Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६२

हा काय अँटीक्लायमॅक्स??

उडाला उडाला कपी तो उडाला
..उत्सुकता वाढते

समुद्र लंघोनी लंकेसी गेला
...काहीतरी ऍक्शनपॅक्ड घडणार म्हणून आपण सरसावून बसतो

लंकेसी जाऊन विचार केला
....विचार केलास? विचार? वि चा र ? अरे भाऊ मग तो किष्किंधा नगरीतच बसून करायचास की! एवढी यातायात का केलीस?

नमस्कार माझा तया मारुतीला
.....??

ही काय भानगड आहे? शेवटच्या दोन ओळी काही वेगळ्या आहेत का? पुढच्या श्लोकात स्पष्टीकरण आहे का? "विचार केला" हा काही संकेत आहे का? (माझ्या आठवणीप्रमाणे शेपूट पेटवल्यामुळे टाळकं सटकून मारुतीने लंका जाळली होती. विचार करण्यासारखं निरुपद्रवी कृत्य नक्कीच केलं नव्हतं.)

गवि Sun, 03/04/2016 - 08:18

सरकारनामा सिनेमातल्या "सत्कार करणे" यासारखा "विचार करणे" हा तत्कालीन कोडवर्ड असू शकावा असं म्हणण्यास हरकत नसावी असं माझं वैयक्तिक मत असू शकेल.

अमुक Sun, 03/04/2016 - 09:58

मीदेखील लहानपणी 'विचार' हाच शब्द ऐकला होता* पण आत्ता जालावर शोधले असता काही ठिकाणी 'लंकेसी जाऊनि चमत्कार केला' असं दिसलं. तसं असेल तर चमत्काराला नमस्कार करायला प्रत्यवाय नसावा. चमत्कार हा शब्द खरा तर लयीत बसत नाही पण खरेखोटे श्लोककार जाणे.
*(व त्यामुळे विचारात पडलो होतो. पण अश्या शंकाना वाव पुष्कळ असतो नि मारुतीच्या शेपटासारख्याच त्या लांबत जातात हे नंतर कळले. उदा. 'आणिला मागुती नेला आलागेला मनोगती' म्हणजे !??!!? किंवा 'वनारी(रि)/वानरी अंजनिसुता रामदूता प्रभंजना' ह्या ओळींत वनारि = वनाचा शत्रू ?, वनारी = ?, वानरी असेल तर रामदासांना तसे खरोखरच अभिप्रेत होते का वगैरे शोध घेणे आले. गेल्याच वर्षी हा दिव्य लेख नसरेस पडला! किंवा जालावर 'वनारी'ऐवजी 'वर द्यावे अंजनिसुता' असे आढळते. एकूणात मूळ प्रतीत काय लिहिले होते नि विपर्यास कसा होत गेला हे शोधणे क्रमप्राप्त होऊन बसते.)

बॅटमॅन Sun, 03/04/2016 - 18:57

In reply to by अमुक

वनारि-वानरी बद्दल सहमत. रामदासी वाङ्मय पाहिल्यास एकूणच रामदासांची भाषा जराशी अनगड होती हे दिसून येते. त्याचाच हा परिणाम असावा.

चार्वी Mon, 04/04/2016 - 18:59

In reply to by अमुक

* 'विचार'चा संस्कृत अर्थ discussion, deliberation असा आहे. तो अर्थ अभिप्रेत असावा का? पण हनुमानरावांनी लंकेत जाऊन शिष्टाई केली असे काही ऐकल्याचे आठवत नाही.

* मला वाटते मंद्राद्रिसारिखा द्रोणु युद्धभूमीवर 'आणिला आणि मागुती (परत) नेला' असा अर्थ असावा. ही नेआण करताना त्याने मनाच्या वेगाने प्रवास केला. मनाचा वेग सर्वोत्तम वेग. (अधिक माहितीसाठी पहा: मन चपय चपय्..बहिणाबाई)

आदूबाळ Mon, 04/04/2016 - 19:13

In reply to by चार्वी

मंद्राद्रिसारिखा द्रोणु युद्धभूमीवर 'आणिला आणि मागुती (परत) नेला

हायला एवढ्या युद्धाबिद्धाच्या गडबडीत जागच्या जागी परत ठेवला होय!

Nile Mon, 04/04/2016 - 19:23

In reply to by आदूबाळ

अहो गडबड तुमच्यासाठी. हनमानाच्या घड्याळातला काटा सेकंदानं सुद्धा पुढं सरकला नाही या सगळ्या प्रकारात!! आहात कुठं!

बाकी, रिलेटीव्हीटीचे पहिले प्रात्यक्षिक हेच बरं का!

राजेश घासकडवी Sun, 03/04/2016 - 18:47

विचार हा शब्द विचरण, विहार या अर्थाने आला असावा. 'खुद्द लंकेत जाऊन तो पठ्ठ्या मोकळेपणे फिरला' याबद्दल मारुतीला नमस्कार आहे.

-प्रणव- Mon, 04/04/2016 - 17:17

माहेर या शब्दाची व्युत्पत्ती काय? शब्दश: आईचे घर असा अर्थ होतो काय? हा शब्द फक्त स्त्रियांना लागू होतो का?

कोणाचे लग्न झाले नसेल आणि ती व्यक्ती आई वडीलांपासून दूर राहत असेल, तर तिच्या आईच्या घराला तिचे माहेर म्हणता येईल काय? का माहेर ही कन्सेप्ट फक्त लग्न झाल्यावरच "निर्माण" होते?

नितिन थत्ते Mon, 04/04/2016 - 18:04

In reply to by -प्रणव-

माझ्या मित्रांपैकी अनेक त्याच शहरात विभक्त कुटुंबात राहतात. ते आपल्या पालकांच्या घरी जातात तेव्हा त्यांच्या घरी फोन केला तर "अजून आलेला नाही. आज (त्याच्या) माहेरी जाऊन येणार आहे" असे त्यांच्या बायका सांगतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 04/04/2016 - 18:43

In reply to by -प्रणव-

ज्या गावात/देशात/संस्थेत पीएचडी केली किंवा आयुष्यातला अतिशय सुखाचा, विद्यार्थीदशेचा काळ घालवला त्याला माहेर म्हणण्याचीही एक पद्धत आहे. ह्या वापराचा लग्नाशी काहीच संबंध नाही; सुखापासून अवकाश-काळ या दोन्ही मितींमध्ये दूर जाण्याशी संबंध जोडला आहे.

Nile Mon, 04/04/2016 - 17:53

विचार केला म्हणजे, सीतेला घेऊन जाऊ का असे विचार'ले. इतक्या सोप्या गोष्टी कशा कळत नाही तुम्हा झंटलमन लोकान्ला!

-प्रणव- Tue, 05/04/2016 - 12:40

घरातल्या भिंतीवरल्या घडाळयाना सेकंद काटा का असतो? असं काय आपण घरी करतो जे कि मोजायला सेकंद लेव्हल वरचं अचूक मोजमापन लागतं?

उगाच टिक-टिकीने त्रास मात्र होतो.

गवि Tue, 05/04/2016 - 13:57

In reply to by -प्रणव-

घरातल्या भिंतीवरल्या घडाळयाना सेकंद काटा का असतो? असं काय आपण घरी करतो जे कि मोजायला सेकंद लेव्हल वरचं अचूक मोजमापन लागतं?

उगाच टिक-टिकीने त्रास मात्र होतो.

घड्याळ चालू आहे की बंद ते कळत राहणं तितकंच महत्वाचं असतं. त्यासाठी.

गवि Tue, 05/04/2016 - 16:32

In reply to by नितिन थत्ते

याखेरीज एक बाब अशी, की घड्याळ्याच्या टिकटिकीपैकी किती भाग सेकंदकाट्याचा खासकरुन असतो आणि किती मूळ गियर्स आणि मेकॅनिझमचा असतो याविषयी शंका आहे. सेकंदकाटा मोठा असेल तर एक अगदी सूक्ष्म अ‍ॅडिशनल पण हलका टक टक असा आवाज येतो पण मुळात टिकटिक सेकंदकाटा नसतानाही आतल्या मूव्हिंग पार्ट्समुळेच मुख्यतः ऐकू येईल किंवा कसं याबद्दल क्लॅरिटी नाही.

'न'वी बाजू Tue, 05/04/2016 - 17:05

In reply to by गवि

सेकंदकाटा मोठा असेल तर एक अगदी सूक्ष्म अ‍ॅडिशनल पण हलका टक टक असा आवाज येतो पण मुळात टिकटिक सेकंदकाटा नसतानाही आतल्या मूव्हिंग पार्ट्समुळेच मुख्यतः ऐकू येईल किंवा कसं याबद्दल क्लॅरिटी नाही.

पुडिंगाचा पुरावा खाण्यात असतो, म्हणतात. (चूभूद्याघ्या.) शिवाय, हातच्या कांकणाला आरसा बोले तो ओव्हरकिल ठरावा, अशीही किंवदंता आहे.

सांगण्याचा मतलब, घरच्या घड्याळाचा सेकंदकाटा तोडून पाहिल्यास त्वरित शंकासमाधान होऊ शकेल, असे यानिमित्ते अतिविनम्रपणे सुचवू इच्छितो. बाकी, थोरल्या छत्रपतींचा जन्म शेजारघरीच होणे अनावश्यक; जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला; स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही; इ.इ., अँड सो ऑन अँड सो फोर्थ.

सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.

गवि Tue, 05/04/2016 - 17:12

In reply to by 'न'वी बाजू

घरच्या घड्याळाचा सेकंदकाटा तोडून पाहिल्यास त्वरित शंकासमाधान

त्यानंतर घरात अनेक अनुषंगिक खणखणाटी आवाज होतील आणि छातीतल्या वाढीव ठकठकीचा त्रास उरेलच तस्मात तूर्तास ही शंका स्थगित ठेवण्यात हित.

'न'वी बाजू Tue, 05/04/2016 - 17:20

In reply to by गवि

...एखाद्या घड्याळजीकरिता रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होईल, ही बाजू विचारात घेतली आहे काय तुम्ही? (नसेलच!)

सबब, हे राष्ट्रकार्य आहे, एवढेच या निमित्ताने निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

इत्यलम्|

गवि Tue, 05/04/2016 - 17:32

In reply to by 'न'वी बाजू

हे राम.. घड्याळजीस चरितार्थ म्हणजे राष्ट्रकार्य हे ऐकून मनोरंजन झाले, करमणूक झाली, (अदिती फेम) कंटाळाही आला, ह्ह्पुवा झाली..

आणखी काही आंतरजालीय प्रतिसादात्मक डिक्षनरीतली भावना राहून गेली असल्यास क्षमस्व..किंवा लक्षात आणून दिल्यास व्यक्त करता येईल.

'न'वी बाजू Tue, 05/04/2016 - 17:39

In reply to by गवि

राष्ट्रात रोजगाराच्या संधींची निर्मिती हे राष्ट्रकार्य नव्हे??? गब्बर चावला काय?

निदान असले अनापशनाप विचार व्यक्त करताना तरी त्या राष्ट्रपित्याचे पेटंटेड निर्वाणीचे बोल वापरू नका हो! काय वाटत असेल त्या बिचाऱ्या बापूजींच्या आत्म्याला?

Nile Thu, 07/04/2016 - 01:01

In reply to by गवि

माझा अंदाज असा आहे की या घड्याळात स्टेपर मोटर्स असणार. डिझाईनचा विचार केल्यास, इन थेअरी, गिअरींग असं करता येईल की जेणे करून टकटक ही प्रतिसेकंदच असेल असं काही नाही. पण टकटक मात्र होणार. भरपूर पैसे खर्च करून सर्वोच्या ऐवजी एखादी सिंक्रोनस बिंक्रोनस मोटर लावली अन गिअरींग लावलं तर ती टकटकही घालवणं, अगेन, इन थिअरी, शक्य आहे. पण इज इट वर्थ इट? विशेषतः घरोघरी कटकटी सुखाने नांदत असताना. (आमच्याकडे भिंतीवरची घड्याळं नाहीतच, तेव्हा भलते प्रश्न विचारू नयेत.)

गवि Thu, 07/04/2016 - 03:44

In reply to by Nile

अजिबात आवाज न करणारी आणि ज्यांचा सेकंदकाटा थबकत थबकत न जाता सरळ एका स्थिर गतीने फिरत जातो अशी घड्याळं अनकॉमन नाहीत.

'न'वी बाजू Tue, 05/04/2016 - 16:36

In reply to by गवि

...कोंबडे झाकल्याने सूर्य जेणेकरून उगवायचा थांबत नाही, तद्वत सेकंदकाटा नसल्याने टिकटीक नाहीशी होत नाही.

(किंबहुना, सेकंदकाटा नसल्याससुद्धा टिकटीक हे घड्याळ चालू असल्याचे दृक् नाही, तरी श्राव्य निर्देशक ठरू शकतेच.)

(इन विच केस, सेकंदकाटा हवाच कशाला, टिकटिकीने भागत असेल तर? तर घड्याळजीच्या दुकानात दुरुस्तीस गेल्यावर तेथील असंख्य घड्याळांपैकी नेमकी कोणती चालू आहेत आणि कोणती बंद, हे घड्याळजीस चटकन कळावे, म्हणून. नुसत्या टिकटिकीच्या आधारावर हे निव्वळ अशक्य.)

(बाकी, घड्याळजीच्या दुकानातील प्रत्येक घड्याळ वेगळी वेळ दाखवते, यामागेसुद्धा कारण आहे. म्हणजे, सगळी घड्याळे टू द मायक्रोसेकंद अचूक त्याच वेळेस लावणे हे तर शक्य नाही; त्यात मामुली फेरफार तर राहणारच. अशा परिस्थितीत, घड्याळजीच्या दुकानातल्या चालू स्थितीतल्या घड्याळांपैकी टोल्याची घड्याळे जर एकसमयावच्छेदेकरून (परंतु सूक्ष्म फेरफारासहित) टोले देऊ लागली, तर दुपारी बारा वाजता डोके फिरण्याकरिता तो घड्याळजी सरदारजी असणे आवश्यक नसेल. सबब, घड्याळजीच्या मन:शांतीखातर (१) तो ठार बहिरा असणे, अन्यथा, (२) घड्याळे ष्ट्यागर करणे हे अत्यावश्यक.)

गवि Tue, 05/04/2016 - 16:46

In reply to by 'न'वी बाजू

(बाकी, घड्याळजीच्या दुकानातील प्रत्येक घड्याळ वेगळी वेळ दाखवते, यामागेसुद्धा कारण आहे. म्हणजे, सगळी घड्याळे टू द मायक्रोसेकंद अचूक त्याच वेळेस लावणे हे तर शक्य नाही; त्यात मामुली फेरफार तर राहणारच. अशा परिस्थितीत, घड्याळजीच्या दुकानातल्या चालू स्थितीतल्या घड्याळांपैकी टोल्याची घड्याळे जर एकसमयावच्छेदेकरून (परंतु सूक्ष्म फेरफारासहित) टोले देऊ लागली, तर दुपारी बारा वाजता डोके फिरण्याकरिता तो घड्याळजी सरदारजी असणे आवश्यक नसेल. सबब, घड्याळजीच्या मन:शांतीखातर (१) तो ठार बहिरा असणे, अन्यथा, (२) घड्याळे ष्ट्यागर करणे हे अत्यावश्यक.)

आपल्या या शेवटच्या परिच्छेदातील रोचक विचारावर एक उपविचार असा सुचला की उदाहरणार्थ, घड्याळे टोले देणारी आहेतच आणि नशिबाचे टोले चुकलेले नाहीतच असं जर घड्याळजीबाबत असेल, तर एकाच वेळी (शिंची) काय ती घणघणाटी कटकट होऊन संपून जाऊदे असा विचार करुन तो वेळा सिंक्रोनाईज करेल की सलग दहा पंधरा मिनिटेही शांतता न मिळेल अशा रितीने स्ट्यागर्ड ठेवून जरा डुलकी लागली न लागली तोच एखादे वेगळेच घड्याळ ठणाणा करायला लागणे अशी स्थिती* स्वहस्ते उत्पन्न करेल?

* अशी स्थिती उत्पन्न केल्यास घड्याळदुरुस्तीच्या काटेकोर कामात डुलकी न लागू देणे आणि चोरांपासून रक्षण करण्यासाठीही डुलकी न लागू देणे अशी उपकार्ये होत असतील तर ती स्थिती घड्याळजीला हवीशीही असू शकेल.

-प्रणव- Tue, 05/04/2016 - 17:58

In reply to by गवि

धन्यवाद, हे माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणजे सेकंद काट्याचे महत्व तो बंद पडल्यावर समजतं तर..

Nile Tue, 05/04/2016 - 18:17

In reply to by -प्रणव-

कोणत्याही हळू वेगात जाण्यार्‍या गोष्टींवरती मार्कर लावण्याची पद्धत सगळीकडेच आहे. मानवी डोळे अ‍ॅब्सल्यूट वेगापेक्षा रिलेटीव्ह वेग चटकन ओळखतात. इथे सेकंदकाटा हा मार्करचे काम करतो. हेच कारण डिजीटल घडाळ्यांतील ब्लिंकर्ससाठी.

-प्रणव- Tue, 05/04/2016 - 19:04

In reply to by Nile

इंटरेस्टिंग!

कोणत्याही हळू वेगात जाण्यार्‍या गोष्टींवरती मार्कर लावण्याची पद्धत सगळीकडेच आहे.

याचा एखादा सोर्स आहे का? मी गुगल केलं why second hand is required in clock टाईप, पण कुठे हे लॉजिक नाही सापडलं.

Nile Tue, 05/04/2016 - 23:53

In reply to by आदूबाळ

१. त्याने रिलेटीव्ह वेग कळणार नाहीच.
२. लॅपटॉप मांडीवर घ्यायचा असतो. भिंतीवरची घड्याळं लोक २०-२५ फुटांवरूनही पाहू शकतात. त्यामुळे छोटा दिवा उपयोगाचा नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/04/2016 - 01:46

In reply to by आदूबाळ

कशाला काटा काढायला जाता? घरच्या घरी घड्याळं बनवणाऱ्यांना आणखी जास्त खिटपिट करावी लागेल ना अशाने!

राजेश घासकडवी Wed, 06/04/2016 - 06:22

In reply to by आदूबाळ

आख्खा काटा काढायची काय गरज आहे?

आणि तो काटा काढण्यासाठी आणखी एका काट्याची गरज पडेल त्याचं काय?

राजेश घासकडवी Wed, 06/04/2016 - 08:27

In reply to by 'न'वी बाजू

नाही. त्या ट्रीटमेंटमध्ये मोठा काटा काढण्यासाठी तितक्याच आकाराच्या काट्यापेक्षा एक दशांश आकाराचा काटा जास्त प्रभावी असतो. आणि त्याहीपेक्षा एक शतांश आकाराचा काटा प्रभावी असतो. आणि त्याहीपेक्षा.... असं करत करत एक अणूदेखील शिल्लक न राहिलेल, म्हणजे न-काटा सगळ्यात प्रभावी असतो.

ऋषिकेश Wed, 06/04/2016 - 09:39

In reply to by आदूबाळ

आबा,
काही घड्याकांना सेकंद काट्याऐवजी एक कोंबड्यसारखा डुलणारा पार्ट कोपर्‍यात असतो, काहि घड्याळांना लंबक असतो, तर तुम्ही म्हणताय तसे ब्लिंकिंग दिवाही पाहिलाय (डायलवरील प्रत्येक मिनिटाचा डॉट क्रमाकमाने चमकतो) पण ते इतकं माफ दिसतं की ते चाललं नसावं

चिमणराव Sun, 10/04/2016 - 19:42

In reply to by ऋषिकेश

घड्याळांची अचूकता : यांत्रिक हातावरच्या घड्याळात आणि गजराच्या घड्याळात फिरणारे चक्र ( balane wheel ) गती नियमन करते ते मिनीटाला दीडशेवळा उलटसुलट फिरते.यामध्ये अधिक/उणे १ फरक झाला तरी घड्याळ पुढे मागे होते. क्वॅार्ट्झ पद्धतीत तयातला स्फटिक एका सेकंदाला ३६००० वेळा कंपने निर्माण करतो. अर्थात त्या कंपनात अधिक/उणे १०० फरक झाला तरी महिन्याभरात वेळेत फारसा फरक दिसणार नाही.

सेकंद काटा : यांत्रिक घड्याळांत सेकंद काटा लावा अथवा काढा नियमन करणाय्रा चक्राचा /कुत्र्याचा किटकिट टिकटिक आवाज येतच राहणार.
क्वॅार्ट्झ पद्धतीत एका सेकंदाला एक/शंभर उड्याअथवा मिनिटात चार/दोन/एक उडी असणारी घड्याळे बनवणं शक्य आहे आणि अशी घड्याळेही तुम्ही पाहिली असतील.
स्टॅापवॅाच:
यांत्रिक पद्धतीत बॅलन्सव्हीलऐवजी एक पातळ पट्टी दातेरी चक्रावर उडत राहाते/त्याला अडकवते त्याचा टकटकटक असा अतिशय जलद आवाज येतो.
**
यांत्रिक पद्धतीत मोठे चाक ( स्प्रिंग लावलेले) इतर चाकांना फिरवते त र क्वॅार्ट्झ पद्धतीत सर्वात लहान चाक इतर चाकांना फिरवते.
भिंतीवरची लंबकाची घड्याळे : बॅलन्स व्हीलऐवजी लंबक गती नियमन करतो.

टोले कसे पडतात: /गजर कसा होतो
तासाच्या चाकास दात्यांच्या जागी खड्डे असतात त्यात एक खटका अडकलेला असतो.योग्य वेळी खटका दूर होतो आणि गजर /चाइमिंग/टोले देणारी- करणारी चाके असलेली वेगळी रचना फिरू लागते.
ककु क्लॅाक: वरील टोले देणाय्रा चाकांना दोन भाते ( पेटीला असतो,लोहाराचा असतो )जोडलेले असतात ते उघडतात/दाबले जातात ती हवा शिट्टीतून फुंकली जाते आणि आवाज येतो.

आडकित्ता Sun, 10/04/2016 - 21:40

In reply to by चिमणराव

घड्याळ दुरुस्ती हा छंद असलेली काही माणसे ऐकून व एक प्रत्यक्ष ठाऊक आहे.

ती इतकी दातेरी चक्रे अन स्प्रिंगा एकत्र जोडून काळाचे तुकडे पाडण्याची व्यवस्था निर्माण केलेली दिसली की मला फार भारी वाटे.

लहानपणी एक घड्याळ संपूर्ण उघडून मोकळे केले, पण ते कधीच पुन्हा जोडता आले नाही. त्यातल्या दातेरी चाकांच्या भिंगर्‍या मात्र झकास फिरत.

शाळेत शिकवायला पाहिजे मेकॅनिकल घड्याळ कसं बनवायचं ते. मग मोठेपणी असे प्रश्न पडणार नाहीत. :)

चिमणराव Sun, 10/04/2016 - 23:39

In reply to by -प्रणव-

ओटमॅटिक /सेल्फवाइंडिंग हातातली घड्याळे:
घड्याळाला चावी दिली की साधारणपणे सहा फिरकीत पूर्ण चावी बसते आणि स्प्रिंग घट्ट गुंडाळली जाते.त्यावर तीसेक तास घड्याळ चालू राहाते.हेच चावी देण्याचं काम आपोआप व्हावं म्हणून एक जड परंतू अर्धच चाक चावीला जोडलेलं असतं.हात खाली वर हालला की हे जड चाक फिरून वजन खालीच राहील असं फिरतं.हळूहळू स्प्रिंग गुंडाळली जाते.आता समजा चावी पूर्ण बसल्यावरही पुढे गुंडाळतच राहून मोडू नये म्हणून स्प्रिंगचे टोक चक्राच्या आतल्या बाजूस पक्के न जोडता सरकते ठेवतात.कमी पीळ असेल तर भरला जातो पण पूर्ण झाल्यास सटकत राहतो.यासाठी ग्राफाइट ग्रीस वापरतात.या घड्याळाच्या चावीचा वापर फक्त महिन्यातून एखादेवेळी काटे फिरवायलाच होतो आणि बटणाच्या ( =crown) आतला रबर वॅाशर घासला जात नाही.ते बरेच वॅाटरप्रुफ होते/राहाते.उदा "सीको ५"seiko5.अश घड्याळातलं तेल उणे १० ते ५० तापमानासही काम करत असल्याने काही लोक हे वापरतात.क्वॅार्टझची बॅटरी आता सुधारली असावी परंतू पूर्वीची शून्य तापमानाजवळ बंद पडायची.आता सोलर पावरवरच्या घड्याळात एक कंडेन्सर चार्ज केला जातो तो वीज पुरवतो.

वॅाटरप्रुफ /महागडी घड्याळे
घड्याळाचे यंत्र यांत्रिक अथवा बॅटरी सेलवरचे असू शकते परंतू ते ज्या एका डबीत ( case ) बसवतात त्यावरही घड्याळाची किंमत वाढत जाते.प्लास्टिक अथवा धातूचा वापर किंमतीत फरक करतो.शिवाय काही कंपन्या हिरे माणके लावून किंमत वाढवतात.आपण जी बरीच घड्याळे पाहतो त्यात मनगटाकडे खाली एक झाकण असते ते काढून ,चावीचा दांडा उचकटला की आतले यंत्र बाहेर येते.वरच्या बाजूस काच /प्लास्टिक असते त्यातून काटे दिसतात.जेवढे जोड भाग तेवढे पाणी आत जाण्याचे मार्ग वाढतात.ते कमी करायचे म्हटले तर खालचे झाकण न ठेवणे.चावीचा कमीतकमी वापर असावा म्हणून ओटो/क्वार्टझ करणे.
लोखंड,स्टील न वापरता टिटानियम धातूची केस खोदून बनवतात. झाकण नाही. गंजत नाही,चुंबकीय नाही.आत यंत्र ठेवून चावीदांडा सरकवून वरच्या बाजूस काचेऐवजी मशिन कट क्वार्टझ क्रिस्टल फिक्स करतात.उदा० RADO . असे घड्याळ फक्त कंपनीतच उघडता येते कारण तो क्रिस्टल काढून पुन्हा बसवणे इतरांस शक्य नसते.सोने धातू खूप चांगला असला तरी कणकेसारखा मऊ असतो.केससाठी उपयोगाचा नसतो.प्लॅटिनम चालते.

-प्रणव- Sat, 09/04/2016 - 00:35

बऱ्याचदा आपण म्हणतो की गरज नसेल तर पेट्रोल जाळू नये, सार्वजनिक वाहतूक वापरावी वगैरे वगैरे.

पण मला असं वाटतं (मी त्यावर अमलबजावणी करत नाही ही गोष्ट वेगळी), की

- समजा अजून १०० वर्षांनी पेट्रोल संपणार आहे. पेट्रोल जास्त वाया घातल्यास अजून लवकर संपेल आणि राजकारणी, वैज्ञानिक लोकांवर अपारंपरिक ऊर्जा स्रोत तंत्रज्ञान लवकरात लवकर विकसित व्हावं असा खूप मोठा दबाव पडेल.

आपणास काय वाटते? या लॉजिक मधे काही चुकीचं आहे का?

नितिन थत्ते Fri, 08/04/2016 - 22:30

In reply to by -प्रणव-

>>या लॉजिक मधे काही चुकीचं आहे का?

पेट्रोल जाळु नये या म्हणण्यामागे पेट्रोल संपेल ही भीती असण्यापेक्षा पर कॅपिटा प्रदूषण जास्त होण्याचा मुद्दा असावा.

>>वैज्ञानिक लोकांवर अपारंपरिक ऊर्जा स्रोत तंत्रज्ञान लवकरात लवकर विकसित व्हावं असा खूप मोठा दबाव पडेल.

आपल्या कामाच्या बाबतीत दबाव आला तर आपण काय करतो? त्या कामाची डेडलाईन पुढे नेता येईल का ते पाहतो. तसा प्रयत्न करतो. पेट्रोल कमी वापरा म्हणण्यामागे ही या दबावाचा परिणाम असेलच ना?

-प्रणव- Fri, 08/04/2016 - 23:32

In reply to by नितिन थत्ते

ह्म्म. प्रदूषणाचा मुद्दा बरोबर आहे.

>> आपल्या कामाच्या बाबतीत दबाव आला तर आपण काय करतो? त्या कामाची डेडलाईन पुढे नेता येईल का ते पाहतो. तसा प्रयत्न करतो. पेट्रोल कमी वापरा म्हणण्यामागे ही या दबावाचा परिणाम असेलच ना?

ओके. पण कामाचा दबाव आल्यावर आपण जर टाईमपास करत असू तर तो देखील बंद करतो.

सध्याचं पाणीटंचाईचं उदा. घ्या. प्रत्यक्ष झळ बसतीये, तेव्हा कुठे लोकं पाणीविरहीत होळी, आय.पी.एल. चे सामने बंद करा वगैरे च्या गोष्टी करत आहेत. एरवी राजकारणी लोकं ज्या निरर्थक मुद्यावर वेळ वाया घालतात (भारतमाता इ.) त्या ऐवजी खरोखर असे मोठे संकट आले, तर त्यांना त्याची दखल घ्यावीच लागेल (असे वाटते). म्हणजे प्रश्न अजून गंभीरतेने घेतील, संशोधनाला अजून फंडिंग मिळेल इ. इ.

नगरीनिरंजन Sat, 09/04/2016 - 17:49

In reply to by -प्रणव-

संशोधन म्हणजे काहीतरी शुअरशॉट गोष्ट असल्यासारखं का बोलतात लोक? ओता पैसा आणि काढा सोल्यूशन.
अर्जन्सी किंवा फंडिंगवरच फक्त संशोधनाचं फलित अवलंबून असतं का? म्हणजे जणू काही ऑईलइतकाच किंवा त्यापेक्षाही स्वस्त ऊर्जाप्रकार अस्तित्वात आहेच पण केवळ इतके दिवस ऑईल होतं म्हणून तो शोधला नाही. संशोधन करुनही ऑईलइतका स्वस्त आणि सोयीस्कर ऊर्जास्रोत मिळणार नाही याची शक्यता जवळजवळ नाहीच या थाटात बोलणं चाललेलं असतं सदानकदा आणि तेही स्वतःला विज्ञानवादी समजणार्‍या लोकांचे.

-प्रणव- Sat, 09/04/2016 - 11:56

मराठी, हिंदी मधील आदरवाचक सर्वनाम, क्रियापदे यांचा समाजावर इनडायरेक्टली चांगला परिणाम होतो का वाईट?

इंग्रजी मधे सरळ you, he असे सर्वनाम आहेत. उगाच तू, आपण, ते अशा भानगडी नाहीत. त्यामुळे इंग्रजी समाजात समानतेची भावना अधिक सहजतेने येते, असे म्हणता येईल का?

चार्वी Sun, 10/04/2016 - 18:19

In reply to by -प्रणव-

* भाषिक व्यवहार हे सामाजिक व्यवहारांचाच एक भाग असतात. त्या त्या समाजाची जी मूल्यव्यवस्था असते ती भाषेतही उमटलेली दिसते. भाषेमुळे समाजात विशिष्ट मूल्ये (आदर/समानता) निर्माण होत असतील असे वाटत नाही. आदरार्थी बहुवचन वापरणे/ सरसकट सगळ्यांसाठी एकच सर्वनाम वापरणे याचा ती भाषा जन्मतः बोलणार्‍या समाजावर तितकासा फरक पडत असेल असे वाटत नाही. तसे असते तर सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी भाषिक बदल केलेले पुरले असते. (१९८४मधल्या 'न्यूस्पिक'ची आठवण झाली.)
* इंग्रजीत आदरार्थी बहुवचन नाही, पण उतरंड/ असमानता/ आदर दर्शवणारी इतर संबोधने/ प्रघात असतात की. उदा. लेडी, लॉर्ड, सर, हिज/हर्/युवर मॅजेस्टी. अमेरिकेत आडनावाआधी मि.(Mr.) लावणे आदरार्थी, पण नावाआधी मि. लावणे हे असन्मानदर्शक मानले जाई (कारण तसे संबोधन काळ्या गुलामांसाठी वापरत), असे ऐकले आहे.
(अवांतर: आईशी बोलताना आईला 'तू-तडाक' केल्यामुळे मी माझ्या अलिगढी मैत्रिणीकडून भरपूर ओरडा खाल्ला होता)

अनुप ढेरे Sat, 09/04/2016 - 16:13

मंदीराचा चौथर्‍यावर स्त्रीयांना प्रवेश यासाठीचं आंदोलन आणि भारत माता की जय हा वाद सारखे आहेत का एक उपयोगी दुसरा निरुपयोगी?

-प्रणव- Sat, 09/04/2016 - 17:57

In reply to by अनुप ढेरे

मंदीराचा चौथर्‍यावर स्त्रीयांना प्रवेश यासाठीचं आंदोलन आणि भारत माता की जय हा वाद सारखे आहेत का एक उपयोगी दुसरा निरुपयोगी?

तुमची बाजू कोणती आहे त्यावर ते डिपेंड करतं. :)

या दोन बाजू व्यक्तिस्वातंत्र्य आणि मेजॉरीटी ओपिनियन/परंपरा या आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/04/2016 - 19:05

In reply to by अनुप ढेरे

चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेशाचं आंदोलन कायदेशीर पद्धतीने संपतंय, संपवलं. म्हणून ते मला निरुपयोगी वाटतं. त्याऐवजी "आमच्या घरातल्या स्त्रियांना जिथे जाता येत नाही तिथे आम्हीही जाणार नाही" अशी भूमिका घेतली असती, घेण्यासाठी लोकांना तयार केलं गेलं असतं तर खरंच काही फरक पडला असता.

-प्रणव- Sat, 09/04/2016 - 19:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याऐवजी "आमच्या घरातल्या स्त्रियांना जिथे जाता येत नाही तिथे आम्हीही जाणार नाही" अशी भूमिका घेतली असती

खाजगी मधे अशी भूमिका घेतलीही असेल काही लोकांनी. त्याची पब्लिसिटी नसेल वाटली करावी.

पण का म्हणून कोणाचे चुकीचे नियम पाळायचे? त्यांना काय फरक पडणार आहे अशाने?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/04/2016 - 18:49

In reply to by -प्रणव-

खाजगी मधे अशी भूमिका घेतलीही असेल काही लोकांनी.

त्याचं स्वागतच आहे.

पण का म्हणून कोणाचे चुकीचे नियम पाळायचे? त्यांना काय फरक पडणार आहे अशाने?

हा विशिष्ट नियम योग्य का अयोग्य याबद्दल माझं काही मत नाही. मी नास्तिक आहे, श्रद्धेपोटी देवळात जाण्याची कृती मला स्वतःच्या संदर्भात मानसिक गुलामगिरी वाटते, त्यामुळे स्त्रियांना तिथे जाता येत नाही याबद्दल काय मत असावं याबद्दल शंका आहे.

पण हे निमित्त होतं. स्त्रियांना समाजात समान स्थान आहे, असावं, ही धारणा फक्त काही स्त्री-पुरुषांची असून पुरणारं नाही. संपूर्ण समाजाची वाटचाल त्या दिशेने झाली पाहिजे. त्यासाठी स्त्रियांनी स्वतःला कमी लेखणं बंद झालं पाहिजे, पुरुषांनी स्त्रियांना कमी लेखणं बंद झालं पाहिजे. शनीमंदिराचं निमित्त ह्या संदर्भात जागृती करण्यासाठी वापरता आलं असतं. त्यातून शनीच्या गाभाऱ्यात स्त्रियांनी प्रवेश केल्यास अमकं-फलाणं होईल ही अंधश्रद्धा दूर होण्यासाठीही मदत झाली असती. पण तसं होण्याऐवजी न्यायालयाकडून आज्ञा आली. लोकांचे विचार, मत, मन न बदलता ही गोष्ट लादली गेली. सध्या त्याचा परिणाम बरा होतोय असं दिसत नाही; मटात काल/परवा बातमी होती - स्त्रिया गाभाऱ्यात गेल्यानंतर स्थानिकांनी गाभारा धुवून काढला, इ.

माझ्या लेखी महत्त्व गाभाऱ्याला नाही, समाज कसा विचार करतो याला आहे. समाजाचे विचार बदलले की मंदिरं सगळ्या जातीजमातींसाठी, न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय, खुली होतात.

तिरशिंगराव Sun, 10/04/2016 - 16:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शनिच्या मागे बायका का लागल्या आहेत ?

त्यालाही एकदा कळू दे, साडेसाती म्हणजे काय ते !

असं वाचलं बुवा.

-प्रणव- Tue, 12/04/2016 - 08:34

लोकं बोर झालं की गोष्टीचं पुस्तक वाचतात तसंच कवितेचं पुस्तक पण वाचतात का? का फक्त शेल्फ वर ठेवायला घेतात.

मनोरंजन आणि ज्ञानवर्धन या दोन्ही गोष्टीत मला कविता मागे पडलेल्या वाटतात. (अपवाद विडंबन कवितांचा! हसू तरी येतं at least)

का आवडतात लोकांना कविता as opposed to गाणी?

सिरीयस प्रश्न आहे!

ऋषिकेश Tue, 12/04/2016 - 10:32

In reply to by -प्रणव-

मी जर कवितेचा मूड असेल तर कविता वाचतो.
मात्र, बोर झालं की टाईमपास म्हणून तसंही (कोणतंच) पुस्तकं वाचत नाही ;)

सखी Tue, 12/04/2016 - 12:10

In reply to by -प्रणव-

मला कविता कळणाऱ्या लोकांबद्दल प्रचंड आदर वाटतो ..

पण माझ्या मूड नुसार कुठली कविता वाचायला मिळाली तर त्या कवितेला जास्त relate करू शकते मी.

preference नेहेमी पुस्तक वाचायलाच असतो ..

.शुचि. Tue, 19/04/2016 - 02:11

In reply to by -प्रणव-

कवितेचा एखादा पापुद्रा कळणे आणि एखादे अवघड प्रमेय सुटणे - सोन्ही आनंद एकाच पठडीचे. तितकेच अवर्णनिय तितकेच उल्हासित करणारे, वेडावणारे.

राही Tue, 12/04/2016 - 15:53

मध्यंतरी एखाद वर्षापूर्वी 'माझी गोष्ट' नावाचे डॉ. लीला गोखले (रानडे) यांचे पुस्तक वाचायला मिळाले होते. पुस्तक तर वाचनीय आहेच. शंभर वर्षांपूर्वीच्या सधन ब्राह्मण कुटुंबकबिल्यातले (कबिला म्हणण्याचे कारण हा शाशंभर माणसांचा बारदाना होता.) वातावरण, खाणे-पिणे-वागणे, कपडालत्ता-दागदागिने, सणवार, लग्न-मुंजी, व्रतेवैकल्ये या सगळ्या तपशिलांसह उभे केले आहे. पुस्तक तर आवडलेच होते पण त्यातल्या एका उल्लेखाने अधिक लक्ष्य वेधून घेतले. "माझ्या एक आत्याबाई तर मुलगे, सुना, नातू यांना साजुक तूप वाढत आणि मुलींना लोणकढं! कारण साजुक तुपाची सवय लागली तर सासरी चोरून-बिरून खातील आणि ते लोक माहेरचा उद्धार करतील!"
मराठी आंतरजालावर 'लोणकढे आणि साजुक' या विषयी चर्चा झाल्याचे लक्ष्यात होतेच. मग या शब्दांच्या तपशीलवार अर्थासाठी मिळाले तेव्हढे शब्दकोश, ज्ञानकोश, विश्वकोश धुंडाळले. सगळीकडे दोन्हींचा एकच अर्थ दिलेला. नाही म्हणायला साजुक म्हणजे 'सद्य', अगदी आत्ताचे, ताजे असा अर्थ मिळाला, जो 'लोणकढे' या शब्दाचा म्हणूनही दिला होता. म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. मग अलीकडे ते पुस्तक ग्रंथालयातून आणून पुन्हा वाचले. तर त्यात डॉ. लीलाताईंचा फोन नंबर दिला होता. पुस्तक प्रसिद्ध झाले त्या वेळी बाईंचे वय ९४-९५ वर्षांचे. साशंकतेनेच फोन लावला. आणि चक्क त्या भेटल्या. भरभरून बोलल्या. मग मी मनात बारीकशी खदखद ठेवून राहिलेला 'साजुक' प्रश्न विचारला. तर त्यांनी सांगितले की जरी घरात मोठेच दूधदुभते होते तरी घरात निघणारे लोणी कढवून केलेले तूप इतक्या माणसांना पुरत नसे. हे तूप वर लिहिल्याप्रमाणे मुलगे'सुना नातवा आणि सोवळ्यातल्या बायकांसाठी वापरायचे. हे साजुक तूप. मग इतरांसाठी बाहेरून लोणी विकत घेऊन त्याचे तूप करायचे. ते लोणकढे तूप.
म्हणजे दोन्हीमध्ये लोणी कढवूनच तूप निघणार, फक्त घरच्या लोण्यापासून केलेल्याला साजुक म्हणायचे आणि विकतच्या लोण्यापासून केलेल्याला लोणकढे म्हणायचे.
माझ्या स्वतःच्या आठवणीत 'लोणकढे' हाच शब्द वापरला जाई आणि ते घरच्या लोण्याचे तूप असे. बाहेरचे लोणी कधी विकत घेतल्याची आठवण नाही.
(पुस्तकातले उद्धृत आहे. कदाचित कॉपीराइटचा भंग होत असण्याची शक्यता असेल तर प्रतिसाद काढून टाकावा किंवा संपादित करावा. अलीकडे 'सर्व हक्क लेखकाधीन' वगैरे काही लिहीत नसावेत. बार कोड मात्र असतो.)

-प्रणव- Tue, 12/04/2016 - 16:01

In reply to by राही

रोचक.

मग या शब्दांच्या तपशीलवार अर्थासाठी मिळाले तेव्हढे शब्दकोश, ज्ञानकोश, विश्वकोश धुंडाळले.

त्याआधी शेजारच्या काकूंना विचारले होते का :)

राही Tue, 12/04/2016 - 16:13

In reply to by -प्रणव-

आजकाल अगदी काकू झाल्या तरी घरी विरजण घुसळत बसत नाहीत. अगदी मिक्सरवरसुद्धा नाही. त्या मुळी 'लो फॅट' दूध विकत घेतात. त्यावर लोणी निघतच नाही. आणि अमूल, सागर, गोवर्धन, पतंजली कुणासाठी आहेत?

सखी Tue, 12/04/2016 - 18:05

In reply to by राही

मी पण लोणकढं तूप म्हणजे साजूक तूप असंच समजायचे ..

लोणी कढवून केलेले तूप म्हणजे लोणकढं असं..

नवीन माहिती मिळाली ..

राही Wed, 13/04/2016 - 13:30

In reply to by सखी

शुद्ध तूप हे लोणी कढवूनच बनतं. फक्त ते लोणी ताजं, नुकतंच काढलेलं असं कढवलं की निघणारं तूप म्हणजे साजुक तूप आणि शिळं लोणी, बाजारातून विकत घेतलेलं खूप दिवस आधी काढलेलं लोणी कढवून मिळालेलं तूप ते लोणकढं तूप. निदान मलातरी डॉ. लीलाताई गोखले यांच्या बोलण्यावरून असं जाणवलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/04/2016 - 18:33

In reply to by राही

मुलगे आणि सुनांमध्ये फरक नाही ही बाबही ध्यानात घेण्याजोगी. या 'पंक्तिप्रपंचात' घरातले वयस्कर पुरुष कुठे असायचे?

चार्वी Tue, 12/04/2016 - 21:26

In reply to by राही

* रोचकतम! 'लोणकढी थाप' म्हणजे काय असेल मग? विकतच्या लोण्यासारखी भेसळयुक्त थाप?

* जालावरच्या लोणकढी-साजूक चर्चेची लिन्क देईल का कुणी?

अमुक Wed, 13/04/2016 - 09:50

In reply to by चार्वी

गतवर्षी तिरशिंगराव यांना पडलेल्या ह्याच प्रश्नाला राही यांनीच दिलेला प्रतिसाद व त्याखालील धनंजय यांचा प्रतिसाद पाहावा.
.....
तुपावरील एक चर्चा इथे आहे.

अमुक Wed, 13/04/2016 - 09:44

हा प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी पडला. आता योग्य ठिकाणी नेला आहे.

नितिन थत्ते Thu, 14/04/2016 - 23:14

स्वातंत्र्यलढा म्हणजे गांधी-नेहरू असे समिकरण बनवून खरा (क्रांतिकारकांचा) स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुसून टाकला गेला आहे असे आपण अनेकदा ऐकतो. म्हणून मी घासू गुर्जींप्रमाणे विदा जमवायचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारच्या पाठ्यपुस्तकाचा शोध घेतला. तेव्हा मला आठवीपर्यंतची पाठ्यपुस्तके या लिंकवर पीडीएफ स्वरूपात सापडली. त्यात आधुनिक भारताचा इतिहास हे आठवीचे इतिहासाचे पुस्तक सापडले ज्यात स्वातंत्र्यलढ्याविषयी माहिती आहे.

त्याची अनुक्रमणिका पाहिली असता प्रकरण ९ ते प्रकरण १६ अशी आठ प्रकरणे काँग्रेसची स्थापना ते स्वातंत्र्य मिळाले इथपर्यंत इतिहास सांगतात. त्यापैकी राष्ट्रीय सभेची स्थापना (४ पाने) व राष्ट्रीय चळवळीची वाटचाल (३ पाने) अशी ७ पाने सुरुवातीच्या काळातील, गोखले, रानडे, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, अ‍ॅनी बेझंट यांच्याशी संबंधित आहेत.
त्यानंतर असहकार चळवळ (६ पाने) आणि सविनय कायदेभंग (४ पाने) अशी १० पाने गांधी-नेहरू-लाला लजपतराय, यांच्याविषयी आहेत.
सशस्त्र क्रांतिकारी चळवळ (७ पाने) आझाद हिंद सेना (५ पाने) अशी १२ पाने नॉन-गांधियन लढ्याशी संबंधित आहेत. चाफेकर, सावरकर, भगतसिंग प्रभृती, खुदिराम बोस, अनुशीलन समिती, अभिनव भारत यांची माहिती यात आहे.
शेवटी चलेजाव आंदोलन (५ पाने) असा धडा आहे. यात नाविकांचे बंड, भूमिगत चळवळींची माहिती आहे.

स्वातंत्र्य लढ्यावरील माहितीपैकी १५ पाने गांधियन लढ्याविषयी आणि १२ पाने नॉन गांधियन लढ्याविषयी आहेत. यात १८५७ च्या लढ्याविषयी ५ पाने मिळवली तर गांधियन लढ्यासंबंधी १५ पाने आहेत तर नॉन गांंधियन लढ्याविशयी १७ पाने आहेत. प्री-गांधी 'काँग्रेस'संबंधी आणखी सात पाने आहेत. ती गांधियन नक्कीच म्हणता येणार नाहीत.

पुस्तक २००६ सालचे आहे असे त्यावर दिसते.

नॉन गांधियन स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पुसला गेला आहे हा प्रचार पॉप्युलर कशामुळे झाला?

गब्बर सिंग Thu, 14/04/2016 - 23:21

In reply to by नितिन थत्ते

हा स्वतंत्र धागा असावा असं वाटलं.

नॉन गांधियन स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पुसला गेला आहे हा प्रचार

हा प्रचार मी कैकदा ऐकलेला आहे. गांधी व नेहरू शिवाय दुसर्‍या कुणी काही देशासाठी केलंच नाही असा आविर्भाव आहे/होता - असा साधारण सूर असायचा त्या तक्रारींचा.

नितिन थत्ते Thu, 14/04/2016 - 23:35

In reply to by गब्बर सिंग

शिवाय गांधियन लढा म्हणून जो भाग आहे त्यात केवळ गांधी नेहरूंबद्दल माहिती नसून पटेल, सरोजिनी नायडू, आझाद, आंबेडकर, क्रांतिवीर नाना पाटील यांबद्दलही माहिती आहे.

हेडगेवार, गोळवलकर, गोपाळ+नथुराम गोडसे यांची नावे मात्र त्यात नाहीत. (डांग्यांचे नावसुद्धा दिसले नाही).

गब्बर सिंग Thu, 14/04/2016 - 23:51

In reply to by नितिन थत्ते

माझ्या ओळखीतली एक व्यक्ती नेताजी भक्त आहे. म्हंजे ती व्यक्ती असं स्पष्टपणे म्हणते की "नेताजी सावरकरांपेक्षा श्रेष्ठ** होते". व या व्यक्तीने सुद्धा नेताजींवर अत्यंत अन्याय झाला असा सूर लावला होता. खरंखोटं मला माहीती नाही.

** हा एक मजेशीर प्रकार असतो आपल्याकडे. सोयिस्कर रित्या हे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत्/होते असं म्हणायचं. आणि सोय होत नसेल तर .... "नाय नाय ... अशी तुलना करणं चुकीचं आहे... सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे" असं म्हणायचं. राखी सावंत म्हणाली होती ना की "सभी नंबर वन है ... शाहरुख भी है, आमिर भी है, सलमान भी है, ऋतिक भी है...." तसं.

१४टॅन Tue, 28/03/2017 - 12:28

In reply to by नितिन थत्ते

त‌र, मीही ते पुस्त‌क वाचलेलं आहे. व्य‌मा, भार‌तीय मुस‌ल‌मान, साव‌रक‌र ते भाज‌प, मौज चे अंक इ. पासून ते १२१ शूर‌क‌था इ. वाच‌त अस‌ल्याने प्र‌तिस‌र‌कार, सूर्य‌सेन, आझाद, साव‌रक‌र, बोस ह्यांबाबत ख‌रंत‌र जित‌कं लिहीलं पाहिजे त्याच्या साधार‌ण एक‌च ट‌क्का म‌ज‌कूर अस‌ल्याचं आठ‌व‌तंय. साव‌र‌क‌रांचं एक‌ही चित्र अस‌ल्याचं आठ‌व‌त नाही. म्ह‌ण‌जे, अग‌दी एका वाक्यात सांगाय‌चं झालं त‌र आधुनिक भार‌ताचा इतिहास म्ह‌ण‌ण्याऐव‌जी आधुनिक कॉंग्रेस‌चा इतिहास हे पुस्त‌काचं शीर्षक अस‌तं त‌र जास्त स‌युक्तिक झालं अस‌तं.
आता थोडं अवांत‌र.
ह्या २६ जानेवारीला एका संस्थेत गेलो होतो, 'क‌रू संविधानाचा जाग‌र' असल्या काय‌त‌री कार्य‌क्र‌माला. तिथे कोणी पुण्याहून प्राध्याप‌क आले होते. व्हॉट्सॅप निमंत्र‌णात दैनिक जीव‌नात‌ले संविधानाचे म‌ह‌त्व इ. वाचून मी ख‌रंच संविधानात‌ल्या अन‌सुन्या त‌र‌तुदी वगैरे ऐकाय‌ला मिळ‌तील ह्या अपेक्षेने गेलो होतो. थोडा प‌रिचय व‌गैरे झाल्याव‌र त्यांनी संविधानाव‌र गाडी नेली. म‌ग, आंबेड‌क‌र आंबेड‌क‌र सुरू झालं. हा अग‌दीच अपेक्षाभंग होता. म‌ग बाकी कोणालाच दूर‌दृष्टी क‌शी न‌व्ह‌ती आणि ने-गां नाच फ‌क्त क‌शी होती व‌गैरे सुरू झाल्याव‌र मी पेट‌लो. म्ह‌ट‌लं, बोसांनी प‌हिल्यांदा संपूर्ण स्वातंत्र्याची अट घात‌ली, गांधी जुनंच व‌साह‌त‍-स्वातंत्र्य घ्याय‌ला रेडी होते. म‌ग प्रा. प‌र्स‌न‌ल झाले. म्ह‌णाले, की गांधी प‌र्फेक्ट न‌व्ह‌ते, त‌सेच बोस‌ही न‌व्ह‌ते, एक हुकूम‌शाही उल‌थाय‌ला दुस‌रीची म‌द‌त घेणे व‌गैरे त्यांनीही चुका केल्या. म‌ग म‌ला एकूण‌च काय चाल‌लंय ह्याचा अंदाज आला आणि वादात अर्थ नाही म्ह‌णून ग‌प्प ब‌स‌लो.
नंत‌र आयोज‌कांना 'स्व‌त:ला अभ्यास‌क म्ह‌ण‌व‌णाऱ्या लोकांऐव‌जी ख‌रोख‌रीच्या अभ्यास‌कांना बोल‌वाय‌चं क‌धी पाह‌ताय' हा संदेश पाठ‌वाय‌चा मोह मी आत्ताप‌र्यंत आव‌रून‌ ध‌र‌लेला आहे.

गब्बर सिंग Tue, 28/03/2017 - 20:30

In reply to by १४टॅन

नंत‌र आयोज‌कांना 'स्व‌त:ला अभ्यास‌क म्ह‌ण‌व‌णाऱ्या लोकांऐव‌जी ख‌रोख‌रीच्या अभ्यास‌कांना बोल‌वाय‌चं क‌धी पाह‌ताय' हा संदेश पाठ‌वाय‌चा मोह मी आत्ताप‌र्यंत आव‌रून‌ ध‌र‌लेला आहे.

अधोरेखित २ श‌ब्द‌योज‌ना या दोन भिन्न कॅटेग‌रिज आहेत असं तुम‌चं म्ह‌ण‌णं दिस‌तं
या दोन कॅटेग‌रीं म‌धे फ‌र‌क क‌सा क‌र‌ता ?
दोन्हींच्या व्याख्यांसह सांगा.

१४टॅन Tue, 28/03/2017 - 21:52

In reply to by गब्बर सिंग

पीएचडी, कमीत कमी मास्टर्स तरी त्या विषयात केलेलं असेल, त्या विषयाच्या वर्तुळात बोलबाला/प्रसिद्धी इ. गोष्टी असतील, तर अभ्यासक. हे फार पुढचं झालं. कमीत कमी एक निरपेक्ष दृष्टीकोन ठेवून, 'मला ह्या शाखेबद्दल फार माहिती नाही,' हे उघडपणे म्हणता येणं हेही अभ्यासकाचं लक्षण.
उगीच भाराभर रद्दी प्रकाशित करून स्वतःच अभ्यासक आहोत हे सांगत फिरणे हा दुसरा प्रकार.
जाहीर व्याख्यानांचं 'प्रवचन' न करणं, श्रोत्यांनमध्ये उत्सुकता जागृत करणं हेही अभ्यासकाचं लक्षण. दुसरं कळेलच ह्यावरून.

गब्बर सिंग Tue, 28/03/2017 - 21:58

In reply to by १४टॅन

कमीत कमी एक निरपेक्ष दृष्टीकोन ठेवून, 'मला ह्या शाखेबद्दल फार माहिती नाही,' हे उघडपणे म्हणता येणं हेही अभ्यासकाचं लक्षण.

हे प्र‌च‌ंड् ध‌क्कादाय‌क आहे.

१४टॅन Tue, 28/03/2017 - 23:16

In reply to by गब्बर सिंग

ते 'अमुक एका' असं वाचा. टंको झालाय.
'विषय माझा असला, तरी त्यातल्या एका शाखेबद्दल भन्नाट वाचलेली/ बहुश्रुत माणसं माझ्या श्रोतृवृंदात असू शकतील, ह्याचं भान बाळगणं, आणि त्यांच्याकडून माहिती घेण्यात कमीपणा न वाटणं' असं मला म्हणायचं होतं.

गब्बर सिंग Fri, 15/04/2016 - 09:10

एक महिन्यानंतर मोदी सरकार ची २ वर्षं पूर्ण होतील. त्यानिमित्त कोण काय बोलेल ??

१) सोनिया गांधी - मायनॉरिटीज वर अन्याय होत असल्यामुळे हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे
२) राहुल गांधी - मोदींनी सूट बूट घालून मुंबईत शेती करून दाखवावी.
३) केजरीवाल - मोदींनी दिल्ली सरकारशी सहकार्य करण्यासाठी सहकार तज्ञ शरद पवार यांना सहकार-मंत्री नेमावे.
४) ओवेसी - मोदींच्या मुळे मला माझ्या घरात पण प्लुरलिझम राबवता येत नैय्ये.
५) नितिश कुमार - बिहार मधे दारुबंदी झाली आहे. मोदींच्या गुजरातेत पण आहे. मग देशभर का नाही ? बीफबंदी चालते मग दारुबंदी का नको ?
६) लालू - मोदी बड्या बड्या बाता मारतात ... पण आमच्या कंदिलास वीज पुरवत नाहीत हा अन्याय आहे.
७) ममोसिं - मोदी हे गेल्या जन्मीसुद्धा स्वतःचं च घोडं पुढे दामटायचे.
८) शरद पवार - हे सरकार कोण चालवतंय तेच समजत नाही. अमित शहा, मोदी, जेटली, स्मृति+सुषमा, राजनाथ, की रेशीमबाग. मोदींनी एकाधिकारशाही बंद करावी व इतरांना सुद्धा निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यावे.

आडकित्ता Wed, 27/04/2016 - 22:43

In reply to by गब्बर सिंग

सध्या दोन प्रकारच्या लोकांचा शोध जारी आहे.
१. मोदींच्या हातचा चहा प्यायलेले लोक
२. मोदींच्या सोबत / वर्गात कॉलेजात गेलेले लोक.

पैकी चहा प्यालेला एक सापडला. म्हणे ५ रुपयांची नोट दिली होती. ४ रुपये सुटे अजून परत मिळालेले नाहीत..

चिंतातुर जंतू Tue, 19/04/2016 - 18:12

केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाने १९९० साली काढलेली आणि विष्णुबुवा जोग यांनी संपादित केलेली सार्थ तुकाराम गाथा कुठे मिळू शकेल काय? पुण्यात मिळाली तर उत्तम. ह्या दुव्यानुसार ती मुलुंडमध्ये आहे, पण अख्खी गाथा काही दिवस लायब्ररीमधून बाहेर नेऊ देतील का, ह्याविषयी काही कल्पना नाही.

बॅटमॅन Tue, 19/04/2016 - 18:33

In reply to by चिंतातुर जंतू

विकतच घ्यायची असेल तर कुठेही मिळावी बहुधा. पण वैसेभी अलीकडे पूर्ण गाथा ऑनलाईन उपलब्धच आहे, सो व्हाय हार्ड कॉपी?

चिंतातुर जंतू Tue, 19/04/2016 - 18:43

In reply to by बॅटमॅन

१. मला हीच आवृत्ती पाहायची आहे. (त्यात जोगांची टिप्पणी आहे.)
२. ऑनलाइन आवृत्ती म्हणजे हीच का? ती सर्चेबल आहे का? मला काही ते धड उमगलेलं नाही.

बॅटमॅन Tue, 19/04/2016 - 19:05

In reply to by चिंतातुर जंतू

१. ओके.
२. सर्चेबल नसली तरी अनुक्रमणिका आहे, अभंग कुठल्या अक्षराने सुरू होतो त्यावरून अकारविल्हे सूची आहे. त्यावरून शोध घेता यावा असे वाटते. पहा जमले तर.

चिंतातुर जंतू Tue, 19/04/2016 - 19:16

In reply to by बॅटमॅन

ज्या अभंगांत काही विशिष्ट शब्द येतात असे अभंग मला शोधायचे आहेत. त्यामुळे हे उपयोगाचं नाही. (त्यामुळे मला पडणारा एक नेहमीचा प्रश्न : असले प्रकल्प करणारे लोक डेटा प्रोसेसिंगबद्दल इतके अनभिज्ञ का असतात? मग त्यापेक्षा गूगल बुक्सला हे करू देणं योग्य ठरेल का?)

बॅटमॅन Tue, 19/04/2016 - 19:20

In reply to by चिंतातुर जंतू

(त्यामुळे मला पडणारा एक नेहमीचा प्रश्न : असले प्रकल्प करणारे लोक डेटा प्रोसेसिंगबद्दल इतके अनभिज्ञ का असतात? मग त्यापेक्षा गूगल बुक्सला हे करू देणं योग्य ठरेल का?)

लैच अपेक्षा बाळगता असे म्हणावे लागेल. गूगल बुक्सला हे करू देणे बेष्टच, पण लोकांचं बोलायचं तर इन जनरल गोष्टी नेटवर टाकणे हे उपयोगी असते हा विचार आत्ताआत्ता जराजरा जनमानसात रुजू पाहतो आहे. त्यामुळे त्यातील अ‍ॅडव्हान्स्ड गोष्टींबद्दल अजून काम होत नाहीये. होपफुली होईलही नंतर.

आदूबाळ Tue, 19/04/2016 - 19:25

In reply to by चिंतातुर जंतू

http://tukaram.com/downloads/marathi/gatha.zip

इथे युनिकोड पीडीएफमध्ये मिळेल. त्यात पीडीएफ रीडरचं सर्च फंक्शन वापरूनही शोधता येईल.

दुसरा, जरा हैटेक मार्ग म्हणजे "आर" सारखं (ओपनसोर्स) सॉफ्टवेअर वापरून डेटा मायनिंग करता येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 19/04/2016 - 18:59

ऋषिकेशच्या ह्या प्रतिसादामुळे प्रश्न पडला. ऋषिकेश म्हणतो,

या न्यायाने संभोगामुळे मुले झाली हा नैसर्गिक भाग झाला. पण मुले जन्माला घालण्यासाठी खास ठराविक वेळी संभोग करणे, इतर स्त्री/पुरुषांबद्दल आकर्षण वाटूनही ठराविक व एकाच व्यक्तीशी (लग्न वगैरे संस्था निर्माण करून) संभोग करणे, आपल्या भावांडांमध्ये आकर्षण वाटूनही संभोग न करणे हे अनैसर्गिक झाले. थोडक्यात सगळे अनैसर्गिक बदल/कृती हे अहितकारक असतीच असे नाही. (भावंडांमध्ये संभोग थांबल्याने आलेल्या जेनेटिक वेगळेपणाप्रमाणेच) शेतीसुद्धा अनैसर्गिक असली तरी माणसाला हितकारकच ठरली आहे!

काही माहितीचा शोध आपल्या जन्माच्या अनेक दशकं-शतकं आधीच लागलेला असतो. उदाहरणार्थ धूम्रपानामुळे कर्करोग होण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात वाढते याचा शोध कधीतरी १९६०-७० च्या दशकात लागला असेल. मी शाळेत जायला लागेस्तोवर ही माहिती पाठ्यपुस्तकांमध्ये आलेली होती. त्यामुळे धूम्रपान वाईटच ही गोष्ट मला 'सामायिक ज्ञानस्रोता'मधली वाटते. 'रॉकेट सायन्स नाहीये हे' असं. तीच गोष्ट भावंडांमधल्या संभोगाची, किंवा गोत्रगमनाची. लहान मुलं आईचं दूध पितात तशासारखं गुणसूत्रांमधून असणारं उपजत ज्ञान नसलं तरीही बहुतांश लोक गोत्रगमनी नसतात.

मला पडलेला प्रश्न असा की एकेकाळी गोत्रगमनाचा नियम कृत्रिम असेल पण तो आता कृत्रिम मानता येईल का? या प्रश्नामागे नैसर्गिक-कृत्रिम व्याख्या ऋषिकेशने ठरवलेली आहे तीच मान्य केली आहे.

बॅटमॅन Thu, 21/04/2016 - 13:29

In reply to by चार्वी

कोल्हटकरांच्या मते तो संस्कृत शब्द संस्कृतात लिहितो तसाच लिहिला जावा म्हणून वि पहिली.

अमुक Wed, 27/04/2016 - 13:12

In reply to by नंदन

साधलातच ना धातु आपलं... हेतू? :प

अमुक Wed, 27/04/2016 - 13:17

In reply to by -प्रणव-

लेखक-वाचक, गायक-श्रोता तर मग कवी-** जोडी कोणती? परत वाचक?
..........कविता ही वाचली नि ऐकली जाऊ शकते म्हणून श्रोचक. ;)
त्यात कुणाला प्रेक्षकही हवा असेल तर श्रोवाक्षक वगैरे शब्द पाडावेत.

नगरीनिरंजन Thu, 21/04/2016 - 10:22

ख्रिश्चन व मुस्लिम मृतांना कबरीत कूस बदलायची सोय आहे तशी हिंदूंना काय सोय आहे? आत्म्याला काहीच होत नाही म्हणतात त्यामुळे जाळून केलेल्या धुराची वावटळ वगैरे होणे शक्य नाही. शिवाय पुनर्जन्म झाला असल्यास वेगळाच प्रकार. कदाचित माणसांना एकाएकी वेड लागण्यामागे किंवा प्राणी अचानक पिसाळण्यामागे हेच कारण असावे का?
उदा. एखाद्या थोर साहित्यिकाच्या मृत्युनंतर त्याच्या चाहत्यांपैकी एकाने त्याच्यावर टिनपाट कविता केली आणि त्या साहित्यिकाचा माणूस म्हणूनच पुनर्जन्म झाला असेल तर तो जिहादी वगैरे होत असेल का?

अक्षरमित्र Tue, 28/03/2017 - 22:41

मी नुकताच योग वर्ग सुरु केला होता. त्यावेळी घरी सराव करतांना , विशेषत: हलासन, धनुरासन ,अशी अवघड तोलात्मक आसने करताना, सुरवातीला ,पाच दहा सेकंदाच्या वर आसन स्थिती टिकत नसे. अशा वेळी हॉल मधील घड्याळाच्या सेकंद काट्याकडे नजर ठेऊनच, आसनाचा कालावधी वाढवीत नेत असे. म्हणून सेकंद काटा तेथे सुद्धा आवश्यक आहेच.