत असेल तर भारतीय दंडविधानाच्या नक्की कोणत्या कलमानुसार ते दहशतवादी कृत्य आहे ते सांगावे.
कायद्यानुसार ते दहशतवादी
कायद्यानुसार ते दहशतवादी कृत्य असेल तर नक्कीच ते दहशतवादी आहे. हे कृत्य तुम्हाला दहशतवादी कृत्य वाटत असेल तर भारतीय दंडविधानाच्या नक्की कोणत्या कलमानुसार ते दहशतवादी कृत्य आहे ते सांगावे.
येस इंडीड. त्या निमित्ताने कायदा नक्की कसा आहे हे तरी कळेल. ते न करता "मेरे मन को भाया, मैने सबको दहशतवादी बनाया" छाप अर्ग्युमेंटे पाहून वाईट वाटले.
२००८च्या त्या अतिरेकी
२००८च्या त्या अतिरेकी हल्ल्याबद्दल बोलायचे तर तेव्हा छ. शिवाजी टर्मिनस, कामा हॉस्पिटल इथल्या हल्ल्यांमध्ये पुष्कळच मुस्लिम मरण पावले कारण तो मुस्लिमबहुल भाग आहे. मला असे वाटते की हा हल्ला आणि इतरही दहशतवादी हल्ले हे भारताविरुद्ध होते. जे पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले ते मुसलमान असले तरी इथल्या मुस्लिमांनी त्यांचे इथे दफन करायचे साफ नाकारले होते. छबद हाउसवरील हल्ला हा तिथल्या लिओपोल्ड् या कॅफेवरील हल्ला होता.
मुस्लिम दहशतवादी हे सर्वच धर्मीयांवर हल्ले करीत आहेत. (हे आपणही आपल्या प्रतिसादात लिहिले आहे.) केवळ हिंदूंवर नव्हे. हे हल्ले युरोपात, इंडोनीशिया, मलेशिया, अमेरिका असे सर्वत्र झाले आहेत. ते मुस्लिमांवरही हल्ले करीत आहेत. खरे तर या हल्ल्यांत इतर धर्मीयांपेक्षा मुस्लिमच आतापर्यंत जास्त संख्येने मारले गेले आहेत. (अगदी ट्विन टॉवर्सची मृतसंख्या धरूनही.) जास्तीत जास्त हल्ले पाकिस्तानात झालेले आहेत, त्यानंतर अफ्घानिस्तानात. (किंवा उलट) सीरिया, तुर्कस्तान, कुर्दिस्तान, इराक, इराण हे सर्व मुस्लिम देश यात भाजून निघत आहेत. वाचला आहे फक्त सौदी अरेबिया.
हे एक जागतिक आव्हान आहे आणि हे सर्व फार गुंतागुंतीचे आहे. अरबी पैसा, अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी, अमेरिकेतले शस्त्रास्त्र कारखाने, रशिया-अमेरिका यांचे हितसंबंध अश्या अनेक गोष्टी त्यात आहेत.
तेव्हा हिंदू-मुस्लिम असे सुलभीकरण करणे तितकेसे बरोबर नाही. आमचा प्रथम क्रमांकाचा शत्रू भारत असला तरी इस्लामी दहशतवाद्यांचा प्रथम क्रमांकाचा शत्रू भारत नाही.
इतिहासातले उदाहरण द्यायचे तर (मुस्लिम)इराणवर चेंगीज़्खानाने केलेल्या हल्ल्यात प्रचंड नरसंहार झाला होता. अगदी वंशछेद म्हणता येईल इतका.
असंही नाही
असंही नाही. भारतीय अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये सामान्य भारतीय मुस्लिमही मारले जातात. (शिवाय मुसलमान धर्माविरोधात एककलमी अपप्रचार केल्यामुळे अविश्वासाचं वातावरण, पोलिसी दंडुके यांच्यामुळे सामान्य भारतीय मुस्लिम भरडले जातात ते निराळं.)
दिसताना अतिरेकी कोणत्या धर्माचे दिसतात त्यावरून निष्कर्ष काढणं योग्य नाही. दहशतवादाची पाळंमुळं जागतिक राजकारण, अर्थकारण, भांडवलशाही यांच्याशी संबंधित खोलवर गेलेली आहेत. त्याचं (श्रीगुरुजी करताहेत तसं) भगवं-हिरवंछाप सरसकटीकरण, सुलभीकरण अग्राह्य आणि अयोग्य आहे असा त्या प्रतिसादाचा अर्थ आहे.
दहशतवादाची पाळंमुळं जागतिक
दहशतवादाची पाळंमुळं जागतिक राजकारण, अर्थकारण, भांडवलशाही यांच्याशी संबंधित खोलवर गेलेली आहेत. त्याचं (श्रीगुरुजी करताहेत तसं) भगवं-हिरवंछाप सरसकटीकरण, सुलभीकरण अग्राह्य आणि अयोग्य आहे असा त्या प्रतिसादाचा अर्थ आहे.
असहमत. दहशतवादाचा आणि गरीबी, श्रीमंती, अर्थकारण, राजकारण, भांडवलशाही इ. शी संबंध नाही. दहशतवाद मुख्यत्वेकरून धर्माशी संबंधित आहे. तसे नसते तर अब्जाधीश असलेला लादेन, डॉक्टर असलेला केमिकल अली, अयमान जवाहिरी, अत्यंत श्रीमंत असलेला सौदी अरेबियासारखा देश, अत्यंत शिकलेले व सुस्थितीत असलेले मुस्लिम हे दहशतवादाकडे ओढले गेले नसते.
दहशतवादाचा आणि गरीबी,
दहशतवादाचा आणि गरीबी, श्रीमंती, अर्थकारण, राजकारण, भांडवलशाही इ. शी संबंध नाही.
=))
यानंतरही चर्चा होऊ शकेल असे श्री अनामिक रावांना वाटते काय? एकदा ट्राय करून पहा की!
मत बदलायची गरज नाही हो दुसर्याचं डोकं उघडं ठेऊन ऐकून घेण्याची गरज आहे. पण असो प्रत्येकाला ते जमेलच असे नाही. त्यांचा दोष नाही! (असे म्हणायची पद्धत असते म्हणे)
दहशतवाद आणि पैसा.
एखाददुसरे दहशतवादी कृत्य घडवून आणणे हे एकट्या-दुकट्या माथेफिरू/ध्येयप्रेरिताला करणे शक्य असते. पण दहशतवादी संघटना चालवायची तर त्याला पुष्कळ पैसा लागतो. हा पैसा ध्येयभारितांकडून वर्गणी, देणगी म्हणून जमा होऊ शकतो. पण अश्या अनेकांकडे दान मागण्याऐवजी काही थोड्यांकडून खंडणी किंवा सुरक्षिततेची किंमत मागणे सोपे असते. ही वसुली करण्यासाठी संघटना आणि पुन्हा पैसा लागतो. तेव्हा शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थ तस्करी हा चांगला पर्याय ठरतो. त्यासाठी जगभर कराव्या लागणार्या उपद्व्यापासाठीसुद्धा पुन्हा पैसा लागतो. तुमच्या हेतूंवर विश्वास बसावा म्हणून इन्डॉक्ट्रिनेशन करावे लागते. इन्डॉक्ट्रिनेटेड अनुयायी मिळवण्यासाठी काही धमाकेदार असे करून दाखवावे लागते. तेव्हा कुठे त्या डॉक्ट्रीनचे पदाती (पायिक) वश होतात. ही वश होण्याची शेवटची प्रक्रिया त्यांच्या वैयक्तिक आर्थिक स्थितीवर अवलंबून नसते, पण या पातळीवर गरीबांना विकत मात्र घेतले जाते/जाऊ शकते. त्याआधीच्या सर्व प्रक्रियांसाठी पैसा लागतो. हा पैसा मिळवण्याचे एक शास्त्र-भूमिगत अर्थशास्त्र असतेच असते. ते जगड्व्याळ असते. सरकारे, शासनव्यवस्था विकत घ्याव्या लागतात, पैसा इकडून तिकडे फिरवावा लागतो, बँका उघडाव्या लागतात, अर्थदलालांशी किंबहुना सर्वच मध्यस्थांशी संबंध ठेवून वाढवावे लागतात.
तसेच हाती नव्याने आणि कष्ट न करता पैसा आला की त्याबरोबर माजही येतो. पुणे, नवी मुंबई, वसई-विरार, पेण पनवेल येथे पैशाची मॅनेजमेंट माहीत नसलेल्या लोकांकडे अचानक भरपूर पैसा आला. त्यातून अनैतिक धंदेव्यवस्था फोफावली. शिवाय व्यवस्था चालवण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवण्याची आकांक्षा वाढली. मग यातून धाकदपटशा, धमक्या, खंडण्या, खूनमारामार्या सुरू झाले.
सौदी च्या तैलधनामुळे तिथे दहशतवाद पोसण्यासाठी अत्यंत अनुकूल भूमी तयार झाली होती. त्यात वहाबींनी बी रोवले. आता पैसा आणि सत्तेसाठी दहशतवाद सुरू आहे. नाही तर मुस्लिमांनी मुस्लिमांना मारले नसते. शिवाय धर्माच्या नावाखाली दहशत माजवणे सुरक्षित असते. त्यात अनैतिकतेला, अंदाधुंदीला आणि बेकायदेशीरपणाला उदात्ततेचे आवरण मिळते. पण खरा गाभा सत्ता ताब्यात ठेवण्याचाच असतो.
शिवाय हे लोक खरे धार्मिकही नसतात. तसे नसते तर सिगरेट पिणेही मना असलेल्यांमध्ये अंमली पदार्थांची नशेबाजी आणि व्यसनबाजी केली गेली नसती. ऑपरेशन ब्लू स्टारनंतर सुवर्णमंदिरात सापडलेल्या चिजा पाहून लश्करी अधिकारी थक्क झाले होते असे माधव गडकरी यांनी लिहिले होते. खालिस्तानी दहशतवादाचा उल्लेख झालाच आहे तर त्या दहशतवादात आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भांडवलशाहीचा हात नव्हता असे छातीठोकपणे म्हणता येईल काय? कोणत्यातरी राजकीय असहायतेमुळे, अफ्घानिस्तानमध्ये तालिबानला आणि पंजाबमध्ये भिंड्राँवाले यांना उत्तेजन मिळाले नाही काय? असे भूराजकीय कारणांसाठी पोसले गेलेले अनेक भस्मासुर दाखवता येतील.
दहशतवाद मुख्यत्वेकरून धर्माशी
दहशतवाद मुख्यत्वेकरून धर्माशी संबंधित आहे.
असं म्हणायचं तर मग हिंदू दहशतवादी हे शब्द मनाला का लागावेत ? फार तर फार सौम्य दहशतवाद किंवा आपल्या बाब्याचा म्हणून "गुड टेररिझम" असं म्हणावं का ? बरं माझ्या सारख्या सामान्यांना केवळ तलवारी-बॉम्ब उगारले म्ह्णजेच दहशतवाद एवढाच अर्थ अह नसतो. माझ्या शेजारी देवळात तिन्ही त्रिकाळी माईक वरुन चालणारे भजन, रस्ते अडवून घातलेले मंडप, त्यात रहदारीच्या आवाजावर ताण करत लावलेली गाणी, कामासाठी सरकारी ऑफिस मध्ये गेले असता कामं खुंताळ्यावर टांगून चाललेल्या पूजा ही सगळी दहशत्वादाहीच सौम्य रुपे आहेत. कारण त्याचा त्रास होतो आणि त्याविरुद्ध थोडाही आवाज उठवल्यास त्याची फळे भोगावी लागतात. मदतीसाठी पोलिसांपासून सगळ्या संस्था निरुपयोगी ठरतात.
असं म्हणायचं तर मग हिंदू
असं म्हणायचं तर मग हिंदू दहशतवादी हे शब्द मनाला का लागावेत ?
फार तर फार सौम्य दहशतवाद किंवा आपल्या बाब्याचा म्हणून "गुड टेररिझम" असं म्हणावं का ? बरं माझ्या सारख्या सामान्यांना केवळ तलवारी-बॉम्ब उगारले म्ह्णजेच दहशतवाद एवढाच अर्थ अह नसतो. माझ्या शेजारी देवळात तिन्ही त्रिकाळी माईक वरुन चालणारे भजन, रस्ते अडवून घातलेले मंडप, त्यात रहदारीच्या आवाजावर ताण करत लावलेली गाणी, कामासाठी सरकारी ऑफिस मध्ये गेले असता कामं खुंताळ्यावर टांगून चाललेल्या पूजा ही सगळी दहशत्वादाहीच सौम्य रुपे आहेत. कारण त्याचा त्रास होतो आणि त्याविरुद्ध थोडाही आवाज उठवल्यास त्याची फळे भोगावी लागतात. मदतीसाठी पोलिसांपासून सगळ्या संस्था निरुपयोगी ठरतात.
त्याचं कारण असं की "हिंदू दहशतवाद" आणि "हिंदू दहशतवादी" असे काहीही अस्तित्वात नसताना ओढूनताणून हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न होत आहे म्हणून. मी पूर्वीच विचारले आहे की ज्यांच्यावर दहशतवादी कृत्ये केल्याचे सिद्ध झाले आहे अशा "हिंदू दहशतवाद्यांची" नावे सांगा. यावर आतापर्यंत एकही नाव पुढे आलेले नाही. परंतु हिंदूसुद्धा दहशतवादी आहेत हे दाखविण्यासाठी एवढी तगमग सुरू आहे की मग बजरंग दलाची मिरवणूक आणि तुमच्याच वरील प्रतिसादातील लिहिलेले सार्वजनिक उत्सवामुळे होणारे उपद्रव हे सुद्धा त्याच पातळीची दहशतवादी कृत्ये आहेत असे ओढूनताणून सांगितले जात आहे.
हिंदूंना धार्मिक दहशतवादाच्या कृत्यामुळे शिक्षा झाल्याचे एकही उदाहरण नाही. म्हणून आधी बजरंग दलाची रॅली हा दहशतवाद असा दावा केला गेला. आणि आता सार्वजनिक उत्सव हा हिंदुंचा दहशतवाद हा दावा आहे. याच हिशेबाने हिंदू आपल्या घरात करीत असलेली देवपूजा किंवा खोलीत बसून केलेले जपजाप्य हा सुद्धा "हिंदूंचा धार्मिक दहशतवाद" असे लॉजिक पुढे आल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही. "हिंदू करीत असलेली प्रत्येक गोष्ट हा धार्मिक दहशतवाद आहे" असे उद्या एखादा निर्धमांध धार्मिक दहशतवादाची व्याख्या करून सांगेल.
धार्मिक दहशतवाद ही फार गंभीर गोष्ट आहे. ही एक अत्यंत गंभीर अशी जागतिक समस्या आहे. दहशतवादी घटनांमध्ये अजून एकही हिंदू सापडला नाही हे शल्य निधर्मांधांच्या मनात असावे. त्यामुळे दहशतवादी नसताना सुद्धा ओढूनताणून हिंदूंना त्यात गोवून दहशतवाद्यांच्या पातळीवर आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असतात.
बाबू बजरंगी आणि माया कोदनानी
बाबू बजरंगी आणि माया कोदनानींबद्दल तुम्ही काही बोलत नाही का? का हिंदू दहशतवाद्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करता? आणि जो आरोप पुरोगाम्यांवर करता, सिलेक्टिव्हटीचा, ते स्वतःही करता. पुरोगामी निदान परामाणिकपणे मान्य करतात की आम्ही हिंदू धर्मावर अधिक टीका करतो, त्याची कारणमीमांसा शोधायचा प्रयत्न करतात. तुम्ही तर वैचारिक अप्रामणिकपणा, दुटप्पीपणा करता, ते मान्यही करत नाही. तेच ते झापडबंद विचार, तेच-ते फिरवून फिरवून बोलणं यापलिकडे काही बोलत नाही.
तुमच्या लेखनाला करमणूकमूल्य सोडून इतर मूल्य आहे असं का समजावं?
बाबू बजरंगी आणि कोदनानी यांना
बाबू बजरंगी आणि कोदनानी यांना जातीय दंगलीतील सहभागाबद्दल योग्य ती शिक्षा झालेली आहे. गोध्रा येथे रेल्वेची बोगी जाळून ६० प्रवाशांना मारणार्या बर्याच स्थानिकांना योग्य ती शिक्षा झालेली आहे. त्यानंतर उसळलेल्या दंगलीतील सहभागाबद्दल अनेकांना योग्य ती शिक्षा झाली आहे. जातीय दंगलींचा इतिहास खूप जुना आहे. धार्मिक दहशतवाद मोठ्या प्रमाणात उफाळण्याच्या कितीतरी आधीपासून जातीय दंगली होत आहेत. जातीय दंगलीत दंगलीत सहभागी असलेल्या दोन्ही बाजूंची खूपच हानी होते. जातीय दंगलींविषयी मी आधीच्या एका प्रतिसादात सविस्तर लिहिले आहे ते वाचावे.
तुमच्या लेखनाला करमणूकमूल्य सोडून इतर मूल्य आहे असं का समजावं?
तुम्ही काहीही समजा. तो तुमचा व्यक्तिगत निर्णय आहे.
व्यक्तिगत? अजिबात नाही.
कोदनानी आणि बजरंगी मजेत जामिनावर बाहेर आहेत. शिक्षा होऊनही.
तुम्ही काहीही समजा. तो तुमचा व्यक्तिगत निर्णय आहे.
अजिबात नाही. हा व्यक्तिगत निर्णय नाही. निरर्थक, तर्कहीन, चष्मा लावून मोठ्या समाजाकडे द्वेषपूर्ण नजरेने बघणाऱ्या लेखनाला हास्यास्पद समजणं हा व्यक्तिगत निर्णय नाही. हे अनेकदा दाखवून तुम्ही ते अमान्य करत आहात हा तुमचा व्यक्तिगत झापडबंदी निर्णय आहे.
कोदनानी आणि बजरंगी मजेत
कोदनानी आणि बजरंगी मजेत जामिनावर बाहेर आहेत. शिक्षा होऊनही.
जामीन हा न्यायालयाचा निर्णय असतो. हा एखाद्या पक्षाचा किंवा सरकारचा निर्णय नसतो. घटनेनुसार आरोपी जामीन मागू शकतो आणि अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार जामीन द्यायचा का नाही याचा निर्णय फक्त न्यायाधीश घेऊ शकतात. जामीन नाकारला असेल तर तो कायद्यानुसारच नाकारला जातो आणि जामीन दिला असेल तर तो कायद्यानुसारच दिला जातो. हा निर्णय न्यायाधीशांचा असतो. इतरांचा नाही. दोषी ठरून शिक्षा झालेले अनेक गुन्हेगार जामिनावर बाहेर आहेत. (उदा. लालू, संजय दत्त इ.).
अजिबात नाही. हा व्यक्तिगत निर्णय नाही. निरर्थक, तर्कहीन, चष्मा लावून मोठ्या समाजाकडे द्वेषपूर्ण नजरेने बघणाऱ्या लेखनाला हास्यास्पद समजणं हा व्यक्तिगत निर्णय नाही. हे अनेकदा दाखवून तुम्ही ते अमान्य करत आहात हा तुमचा व्यक्तिगत झापडबंदी निर्णय आहे.
हे वाचून खूपच हसायला आलं. हा भाबडेपणा म्हणावा का स्वतःचे मत म्हणजेच अखिल ब्रह्मांडाचे मत समजण्याचे अज्ञान? तुमचे व्यक्तिगत मत म्हणजे इथल्या यच्चयावत सर्व सदस्यांचे मत हेही यानिमित्ताने समजले. असो.
दहशतवादामागची ड्रायव्हिंग
दहशतवादामागची ड्रायव्हिंग कारणे - जागतिक राजकारण, अर्थकारण, भांडवलशाही - ही सुद्धा आहेत असे मला सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे "धर्मांध वि. सामान्य जनता" हे ओव्हरसिम्प्लिफिकेशन होते आहे. म्हंजे या ओव्हरनिम्प्लिफिकेशनमुळे परिणाम असा होतो की - खरी लढाई जागतिक राजकारणांध वि. सामान्य माणूस, अर्थकारणांध वि. सामान्य माणूस, भांडवलशाहीने अंध झालेले वि. सामान्य माणूस - अशी सुद्धा आहे असे म्हणायची आमची संधी हुकते आहे.
+१
एकदम मान्य आहे. असे अनेक निकष असतील- दहशतवाद हा त्यापैकीच.
पण मुळात जेव्हा कोणी समाजाची विभागणी "हिंदू वि. मुस्लिम" म्हणतो तेव्हा त्याचा निकष "धर्म" आहे हे उघड आहे. आणि एका धर्माविरूद्ध दुसर्याने लढणं ही संकल्पना आजच्या जगात हमखास कालबाह्य आहे- धर्माला आता रोजच्या जगण्यात एक संस्था म्हणून काहीच स्थान नाही.
तेव्हा-to remain relevant in current times- खरी विभागणी "धर्माला कवटाळणारे/धर्माचा आग्रह धरणारे Vs सामान्य लोक" अशी करावी लागेल.
(पण श्रीगुरूजी हिंदुत्ववादी असल्याने त्यांचा नकार नक्की कशाबद्दल आहे हे बघू.)
माझं मर्यादित निरीक्षण तरी
माझं मर्यादित निरीक्षण तरी असंच आहे.
भारताचं उदाहरण घ्या. मी धर्म मानत नाही, तरीही व्यवस्थित जगतो. माझी सगळी कामं करतो, माझ्या गरजा पूर्ण होतात. "धर्म ही एक संस्था" ह्या नात्याने मला काही करायला सांगत नाही आणि माझी अडचण होत नाही. धर्म माझ्यावर किंवा मी धर्मावर अवलंबून नाही. धर्म नसला तरी मी (आणि माझ्यासारखे अनेक) व्यवस्थित जगतात.
दुसर्या शब्दांत - धर्म समजा उद्या सकाळी ८ वाजता नष्ट झाला , तर आपल्या रोजच्या जगण्यात काय फरक पडणार आहे? आणि कसा?
किमान एक उदा. माहिती आहे.
नॉर्थीस्ट भागात चर्चचा बर्राच होल्ड आहे जन्तेवर, विशेषतः नागालँड वगैरे भागात. रविवारच्या प्रार्थनेला न येणार्या कुटुंबाचे डेव्लपमेंट बेनिफिट्स चर्चकडून कट केले जातात असे तिथल्या प्रत्यक्षदर्शींकडून ऐकलेले आहे. आणि हौ डेअर चर्च डू इट? कारण त्यांचा जनसंपर्क तगडा असल्याने अनेक डेव्हलपमेंट स्कीममध्ये सरकारच त्यांची मदत घेते वगैरे.
बाकी धर्माचे संस्थात्मक महत्त्व आहे की नाही या प्रश्नाच्या उत्तराकरिता 'उद्या धर्म नष्ट झाला तर काय होईल?' हे लॉजिक गैरलागू आहे. जगण्यात तादृश अडथळा येत नाही याचा अर्थ, व्हाईल इट लास्टेड काहीच महत्त्व नव्हते असे यात ध्वनित होतेय जे चूक आहे. वर्तमानाबद्दल काय ते पहावे, कल्पित भविष्याआधारे वर्तमानाबद्दल इन्फरन्स काढणे तर्कसुसंगत नाही.
नॉर्थ इस्ट मधली गोष्ट खरी
नॉर्थ इस्ट मधली गोष्ट खरी असेल तर मग तिथे धर्म एक संस्था ह्या नात्याने नक्कीच चालू आहे.
@उद्या धर्म नष्ट झाला - उद्या म्हणजे भविष्यकाळ नव्हे, तर एक गृहितक म्हणून. वर्तमानकाळात तुमच्या माझ्या जगण्यातून धर्म एक संस्था म्हणून वजा करून टाकलं, तर आपल्याला कशाची कमी भासेल? बँक व्यवहार, मतदान, नोकर्या, जन्म, मृत्यू, लग्न, शिक्षण, प्रवास, खाणं पिणं ह्या सगळ्यात तरी नाही. थोडंसं जनरलायझेशन केलं तर ऐहिक गोष्टींमधे धर्म आता एक संस्था म्हणून लुडबूड करू शकत नाही.
तेव्हा भूतकाळात अर्थात धर्म महत्त्वाचा होता. पण आता नाही, आणि नसलाच पाहिजे.
पुन्हा, वैयक्तिक पातळीवर धर्माचं आणि देवाचं महत्व अजूनही आहेच, पण एक सार्वजनिक संस्था म्हणून धर्म माझ्यासाठी टाकाऊ आहे.
======
छोट्या पातळीवर विचार केला तर मुस्लीम समाजात धर्म एक संस्था म्हणून अजूनही बराच relevant असावा असं गृहितक आहे पण काही पुरावा नाही.
धार्मिक संस्थांनी चालवलेले
धार्मिक संस्थांनी चालवलेले चॅरिटेबल उपक्रम हा धर्माच्या संस्थात्मक रिलेव्हन्सचा पुरावा नाही काय? त्या संस्थांसाठी पैसा येतो तो धार्मिक संस्थांना मिळणार्या डोनेशनकडून, सबब हे धर्माच्या संस्थात्मक रिलेव्हन्सचेच उदाहरण म्हणायला हरकत नसावी. नॉर्थीस्टच्या उदाहरणाप्रमाणे धर्म न मानणार्यांना बहिष्कृत करण्याने आपले अस्तित्व दाखवले तरच ते उदाहरण ग्राह्य आहे असं काही आहे का? तसं नसेल तर हीही उदाहरणे चालायला हरकत नाही.
मी तर म्हणते आई-वडीलांना
धर्म समजा उद्या सकाळी ८ वाजता नष्ट झाला , तर आपल्या रोजच्या जगण्यात काय फरक पडणार आहे? आणि कसा?
मी तर म्हणते आई-वडीलांना पाश्चात्य पद्धतीसारखा एकटे टाकण्याचा किंवा वृद्धाश्रमाचा रस्ता न दाखविणे, श्रावण बाळ असणे हा धर्माच्या रिलेव्हन्स चा पुरावा नाही का?
अजुनही बायका हळद-कुंकू करतात, नवर्याला देव मानतात (दाखवत नसतील पण शब्द खाली पडू देत नाहीत) हे सतीसावित्री व्रत धर्माचा रिलेव्हन्स दाखवत नाही का?
पालकांनी वंशाच्या दिव्यावरती आर्थिक रीत्या (किंवा सामाजिक रीत्या) अवलंबून रहाणे हा धर्माच्या ढवळाढवळीचा/चांगल्या इन्टरफिअरन्स चा पुरावा नाही का?
___
** सुतळी बॉम्ब फुटुन गेल्यानंतर आमच्या या लवंगी/टिकल्या ;)
अजुनही बायका हळद-कुंकू करतात,
अजुनही बायका हळद-कुंकू करतात, नवर्याला देव मानतात (दाखवत नसतील पण शब्द खाली पडू देत नाहीत) हे सतीसावित्री व्रत धर्माचा रिलेव्हन्स दाखवत नाही का?
पालकांनी वंशाच्या दिव्यावरती आर्थिक रीत्या (किंवा सामाजिक रीत्या) अवलंबून रहाणे हा धर्माच्या ढवळाढवळीचा/चांगल्या इन्टरफिअरन्स चा पुरावा नाही का?
अधोरेखित भाग म्हणजे स्त्रीद्वेषाचा पुरावा असे म्हटल्याशिवाय अलीकडे पुरोगामी होता येत नाही म्हणे.
अस्वलराव तुम्ही अनेक चांगले
अस्वलराव तुम्ही अनेक चांगले प्रश्न विचारलेले आहेत. व अनेक मस्त मुद्दे मांडलेले आहेत.
----
पुन्हा, वैयक्तिक पातळीवर धर्माचं आणि देवाचं महत्व अजूनही आहेच, पण एक सार्वजनिक संस्था म्हणून धर्म माझ्यासाठी टाकाऊ आहे.
अधोरेखित भाग अत्यंत मस्त शब्दप्रयोग.
टाकाऊ आहे त्याची जी कारणं आहेत त्यात हे देखिल आहे की - you let Govt. replace religion.
One important role of religion (apart from commenting on spirituality and philosophy) is to offer a range of institutions of governance/regulation of individual behavior. Religion uses rules (institutions) as prescribed by someone (divine). Those are generally least changeable. More or less fixed over a century or a millennium. Govt. came to replace this by offering to let you choose the rules you will be governed by (as opposed to having fixed / not changeable rules). You let Govt. take over the role of your regulator at the HIGH level and FORMAL. But the INFORMAL norms, conventions, etiquette, mannerisms, taboo, customs, traditions still remain. Many of them stem from religion.
व म्हणून हे अनौपचारिक (इन्फॉर्मल) नियम जे धर्मातून निर्माण झालेले आहेत ते तुमच्या जीवनावर प्रभाव टाकतातच. त्यामुळे उद्या ८ वाजता धर्म संपला तरी त्या इन्फॉर्मल नियमांचे वर्चस्व नसले तरी प्रभाव राहणार आहेच. किमान काही कालासाठी.
( खूप ढोबळ मानाने लिहिलेले आहे. )
होय अर्थातच पण हा सबसेट
होय अर्थातच पण हा सबसेट आहे
माझ्या मते खरा लढा जन्मावर आधारीत ओळखीच्या पोकळ अस्मितेवर स्वतः पोसणारे वि त्या अस्मितेला रोजच्या जगण्यात एका मर्यादेहून भाव न देताही आनंदाने जगू इच्छिणारे असा आहे. धर्म हा त्या पोकळ अस्मितांपैकीच एक. (जात, सभोवतालची/पालक वापरतात ती भाषा, रंग, वंश, पंथ इत्यादीही त्यातच आले)
माझ्या मते खरा लढा जन्मावर
माझ्या मते खरा लढा जन्मावर आधारीत ओळखीच्या पोकळ अस्मितेवर स्वतः पोसणारे वि त्या अस्मितेला रोजच्या जगण्यात एका मर्यादेहून भाव न देताही आनंदाने जगू इच्छिणारे असा आहे. धर्म हा त्या पोकळ अस्मितांपैकीच एक. (जात, सभोवतालची/पालक वापरतात ती भाषा, रंग, वंश, पंथ इत्यादीही त्यातच आले)
राष्ट्रीयत्व ही अस्मिता असते का ?
जन्मावर आधारित असते का ?
पोकळ असते का ?
काही मर्यादित प्रमाणावर असली की सुयोग्य व त्याबाहेर असली की पोकळ - असं असतं का ?
पूर्वी तुम्हीच ही लिन्क एका धाग्यात दिली होतीत
पूर्वी तुम्हीच ही लिन्क एका धाग्यात दिली होतीत. तेव्हापासून हा लेख नीट लक्षात आहे. या उतार्यात लेखिका तेच म्हणते आहे की - मी भारतिय असण्याची अस्मिता बाळगावी असे मी आपणहून काय केले? योगायोगाने भारतात जन्मास आले एवढच? अन मग ती अस्मिता मी का बाळगावी?
http://openborders.info/blog/day-wagah-rethink-borders/
I had changed in small ways. For example, while watching a match of cricket, a sport passionately followed both in India and Pakistan, I cheered more often based on the quality of the game rather than the country playing. India’s performance in a match did not seem tied to my core identity. I no longer felt either “proud” or “ashamed” of being an Indian. My being Indian was just a fact of my life. There seemed no logical reason to believe that my country was better than others merely because I was born here. Paradoxically, I was more open-hearted in my appreciation of significant Indian milestones because that was based on genuine evaluation rather than pre-scripted loyalty.
राष्ट्रीयत्व काही अंशी डिफाइन
राष्ट्रीयत्व काही अंशी डिफाइन करता येते. राष्ट्राच्या सीमा, राज्यघटना, राज्यकारभाराच्या पद्धती, तिथला जन्म, वास्तव्य,नागरीकता इ. त्यामुळे मर्यादीत स्वरूपात राष्ट्रीय अस्मिता सुसह्य असते..
पण धर्म ही संकल्पना इतक्या असंख्य पद्धतीने इंटरप्रीट करता येते की एका इंटरप्रिटेशनने असलेली अस्मिता बाकी बर्याच अंगाने पोकळ ठरते.
इथे
दहशतवादामागे अर्थकारण, सत्ताकारण, राजकारण, झालंच तर हिंदू- शीख वगैरे धर्म ही कारणे असू शकतात पण इस्लाम मात्र कधी असूच शकत नाही हे या निमित्ताने लक्षात आले.
एकदम सहमत.
संपूर्ण धाग्याचा सारांश चारपाच मुद्द्यात मांडायचा असेल तर त्यातला एक मुद्दा हा आहे. अगदी बुद्ध धर्म पण हिंसात्मक (दहशतवादी ???) कारवाया करतो. उदा. इथे पहा (5:00 to 5:30 च्या दरम्यान) तो सगळा व्हिडिओ पाहण्यासारखा/ऐकण्यासारखा आहे.
अगदी बुद्ध धर्म पण हिंसात्मक
अगदी बुद्ध धर्म पण हिंसात्मक (दहशतवादी ???) कारवाया करतो
सिंहली आणि म्यानमारी लोक्सचे उदाहरण इथे फिट बसतेय.
बाकी आयसिस, अल्कायदा वगैरे मध्ये मात्र इस्लामचा त्यात काही संबंध आहे असे मानणे, आपल्या अनेक दहशतवादी कृत्याच्या समर्थनार्थ इस्लामिक धर्मग्रंथांचा आधार घेणे वगैरे निव्वळ शत्रुपक्षाचा अपप्रचार असावा. धार्मिक दहशतवाद करावा तर तो फक्त हिंदू धर्मीयांनी.
बाकी आयसिस, अल्कायदा वगैरे
बाकी आयसिस, अल्कायदा वगैरे मध्ये मात्र इस्लामचा त्यात काही संबंध आहे असे मानणे, आपल्या अनेक दहशतवादी कृत्याच्या समर्थनार्थ इस्लामिक धर्मग्रंथांचा आधार घेणे वगैरे निव्वळ शत्रुपक्षाचा अपप्रचार असावा. धार्मिक दहशतवाद करावा तर तो फक्त हिंदू धर्मीयांनी.
+ १
उत्तम लेखन.
उत्तम लेखन.
आपला संवाद आपणांशी आणि संवादाचा परीघ थोडा वाढवून आपला संवाद आपल्यासारख्या लोकांशी, याचं सुंदर उदाहरण. त्याचबरोबर तो संवाद तिथेच थांबू नये याचीही काळजी घेण्याबद्दल लेख सुचवतो.
हिंदू घरांत जन्माला आलेले लोक हिंदू धर्माचीच चिकीत्सा का करतात याचंही एक उत्तर या लेखातून मिळालं. त्याबद्दल उत्पलचे आभार.