Skip to main content

आजचे दिनवैशिष्टय - ४

व्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी असा पहिला धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.
---

मुखपृष्ठावरचे "तुमुल कोलाहल कलह" गाणे ऐकले. नेटवर शोधले असता, "जयशंकर प्रसाद " या कवींनी ही कविता "श्रद्धा" नावाच्या प्रकरणात (सर्ग) लिहीली आहे अशी माहीती मिळाली.

अजुन एक क्युरीअस गोष्ट मला ही वाटली की तुमुल शब्द हा Tumult या शब्दाशी व अर्थाशी जवळ असावा

तुमुल कोलाहल कलह में, मैं हृदय की बात रे मन |
विफल होकर नित्य चंचल,
खोजती जब नींद के पल,
चेतना थक सी रही तब, मैं मलय की बात रे मन |
चिर विषाद विलीन मन की,
इस व्यथा के तिमिर वन की,
मैं उषा-सी ज्योति रेखा, कुसुम विकसित प्रात रे मन |
जहां मरू-ज्वाला धधकती,
चातकी कन को तरसती,
उन्हीं जीवन घाटियों की, मैं सरस बरसात रे मन |
पवन के प्राचीर में रुक,
जला जीवन जी रहा झुक,
इस झुलसते विश्व दिन की, मैं कुसुम ऋतु रात रे मन |
चिर निराशा नीरधर से,
प्रतिच्छायित अश्रु-सर से,
मधुप मुख मकरंद मुकुलित, मैं सजल जलजात रे मन |
-जयशंकर प्रसाद

अरविंद कोल्हटकर Wed, 06/08/2014 - 02:27

अजुन एक क्युरीअस गोष्ट मला ही वाटली की तुमुल शब्द हा Tumult या शब्दाशी व अर्थाशी जवळ असावा.>

हे शक्य आहे, जरी आपटे आणि मोनिअर-विल्यम्स दोघेहि असा काही संबंध स्पषटपणे दाखवीत नाहीत. दोघांनीहि ह्याच संदर्भामध्ये 'tumultuous' असा 'तुमुल'चा अर्थहि दाखविला आहे.

मराठी 'तुंबळ' हा 'तुमुल'चाच अपभ्रंश दिसतो.

............सा… Thu, 14/08/2014 - 21:13

वा! माझे आवडते लेखक, सर्वात आवडते लेखक जयवंत दळवी यांचा आज जन्मदिवस :) त्यांच्या महानंदा कादंबरीवरील आधारीत चित्रपटातील एक अस्वस्थ करणारा क्षण टाकते आहे. पूर्वी अन्यत्र प्रकाशित.
________________________________________

आर्ट इज नॉट आर्ट टिल इट डिस्टर्ब्स यु.

हे वाक्य म्हणून वाचायला बरे आहे. पण खरच अशी कला जेव्हा सामोरी येते, तेव्हा भयंकर वाटते.

खूप वर्षांपूर्वी, खरं तर लहानपणी "महानंदा" हा चित्रपट पाहीला होता. दूरदर्शनवर लागला होता. अर्थातच सेन्सॉर केलेला होता. आज परत आपलीमराठी वर पाहीला. व्यक्तीचित्रण अतिशय प्रभावी आहे. जयवंत दळवींसारख्या सिद्धहस्त लेखकाची कथा असल्याने चित्रपट उत्तम असणार यात वादच नव्हता. हा चित्रपट "बेंचमार्क" चित्रपट म्हणून नावाजलेला असल्याने आता कळत्या वयात पहायची उत्सुकता होतीच.
गोव्याच्या पार्श्वभूमीवर एका भावीणीची मुलगी व एक मराठीचा प्राध्यापक यांच्यामध्ये फुललेली प्रेमकथा आहे. जयवंत दळवी लिखीत असल्याने एक तरी वेडसर पात्र असणे जरुरीचे आहे. पण या कथेत २ वेडी पात्रे आहेत.
हे स्फुट चित्रपटाचे परीक्षण नाही तर एका प्रसंगाबद्दलचे मनोगत आहे.
सुदैवाने आतापर्यंत कधीच इतका अस्वस्थ करणारा प्रसंग कोणत्याही चित्रपटात मी पाहीला नाही. हा जो सीन (प्रसंग) मी लिहीते आहे तोदेखील इतका सखोल अस्वस्थ करणारा होता की मी तो पूर्ण पाहूच शकले नाही. गावात एक वेडसर भावीण आहे, जी लक्तरे ल्यालेल्या अवस्थेत, मांड्या कराकरा खाजवत फिरते. ती सदैव अन्न-पाण्याकरता भुकेली, वखवखलेली अशी चित्रीत केलेली आहे. याच गावात एक पोस्ट्मास्तर आहे जो सर्वांची खाजगी पत्रे चोरुन वाचतो.
प्रसंग असा होता की ही वेडसर मुलगी रस्त्यावर एका रिकाम्या खोलीच्या कडेला काहीबाही खात बसलेली आहे, मध्येच हसते आहे, कराकरा अंग खाजवते आहे. आणि पोस्टमास्तर तिचे अन्न हिसकावून घेऊन, तिच्या तोंडापाशी नेत पण तिला न देता तिला त्या रिकाम्या खोलीकडे भुलवत नेतो. कधी गडव्यातील पाण्याची धार तिच्या समोर ओतत, पण पाणी न देत तिला "ये ये" असे म्हणत तिला त्या खोलीत घेऊन जातो. आणि एखाद्या पशुसारखी ही मुलगी अन्न-पाण्याला भुलून, त्याचा कावा न ओळखता त्याच्या मागे मागे जाते.
मला हा प्रसंग बघवला नाही. खूप म्हणजे प्रचंड अस्वस्थता दाटून आली. भूक-लैंगिकता- वेडसरपणा या तीनही प्रभावी (पोटंट) गोष्टींतून साकार झालेला, पोस्टमास्तरच्या विकृतीचे दर्शन घडवणारा तो प्रसंग मनावर अतिशय ओरखडे उठवून गेला.
जबरदस्त डिस्टरबींग सीन आहे. जयवंत दळवी लिखीत हा प्रसंग दिग्दर्शकाने फार ताकदीने चित्रित केलेला आहे एवढेच म्हणेन.
खरं तर चांगल्या गोष्टी नेहमी दुसर्‍यांबरोबर शेअर कराव्या पण आज ही अस्वस्थता शेअर करावीशी वाटली म्हणून हे स्फुट्/मुक्तक.
तो सीन पाहील्यावर अगदी १००% असे वाटून गेले की जगात देव असावा आणि तो न्यायी असावा आणि त्या पोस्टमास्तरसारख्या हीडीस नरधमांन शिक्षा व्हावी. खरं तर काय काय वाटले हे शब्दात न मांडता गेणारा अनुभव चित्रपटातील तो प्रसंग देऊन गेला. दाटून आलेल्या अस्वस्थेला बद्ध करणारे शब्दच खरोखर नाहीत. जयवंत दळवींचे सामर्थ्य पुन्हा माझ्या साठी निर्विवाद अधोरेखित झाले.

सानिया Fri, 15/08/2014 - 19:51

आज यांचे काही मुखपृष्ठावर ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती. असो.
'बैजू-बावरा', 'झनक झनक पायल बाजे' या चित्रपटांसाठी यांनी गायलेली गाणी प्रसिद्धच आहेत. मला हे चित्रपटात स्थान न मिळालेलं गाणंही आवडतं.
https://www.youtube.com/watch?v=2ptB2OSywyg

चिंतातुर जंतू Fri, 15/08/2014 - 21:14

In reply to by सानिया

>> आज यांचे काही मुखपृष्ठावर ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती.

धन्यवाद! हेच करायला ऑनलाइन आलो होतो.

राजन बापट Sat, 16/08/2014 - 18:53

In reply to by सानिया

कवितचं शीर्षक : "अमीर खां".

तुम खोजते रहे रहने के लिए एक घर
गाने के लिए एक घराना
तुम खोजते रहे दोस्तों की बैठकों में
किसी स्त्री के चेहरे पर
अपने ही जैसे लापरवाह शिष्यों की आवाज में
विकल करती हुई उन बंदिशों में
जिन्हें तुम एक निराकार शांति के साथ प्रस्तुत करते थे
आरोह-अवरोह के आकाश –पाताल के बीच
संगीत के मेरूखंड में तुम कहीं एक कोना ढूंढ़ते रहे
तुम बनाते रहे एक असंभव घर
सरगमों और छूट की तानों में
खिड़कियों दरवाजों के लिए खाली जगहें छोड़ते हुए
इतनी दूर से तुम सहज ही सम पर लौट आते थे
जैसे कोई लौटता है अपने घर
जहां बहुत दूर की चीजें भी बहुत पास रखी हुई होती हैं।

तुम गाते थे एक चट्टान की सिहरन
पेड़ों का रूदन, बादलों की हंसी
वियोग की तरह फैली हुई रात में उड़ता अकेलापन
तुम बार-बार मनाते रहे किसी रूठे हुए प्रेम को
देह को आत्मा और आत्मा को
देह की पुकार से भरते हुए
लेकिन कला में हम जितना बनाते-बनाते जाते हैं
उतना वह ढहता-ढहता जाता है
ऊपर उठते हुए ऊंचाइयां और ऊंची हो उठती हैं
नीचे उतरते हुए गहराइयां और गहरी

संगीत तुम्हारा एकमात्र काम था
हालांकि तुम्हें दे दिए गए थे दूसरे कई काम
जो संगीत के साथ थे बेसुर-बेताल
तुम्हें हिसाब रखना नहीं आया पैसे पता नहीं कहां खोते रहे
महान अमूर्तनों का समय खत्म हुआ आया व्यापार का युग
पाश् र्व में सुनाई देते रहे विवादी स्वर
समझ में न आने वाला गायन आवाज की सीमाएं
हिंदू संगीत मुस्लिम संगीत
घर घराना परंपरा कहीं की ईंट कहीं रोड़ा
लेकिन तुम गाते रहे बागेश्री पूरिया चंद्रकौंस
जगसम्मोहिनी अहीर भैरव कोमल ऋषभ आसावरी
और उत्तर दक्षिण हिंदी फारसी ईश्वर अल्लाह सबको एक करती
ज्ञान और गुण मांगती हंसध्वनि
इत्तिहादे मियाने मनो तो नेस्त मियाने मनो तो ...

कठिन था घर और घराने का बनना
कठिन था संगीत का गुरुत्व थामे रहना
अंत में तुम जीवित रहे अपनी उदारता औऱ विनम्रता के किस्सों में
घरेलू महफिलों और रेडियो स्टेशनों में दर्ज धुंधली पड़ती आवाज में
तुम जीवित रहे उन संस्मरणों में
कि किसने तुम्हें आखिरी बार कहां कब क्या गाते सुना था
और हर बार तुम्हें एक परीक्षा से गुजरना पड़ा
तुम्हारा जीवन संघर्ष अपने ही संगीत से था
अपनी ही आवाज से
और १९७४ में जब कलकत्ते के पास
एक कार दुर्घटना में तुम्हारी आकस्मिक मृत्यु हुई
तुम एक दोस्त के विवाह में अपना आखिरी राग सुनाकर
लौट रहे थे अपने असंभव घर और घराने की ओर।

- मंगलेश डबराल

............सा… Fri, 15/08/2014 - 20:35

१९६३: स्कॉटलंडमधला शेवटचा मृत्युदंड - उत्तम निर्णय वाटतो. कैद्यांना आमच्या पैशानी आम्ही का पोसायचं वगैरे मुद्दे निघू शकतात अन तरीही मृत्युदंड न देण्याचा निर्णय उत्तम वाटतो - अगदी चाइल्ड मोलेस्टर्स, रेपिस्ट अन खून्यांकरताही!

अमुक Sun, 24/08/2014 - 09:16

२३ ऑगस्ट १९६६ : लूनर ऑर्बिटर १ यातून सर्वप्रथम चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचे छायाचित्र घेतले गेले.
..................हे ते चित्र -


---
यानंतर २४ डिसेंबर १९६८ रोजी अपोलो-८ मधून टिपलेला पृथ्व्योदय -

अपोलो-८ हे यान प्रामुख्याने, चंद्रावर कुठली जागा (जुलै १९६९, 'नील आर्मस्ट्रॉन्ग'वाले) यान उतरवण्यास साजेशी आहे, याचा अभ्यास करण्यासाठी पाठविले गेले होते. चंद्राच्या पृष्ठभागाची चित्रे टिपताना अचानक पृथ्वी दिसणे आणि ते दृश्य टिपणे हा एक योगायोग होता. त्यापूर्वी पृथ्वी 'उगवत' असताना यानाची दिशा योग्य नसल्याने तसे चित्र टिपणे शक्य झाले नव्हते. २४ डिसेंबर रोजीचा तो योगायोग कसा साकार झाला त्या संपूर्ण घटनाक्रमाची जुळणी आता अद्ययावत माहितीमुळे शक्य झाली आहे. ४५ वर्षांपूर्वी ते यान नक्की कुठल्या कोनात होते, कुठल्या जागी होते, अंतराळवीरांना पृथ्वी यानातून कशी दिसली असेल हे सर्व आता एका चित्रफितीत उपलब्ध झाले आहे. अतिशय उत्कंठावर्धक अशी फीत (७ मि.) आहे; अवश्य पाहावी.

अरविंद कोल्हटकर Sat, 13/09/2014 - 02:11

आजच्या (१२ सप्टेंबर) दिनवैशिष्टयामध्ये 'ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाचे संस्थापक वि. ल. भावे (१९२६)' अशी नोंद पुण्यस्मरण सदरात आहे. हे त्यांचे कार्य महत्त्वाचे आहेच पण वि.ल.भावे सार्वत्रिक पातळीवर अधिक माहीत आहेत ते 'महाराष्ट्र सारस्वता'चे निर्माते म्हणून. मराठी भाषेच्या उगमापासून मराठी साहित्याचा लेखक-कवींचा आढावा घ्एणारे हे पुस्तक एक उत्तम संदर्भग्रंथ आहे. शं.गो.तुळपुळे ह्यांनी ह्याला एक विस्तृत पुरवणीही नंतर लिहिली आहे. पुरवणीसह हा ग्रंथ संग्राह्य आहे.

महानुभाव साहित्यावर प्रकाश टाकणारे त्यांचे कार्यहि असेच सर्वज्ञात आहे.

चिंतातुर जंतू Sat, 13/09/2014 - 10:00

In reply to by अरविंद कोल्हटकर

सूचनेबद्दल आभार. पश्चातदुरुस्ती केली आहे.

अरविंद कोल्हटकर Wed, 24/09/2014 - 06:13

आज 'स्वातंत्र्यदिन : सौदी अरेबिया उभयलिंगता (बायसेक्शुअ‍ॅलिटी) दिन' असे दिनवैशिष्ट्यात वाचनात आले आणि क्षणभर डोळ्यावर विश्वास बसेना! नीट पाहिल्यावर कळले की ते

स्वातंत्र्यदिन : सौदी अरेबिया
उभयलिंगता (बायसेक्शुअ‍ॅलिटी) दिन.

असे लिहिले आहे. सौदी अरेबियापुढे पूर्णविराम न पडल्याने क्षणभर तो भास झाला.

चिंतातुर जंतू Wed, 24/09/2014 - 11:12

In reply to by मन

>> भारत-पाक १९६५ युद्ध.... २३ सप्टेंबरास संपले

विकीपीडिआनुसार ते २२ तारखेला संपलं. त्यामुळे २२च्या दिनवैशिष्ट्यात ते येऊन गेलं.

वामा१००-वाचनमा… Fri, 26/09/2014 - 21:33

चित्र सुंदर आहे, उत्कट आहे. एका बाजूला नैराश्य अन दुसरीकडे आशावाद अशी स्पष्ट विभागणी मला वाटली. ड्युअ‍ॅलिटी
काही लोक हातवार्‍यांनी अन रुमाल उडवत अन्य जहाजांना बोलावत आहेत तर एकीकडे अतिशय विमनस्कावस्थेतील लोक व प्रेतांचा खच.

अरविंद कोल्हटकर Sat, 27/09/2014 - 17:13

काल २६ सप्टेंबरच्या पुण्यतिथींमध्ये 'सदाशिवशास्त्री कान्हेरे १९५२' अशी नोंद होती.त्यांची पुढील माहिती सिद्धेश्वरशास्त्री चित्राव ह्यांच्या 'अर्वाचीन चरित्रकोशा'मध्ये पुढील माहिती आहे.

ह्यांनी महाराष्टामध्ये गीतेवर प्रवचने करून चांगली ख्याति मिळविली होती. १९१५ साली ते इंग्लंडात राहण्यास गेले आणि १९४५ पर्यंत तेथेचे होते. तेथे लंडन विद्यापीठामध्ये मराठी आणि संस्कृतचे प्राध्यापक असे काम त्यांनी केले. त्यांनी एका इंग्लिश बाईशी विवाह केला आणि त्यांना एक मुलगीहि होती. ती २० वर्षांची झाल्यावर तिच्या विवाहाची सोय लावून ते हिंदुस्थानात परतले आणि प्रायश्चित्त घेऊन पुनः हिंदुधर्मात आले.वाराणसीचे प्रसिद्ध विद्वान राजेश्वरशास्त्री द्रविड ह्यांनी त्यांना 'जाणूनबुजून दीर्घकाल यवनीसंसर्ग करणार्‍याला प्रायश्चित्त नाही' असे सुनावले होते.

अनुप ढेरे Mon, 29/09/2014 - 15:26

१८९६ : लो. टिळकांनी दुष्काळ निवारणासंदर्भात केसरीमध्ये अग्रलेख लिहिला.

या एका अग्रलेखाला दिनविशेषामध्ये जागा मिळाली आहे. या अग्रलेखात काय विशेष होतं?
म्हणजे टिळकांनी केसरीमध्ये शेकडो अग्रलेख लिहिले असावेत. याची दखल घेण्याच काही वेगळ कारण आहे का?

चिंतातुर जंतू Mon, 29/09/2014 - 17:08

In reply to by अनुप ढेरे

>> टिळकांनी केसरीमध्ये शेकडो अग्रलेख लिहिले असावेत. याची दखल घेण्याच काही वेगळ कारण आहे का?

हा दुष्काळ खूप मोठा होता. किंबहुना, १८७६पासूनच दुष्काळाची तीव्रता जाणवत होती. 'Late Victorian Holocausts' असंही त्यांना संबोधलं जातं. एकीकडे अन्न निर्यात होत असताना दुष्काळी परिस्थिती निर्माण होणं आणि इतर कारणांमुळे हा दुष्काळ मानवनिर्मित (पक्षी : ब्रिटिश राज्यकर्त्यांची जबाबदारी) होता असंदेखील मानलं जातं. ह्या काळ्या इतिहासातल्या ब्रिटिशविरोधाचा आणि स्वातंत्र्याच्या मागणीचा संदर्भ त्याला आहे.

अरविंद कोल्हटकर Mon, 29/09/2014 - 19:14

१८९६ साली टिळकांकडून सरकारच्या दुष्काळविषयक कामगिरीविषयी अनेक वेळा केसरीमध्ये लिखाण झाले आहे. १८९६ मध्ये प्रथम अतिवृष्टि होऊन ओला दुष्काळ पडला आणि तदनंतर हस्ताचे वगैरे पाऊस अजिबात न झाल्याने रब्बीचे पीकहि हातून गेले. त्यापूर्वी १८७६ मध्येहि असाच भीषण दुष्काळ पडला होता आणि त्या निमित्ताने सरकारने 'फॅमिन कोड' तयार केले होते. १८९६ मध्ये त्या कोडानुसार कार्यवाही करण्यात दिरंगाई, कोडाची जनतेस पुरेशी माहिती मिळून न देणे जेणेकरून जनता सरकारला नाकर्तेपणाबद्दल धारेवर धरू शकेल, सार्वजनिक सभेने, जी ह्या वेळी टिळकांच्या ताब्यामध्ये होती, पुढे केलेला सहकार्याचा हात झिडकारून टाकणे अशा अनेक मुद्द्यांवरून टिळकांनी सरकारवर अनेक लेखांमधून टीका केली होती. पुढच्याच वर्षी १८९७ मध्ये रँडचा खून आणि त्यामध्ये पुण्यातील ब्राह्मणांचा आणि टिळकांचा हात आहे अशी सरकारची शंका, शिवजयंतीसंबंधाने केसरीमध्ये आलेले लेख ह्या सर्वांमध्ये सरकारला राजद्रोहाचा वास येऊन टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला. सरकारची टिळकांवर अशी वक्रदृष्टि वळण्याचा प्रारंभ १८९६तील दुष्काळविषयक लेखनाशी होता अशा अर्थाचे विवेचन केळकरलिखित टिळकचरित्र भाग १ येथे मिळते.

अरविंद कोल्हटकर Fri, 03/10/2014 - 23:07

'आजचे दिनवैशिष्टय' मध्ये आज वरील नोंद पाहिली.

ह्या संदर्भामध्ये 'लंडन गझेट' च्या सोमवार फेब्रुअरी १७ - गुरुवार फेब्रुअरी २०, १६७२ ह्या दिवशीच्या आवृत्तीमधील खालील उल्लेख मनोरंजक आहे. मजकुरामधील जुन्या प्रकारची इंग्रजी अक्षरे, उदा f सारखा दिसणारा s, लक्षणीय आहेत.

सुरतेमधील इंग्लिश वखारीच्या अध्यक्षाने पाठवलेल्या मजकुराचा हा सारांश आहे आणि तो पाठविणारा बातमीदार सध्याच्या सीरियामधील अलेप्पो येथून बातमी लिहीत आहे. १६७०चा सुरतेवरील हल्ला ताजा असल्याने अशा हल्ल्यांच्या शक्यतेमुळे व्यापारी वर्ग मुंबईकडे जाणे पसंत करीत आहेत असा तो मजकूर आहे.

(अवान्तर - अन्य एका कारणासाठीही वरील उतारा मनोरंजक आहे. पोप ग्रेगरीचे १५८२ सालापासून सुधारित कॅलेंडर ब्रिटनमध्ये मान्य व्हायला सप्टेंबर १७५२ पर्यंत वेळ लागला आणि तोपर्यंत तेथील तारखा ग्रेगरीपूर्व कॅलेंडरच्याच चालू होत्या. त्यानुसार १७ फेब्रुअरी १६७२ ह्या दिवशी सोमवार आहे. ग्रेगरी कॅलेंडरप्रमाणे १७ फेब्रुअरी १६७२ ह्या दिवशी बुधवार पडतो.

१७५२ मध्ये ब्रिटनमध्ये ग्रेगरीचे कॅलेंडर मान्य होईपर्यंत ते कॅलेंडर ब्रिटनच्या कॅलेंडरच्या ११ दिवस पुढे गेले होते. ३ सप्टेंबर १७५२ ते १३ सप्टेंबर १७५२ हे ११ दिवस ब्रिटनच्या कॅलेंडरमधून पूर्णपणे गाळून दोन्ही कॅलेंडरे बरोबर आणण्यात आली. १७० वर्षांमध्ये हा ११ दिवसांचा फरक पडला. १६७२ पर्यंतच्या ९० वर्षांत हाच फरक ५.८ किंवा ५ पूर्ण दिवस इतका होता. ह्याच वेळी दुरुस्ती केली असती तर ब्रिटनच्या कॅलेंडरामध्ये १७ फेब्रुअरीनंतर सोमवारनंतर ५ दिवस पूर्ण वगळून २३ फेब्रुअरीस मंगळवार पडला. ग्रेगरीमधील २४ फेब्रुअरीला बुधवार ह्याच्याशी हे जुळते.

ह्या बातमीपत्रामध्ये अजूनहि एक मनोरंजक बाब आहे. बातमीपत्र अलेप्पोहून १९ नोवेंबर १६७२ ला रवाना झाले असे स्पष्ट लिहिले आहे. तर मग ते १७ फेब्रुअरी १६७२ च्या गझेटमध्ये कसे छापले गेले? हा बहुतेक मुद्राराक्षसाचा अथवा 'उसंडु*'चा परिणाम असावा आणि बातमीपत्राची खरी तारीख १९ नोवेंबर १६७१ असावी. १६७० च्या घडामोडी अलेप्पोपर्यंत पोहोचायला १ वर्ष पुरे आहे, २ ची आवश्यकता नाही.

* उसंडु ऊर्फ 'उपसंपादकाच्या डुलक्या' असे एक मनोरंजक सदर जुन्या 'अमृत' डायजेस्टमध्ये येत असे त्याची आठवण झाली.)

धन्यवाद. मजकूर विशेष आवडला. काही ठिकाणी 'एफ' आणि काही ठिकानी 'एस' असे दोन वेगळे वापर करण्याचे कोणते व्याकरणीय कारण आहे काय? शिवाय सुरवातीचे अक्षर कॅपिटल करणे पण इंटरेस्टींग वाटते आहे. अवांतरही मस्त!

"... who acquaints us with the daily fears they have there, from Sevagee (?) the Rebel, who having beaten the Moguls in several Battles, remains almost master of that Countrey.." हे मात्र खासच!

अरविंद कोल्हटकर Mon, 06/10/2014 - 05:33

In reply to by Nile

वरील प्रश्नाचे उत्तर येथे पहा.

हा 'एस' कॅलक्युलसमध्ये आजहि दिसतो. इंटीग्रलची खूण '∫' ही मूळचा 'एस'च आहे कारण इंटीगेशनच्या मुळाशी बेरजेची (summation) संकल्पना असते.

लॉरी टांगटूंगकर Sat, 11/10/2014 - 13:00

In reply to by अरविंद कोल्हटकर

अजून थोडं आठवेल तसं खरडतो,
आम्हाला गणित शिकवायला साईसुब्रमण्यमसर होते ते गणितातल्या अशा बर्‍याच गोष्टी सांगायचे. इंटीग्रलची खेचलेल्या एस सारखी खूण सर्वप्रथम सोळाव्या शतकात लेब्नीझने वापरली. डीफ्रन्शियल साठी dy/dz ही सुद्धा त्याचीच देणगी. न्यूटन डीफ्रन्शियलसाठी डॉट किंवा किंवा X' असे नोटेशन वापरायचा.
कॅल्यूलस मधले हे संशोधन न्यूटन आणि लेब्नीझने जवळपास एकाच वेळेला स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले. ब्रिटीशांनी न्यूटनचे नोटेशन वापरले आणि इतरत्र युरोपात (जर्मनीमध्ये वगैरे) लेब्नीझचे नोटेशन वापरले गेले,आणि आजही वापरले जाते. असे म्हणतात की न्यूटनचे मुळ संशोधन दहा वर्षे आधीच पूर्ण होऊन अप्रकशित होते (मधल्याकाळात त्याचे वेगळ्या विषयांवर काम चालले होते). लेब्नीझचे त्याच विषयावर संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर रॉयल सोसायटी आणि न्यूटनने लै पंगे घेतले. पंगे संपलेच नाहीत रॉयल सोसायटी आणि बर्लीन अ‍ॅकॅडमी दोन्हीकडून लेब्नीझ दुर्लक्षीत राहीला.

वामा१००-वाचनमा… Sun, 05/10/2014 - 16:37

आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोध दिन

कशाबद्दल विरोध? समाजाची गरज आहे ती. एखादी व्यंग असलेली अतिशय कुरुप व्यक्ती (स्त्री अथवा पुरुष), धडधाकट पण काही एक फँटसी मनात घेऊन जणारी व्यक्ती, लग्नाचे बंधन नको असलेली किंवा अन्य कुठेच स्ट्रिंग अ‍ॅटॅचड नको असलेली व्यक्ती, अन्यही प्रकार असतील, यांना विकल्प काय? - घुसमट??

अन कशावरुन लोक (स्त्री-पुरुष) स्वेच्छेने वेश्या होत नाहीत?

विरोधच करायचा तर ह्युमन ट्राफिकींग ला करा या व्यवसायाला कशाला?

मन Sun, 05/10/2014 - 16:44

In reply to by वामा१००-वाचनमा…

"आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोध दिन" ह्या मागे अध्याह्रुत आशय तोच असावा.
(म्हणजे टक्केवारीनं पाहिलं तर प्रचंड मोठ्या संख्येने ह्या व्यवसायात ओढली गेलेली व्यक्ती ही अनिच्छेनेच आलेली दिसते.(कुणीतरी पळवून्/भुलवून आणले वगैरे) किंवा
खुद्द ती व्यक्ती जन्मलीच अशा वस्तीमध्ये असते.)
.
.
"परस्परसंमती " वगैरे ऐकायला छान वाटतं. प्रत्यक्षात टक्केवारीनं किती व्यक्तींनी स्वेच्छेनं व्यवसाय स्वीकारला आहे ? (अ‍ॅमस्टरडॅम, लास वेगास वगैरे "सिन सिटीज् " मध्ये स्वेच्छा वगैरे ऐकून आहे. उर्वरित जगाचे काय ?)
.
.

वामा१००-वाचनमा… Sun, 05/10/2014 - 16:46

In reply to by मन

म्हणूनच "ह्युमन ट्रॅफिकींह" या हीन प्रकारास विरोध हवा. जे स्वेच्छेने स्वीकारतात त्यांच्या विकल्पावर घाला कशाला? हे म्हणजे दुखणे कुठेतरी अन उपचार कुठेतरी.

अरविंद कोल्हटकर Sun, 05/10/2014 - 17:55

In reply to by मन

ह्या दिवसाचे इंग्लिशमधील नाव International Day of No Prostitution - IDNP- असे आहे. तो कोणी सुरू केला हे नीट कळत नाही पण ह्या विषयाशी संबंधित अनेक चळवळींचे हे स्वेच्छाधारित काम दिसते. त्याच्यामागे यूनो, युनेस्को, WHO अशी काही आन्तरराष्ट्रीय संस्था दिसत नाही. ह्या दिवसाला International Day of No Prostitution हेच नाव क दिले हेहि नीट कळत नाही.

वामा१००-वाचनमा… Sat, 11/10/2014 - 01:08

अभिनेता रिचर्ड बर्टन याचा जन्मदिवस विकीवर १० नोव्हेंबर लिहीला आहे. हे लक्षात रहायचं कारण त्याची सूर्य रास आहे वृश्चिक अन लिझ टेलरचे आहे मीन. वृश्चिक-मीन रोमान्स टेरिफीक असतो अशा प्रकारचा लेख आदि वाचलेला आहे.

सांगायचा मुद्दा - रिचर्ड बर्टनचा जन्मदिवस चूकीचा वाटतो आहे.

मेघना भुस्कुटे Sat, 11/10/2014 - 18:57

प्रमाणलेखनात शिरते आहे, माफ करा. गुरुदत्त यांचं नाव मुद्दामहून (मूळ लेखनाला, योग्य लेखनाला अनुसरून) गुरु दत्त असं लिहिलं आहे हे गृहित धरते. पण मग 'र'ला दिलेला उकार दीर्घ नको का?

मेघना भुस्कुटे Sun, 12/10/2014 - 07:39

In reply to by बॅटमॅन

+१

होय, मान्य आहे. 'गृहीत' आणि 'गृहीतक' या दोन शब्दांच्या बाबतीत माझा बरेचदा गोंधळ होतो. वारंवार कोश तपासूनही होतो. आता तरी ते नीट लक्षात राहील, आभार!

-१

पण त्याचा मी सुचवलेल्या गोष्टीशी काय संबंध आहे? 'शुद्धलेखन येत नाही, तर लिहिता कशाला, फडतूस साले' अशा सुरातही मी काही म्हणत नाहीये. 'अमुक अमुक असं नको का?' असं विचारतेय फक्त. तरी 'आधी स्वतःच्या पायाखाली बघा' असा प्रतिसाद का बरं द्यावा?

धनंजय Sun, 12/10/2014 - 06:17

In reply to by अरविंद कोल्हटकर

तत्सम नव्हे तर तद्भव शब्द अधिक प्रचलित आहे.

ह्+व्यंजन -> व्यंजन + ह्

हा वर्णविपर्याय प्राकृतांत बहुतेक कित्येक शतकांपूर्वी झाला.

मेघना भुस्कुटे Sun, 12/10/2014 - 07:36

In reply to by धनंजय

धन्यवाद.

आता हीही शंका दूर करा. अशीच अडचण जीव आणि भीती या शब्दांबाबतही होते. त्यांची सामान्यरूपं करताना 'जी' आणि 'भी' र्‍हस्व लिहायचा की दीर्घ ते ठरवताना दर वेळी नाकी नऊ येतात. हे शब्द तत्सम म्हणायचे की तद्भव?

'न'वी बाजू Sun, 12/10/2014 - 07:42

In reply to by मेघना भुस्कुटे

सोप्पे आहे.

सामान्यरूप करताना जिवाच्या भीतीने 'जि' र्‍हस्व आणि 'भी' दीर्घ लिहायचा. आहे काय नि नाही काय?

मेघना भुस्कुटे Sun, 12/10/2014 - 07:45

In reply to by 'न'वी बाजू

तुम्ही मस्करी करत नाही, असं गृहीत धरून -

मग १) 'जीवजंतू'मध्ये 'जी' का म्हणून? २) 'भीती'चं अनेकवचन 'भीत्या' असं करायचं का?
आणि दोन्हीच्या उत्तरांवर ३) का?

'न'वी बाजू Sun, 12/10/2014 - 09:02

In reply to by मेघना भुस्कुटे

१) 'जीवजंतू'मध्ये 'जी' का म्हणून?

कारण 'जीवजंतू' मध्ये 'जीव' या पदाचे सामान्यरूप (?) झालेले नाही म्हणून.

थोडक्यात, 'मूल'पासून 'मुलाचा' परंतु 'मूलबाळ', तद्वत, 'जीव'पासून 'जिवाची' परंतु 'जीवजंतू'.

२) 'भीती'चं अनेकवचन 'भीत्या' असं करायचं का?

हो.

'रीतभात'चे जसे 'रीतीभाती' करायचे, तसेच 'भीती'चे 'भीत्या' करायचे. (मात्र, 'भूत' हे उलटे पायवाल्या, झालेच तर रात्रीअपरात्री 'हॅ: हॅ: हॅ: हॅ:' करत हिंडणार्‍या क्याटेगरीतले असले, तर त्याचे 'भुते' करायचे, पण जीवजंतू किंवा एलेमेंटल क्याटेगरीतले असले, तर मात्र त्याचे 'भूते' करायचे. (पहा: 'भूतां परस्परे जडो मैत्र जिवाचे' किंवा 'पंचमहाभूते'.))

आणि दोन्हीच्या उत्तरांवर ३) का?

कारण मी सांगतो म्हणून. कारण तसा संकेत / तशी पद्धत आहे, म्हणून. (त्याचाच अर्थ तो.) याव्यतिरिक्त या प्रश्नाला दुसरे उत्तर नाही.

नितिन थत्ते Sun, 12/10/2014 - 08:17

In reply to by मेघना भुस्कुटे

तत्सम म्हणून लिहायचे तर भीति, प्रीति, कीर्ति असे लिहायला हवे. पण सरकारी (शासकीय) नियमाप्रमाणे भीती, प्रीती, कीर्ती असे लिहायचे.

तसेच उच्चारी सूख* म्हणत असलो तरी लिहिताना सुख असे लिहायचे असते.

*शेवटचे अक्षर अकारांत किंवा र्‍हस्व असेल तर त्यापूर्वीचे अक्षर दीर्घ** लिहायचे (तूप, वीज, जीव, डूख, रूप, जीभ, नीट, ठीक) अशा नियमानुसार हे बरोबर आहे.

**हे इकार उकारासाठी लागू आहे. सहसा र्‍हस्वांत*** शब्दाचे शेवटून दुसरे अक्षर दीर्घच उच्चारले जाते (खप, पीन, नीब).
***शासकीय नियमानुसार अकारांत शब्दांखेरीज इतर कुठलेच शब्द र्‍हस्वांत असत नाहीत.

अनुप ढेरे Sun, 12/10/2014 - 08:24

In reply to by नितिन थत्ते

लोक शासकीय शुद्धलेखनाचे नियम खरच वाचतात आणि आत्मसात करतात हे रोचक आहे. शुद्धलेखनाचे नियम वाचण्याची प्रेरणा काय असेल असा विचार करतो आहे.

नितिन थत्ते Sun, 12/10/2014 - 08:33

In reply to by अनुप ढेरे

हे हे हे....

मी कुठे वाचले आहेत? मला अंतर्ज्ञानाने ते नियम कळले. ;)

साधारण स्टॅण्डर्ड लेव्हलच्या प्रकाशकांची पुस्तकं वाचली तर त्यातल्या कष्टमरी* पद्धतीवरून नियम काय असतील याचा अंदाज मी बांधतो.

*मराठी प्रकाशकांविषयी बोलत असल्याने कष्टमरी या शब्दाचा कष्टंबर या प्राण्याशी काही संबंध नाही हे उघड आहे.

'न'वी बाजू Sun, 12/10/2014 - 09:35

In reply to by नितिन थत्ते

मी कुठे वाचले आहेत? मला अंतर्ज्ञानाने ते नियम कळले.

'कारण शेवटी आम्हीं भटेंच! त्याला काय करणार?' - पु.ल.

मराठी प्रकाशकांविषयी बोलत असल्याने कष्टमरी या शब्दाचा कष्टंबर या प्राण्याशी काही संबंध नाही हे उघड आहे.

खुद्द इंग्रजीतदेखील 'कष्टमरी'चा 'कष्टमर'शी संबंध नसावा; 'कष्टम'शी असावा. ('कष्टम' बोले तो, 'पद्धत' अशा अर्थाने; 'गिर्‍हाइकी' अशा अर्थाने नव्हे.) 'कष्टमर'अखेर 'एम--आर' आहे, तर 'कष्टमरी'अखेर 'एम--आर-वाय' आहे, हा महत्त्वाचा फरक या दृष्टिकोनातून लक्षात घेण्यासारखा आहे.

नितिन थत्ते Sun, 12/10/2014 - 09:46

In reply to by 'न'वी बाजू

>>खुद्द इंग्रजीतदेखील 'कष्टमरी'चा 'कष्टमर'शी संबंध नसावा; 'कष्टम'शी असावा. ('कष्टम' बोले तो, 'पद्धत' अशा अर्थाने; 'गिर्‍हाइकी' अशा अर्थाने नव्हे.) 'कष्टमर'अखेर 'एम-ई-आर' आहे, तर 'कष्टमरी'अखेर 'एम-ए-आर-वाय' आहे, हा महत्त्वाचा फरक या दृष्टिकोनातून लक्षात घेण्यासारखा आहे.

हे मात्र बरोबर हां...

मिहिर Sun, 12/10/2014 - 09:56

In reply to by अनुप ढेरे

मी पहिल्यांदा शासकीय शुद्धलेखनाचे नियम नववी-दहावीत वाचले. त्यावेळी ते मराठीच्या पाठ्यपुस्तकात परिशिष्ट म्हणून दिले होते. त्यात सगळे नियम होते की नाही हे आता आठवत नाही. प्राथमिक प्रेरणा म्हणाल तर, आपण जे सर्वसाधारण प्रमाणलेखन करतो (त्यावेळी नियम माहीत नसताना) ते आणि शासकीय नियम कितपत सुसंगत आहेत हे पाहणे ही होती. हे नियम मला बरेच आवडले. काही मी केलेली निरीक्षणे पक्की झाली, काही बाबी नव्याने कळल्या ज्यामुळे शुद्धलेखनातल्या माझ्या चुकांचे प्रमाण आणखी कमी झाले असे वाटते. काही अपवाद सोडले तर हे नियम समजायला आणि आत्मसात करायला खूप सोपे आहेत आणि त्यामुळे वारंवार दिसणार्‍या शुद्धलेखनाच्या चुका (उदा. मिळुन, मूलांची, असेहि, तीने इ.) बर्‍याच कमी होतील.
वरील परिच्छेदात शुद्धलेखन हा शब्द प्रमाणलेखनाचे शुद्धलेखन ह्या अर्थाने वापरला आहे. इंग्रजी वगैरेंत नाही का आपण कधी नियम गूगलवर किंवा व्याकरणाच्या पुस्तकांत शोधत? आपण जे लिहितो ते बर्‍यापैकी बिनचूक असावे असे वाटणे आणि त्यासाठी एका साधारण प्रमाणस्रोताची (इथे शासकीय नियम) मदत घेणे चुकीचे वाटत नाही.
......
१. तत्सम-तद्भव शब्द आणि त्यांच्याबद्दलचे काही नियम गोंधळवणारे आहेत हे मान्य आहे. पण किमान तद्भव शब्दांची रूपे योग्य प्रकारे लिहिली तरी (जालावरील) एकुण शुद्धलेखनाची पातळी बरीच उंचावेल.

बॅटमॅन Sun, 12/10/2014 - 15:15

In reply to by मिहिर

मी कधी नियम वाचले असल्याचे आठवत नाही. पण वाचन असल्यामुळे शुद्धलेखनास कधी अडचण आली नाही. फक्त हृदयरोग ऐवजी हृद्रोग लिहिल्यास चूक देणे इ.इ. तद्दन 'प्राकृति'क प्रसंगांशिवाय कधीच त्रास झाला नाय.

बॅटमॅन Sun, 12/10/2014 - 15:08

In reply to by धनंजय

हेच म्हणणार होतो. यद्यपि प्राकृतात हे कधीपासून आहे माहिती नाही. पण मराठी सोडून अन्य भाषांत असा उच्चारही दिसत नाही अन लेखनही. त्यामुळे हा मराठी पेश्शल फिनॉमिनन असावा.

मेघना भुस्कुटे Mon, 13/10/2014 - 00:07

तत्सम आणि तद्भवः

तद्भव शब्दः फूल (फूल - फूलझाड - फुलझाडाचा - फुलाला - फुले). इथे सामासिक शब्द आणि सामान्यरूप दोहोंमध्ये उकार र्‍हस्व झाला.

तत्सम शब्दात असं होत नाही. म्हणून -

तद्भव शब्दः जीव (जीव - जीवजंतू - जीवाचा - जीव). इथे सामान्यरूपातही वेलांटी दीर्घच राहिली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. 'जिवाला गोड लागत नाही' / 'ती दोन जिवांची आहे' असा शब्दप्रयोग जास्त प्रचलित दिसतो. म्हणून 'जीव' तत्सम मानायचा की तद्भव असा संभ्रम.

तीच अडचण 'भीती' आणि 'भूत' यांच्याबाबतही.

भीती - भितिदायक - भीतीला. इथवर ठीक आहे. पण या शब्दाचं अनेकवचन करायला गेलं की 'दोन प्रकारच्या भीती' हा शब्दप्रयोग होत नाही. 'दोन प्रकारच्या भित्या' असा होतो. तेव्हा वेलांटी र्‍हस्व होते. मग 'भीती' तत्सम की तद्भव?

भूत - भूतमात्र. पण अनेकवचनात आणि सामान्यरूपातही 'भूताला' किंवा 'भूते' असं म्हणण्याची पद्धत नाही. 'भुताचा' किंवा 'भुते' असंच म्हणायची चाल आहे. मग परत 'भूत' तत्सम की तद्भव?

माझ्या मते जीव, भीती, भूत अशा शब्दांच्या बाबतीत त्यांच्या वापराबद्दलची आकडेवारी तपासून मग हा निर्णय घेतला गेला पाहिजे. काही शब्द तत्सम असतात. पण कालांतराने ते वापरानुसार तद्भव गणायला हरकत नसावी.

असो. तत्सम-तद्भव घोळाला कारणीभूत ठरलेल्या प्रमाणलेखनासंबंधीच्या या धाग्याला या निमित्ताने उजाळा देते.

बॅटमॅन Mon, 13/10/2014 - 01:13

In reply to by मेघना भुस्कुटे

मराठीत सामान्यरूपे कशी होतात यावरून तत्सम आणि तद्भव ठरवणेच मुळात चूक आहे. वरिजिनल संस्कृत रूप आणि मराठी रूप यांत काही फरक नसेल तर तो तत्सम, नपेक्षा तद्भव ही साधी व्याख्या आहे. त्यावरून भूत, जीव, भीती हे तत्सम. बाकी तद्भव. निटपिकच करायचे तर लिखाणापुरते ती दीर्घ असल्याने भीती तद्भव म्हणा फारतर.

तत्सम आणि तद्भव शब्दांची सामान्यरूपे अमुक तमुक प्रकारे होतात. पण कॉनव्हर्स ट्रू असेलच असे नाही. त्यामुळे हा नियम वॉटरटाईट नाही. बेसिक व्याख्या वापरली, तर तत्सम आणि तद्भवाचा घोळ निस्तरला जाईल. बेसिक व्याख्या सरळ आहे. लेखनात काही अपवाद दिसले म्हणून ती रद्द करण्याची गरज नाही.

अरविंद कोल्हटकर Tue, 14/10/2014 - 20:27

ऑक्टोबर १४, १०६६. आजच्या दिवशी विल्यम डयूक ऑफ नॉर्मंडी (William the Conqueror) आणि इंग्लंडचा राजा हॅरॉल्ड, अर्ल ऑफ वेसेक्स, ह्यांच्यामधील हेस्टिंग्जची लढाई होऊन हॅरॉल्ड मारला गेला आणि नॉर्मन सत्ता इंग्लंडमध्ये प्रस्थापित झाली. ह्यानंतर सरंजामशाहीच्या युगात इंग्लंडचा प्रवेश होऊन पूर्वीच्या दुर्लक्षित समाजाकडे युरोपीय सत्तांचे लक्ष वेधले जाऊन इंग्लंड इतिहासाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील झाले.

ह्या घटनांचे चित्ररूपाने केलेले वर्णन विख्यात Bayeux Tapestry ह्या तत्कालीन पटावर पाहण्यास मिळते. २३० फूट लांब आणि २० इंच रुंद असा हा विणलेला पट गेल्या हजार वर्षांमध्ये अनेक चढउतारांमधून जाऊन आता फ्रान्समधील बायू गावात एका खास म्यूझिअममध्ये सुरक्षित ठेवला गेला आहे. त्याचे विडीओरूपाने दर्शन यूटयूबवरील बीबीसीच्या ह्या विडीओमध्ये पाहता येईल.

अरविंद कोल्हटकर Sat, 25/10/2014 - 05:00

२५ ऑक्टोबर १९१७ ह्या दिवशी झारिस्ट रशियामध्ये ऑक्टोबर क्रांती'ची सुरुवात झाली. ह्या उल्लेखाने अनेक मजेदार आठवणी जाग्या झाल्या.

सर्वप्रथम म्हणजे ही तारीख रशियन ऑर्थोडॉक्स चर्चला मान्य असलेल्या तत्कालीन कॅलेंरची आहे. पोप ग्रेगरीचे सुधारित कॅलेंडर रशियामध्ये मान्य केले गेले नव्हते त्यामुळे रशियातील कॅलेंडर अन्य जगाच्या १३ दिवस मागे पडले होते. कम्युनिस्टांनी कारभार हाती आल्यावर जुने कॅलेंडर काढून टाकून त्याच्या जागी जगभर चालू असलेले पोप ग्रेगरीचे सुधारित कॅलेंडर आले. त्या कॅलेंडरनुसार सोवियट संघामध्ये तथाकथित 'ऑक्टोबर क्रान्तीचा' वाढदिवस ७ नोवेंबरला साजरा करण्याची प्रथा होती यद्यपि त्या दिवसाचे अधिकृत नाव 'महान् ऑक्टोबर क्रान्ति' Великая Октябрьская Революция असेच चालू राहिले. (ह्याच संदर्भामध्ये वरील ३ ऑक्टोबरचा प्रतिसादहि पाहावा.)

ह्या क्रान्तीचे स्थान 'पेट्रोग्राड' असे दाखविले जाते. हे पीटर द ग्रेटचे - आणि आपल्याला परिचित - सेंट पीटर्सबर्ग. रशियन लोक त्याचा उच्चार फ्रेंच पद्धतीने 'सांक्त पित्येरबुर्ग' Санкт Петербург असा करत असत. ह्यातील पित्येरबुर्ग मध्ये जो जर्मन परिणाम दिसतो तो जर्मनी शत्रुदेश झाल्यावर पुसून टाकण्यासाठी १९१४ साली पित्येरबुर्गचेच रशियन रूपान्तर पेट्रोग्राड - शब्दशः 'पीटरचे शहर', ग्राद = गोरद = शहर - असे करण्यात आले. क्रान्ती यशस्वी झाली आणि नंतर लेनिनचा मृत्यु १९२४ साली झाला. त्याचे नाव चिरंतन राहावे म्हणून पेट्रोग्राड बदलून शहराचे नाव लेनिनग्राड करण्यात आले. सोवियट संघाचे विघटन झाल्यानंतर आता शहराला त्याचे पहिले नाव 'सेंट पीटर्सबर्ग - सांक्त पित्येरबुर्ग' पुन: देण्यात आले आहे.

अरविंद कोल्हटकर Mon, 03/11/2014 - 20:23

आजच्या दिनवैशिष्टयामध्ये पुढील नोंद वाचली: ’१८३८ : 'द टाइम्स ऑफ इंडिया'ची 'द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स' या नावाने स्थापना.’

टाइम्स ऑफ इंडियाच्या विकिपानानुसार रा.ब. नारायण दिनानाथ वेलकर ह्यांनी सुरू केलेले हे द्विसाप्ताहिक १८६० मध्ये तकालीन संपादक रॉबर्ट नाइट ह्यांनी १८६० मध्ये हिंदुस्थानी मालकांपासून विकत घेऊन प्रतिस्पर्धी पत्र बॉंबे स्टॅंडर्ड ह्याच्याशी जोडले. ह्या पत्राचे नाव बॉम्बे टाइम्स ॲण्ड स्टॅंडर्ड असे झाल्याचे दिसते. १८६१ मध्ये त्याचे नाव पुन: बदलून द टाइम्स ऑफ इंडिया असे करण्यात आले, जे नाव आजतागायत चालू आहे.

बॉम्बे टाइम्स ॲण्ड स्टॅंडर्ड हे पत्र २ चर्चगेट स्ट्रीट येथे होते. जालावर उपलब्ध असलेल्या पुढील तकालीन छायाचित्रांमध्ये हा चर्चगेट स्ट्रीट त्याच्या दोन्ही बाजूकडून दिसत आहे. मुंबई किल्ल्यासभोवतीची भिंत पाडण्यापूर्वीची ही चित्रे आहेत. त्यापैकी क्र, २ च्या चित्रातील दुसरी पाटी BOMBAY TIMES AND STANDARD OFFICE अशी स्पष्ट वाचता येते. (ह्यासाठी कदाचित चित्र उतरवून घेऊन मोठे करावे लागेल.) चित्र १८६०-६१ च्या काळातील आहे.



हीच चित्रे २०१३ च्या दिवाळी अंकातील ’१८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद’ ह्या माझ्या लेखातहि आहेत.

चिंतातुर जंतू Tue, 04/11/2014 - 11:36

In reply to by अरविंद कोल्हटकर

दिनवैशिष्ट्यातल्या माहितीचा स्रोत : 'टाइम्स ऑफ इंडिया'चं मराठी विकीपान.
तुमच्या प्रतिसादामुळे इंग्रजी विकीपान पाहिलं तर त्यावरदेखील दिनवैशिष्ट्यात दिलेलीच माहिती होती. त्यामुळे सध्या तरी त्यात बदल केलेला नाही.

अरविंद कोल्हटकर Wed, 05/11/2014 - 00:02

आजच्या पुण्यस्मरणांमध्ये पुढील नोंद आहे: प्राच्यविद्या संशोधक 'पु. वि. बापट (१९११)'. ह्यात काहीतरी चूक दिसत आहे.

पाली भाषा आणि बौद्ध तत्त्वज्ञान ह्यांचे प्रख्यात प्राध्यापक डॉ. पुरुषोत्तम विश्वनाथ बापट ह्यांचा जन्म १८९४ साली झाला (चित्रावलिखित अर्वाचीन चरित्रकोश) आणि त्यांच्या भाषणांचे आणि लेखनाचे उल्लेख जालावर १९७८ पर्यंत तरी आढळतात. त्याच्य मृत्यूचे वर्ष १९८१ अथवा १९९१ आहे काय?

'न'वी बाजू Mon, 10/11/2014 - 02:39

जन्मदिवस: ९ नोव्हेंबर: 'सारे जहाँ से अच्छा'कार कवी इकबाल (१८७७)

यांची 'सारे जहाँ से अच्छा'कार इतकीच 'चीनो-अरब हमारा', कार हीदेखील ओळख महत्त्वाची नाही काय?

-----------------------------------------------------------------------------------------------------------------
तराना-ए-हिंद.

तराना-ए-मिल्ली. ("चीनो-अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा, मुस्लिम हैं हम, वतन है सारा जहाँ हमारा...")

ती सर्वपरिचित साहिर-आवृत्ती (साहिर-टेक किंवा साहिर-विडंबन म्हणावे काय? "चीनो अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा, रहने को घर नहीं है, सारा जहाँ हमारा...") वेगळी.

बॅटमॅन Fri, 14/11/2014 - 19:17

In reply to by वामा१००-वाचनमा…

हे मोने मूळचे कोकणातले. त्यांच्या हातात कला होती, म्हणून लोक त्यांना कलोदक मोने असे म्हणू लागले. पुढे फ्रान्स आणि इंग्लंडला यांचा सुगावा लागला. इंग्लंडमध्ये कायम ढगाळ वातावरण असल्याने 'कलोदक' ऊर्फ 'क्लाउदक' चे त्यांना कौतुक नव्हते, मग फ्रेंचांनी त्यांना ठेवून घेतलं.

वामा१००-वाचनमा… Fri, 14/11/2014 - 19:20

In reply to by बॅटमॅन

हे मोने मूळचे कोकणातले. त्यांच्या हातात कला होती, म्हणून लोक त्यांना कलोदक मोने असे म्हणू लागले.

=)) =)) कहर आहेस :)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 14/11/2014 - 23:40

१४ नोव्हेंबर - नेहेरुंचा जन्मदिवस

या निमित्ताने गेली काही वर्षं, सोशल मिडीयावर नेहेरूंचे विवक्षित फोटो, (ते सुद्धा विवक्षित विचारसरणी बाळगणाऱ्या लोकांकडून प्रसारीत होताना) दिसतात. मला आज त्यातला हा एक दिसला.

माझ्या (अपूर्ण) माहितीनुसार हा फोटो आँरी कार्तिअर-ब्रेसाँ या फ्रेंच छायाचित्रकाराने काढलेला आहे. हा माणूस अतिशय कलात्मक, सुंदर फोटो काढण्यासाठी प्रसिद्ध होता, (प्रसिद्ध अजूनही आहे).

पुरुषाने स्त्रीची सिगरेट पेटवणं, हे तत्कालीन युरोपमध्ये सभ्य आणि उच्चभ्रूपणाचं लक्षण मानलं जात असे. (आज याला बहुतेक स्त्रीवादी आणि कर्करोगविरोधक आक्षेप घेतील.) पण कार्तिअर-ब्रेसाँने हा फोटो सुंदर चित्र म्हणून काढला आणि प्रकाशित केला.

म्हणून मला गॅरी विनोग्रांड या प्रसिद्ध अमेरिकन छायाचित्रकाराचं एक वाक्य पुन्हा आठवलं आणि पटलं. त्याचा मतितार्थ असा -
समोरचं दृश्य सगळ्यांनाच दिसतं. छायाचित्रकाराचं कसब चित्राची फ्रेम निवडण्यात, जेणेकरून दिसतंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं, कलात्मक, आपला दृष्टिकोन मांडणारं चित्र समोर ठेवता येईल.

निःसंशय, या चित्राकडे बघण्याचा कार्तिअर-ब्रेसाँचा दृष्टिकोन स्वच्छ होता. हे सगळे संदर्भ समजल्यावर मला हा फोटो आवडतो.

पण अशा कोणत्याही संदर्भाशिवाय, भारतीयांनी आजच्या काळात, आजच्या दिवशी हे चित्र दाखवणं कुचेष्टा वाटावी का? होय. विशेषतः अशी चित्रं प्रसारीत करणारे कडवे धार्मिक, उजव्या विचारसरणीचे, संघिष्ट आणि/किंवा नेहरूविरोधक असतील तर मला ते हीन विचारसरणीचं लक्षण वाटतं.

(कार्तिअर-ब्रेसाँबद्दल अभिजीत भाटलेकर यांनी डिजीटल दिवाळी २०१४ या अंकात एक सुंदर लेख लिहिला आहे. जरूर वाचा.)

बालदिनाच्या शुभेच्छा.

उदय. Fri, 21/11/2014 - 02:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा फोटो होमाई व्यारावाला या भारतीय छायाचित्रकाराने काढलेला आहे. नेहरू जनमानसात आपली प्रतिमा चांगली रहावी म्हणून खूप जागरूक असत, पण होमाई व्यारावालाबरोबर अगदी मैत्रीचे संबंध असल्यामुळे त्यांनी तो फोटो काढला तेव्हा नेहरूंनी आक्षेप घेतला नाही, असे होमाई व्यारावाला स्वतः म्हणाल्या असे वाचल्याचे आठवते.

बाकी कडवे धार्मिक, उजव्या विचारसरणीचे, संघिष्ट आणि/किंवा नेहरूविरोधक इत्यादीबद्दल मला पुरेसे ज्ञ्यान नाही आणि एका फोटोचा या सगळ्याशी काय संबंध ते कळले नाही, त्यामुळे त्याबद्दल काही लिहू शकत नाही. पण एका पुरुषाऐवजी एका महिलेने हा चांगला फोटो काढला आहे आणि तिला योग्य ते क्रेडिट मिळावे, म्हणून हा प्रपंच. गंमत म्हणजे ही छायाचित्रकार भारतातील पहिली महिला प्रेस फोटोग्राफर आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 26/11/2014 - 00:47

In reply to by उदय.

आभार. होमाई यांच्याबद्दल मला काहीही माहिती नव्हती.

पारशी व्यक्तिने फोटो काढला आहे म्हणजे पुन्हा त्यांचा दृष्टिकोन, मूल्यं यांबद्दल वेगळा विचार करण्याची गरज नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 20/11/2014 - 01:41

In reply to by राजन बापट

माझ्याकडून दिनवैशिष्ट्य लिहिणाऱ्यांचा ... शौचालय आधी पाहिजे.
ज्याच्या घरात शौचालय नसेल तर त्या मुलाशी लग्न करणार नाही, अर्थाच्या बातम्या तुम्ही वाचत नाही का?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 20/11/2014 - 09:15

In reply to by मेघना भुस्कुटे

शीसाठी दोन भाषांची साठमारी करावी लागते. जोडकामं... गंमत नाय.

वीर्य हे एक उदाहरण. पुरुष या शब्दातली सगळी अक्षरं र्‍हस्व आहेत.

अरविंद कोल्हटकर Wed, 26/11/2014 - 00:29

मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व सहकार चळवळीचे प्रणेते यशवंतराव चव्हाण (१९८४)>

हे आजच्या दिनवैशिष्टयामध्ये लिहून आले आहे. त्यापैकी 'मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री' हा तपशील बरोबर नाही.

१९३५ च्या Government of India Act च्या खाली प्रान्तिक मंत्रिमंडळे अस्तित्वात आली आणि काँग्रेसने ह्यामध्ये भाग घ्यायचा निर्णय घेतला तेव्हा मुंबईचॅ पहिले प्रधानमंत्री (Prime Minister - तेव्हाचा शब्द) बाळ गंगाधर खेर हे झाले. (तेव्हा त्या पदाचे खरे हक्कदार नरिमन होते पण ते पारसी असल्यामुळे त्यांना पटेलांनी डावलले आणि नेहरूंनी त्यामध्ये हस्तक्षेप करणे टाळले असे आझादांचे मत त्यांच्या India Wins Freedom ह्या पुस्तकामध्ये नोंदविले आहे.) युद्धकाळाच्या वेळी अशी सर्व सरकारे बरखास्त केली गेली आणि खेर तुरुंगात गेले. सुटून आल्यावर ते पुनः त्याच स्थानी होते आणि स्वातन्त्र्यानंतर मुंबई प्रान्ताचे मुख्यमन्त्री म्हणून १९५२ सालापर्यंत ते तेथे राहिले. त्यांच्यानंतर मोरारजी मुख्यमंत्री झाले. यशवंतराव त्यांच्यानंतर प्रथम द्वैभाषिकाचे आणि नंतर महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर त्याचे ते पहिले मुख्यमन्त्री झाले.

खेरांच्या मन्त्रिमंडळामध्ये यशवंतराव पार्लमेंटरी सेक्रेटरी ह्या तशा दुय्यम पदावर होते.

अरविंद कोल्हटकर Wed, 26/11/2014 - 08:35

आजच्या दिनवैशिष्टयामध्ये 'पुण्यस्मरण' ह्याखाली पां.दा गुणे ह्यांचा उल्लेख आहे. त्यांच्याबाबत थोडी अधिक माहिती.

जगन्नाथ शंकरशेट, भाऊ दाजी, झाला वेदान्त अशा उल्लेखनीय पारितोषके मिळवून हे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये १९०८ साली संस्कृतचे प्राध्यापक झाले. तदनंतर जर्मनीमध्ये पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ति मिळाल्यामुळे ते तिकडे गेले आणि १९१४ साली डॉक्टरेट मिळवून परत आले. येथे त्यांनी भाषाशास्त्राचा विशॅष व्यासंग केला. १९१७ साली भांडारकर प्राच्यविद्या संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा भाग होता आणि संस्थेचे ते पहिले कार्यवाह होते. भाषाशास्त्रीय विषयांवर त्यांनी बरेच लेखन केले आहे. आपल्या परदेशातील मुक्कामावर त्यांनी 'माझा युरोपचा प्रवास' असे पुस्तक लिहिले आहे. हिंदुस्तानी व्यक्तीला त्या काळचा युरोप कसा दिसत होता ह्याचे उत्तम चित्रण त्यामध्ये मिळते.

१९२२ साली वयाच्या ४० व्या वर्षी त्यांचा मृत्यु झाला.

वामा१००-वाचनमा… Mon, 01/12/2014 - 19:55

अरे वा - १ डिसेंबर १८३५ : हान्स ख्रिश्चन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित. :) सुंदर!!!
The Little Match Girl माझी सर्वात आवडती कथा आहे. अर्थात ब्युटी अँड द बीस्ट नंतरच!

वामा१००-वाचनमा… Tue, 02/12/2014 - 21:09

२ डिसेंबर १८८५ : डॉ. पेपर या पेयाची प्रथम विक्री.

हे डॉ पेपर पेय इतकं विचीत्र लागतं. या पाश्चात्यांना का आवडतं कोणास ठाऊक :(
अक्षरक्षः "टर्पेंटाइन" प्यायल्यासारखी उग्र अन रासायनिक चव आहे.
____
रुट बिअरही तोच प्रकार. नावाला बीअर आहे पण त्यात अल्कोहोल शून्य असते. लहान मुलांना आवडतं हे पेय. इथे म्हणाजे कौटुंबिक खास खास पारंपारीक पद्धती असतात ज्याने हे पेय बनवतात व अभिमानाने सांगतात. मला तर तो प्रकार अज्जिबात आवडला नाही.

'न'वी बाजू Wed, 03/12/2014 - 16:55

In reply to by वामा१००-वाचनमा…

अक्षरक्षः "टर्पेंटाइन" प्यायल्यासारखी उग्र अन रासायनिक चव आहे

टर्पेंटाइन पिण्याचा अनुभव दांडगा दिसतोय.

(पण भयानक लागते खरे. मात्र, मी कॉफ सिरपची उपमा दिली असती. बोले तो, "आपल्याकडचे" - देशी - बेनॅड्रिल पाण्यात - किंवा, फिझसाठी सोड्यात - विरघळवून, क्यानमध्ये भरून जर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले, तर जसे लागेल, साधारणतः तशी चव.)
............................................

रुट बिअरही तोच प्रकार.

ही पिण्याऐवजी लिस्टरीनचा माउथवॉश प्यायल्यास तो किमान शतपटीने बरा लागावा, असा अंदाज आहे.

लहान मुलांना आवडतं हे पेय.

एक तर हे विधान धादान्त खोटे असावे. (आणि, ते करणारे लोक रूट बिअर कंपन्यांकडून ते करण्याचे पैसे घेऊन गरीब बिचार्‍या गोजिरवाण्या निष्पाप लहान मुलांच्या नावावर बिले फाडीत असावेत.) नाहीतर मग दुसरी शक्यता म्हणजे लहान मुलांना अक्कल नसावी. (पहिलीच शक्यता अधिक वाटते.)

वामा१००-वाचनमा… Wed, 03/12/2014 - 18:05

In reply to by 'न'वी बाजू

ही पिण्याऐवजी लिस्टरीनचा माउथवॉश प्यायल्यास तो किमान शतपटीने बरा लागावा, असा अंदाज आहे.

हाहाहा खरय!

अरविंद कोल्हटकर Sat, 06/12/2014 - 01:34

'१९६९ : इंटरनेटचे पूर्वसूरी अर्पानेट कार्यरत.' आजच्या दिनवैशिष्टयामधील एक नोंद.

येथे 'पूर्वसूरी' (पूर्वसूरि) हा शब्दप्रयोग खटकला. 'सूरि' म्हणजे विद्वान् व्यक्ति. ह्या अर्थानेच विशेषतः जैन संप्रदायामध्ये विद्वान व्यक्तींना 'सूरि' असे संबोधले जाते, जसे जिनेश्वरसूरि, हरिभद्रसूरि, वर्धमानसूरि इ. 'पूर्वसूरि' म्हणजे ह्यापूर्वी होऊन गेलेला विद्वान्. इंटरनेटला 'पूर्वसूरि' असू शकत नाही. त्याला 'पूर्वीचे', 'पूर्वगामी' वगैरे अर्पानेट होते.

'न'वी बाजू Sat, 06/12/2014 - 19:56

In reply to by अरविंद कोल्हटकर

जालावर भरपूर विदा असतो (किंवा खरे तर विद्याचे आदानप्रदान हेच जालाचे मूळ उद्दिष्ट होते) हे लक्षात घेता, जालास 'विद्वानां'त गणणे सयुक्तिक ठरू नये काय?

उदय. Sun, 14/12/2014 - 09:54

आजच्या दिनवैशिष्टयामध्ये 'पुण्यस्मरण' ह्याखाली चित्रकार व्हासिली कांडिन्स्की ह्याचा उल्लेख आहे. त्या निमित्ताने ऐसीच्या मुख्य पानावर त्याचे एखादे चित्र बघायला आवडेल.

मिसळपाव Tue, 16/12/2014 - 18:25

In reply to by चिंतातुर जंतू

अहो पण आधीचं चित्र परत एकदा डकवाल का? पुण्यतिथीनिमित्त चित्र लावलंय कबूल आहे. पण बर्‍याच दिवसानी मला कळेल असं चित्र बोर्डावर लागलं होतं आणि वासिली कान्डिन्स्की आडवा आला! तस्मात, मास्तर, तेव्हढं ते आधीचं चित्र परत लावायचं बघा बुवा.

अवांतर - त्या चित्रावरून रेम्ब्रांट्चं हे चित्र आठवलं.

निषेध - बबन प्रभूचा पण जन्मदिवस आहे नाही दिसलं वाटतं तुम्हाला? बरोबर आहे, घरचा ना तो? मग कोण किंमत करतंय त्याची? त्या कान्डिन्स्क्याच्या फराट्याचं तेव्हढं कवतिक !!!

मिसळपाव Tue, 16/12/2014 - 20:36

In reply to by चिंतातुर जंतू

येस्स हेच! थ्यांक्यू! या चित्रकाराचं नावही माहीती नव्हतं मला. Johannes_Vermeer नाव दिलंय त्याचं पण मला Jan Vermeer Van Delft या नावाने अजून चित्र मिळाली. असो. या चित्रात मागे भिंतीवर शिंकाळ्यासदृश्य काहीतरी आहे वाटतं.

एक प्रश्ण - या चित्रातले रंग एव्हढे ब्राईट (उठावदार?) कसे? पुनर्मुद्रण करताना कोणी 'सुधारायचा' प्रयत्न केलाय की काय? ;-) या प्रतीतले रंग त्या वेळचे वाटतायत.

मला हवी ती माहीती मिळाली. परत बोर्डावर नाही लावलं तरी चालेल बाकी कोणाला इंटरेस्ट नसला तर. किंवा एक सूचना - ते रेंम्ब्रांट्चं चित्र, मी वर लिंक दिल्येय ते, लावा म्हणजे बाकिच्या मंडळीना अजून एक उत्तम चित्र पहायला मिळेल / पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल.

अरविंद कोल्हटकर Tue, 16/12/2014 - 21:23

In reply to by मिसळपाव

ह्या चित्रकाराचे The Girl with the Pearl Earring हे चित्र तुमच्या परिचयाचे असेल. ह्याच नावाचा आणि स्कार्लेट जोहानसनचे मुख्य काम असलेला चित्रपट अलीकडे बराच गाजला होता.

वर उल्लेखिलेले डेल्फ्ट हे गाव नेदर्लंडमध्ये द हेगपासून जवळच आहे. वर्मीर, तसेच मायक्रोबायॉलऑजी शास्त्र आणि मायक्रोस्कोपचा संशोधक अँटनी वॉन लुवेनबर्ग आणि निळ्या रंगात रंगविलेले डेल्फ्ट्वेअर हे चायनावेअर ह्यांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे

'न'वी बाजू Fri, 26/12/2014 - 01:24

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - कैद-ए-आझम दिन (पाकिस्तान)

"कैद-ए-आझम" नव्हे. "काइद-ए-आझम" किंवा "कायदेआझम".

असो. कायदेआझमजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.

अरविंद कोल्हटकर Fri, 26/12/2014 - 03:50

२५ डिसेंबरच्या दिनवैशिष्टयामधील हा उल्लेख बरोबर आहे का?

२५ डिसेंबर हा जिनांचा जन्मदिवस आहे हे बरोबर आहे पण तो पाकिस्तानचा 'राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन' नाही. ब्रिटिश इंडियाच्या पश्चिमोत्तर आणि पूर्व भागांत 'स्वयंपूर्ण आणि सार्वभौम' (autonomous and sovereign) मुस्लिम राज्यांची मागणी स्पष्टपणे 'लाहोर ठरावा'तून मुस्लिम लीगने २३ मार्च १९४० ह्या दिवशी मांडली आणि म्हणून २३ मार्च हा दिवस पाकिस्तानमध्ये 'राष्ट्रीय दिन' म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानचा स्वातन्त्र्य दिन १४ ऑगस्टला पडतो.

आणखी एक मनोरंजक तपशील. मौलाना अबुल कलाम आझाद ह्यांच्या 'India Wins Freedom'मध्ये पान ९७ वर असा उल्लेख आहे की जिनांना 'कायदे-आझम' असे उल्लेखले जाण्यामागे महात्मा गांधी हे कारण आहे. मुळामध्ये जिनांना असली काहीहि पदवी नव्हती. काही उर्दू वृत्तपत्रे जिनांचा उल्लेख असा करतात असे अमतुस सलाम नावाच्या कोणा बाईंनी - ज्या गांधींच्या बरोबर असत - गांधींना सांगितले. त्याचा परिणाम म्हणजे १९४४ च्या गांधी-जिना चर्चेच्या संदर्भात गांधींनी जिनांना लिहिलेल्या पत्रांमध्ये जिनांचा उल्लेख 'कायदे-आझम' असा केला गेला. ह्या पत्रांना उर्दू वृत्तपत्रांमधून प्रसिद्धि मिळाल्यावर जिनांची ही नवी पदवी सर्व मुस्लिम समाजापर्यंत पोहोचली आणि त्यामुळे ते जिनांचे एक विशेषणच झाले.

'न'वी बाजू Fri, 26/12/2014 - 04:51

In reply to by अरविंद कोल्हटकर

२५ डिसेंबर हा जिनांचा जन्मदिवस आहे हे बरोबर आहे पण तो पाकिस्तानचा 'राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन' नाही. ब्रिटिश इंडियाच्या पश्चिमोत्तर आणि पूर्व भागांत 'स्वयंपूर्ण आणि सार्वभौम' (autonomous and sovereign) मुस्लिम राज्यांची मागणी स्पष्टपणे 'लाहोर ठरावा'तून मुस्लिम लीगने २३ मार्च १९४० ह्या दिवशी मांडली आणि म्हणून २३ मार्च हा दिवस पाकिस्तानमध्ये 'राष्ट्रीय दिन' म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानचा स्वातन्त्र्य दिन १४ ऑगस्टला पडतो.

(अवांतर: मी ते राष्ट्रीय दिन स्लॅश - 'किंवा' अशा अर्थी - स्वातंत्र्यदिन असे वाचले. मला वाटते 'आजचे दिनवैशिष्ट्य'करिता एक जेनेरिक टायटल म्हणून ते वापरले असावे. अन्यथा, २५ डिसेंबरला पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन मानण्याची चूक येथे बहुधा कोणीही करू नये. (चूभूद्याघ्या.))

२५ डिसेंबर हा पाकिस्तानचा अधिकृत 'राष्ट्रीय दिन' नसेलही - ते नामाभिधान अधिकृतरीत्या दुसर्‍या एखाद्या दिवसाकरिता दुसर्‍या काही कारणाकरिता असूही शकेल. (नव्हे, आय डेअरसे, आहे.) मात्र, २५ डिसेंबरचा दिवस पाकिस्तानात व्यापक राष्ट्रीय पातळीवर नाताळ म्हणून साजरा न होता कायदेआझमजयंती म्हणून साजरा होतो, ही बाबही नजरेआड करून चालणार नाही.

(कदाचित 'राष्ट्रीय महत्त्वाचा दिन' म्हणावे काय?)

(अतिअवांतर: त्याच न्यायाने, ९/११चा दिवस हा पाकिस्तानात कायदेआझमपुण्यतिथी म्हणून साजरा होत असावा काय?)

अरविंद कोल्हटकर Fri, 26/12/2014 - 21:02

बाबरचे पुण्यस्मरण?

कशासाठी?