दूध, आंदोलन, वगैरे वगैरे : १
तर अखेर ते दूध उत्पादकांचं आंदोलन संपलं आज. म्हणजे शहरी मध्यमवर्गीयांना तसा काही फरक पडत नव्हता. म्हणजे तशा कुणी शेतकरी सदृश इसमानं 'दुधोनॉमिक्स'वर एक-दोन पोस्टी टाकल्या होत्या आणि त्याला शहरी मध्यमवर्गीयांच्या "Yawn", वगैरे अशा सखोल, विश्लेषणात्मक, तसंच 'दुधाचा टँकर रस्त्यावर ओतणं हे कसं वाईट्ट आहे आणि त्यापेक्षा गरजूंना देणं कसं योग्य', अशा सर्वोदयी कमेंट्स वाचल्या म्हणून म्हटलं काही किरकोळ लिहावं. असं आहे, की दूध हा विषय शहरी उपभोक्त्यांनी बराच गृहीत धरण्याचा विषय झाला आहे हेच ते 'ऑपेरेशन फ्लड' वगैरेंचं खरं तर यश मानावं का असं वाटून राहिलं. कारण सकाळी रांगेत उभं राहून आरे दुधाच्या मोजक्या बाटल्या घेणारी पिढी आता फारशी उरली नाही. (गेले ते दिवस.)
तर मंडळी दुधाबद्दल काही उथळ, वरवरचं लिहितोय आणि आधीच एक वैधानिक इशारा :
१. मला या विषयातील जास्त माहिती नाही. आहे ती ऐकीव आणि वाचीव.
२. मला लेखनशिस्त नाहीये. अघळपघळ गप्पांसारखं लिहितोय तर असो.
३. अमूलबद्दल लिहीत नाहीये. कारण त्याबद्दल पुरेशा डॉक्युमेंट्रीज नेटवर आहेत; आणि नितीन थत्तेंसारख्या अमूलच्या सप्लाय चेन मॅनेजमेंटमधील तज्ज्ञ माणसानी त्यावर लिहून लोकांना ज्ञानसंपृक्त करावे (ही विनंती).
आपण शहरी मध्यमवर्गीय मंडळी न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, अपवादानं अमेरिका वगैरे देशातील डेअऱ्या, त्यांच्या त्या गायी, हिरवीगार कुरणं, त्यांचे गोग्गोड फोटो, माहित्या बघत वगैरे त्या देशांच्या दुग्धसमृद्धीबद्दल अवाक होऊन वगैरे तोंडात बोटं वगैरे घालत असू. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपला देश दूधनिर्मितीमध्ये कायमच पहिल्या एक-दोन-तीन या नंबरांमध्ये राहिला असावा. (गायीच्या दुधात अमेरिका एक नंबर आपण दोन नंबर आणि म्हशीच्या दुधात आपण एकच नंबर.)
असं असूनही आपल्या देशात अमूलचा एक अपवाद वगळता दुग्धव्यवसाय हा एकविसावं शतकचालू होण्यापूर्वी हा बऱ्यापैकी कॉटेज इंडस्ट्री छाप होता. एका महत्त्वाचं कारण म्हणजे दूध हा अत्यंत नाशिवंत पदार्थ आणि दुसरा म्हणजे याच उत्पादन जास्त खेडोपाडी. यामुळे व्यवसाय जास्तीतजास्त लोकल. 'काऊ बेल्ट' नामानिधानप्राप्त हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहार इथे उत्पादन आणि दर्जा अमाप आणि अफाट. तेच गुजराथचंपण. महाराष्ट्रात मर्यादित. चारही दक्षिणी राज्यांतही उत्पादन 'काऊ बेल्ट'च्या खालोखाल. उत्तरेतील दुधाचा पीक सिझन म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. उन्हाळ्यात उत्पादन बऱ्यापैकी घसरतं. दक्षिणी राज्यांमध्ये अशी सिझनल व्हेरिएशन्स त्या मानाने कमी. २००० सालापर्यंत साधारणपणे दूध सरकारी डेअऱ्या (आरे वगैरे) किंवा लोकल सहकारी दूध डेअऱ्या, जिथे लोकली दूध गोळा होऊन कमीतकमी काळात त्याचे प्रोसेसिंग चालू होऊ शके. या काळामध्ये प्रोसेसिंग म्हणजे मुख्यतः होमोजिनायझेशन /स्टॅण्डर्डायझेशन व पास्चरायझेशन करून मग दूध बाटल्यांमध्ये किंवा पाऊचमध्ये भरणे व थंड तापमानात स्टोअर करून शहरांमध्ये पाठवणी करणे. दूध, तूप, चक्का अशी त्यामानाने कमी सोफिस्टिकेशन लागणारी प्रॉडक्टस बनवली जात, क्वचित सुगंधी दूध. (अमूलला वगळून मी हे लिहीत आहे.) आईसक्रीमचे मोठे ब्रॅण्ड्स नव्हत; लोकल उत्पादन होई. तीच गोष्ट पनीरची, जे उत्तर भारतात जास्त बनविले जाई. त्यामानानं लो टेक, लो इन्व्हेस्टमेंट, लोकल आणि दुर्दवाने कमी एफिशियंट असा मामला एकंदरीत. (अवांतर : चितळे हे याला अपवाद. या अशा सेटअपमध्येही चितळे कायमच टेक सॅव्ही आणि प्रगत समजले जात. एक उदाहरण म्हणजे, आमचा एक कस्टमर जो आता चितळ्यांपेक्षा खूप मोठा व्यावसायिक झाला आहे तो चितळ्यांचे नाव काढलं की हात जोडे. का, असं विचारलं तेव्हा त्याचं उत्तर रोचक होतं, "ज्या काळात आम्ही खरी/ खडी बाउलीजवळ चक्क्याचे कट्टे लावून विकत असायचो त्या काळात चितळेंनी स्वतः खूप सोफेस्टिकेशन आणले होते डेअरी प्रॉडक्टस मध्ये. आम्ही त्यांच्याकडे बघून उत्पादन, दर्जा शिकलो." ही घटना २००४मधली)
हा उद्योग कॉटेज इंडस्ट्री आणि लोकल राहण्यामागे एक कारण होतं प्रोसेसिंग मशीनरीची किंमत. मिल्क पावडर आणि/किंवा इतर मिल्क प्रॉडक्टस तयार करण्याची मशिनरी, टेट्रापॅकसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या देत असत आणि त्यात लागणारी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही खाजगी व्यवसायिकांकरिता प्रचंड होती. (अमूलची गोष्ट न्यारी. ते हेच सगळं आधीच करून बसले होते. तेथील दिशादर्शक लोकांची (उदा. कुरियन) दूरदृष्टी व त्यांचा आर्थिक ताकद) काही व्यावसायिकांनी बहुधा आंतरराष्ट्रीय मार्केट मधील होणाऱ्या बदलांची चाहूल घेऊन म्हणा (किंवा इतर काही फॅक्टर्स असतील तर ते मला माहीत नाहीत) जाणतेपणाने २००२-२००४मध्ये ही मोठी गुंतवणूक करून दुधाची भुकटी छापायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय बाजारात दूधभुकटीच्या किमतींनी २००५पासून उसळी घ्यायला सुरुवात केली आणि त्यावेळी बऱ्याच लोकांना या मंडळींच्या जाणतेपणाची जाणीव झाली. भारतातून मोठ्या प्रमाणावर खाजगी व्यवसायिकांकडूनही निर्यात चालू झाली आणि उत्तम नफा मिळू लागला.
या सुरुवातीच्या काळात टेट्रापॅकसारखे उत्तम पण महाग तंत्रज्ञान व यंत्रसामग्री देणाऱ्यांच्या पंगतीला कॉपी मारून किंवा समजून घेऊन कमी किंमतीत असेच तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री पुरवणाऱ्या अनेक देशी कंपन्या निघाल्या. दूधभुकटीच्या निर्यातीतून मिळणारा नफा अनेकांच्या तोंडाला पाणी सुटेल असा होता. ही लाट चार-पाच वर्षं टिकली. या काळात स्वस्त किंवा महाग तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचा वापर करून दुग्धप्रक्रिया प्लांट्स लागले. दूध होतं पण प्रक्रिया अमाप वाढली. दुग्धव्यवसायाशी संबंधित नसलेली अनेक मंडळी यात उतरली. (हा निराळा रोचक विषय आहे. नंतर कधी.)
२००४ - ०५मध्ये ज्यांच्या हाती तंत्रज्ञान/यंत्रसामुग्रीची दोरी त्यांचे राज्य अशी परिस्थिती होती. ती बदलून ज्यांच्या हाती मिल्क प्रोक्युअरमेंटची दोरी त्यांचे राज्य अशी परिस्थिती आली. उसाप्रमाणे दुधाची पळवापळवी होणार की काय अशी चिन्हं दिसू लागली. आणि अपेक्षेप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात मिल्क पावडरच्या किंमती आपटल्या. अनेक नवीन उगवलेल्या डेअऱ्या बंद पडू लागल्या. जुन्या-जाणत्या खेळाडूंनी काळाची पावलं आधीच ओळखून दोन प्रकारची तयारी करून ठेवली होती. एक म्हणजे त्यांनी उत्पादनं दूधभुकटीपुरती मर्यादित न ठेवता तूप, बटर, दही (योगर्ट) आणि मुख्य म्हणजे चीज बनवायला सुरुवात केली होती. यांचे मार्केटिंग देशी ग्राहकाला समोर ठेऊन केले गेले त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील उतारचढावापासून यांचे उद्योग सुरक्षित राहिले. दुसरे म्हणजे पडत्या स्पर्धेमध्ये या कंपन्यांनी स्वतःचं प्रोक्युअरमेंटचं जाळं दूर दूर पसरवलं. खेडोपाडी चिलिंग सेन्टर्स उभी आहेत आणि या कंपन्यांचे मध्यम आकाराची दुग्धप्रक्रियाकेंद्रं देशभर पसरली आहेत. एक उदाहरण म्हणजे पूर्वी तामिळनाडूमध्ये मर्यादित असलेला एक मोठा समूह आता बेळगावपर्यंत चिलिंग सेन्टर्स आणि मध्यम क्षमतेची प्रक्रियाकेंद्रं आणून पसरला आहे. महाराष्ट्रातही सुरुवात झाली आहे. यांचं कॅपॅसिटी एक्सपान्शन २००४पासून अजून चालूच आहे. तीच गोष्ट आंध्र प्रदेशातील काही कंपन्यांची. दक्षिण भारतात काही विशिष्ट ठिकाणी दुधाची उपलब्धता खूप आहे अशा ठिकाणी या सगळ्या कंपन्या असतात. काही उत्पादकांनी "milk untouched by hand" अर्थात पाश्चात्त्य हायटेक गोठा, ज्यात दूध काढणं स्वयंचलित यंत्रांद्वारे होऊन मग यूएचटीचा वापर करून डायरेक्ट टेट्रापॅकमध्ये पॅक होतं. (गंमतीची गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळात हे गोठे मॅनेज करण्यासाठीचे गोरे गुराखीसुद्धा आयर्लंड, न्यूझीलंड वगैरे देशांतून आणले गेले. एकदोन वर्षांनी एतद्देशीय लोकांनी त्यांची जागा घेतली.) आता सचिनतेंडुलकरअमिताबच्चन वगैरे मंडळी सत्तर-ऐशी रुपये देऊन हेच दूध पितात.
तर अशी परिस्थिती आहे मार्केटची. कायम बदलती. कुठल्या दिशेला जाईल ते बघणे रोचक ठरणार.
(व्यवस्थापकीय नोंद - धाग्यातलं प्रमाणलेखन किंचित सुधारून पुन्हा प्रकाशित केला आहे.)
माझं मत - भारतातलं दूध आणि
माझं मत - भारतातलं दूध आणि दुधाचे पदार्थ खाणारे गिह्राइक फारच पक्कं आहे आणि परदेशी इकनॅामिकल मॅाडेल इथे कधीही आणता येणार नाही.
कित्येक गट दुधाला महत्त्वच देत नाहीत.
इंदुर उज्जेन परिसरात जेवढे दुधाचे पदार्थ आवडीने खाल्ले जातात तसे लोक कोल्हापुरला खातात का?
उत्तर भारतात (पंजाबात ) पनीर, बंगाल ओडिशात छेना - पनीरला गोड करून केलेले पदार्थ यांना उठाव आहे तसा महाराष्ट्रात कुठे? खव्याचे पदार्थ, श्रीखंड, सर्वांनाच आवडत नाहीत. लस्सीला मराठी मागणी किती? बय्राच जणांकडे दुधाच्या चहा- कॅाफीऐवजी थंड मागवतात.
पुर्वी जी आरेचे दूध मिळणे अवघड होते तेच बरे होते.
१) त्या कुरिअनलाही नंतर
१) त्या कुरिअनलाही नंतर हाकलले म्हणतात. खरेखोटे माहित नाही.
२) चीज हे शाकाहारी नाही ही ओरड झाल्यावर अमुलने तो उद्योग ( चीज बनवायला लागणारे द्रव्य ) बंद केला. ते परदेशातून तयार डबे आणतात.
३) आता चीज घातलेले पदार्थ { हॅाटेलमध्ये} खाण्याची चटक गुजरातमध्ये भयानक वाढली आहे. महाराष्ट्रात अजून नाही.
४)अमुलसारखंच लोणी इतरांनी करण्याचा प्रयत्न केला पण गिह्राइकाला अमुलच लागते.
१. हाकलले म्हणणे जरा क्रूर
१. हाकलले म्हणणे जरा क्रूर वाटते. सक्षम पायाभरणी आणि स्वच्छ व यशस्वी कारभार त्यांनी खूप म्हणजे खूपच वर्षे केला. पेपरातील बातम्यांवरून ते नाखूष होते असे जाणवले. पण तिथल्या एकाचे ( मिडल मॅनेजमेंट) मत कोट करतो "तेंडुलकर किती का थोर असला तरी त्याने पण कुठं तरी थांबायचं असतं"
२. चीज शाकाहारी नाही वगैरे ओरड कधी झाली ? ऐकलं नाही त्याविषयी . खास अमूल च माहीत नाही , पण भारतात सध्या अनेक डेअरीज चीज बनवतात.
३. बटर बद्दल पण अमूल सारखे इतरांना जमत नाही हे जनमत माहीत नव्हते.
अटरली बटरली डेलिशस ...
३. बटर बद्दल पण अमूल सारखे इतरांना जमत नाही हे जनमत माहीत नव्हते.
माझ्या ओळखीतल्या लोकांना विकतचं लोणी म्हणजे बटर आणि बटर म्हणजे अमूल बटर, एवढंच माहीत आहे. पावभाजीच्या गाड्यांवर पाहा, लोणी म्हणणार नाहीत, 'एक्स्ट्रा अमूल बटर' म्हणतील. बाजारात सर्वांच्या आधी येणं आणि ब्रँडनेममधून होणारं मार्केटींग याचा उत्तम नमुना आहे.
काही वर्षांपूर्वी भारतात असताना लोणी हवं होतं. पाव बनवायला. 'बिनमिठाचं लोणी कसं मिळणार' याबद्दल मी बराच वेळ डोकं खाजवलं. नंतर लक्षात आलं, हलवायाकडे जाऊन सरळ लोणी मागता येईल; बिनमिठाचं अमूल बटर शोधण्याची गरज नाही.
भारतात चांगली चीजं बनण्याची गरज आहे. पावभाजीवर किसून घालायला अमूलचं चीज ठीके. निदान पुणे-नाशिक पट्ट्यात, जिथे वारुणीगृहं आहेत, तिथे चांगली चीजंही बनवायला सुरुवात व्हावी असं मनापासून वाटतं. एवढा दूधप्रेमी देश, एवढी विविधता दुधापासून बनणाऱ्या पदार्थांत, आता चांगली चीजंही बनवली पाहिजेत.
>>>२. चीज शाकाहारी नाही वगैरे
>>>२. चीज शाकाहारी नाही वगैरे ओरड कधी झाली ? ऐकलं नाही त्याविषयी .>>
म्हणजे दही बनवायला एक विरजण लागतं किंवा लिंबू पिळून दूध फाडून पनीर करता येतं तसं चीज करायला जे इन्झाइम लागतं ते मासाहारी म्हणता येईल. ते कसे करतात एकदा पेपरात आल्यावर गुजरातमध्ये बय्राचजणांनी चीज खायचं सोडलं. पण नवी पिढी या चीजला फारच चटावली आहे. मजा म्हणजे गुजराती चानेलवर चालणाय्रा पाककृतींत असतात याचे पदार्थ. अन्यथा ते शाकाहारी लोकांसाठीचा चानेल आहे.
मुद्दा असा आहे की उरलेल्या नाशिवंत दुधाचं चीज बनवलं तर टिकतं आणि उलट जुनं तेवढं महाग विकता येतं ही इकनॅामी इकडे गिह्राइकाला समजत नाही. इथे कुणाला दही, चीज, खवा, पनीर,श्रीखंड खायचेच नाहीत.
केवळ पर्याय माहित असणे हा भाग नसून ते इकडे ग्राह्य नाहीत. श्रीखंडाचंच उदाहरण घ्या. खाणारे लोकही दोनचार सणाला आठवण काढतात,एरवी नाही.
पनीर : गायीच्या दुधाचच चांगलं होतं,म्हशीच्या नाही.
गायीला गाय पाडस झालेली हवी आहे पण आता बैल अजिबात नकोय - बैलगाडी, नांगर बाद झालेत. म्हशीचा रेडा कुणालाच नकोय.
निसर्गाचं जे शेती -जनावरं -शेती हे चक्र आहे त्यात खोडा घातलेला आहे. एकमेकास पुरक राहिले नाहीत.
( मोठ्या जनावरांचे मास खाणे हे जे परदेशात अतीसामान्य आहे तो मुद्दा घेतच नाही) डेअरी व्यवसाय फायदेशिर होण्यात हेसुध्दा आहे, दुधाचा इत्पादन खर्च कमी होऊ शकतो हे सांगायला इकनॅामिस्ट लागत नाही.
जे शाकाहारी नसते ते बाय
जे शाकाहारी नसते ते बाय डिफॉल्ट मांसाहारी कसे काय असते बरे? जनावरापासून दूध पिळून घेणे हे क्रूर खरेच, परंतु त्यात त्याचे मांस नसते म्हणून दूध मांसाहारी नाही. परंतु ते झाडपाल्यापासून न येता प्राण्यांपासून येत असल्याने शाकाहारीही नाही.
मुळात भारतीय "शाकाहार" (निरामिष आहार) हा शुद्ध शाकाहार + दुग्धाहार आहे.
रेनेट
+ जे इन्झाइम लागतं ते मासाहारी म्हणता येईल+
तत्वतः हे बरोबर . कारण पारंपरिक चीज तयार करताना त्यात रेनेट घालावे लागते जे प्राणिजन्य असते . ( ऍसिड चीज मध्ये नाही , आपल्या पनीर सारखं ते )
अर्थात दही बनणे ( किंवा सर्व फरमेंटेड फूड्स ) ही बनवायला जिवंत बॅक्टरीअल कल्चर्स लागतात . त्याला काय म्हणावे ?
जैन लोकांना ( तोंडाला किडेसुद्धा जाऊ नयेत म्हणून ते कायसस बांधणारी ) फरमेंटेड फूड्स चालतात का हो ?
++श्रीखंडाचंच उदाहरण घ्या. खाणारे लोकही दोनचार सणाला आठवण काढतात,++
हे असं आहे ? आता लोकं कधीपण कायपण खातात हो . सणासुदीपुरतं मर्यादित नाही राहिलं आता असं वाटतं .
अर्थात दही बनणे ( किंवा सर्व
अर्थात दही बनणे ( किंवा सर्व फरमेंटेड फूड्स ) ही बनवायला जिवंत बॅक्टरीअल कल्चर्स लागतात . त्याला काय म्हणावे ?
बॅक्टेरिया, यीस्ट वगैरे मिञमंडळी बोटॅनिकल किंगडमची सब्जेक्ट्स आहेत, असे ऐकून आहे.
जैन लोकांना ( तोंडाला किडेसुद्धा जाऊ नयेत म्हणून ते कायसस बांधणारी ) फरमेंटेड फूड्स चालतात का हो ?
अर्थात, जैन लोकांचे (किंवा फॉर्दॅटमॅटर कोठल्याही धर्माच्या१ लोकांचे) लॉजिक विचारायचे नाही. प्राणिजन्य दूध चालते, परंतु वनस्पतिजन्य बॅक्टेरिया चालत नाहीत, याला काय म्हणावे?
(अतिअवांतर: तोंडावर(सुद्धा) फडके बांधणाऱ्यांना कधी जंतांचा विकार होऊच शकत नसेल, नाही?)
..........
१ आमचा एक पारशी कलीग होता. भरपूर सिग्रेटी फुकायचा. मात्र, फुकून झाल्यावर जातीने वाकून जमिनीवर हाताने चुरडून थोटूक विझवत असे. कधीही बुटाखाली चिरडून विझवत नसे. का, तर म्हणे ती आग (पक्षी: त्याच्या धर्मात पवित्र) असते, सबब तिला पाय लावायचा नसतो. आता बोला.
>>>एकूणच दूध हे दूध म्हणून
>>>एकूणच दूध हे दूध म्हणून कमीत कमी आणि बायप्रॉडक्टस म्हणून जास्त फिरले पैजे.>>>
साडेतीन लिटर्स( किलो धरा) दुधाची भुकटी एक किलो झाली, त्याचा टिकाउपणा वट्ट तीनचार महिने झाला.
भुकटी करण्याचा खर्च वजा केला तर वहातुक खर्च अगदी तिप्पट नाही पण दुप्पट कमी होईलच.
"आता ही भुकटीच मिळणार, दूध नाहीच, शहरात राहता ना? घ्या हीच." अशी गळी उतरवयाची चायना कॅाम्युनिझम छाप सुधारणा.
गायींना एका यंत्रासारखं
गायींना एका यंत्रासारखं गोठ्यात डांबायचं, पुढे चारा येऊन पडतो तो गुमानं खायचा, मागे एक यंत्र दुध काढतं.
त्यांना लहानपणापासून आईमागे उड्या मारत स्वच्छंदी बागडायला बंदी. ठराविक इंजेक्शनं मारून घ्यायची, ठराविक वय झालं की सुरीखाली~~~~
तर असं तबेल्यातलं दूध सत्तर सेंट्स/ तर डोंगरात हिरवं गवत खात झय्राचं पाणी पीत गारा वारा घेत निसर्गात फिरणाय्रा गायीचं अस्सल दूध ( म्हणजे तसे सर्टिफाइडसुध्दा) १.७० युअरो - हे दोन्ही टेट्राप्याकस स्टॅारच्या एकाच शेल्फावर - ही फिल्मही पाहिली आहे. ( याची लिंक मी टाकल्याचं आठवतय.)
तर अशी दोन दुधं विकायची का? इतर भाज्यांची ओर्गॅनिक वगैरे प्रतवारी आहेच. ( गोदरेजने फुड्स डिविजन हर्शे'ला विकली.)
सोलापुर गावात कमीत कमी १००
सोलापुर गावात कमीत कमी १०० गोठे आहेत. भर कसबा गावात. दिवसातून दोनदा त्यांच्या म्हशी चरायला वर्दळीच्या रस्त्यावरुन जातात. एका कळपात कमीतकमी १५-२० म्हशी. ट्राफिक बोंबलते पण घरी दूध गवळ्याकडून आलेलेच लागते. गावात मोक्याच्या जागेवर चारा प्लांट आहेत. बिल्डरांचा डोळा आहे पण ते हलत नाहीत. कुठं चारणार म्हशी?
गावात कलेक्शन होते सोमवारी दिवसभर.(टेंपो, आपे, स्प्लेंडरांचा पेट्रोल डिझेल खर्च) मंगळवार आक्खा डेअरीत पाशचरायझेशन आणि एकत्र करण्यात (हेला लै मस्त नाव आहे. होमिजिनाइज्ड) जातो. दिवसभर चिलर चालू.(लाईट, कामगार, केमिकल) पीएच बॅलन्सला युरीया. बुधवारी जाते मुख्य संकलन केंद्रात.(इथे टॅकर) तेथे परत एकत्रीकरण करुन प्रोसेस. मग पॅकिंगला दोन दिवस. आला शुक्रवार. डेट कुठली टाकतात पिशवीवर कुणास ठाऊक. शुक्रवारी पिशव्या बाजारात सर्क्युलेट(इथे क्रेटातला बर्फ आणि टेंपो) होउन बारक्या फ्रीजात. तिथे पडते १-२ दिवस. तेथून येते सोमवारी मंगळवारी किचनात. लगेच तापवायला ० टू १०० करायला जाळायचा ग्यास. थोडे घेऊन परत रवानगी फ्रीजात. परत जाते ४ डीग्रीला. कुठले ताजे अन नीरसे दूध घेऊन बसलाव.
दोनच पर्याय ठेवा. एकतर मोठ्या शहरात पॅकबंद नायतर पावडर. मध्यम शहरात ५० कीमीच्या आतले. तिथे टाका दूध संघ आन करा पावडरी नाहीतर खवा श्रीखंड. लहान गावात लोकल दूध. एक्स्ट्रा ते सगळे बायप्रॉडक्ट करा. पाहिजे तेथे दूध पोहोचावायची फ्लड कन्सेप्टच बाद केली पाहिजे.
एकूण दुधाची आणि दुग्धजन्य
एकूण दुधाची आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी कमी झाली अथवा त्यामध्मे सातत्य नाही.
१) वर सांगितल्याप्रमाणे श्रीखंडाला ठराविक सणाला मागणी असते. जिथे दुध उत्पादक आहेत ते न खपलेले दूध एका खरेदीदाराला रात्री दहा वाजता ' घालतात' त्याचा तो फारच कमी भाव देतो पण आणलेले सगळे घेतो. उत्पादक त्या दिवशीचे कॅन रिकामे करून मोकळा होतो. दसरा, पाडवा सण येण्याअगोदर दीड महिना या सर्व मिक्स्चर दुधाचा चक्का करून फ्रिजरमध्ये टाकतात. सणाअगोदर ते डबे रेल्वे/एसटीने दुसय्रा शहरात पोहोचतात. त्याचे श्रीखंड स्थानिक विक्रेता देतो.
२) पेठचा किल्ला/ हरिश्चंद्रगड इत्यादी डोंगरावर म्हशी फुकटचा चारा / पाणी खाऊन जोपासतात. त्यांचे दुध चांगले घट्ट असते. रोजरोज कोण चारपाचशे मिटरस दूध पोहोचवणार? त्याचा खवा करून टाकतात. वरती हवा थंडच असते, खवा टिकतो. तो नंतर कर्जत/जुन्नरला जातो जमा झाला की.
३) रोजच्या जेवणात दुधा ताकावरच भर असणारी कुटुंबं फारच कमी असतात.
४) दूध उत्पादकास रोजचे दूध कोणत्यातरी मार्केटला / डिस्ट्रीब्यूशनला देण्याचा करार करून मोकळे व्हावे लागते. दहा/शंभर/हजार लि रोज उचलणारा डिस्ट्रिब्युटर ठरवेल तीच किंमत कारण तो दादागिरीत असतो. मग भाव पडतो.
५) कफ प्रकृतीवाल्यांना दूध ताक सोसवत नाही, पित्तवाले खुश असतात. किंवा A +ve रक्तगट वाल्यांचं दुधाशी जमत नाही.
६) एकूण गिह्राइकांच्या लहरीपणामुळे भाव पडतो.
७) दुध आणि पेट्रोलचा लिटर/ग्यालनचा भाव तुलना करा गेल्या दहा वर्षांत भारत/इतर देश. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी.
>>कारण पारंपरिक चीज तयार
>>कारण पारंपरिक चीज तयार करताना त्यात रेनेट घालावे लागते जे प्राणिजन्य असते .
दूध तेवढे सोयाचे वापरतात काय?>>
- नबा, थोडक्यात सांगितलं हो.
उद्या जर का एन्डोस्कोपी का काय म्हणतात ते ( नॅान डिस्ट्रक्टिव, वासराला न मारताच) वापरून त्याच्या आतड्यातलं रेनेट इन्झाइम इवलंसं काढता आलं तर चीज शाकाहारी करता येईल. दूध जसं प्राणिजन्य परंतू हत्त्या न करता घेतो तसे.
वर कुणीतरी बैल/रेडा नको असे
वर कुणीतरी बैल/रेडा नको असे म्हटले आहे. त्या अनुषंगाने रेडकू झाले तर ताक पाजून मारतात वगैरे गोष्टी ऐकल्या आहेत. पण ॲडव्हान्सड दूधसंघांकडे गर्भजलचिकित्सा करण्याची सोय असते. त्यामुळे रेडकू/गोऱ्हा जन्माला घालून मग मारून टाकण्याचे "क्रौर्य" दाखवावे लागत नाही.
येऊद्या अजून.
येऊद्या अजून.
पहिला भाग ठीकठाकच जमला आहे.
डिसक्लेमर: मी अमूल सप्लाय चेनमधला तज्ञ वगैरे नाही. अमूलमध्ये आयबीएमने एस ए पी इम्प्लिमेंटेशन केले तेव्हा ॲडव्हान्स्ड प्लॅनिंग & ऑप्टिमायझेशन मध्ये मी कन्सल्टंट म्हणून काम केले. त्यामुळे त्यांच्या बिझिनेस मॉडेलची थोडीफार जाण आली.
बेसिकली अमूलचे यश हे काही प्रमाणात सरकारी पुश+मदत अणि "उत्पादन साधनांची मालकी शेतकऱ्यांकडे" यामुळे आहे.