रात्र काळी घागर काळी : पुस्तक परिचय
'चिंतामण त्र्यंबक खानोलकर' हे नाव तसे अनोळखीच होते माझ्यासाठी. त्यांची सर्वात प्रथम वाचलेली कादंबरी म्हणजे 'अजगर'. या कादंबरीवर अगदी आचार्य अत्र्यांनीही खरपुर टीका केली होती असे ऐकुन आहे. पण 'अजगर' मुळेच मी चिं.त्र्यं. च्या प्रेमात पडलो. त्यानंतर साहजिकच 'रात्र काळी घागर काळी' वाचनात आले. मग चिं.त्र्यं. वाचण्याचा सपाटाच लावला आणि मग वाचता वाचता, चिं.त्र्यं. ना शोधता शोधता कुठल्यातरी एका क्षणी समजले की हा माणूस आपल्याला अनोळखी नाहीये. कारण चिं.त्र्यं. ना ओळखत नसलो तरी 'आरती प्रभूंनी' कधीच माझ्या मनावर गारुड केलेले होते.
ये रे घना, ये रे घना
न्हावूं घाल, माझ्या मना ... या गीताने कधीच वेड लावलेले होते.
नाही कशी म्हणु तुला, तो एक राजपुत्र (चानी), लव लव करी पात (निवडुंग), कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (सामना) ही आणि अशी अप्रतिम गीते लिहीणार्या 'आरती प्रभूंचेच' नाव चिंतामण त्र्यंबक खानोलकर आहे हे समजल्यावर आनंदाश्चर्याचा धक्काच बसला होता. लहानपणापासून कवितेत आकंठ बुडालेला हा माणूस ' रात्र काळी घागर काळी' सारखी अफाट कादंबरी लिहीतो आणि आपल्याला ते माहीतही नसावे याबद्दल स्वतःचाच प्रचंड राग आला होता त्या वेळी.
आता थोडेसे "रात्र काळी घागर काळी" बद्दल.
खरेतर या कादंबरीचे परिक्षण लिहीणे मला या जन्मीतरी शक्य होणार नाही. या कादंबरीचा, कथेचा आवाका प्रचंड आहे आणि तो पेलण्याइतकी माझी कुवत नाही. पण तरीही मला जे जाणवलं ते मांडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणलं तर ही एका दुर्दैवी स्त्रीची शोकांतिका आहे. म्हटलं तर हे अगम्य अशा स्त्रीस्वभावाचे चित्रण आहे. म्हणलं तर नियतीच्या विलक्षण खेळाची कहाणी आहे. प्राक्तनाने एकाच व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या दोन विलक्षण स्त्रीयांची ही गोष्ट आहे. सर्व सामान्याला अप्राप्य असं दैवी सौंदर्य सहजगत्या पदरात पडूनही त्याच्म तेज सहन न झाल्याने स्वतःच राख होणार्या एका दुर्दैवी जिवाची ही कथा आहे.
तसं पाहायला गेलं तर 'यज्ञेश्वरबाबांची' दैवी सौंदर्य लाभलेली कन्या 'लक्ष्मी' ही या कथेची नायिका आहे. या कथेत आणखी एक तितकेच महत्वाचे पात्र आहे ते म्हणजे 'जाई' , लक्ष्मीपासून दुर जावू पाहणारा तिचा पती 'दिगंबर' जिच्यात गुंतलाय ती 'जाई' गावातल्या एका भाविणीची मुलगी ! तसं बघायला गेलं तर कथेत या दोन रुढार्थाने नसल्या तरी नियतीने एकमेकीच्या सवती बनवलेल्या स्त्रीयांच्या परस्परांतर्गत संघर्षाची कहाणी यायला हवी. पण इथे पुन्हा लक्ष्मीच नायिकेबरोबर, प्रतिनायिकाही बनते. आपली पत्नी गेल्यावरही अतिशय सौम्यपणे' "नशिबवान होती, सवाष्णपणाने गेली" इतकी निर्विकार आणि विरक्त प्रतिक्रिया व्यक्त करणारे यज्ञेश्वरबाबा आपली लेक समोर आली की मात्र त्यांच्या विरक्त डोळ्यात आईची वत्सलता दाटते.
उच्च आणि रौद्र स्वरात लागलेला दिगंबराचा 'रुद्र' ऐकून यज्ञेश्वरबाबा कमालीचे प्रभावीत होतात आणि दिगंबराचा काका 'दास्या' याच्याकडे दिगंबराला आपली मुलगी देण्याची इच्छा व्यक्त करतात. 'दास्या'ला ती अतिशय आनंदाची, अभिमानाची गोष्ट वाटते. प्रत्यक्ष यज्ञेश्वरबाबांसारख्या तेजपुंज व्यक्तीची देखणी कन्या आपल्या घरात सुन म्हणून येणार ही कल्पनाच त्याला विलक्षण सुखावून जाते. पण लक्ष्मीचे सुन म्हणून त्या घरात येणे त्याच्या आयुष्यात किती मोठी उलथापालथ करणार आहे याची त्याला कल्पनाच नाही. इथे 'दास्या' हा एक पराभुत, कायम दुसर्यावर अवलंबून असलेल्या एका लाचार, असहाय्य आणि मानसिकदृष्ट्या पंगु मनोवृत्तीचं प्रतिक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या जिवलग मित्रावर 'अच्युत'वर अवलंबून असणारा 'दास्या' हे ही एक विचित्र च्यक्तीमत्व आहे. प्रत्येक कामासाठी त्याला अच्युतचा आधार लागतो, तरीही संधी मिळताच अच्युतच्या निपुत्रिक असण्यावर टोमणे मारायला तो कमी करत नाही. पुढे जेव्हा लक्ष्मी आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी अच्युतकडे द्यायचे ठरवते तेव्हा सर्वस्वी अच्युतवर अवलंबून असणारा दास्या 'माझा नातु वांझेच्या वाईट सावलीत वाढायला नको' असे म्हणून अच्युतच्या दुर्दैवी पत्नीची अवहेलना करतो. यामुळे दुखावला जावूनही त्याला दुर न सारणारा 'अच्युत' जेव्हा 'दास्या तरी काय, लहान मुलच आहे माझ्यावर अवलंबुन असलेलं' असं म्हणतो तेव्हा नकळत तो आहे त्यापेक्षा खुप मोठा बनत जातो. स्वतःला मुल नसलेल्या अच्युतचं मित्रप्रेम, दिगंबरावर केलेली निर्व्याज माया, दास्याच्या त्याच्यासारख्याच अर्धवट मुलाला 'वामन'ला अच्युतने लावलेला जिव या सगळ्याच गोष्टी अतर्क्य अशा मानवी स्वभावाचे सुरेख उदाहरण म्हणून आपल्या समोर येत जातात.
आपल्या कथेची नायिका, यज्ञेश्वरबाबांची सौंदर्यवती कन्या 'लक्ष्मी' हा 'रात्र काळी.....' चा मुळ कणा आहे. एका विरक्तीकडे वळलेल्या संन्यस्त गृहस्थाच्या घरात जन्माला आलेली ही लोकविलक्षण, अद्वितीय म्हणता येइल असे सौंदर्य लाभलेली निरागस आणि निष्पाप मुलगी. बाबांच्या इच्छेखातर, किंबहुना त्यांच्या डोळ्यातली वात्सल्याची भावना टिकवण्याखातर ती त्यांनीच ठरवलेल्या दिगंबरशी लग्न करते. पण अगदी उच्च स्वरात, खणखणीतपणे तेजस्वी रुद्र म्हणणारा दिगंबर मानसिकरित्या अगदीच दुर्बळ निघतो. तिच्या दैवी सौंदर्याचीच त्याला भिती वाटायला लागते. एवढं अफाट सौंदर्य लाभलेली स्त्री शुद्ध असुच-राहुच शकत नाही असा विचित्र गैरसमज त्याच्या या न्युनगंडातून जन्माला येतो. या न्युनगंडामुळे दिगंबर तिच्या सौंदर्याला भुलत नाही पण घाबरतो जरूर. पण त्याच्या "तू शुद्ध आहेस का?" या प्रश्नाने मनोमन प्रचंड दुखावली गेलेली लक्ष्मी जेव्हा त्याच्यातल्या पुरुषाला डिवचते तेव्हा चवताळून तो तिच्यावर लाक्षणिक अर्थाने बलात्कार करतो आणि " चुकार बीज पेरलं जातं ". पण जेव्हा ती फणा काढून उभी राहते तेव्हा मात्र तो गलितगात्र होवून पळुन जातो. " हे शंभर नंबरी सोनं नव्हेच " असं त्याला वाटतं आणि तो जाईकडे (भाविणीच्या मुलीकडे) वळतो. त्यामुळे लक्ष्मी मुळातूनच कापल्यासारखी होते. जे सुख पत्नी (एका ऋषितुल्य व्यक्तीची पोर असूनही) म्हणून तिला नाकारलं गेलं तेच सुख एका भाविणीच्या पोरीला विनासायास मिळालं याची चीड तिच्या मनात कायम राहते. अर्थात मनाने कमजोर असलेला दिगंबर जाईकडेही टिकु शकत नाही. ऐन वेळी अच्युतने त्याला जाईबरोबर पकडल्यानंतर तो घर सोडून पळूनच जातो. लक्ष्मीचं सौंदर्य मात्र नेहमीच लोकांना तिच्याकडे आकर्षित करत राहतं. यातुन दिगंबरचा मानलेला काका ’अच्युतही’ सुटलेला नाहीये. अच्युतच काय पण तिचा सासरा ’दास्या’देखील तिच्या मोहात पडतो. पण मुळातच मनाने पंगू असलेला दास्या, त्याच्यात तीही हिंमत नाही. तो आपली वासना केवळ लक्ष्मीच्या साडीच्या माध्यमातून पुरवण्याचा प्रयत्न करतो. कादंबरीतला हा प्रसंग तर विलक्षणच आहे. चिं.त्र्य. अगदी साध्या शब्दात पण अतिशय प्रभावीपणे दास्याच्या मनाची ती उलाघाल शब्दबद्ध करतात. पण हे पाहून लक्ष्मी मात्र दुखावली जाते. तिच्यातली बंडखोर, मानी स्त्री दास्याचं घर सोडून दुसर्याच एका व्यक्तीचा आसरा घेते.
चिं.त्र्यं.ची सगळीच पात्रं विलक्षण आहेत या कथेतली. एका दर्शनात 'लक्ष्मीसाठी' वेडे झालेले 'केमळेकर' वकील तिला आपल्या घरात आश्रय देतात. सर्व सुख-सोयी पुरवतात. अगदी 'दास्या'च्या घरासमोरच तिला एक टुमदार घरही बांधून देतात. पण जिच्यासाठी एवढं सगळं केलं ती लक्ष्मा सहजसाध्य असतानाही तिच्या दैवी सौंदर्याला स्पर्शही करण्याची त्यांची हिंमत होत नाही. लक्ष्मीचं सौंदर्य दैवी असलं तरी तिच्या स्वत:साठी मात्र ते अशा रितीने शापित बनत जातं. केमळेकरांच्या सांगण्यावरुन तिला वाणसामानाचा पुरवठा करणारा गावातला वाणी ’दाजी’ देखील लक्ष्मीकडे आकर्षित झालेला आहे. पुरुषसुखाला वंचीत झालेली ’लक्ष्मी’ या दाजीला देखील जवळ करण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या शापित सौंदर्याला स्पर्श करण्याचे धाडस दाजीतही नाहीये. तो फ़क्त दुरुनच लक्ष्मीला पाहण्यातच आपले समाधान मानतो.
लक्ष्मीचं पात्र म्हणजे एक प्रचंड गुंतागुंत आहे. मानवी मनाच्या अगम्य गुंत्याचं, अवस्थांचं एक विलक्षण प्रतीक आहे लक्ष्मी. जिच्यामुळे आपला नवरा आपल्यापासून दुर गेला त्या ’जाई’ला मात्र तिचा दिगंबरपासून राहीलेला गर्भ आपोआपच जिरून गेलाय हे कळाल्यावरही ती जाईला जवळ करतेय. आपल्या मुलाला ’सदाला’ ती जाईच्या मायेत वाढवते. इथेच कथेत अजुन एका पात्राचा प्रवेश होतो. अच्युतकाका एक दिवस त्याला नदीकाठी सापडलेली एक तान्ही पोर घेवून लक्ष्मीकडे येतो आणि तिला सांभाळण्याची विनंती करतो. लक्ष्मी त्या बेवारस मुलीला सांभाळते, तिला ’बकुळ’ हे नाव देते. इथे मात्र ती अच्युतच्या सांगण्यावरून बकुळला आपल्या एका अनामिक मैत्रीणीची मुलगी म्हणून वाढवते. पण केमळेकरांनी दिलेले ते घर तिला शापित वाटत असते, आपला मुलगा ’सदा’ इथे वाढायला नको म्हणून ती त्याला अच्युतकडे देते. "वांझेची अपवित्र सावली माझ्या नातवावर नको’ या आपल्याच मित्राच्या वाक्याने हादरलेला अच्युत मग लक्ष्मीची समजुत काढुन सदाला दास्याच्या घरीच ठेवायला तिच्या मनाची तयारी करतो. स्वत: जातीने सदाचा सांभाळ करायचे वचन तो लक्ष्मीला देतो. इथे नकळत ’दास्याला तरी काय मीच सांभाळतोय ना’ हे त्याचे वाक्य त्याच्या मनाच्या मोठेपणाला अजुन उजाळा देते.
पुढे मोठा झाल्यावर आजोबाच्या घरी वाढलेला सदा नकळत बकुळवर प्रेम करायला लागतो. बकुळही त्याच्या प्रेमात पडते. पण हे लक्षात आल्यावर मात्र ’लक्ष्मी’ मनोमन हादरते. कारण सदाबरोबरच तीने बकुळलाही आपले दुध पाजून वाढवलेले आहे. त्या दोघांना एकमेकांपासुन दुर करण्यासाठी ती ’बकुळ’ला खोटेच सांगते की बकुळ ’जाईची’ म्हणजे एका भाविणीची मुलगी आहे. या बातमीने अंतर्बाह्य कोसळलेल्या बकुळचे लग्न ती दास्याच्या अर्धवट मुलाबरोबर वामन्याबरोबर लावून देते. वर पुन्हा सदा आणि बकुळ एकमेकांसोबत येवु नयेत म्हणून ती अर्धवट वामन्याला एक मंत्र देते....
"दाजी येइल अधुन मधुन बकूळकडे, त्याला अडवु नको"
पुढे काय होते? सदा आणि लक्ष्मीच्या नात्याचे काय होते? सदा आणि बकूळचे काय होते? गायब झालेला दिगंबर त्याचे पुढे काय झाले? मुळात लक्ष्मीच्या आयुष्यात अजुन काय उलाढाली, दिव्ये लिहीलेल्या आहेत. या सर्व गोष्टी पुस्तकात वाचण्यातच गोडी आहे.
कादंबरी लिहिताना कोकणातले जे पुरातन, सनातन गूढ वातावरण खानोलकरांनी निर्मीले आहे की वाचताना आपण मनोमन चिं. त्र्यं. ना मनमो़कळी दाद देवुन जातो. त्यांनी वर्णनात्मक शैलीचा अवलंब केल्याने कादंबरी प्रवाही झाली आहे. इतकी प्रवाही की बरेचदा ती वाचणार्याला स्वत:बरोबर फरफ़टत नेते. जेव्हा कादंबरी संपते तेव्हा मनासकट बरच काही सुन्न होतं. संवेदना या शब्दाची फोड कशी होते ठाऊक नाही पण सह-वेदना काय असू शकते याचा प्रत्यय येतो.अगम्य, अतर्क्य अशा मनाच्या काळोख्या डोहात लपलेल्या अनेक वादळांची, उद्रेकांची कहाणी म्हणजे ’रात्र काळी घागर काळी’ !
एकदातरी वाचायलाच हवी आणि संग्रहात तर हवीच हवी.
चिं.त्र्यं.खानोलकरांचेचे इतर गद्य लेखन...
अजगर (कादंबरी, १९६५)
अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)
अभोगी (नाटक)
अवध्य (नाटक, १९७२)
आपुले मरण
एक शून्य बाजीराव (नाटक, १९६६)
कालाय तस्मै नमः (नाटक, १९७२)
कोंडुरा (कादंबरी, १९६६)
गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)
चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)
जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)
त्रिशंकू (कादंबरी, १९६८)
दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)
नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५)
पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)
पिशाच्च ((कादंबरी, १९७०)
रखेली (नाटक)
राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)
रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)
श्रीमंत पतीची राणी (नाटक)
सगेसोयरे (नाटक, १९६७)
सनई (कथा संग्रह, १९६४)
विशाल ....
प्रतिक्रिया
सुंदर पुस्तकाचा सुंदर परिचय
इरसाल म्हमईकरा... एकदम सुंदर लिहिले आहेस रे. खानोलकर आहेतच तितके उच्च दर्जाचे लेखक.
हे पुस्तक नेमके माझ्या वाचनात नाही आलेले. आता घेतोच हे पुस्तक लवकरच.
सविस्तर पुस्तकाचे परिक्षण लिहिल्याबद्दल तुलाच धन्यवाद. कारण अजून एक छान पुस्तक तुझ्यामुळे मला लवकरच वाचायला मिळणार आहे
खानोलकरांची पिशाच्च ही कादंबरी पण या निमित्ताने पुन्हा वाचायचा मला मोह होतो आहे.
माहिती
ज्यान्नी खानोलकराञ्चे लेखन वाचलेले नाही, त्यान्ना त्या लेखनाची ताकद काय होती हे जाणून घ्यायचे असेल तर मला आठवते, त्याप्रमाणे 'मैत्र' या पुस्तकात पु.लं.नी त्याञ्च्यावर एक लेख लिहीला आहे, तो अवश्य वाचावा. तसेच विजया मेहता, श्रीराम लागू, इ. नाटकमण्डळी काय म्हणतात ते जाणण्यासाठी ही चित्रफीत पाहा. विशेषतः साधारण १०व्या मिनिटापासून लागूञ्चे बोलणे अनुभवण्यासारखे आहे.
'चानी' वाचल्यानन्तर दुर्दैवाने व्ही. शान्तारामाञ्चा 'चानी' पाहिला.
चेतन दातार दिग्दर्शित 'गणुराया' दूरदर्शनवर फार वर्षाम्पूर्वी पाहिल्याचे आठवते.. ते माध्यमान्तर उत्तम झाले होते.
हे पुस्तक वाचलेल होतच ऊत्तम
हे पुस्तक वाचलेल होतच
ऊत्तम लेख
नेमक्या शब्दात दिलेली पुस्तकाची ओळख आवडली
.
धन्यवाद मंडळी ! सागर, जरुर
धन्यवाद मंडळी !
सागर, जरुर वाच रे, खुप सुंदर आहे