आत्महत्येचे गूढ
माणसं आत्महत्या का करतात ही एक जगभरच्या मानसतज्ञांना नेहमीच सतावणारी समस्या आहे. ज्या देशात टोकाचे दारिद्र्य, असह्य वेदना देणारे आजारपण, वा कर्जबाजारीपण ही कारणं आत्महत्येसाठी पुरेसे ठरत असले तरी विकसित देशात अशा प्रकारची कारणं नसतानासुद्धा माणसं आत्महत्या का करतात, हे एक न सुटलेले कोडे ठरत आहे. या विकसित देशासंबंधीच्या एका अभ्यासानुसार अशा देशातील ऍनोरेक्सियाने (anorexia) ग्रस्त असलेल्यांच्यापैकी 20 टक्के रुग्ण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. ऍनोरेक्सियाचे रुग्ण काही कारणामुळे पोटभर खात नसल्यामुळे या रोगाचे बळी ठरतात. जगभरातील सुमारे शंभर कोटी जण भुकेने तडफडत जिवंत राहण्यासाठी काहीना काही तरी आधार शोधत असतात. जिवंत राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. मात्र इतर काही संपन्न देशात भूक लागत नाही, भूक लागली तर खायचे नाही, वजन जास्त होत आहे म्हणून खायचे नाही वा जंक फुडच्या आहारी गेल्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीही खायचे नाही, अशी माणसं आहेत. व ही कारणं ऍनोरेक्सियासाठी पुरेसे ठरतात. या दोन टोकाच्या कात्रीत सापडलेल्या मानसतज्ञांना आत्महत्या नेहमीच चकवा देणारी एक मोठी समस्या ठरत आहे.
शंभर वर्षापूर्वी एमिल डुर्खेम (Émile Durkheim) या समाजशास्त्रज्ञाने आणि सिग्मंड फ्रॉयड या मानसतज्ञाने आत्महत्यासंबंधी काही विचार मांडले होते. डुर्खेम हे समाजशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे आत्महत्येच्या कारणांना समाजातील विविध घटकामध्ये शोधत होते. त्यांच्या मते समाजाशी नीटपणे जुळवून न घेतल्यामुळे, समाजाच्या अरेरावीमुळे, बहिष्कृतावस्थेत राहिल्यामुळे काही जणांना जीवन संपवून टाकावे असे वाटले असावे. फ्रॉयड मात्र death instinct हे माणसात जन्मापासूनच असल्यामुळे तेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असावे, अशी मांडणी करत होता. अलीकडील आधुनिक अभ्यासकांच्या मते विषण्णता, नैराश्य, भावनिक उद्वेग, वा हताश स्थिती ही कारणं माणसांना आत्महत्या करण्यास उद्युक्त करतात. परंतु हे विधान अत्यंत ढोबळ स्वरूपाचे असून हे अभ्यासक अजूनही आत्महत्येसंबंधीच्या मुळाशी जाऊन विचार करत नाहीत असे वाटते.
समान परिस्थितीतून जात असताना काही जण आत्महत्येत शेवट शोधतात व इतर मात्र परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतात. हे असे का?
आत्महत्येसंबंधीची आकडेवारी गोळा करण्यात थोडी फार प्रगती झालेली आहे. जगभरात सुमारे 1.8 टक्के मृत्यु आत्महत्येमुळे होतात. आत्महत्या करणार्यात 15 ते 24 वर्षे वयातल्यांची संख्या जास्त असून वाहन अपघातातील मृत्युनंतर आत्महत्येचाच क्रमांक लागतो. आत्महत्येचा प्रयत्न करणार्यात स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. परंतु आत्महत्या करण्यात यशस्वी होणार्यात पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.
प्रती वर्षी सुमारे 10 लाख जण आत्महत्या करतात. आत्महत्या करणार्यात बहुतांश जण मनोरुग्ण असतात. ऍनॉरेक्सिया, टोकाचे नैराश्य, द्विधृवीय भग्नता (bipolar disorder), छिन्न मानसिकता (schizophrenia) व मुख्यत्वे करून व्यक्तिमत्व भग्नता (borderline personality disorder) या मानसिक आजारांचा त्यांच्यात समावेश होऊ शकतो. त्याचप्रमाणे इतर प्रकारचे क्रॉनिक रुग्णसुद्धा आत्महत्येच्या विचारात असतात. अवसादावस्था (depression) व टोकाचे नैराश्य आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू शकतात. प्रती 40 सेकंदाला एक जण आत्महत्या करून मृत्युमुखी पडतो. कुठल्या प्रकारच्या रुग्णामध्ये हा धोका जास्त आहे हेच मानसतज्ञांना समजून घ्यायचे असते. परंतु उपलब्ध आकडेवारीतून ते स्पष्ट होत नाही. फक्त काही जणच आत्महत्येचा धोका पत्करतात व इतर हा मार्ग का निवडत नाहीत?
2005 साली अमेरिकन मानसतज्ञ, थॉमस जॉयनर याने याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या वडिलानी आत्महत्या केली होती म्हणून त्याला याविषयी जास्त कुतूहल होते. आत्महत्या करणार्यांचा वयोगट व त्या गटातील समान गुणविशेष यांच्या अभ्यासावरून तो काही निष्कर्षाप्रत पोहोचला. त्याच्या मते आत्महत्या करणारे विषण्णता व नैराश्य असे दोन निकष पूर्ण करतात. त्यातून त्यांना त्वरितपणे मरून जावेसे वाटत असते व याबद्दल ते अत्यंत गंभीरपणे विचार करू लागतात. सामान्यपणे एकाकी, एकलकोंडे आयुष्य जगणारे, दुसर्यांना आपले ओझे तर होत नाही ना किंवा आपल्या जवळचे कुणीही नाही या भावनेने त्रस्त झालेले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.
दुसरे म्हणजे स्वतःवर मृत्यु ओढून घेण्यात ते यशस्वी होतात. हे विधान जरी अती सामान्य वाटत असले तरी काही जण आत्महत्या करतात व काही करत नाहीत या प्रश्नाचे गुपित या विधानात आहे असे जॉयनरला वाटते. कारण आत्महत्येचा विचार मनात आला तरी आत्महत्या करण्यात अयशस्वी झालेल्यांची आकडेवारीच मुळात उपलब्ध नाही. कितीही गंभीरपणे विचार करून मरावेसे वाटत असले तरी प्रत्यक्ष कृती तेवढी सोपी नसते. त्याचबरोबर माणसातील self preservation ही एक जबरदस्त सहज प्रवृत्ती असल्यामुळे प्रत्यक्ष कृतीत थोडीशी अडचण आली तरी माणूस त्या कृतीतून माघार घेतो व आपण त्या गावचे नाही असे सोंग करतो. self preservation चे इन्स्टिंक्ट आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडते. त्यामुळे आत्महत्येची प्रत्यक्ष कृती सामान्यपणे फार अवघड प्रक्रिया असते.
self preservationच्या इन्स्टिंक्टला मात करून कृती करण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे त्यातील सर्व बारीक सारीक तपशीलाकडे लक्ष ठेऊन काम तडीपार नेणे. सामान्यपणे पहिला प्रयत्न अयशस्वी होतो. अडचणी येतात. काही वेळा दुखापत होऊ शकते वा घेतलेल्या विषारी पदार्थाचा डोज पुरेसा नसतो. अनेक प्रयत्नानंतरच हा दुर्दैवी अपघात यशस्वी होतो. प्रती 20 अयशस्वी प्रयत्नामागे एक यशस्वी आत्महत्या असते असे जाणकारांचे अंदाज आहे.
आत्महत्येच्या प्रयत्नात मृत्युची भीती वा त्या क्षणी होत असलेल्या वेदनांची जाणीव नसणे हाही भाग असू शकतो. मृत्युला जवळून पाहणारे पोलीस वा सैनिक आत्महत्या करून जीवन संपवण्यास कधीच घाबरत नाहीत. कदाचित आत्महत्या करणार्यांच्यात त्यांची संख्या जास्त असावी. त्याचप्रमाणे डॉक्टर्संना त्याच्या वैद्यकीय व्यवसायात मृत्युचे दर्शन दिननित्य घडत असल्यामुळे त्यांनाही त्याचे काहीही वाटत नसावे. जनसामान्यापेक्षा डॉक्टर्समध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे हे नाकारता येत नाही. जॉयनरच्या मते त्यांच्यातील कणखरपणाच त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत असावे. त्याचप्रमाणे ऍनोरेक्सियाच्या रुग्णातसुद्धा अशाच प्रकारचा कणखरपणा आढळतो. या दोन्ही नीरिक्षणामध्ये काही संबंध असेल का यावरही त्यानी अभ्यास केला.
2006 सालच्या एका अभ्यास शिबिरात जिल होल्म डेनोमा आणि व ट्रेसी विट्टे हे दोन विद्यार्थी जॉयनरचे भाषण ऐकत होते. विट्टेच्या नीरिक्षणानुसार ऍनोरेक्सिया रुग्णांच्या वाढत्या आत्महत्येची दोन कारण असू शकतील. इतर मनोरुग्ण व ऍनोरेक्सियात्रस्त यांच्यातील आत्महत्येला सामोरे जाण्याचे प्रमाण कमी जास्तपणे सारखे असले तरी ऍनोरेक्सियात्रस्तांची शारीरिक स्थिती अगदीच कमजोर असल्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे प्रयत्न यशस्वी ठरत असावेत. किंवा ऍनोरेक्सियामुळे होणार्या वेदना आत्महत्येच्या प्रयत्नातील वेदनेपेक्षा जास्त भयंकर असल्यामुळे वेदनेतून सुटका होण्यासाठी आत्महत्येच्या प्रयत्नात थोडीसुद्धा चूक राहू नये याची काळजी घेतली जात असावी.
जॉयनरच्या मते दुसरे स्पष्टीकरण जास्त योग्य होते. याची चाचणी घेण्याचे त्या दोन विद्यार्थ्यांनी ठरविले. Randomly निवडलेल्या काही आत्महत्येची प्रकरणं त्यानी तपासली व त्यातून नेमके काय होत असावे याचा अंदाज घेतला. आत्महत्येत यश व ऍनोरेक्सियात्रस्तांची शारीरिक आरोग्य यांचा तसा काही संबंध नव्हता. आत्महत्येत यशस्वी ह्वावे यासाठी यातील तिघे चालत्या रेल्वेखाली जीव गमावलेले असतात. एकाने जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेऊन जगाचा निरोप घेतला होता. एकीने बंद खोलीत गॅसला आग लावून जीवनाची इतिश्री केली होती. अजून एकाने फिनेलसदृश कीटनाशक पिऊन प्राण सोडले होते. या 9 केसेसचा अभ्यास पुरेसा नसला तरी आत्महत्येसाठी केलेल्या प्रयत्नांची कल्पना येऊ शकते.
ऍनोरेक्सियाबद्दलचे हे निष्कर्ष जॉयनरच्या गृहितकाला पूरक आहेत असे वाटू लागते. ऍनोरेक्सियाचे रुग्ण सामान्यपणे लोकांच्यात मिसळणे टाळतात. कारण लोकांच्यात मिसळल्यामुळे काही खाण्यापिण्याचा आग्रह झाल्यास त्याला नाकारणे वा तुसडेपणाने वागणे बरे दिसत नाही. याच कारणामुळे ते कुठल्याही चित्रपटांला (जेथे पॉपकॉर्न खाण्याची तीव्र इच्छा होण्याची शक्यता असते) वा मित्रांच्या घरी जाणे टाळत असावेत. हा एकलकोंडेपणाच त्यांना आत्महत्या करण्यास उद्युक्त करत असावा. एका प्रकारचे वादळच त्यांच्या मनात भोंबावत असते. त्याचबरोबर हे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना मित्रमैत्रीणींना ओझे वाटू लागतात. मुलांच्यावरील ऍनोरेक्सियाचे उपचार प्रसंगी पालकांच्या जीवावर बेततात. कारण दिवसाचे 24 तास पाळत ठेवणे गरजेचे ठरते.
महत्वाचे म्हणजे ऍनोरेक्सियामुळे अतीव वेदनेची सवय होऊ लागते. जेवण न करणे, भुकेकंगाल राहणे, उपवास करणे यामुळे पोटदुखी, डोकेदुखीचे प्रमाण यांच्यात जास्त असते. ऑक्सिओपोरोसिससुद्धा या रुग्णात सर्रासपणे आढळतो. ढिसूळ हाडामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते.छातीत दुखणे वा हृदयाघात या गोष्टीही होऊ शकतात.
जॉयनर आणि विट्टेच्या अभ्यासामुळे या आजाराच्या रुग्णांची खोलात जाऊन चाचणी घेत आत्महत्येकडे ज्यांचा कल आहे हे शोधता येईल. यासाठी त्यांच्या मनाचा ठाव घेऊ शकणारी चाचणी हवी. त्याच प्रमाणे आत्महत्येला उत्तेजन करणार्या गोष्टीपासून – धोकादायक हत्यारं, विषारी औषधं इत्यादींची सहज उपलब्धता – जितके दूर ठेवता येईल तेवढे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
1965 नंतरच्या दशकात आत्महत्येचे प्रमाण 60 टक्क्यानी वाढला आहे, असे तज्ञांचे मत आहे.
जरी सर्व गोष्टी जॉयनरच्या गृहितकाकडे बोट दाखवत असले तरी त्याच्या मते आत्महत्येच्या संबंधी अजूनही फार मोठ्या प्रमाणात संशोधन होण्याची गरज आहे. ही फक्त सुरुवात आहे व अजूनही पद्धतशीरपणे अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.
आत्महत्या का करतात, ज्यांच्यामध्ये हा धोका जास्त आहे व यातून बाहेर पडण्यासाठी काही नवीन मार्ग असू शकतील का याचाही विचार होणे गरजेचे आहे. दीर्घ काळचे मानसोपचार थोड्या फार प्रमाणात भयगंड दूर करून आत्महत्येपासून परावृत्त करणे शक्य होईल परंतु जोपर्यंत लोकामध्ये वेदनेची जाणीव होत नाही, जोपर्यंत त्यांना एकलकोंडेपणाने त्रस्त असतात वा इतरानां त्यांचे ओझे वाटत असते तोपर्यंत आत्महत्येची फक्त चर्चा होत राहील, हाती काही लागणार नाही.
प्रतिक्रिया
(No subject)
प्रवृत्त की परावृत्त ?
दीर्घ काळचे मानसोपचार थोड्या फार प्रमाणात भयगंड दूर करून आत्महत्येपासून प्रवृत्त करणे शक्य होईल
प्रवृत्त ???
तुम्हाला परावृत्त म्हणायचय का काका ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
चूक लक्षात....
'मन' यांनी चूक वेळीच लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
माणसं आत्महत्या का करतात ही
लहानपणी आत्महत्येचे नाहित मात्र घरातून पळून जाण्याचे विचार काही वेळा (विशेषतः काहितरी थरारक कारनाम्याम्ची पुस्तके वाचल्यावर) येत असत. माझ्यातील कैक प्रकारचे टॅलेंट कुण्णाकुण्णाला कसे कळत नाही असा स्वतःबद्दलचा एक (गैर)समज होता (म्हणजे कळत नव्हते हा समज खरा होता, माझ्यात ते टॅलेंट असल्याचा समज गैर होता). पुढे कळले की असे विचार अनेक मित्रांच्या डोक्यात येऊन गेले आहेत. याचे कारण काय असावे? ही एक जगभरच्या मानसतज्ञांना नेहमीच सतावणारी समस्या का बरे झाली नाही?
===
बाकी एकुणात लेख नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नुकतीच एका पारिचित व्यक्तीने
नुकतीच एका पारिचित व्यक्तीने आत्महत्या केली. दुवा
ज्ञानप्रबोधिनी येथे राष्ट्रवादी अभ्यास मंडळ अशा नावाने काम करत असलेले एक व्यासपीठ होते त्याला ते नेहमी येत असत. अनेक पुरोगामी कार्यक्रमांनाही येत.
माझे गुरुसमान मित्र कै. माधव रिसबूड यांच्या मुलाने तरुणवयात अमेरिकेत आत्महत्या केली. आम्ही त्याची प्रथितयश ज्योतिषाने बनविलेली कुंडली एका ठाण्याच्या ज्योतिषाला त्याच्या मागणीवरुन पाठविली. त्यासोबत जन्मवेळ, जन्मस्थळ व जन्मतारीख ही पाठविली. आम्ही सगळी माहिती खरी दिली व फक्त मृत्यू हा कसा व १९८० ते १९९० या काळात कुठल्या वर्षी झाला असेल एवढेच विचारले. त्याला ज्योतिषाने तयार केलेली कुंडली पाठविली. ती कुंडलीसुद्धा चुकीची निघाली. त्याने ती स्वत: तपासून नवीन बनविली व त्यावरुन एक वर्ष दिले ते मृत्यू वर्षाच्या जवळपाससुद्धा नव्हते. सदर आवाहन हे धनुर्धारी मे २००० चा अंक या ज्योतिषांच्या व्यासपीठावरच मांडले गेले होते. आता कुणी म्हणेल की एखादा ज्योतिषी चुकला म्हणून काय शास्त्र चुकीचे का?
मिपावर यशवंत कुलकर्णी यालाही हा मार्ग का निवडावासा वाटला? गुढ विषयाबद्दल एक सुप्त आकर्षण त्यामागे असावे. निहिलिझम हे देखील एक कारण आत्महत्येमागे असावे.
एकुणात जगण्याच्या प्रेरणेला मरण्याच्या प्रेरणेने मागे टाकले कि आत्महत्येचा मार्ग मोकळा होतो.
आत्महत्येची वर्गवारी हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्यांची चिकित्सा जर केली असेल त्याविषयी वाचायला आवडेल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
लेख पुन्हा नीट वाचेन. या
लेख पुन्हा नीट वाचेन. या विषयावर विचार घोळतच असतात मनात.
आत्महत्या, प्रायोपवेशन आणि जिवंत समाधी यात काय फरक आहे?
१. जीवनत्यागामागील विचारांचे
१. जीवनत्यागामागील विचारांचे स्वरूप व व्याप्ती
२. समाजाकडून मिळालेली मान्यता
हे फरकाचे दोन तरी मुद्दे दिसताहेत.
रादर, समजून उमजून, जबाबदार्या न टाळता घेतलेला जीवनत्यागाचा निर्णय म्हणजे प्रायोपवेशन किंवा समाधी आणि भावनेच्या भरात इ. घेतलेला निर्णय म्हणजे आत्महत्या असे जीवनत्यागाच्या प्रयत्नांचे वरील लेबलांमध्ये वर्गीकरण (रादर पर्सेप्शन) आहेसे दिसते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जबाबदार्या न टाळता म्हणजे
जबाबदार्या न टाळता म्हणजे काय? समाजाने चांगले म्हणावे म्हणून केलेला आत्महत्येचा एलॅबोरेट प्रकार म्हणून इतर दोन प्रकारांकडे का बघू नये?
शिवाय एखाद्याने व्यक्त केले नाही, पुस्तक लिहीले नाही म्हणजे विचारांची व्याप्ती कमी असेल असे नाही.
म्हणूनच मी म्हणालो की
म्हणूनच मी म्हणालो की 'पर्सेप्शन' आहे त्या लेबलांबद्दल.
२+२=४च का? ३ का नाही? २ म्हणजे काय आणि + म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट केल्यावर २+२ याचे जे कै उत्तर येईल त्याला ४ म्हणायचे इतकाच त्याचा अर्थ. ४ आणि ३ या लेबलांना काही इंट्रिन्सिक अर्थ नाही.
तीच गोष्ट इथेही अंशतः तरी लागू व्हावी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हं. पटले. म्हणजे लाईफ ऑफ पाय
हं. पटले. म्हणजे लाईफ ऑफ पाय सारखं हे डेथ ऑफ पाय.
आत्महत्या = स्वतःला संपवणे
आत्महत्या = स्वतःला संपवणे हाच उद्देश बहुतांशवेळ स्वतःबद्दल निर्माण झालेला तिरस्कार कारणीभुत. मरावे परी कोणत्याहीरुपी न उरावे हा उद्देश.
प्रायोपवेशन = बहुदा शरीरच नको झालेले असते स्वतःबद्दल नकारात्मकता तिरस्कार असेलच असे नाही. आत्महेत्यसाठी याचा वापर केला जाउ शकतो, म्हणून बरचेदा याला आत्महत्या मानण्याची गल्लत होणे शक्य आहे.
समाधी = कोणतीही गोंष्ट नष्ट करणे, नकारात्मकता हा यातील उद्देश व साध्य नाही. निसर्गावर प्रभुत्व मिळवुन त्याच्याशी एकरुप होउन राहणे हे साध्य. सामान्यास (बहुतेकांना) हे उपलब्ध्द झालेले दिसत, अनुभवात येत नाही त्यामुळे या भोवती गुढता, अंधश्र्ध्दा, फँटसी ओतणारे ज्वालामुखी जागोजागी आहेत. बहुदा अशक्य कोटीतील गोष्ट.
अपघाती म्रुत्यु = सगळं संपणे
नैसर्गीक मृत्यु = एक नवीन सुरुवात.
खुन = इतरांना इछ्चेविरुध्द यमसदनी पाठवणे.
विरमरण = एखाध्या महत्वाच्या उद्देशासाठी म्रुत्यु येणे. "महत्वाचा उद्देश" ही द्रुश्टीकोनात्मक बाब आहे.
समाधी सोडुन बाकी सर्व irreversible आहे असा सार्वत्रीक अनुभव आहे.
actions not reactions..!...!
http://www.befrienders.org/su
http://www.befrienders.org/suicide-statistics
आत्महत्येचा दर म्हणजे दरडोई स्टॅट. तो ६०% वाढला आहे म्हणजे माणसाच्या जीवनातले दु:ख ६०% ने वाढले आहे असे ओढून ताणून म्हणता यावे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हो ना. जुन्या काळी
हो ना. जुन्या काळी होलोकॉस्टसारखे प्रोग्रॅम राबवले जात असल्याने लोकसंख्या आटोक्यात तर रहायचीच, शिवाय भुईचा भार कमी झाला म्हणून बाकी उरलेले लोकही एकदम खूष असायचे.
भेंडी..खवचट, खोडसाळ, विनोदी, इ. सोडून चक्क माहितीपूर्ण? अरे कुठे नेऊन ठेवलाय श्रेणीदाता ऐसीचा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
श्रेयअव्हेर
या वेळेस याकरिता मी जबाबदार नाही, हे आधीच सांगून ठेवतो.
एकदोनदा वाटले होते बॉ
एकदोनदा अगदी तीव्र विचार आले होते बॉ. मात्र तो काळ ओसरुन जमाना झाला. मात्र असे विचार का येऊ शकतात? येतात तेव्हा त्या व्यक्तीची किती वाईट परिस्थिती असते याची पुसटशी कल्पना त्यामुळे आली. आता जगायची तीव्र इच्छा आहे. अगदी गॅस वगैरेंने जरी छातीत कळ आली तर दुसऱ्या दिवशी १५ मिनिटे जास्त वर्कआऊट करावासा वाटतो. माणसाचा जन्म एकदाच मिळतो. जगून घ्या. पुढच्या जन्मी कबुतर वगैरे झालो तर लोकांचे रट्टे खायला लागतील.
विचारप्रवर्तक, माहितीपूर्ण
विचारप्रवर्तक, माहितीपूर्ण.
माझ्या मते आत्महत्येला
माझ्या मते आत्महत्येला गरजेपेक्षा जास्तच नकारत्मकता लाभली आहे. माझ्या सारख्या ज्या लोकांना आत्मा, पुनर्जन्म, मेल्यावर स्वर्ग नरक मिळणे ह्या वर विश्वास नसतो त्यांच्या साठी आत्महत्या सर्व तकतकी पासुन ची खरी आणि कायमची मुक्तता आहे.
थांबवते ती एकच गोष्ट - करायची कशी ज्याने गॅरेंटेड, विना वेदना जमु शकेल.
कदाचित जर असा पर्याय शोधला गेला आणि उपलब्ध झाला तर आनंदाने आत्महत्या करणारी संख्या बरीच वाढेल.
इच्छामरणाला कायदेशीर मान्यता
इच्छामरणाला कायदेशीर मान्यता नाही म्हणुन आत्महत्या असा ही मुद्दा असू शकतो. पण त्याची नोंद कशी होणार? सुसाईड नोट मधे लिहिले असेल तरच ते ग्राह्य असू शकते.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
Coffee, May Reduce Risk of
Coffee, May Reduce Risk of Suicide, Study Concludes
http://news.harvard.edu/gazette/1996/03.14/CoffeeWontGrind.html
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...