Skip to main content

आय आय टी रामैय्या

पंचवीस-सव्वीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे आपल्या जवळच्याच आंध्रप्रदेशातली. तेलंगणातल्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आयुष्य घालवलेला चुक्का रामैय्या नावाचा एक हाडाचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा एक व्रत म्हणुन स्विकारण्यापुर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेला, गांधींजींच्या सत्याग्रह आंदोलनात तुरूंगवास भोगलेला एक देशभक्त! वारंगळमधल्या आपल्या गुडुर या मुळगावी अस्पृश्यता विरोधी चळवळ चालवून आपल्याच ब्राम्हण समाजातून वाळीत टाकल्या गेलेला एक पुरोगामी विचाराचा माणुस. नागार्जुनसागरच्या आंध्रप्रदेश रेसिडेंशिअल स्कुलमधून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांचं निवृत्तीवेतन अडकलं. आयुष्यभर ईमाने ईतबारे शिक्षक म्हणुन नोकरी केलेल्या माणसाजवळ पैसा तो कितीसा असणार? काही महिन्यातच आर्थीक अडचण पुढे दत्त म्हणुन उभी राहिली.

विद्यादानाचं कार्य करत आयुष्य घालवलेल्या या शिक्षकाला आधार वाटला तो माता सरस्वतीचाच! पुढे काय? यावर चिंतन करण्यासाठी 'बसर' मधील ज्ञानसरस्वती मंदिर गाठलं. देशातलं हे एकमेव सरस्वतीचं स्थान. लहान मुलांना या मंदिरात आणुन त्यांच्याकडून 'श्री गणेशा' लिहून घेण्याची पद्धत आहे. असं म्हणतात की या मंदिरात शिक्षणाचा श्रीगणेशा करणा-या मुलांना सरस्वती मातेचा आशिर्वाद मिळतो. रामैय्यांनीही मग तसंच करायचं ठरवलं. आपल्या नव्या जीवनाचा श्रीगणेशा या मंदिरातच त्यांनी गीरवला. परत एकदा शिक्षक म्हणुन काम सुरू केलं. आता शाळेचं बंधन नव्हतं. आणि वैयक्तीक शिकवणी वर्ग घ्यायचे असतील तर हैद्राबादला जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

आंध्रप्रदेशच्या या राजधानीत त्यांच्या जुन्या विद्यार्थ्यांपैकी काही तेव्हा ईंडियन ईंन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आय आय टी) च्या प्रवेश परिक्षेची तयारी करत होते. शाळेत रामैय्यांसरांनी शिकविलेल्या गणिताचा प्रभाव त्यांच्या मनावर कायम होता. सरांनी आय आय टी साठी देखील गाणित शिकवावं असा हट्ट या विद्यार्थ्यांनी धरला. आजवर शाळेत गणित शिकवलेल्या रामैय्यांनी हे एक आव्हान म्हणुन स्विकारलं. पहिलं वर्ष आय आय टीचं गणित समजवून घेण्यातच गेलं. मात्र दुसरी दहा जणांची बॅच सुरू झाली आणि यातील सहा विद्यार्थ्यांना आय आय टीत प्रवेश मिळाला. ते वर्ष होतं १९८४. त्यानंतर रामैय्या सरांना मागे वळून पहावं लागलं नाही.

आज भारतातील अग्रगण्य आय आय टी कोचींग सेन्टर्सपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणुन रामैय्या ईन्स्टीट्युट मानले जाते. भारतातल्या सर्वात प्रतिष्टेच्या प्रवेश परिक्षेची तयारी करवून घेण्या-या या शिकवणी वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी वेगळी प्रवेश परिक्षा द्यावी लागते. रामैय्या स्टडी सर्कलच्या ठरावीक सव्वाशे जागांसाठी देशभरातील १२ हजार विद्यार्थी दरवर्षी ती परिक्षा देतात. ही परिक्षा 'क्रॅक' करण्यासाठी स्वतंत्र कोचिंग सेन्टर्स आंध्रप्रदेशभर निर्माण झाले आहेत आणि जोमाने सुरू आहेत. आजवर एक हजाराहून अधीक आय आय टी ईंजिनिअर्स दिल्यानंतर ८४ वर्षांचे रामैय्या सर सकाळी चार वाजताचा गणिताचा वर्ग आजही तेवढ्याच तडफेने शिकवतात. गणिताच्या एका शिक्षकाचा हा प्रवास कुठल्याही दंतकथेपेक्षा कमी नाही.

मात्र रामैय्यांच्या मते याचं गमक त्यांनी घेतलेल्या पारंपारिक गणिताच्या शिक्षणामध्ये आहे. रामैय्यांचं घर आणि गुडुर हे गाव म्हणजे विद्याभ्यासाचं केन्द्र. मात्र एकिकडे ज्ञानार्जन आणि सरस्वतीसाधनेच्या गोष्टी करायच्या आणि दूसरीकडे अतिशय काटेकोरपणे अस्पृष्य़ता पाळायची हे धोरण काही तरूण रामैय्यांना पटेना. 'कसेल त्याची जमीन' या धोरणाच्या समर्थनार्थ त्यांनी गावात आंदोलन उभारलं. मोठमोठ्या जमिनपट्ट्यांचे मालक आणि सावकार असणा-या त्यांच्याच ब्राम्हण समाजातील धुरिणांना या शाळकरी पोराचं हे धाडस पहावलं नाही. त्यांनी रामैय्यांना जातीबाहेर टाकलं. आठव्या वर्गापर्यंत गावात शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबाच्या भल्यासाठी त्यांना गावही सोडावं लागलं.

मात्र महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावीत रामैय्यांना त्याने फारसा फरक पडला नाही. ओस्मानिया विद्यापिठात प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यचळवळीतही हिरीरीने भाग घेतला. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्त्वातल्या रझाकारांच्या विरोधातील चळवळीतही ते आघाडीवर राहिले. त्यामुळे अनेकदा तुरूंगवास भोगावा लागला. अश्यात गणितामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. शिक्षक होउन पोटापाण्याचा प्रश्नही सुटेल आणि चळवळीतही काही ना काहीतरी करता येइल या उद्देशाने त्यांनी तेलंगणातील जनगाव मधल्या एका शाळेत नोकरी पत्करली. त्यानंतर सुरू झाला तो दंतकथेचा प्रवास. तो आजवर सुरू आहे. अगदी २००७ मध्ये शिक्षक आमदार म्हणुन आंध्र विधानपरिषदेवर निवडून येईपर्यंत!
चळवळीशी असलेलं रामैय्यांचं नातं अतुट आहे. आय आय टीचं नवं केन्द्र हैद्राबादला न उभारता बसरा या सरस्वतीच्या तिर्थस्थळी उभारावं हा त्यांचा आग्रह होता. त्याचा त्यांनी बराच पाठपुरावा केला, परंतू शेवटी आय आय टी आली, ती हैद्राबादलाच! आजही त्यांना या गोष्टीची खंत वाटते.

आपलं म्हणणं नेहमी गणितीय परखडपणे मांडणा-या आणि आंध्रातील युवकांचं श्रद्धास्थान असणा-या रामैय्यांना विरोध करण्यासाठी काहीही प्रभावी हत्यार जवळ नसल्यामुळे त्यांच्या शिकवणीच्या वेळांवरतीच आंध्रातल्या नेत्यांनी हल्ला चढवला. सकाळी चार ही काही शिकवणीची वेळ नव्हे! तसेच पाठांतर ही काही गुण मिळवण्याची पद्धत नव्हे अशी वक्तव्ये आंध्रातील अनेक नेते वरचेवर देत असतात. "मी सकाळी चार वाजता उठूनच गणिताचा अभ्यास केला आहे. आणि माझ्या विद्यार्थ्यांनाही हीच वेळ योग्य वाटते. यामुळे त्यांना दिवस मोकळा मिळतो, शिवाय या वेळी केलेलं मनन कायमचं लक्षात राहतं," असं स्पष्टपणे बोलून रामैय्या सर्व विरोधकांची हवा गुल करतात.

त्यांच्यामते आय आय टी ची परिक्षा म्हणजे ज्ञानापेक्षा कौशल्याची कसोटी आहे. ईतर प्रवेशपरिक्षांमध्ये विद्यार्थी किती वेगाने उत्तरे शोधू शकतो याची कसोटी असते, मात्र आय आय टी मध्ये कमीत कमी पाय-यांमध्ये जास्तीत जास्त कौशल्याचा वापर करून उत्तर शोधण्याला गुण असतात. ही विशेषता लक्षात घेऊन त्यांनी आपल्या शिकवणी वर्गात फक्त आयआयटी-जेईई करिताच शिकवण्याची मर्यादा घालून घेतली आहे. आजवर कधीही आपली जाहिरात त्यांनी केलेली नाही, की कुठे एक साधा फलकही लावलेला नाही. आता रामैय्य्या ईन्स्टीट्युटमध्ये गणिताबरोबरच भौतिक आणि रसायनशास्त्रही शिकवले जातात. यासाठी या विषयातील तज्ञांची निवड रामैय्यांनी स्वतः केलेली असते.

प्रवेशाची पद्धतही मोठी वैषिष्ट्यपुर्ण आहे. आवेदन पत्रे मिळण्याचं एकमेव स्थान आहे, ते म्हणजे नल्लाकुंटामधील त्यांचं ईन्स्टीट्युटचं ऑफीस आणि एकमेव दिवस आहे, तो म्हणजे एक एप्रिल. प्रवेश परिक्षेसाठी पात्र असतात दहावीची परिक्षा दिलेले विद्यार्थी. अगदी नुकताच अकरावीत प्रवेश घेतला असेल, तरीही तुम्ही या प्रवेश परिक्षेसाठी पात्र नाही. तीन पेपर होतात. आणि सर्वाधीक गुण मिळवण्या-या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. या प्रवेशप्रक्रियेवर अनेक वाद आजवर उठलेत. मात्र रामैय्यांच्या यशाचं हेच गमक आहे, की त्यांनी आपला मार्ग कधीच सोडला नाही. सव्वाशेपैकी जवळपास वीस जागा गरिब हुशार विद्यार्थ्यांसाठी असतात. त्यांच्याकडून एक रूपयाही फि म्हणुन घेतला जात नाही.
या सर्वांबरोबरच रामैय्या हे एक उत्तम लेखकही आहेत. त्यांचे तेलगुमधील लघुनिबंध लोकप्रिय आहेत. गणित या विषयाव्यतिरिक्त ईतर विषयांवर त्यांची एकवीस पुस्तकं आजवर आली आहेत. त्यातील १६ लघुनिबंधांचे संग्रह आहेत तर ईतर पुस्तकांमध्ये आपले शिक्षणविषयक विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. पारंपारिक शिक्षणपद्धतीचा त्यांना अभिमान आहे, मात्र बदलत्या काळानुसार अध्ययन आणि अध्यापन पद्धतीमध्ये काय बदल घडवले पाहिजेत, हे देखील त्यांनी प्रभावीपणे मांडले आहे.

शिक्षक, गणितज्ञ,स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, लेखक यांबरोबरच मुलगा, भाऊ, पती, वडिल, आजोबा आणि आता पणजोबा या भुमीका निभावण्यातही त्यांनी शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत. ज्या वयात लोकांना जगणे असह्य होते त्या वयात रामैय्यासर शेकडो आय आय टी टॉपर्स तयार करण्याच्या मोहिमेत उत्साहाने कार्यरत आहेत ही बसरच्या ज्ञानसरस्वतीची कृपाच नव्हे का?

ऋषिकेश Tue, 17/04/2012 - 16:48

आजवर रामैय्या या नावासोबत 'कुशल व्यावसायिक' हेच विषेशण डोक्यात यायचं. ही दुसरी बाजूही प्रभावी वाटली.
विस्तृत माहितीबद्दल आभार

आतिवास Tue, 17/04/2012 - 19:45

विस्तृत माहितीबद्दल आभार. गणित हा विषय स्वत:ला आवडणं हा एक भाग आहे आणि तो दुस-यांना आवडेल असा शिकवण ही दुसरी बाब आहे. या दोन्ही गोष्टी रामय्या सरांना जमलेल्या दिसताहेत हे विशेष आहे. पण अशा संस्था कितीही उपयोगी असल्या तरी त्यातून सध्या प्रचलित असलेल्या शिक्षणाच्या सोयीबद्दल काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. महाराष्ट्रातही शाळा - महाविद्यालयापेक्षा 'क्लासेस'वर अवलंबून राहण्याची पद्धत वाढत चाललेली दिसते आहे - जी चिंताजनक आहे. अर्थात शिक्षणाचे ज्या वेगाने खाजगीकरण झाले आहे आणि ज्या प्रकारची स्पर्धा आहे त्यातून हा बदल अपरिहार्य आहे असेच म्हणावे लागते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/04/2012 - 20:43

रामय्यांबद्दल इतर माहिती रोचक वाटली.

त्यांच्या क्लासबद्दल अनेक विचित्र गोष्टी, त्यांच्या क्लासच्या एका विद्यार्थिनीकडून ऐकून आहे. (ती आय.आय.टी. खडगपूरमधे शेवटच्या वर्षात असताना मला भेटली.) पहाटे चार वाजता क्लास असतो हे एक. त्यावर कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थ्यांनी स्वेटर, जॅकेट्स घालून क्लासमधे बसू नये असा नियम आहे आणि वर पुन्हा डोक्यावर पंखा सुरू असतो. हे का, तर चार वाजता उठल्यामुळे मुलांना झोप येऊ शकते. मग चार वाजता मुळात सुरूवातच का करा? रॅटरेसमधे धावायची अशी तयारी करवून घेणार्‍यांना गणिताचे शिक्षक म्हणणे मलातरी जमणार नाही.

जयदीप चिपलकट्टी Tue, 17/04/2012 - 23:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रात्री लवकर झोपून पहाटे चार वाजता अभ्यासासाठी उठणं ही माझ्या मते फार अघोरी पद्धत अाहे. अशा मुलांचं पुढे अाय.अाय.टी.त गेल्यावर कसं होणार कोण जाणे. कारण तिथे ज्या गोष्टींकरता जायचं असतं (उदाहरणार्थ, नाटकांच्या तालमी, रम पिऊन मार्क्सवादावर चर्चा) त्या सगळ्या रात्री उशीराच सुरू करण्याचा प्रघात अाहे. त्यापेक्षा न झोपता काहीबाही करत पहाटे चारपर्यंत जागं राहणं ही पद्धत जास्त चांगली अाहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 18/04/2012 - 09:16

In reply to by जयदीप चिपलकट्टी

"आयायाटीयन विद्यार्थीही माणूस असतात, त्यांनाही आपलं म्हणा" कँपेनचा क्षीण प्रयत्न! ;-)

रमाबाई कुरसुंदीकर Tue, 17/04/2012 - 20:48

उत्तम रे चैतन्या ! रामैया गुरुजींसारखी माणसे ह्या एके काळी पवित्र असलेल्या क्षेत्रात आहेत हे पाहून बरे वाटले.
आय. आय. टी. ,आय. टी.आय. सगळेच आम्हाला सारखे हो. शिरिष बसला होता त्या परी़क्षेला एकदा-१९८० साली बहुतेक. १८०० का १९०० मध्ये क्रमांक आला होता.पण विद्युत अभियांत्रिकीत प्रवेश नाही मिळाला.

राजेश घासकडवी Wed, 18/04/2012 - 07:57

रामैय्या व त्यांच्या क्लासेसविषयी माहिती अतिशय वाचनीय शैलीत दिलेली आहे.

चार वाजता उठून अभ्यास करण्याविषयी मात्र जयदीप चिपलकट्टींशी सहमत.

विसुनाना Wed, 18/04/2012 - 11:25

या लेखावरील माझी प्रतिक्रिया मी इतरत्र दिलेली आहे. (कारण हा लेख तिकडेही प्रसिद्ध झाला आहे.)

या लेखातील माहिती आद्ययावत नाही. तेथे माझ्या आक्षेपांवर श्री. चैतन्य यांचा प्रतिसादही बोलका आहे.

त्यावरील माझ्या प्रतिसादातील काही भाग येथे -

"वृत्तपत्रीय लेखनाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून (लेख जितका सत्याशी प्रमाणिक करता येईल तितका करून) तुम्हाला काही स्वतंत्र मते मांडता आली असती. किंबहुना असा लेख म्हणजे केवळ जाहिरात न होता विद्यार्थ्यांना आणि पालकांना रामैय्या इन्स्टिट्यूटकडून नक्की कोणती आणि किती अपेक्षा ठेवायची तेही कळले असते.

विद्यानगर हे आय आय टी जेईई (आता आयसीट ?) तयारीच्या इन्स्टिट्यूटचे माहेरघर आहे. (इन्स्टिट्यूटचे पेव फुटले आहे असे म्हणा. इथे केवळ दीड किलोमिटर परिसरात १५०-२०० इन्स्टिट्यूट / क्लासेस आहेत.) महाराष्ट्रातून तसेच देशाच्या अनेक भागातून अनेक हुशार व होतकरू विद्यार्थी अणि पालक फक्त त्यासाठी दोन वर्षे इथे येऊन राहतात. कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. या सार्‍याच व्यवसायाची (आणि त्यामागच्या 'धंद्यांची') कल्पना कदाचित तुम्हाला नसावी.
त्यावर एखादा नि:पक्षपाती लेख येणे गरजेचे आहे.

नाहीतर रामैय्याच्या एन्ट्रन्स एक्झामच्या तोंडावर आलेला जाहिरातवजा लेख इतकेच याचे स्वरूप राहील. चुक्का रामैयांचे मोठेपण त्यामुळे झाकोळून जात आहे असे मला वाटते."

मी कोणत्याही इन्स्टिट्यूटचा प्रचारक नाही किंवा विरोधकही नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. खुद्द विद्यानगर, हैदराबाद येथे राहणारा एक अनुभवी पालक म्हणून हे मत मांडले आहे.

मी Wed, 18/04/2012 - 12:02

लेख छान आहे, रामैय्या खरेच जिनिअस आहेत(उपरोध नाही), लेख वाचून (बन्सल)कोटा क्लासेसची आठवण झाली, मग दहावी/बारावीसाठी आपटे प्रशाला, लातूर पॅटर्न आठवला.

रामैय्यांच्या शिकवणीला जाणारे आय.आय.टी. प्रवेश परिक्षा 'क्रॅक' करण्यासाठी आवश्यक कौशल्य किमान वेळेत प्राप्त करण्यासाठी जातात, अर्थात स्पर्धायुगात हे ठीकच आहे, पण एका निस्पृह(!!) शिक्षकाला त्याच्या विद्यार्थ्याने पॅटर्न आत्मसात करण्याच्या किमान कौशल्यापेक्षा पॅटर्न ओळखण्याचे कौशल्य आत्मसात करायला लावण्यात जास्त आनंद वाटला असता.

वर पहाटे ४ वाजता शिकवणी घेण्याला बरेच आक्षेप दिसले, पण आय.आय.टी प्रवेशाची हमी(बर्‍यापैकी) मिळत असेल तर कोणते पालक ४ वाजतासाठी कुरकरणार आहेत (वरचे सोडून)?

रमाबाई कुरसुंदीकर Wed, 18/04/2012 - 15:16

In reply to by मी

अगदी योग्य बोललात मी. नाना आम्हाला पहाटे पाचला उठवून पावकी,आकडेमोड्,सरासरी,व्याकरण घोकायला लावत.त्यावेळी कंटाळा यायचा पण त्याचे महत्व नंतर कळले.मालाचा दाखवण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा अनंतरावांनी सरासरी,व्याकरणावरच भर दिला होता!!