चारधामच्या निमित्ताने
चारधाम यात्रा करावी का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सध्या भयानक आपत्तीमुळे चारधाम, विशेषतः केदारनाथ गाजते आहे. पण या लेखाचा विषय तो नाही. मी जेंव्हा चारधामांना भेट दिली त्याचे सचित्र प्रवासवर्णन करण्याचाही या लेखाचा हेतू नाही. तर एकंदरीतच, जे अनुभव आले त्यातून आपल्याला काही बोध घेता येतो का, याविषयी हा लेख आहे.
चारधामला मी जाणार, हे कळल्याबरोबर माझ्या समविचारी मित्रांनी थट्टा केली. 'अरे,तू इथे कधी कुठल्या देवळात जात नाहीस, कुठल्याही दिवशी तुझा उपास नसतो, ३६५ दिवस तू सामिष आहार करु शकतोस, तर तिथे जाऊन काय करणार आहेस?' अशा प्रकारच्या कॉमेंटस ऐकल्या. पण मला, त्या चारधामांच्या ठिकाणी असलेल्या निसर्गसौंदर्यात अतिशय रस होता. म्हणून मी कुठल्याही यात्रा कंपनीकडे न जाता मुंबईतल्या गढवाल निगमकडे गेलो. त्यांच्याकडून टूर आखून घेतली आणि आम्हा चार जणांना स्वतंत्र टॅक्सी ठरवून टाकली.
ऋषिकेश जवळ 'मुनी की रेती' हे फार सुंदर ठिकाण आहे. तिथले गढवाल निगमचे लोकेशन छान आहे.लागूनच गंगा नदी असल्यामुळे शांत आणि प्रसन्न वाटते. त्याउलट ऋषिकेशला फारच गजबजाट आहे. चारी धामांचा प्रवास करताना म्रुत्यु, कुठे ना कुठे, दर्शन देतोच, असे वाचले होते. आम्हालाही ते अनुभवायला मिळाले. कारण पहिल्याच यमुनोत्रीच्या प्रवासात, आमच्या ड्रायव्हरने मसुरीपर्यंत उगाच जास्त वेळ काढला. आणि त्यानंतर घाटात तो चक्क पेंगू लागला. समोरून येणार्या एकदोन वाहनांना निसटती धडक दिल्यावर आमच्या लक्षांत आले. लगेच पुढच्याच गांवात मी त्याला तिथल्या लोकल डॉक्टरला दाखवले, तेंव्हा तो दारु प्यायल्याचे स्पष्ट झाले. त्याला गाडीमधे दोन तास सक्तीने झोपवला. त्यानंतर त्याला उठवून एका नळाखाली त्याचे डोके धरले. चहा पाजला. एवढे सगळे केल्यावर तो शुद्धीत आला. माफी मागू लागला. पुढे मात्र, त्याने गाडी व्यवस्थित चालवली. या सर्व प्रकरणात आम्हाला पायथ्याशी पोचायला रात्रीचे आठ वाजले. मॅनेजरकडे रीतसर तक्रार करुनही काहीही झाले नाही. पुढचा सगळा प्रवास त्याच्याबरोबरच करावा लागणार, हे जेंव्हा स्पष्ट झाले तेंव्हा आम्ही सामोपचाराने घेण्याचे ठरवले. आणि तोही पुढे संपूर्ण ट्रीपभर नीट वागला.
यमुनोत्री आणि केदारनाथला चढावे लागते वा घोडा/डोली करावे लागते. गंगोत्री आणि बद्रीनाथला शेवटपर्यंत वाहन जाते. ज्याला निसर्गसौंदर्य लुटायचे आहे त्याने पायी चढावे. घोडा केला तर चढता-उतरताना जी अवस्था होते त्यांत इकडे-तिकडे बघणे शक्य होत नाही. सर्वात त्रास होत असेल तर भक्तिधुंद तांड्यांचा. पायी चालणार्यांचा सुद्धा ट्रॅफिक जाम होऊ शकतो, हे मी यमुनोत्रीला बघितले. वर गेल्यावर निसर्गाचा आनंद घेताच येत नाही. स्पोर्टस शूज काढून त्या ओल्या, निसरड्या पायर्यांवरुन सगळ्या मंदिरांत डोकवावे लागते. मला तर, प्रत्येक मंदिरातला 'देव' किती केविलवाणा दिसतो, एवढेच पहायचे होते. हात जोडायचा वा अभिषेक करण्याचा प्रश्नच नव्हता.
गंगोत्रीला गाडी एक किमी. आधीच थांबवतात, त्यामुळे बरेच चालावे लागते. तिथे तर बाजारच भरलेला असतो. गंगेच्या घाटावर मात्र नदीचे रुद्र दर्शन होते. अत्यंत गढूळ पाणी प्रचंड वेगाने वहात होते. माझ्या मेहुण्यांनी एक बाटली भरुन घेतली तर एक मिनिटांत सर्व गाळ खाली बसला आणि वरचे पाणी एकदम स्वच्छ दिसायला लागले. मी काही, ते पिण्याचे डेअरिंग केले नाही आणि बरोबरही आणले नाही.
केदारनाथचे जे गौरीकुंड, सध्या गाजते आहे, तिथे वर जायचा रस्ता एनक्रोचमेंटमुळे इतका अरुंद झाला आहे(आता होता असेच म्हणावे लागेल) की त्या घोडेवाले, डोलीवाले यांना चुकवत आंत प्रवेश करणे, हे एक दिव्यच होते. हा चौदा कि.मी. चा ट्रेक मात्र सुंदर आहे. डोलीतून जाडजूड माणसांना वाहून नेणार्या त्या, नेपाळी पोरांची मात्र कमाल वाटली. हे सीझनचे दोन महिने इथे येऊन बिचारे अक्षरशः घाम गाळून चार पैसे कमावतात आणि पावसाळा सुरु झाला की शेतीसाठी परत मायदेशी जातात. विरळ हवेत, आपण फा फू करत चढत असताना, हे आपल्या दुप्पट वेगाने एवढे ओ़झे अगदी लीलया वाहून नेतात. परत कायम हसतमुख. विश्रांती घेताना केळी खातात, तीच त्यांची एनर्जी! चढत असताना दोन्ही बाजूला इतक्या टपर्या उभ्या दिसल्या, त्यांत 'लेज' पासून सगळ्या पताका लटकत होत्या. रामबाड्याला पोचलो आणि जबरदस्त पावसाची सर आली. भिजल्या कपड्यांत थंडी भरुन आली. चहा प्यायल्याशिवाय ती काही थांबेना. ते आठवल्यावर वाटले की आत्ता लोकांनी भिजलेल्या अवस्थेत कसे दिवस काढले असतील? वरच्या रुम्स चांगल्या होत्या. पण जेवून परत येताना एका पंड्याने आम्हाला गाठलेच. मी 'टफ नट' आहे हे त्याने लगेचच ओळखले आणि मेव्हण्यांना पटवले. त्याने सांगितल्यानुसार सकाळी पांच वाजता मंदिराशी गेलो. प्रचंड मोठ्या बैठ्या लाईनीत त्याने आम्हाला अगदी प्रवेशदारापाशीच मधे घुसवले. तसे आम्ही देऊळ रात्रीच बघून आलो होतो. हातापायाला निसरड्या तेलकट स्पर्शाशिवाय दुसरी कुठलीच अनुभूति मला झाली नाही. दिवसा मात्र, बाकीचे अभिषेकात गुंतल्याचे बघून मी मंदिराच्या मागच्या बाजूला गेलो आणि चारधामला येण्याचे सार्थक झाले. तो भोलेनाथ, मागच्या त्या विहंगम दृष्यातच मला खुणावत होता.
बद्रीनाथला तर बाजारीकरणाचा कडेलोटच झाला आहे. त्या मंदिराला बाजूच्या असंख्य ओंगळ इमारतींनी वेढले आहे. तीच ती पंड्यांशी सौदेबाजी, तीच ढकलाढकली आणि तेच ते भक्तिधुंद तांडे! परत आल्यावर माझ्या एका मित्राला मी कबुलीच दिली होती की शेवटीशेवटी माझी अवस्था त्या ओमेन' चित्रपटातल्या बालनायकासारखी झाली होती. मंदिर आणि ती गर्दी अंगावर यायची आणि त्यापासून शक्यतो दूर पळून जावे, अशी तीव्र उर्मी मनांत दाटून यायची, फक्त माझ्या टाळूवर ६६६ चा आंकडा कोरलेला नसल्यामुळे मी आंत जाऊ शकायचो.
थोडक्यांत काय, तर निसर्गाची अनेक मनमोहक रुपे बघायला मिळतात तिथे, कधी आत्तासारखी मृत्युचीही रुपे दिसतात. पण निसर्ग अनुभवायला पृथ्वीवर दुसरी असंख्य ठिकाणे आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या लोकांनी अशी ठिकाणे टाळावीतच. ह्या ट्रीपनंतर मी माझ्या आगामी लिस्टमधून वैष्णोदेवी, अमरनाथ, वगैरे जागा कायमच्या बाद करुन टाकल्या आहेत.
प्रतिक्रिया
प्रकटन आवडलं
प्रकटन आवडलं
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
छान लिहीलय. फोटो हवे होते.
छान लिहीलय. फोटो हवे होते.
फोटो
फोटो, कंप्युटरची हार्ड डिस्क उडल्यामुळे मागेच निवर्तले,फक्त प्रिंटस आहेत. आणि तसेही त्याचे प्रवासवर्णन करायचेच नव्हते.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
लहानपणी मंदिरात जाणे हा
लहानपणी मंदिरात जाणे हा माझ्यासाठी अत्यंत सुखद अनुभव राहिला आहे. गावांमधल्या विशालकाय मंदिरांमधे खूप मोकळी जागा असे, बागा असत आणि गर्दी मुळीच नसे. मला पहिली मंदिराची तिडिक बसली ती तुळजाभवानीच्या मंदिरात. त्याचं पहिलं कारण होतं ते म्हणजे पोलिस लोकांना, पर्यायाने आम्हाला चक्क दंडुक्याने मारुन बाहेर हाकलून देत होते. दुसरं म्हणजे, मंदिराच्या चोहोबाजूंच्या पायर्यांवर ३०-४० जणांनी तरी संडास करून ठेवली होती. मुंबईत महालक्ष्मीच्या मंदिरात रांग माझ्या अपेक्षित लांबीपेक्षा १००-२०० पट लांब निघाली. स्वतः चिड्चिड करणे, गर्दीवर राग काढणे आणि देवाला दुषण देणे हे तिन्ही प्रकार मी कसे केले ते इथे लिहिले तर ते प्रक्षोभक मानले जाईल. दिल्लीत रमणीय असं हिदू मंदिर असा प्रकार नाही, अशी जुनी गल्लीतली छोटी , हिरवी मंदिरे तर नाहितच नाहित. अक्षरधाम, बिर्ला मंदिर येथे जाणे हा कोणत्याही अर्थाने 'सहजानुभव' नाही आणि ती 'भव्य' आहेत, रम्य आणि निवांत नाहित. नाही म्हणायला गुरगावला असताना तिथे एक प्रशस्त, रम्य छोटेखानी मंदीर होतं. तिथे मी अभद्र/चूक मुहुर्त असलेल्या दिवशी नक्की जायचो.
उत्तराखंडमधे मी निसर्गाच्या लोभाने कितीदातरी गेलो आहे. Every visit has been worth it. कारने गेल्याने आम्ही मनसोक्त किरू शकू. पण मी अजून कधी ऋषिकेशच्या पलिकडे गेलो नाही, बायकोला उंचीचा फोबिया आहे आणि तिथल्या रस्त्यांच्या स्वरुपाने मी ही टरकलेलाच असतो. ऋषिकेश , नौकुचियाताल ही भन्नाट स्थाने आहेत. शहराबाहेर राहावे, मंदिरे टाळावी, 'जास्त स्थळे कव्हर करणे' च्या फंदात पडू नये. स्वतःचा आणि इतरांचा देव,धर्म,भक्ती, मूल्ये यांचे विश्लेषण करण्यात बराच वेळ जातो, तेही टाळावे असा माझा मानस असतो. तरीही पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेऊ द्यावा हे साधे तत्त्वच अशा ठिकाणच्या लोकांना भारतात कळलेले नाही. म्हणून प्रसिद्ध जागी जाऊच नये असे मत होत चालले आहे. 'unfamous lonely place recommended by a local with a local' पाहावे अशी निती ठेवली आहे आणि ती पे करत आहे. अश्याने इम्फाळच्या शिंगडा डॅमला दिलेली भेट ताजमहलच्या भेटीपेक्षा १० पट आनंददायक ठरली.
उत्तराखंडच्या दुर्घटनेने तेथे पर्यटन विषयक बदल होतील आणि मग भारतात फिरायला जायला एक सॉल्लिड जागा बनेल अशी आशा थोडीफार का होईना आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रसिद्ध मंदिरे म्हंजे
प्रसिद्ध मंदिरे म्हंजे बर्याचवेळा वैताग असतो. आत्तापर्यंत पाहिलेले सर्वांत गलिच्छ मंदिर म्हंजे कोलकात्यातले कालीघाटचे. नुस्ता उकिरडा अन चिंचोळी जागा, निर्माल्याचा ढीग पडलेला अगदी गाभार्याजवळही.
अन बाकीच्या अस्वच्छतेचा अनुभव खिद्रापूरमधल्या स्वर्गीय शिल्पकला असलेल्या मंदिरातही घेतलेला आहे. एका मांजराने देवळाच्या आतच विधी केलेला होता अन त्याची कुणाला दाद न फिर्याद!!!
त्या तुलनेत दक्षिणेतील देवळांत मात्र स्वच्छता उत्तम असते हे पाहिले आहे. अर्थात चिंचोळेपणा तिथेही असतोच. बदामी बनशंकरीच्या देवळाचा गाभारा इतका चिंचोळा अन हवा खेळती रहावी म्हणून वट्ट २ खिडक्या. भाविकांच्या गर्दीत अक्षरशः गुदमरायला झालं होतं. पुरता घामाघूम झालो होतो, तो अनुभव अजून लक्षात आहे.
तुलनेने इस्कॉन, रामकृष्ण मठवाले, जण्रल सौथवाले बरेच बरे. गावाकडची साधी, तुलनेने अप्रसिद्ध मंदिरे सगळ्यात बेष्ट! स्वच्छताही असते, अन मुख्य म्हंजे गर्दी आजिबात नसते. मिरजेत अशी कैक देवालये आहेत जिथे नुस्ते बसून रहावे, नो टेन्शन. पुण्यातली माझी आवडती देवळे म्हंजे पाताळेश्वर. शेजारचा जंगली महाराजांचा मठही उत्तम आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
देवळे
आत्तापर्यंत पाहिलेले सर्वांत गलिच्छ मंदिर म्हंजे कोलकात्यातले कालीघाटचे.
................ कालीघाट गलिच्छ आहे हा माझाही अनुभव आहे. त्यावर उतारा म्हणून बेलूर मठात जावे. पूर्ण उलट स्थिती आहे. रामकृष्णांची संगमरवरी मूर्ती असलेले ठिकाण तर फारच उत्कृष्ट. कसलाही भपका नव्हता. पूर्ण शांतता.
तुलनेने अप्रसिद्ध मंदिरे सगळ्यात बेष्ट! जण्रल सौथवाले बरेच बरे.
......... सहमत.
+१०१००. बेलूरचा नादच नै
+१०१००.
बेलूरचा नादच नै करायचा. संध्याकाळची पूजा झाली की त्या उजेडात झगमगता बेलूर मठ पाहत गंगेतून नावेने "दोक्खिनेश्शोर" पर्यंत यायचे. जे भारी वाटतं !! बेलूरची आठवण करून दिल्याबद्दल बहुत धन्यवाद
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चारी धामांचा प्रवास करताना
एकविसाव्या शतकातही अशा गोष्टी लिहीताना या भक्तलोकांना लाज कशी वाटत नाही?
अश्रद्धाच्या नजरेतून चारधाम वाचायला आवडले.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छान अनुभव
छान अनुभव
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
लेखन आवडलं.
लेखन आवडलं.
बद्रीनाथ केदारनाथ यात्रा
ही यात्रा आम्ही दोघांनी १९७६ साली केली होती. 'यात्रा' ह्या हेतूने नाही तर हिमालय आतून पाहण्याची एक संधि म्हणून.
दिल्लीच्या करोल बागेत तेव्हा 'पणिक्कर ट्रॅवल्स' नावाच्या एका केरळी माणसाच्या व्यवसायातून अशा हिमालयात यात्रा arrange केल्या जात आणि त्यांच्याबरोबर आम्ही गेलो होतो. प्रवासाची बस त्यांची आणि बाकी सर्व, म्हणजे झोपण्याचे सामान, जेवणखाणाचा खर्च स्वतःचा अशी व्यवस्था होती. एकूण हिमालयात सर्व प्रकार त्या दिवसात तरी सगळे अगदी primitive होते आणि अर्थातच स्टारवाली हॉटेल्स, स्वच्छ शौचकूप असले लाड नव्हते. दिवसा काही तास प्रवास आणि वाटेतील पवित्र स्थानांना भेट आणि रात्री कोठल्यातरी गावात पणिक्करने सोय केलेल्या कोठल्यातरी घरातील खोल्या-दोन खोल्यांमध्ये आपापले होल्डॉल उलगडून सर्व प्रवाशांनी झोपणे असे आम्ही सुमारे बारा दिवस करून दिल्ली ते दिल्ली प्रवास पूर्ण केला. वाटेतच ढाब्यांवर इच्छेप्रमाणे चहा-फराळ, रात्री असेच जेवण. शौचासाठी एक-रस्ती गावांच्या अल्याड-पल्याडच्या हिमालयात दगड आणि झुडपांचे आडोसे. हिमालयात मे महिन्यात खूपदा दुपारी पाऊस पडतो. असा पाऊस पडला म्हणजे जिकडे तिकडे चिखलाचा रबरबाट. हया सर्वांमुळे 'बद्रीनाथाला आंधळा सुद्धा एकटा जाऊ शकेल, त्याचे नाक त्याला रस्ता सांगेल' असे मी त्याचे वर्णन करीत असे. हिमालयातील लहानसहान गावात तेव्हा तरी भाज्याबिज्या मिळतच नसत. जेवण म्हणजे आलटून पालटून बटाट्याचा रस्सा आणि पुरी किंवा दालचावल. जोडीला उकळून उकळून काळा पडलेला गोड चहा.
ह्या गैरसोयी सोडल्या तर बाकी प्रवास उत्तम झाला. त्या दिवसात तरी यात्रेकरूंची गर्दी अशी नसे हिमालयातील सगळा प्रवास म्हणजे एका नदीनाल्याच्या घाटीतून दुसर्या घाटीत असा सर्व चढउताराचा. अरुंद आणि कच्चे, घसरणारे आणि सतत वळणारे रस्ते, खाली हजार-दीड हजार फुटांवर वाहणारी नदी अशा ठिकाणी सर्व भिस्त ड्रायवरच्या कौशल्यावर.
हरिद्वार-हृषिकेशपासून श्रीनगर, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, जोशीमठ-शंकराचार्य गुहा असे टप्पे घेत बद्रीनाथला पोहोचलो. तेथे दोन दिवसांच्या धर्मशाळेतील मुक्कामात गरम पाण्याच्या कुंडात उतरणे, माना पासला भेट, त्रिशूल शिखराचे दर्शन अशा गोष्टी पदरात पाडून उत्तरकाशी-गौरीकुंड मार्गे केदारनाथला गेलो. त्या काळात बस बद्रिनाथपर्यंत जाऊ शकत असे पण केदारनाथला गौरीकुंड येथे बस सोडली. पुढची चढण पायी अथवा घोड्याने. आम्ही पायीच गेलो. गौरीकुंड ते रामपाडा असे पायी जाऊन तेथे रात्री एकाच्या ओसरीवर मुक्काम केला. दुसर्या दिवशी पहाटे उठून केदारनाथला गेलो आणि तास-दोनतास आसपास पाहून परत गौरीकुंडाला आलो असे आठवते.
ह्यानंतर काही वर्षांनंतर आम्ही दोघांनी Youth Hostels Association of India चा मनालीजवळ रायसन ते रायसन, पार्वती आणि मलाणा नद्या - मणिकरण - मलाणा गाव - चंदरखणी पास अशा मार्गे असा १४ दिवसांचा ट्रेक केला होता. तोहि अनुभव असाच काहीसा होता.
गंगेच्या उगमाचा शोध.
१८व्या शतकाच्या अखेरीपासून हिंदुस्तानचा पूर्ण नकाशा तयार करण्याचा ब्रिटिशांना ध्यास लागला होता आणि त्यामध्ये गंगेच्या उगमाचा छडा लावून त्याबाबतच्या नेटिवांतील नाना परस्परविरोधी किंवदंत्यांचा अखेरचा निकाल लावणे ह्यामधे त्यांना स्वारस्य होते. गंगा कोठे निश्चित उगम पावते ह्याबाबत एतद्देशीयांमध्ये अनेक मतमतांतरे होती. ती मानससरोवरात हिमालयाच्या उत्तरेच्या उतारावर उगम पावते अशी मोठी श्रद्धा होती. १८१४-१८ च्या नेपाळशी युद्धानंतर गढवालचा प्रदेश नेपाळकडून इंग्रजांच्या ताब्यात आला पण तत्पूर्वी ह्या प्रदेशात प्रवास करण्यासाठी ब्रिटिशांना नेपाळची संमति मिळवावी लागे. १८१० साली ले.वेब नावाच्या सर्वेयरने नेटिवांच्या मदतीने गंगोत्रीपर्यंत प्रवास करून गंगेच्या उगमाच्या वेगवेगळ्या theoriesचा अखेर निकाल लावला. हे त्याच्याच शब्दात वाचा:
सर,
काहीच वाचता येत नाही. लिंकदान करावे ही विनंती.
बीएमपी फाईल फारच सुक्ष्म झाली आहे. मोठी जेपीजी बनवलीत तर बहार येइल.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
हे पहा
चित्र थोडे मोठे केले आहे.
ही माहिती Historical Records Of Survey of India Vol II 1800-1815 येथे पृ.७७ वरून घेतली आहे.
छान प्रकटन. चारधामच्या
छान प्रकटन. चारधामच्या प्रत्यक्ष घटनेवर टिप्पणी न करता त्या निमित्ताने आलेल्या आठवणी सुंदर मांडल्या आहेत. प्रवासवर्णन म्हणजे प्रवासातल्या 'मी' चं वर्णन असं पुलंनी म्हटलं होतं, ते इथे पूर्णपणे लागू पडतं. भक्तिधुंद तांडे हा शब्दप्रयोग आवडला.
गढवाल भागात आम्ही अनेक वर्षांपूर्वी ट्रेकला गेलो होतो. पण या मंदिरांच्या आसपास नाही. त्याच्या पुसट आठवणी थोड्याशा उजळल्या.
आध्यात्मिक अनुभूती वगैरे काssss ही आली नही ब्वा
मी हेमकुंड , पुष्पघाटी आणि ऋषिकेश , औली,पंचप्रयाग अशी खडतर यात्रा केली होती ७/८ वर्षांपूर्वी .
तेंव्हाचे मजेशीर अनुभव लिहून ठेवले नाहीत याची खंत आहे . घोड्यावरचा सात किलोमीटरचा प्रवास
चित्तथरारक होता . एका मैत्रिणीचा आळशी घोडा डोंगरात ठिकठिकाणी त्यांच्या मुतायच्या कोपऱ्यात
जाऊन उभा रहायचा . पुढे जायला नकार द्यायची त्याची बिकट स्टाईल पाहून भरपूर मनोरंजन झाले .
हिमालय अद्भूत आहे पण आध्यात्मिक अनुभूती वगैरे काssss ही आली नही ब्वा .
सुरेख प्रकटन
मी पूर्णतः नास्तिक असल्याने यात्रा हा उद्देश्य कधीच मनात नव्हता...
पण हिमालयाच्या निसर्गसौंदर्यासाठी का म्हणा, गंगोत्री-जमनोत्री करावी अशी एक इच्छा मनात होती...
तुमचे प्रकटन वाचून ती इच्छा पूर्णपणे मावळली....
तेंव्हा पैसे आणि यातायात वाचवल्याबद्दल धन्यवाद!!!!
प्रकटन आवडले. घटनेविषयी
प्रकटन आवडले.
घटनेविषयी वेगळ्या धाग्यात लिहावे असे वाटते आहे.. बघु वेळ मिळाला तर लिहिन नाहितर याच प्रतिसादात खरडेन. तुर्तास पोच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जरुर लिहावे. वाट पहातोय
जरुर लिहावे. वाट पहातोय आम्ही.
प्रकटन
प्रकटन आवडले. प्रतिसाद देणार्यांमध्ये नास्तिकांचे प्रमाण जास्त कसे काय बुवा? कितीही अमंगळाचे पचाकपचाक सडे असले तरी भगवंताचे ते कैवल्यस्वरुपी मांगल्यपूर्ण विराटदर्शन पाहून हे सगळे सगळे विसरायला होते आणि अंगावर त्रैलोक्यस्वरुपी रोमांच उभे राहातात असलेही काही प्रतिसाद वाचायला आवडले असते...
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
एका ठिकाणी किती भाविक अथवा
एका ठिकाणी किती भाविक अथवा पर्यटक जाऊ शकतील त्याची मर्यादा शंभरपटीने ओलांडली आहे भारतातील बऱ्याच धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थानांनी .