Skip to main content

गुरगाव फाईल्स

#संकल्पनाविषयक #ललित #समाजमाध्यम #ललित #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

गुरगाव फाईल्स
- आदूबाळ

दुरून डोंगर
तुमच्यामध्ये कितीही मोठा 'प्रवासी किडा' वळवळत असेल (किंवा हल्लीच्या रील्सभाषेत म्हणायचं तर 'वॉन्डरलस्ट' असेल) तरी तुमच्या स्वप्नातल्या प्रवास-ठिकाणांमध्ये 'गुरगाव' नामक प्रकार असणं अशक्य आहे. आणि हे मी उगाच म्हणत नाहीये – प्रवासी किडे बाळगणारी अनेक मंडळी मला भेटली आहेत. त्यात अनेक चमत्कारिक नमुने सापडतात. लंडन ते बेजिंग प्रवास रेल्वेने करायची योजना कागदावर आखलेला एक इसम आहे. (पण सध्या रशियाचं बूड स्थिर नसल्याने त्याने हा बेत तहकूब केला आहे.) फक्त धारावी झोपडपट्टी बघायला मुंबईला आलेली एक बाई मला माहीत आहे. ती समाजशास्त्राची किंवा कोणत्याही शास्त्राची अभ्यासक, पत्रकार, लेखक, कवी वगैरे असलं काहीही नाही. एका सरकारी हापिसात कारकून आहे. तिला झोपडपट्टी कशी दिसते ते पाहायची आत्यंतिक असोशी मुंबईपर्यंत घेऊन आली. (अशा सहली आयोजित करणारे ट्रॅव्हल एजंट असतात ही माहितीही तिने दिली.) असले लोक जगात असतात, पण तरीही गुरगावला कोणी हौसेने जाईल हे निव्वळ असंभवनीय आहे.

गुरगाव हे नाव प्रथम कधी ऐकलं असा विचार केला तर स्मृतीला ताण देऊनही इ. स. २००० अगोदर आठवण खेचता येत नाही. अर्थात, पश्चिम महाराष्ट्रात राहणाऱ्या ममव माणसाच्या अनुभवविश्वाची ही मर्यादा आहे हे खरंच. त्या वेळी 'इंडिया शायनिंग' किंवा तत्सम नावाखाली काही जुन्या शहरांच्या नजीक काँक्रिट-काचेच्या तुरुंगवजा कोठड्या उभारायचं काम जोरात सुरू होतं. पुण्याजवळची हिंजेवाडी (याला पूर्वी 'हिंजवडी' म्हणत), मुंबईचा बीकेसी, कोलकात्याचा सॉल्ट लेक सिटी भाग, वगैरे प्रकार. पण दिल्लीने आपल्याभोवती असलेल्या हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यांतला थोडा थोडा भाग घेऊन चक्क 'नॉर्दन कॅपिटल रीजन' उर्फ एन. सी. आर. बनवला. त्यांतले शिरोमणी म्हणजे गुरगाव आणि नॉयडा. बागपत-सोनिपत-पानिपत भागाचं नाव फार ऐकू येत नाही. पूर्वी जिथे निव्वळ शेतजमीन होती तिथे जागेला भाव यायला सुरुवात झाली आणि बघता बघता टोलेजंगी कृत्रिम शहर उभं राहिलं.

गुरगाव नावाचं मूळ गाव असेलच तर ते खेडं असावं, किंवा फार फार तर तालुक्याचं ठिकाण. बाकी 'डुंडाहेडा', 'कपासहेडा' असल्या नावाची लहान लहान खेडी. तिथे राहणारे 'हेडाऊ' – म्हणजे पशुपालक लोक. आता या आजूबाजूच्या सगळ्या भागालाही 'गुरगाव'च म्हणू लागले. स्थानिक बोलीत 'गुड़गाँव'. आणि नंतर कधीतरी संस्कृतीकरणाच्या कमंडलूत बुचकळून पवित्र झालेलं 'गुरुग्राम'.

दिल्लीतल्या मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपली दिल्ली ऑफिसं या गुरगाव भागात हलवली. तिथले फोटो चकचकीत बिझनेस मासिकांत झळकत. त्यांकडे बघून "अगद्दी परदेशी गेल्यासारखं वाटतं नै" असं (कधी परदेशी न गेलेला) आमचा एक मित्र म्हणत असे. गुरगाव ही त्याकाळी "अगं बने!" म्हणायला लावणारी awe inspiring जागा होती.

कळपात राहून कळपाच्या दिशेने बिनतक्रार जाण्यात समाधान मानणाऱ्या एका मैत्रिणीने एम्बीए केलं. क्याम्पस इंटरव्ह्यूचे जीडी-पीआय वगैरे सोहळे रीतसर पार पडले, आणि तिला 'मॅनेजमेंट ट्रेनी' म्हणून गुरगावी रुजू व्हायला सांगितलं. माझ्या माहितीतली गुरगावी गेलेली ही पहिली व्यक्ती. ही मैत्रीण गुरगावी गेली आणि गुप्त झाली. म्हणजे तिला कोणी किडन्याप करून तुकडे करून तंदुरीत टाकले वगैरे असलं काहीही झालं नाही. ती तिच्या नोकरी-आयुष्यात रमली, संपर्क तुटला.

माझ्या नोकरीने मला सिल्व्हासापासून ते सेमारांगपर्यंत अनेक ठिकाणी फिरवलं, पण या गुरुग्रामी उदक पडायचा योग आताआतापर्यंत आला नव्हता. मग एक दिवस अचानक आला. आणि नजीकच्या भविष्यकाळात परत परत येत राहील असं दिसतंय.

मीही कोणत्याही शास्त्राचा अभ्यासक, पत्रकार, लेखक, कवी वगैरे काहीही नाही. मीही सरकारी नसलो तरी एका हापिसातला कारकून आहे. कुठेही गेलो (विशेषतः कामासाठी) तरी रात्रीबेरात्री रस्त्याने एकटेच हिंडणे किंवा बंजी उड्या मारणे वगैरे जोखमीचे खेळ खेळत नाही. जीवाला जपून असतो. मुद्दा असा की माझ्या प्रवासी अनुभवविश्वाचं तोकडेपण हा बग नसून फीचर आहे. तरी गुरगावचे अनुभव इतर शहरांच्या अनुभवांपेक्षा वेगळे(च) आहेत. माझ्याभोवती उभ्या केलेल्या कडेकोट ममव कवचाला भेदूनही गुरगावची गुरगावी माझ्यापर्यंत पोचलीच.


गुरगावचा नकाशा

अहिर मारुती आणि चमार होंडा

हॉटेलपासून ऑफिस तीन किलोमीटर दूर होतं. म्हणून उबर/ओला किंवा अन्य टॅक्सीच्या भानगडीत न पडता ऑफिसला सोडण्या-आणण्यासाठी गाडी मिळवून देण्याचं काम हॉटेल बुक करतानाच मी त्यांच्या गळ्यात घातलं. आता ठरावीक वेळेला गाडी उपस्थित असणं अपेक्षित होतं, पण दोन दिवसांतच हॉटेलचं पितळ उघडं पडलं. त्यांच्याकडे पुरेशा गाड्या नव्हत्या, आणि गुरगावात रस्ते मोठे असले तरी रहदारी भयानक. शेवटी टॅक्सी स्वतः शोधण्याशिवाय काही पर्याय उरला नाही.

"मैं पहुंच रहा हूँ, आप होटल के बाहर आ के खडे रहना..." असा चालकाचा आदेश आल्यामुळे मी बाहेरच्या रस्त्यावर येऊन खडा झालो. हॉटेलमध्ये आत शिरताना गाडीची तपासणी होते. टॅक्सीवाल्याला ती होऊ द्यायची नसावी. बहुधा उगाच वेळ जाऊन धंद्याची खोटी होते म्हणून असेल. (म्हणजे मी अशी मनाची समजूत घालून घेतली.) पण बाहेर रस्त्यावर त्या मॉडेलच्या आणि रंगाच्या अनेक गाड्या उभ्या होत्या. त्या हॉटेलसमोरचा तिठा बराच लोकप्रिय पिक अप पॉईंट असावा. ऑफिसला जाणाऱ्या वेगवेगळ्या कामकरी मुंग्या आपापली टॅक्सी ओळखून त्यात घुसत होत्या. आता मला प्रत्येकीचा नंबर तपासत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

"सर, कहाँ हॅ?" परत टॅक्सीवाल्याचा उर्मट गुरगावी फोन आला. 'उर्मट गुरगावी' हे 'पिवळा पितांबर' म्हटल्यासारखं आहे. गुरगावी बोलीत 'है'चा 'हॅ' होतो हॅही जाता जाता सांगतो.

"अरे यहीं हूँ, आप किधर? दिखाई नहीं दे रहे..."

"अरे सर, चमारवाली अपनी एकही गाडी तो हॅ लाईन में."

"क्या वाली?" मी गोंधळून विचारलं. पण माझ्या हिंदीच्या एकंदर लहेजावरून टॅक्सीवाल्याला पावणा कुठून आलाय हे कळलं होतं. तो गाडीतून पायउतार झाला आणि त्यानेच मला शोधून काढलं.

त्याची गाडी दिसताच चमार प्रकरणाचा उलगडा झाला. कारण गाडीच्या पुढच्या आणि मागच्या काचेवर 'चमार' असं मोठ्या लालेलाल वळणदार अक्षरांत लिहिलं होतं. त्याच्या डाव्या बाजूला 'तलवार की तेज धार', 'अन्याय पर प्रहार' वगैरे 'र'कारान्त वाक्यतुकडे लिहून त्याचं 'चमार'शी यमक जुळवून ठेवलं होतं. म्हणजे 'तलवार की तेज धार - चमार;' अशा रीतीने हे वाचणं अपेक्षित होतं. अशी सात आठ वाक्यं होती. शेवटी सुचायचं तर थांबलं असावं आणि जागा तर राहिली असावी. मग 'थोडा गुस्सा बहुत प्यार - चमार' हेही चेपून दिलं होतं.

"इत्ता बडा लिखा हॅ – देखा नी देखा?" त्याने घाम पुसत अर्धवट मला अर्धवट स्वतःला विचारलं आणि गाडी हाकली.

संध्याकाळी मी हुशार झालो होतो.

"आप की गाडी कैसे दिखती हॅ?" मीही गुरगावी हेल फिरवत (वेगळ्या) उबर टॅक्सीवाल्याला विचारलं.

"अरे सर, पीछेवाली काँच पे 'अहिर' लिखा हॅ..."

पाच सेकंदांत त्याला शोधून काढलं.

तीन गुरगावे

एका शहरात अनेक शहरं वसतात. जेकब रीस (Jacob Riis) या छायाचित्रकाराने १८९० मध्ये 'हाऊ द अदर हाफ लिव्ह्ज' या पुस्तकात न्यू यॉर्क शहरातल्या चाळवजा झोपडपट्ट्यांचं दर्शन घडवलं होतं. आपल्या श्रीमंत शहरातला अर्धा भाग 'असा'ही जगतो हे बघून श्रीमंत न्यू यॉर्ककरांना बसलेल्या धक्क्यातून पुढे बरीच सुधारणा घडत गेली.

गुरगावात एकूण तीन गुरगावं राहतात. सर्वांत मध्यभागी गेटबंद चकचकीत टोलेजंग इमारतींचं गुरगाव. इमारतीच्या भोवती काचा असल्या तर त्यात ऑफिसं असतात, आणि नसल्या की त्यात घरं असतात. ऑफिसांच्या इमारतींची नावं 'डीएलएफ सायबर पार्क', 'डीएलएफ सायबर सिटी' असली असतात. गुरगावात डीएलएफ हे ऑफिस इमारतींच्या नावांमागचं अनिवार्य विशेषण बनून येतं. बहुधा नावात डीएलएफ नसेल तर काहीतरी फ्रॉड असावा अशी शंका घेणाऱ्याला येत असेल. घरगुती इमारतींची नावं मात्र काहीही असू शकतात. त्यात डीएलएफ क्वचित दिसतं – तेही फक्त अतिश्रीमंत इमारतींत. ही कंपनी मध्यमवर्गीय घरं बांधण्यासारखी फुटकळ कामं घेत नसावी. इमारतींच्या नावांत एक भलत्याच युरोपीय भाषेतला एक्झॉटिक वाटणारा शब्द हवाच. तो शब्द सयुक्तिक किंवा सुसंगत असावा अशी सक्ती तर नाहीच, पण त्याला किमान अर्थ असावा अशीही गरज नाही. 'मर्लिन' नावाच्या इमारतीचा जादूगाराशी काही संबंध असेल असं मला उगाच वाटत होतं. पण तसं काही निघालं नाही. ATS Tourmaline यातला दुसरा शब्द काय सुचवतो देव जाणे.

या टोलेजंग इमारतींत गेटबंद माणसं राहतात. ती काचेच्या दुसऱ्या टोलेजंग इमारतींत नोकरीला जातात. काचेच्या गाडीतून, आणि शक्यतो चालवायला ड्रायव्हर. ही माणसं आपल्या वातानुकूलित घरातून इमारतीच्या वातानुकूलित फॉयेमध्ये जातात. तिथे वातानुकूलित गाडी घेऊन त्यांचा ड्रायव्हर येतो. तो काचबंद इमारतीच्या फॉयेमध्ये त्यांना सोडतो. तिथून ते वातानुकूलित ऑफिसमध्ये जातात. संध्याकाळी हाच क्रम उलट्या दिशेने करतात.

मग त्यांना दुसरं गुरगाव भेटतं. मॉल.

गेटबंद चकचकीत टोलेजंग इमारतींशेजारी गेट नसलेला, फारसा टोलेजंगी नसलेला, पण चकचकीत मॉल असतो. गेट नाही याचा अर्थ कोणालाही प्रवेश असा होत नाही. कारण जवळजवळ सगळ्या ठिकाणी 'सिक्युरिटी चेक'च्या नावाखाली कळकट मळकट लोकांची अंगे चकचकीत अंगांना घासणार नाहीत यासाठी चाळणी लावली जात असावी. पुरेसे चकचकीत असाल तर मॉलमध्ये नुसतं हिंडा-फिरायला कोणी आडकाठी करत नाही.

"सब से हॅपनिंग जगा हॅ" असं प्रशस्तीपत्र मिळालेल्या मॉलमध्ये एका रेस्टोरंटबाहेर नंबर लावून उभे होतो. रात्रीचे दहा-साडेदहा वाजलेले असतील. टेबल मिळायला पंधरा-वीस मिनिटं लागणार होती म्हणून गप्पा छाटत होतो. या मॉलमध्ये मुख्य मजल्याच्या वर गॅलरीवजा 'मेझनीन' मजल्यावर ही रेस्टोरंटे आहेत. जगा हॅपनिंग असल्याने मी 'हॅपनिंग क्राउड ते दिसते कसे आननी' याचा सर्व्हे गप्पा मारता मारता करत होतो. बऱ्यापैकी गर्दी होती, लोक येत जात होते. मराठी वर्तमानपत्रे ज्याला 'सळसळती तरुणाई' वगैरे म्हणतात तसेच सगळे होते असं नाही. बरेच मध्यमवयीन लोकही होते. जो तो आपापल्या मगदुराप्रमाणे सळसळत होता.

मध्येच मला काही चेहरे परत दिसल्याचा भास झाला. आता मी काही जॉर्ज स्मायली किंवा रिव्हर कार्टराईट किंवा अगदी अजित डोवालही नाही. पण (चक्क) सस्पेंडर नेसलेले बुटकेसे सुदृढ गुरगावी 'अंकिल' आणि पालिका बाजारातून आणलेला कार्डिगन मिरवणारी अंकिलभार्या एकदा दिसले तरी आपल्या रेटिनावरचं ते चित्र पुसणं कठीण असतं. दहा मिनिटांत दुसऱ्यांदा ते दिसल्यावर लक्षात राहणारच.

मी कुठे बघतो आहे ते माझ्या सहकाऱ्याच्या लक्षात आलं.

"घूमने आए होंगे," तो म्हणाला.

"हां – लेकिन लगते तो लोकल हॅ, एकही मॉल में कितनी बार घूमेंगे?" मी विचारलं.

तर असं कळलं की मॉल ही जागा वॉकिंग ट्रॅक म्हणून वापरणारेही बरेच गुरगावी लोक आहेत. रात्री दहा-साडेदहानंतर गुरगावची हवा त्यातल्या त्यात सुसह्य होते. तेव्हा मॉलमध्ये पाय मोकळे करायला बरेच लोक येतात.

"पार्कवार्क नहीं हैं क्या?" हा प्रश्न तोंडातून निघून गेल्यावर तो किती निर्बुद्ध आहे हे लक्षात आलं.

तिसरं गुरगाव आणि "मेगी"

तिसरं गुरगाव पटकन दिसलं नाही. पण काही काळाने आमच्या ऑफिसने पत्ता बदलला. त्यामुळे हॉटेल बदलायला लागलं. हे नवीन हॉटेल ऑफिसच्या बरोब्बर समोर होतं. म्हणजे इतकं समोर की हॉटेलच्या दारात उभं राहिलं की इमारतीच्या माथ्यावरची ऑफिसची पाटी दिसे. टॅक्सीच्या लफड्यातून सुटका झाल्याने मी खुश झालो.

पण मध्ये वाहता रस्ता आहे आणि तो गुरगावी आहे हे माझ्या ध्यानात आलं नाही. पादचारी लोकांना रस्ता ओलांडायला झेब्रा क्रॉसिंग वगैरे चिरकुट गोष्टींना गुरगावात थारा नाही. दोन किलोमीटरवर पादचारी ओव्हरब्रिज आहे तो तरी वापरा, नाही तर टॅक्सी करून वळसा घ्या, नाही तर आहे त्या ठिकाणाहून काटकोनात येणाऱ्या ट्रॅफिकला चकवत रस्ता ओलांडा. हॉटेलमधून बाहेर येऊन मी रस्ता ओलांडायच्या पोजमध्ये उभा राहिलो. पण एकाही वाहनाने वेग कमी करायचा विचार मनातही आणला नाही. पाच मिनिटं झाली, दहा झाली तरी मी तसाच. वेगात जाणाऱ्या वाहनांच्या धारेत खळ नव्हता. वेगाने पळण्याच्या ससा-कासव स्केलवर मी अंमळ सशाच्या बाजूला झुकत असलो तरी मला काटकोनात जाणारी वाहने माझ्यापेक्षा जास्त चपळ होती. त्यामुळे ती रिक्स घेण्यात अर्थ नव्हता.

शेवटी हॉटेलच्या गेटवर बसलेल्या सिक्युरिटीला माझी दया आली. (किंवा त्याने 'तरस खाल्ला' असंही म्हणता येईल. अर्थात त्याच्या आहाराबद्दल माझ्याकडे काहीच माहिती नाही.) दोघे जण येऊन माझ्या आजूबाजूला जयविजयासारखे उभे राहिले. विजयाने आपल्या हातातला चमकता दांडू उगारला. त्यात केशरी पांढरे हिरवे दिवे लकाकले आणि उंच कर्णकटू शिट्टीवजा आवाज त्यातून निघाला. (हे अद्भुत यंत्र मी प्रथमच पाहिलं. नंतर विचारल्यावर "चायना का माल हॅ" अशी माहिती मिळाली.) मीच काय, पण येणाऱ्या वाहनांतले दोन-तीन लोकही दचकले आणि त्यांनी प्रतिक्षिप्त क्रियेने वेग कमी केला. त्यामुळे प्रवाहात निर्माण झालेल्या लहानशा खोबणीचा फायदा घेत जयाने माझ्या मनगटाला धरून मला ओढलं, आणि आम्ही पैलतीरी लागलो. माझ्या डोकीवर एक टोपली आणि त्यात बाळ असतं तर तान्ह्या कृष्णाला मथुरेतून गोकुळात स्मगल करण्याचा शीन उत्तम वठला असता.

ऑफिशियल वृद्धापकाळ किमान दोन दशकं दूर असताना असं हाताला धरून रस्ता ओलांडवायला लागणं हे म्हणजे अगदीच जिंदगीवर लानत असल्याचं लक्षण होतं. म्हणून मी बाणेदारपणे हा आशिष्टन् परत घ्यायचं नाकारलं. सकाळी रहदारी फुगायच्या आत मी रस्ता ओलांडून ऑफिसात जाई आणि संध्याकाळी ऑफिसकाळ सरला की परत येई.

आणि यामुळेच मला तिसरं गुरगाव जवळून बघता आलं. गेटबंद चकचकीत इमारती चकचकीत ठेवणाऱ्या कळकट मळकट लोकांचं गुरगाव.

सिक्युरिटी, ऑफिसातले चपराशी, वेटर, सफाई कामगार, घरगुती नोकर, ड्रायव्हर, छोट्यामोठ्या सेवासुविधा पुरवणारे विविध "वाले" यांचं जग तिसऱ्या गुरगावात राहतं. मोठ्या रस्त्यांना काटकोनात असणारे लहान रस्ते हे इथले मॉल आहेत. छोले-कुलचेवाल्यापासून मेवाड आईस्क्रीमवाल्यापर्यंत रेस्टॉरंट्स आहेत. जत्रा आहेत. 'खाटू श्यामजी' किंवा वैष्णोदेवीला निघालेल्या पदयात्रा आहेत.

जवळच्या सिगरेटी संपल्या म्हणून नवीन पाकीट मिळवायच्या मोहिमेवर मी अशाच एका काटकोनातल्या रस्त्याला वळलो. मुख्य रस्त्यावरचे उंच झगझगीत दिवे इथे नव्हते. खांबांवर बसवलेल्या ट्यूबलायटी होत्या. त्यामुळे तुलनेने थोडा अंधारच वाटत होता. रस्त्याच्या दुतर्फा खाद्यपदार्थांच्या हातगाड्या होत्या. काही पक्की दुकानं होती, पण त्यातल्या वस्तूही न लाजता बाहेर मांडल्या होत्या. बाहेरच्या रस्त्यावर बीएमडब्ल्यू किंवा तत्सम गाड्या होत्या. इथे टाटाचे डुक्कर टेम्पो बरेच दिसत होते. थोडं चालल्यावर पानाची टपरी दिसली, योग्य तो माल प्रथम हाती पाडून घेतला. वाटेत नाकाला एक परिचित वास आला, पण हा वास मला इथे येणं अपेक्षित नव्हतं. त्या वासाच्या मागावर निघालो. दहा मीटरवर एका गाड्याशी शोध संपला.

उघड्या गाड्यावर तीन बाजूंनी पांढरट पिवळ्या लहान लहान विटांची तटबंदी उभारली होती. त्या तटबंदीच्या आत आगीवर काही तरी उकळत असावं, कारण वाफा दिसत होत्या. केसांना मोठा रुमाल लावून एक आचारी काही खुडबुड करत होता. एक-दोन गिऱ्हाईकं ऑर्डर देऊन वाट बघत होती. गाड्याच्या बाजूला प्लॅस्टिकची लालेलाल स्टुलं मांडली होती. (अवांतर : अशा स्टुलांच्या मधोमध नाणं आरपार जाईल असं एक गोल भोक का असतं देव जाणे. मूळव्याध झालेल्या लोकांची सोय याशिवाय दुसरा उपयोग मला आजवर सुचला नाहीये.)

"मेगी खायेंगे साब?" एका बारा चौदा वर्षांच्या पोराने विचारलं. गाड्यावर 'इथे बालकामगार काम करत नाहीत' अशी पाटी अर्थातच नव्हती.

मेगी मला नको होतं, पण चहा चालणार होता. तटबंदीच्या आतून त्या पोराने तो आणून दिला. मी थोडा जवळ एका लाल स्टुलावर बसून तो भुरकू लागलो. तटबंदीच्या पांढरट पिवळ्या लहान लहान विटा हे इन्स्टंट नूडल्सचे ठोकळे आहेत हे तोपर्यंत माझ्या लक्षात आलंच होतं. या मेगीचा नेस्ले कंपनीच्या मॅगीशी संबंध नसावा. मेगी, मसाला मेगी, चीज मेगी, एग मेगी, असले प्रकार बनत होते. वास तरी अस्सल मॅगीच्या जवळ जाणारा होता. गाड्याच्या दुसऱ्या अंगाला मेगीचं होलसेलही चालू होतं. तिथे चक्क लहानशी रांग लागली होती. पांढरट पिवळ्या लहान लहान विटा वजनावर विकल्या जात होत्या. एका निळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत तो (किंवा त्यासारखा दिसणारा) विशिष्ट मसाला बांधून दिला जात होता. वजन विटांचं होत होतं, मसाला अंदाजपंचे मुठीमुठीने भरून दिला जात होता. काही खट गिऱ्हाइकं 'भिया'ला आणखी चिमूटभर मसाला बांधून द्यायला भाग पाडत होती.

या नूडल्स Sodlé कंपनीच्या असतील का असा एक भीषण विनोद उगाचच सुचून गेला.

ट्रॅफिक
अतिशय वाईट वाहतूकव्यवस्था असलेल्या शहरांत पुण्याचा दुसरा नंबर आल्याची बातमी परवाच वाचली. माझा मराठमोळा ऊर भरून आला आणि फुफ्फुसांच्या घडीत साठलेल्या जुन्या कार्बन मोनॉक्साईडला स्मरून मी अभिमानपूर्वक खोकलो. पुण्याचा शॉट कितीही वेगळा असला तरी वाहनांचा महासागर रस्त्यांवर असणे आणि थोडके किलोमीटर जायला भरपूर मिनिटं लागणे हे अनेक शहरांबाबत होतं. गुरगाव वेगळं नाही. गुरगावबाहेर राहणारे माझे सहकारी सकाळी साताला घर सोडतात म्हणजे नवापर्यंत त्यांची होडी ऑफिसाच्या काठाला लागते. गुरगावात राहणारे सहकारी आठाला सोडतात. तरी तासभर पुतळ्याच्या पोजमध्ये बसणं कोणालाच चुकलेलं नाही.

ट्रॅफिक

मला याची पुरेपूर कल्पना असल्याने दहा किलोमीटरच्या प्रवासासाठी मी दोन तास काढून ठेवतो. खिडकीतून बघायला काही नसेल तर कोणताही प्रवास कंटाळवाणा होतो. अगदी निरुपायाने चक्रधर आणि मी गप्पा मारतो.

एरवी मी रिक्षा/टॅक्सी ड्रायव्हरांशी गप्पा मारायला आपणहून पुढाकार घेत नाही. एक तर मी ग्राउंडशी जुडलेला राजकीय निरीक्षक, अंडरकव्हर पत्रकार, समाजमनाचा कानोसा घेणारा फेसबुकी लेखक, वित्त भांडवलाच्या चारित्र्याचा अभ्यासक, किंवा अरविंद अडिगा यांपैकी काहीच नसल्याने हे करायची मला कोणतीही खाज नाही. यावर माझी मंमं अवलंबून नाही. दुसरं असं, की रिक्षा/टॅक्सी चालकांसाठी मी दिवसातल्या शेकडो गिऱ्हाइकांपैकी एक. त्यांचं मुख्य काम प्रवाशाला अ ठिकाणाहून ब ठिकाणी वेळेत आणि सुरक्षित नेणं. या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये निरर्थक गप्पा मारणं ही सर्व्हिस येत नाही. शिवाय हा काही परदेश नाही, गिऱ्हाईकांची समाधानाची पर्वा करण्यासाठी. मी त्यांच्या जागी असतो तर लै वैतागलो असतो आणि बोलक्या गिऱ्हाईकाला फाट्यावर कोलायला 'नदीम श्रवण के १०१ नगमें' लावले असते. पण मुंगीच्या गतीने चालताना चक्रधरस्वामींना अन्य काही मनोरंजनापेक्षा माझ्याशी बोलणं सोपं वाटलं असावं.

मोठा आठ पदरी रस्ता होता. त्याच्या सगळ्यात कडेच्या पदराला अडवून मोठमोठे ट्रक उभे होते. ट्रकवाले बाहेर पडून लुंगीबिंगी लावून तंबाखू चोळत होते.

"ये जा क्यूँ नहीं रहे?" मी विचारलं.

"रात में निकलेंगे. अभी उन को अलाऊड नहीं है," स्वामी म्हणाले.

"क्यूँ?"

"अरे सर ये लोग एक बार निकल लिये तो पूरा रोड जाम कर देते हैं," स्वामी म्हणाले. "इनका नेसनल परमिट होता है ना, किधर भी निकल पडते है. टाइम पे डिलिवरी होनी चाहिये ना.."

"हाँ लेकिन यहाँ ऐसे सडक की साईड में बहुत टाइम रुके रहना होगा," मी म्हणालो.

"बहुत टाइम – कभी कबार अग्यारबारा घंटे," एक क्षणभर तो काहीच बोलला नाही. "इसीलिये तो ट्रकवालों का कोई घर नहीं होता साब."

"आप का घर कहाँ है?" मी विचारलं.

"वैसे घर पडता है लखीमपुर साईड में. आप ने सुना नहीं होगा नाम," त्याने मला उगाच सस्त्यात काढलं पण लखीमपूर बरेलीजवळ आहे ही माहिती काही कारणाने माझ्याकडे होती. हे त्याला सांगितल्यावर तो एकदम खुशीत आला आणि आपला आजवरचा प्रवास सांगू लागला.

ट्रकवर पोऱ्या म्हणून त्याने सुरुवात केली. पुढे ट्रक ड्रायव्हर होण्यापर्यंत मजल मारली. पण ते आयुष्य त्याला जगायचं नव्हतं. "परिवार बनाना चाहता था." ओळखीपाळखीतून गुरगाव भागात शिफ्टवर टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम मिळालं. पुढे त्या मालकाने याला काढून टाकलं पण तोवर याला सिस्टीम समजली होती. गुरगावात एके ठिकाणी टॅक्सी ड्रायव्हर लोकांचा मजूर अड्डा भरतो. तिथे ड्रायव्हरी करू शकणारे लोक गोळा होतात. टॅक्सी कंपन्यांचे सबकॉन्ट्रॅक्टर, किंवा सबकॉन्ट्रॅक्टरचे सबकॉन्ट्रॅक्टर तिथे येऊन शिफ्टसाठी ड्रायव्हर भरती करतात.

"तो आप ये शिफ्ट पे चलाते हैं?" मी विचारलं. गाडी शिफ्टची वाटत नव्हती, कारण देवाच्या तसबिरी, पडदे वगैरे वैयक्तिक सजावट दिसत होती. शिफ्टच्या गाड्या इम्पर्सनल दिसतात.

"अरे नहीं, ये पुरानी बातें हैं, दस साल पुरानी. फिर ये उबरवाला मालिक मिला, और उसकी ये गाडी चलती है बारा घंटे."

"आपही के पास रहती है?"

"नहीं जी – आधा टाइम गाडी खडी रखेंगे तो प्राफिट कैसे बनायेगा मालिक? रात के आठ बजे जोडीवाला ले जाता है. मैं सुबह आठ बजे उस से वापस लेकर आता हूँ."

म्हणजे गाडी चोवीसही तास रस्त्यावर पळत होती!

रूम

"आप का परिवार कहाँ है? लखीमपूर?"

"जी नहीं जी, अभी लखीमपूर में कुछ नहीं रख्खा, कोई नहीं उधर." क्षणभर बाहेर पाहून तो म्हणाला. "इधर एक रूम ले के रख्खा है."

'रूम'बद्दल त्याने आणखी माहिती दिली. गुरगावच्या सीमेवर एका उपनगरात ती रूम होती. तिथे हा, बायको, आणि दोन मुलं असे राहात होते. त्याला मुलांना अंग्रेजी इसकूलमध्ये घालायचं होतं पण रूमजवळ तशी 'चांगली' शाळा नव्हती.

मला एकाएकी जाणवलं, तो सतत 'रूम' म्हणत होता. 'घर' नाही.

कॉकटेल आणि ठेका

सहकर्मचाऱ्यांबरोबर जेवायला जाणे ही गोष्ट कॉर्पोरेट जगात टाळता येत नाही. "या नीचासोबत तुकडा मोडायला नको" असं वाटवून देणारे लोक असले तरी पर्याय नसतो. कॉर्पोरेट जगात प्रत्येकावर 'टीम प्लेयर' असायची अघोषित सक्ती आहे. माफक मद्यपान करून लौकर कटणे बऱ्याचदा उत्तम. मी पाव्हणा असल्याने माझ्याच सन्मानार्थ जेवायला जायचं होतं. शिवाय मला परत हॉटेलवर एक सहकारीच सोडणार होता. त्यामुळे संपूर्ण वेळ थांबणं भाग होतं.

रेस्टोरंट मोठ्या मॉलमध्ये होतं (आणखी कुठे असणार?) नव्या कोऱ्या जागेला जुनं रूप देऊन इराणी हॉटेल पद्धतीच्या खुर्च्या वगैरे होत्या. माझ्या एका सहकाऱ्याला कॉकटेल घ्यायची इच्छा झाली. मेन्यू उघडून पाहिला तर त्यात 'इमली जिंजर मार्गारिटा', 'जलजिरा जिन अँड टॉनिक', 'चाय ओल्ड फॅशन्ड' वगैरे भीषण आर्यांग्ल प्रकार होते. फ्युजन अन्न ही संकल्पना बुद्धीला कितीही वेधक वाटली तरी त्या फ्युजनकल्पनेचं चविष्ट पदार्थांत रूपांतर करू शकणारे लोक फार फार कमी असतात. त्यामुळे मी आपला पारंपरिक कॉकटेल्सना आश्रय देतो. पण हे लॉजिक पटणारे लोक फार कमी सापडले आहेत. सहकाऱ्याने 'वॉटरमेलन ब्ल्यू लगून' घ्यायचं ठरवल्यावर मी त्याचा नाद सोडला, आणि 'मॉस्को म्यूल' हे यादीत सापडलेलं एकमेव पारंपरिक कॉकटेल मागवलं.

'मॉस्को म्यूल' म्हणजे व्होडका, जिंजर एल (अर्थात आल्याच्या चवीचा सोडा), आणि लिंबू यांचं मिश्रण. अगदीच लाडात आला असाल तर त्यात पुदिन्याची डहाळी खोवतात. हे सगळं प्रकरण एका तांब्याच्या मगात भरतात आणि बर्फ घालून देतात. फारच हुच्च्य हाटेल असेल तर मगाचा कान पितळी असतो. ("हे असंच का?" असं कॉकटेलशास्त्रात विचारत नाहीत.) नावात मॉस्को असलं तरी हे कॉकटेल अमेरिकी आहे. त्याबद्दल अशी स्टोरी सांगतात की न्यू यॉर्कमधल्या कोणत्याश्या गुत्त्याकडे नव्या दारूची डिलिव्हरी येणार होती. पण त्यांच्याकडे मद्य साठवायला मर्यादित जागा होती, आणि त्यात व्होडकाच्या बाटल्या आणि जिंजर एलचे बुधले उरले होते. ते एकदाचे संपवण्यासाठी म्हणून त्यांनी व्होडका जिंजर एलमध्ये घालून विकायला सुरुवात केली. आता त्याला तो तांब्याचा गलास कोणी चिकटवून दिला काय माहीत. गेल्या दोन वर्षांत या कॉकटेलला काही 'वोक घराण्या'तल्या लोकांनी 'किएव्ह म्यूल' म्हणायला सुरुवात करून पुतीनवर सूड घेतला आहे. पुतीनचा पाडाव होईल तो अशाच लोकांमुळे. सलाम आहे. पण एकंदरीत हे पेय लोकप्रिय आहे यात वाद नाही. शिवाय तयार करायला फार बुद्धी लागत नाही, त्यामुळे बिघडायची शक्यताही कमी.

या गुरगावी रेस्टोरंटाने त्याचे तब्बल सतराशे रुपये लावायचा मानस उजव्या बाजूला जाहीर केल्याने मला धक्काच बसला. अर्थात रुपये सतराशे गुणिले माझी कपॅसिटी भागिले २०० मिली माझ्या खिशातून जाणार नसल्याने मी निवांत होतो. पण या किमतीबद्दल आश्चर्य व्यक्त करताच मला घरी सोडणारा माझा होष्ट एकदम पेटला. या (आणि इतर) रेस्टोरंटच्या सुलतानी दरपत्रकाबद्दल कडक निषेध करून झाल्यावर त्याने मला "मैं बाद में आप को एक हैरतंगेज जगह ले चलता हूँ" असा मानस जाहीर केला. "वो जगह अजीबोगरीब है – मतलब अजीब भी है और गरीब भी" असं सांगून माझी उत्सुकता फारच ताणली.

सुलतानी दरात जेवण करून झाल्यावर योग्य ते हाहाहीही करून आम्ही काढता पाय घेतला. अजून एक सहकारी हैरतंगेज जगहला यायला उत्सुक असल्याने त्यालाही गाडीत जमा केलं आणि आम्ही निघालो. काटकोनांतल्या गुरगावी रस्त्यांवरून सुमारे वीस मिनिटं गेल्यावर त्याने एका ठिकाणी गाडी उभी केली आणि आम्हांला गाडीतच बसायला सांगितलं.

गुरगाव किंवा चंडीगड किंवा गांधीनगरसारख्या योजनाबद्ध शहरांत किंवा सैनिकी छावणी (कॅन्टोन्मेंट) शहरांत एक विशिष्ट रचना असते. त्यात सगळी दुकानं एका गोल भागात एकत्र करून ठेवलेली असतात. त्याला 'अमुकतमुक सेक्टरचे मार्केट' वगैरे नाव असतं. त्यात उडप्याच्या हॉटेलपासून ते फाफडा गाठीया विक्री केंद्रापर्यंत काहीही असू शकतं. अशाच एका मार्केटमध्ये – किंवा मार्केटच्या मागच्या बाजूच्या मैदानात – त्याने गाडी उभी केली होती. रात्री उशीराची वेळ असल्याने सगळीकडे सामसूम होती, पण आमच्यासारख्या गाड्या जागोजाग उभ्या होत्या. त्यातले लोक जा-ये करत होते ती मार्केटमधल्या एका गाळ्याची मागची बाजू होती.

सहकारी थोड्या वेळात परतला. त्याच्या सोबत एक जेमतेम विशीचा मुलगा होता. त्याने लॅमिनेट केलेली दोन कार्डं आम्हांला दिली. त्यांतल्या एकावर अनेक प्रकारच्या दारवा आणि त्यांचे ६०-९०-क्वार्टर-फुल असे भाव लिहिले होते. तळाशी 'फुल १००० मिली' आणि 'हमारे यहाँ हर माल असली होता है, आश्वस्त रहिये' अशा टिपाही होत्या. दुसऱ्या कार्डावर चक्क वेगवेगळी कॉकटेल्स होती! ब्लडी मेरीपासून ते मार्टिनीपर्यंत. (शेकन असावी की स्टर्ड याबाबत काही टीप सापडली नाही.) किमती माझ्या मते जरा चढ्याच असल्या तरी त्या मॉलच्या मानाने फुटकळ होत्या.

माझ्या चेहऱ्यावरचा धक्का बघून सहकारी मनमुराद हसत होते.

"हॅ नी हॅ अजीबोगरीब?" त्याने विचारलं. "इस ठेके पे बडी हस्तियां मिल जाती हॅ." त्याने एकदोन राजकारण्यांची नावं घेतली. एक दोन रील्सतारकांची. शिवाय आमच्या गुरगावी हापिसातला सगळा सी-स्वीट इथे भेटू शकतो अशीही अमोलिक माहिती मिळाली. त्या दोन सहकाऱ्यांत काही वेळ कोणी कोणाला कोणाबरोबर पाहिलं याची 'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला' धर्तीची चर्चा रंगली. बाहेर तो विशीचा मुलगा शांतपणे आमची वाट पाहात उभा होता.

"दारू असली तो हॅ ना भई?" मी एकदा विचारून घेतलं. त्यावर 'हांजी बिलकुल असली' असल्याचा दिलासा मिळाल्यावर शेवटी उडी घ्यायचं ठरवलं. तसा मी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून असतो – तुलना करायची ही संधी मी सोडणार नव्हतो. दुसऱ्या कार्डावर असलेली 'मॉस्को म्यूल' मागवली. किंमत रुपये दोनशे.

प्लॅस्टिकच्या डिस्पोजेबल ग्लासातून आलं.

स्टराईल

कॉलेजमधली गुरगावला नोकरी धरणारी ती मैत्रीण अजून इथेच होती असं कळलं. वत्सापी ढोसल्यावर जुना मित्र भेटल्याने तिला आनंद झाला, आणि तिने जेवायला घरी बोलावलं.

मध्यंतरी तिचं लग्न झाल्याचं मला समजलं होतं. तिचा नवरा एका फर्निचरच्या बहुराष्ट्रीय कंपनीत याचा-नाही-तर-त्याचा इंडिया हेड होता, आणि ही वेगळ्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत अमक्यातमक्याची रीजनल हेड होती. (हे उल्लेख भूतकाळात केल्याचं कारण पुढे समजेलच.) त्यांना एक मुलगा आहे – इयत्ता दुसरी.

मुलासाठी (पुस्तक) खाऊ घेऊन ठरलेल्या वेळेला तिच्या घरी पोचलो. उभयतांच्या हेडत्वाला साजेशा एका गेटबंद चकचकीत टोलेजंग इमारतीत ती राहात होती. महादरवाजाची कवाडे उघडायचा कोड तिने मला अगोदरच देऊन ठेवल्याने रखवालदाराची पारखी नजर टाळून मी थेट लिफ्टपाशी पोचलो. मैत्रिणीने मला "खाली आलास की फोन कर" असं सांगून ठेवलं होतं. तसा केला.

मी वर पोचलो तर माझी वाट पाहात मैत्रीण दाराबाहेर उभी होती. तिच्या हातात एक पुडकं होतं. मी "कशाला कशाला गिफ्ट वगैरे" असले सभ्य उद्गार काढणार तितक्यात मी त्या पुडक्यावरचं नाव वाचलं. गुन्हा होतो त्या ठिकाणी वापरतात तसला 'नॉडी सूट' होता. शिवाय त्याच मटेरियलचे मोजे आणि डोक्यावर घालायची, केस झाकले जातील अशी टोपी.

तिची अशी अपेक्षा होती की मी कपड्यांवर ही सगळी झूल घालून मगच आत यावं.

"सांगते सगळं नंतर.." ती म्हणाली, आणि तिने ते पुडकं हातात टाकलं.

आत तिचा मुलगा होता. मलूल झालेला, हालचाली मंदपणे करणारा. त्याला बालदमा आहे. अधूनमधून त्याचे अटॅक येतात. दोनच दिवसांपूर्वी असा झटका आला, इतका की मध्यरात्री हॉस्पिटलकडे धाव घ्यायला लागली.

"इथली हवाच भिकारचोट आहे रे.." ती हताशपणे म्हणाली. "सॉरी हां – तुला हे सगळं करायला लावते आहे."

संसर्गापासून जपायला लागतं. हॉस्पिटलचा सीन नुकताच झालेला, आणि आज मी परका माणूस घरी येणार म्हणून ही काळजी.

"अगं माझं एक ठीक आहे, पण असं किती जपत बसणार? शाळेत? रस्त्यावर?"

"हो ना रे. बघवत नाही हा प्रकार, एकदा अटॅक आला की. डॉक्टर परवा स्पष्ट म्हणाला – त्याच्यासाठी तरी तुम्ही गुरगाव सोडून जा."

"मग?"

"मग काय? बघतो आहे दुसरीकडे."

या घटनेनंतर तीन महिन्यांत हे कुटुंब बंगळुरूला स्थलांतरित झालं.

ऊन पाऊस

एक अविस्मरणीय गुरगावभेट ऐन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झाली. इंदिरा गांधी विमानतळावर उतरलो तेव्हा मध्यरात्र होती – दीड-दोन वाजलेले असावेत. तापमान होतं ३४ अंश सेल्सियस. माझ्या अंगावरच्या कपड्यांचा त्वरित काला झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता तापमानाने चाळीशी कधीच ओलांडली होती. कदाचित पंचेचाळीशी. हॉटेल-रस्ता-ऑफिस या ५०० मीटरच्या पायी प्रवासात मला उष्माघात होईल की काय अशी खरोखरची भीती वाटायला लागली. संध्याकाळी साताच्या आसपास परत निघालो तेव्हा सूर्य मावळला होता, पण तापमान चाळीसपेक्षा फार खाली गेलं नव्हतं. एका दुपारी सहकाऱ्याच्या कारमधून काही तरी आणण्यासाठी गेटापाशी गेलो. तेव्हा त्याच्या गाडीतला तापमापक ५०.५ अंश दाखवत होता.

भल्या पहाटे ऑफिसला जाणं आणि उशीरा हॉटेलवर येणं हा उपक्रम मी याही कारणासाठी जारी ठेवला. तरी परत आल्यावर एका थंडगार बियरने शरीराचं तापमान कमी करायला लागत असे.
"इस साल सूर्यनारायण का प्रकोप बहुत ज्यादा है.." आमच्या हापिसातले एक शुद्ध गायीच्या तुपात तळले गेलेले 'पाण्डेऽयजी' म्हणाले. ते तसे लोकांना हाशिवणारे चतुर आहेत. माझ्या नावाचा अर्थ सूर्य असल्याने मला कसा त्रास होणार नाही यावर अपेक्षित कोटी त्यांनी केलीच.

"बारिश कब होगी पाण्डेऽयजी?" डे आणि य मध्ये त्यांनी शिकवल्याप्रमाणे हेलकावा देत विचारलं.

"जुलाई या तो फिर अगस्त आना आप." मी काही इतके दिवस राहणार नव्हतो. पण एकदा खरोखर अगस्तमध्ये जायची वेळ आली.

तेव्हा इतका पाऊस पडला की रस्ते तुंबले.

अपूर्णात्...

माझ्या आयुष्यातली गुरगावी संपली नाहीये. संध्याकाळी गुरं गोठ्याकडे परततात तसं हे गुरूही गुरगावला परतेल. गुरगाव फाईल्समध्ये आणखी कपटे जोडले जातील. तोपर्यंत अपूर्णविराम.

विशेषांक प्रकार

तिरशिंगराव Fri, 01/11/2024 - 07:13

गुरगांव बद्दल इतकी सखोल माहिती नव्हती. नेहमीप्रमाणेच खुसखुशीत भाषेत. धन्यवाद!

'न'वी बाजू Fri, 01/11/2024 - 08:29

दिवाळी अंकाचे सार्थक झाले. उर्वरित तमाम दिवाळी अंक प्रस्तुत लेखावरून ओवाळून फेकून द्यावा.

बाकी, लेखातल्या एकदोन (तुलनेने मामुली) जागांबद्दल (काहीश्या असंबद्ध) कमेंटा/(तळ)टीपा ठोकायच्या आहेत (जित्याची खोड!), परंतु पुन्हा केव्हातरी सवडीने. तूर्तास, ‘लेख आवडला’ हे कळविण्यापुरती ही केवळ पोच.

'न'वी बाजू Wed, 06/11/2024 - 08:48

In reply to by 'न'वी बाजू

गुरगाव हे नाव प्रथम कधी ऐकलं असा विचार केला तर स्मृतीला ताण देऊनही इ. स. २००० अगोदर आठवण खेचता येत नाही. अर्थात, पश्चिम महाराष्ट्रात राहणाऱ्या ममव माणसाच्या अनुभवविश्वाची ही मर्यादा आहे हे खरंच.

विदाबिंदू #१.
संजय गांधींची 'मारुति मोटर्स' गुड़गांवात सुरू झाली होती, असे आठवते. ही 'मारुति मोटर्स' बोले तो आजचा 'मारुति उद्योग' (किंवा आता त्याला जे काही म्हणत असतील ते) नेमका नव्हे, तर त्याची पूर्वावृत्ती. आजचा 'मारुति उद्योग' प्रत्यक्षात बऱ्यावाईट गाड्या बनवून विकतो. 'मारुति मोटर्स'ने फक्त 'गाड्या बनवणार, बनवणार' म्हणून कित्येकांकडून भांडवली पैसा गोळा करून, प्रत्यक्षात फारसे काही न करता, पैसे गुंतविणाऱ्यांना चुना लावला. आणीबाणीचा जमाना तो. पुढे इंदिरा गांधींचे सरकार हापटून नंतर आणीबाणीतल्या एकेका गैरप्रकाराची चौकशी होऊन ज्या बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या, त्यात 'मारुति मोटर्स' प्रकरणाचाही बराच गवगवा झाला.

(पुढे जनता सरकार हापटून कालवशात् इंदिरा गांधींचे सरकार पुन्हा आल्यावर, कालांतराने भारत सरकारने पैसा ओतून 'मारुति उद्योग'चे पुनरुज्जीवन केले, आणि हा 'मारुति उद्योग' या वेळेस (जपानी तांत्रिक सहकार्याने) खरोखरच मोटारी बनवून विकू लागला. तर ते एक असो.)

तर सांगण्याचा उद्देश, आणीबाणीनंतर जनता सरकार आल्यानंतर आणीबाणीतल्या बाहेर आलेल्या भानगडींचे जे रिपोर्टिंग तत्कालीन वर्तमानपत्रांतून होत होते, त्यात कधीतरी, या 'मारुति मोटर्स'च्या संदर्भात आम्ही 'गुरगाव' हा शब्द आयुष्यात सर्वप्रथम ऐकला. (खरे तर, वाचला. आणि, मराठी पेपरांतून तो 'गुरगाव' असाच छापला जात असे.) इसवी सन १९७७-७८च्या सुमारास. तेव्हा आम्ही पश्चिम महाराष्ट्रात राहात होतो, नि ममव होतो.

विदाबिंदू #२.
त्यानंतर फास्ट फॉर्वर्ड करू या सन १९८१-८२कडे. (खरे तर 'रिवाइंड करू या' म्हटले पाहिजे. का, ते पुढे पाहू.) आम्ही दहावी पास होऊन, महाराष्ट्रात ज्याला 'ज्युनियर कॉलेज' म्हणतात, त्यात दाखल झालो होतो. (१०+२+३ पॅटर्नवाली जी जी म्हणून राज्ये तथा प्रदेश त्या काळी होते, त्यांपैकी अकरावी-बारावीला ('ज्युनियर' का होईना, परंतु) 'कॉलेजा'त गणणारी बहुधा महाराष्ट्र आणि (तत्कालीन) आंध्रप्रदेश ही दोनच राज्ये तेव्हा अस्तित्वात असावीत. इतरत्र बहुतकरून सर्वत्र (आणि विशेषेकरून दिल्लीत वगैरे) ही दोन वर्षे शाळेतच गणली जात. तर ते एक असो.) मिसरुडांची फूट जरी जेमतेमच असली, तरी, शिंगे चांगली फूटभर फुटली होती. आपण आता 'कॉलेजा'त आलो आहोत, आणि 'कॉलेजा'त लेक्चरे ही बंक करण्यासाठीच असतात, हे तत्त्व डोक्यात, नसांनसांत, हाडीमाशी आणि रक्तात भिनलेले होते. त्यामुळे, लेक्चरांच्या वेळांत आम्ही (अनुक्रमे) (१) कॉलेजच्या कँटीनमध्ये, (२) कॉलेजाजवळच्या उडप्यांकडे, तथा (३) फारच कंटाळा आला (अथवा कडकी असली), तर कॉलेजच्या रेफरन्स लायब्ररीत पडीक राहत असू. (टाइमपासकरिता रेफरन्स लायब्ररीसारखी दुसरी जागा नाही. अभ्यासाची सोडून इतर (नाही नाही ती) पुस्तके चाळण्यात छान वेळ जातो. तर तेही एक असो.)

तर असेच एकदा आम्ही, नक्की का, ते आठवत नाही, परंतु, रेफरन्स लायब्ररीत पडीक होतो. चाळण्याकरिता म्हणून एक असाच भलताच कुठलातरी बऱ्यापैकी पुरातन असा (म्हणजे साधारणत: स्वातंत्र्यानंतर, परंतु पूर्व पंजाबचे विभाजन होऊन पंजाब आणि हरयाणा अशी दोन वेगळी राज्ये अस्तित्वात येण्यापूर्वीच्या काळात प्रकाशित झालेला; बहुधा १९५० किंवा १९६०च्या दशकातला असावा.) कोश समोर घेतला होता. (नक्की आठवत नाही, परंतु बहुधा 'मराठी भाषेतील अश्लील म्हणीं'चे संकलन वगैरे असावे. त्या काळात अशी अत्यंत गंभीरपणे केलेली अभ्यासपूर्ण संकलने पुष्कळ होत असावीत. सरकारी ग्रांट मिळत असावीसे वाटते. असो; कोश रोचक होता खरा, परंतु तूर्तास प्रस्तुत संदर्भात ते महत्त्वाचे नाही.) तर त्या कोशात अधूनमधून जाहिरातीही होत्या. (मला वाटते त्या काळात हे पुष्कळ चालत असावे.) तर त्या जाहिरातींपैकी एक आजही लक्षात राहिली, ती म्हणजे 'बँक ऑफ महाराष्ट्र'ची. किंबहुना, त्या जाहिरातीतले एकच वाक्य आजही लक्षात आहे, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. ते वाक्य म्हणजे, 'पंजाबात गुरगाव येथे शाखा.'

(कदाचित, 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या तत्कालीन मर्यादित विस्तारात, महाराष्ट्राबाहेरची त्यांची ती एकमेव शाखा असावी की काय, नकळे. अन्यथा, इतके मिरवून (नि प्रकर्षाने) सांगण्याचे प्रयोजन नव्हते. बहुधा दिल्लीत काढणे जमले नसेल, नि म्हणून दिल्लीच्या त्यातल्या त्यात जवळ म्हणून काढली होती की काय, कोणास ठाऊक. मात्र, त्या काळात त्याचे वर्णन 'दिल्ली परिसरात' असे करणे कदाचित सयुक्तिक झाले नसते, असे वाटते. काही का असेना, त्या जाहिरातीत असे वाक्य होते खरे.)

आता, १९८१-८२ सालीसुद्धा आम्ही पश्चिम महाराष्ट्रातच राहात होतो, आणि ममवच होतो, हे खरेच. परंतु, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, १९५०-६०च्या दशकांत (आणि कदाचित अजूनसुद्धा) 'बँक ऑफ महाराष्ट्र' ही पश्चिम महाराष्ट्रात राहणारी एक (मनाने) ममव बँक होती.

म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रातल्या ममवच्या अनुभवविश्वाच्या स्मृतीला मागे ताणायचेच, म्हटले, तर इ.स. २०००च्या बऱ्याच अगोदरपर्यंत, कदाचित १९५०-६०च्या दशकांपर्यंत मागे खेचता यावे. १९५०-६०च्या दशकांत कधीतरी 'बँक ऑफ महाराष्ट्र' या पश्चिम महाराष्ट्रातल्या ममव बँकेने 'गुरगाव' हे नाव नुसते ऐकलेच नव्हते, तर ती तेथे कार्यरतसुद्धा होती!

विदाबिंदू #३.
आता, वास्तविक, वरील विदाबिंदू #२. मांडल्यानंतर, प्रस्तुत विदाबिंदू #३. मांडण्याचे काहीही प्रयोजन नाही. कारण, त्याने स्मृती आणखी मागे खेचली जात नाही, त्यामुळे, नवे असे काहीही साध्य (अथवा सिद्ध) होत नाही. परंतु तरीही, प्रस्तुत विदाबिंदू हा तुमच्या इ.स. २०००च्या बेंचमार्कच्या बऱ्याच अगोदरचा असल्याकारणाने (आणि, तसेही, आमची स्मरणरंजनाची खाज म्हणून), मांडतोच.

इ.स. सुमारे १९८५ किंवा ८६. इंग्रजी भाषेतील 'द हिंदू' या दक्षिणी वर्तमानपत्राने तेव्हा नुकतीच आपली नवीकोरी दिल्ली आवृत्ती सुरू केली होती. त्या काळात आम्ही वसतिगृहात राहात असू. दिल्लीत जरी नसलो, तरी दिल्लीत भल्या सकाळी वितरित होणारी वर्तमानपत्रे सकाळी साधारणत: ११ ते मध्यान्हीपर्यंत हाती पडण्याइतक्या वितरणपरिघात होतो. दुपारी लंचला मेसला जाण्याअगोदर पेपर हातात पडत.

त्या काळात, वसतिगृहातल्या आमच्या १२ जणांच्या विंगेत, समाईक-वर्गणी-तत्त्वावर आणि परस्परदेवघेवीच्या बोलीवर एक 'टाइम्स' आणि एक 'एक्स्प्रेस' अगोदरच फिरत असत. त्यात पुन्हा आमच्या विंगेत बहुतांशी दाक्षिणात्यांचा भरणा असल्याकारणाने, त्यात ही 'द हिंदू'ची नवी भर त्वरित पडली. (आम्हाला काय, क्रॉसवर्डांवर तासन्‌तास घालवायचे, त्याकरिता आणखी एक पर्याय वाढला!)

तर सांगण्याचा मतलब, 'द हिंदू'ची ही आवृत्ती अधिकृतरीत्या 'दिल्ली आवृत्ती' जरी म्हणवली जात असली, तरी प्रत्यक्षात गुड़गांवात छापली जाऊन तेथूनच प्रसिद्ध होत असे. (माझी स्मृती जर दगा देत नसेल, तर, तेव्हा खरे तर 'एनसीआर' वगैरे बनला नव्हता; पुढेमागे कधीतरी तो बनणार, अशी केवळ हवा होती.) आणि हो, तेव्हा जरी आम्ही शरीराने पश्चिम महाराष्ट्रात (तात्पुरते) राहात नसलो, तरी आमचा 'पर्मनंट ॲड्रेस' हा 'पिन कोड ४११ ०३०' मध्येच होता. (सत्रभरात आम्ही काय दिवे लावले याचा रिपोर्ट पोष्टाने, आणि दस्तुरखुद्द आम्ही आगगाडीने, सत्राअखेर तेथे बरोबरच टपकत असू.) आणि, आम्ही तेव्हासुद्धा ममवच होतो.

असो चालायचेच.

गवि Wed, 06/11/2024 - 09:15

In reply to by 'न'वी बाजू

#विदाबिंदू ४

हेराफेरी या २००० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात घनश्याम (सुनील शेट्टी) आणि बाबूराव आपटे (परेश रावल) यांच्या पहिल्याच भेटीत घनश्याम गुडगावहून आलेला आहे असे कळते आणि बाबूराव गुडगाव हे नाव ऐकताच वहा का लोग गुड जैसा मीठा होनेका.. असे सर्टिफिकेट देतो. म्हणजे अगोदर देखील गुडगावहून येणाऱ्या लोकांचा त्याला अनुभव असावा. यातही मारूती आहे. घनश्याम हा मारुती राव नामक रेस्टॉरंट मालकाच्या रेफरन्सने आलेला असतो. २०००च्या आधीचा संदर्भ नसला तरी बरोब्बर दोन हजारचा आहे.

'न'वी बाजू Sat, 16/11/2024 - 00:19

In reply to by 'न'वी बाजू

आता या आजूबाजूच्या सगळ्या भागालाही 'गुरगाव'च म्हणू लागले. स्थानिक बोलीत 'गुड़गाँव'.

‘गुड़गांवां’ नव्हे काय? (का कोण जाणे, पण माझ्या कानांना तसे ऐकू आल्यासारखे वाटते. अर्थात, माझी आठवण साधारणपणे पस्तीस-चाळीस वर्षे जुनी असावी; त्यानंतर त्या बाजूशी संबंध आलेला नाही. आणि, खुद्द गुड़गांवांत जरी कधीही गेलेलो नसलो, तरी, त्या बाजूच्या आणि तत्सम बोली एके काळी उडतउडत का होईना, परंतु कानांवरून गेलेल्या आहेत. असो.)

आणि नंतर कधीतरी संस्कृतीकरणाच्या कमंडलूत बुचकळून पवित्र झालेलं 'गुरुग्राम'.

हे म्हणजे, ‘मूळ नावां’चा आग्रह धरायचा, नि त्या नावाखाली ‘पुण्या’चे (‘पुनवडी’ऐवजी) संस्कृतीकरण करून ‘पुण्यपत्तन’ (किंवा अगदीच नाही तर ‘पुण्यनगरी’) करायचे, तशातली गत आहे. चालायचेच.

(वास्तविक, (आघातहीन) ‘पुण्या’चा (आघातासह) ‘पुण्या’शी (आणि व्हाइसे व्हर्सा) काही तरी संबंध आहे काय? पण लक्षात कोण घेतो?)

ही मैत्रीण गुरगावी गेली आणि गुप्त झाली. म्हणजे तिला कोणी किडन्याप करून तुकडे करून तंदुरीत टाकले वगैरे असलं काहीही झालं नाही.

माझ्या आठवणीत, तसला प्रकार फक्त एकदाच जो झाला होता, तो १९९५ साली (मी त्या भागांत — किंबहुना, भारतातसुद्धा — असताना नव्हे!) आणि तोदेखील प्रॉपर नव्या दिल्लीत झाला होता, गुड़गांवांत नव्हे. (फारच notorious झाली होती तेव्हा ती घटना.) त्यानंतर पुन्हा असे काही घडल्याचे ऐकिवात नाही.

(सांगण्याचा मतलब, गुड़गांवांची बाजू घेण्याचा उद्देश नाही, आणि गुड़गांवांबद्दल विशेष प्रेमदेखील नाही, परंतु, उगाच गुड़गांवांला नसत्या गोष्टीवरून बदनाम करू नका राव! आता एनसीआरचा भाग असले, म्हणून काय झाले? दिल्ली दिल्ली आहे, नि गुड़गांवां (किंवा बिगरदिल्ली) गुड़गांवां (/बिगरदिल्ली) आहे.)

(उलटपक्षी, ब्राइडबर्निंग हा प्रकार दिल्लीत (निदान पूर्वी तरी) सामान्य असावा. एके काळी, दिल्लीहून येणाऱ्या दररोजच्या पेपरातल्या ‘छोट्या बातम्यां’मध्ये, ब्राइडबर्निंगच्या तीनचार बातम्या तरी किरकोळीत असायच्या, असे आठवते. कदाचित, दिल्लीच्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग (‘अटूट अंग’ की काय ते) असावा. अर्थात, ‘तंदूर मर्डर केस’ हा प्रकार ब्राइडबर्निंगचा नव्हता, तर, (बायकोचा) खून करून नंतर मग प्रेताची विल्हेवाट लावण्याचा डेस्परेट प्रयत्न होता. आणि, राजकारणातल्या लोकांशी संबंधित असल्याकारणाने, राष्ट्रभरातून पहिल्या पानांवर झळकला. अन्यथा, ‘स्थानिक आवृत्ती’च्या आतल्या पानांमध्ये, ‘पानपूरणार्थां’त किरकोळीत गुंडाळला गेला असता कदाचित. कोणास ठाऊक. रोज जळे, तिला कोण रडे? चालायचेच!)

(अवांतर: ‘पर कॅपिटा रेप’ (श्रेय: घासूगुर्जी.) ही (स्टॅटिस्टिकल) कॉन्सेप्ट म्हणून आपल्याला भयंकर वाटते; ‘पर कॅपिटा ब्राइडबर्निंग’ या (संख्याशास्त्रीय) संकल्पनेचे (निदान तत्कालीन तरी) दिल्लीकरांना बहुधा फारसे काही वाटत नसावे. होता है!)

(किंबहुना, मध्यंतरी दिल्लीत जे ‘निर्भया’ प्रकरण घडले, ते भयंकर, धक्कादायक, नि घृणास्पद होते खरे. मात्र, ते दिल्लीत घडले, याबद्दल अजिबात आश्चर्य वाटले नाही. (दिल्लीत घडले नसते, तर कदाचित दिल्ली विनाकारण खुशनाम झाली असती.) असो.)

(But, I digress. हे सगळे (प्रॉपर) दिल्लीत घडले. त्यावरून गुड़गांवांला नाहक बदनाम करण्यात हशील दिसत नाही. गुड़गांवांला बदनाम करण्याकरिता गुड़गांवां-स्पेसिफिक मुद्दे शोधल्यास भरपूर सापडतील, याबद्दल मन्मनास यत्किंचितही शंका वाटत नाही.)

'उर्मट गुरगावी' हे 'पिवळा पितांबर' म्हटल्यासारखं आहे.

‘हरयाणवी माज’ ही काही और चीज आहे. गुड़गांवां हरयाणात आहे. तस्मात्… (मानव-मर्त्य-सॉक्रेटिस-मानव-न्याय.)

एके काळी दिल्लीतल्या स्थानिक बसचे कंडक्टर हे बहुतकरून हरयाणवी जाट असत. (कदाचित अजूनही असतील.) त्या मंडळींपुढे आपल्या पुण्यातल्या ‘पीएमटी’चे (आता ‘पीएमपीएमएल’) कंडक्टर म्हणजे साक्षात सौजन्यमूर्ती मानावे लागतील.

फार कशाला, ‘हरयाणा रोडवेज’च्या (पक्षी: हरयाणाची एसटी.) (तत्कालीन) ‘निळ्या डब्यां’शी एके काळी पुष्कळच पाला पडलेला आहे, एवढेच सांगून मी आपली रजा घेतो.

गुरगावी बोलीत 'है'चा 'हॅ' होतो हॅही जाता जाता सांगतो.

(आमचेही ‘जाता जाता’: ‘ळ’ या व्यंजनाचा (बोलीभाषेत) प्रादुर्भाव जाणवला की नाही?)

असो. (तूर्तास) इत्यलम्.

प्रभुदेसाई Fri, 01/11/2024 - 08:35

अत्यंत खुशखुशीत. मला वाटतं कि सर्व शहरांची हीच अवस्था असावी. गुरगाव हे एक प्रातिनिधिक आहे. अशा शहरांच्या लिबलिबीत अंडरबेलीची सहल. छान लिहिले आहे.

गवि Fri, 01/11/2024 - 13:14

ऐसी दिवाळी अंक अतिशय दर्जेदार असणार हे सांगावे लागत नाही. या उत्तम लेखाने वाचनाची सुरुवात झाली. एकेक वाचणे चालू आहे.

जगभर फिरत असताना डोळे आणि एकूण सर्व सेन्सेस उघडे ठेवून निरीक्षक म्हणून असे आसपासचे जग टिपत जाणाऱ्या व्यक्तीला एक लेखक म्हणून कधीही रसद अपुरी पडत नाही.

अभिनंदन आदूबाळ.

आणखी एक दोन गोष्टींचा उल्लेख जाता जाता. प्रतिक्रिया सर्व अंगांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न.

१. माझ्यामते NCR म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन. नॉदर्न नव्हे. सुरुवातीला देखील असे नाव नव्हते.

२. पूर्वी नसलेला एक टोन म्हणा किंवा वास म्हणा यावेळच्या कथनात जाणवला आणि किंचित अस्वस्थ वाटले. आपण साधेसुधे चार जणांसारखे आहोत (मी अमुक नाही, तमुक नाही, थोडक्यात तथाकथित हुच्च नाही, थोर नाही) हे पुन्हा पुन्हा अधोरेखित करून (पुलंसारखे) , पुढे मात्र इतर अनेक सामान्य लोकांबाबत अनावश्यक उपरोध किंवा कुठेतरी अगदी नकळत कोणाच्यातरी अमुक असे असण्यावर खोचक पण ठाम निगेटिव्ह टिपणी जाताजाता करण्याची उर्मी टाळता आलेली नाही. असे लिहीणे तूर्त उत्स्फूर्त असेलही पण त्यातून पुढे पुढे वाढत्या प्रमाणात स्वतःला जाता जाता मी इतरांपेक्षा फार वेगळा, जाणता, उच्च अभिरुचीवाला (पण स्वतःला सामान्य म्हणवणारा नम्र देखील) असे अत्यंत सटलपणे आणि स्वतःच्याही नकळत प्रोजेक्ट करण्याचा धोका संभवतो लेखक म्हणून. मग विरोधाभास वाढून वाचकांपासून दूर जाणे घडते.

त्यांकडे बघून "अगद्दी परदेशी गेल्यासारखं वाटतं नै" असं (कधी परदेशी न गेलेला) आमचा एक मित्र म्हणत असे.

मराठी वर्तमानपत्रे ज्याला 'सळसळती तरुणाई' वगैरे म्हणतात तसेच सगळे होते असं नाही. बरेच मध्यमवयीन लोकही होते. जो तो आपापल्या मगदुराप्रमाणे सळसळत होता.

एक तर मी ग्राउंडशी जुडलेला राजकीय निरीक्षक, अंडरकव्हर पत्रकार, समाजमनाचा कानोसा घेणारा फेसबुकी लेखक, वित्त भांडवलाच्या चारित्र्याचा अभ्यासक, किंवा अरविंद अडिगा यांपैकी काहीच नसल्याने हे करायची मला कोणतीही खाज नाही.

मेन्यू उघडून पाहिला तर त्यात 'इमली जिंजर मार्गारिटा', 'जलजिरा जिन अँड टॉनिक', 'चाय ओल्ड फॅशन्ड' वगैरे भीषण आर्यांग्ल प्रकार होते.

परदेशांत त्यांच्या कॉकटेल्स किंवा शुगर केकची रेसिपी कशी जुगाड करण्यातून किंवा अपघाताने घडली याबाबतीत असंख्य कथा आपण ऐकून येऊन इतरांना ऐकवतो, कौतुकाने स्वीकारतो. भारतात कोणी असे प्रयोग केले, अगदी काही फसले तरी, ते भीषण म्हणून जनरलाईज करणं आवश्यक आहे का? मला इथली अनेक देशी फ्युजन टाइप आणि ओरिजीनल भारतीय प्रयोगातून आलेली कॉकटेल मॉकटेल खूप आवडली आहेत.

.....

एकूण गुरगावचा लेखाजोखा उत्तम आहे. इतर शहरांविषयी असेच लिहीत जावे..

आदूबाळ Fri, 01/11/2024 - 14:39

In reply to by गवि

सामान्य लोकांबाबत अनावश्यक उपरोध किंवा कुठेतरी अगदी नकळत कोणाच्यातरी अमुक असे असण्यावर खोचक पण ठाम निगेटिव्ह टिपणी जाताजाता करण्याची उर्मी टाळता आलेली नाही

Point taken, Sir! अनेक आभार.

परदेशांत त्यांच्या कॉकटेल्स किंवा शुगर केकची रेसिपी कशी जुगाड करण्यातून किंवा अपघाताने घडली याबाबतीत असंख्य कथा आपण ऐकून येऊन इतरांना ऐकवतो, कौतुकाने स्वीकारतो. भारतात कोणी असे प्रयोग केले, अगदी काही फसले तरी, ते भीषण म्हणून जनरलाईज करणं आवश्यक आहे का?

बहुधा हे कारण असावं. "फ्युजन अन्न ही संकल्पना बुद्धीला कितीही वेधक वाटली तरी त्या फ्युजनकल्पनेचं चविष्ट पदार्थांत रूपांतर करू शकणारे लोक फार फार कमी असतात."

कदाचित मीच योग्य फ्युजन चाखलं नसेल.

अनुप ढेरे Sat, 02/11/2024 - 11:21

लेख आवडला.
संजीव संन्याल या अर्थशास्त्रज्ञाच्या एका पुस्तकात गुरगाव आणि चंडीगढ अशी तुलना वाचली होती. चंडिगढ हे अतिशय 'planned'/ बनवलेले शहर आहे आणि गुडगाव त्याच्या टोटल विरुद्ध प्रकारे 'बनलेले शहर' आहे असे काहीसे. पण गुडगाव अतिशय chaotic असले तरी तथाकथित 'planned' शहराच्या तुलनेत unplanned गुडगावमध्ये आर्थिक उन्नतीच्या संधी कैक पटीने अधिक आहेत. आणि त्याही विविध वर्गातील लोकांना उपलब्ध आहेत. (लेखात ड्रायवर किंवा हाटेले चालवणारी उदाहरणे दिसत आहेतच. )
त्या तुलनेत 'planned' चंडिगढ ही नोकरशाह लोकांची retirement colony होती अनेक दशके.

Rajesh188 Sat, 02/11/2024 - 23:20

In reply to by अनुप ढेरे

दर्जा नावाचा काही तरी प्रकार असतो.
हे माहीत आहे का?
जगातील सर्वोत्तम शहरात एक पण भारतीय शहर नाही.

प्रश्न उद्योग व्यवसाय च..

अन्न पदार्थ पासून वाहतूक व्यवस्था ज्या मुळे जास्त रोजगार गुरगाव मध्ये असेल .
त्याचा दर्जा काय आहे त्याचा विचार करा.
लोक मजबुरी म्हणून त्याचा वापर करतात.
बस

'न'वी बाजू Sat, 09/11/2024 - 23:01

In reply to by अनुप ढेरे

तसे पाहायला गेले, तर आर्थिक उन्नतीच्या संधी धारावीतसुद्धा भरपूर असाव्यात. (भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे धंदे चालतात, म्हणे तिथे. आणि, मुख्य म्हणजे, त्यातले सगळेच धंदे बुरे नसावेत. (तिथली लेदर इंडस्ट्री बऱ्यापैकी आहे, म्हणून ऐकलेले आहे. खरेखोटे कोणास ठाऊक.)) आणि, कोणा ना कोणा अर्थशास्त्र्याने नाहीतर मॅनेजमेंट गुरूने त्याचे वारेमाप कौतुक कधी ना कधी केलेले असेलच. (कोणास ठाऊक, कदाचित त्याबद्दल गिनीज़बुकातही नाव आलेले असू शकेल. (चूभूद्याघ्या.))

मग, काय म्हणताय? कधी स्थलांतरित होताय धारावीला? (कदाचित तुम्ही नाही, तरी गेला बाजार तुमचे ते कोण ते अर्थशास्त्री तरी?)

(अतिअवांतर: रस्त्यात भीक मागणे हीदेखील ‘आर्थिक उन्नतीची संधी’ असू शकते कोणासाठी तरी. आणि, ती संधीसुद्धा खेडेगावां/लहान शहरांच्या तुलनेत मोठ्या शहरांत, नि planned शहरांच्या तुलनेत unplanned शहरांत अधिक मोठ्या प्रमाणात असते. So, what’s your point?)

(अर्थशास्त्रज्ञांचे काय जाते बोलायला? होय, गुड़गांव किंवा धारावी असल्या ठिकाणी ‘आर्थिक उन्नतीच्या संधी’ अधिक असतात, हे तत्त्वतः खरेच आहे. परंतु, is that necessarily a good thing?)

(नाहीतर मग, दुसऱ्या टोकाला, असल्या जागा बुलडोझ करून, त्यांखालची premium real estate विकून, स्वतःच्या ‘आर्थिक उन्नतीची संधी’ साधू पाहणारी दुसरीही एक जमात असते. परंतु, तूर्तास तो आपला विषय नाही.)

(सुपरअवांतर: Of all the political/economic theorists, Libertarians are the worst hypocrites (and charlatans). परंतु, तूर्तास तोही आपला विषय नसल्याकारणाने, सोडून देऊ. तसेही, प्रस्तुत संदर्भात हे विधान लागू असेलही वा नसेलही, परंतु, एक जनरल विधान म्हणून ते ठोकून देण्याचा मोह आवरता आला नाही, एवढेच त्या विधानाचे प्रयोजन; अन्य काहीही नाही.)

असो चालायचेच.

अनुप ढेरे Mon, 11/11/2024 - 13:20

In reply to by 'न'वी बाजू

धारावी हे शहरात नव्याने आलेल्या गरिब लोकांना देतेच सन्धी. त्याबद्दल पुष्कळसे लिहिले गेले आहेच.
आणि मी आता कशाला राहायला जाऊ तिथे? मी आता गरीब नाही. पण माझे आजोबा शहरात आले तेव्हा अशाच एका खोलीत सात लोक वगैरे ठिकाणी राहुनच शिकले आणि थोडे स्तेबल झाले. आता मला आर्थिक उन्नतीची गरज नाही.

Rajesh188 Mon, 11/11/2024 - 13:59

In reply to by अनुप ढेरे

धारावी मध्ये असे काय उद्योग आहेत.

इडली,समोसे बनवणे.

लेथर च्या वस्तू बनवणे.

लोणचे ,पापड .
इत्यादी असेच उद्योग आहेत
तिथे काही विमानाचे part बनत नाहीत.
तिथे जे उद्योग आहेत त्यासाठी .
शिक्षण गरजेचे नाही.
दहा पंधरा दिवसात येण्या सारखे काम असते.
त्या कामगार ना किती वेतन मिळते हा विषय वेगळा.

पण आठ दहा हजार रुपये महिना कमावण्यासाठी २ ते ३ हजार किलो मीटर वरून धारावी मध्ये यावं लागत असेल.
इडली बनवण्यासाठी इतका प्रवास करावा लागत असेल तर .
देशात प्लॅनिंग नावाची कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाहि.

हे सरळ आहे.

लोकांचे कमीत कमी स्थलांतर व्हावे ,त्यांना त्यांच्या भागात रोजगार मिळावा म्हणून प्लॅनिंग लागते.
त्या साठी प्लॅनिंग खूप महत्वाचे असतें
तुम्ही तेच नाकारत आहात.
धारावी मधील जीवनाचा स्तर काय आहे?
पैसा असेल
पण.
प्रदूषण,गर्दी, कचरा,कमीत कमी जागेत राहणारी लोक, .
.....

खूप

खूप वाईट जीवनाचा दर्जा आहे

सई केसकर Mon, 11/11/2024 - 14:39

In reply to by Rajesh188

धारावीत (ऐंशीच्या दशकात) कोणकोणते धंदे चालत होते हे या कादंबरीत चांगलं दिलेलं आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Shantaram_(novel)
बहुतेक यावर सिनेमाही आला आहे.

अनुप ढेरे Mon, 11/11/2024 - 14:58

In reply to by Rajesh188

धारावीमध्ये विमानाचे पार्ट्स वगैरे बनत नाहीत हे माहिती आहे. पण केवळ पापड लोणची बनतात असेही नाही. apparel उद्योग देखील आहे मोठा. स्थलान्तरित एवढ्या लाम्बुन ७/८००० मिळवायला शहरात स्वत:हुन, कोणत्याही बळजबरी शिवाय येतात आणि अशा ठिकाणी राहतात याचा अर्थ त्यांना हवे ते त्यांच्या मूळ ठिकाणी मिळत नाही आणि इथे मिळते असा आहे. पण लोक आले की कायमचे इथेच राह्तात असेही नाही. अनेकांसाठी तो एक स्टेपिन्ग स्टोन देखील असतो. इथे येउन पुढे कुठेतरी जातात.
धारावी अगदी नन्दन्वन आहे, सगळ्यात ideal असे कोणीही म्हणत नाही. गुन्हेगारी, बाल कामगार अशा अनेक गोष्टी आहेतच.

मूळ मुद्दा असा की central planning हे एक प्रकारचे बन्धन असते. unplanned ठिकाणी बन्धने कमी असल्याने अधिक संधी उपलब्ध होतात. हा मुद्दा मला पटतो.

Rajesh188 Wed, 13/11/2024 - 13:40

In reply to by तिरशिंगराव

चुकीचा अर्थ वाचकांनी काढला तर तुमची कॉमेंट अतिरेकी स्वरूपाची आहे लोकशाही शी विपरीत आहे .
असा समज होण्याचा धोका आहे

अगदी अगदी चुकीची कॉमेंट आहे .

योग्य निर्णय घ्यावा

Rajesh188 Sat, 02/11/2024 - 20:03

City प्लॅनिंग नावाचं काही तरी शास्त्र असते हे भारताला माहीतच नाही.

चंदीगड शहराचे प्लॅनिंग अमेरिकन नगर रचनाकार नी केले होते म्हणून ते शहर व्यवस्थित आहे.

ब्रिटिश लोकांनी मुंबई च प्लॅनिंग केले होते म्हणून मुंबई व्यवस्थित आहे ..सुंदर आहे( ब्रिटिश काळात जिला मुंबई शहर म्हणत फक्त ती मुंबई)
ब्रिटिश नंतर निर्माण झालेली मुंबई पण अस्ताव्यस्त च आहे .

भारतातील सर्व शहर ट्रॅफिक जॅम नी हैराण आहेत,प्रदूषण चरम सीमेवर आहे.

अति प्रचंड गर्दी प्रत्येक शहरात आहे.
फूटपाथ नावाचा प्रकार च शिल्लक नाही.
मोकळी मैदाने नाहीत,.
फक्त अस्ताव्यस्त वाढलेली खेडी च आहेत ती.

प्लॅनिंग कमिशन म्हणून काहीतरी प्रकार कागदावर तरी आहे .
पण ग्रामीण अर्थव्यवस्था कशी वाढेल, जेणेकरून शहरांवर अतिरिक्त बोजा पडणार नाही असली फालतू काम ते प्लॅनिंग कमिशन करत च नाही.

एकंदरीत भारतीय शहर,आणि ग्रामीण भागाचे भवित्व खूप सुंदर आहे असे वाटत नाही.

पुण्यात दोन किलोमीटर साठी १tas लागतो.
एक्स्प्रेस पासून सर्व प्रकारचे हायवे नेहमी जम असतात.

देश प्रगती करतो पण आपली अधोगती होत चालली आहे.
दहा वर्षापूर्वी मुंबई सातारा ४ तासात पोचता येतं होते .
आता ७ ये ८ तास लागतात..
Bypas स्वतचं जॅम असतो .
तो काय ट्रॅफिक बायपास करणार आहे

Nikhil Wed, 06/11/2024 - 05:59

In reply to by Rajesh188

चंदीगड शहराचे प्लॅनिंग अमेरिकन नगर रचनाकार नी केले होते म्हणून ते शहर व्यवस्थित आहे.

काहीही काय? कॉर्बू स्विस- फ्रेंच होता.

'न'वी बाजू Wed, 06/11/2024 - 06:29

In reply to by Nikhil

सर्वप्रथम एक अमेरिकन नगररचनाकार आणि एक पोलिश आर्किटेक्ट यांच्या जोडगोळीने काम हाती घेतले होते आणि कामाला सुरुवात केली होती. पैकी पोलिश आर्किटेक्टचे लवकरच विमानअपघाती निधन झाल्यानंतर अमेरिकन नगररचनाकाराने काम अर्धवट सोडून अंग काढून घेतले. त्यानंतर कोठे मग कॉर्बूज़िएला प्रकल्पात आणण्यात आले. त्याने अमेरिकन नगररचनाकाराच्या मूळ ढांच्यात आपली भर टाकून काम उरकले, असे कायसेसे विकी सांगतो.

(किंबहुना, राजेश१८८जींचा प्रतिसाद वाचल्यानंतर सर्वप्रथम माझीही प्रतिक्रिया तुमच्यासारखीच काहीशी झाली होती, नि असाच काहीसा प्रतिसाद लिहायला मीदेखील सरसावलो होतो. मात्र, प्रतिसादात तपशील भरण्याकरिता जसा विकीशोध घेऊ लागलो, तसे हे समजले. राजेशरावांचे अगदीच चुकले नाही, असे म्हणावेसे वाटते.)

अनुप ढेरे Fri, 08/11/2024 - 11:25

In reply to by Rajesh188

प्लानिन्ग कमिशन जे होते, ( काही मूठभर , निवडुन न आलेले लोक देशात किती गाड्या बनणार, किती सिमेन्ट बनणार वगैरे नियम बनवणार , मार्केट मध्ये मागणी कशाची आहे वगैरे न बघता) त्याला २०१४ मध्ये तिलान्जली देण्यात आली आहे. आता देशाचे प्लानिन्ग कमिशन अस्तित्त्वात नाही. तुम्हाला टाउन प्लनिन्ग म्हणाय्चे असावे.

मुद्दा सोपा होता. देशात मुख्य समस्या गरिबी आहे. गरिबीतुन लोकांना बाहेर पडण्याचा मार्ग गुरगावसारख्या शहरातुन जास्त मिळतो. तो मिळतो कारण गुरगाव किचकट नियमात बान्धले गेले नाहीये. गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग आणि थोडा chaos हे एकत्र येतात.

Rajesh188 Fri, 08/11/2024 - 14:19

In reply to by अनुप ढेरे

पण गरिबी निर्मूलन करण्याचा हा एकमेव मार्ग नाहि.
१)फूटपाथ वर अतिक्रमण करून फेरी च व्यवसाय करणे.
२) मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून झोपड्या बांधणे.
३) शहरच आकार किती मोठा आहे ,किती जमीन आहे हे न बघता सर्रास उंच ,उंच बिल्डिंग नियम तोडून बांधणे आणि लोकसंख्या एकच जागी जमा करणे.

शहर राहण्याच्या लायकीची भारतात बिलकुल राहिली नाहीत .
कारण नियोजन नाही.

उद्योगांचे विकेंद्रीकरण सक्ती नी केले पाहिजे.
ज्या राज्यात कायद्याचे राज्य नाही समाज हितासाठी दिलेला फंड योग्य कामासाठी जी राज्य सरकार वापरत नाहीत ती सरकार अनंत काळासाठी बरखास्त केली पाहिजेत.
यूपी बिहार ची सरकार ह्या निकषावर पुढील ५० वर्ष तरी बरखास्त होतील.

कारण ज्या प्रदेशात सक्षम सरकार नसते त्या भागातून लोक पलायन करतात पोट भरण्यासाठी.
यूपी,बिहार मधून सर्वात जास्त लोक पलायन करतात ह्याचा अर्थ स्पष्ट आहे त्या प्रदेशात सक्षम राज्य सरकार नाही.

भारतातून लोक अमेरिकेत जातात अमेरिकेतून लोक भारतात येत नाहीत.
ह्याचे पण तेच कारण आहे
ग्रामीण भागात रोजगार निर्मिती झाली पाहिजे.

योग्य रीती नी अशा प्रकारचं गरिबी दूर होईल.
रोजगार वाढवा म्हणून कोणताच भांडवलदार उद्योग निर्माण करत नाही.
सरकारी धोरणे , सरकार चे नियोजन ज्या प्रदेशात चांगली असतात तिथे च रोजगार निर्मिती होते.
नेमके ह्याच्या कडेच आपण दुर्लक्ष करतो

अनागोंदी कारभार गरीब आणि श्रीमंत सर्वांचे आयुष्य जगणे मुश्किल करेल

तुम्ही इतकेही वाईट नाही आहात हो! कधीकधी मुद्द्याची गोष्टसुद्धा बोलून जाता. You make sense sometimes, which others, weirdly enough, often don’t.

मानले तुम्हाला!

(म्हणूनच, तुमचे बऱ्याचदा पटत नसूनसुद्धा तुम्हाला support करण्याचा (माझ्या बाजूने) प्रयत्न करतो. असो.)

'न'वी बाजू Sun, 10/11/2024 - 03:36

In reply to by अनुप ढेरे

प्लानिन्ग कमिशन जे होते, ( काही मूठभर , निवडुन न आलेले लोक देशात किती गाड्या बनणार, किती सिमेन्ट बनणार वगैरे नियम बनवणार , मार्केट मध्ये मागणी कशाची आहे वगैरे न बघता) त्याला २०१४ मध्ये तिलान्जली देण्यात आली आहे.

प्लॅनिंग कमिशन हा प्रकार इतर अनेक कारणांकरिता टीकार्ह असू शकेलही (किंवा नसेलही; मला कल्पना नाही), मात्र, ‘काही मूठभर, निवडून न आलेले लोक’ हा खोडसाळ अपप्रचार आहे.

भारतीय राज्यव्यवस्थेत, सरकारी धोरणांची अंमलबजावणी, तथा त्याकरिता लागणारे नियम बनविणे वगैरे nitty-gritty कामे करणारी जी नोकरशाही (bureaucracy) व्यवस्था असते, ती तशीही लोकनियुक्त वगैरे नसते; किंबहुना, (लोकनियुक्त) सरकार बदलले, तरी नोकरशाही बदलतेच, असे नाही. मात्र, (भारतासारख्या वेस्टमिन्स्टरसदृश राज्यपद्धतींत) ही नोकरशाही अंतिमतः ज्या (विविध खात्यांच्या) मंत्रालयांना जबाबदार असते, त्यातील मंत्री हे लोकनियुक्त (निवडून आलेले) असतात (किंवा, नसले, तर नियमांप्रमाणे त्यांना सहा महिन्यांच्या आत त्यांना निवडून यावे लागते).

(उदाहरणादाखल, श्री. विवेक पटाईत हे निवडून आलेले सदस्य आहेत, अशी आपली प्रामाणिक समजूत आहे काय?)

‘प्लानिंग कमिशन’ तरी याला अपवाद का असावे?

((‘विकी’वरून मिळालेल्या माहितीनुसार) भारताचे पंतप्रधान हे ‘प्लानिंग कमिशन’चे पदसिद्ध अध्यक्ष असत, तर अर्थमंत्री, कृषिमंत्री, गृहमंत्री तथा इतरही काही मंत्री हे पदसिद्ध सदस्य असत. ही सर्व मंडळी (पंतप्रधान तथा इतर मंत्री) निवडून आलेली असत, आणि, अंतिमतः, या सर्वांच्या देखरेखीखालीच ‘प्लानिंग कमिशन’चे कामकाज चाले. प्रत्यक्ष नियम बनविणारे त्या-त्या क्षेत्रांतले तज्ज्ञ हे स्वतः जरी निवडून आलेले नसले, तरीसुद्धा, अंतिमतः ते या निवडून आलेल्या मंडळींना उत्तरदायी असत.)

(आणि, ‘प्लानिंग कमिशन’च्या जागी जो ‘निती आयोग’ आणला गेला, तो तरी ‘निवडून न आलेल्या लोकां’पासून मुक्त आहे, असा आपला दावा आहे काय? असल्यास, तो तपासला पाहिजे.)

—————

(अतिअवांतर: हे भारतासारख्या वेस्टमिन्स्टरसदृश व्यवस्थांचे झाले. अमेरिकन पद्धतीत तर (अध्यक्ष आणि उपाध्यक्ष वगळता) कॅबिनेटमधील कोणीच (अगदी विविध खात्यांचे ‘मंत्री’ अर्थात सेक्रेटरी किंवा खातेप्रमुख हेसुद्धा) सामान्यतः निवडून आलेले नसते; किंबहुना, नियमांप्रमाणे, त्यांनी निवडून आलेले नसणे हेच अपेक्षित आहे. (अध्यक्ष आपल्या मर्जीनुसार त्यांना नेमतात वा बडतर्फ करतात; मात्र, त्यांच्या नेमणुकीला (लोकनियुक्त) ‘सेनेट’ची (संसदेच्या उर्फ ‘काँग्रेस’च्या उच्चसदनाची) मान्यता असावी लागते.)

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हेसुद्धा, निवडून जरी आलेले असले, तरी ते केवळ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांपुरतेच; संसदेच्या उर्फ ‘काँग्रेस’च्या कोणत्याही सदनावर नव्हे. (उपाध्यक्ष हे जरी ‘सेनेट’चे अध्यक्ष असले, तरी केवळ पदसिद्ध, ‘सेनेट’वर निवडून आलेले नव्हेत; तेथे त्यांचा अधिकार हा वेळप्रसंगी कोंडी फोडण्यापुरते मत देण्याइतका मर्यादित असतो.)

याबद्दल काय म्हणणे आहे?)

—————

तर सांगण्याचा मतलब, ‘ काही मूठभर, निवडून न आलेले लोक’ हे तत्त्वतः खरे जरी असले, तरीही, हा दिशाभूल करण्याचा खोडसाळ प्रयत्न आहे.

(सुशिक्षितांची दिशाभूल करणे हे जर इतके सोपे असेल, तर अडाणी लोकांना गंडवणे हे कित्ती कित्ती सोप्पे असेल, नाही?)

अनुप ढेरे Mon, 11/11/2024 - 13:26

In reply to by 'न'वी बाजू

प्लनिन्ग कमिशन आणि नोकरशाही ही तुलना हास्यस्पद आहे नोकरशाही ही (planning commission प्रमाणेच ) निवडून आलेली नसली तरी नोकरशाही पोलिसी बनवत नाही. पोलिसी इम्प्लेमेन्ट करते. प्लनिन्ग कमिशन पोलिसी बनवत असे जे की सन्सदेचे काम असणे अपेक्षित आहे.

दिशाभूल माझी झालेली नसून तुमची झालेली आहे.

Rajesh188 Mon, 11/11/2024 - 14:29

In reply to by अनुप ढेरे

नोकर शाही पॉलिसी अमलात आणते हे अगदी खरे आहे.

देश स्वतंत्र झाल्या पासून आज पर्यंत भारत सरकार,राज्य सरकार ,नी अमलात आणलेल्या पॉलिसी किती टक्के अमलात आणल्या गेल्या.
आणि ही सर्व माहिती on record नक्कीच असेल.

भारत सरकार ची एक पॉलिसी, विविध राज्य सरकार न ची एक पण पॉलिसी नोकरशाही नी अमलात आणली नाही.
हेच सिद्ध होईल.
भारत अजून पण सर्वात जास्त गरीब लोक असणाऱ्या लोकांच्या देश आहे तो त्या मुळेच.
भारतात शेतकरी बिकट स्थिती मध्ये आहेत ते त्या मुळेच.
न्यूनतम वेतन पण लोकांना मिळत नाही ते पण त्या मुळेच.

सरकारी जागांवर अतिक्रमण झाले आहे ते पण त्या मुळेच.
शहर शेवटची घटका मोजत आहेत ते पण त्या मुळेच.
ग्रामीण भारत उजाड होत आहे ते पण त्या मुळेच.

सब का का साथ अपना ही विकास हे जे दृश्य दिसत आहे ते फक्त आणि फक्त नियोजन नसल्या मुळे च.
नियोजन म्हणजे planing इंग्लिश मध्ये.

आणि प्लॅनिंग च व्यापक अर्थ आहे सरकार नी घोषित केलेले प्लॅन किती यशस्वी झाले ह्याचे मूल्यमापन करणे.
ह्याला प्लॅनिंग म्हणतात आणि त्या साठी plyanig कमिशन ची गरज असते.
तेव्हा योग्य विकास होत आहे की नाही त्याची माहिती मिळते

सई केसकर Sat, 02/11/2024 - 22:25

आमचं कामही गुड़गांवच्या कंपन्यांमध्ये चालतं. तिथल्या ट्राफिकचा अंदाज न आल्याने सुरुवातीला पुण्यातून गेलेल्या निरागस माणसांची विमानं चुकली आहेत. डुक्कर टेम्पोची सुधारित "टाटा मेजिक" आवृत्ती मध्य प्रदेशात बघायला मिळते. तिथे पैसे देऊन आपापली स्वतंत्र टॅक्सी किंवा रिक्षा करायची का असा प्रस्ताव मांडल्यावर आपण परग्रहावरून आलो आहोत असं बघतात. सगळ्यांनी शेअर रिक्षा वापरायची असा नियम आहे. आणि प्रत्येक स्टॉपवर, "चलो सब दस दस ग्राम खसकों" असा आदेश रिक्षाचालक देतो. एखाद्याला सरकून जागा करून देण्याचं युनिट ग्रॅम असू शकेल असं कधी वाटलं नव्हतं.

'न'वी बाजू Sun, 10/11/2024 - 05:26

In reply to by सई केसकर

एखाद्याला सरकून जागा करून देण्याचं युनिट ग्रॅम असू शकेल असं कधी वाटलं नव्हतं.

आता, प्रकाशवर्ष हे जर कालमापनाऐवजी विस्थापनाचे एकक असू शकते, तर मग ग्राम का असू नये?

किंवा मग, ग्राम याचा अर्थ येथे गाव असा असू शकेल. (रिक्षाचालक शुद्ध देशी तुपात तळलेला एखादा पाण्डेऽय वगैरे असावा.) आणि, त्याच्या सूचनेचा अर्थ साधारणतः ‘दहा गावे सरका’ (अर्थात, ‘इथून दहा गावे इतके अंतर सरका’, म्हणजेच, ‘इथून कटा, आणि पुन्हा तोंड दाखवू नका’) असा घेता यावा बहुधा.

म्रिन Wed, 06/11/2024 - 15:50

वा, किती ती टोमणे कोणाकोणाला मारलेस आबा! आवडलंय वाचायला.
गुरगावात काही गेले नाही कधी, ऐकीव माहितीच फारशी बरी नाहीये.
तुझी मैत्रीण मुलाच्या तब्येतीसाठी गुरगावहून बंगलोरला गेली, आशा आहे की तिथे तिच्या मुलाची तब्येत ठीक आहे. कारण बंगलोरच्या हवेत दम्याचा त्रास होतो, खासकरून मुलांना, म्हणून तिथनं बाहेर पडणारेही लोक माहीत आहेत.

नितिन थत्ते Sun, 10/11/2024 - 12:57

गुरगांव/गुडगाव याचे नामकरण गुरुग्राम असे केले आहे. ते चूक आहे असे मला वाटते. कारण गुरुग्रामचा अपभ्रष्ट उच्चार गुरगाव होणे शक्य असले तरी तो गुडगाव होणे शक्य नाही. म्हणजे त्या भागात गुरप्रीत, गुरशरण अशी नावे असतात त्यांचा अपभ्रंश कोणी गुडप्रीत किवा गुडशरण करत नाही. तेव्हा त्या गावाचे मूळ नाव गुडगाव (बहुधा गूळ या अर्थी) असेच असून इंग्रजी काळात त्याचा आर झाला असावा. जसे रामगढ चे इंग्रजी स्पेलिंग रामगऱ्ह असे केले जाते.

'न'वी बाजू Sat, 16/11/2024 - 21:26

In reply to by नितिन थत्ते

जसे रामगढ चे इंग्रजी स्पेलिंग रामगऱ्ह असे केले जाते.

किंवा, ‘खडकी’चे ‘कर्की’.

अतिअवांतर: आम्ही प्राथमिक शाळेत असताना (सर्का १९७१-७५) ‘कर्की’, ‘पूना’, ‘थाना’, ‘शोलापूर’, ‘धुलिया’, ‘भीर’, ‘अम्राओती’, ‘येओतमाल’ असलीच रूपे (इंग्रजी भाषेतून) अधिकृतरीत्या प्रचलित होती. (तिसरीला भूगोलाकरिता ‘अवर पूना डिस्ट्रिक्ट’ नावाचे पुस्तक असल्याचे आठवते. (आम्ही प्राथमिक शाळा (तथाकथित) इंग्रजी माध्यमातून केली.)) नंतर त्याच काळात कधीतरी किंवा त्यानंतर लवकरच त्यांचे उच्चाटन झाले. (त्या मानाने ‘बॉम्बे’चे अधिकृतरीत्या (इंग्रजीतून) ’मुंबई’ व्हायला बराच काळ लोटावा लागला.)

तर सांगण्याचा मतलब, ‘कर्की’ (Kirkee) हे नाव आम्ही हमखास ‘किर्की’ असे वाचत असू. ते ‘कर्की’ असे वाचणे अपेक्षित होते, हे पुष्कळच नंतर कळले, आणि ज्या दिवशी कळले, त्या दिवशी ‘युरेका! Now it makes sense!’ अशी ट्यूब डोक्यात अचानक (आणि लख्खकन्) पेटली होती, असे आठवते.

असो चालायचेच.

विवेक पटाईत Sun, 10/11/2024 - 18:07

गुरुग्राम हे प्राचीन नाव आहे. या गावांत गुरु द्रोणाचार्‍यांचे आणि एकलव्याचे मंदिर ही आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही. बिना कार तुम्ही घरातून बाहेर पडू शकत नाही. गेल्या तीन महिन्यांपासून मी ग्रेटर नोयेडा वेस्ट इथे एका गृह निर्माण संस्थेत 22 व्या माल्यावरच्या फ्लॅट मध्ये शिफ्ट झालो. या भागात शेकडो इमारती 25 माल्यांच्या आहेत. इथे ही पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही. गाडी शिवाय पर्याय नाही. दुसरी कडे या भागातील गांवांत दुसरे विश्व आहे. चिपयांना बिसरख, इत्यादि गांवात एका खोलीत परिवार राहतात. या भागातील कुलसेरा गावात रावणाचे मंदिर आहे. इथे रावण दहन होत नाही. बाकी ट्राफिक जाम गुरुग्राम सारखेच.

Rajesh188 Sun, 10/11/2024 - 23:45

In reply to by विवेक पटाईत

नोएडा ल प्रशासकीय अधिकारी चालवतात तिथे स्वराज्य संस्था च नाही.

महानगर पालिका च नाही .
असे वाचले .

असे असेल तर तिथे सिटी बस असणे शक्य च नाही.
जनतेला सरळ बांधील व्यवस्था नसली की अनेक गैर सोयी जाणवतात च..
त्या मुळे तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसावी

'न'वी बाजू Mon, 11/11/2024 - 00:06

In reply to by Rajesh188

नोएडा ल प्रशासकीय अधिकारी चालवतात तिथे स्वराज्य संस्था च नाही.
महानगर पालिका च नाही .
असे वाचले .
असे असेल तर तिथे सिटी बस असणे शक्य च नाही.

स्थानिक स्वराज्य संस्था नसेल, तर तेथे सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेस कदाचित प्राधान्य मिळणार नाही, हा तर्क समजण्यासारखा आहे. (आणि म्हणूनच, अशा ठिकाणी सार्वजनिक वाहतूकव्यवस्था नसल्यास ते अनपेक्षित नाही, इथवरही कदाचित मान्य करता येण्यासारखे आहे.)

मात्र, (या कारणास्तव) अशा ठिकाणी सार्वजनिक वाहतूकव्यवस्था असणे शक्यच नाही, याबद्दल साशंक आहे.

Somebody please correct me if I am wrong, परंतु, १९७०च्या दशकाच्या सुमारास जेव्हा ‘नवी मुंबई’ प्रकल्प उभारणीस सुरू झाला, तेव्हा तेथे स्थानिक स्वराज्य संस्था होती का? माझ्या कल्पनेप्रमाणे, नसावी. (चूभूद्याघ्या.) मात्र, तेव्हासुद्धा तेथे ‘सिडको’ची बसवाहतूकव्यवस्था कार्यरत असावी, असे वाटते. (पुण्याहून मुंबईला रस्त्याने जाताना, वाटेत नवी मुंबई (वाशी) भागातून पार पडताना, रस्त्यात पाहिल्याचे अंधुकसे आठवते.)

नितिन थत्ते Sat, 16/11/2024 - 12:25

In reply to by 'न'वी बाजू

शिवाय कोल्हापूर आणि नाशिक सारख्या शहरात महपालिकेची वाहतुक व्यवस्था नसून एष्टी महामंडळाची स्थानिक वाहतुक व्यवस्था काही काळापूर्वी होती.

गवि Sat, 16/11/2024 - 20:54

In reply to by 'न'वी बाजू

रत्नागिरीत पण १९७०-८०

पांढऱ्या टपाची सिटी बस (शहर अंतर्गत). पिवळसर टपाची बाहेरगावी जाणारी. दोन्ही एसटीच्याच.

गवि Sat, 16/11/2024 - 20:56

In reply to by 'न'वी बाजू

सांगलीत १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला जोड गाडी पण असायची. एका बसमागे दुसरी बस (अर्थात विना इंजिनाचा डबा) साखळीने जोडलेला. त्याच्या मागे warning लिहीलेली असायची.

'न'वी बाजू Sun, 17/11/2024 - 04:40

In reply to by गवि

साधारणतः त्याच सुमारास पुण्यातसुद्धा (तत्कालीन) पीएमटीने हाच प्रयोग करून पाहिला होता. आणि हो, त्याच्याही मागे वॉर्निंग वगैरे असे. मात्र, (उदाहरणादाखल) फर्ग्युसन कॉलेज रोडवरून (साधारणतः गुडलकजवळच्या भागांतून वगैरे) सायकलीवरून जात असताना, बाजूने जर का पीएमटी ओलांडून गेली, आणि, ‘आता बस संपली’ या समजुतीखाली जर (सायकलस्वाराने) त्या बसच्या मागची जागा व्यापण्याच्या दृष्टीने त्या दिशेस हलण्याचा प्रयत्न केला, तर (१) त्या वॉर्निंगचा काहीही उपयोग नसे, आणि (२) त्या सायकलस्वाराची (उदाहरणादाखल: माझी) प्रचंड वाट लागत असे, असे अंधुकसे आठवते.

असो चालायचेच.

——————————

प्रस्तुत वाक्यांश, ‘मोटार चालू असताना, वाटेत जर का म्हैस आडवी आली,…‘च्या चालीवर म्हणून पाहायचाच झाल्यास, स्वतःच्या जबाबदारीवर म्हणून पाहावा.

गवि Sun, 17/11/2024 - 11:39

In reply to by 'न'वी बाजू

, ‘मोटार चालू असताना, वाटेत जर का म्हैस आडवी आली,…‘च्या चालीवर..

हाच कल्पनाविस्तार पुढे करत असताना असा विचार आला की "जिभेचे हाड मोडलें असेंल.." असे जर पुणेकर व्यक्तीच्या बाबतीत घडले तर कितपत दीर्घकालीन नुकसान होत असावे?

Rajesh188 Mon, 11/11/2024 - 00:44

मला नेहमी जाणवते आणि मी ह्या मतावर ठाम पण आहे.
किती ही नालायक लोक प्रतिनिधी असेल तरी तो जनतेशी सरळ बांधील असतो ,.

त्या मुळे लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या व्यक्ती पेक्षा संबंधित विभागातील समस्या समजून घेण्यात जास्त सक्षम असतात (भले शालेय शिक्षण कमी असले तरी)
जिथे लोकप्रतिनिधी नाहीत तिथे लोकांचे प्रश्न समजून घेणारी कोणतीच सक्षम यंत्रणा नसते.
नोकरशही कधीच लोकांशी बांधील नसते

'न'वी बाजू Mon, 11/11/2024 - 05:00

In reply to by Rajesh188

किती ही नालायक लोक प्रतिनिधी असेल तरी तो जनतेशी सरळ बांधील असतो ,.

आणि

जिथे लोकप्रतिनिधी नाहीत तिथे लोकांचे प्रश्न समजून घेणारी कोणतीच सक्षम यंत्रणा नसते.
नोकरशही कधीच लोकांशी बांधील नसते

या दोन्ही विधानांच्या विरोधात मला काहीच म्हणायचे नाही; ती आपापल्या जागी बरोबरच आहेत.

माझे म्हणणे एवढेच आहे, की अशी यंत्रणा असो वा नसो, एखाद्या नोकरशाहीने (बांधिलकीपोटी नव्हे, परंतु) suo motu अशी काही सुविधा पुरविणे हे अगदीच अशक्य नसावे.

मारवा Sun, 17/11/2024 - 09:13

मिश्किल आणि संवेदनशील लेख.
नवशब्दनिर्मितीकौशल्य रोचक मनोरंजक
मात्र लेख गुरगावची अंडरबेली दाखवतोय असे काही वाटले नाही.
लेख एका मर्यादित अनुभवा वर आधारीत आहे. वरची त्वचा सोललेली.
पण अत्यंत प्रमाणिकपणे जितना जाना ऊतना मांडलेल आहे. लेखकाला तशी महत्त्वाकांक्षा पण नाही अंडरबेली उलगडून दाखवतो वगैरे हे त्यानीच स्पष्ट केलंय. कामधंदा सांभाळून एका मराठी माणसाने जमेल तीतके झाकण उघडून दाखवले. आणि ते फार उत्तमरीत्या केलेले आहे.
विशेष उल्लेखनीय जमून आलेला तुकडा म्हणजे स्टराइल !
अगदी मोजक्या शब्दांत गुरगाव च्या पर्यावरणाची भीषण स्थिती, त्यातून निर्माण होणारी ट्रॅजेडी मजबूरी फार तीव्रतेनें पोहचवली. हाच फरक आहे क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन आणि निव्वळ माहिती अभ्यासू शैलीत मांडण्यामध्ये.
Minimalism साधलाय.

लेखक अजून गुरगाव ची वारी करो अजून अनुभवत अजून ठिकाणी टॉर्च मारून दाखवो
महत्वाकांक्षी नसलेला उदासीन लेखक (लिहिण्यासंदर्भात) हा अधिक deep dive मारतो त्यांच्या तुलनेने जे जीवनाचा अनुभव घेण्यासाठी त्वेषाने बाहेर पडतात असे माझे मत आहे.
आदु अर्थातच उदासीन आहेत.

चिमणराव Wed, 20/11/2024 - 16:04

लेखकाला जसा दिसला गाव गुडगाव तसा मांडला त्यांच्या शैलीत.

काही अनुभव सांगितले. शैलीचे ओचकारे गविंनी काढले आहेत. पण मला एक दोन परिच्छेद वाचले की सवय होते. ( मुळात दीर्घ कथा लिहिण्याची आवड असलेला लेखक प्रथमच या हद्दीत घुसला आहे. त्याच्या कथांमध्ये चार कथानकं समांतर यशस्वीपणे नेतो. चारही शेवटी एकत्र येतात. ) आपल्याला पुलंची सवय होते तशी. शैली बदलायला लावणारे आम्ही कोण? अगदी सुचवायचेच झाले तर मी संवादात्मक कथन अधिक वाढवा म्हणेन.
लेखन आवडलं आहे. गुडगावची ओळख आवडली.
"लेखनाची सुरसुरी असल्यानेच लिहितो" हे मागे कधी वाचलं आहे.