Skip to main content

चित्रपटातले प्रथम "हट के"

भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ऐसी अक्षरेवर झालेला "सोहळा" फार मोठा दिमाखदार नसला तरी आवडला. त्यानिमित्ताने कोणत्या चित्रपटात सर्वप्रथम काही वेगळं झाल्याच्या नोंदी आहेत का हे शोधत होतो. काही सापडले, काही सापडले नाहीत. पण अशी एक संपूर्ण यादी बनवावी असे वाटते. विशेषतः इंटरनेट आणि आय.एम.डी.बी.च्या आधीच्या जमान्यातल्या चित्रपटांची माहिती चार लोकांशी बोलल्याशिवाय जमा होणार नाही.

पहिला भारतीय बनावटीचा पिक्चर 'राजा हरिश्चंद्र' आहे हे आता सगळ्यांना माहित आहे. 'आलम आरा' (पहिली टॉकी), 'वक्त' (पहिला मल्टीस्टारर) वगैरे सिनेमांचे कौतुकही अनेक लोक करतात त्यामुळे ते ही माहित असतं. पण पडद्यावर सर्वप्रथम काही "हट के" गोष्टी करणार्‍या चित्रपटांची यादी कोणीही बनवत नाही. यांनाही का उपेक्षित ठेवावं? त्यामुळे चर्चा किंवा माहितीची देवाणघेवाण सुरू करण्यासाठी माझ्याकडून काही इनपुट्सः

भारतीय चित्रपटात सर्वप्रथम:

  • चित्रपटात पुरूषाचा बूड दाखवणं: मेरा नाम जोकर (?)
  • तोंडाचा व्यायाम करवणार्‍या नावाच्या रोगाची शिकार असणारं पात्र चित्रपटात प्रमुख भूमिकेतः आनंद (आणि पुढे पा)
  • हिरॉईनीला लग्नाआधीच मूल होणे: ज्यूली
  • स्तनपान करताना: राम तेरी गंगा मैली
  • वारा सरण्याचा उल्लेख आणि दाखवणे: हम दिल दे चुके सनम ('गंध' चित्रपटाची कल्पना तिथूनच आली का?)
  • मुलीच्या वयाच्या हिरॉईनशी हिरोचे अफेअर दाखवणे: नि:शब्द
  • बापापेचा मोठ्या वयाच्या हिरोशी हिरॉईनचे अफेअरः चीनी कम
  • चित्रपटात प्रथमच खोटे का होईना, समलैंगिक दाखवणे: दोस्ताना (दाखवायचं नसूनही गे वर्तणूक सुचवण्याबद्दल 'मै खिलाडी तू अनाडी'बद्दल अशोक रावकवी यांनी काही लिहीलं होतं आणि त्यावर चिडून सैफ अली खानने रावकवी यांनामारहाण केली होती असं आठवतं.)
  • नायक व्हर्जिन आहे पण नायिका नाही: एक मै और एक तू (हा 'जब वी मेट'वाल्याचा नवा चित्रपट आहे)
  • रोमँटीक पिक्चर असूनही शेवटी नायक-नायिकेचे अफेअर झालेलं दाखवलेलं नाही: (पुन्हा एकदा,) एक मै और एक तू
  • चित्रपटात बूड दाखवणारी बाप-लेकाची जोडी: ऋषि आणि रणबीर कपूर
  • पडद्यावर "वन-पीस" (किंवा स्कर्ट यांपैकी एक काहीतरी) घालणारा हिरो - धर्मेंद्र
  • (मर्दानी "सौंदर्या"ऐवजी) मेट्रोसेक्शुआलिटीसाठी शर्ट काढणारा पहिला हिरो - सलमान खान
  • आयटम गर्ल्सची (काही काळापुरतीतरी) चलती संपवणारी - माधुरी दीक्षित

हिंदी/भारतीय चित्रपटांत अशा इतर कोणत्या "हट के" गोष्टी आहेत ज्या या यादीत असाव्यात?

जयदीप चिपलकट्टी Fri, 08/06/2012 - 04:40

'शोले' मध्ये टांकसाळीतून चुकीचं तयार झालेलं (म्हणजे दोन्ही बाजूला 'छापा' असलेलं) नाणं हे plot device म्हणून वापरलेलं अाहे. अशासारखी कल्पना दुसरीकडे कुठे वापरलेली कुणाच्या पाहण्यात अाहे का? (माझ्या तरी नाही.)

या नाण्याबद्दल अाणखी एक गोंधळात पाडणारा प्रकार म्हणजे सिनेमातला काळ हा स्वातंत्र्यानंतरचा अाहे (कारण 'हम अंग्रेज के जमाने के जेलर हैं' असं वाक्य) पण नाणं इंग्रजी अामदानीतलं अाहे, तेव्हा धर्मेन्द्रला चलनात नसलेलं नाणं पुन्हापुन्हा टॉससाठी वापरल्याचा संशय कसा येत नाही कोण जाणे. (त्याचं पात्र विलक्षण बुद्धिमान दाखवलेलं नाही हे मला मान्य अाहे, पण तरीही…)

'न'वी बाजू Fri, 08/06/2012 - 05:08

In reply to by जयदीप चिपलकट्टी

पण नाणं इंग्रजी अामदानीतलं अाहे, तेव्हा धर्मेन्द्रला चलनात नसलेलं नाणं पुन्हापुन्हा टॉससाठी वापरल्याचा संशय कसा येत नाही कोण जाणे.

कोणास ठाऊक, कदाचित अमिताभच्या पात्राने (जयने) ते नाणे 'सेंटिमेंटल वॅल्यू' म्हणून (पाचव्या की सहाव्या ज्या कुठल्या असेल त्या जॉर्जची आठवण म्हणून) ठेवले असेल, आपल्याला काय करायचे आहे, म्हणून कदाचित धर्मेंद्रच्या पात्राने (वीरूने) त्याकडे काणाडोळा केला असावा. (लोक नाहीतरी 'सेंटी'च्या नावाखाली कशाकशाच्या आठवणी जपतात. तसाच असेल यालाही काही छंद. आपणास काय ठाऊक? आपल्याला एवढी चांगलीचुंगली बसंती आहे, तिच्याकडे पहायचे म्हटले, तरी जमत नाही - मौसी आड येते. तर मग याच्या भानगडींकडे कुठे लक्ष देत बसायचे? असाच सुज्ञ विचार त्या परिस्थितीत निदान मी तरी केला असता बुवा. वीरूनेही तो तसाच केला, याबद्दल त्याला मी कोणत्या तोंडाने दोष द्यावा?)

याउलट आमचा जय म्हणजे एकदम पक्का. त्याचे म्हणणे, सेंटिमेंट को मारो गोली. (तसा बर्‍यापैकी निष्णात नेमबाज होताच म्हणा तो.) त्याने ते दोनदोन (!) सहावे जॉर्ज असणारे नाणे व्यवस्थित जपून ठेवले खरे, पण ते त्या दोघा सहाव्यांची आठवण म्हणून नव्हे काही. त्याला पक्के ठाऊक, की जे 'बाई' या सदरात मोडत नाही, त्याकडे (ते 'बाटली' असल्याखेरीज) वीरू काही ढुंकूनदेखील पाहणार नाही. तेव्हा त्याला बनवत रहायला ही ट्रिक चांगली आहे. चुकूनदेखील उघडकीस येणार नाही. (बरे झाले, सहाव्या जॉर्जच्या कारकीर्दीतच इंग्रजांनी हिंदुस्थान सोडला ते. इंग्रजी राज्य आणखी काही वर्षे जरी टिकले असते, तरी जयची ही ट्रिक कदाचित चालण्यातली नव्हती.)

ऋषिकेश Fri, 08/06/2012 - 09:59

पहिला भारतीय बनावटीचा पिक्चर 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'

नसून 'राजा हरिशचंद्र' हा आहे :)

बाकी सर्वाधिक काळ शुटिंग चालूनही प्रचंड हिट असलेला चित्रपटः मुघल-ए-आजम

Churchill Sat, 09/06/2012 - 00:26

In reply to by ऋषिकेश

गडबडीत थोडी चूकच झाली.

बाकी सर्वाधिक काळ शुटिंग चालूनही प्रचंड हिट असलेला चित्रपटः मुघल-ए-आजम

लेखात उल्लेख केलेल्या 'सोहळ्या'त ज्या चित्रपटाचा उल्लेख झाला आहे तो 'पाकीजा' दहा वर्षांच्यावर बनत होता. मुघल-ए-आझमला किती काळ लागला?

राजेश घासकडवी Fri, 08/06/2012 - 16:25

शिनेमांविषयी माझी माहिती जरा बेताचीच असल्यामुळे किती भर घालता येईल सांगता येत नाही.

पहिलं चुंबनदृश्य - बेताब. याआधी हिरो हिरॉइनींची तोंडं जवळ जवळ जवळ येत आणि मध्येच कुठचातरी झाडपाला किंवा फुलोरा आड येत असे. गणिताचे एक मास्तर त्या ओठांमधलं अंतर हे कॅल्क्युलसमधली 'एक्स टेंड्स टू झीरो' ही संकल्पना शिकवताना वापरायचे.

आयटम गर्ल्सची (काही काळापुरतीतरी) चलती संपवणारी - माधुरी दीक्षित

हे मात्र पटत नाही. आमची झीनत अमान पहिली - हिरॉइन आणि आयटम गर्ल यांचा डब्बल रोल करणारी.

चिंतातुर जंतू Fri, 08/06/2012 - 17:13

In reply to by राजेश घासकडवी

>>पहिलं चुंबनदृश्य - बेताब. याआधी हिरो हिरॉइनींची तोंडं जवळ जवळ जवळ येत आणि मध्येच कुठचातरी झाडपाला किंवा फुलोरा आड येत असे.

(रामाच्या काळातच आपल्याकडे पुष्पक विमान होतं महाराजा या चालीवर...) स्वातंत्र्यपूर्व काळातच हिंदी सिनेमांनी हे कर्तृत्वशिखर गाठलेलं होतं. नंतर आपण भ्रष्ट झालो आणि चुंबनांकरता काळं युग पडद्यावर अवतरलं. उदाहरणार्थ हे पाहा, किंवा १९३३च्या 'कर्मा'मधलं देविका राणी आणि हिमांशू रॉय यांच्यातलं हे चुंबनदृश्य :

राजेश घासकडवी Fri, 08/06/2012 - 17:56

In reply to by चिंतातुर जंतू

बरं झालं, चित्रपटांबद्दलची माझी माहिती बेताचीच आहे डिस्क्लेमर आधीच टाकलं ते :)

मला वाटतं स्वातंत्र्योत्तर काळ हा चित्रपटांमधल्या चुंबनदृश्यांसाठी मध्ययुग म्हणावं लागेल. रेनेसान्सची सुरूवात बेताबने केली असावी.

चिंतातुर जंतू Fri, 08/06/2012 - 18:15

In reply to by राजेश घासकडवी

>>रेनेसान्सची सुरूवात बेताबने केली असावी.

हं असं म्हणता येईल खरं, पण एक मोठा धक्का तुमच्या झिनी बेबीनं 'सत्यम् शिवम् सुंदरम्'मध्ये दिला होता :

Nile Fri, 08/06/2012 - 20:58

In reply to by चिंतातुर जंतू

स्वातंत्र्यपूर्व काळातच हिंदी सिनेमांनी हे कर्तृत्वशिखर गाठलेलं होतं.

इतकंच नाही तर अशा उदारमतवादात (या दृश्यातून तरी) स्त्रीवर्गसुद्धा आघाडीवर होता असे दिसते! स्वातंत्र्यानंतर काहीतरी झोल झालेला दिसतो. ;-)

'न'वी बाजू Fri, 08/06/2012 - 21:40

In reply to by Nile

... याचीच सेंटिमेंटल आठवण म्हणून 'जय'ने ते (दोनदोन) सहावा जॉर्जवाले नाणे एवढे जपून ठेवले असावे काय?

(ठीकाय ठीकाय... हा पिच्चर १९३३चा, सहावा जॉर्ज १९३६अखेरपासून. १९३३ सालचा जॉर्ज तो पाचवा. पण आपल्याला इंग्रजी अमदानीच्या आठवणीने सद्गदित होण्याशी मतलब. जॉर्ज पाचवा की सहावा, याने काय फरक पडतो?)

Churchill Sat, 09/06/2012 - 00:29

In reply to by राजेश घासकडवी

श्री. घासकडवी आणि त्यांच्यासारखे इतरही लोक असल्यासः

चित्रपटांबद्दल माहिती नसल्यास हरकत नाही. निदान काय काय कॅटॅगरीज हव्यात याचा उल्लेख प्रतिसादातून करता येईल. उदाहरणार्थ, भारतीय चित्रपटात सर्वप्रथम मारियुआना किंवा तत्सम पदार्थांचा उपयोग झाल्याची दृष्य सर्वप्रथम कोणत्या चित्रपटात आली? 'दम मारो दम'च्या आधी कोणी असेल तर मला माहित नाही.

झीनत अमानच्या काळातही आयटम गर्ल्स चित्रपटात दिसत नसत का? झीनत अमान एकटीच होती, पण माधुरीनंतर मेन स्ट्रीममधल्या हीरॉईनीच आयटम साँग्ज करायला लागल्या आणि आयटम साँग्जनाही लोकमान्यता मिळाली असं काही मला सुचवायचे होते.

जयदीप चिपलकट्टी Sat, 09/06/2012 - 01:06

माझ्या समजुतीप्रमाणे एकेकाळी सिनेमाचा असा अलिखित नियम होता की हिरॉईनवर यशस्वी बलात्कार होऊ शकत नाही. म्हणजे तसा प्रयत्न होऊ शकतो, किंवा तिला पळवलं वगैरे जाऊ शकतं पण अायत्यावेळी काहीतरी होऊन ती वाचते. मला वाटतं १९८५-९० च्या अासपास केव्हातरी हा नियम मोडला गेला, अाणि मग एकदोन वर्षांत पूर्ण निकालातच निघाला. पण पहिल्यांदा केव्हा हे कुणाला माहिती अाहे का?

'नटरंग'मध्ये पुरुषावर झालेला बलात्कार अाहे. तोसुद्धा अशा प्रकारचा पहिलाच प्रसंग असू शकेल.

Nile Sat, 09/06/2012 - 01:21

शिवी असलेला पहिला चित्रपण कोणता असावा बरे? सालं चित्रपटांबाबत आपला अभ्यास म्हणजे अगदीच "ह्या" आहे. पण पहिली शिवी कधी, कोणी, कोणाला आणि कोणत्या चित्रपटात दिली हे जाणून घ्यायला आवडेल.

तसेच नेहमीच साला हिरो जिंकणार असं असतं. त्या विपरीत पहिला व्हिलन प्रोटॅगॉनिस्ट सिनेमा कोणता?

चेतन सुभाष गुगळे Thu, 14/06/2012 - 12:59

In reply to by Nile

तसेच नेहमीच साला हिरो जिंकणार असं असतं. त्या विपरीत पहिला ... .>>

काल्पनिक कथेत नायकाला जिंकवण्याचं स्वातंत्र्य लेखक / दिग्दर्शकाला असलं तरी वास्तव घटनेवर चित्रपट बनविताना असं करण्यावर मर्यादा येतात. ज्या युद्धामध्ये भारत हरला आहे अशा १९६२ च्या चीन विरोधी युद्धावर बनलेला दिग्दर्शक चेतन आनंद यांचा हकीगत हा प्रयोग देखील हटकेच म्हणावा लागेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/06/2012 - 02:53

तसेच नेहमीच साला हिरो जिंकणार असं असतं. त्या विपरीत पहिला व्हिलन प्रोटॅगॉनिस्ट सिनेमा कोणता?

त्यामानाने नवीन असणार्‍या 'बाजीगर'चं या बाबतीत कौतुक झालेलं होतं. पण '१०० डेज'चा नंबर त्या आधी लागावा. अंजाम, एक हसीना थी वगैरे चित्रपट त्यामागून आले.

स्त्रियांना, विशेषतः नायिकांना, खलपात्र दाखवणारे चित्रपट आणखीनच कमी असावेत असं वाटतं. आत्ता फक्त 'गुप्त'च आठवतोय. तसं 'दिल से'मधे मनीषा कोईरालाही दहशतवादी दाखवलेली आहे. मालिकांमधल्या खवीस बायका चित्रपटात येऊन एवढ्या सोज्ज्वळ का बनतात?

या यादीत घालायला आणखी एक प्रकार सुचला, पण त्याचं वर्णन नीट जमलेलं नाही:
अंगप्रदर्शनासाठी प्रसिद्ध असणारी नटी (मल्लिका शेरावत) चित्रपटात "मी नाही त्यातली" म्हणते असा चित्रपटः प्यार के साईड इफेक्ट्स.

मी Sat, 09/06/2012 - 23:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>पण '१०० डेज'चा नंबर त्या आधी लागावा.

शोले बहूदा सर्वात वर असावा, गब्बरएवढा भाव अमिताभच्या वाट्याला पण नाय आला, रुढ अर्थाने नसला तरी गब्बर वॉज दी हिरो ऑफ शोले. तसा मदर इंडीया मधला सुनील दत्त राजिंदर पेक्षा जास्त भाव खातो, पण तो मेन्शनेबल वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 13/06/2012 - 23:22

In reply to by मी

तुमचा हा प्रतिसादही 'हट-के'च म्हणायला हवा. ;-)

'ये हाथ हम को दे ठाकूर', 'कितने आदमी थे', 'आदमी तीन, गोलियां छे। बहुत नाईन्साफी है' किंवा 'रामपूर की छोरीया किस चक्की का आटा खाती है..." वगैरे डायलॉग जय-वीरू आणि ठाकूरच्या डायलॉगांपेक्षा काकणभर अधिक लोकप्रिय असतील असं वाटतं. एक्ट्राच्या पात्रांचा 'ये सुसाड का होता है...." संवादही लोकप्रिय आहे. त्याही बाबतीत शोले हटके वाटतो.
आणि तसेही जय-वीरू हे भुरटे चोर, रूढार्थाने वाया गेलेले, डोक्यावर इनाम असणारे लोक दिग्दर्शकाने मुख्य कलाकार म्हणून दाखवलेले आहेत.

'मदर इंडीया' पाहिलेला नाही, त्यामुळे पास.

तिरशिंगराव Wed, 13/06/2012 - 21:12

एकही गाणे नसलेला पहिला सिनेमा म्हणजे अशोककुमारचा 'कानून'.
एकही डायलॉग नसलेला सिनेमा कमल हसनचा 'पुष्पक'

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 13/06/2012 - 23:26

'किसी और की मुझ को जरूरत क्या मै तो खुद से प्यार जताऊं' असं खुल्लमखुल्ला म्हणणारी शीला भारतीय चित्रपटातली पहिलीच व्यक्ती का? अभ्यासू काका लोकांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.

चेतन सुभाष गुगळे Thu, 14/06/2012 - 12:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शाहरुख खान कृत अशोका तील करिना कपुर वर चित्रीत झालेल्या एका गाण्यात "मै आप ही अपनी प्रेमिका, मै आप ही अपनी सहेली" असे शब्द आहेत.

मन Sun, 17/06/2012 - 15:58

लोकप्रभेत खच्चून भरलय ह्यावेळेला:-
१९३० चे दशक असावे:-
इम्पीरियलच्या ‘पुजारन’मध्ये बिलिमोरिया व सुलोचना चक्क देवळाच्या गाभाऱ्यात, अगदी देवाला साक्षी ठेवून धुंद प्रणयाराधन करताना दाखवले आहेत. यावर सर्व िहदूंनी बहिष्कार टाकायला हवा होता, पण त्याविषयी कुणी अवाक्षरही काढले नाही.

त्याशिवाय :-

द्वारकादास संपत यांच्या ‘सती अनुसूया’ (१९२१) या मूकपटात काही मिनिटांचा का होईना पण सकिनाबाई या नटीने संपूर्ण विवस्त्र शॉट दिला होता.

आणि हे सुद्धा:-
प्र. के. अत्रे यांचा ‘ब्रह्मचारी’ हा त्या वेळचा क्रांतिकारी हॉट चित्रपट! यामध्ये, मराठमोळी नायिका मीनाक्षी प्रथमच स्वीिमग ड्रेसमध्ये पडद्यावर आली. प्रेक्षकांसाठी हे काहीतरी अप्रूप होते. भालजी पेंढारकर यांचा ‘श्यामसुंदर’ पाहताना पडद्यासमोरील स्टेजवर अक्षता, हळदीकुंकू, फुले, नारळ ठेवून भक्तिभावाने त्याच्या पाया पडणारे भोळेभाबडे प्रेक्षक ‘ब्रह्मचारी’ पाहाताना पुढील रांगा अडवून बसत. मीनाक्षीच्या, स्वििमग ड्रेसमधील ‘यमुना जळी खेळू खेळ कन्हय्या का’ गाण्याच्या वेळी कॅमेरा खालून वर जात असे. पुढच्या रांगेत बसलेले प्रेक्षक कमरेतून खाली वाकून आशाळभूत नजरेने वर जाणाऱ्या कॅमेऱ्याकडे, अजून काही दिसतंय का? ते पाहात!

अधिक रंजकः-
१९४३ मध्ये विजय भट्ट महात्मा गांधींना ‘रामराज्य’ दाखवायला घेऊन आले होते. पण राम रामासारखा दिसत नाही आणि सीता ही सीतेसारखी वाटत नाही म्हणत जेमतेम एक रीळ पाहून गांधीजी निघून गेले. आता प्रभू रामाला कुणीही, कधीही प्रत्यक्ष पाहिले होते का?

Churchill Tue, 19/06/2012 - 05:38

लोकप्रभेतला मूळ लेख वाचला. रोचक आहे खरा!

'हट के' चित्रपटांची यादी बनवावीशी का वाटली याबद्दल थोडे:

चित्रपटांत सर्वप्रथम स्विमसूट घालणार्‍या मीनाक्षीबाईंचा उल्लेख वर दोन कॉमेंट्समधे आला आहे. मीनाक्षीबाईंनी त्या काळात घातलेल्या स्विमसूटएवढे (ज्याने काही खळबळ माजवली होती) कपडे आजच्या काळात सामान्य मुली, स्त्रिया सर्रास घालतात, कदाचित अजूनही कमीच. अगदी भारतातही! मीनाक्षीबाईंच्या नाती, शिल्पा आणि नम्रता शिरोडकर यांनी बिकीनी घालण्यात काहीच नावीन्य राहिलेले नव्हते. मधल्या काळात निश्चितच भारतीय समाजाची, विशेषतः पुरूषांची, नजर थोडीतरी निश्चितच मेली, किंवा निर्ढावलेपण आलं किंवा कमी कपड्यांतल्या स्त्रिया पाहून भारतीय पुरूष वासनांचे प्रदर्शन ताब्यात ठेवायला शिकले. एकीकडे या हिरॉईन्सना शोभेच्या बाहुल्या म्हणतात, दुसरीकडे काही स्त्रीवादी स्त्रियांच्या या स्किन-शोवर आक्षेप घेतात आणि तिसर्‍या बाजूने समाजाची नजर स्किन-शोमुळे मरते. एका पिढीतल्या काही स्त्रियांनी पुढारलेपण, आधुनिकता (आणि कातडीही) दाखवली; पुढच्या पिढीतल्या आम स्त्रिया अगदी सहज, आधीच्या पिढीपेक्षा तोकडे कपडे घालून बाहेर येऊ शकल्या.

आणि हीच गोष्ट इतर बाबतीतही! सलमानच्या मेट्रोसेक्शुअल वागण्यामुळे इतर मेट्रोसेक्शुअल मुलगे-पुरूषांना सलॉनमधे जाण्यात बायकीपणा नाही असं ठासून सांगता आलं. गुडी-गुडी हिरोंची चलती असणारे बडजात्या-छाप सिनेमांचं प्रमाण कमी होऊन तिथेही ग्रे-शेड्स असणारे 'हिरो' दिसायला लागले. अगदी करण जोहरनेही 'कभी अलविदा ना कहना'सारख्या तद्दन चोप्रापटातून "जमत नसेल तर लग्न मोडून टाका" दाखवलं. तीन दीवारें, डोरसारख्या अपवादात्मक सिनेमांमधून स्त्री केंद्री आणि तरीही रेशमी रूमालाच्या गुंडाळीबाहेरची कथा सिनेमात दिसायला लागली.

पिक्चर्समधल्या 'हट के' गोष्टींशिवाय आधुनिकता आलीच नसती का? अर्थात आधुनिकता फक्त चित्रपटांमधूनच येते असं नाही; पण चित्रपटांनी त्यांच्या पद्धतीने मदत केली आणि करत आहेत एवढंच.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 21/06/2012 - 09:08

In reply to by Churchill

तीन दीवारें, डोरसारख्या अपवादात्मक सिनेमांमधून स्त्री केंद्री आणि तरीही रेशमी रूमालाच्या गुंडाळीबाहेरची कथा सिनेमात दिसायला लागली.

माफ करा, पण तीन दीवारेंमधे जुही चावलाचं पात्र गोष्टीसाठी अतिशय महत्त्वाचं असलं तरीही चित्रपट स्त्रीकेंद्रित वाटत नाही. डोर तसा आहे निश्चित आणि दोन्ही चित्रपटात रेशमी रूमालांच्या गुंडाळ्या नाहीत हे ही मान्य.

राधिका Mon, 02/07/2012 - 12:15

स्त्री दिग्दर्शिकेचा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट- बुलबुल-ए-परिस्तान. (संदर्भ- http://en.wikipedia.org/wiki/Fatma_Begum)
आणि या दिग्दर्शिकेचे नाव आहे- फातमा बेगम.

:-)