Skip to main content

सध्या काय वाचताय? - भाग ६

याआधीचे भागः | | | ४ |

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
***************

नरहर कुरुंदकरांचे 'जागर' वाचायला घेतले आहे. सहज जालावर भटकत असताना पुस्तकजत्रावर 'जागर' उपलब्ध दिसल्यावर लगेच ऑर्डर देऊन टाकली. फ्री शिपिंगसाठी थोडे पैसे कमी पडत असल्याने लगेच दिसलेले इरावती कर्व्यांचे 'आमची संस्कृती' ही मागवले. :ड

ऋषिकेश Wed, 04/09/2013 - 17:06

काय योगायोग! मी देशील "जागर" वाचतो आहे.
हळुहळू वाचतो आहे. मात्र फ्री शिपिंगचे पैसे कमी पडल्याने मी मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास मागावले आहे ;) (माझ्याकडले कुणी ढापले कुणास ठाऊक :( )

बॅटमॅन Wed, 04/09/2013 - 17:14

In reply to by ऋषिकेश

त्या गाळीव इतिहासाचे कुणीतरी जाहीर अभिवाचन केले पाहिजे बॉ. महाराष्ट्र सारस्वताचे इतके जबरी विडंबन आजपर्यंत कध्धी म्हणून पाहिले नाही. खुद्द वि.ल.भाव्यांनीही वाचून आनंदाने पावती दिली असती. काय ती उदाहरणे अन काय ती वाक्यरचना. प्रस्तावनेपासून ते मेजर क्यांडीपर्यंत सगळ्यांचा इतका फर्मास समाचार घेतलाय तेच्यायला. महाराष्ट्र सारस्वत वाचल्यास या पुस्तकाचे अ‍ॅप्रीसिएशन अतिशय नेमके होते. सुदैवाने ते वाचल्याने पुलंनी त्याचा अतिशय बारकाईने केलेला अभ्यास लगेच डोळ्यांत भरतो.

बॅटमॅन Wed, 04/09/2013 - 17:57

In reply to by रमताराम

त्यापेक्षा आमचे रश्यन्स कै वैट हैत?

म्हंजे न्याशन्यालिटीचे नाव अन रसरशीत ल्हिणारे अशे दोन्हीही क्याप्चर झाले. हिकडं विंग्रजी अन तिकडं रश्यन अशी सुरुवात केली, का मग मधल्यांना कवळायला येळ नै लागायचा.

ऋता Wed, 04/09/2013 - 17:51

In reply to by बॅटमॅन

त्या गाळीव इतिहासाचे कुणीतरी जाहीर अभिवाचन केले पाहिजे बॉ.

-हो नक्कीच केलं पाहिजे- चांगलं असल्यास खूप खपेल.

ऋषिकेश Thu, 05/09/2013 - 08:53

In reply to by बॅटमॅन

त्या गाळीव इतिहासाचे कुणीतरी जाहीर अभिवाचन केले पाहिजे बॉ.

गेल्या दिवाळी अंकात त्यातीला काही भागाच्या अभिवाचनाचा प्रयोग करण्याचा मी विचार केलाही होता (मुळ संहिता इतकी ताकदवान आहे की माझ्यासारख्याने वाचुनही चालुन गेले असते असा समज (स्वान्तसुखाय) करून घेतला होता ;) )पण प्रताधिकारामुळे तसे करणे कठिण वाटते.

कोणत्यातरी व्यावसायिक संस्थेने काम हाती घेतले पाहिजे

सागर Wed, 04/09/2013 - 21:21

मिहिर आणि ऋ, दोघे कुरुंदकरांचे जागर वाचत आहात - एक बौद्धीक मेजवानी नक्की मिळत असणार तुम्हा दोघांना.

ऋ पु.लं.च्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' आहे.

मी एवढ्यातच फ्रॉम रशिया विथ लव्ह वाचून संपवले.

आज उद्या एस.एल. भैरप्पांची साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेली 'जा ओलांडुनी' वाचायला घेणार आहे ( मूळ कन्नड नाव 'दाटु' )
सध्या हे पुस्तक बहुतेक आऊट ऑफ प्रिंट असावे. कारण दीड वर्षांपूर्वी मलाच हे पुस्तक मिळवायला बरेच कष्ट पडले होते.

विषय स्फोटक आहे आणि अजून माझा वाचूनही व्हायचाय. त्यामुळे जिज्ञासूंनी नंदिनीच्या ब्लॉगवरील हे परिक्षण वाचावे

ऋता Fri, 06/09/2013 - 14:44

'फनी साईड अप'-रस्किन बॉन्ड
हलकं फुलकं सुंदर साधं इंग्रजी वाचायचं असल्यास उत्तम पर्याय. पुस्तकात त्यांच्या नेहमीच्या शैलीत लिहिलेले छोटे लेख आणि काही कविता आहेत.

ॲमी Sun, 08/09/2013 - 22:15

क्रॉसफायर सिरीज वाचली. आणि चक्क चक्क 'फिफ्टी शेड्स बरं होत याच्यापेक्षा' असं मत झालं. नै म्हणजे सिल्विया डे च इंग्रजी, लेखनशैली चांगलीय इ एल जेम्स पेक्षा. आणि क्याराक्टरस्, कथा पण फिफ्टीपेक्षा कमी वाईट आहे. पण ज्या इरॉटीक कंटेँट साठी ही पुस्तक विकली जात आहेत ते मला तरी फिफ्टीमधेच जास्त रोचक वाटलं. ही पुस्तकं वाचल्याने, हिरो नै आवडला तरीही फिफ्टीच्या सिनेमांबद्दल उत्सुकता उगाचच वाढली.

मेघना भुस्कुटे Sun, 15/09/2013 - 13:54

झुंडीचे मानसशास्त्र - विश्वास पाटील

या पुस्तकाचा काही भाग 'कदंब'च्या एका दिवाळी अंकात वाचला होता, तेव्हापासून या पुस्तकाबद्दल उत्सुकता होती. 'प्रभात' प्रकाशनाचं हे पुस्तक काही केल्या कुठेच मिळत नव्हतं. ते एकदाचं मिळालं.
विचारधारा कुठल्याही असल्या, तरीही झुंडींचं वर्तन समान असतं. त्या केवळ दुष्कृत्यच करतात असं नाही, झुंडींनी अनेक धीरोदात्त कृत्य केल्याचेही दाखले इतिहासात आहेत. पण म्हणून झुंडींना स्वत:ची निर्णयक्षमता असत नाही, तरल विचारक्षमता असत नाही. त्या उत्क्रांतीच्या खालच्या टप्प्यावर असतात. त्या बंडखोर असतात, मात्र क्रांतिकारी नसतात. त्यांना इन्हिबिशन्स (आंतरिक निषेध) नसतात, तसा सारासार विवेक नसतो. मुळात विवेक शाबूत असलेली व्यक्ती झुंडीत सामीलच होत नाही. झुंडी संमोहित होण्याला उत्सुक आणि सूचनासुलभ असतात. त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचं विलीनीकरण पुढार्‍याच्या व्यक्तिमत्त्वात करतात आणि त्याच्या मेंदूला पूरक असे शरीर म्हणून केवळ उरतात. झुंडींना हाताळण्याचं कौशल्य असल्याखेरीज कोणत्याही चळवळी यशस्वी होत नाहीत...
अशी अनेक रोचक वाक्यं या पुस्तकात आहेत.
मांडणी काहीशी पाल्हाळिक आहे. पुनरावृत्ती आहे. पण कंटेंट - स्पष्ट, धारदार. मजा येतेय.

बॅटमॅन Thu, 12/09/2013 - 12:17

"प्रिन्सेस-अ ट्रू स्टोरी बिहाईंड द व्हेल इन सौदी अरेबिया" हे जीन सॅसनचे पुस्तक नुकतेच वाचले. सौदी राजघराण्यातल्या एका सुलताना नामक राजकन्येचे (नाव बदलून पण खर्रेखुर्रे) आत्मवृत्त आहे. काळ १९७० पासून पुढचा. नॉट विदौट माय डॉटर, सोन्याच्या धुराचे ठसके, मयादा, इ. पुस्तके वाचलेल्यांना काही नवीन नाही. पण राजघराण्यातील व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तिथल्या स्त्रियांच्या पशुवत् स्थितीचे वर्णन कधी वाचले नव्हते ते या निमित्ताने वाचायला मिळाले. वर्णनशैली 'व्हिव्हिड" (मराठी?) आहे, खिळवून ठेवणारी आहे. बर्‍याच गोष्टींबद्दल आधी कुठेसे वाचले असले तरी इथे त्या एकदम अंगावर येतात. सौदी राजघराण्याची अगणित संपत्ती आणि शिवाय स्त्रियांवरच्या बंधनांमुळे येणार्‍या कंटाळ्याचे, रितेपणाचे वर्णन यथार्थ आहे. अशी वर्णने कैकदा डिसमिसिवली जातात, सुख टोचतंय इ.इ. म्हणून. पण त्यामुळे त्यांची सत्यता कमी होते असे मला तरी वाटत नाही. असो. सौदीमध्ये अलीकडे झालेले काही बदल त्या तुलनेने बरेच स्वागतार्ह आहेत.

बाकी, जीन सॅसनबद्दल फ्रॉडचे आरोपही झालेत, तेव्हा किती खरेखोटे ते तो एक अल्लाच जाणे. पण पुस्तक रोचक आहे हे नक्की.

जुई Thu, 12/09/2013 - 17:19

'मुखवटे आणि इतर कथा' हा आनंद जातेगावकर यांचा कथा संग्रह वाचला .
सर्व कथा वाचनीय आहेत. बहुतांशी कथांमधले वातावरण साठ सत्तरच्या दशकातले आहे .
एकच कथा 'अहिल्या ' वेगळी आहे .

'मुखवटे' ही मुखपृष्ठ कथा वाचताना कथानायिका अन्नपूर्णेची खूप कीव येते . माणूस आपणच तयार केलेल्या देवधर्मा कर्मकांडाच्या च्या मुखवट्याआड किती पिचून घेतो असे वाटते . ते तोडायची हिम्मतही होत नाही आणि जीवही घुसमटत राहतो .

बऱ्याच कथांमध्ये ही असलीच घुसमट दाखवली गेलीय.

'गुलमोहर' कथा वाचताना हुळहुळ लावून जाते . 'रान' या कथेत चित्रमय वातावरण दिसते काहीतरी सुंदर शांत अनुभव देणारी कथा होणार अस वाटते पण या पहिल्याच कथेत जीवाला चटका लावेल असा मृत्यू दिसतो . भातुकली ही कथाही बघता बघता निरागसते मधून एकदम काही कुरूप दाखवून जाते .
रूढ शिक्षणातील अपयश त्यामुळे येणारी तडफड , उदासीमुळे पिचलेली, आत्महत्येकडे झुकणारी पौगंडअवस्थेतील मुले काही कथांमध्ये येतात .
काळ कितीही बदलला तरी मूळ माणूस आणि त्याचे संघर्ष तेच राहतात असे वाटते .

'अहिल्या ' ही कथा मात्र सर्व कथांपेक्षा वेगळी , सरस आहे . पहिल्या निवेदनापासून ही कथा उंचावत जाते .
अहिल्येचा वेगळाच सुंदर पैलू समोर येतो . रूढ प्रतिमा असलेली बिच्चारी गरीब शापित अहिल्या गायब होऊन अहिल्या एकदम मुक्त स्त्री होऊन जाते.
एकूण हा कथा संग्रह वाचनीय आहे . ~ जुई http://www.bookganga.com/eBooks/Book/5596289048701953047.htm?Book=Mukha…

अक्षय पूर्णपात्रे Thu, 12/09/2013 - 19:02

गेल्या आठवड्यात रारा नेमाडे यांच्या निवडक सोळा भाषणांचे संकलन विकत घेतले. हे पुस्तक नजरेस पडण्याआधी विलास सारंग यांचे कुठलेतरी पुस्तक चाळले. त्यातील मुलाखतीतून इतर लेखक-समिक्षकांवर स्वैर टिका करण्याच्या नेमाडी कावेबाजपणावर टिका केल्याची नेमकी पाने वाचल्यानंतर नेमाड्यांच्या मुलाखतींचा संच न घेता भाषणांचा संच घेतला. सारंगांचे न वाचलेले सात दशांश पुस्तक मात्र घेतले नाही. नेमाड्यांच्या मुलाखतींचे उस्तक चाळले.

भाषणे खूप आधीची नसून 'हिंदू' प्रकाशित होण्याच्या आधीची असल्याने कादंबरीतला पसारा अडगळीपर्यंत कसा पोचला असावा याचा माफक अंदाज बांधता येतो. भाषणांना उपस्थित असलेले महाजन, जागा आणि निमित्तं यावरून नेमाड्यांचा कुणबट चालाखपणा ध्यानी येतो. काही भाषणांत देशीवादाची तात्त्विक चौकट स्पष्ट होण्यास मदत होते. इंग्रजी भाषणांची इतरांनी केलेली भाषांतरे इतकी चोख आहेत की भाषांतर करणारे लोक नेमाड्यांच्या शैलीचे मोठेच भक्त असावेत असा संशय येतो. पुस्तक अर्थातच वाचनीय आहे. मी आत्त्तापर्यंत पाच-सहाच भाषणे वाचली आहेत.

ऋता Sat, 14/09/2013 - 14:36

सध्या तवलीन सिंग यांचे लेख वाचते आहे. त्यातला 'अ चेंबर ऑफ प्रिंसेस?' हा लेख वाचनात आला. आपल्या संसदेत अनेक सदस्य हे त्यांच्या बापाच्या पुण्याईने जागांवर निवडून आलेले आहेत हे आपण सगळेच जाणतो...पण नक्की याचं प्रमाण किती..हे या लेखात वाचून चक्रावून जायला होतं. आपल्या देशात लोकशाही असली तरी निवडून आलेल्याला राजा समजणे आणि त्याच्या भाऊबंधांना पिढ्यानुपिढ्या त्या जागांवर निवडून देणे यातच बहुसंख्य लोक धन्यता मानतात असे दिसते. राजकीय पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव त्यांनी अधोरेखित केला आहे.

तवलीन यांचे अन्नसुरक्षा विधेयकाबद्द्लचेही लेख आवडले. बाकी वाचते आहे.

चिंतातुर जंतू Sun, 15/09/2013 - 15:29

In reply to by ऋता

तवलीन सिंग ह्यांना पाकिस्तानी राजकारणी सलमान तसीर ह्यांच्यापासून एक मुलगा आहे - आतिश तसीर. त्याचं पाकिस्तानविषयक लिखाण नक्की वाचावं असं सुचवेन. (जाता जाता : सलमान तसीर ह्यांनी पाकिस्तानी धर्मद्रोही कायद्याला विरोध केला म्हणून त्यांची २०११मध्ये हत्या झाली.)

अर्धवट Sat, 14/09/2013 - 15:50

सध्या 'हू सेज एलेफंट कान्ट डान्स' हे पुस्तक संपवत आणलं आहे,
आयबीएम ह्या अवाढव्य आणि नोकरशाहीने भरलेल्या आणि भारलेल्या कंपनीला १९९३ सालाच्या नीअरडेथ म्हणता येइल अशा अवस्थेतून खेचून काढणारा आणि माहितीतंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील अव्वल कंपनी पुन्हा बनवणारा, टर्नअराउंडचा जादूगार लुई गएर्स्ट्नर ने लिहिलेले एक चांगलं पुस्तक.
तांत्रीक परिभाषा अजिबात न वापरता, अत्यंत साध्या भाषेत त्याच्या आठ वर्षाच्या सीईओ कारकिर्दीचा आढावा आहे, मला वर्क कल्चरविषयी लिहिलेला भाग जास्त आवडला. मोठेपणाचा आव न आणता, अडचणी, उपाय आणि त्यांचे एका द्रष्ट्या नेत्याने, ज्या सर्वांवर केलेलं भाष्य असा प्रवास आहे.

कॉर्पोरेट जगताविषयी उत्सूकता, व मॅनेजेमेंट सायन्सची आवड असलेल्यांना आवर्जून रेकमेंड करेन.

बॅटमॅन Mon, 23/09/2013 - 00:54

"डिसायफरमेंट ऑफ लिनिअर बी" हे जॉन चॅडविकचे पुस्तक वाचले. मायकेल व्हेंट्रिस आणि जॉन चॅडविक या जोडगोळीने मायसीनियन ग्रीक भाषेत, लिनिअर बी लिपीत लिहिलेल्या मातीच्या जवळपास ६००० टॅबलेट्सचा अभ्यास केला आणि द्वैभाषिक एकही इन्स्क्रिप्शन नसताना भाषा डिकोड केली. याला आजवरच्या पुरातत्त्वशास्त्राच्या इतिहासात तोड नाही. बाकी इजिप्शियन भाषा अन लिपीचा शोध त्रैभाषिक रोझेटा स्टोनमुळे लागला, मध्यपूर्वेतील बॅबिलोनियन इ. अन्य भाषांचा शोधही असाच लागला. दरवेळेस आधी माहिती असलेल्या एकातरी भाषेचा क्लू होता. इथे मात्र तसे काहीही नव्हते. अर्थात, सायप्रस बेटात सापडलेल्या अन डिकोड झालेल्या लिपीच्या चिन्हांबरोबर २-३ चिन्हे म्याच झाल्यावर मग त्यांच्या डोक्यात फॉक्कन प्रकाश पडला होता हे आहेच. पण तरीही इतक्या तुटपुंज्या डिरेक्ट पुराव्यांवरून त्यांनी पुढे जी झेप घेतली, त्याचे वर्णन केवळ तोंडात बोट घालायला लावणारे आहे.

संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी या म्हणीप्रमाणे, द्वैभाषिक शिलालेख नसताना त्या भाषेबद्दल अंदाज बांधणे सुरू केले. ती भाषा ग्रीक असू शकेल असे कुणालाच वाटले नव्हते. अन्य भाषा मानल्या-अगदी इजिप्शियन बॅबिलोनियन पासून सर्व भाषा मानल्या, काही जमेना. मग शेवटी भाषा कुठली का असेना, जनरल स्ट्रक्चर काय असेल याबद्दल अंदाज बांधणे सुरू केले. त्यात अ‍ॅलिस कोबेर ने जे चिन्हे व अन्य निगडित गोष्टींचे ग्रिड बनवले होते त्याचीही त्यांना लै लै मदत झाली. भाषा वैग्रे काही पत्ता नसताना हे नाम असेल, हे सर्वनाम, हा लिंगभेद, हा विभक्तिप्रत्यय, अशा अगदी तपशीलवार लिस्टा अ‍ॅलिसने बनवल्या होत्या. त्या वापरल्या, काही लकी गेस मारले आणि त्यामुळे जनरल रचना स्पष्ट झाली. आणि शिवाय ऐतिहासिक भाषाशास्त्रज्ञांकडून मायसीनियन (ट्रोजन वॉरच्या वेळच्या) ग्रीक भाषा कशी असेल त्याचे मॉडेल बनवले होते ते वापरले.

एकदा का ती टॅबलेट्सवरची भाषा ग्रीक आहे असे मानले आणि बाकी गेसवर्क सुरू ठेवले, की मग शेवटी भसाभस निष्कर्ष निघू लागले. त्या तर्काला पुष्टी देणारे अन्मिस्टेकेबल पुरावे मिळू लागले. आजपर्यंत फक्त होमरमध्येच वाचलेले कितीतरी शब्द जुनाट रूपांत मिळू लागले. देवांची व माणसांची नावे, शिवाय प्राणी आणि अन्य वस्तूंची नावे चक्क होमरशी जुळू लागली आणि ट्रोजन युद्धाशी संबंधित बर्‍याच गोष्टींचा उलगडा झाला. एक लै मोठ्ठा बोळा निघाला.लिनिअर ए मात्र अजून डिकोड करता आली नाहीये.

हे वाचून हडप्पा लिपीबद्दल आशा वाटू लागली. पण इथे काही महत्त्वाचे फरक आहेत-हडप्पा लिपीतल्या 'शिलालेखांत' दर लेखात चिन्हे जास्तीतजास्त १०-१२ असतील, बहुतेकवेळा अजून कमी. आणि हडप्पा लिपी ही मुळात कुणा भाषेची लिपी आहे किंवा नाही यावरच जोरदार वाद सुरू आहेत, लिनिअर बी मध्ये असा डाऊट तरी कुणी खाल्ला नव्हता. पण देव करो आणि हडप्पा लिपीही डिकोड होवो. आमेन!

मन Fri, 11/10/2013 - 16:05

In reply to by बॅटमॅन

हे इतकं आणि एवढं काम केलेलं असणं अशक्य आणि आवाक्याबाहेरचं आहे असच वाटतं.म्हणजे पन्नाश षटकांच्या सामन्यात तीनशे चेंडूंवर शटकार मारल्यासारखं वाटतं राव.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 23/09/2013 - 01:23

करुणा गोखले यांनी लिहीलेलं 'बाईमाणूस' पुन्हा एकदा वाचलं. अगदी फार आवडलं नाही; पण जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल असल्यामुळे अधिक रस. मला फार न भावण्याचं कारण म्हणजे क्वचित व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधनं येतील अशा प्रकारचे विचार दिसतात/वाटतात. शिवाय 'द सेकंड सेक्स' वाचल्यानंतर या विषयासंदर्भात निराळं मूलगामी लिखाण करणं कठीणच आहे. तरीही भारतीय संदर्भातला स्त्रीवाद म्हणून हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. आपल्याकडे असणारी प्रचंड प्रमाणातल्या सामाजिक, आर्थिक विषमतेमुळे असणारी निराळी परिस्थिती आणि मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग वाचतो अशा पेपरांमधे दिसणारी बलात्काराच्या बातमीशेजारी तोंड झाकलेली मुलगी दाखवणारी चित्रं, असे (खास अपाश्चात्य/भारतीय) प्रकार या संदर्भात भारतीय लेखणीतून झालेलं लिखाण रोचक वाटतं.

अलिकडच्या काळात झालेल्या चर्चा आणि काही प्रमाणात असणार्‍या सरसकटीकरणाच्या आक्षेपांचं उदाहरण म्हणून हा एक परिच्छेद. 'फूटनोट्स' माझ्या आहेत.

स्त्रियांवर पेहरावासंदर्भात जे निर्बंध घातले जातात त्याविषयीपण थोडा तपशिलात जाऊन विचार करणे अगत्याचे आहे. साधारणपणे स्त्रियांनी भडक अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणे म्हणजे छेडछाडीला आणि अत्याचाराला आमंत्रण असे मानले जाते. अनेकदा 'प्रक्षोभक' कपडे घातलेल्या स्त्रीवर बळजबरी झाली, तर ती समर्थनीयसुद्धा मानली जाते. परंतु येथे काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. एक म्हणजे अगदी पारंपरिक, 'सभ्य' कपडे घातलेल्या स्त्रीची पण छेडछाड होते वा तिच्यावर अत्याचार होतात. म्हणजेच स्त्रीचा पेहराव हे तिच्यावर होणार्‍या अत्याचारांचे कारण नसून लटके समर्थन आहे. स्त्रीवर अत्याचार होतात ते तिच्याकडे बघण्याच्या प्रदूषित दृष्टिकोनामुळे. म्हणूनच तीन वर्षांच्या अजाण बालिकेपासून, ते डोक्यापासून पायापर्यंत गुंडाळलेल्या स्त्रीवर सुद्धा अत्याचार होताना आढळतात. तोकडे कपडे हाच मुद्दा असता, तर पुरुषावरही अत्याचार व्हायला हवेत. कारण घरात तर पुरुष सर्रास छातीचा वरचा भाग उघडा टाकून वावरत असतात. अगदी घराबाहेरसुद्धा अनौपचारिक प्रसंगी पुरुष अर्धी विजार घालून वावरतात. पण स्त्रिया अशा पुरुषांची टवाळी करत नाहीत किंवा त्यांच्यावर अनुदार शेरेबाजी करून कमीपणा आणत नाहीत; कारण स्त्रिया पुरुषाच्या देहाकडे तुच्छता वृत्तीने बघत नाहीत. हे सर्व गैरप्रकार स्त्रीबाबत होतात. कारण स्त्रीचे शरीर ही उपभोगाची आणि उपभोग शक्य नसेल, तर कुचेष्टेची बाब आहे हा अपसमज दृढ झाला आहे. स्त्रीच्या शरीराला इजा करण्याची मुभा समाज घेत असल्यामुळे ते सतत झाकून त्याला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक स्त्रीवर सतत येऊन पडते. याचाच अर्थ असा, की स्त्रीवर कपड्यांच्या बाबतीत पडणारे निर्बंध नैसर्गिक नसून ती पुरुषकेंद्री सामाजिकतेची देणगी (?) आहे.

१. पुरुषांवरही, कमी प्रमाणात का होईना, अत्याचार होतात.
२. शेरेबाजी करत नाहीत हे वाक्य बहुदा भूतकाळात मान्य करण्यासारखं आहे. अस्मादिक आणि अन्य काही उदाहरणांवरूनतरी हे वाक्य अमान्य आहे. अशा वर्तनाबद्दल अपराधी भाव बाळगावा असं वाटत नाही.
३. यात स्त्रियांना निष्कारण पांढर्‍या रंगात रंगवण्याचा प्रयत्न वाटतो. "लोक काय म्हणतील" ही लहान वयापासून दाखवलेली भीतीसुद्धा याला कारणीभूत असते. पुरेसं भरीस पाडलं तर अशा 'घाबरट' किंवा उच्च नैतिक भूमिका घेणार्‍या मुली/स्त्रियासुद्धा एखादा शेरा मारतात.

एकंदर स्त्रियांवर अन्याय झालेला आहे, होतो आहे म्हणजे स्त्रियांची विचारसरणी ही पांढरीच असं काहीसं पुस्तक वाचताना जाणवतं. स्त्रीवाद ही विचारसरणी पांढरी असण्याबद्दल शंका नाही, म्हणून सगळ्याच किंवा बहुतांश (स्त्रीवादी असोत वा गुलामगिरीवादी) स्त्रिया पांढर्‍या विचारसरणीच्या असं म्हणणं हा ही दुसर्‍या टोकाचं आणि म्हणूनच अन्यायकारक वाटतं.

ऋषिकेश Mon, 23/09/2013 - 09:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतरः

कारण स्त्रिया पुरुषाच्या देहाकडे तुच्छता वृत्तीने बघत नाहीत

स्त्रिया - त्यातही मध्यमवयीन / पुर्वीच्या स्त्रिया- पुरूषांच्या देहाकडे कशा पाहतात हा माझ्यासाठी कुतूहलाचा विषय आहे. याला कारण एकतर या विषयावर मोकळेपणाने बोललेले - तेही पुरूषांसमोर - कमीच. कॉलेजमधील माझ्या वयाच्या मुली आडून का होईना वाटणारे शारीरीक आकर्षण/घृणा सुचवायच्या. काही तेव्हा बोल्ड वाटणार्‍या मुली शिट्या मारण्यापासून "अरे तुने तो बॉडी शेव्ह कर दिया अब तुझे देखनेमे क्या मजा?" असे एकाला प्रत्यक्ष बोलताना ऐकले आहे. पण त्या अपवादच. माझ्या १०एक वर्षांनंतरच जन्मलेल्या पूर्णपणे मुक्त आर्थिक धोरणात वाढलेल्या मुली मात्र या टॅबूतून बर्‍यापैकी बाहेर आलेल्या दिसतात.

मात्र मध्यमवयीन / पूर्वीच्या स्त्रियांनी व्यक्त केलेली मते अधिक रोचक वाटतात, आणि त्यामुळे कुतूहल अधिकच वाढते. नुकतेच ऐकलेले एक उदा:
सध्याच्या बलात्कारावर सासायटीतल्या बायकांच्या गटात जिन्यात ताटकळत खमंग चर्चा चालु असताना एका काकूंचे मत (मी घरात होतो तरी स्वच्छ ऐकू येत होते ;) )"तसेही पुरूषांच्या शरीराला एकच अवयव असतो असं बायकांना काय अगदी पुरूषांनाही पटलेलं आहे, बायकांना त्यात बघायसारखं काय वाटणार!?"

बाकी पुस्तक वाचायच्या यादित आहेच

बॅटमॅन Thu, 17/10/2013 - 18:09

In reply to by ऋषिकेश

कमिन्स कालिज क्याम्पसात गेल्यास मेजॉरिटी मुली मायनॉरिटी मुलांवर नजरेने बलात्कार करतात अशी तक्रार तिकडे गेलेला माझा मित्र करत होता आणि बाकीचे लोक त्याची टर उडवून वर त्याचा हेवा करीत होते असा इञ्जिनिअरिङ्ग मधला किस्सा आठवला.

ते हि नो दिवसा: गता: |

आबा Mon, 23/09/2013 - 01:35

डॉ. व्हिक्टर फ्रांकेल यांचं "Man's search for meaning" नावाचं पुस्तक नुकतंच वाचणात आलं. फ्रांकेल हे एक सायकिआट्रीस्ट होते, ते ज्यू असल्यामुळे त्यांना जर्मनांनी छळछावणी मध्ये टाकलं होतं. तिथल्या अनन्वित अत्याचाराला कंटाळून कैदी आत्महत्या करीत असत. कैदेतल्या आयुष्याचा कैद्यांच्या मनस्थिती वर कसा परिणाम होतो याची निरीक्षणे डॉक्टरांनी यात नोंदवली आहेत. "सहानुभूतीसारख्या मानवी भावना अश्या परिस्थितीतही जिवंत राहणं" आणि "सिसीफसच्या प्रश्नाचं उत्तर धर्मामध्ये आहे असं मानणाऱ्या लोकांनाही मरणामध्येच मुक्ती आहे असं वाटणं" यातला विरोधाभास रोचक वाटला.

अवांतर: डॉ. अभय बंगांच्या, "माझा साक्षात्कारी हृदयरोग" आणि "Man's search for meaning" यामध्ये एक समान सूत्र आहे असं वाटलं. ते म्हणजे आपल्यावर आलेल्या संकटामध्ये आपल्या मनस्थितिची आणि जीवननिष्ठांची चिकित्सा करावी याची कृतीशील जाणीव.

सामो Tue, 09/02/2021 - 04:49

In reply to by आबा

डॉ. व्हिक्टर फ्रांकेल यांचं "Man's search for meaning" नावाचं पुस्तक नुकतंच वाचणात आलं.

होय मीही वाचलय हे पुस्तक. खूप ऐकलेलं असल्याने. खूप म्हणजे खूपच. एकदाचं घेउन वाचलं. आवडलं. कमाल आणि कौतुक वाटले लेखकाविषयी.

मन Fri, 11/10/2013 - 16:20

In reply to by सविता

साधे ...सरळ... सुंदर.
कुठलीही चांगली मूल्यं रुजवायची असतील, एखा मातीच्या गोळ्याला चांगला आकार द्यायचा असेल तर फार मोठी तात्विक भाषणे देण्यापेक्षा अशी पुस्तकं , कथा , गोष्टी हाती ठेवाव्यात.
मनाला एक वेगळी दिशा मिळून जाते.

विषारी वडापाव Sat, 28/09/2013 - 10:03

प्रकाश अकोलकरांच जय महाराष्ट्र- हा शिवसेना नावाचा इतिहास आहे हे पुस्तक भारी आहे. शिवसेनेचया स्थापनेपासून ते बालासाहेबांचया निधनापर्यंत शिवसेनेचया वाट्चालिचा अभ्यासपूर्ण मागोवा या पुस्ताकात आहे. एक पत्रकार म्हनून अकोलकरानी शिव सेनेला जवळुन पाहीले आहे. मी स्वतहा परभणि सारख़्या शिवसेना च्या बालेकिल्ल्यात लहानाचा मोठा zआल्याने शिवसेना बद्दल वाचायला मला आवडत. (जरी त्यांचा समर्थक नसलो तरी). शब्द आणि कृति यांचयातला विरोधाभास हे शिवसेना चे पहिल्यापासुन्चे धोरण राहिले आहे हे या पुस्तकातुन कळत. शिवसेना ने खरच मराठी मानसाच भल केल का? शिवसेना ही खरीच मराठी मानासाची तारनहार आहे का? या प्रश्नाची उत्तर ज्याने त्याने शिवसेनेचा हा इतिहास वाचून शोधावित. राजकारण मध्ये रस असनार्याणी ज़रूर वाचाव असपुस्तक.

ऋषिकेश Thu, 03/10/2013 - 09:33

सध्या रविंद्रनाथांच्या कथा वाचतोय. पहिल्यांदाच वाचतोय. आवडताहेत.
शिवाय जोडीला अवचटांचं पुण्यातील अपूर्वाई पुन्हा वाचायला घेतलंय. पुण्यात काही काळ वास्तव्य झाल्यानंतर ते पुन्हा वाचायला अधिक मजा येतेय.

बाकी मेहताचा ३५% व ५०% सेल चालु असल्याने पुढिल ३ पुस्तके मागवली आहेत:
-- वंशवृक्षः (अनुवादित) डॉ. भैरप्पा
-- केतकर वहिनी: उमा कुलकर्णी
-- रशियन डायरी (अनुवादित)

ऋता Sun, 06/10/2013 - 00:39

सध्या अफ्रिकन लेखकांची पुस्तके वाचत आहे. त्यात चिनुआ अचेबे *(Chinua Achebe) यांची दोन पुस्तके वाचली. पहिले होते 'गर्ल्स अ‍ॅट वॉर अँड अदर स्टोरीज'...सगळ्या कथा आवडल्या नाहीत.पण अफ्रिकेतल्या माणसांची, त्यांच्या संस्कृतीची नक्कीच थोडीफार ओळख झाली. 'गर्ल्स अ‍ॅट वॉर' ही गोष्ट मात्र अतिशय विचार करायला लावणारी आणि दु:खी करणारी आहे. या लेखकाची लेखनाची शैली आवडलीच होती...मग दुसरी त्यांचीच 'थिंग्ज फॉल अपार्ट' ही कादंबरी वाचली. खूपच आवडली. अफ्रिकेत ख्रिश्च्न मिशनर्‍यांच्या शिरकाव्याने कशा गोष्टी बदलत गेल्या आणि नव्या संस्कृतीच्या लोंढ्यात जुने कसे अचानक कालबाह्य होवून तुटून पडते हे कादंबरीतून खूप स्पष्टपणे समोर येते.
आणखीन एक कादंबरी वाचते आहे...'द ब्राइड प्राइस'...लेखिका बुची एमेचेता *(Buchi Emecheta). ही गोष्ट नायजेरियात घडते...त्यात संस्कृतीमध्ये अफ्रिकन आणि ख्रिश्चन असे दोन्ही प्रभाव आहेत. ह्या कादंबरीतून हे कळलं की अफ्रिकेत सुद्धा 'फ्री मेन' हे 'स्लेव्ज'ना कमी लेखत आणि त्यांच्यात बेटी व्यवहार वर्ज्य होता.

*अफ्रिकन उच्चारांबाबत मला कल्पना नाही त्यामुळे देवनागरीत लिहिलेला उच्चार चुकीचा असू शकतो.

रोचना Sat, 19/10/2013 - 16:14

In reply to by ऋता

त्सित्सी दांगारेम्गा या (झिंबाब्वेच्या) लेखिकेचं "नर्वस कंडिशन्स" आणि एंगूगी वा थियोंगो या (केन्यन) लेखकाचे "ग्रेन ऑफ व्हीट" आणि "द रिवर बिटवीन" ही मस्त आहेत, थिंग्स फॉल अपार्ट च्याच परंपरेतले.

आबा Thu, 17/10/2013 - 17:49

आयन रँडचं "द फ़ाऊंटनहेड" वाचलं. छान आहे, पण पंधरा सोळा वर्षाचा असताना वाचलं असतं तर जास्त आवडलं असतं.
बाईंवर डाव्या विचारांचा खूप प्रभाव असावा असं वाटलं. तिच्या कुटुंबालाच बोल्शेविक क्रांतीमुळे स्थलांतर करावं लागलं होतं हे नंतर कळालं.

अवांतर : "जोनाथन लिविंग्स्टन" जर पक्षी असण्याऐवजी माणूस असता. तर त्याच नाव हावर्ड रोर्क असलं असतं असंही वाटून गेलं :)

बॅटमॅन Thu, 17/10/2013 - 18:01

In reply to by आबा

फौंटनहेड वॉज द फौंटन फ्रॉम व्हिच स्प्रॅङ्ग अप दि अ‍ॅटलास द्याट वॉज अल्टिमेटलि श्रग्ड (शेवटचा ड पूर्ण).

तिथला जॉन गाल्ट तर खत्राच प्रकरण आहे. फौंटनहेडच्या पुढची आवृत्ती आहे. ते वाचून लहानपणी पडलेल्या तत्सदृश प्रश्नांची आठवण झाली आणि थोडेसे विचारमन्थनही झाले. फौण्टनहेड आता इतके आठवत नै पण गेल वायनंड अन डॉमिनिक ही पात्रे जास्त आवडली. आणि पीटर कीटिंग इतके पाहिलेत आसपास, अरारारारा, प्रथमपासूनच ते पात्र डॉक्शात गेलं होतं.

हॅङ्क रिअरडेन, डी अ‍ॅङ्कोनिया, डॅग्ने टागार्ट आणि ऑफकोर्स जॉन गाल्ट ही पात्रे अ‍ॅटलासमध्ये रोचक वाटली. पण एकूण सगळे प्रकरण अल्टिमेटलि भाबडेच वाटले.
इतके असूनही, असे कधीतरी जर झाले तर लोकांची कसली भंबेरी उडेल असे वाटून एक नाही-रे-सुलभ आहे-रे-वाल्यांबद्दल द्वेषमूलक आनंदाची प्रतिक्रिया आल्याचेही आठवतेय. फौंटनहेड कसे, त्यात रोआर्क एकांडा इ. असला तरी त्याचा फुन्सुख वांगडू होतो शेवटी. वाया जात नै. म्ह्ञ्जे समाजात थोडेतरी चाङ्गले आहे असे वाटायला लावते. अ‍ॅटलास श्रग्ड मात्र लैच खंग्री आहे. प्रथम वाचनात तर यच्चयावत सगळे म्यानेजर्स आणि अ‍ॅडमिन्स हे पॅरासाईट आहेत असा शाळकरी ग्रह होतोच होतो. त्या गंडातून बाहेर पडायलाही जरा वेळ लागतो.

आबा Thu, 17/10/2013 - 19:57

In reply to by बॅटमॅन

अ‍ॅटलास श्रग्ड वाचलं नाही मी, पण वाचेन एकदा. हल्ली एखाद्या पुस्तकाचा प्रचंड प्रभाव पडावा असं होत नाही.
सुचवणीबद्दल थँक्यू.

बॅटमॅन Thu, 17/10/2013 - 20:01

In reply to by आबा

हल्ली एखाद्या पुस्तकाचा प्रचंड प्रभाव पडावा असं होत नाही.

सेम हिअर! हे कितपत चांगले/वाईट ते सांगता येणार नाही पण अलीकडे असे होतेय हे मात्र खरे.

बॅटमॅन Fri, 18/10/2013 - 01:45

रा.रा. ररागुर्जीञ्च्या फेसबुक भिन्तीवर बागडताना हा लेख दिसला आणि वाचला. ररागुर्जी कैतरी हटके असेल तं शेअर करणार हे ओघाने आलेच.

महाराष्ट्र- आखूड लोकाञ्चा प्रदेश.

सुहास पळशीकरांनी जी मुलूखमैदान तोफ चालवलीये वा!!!!!! लै मार्मिक. एकदा वाचावीच अशी शिफारस आहे.

मी Fri, 18/10/2013 - 02:29

In reply to by बॅटमॅन

कुबेरांनीही असचं काहिसं लिहलयं नं दसर्‍याच्या अग्रलेखात? एकदम काय झालयं ह्या लोकांना, हे आधी नव्हतं की काय महाराष्ट्रात? किती पेसिमिझम तो, त्यांनी युनिक फिचर्सची लाज काढली नाही हे विशेष, का हा आग-ओक्या-विशेषांक आहे अनुभवचा?

मन Fri, 18/10/2013 - 10:03

In reply to by मी

"चंगळवादी व्हा" शीर्षक असलेल्या गिरीश कुबेरांच्या लेखाबद्दल बोलताय का? (कुबेरच तो; चंगळवादी होणं कुबेराला नक्कीच परवडेल ;) )
मज्ज येते ब्वा. असे लेख नसले तर वाद कसे घालणार? गप्पा कशा होणार?

बॅटमॅन Fri, 18/10/2013 - 13:53

In reply to by मी

हा हा हा...इतका वाईट काळ तरी नव्हता हे नक्की.

पण हे वाचून आलेले वैफल्य गो पु देशपांड्यांच्या मीडिऑक्रिटीज वरच्या लेखवाचनाने जाते. हे क्षणिक असून द डार्क नाईट विल राईज लेटर फॉर शुअर असा विश्वास देण्यास तो लेख उत्तम आहे.

मन Fri, 18/10/2013 - 10:01

In reply to by बॅटमॅन

खूपच जुना लेख; निदान काही वर्षे तरी.
उपक्रमावर त्यावेळी ह्या लेखावरून उपक्रमच्या मानाने प्रचंड असा दंगा झाला होता.
उपक्रम जिवंत रसरशीत होतं तेव्हाचा तो काळ.
.
ह्याच धर्तीवरचं राजेश घासकड्वींनी कुठून तरी लिंकवलेलं "मराठी भाषा हे एक डबके झाले आहे" हे राज खान ह्यांचे विधान व तदनुषंगाने चर्चा.
बहुतेक ती चर्चा मात्र ऐसीवरच झाल्ति.

अक्षय पूर्णपात्रे Fri, 18/10/2013 - 19:55

In reply to by बॅटमॅन

केव्हा केव्हा असं लांबच-लांब तळतळून मराठी लोकांच्या आत्मप्रौढीचा राग येतो. अत्रे, देशपांडे, मोरे, रेगे, साळूंखे, नेमाडे असा सर्वंकष आखुडपणाचा विस्तार खूपच आवडला.

बॅटमॅन Fri, 18/10/2013 - 20:04

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

तो लेख आवडला तर ज्ञानदा देशपांड्यांचा हाही लेख बघा. आधीच्या लेखात विचारवंतांना टार्गेट केलंय, इथे नेते आणि जण्रल समाजाला टार्गेट केलंय.

त्यांचे एकूण लेख जब्री असतात. त्यांचा ब्लॉग अलीकडे थंड पडलाय, का कोण जाणे. पण खल्लास आहे.

http://dnyanadadeshpande.blogspot.in/

मिहिर Fri, 18/10/2013 - 19:38

सहज म्हणून पुस्तकविश्ववर गेलो आणि काही जुने लेख चाळले आणि त्यातच बराच वेळ गुंगलो.
इथे तर चक्क चक्क चिंतातुर जंतूंना मराठी साहित्याचे कौतुक करताना पाहून आश्चर्य, आनंद, मौज वगैरे बरेच काय काय वाटले. ;)

नगरीनिरंजन Sat, 19/10/2013 - 20:49

सध्या डेविड सुझुकी (आणि डेव रॉबर्ट टेलर) यांचा "The Big Picture" हा निबंधसंग्रह वाचतोय.
पुस्तकाचे वर्णन असे केले आहे: "Reflections on science, humanity and a quickly changing planet"
आणि पहिल्याच निबंधाचे नाव आहे "Blinded by science"
प्रचलित विज्ञानाच्या मर्यादा समजून न घेता त्यावर श्रद्धा ठेवण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य केले आहे.
काही वाक्ये:
As powerful and as useful it is, science is one-dimensional. It is elegant but imperfect.
..... because of its reductionist nature science can never provide us with a complete understanding of how the world works.
.....Nature does not operate in vacuum. Interconnections among the various parts of the natural world are what actually drive it. When we pull it apart, we lose context and that can mean everything.
Recognizing the limitations of science, however, does not negate its value. Nor should it push one to extremes....The great strength of science is that it gives us the capacity to probe nature and learn its secrets.....
But we should not blindly accept every new discovery as gospel or every new technology as savior.
.....
Science proceeds not in a beeline, but a stagger, stumbling home in the darkness after a night at the pub drunk on its own discoveries.
विज्ञानावरच्या (खरे म्हणजे तंत्रज्ञानावरच्या; विज्ञान म्हणजे तेच अशी एक पाॅप्युलर समजूत दिसते बहुदा) अंधश्रद्धेविरुद्ध आवाज करायची हिम्मत कोण करणार असा प्रश्न पडलेला असताना एका वैज्ञानिकाने असे लिहिलेले वाचून आशा वाटली.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 19/10/2013 - 21:33

In reply to by नगरीनिरंजन

..... because of its reductionist nature science can never provide us with a complete understanding of how the world works.
.....Nature does not operate in vacuum. Interconnections among the various parts of the natural world are what actually drive it. When we pull it apart, we lose context and that can mean everything.

या लोकांना निर्वात पोकळीतूनही गुरुत्वीय बल, वैश्विक प्रसरण, प्रकाश यांचं propogation होतं हे माहित नसावं.

नितिन थत्ते Sun, 20/10/2013 - 12:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रतिसाद विनोदी म्हणून दिला आहे का ते कळत नाही. (विनोद नसेल तर ज्याला प्रतिसाद आहे त्यातले म्हणणे समजण्यात गंडला आहे)

'न'वी बाजू Sun, 20/10/2013 - 19:35

In reply to by नितिन थत्ते

हा प्रतिसाद विनोदी म्हणून दिला आहे का ते कळत नाही. (विनोद नसेल तर ज्याला प्रतिसाद आहे त्यातले म्हणणे समजण्यात गंडला आहे.)

त्यापेक्षासुद्धा, प्रतिसादलेखिकेच्या घरी 'व्हॅक्युम' (पक्षी: निर्वातझाडू) नसावा किंवा कसे, ते कळत नाही. (घरी व्हॅक्युमक्लीनर असेल, तर प्रतिसादलेखिकेचे निरीक्षण साफ गंडलेले आहे. अन्यथा, आपल्या घरच्या व्हॅक्युमक्लीनरच्या ब्यागेमध्ये / ब्यागलेस असल्यास क्यानिष्टरमध्ये 'डॉ. नेचर' नावाचा सर्जन ऑपरेशने करतो, हे सप्रमाण सिद्ध करावे, असे मी प्रतिसादलेखिकेस आव्हान करतो.)

(अधिक माहितीकरिता: 'व्हॅक्युम'च्या येथे दिलेल्या अर्थांपैकी 3b क्रमांकाचा अर्थ उद्बोधक आहे.)

(अतिअवांतर: अधिक संशोधनाअंती, प्रेमालाच कशाला, मोरेश्वरभटासदेखील उपमा नाही - फक्त सांजा - असे दृष्टिपथास येते. [चूभूद्याघ्या.])

मेघना भुस्कुटे Thu, 24/10/2013 - 17:07

'रुचिरा' या लोकप्रिय पाकपुस्तकाची पन्नासावी आवृत्ती वाचतेय.

कमलाआजींची जुन्या वळणाची भाषा; सिरके (व्हिनेगर)- बाळवाटी (मुलांना द्यायचा खाऊ) - दूधभोपळा (दुधीभोपळा) या संज्ञा; लवंगलतिका, दूधमोगरा ही खास पदार्थांची खास नावं; साग्रसंगीत स्वैपाकाला लागणार्‍या शिध्याचं अंदाजपत्रक (थेट १०० पानांसाठी!); परक्या पदार्थांचं बारसं करून त्यांना मराठी करून घेण्यातली गंमत (बटाट्याची पोळी, मुळ्याची पोळी! आलूदा प्राठा वा मुली का प्राठा नाही!)... मज्जा येतेय.

मला पाकपुस्तकं वाचायला आवडतात. कादंबर्‍यांच्याइतकीच सुरस असतात ती, अनुभवी हातानं नि मनापासून लिहिलेली असली की. पाकपुस्तकांमधे अजून काही विशेष वाचण्यासारखी नावं आहेत का?

अमुक Thu, 24/10/2013 - 22:58

In reply to by मेघना भुस्कुटे

'खमंग' हे दुर्गा भागवतांचे पुस्तक पाहावे. अनेक अनवट पदार्थ आणि जुन्या शब्दांची ओळख त्यातही होईल. दुव्यातली पहिली काही पाने आणि अनुक्रमणिकेवरून अंदाज येईलच.

मेघना भुस्कुटे Fri, 25/10/2013 - 09:53

In reply to by अमुक

'खमंग' वाचलंय मी. रुपयाची भाकरी आणि सात कापाचे घावन आणि उकडीच्या पोळ्या (गवसण्या बहुदा) इत्यादि. अफलातूनच आहे ते! लालन सारंगांचं एक पुस्तक आहे (नाव नाही आठवत), किस्से आणि पाककृतींचं, तेपण रोचक आहे. अनिल नेने या गृहस्थांचं 'साखरेचं खाणार' नावाचं पुस्तक आहे, पण ते पाककृतींबद्दल नाही - तर देशोदेशीच्या वारुणी (की वारुण्या?), निरनिराळे माशांचे आणि मांसाचे प्रकार, चीज... असल्या गोष्टींच्या चवींबद्दल आहे. त्या पुस्तकाची गंमत लिखाणाच्या शैलीत वा भाषेत नसून त्यातल्या मुद्देमालात आहे.
जेव्हा 'साप्ताहिक सकाळ'ला काहीएक कुळशील असे, त्या काळात त्यांचा स्वैपाक विशेषांक निघे (हल्लीही निघत असेल म्हणा). त्यात सेवादलाच्या शिबिरांच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या खेडोपाडी हिंडताना कायकाय खाद्यसंस्कृती अनुभवायला मिळाली याबद्दल दत्ता बाळसराफांचा एक भारी लेख होता. (माझ्याकडे त्याची स्कॅण्ड प्रत आहे. इच्छुकांनी... इत्यादि. :ड) 'सास'च्याच अजून एका विशेषांकात अपर्णा कुलकर्णी नावाच्या (बहुदा. चूभूदेघे.) बाईंचा स्वैपाक शिकण्याबद्दल एक लेख होता. नेहमीचे हमखास यशस्वी, हुकुमी इत्यादि पाकफजितीचे प्रसंग त्यात नव्हते. रस घेऊन शिकणार्‍या नि करणार्‍या आधुनिक माणसाला स्वैपाकाच्या प्रांतात कायकाय मजा गवसू शकते त्याचा रोचक वृत्तान्त होता. (हे अतीच अवांतरः याच बाईंचा 'स्तनपान' या अत्यंत कंटाळवाण्या-शास्त्रीय विषयावरचा कमालीचा मजेदार आणि अंतर्मुख करणारा एक लेख 'सास'च्याच 'स्तनपान' विशेषांकात होता.) (पुन्हा एकदा 'सास'! मला 'सास'वाले या रिट्रॉस्पेक्टिव्ह प्रसिद्धीबद्दल काहीही देत नाहीत, हे इथे नमूद करणं उचित ठरेल.) प्राची जागुष्टे नावाच्या बाईंचा ठिकठिकाणच्या उपेक्षित पण स्थानिक नि पारंपरिक पदार्थांबद्दलचा, पारंपरिक भांड्याकुंड्यांबद्दलचा एक रसाळपैकी लेख 'सास'च्या आणिक एका अंकात वाचायला मिळाला होता. गेले ते दिवस!

मन Thu, 24/10/2013 - 17:50

दोन कथासंग्रह वाचले.
एक होता द मा मिरासदार ह्यांचा. दुसरा होता जयंत नारळीकर ह्यांचा.(दोन्हींची नावे आठवत नाहित.)
पहिल्यात होत्या काही बिलंदर-वात्रट काही भाबड्या माणसांच्या खुसखुशित कथा, दुसर्‍अयत होत्या विज्ञानकथा.
दोन्ही आवडले.
नारळीकर खरच चांगलं लिहितात. मला आवडतात. विशेषतः त्यांची "शुनःशेप" नावाची कथा भावली.
त्यांच्या पौराणिक किंवा जुन्या भारतीय साहित्याबद्दलच्या माहितीबद्द्ल कौतुक वाटतं.
.
बाबू मोशाय ह्या टोपणनावानं लिहिलेलं अमिताबह्चं चरित्र वाचलं. तिपिकल चित्रपटवेडे आणि समीक्षक देतात तसले तपशील आणि गप्पा.
तरी कसंबसं संपूर्ण वाचलं.(निदान पुधचं पान तरी माणसासारखं लिहिलं असेल ह्या अपेक्षेनं वाचत गेलो; शेवटी पुस्तक संपलं.)
अमिताभच्या अगदि फ्लॉपचित्रपटातील दृश्यांसंबंधीही तपशीलवर माह्तिई; सगळा आगापीछा; जागतिक कलाकारांशी तुलना आणि पुढचे सगळे समीक्षकी पंचेस. पकलो.
उदा:- अमिताबह्च्या डोळ्यातील आर्तभाव पाहून त्याच्या वैचारिक खोलीमध्ये डुंबायला होतं.
अमिताभनं चित्रसृश्टीसाठी काय केलं? त्यानं अमुक तमुक का केलं नाही.
कंटाळवाणं.
सुदैवानं एकही पुस्तक मी विकत घेतलं नव्हतं. समोर पडली म्हणून वाचण्यात आली.

बॅटमॅन Thu, 24/10/2013 - 17:58

In reply to by मन

शुनःशेप म्हणजे वरुण तार्‍याला पृथ्वीच्या बदल्यात चंद्र दिल्या जातो तीच कथा ना? जबराट कथा आहे एकदम. बाकी नारळीकरांचे प्राचीन भारतीय साहित्याबद्दलचे ज्ञान सखोल आणि अतिशय नेमके होते यात शंकाच नाही. बर्‍याचदा नैतर शास्त्रज्ञांना साहित्य इतिहासादिंचे अंग नसते आणि साहित्यिकांना विज्ञानाचे तर नसतेच नसते. अहो विज्ञान सोडा, तारतम्यही नसते. "त्याने भाला फेकून समोरच्याची खांडोळी केली" सारखे शब्दप्रयोग त्यामुळेच केले जातात. भाल्यामुळे खांडोळी? फारतर जखम होईल, अगदी कोथळा बाहेर येईल, पण खांडोळी??? (हो, आम्ही विकृत नि कायबायही आहोत. असे वर्णन पाहिले की हसू येतेच. शब्दकुस्कर्‍याची इयत्ता न वलांडलेल्यांना फाट्यावर मारल्या गेले आहे.) त्या तावात ते वाचायलाही काही वाटत नै, पण नंतर एकदा गंडलावस्था (श्रेयः अमुकराव) कळ्ळी की हहपुवा झाल्यावाचून राहत नै.

अवांतरः शुनःशेप हे नाव पुढे भयंकरच अश्लील वाटू लागलं खरं. म्हणजे हे नाव ठेवणार्‍याने नक्की काय विचार केला होता आणि काय पाहिलं होतं देव जाणे. अंमळ विचित्रवीर्य या नावागतच प्रकार.

मन Thu, 24/10/2013 - 18:12

In reply to by बॅटमॅन

शुनःशेप म्हणजे वरुण तार्‍याला पृथ्वीच्या बदल्यात चंद्र दिल्या जातो तीच कथा ना?
तीच कथा. हायला मला वाटलं कमी वाचक असतील नारळीकरांचे! लय भारी!

जबराट आहेच. त्याच्याच सोबत "अवकाशाला घड्या/वळ्या पडतात " ह्या संकल्पनेवर दुसर्‍या जीवसृष्टीशी संपर्क करण्याची कल्पनाही भन्नाट.
तिसरं म्हणजे "देवाचा डोळा" . अर्थात ती १०१% फॅण्टसी आहे. कितीही तर्क लावून त्यांनी पटवलं तरी "माणूस स्वतःच्या खांद्यावर चढू शकत नाही" हे सत्य आहे.
पण तेवढी लॉजिकल फॅलसी सोडली, तर तीही कथा जब्बरदस्त.
.
बाकी नारळीकरांचे प्राचीन भारतीय साहित्याबद्दलचे ज्ञान सखोल आणि अतिशय नेमके होते यात शंकाच नाही
बुद्धीवादी आहेत ते. पण काहिच न वाचता त्यांनी कुणाला वेड्यात काढलं नाही.अभिनिवेशही नाही. सरळ साधं , साधार कथन, मंडन हे मला आवडतं त्यांच्या लिखाणतलं.
तार्किक असलं तरी कंटाळवाणं झालं नाही.
.
त्याने भाला फेकून समोरच्याची खांडोळी केली
हे म्हंजे परवाच्याच धाग्यावरच्या "नितंबांवर कंचुकी घट्ट बसली होती" किंवा "झाटांच्या जटा बांधून त्यावर फेटा चढवला" सारख्या उदाहरणांसारखं होतय.

अवांतरः शुनःशेप हे नाव पुढे भयंकरच अश्लील वाटू लागलं खरं.
ते कसं भौ? उलगडून सांग.

बॅटमॅन Thu, 24/10/2013 - 18:16

In reply to by मन

बाकीच्या दोन कथा आठवत नैयेत. पाहिले पाहिजे. अंतराळातील भस्मासुर नामक कथासंग्रह आणि वामन परत न आला सोडले तर बाकी त्यांचे कथावाङ्मय वाचलेले नै. कदाचित वाचलेले असले तरी ते आजमितीस आठवत नै.

बाकी उदाहरणांबद्दल सहमत.

शुनः म्हणजे श्वान या शब्दाचे षष्ठी एकवचन. 'श्वानाचा' असा अर्थ.
शेप नामक शब्दासाठी हे पहा. इन शेप, औटॉफ शेप, इ.इ. कितीक शब्दांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो =))

मन Thu, 24/10/2013 - 18:32

In reply to by बॅटमॅन

हैट आहे. विचित्रवीर्य म्हटल्याप्रमाणं असच वाटतं वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणं.
आता आमचं कुलदैवत अश्विलिंग का अश्वलिंग असं काहेतरी आहे. तेही विचित्र वाटतं ऐकायला.
(no. pls. nt again. शिव,लिंग, लज्जागौरी शिल्प, लिंगपूजन-योनीपूजन- सृजन- नवनिर्मिती वगैरे वगैरे हमखास "सांस्कृतिक" टच वाल्या गोष्टी ऐकल्यात, ठाउक आहेत. त्या पुन्हा नको ऐकायला.
पण तरीही विचित्र वाटतं. लिंग काय, लिंगावर दूध काय, काय चल्लय काय साला)

बॅटमॅन Fri, 25/10/2013 - 12:16

In reply to by अमुक

पण मग माणसाचे वर्णन डॉगटेल्ड असे करण्याला नक्की अर्थ तो काय? शुनःशेप हा माणूसच होता तस्मात त्याला शेपूट इ. असणे चूक वाटते, शिवाय तो वानरकुळातला असल्याचेही वर्णन नाहीये.

बाकी, या निमित्ताने मराठी 'शेपूट' हे संस्कृत 'शेप' वरूनच आले असावे असा तर्क मांडतो.

नितिन थत्ते Fri, 25/10/2013 - 12:44

In reply to by बॅटमॅन

नक्की माहिती नाही.... पण कुत्र्याचे शेपूट जसे कायम वाकडे असते तसा कायम वाकडा (आडमुठा स्वभाव असलेला वगैरे)

मन Fri, 25/10/2013 - 12:52

In reply to by बॅटमॅन

कथा असेल त्यामागे काहीतरी. जुन्या ऋषींची नावं अशीच भारी भारी असायची.
उदा:- भ्रुशुंडी.
ज्याच्या भुवयातून सोंड बाहेर आली आहे असा तो.(षष्ठी बहुव्रीही समास)
.
ऋष्यशृंग :- दोक्यावर शिंगे असलेला ऋषी.(षष्ठी बहुव्रीही समास)
.
अजूनही आहेत नावं, आता अआथवत नाहियेत.
इव्हन महाभारतातील नावं प्रतीकात्मक वाटतात.

जे कुणी युधिष्टीर (युद्धातही स्थिरे राहणारा), अर्जुन (अर्जुन हा शब्द वैदिक भाषेत प्रेरणा म्हणून घेतलाय), भीम (आडदांड, बलवान) असतील आणि जरी ते न्-कुल, नकुल (उच्च कुळ नसणारे असतील) तरी सह-देव सहदेव(त्यांच्यासोबत देव असतोच) अशी एक फोड एका कीर्तनकारांनी ऐक्वली होती.
उदा:- धृतराष्ट्र ; आंधळे, हतबल राष्ट्र.
असो.
.
किंवा अश्वमेध माहितित्ये ना? त्याचे "ते " एक्सायटिंग विधी सुद्धा? तसाच एखादा "श्वानमेध" केला असेल आणि त्यानंतर अपत्यप्राप्ती झाल्याने शुनःशेप हे नाव. (श्वानाच्या लिंगाने आलेला असा तो)

बॅटमॅन Fri, 25/10/2013 - 13:01

In reply to by मन

भ्रूशुंडी म्हणजे सोंडेसारखे सांडगे नाक असणारा असेल बहुतेक. तसेही सोंड म्हणजे वाढीव नाकच आहे.

ऋष्यशृंग हे नाव रोचक आहे खरे. "आली अंगावर, घे शिंगावर" करण्याचा स्वभाव होता की काय =))

बाकी काही व्युत्पत्त्या अंमळ गंडल्या आहेत. नकुल=उच्च कुळ नसलेला असा अर्थ नाही. मुंगूस, बंगाल, इ. बरेच अर्थ आहेत त्याचे. धृतराष्ट्र म्हणजे धृतं राष्ट्रं येन सः- राष्ट्र भक्कमपणे एका जागी धरून ठेवणारा.

अश्वमेध माहितीये :) श्वानमेधाबद्दल साशंक आहे कारण तसा उल्लेख कधीच वाचनात आला नाही.

अमुक Tue, 10/12/2013 - 20:22

In reply to by मन

भ्रुशुंडी ऋषींबद्दलची लहानपणी ऐकलेली कथा -
एक वाटमार्‍या असतो (नांव लक्षात नाही). साहजिकच लोकांना लुटून उदरनिर्वाह करत असतो. एकदा मुद्गल ऋषी ('मुद्गल पुराण' वाले) गणेशाचा जप करीत जात असता त्यांना लुटायला/मारायला जातो. मारायच्या क्षणी त्याला अचानक उपरती होते आणि तो शस्त्र टाकून मुद्गल ऋषींना शरण जातो. पापे नष्ट करण्यासाठी उपाय सांगा म्हणतो. मुद्गल त्याला 'मी परत येईस्तोवर 'श्री गणेशाय नम:' चा जप कर', असे सांगतात. तो तिथेच एक काठी जमिनीत पुरतो आणि जपाला बसतो. अनेक वर्षांनी (हिशेब बहुतेक शेकड्यात) मुद्गल ऋषी तिथे परततात त्यावेळी काठीचा वृक्ष झालेला असतो आणि त्याखाली मुंग्यांचे वारूळ दिसते, ज्यातून गणेशाय नम: जप ऐकू येत असतो. मुद्गल ते वारूळ फोडतात तर त्यात तोच वाटमार्‍या ध्यानस्थ बसलेला दिसतो आणि इतक्या गणेशजपाने तो गणेशाशी तादात्म्य पावून त्याला - भुवया एकत्र येतात तिथून - सोंड फुटलेली असते (मानवी नाकाचा उगमही तिथूनच होतो. सायनसचा त्रास असलेल्यांना विचारा ;)) मग मुद्गल ऋषी त्याला 'भ्रुशुंडी' असे नांव देऊन तो ऋषी म्हणून प्रसिद्धीस पावतो. विदर्भात कुठेतरी त्यांचे देऊळ आहे असे ऐकून आहे.

मन Thu, 24/10/2013 - 17:48

चं प्र देशपांडे ह्यांची "सेक्स" ही एकांकिका वाचली. चर्चानाट्य प्रकारातली आहे.
पहिल्या दोन पात्रांची एकांकिकेच्या सुरुवातीची पंधरा वीस मिनिटं क्रिस्पी असली तरी चावटपणाच्या काठाकाठानं जातात
आणि टिपिकल फ्लर्टिंगच्या मळलेल्या वाटेने गाडी जाते की काय अशी भीती वाटत असतानाच तिसर्‍या पात्राचा खणखणीत प्रवेश होतो.
आणि त्यानंतरचा घटनाक्रम अगदि थोडास्सा असला तरी चित्त खिळवून ठेवतो.
शेवटची ती मिनिटं इतकी भन्नाट आहेत की त्य्स्साठी पुन्हा पुन्हा तेवढाच भाग वाचून, स्वतःच सादर करुन पाहिला.
.
पु लं ची "आम्ही लटिके ना बोलू" नाटिका वाचली. कंटाळलो. उग्गाच सिरियस आणि तत्वज्ञानात्मक केलय असं वाटलं.
.
अशोक पाटोळे ह्यांचं "झोपा आता गुपचुप" हे तीन अंकी नाटक पुन्हा वाचलं. भन्नाट आहे. प्रचंड आवडलं. त्यावर आधारित आलेला मराठी चित्रपट
नाटकाच्या तुलनेत प्रबहवहीन वाटला होता.

अमुक Thu, 24/10/2013 - 19:54

In reply to by मन

टिपिकल फ्लर्टिंगच्या मळलेल्या वाटेने गाडी जाते की काय अशी भीती वाटत असतानाच...
............'चंप्रं'ची 'बुद्धिबळ आणि झब्बू' नाटिकादेखील अवश्य वाचा असे सुचवेन.
पाहायला तर धमाल येते. गीतांजली कुलकर्णी, किमया चौबळ, सिद्धार्थ जाधव आदि मंडळींनी प्रयोगात बहार आणली होती.

मेघना भुस्कुटे Thu, 24/10/2013 - 18:02

मी अजून वाचलेले नाही, पण (किंवा म्हणूनच) रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या 'खेळघर' नावाच्या पुस्तकाबद्दल कुणाला काही ठाऊक आहे का?

नितिन थत्ते Thu, 24/10/2013 - 20:24

अरुणा ढेरे यांचं कृष्णाकिनारा वाचायला घेतलं आहे.

राधा, कुंती आणि द्रौपदी यांच्या आयुष्यातला कृष्ण आणि त्यांच्या नात्याचा कल्पनाविस्तार आहे.

सविता Fri, 25/10/2013 - 10:17

पाडस वाचतेय..... फारच आवडतंय. कथा तर छान आहेच पण त्याचा अनुवाद करणार्‍याचे कसबही वाखणण्याजोगे आहे.. अनुवाद करून पुस्तकांचे वाटोळे कसे करता येते हे पाहिलेले (वाचलेले) असल्याने हा सहज आणि ओघवता अनुवाद फारच आवडला. विजय देवधर, रविंद्र गुर्जर , शांता शेळके या काही मोजक्या लेखक्/अनुवादकांच्या रांगेत राम पटवर्धन यांना विराजमान करण्यात आले आहे. अर्थात तसे बाकीचे ही बरेच चांगले अनुवाद वाचले आहेत - पण आता त्यांची नावे लक्षात नाहीत, वीणा गवाणकरांचे "एक होता कार्व्हर" पण चांगल्या रितीने अनुवादित केले आहे. पण तरी पुस्तक + भाषांतर दोन्ही कथा + अनुवादशैली या साठी बेहद्द आवडले असे एकूण कमीच!

ऋषिकेश Wed, 06/11/2013 - 09:20

सध्या उमा कुलकर्णी यांचे 'केतकर वहिनी' हे पुस्तक वाचतोय - संपत आलंय.
एकट्या बाईने कूळकायद्यानंतर आपल्या जमिनीच्या न्याय्य हक्कांची लढाई असे पुस्तकाचे स्वरूप असले तरी तत्कालीन कोकणाची दुर्गमता, भीषणता, झालेले सामाजिक आर्थिक राजकीय बदल, गावातील राजकारण, कुळांची दयनीय परिस्थिती इत्यादी अनेक गोष्टी परिणामकारक पणे चितारल्या आहेत.

प्रथमपुरूषी एकवचनात पुस्तक लिहिल्याने स्वतः केतकर वहिनीच आपली कथा सांगताहेत. त्यामुळे कथनाला आलेला जिवंतपणा, सच्चाई लेखन अधिक उंचीवर नेते.

आता उद्या वंशवृक्ष हातात घेईन

ऋता Tue, 12/11/2013 - 18:27

अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस (व्ही. एस. नायपॉल) हे वाचत आहे. या पुस्तकावर भारतात बंदी घालण्यात आली होती- आता उठवली आहे की अजूनही हे बाळगणे भारतात गुन्हा आहे हे माहित नाही.
भारतातल्या अनेक गोष्टींवर'डोळ्यात अंजन पडेल' ह्या शैलीत नायपॅलांनी टीका केली आहे. त्यांच्या इतर काही पुस्तकांपेक्षा मला यातील लेखन शैली सोपी वाटली आणि हे पुस्तक भरभर वाचले जात आहे.
नायपॉल हे भारतीय वंशाचे आहेत आणि त्यांचे आजोबा त्रिनिदाद मध्ये स्थलांतरित झाले होते. वंश भारतीय असला तरी भारत केवळ कल्पनेतला-'अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस' असा त्यांच्यासाठी होता. तो पहाण्यासाठी ते भारतात येऊन, भारतातल्या विविध भागात एक वर्ष राहिले. त्या अनुभवांचे वर्णन या पुस्तकात आहे. परमिट राज, भारतातील वर्ण व्यवस्था आणि त्याचे झालेले परिणाम, अस्वच्छता याबद्द्ल त्यांनी विविध अनुभवातून भाष्य केले आहे.
माझ्या मते भारतात काही चांगला बदल व्हावा असे ज्यांना वाटते त्यांनी या पुस्तकातील विश्लेषण नक्कीच वाचायला हवे. बंदी घालण्यासारखा मूर्खपणा करण्यापेक्षा हे पुस्तक खरेतर सगळ्या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून द्यायला हवे असे माझे मत झाले आहे.

चिंतातुर जंतू Wed, 20/11/2013 - 13:58

आज माझ्या घरी आलेलं म.न.से.चं एक पत्रक वाचलं. तरुणांचं 'आयुष्य बदलून टाकेल' अशा पुस्तकांची यादी दिली होती. बहुधा ऐंशीच्या आसपास पुस्तकं असावीत. त्यातलं कोणतंही एक पुस्तक भेट मिळेल अशी योजना आहे. त्यात अब्दुल कलाम, रणजित देसाई, वि. स. खांडेकर, व. पु. काळे, झालंच तर 'सभेत कसे बोलावे', 'रुचिरा' वगैरे अनेक टाईपची पुस्तकं होती. 'केसांची निगा' असंदेखील एक पुस्तक त्यात होतं. ज्याला महाराष्ट्रातल्या तरुणांचा इतका चौफेर विचार करता येतो तो पक्ष आणि त्यांचा नेता द्रष्टेच म्हणायला हवेत नाही का?

चिंतातुर जंतू Wed, 20/11/2013 - 14:19

In reply to by ऋषिकेश

ओगलेआजींच्या 'रुचिरा'नं माझं आयुष्य बदललं हे खरं, पण ते मला मैत्रिणीकडून भेट मिळालंय. त्यासाठी मला मनसेमित्राची गरज नाही ;-)

मी Wed, 20/11/2013 - 14:45

In reply to by चिंतातुर जंतू

मग त्यांनी टिव्ही/रेडिओ वगैरे वाटायला हवे होते काय? ते पुस्तकं वाटत आहेत ह्यात काहिच परिपक्वता दिसत नाही हे खेदकारक आहे, मध्यमवर्गाला भावणारी पुस्तके ते वाटत आहेत असा तुमचा आरोप असावा, पण 'बिहारी हटाव' ह्या ब्रीदवाक्याला चिकटून न बसता वैचारिकतेकडे किंचित का होइना पण झुकणारे असे काही करु इच्छित आहेत हे कमी मानण्यासारखे नाही. त्यांचा नेता दृष्टा आहे किंवा नाही ह्याबद्दल मते वेगळी असु शकतील पण ह्या उपक्रमाची 'हेटाइ' हे केवळ उच्चभ्रुपणाचे लक्षण आहे. उद्या त्यांनी कुरूंदकर वाटल्यास ते त्यांच्या भुमिकेविरुद्ध आहे म्हणूनही टिका होईलच नाहि का?

बॅटमॅन Wed, 20/11/2013 - 14:50

In reply to by मी

सहमत!! जे चूक ते चूकच पण त्याबरोबर चांगल्याची अशी हेटाळणी करणे त्यापेक्षा चूक. टिपिकल मनोरानशीन वक्तव्याचे उदाहरण वाटते.

ऋषिकेश Wed, 20/11/2013 - 14:51

In reply to by मी

त्यांचा आक्षेप पुस्तके वाटण्याला वाटला नाही
"तरुणांचे जीवन बदलून टाकणारी" पुस्तकांची म्हणून जी यादी दिली आहे त्याची खुसखुशीत खिल्ली उडवलेली वाटली - मला तरी!

बॅटमॅन Wed, 20/11/2013 - 14:59

In reply to by ऋषिकेश

खिल्ली उडवलेली आहे पण अस्थानी आहे इतकाच मुद्दा आहे. आमजनतेवर तथाकथित हुच्चभ्रू आवडींचे रोपण लागत नसल्याने त्याची खिल्ली उडवण्याचा हा प्रकार मला पटला नाही.

चिंतातुर जंतू Wed, 20/11/2013 - 17:42

In reply to by बॅटमॅन

>> आमजनतेवर तथाकथित हुच्चभ्रू आवडींचे रोपण लागत नसल्याने

हे शब्दही तुमचेच अन् त्यामागची भावनाही (असलीच तर) तुमची, त्यामुळे त्यावर मी काही बोलू इच्छित नाही. पुष्कळ गोष्टींची खिल्ली उडवणारे लोक जेव्हा एखाद्या गोष्टीची खिल्ली उडवणं अस्थानी मानतात तेव्हा मला ते खूप रोचक वाटतं. त्यामुळे, म्हणजे एक रोचक विधान केलंत त्यामुळे धन्यवाद.

बॅटमॅन Wed, 20/11/2013 - 17:46

In reply to by चिंतातुर जंतू

खिल्ली उडवायला हरकत नसते, फक्त इथे ती अस्थानी आहे हे मुख्य प्रतिपादन आहे. अर्थात त्यासोबतच्या बायप्रॉडक्टवर लक्ष द्यायचे की मुख्य गोष्टीवर हा चॉइस अर्थातच तुमचा असल्याने तुमचा चॉइसही तुमच्याच भाषेत बोलायचं झालं तर 'रोचक' वाटत असल्याने डबल धन्यवाद.

सानिया Wed, 11/12/2013 - 03:32

'द हिंदू' या वृत्तपत्रातील क्विन्सी केंडल चार्ल्स या कथक नर्तकाची मुलाखत वाचली. मुळच्या वेस्ट ईंडीज येथल्या, गणितात पदवी मिळवलेल्या क्विन्सी यांनी काही वर्षे बँकेत नोकरीही केली पण वयाच्या सोळाव्या वर्षी पडलेली कथक नृत्याची भूल त्यांना स्वस्थ बसू देईना. सामाजिक, कौटुंबिक दबावाला बळी न पडता कथक नृत्य हेच आपले ध्येय असल्याचे जाहिर करून, त्यांनी भारतात नृत्यप्रशिक्षणाला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी बीबीसीवर त्यांची मुलाखत पाहिली, तेव्हापासून मी त्यांच्या पंख्यांमधे सामील झाले आहे. दुरदर्शनवरचा रुम-झुम हा कार्यक्रम जे पाहत असतील, त्यांना क्विन्सी हे नाव अपरिचीत नाही.
हा त्यांच्या मुलाखतीचा दुवा : http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-metroplus/step-by-s…

ॲमी Mon, 09/12/2013 - 12:02

हे वर्ष पुस्तकांच्या दृष्टीने थंडथंडच होत वाटत. क्रेझ निर्माण केलीय असे एकही पुस्तक नाही... २०१३ची कोणती बेस्ट सेलर फिक्शन पुस्तक वाचु?

मन Mon, 09/12/2013 - 12:09

In reply to by ॲमी

आधीच उपलब्ध असलेली जगातली पुस्तकं एका जन्मात कुणाला वाचून संपवणं शक्य होइल असं वाटत नाही.
दर वर्षी अशी भर पडत राहिली तर आपल्या किती गोष्टी राहून गेल्यात ह्याची जरा जास्तच चुटपूट लागेल.
ते जाउ देत. "शिवा ट्रायलॉजी " का काय ते मागच्या दोन्-तीन वर्षात बरच नाव ऐकतोय.
ते वाचलत का?

मेघना भुस्कुटे Mon, 09/12/2013 - 12:08

हे निरीक्षण इथे थोडं अस्थानी असू शकेल. पण माझ्या वाचनाच्या सवयीच बदलताहेत असं माझ्या लक्षात येतं आहे.
एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण करून मगच बाजूला ठेवण्याची सवय मला होती. पुस्तकाचा विषय, सोपेपणा, माझ्याकडे असलेला वेळ - यांचा परिणाम त्या सवयीवर होत असे, नाही असं नाही. पण बहुतांशी पुस्तक कितीही कंटाळवाणं झालं तरी ते पुरं करण्याचं प्रमाण खूपच जास्त होतं. हल्ली पुस्तकं मिळवणं, सुरुवात करून मधेच सोडून देणं, त्याऐवजी जालावर भटकंती करून त्या पुस्तका'बद्दल' माहिती मिळवणं, मग 'वाचू' अशा वाढत्या यादीत त्या पुस्तकाची / लेखाची भर टाकून मोकळं होणं... हे प्रमाणाबाहेर वाढलं आहे. वाचनात नुसता हार्डकॉपी विरुद्ध सॉफ्ट कॉपी इतकाच फरक पडलेला नाही, तर वाचनाचा आवाका (लांबीनुरूप) कमी होणं हा महत्त्वाचा बदल आहे. पण मी ५ वर्षांपूर्वी जितकी ताजी 'माहिती' डोक्यात घेत असेन त्यापेक्षा कितीतरी जास्तच माहिती सध्या घेते आहे, हे मात्र निश्चित.
यात मला बरं-वाईट ठरवता येत नाही. पण थोडं अस्थिर मात्र वाटतं आहेच.
तुमचे काय अनुभव?

अनुप ढेरे Mon, 09/12/2013 - 12:16

In reply to by मेघना भुस्कुटे

मला पण काहीसा असाच अनुभव आहे. मराठी आंतरजालाची माहिती मिळाल्यापासून आधी ज्या वेळात पुस्तकं वाचायचो त्यातला बराचसा वेळ जालावरचं वाचण्यात जातो. कधी कधी हपिसामधून पण जालावर वेळ घालवला जातो.

मन Mon, 09/12/2013 - 12:22

In reply to by अनुप ढेरे

२४ तास ही उपलब्ध वेळेची मर्यादा तंत्रजान फार काही बदलू शकलेले नाही.
पूर्वी पुस्तक वाचायचात, फिरायचात,ंडळींना भेटायचात.
आता तेच सर्व करुन तुम्हाला करुन फेसबुक, मराठी जाल, मोबाइल मेसेजेस, व्हॉट्सअ‍ॅप, जालावरील इतर उपयुक्त माहिती ... इत्यादी इत्यादी पैकी काही वा सर्व गोष्टींसाठी तासन्तास वेळ द्यायचा आहे.
कसे शक्य आहे? वेळ २४तासाहून अधिक होणार नाही, ही फ्याक्ट आहे.
माहिती/लेख/विडियो/फटो वगैरे वगैरेचा महापूर काही तुमच्या वेळात बसेल इतका नाही.
तो धो धो वहातोय.

............सा… Mon, 09/12/2013 - 14:20

जुन्या पुस्तकांच्या दुकानात एक छान पुस्तक सापडले. विस्कॉन्सिनच्या शिकार व मासेमारीतील सीझनमधील अनुभवांची ओळख करुन देणारं फार युनिक पुस्तक आहे. युनिक आहे कारण रांगड्या (रफ न टफ) शिकार्‍यांचे काही हळवे क्षण या कथांत टीपले आहेत. उदा - काही गोष्टींमध्ये वडील-मुलाचे गुंतागुंतीचे नाते व त्या नात्यांचे हळूवार पदर उलगडले आहेत. तर कुठे अन्य शिकार्‍यांच्या शिकारीत अधू झालेल्या कॅनेडीअन गीझ च्या मर्सी किलींगच्या अनुभवाचे हृद्य चित्रण आहे.

रिचर्ड बेहम या लेखकाने लिहीलेली एक गोष्ट - लेखक व त्याच्या वडीलांच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकणारी अतिशय सुंदर गोष्ट आहे. एक वाचक म्हणून हे नातेसंबंधांचे उलगडत जाणारे पदर मला मनोरम वाटले. लेखकाच्या बालपणात त्याच्या वडीलांनी त्याला मासेमारी करण्यास शिकविले. पहीला मासा पकडण्याची फार चित्रमय आठवण या लेखात येते. पुढे स्वतःची आयडेन्टिटी निर्माण करण्याच्या गरजेमधून लेखकाने इतक्या वेळा बंड केले की प्रत्येक बंड म्हणजे जणू नात्यात रोवलेली वीट, अशा रीतीने एक उंच भींत दोघांच्यात निर्माण झालेली दिसते.पण या रांगड्या शिकार्‍याला मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी वडीलांबद्दल अतोनात माया आहे, त्याला हात पुढे करायचा आहे पण करता येत नाहीये. मग लेखक वडीलांबरोबरच्या समेटाची दिवास्वप्ने रंगवितो. मासे पकडण्यातील आनंद हा दोघांमधील समान धागा आहे, त्या छंदाची मदत घेऊ इछितो.मला ही कथा फार आवडली कारण जरी ती ऑल-अमेरीकन पिता-पुत्राच्या संबंधावर आधारीत असली तरी तिला एक वैश्विक परिमाण आहे.

दुसरी एक चटका लावून गेलेली गोष्टदेखील वडील-मुलाच्याच नात्यावर आधारीत आहे. या कथेतील वडीलांना मुलाला एक कणखर बनवायचे आहे (मेक मॅन आऊट ऑफ हिम) आणि त्यांच्या मर्यादित बुद्धी म्हणा, आकलन म्हणा प्रमाणे त्यांना एकच मार्ग माहीत आहे अन तो म्हणजे स्थानिक शिकार्‍यांच्या कंपूबरोबर भटकणे, मग भले त्या कंपूतील कोणीही कितीही हिडीस-फिडीस करोत. परंतु चांगले शिकारी नसल्याने, वडीलांना या गँगमध्ये मिसळून जाता तर येत नाही, नुसतीच एक केविलवाणी धडपड अन यातायात होत रहाते. लहान मुलाच्या (तेव्हाचे आपले लेखक) याच्या नजरेतून ती धडपड अन ते ओशाळलेपण सुटत नाही. पण मोठा झाल्यावर लेखक म्हणतो- माझ्या म्हातार्‍याला इतकं लाचार व्हायची गरज खरच होती का? आम्ही दोघे फक्त एकमेकांबरोबर गूजगोष्टी केल्या असत्या तरी चालले असते. मला जो स्वतःचा स्वीकार आणि कौतुक वडीलांकडून हवे होते ते शेवटी दूरच राहीले अन बाबांना हे कधी कळलेच नाही की कोणत्याही कंपूपेक्षा ते स्वतः माझ्याकरता किती मोलाचे होते. वडीलांची केवीलवाणी धडपड चटका लावून जाते.

हे पुस्तक २ जणांना मी भेट म्हणुन दिलेले आहे. व टाईम टु टाइम ॲमॅझॉनवरती शोधत असतेच. खरच छान पुस्तक आहे. या पुस्तकातील काही कथांचे मरातःई रुपांतर -

https://aisiakshare.com/node/3956

https://aisiakshare.com/node/3963

लॉरी टांगटूंगकर Mon, 09/12/2013 - 15:12

"पर्व" लेखक-एस एल भैरप्पा तीनएकशे पानं नेटान धरून वाचलं वाचलं. शास्त्र शुद्ध कंटाळलो. लै लै रिपीट होणारी वर्णने अन् प्रत्येक वेळेला अर्धवट डॉमिनेटिंग संस्कृती दाखवणं कंटाळवाणं झालं. नंतर युद्धात काहीतरी एक्सायटिंग असेल म्हणून स्कीप मारून तिथं गेलो. तर तिथं पण अशीच वर्णनं होती. आज उद्या परत देतोय..
इतकं गाजण्यासारखं काय होतं ते कळलं नाही.

बॅटमॅन Mon, 09/12/2013 - 15:40

In reply to by लॉरी टांगटूंगकर

मिस्ड द प्वाइंट असे वाट्टेय. युद्धाचे ग्लोरिफिकेशन नै केले तरी ती कादंब्री तितकीच सरस आहे. त्या काळच्या समाजाचे दर्शन तितके याथातथ्यत: घडवणारी अजून कुठलीही कादंबरी आज अस्तित्वात नाही. मनोव्यापारांचे तितके गुंतागुंतीचे चित्रण अजून कोणीच केले नाही. कसलेही रोमँटिकीकरण अन उदात्तीकरण न करताही रंजकतेत कमी न पडणे हे अतिशय अवघड आहे. हे शिवधनुष्य पेलण्यात भैरप्पा यशस्वी झालेत. नैतर अन्य लेखक कृष्णाला कोल्हापुरात येऊन चक्क कुस्ती खेळावयास लावतात, खांडेकरी भाषेत कोल्हापुरी रस्सा ओतून वीररसाचे प्यारेग्राफ सादर करतात त्यापेक्षा भैरप्पांची संयत पण परिणामकारक शैली लै भावते.

मेघना भुस्कुटे Mon, 09/12/2013 - 15:47

In reply to by बॅटमॅन

कोल्हापुरी कुस्त्या नि वीररसाचे प्यारेग्राफ्स तुलनेला आणले म्हणून 'पर्व' बाय डिफॉल्ट मोठी होते की काय? मलाही 'पर्व' ओव्हररेटेड वाटली. मी ती पुरी करू शकले नाही. रंजक तर ती (मला) अगदीच वाटली नाही. एकतर हरेक चमत्काराचं काहीतरी मानवी स्पष्टीकरण द्यायचंच द्यायचं असा अट्टाहास जाणवला (मला.) नि 'त्या काळच्या समाजाचे यथातथ्य दर्शन' असंही अजिबात वाटलं नाही. कारण ती एक 'गोष्ट' आहे. तिचा काळ मुळातच लेखकाच्या कल्पनेतला. चोप्रांच्या इंटरप्रिटेशनमधेही तो तितकाच यथातथ्य नि प्रकाश झाच्या इंटरप्रिटेशनमधेही. शेवटी गोष्ट कुठल्याही काळात सांगता येतेच, तिचा आत्मा शाबूत ठेवून. भैरप्पांना आत्मा गवसला असं तर (मला) नाहीच वाटलं, शिवाय त्यांचं काळाचं इंटरप्रिटेशनही मला बळंच उभ्या केलेल्या सेटसारखं खोटं खोटं, अनावश्यक नि गोष्टीतल्या नाट्यपूर्णतेला मारक वाटलं.

मला 'आवरण'ही बळंच वाटली होती, सो शक्य आहे की मला भैरप्पा फारसे भावले नसतील. हे सापेक्ष आहे हे मान्य आहेच.

बॅटमॅन Mon, 09/12/2013 - 16:09

In reply to by मेघना भुस्कुटे

कोल्हापुरी कुस्त्या नि वीररसाचे प्यारेग्राफ्स तुलनेला आणले म्हणून 'पर्व' बाय डिफॉल्ट मोठी होते की काय?

यात 'मरियाना ट्रेंचपेक्षा उंच आहे म्हणून पर्वती एव्हरेस्ट होते काय?' या प्रश्नागत सूर दिस्तोय. पर्व सोडून अन्य कादंबर्‍यांची पोहोच पाहता किमान असे कैतरी नाही हा एक मुद्दा तरी माझ्या मते जमेच्या बाजूस आहेच.

मलाही 'पर्व' ओव्हररेटेड वाटली. मी ती पुरी करू शकले नाही. रंजक तर ती (मला) अगदीच वाटली नाही. एकतर हरेक चमत्काराचं काहीतरी मानवी स्पष्टीकरण द्यायचंच द्यायचं असा अट्टाहास जाणवला (मला.) नि 'त्या काळच्या समाजाचे यथातथ्य दर्शन' असंही अजिबात वाटलं नाही. कारण ती एक 'गोष्ट' आहे. तिचा काळ मुळातच लेखकाच्या कल्पनेतला. चोप्रांच्या इंटरप्रिटेशनमधेही तो तितकाच यथातथ्य नि प्रकाश झाच्या इंटरप्रिटेशनमधेही.

इथे अंमळ असहमत. महाभारत ग्रंथात वर्णिलेली कथा जश्शीच्या तश्शी घडली होती हे मान्य करण्याइतपत आवश्यक पुरावा आजिबात नाहीये, तेव्हा ग्रंथ अन आर्किऑलॉजी या दोहोंच्या सांगण्याशी शक्य तितके साधर्म्य राखणारे नॅरेशन असले तर बरे. मायकेल क्रायटनच्या टाईमलाईन कादंबरीत असा प्रयत्न दिसतो. इथेही तो प्रयत्न जाणवतो. माहिती उपलब्ध आहे, पण योग्य ठिकाणी योग्य ते डीटेल्स आले तर चित्र उभारण्यास मदत होते. पर्व मध्ये ठीकठिकाणी आलेली खाण्याची वर्णने तत्कालीन ग्रंथांतील वर्णनांशी सुसंगत आहेत, सामाजिक प्रथांची औटलैनदेखील सुसंगत आहे. गिव्हन दीज फॅक्ट्स, त्यांनी त्या समाजातील वर्गसंघर्ष जो चितारलाय त्यातले साकल्य अजून कुणालाही जमलेले नाहीये. मृत्युंजय वैग्रे सोडले तर अन्य कुठेच असे दिसत नाही. तिथेही ते अंग येते कारण कथानायकच नाही-रे पैकी होता.- यद्यपि नंतर आहे-रे झाला तरी जन्मापायी हेटाळणी सहन करावी लागते इ.इ.इ. तुलनेने पर्व मधील वर्गसंघर्ष पुरुष-स्त्री, ब्राह्मण-क्षत्रिय, क्षत्रिय-सूत, आर्य-अनार्य इ. अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवरती दिसतो त्यामुळे त्या काळाचे मोनोलिथिक चित्र उभे न राहता कुठल्याही काळाचे असते तसे व्यामिश्र, गुंतागुंतीचे चित्र उभे राहते अन कुठल्याही एका बाजूला सहानुभूती प्रदान करण्याची मानसिकता राहत नाही. तुलनेने युगंधरसारख्या कादंबरीत बर्‍याच नॅरेटर्सच्या माध्यमातून गोष्ट सांगितली तरी ती गुडी गुडी हीरोवर्शिपच आहे. ययाती या बाबतीत बरीच पुढे म्हणावी लागेल. पण तिथेही वर्गसंघर्ष दिसत नाही फारसा.

शेवटी गोष्ट कुठल्याही काळात सांगता येतेच, तिचा आत्मा शाबूत ठेवून. भैरप्पांना आत्मा गवसला असं तर (मला) नाहीच वाटलं, शिवाय त्यांचं काळाचं इंटरप्रिटेशनही मला बळंच उभ्या केलेल्या सेटसारखं खोटं खोटं, अनावश्यक नि गोष्टीतल्या नाट्यपूर्णतेला मारक वाटलं.

इथे तर कुडंट डिसॅग्री मोर. इंटरप्रिटेशन बेगडी आहे असे आपण नेहमीच म्हणू शकतो कारण आपण काय नि भैरप्पा काय, प्रत्यक्ष युद्धबिद्ध बघायला कोणीच गेलं नव्हतं. पण उपलब्ध सामग्रीच्या आधारे इतके वेगवेगळे पैलू मांडणे अन्य कुणाला या जॉनरमध्ये जमलेय असे वाटत नाही-एस्पेशली पौराणिक जॉनरमध्ये. आता परत अंताजीची बखर वगैरे नका सांगू कारण त्या कादंबरीचा काळ लै जवळचा आहे आणि त्याबद्दल प्रत्यक्ष माहितीही लै उपलब्ध आहे शिवाय फॉरमॅटही वेगळा आहे.

मला 'आवरण'ही बळंच वाटली होती, सो शक्य आहे की मला भैरप्पा फारसे भावले नसतील. हे सापेक्ष आहे हे मान्य आहेच.

असोच. :D :D

मेघना भुस्कुटे Mon, 09/12/2013 - 16:47

In reply to by बॅटमॅन

'बखरी'ला ऐतिहासिक पुराव्यांचा आधार आहे. 'महाभारता'ला कसले पुरावे नि कसलं काय?! नि 'मृत्युंजय' केवळ तपशील तुझ्या मते 'कालसुसंगत' म्हणून चांगली काय? नि समग्र व्यापक चित्राचा नि कुणालाच सहानुभूती न देण्याचा - आणि भैरप्पांनी लावलेल्या अर्थांचा संबंध काये? असो. असो. यावर काय वाद संभवत नाही. मला नाही आवडली, तुला आवडली, इतकंच.

बॅटमॅन Mon, 09/12/2013 - 17:03

In reply to by मेघना भुस्कुटे

'महाभारता'ला कसले पुरावे नि कसलं काय?!

सध्या संशोधकांच्या मान्यतेनुसार महाभारत कथेला लोहयुगीन भारतातल्या खर्‍या लढाईचा आधार असावा असे समजले जाते. बरेच उत्खननदेखील झालेले आहे. रेमंड अल्चिनसारख्या विद्वानांनी त्यावर पुस्तकेही लिहिलेली आहेत. बी बी लाल यांनी हस्तिनापुरात उत्खननही केले आहे. कमी पुरावे सापडले असले तरी तसे काहीसे होणे शक्यतेच्या कोटीत आहे इथपर्यंत तरी मान्यता आहेच. तत्कालीन समाजस्थितीचे ग्रंथाधारे वर्णनही सुसंगत आहे.

नि 'मृत्युंजय' केवळ तपशील तुझ्या मते 'कालसुसंगत' म्हणून चांगली काय?

ओ हॅलो! मृत्युंजयला चांगलं कधीच म्हटलं नव्हतं मी. थोडासा बेनिफिट ऑफ डौट दिला इतकंच.

नि समग्र व्यापक चित्राचा नि कुणालाच सहानुभूती न देण्याचा - आणि भैरप्पांनी लावलेल्या अर्थांचा संबंध काये?

बळंच? समग्र चित्र दाखवणे, कुणालाही अवाजवी सहानुभूती न दाखवणे हे कादंबरीच्या निकषांतही बसत नाही का?

१. द्रोणपर्वात पदरचा तोच तो थोडासा इनहेइटेड मसाला ओतून ती गिरवी वेगवेगळ्या भांड्यात सादर करणे आणि युद्धाकडेच वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे,

२. एकाच्याच वकिलीपेक्षा सर्व बाजूंचे चित्र मांडणे,

या दोन्ही उदाहरणांत गुणात्मक फरक आहे की नाही? भैरप्पांनी पर्व मध्ये हेच केलेलं आहे. त्याचा काय संबंध म्हणजे कादंबरीच्या मूल्यमापनाचे हे निकष असू नयेत असे म्हणायचे आहे का? तत्कालीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नसणे हे काही ढिसाळ शैलीचं समर्थन ठरतं का?

यावर काय वाद संभवत नाही. मला नाही आवडली, तुला आवडली, इतकंच.

अवश्य संभवतो. कुठेतरी शेवट "तुला नै आवडली अन मला आवडली" इथे होईल पण वादार्ह प्रदेशाची व्याप्ती तुला वाटते त्यापेक्षा मोठी नक्कीच आहे.

मेघना भुस्कुटे Mon, 09/12/2013 - 17:23

In reply to by बॅटमॅन

नाही, तसे पुरावे म्हणत नाही आहे मी. (मला ही माहिती नवीच आहे हो. पण ते इथे फारसं महत्त्वाचं नाही). अशा एखाद्या लढाईमुळे व्यासांना (किंवा ज्या कुणी ती गोष्ट रचली त्याला) गोष्टीची कल्पना स्फुरली असेल. मग? त्यानं तो इतिहास होतो का? नाही. ती गोष्ट आहे. फिक्शन. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लोकांनी ती पुन्हा पुन्हा सांगितली आहे. चित्रशाळेची प्रत (बहुतेक. चूभूदेघे.) महाभारताची (सर्वांत जुनीबिनी) अधिकृत प्रत मानली जाते, तशीच महाभारताची लोकमानसातली आवृत्तीही असते. (राधा हे पात्र त्या लोकावृत्तीतलंच.) 'भारत एक खोज'चं इंटरप्रिटेशन मला जितकं आवडतं, तितकंच चोप्रांचंही. बी. आर. चोप्रांची आवृत्ती मला लोकावृत्तीच्या जवळ जाणारी नि म्हणून वेगळ्या प्रकारे रंजक वाटते.

मुद्दा असा आहे की, केवळ गोष्टीच्य मूळ आवृत्तीतली समाजस्थिती शक्य तितक्या हुबेहूब प्रकारे अनुकृत केली, यावरून गोष्ट बरी सांगितलीय की वाईट, हे ठरत नाही. तो निकषच नाही.

कुठल्याच एका पात्राला बेतालपणे मोठं न करता, सहानुभूती न देता गोष्ट प्रभावीपणे सांगितली की नाही? बास. मग कुंतीनं वर मागून मुलं जन्माला घातली की हिमालयात आडमाप उंचीच्या एखाद्या जमातीच्या पुरुषांजवळ आळीपाळीनं रत होऊन घातली, या तपशिलात मला रस नाही. तो तपशील तेव्हाच महत्त्वाचा ठरेल, जेव्हा त्याची गोष्टीत काहीएक अनिवार्यता असेल. 'पर्व'मधे ही अनिवार्यताच मला गायब दिसली.

'मृत्युंजय', 'राधेय', 'युगंधर' आणि अजून असल्या छप्पन्न तथाकथित पौराणिक कादंबर्‍या नि 'पर्व' यांच्यात तुलना असेल, तर 'पर्व' थोडीशी अधिक बरी आहे. पण त्याची कारणं साहित्यिक अज्याबातच नाहीत.

(बाकी वादार्ह प्रदेशाच्या व्याप्तीबद्दल मान्य आहे. म्हणून इतकं खरडलं!)

बॅटमॅन Mon, 09/12/2013 - 18:05

In reply to by मेघना भुस्कुटे

मुद्दा असा आहे की, केवळ गोष्टीच्य मूळ आवृत्तीतली समाजस्थिती शक्य तितक्या हुबेहूब प्रकारे अनुकृत केली, यावरून गोष्ट बरी सांगितलीय की वाईट, हे ठरत नाही. तो निकषच नाही.

एकमात्र निकष नसला तरी वन ऑफ द निकष पाहिजे असे मत आहे. गोष्ट सांगण्याची कला हा एक वेगळाच मुद्दा आहे पण त्यात शक्य तितके 'सत्य' असावे अशी अपेक्षा.

कुठल्याच एका पात्राला बेतालपणे मोठं न करता, सहानुभूती न देता गोष्ट प्रभावीपणे सांगितली की नाही? बास. मग कुंतीनं वर मागून मुलं जन्माला घातली की हिमालयात आडमाप उंचीच्या एखाद्या जमातीच्या पुरुषांजवळ आळीपाळीनं रत होऊन घातली, या तपशिलात मला रस नाही. तो तपशील तेव्हाच महत्त्वाचा ठरेल, जेव्हा त्याची गोष्टीत काहीएक अनिवार्यता असेल. 'पर्व'मधे ही अनिवार्यताच मला गायब दिसली.

रोचक. अशी अनिवार्यता तर कृष्णाच्या रथाच्या, राजवाड्याच्या किंवा गेलाबाजार कुणा सुंद्रीच्या पुष्ट अवयवांच्या वर्णनातही नसते. सो व्हॉट?

'मृत्युंजय', 'राधेय', 'युगंधर' आणि अजून असल्या छप्पन्न तथाकथित पौराणिक कादंबर्‍या नि 'पर्व' यांच्यात तुलना असेल, तर 'पर्व' थोडीशी अधिक बरी आहे. पण त्याची कारणं साहित्यिक अज्याबातच नाहीत.

अज्याबातच नाहीत?? मग "कुठल्याच एका पात्राला बेतालपणे मोठं न करता, सहानुभूती न देता गोष्ट प्रभावीपणे सांगितली की नाही?" हे साहित्यिक अंगच आहे की.

(बाकी वादार्ह प्रदेशाच्या व्याप्तीबद्दल मान्य आहे. म्हणून इतकं खरडलं!)

वोक्के म्याम :)

मेघना भुस्कुटे Mon, 09/12/2013 - 18:14

In reply to by बॅटमॅन

'शक्य तितके 'सत्य' असावे अशी अपेक्षा.'

कशाकरता? त्यानं नक्की काय फरक पडला? हेच ते न-साहित्यिक निकष.

बाकी वर्णनांत अनिवार्यता नाही कशी? असतेच की. द्रौपदीच्या अंगाला निळ्या कमळांचा गंध होता, हे वर्णन आहे. पण ते काढून टाकलं, तर द्रौपदीचं पेश्शल सौंदर्य गोष्टीतून गायब होईल. व्यासाला जी गोष्ट सांगायचीय, त्या गोष्टीचा लॉसच की. त्याच्याकरता हे वर्णन अनिवार्य आहे. तसं चमत्कारांचं मानवी स्पष्टीकरण नि तत्कालीन सामाजिक व्यवहाराचे तपशील 'पर्व'साठी अनिवार्य / इनडिस्पेन्सेबल आहेत का? त्यानं गोष्टीच्या रंजकतेत / थोरपणात भर पडली का? माझ्या मते नाही पडली. 'सामाजिक व्यवहाराचे तपशीलच ल्याहायचे, तर झकासपैकी निबंध लिहायचा. आमचं महाभारत कशाला बोअर करून ठेवलंत?' असा "व्यक्तिसापेक्ष" शेरा माझ्या डोक्यात उमटला. म्हणून मला अनिवार्यता नाही दिसली. त्याचा वर्णनांशी संबंध नाही.

बाकी "कुठल्याच एका पात्राला बेतालपणे मोठं न करता, सहानुभूती न देता गोष्ट प्रभावीपणे सांगितली की नाही?" हे अलबतच साहित्यिक अंग आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं चित्रण यथायोग्य आणि हुबेहूब आणि चमत्कारविरहित आहे की नाही, हे न-साहित्यिक.

बॅटमॅन Mon, 09/12/2013 - 18:19

In reply to by मेघना भुस्कुटे

'सामाजिक व्यवहाराचे तपशीलच ल्याहायचे, तर झकासपैकी निबंध लिहायचा. आमचं महाभारत कशाला बोअर करून ठेवलंत?' असा "व्यक्तिसापेक्ष" शेरा माझ्या डोक्यात उमटला. म्हणून मला अनिवार्यता नाही दिसली. त्याचा वर्णनांशी संबंध नाही.

उगीच विरोधासाठी म्हणून नव्हे, पण मग अंताजीच्या बखरीबद्दलही हेच म्हणता येईल की. इतकं वास्तववादी लिहायचं होतं तर प्रबंध लिहायचा, जोरदार ब्राह्मणी राज्य उगा बदनाम कशाला केलेत?

तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं चित्रण यथायोग्य आणि हुबेहूब आणि चमत्कारविरहित आहे की नाही, हे न-साहित्यिक.

इथे एक प्रश्नः महाभारतकालीन इतिहासाची एकूण माहिती तुटपुंजी असल्याने त्या काळाबद्दल असे केले तर ठीक आणि शिवकाळाबद्दल बरीच माहिती असल्याने शिवकालीन कादंबरीत चमत्कार आणू नयेत असे मत आहे का? की तिथेही चालेल? या प्रश्नाच्या उत्तरात समाजपरिस्थितीचे चित्रण याथातथ्यतः करणे साहित्यिक की न-साहित्यिक या प्रश्नाचेही उत्तर सामावले आहे.

मेघना भुस्कुटे Tue, 10/12/2013 - 14:30

In reply to by बॅटमॅन

तसे नव्हे रे, तसे नव्हे!

माहिती तुटपुंजी असण्याचा प्रश्न नाही. शिवकाळ हा इतिहास आहे. त्याचे पुरावे आहेत. त्या पुराव्यांना प्रमाण मानून / त्या पुराव्यांना फाट्यावर मारून आपल्या वेगळ्या गृहीतकांनिशी / त्या पुराव्यांच्या अधलामधला काळ आपल्या कल्पनेनं भरून गोष्ट लिहिता येईल. ती चांगली किंवा वाईट असेल. तिचं मूल्यमापन करताना ती उपलब्ध पुराव्यांना (ऐतिहासिक, सामाजिक, भाषिक) धरून आहे की नाही, हा अनेकांपैकी एक निकष असेल. उदा. शिवाजीनं वापरलेली ब्राह्मणी आणि बरीच आधुनिक भाषा जमेस धरूनही इतर निकषांवर बर्‍याच अंशी उतरल्यामुळे 'श्रीमान योगी' ही तशी बर्‍यापैकी वाचनीय कादंबरी आहे.

'अंताजीची बखर' गोष्ट म्हणून सरस आहे, त्यात जे आहे ते निबंधातून धड व्यक्त करता आलं नसतं असं मला वाटतं. तिच्यातलं तत्कालीन समाजपरिस्थितीचं चित्रण यथातथ्य आहे हा तिच्या शैलीसाठी अत्यावश्यक असलेला एक मूलभूत भाग झाला. तो यथायोग्य पाळला, म्हणून लगेच गोष्ट भारी होते असं मला वाटतं का? नाही. विच्छेदनच करायचं, तर गोष्टीचा बांधेसूदपणा, उत्कंठा वाढवून धरणं, जोरकस व्यक्तिरेखा इत्यादी गोष्टी आहेत, म्हणून मला बखर भारी वाटते.

असं महाभारताबद्दल आहे का? मी महाभारतविषयक गोष्टीचं मूल्यमापन करताना ती उपलब्ध पुराव्यांना (ऐतिहासिक, सामाजिक, भाषिक) धरून आहे की नाही, हा निकष फारसा महत्त्वाचा मानत नाही. कारण हा निकष फाट्यावर मारूनही गोष्ट चांगल्या प्रकारे (संतुलित, रंजक, विचारप्रवर्तक) सांगता येते, असं माझा अनुभव सांगतो.

जरी तत्कालीन परिस्थितीचं चित्रण यथातथ्य असलं, तरीही 'पर्व' मला थोर वाटत नाही. ती पास होण्याइतके गुण मिळवते, पण नंबरात येते का? माझ्याकरता नाही.

बॅटमॅन Tue, 10/12/2013 - 15:59

In reply to by मेघना भुस्कुटे

ती चांगली किंवा वाईट असेल. तिचं मूल्यमापन करताना ती उपलब्ध पुराव्यांना (ऐतिहासिक, सामाजिक, भाषिक) धरून आहे की नाही, हा अनेकांपैकी एक निकष असेल.

वोक्के.

उदा. शिवाजीनं वापरलेली ब्राह्मणी आणि बरीच आधुनिक भाषा जमेस धरूनही इतर निकषांवर बर्‍याच अंशी उतरल्यामुळे 'श्रीमान योगी' ही तशी बर्‍यापैकी वाचनीय कादंबरी आहे.

इथे असहमत. वाचनीय म्हणजे नासं इनामदारांच्या कादंबर्‍यांपेक्षा नक्कीच वाचनीय आहे पण कादंबरीमय शिवकालाची सर/मॅडम/प्यून वट्टात नाही तिला.

अंताजीची बखर' गोष्ट म्हणून सरस आहे, त्यात जे आहे ते निबंधातून धड व्यक्त करता आलं नसतं असं मला वाटतं. तिच्यातलं तत्कालीन समाजपरिस्थितीचं चित्रण यथातथ्य आहे हा तिच्या शैलीसाठी अत्यावश्यक असलेला एक मूलभूत भाग झाला. तो यथायोग्य पाळला, म्हणून लगेच गोष्ट भारी होते असं मला वाटतं का? नाही. विच्छेदनच करायचं, तर गोष्टीचा बांधेसूदपणा, उत्कंठा वाढवून धरणं, जोरकस व्यक्तिरेखा इत्यादी गोष्टी आहेत, म्हणून मला बखर भारी वाटते.

बखरीच्या शैलीसाठी तत्कालीन समाजपरिस्थितीचं चित्रण याथातथ्यतः करणं आवश्यक का होतं?

असं महाभारताबद्दल आहे का? मी महाभारतविषयक गोष्टीचं मूल्यमापन करताना ती उपलब्ध पुराव्यांना (ऐतिहासिक, सामाजिक, भाषिक) धरून आहे की नाही, हा निकष फारसा महत्त्वाचा मानत नाही. कारण हा निकष फाट्यावर मारूनही गोष्ट चांगल्या प्रकारे (संतुलित, रंजक, विचारप्रवर्तक) सांगता येते, असं माझा अनुभव सांगतो.

रंजक वैग्रे ठीक, ते तर मृत्युंजयही करतोच. संतुलित अन विचारप्रवर्तकपणे केल्याचं उदाहरण मला माहिती नाही. जितक्या निकषांना फाट्यावर माराल तितके उत्तम गोष्ट सांगणे अवघड होते. शेवटी महाभारताबद्दल नेमकी माहिती कमी म्हणूनच याथातथ्यतेचा निकष फाट्यावर असेच दिसते आहे.

जरी तत्कालीन परिस्थितीचं चित्रण यथातथ्य असलं, तरीही 'पर्व' मला थोर वाटत नाही. ती पास होण्याइतके गुण मिळवते, पण नंबरात येते का? माझ्याकरता नाही

.

पुन्हा एकदा: असोच ;) :D

ऋषिकेश Mon, 09/12/2013 - 17:36

In reply to by बॅटमॅन

संपूर्ण अवांतरः

तुझा नी मेघनाचा संवाद वाचुन माझ्या डोक्यातला जुना प्रश्न पुन्हा वर आला
आता तुला इतिहासाची आवड आहे नव्हे अभ्यास आहे त्यामुळे तुला या कादंबरीत काही असे पैलु दिसत आहे ते आम्हांला - किमान मला - अजिबातच दिसणे शक्य नाही. असे असताना अखादी कलाकृती - त्यातील सौदर्यस्थळे - फक्त ठराविक लोकांनाच त्यांच्या विशिष्ठ अभ्यासामूळे समजत असेल - पोचत असेल - तर तिला किती श्रेष्ठ समजावे? जर एखादा पदर, एखादा पैलु आहे हेच समजलं नाही, म्हणजे त्याचं अस्तित्त्वच जाणवलेलं नाही तर तो पैलूही आहे असे दुसरा एखादा सांगतो त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा एकवार मी त्या कलाकृतीकडे शक्य असल्यास पाहतोही पण तरीही तो पैलु जाणवला -पोचलाच नाही तर तो श्रेष्ठत्त्वाचा निकष म्हणून कसा मान्य करावा?

हा प्रश्न तुलाच किंवा याच कादंबरीविषयी आहे असे नाही . कदाचित तुमच्या चर्चेच्या दृष्टिने हा प्रश्नच गैरलागू असेल. पण हा प्रश्न मला अनेकदा पडतो. इथे चिंजंच्या काही चित्रपटांच्या मतांनंतरही तो पडलेला आहे.

मेघना भुस्कुटे Mon, 09/12/2013 - 17:45

In reply to by ऋषिकेश

एखादी कलाकृती - त्यातील सौदर्यस्थळे - फक्त ठराविक लोकांनाच त्यांच्या विशिष्ठ अभ्यासामूळे समजत असेल - पोचत असेल - तर तिला किती श्रेष्ठ समजावे?
अगदी अगदी. मलाही हा प्रश्न पडतो.
बाकी हे 'तत्कालीन सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब, म्हणून पर्व थोर', हे मला कसं वाटतंय सांगू का - अमुक एका नाटकाचं नेपथ्य वास्तववादी आहे, म्हणून मग नाटक चांगलं. असं थोडंच असतं? नेपथ्य वास्तववादी असलेलं भिकार नाटक नि फिरता सेट असलेलं किंवा बिनसेटचं चांगलं नाटक असूच शकतं. नेपथ्य किती हुबेहूब हा निकषच नाहीये. गोष्ट परिणामकारकपणे सांगायला नेपथ्य पूरक आहे का? असेल, तर त्यानं नाटकाच्या गुणवत्तेत भर पडेल. पण अगदी हुबेहूब धबधबा स्टेजवर निर्माण केला नि नाटकातलं नाट्य गायब असेल, तर ते नेपथ्य तर्कशुद्ध, तंत्रशुद्ध, हुबेहूब असूनही नाटकाला निरुपयोगीच. असं.

चिंतातुर जंतू Mon, 09/12/2013 - 17:54

In reply to by ऋषिकेश

>> अखादी कलाकृती - त्यातील सौदर्यस्थळे - फक्त ठराविक लोकांनाच त्यांच्या विशिष्ठ अभ्यासामूळे समजत असेल - पोचत असेल - तर तिला किती श्रेष्ठ समजावे? जर एखादा पदर, एखादा पैलु आहे हेच समजलं नाही, म्हणजे त्याचं अस्तित्त्वच जाणवलेलं नाही तर तो पैलूही आहे असे दुसरा एखादा सांगतो त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा एकवार मी त्या कलाकृतीकडे शक्य असल्यास पाहतोही पण तरीही तो पैलु जाणवला -पोचलाच नाही तर तो श्रेष्ठत्त्वाचा निकष म्हणून कसा मान्य करावा?

हा खूपच गहन प्रश्न आहे. माणसानं उभी केलेली कोणतीही कला/ज्ञानशाखा पुरेशी जुनी असेल तर त्यात किती खोलवर शिरता त्यावर तुमची पातळी ठरते. म्हणजे दहावीपर्यंत अभ्यासक्रमात शिकलेलं भौतिकशास्त्र आणि पीएच.डी. झाल्यानंतर माहीत झालेलं भौतिकशास्त्र ह्यात फरक असतो. पण न्यूटनचे गतिविषयक सिद्धांत दहावीपर्यंत होऊन गेले म्हणून कमी महत्त्वाचे ठरत नाहीत. एखादं किचकट प्रमेय समजण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील किंवा तुमचं विषयातलं ज्ञान कसाला लागेल, पण समजल्यानंतर समाधानही मिळेल. तसंच कलेच्या आस्वादाबाबतही होऊ शकेल.

साहित्य, चित्रपट किंवा इतर कलांचं पंडिती शिक्षण घेतानासुद्धा कोणत्याही ज्ञानशाखेप्रमाणे पातळ्यांचा हा फरक पडतोच. मग निव्वळ आस्वादक म्हणूनही असा फरक पडणारच. 'त्यामुळे किती जणांना ते कळेल?' हा प्रश्न आणि त्यावर कलाकृती तोलणं मला फारसं रुचत नाही. सहज कळतील अशा कलाकृती केवळ कळायला सहज आहेत म्हणून कनिष्ठ ठरू नयेत आणि कळायला कठीण कलाकृती केवळ कठीण आहेत म्हणून श्रेष्ठही ठरू नयेत. शिवाय, ऐतिहासिक श्रेष्ठत्वाची आणि वैयक्तिक आवडीनिवडीची गल्लतही करू नये. त्याविषयी अधिक इथे.

मी Mon, 09/12/2013 - 18:33

In reply to by चिंतातुर जंतू

एखादं किचकट प्रमेय समजण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील किंवा तुमचं विषयातलं ज्ञान कसाला लागेल, पण समजल्यानंतर समाधानही मिळेल. तसंच कलेच्या आस्वादाबाबतही होऊ शकेल.

कष्टानंतर प्रमेय समजण्याची शक्यता कलाकृती अस्वादाच्या शक्यतेच्या बरीच जास्त आहे, त्यामुळे खुलासा बरोबर वाटला तरी नेमका/पुरेसा नाही, क्युबिझमसंबंधी प्रतिसाद अधिक खुलासा करतो हे मान्य.

श्रेष्ठत्व वगैरे बाबी इतर क्षेत्रांप्रमाणेच इथेही मान्यवरांनी ठरवाव्यात व इतरांनी अभ्यासूनच+'आस्वाद घेउनच' त्या मान्य कराव्यात वगैरे बरोबर आहे, पण ते अस्वादाचं गणित शिकवून किंवा इतर विषयांप्रमाणे शिकुन येणार नाही असा कयास आहे, कलेच्या क्षेत्रात प्रगल्भतेचा 'क्लास' लावता येणार नाही असे वाटते.

चिंतातुर जंतू Mon, 09/12/2013 - 18:38

In reply to by मी

>> कष्टानंतर प्रमेय समजण्याची शक्यता कलाकृती अस्वादाच्या शक्यतेच्या बरीच जास्त आहे, त्यामुळे खुलासा बरोबर वाटला तरी नेमका/पुरेसा नाही,

'गणित सगळ्यांनाच कळतं; फक्त कष्ट घेण्याची गरज आहे' हे गृहीतक ह्या विधानामागे आहे. पण गणितात सगळ्यांनाच गती नसते.

............सा… Mon, 09/12/2013 - 20:08

In reply to by मी

शॅरन ओल्ड्स ची ही कविता समजावयास मला किंचीत वेळ लागला. पण जेव्हा समजली तेव्हा "प्रमेय सोडविल्याचाच" आनंद झालेला स्मरते.

Late Poem to My Father

Suddenly I thought of you
as a child in that house, the unlit rooms
and the hot fireplace with the man in front of it,
silent. You moved through the heavy air
in your physical beauty, a boy of seven,
helpless, smart, there were things the man
did near you, and he was your father,
the mold by which you were made. Down in the
cellar, the barrels of sweet apples,
picked at their peak from the tree, rotted and
rotted, and past the cellar door
the creek ran and ran, and something was
not given to you, or something was
taken from you that you were born with, so that
even at 30 and 40 you set the
oily medicine to your lips
every night, the poison to help you
drop down unconscious. I always thought the
point was what you did to us
as a grown man, but then I remembered that
child being formed in front of the fire, the
tiny bones inside his soul
twisted in greenstick fractures, the small
tendons that hold the heart in place
snapped. And what they did to you
you did not do to me. When I love you now,
I like to think I am giving my love
Directly to that boy in the fiery room,
As if it could reach him in time.

.

ऋषिकेश Wed, 11/12/2013 - 13:24

In reply to by चिंतातुर जंतू

हे मान्य आहेच.
माझा प्रश्न थोडा नंतर चालु होतो. एखादा नवा पैलु एखाद्याने (मित्र वैगरे जाऊद्या समजा एखाद्या अभ्यासू समीक्षकानेही समोर मांडला) तर मी अनेकदा त्या दृष्टीकोनाने त्या कलाकृतीकडे बघायचा प्रामाणिक प्रयत्न करतोही पण बॅट्याम्हणतो तसे यात आपल्याला कळला आहे त्यापेक्षा अधिक विस्तारीत परिप्रेक्ष्य असु शकतो इतकी आणि इतकीच जाणीव होते. पुनरावलोकनानंतरही तो नवा आयाम/पैलू/पदर काही केल्या जाणवतच नाही - समजणे, त्याचा आस्वाद घेणे, त्यावर मत देणे वगैरे तर कोसो दूरच राहिले. अशा वेळी केवळ त्यातील दर्दी म्हणतात व त्यांना तो पैलु जाणवला आहे म्हणून तो तसा आहे इतकीच खूणगाठ बांधावी लागते. मात्र तरीही मनातून समाधान होत नाही ते नाहि, उलट स्वतःला तो पदर न जाणवल्याने - न जाणवूनही - आपण ते मान्य करतो आहोत किमान अमान्य करणे शक्य नाही - तितका अभ्यास नाही- असे समजून हताश + या बाबतीत आपण अंधश्रद्ध आहोत असे वाटु लागते. तेव्हा मी किमान माझ्या आवडी ठरवताना तो पैलु लक्षात कसा व का घ्यावा?

बॅटमॅन Mon, 09/12/2013 - 18:11

In reply to by ऋषिकेश

अर्थातच हे मान्य आहे. प्रत्येकाला प्रत्येक पैलू जाणवेल असे नाही, समजा जाणवला तरी त्याचे महत्त्व वाटेल असे नाही. अन ते आपापल्या ठिकाणी बरोबरच आहे- आस्वाद हा इनहरंटलि सापेक्ष असतो म्हणून पाहिले तर. पण किमानपक्षी आस्वादात अमुक हाही पैलू आहे, हे सांगणे समीक्षेचे कर्तव्य असते. जंतूंची चित्रपटसमीक्षा वाचून सुरुवातीला मलाही असेच वाटायचे पण अलीकडे माझे मत असे आहे की चूक-बरोबर पेक्षा अधिकाधिक मुद्याचे अस्तित्व जाणवून देणे हे समीक्षेचे कार्य आहे/असावे. समीक्षा न वाचता ते कळाले नाही अन वाचून कळाले तर समीक्षा यशस्वी झाली असे म्हणता येईल, नपेक्षा नाही. अन अर्थातच, अमुक एकाचे निकष तमुक एकाने मानावेत असे नाही, फक्त आस्वादासाठीचं परिप्रेक्ष्य वाटतं त्यापेक्षा विस्तृत आहे इतका बोध झाला की बास.

'न'वी बाजू Tue, 10/12/2013 - 17:50

In reply to by बॅटमॅन

अन्य लेखक कृष्णाला कोल्हापुरात येऊन चक्क कुस्ती खेळावयास लावतात,

बोले तो, 'युगंधर' काय हो?

फारा वर्षांपूर्वी वाचली होती, तीही एन्सायक्लोपीडिया-छाप र्‍याण्डम-आक्सेस पद्धतीने (आम्ही मोठ्ठाल्या कादंबर्‍या - वाचल्याच तर - अश्शाच वाचतो.); आता फारशी आठवत नाहीये, पण त्यात कोठेतरी एरोप्लेनचेही वर्णन आले होते, असे अंधुकसे आठवते, आणि त्यावरून, त्या काळातली विमाने ही फार फार तर कन्वेन्शनल (प्रॉपेलर-ड्रिवन) असावीत, जेटपर्यंत प्रगती झाली नसावी, या निष्कर्षाप्रत पोहोचलो होतो, हे चांगलेच आठवते.

एकंदरीतच मागासलेला काळ असावा तो. किंवा, लेखकाच्या कल्पनेच्या भरारीची मर्यादा म्हणू या. (शेवटी लेखकसुद्धा बिचारा त्याला आजमितीस जे माहीत आहे, त्यावरूनच कल्पना करणार ना! आता आम्ही जर [दुसरे उद्योग नाहीत म्हणून] १९८०च्या दशकात भारतात बसून महाभारतकथा लिहिली असती, तर त्यात [कल्पनाशक्ती ताणताणूनसुद्धा] हस्तिनापुराच्या नाहीतर इंद्रप्रस्थाच्या रस्त्यांवरून 'रथ' म्हणून अँबॅसिडर नाहीतर प्रीमियर पद्मिन्याच धावल्या असत्या, अगदी फारच झाले, तर मारुत्या. तेथे बीएमडब्ल्यू नि व्हॉल्व्हो सोडा, साधी टोयोटा करोला तरी थोडीच धावली असती? शक्यच नाही! जेथे आम्हालाच माहीत नव्हती, तेथे कोठून धावायला?)

बॅटमॅन Tue, 10/12/2013 - 17:56

In reply to by 'न'वी बाजू

हा हा हा, गेस्ड रैट्ट!!!! एरोप्लेनचे वर्णन होते किंवा कसे हे आठवत नाही.

एकंदरीतच मागासलेला काळ असावा तो. किंवा, लेखकाच्या कल्पनेच्या भरारीची मर्यादा म्हणू या. (शेवटी लेखकसुद्धा बिचारा त्याला आजमितीस जे माहीत आहे, त्यावरूनच कल्पना करणार ना! आता आम्ही जर [दुसरे उद्योग नाहीत म्हणून] १९८०च्या दशकात भारतात बसून महाभारतकथा लिहिली असती, तर त्यात [कल्पनाशक्ती ताणताणूनसुद्धा] हस्तिनापुराच्या नाहीतर इंद्रप्रस्थाच्या रस्त्यांवरून 'रथ' म्हणून अँबॅसिडर नाहीतर प्रीमियर पद्मिन्याच धावल्या असत्या, अगदी फारच झाले, तर मारुत्या. तेथे बीएमडब्ल्यू नि व्हॉल्व्हो सोडा, साधी टोयोटा करोला तरी थोडीच धावली असती? शक्यच नाही! जेथे आम्हालाच माहीत नव्हती, तेथे कोठून धावायला?)

अर्थातच. घोड्यांचा देवही हयग्रीवच असणार. त्यात परत आपली वरिजिनल पुराण-महाकाव्यादींमधील क्रिएटिव्हिटीच इतकी जबरी आहे की त्यापुढे ही शिवाजी सावंती किंवा विश्वास पाटीलकी सर्व कै भुस्काट आहे. कोवाडकर रणजित देसाई तर कथानायकास ललित लेखकाचा एक अ‍ॅडिषणल आयाम रेट्रोफिटवल्याखेरीज राहतच नाहीत. "पावनखिंड" तेवढी जरा या दोषांपासून अलिप्त आहे. तलवारीचा घाव लागला तर "चालायचंच! अस्ल्या खर्वडींना आम्ही दाद देत नाही." सारखे दमदार ड्वायलॉक तीत असल्याने यत्ता नौवीत आम्हाला भयंक्र म्हणजे भयंक्रच आवडलेली.

मेघना भुस्कुटे Tue, 10/12/2013 - 18:03

In reply to by बॅटमॅन

कोवाडकर रणजित देसाई तर कथानायकास ललित लेखकाचा एक अ‍ॅडिषणल आयाम रेट्रोफिटवल्याखेरीज राहतच नाहीत.
अगदी अगदी!
त्यांचे एकजात सगळे नायक "अखेरीस अगदी एकटे" राहतात. मग चित्रकार असोत, पेशवे असोत नाहीतर छत्रपती.

बॅटमॅन Tue, 10/12/2013 - 18:09

In reply to by मेघना भुस्कुटे

त्यांचे एकजात सगळे नायक "अखेरीस अगदी एकटे" राहतात. मग चित्रकार असोत, पेशवे असोत नाहीतर छत्रपती.

ठ्ठो!!!! तेवढं ते रविवर्म्याच्या कादंब्रीतलं ताज्या वाफाळत्या इडल्यांचं आणि ग्रमग्रम सांबाराचं वर्णन अजून डोक्यात आहे ;)

अवांतरः पानिपत कादंब्रीमध्ये सुजाउद्दौल्याच्या राजधानीत- अवधेत रोडसाईड कबाबांचेही वर्णन तोंपासू आहे एकदम. घरचे अन तोपर्यंत अस्मादिकही व्हेज असल्याने यत्ता नौवीधाव्वीत मातु:श्री छोले बनवून आमची चूष भागवीत.

अतिअवांतरः कोवाडकरांच्या बंगल्याच्या आवारातील एक कर्दळ आज आमच्या घरातील बागेची शोभा वाढवीत आहे. तेवढेच आमचे त्यांच्याशी कणेक्षण.

अभिरत Sun, 22/12/2013 - 14:10

गांधीवाद, मार्क्सवाद अशा वेगवेगळ्या विचारसरण्या मांडणा-या ६ वेगवेगळ्या व्यक्तींचे चित्रण असलेल्या एका पुस्तकाचे नाव हवे होते. लेखक बहुतेक - अच्युतराव पटवर्धन की यदि फडके. कोणी सांगता का प्लीज ? :)

पर्स्पेक्टिव्ह Wed, 10/02/2021 - 20:36

आता नवीन धागा सुरू करायला हवा. इथे सव्वाशेच्या वर प्रतिसाद झालेनी.