Skip to main content

बागकामप्रेमी ऐसीकर २०१८

घरी मोगरा कुंडीत लावला आहे. जमिनीत लावायला आवडलं असतं, पण आमच्याकडे दोन-चार दिवस थंड होतं त्यात तो टिकणार नाही. त्या दिवसांमध्ये मोगऱ्याच्या कुंड्या उचलून आत आणावं लागतात. त्यामुळे फार मोठ्या कुंड्यांमध्ये मोगरा लावताही येत नाही.

तर प्रश्न असा आहे की आता तो फार मोठा झालाय. मुळं कुंडीत जेमतेम मावत आहेत. फांद्यांची छाटणी केली (आणि त्यांची कलमं करायला घातली आहेत). पण मुळांचं काय करावं? नवी माती, कंपोस्ट घालायलाही जागा नाहीये.

बाकी आवारात एक ८ बाय ८ फुटाचा पॅच तणानं भरलेला होता. ते तण उपटून पाहिलं, तणनाशक वापरून पाहिलं, काही फरक नाही. हिवाळ्यात तो भाग फूटभर खणला, माती बदलली. म्हणजे जुनी माती काढून, आवारातली पानं चुरून पसरलीत. थोडं कंपोस्ट. त्यात एक डाळिंबाचं झाड लावलंय. आणि इतर बरीच फुलं लावलेली आहेत. जंतू, तुझ्यासाठी रोजमेरीही लावल्ये त्यात; तुला काड्या पुरतील. टिंगल करणाऱ्यांसाठी झेंडू लावलाय. त्याचे फोटो लावते लवकरच. बाकी इतर बरीच फुलझाडं लावल्येत. ती फुलली तरच फोटो लावेन.

भाज्यांमध्ये चार टोमॅटो, दोन मिरच्या बऱ्यापैकी वाढल्या आहेत. दोन-दोन फुलं दिसत आहेत. भेंडी नुकतीच पेरल्ये. फार्मर्स मार्केटात चांगली कोथिंबीर मिळाली. तिच्या काड्या पाण्यात ठेवल्या आहेत. मुळं फुटली तर बाहेर लावेन.

गेल्या वर्षी दोन कुंड्यांत कॅटनिप लावलं होतं; हिवाळ्यात ते मरायला टेकलं आणि आता पुन्हा टरारून वर. शेवंतीसारखंच. ती एकाच जातीची झाडं. आजूबाजूच्या सगळ्या मांजरी आणि बोके कॅटनिपवर जमा होतात. आमच्या तिर्रीबाई बाकीच्या मांजरी आवारात बघून करवादायला सुरुवात करतात. शक्य झालं तर तिच्या करवादण्याचा व्हिडिओही लावेन. बरा अर्धा तिच्यासारखे आवाज काढून तिला छळतो.

चिमणराव Mon, 26/03/2018 - 08:22

प्रयोग आवडले.
तिकडचे हवामान पाहता - थंडी संपता संपता मुळांभोवती शेणखत (भरपूर घाला) घालून पाणी द्या. नंतर मात्र कुंडीतले पाणी बाहेर वाहिल इतके नको. पानं काढलीत हे बरोबर. उन्हाचा तडका लागला की नवीन फुटवे अधिक कळ्या येतात. कळ्यांचे प्रमाण मूळ रोपाच्या वाणावरच अवलंबून.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 27/03/2018 - 22:08

In reply to by चिमणराव

पानं काढली, फांद्याही छाटल्या. पण प्रश्न तसाच आहे. कुंडीतली बहुतेकशी जागा मुळांनीच व्यापली आहे. खत द्यायचं तरी कसं?

चिमणराव Wed, 28/03/2018 - 06:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१) कुंडी मोठी घेणे./
२) मुळं छाटणे. सर्वच मुळांची टोके न छाटता काही मोठी मुळे कापून जागा करायची. मोगरा दणकट असतो मरत नाही, उकाडा ऊन आवडणारे झाड आहे. पोकळ जागेत खत भरायचे. मुळे सुरू होतात खोडापासून ती गाठ मातीच्या किंचित वर राहील असे बसवायचे.

कुंडीचा आकार आटोपशिर (आताचा आहे तो)ठेवायचा असेल तर - नर्सरीतून रोप आणल्यावर ते कुंडीच्या तळाशी शेणखताच्या थरावर ठेवायचे, सर्व बाजूंनी शेणखतच (माती कमीच)भरायचे. पाणी खाली वाहील इतके द्यायचे नाही. असे केल्यास सेप्टेंबरपर्यंत तीनदा बहर येतात. नंतर ते रोप विश्रांती अवस्थेत जाते. फुले येत नाहीत. तेव्हा ते जमिनीत लावून टाकणे.
प्रत्येक झाड आपला सामान्य आकार घेण्याचा प्रयत्न करते ,मोगरा चार बाइ चार फुट जागा घेतो. जमिनीत लावलेल्या झाडाच्या लांबलाब वाढणाय्रा फांद्या न कापता/छाटता त्यांची लेअरिंग पद्धतीने नवीन रोपे सहज करता येतात.

फांदीवर एकाच प्रतलात दोन दोन पाने असतील तर वेल मोगरा, एकाड एक विरुद्ध पाने ते झुडुप बुशटाइप.

चिंतातुर जंतू Tue, 27/03/2018 - 12:22

"There’s rosemary, that’s for remembrance; pray, love, remember"
- ऑफेलिया (हॅम्लेट)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 28/03/2018 - 20:11

परवा धागा काढला, आणि कालच मॉर्निंग ग्लोरीला कळ्या आलेल्या दिसल्या. दुर्दैवानं पहिला रंग गुलाबी दिसतोय. पण अमेरिकेत मिळणारी फुलझाडं जरा गुलाबी असतात. त्याला इलाज नाही.
मॉर्निंग ग्लोरी

या वेली असतात, त्या चढवण्यासाठी स्टँड आणायचे/बनवायचं बाकी आहे. येत्या विकेण्डला तेही पुण्यकर्म करेन म्हणत्ये. मी पहिल्यांदाच हे झाड वाढवणारे. व‌ार्षिक असतं, बियांपासून वाढवलं. बरेच दिवस बाळरोपं छोट्या डब्यांत अडकल्यामुळे पानं अंमळ मरगळेली दिसत आहेत. लवकरच त्यांचाही रंग सुधारेल, अशी आशा आहे.

चिमणराव Wed, 10/10/2018 - 07:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एका ठिकाणी ( आबू )जांभळी मॅार्निंग ग्लोरी वेल दिसले. पण बंगल्यात कुंपणावर नव्हते नाहीतर एखादी कटिंग काढलीच असती. म्हणजे नक्की जांभळीच फुले येतात.
आणि एका घरात कासव होते! ( शर्यतवाले कासव भारतात नाही,जमिनीवरचे जाड पायांचे. कूर्मावतारी पाण्यातले असते.)
फोटो ( facebook group "aise rasik"वरून टाकला आहे.)

चिमणराव Thu, 29/03/2018 - 04:46

कृष्णकमळाला भारतात फळं( प्याशन फ्रुट) धरत नाहीत. पोर्तुगीजांनी वेल आणला पण परागीभवनाचा किटक आणायला विसरले. दुसय्रा देशांत फळे धरतात.(सिंगापूर ~~)

सामो Tue, 09/10/2018 - 20:02

In reply to by चिमणराव

केशर? अहाहा.
मी इथुन अत्युत्कृष्ट प्रतिचे केशर घेउन येणारे दिवाळीला, थोडं घरी. थोडं नरसोबाच्या वाडिला, पादुकांवरती.

सामो Wed, 10/10/2018 - 10:42

In reply to by चिमणराव

:) च्रट्जी, गाणगापूरच्या निर्गुण पादुकांना तर म्हणे फक्त फक्त केशर-अत्तराचा लेप असतो.
वाडीच्या मनोहर पादुकांबद्दल काही ऐकले नाही. पण एक माहीत आहे की हळद-कुंकू प्रकार देवीकरता असतो. तो पादुकांकरता नसावा.

चिमणराव Sun, 12/08/2018 - 11:43

गच्चीतला / बॅल्कनीतला भाजीपाला -

आपल्या घरापाशी थोडा भाजीपाला वाढवता आला तर अगदी स्वच्छ आणि ताजा मिळेल असा कधीतरी विचार येतो. अपेक्षित कुंड्या / झाडे पाच ते पन्नास. ते कसे साध्य करायचं पाहू.

सुरुवात सोप्या झाडांनी करायची आहे.

१) माठ - लाल आणि हिरवा.

२) पालक ,अंबाडी,मेथी वगैरे.

३)अळू, खायचे आणि वडीचे.

४) मोठी झाडे - शेवगा आणि कढीलिंब.

५) फळभाज्या - कारली, दुधी,घोसाळी इत्यादि.

६) शेंगावर्गीय - चवळी, घेवडा,फरसबी ( फ्रेंच बीन्स), गवार , वाल वगैरे.

७) हिरवा / ओला मसाला - कोथिंबीर, पुदिना, लसूण पात.

८) इतर - गवती चहा,

९) कंद - आले, हळद .

आता सप्टेंबरनंतर थंडी सुरू होणार आणि वरच्या यादीतल्या भाज्यांना थंडी मानवते.
महाराष्ट्रात डिसेंबर - जानेवारीत तापमान १० अंश सेंटिग्रेडपर्यंत खाली काही दिवस राहाते. पण शहरांत वाहतुकीमुळे आणि दाट लोकवस्तीमुळे १५-२० पेक्षा वरच राहते. इमारतीच्या दक्षिण भागाकडे येणाऱ्या फ्लॅट्सना ऊन अधिक मिळते असं पूर्वी म्हटलं जायचं परंतू टावर्सची संख्या वाढत गेल्याने तेवढा सूर्यप्रकाश तळाकडच्या घरांच्या बॅल्कनींत येत नाही. त्यामुळे करून पाहा हेच सांगावे लागते.

पालक, माठ,अंबाडी
आपल्या जागेत भाजीपाला होतो का, आपल्याला हे जमेल का हे पाहण्यासाठी या तीन भाज्या ठरवल्या आहेत. बी-बियाणे, खते काही नको. बाजारातून या भाज्यांच्या मुळं असलेल्या छोट्या जुड्या कधीकधी विकायला येतात त्या आणा. चारपाच इंचांची रोपे त्यात असावीत. अंबाडीची पाचसहा इंचांची असतात. भाजीसाठी म्हणून मोठी पाने काढून घ्या. शेंडा , मूळ तसेच ठेवा. ही सर्व रोपे म्हणून कुंडीत लावा. पाणी फार द्यायचे नाही. पंधरा दिवसांत रोपे वाढतील. मोठी पाने येतील ती काढून वापरायची पण झाड उपटायचे नाही. असे तीन वेळा करता येईल फेब्रवारीपर्यंत. याचप्रमाणे कोथिंबीर लावा.
खत अजिबात घालायचे नाही.
पालकाच्या दोन जाती दिसतात. एक मोठ्या गोल पानाची आणि दुसरी छोट्या लांबुडक्या पानांची. दुसरी बरी.
माठ - लालबुंद, हिरवागार,आणि लालहिरव्या पानांचा. हे वेगवेगळे मिळाल्यास छान. राजगिरा लाडू खातो तो राजगिरा पेरल्यासही माठासारखी झाडे येतात. पण भाजीचे बी काळे टणक असते. ती सर्व एकाच वर्गातली झाडे आहेत.
पालकात ए व्हिटमिन, माठात ए व्हिटमिन आणि लोह अधिक असते.
अंबाडीस पुढे मोठी पिवळी पांढरी फुले येऊन बी/ फळ धरते.
पुदिना- पुदिनाची काळसर हिरवी पाने दिसणारी जुडी आणा. मुळं असण्याची गरज नाही. फक्त पाने काढून घ्या. काड्या मातीवर आडव्या ठेवून त्यावर दाबण्यासाठी थोडी माती टाकून पाणी द्या. प्रत्येक गाठीतून दोनदोन शेंडे वर येतात आणि एक दाट गुच्छ तयार होतो. गांडुळ खत एकदोन चमचे टाकल्यास चांगला दर्प येणारी पाने येतात. पुदिन्याची ओली पाने वापरतो शिवाय वाळवून हिरवी पाउडर ही वापरता येते.
मेथी - आता बाजारात जी मेथी आली आहे जाड पानांची तो 'मेथा' आहे. फार कडू असते. थोड्या दिवसांनी पोपटी रंगाची पातळ पाने आणि पांढुरक्या काड्या असणारी मेथी येईल ती लावा. याची त्रिदल पाने खुडुन वाळवून ठेवल्यास कसुरी मेथी होते. अलुमिनम पाउचमध्ये वास चांगला टिकतो. बऱ्याच पदार्थांत शेवटी टाकता येतात. ओली पाने मेथी पराठा किंवा भजीसाठी वापरता येतात. कडुपणा फार नसतो, रंग छान असतो.

कुंड्या, माती
गच्ची असो वा बॅल्कनी, कुंड्यांचा संपर्क जमिनीशी नसतो त्यामुळे पाणी घातल्यावर ते बाहेर पडते ते कुठे मुरत नाही. ही एक मोठी त्रासदायक गोष्ट असते. जास्तीचे पाणी खताचा अंश धुऊन नेते तसेच लाल माती वापरली असल्यास ते लाल ओघळ वाईट दिसतात. कुंडी लहान असल्यास बारा अठरा तासानंतर माती वाळायला सुरुवात होते. भाजीपाल्यास सतत ओलावा/दमट असलेली माती पोषक असते. खूप चिखलही नको आणि माती अधुनमधून कोरडीठाक होता कामा नये. मुख्यत: पानेच उपयोगाची असतात आणि त्यासाठी सतत एकसारखा ओलावा टिकणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्तम उपाय - प्लास्टिक ट्रे. हे बाजारात दोन आकारात मिळतात.
5x9x2 इंच
9x11x2 इंच
या ट्रेंमध्ये एक इंचाचा मातीचा थर घालून त्यावर कुंडी/ प्लास्टिक पिशवी/ कापडी पिशवी ठेवावी. वाहिलेले पाणी खालच्या मातीच्या थरात साठते आणि झाड ते वापरते. मुळं त्यातही पसरतात आणि
झाड जोमदार वाढते. दोन दिवस पाणी घातले नाही तरी रोपे लगेच वाळत नाहीत. साठलेले पाणी मातीत असते, डास होत नाहीत. एक विशेष काळजी प्लास्टिक ट्रे'ची घ्यावी लागते ती म्हणजे उन्हाने फाटू नयेत यासाठी काळ्या प्लास्टिक कापडाच्या पट्टीने काठ झाकणे. तळावर माती असल्याने तिथे ऊन लागत नाही. काळ्या प्लास्टिकचे ट्रे मिळत नाहीत. कापडी पिशव्या म्हणजे पॅालिएस्टर कापडाच्या. या उन्हाने फाटत नाहीत, पाण्याने कुजत नाहीत आणि मुळांना चांगला गारवा देतात. छोट्या ट्रेमध्ये अर्धा/एक किलोच्या पिशव्या राहतात, मोठ्या ट्रेमध्ये पाच किलोची पिशवी ठेवता येते. कढीलिंब आणि शेवगा यासाठी उत्तम. वेलभाज्यांसाठीही.

छोटे आणि मोठे दोन्ही आकाराचे ट्रे बॅल्कनीस/ खिडकीस केलेल्या बॅाक्सटाइप ग्रिलमध्ये बसतात. पाणी न वाहल्याने इतरांच्या तक्रारी येत नाहीत. छोटा ट्रे थोडी खटपट करून ( चार नाइलॅान दोऱ्या बांधून, दोरीचा वळसा तळाखालून घेणे) टांगता येतो. यामध्ये पुदिना लावावा. खूप झान झुपकेदार दिसतो. कामपण, शोभापण.

बी-बियाणे
या भाज्यांसाठी आपण बाजारातल्या बी-बियाणांवर अवलंबून राहात नाही.

कीड निर्मुलन
कोणतेही रासायनिक फवारे वापरायचे नाहीत. याचसाठी आपल्या जागेत भाजीपाला लावतो. रोगटपणा दिसल्यास उपाय - झाड अधिक उन्हात ठेवणे/ पाणी कमी देणे /अथवा उपटून टाकणे / उन्हाळी लागवड करणे.
काही रोग - पांढरा मावा, पांढरी माशी, तुडतुडे यांचा प्रकोप थंडीत फार असतो. कारण धुकेमिश्रित ओली थंडी. फेब्रुवारी १५ / महाशिवरात्रीनंतर लागवड करा.

( लेखन बाकी आहे.)

घनु Tue, 14/08/2018 - 10:44

In reply to by चिमणराव

अनेकानेक धन्यवाद अ.बा. फारच माहितिपुर्ण :) लगेच सुरुवात करून लवकरात लवकर कळवतो :)

एक विशेष काळजी प्लास्टिक ट्रे'ची घ्यावी लागते ती म्हणजे उन्हाने फाटू नयेत यासाठी काळ्या प्लास्टिक कापडाच्या पट्टीने काठ झाकणे. तळावर माती असल्याने तिथे ऊन लागत नाही. काळ्या प्लास्टिकचे ट्रे मिळत नाहीत. कापडी पिशव्या म्हणजे पॅालिएस्टर कापडाच्या. या उन्हाने फाटत नाहीत, पाण्याने कुजत नाहीत आणि मुळांना चांगला गारवा देतात. छोट्या ट्रेमध्ये अर्धा/एक किलोच्या पिशव्या राहतात, मोठ्या ट्रेमध्ये पाच किलोची पिशवी ठेवता येते.

जमल्यास वर दिलेल्या माहितीचा एखादा फोटो देऊ शकाल का? नेमका अंदाज येईल.

चिमणराव Tue, 14/08/2018 - 19:24

भाग दुसरा
गच्चीतला / बॅल्कनीतला भाजीपाला -
साधने -

अगोदरच्या भागात आपण थोडी कामचलाऊ माहिती घेतली. घराच्या अंगणात किंवा मागे जमिनीत झाडे असतात त्यांच्या अडचणी आणि फायदे वेगळे असतात तसेच बॅल्कनीतल्या/ गच्चीवरील झाडांचेही काही वेगळे असतात.
१) ऊन अजिबात न येणे - उन्हाकडची बाजू बॅल्कनीला नसेल तर एकच उपाय म्हणजे मनी प्लांटसारखी झाडे टांगून वाढवणे. फक्त शोभेची. भाजीपाला वगैरे शक्य नाही.
२) ऊन येते किंवा दुपारनंतरचे फार कडक ऊन मिळते. ही खरीतर सर्वच झाडांसाठी गरजेची चांगली गोष्ट आहे. परंतू बॅल्कनीतली झाडे कुंड्यांमध्ये असतात आणि कुंड्याही तापतात. मातीच्या कुंड्यांतले पाणी लगेच सुकते,माती वाळते, रोपांवर ताण पडतो. प्लास्टिकच्या फार तापतात. कार्बन ब्लॅक घातलेले प्लास्टिक - काळे प्लास्टिक ( ओवरहेड टाक्या असतात ते) उन्हाला टिकते, फाटत नाही. इतर रंगीत प्लास्टिकचा चुरा होतो. शिवाय कुंडीच्या बाजूने पाण्याचा निचरा होत नाही.

३) गच्ची फार मोठी ओपन टेरेस असेल तर झाडांची हौस वाढत जाते. फळझाडेही लावली जातात. यांना मोठ्या कुंड्या लागतात. पाणी फार लागते. कधी पुढे गच्चीत कार्यक्रम करायचा म्हटल्यास मोकळी जागा मिळेल याचा विचार करूनच मोठ्या कुंड्या वाढवाव्यात. पंचवीस किलोंच्यावर वजन झाले आणि अशा बऱ्याच झाल्या तर त्या खालच्या सिलिंगवर न ठेवता तुळईच्या भागावर ठेवाव्या लागतात. कधी दहा बारा दिवस बाहेर परगावी गेलो तर पाणी देण्याची व्यवस्था करावी लागेल. कुणाला सांगावे लागेल. ठिबक सिंचन पसारा व्यवहार्य वाटत नाही. पुढेमागे गच्ची गळते म्हणून छप्पर घालावे लागल्यास बागकाम गुंडाळावे लागते आणि महागड्या मोठ्या कुंड्या फेकून द्याव्या लागतात.

४) बॅल्कनीतल्या कुंड्यांतून गळलेले पाणी खालच्या भिंतींवर लाल ओघळ सोडतात. एकाने केले की सोसाइटी सर्वांनाच झाडे काढायला लावते. थपकथपक पाणी खाली पडत राहाते ते वेगळेच.
४) हौस तर करायची, आवाक्यात ठेवायची, इतरांना त्रास नको या सर्वांचा विचार करता काही प्रयत्न केले आहेत ते पाहा.

फोटो १)

एक मोठा प्लास्टिक ट्रे(9x11x2 inches) , त्यात तळाला माती आहे, वर पाच किलोची प्लास्टिक पिशवी, पिशवीस खाली भोके पाडून माती भरून ठेवली आहे. जेव्हा यामधले झाड ( कढीलिंब, जास्वंद, शेवगा वगैरे मोठे होईल तेव्हा त्याची मुळे खालच्य ट्रेमधल्या मातीत पसरतात. तेव्हा पिशवीसह ट्रे हलवायचा, फक्त पिशवी उचलायची नाही.

फोटो २)

छोटा ट्रे( 5x9 x2 inches) त्यात पॅालिएस्टरची कापडी पिशवी, पिशवीतून वेलासाठी आधाराच्या दोऱ्या अगोदरच काढल्या/बांधल्या आहेत. पिशवीची तळाची शिवण बाहेरच ठेवायची आणि लांब टाके टाकायचे. त्यातून मुळे बाहेर खाली जातील. ट्रे'च्या कडा काळ्या प्लास्टिकने झाकल्या आहेत.

फोटो ३)

नेहमी बाजारात मिळणारी प्लास्टिक कुंडी ट्रेमध्ये. याचा बुडाकडे निमुळता होणारा आकार मुळांना पसरायला उपयोगाचा नाही.

फोटो ४)

ट्रे'ला कापडाने झाकून. रंगीत ट्रे झाकला गेला!

फोटो ५)

बाजारात मिळणारे या आकाराचे टब तळाला भोके पाडलेले/ नसलेले दोन्ही मिळतात. भोके नसलेला घेऊन त्यात तळाला थोडी माती घालून एक कापडी पिशवी ठेवली आहे. दोन पिशव्याही बसतात. पालक, कोथिंबीर, मेथी, माठ या भाज्या किंवा ओफिसटाइम (चिनीगुलाब) फुलझाडांसाठी उपयुक्त.

फोटो ६)

वरीलप्रमाणेच छोटा आकार. हे टब बॅल्कनी कट्ट्यावर सहज राहतात. पुदिना आणि लसुणपातीसाठी उपयोगी. पाणी घालताना कडेच्या मातीवर टाकावे. भिजून वर दिसेल एवढेच. खाली भोक नसल्याने टब काठोकाठ भरला जाणार नाही हे पाहावे. उघड्या गच्चीत पावसाचे पाणी साचेल आत आणि झाड कुजेल. हा धोका उथळ ट्रेमध्ये नसतो.
या टबांपेक्षा मोठ्या आकारातले काळ्या प्लास्टिकचे मिळतात.

फोटो ७)

शोभिवंत करायचे झाल्यास चिनी मातीच्या कुंड्या आहेतच. फार जड असतात. पण आतले झाड बदलून एखाददिवशी दिवाणखान्यात ठेवू शकतो. तीन दिवस ऊन न मिळाल्यास पाने पिवळी पडतील. रोज बदलावे.

फोटो ८)

यास खाली भोक असतेच त्यातून पाणी बाहेर वाहते ते भोक सिमेंटने बंद करून त्यात मातीचा थर दिला आहे. एका डब्याला अलुमिनियम पाइप तळाला घट्ट बसवला आहे. त्यात वरती बांबूची काठी घालून वेलाला आधार देता येइल. कुंडी घरात ठेवता येते. पाणी आत साचणार नाही याकडे लक्ष द्यावे.

५) पोर्टेबल आधार -
पिशवीतून आलेल्या दोऱ्या वरती कुठल्या आडव्या आधाराला बांधून वेल पसरवता येतात. पण हाच आधार कुंडीसह फिरेल असा करायचा झाल्यास अशक्य नाही परंतू फार खटपट करावी लागते. कारली, तोंडली अशी छान दिसतील.

करून पाहा.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 22/08/2018 - 21:02

हे बघून फार मानसिक त्रास होतोय.

या वर्षी आमच्याकडे खूप जास्त उन्हाळा आहे. १९व्या शतकात नोंदी ठेवायला सुरुवात झाल्यापासून, म्हणजे १००+ वर्षांच्या नोंदी आहेत, तिसरा सर्वात गरम उन्हाळा आहे. १०० फॅच्या (३७ सेल्सियस) वर सरासरी १३ दिवस असतात, या वर्षी आत्तापर्यंत ४०+ झाले आहेत. उन्हाळा, उकाडा, असह्य तापमानाचे आणखी निदान ३-४ आठवडे बाकी आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला हवा जरा निवळायला लागते.

झाडांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाहीये. वेळ मिळाला तरी एवढ्या उकाड्यात झाडांना किती पाणी घालावं असा प्रश्न पडतो. पाणी घालूनही पूर्ण उन्हातली फुलझाडं पिवळी पडायला लागली आहेत. हवा जरा निवळली की आमच्या दुष्काळी हवेत जगणारी ब्लॅक फूट डेझीसारखी फुलझाडं, रोझमेरी, लॅव्हेंडरसारखा पालापाचोळा आणखी मोठ्या प्रमाणात लावला पाहिजे. साध्या गवताला पाणी घालतानाही त्रास होतो.

चिमणराव Thu, 23/08/2018 - 10:04

मार्चमध्ये कुडाळातून मिरीच्या वेलाचा एक फाटा चारपाच फुट तोडून आणला. पेपराच्या गुंडाळीत ओले करून बॅगेत ठेवला. घरी आल्यावर तीन तुकडे करून लावले. ( तिकडे माडा पोफळीच्या वाडीत गारवा आणि दमटपणा असतो तो इकडे कसा मिळणार बॅल्कनीत?) एक प्लास्टिक पिशवी उलटी झाकली.+1 छान मुळे फुटून तीन रोपे झाली. मार्च ते मे उन्हाळा सहन केला. मला ती रोपे कशीही तयार करायचीच होती.

+1 = युट्युब विडिओ search - growing black pepper, betel leaf.

सामो Tue, 28/08/2018 - 21:45

In reply to by चिमणराव

वा! च्रटजी, बागकाम खूपच आवडतं तुम्हाला. मी सध्या ३-४ सावलीत वाढणारी रोपं आणली आहेत. बाल्कनीत फुलझाडे आहेत. मजा येते.

१४टॅन Tue, 02/10/2018 - 09:43

|| मुनिवर श्री आचरटबाबा (उर्फ अचरट/अचरटबाबा) प्रसन्न ||

ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व अचरटबाबा ह्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे करत गेलो. मोगरा मस्त वाढला. त्याच्या 'लॅटरल ग्रोथ'चं पहायचंहे काहीतरी, पण ते होईल. त्याचा रोगही आपोआप गेला. रोग असलेली पानं येणाऱ्या फांद्या छाटत राहिलो. आता हिरवीगार पानं येतात. मस्त वाट्टं त्याच्याकडे पाहून. फुलं काही यायला नाहीत. सहा महिने झाले.

बरेच दिवस नुस्ताच उंच वाढलेला सोनटक्का फुलू लागला. केलं काय, तर बेसिकली त्याच कुंडीत पूजेत वापरलेल्या असोल्या सुपाऱ्या टाकून दिलेल्या मातोश्रींनी. पुढेमागे खतच्च होणारै... ह्या विचाराने. मी त्या काढून फेकून दिल्या. एक सरळसोट काडी घेऊन सरळ खुपस खुपस खुपसली. असं करुन मातीची ढेकळं वर आली, ती चक्क हातांनी फोडली. मातीत प्रचंड पाणी राहत होतं. दोन तीन दिवस पाणी दिलंच नाही. झाडाला काऽहीही झालं नाही. माती मस्त सुकली. मग त्या भोकांत गांडूळखत ओतलं. मग थोडंच पाणी (साधारणत: १०० मिली.) दररोज न चुकता दिलं. मग जे सपाट्याने वाढलंहे म्हणता! सध्या झाडाची उंची ३ ते ४ फूट आहे. मग पाऊस आला. सगळ्याच झाडं पी-पी पाणी प्यायली. सध्या ह्या एकमेव झाडाला फुलं येतात.

कृष्णकमळाची मात्र ट्रॅजेडी झाली. मेलंच ते. त्याला पावसाचं पाणी काही मिळायचं नाही. तरी एका दिवसाआड मी घालायचो. शिवाय पावसाळा आहे म्हणून मी ते पार छाटून टाकलं होतं. आमची साधारण ४x४ फुटांची खिडकी फक्त ह्या झाडोबांच्या पानांनी व्यापली होती. त्याची लॅटरल ग्रोथ मस्त होती. पण एक दिवस मानच टाकली त्याने. त्याची मुळं काढून पाहिली. पांढरी आहेत. हे जगवायचा (पुनर्जन्म द्यायचा) प्रयत्न करावा की दुसरं आणावं? तसंही ह्या बुवांना फुलं काही कधी धरली नाहीत.

लिंबू युट्यूबावर सर्च करुन लावले. कराच्चं काय, तर लिंबू 'सेफली' कापून त्याच्या अखंड बिया मिळवायच्या. त्या कोरड्या करायच्या, आणि नखं/फोरसेपची मदत घेऊन सोलायच्या. घडीत त्या गुंडाळून ठेवून द्यायच्या. ह्यांच्या पाणी धरणाऱ्या बारीकशा कागदावरच्या जागेवर एक थेंब पाणी घालायचं आणि हे बाळ प्लॅस्टिकमध्ये ठेवून द्यायचं. दहा दिवसांनी बाळाला पाय फुटतात. (मुळं.) मग ते मातीत लावायचं. एकदम बारीक कोंब येतो. इवलंसं, एक मिमीचं पानही येतं. (हे एक बाळ माझ्याकडे सध्या आहे.) एक किशोरवयीन झाडही आहे. आठ झाडांतलं एकमेव जगलेलं. ते मस्त उन्हात ठेवल्यावर भल्लीमोठ्ठी पानं मिरवतंय सध्या.

पानवेलीची सक्सेस स्टोरी निराळीच. वसईला भजनलाल डेअरीतून हे झाड, उत्तम हँगींग कुंडीसकट १५० रुपयांना मिळालं. ह्याचं बरेचदा पिल्लू वाढवायचा प्रयत्न केला. तोही उन्हाळ्यात. ते काही झालं नाही. युट्यूबावर पाहिलं. खरी मेथड अशी, की 'एक तरी लीफ नोड, (पर्णसंपातबिंदू?) पाण्याखाली येईल अशा बेताने ह्याची एक फांदी पाण्यात बुडवून ठेवायची. दर दोन दिवसांनी पाणी बदलायचं. हे करताना ते भांडं/बाटली/डबा, ज्यात फांदी ठेवलीये पाण्यात, ते विसळणं अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या शिवाय मुळं फुटत नाहीत. 'का?' हा प्रश्न असेल तर अचरटबाबांकडे पास. ह्याला त्या पाण्याखालच्या पर्णसंपातबिंदूमधून अर्धपारदर्शक, अगदी नाजूक पांढरी मुळं येतात. ही साधारण १ सेमी झाल्यावर मुळं मातीखाली येतील अशा बेताने फांदी मातीत लावावी. दररोज न चुकता पाणी फार्फार महत्त्वाचं आहे. शिवाय अचरटबाबांची प्रतिक्रिया पहावी. त्यांनी बऱ्याच नोंदी लिहील्या आहेत. एका रोपाची तब्बल सात रोपं झाली आहेत. एकाच कुंडीत आरामात वाढताहेत. गच्च मोठ्ठी पानं बघून मस्त वाटतं. निराळीच 'थेरपी' आहे ही. शिवाय पानांची चव कलकत्त्याच्या ॲव्हरेज पानापेक्षा तिपटीने चांगली आहे. एक रोप शेजाऱ्यांनाही दिलं. पानांच्या बहिर्वर्तुळाचा (सर्कमसर्कल) व्यास ५-६ सेमी पासून ९-१० सेमी पर्यंत वाढलेला आहे.

उगीच फणस लावलेला. मस्त उंच वाढतो आहे. त्याचं काय करायचं हा प्रश्नच आहे. साताठ आंब्यांपैकी एकच आंबा ठेवला; बाकी आंबे पालघर तालुक्यातल्या 'जव्हार' गावी जाऊन लावले आजीआजोबांसोबत. हळद, आलं इ. फार फोफावलेत. तेच ते माती खणणे, गांडूळखत टाकणे झाल्यावर ते भलतेच उत्साहात आलेत. जास्वंद दोन आहेत. त्याला एकदा नवीन नवीन होतं तेव्हाच फूल आलेलं. परत काही यायला नाही.

हँगींगमध्ये पिनीआ नामक पुदिनासदृश प्रकार आहे. त्याला लटकवलेलं आहे. हा बुवा मृत्युंजय आहे. ठीक चाललं आहे बाकी. तो अजून गच्च वाढावा असं मनी आहे, ते पाहू.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 02/10/2018 - 17:27

In reply to by १४टॅन

मोगऱ्याला खताची गरज आहे. पोटॅसियम आणि फॉस्फरस अधिक, नायट्रोजन कमी.

कृष्णकमळ म्हणजे पॅशन वेल का?

१४टॅन Tue, 02/10/2018 - 19:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पॅशनफ्लॉवर. फ्रूट नाही म्हटलं कारण ह्याची म्हणे भारतात फळं होत नाहीत
मोगरा उलट छान वाढतोय सध्या. खताची गरज का बरं? पानांवरचा रोगही गेला. अचरटबाबांनी सांगितलं म्हणून मी द्रवरुप कीटकनाशक मारणंही थांबवलं होतं.
आणि हे पोटॅशिअम आणि फौस्फरस आणू कुठून? कांदा घालावा काय?

सामो Tue, 02/10/2018 - 19:19

In reply to by १४टॅन

आहे आहे पॅशन फ्रुटचे एक झाड औंध ला आहे. माझ्या सासऱ्यांच्या बंगल्यात होते. आता ती प्रॉपर्टी कोणाची आहे माहीत नाही. त्याला आलेली फळे मी खाल्लेली आहेत :)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 02/10/2018 - 19:24

In reply to by १४टॅन

एकदा खात्री करण्यासाठी, हेच ना?
पॅशन वेल

माझ्या शेजारच्या घरात हा पॅशनचा मोठा वेल आहे. तिच्या कंपाउंड वॉलवर वाढतो. दर थंडीत मरतो, हवा सुधारली की फोफावतो. त्यालाही फळं धरलेली बघितलेली नाहीत. मात्र फुलांचा सुगंध सगळीकडे पसरतो. ती दर वर्षी त्याची नवी रोपं बनवून शेजाऱ्यापाजाऱ्यांना वाटून टाकते. मी कधी वाढवलेला नाही. मात्र फार वाईट वाटून घेऊ नका; झाडं का मेली हे समजलं तरी पुढच्या वेळेस झाडं जगवायला त्याचा उपयोग होईल.

मोगऱ्याची वाढ चांगली आहे, पण कळ्या-फुलं धरत नाहीत याचा अर्थ पोटॅसियम, फॉस्फरस आणि सल्फर कमी पडतंय. किंवा ऊन. पोटॅसियम, फॉस्फरस आणि सल्फर आणायचं कुठून हे गूगलून पाहा. मी दुकानातून जैविक खतं आणते, विशेषतः कुंड्यांमधल्या झाडांसाठी. मूठभर घातलं की महिनाभर बहर येतो.

पिवळा डांबिस Fri, 05/10/2018 - 10:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा वेल माझ्याकडे आहे. कुंपणावर प्रायव्हसी म्हणून लावला होता तो आता कुंपणभर पसरला आहे.
त्याला वर दर्शवल्याप्रमाणेच फुलं येतात. फळं सुरवातीला हिरवी आणि पिकल्यानंतर लाल-आमसुली होतात. आकार साधारण बदकाच्या मोठ्या अंड्यासारखा आणि तेव्हडाच.
त्या फळातल्या गराला आणि बियांना एक विलक्शण मोहक सुगंध असतो. बायको त्याचं सरबत बनवते.

पिवळा डांबिस Tue, 09/10/2018 - 01:36

In reply to by चिमणराव

मी त्या फुलांवर भुंगे, एक प्रकारच्या मधमाश्या (आमच्याकडे यलो जॅकेट म्हणतात त्यांना) आणि कधी कधी हमिंगबर्ड्स देखील पाहिले आहेत.
तुम्ही परागणाविषयी म्हणत असाल तर सेल्फ पॉलिनेटिंग असावा. कारण असाच दुसरा वेल मी तरी घराच्या जवळपास पाहिलेला नाही. (अर्थात सगळ्या शेजाऱ्यांच्या परसात जाऊन तपासणी करणंही तसं शक्य नाही)

चिमणराव Tue, 09/10/2018 - 06:02

In reply to by पिवळा डांबिस

अंजिराच्या बाबतीत इकडचे उंबराचे परागिकरण/वहन करणारे किटक ( वास्प) हे चुकून करतात. माझ्याकडे कुंडीत दीडफुटी अंजिर होतं ( अंजिराची झाडं लोकांनी हौसेने बंगल्यात लावलेली आहेत त्याचे कटिंग लावून केलेलं) त्यालाही इतर झाडाप्रमाणे अंजिरं लागून गळून पडायची.
पुण्याजवळच्या सासवड,निरा भागात कशी काय फलधारणा होते माहीत नाही. थंड,कोरडी हवा ४०सेंमी पाऊस हेसुद्धा असेल.
तसंच काही या वेलास होत असेल.

सामो Tue, 09/10/2018 - 19:10

In reply to by पिवळा डांबिस

बायको त्याचं सरबत बनवते.

पिडां त्यांना आधीपासुन माहीत होतं का की सरबरत बनवता येतं? की प्रयोग केला?
सरबत प्यायला तुमच्याकडे यायला पाहीजे :)

अबापट Tue, 02/10/2018 - 20:13

In reply to by १४टॅन

पॅशन फ्रुट पुण्यात होते. भरपूर. ( पत्नीच्या आजोबांनी काहीही वनस्पती लावून यशस्वी वाढवल्या त्यातील हे एक.( अवोकॅडो दुसरे , अशा इतर पण काही) पॅशन फ्रुट चे सरबत लय प्यायलोय मी .

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 02/10/2018 - 20:27

In reply to by अबापट

बापट, आव्होकाडोला फळ धरतं का पुण्यात? वर्षातून किती काळ फळं येतात? कोणत्या दिवसांत फळ धरतं? माझी फार इच्छा आहे दारात आव्होकाडो लावायची. मात्र जागा नाहीये सध्या. असलेल्या झाडांतलं एखादं पडलं तर मात्र तिथे आव्होकाडोच लावेन.

फेसबुक मार्केटप्लेसवर डबल मोगरा, डबल तगर आणि कढीपत्ता मिळाला. ते प्रकरण घरी दोन महिने आहे. कढीपत्ता या वर्षी हिवाळ्यात कसा जगतोय बघू. शून्य अंश सेल्सियसला टिकला तर मात्र पुढच्या वर्षी जमिनीतच लावणार आहे.

एका भारतीय कुटुंबानंच ही झाडं विकायला ठेवली होती. त्यांनी घराच्या मागीलदारी नर्सरी बनवली आहे. मला ती बाई भेटली; जेमतेमच इंग्लिश बोलत होती. मला तिच्याशी चिकार गप्पा मारायच्या होत्या, पण भाषेची अडचण. ती बहुदा मल्याळी आहे. घेवडा, तोंडली वगैरे कायकाय लावलं होतं बागेत. ग्रीनहाऊस बनवलेलं आहे. रोज दोन तास झाडांची काळजी घेते म्हणाली. "घर लहान असलं तरी चालेल, पण मागीलदारी जागा पाहिजे", असा नवऱ्याचा हट्ट होता म्हणाली. दोघांनाही बागकामाचं वेड असणार. त्याशिवाय एवढी नर्सरी टिकवणं शक्य नाही.

अबापट Tue, 02/10/2018 - 20:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पत्नी लहानपणी अवोकॅडोच अमुक आणि अवोकॅडोच तमुक इत्यादी अमाप गोष्टी कंटाळा येईपर्यंत खाल्ल्या म्हणते.प्रचंड प्रोड्युस यायचा म्हणे त्या झाडाला.लग्न झाल्यावर मीही थोड्याफार खाल्ल्यात . पुण्यातील पहिले का दुसरे झाड होते ते म्हणे. तिचे आजोबा मिलिटरीत होते , कुठून कुठून काय काय आणून लावायचे आणि जगवायचे . हौस.

चिमणराव Wed, 03/10/2018 - 06:42

सर्व नवीन खरडी वाचल्या.
टॅनोबा, पानवेल वाढवणं अवघड नाही. नंतर फोटोसह लिहीतो. लिंबू,चिकू, याच्या बियांची रोपटी लगेच होतात पण त्यास फळं लवकर येत नाहीत. त्यात वेळ घालवू नका. किंवा ते झाड मोठे झाल्यावर त्यावर कलम करा. हल्ली जाड सालीची लोणच्याची लिंबे गायब झाली आहेत.
लांब सुबक कळी येणाऱ्या मोगऱ्याा फुलं कमीच येतात. कुंपणाचे झाड आहे ते. थोडासा अस्ताव्यस्त वाढणारा वेलच असतो. आता खत देण्याची घाई नको. संक्रांती नंतर भरपूर शेणखत घाला. मार्चपर्यंत सुप्तावस्था असते. एक कुंद लावा. थंडीत बिनवासाची भरपूर फुले येतील.
ते फोटोतले फूल कृकमळच.
अण्णा तुमच्याकडून ती फांदी नेतो एकदा.

चिमणराव Wed, 03/10/2018 - 12:43

पानवेल,पिंपळी,मिरी एकाच कुळातील वनस्पती. सावलीत किंवा कमी सूर्यप्रकाश, सत्तर टक्क्यांवर दमटपणा लागतो. हे कोकणातल्या माडा पोफळीच्या वाड्यांत शक्य आहे. किंवा कर्नाटकात उंचावर(७००मी+ गारव्यात.
पानाची छोट्या पानाची "नागवेल" जमिनीवर पसरवल्यास खूपच माजते ( भरमसाठ वाढ.)
बिहारात मांडव घालून वर गवताचे विरळ छप्पर, पाण्याचे फवारे मारतात.
इकडे एक प्लास्टिक पिशवी उलटी झाकून दमटपणा आणता येतो, कापडी पिशवीत गारवा राहतो. मार्चमध्ये मिरी वेलाचे फाटे जगवले आहेत.
फोटोत पिशवी बाजूला करून दाखवली आहे. दोनचार तास पिशवी काढल्यास ३४ तापमानास वेल वाळतो.
फोटो १

फोटो २

चिमणराव Thu, 04/10/2018 - 05:36

हो. विड्याची पानं - त्याचा वेल मनीप्लान्टपेक्षा नक्कीच चांगला. दोन्ही कमी उजेडात येतात, हिरवेगार दिसतात,रोग पडत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/10/2018 - 06:12

रताळ्याचा वेल प्रचंड फोफावला आहे. अनेकवचनी. तो कापून पुन्हा ठीकठाक करता येईल; पण कापायची इच्छा नव्हती. जी झाडं, पानं, वेली कापल्यावर पुन्हा वाढतात अशा गोष्टी कंपोस्टात टाकून द्यायचं जीवावर येतं.

बऱ्या अर्ध्याशी या गप्पा झाल्या; मी रेन बॅरलमधून झारीत पाणी काढत होते. तेवढ्यात समोरून एक भारतीय वंशाची बाई जात होती. तिनं आवर्जून बाग आवडल्याचं म्हटलं. तिचा निर्देश कदाचित या भागाकडे असावा -

फुलबाग

मला लगेच रताळ्याच्या वेलीसाठी गिऱ्हाईक मिळालं. कापायला झाले होते त्यातले अर्ध्याधिक फुटवे तिच्यासाठी कापले. आणि मग समजलं, तीही मराठीच आहे. तिनं झेंडू आणि दसऱ्याचा विषय काढला. तिला तेही म्हटलं, "हवा तेवढा झेंडू घेऊन जा. जेवढी फुलं खुडली जातील तेवढी आणखी येतील. मला खुडायला आणि काही करायला वेळ नाही, हौस नाही." तिनं खरंच फुलं तोडली तर बरं होईल; माझं काम कमी होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/10/2018 - 06:52

In reply to by सामो

एक पुढच्या बाजूला आहे, एक मागीलदारी आहे. उद्या फोटो डकवते; त्यात ते वाढता-वाढता-वाढे रताळंही दिसेल.

पावसाचं पाणी छपरावरनं खाली येतं, त्या पायपांच्या खाली लावलेली आहेत; दोन्ही बॅरलं पाच मिनीटं पाऊस पडला तरी भरतात. पुढे हवेनुसार, पण किमान दोन आठवडेतरी पुरतात. सध्या अधूनमधून पाऊस पडतोय. त्यामुळे कदाचित पुढचा उन्हाळा येईस्तोवरही बॅरलं पुरतील. नळाचं पाणी नळीनं घालावं लागत नाही. वर पाणी भरलेल्या, निदान १० किलो वजनाच्या दोन झाऱ्या इकडेतिकडे फिरवून व्यायाम होतो तो निराळा.

नंदन Tue, 09/10/2018 - 09:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पावसाचं पाणी छपरावरनं खाली येतं, त्या पायपांच्या खाली लावलेली आहेत; दोन्ही बॅरलं पाच मिनीटं पाऊस पडला तरी भरतात.

Eaves-dropping आणि डबल-बॅरल असे जुने जालसंदर्भ आठवले :)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/10/2018 - 19:05

In reply to by नंदन

दोन्ही संदर्भ म.म.व. piping hot आहेत.

टेक्सासात फार पाऊस पडत नाही, पडला की एकदम खूप पडतो. आमच्याकडे वार्षिक पर्जन्यमान ३१ इंचाच्या आसपास आहे, पुण्याएवढंच. जमिनीत पाणी मुरू देणं आणि बाष्पीकरण कमी होऊ देणं असे पर्याय असतात. त्यातून चार-सहा फूट खोल खणल्यावर कातळ लागण्याचं प्रमाण जास्त, त्यामुळे पाणी जमिनीत किती मुरणार! रेन बॅरलं विकत घेण्यासाठी ऑस्टीन मनपा थोडे पैसे देते. तुका म्हणे त्यातल्या त्यात.

सामो Tue, 09/10/2018 - 19:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कसलं सुरेख आहे घर तुझं. लाल वीटांचं दिसतय नाहीतर आमच्या तेव्हाच्या ब्राउन्फेल आणि सॅन ॲन्टॅकनिओत कसली करडी व मातकट घरं. डोळ्यांना काही सुखच नव्हतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/10/2018 - 19:38

In reply to by सामो

इथेही बरीच पिवळट-मातकट रंगाची, स्थानिक दगडांच्या भिंती असलेली घरं बरीच असतात. आमच्या शेजारपाजारची बहुतेक घरं तशीच आहेत. बऱ्या अर्ध्याला लाल विटांचं घरच हवं होतं.

शेजारच्या मैत्रिणीचं घर पिवळट दगडाचंच आहे, आमच्यापेक्षा बरंच मोठंही आहे. मात्र तो रताळ्याचा फ्लोरोसंट हिरवा वेल आमच्या विटांच्या घरावर अधिक उठून दिसतो, असं तिचं मत. मी तिलाही वेलींचे थोडे तुकडे देण्याचा क्षीण प्रयत्न करून झाला.

सामो Tue, 09/10/2018 - 19:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बऱ्या अर्ध्याला लाल विटांचं घरच हवं होतं.

बरं झालं. मला ती करडी व पिवळट घरं नाही आवडायची. तुझं सुंदरच आहे.

मात्र तो रताळ्याचा फ्लोरोसंट हिरवा वेल आमच्या विटांच्या घरावर अधिक उठून दिसतो, असं तिचं मत. मी तिलाही वेलींचे थोडे तुकडे देण्याचा क्षीण प्रयत्न करून झाला.

:)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/10/2018 - 19:33

In reply to by चिमणराव

आली असणार. गेल्या वर्षी ऑगस्टाच्या शेवटी वेल जमिनीत लावली होती. नोव्हेंबर-डिसेंबरात कधी तरी वेल मेली. या वर्षी एप्रिलमध्ये पहिले फुटवे दिसले; जुलैपर्यंत नवनवीन ठिकाणी फुटवे फुटताना दिसत होते.

ती वेल मी शोभेसाठी लावली होती, तपकिरी जमिन/माती दिसण्याजागी हिरवं बरं दिसतं म्हणून. त्यामुळे खणून रताळी शोधली नाहीत. पण आता ही वेल एवढी वाढली आहे म्हटल्यावर कदाचित रताळी खणून काढेन. पुढच्या वर्षी कमी वाढ होईल, कदाचित.

चिमणराव Tue, 09/10/2018 - 19:44

सुंदर दिसतेय बाग,घर आणि रेन बॅरलही.

जमिन झाकण्यासाठी स्ट्राबेरी बरी वाटतेय/विचार करा. कारण थंडी पडते ना फार? बटाट्यालाही पांढरी फुले येतात.

१४टॅन Sat, 06/07/2019 - 18:27

उन्हाळा:
अतिशय कडक उन्हाळा होता. कंपोस्ट दुपारचे तीन तास कडक ऊन येतं अशा जागी ठेवलं आणि त्यातली हिरवी पानं करपली. पावसाळा आलेला आहे, आता ते छान तयार झालेलं आहे. अमूल ताक मला आणि बाबांना फार आवडतं. ते प्यायल्यावर रिकाम्या पिशवीत अगदी साधारण १० मिली पाणी घालून ते शिंपडणे, दह्याचे भांडे संपल्यावर ते विसळून त्याचे पाणी शिंपडणे इ. उद्योग केले. मिश्रण वरखालीही नियमित केलं. मी नसताना बाकी लोक त्यात सारखी फुलं पानं टाकत राहतात म्हणून ते एकजिनसी मात्र झालेलं नाही, पण छान झालंय. उन्हाळ्यात आंबा, फणस, तुळस, कृष्णकमळ इ.नी चांगला प्रतिसाद दिला. कृष्णकमळाला फूलही आलं. रातराणीला सुद्धा. पानवेल मात्र करपून गेली. सावलीत ठेवणे, भरपूर पाणी घालणे इ. उद्योग करूनही. तीन लिंबे लावली आहेत तिही वेगाने वाढली. बटमोगरा पूर्ण मेला(?). त्याचं खोडही वठलेलं आहे. हळदीची एकदम नवीन रोपे उगवली.

पावसाळा:
सगळी रोपे धुवून निघाली. कृष्णकमळाला भलीमोठ्ठी पानं आली. पानवेलीची नवीन रोपे बनवून लावली होती ती वेगाने वाढताहेत. पानवेलीला मुळातच उंच उंच वाढण्याऐवजी जागा व्यापायला आवडते असं निरीक्षण आहे. लिंबे वाढताहेत. आंबा आणि फणसही. घुशीचा उपद्रव आहे, एक आंब्याचं रोप काल मोडलं. तुळस मेली. जास्वंद वाढत आहेत. अतिशय वठलेल्या, पूर्ण छाटून टाकलेल्या बटमोगऱ्यातून एक कोंब आला, आणि तो आता वाढतो आहे. तुळशीचं गणित काही जमेना. पानवेल एका ट्रेमध्ये लावली आहे. तिने पूर्ण तो व्यापून टाकावा आणि छोटेखानी जंगलच बनावं असा मानस आहे.
'फॉलिअर' उत्तम खत आहे. जरूर वापरावे. अगदी जवळपास निष्प्राणच झालेल्या झाडाला, ह्याचंच ५% wv द्रावण घातलं आणि ते एकदम बहरलं. ह्याच मात्रेचा स्प्रे मारल्यास कीडही नष्ट होते आणि तजेलदार पानेही येतात. कडूलिंब-गांडूळ खत वापरतो. कंपोस्टही. ताक-दही सुद्धा. वाया गेलेली लिंबे लिंबाच्या झाडाभोवती पुरणे हाही चांगला उद्योग आहे, ज्याला मिळालं ते झाड उत्तम वाढतं आहे. मिरची मात्र उन्हाळ्यात वाढत होती ती गेली.

पानवेलीला मुळातच उंच उंच वाढण्याऐवजी जागा व्यापायला आवडते असं निरीक्षण आहे.

हिला काठी दिली तरी चढण्यात इंटरेस्ट नसतो. मस्त पानंच पानं आली आणि आता तिने एकदम जमिनीवर (ट्रेमध्ये खरंतर, मातीत) लोळण घेतली. प्रत्येक लीफ नोडातून पांढरी पांढरी मुळं फुटतात. जी ओरिजिनल फांदी लावलेली असते तिथे तर खूप मुळांचा फुलोराच येतो आणि ती जाडजूड होते. मस्त उद्योग. ट्रे भरून टाकायचा आहे.
कडुलिंब बाजूला कोणतरी छाटून टाकलं आहे. त्याचा बचकभर पाला आणून कंपोस्टात टाकला, थोडा झाडांत टाकला. आहे त्याच्या पाचपट अजूनही रस्त्यावर पडलाय, अजून आणावासा वाटतोय. पण ते कंपोस्ट पटापट तयार नाही होत बा. तो एक वैताग.
बटमोगऱ्याच्या कुंडीत पाणी साचतं. कुंडीखाली दगड ठेवणं, काठी भोसकून मुळं न दुखवता पाणी भरभर जायला जागा करून देणं इ. प्रकार केले, पण पानं कुरतडल्यासारखी येताहेत. तो कोंब चांगला सहा इंच वाढलाय. कळंना. पाणी साचून साचून तुळस मेली. आता नवीन रोप. तुळस प्रोपगेट कशी करतात? फांद्या की मंजिऱ्या? की पाण्यात घालून पितात ते बी?

चिमणराव Sat, 29/06/2019 - 16:10

In reply to by १४टॅन

माझ्याकडच्या कृष्णकमळाच्या
१) पानांच्या कडा फार दातेरी नाहीत.
२)फुलांना गुलाबपाण्याचा मंद मंद सुगंध आहे.
३) विकीपानात फळांना पेरुचा वास येतो म्हटलय, फुलाच्या वासाबद्दल काही नाही.
फोटो

'न'वी बाजू Sat, 29/06/2019 - 18:38

In reply to by सामो

इतके का सुंदर आहे ते?

म्हणजे, बंगालीत ज्याला 'भीषण सुंदर' किंवा 'दारुण सुंदर' म्हणतात, तशापैकी?

('श्रीश्रीश्रीश्रीश्री'? किंवा 'श्री१०८'?)

चिमणराव Sat, 29/06/2019 - 19:17

In reply to by 'न'वी बाजू

१) भिषोण भालो?
२) या फुलाचा ( पोर्तगिजांनी आणलं विसरून) काही संबंध महाभारताशी जोडण्याचा अट्टाहास ऐकला काय?
बाहेरचे कौरव ( तीस रजेवर ), पाच पांडव, मधल्या तीन कोण ?

गवि Mon, 24/06/2019 - 09:27

अनेक झाडांसोबत एक मोसंबी झाड लावलं. त्याला लहान असूनही एक मोसंबं लागलेलं होतं (नर्सरी ट्रिक??)

ते जरा मोठं होऊन आणि रंग धरुन अचानक गायब झालं. (कोणी पक्ष्याने पळविले असेल. मनुष्य आत येऊ शकणार नाही जनरली. असो.).

तर त्यानंतर एक वर्ष होऊन गेलं. ते रोप वाढतही नाही, मरतही नाही आणि फूल फळ धरण्याची तर चिन्हेही नाहीत. त्याच्या आजूबाजूला सोबतच लावलेली त्याच वयाची आंबा, फणस, रातराणी*, जामफळ ही झाडं व्यवस्थित वाढली आहेत. तीन आठवड्यापूर्वी पूर्ण बागेत शेणखत (या नावाने त्या माणसाने जे काही आणलं असेल ते) आणि माती छोटा ट्रकभर आणून पसरली. तरी काही फरक नाही, पाऊस, पाणी घालणं चालू आहे.

लिंबू या झुडुपाचीही तशीच स्थिती आहे. (दोन्ही सिट्रस झाडं)

काय करावे कळेना.

* रातराणी हे प्रकरण कशाच्या आधारे उभं करुन वर चढवावं लागेल का? जमिनीवर लोळत चालल्यात फांद्या

चिमणराव Mon, 24/06/2019 - 10:32

दोन वर्षांपूर्वी राणीबाग प्रदर्शनात (जाने शेवटी असतं) बरेच बंगाली नर्सरीवाले आले होते संत्री, मोसंबीची झाडं विकायला. दोनफुटी झाड, फक्त मुळांचा झुपका, त्यावर पंचवीसेक फळं ,१५०रु. ते घ्यायला हवं होतं असं घरी आल्यावर मत पडलं.
पण नंतरच्या प्रदर्शनात आलेच नाहीत.
कृष्णकमळाने दणका दिलाय. शंभरेक कळ्या महिन्यात फुलणार आहेत. खत घातलेलं नाही.
काळी वैजयंती तुळस (पंढरपुरी ,मणी करतात ती) दोन वर्षं झाली कुठेही मिळत नाहीये. फुलबाजारातही येत नाही.

चिमणराव Mon, 24/06/2019 - 10:38

दहा जूनला शहापूरला गेलेलो तिथे गोठ्याकडे बावनकशी कुजलेले शेणखत होते. विचारून पिशवीभर घेतले. जपून वापरणारे. नर्सीकडे येत नाही, बागेचे कंत्राटदार परस्पर गोठ्यातून पळवतात.

गोरेगावकडे राहणाऱ्यांना शेणखत आलडोराडो काय म्हणतात ते. शेणखताची लंकाच. किंवा नालासोपारा पूर्व पेल्हार धरणाजवळ.

चिमणराव Mon, 24/06/2019 - 10:45

रातराणीसाठी आधार - आता नगरपालिकाचे लोक रस्त्यावरच्या झाडांच्या फांद्या कापतात तिथून मोठे दांडके मिळतील.
शेवगाच्या झाडाचे छाटणी करतात फूट येऊन बऱ्याच शेंगा येतात . ते दांडके सरळसोट असतात. ते पुरून माझी आजी तोंडली,कारलीसाठी मांडव करायची. पुरलेले दांडके कुजत नाहीच, त्याला फूट येऊन शेंगाही लागायच्या.

सामो Mon, 24/06/2019 - 16:41

आमच्या बाल्कनीत एका नवथर कबूतर जोडीने घरटे केले आहे. मी डिलीव्हरीची वाट बघत बसलेय. एका कबूतराल बऱ्यापैकी कुतूहल आहे. तुळशीच्या फोफावलेल्या रोपापाशी जाउन, नीरीक्षण करत असते. नवीन वाटत असावे. कारण तुळस बाहेर कुठे पाहीली नाही ब्वॉ निदान या कबूतराच्या आसपासच्या परीघात तरी नाहीच.

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 01:00

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)