Skip to main content

खिचडी - हिंदी चित्रपटातील आधुनिकोत्तर कलात्मकता

गेली काही वर्ष टीव्ही न पहाण्याच्या आमच्या सवयीवरून काही वर्ष आम्ही नियमितपणे टोमणे ऐकत आहोत. काही महिन्यांपूर्वी, अगदी सात-आठ वर्षांच्या मुलीनेही माझ्याच घरी येऊन, आख्खं घर धुंडाळत "अय्या, तुमच्याकडे टीव्ही नाही", असले डायलॉग ऐकवले. घरी-दारी ऐकू येणार्‍या "अय्या, तू कधी खिचडी मालिकेचा एकही भाग पाहिलेला नाहीस" असल्या कुजकट बोलण्यांनी वैतागून शेवटी 'खिचडी - द मूव्ही' देखण्याचा मौका आम्ही मिस केला नाही. चित्रपटाची गोष्ट इथे आहेच, ती वेगळी लिहीत नाही. तर हा लेख आहे ''खिचडी - द मूव्ही' आणि आमच्या बालमनाला आवडलेल्या काही गोष्टी' याबद्दलः

१. अतिशय चतुर पद्धतीने करून दिलेला पात्रपरिचय! जयश्रीचा सासरा, जयश्री, जयश्रीची जाऊ हंसा, हंसाचा नवरा प्रफुल आणि हंसाचा भाऊ हिमांशु ही चित्रपटातली मुख्य पात्र देवाला दाखवतानाच आपल्याला दाखवली जातात. प्रेक्षक हाच आपला देव हे सांगण्याचा हा अतिशय विनयशील आणि अभिनव प्रयोग आहे.

२. चित्रपटात एक मुख्य असं पात्र नाही. साधारणतः हिंदी चित्रपटांमधे मुख्य पात्रांभोवती काही ना काही प्रेमकहाणी असते. पण 'खिचडी' या चित्रपटात सर्व जुन्या संकल्पनांना छेद देत प्रेमकहाणीतली पात्रही सामान्यच दाखवली आहेत.

३. "चल चल भोंसलें मार्केट चल" हे शान आणि महालक्ष्मी अय्यरच्या आवाजातलं अतिशय सुपरहिट गाणं. गुजराथी आणि पंजाबी वर-वधूच्या साखरपुड्यानंतर, भोसले या मराठी (आड)नावाच्या बाजारावरून मार्केट आहे, तिथे घडतं. एवढंच नाही तर एक्स्ट्रा नाचणारे आधी मराठी आणि नंतर राजस्थानी पेहेरावात येतात. एवढंच नाही तर राजस्थानी कपडे घातलेले लोकही कोळी नृत्यातल्या स्टेप्सवर नाचतात. सर्व चित्रपट मुंबईत घडतो, मुंबई महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलतात. तर स्थानिक संस्कृती या बाहेरून आलेल्यांनी उचलली आहे, आत्मसात केलेली आहे हे दाखवण्याचा हा अतिशय हृद्य प्रयत्न आहे.
३अ. हिमांशुसाठी मुलगी शोधताना "आम्ही मुंबईचे आहोत, आम्ही पुण्याची मुलगी का शोधू?" असा बिनतोड प्रश्न विचारून जयश्री (का हंसा?) स्थानिकांमधे असणार्‍या मुंबई-पुणे या वादाचा विनोदी संदर्भ अतिशय सहजपणे वापरून, महाराष्ट्राबाहेरच्या प्रेक्षकांनाही महाराष्ट्राच्या महान सांस्कृतिक वारशाबद्दल थोडी माहिती देते.

४. चित्रपटात कुठेही स्त्रीदेहाचं बटबटीत प्रदर्शन नाही. पडद्यावरची माणसं आपल्याच घरातली माणसं वाटावी अशा आकार, चेहेर्‍याची आहेत. शेजारी कुटुंब पंजाबी असलं तरी कोणी पुरूष उगाच आठ फूट उंच आणि दोन फूट घेरांचे बायसेप्स असणारे नाहीत; वा कोणी स्त्रिया सव्वा फूट कमरेच्याही नाहीत. पण म्हणून स्त्रियांची सुंदर दिसण्याची हौस यापायी मारलेली नाही. खरंतर हंसा (उच्चारी हन्सा) हे पात्रतर रात्री झोपतानाही सर्व दागदागिने घालूनच झोपत असावं असं वाटतं. तरीही साध्याभोळ्या हंसाच्या घरेलू व्यक्तिमत्त्वामुळे हे आजकालच्या पॉप्युलर कल्चरमधल्या चित्रपट, किंवा मालिकांसारखं श्रीमंतीचं ओंगळ प्रदर्शन वाटत नाही.

५. प्रफुल या सामान्य रंगरूपाच्या माणसात दाखवलेली कल्पकता मन मोहवून टाकते. अतिशय बुद्धीमान माणसंही वेळोवेळी आपलं सामान्य असणं दाखवून देतात, हे आपणांस काही नवीन नाही. त्याच्याच जोडीला सामान्य कुवतीचा दाखवलेला प्रफुल्ल, अनेक ठिकाणी आपल्या लॅटरल थिंकिंग, तर्कशुद्ध विचार, प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याची वृत्ती यामुळे तो अतिशय असामान्य बुद्धीवंत वाटतो. सामान्यांतलं हे असामान्यपण दाखवणं हे कौशल्यच निराळंच.

६. कोर्टकेसमधे अनेक ठिकाणी न्यायाधीश, हिमांशु किंवा बाबूजी बोलत असताना अनेक ठिकाणी लाँग शॉट्स घेतले आहेत. आजूबाजूच्या बर्‍याच गोष्टी या कोनातून आपल्याला दिसत रहातात. दिग्दर्शकाची समष्टीची जाणीव या ठिकाणी, अशा शॉट्समधून प्रतीत होत रहाते.

७. हंसा, प्रफुल, बाबूजी, जयश्री, हिमांशु हे गुजराथी कुटुंब आनंदी आहे. पण म्हणून मुद्दामच रात्रीचे, अंधारातले, किंवा भडक प्रकाशातले सीन्स टाळून रंगांवरून मनस्थिती दिसते असं दाखवण्याचा पाश्चिमात्य प्रभावाचा क्लिशे टाळला आहे. (उदा: 'साहब, बिवी और गुलाम'मधली मीनाकुमारी कायम कृत्रिम उजेडात दाखवली आहे.)

८. लग्न पुढे ढकलणं, हंसाची साडी बदललेली दिसणं या सर्व गोष्टी एखाद्या सामान्य कुवतीचा दिग्दर्शक सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली सोडून देईल, पण 'खिचडी'मधे असं दिसत नाही.

९. हिंदी चित्रपटात सगळंच बटबटीत, सरधोपटपणे दाखवलं जातं याला हा चित्रपट छेद देतो. आधुनिकोत्तर विचारधारा हिंदी चित्रपटांवरही प्रभाव पाडून जाते हे प्रफुलच्या स्वप्नात दिसतं. लग्न मोडल्यावर त्याला त्याच्या आयुष्यातल्या काही प्रसंगांच्या फ्रेम्स दिसणं यातून हिंदी चित्रपट परिपक्व होतो आहे ही जाणीव सुखद आहे. अशा अभिजात कल्पनांमधून दिग्दर्शकाची सौंदर्यदृष्टी हिंदीत फारच कमी वेळा दिसते.

प्रत्येक पिक्चरमधून काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न कोणीही यशस्वी दिग्दर्शक करत असतो. जोहर-चोप्रा लोकं जो संदेश अतिशय बटबटीत आणि कृत्रिम पद्धतीने देतात, अनेक भाषांमधून वेगवेगळी रूपकं वापरून जो संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो, तोच संदेश दिग्दर्शक आतिश कपाडीया अगदी सहजपणे, बाबूजी या पात्राकरवी देतो, हर प्रफुल के लिए एक हंसा होती है।

सध्याच्या प्रसिद्धीसंस्कृतीशी इमान राखून कला आणि वास्तव यांच्यातलं नातं आपल्यापर्यंत पोहोचवताना दिग्दर्शकाची कला आणि अभिजात भारतीय संस्कृतीशी षयीची बांधलकी तर दिसतेच पण त्याचबरोबत चित्रपटात सामान्य भासणार्‍या पात्रांच्या मार्फत त्याची व्यापक जीवनदृष्टीही प्रतिबिंबित होते. शेवटी जीवन म्हणजे एक प्रवाह, विविध विचारप्रवाहांची होणारी खिचडी आणि येणारे चढाव-उतार हे आयुष्य आणि पाणी दोघांसाठीही सारखेच. मनुष्याचं जीवन हे बाणाप्रमाणे सरळ रेषेत जाण्याऐवजी वेगवेगळ्या ऊर्मींच्या खेचाखेचीतून कधी इथे तर कधी तिथे असं जातं. खोट्या चेहेर्‍यांच्या बॉलिवूडी गर्दीत आपली ओळख बॉक्सऑफीवर निर्माण करण्यात भले आतिश कपाडीया फार यशस्वी झाले नसतील, पण एक प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून सर्व चित्रपटरसिकांनी त्यांची नोंद घ्यावी एवढी आशा खिचडी या चित्रपटातून जरूर निर्माण झाली आहे.

अ. शी! अमेरिकेत ना फूट, आऊन्स, गॅलन, पाऊंड, फॅरनहीट असली एककं वापरतात!!

ऋषिकेश Tue, 08/11/2011 - 11:03

कोणी काहिहि बोलुदेत.. मी या खिचडी संप्रदायाचा मोठा पंखा आहे
====
"हंसा भाभी बुरी खबर है.. बाबुजी आखरी सारे गिन रहे है"
"हाय हाय.. किसकी!"
=))
====
"हा ये ले बाबुजीको फोन ल्गा"
"हाय हाय, कैसे लगा? कहा लगा? आज तो एक के बाद एक बुरी खबरे मिल रहि है"
=====
" अरे मैने तुम्हे बेल लाने को कहा था ना प्रफुल!"
"हा तो ले आया ना बैल"
या वेळी एक बैल हॉस्पिटलमधुन फिरताना दिसतो
"अरे ये बैल है मैने तुम्हे बेल लाने को कहा था..ऐसे ऐसे (इथे अ‍ॅक्शन) बजाने वाली.. नर्स को बुलानेवाली"
"बाबुजी ये चिटींग है, आपने ऐसा साफ कहा ही नही और ऐसे ऐसे (अ‍ॅक्शन) तो कीयाही नही था"
"प्रफुल, बेटे इतना तो सोचना चाहिये था ना की ये बैल से मै नर्स को कैसे बुलाऊंगा?"
"आसान है.. अगर बैल ने हॉऽऽऽ ऐसा आवाज कीया तो नर्स को बोलना आजा"
"अरे लेकीन जब मुझे चाहिये तब बैल ने हॉऽऽऽ ऐसे आवाज नही किया तो?"
"तो आप खुद हॉऽऽऽ ऐसा आवाज करना!"
"अरे लेकीन अगर मुझेही हॉऽऽऽ ऐसा आवाज निकालना है तो बैल की क्या जरुरत"
"ये आपको बैल मंगवानेसे पहले सोचना चाहिये था ना!"
====

फारएण्ड Tue, 08/11/2011 - 11:54

हा चित्रपट किंवा मालिका काहीच पाहिलेले नाही, आता पाहण्याची उत्सुकता आहे. लेखाचा टोन जबरी आवडला पण स्पेसिफिक उदाहरणे जरा बाउन्सर गेली, मालिकेतील काही भाग पाहून पुन्हा वाचतो :)

आडकित्ता Tue, 08/11/2011 - 12:53

म्हंजे ती शिनुमा / सेरियल काढताना कथानकाची खिचडी करतात ते पुरे नाही तर डायरेक्ट नावच खिचडी दिलेला शिनुमा/सिरियल आहे वाट्ट?
मी टिव्ही सिरियल्स व चित्रपटांच्या बाबतीत अगाध (अ)ज्ञानी. कौबक मधले नंतरचे सगळे प्रश्न येत असले तरी शिनुमा अन क्रिकेट या दोन प्रश्नांवर माझी डायरेक्ट दांडी उडते. मग नुस्तेच १२.५ हजार रुपये मिळवून मी ऑट होतो. ;)

............सा… Tue, 08/11/2011 - 20:10

In reply to by आडकित्ता

मला तुमच्या प्रतिसादाला "विनोदी" अशी श्रेणी द्यायची होती परंतु मला आता श्रेणी देता येत नाहीये :(. असो मस्त प्रतिसाद.

अशोक पाटील Tue, 08/11/2011 - 20:06

मी टीव्ही पाहात नसल्याने 'खिचडी' च्या दोन्ही प्रकरणाबाबत (मालिका आणि चित्रपट) भाष्य करण्यास अपात्र आहे. पण धागाकर्ती अदिती यानी लेखाच्या ओघात एक उदाहरण दिले आहे (उदा: 'साहब, बिवी और गुलाम'मधली मीनाकुमारी कायम कृत्रिम उजेडात दाखवली आहे.).

'साहब, बिवी और गुलाम' मी कित्येक वेळा पाहिला आहे. चित्रपटातील फ्रेम-न-फ्रेम माझ्या नजरेसमोर आहे. मीनाकुमारीने सादर केलेली 'छोटी बहु' पडद्यावर येते ती वाड्यातील फक्त तिच्या वाटणीच्या खोलीतच....अन् एक प्रसंग वगळता [नशापाणी करून नवर्‍याला गणिकेकडे जाऊ न देण्याच्या तिचा प्रयत्न. इथे रात्रीचा समय आहे] सर्वकाळ दिवसाच. म्हणजेच भूतनाथ तिला भेटायला जातो, बोलतो, तिचे दु:ख जाणतो ते सर्व दिवसा उजेडी. "मोहिनी सिंदूर" लावून आनंदाने गाणे म्हणते ते देखील दिवसाउजेडीच. कथानकात थोरल्या व मधल्या जाऊशी तिचा एक छोटा संवाद आहे, वाड्याच्या पॅसेजमध्ये, तोही दिवसाच. फक्त शेवटच्या प्रसंगात बग्गीतून भूतनाथबरोबर जाताना रात्र दाखविली आहे आणि तिथेच तिची हत्यादेखील होते.

मग अदिती याना जाणवलेला कृत्रिम उजेड म्हणजे त्याना नेमके काय अपेक्षित आहे याचा उलगडा होत नाही.

अशोक पाटील

............सा… Tue, 08/11/2011 - 20:19

परीक्षण आवडले. परीक्षणातील, समष्टी, छेद देणे, आधुनिकोत्तर विचारधारा आदि वाक्यप्रयोग प्रभावी वाटले.

आज यु ट्यूब वर "चल चल भोसले मार्केट चल" हे गाणे पाहीन.

>> पुरूष उगाच आठ फूट उंच आणि दोन फूट घेरांचे बायसेप्स असणारे नाहीत; वा कोणी स्त्रिया सव्वा फूटअ कमरेच्याही नाहीत >>
हाहाहा कूल!!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/11/2011 - 21:07

ऋ: मी 'खिचडी' मालिका कधीही पाहिलेली नाही, पण चित्रपट मला भयंकर आवडला हे खरं आहे.
फारएण्डः हा चित्रपट तू पाहिलास तरी एण्डला फार फायदा नाही; तू बंडल चित्रपटच बघत जा! ;-)
आडकित्ता: चित्रपटाचंच नाव 'खिचडी - द मूव्ही' असं आहे.
अशोक पाटील: हा आख्खा लेखच उधारीच्या शब्दांवर आणि कल्पनांवर आधारित आहे; त्यामुळे 'साहेब, बीवी और गुलाम'चं उदाहरणही उधारीवरच उचलून आणलेलं आहे. हे वाक्य माझं नव्हे!
सारीका: तुला आवडलेले सगळे शब्दप्रयोग मी उधारीवरच आणले आहेत.

खिचडी मालिकेतली विसंवादी पात्र, त्यांचे चित्रविचित्र स्वभाव आणि सवयी यांच्या मिश्रणातून मालिका स्लॅपस्टीक कॉमेडी असेल असं वाटतं. हाच साचा घेऊन बॉलिवूडची टर उडवण्याचा प्रयत्न चित्रपटात केलेला आहे. थोरांप्रती ओघळणारा, लिडबिडणारा आदर, प्रेमाचं उदात्तीकरण, वाट्टेल तिथे गाणी घुसडणे, गडगंज श्रीमंत लोकं आणि त्यांचा पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणाचा सोस, हिरोने काहीतरी उदात्त करून दाखवलंच पाहिजे असा अट्टाहास, पुरूषप्रधान संस्कृतीचा उदोउदो असलं काहीबाही दाखवणार्‍या बॉलिवूडची टर उडवण्याचा मूळ विचार आणि चित्रपटात वापरलेल्या खत्तरनाक कल्पना विनोदी आहेत यात वाद नाही. पण या दोन्हीची खिचडी साधलेली नाही. मूळ कल्पनांचा जीव दोन तासांचा चित्रपट बनवण्याएवढा मोठा नाही. पण तरीही दोन तास काहीही विचार न करता हसायचं असेल तर हा चित्रपट जरूर पहावा. एकही अ‍ॅडल्ट जोक न करता पांचट विनोद करूनही चित्रपट पुरेसा टाईमपास आहे. बॉलिवूडमधे एवढा 'मसाला' असूनही त्याची पुरेशी थट्टा त्यांना उडवता आलेली नाही हे ही तेवढंच खरं.

राजेश घासकडवी Tue, 08/11/2011 - 22:05

मनुष्याचं जीवन हे बाणाप्रमाणे सरळ रेषेत जाण्याऐवजी वेगवेगळ्या ऊर्मींच्या खेचाखेचीतून कधी इथे तर कधी तिथे असं जातं.

हे अगदी पटलं. अशाच भंजाळलेल्या व्हेक्टर फोर्सेसच्या बेरजेने जिथे आपण अविरत खेचले जातो, त्यालाच आपण शेवटी जीवनाची दिशा वगैरे म्हणतो. आणि मग पिपात उंदरांना न्हाल्यासारखं वाटतं.

खिचडीसारख्या उत्कृष्ट कलाकृतीला नाकं मुरडण्याचा प्रयत्न हा तद्दन एतद्देशीय विचारसरणीचा नमुना आहे. रॅटटूई - नावाचा चित्रपट अशीच सगळ्याची खिचडी करतो. किंबहुना ती फ्रेंच खिचडी (हाताला येतील ते पदार्थ घालून केलेली) असल्यामुळे त्यातला स्वाभिनंदक अन्नसमीक्षक अत्युच्च कलेची पावती देतो. असा उरफाटा आपपरभाव करायचा आणि मग हिंदी सिनेमा हे डबकं झालं आहे का वगैरे परिसंवाद करायचे अशी या हुच्चभ्रू विचारजंतांची क्लृप्ती असते. पोट भरण्याचे धंदे, दुसरं काय!

लेखिकेने या सर्वाचा पर्दाफाश करणारा लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन. अशा कुप्रथेच्या पर्दाफाशीमुळे या लेखाला विडंबनाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

शहराजाद Tue, 08/11/2011 - 22:12

लेखाचा टोन मस्त!

चिंतातुर जंतू Wed, 09/11/2011 - 14:13
  • विनयशील, प्रयोगशील, वगैरे शीलवान शब्दगण;
  • उर्मी, छेद, हृद्य, समष्टी, परिपक्व, जाणीव, कल्पना, व्यापक, रूपकं, कला आणि वास्तव असे हृद्य शब्दगण;
  • आधुनिकोत्तर, अभिजात, बांधीलकी, सौंदर्यदृष्टी, जीवनदृष्टी वगैरे अभिजात समीक्षेचे बोट धरून सहजपणे लेखनात उतरलेले शब्दगण;
  • संदर्भ अतिशय सहजपणे वापरणे, मन मोहवून टाकणे, सामान्यांतलं असामान्यपण दाखवण्याचं कौशल्य, क्षयझची सुखद जाणीव, क्षयझ प्रतीत किंवा प्रतिबिंबित होणे, क्ष आणि यझ यांच्यातलं नातं, वगैरे वगैरे मोहक वाक्यगण;

अशांची सुयोग्य पखरण वाचून अंमळ रंजन झाले एवढे नमूद करतो आणि एका गंभीर पण श्रेयअव्हेरामुळे अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाकडे वळतो:

>>'साहब, बिवी और गुलाम' मी कित्येक वेळा पाहिला आहे. चित्रपटातील फ्रेम-न-फ्रेम माझ्या नजरेसमोर आहे. मीनाकुमारीने सादर केलेली 'छोटी बहु' पडद्यावर येते ती वाड्यातील फक्त तिच्या वाटणीच्या खोलीतच....अन् एक प्रसंग वगळता [नशापाणी करून नवर्‍याला गणिकेकडे जाऊ न देण्याच्या तिचा प्रयत्न. इथे रात्रीचा समय आहे] सर्वकाळ दिवसाच. म्हणजेच भूतनाथ तिला भेटायला जातो, बोलतो, तिचे दु:ख जाणतो ते सर्व दिवसा उजेडी. "मोहिनी सिंदूर" लावून आनंदाने गाणे म्हणते ते देखील दिवसाउजेडीच. कथानकात थोरल्या व मधल्या जाऊशी तिचा एक छोटा संवाद आहे, वाड्याच्या पॅसेजमध्ये, तोही दिवसाच. फक्त शेवटच्या प्रसंगात बग्गीतून भूतनाथबरोबर जाताना रात्र दाखविली आहे आणि तिथेच तिची हत्यादेखील होते.

मग अदिती याना जाणवलेला कृत्रिम उजेड म्हणजे त्याना नेमके काय अपेक्षित आहे याचा उलगडा होत नाही.

प्रसंग दिवसा घडणे आणि दिवसाउजेडी घडणे यांतला मूलभूत फरक आधी लक्षात घेतला पाहिजे असे वाटते. उदाहरणार्थ 'भंवरा बडा नादान' हे वहीदावर चित्रित झालेले गाणे भर दिवसा आणि उघड्यावर (घराबाहेरच्या बागेत) घडते. गाण्याच्या उडत्या चालीत आणि त्या अनुषंगाने वहीदाच्या हावभावांत पात्राचा बागडणारा उत्फुल्लपणा जाणवतो. तसाच त्या गाण्यात दिसणार्‍या झगझगीत सूर्यप्रकाशातून तो प्रतिबिंबित होतो. याउलट छोटी बहू हवेलीत आणि त्यातही तिच्या खोलीत सीमाबद्ध आहे. तिच्या खोलीत सूर्यप्रकाश येतच नाही किंवा खिडक्या बंद ठेवून तो येऊ दिला जातच नाही. त्यामुळे हे प्रसंग कंदील/दिवा वगैरेंच्या (पक्षी: कृत्रिम) प्रकाशात घडतात. तिचे दागिने त्या प्रकाशात कितीही झळाळले तरीही तिचे आयुष्य नैसर्गिक सूर्यप्रकाशात उत्फुल्लपणे बागडण्यात व्यतीत होत नाही तर अंधारात झुरत झुरत चालले आहे. थोडक्यात, बाहेर दिवस आहे की रात्र याने तिच्या वास्तवात काही फरक पडत नाही. जशी सूर्यप्रकाशाला हद्दपारी आहे तशीच तिच्या जाणिवा, उर्मी, आकांक्षा यांना इथे हद्दपारी आहे. हवेलीतली कालबाह्य होऊ घातलेली आणि र्‍हास पावणारी जमीनदारी व्यवस्था तिच्या आयुष्यात अंधार करते आणि तिला पारतंत्र्यात खितपत ठेवते; याउलट आधुनिक विचारांचा उत्फुल्ल प्रकाश ब्राह्मो समाजी वहीदाच्या पात्राच्या आयुष्यात पसरतो आणि तिला स्वातंत्र्य बहाल करतो. थोडक्यात, चित्रपटातला हा भाव प्रकाशयोजनेत अतिशय हृद्य प्रकारे प्रतीत होतो.

अशोक पाटील Thu, 10/11/2011 - 10:54

In reply to by चिंतातुर जंतू

"चित्रपटातील प्रकाशयोजनेचे महत्व" हा विषय इथल्या धाग्यातील आशय आणि प्रतिसादाशी फटकून असल्याने वरील विवेचनावर इथे भाष्य करणे अप्रस्तुत होईल. पण मला नक्की कलेच्या या घटकावर लिहायला वा लिहिलेले वाचायला आवडते. संधी मिळाल्यास पुढे जरूर हा विषय/विचार विस्तृतपणे मांडतो.

तोपर्यंत थॅन्क्स.

अशोक पाटील

परिकथेतील राजकुमार Wed, 09/11/2011 - 15:40

परिचय आवडल्या गेला आहे.

चित्रपट आणि सिरियल दोन्ही आपल्याला बेहद आवडतात.

लवकरच 'ऑफिस ऑफिस' वर आलेला चित्रपट देखील बघण्याचा मानस आहे.

कोणितरी आमच्या 'साराभाई VS साराभाई' वरती देखील चित्रपट काढा रे.

अनामिक Wed, 09/11/2011 - 21:20

In reply to by परिकथेतील राजकुमार

'साराभाई VS साराभाई' वर चित्रपट नाही, पण पुढचा सिझन येतोय हे ऐकलं होतं. खरं खोटं त्या जेडी मजेठीयाला माहीत.

प्रियाली Wed, 09/11/2011 - 15:42

मी कधीच पाहिली नव्हती ही मालिका. आता लागते का?

ऋषिकेश Wed, 09/11/2011 - 17:42

In reply to by प्रियाली

मी कधीच पाहिली नव्हती ही मालिका

ऑ!!! कुठे फेडशील ही पापं! ;)

प्रियाली Wed, 09/11/2011 - 20:39

In reply to by ऋषिकेश

पापं फेडावीशी वाटतात म्हणूनच आता लागते का विचारलं?

आता काहीतरी

पापडपोल वगैरे लागतं पण तारक मेहता का उल्टा चष्मा सही आहे. ;-)

अनामिक Wed, 09/11/2011 - 21:16

In reply to by प्रियाली

बहुतेक राजश्री डॉट कॉमवर मिळतील ह्या मालिकेचे भाग. प्रफुल आणि हन्सा दोघेही जबरदस्तं आहेत, जरूर बघा.

... Wed, 09/11/2011 - 19:14

समीक्षा आवडली
स्टार वन जेव्हा चालू झाल तेव्हा लागण्याऱ्‍या चांगल्या मालिकापैकी ही एक
नर्मविनोदीपणा हे मालिकेचे प्रमुख वैशिष्ट्य
प्रत्येक पात्राचे स्वतचे असे वेगळेपण होते
काही फेमस डाँयलाग या मालिकेतील
बाबूजी = प्रफूल तू तो गधा है
हंसा = हाय हाय अगर मै काम करुगी तो काम का अपमान होगा
प्रफूल = बाबूजी पहिले एक बात निश्चित कीजीए या आप मेरे पिताजी है या गधे के पिताजी
जयश्री =हे भगवान ये लीना कब डूब मरेगी
यातील पात्रेही भूमिकेत फिट्ट बसली होती
गंमत म्हणजे यातली लहान मुले समजूतदार दाखवली होती
त्याच्या तोँडचा फेमस डाँयलाग भागाच्या शेवटी नेहमी असे
बडे लोग पागल है लेकीन दिल के अच्छे और सच्चे है

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/11/2011 - 20:42

ऋ, फारएण्ड, अशोक पाटील, सारिका, चिंतातुर जंतू, परा, प्रियाली आणि जाई,

"हाव्वार? खाने खाके जाना हां"

प्रियाली: आता ही मालिका टीव्हीवर लागते का नाही माहित नाही. यूट्यूबवर झलकतरी मिळावी. मी हा चित्रपट यूट्यूबवरच पाहिला आणि त्यानंतर काही दिवसांनी कॉपीराईटवाल्यांची कात्री चालली.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 10/11/2011 - 00:18

In reply to by पुष्करिणी

भावेशकुमार कोण? पिक्चरमधे ओबामाकुमार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जॉन अब्राहमकुमारचा उल्लेख आहे.

युट्यूबवर सिनेमा सापडला. गुगलल्यास लिंक मिळेलच.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 10/11/2011 - 09:24

In reply to by पुष्करिणी

नाही. मीरा आणि तिचा नवरा चित्रपटात नाहीत.

पण जॉन अब्राहम कुमारचा उल्लेख आहे त्यात. ;-)

मी Thu, 10/11/2011 - 12:52

लेख रोचक आणि आता 'मार'मिक.

खिचडी छान टीपी आहे, मस्त डेडपॅन ह्युमर आहे.